मराठी साहित्य – जीवनरंग ☆ राग… – भाग -2 ☆ श्री दीपक तांबोळी ☆

?जीवनरंग ?

☆ राग… – भाग -2 ☆ श्री दीपक तांबोळी

(मागील भागात आपण पाहीलं-  अनूला आता शोधणं भाग होतं.न सांगता माहेरी तर निघून नाही गेली? पण मोबाईल घेतल्याशिवाय ती जाणार नाही हे त्याच्या लक्षात आलं.कपडे थोडे व्यवस्थित करुन तो जायला निघाला तेवढ्यात दार लोटून अनू आत आली तिच्या कडेवर बाळ होतं आणि ते शांत झोपलं होतं.  आता इथून पुढे )

“कुठे गेली होतीस?” त्याने विचारलं पण त्याला उत्तर न देता ती बेडरुममध्ये गेली.बाळाला पाळण्यात टाकून त्याला झोपवलं.अजित आत आला.

” बरं वाटतंय का त्याला?”त्याने विचारलं.तिने त्याच्याकडे पाहिलं आणि तोंडावर हात दाबून ती रडायला लागली.मग बेडवर जाऊन उशीत डोकं खुपसून मुसमुसत राहिली.

” साँरी अनू आज खुप टेंशन होतं गं.त्यामुळे…..”

उत्तर न देता अनू रडत राहिली.अजितने पाळण्यात झोपलेल्या बाळाकडे पाहिलं.त्याच्या निरागस गोड चेहऱ्याकडे पाहून त्याला उचलून घ्यायचा मोह त्याला झाला. पण अनू रागावेल या भितीने तो त्याला न घेताच बाहेर आला.

रात्री दोन वाजता त्याला जाग आली.अनू आणि बाळ दोघंही जागेवर नव्हते पण कुठूनतरी बाळाच्या रडण्याचा आवाज येत होता.तो उठून बाहेर आला.अंगणातला दिवा सुरु होता आणि अनू बाळाला थोपटत झोपवायचा प्रयत्न करत होती.

” मी घेऊ त्याला?”त्याने अनूला विचारलं.तिने मानेनेच त्याला नकार दिला आणि फेऱ्या मारणं सूरु ठेवलं.अजित थोडावेळ थांबून परत बेडरुममध्ये येऊन झोपला.एक गोष्ट त्याच्या लक्षात आली.आई ती आई असते.मुलांनी कितीही त्रास दिला तरी ती रागवत नाही,ओरडत नाही.प्रेमाने त्यांची सेवा करणं ती सुरुच ठेवते.बाप कितीही चांगला असला तरी तो आई होऊ शकत नाही.त्याला आठवलं लहानपणी तो एकदा आजारी पडला होता त्यावेळी त्याच्या आईने ७-८ रात्री अक्षरशः जागून काढल्या होत्या.

दुसऱ्या दिवसापासून रुटीन सुरु झालं.पण अनू त्याच्याशी मोकळेपणाने बोलत नव्हती.फक्त त्याने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरंच देत होती, तीही तुटक.तीन दिवसात तर तिने त्याला बाळाला हातसुध्दा लावू दिला नाही.अजितला न घेताच ती बाळाला दवाखान्यात घेऊन जायची.

कंपनीत आलं की अजितला आज आँर्डर येणार नाही ना याची भिती वाटायची. त्याचं कामावरचं लक्ष उडालं. एकदा तर क्वालिटीकडे लक्ष न दिल्यामुळे बरंच मटेरिअल वाया गेलं.नेहमीप्रमाणे पाटीलने सर्व कामगारांसमोर त्याचा पाणउतारा केला.राचीची आँर्डर लवकरच देण्याची धमकीही तो देऊन गेला.

दुसर्‍या आणि तिसर्‍या दिवशी पाटील प्लांटमध्ये आला नाही तेव्हा अजितला आश्चर्य वाटलं. त्याने  चौकशी केली तर पाटील मुंबईच्या आँफिसमध्ये गेल्याचं कळलं.नक्कीच तो आपली आँर्डर काढायला गेला असावा याची त्याला खात्री पटली.पण आता त्याने मनाची तयारी केली होती.अनू आणि बाळाला राचीला घेऊन जायला त्याला हरकत नव्हती.पण तिथून महाराष्ट्रात परतणं सोपं नाही हेही त्याला माहित होतं.आईच्या ट्रिटमेंटसाठी त्याला सुटी घेऊन यावं लागणार होतं.धावपळ होणार होती,त्रास होणार होता पण इलाज नव्हता.सध्याच्या बेरोजगारीच्या काळात अशी चांगली नोकरी लगेच मिळणं फार कठीण होतं.

तिसऱ्या दिवशीही पाटील कंपनीत आलाच नाही.अजितचं टेंशन वाढलं होतं.त्यात दुपारी शिपाई जी.एम.साहेबांनी बोलावल्याचा निरोप घेऊन आला.जड पावलांनी तो त्यांच्या केबिनजवळ पोहचला.

” मे आय कम ईन सर”

” येस कम ईन”

तो जी.एम.साहेबांसमोर जाऊन उभा राहिला.

” हँव अ सीट माय बाँय”

अजित अवघडून  बसला.जी.एम.साहेबांनी ड्राँवरमधून एक लिफाफा काढून टेबलवर ठेवला.

“धीस इज युवर आँर्डर.”

शेवटी जी येऊ नये असं वाटत होतं ती आँर्डर आली होती.पाटीलने त्याला छळायचं सोडलं नव्हतं.अजितच्या पायातलं त्राण गेलं.त्याने डोळे घट्ट मिटून घेतले.संताप,निराशा,अपमान या मनातल्या भावनांवर तो ताबा मिळवायचा प्रयत्न करु लागला.

“काँग्रँच्युलेशन्स फाँर युवर प्रमोशन!”

त्याच्या कानावर जी.एम.साहेबांचे शब्द पडले आणि त्याने खाडकन डोळे उघडले.

“प्रमोशन?विच प्रमोशन?”त्याने आश्चर्याने विचारलं.

“येस! यू हँव बीन प्रमोटेड टू दी पोस्ट आँफ प्राँडक्शन मँनेजर.”

अजितला फारसा आनंद झाला नाही.राचीच्या प्लांटमध्ये प्रमोशन मिळणं फारसं आनंददायी नव्हतं कारण नवीन प्लांटला सांभाळणं सोपं नव्हतं.

” सर राचीका प्लांट कैसा है?जस्ट आस्कींग टू हँव अ नाँलेज बिफोर जाँयनिंग. “

“यु आर नाँट गोईंग टू राची.यु विल वर्क हिअर अँज प्राँडक्शन मँनेजर.”

“व्हाँट?”अजित खाडकन उभा राहिला. त्याचा स्वतःच्या कानांवर विश्वास बसेना.

“येस माय बाँय”जी.एम.हसत म्हणाले.

“व्हाँट अबाउट मिस्टर संतोष पाटील सर?”

” उनको कंपनीने निकाल दिया है. ही वाँज व्हेरी अँरोगंट पर्सन. ही नाँट ओन्ली इन्स्ल्टेड मी बट आल्सो अवर एम.डी. ही हँड सबमिटेड मेनी कंप्लेंटस् रिगार्डिंग युवर वर्कींग बट आय वाँज व्हेरी मच नोन अबाऊट युवर हार्ड वर्क अँड डेडीकेशनस्. सो आय रिकमेंड युवर नेम फाँर धीस पोस्ट. “

जी.एम.साहेब बऱ्याच वेळ पाटीलबद्दल बोलत होते. कामापेक्षा इतर भानगडीत त्याला जास्त रस होता. त्याच्या कालावधीत प्राँडक्शनचा दर्जा घसरला होता त्यामुळे कंपनीचं खूप नुकसान झालं होतं.म्हणून कंपनीने त्याला डच्चू दिला होता.

आनंदाच्या भरात अजित घरी यायला निघाला.वाटेत त्याने पेढे घेतले.घरात तो शिरला तर बाळ हाँलमध्येच खाली सतरंजीवर पहुडला होता.अनू किचनमध्ये काहितरी करत असावी.अजित बँग ठेवून बाळाकडे गेला.बाळाने त्याच्याकडे पाहिलं आणि तो गोड हसला.त्याच्या हसण्याने हुरळून जाऊन अजित त्याच्याशी गप्पा मारु लागला.त्याच्या गोबऱ्या गालांवर हात फिरवू लागला.त्याच्या उघड्या पोटावर बोटांनी गुदगुल्या केल्यावर बाळ खळखळून हसला.त्याच्या गालाचा मुका घेण्यासाठी अजित खाली वाकला तेव्हा बाळ त्याचे गबगुबीत मऊ हात त्याच्या गालांवर फिरवू लागला.अजितला आता रहावलं नाही.अनावर प्रेमाने त्याने बाळाला उचलून घट्ट छातीशी धरलं आणि त्याच्या डोक्यावरून,पाठिवरुन प्रेमाने हात फिरवू लागला.मग अजितने त्याला दोन्ही हातांनी हवेत उडवलं आणि परत झेललं तसा बाळ खळखळून हसला.त्याला आता अजितची थोडीही भिती वाटत नव्हती.

” द्या इकडे त्याला माझ्याकडे” अनूच्या बोलण्याने तो अचानक भानावर आला.

” राहू दे ना थोडा वेळ. बघ कसा छान खेळतोय.खळखळून हसतोय.”

“नको.तो रडायला लागला की परत फेकून द्याल त्याला कुठेतरी. चल रे बेटा,चल दुध प्यायचंय ना” अनूने बाळाला घेण्यासाठी हात पुढे केले पण आज बाळाचा मुड वेगळाच होता.त्याने क्षणभर तिच्याकडे आणि अजितकडे पाहिलं आणि त्याने मान फिरवली.आपले दोन्ही हात अजितच्या गळ्यात टाकून तो त्याला बिलगला.अनूने जबरदस्तीने त्याला ओढण्याचा प्रयत्न केला पण प्रत्येक वेळी तो मान फिरवून अजितला मिठी मारत होता.         ” बदमाश!विसरला वाटतं बाबांनी त्यादिवशी कसं तुला फेकून दिलं होतं ते”हताश होऊन अनू म्हणाली.

“अनू ,बाळ विसरला बघ ती गोष्ट. तुही विसर ना प्लीज” अजित कळकळीने म्हणाला.”     तो विसरेल. तुम्हीही विसराल हो.पण मी कशी विसरेन.नऊ महिने वाढवलंय मी त्याला पोटात.त्याला जन्म देतानांच्या वेदना मी सहन केल्यात. तुमच्या संतापामुळे एका मिनिटात होत्याचं नव्हतं झालं असतं.बरं तरी सोफ्यावर आदळलं,फरशीवर आदळलं असतं तर…” बोलता बोलता तिचा स्वर गहिवरला.

” चुकलंच माझं अनू.फार टेंशन होतं गं त्या दिवशी. त्यातून बाळाच्या रडण्याने मी कातावून गेलो होतो.”

” पण म्हणून तुमचा राग त्या निरागस जीवावर काढायचा तुम्हांला काही हक्क नव्हता.आणि टेंशन कुणाला नसतात हो? मीही नोकरी केलीये. तिथे काय टेंशन असतं मलाही माहितेय.पण आँफिसमधला राग मी कधीही घरातल्या व्यक्तीवर काढला नाही.त्यादिवशी मीही टेंशनमध्ये होते. एक जिवलग मित्र अचानक वारल्यामुळे बाबांना हार्ट अटँक आला होता.त्यांना आय.सी.यू.त भरती केल्याचा आईचा फोन आला होता.”

“अरे बापरे!अगं मग सांगायचंस ना!आपण गेलो असतो त्यांना भेटायला.”

” काय सांगणार?मी काही सांगण्याआधीच तुम्ही नको ते करुन बसलात.मग तुम्हाला सांगायची हिंमतच नाही झाली.”

” आय अँम एक्स्ट्रिमली साँरी अनू.खरंच मी त्यादिवशी तसं वागायला नको होतं.खुप पश्चाताप होतोय गं.माफ कर ना मला प्लीज!”

” मी काय माफ करणार तुम्हांला? जगात जेव्हा जेव्हा क्रोध निर्माण झाला त्यात निरागस,निष्पापांचाच बळी गेला आहे.माझं बाळ माझं विश्व आहे अजित. त्या विश्वाला तोडण्याचा प्रयत्न तुम्ही केलात. तुमच्यासारख्या शांत व्यक्तीकडून ही अपेक्षा नव्हती म्हणून मला खुप जबरदस्त धक्का बसला होता.बस.परत असं करतांना शंभर वेळा विचार करा एवढंच माझं म्हणणं आहे.”

” तुझी शपथ,अनू मी परत असं कधीही करणार नाही.”

बाळाचा हसल्याचा आवाज आला तसं अनूने त्याच्याकडे पाहिलं.आता मात्र बाळाने तिच्याकडे झेप घेतली.

” एक आनंदाची बातमी आहे अनू.माझं प्रमोशन झालं आणि विशेष म्हणजे मला त्रास देणाऱ्या आमच्या प्राँडक्शन मँनेजरचीही कंपनीने हकालपट्टी केली.बरं चल अगोदर आपण तुझ्या बाबांना बघायला जाऊ. त्यांना बरं वाटत असेल तरच मी आणलेले पेढे खाऊ.”

“अहो त्यांना माईल्ड अटँक आला होता. तीन दिवसातच त्यांना डाँक्टरांनी घरी पाठवलं.’      “मग तर पेढे खायलाच पाहिजे” असं म्हणून अजितने बँगेतला पेढ्यांचा बाँक्स काढून अनूला एक पेढा भरवला. अनूनेही एक पेढा अजितला भरवला. शेवटी सगळं गोड झालं हे पाहून की काय अनूच्या कडेवरचा बाळही खुदकन हसला.

– समाप्त –

© श्री दीपक तांबोळी

9503011250

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ राग… – भाग -1 ☆ श्री दीपक तांबोळी ☆

?जीवनरंग ?

☆ राग… – भाग -1 ☆ श्री दीपक तांबोळी

“साहेब चला,पाटीलसाहेब बोलावताहेत”

कामात गुंतलेल्या अजितला शिपाई म्हणाला, तसं अजितने मान वर करुन त्याच्याकडे पाहिलं.

” कामात आहे जरा. येतो थोड्या वेळाने”

“अर्जंट आहे असं म्हंटले साहेब. घेऊनच ये म्हणाले साहेबांना”

” ठिक आहे.तू चल पुढे ,मी येतोच आवरुन” मोठ्या नाराजीने अजित म्हणाला.शिपाई गेला तसा त्याने लँपटाँप बंद केला.खरं तर त्याचा कामाचा मुडच गेला होता.पाटीलसाहेबांनी बोलावलं म्हणजे नक्कीच काहीतरी वाईट सुनावण्यासाठी बोलावलं असणार याचा त्याला अंदाज होता.कारण आजपर्यंत पाटीलसाहेब चुकूनही त्याच्याशी कधी चांगलं बोलला नव्हता.आपल्याकडून काय चुक झाली असावी याचा विचार करतच तो साहेबाच्या केबिनजवळ पोहचला.” संतोष पाटील,प्राँडक्शन मँनेजर ” या पाटीवर त्याची नजर गेली.”संतोष” या नावाचं त्याला हसू आलं.”कसला संतोष?हा तर असंतोष फैलावणारा माणूस” त्याच्या मनात आलं.दारावर टकटक करुन तो आत गेला.नाकावर घसरलेल्या चष्म्याने पाटील साहेबांनी त्याच्याकडे वरपासून खालपर्यंत पाहिलं.

” सर तुम्ही मला बोलावलंत?”अजितने विचारलं.

“मि.शेवाळे कलकी डे शिफ्टमें प्राँडक्शन कम क्यू हूँआ?”

मराठी असुनही साहेबाने पुन्हा त्याच्याशी हिंदीत बोलावं हे पाहून अजितचं डोकं सणकलं. ” सर मशीन खराब झाली होती ती रिपेअर करण्यात दोन तास गेले. तसा रिपोर्टही मी सबमिट केलाये”

” मशीन क्यूँ खराब हुई?आप लोग मशीनको मेंटेन नही रखते हो इसलिए ना?”

“सर मशीन जुनी झालीये.तिचे बरेच पार्टस गंजलेत.तिला रिप्लेस करणं आवश्यक आहे”

“मेरेको सिखा रहे हो क्या?और मैने तुमको कितनी बार बोला है की हिंदीमें बात करो लेकीन तुम्हारी तो मनमानी चल रही है.”

साहेब उध्दटपणे बोलला तशी संतापाची एक तिडीक अजितच्या डोक्यातून गेली.तो जरा जोरातच बोलला, ” साहेब तुम्ही मराठी मी मराठी.मग आपण हिंदीत बोलायचं कशाला?”

” इस कंपनीचा मालिक बिहारका है. तो वो जिस भाषामें बात करता है उसी भाषामें हमे बात करना है.”

“साहेब असा कुठे नियम आहे?आपले जी.एम.साहेब तर साऊथ इंडियन आहेत ते तर नेहमी इंग्रजीतून बोलतात.आपल्या एच.आर.ही साऊथ इंडियन आहेत त्यांच्याशी ते तामिळ भाषेत बोलतात.”

‘ याचा अर्थ असा झाला कीबमी चुकीचं बोलतोय. हे बघ, मला काहीवुझ्याशी वाद घालायचा नाहीये. मी ज्या कामासाठी तुला बोलावलं, त ऐक. जरखंडाच्या राची मध्ये आपला एक प्लांट सुरू होतोय. तिथे काही इंजींनीयर्सची गरज आहे. मी तुझं नाव प्रपोज केलय, एव्हा तयार रहा. एका आठवड्यात तुझी ऑर्डर येईल. ते ऐकून अजित सुन्न झाला. त्याच्यावर जणू आकाश कोसळलं.

” साहेब माझी आई खेड्यावर रहाते तिला कँन्सरच्या ट्रिटमेंटसाठी वारंवार मुंबईला न्यावं लागतं. घरात चार महिन्यांचं बाळ आहे. कसं शक्य आहे मला इतक्या दुर जाणं?आणि आपल्याकडे दुसरे बिहारी इंजीनियर्स आहेतच की, त्यांना पाठवा ना तिकडे. ते एका पायावर तयार होतील “अजित गयावया करत म्हणाला.

” मै कुछ नही सुनना चाहता. अपने यहा इतने बिहारी काम करते है.इनकी भी तो कोई प्रॉब्लेम होगी! क्या उनको माँ-बाप, बिवीबच्चे नही है? ये तो कभी तुम्हारे जैसी कहाँनियाँ सुनाते नही.”

“साहेब ही कहाणी नाही……”

“देखो भाई तुमको जाना तो पडेगा. नही तो नोकरी छोडके घरपे बैठ जाना. जाओ अपना काम करो.आँर्डर के लिए तय्यार रहना”

अजित खचलेल्या मनाने तिथून बाहेर पडला.संताप,निराशा आणि रांचीला गेल्यावर आईवडिलांचे,बायकोचे होणारे हाल यांच्या चित्रांनी त्याच्या मनात वादळं निर्माण होत होती. 

ही कंपनी एका बिहारी मालकाची होती.स्थापन केल्यानंतर त्याने अगोदर स्थानिक मराठी कामगार आणि सुपरव्हायजर्सची भरती केली होती.अजित त्याचवेळी इथं एका बिहारी मित्रामुळेच जाँईन झाला होता.काही दिवसांनी मराठी कामगार आणि सुपरव्हायजर्सची गळती सूरु झाली.मराठी कामगार काम करत नाहीत असं मालकाचं म्हणणं होतं.काम सोडून गुटखा,तंबाखू खाणं,वेळीअवेळी चहा प्यायला जाणं,गप्पा मारणं,सुपरव्हायजर्सला दमदाटी करणं असे प्रकार सुरु होते.अजून काही दिवसांनी स्थानिक राजकीय नेते कंपनीत युनियन स्थापण्याच्या प्रयत्नात आहेत असं समजल्यावर मालकाने मराठी कामगारांना डच्चू द्यायला सुरुवात केली.अजितचं काम चांगलं होतं.खेड्यातल्या शेतमजुराच्या गरीब कुटुंबातून तो आला असल्यामुळे त्याला नोकरीची गरज होती. त्यामुळे तो आपलं काम इमानेइतबारे करत होता.शिवाय तो मेहनती आणि हुशारही होता.त्यामुळे कंपनीने त्याला धक्का लावला नाही. हळूहळू कंपनी बिहारी कामगार आणि सुपरव्हायजर्सनी भरुन गेली.अजित एकटाच मराठी इंजीनियर तिथे उरला.मागच्या वर्षी संतोष पाटील नावाचा प्राँडक्शन मँनेजर कंपनीत रुजू झाला तेव्हा अजितला आपला मराठी माणूस आल्याचा खुप आनंद झाला होता.पण हा आनंद फार काळ टिकला नाही.संतोष पाटील इतर बिहारी सुपरव्हायजर्सशी प्रेमाने बोलायचा.त्यांना शाबासकी द्यायचा.पण अजितशी तुसडेपणाने वागायचा.त्याच्या कामात मुद्दामच चुका काढून कामगारांसमोरच पाणउतारा करायचा.अजित त्याच्याशी मराठीत बोलायला लागला की तो हटकून हिंदीत बोलायचा.मराठीत बोलण्यावरुन त्याने अजितला ” मेरे मराठी होनेका गलत फायदा उठानेकी कोशीश मत करना” अशी अनेकदा ताकीदही दिली होती.बिहारी मालकाला इंप्रेस करण्यासाठी तो हे करतोय हे अजितला समजत होतं.तो मनातल्या मनात त्याला खूप शिव्या घालायचा.पण बाँस असल्याने मर्यादेने वागणं भाग होतंच.

शिफ्ट संपली.अजित कंपनीतून निघाला तो डोक्यात राग घेऊनच.एका मराठी माणसानेच दुसऱ्या मराठी माणसाचा जाणूनबुजून छळ करावा याचा त्याला राहूनराहून संताप येत होता.

ऐका वळणावर तो डावीकडे वळणार तोच राँगसाईडने एक बाईकवाला येऊन त्याला धडकला.अजित वाचला पण त्याची बाईक खाली पडली.

“काय रे हरामखोर.ट्रँफिक रुल माहित नाहिये तर गाडी चालवतोच कशाला?” अजित त्याच्यावर ओरडला.तसा तो बाईकवाला बाईकवरुन खाली उतरला.

” हरामखोर कुणाला म्हणतो रे ×××××”

दोघांची बाचाबाची सुरु झाली.शब्दाला शब्द वाढत गेला.दोघांभोवती गर्दी जमा होऊ लागली.लोक दोघांना समजावू लागले.पण दोघं पेटले होते.दोघांची हाणामारी सुरु होणार इतक्यात ट्रँफिक पोलिस पळत आला.दोघांना समजावून बाजुला केलं.अजित जायला निघाला.पोलिसाने गर्दी पांगवली आणि राँग साईड घुसणाऱ्या पोराला बाजूला कोपऱ्यात  नेलं.त्या पोराने पाचशेची नोट काढून पोलिसाच्या हातात ठेवली आणि बाईकला किक मारुन तो ऐटीत निघून गेला.अजितने ती देवाणघेवाण पाहिली आणि तो अधिकच संतापला.पण स्वतःला शांत करायचा प्रयत्न करत आपल्या बाईकचं तुटलेलं मडगार्ड पाहून त्याने बाईक उचलली आणि घराकडे निघाला.

तो घरात शिरला तेव्हा बेडरुममधून बाळाच्या रडण्याचा आवाज त्याला आला.बँग ठेवून तो बेडरुममध्ये गेला तेव्हा अनू बाळाला कडेवर घेऊन त्याला थोपटत फिरत होती.

” काय झालं का रडतोय तो?” अजितने विचारलं. त्याच्या स्वरातला कठोरपणा पाहून ती चकीतच झाली पण शांत स्वरात त्याला म्हणाली.

“अहो काही नाही त्याने सू केलीये म्हणून रडतोय.बदललेत मी त्याचे कपडे.जरा बेडवरची चादर बदलायची राहिलीये.जरा धरता का याला.थोडं फिरवा.तोपर्यंत मी चादर बदलून घेते.”

अजितने त्याला कडेवर घेतलं आणि त्याला घेऊन बाहेरच्या हाँलमध्ये आला.त्याच्या पाठीवर थोपटत त्याला शांत करायचा प्रयत्न करु लागला.पण आज बाळानेही त्याच्या सहनशीलतेची परीक्षा घ्यायचं ठरवलं असावं.तो रडणं थांबवायचं नाव घेत नव्हता.दिवसभर घडलेल्या घटनांनी तापलेल्या अजितच्या डोक्यात आता संताप शिरु लागला.

“ए बाबा,बस कर ना आता. किती रडशील?आधीच डोकं तापलंय माझं.बस कर” पण बाळ शांत व्हायचं नाव घेत नव्हता.अजितने जरा जोरातच त्याच्या पाठीत चापट मारली.     ” पटकन शांत हो म्हंटलं ना तुला.बस कर”अजित त्याच्यावर खेकसला.पण चापट मारण्याने आणि अजितच्या खेकसण्याने बाळ अजूनच जोरात रडायला लागला. अजितचा आता संयम संपला.बाळाला दोन्ही हाताने त्याने समोर धरलं आणि तो मोठ्याने ओरडला, ’”बंद कर तुझं रडणं.”

एक क्षण बाळ शांत बसलं. दुसऱ्याच क्षणी त्याने दुप्पट आवाजात भोकाड पसरलं.अजितचा संताप अनावर झाला आणि त्याने बाळाला सोफावर फेकून दिलं.अजितच ओरडणं पाहून बाहेर येत असलेल्या अनूने ते दृश्य पाहिलं आणि ती जोरात किंचाळली

“अहो काय करताय…..?”आणि ती सोफ्याकडे धावत गेली.इतक्या वरुन फेकल्यामुळे क्षणभर स्तब्ध  झालेलं बाळ आता किंचाळू लागलं.अनूने पटकन त्याला उचलून छातीशी धरलं.

“असं फेकतात बाळाला?”अजितकडे रागाने आणि दुःखाने पहात ती म्हणाली.तिच्या डोळ्यात अश्रू जमा झाले होते.

” लवकर शांत कर त्याला.त्याच्या रडण्याने डोकं फाटतंय माझं” अजित तिच्यावर ओरडला.

“अहो आजारी आहे तो. ताप आहे त्याला.तापात रडतातच मुलं! ” रडतरडत अनू म्हणाली आणि बाळाला घेऊन बाहेर अंगणात गेली.अजित कपडे न काढताच बेडरुममध्ये गेला आणि बेडवर त्याने स्वतःला झोकून दिलं.मणामणाचे घाव त्याच्या डोक्यात पडत होते.दिवसभरातल्या घटनांनी त्याचं मानसिक संतुलन पार बिघडून गेलं होतं.बराचवेळ तो तळमळत पडला होता.एक तासाने त्याला जरा बरं वाटू लागलं.त्याने कानोसा घेतला.बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू येत नव्हता.आपण मगाशी बाळाला फेकल्याचं त्याला आठवलं आणि भीतीची एक शिरशिरी त्याच्या शरीरातून निघून गेली.बापरे!त्याला काही झालं तर नाही ना?अनू त्याला दवाखान्यात तर नाही घेऊन गेली?खरंच त्याला काही झालं असेल तर?मानेला काही झटका बसून…..! त्याविचारासरशी तो घाबरून उठला.बाहेरच्या हाँलमध्ये आला.अनू आणि बाळ दोघंही तिथे नव्हते.तो बाहेर अंगणात आला मग गेट उघडून तो बाहेर रस्त्यावर आला.पण कुठेही त्या दोघांचा पत्ता नव्हता.तो परत आत आला.मोबाईल उचलून त्याने अनूला फोन लावला.रिंग वाजली पण अनूचा मोबाईल समोरच टेबलवर होता.ती मोबाईल घरातच ठेवून गेली होती.बाळाच्या काळजीने आता अजितला घाम फुटला.त्याचा तो गोड ,हसरा चेहरा आठवून त्याच्या डोळ्यात आसवं जमा होऊ लागली.जीव कासावीस होऊ लागला.तिरीमिरीत तो उठला.अनूला आता शोधणं भाग होतं.न सांगता माहेरी तर निघून नाही गेली? पण मोबाईल घेतल्याशिवाय ती जाणार नाही हे त्याच्या लक्षात आलं.कपडे थोडे व्यवस्थित करुन तो जायला निघाला तेवढ्यात दार लोटून अनू आत आली तिच्या कडेवर बाळ होतं आणि ते शांत झोपलं होतं.

क्रमश: भाग १

© श्री दीपक तांबोळी

9503011250

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मोहनमाळ ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर

? जीवनरंग ❤️

☆ मोहनमाळ ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

भागिरथीबाई वयाच्या ८१व्या वर्षी वारल्या. काल दिवसकार्य झालं आणि आज चौदाव्याचं गोडाचं जेवण!आता जरा आराम करून मंडळी आपापल्या घराकडे निघणार होती. गजानन आणि त्याची बायको गडी माणसांकडून मागची आवरा-आवर करून घेण्यात गुंतली होती. हो, हातासरशी कामं करून घेतली नाही, तर परत कामाला माणसं कुठून मिळणार?  बाकीची तीन मुलं, त्यांच्या बायका, एक मुलगी आणि जावई माजघरात बसली होती. त्यांची हलक्या आवाजात कुजबुज चालू होती.

भागिरथीबाईंना एकूण नऊ मुलं झाली, पण आज घडीला चार मुलगे आणि एक मुलगी तेवढी जिवंत आहेत. सगळी, लग्न, पोरंबाळं होऊन रांगेला लागलेली. मोठा गजानन आणि त्याचं कुटुंब, भागिरथीबाईंसोबत रत्नागिरीजवळ चिखलीला राहात होतं. त्याच्या पाठचा सुरेश, रमेश, आणि वसंता ही मुंबईत, तर नंदा पुण्यात स्थिरावलेली.

चिखलीतलं  जुनं कौलारू घर तसं लहानच, पण दरवर्षी काही ना काही दुरूस्तीचा खर्च असायचाच. म्हणून मोठ्या मनानं सगळ्या भावंडांनी घरावरचा हक्क सोडून, ते गजाननाच्या नावावर करून दिलं होतं. थोडी नारळ-सुपारीची झाडं आणि आंब्याची कलमं होती. दरवर्षी सगळे भाऊ, एकेक जण करून आठ दिवस राहून जायचे.गाडीनी आसपासच्या कोकणात फिरायचे आणि जाताना आपल्या वाटणीचे आंबे, नारळ, कोकमं असं गाडीत भरून घेऊन जायचे. नंदा तर  बोलून चालून माहेरवाशीण, ती देखील सहकुटुंब दोन-तीन आठवडे मुक्काम ठोकून असायची. जाताना सारा वानोळा घेऊन जायचीच.

गजानन आणि माधवी, मोठेपणाचा आब राखत, सगळं हसून साजरं करायचे.तक्रार करायचा स्वभावच नव्हता दोघांचा! माधवी लग्न होऊन नेन्यांच्या घरात आली, तेव्हा धाकटी नंदा अवघी  दोन वर्षांची तर होती.आणि बाकी तिघे शाळेत जाणारे.

नंदा सहा वर्षांचीअसतानाच, माधवीचे सासरे लकवा होऊन अंथरुणाला खिळले. मग सासूबाई त्यांच्या शुश्रूषेत गुंतल्या आणि कुटुंबाचा बाकी सारा भार  गजानन आणि माधवीवर पडला.

पोटची पोरं असल्यागत सगळ्यांना सांभाळलं होतं तिनं! शिक्षण संपल्यावर दिरांना नोकऱ्या लागल्या आणि लग्न करून त्यांचे संसारही थाटून दिले होते. पंधरा वर्षे सासरे आजारी होते. त्यांचं पथ्यपाणी, आल्यागेल्याचा पाहुणचार, सासूबाई आणि स्वतःचा संसार माधवीनं छान सांभाळला होता. सासरे गेले आणि सासूबाईंनी संसारातून पूर्णच लक्ष काढून घेतलं. गेली सात-आठ वर्षे त्याही अस्थमा आणि संधिवातानं बिछान्यावरच होत्या. गजानन घरातली पिढीजात भिक्षुकी चालवत होता. थोडं नारळ-सुपारीच्या बागेचं उत्पन्न येत होतं. त्यावर त्यांचा निर्वाह ठीक चालला होता. पण वेळेला हातात नगद पैसा नसायचा.त्याला एक मुलगा, एक मुलगी. मुलगा  इंजिनिअर होऊन नुकताच नोकरीला लागला होता चिपळूणला. मुलगी बी. काॅम. झाली होती. तिच्या लग्नाचं बघायचं होतं आता.

गडी माणसांकरवी कामं मार्गी लावून, गजानन आणि माधवीदेखील माजघरात येऊन टेकले. नणंदा-भावजयांची जरा नेत्रपल्लवी झाली. नंदा थोडी माधवीजवळ सरकली.

‘वहिनी,दमलीस ना ग! आईचं तुम्ही खूप केलंत!आईचं काय आमचं सगळ्यांचंच केलंस बाई तू! आता चार दिवस सवड काढून तू आणि दादा माझ्याकडे या आराम करायला.’ माधवीच्या दिर-जावांनीही नुसत्या माना हलवल्या.

‘मी काय म्हणते,’ आईचे काही दागिने होते का ग? मला वाटतं एक मोहनमाळ होती ना पाचपदरी? नाही म्हणजे तसं काही नाही म्हणा, पण आठवण म्हणून सगळ्यांना देता येईल ना काहीतरी, ती मोडून!या सगळ्यांचंच मत आहे हं असं!

‘मोहनमाळ म्हणजे ७-८ तोळ्याची तरी असेल ना हो वन्सं! ‘ वसंताच्या बायकोनं विचारलं.

माधवीला काय बोलावं सुचेना. ती आपल्या नवऱ्याच्या तोंडाकडे बघू लागली. गजानन हाताने थांबा अशी खूण करत, माडीवरच्या त्याच्या खोलीकडे गेला. येताना त्याच्या हातात एक कागदी लखोटा होता. त्याने आतला कागद काढून नंदाच्या हातात ठेवला. ती सोनाराकडची पावती होती. माधवजी शाह.. त्यांच्या नेहमीच्या सोनाराचा सही-शिक्का होता त्यावर. पाकिटातच मोहनमाळ  होती.

‘सगळ्यांना वाचून दाखव नंदा काय लिहिलंय ते!’ गजानन म्हणाला.

‘मोहनमाळ, वजन चार तोळे, दहा मासे.. लाखीमणी.  सोन्याचा मुलामा’.

‘अरे, पण आई तर एकदा म्हणाली होती की बाबांच्या आजारपणात पैशासाठी तू दोन्ही गहाण टाकलंय.’

‘हो, बरोबर आहे. बाबांच्या औषधपाण्यासाठी पैसा पुरत नव्हता. त्यात ऐन पावसाळ्यात स्वैपाकघरातली भिंत ढासळली. पैशाची सोय करणार तरी कुठून? म्हणून एकदा फोन केले होते सगळ्यांना नाईलाजाने. पण त्यावेळी तुमचीही प्रत्येकाची काही ना काही अडचण होतीच. आईने तिची ही मोहनमाळ जीवापाड जपली होती,तिच्या माहेरची आठवण म्हणून  तिच्या लग्नात तिला घातली होती ती. एकदाच कधीतरी ती गहाण ठेवायची वेळ आली होती. पण थोड्याच दिवसांत बाबांनी ती सोडवून आणली होती.

मी माधवजींकडे ती घेऊन गेलो. त्यांनी ती माळ हातात घेऊन तीनतीनदा पाहिली आणि मला म्हणाले,’ गजा, अरे ही सोन्याची नाही. नुसता मुलामा आहे वरून सोन्याचा! असं कसं झालं? तुझ्या आईची  मोहनमाळ एकदा मी पाहिली आहे. ती पिवर सोन्याची होती. तुझे बाबा एकदा गहाण ठेवायला आले होते. मी त्यांना म्हणालो,’ अरे हे स्त्रीधन घरात राहू दे. मी देतो ना तुला पैसे. आपले मैत्रीचे संबंध किती जुने आहेत.’ पण त्यांच्या स्वाभिमानी मनाला ते पटलं नाही.

पण मला नाही कसं म्हणायचं? म्हणून म्हणाले, ‘ तुझं बरोबर आहे माधव, दुसरी काही सोय होते का बघतो.’

तेच्यानंतर माझे वडील आजारी झाले म्हणून मी गुजरातला गेलो. वडील गेले म्हणून महिनाभर तिकडेच होतो.

‘ मी आल्यावर तो भेटायला आला होता मला. मी पैशाची सोय झाली का विचारलं. तेव्हा म्हणाला मुरली मारवाड्याकडून घेतले होते. पण नंतर कोणाची थकबाकी आली आंब्याची, दोन वर्षांची आणि  सोडवली माळ. मला वाटतं तवाच कायतरी झोल केला असणार मुरलीनं! आतातर तो पण देवाघरी गेला. कोणाला धरणार? ‘

मी सटपटलो. ही तर मुरलीनं घोर फसवणूक केली होती. आणि बाबांनी विश्वासानं तो दागिना खरा समजून घेतला होता परत. आईनं घेऊन हडप्यात ठेवून दिला. आता आईला काय आणि कसं सांगायचं? एकतर तिला खूप धक्का बसणार, नाहीतर माझ्यावरचा पण विश्वास उडणार. एकूण सर्व परिस्थिती खूपच नाजूक होती.

माधवशेठ मदतीला धावला. त्याने ही पावती करून दिली,आणि मोहनमाळ मला परत केली. माझी पैशाची गरज भागवली. घराची भिंत उभी राहिली. बाबांच्या औषधपाण्याची सोय झाली. आईला मात्र मोहनमाळ गहाण ठेऊन पैसे आणल्याचं सांगितलं. पण त्याचे पैसे तर फेडायला हवेच ना! माझ्या तुटपुंज्या उत्पन्नात ते तरी कसं जमणार? मग माधवशेठनी मला त्याच्या पेढीचं हिशोबाचं काम सोपवलं. महिना ३०रू.पगार! ते पैसे मी न घेता कर्जफेड करायची. ३००० रूपयाचं मुद्दल फेडायचं तरी आठ वर्षे जाणार होती. व्याजाची गोष्ट माधवनी केलीच नाही. त्यातच बाबा गेले, पुन्हा त्यांच्या दिवसकार्याचा खर्च झाला. त्यामुळे दोन-तीन महिने ती कर्जफेड करणंही झालं नाही. घराचीही काही न काही डागडुजी करावी लागतच होती.

तशात माधवशेठनी बायको खूप आजारी पडली. टायफॉइडनी ती अंथरुणालाच खिळली.त्याचा मुलगा-सून गुजरातेत. माधवी घरचं सांभाळून रोज तिच्याकडे जायची. तिचं सर्व अंथरूणातच करावं लागत होतं. पण ते करायची. तिला पथ्याचं काही करून जबरदस्ती भरवायची. तिच्या या शुश्रुषेमुळे मायाबेन आजारातून उठली. तिनं हिचे पाय धरले, ‘ तुझ्यामुळे मी जिवंत राहिले. माझ्या कातड्याचे जोडे घातले तरी तुझे उपकार फिटणार नाही.मी तुला काय देऊ?’

‘ माझ्या धाकट्या बहिणीसारखीच ना तू! मग घरच्या माणसाची काळजी आपणच घ्यायला नको का? ‘ माधवी म्हणाली.

माधवीनं कोणत्या अपेक्षेनं थोडीच तिची सेवा केली होती. ही तर माणुसकी आहे ना! आणि आपल्या वेळेला माधवनी मदत केली, त्याला गरज आहे तेव्हा आपणही करायलाच हवी की! पण त्यानंतरच्या दसऱ्याला माधवशेठ आणि मायाबेन आईला भेटायला आले होते.

जाताना माधवशेठ मला एक लिफाफा देऊन गेला. त्यामध्ये दहा हजार रुपये होते आणि कर्जफेड पूर्ण झाल्याची पावती सही-शिक्क्यानिशी होती.

‘ तू काही बोलू नको. माझी पण आईच आहे ही!तिला तिचा जिन्नस दे,खूप आनंद होईल बघ तिला! आणि तिचं औषध-पाणी नीट होऊ दे.  काय लागलं तर बिनधास्त सांगायचं मला.’ असं म्हणून त्यानं मिठी मारली घट्ट! ‘

मग मी आईला तिची मोहनमाळ दाखवून, कर्ज फिटल्याचं सांगितलं.  तिनं खूप आनंदानं ती मोहनमाळ  स्वतःच्या गळ्यात घालायला माधवीला सांगितलं. खूप समाधान वाटलं म्हणाली आणि मग पुन्हा ती माळ काढून माधवीच्या हातात दिली.

‘ नंदा, आईची आठवण म्हणून तुम्हाला हवं तर  तुम्ही कोणीही ती घेऊन जा. आमचं दोघांचं काही म्हणणं नाही ! गजानन म्हणाला आणि माधवीनंही मानेनं होकार दिला.

नंदाचा चेहरा बघण्यासारखा झाला होता आणि इतरांच्या माना शरमेने खाली झुकल्या होत्या.

© सुश्री प्रणिता खंडकर

संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.

ईमेल [email protected] केवळ वाॅटसप संपर्क.. 98334 79845.

ही कथा आवडल्यास लेखिकेच्या नावासह आणि कोणताही बदल न करता अग्रेषित करण्यास हरकत नाही.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तीन  अनुवादीत कथा – सुश्री अनघा जोगळेकर ☆ (भावानुवाद) – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ तीन  अनुवादीत कथा – सुश्री अनघा जोगळेकर ☆ (भावानुवाद) – सौ. उज्ज्वला केळकर 

१. आदलाबदली  २.  हॅँग टिल डेथ  ३. वखवखलेले डोळे

१. आदलाबदली

आभाळातून मोत्यांची झडी लागली होती. मोठे मोठे शुभ्र मोती जमिनीवर विखरून पडत होते. आकाश निरखणारं तिचं अबोध मन खिडकीपाशीच रेंगाळलं होतं. ओलसर, थंड, तरीही उमललेले मोती. तिचे हरणासारखे डोळे एकटक त्या मोत्यांकडे एकटक बघत होते.

तिचे उत्सुक डोळे जसे काही बोलत होते, जसा काही आकाशात खजिना आहे. त्याचा दरवाजा चुकून उघडा राहिला आहे आणि त्यातले सगळे मोती खाली पडताहेत. ती किलबिलल्यासारखी म्हणाली, ‘ हे देवा! अशा तर्‍हेने तर तुझा सारा खजिनाच संपून जाईल! ‘

तिचं बोलणं ऐकून मी हसलो आणि तिच्या निरागसतेकडे पाहू लागलो.

ती दिवसभर घरात एकटीच असायची. त्या खिडकीपाशी बसायची. संध्याकाळ होताच घरात हालचाल, गडबड सुरू व्हायची. येणार्‍यांपैकी कुणी तिला पाणी मागायचं, कुणी जेवण. कुणी काही, तर कुणी काही. ती धावत-पळत सगळ्यांची कामे करायची. 

रात्री उशिरा सगळे आपापल्या खोल्यातून जात, तेव्हा ती आपली सारी कामे संपवून खिडकीपाशी येऊन बसायची आणि तारे मोजायची. अनेकदा तारे मोजता मोजता तिच्या डोळ्यातून अश्रू वाहायचे, जशी काही ती त्या तार्‍यांमधे कुणाला तरी शोधते आहे. कधी खळखळून हसायची, जसं काही जे शोधत होती, ते तिला सापडले आहे. कधी कधी गुणगुणायची, ‘ये चाँद खिला, ये तारे हँसे…’

तिचं असं गुणगुणणं ऐकून आतमध्ये बसलेली माणसे फुसफुसायची, ‘ असं वाटतय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स रोबोटचं प्रोग्रॅमिंग करताना त्यात इमोशनल कोशंटचं परसेंटेज जरा जास्तच फीड झालय!’

भावशून्य मशीन बनत चाललेल्या त्या माणसांमध्ये, तो आर्टिफिशियल इंटेलिजन्स रोबोट, प्रत्येक क्षणी आपला इमोशनल कोशंट वाढवण्याचा प्रयत्न करत होता आणि मी त्या मशीन बनलेल्या माणसांमध्ये त्या रोबटचे मशीनमधून  माणसात रूपांतर होण्याची वाट बघत होतो.

♥ ♥ ♥ ♥ ♥ 

२.  हॅँग टिल डेथ

मीनू, मी बघतले, जेव्हा जेव्हा तुला वाईताग येतो, किंवा तू काळजीत, चितेत असतेस, तेव्हा तेव्हा तू खोलीत जाऊन कपात उघडतेस. तिथेच थोडा वेळ उभी रहातेस. मग थोड्याच वेळात तुझा चेहरा हसरा हसरा होतो. अखेर ता कपाटात असं आहे तरी काय?’

पलाशचं बोलणं ऐकून मीनू हसली.

‘छे छे, केवळ हसून काम भागणार नाही. आज तुला हे रहस्य उलगडून दाखवावंच लागेल. ‘ पलाशच्या आवाजात थोडा आवेश होता. मग नजर चुकवत म्हणाला, ‘तुझ्या अपरोक्ष मी ते कपाट अनेक वेळा उघडून पाहीलं. शोधाशोध केली पण….. अखेर असं आहे तरी काय तिथे?’ तो जवळ जवळ ओरडताच म्हणाला.

मीनू थोडा वेळ त्याच्याकडे बघत राहिली. मग तिने त्याचा हात धरला आणि त्याला खोलीत घेऊन आली. तिने कपाट उघडले.

‘ ते बघ माझ्या खुशीचं रहस्य!’

‘अं… तो तर एक हॅंगर आहे. ….रिकामा हॅंगर…’

‘ होय पलाश. तो हॅंगर आहे, पण रिकामा नाही. याच्यावर मी माझ्या सार्‍या चिता, काळज्या, त्रास, वैताग लटकवून ठेवते आणि कपाट बंद करण्यापूर्वी  त्यांना म्हणते,

‘मरेपर्यंत लटकत रहा!’ मी माझ्या काळज्या, त्रास, वैताग माझ्या डोक्यावर स्वार होऊ देत नाही. त्या माझ्यापासून दूर केल्यानंतरच त्या निपटून काढते. ‘

आता त्या कपाटात एकाऐवजी दोन हॅंगर लटकलेले आहेत.

  ♥ ♥ ♥ ♥ ♥ 

३. वखवखलेले डोळे

‘खरोखर काळ काही बदलला नाही. पुराणकाळात इंद्राने अहल्येवरती जोर-जबरदस्ती केली होती आणि आज-कालची ही पोरं येणार्‍या जाणार्‍या प्रत्येक मुलीची छेडछाड काढत रहातात. ‘ टी. व्ही.वर काही तरी बघत आजी म्हणाली.

‘ही इंद्राची काय गोष्ट आहे आजी?’ मी सोफ्यावर माझी पर्स फेकत विचारलं.    ‘अग, प्रथम हात-पाय धू. चहा- पाणी होऊ दे. मग सांगते. रोज रोज बसने येऊन जाऊन करण्याने तू थकत असशील ना!’ आजीने वात्सल्याने विचारले.

‘ हुं…. आता सांग.’ मी चहा पिता पिता पुन्हा विचारलं.

‘असं घडलं की इंद्राची वाईट नजर अहल्येवर पडली, तेव्हा गौतम ऋषींच्या शापाने त्याच्या सगळ्या शरीरावर योनी उमटल्या. नंतर त्या पुढे डोळ्यात बदलल्या. ‘

‘डोळ्यात? ‘

‘हो ना! म्हणून तर इंद्राला हजार डोळे आहेत.’

इतकं ऐकताच मी उठून उभी राहिले आणि कपडे झाडू लागले.

‘आता तुला काय झालं? आणि कपडे का झाडते आहेस?’

‘इंद्राचे ते हजार वखवखलेले डोळे, आजही समाजामध्ये पसरलेले आहेत. मी ते माझ्या अंगावरून झाडून दूर करते आहे.’

केवळ झाडण्याने काम नाही भागणार पोरी. ते फोडण्याची गरज आहे.’ आजी दृढ स्वरात म्हणाली.

♥ ♥ ♥ ♥ ♥ 

मूळ लेखिका – सुश्री अनघा जोगळेकर  

मराठी अनुवाद – सौ उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170ईमेल  – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ केमो तिची… थेरपी कोणाची?…भाग 2 ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

? जीवनरंग ❤️

☆ केमो तिची… थेरपी कोणाची?…भाग 2 ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆ 

(पूर्णतः सत्य घटनेवर आधारित)

(मागील भागात आपण पाहिले, सर, आईबद्दल एक विचारायचं होतं.” – आता इथून पुढे )

“बोला ना. काकू म्हणजे तुमची आई एकदम ok आहे. छान progress आहे त्यांची.”

“नक्की ना ?” हिच्या आवाजात कंप.

“म्हणजे ? मी समजलो नाही. काही त्रास होत आहे का त्यांना घरी ? पण इथं काही बोलल्या नाहीत त्या तसं. आणि रिपोर्ट्ससुद्धा छान आहेत त्यांचे.” आता बुचकळ्यात पडण्याची पाळी डॉक्टरांची होती. 

“तिच्यात जर चांगली सुधारणा होत असेल, तर मग तुम्ही सगळेच जण इतरांपेक्षा इतका जास्त वेळ का तिच्यापाशी थांबलेले असता ? काहीतरी बिनसलं असल्याशिवाय थोडी असं होणार आहे ?” तिनं आपल्या मनातली खदखद शेवटी बोलून दाखवलीच.

डॉक्टर क्षणभर गप्प झाले, आणि मग जणू स्वतःलाच स्पष्टीकरण (explanation) दिल्यासारखं ते बोलू लागले.

“तुला जेव्हा कळलं की तुझ्या आईला कॅन्सर झाला आहे, तेव्हा तुला त्याचा मानसिक त्रास झाला ना ? आम्ही सगळे तुझ्या आईची जास्तच काळजी घेत आहोत हे पाहिल्यावर तुझा जीव घाबरा झाला ना ?

अग, तुझ्यासाठी तुझी आई ही एकच पेशंट आहे जिची तुला काळजी आहे, फिकीर आहे. आणि त्यामुळे तुझ्यावर हे दडपण आलं. आमचं तसं नाही. रात्रंदिवस, दररोज, आपल्या या केंद्रावर असंख्य रुग्ण येत असतात. आम्हाला त्या सगळ्यांचीच, तुला तुझ्या आईची जितकी आहे ना, तेवढीच, किंबहुना त्यापेक्षा कांकणभर जास्तच काळजी असते.

काकू सुदैवी आहेत. त्यांचा रोग लवकर ध्यानात आला. त्यांची काळजी घ्यायला तुम्ही सगळे त्यांच्या अवतीभवती आहात. सगळेच जण असे भाग्यवान नसतात. काहींचे रोग उशीरा detect झालेले असतात, आपले उपचारांचे – औषधांचे दर खूप कमी असूनही काहींना आर्थिक अडचणींमुळे तेवढे पैसे उभे करणंही कठीण असतं.

आणि मग हे सगळे रुग्ण, त्यांचे सगेसोयरे ही सगळी दुःखं आमच्यापाशी मोकळी करतात. तक्रार करायची म्हणून नव्हे, कोणावर खापर फोडायचं म्हणून नव्हे पण निदान बोलून भार हलका करण्यासाठी – रितं होण्यासाठी.

पण या सगळ्याचा आम्हाला खूप ताण येतो, खूप दडपण येतं. प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही जेव्हा रुग्ण हताश होतात किंवा प्राण सोडतात, ते बघून आतमध्ये तुटतं खूप काही. नाऊमेद व्हायला होतं. नैराश्य येतं.

अशा सगळ्या वातावरणात, तुझी आई – आमच्या काकू, आमच्यासाठी एक आशेचा किरण आहेत, प्रसन्न करणारी एक सुखद झुळूक आहे. इतरजण मिळालेल्या उत्तरांमध्ये (solution) प्रॉब्लेम शोधत बसतात, तुझी आई प्रॉब्लेममध्ये उत्तर (solution) शोधून काढते.

इतर सर्व पेशंट आमच्यासाठी सर किंवा मॅडम असतात, तुझी आई दुसऱ्या वेळेपासूनच आमची सर्वांचीच काकू झाली.

पहिल्या केमोच्यावेळी काकूंची हाताची नस सापडत नव्हती, टेक्निशियन पंधरा मिनिटे भोसकाभोसकी करत होता. पण या माऊलीने हूं का चू केलं नाही.

नंतर एकदा ते इंजेक्शन / सलाईन out गेल्याने (शीरेतून बाहेर आल्याने) हात सुजला, पण no complaints. औषध ऊष्ण पडल्याने आग आग झाली, तरी काही निषेध नाही. ‘अरे, माझ्या भल्यासाठीच करताय ना तुम्ही हे सगळं !’ उलट हे सर्टिफिकेट आम्हाला.

फॉलो अपच्या इंजेक्शनच्या वेळी काकूंच्या फॅमिली डॉक्टरांचा हात जरा जड लागला. खूप दुखत राहिलं – तरीही त्यांची तक्रार नाही.

साईड इफेक्टमुळे पहिल्याच केमोनंतर भसाभस केस गळले, पण तोंडावर नाराजीची खुणसुद्धा नाही.

पण दुसऱ्या केमोनंतर फॉलो अपच्या इंजेक्शनच्या वेळी आमच्या सिस्टरने हलक्या हातानं इंजेक्शन दिलं तर केवढं गौरवलं तुझ्या आईने तिला.

एवढ्या तेवढ्या कारणावरून डायरेक्टरना तक्रारी करणारे पेशंट आणि नातेवाईक सवयीचे आहेत आमच्या, पण दरवानापासून डॉक्टरपर्यंत आम्ही सगळे कसे “मस्त” आहोत (हा तुझ्या आईचा शब्द, बरं का) हे कौतुकाने सांगायला आमचे प्रमुख डॉ. श्रीकांतदादा बडवे यांना फोन करणारी तुझी आई एकटीच.

पहिले प्रथम त्यांनी कौतुक केलं ते केंद्रातील स्वच्छतेचं. अल्प दरात सुविधा उपलब्ध करून दिली असली तरी टापटीप, स्वच्छता अप्रतिम आहे असं सर्टिफिकेटच देऊन टाकलं त्यांनी.

बरं हा नुसता वरवरचा पोशाखी फोन नव्हता बरं. आमच्या केंद्राचं सविस्तर समालोचनच होतं ते.

डॉक्टर असूनही दुर्गेश काटकर सरांचं अक्षर कसं सुंदर आहे, त्यांनीच कशी त्यांना काकू म्हणायला सुरुवात केली हे त्यांनी सांगितलं.

डॉ. निधी कशा प्रसन्न वदनाने पेशंटचे टेन्शन दूर करतात, अगदी पराग तावडेदादांची झुबकेदार मिशी, प्रशांतसर प्रभूदेसाईंची भिकबाळी, मितभाषी पण कार्यतत्पर स्वप्निल, अक्षता – कविता – सुनयना – सीमा या आमच्या सिस्टर, वॉचमन दुबेकाका – या सगळ्या सगळ्यांचं नावासकट, त्यांच्या प्रत्येकाच्या चांगुलपणासकट इत्थंभूत वर्णन काकूंनी सरांकडे केलं.

आम्ही स्टाफ सगळे इतकी वर्षे एकमेकांबरोबर आहोत. आम्हाला माहीत नाही, पण कोणाचा मुलगा कितवीत आहे, कोणाची परीक्षा आहे, कोणाच्या सासूला – वडिलांना बरं नाहीये – हे सगळं सगळं काकूंना ठाऊक आहे. आणि दर वेळी आवर्जून त्या त्याप्रमाणे चौकशी करतात.

आणि हे आमच्यासाठी खूप नवीन आहे, आणि खूप सुखावणारं आहे.

तुला वाटतंय की तुझ्या आईला बरं नाही आणि म्हणून तिच्या उपचारांसाठी आम्ही तिच्याभोवती गराडा घालून असतो, पण वास्तव त्याच्या एकदम उलटं आहे.

आम्ही आम्हाला बरं वाटावं यासाठी तिच्याभोवती रुंजी घालत असतो.

देवळात बसलं की कसं प्रसन्न वाटतं, बॅटरी रिचार्ज होते, तसं आमचं आहे, म्हणून आम्ही जास्तीत जास्त वेळ तिच्याजवळ थांबतो.

केमो तिची चालू आहे, पण थेरपी आम्हाला मिळत आहे.”

डॉक्टर सांगत होते आणि लेक आपले डोळे पुसत होती.  

 – समाप्त –

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड, पुणे.  मो 8698053215

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ केमो तिची… थेरपी कोणाची?…भाग १ ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

? जीवनरंग ❤️

☆ केमो तिची… थेरपी कोणाची?…भाग १ ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆ 

(पूर्णतः सत्य घटनेवर आधारित)

ती – एक मध्यमवर्गीय मुंबईकर. हम दो, हमारे दो – आदर्श सुखी संसार. निर्व्यसनी कुटुंब. चारचौघींसारखी नोकरी केली. मुला मुलीची लग्नं करून दिली. वयानुसार ती आणि नवरा निवृत्त झाले. And they lived happily ever after. सगळं कसं छान चाललं होतं.

नोकरीनिमित्त लेक नुकताच बंगळुरूला गेला होता, सूनबाई आणि नात अजून मुंबईलाच होत्या. लेकीचंही लग्न झालेलं, जावई – नातू गुणी होते.

सगळं कसं छान चाललं होतं, आणि हिलाच कोणाची तरी दृष्ट लागली. निमित्त झालं रात्री सारखं उठून बाथरूमला जावं लागण्याचं. एकानंतर एक वैद्यकीय तपासण्यांचा ससेमिरा लागला, निदान झालं आणि डॉक्टरांनी बोलावून घेतलं.

उठून बाथरूमला जावं लागण्याचं. एकानंतर एक वैद्यकीय तपासण्यांचा ससेमिरा लागला, निदान झालं आणि डॉक्टरांनी बोलावून घेतलं.

गंभीर आवाजात सांगितलं – ”वाईट बातमी अशी आहे की तुमच्या गर्भाशयावर कॅन्सरची एक छोटीशी गाठ आहे, पण चांगली बातमी ही आहे की गाठ अगदी छोटी आहे, कॅन्सर प्राथमिक अवस्थेतलाच आहे आणि एका छोट्या ऑपरेशनने ती गाठ काढून टाकता येईल.”

रोगाचं निदान समजल्यावर लेक बंगळूरूहून तडकाफडकी मुंबईला निघून आला, मुलगी माहेरी आली. रोगाचं नावच असं जबरदस्त होतं की सगळ्यांचे चेहरे शोकाकूल होते.

सगळ्यांचे म्हणजे ही सोडून.

तीन तीन आठवड्यांच्या अंतराने केमोथेरपीचे एकूण तीन डोस द्यायचे, त्यानंतर गाठीचे स्वरूप पहायचे आणि मग गरज पडली तर शस्त्रक्रिया आणि मग पुन्हा तसेच केमोचे तीन डोस असं उपचारांचं वेळापत्रक ठरलं.

चौकशीअंती ‘नाना पालकर स्मृती समिती’च्या केंद्रात केमोथेरपी घ्यायची हे ठरलं, आणि आपल्या दोन्ही मुलांसह appointment घेऊन ही केंद्रातील डॉक्टरांना भेटायला हजर झाली.

डॉक्टर खूप छान होते, त्यांचं नावच तिला खूप भावलं – डॉ विजय शरणागत. कॅन्सरवर विजय मिळवण्याचा संकेत आणि शरणागत भाव – नावातली ही अर्थगर्भ जोडगोळी तिला सुखावून गेली, आश्वस्त करून गेली.

तिच्या चेहऱ्यावरचा शांतपणा, संयतपणा मात्र डॉक्टरांना गोधळवून गेला. न राहवून त्यांनी विचारलंच – “पेशंटला का नाही आणलंत ?”

ती मनापासून हसली, म्हणाली, “ही काय, मी आले आहे की.”

आश्चर्याच्या धक्क्यातून सावरल्यावर, सोप्या शब्दांत काय झालं आहे, काय आणि कसं करायचं हे डॉक्टरांनी विस्ताराने समजावून सांगितले. केमोचे औषध कसे दिले जाते, औषध घेताना आणि नंतर काय त्रास होऊ शकतो तेही सांगितले आणि विचारलं, “सहा सात तास लागतात एक डोस घ्यायला. मग कधीपासून उपचारांना सुरूवात करू या ? या आठवड्यात का पुढच्या ?”

“नंतर कशाला ? आज करता येईल ना सुरुवात ? मग आजच करू या की.” ती.

“अगं आई, आपण जरा दोन मिनिटं बोलू या का ? घरी बाबांना सांगूया आणि …” मुलगा या तडकाफडकी निर्णयापासून आईला परावृत्त करण्याचा प्रयत्न करत होता.

“अरे, बघ. आज डोस घेतला की तू दोन चार दिवस थांब. मग तुला बिनघोर रुजू होता येईल कामावर. उगाच उशीर कशाला तुला ?

बरं, आज नाही तर चार दिवसांनी, हीच treatment घ्यायची आहे ना ? मग उगाच उशीर कशाला ?” तिचा practical approach.

केमोचा पहिला डोस झाला, दुसऱ्या दिवशी घ्यायचं इंजेक्शन  समितीच्या केंद्रातून न घेता तिनं तिच्या फॅमिली डॉक्टरांकडून टोचून घेतलं, मग समिती केंद्रात आठवड्याभरानंतरचा फॉलो अप झाला. बघता बघता आणखी दोन आठवडे भुर्रदिशी उडून गेले आणि दुसऱ्या केमोची वेळ आली. पुन्हा दुसऱ्या दिवशीचे इंजेक्शन – या वेळी मात्र आग्रहाने समितीच्या केंद्रातच, पुन्हा फॉलो अप.

दुसऱ्या तिसऱ्याच दिवशी मुलाला एक गोष्ट जाणवली होती की नर्सेस असोत वा डॉक्टर्स वा अन्य कोणी स्टाफ, ते आईकडे अंमळ जास्तच वेळ थांबत होते.

का बरं असेल असं?

सांगताना तर अगदी minor आहे, काळजीचं काहीच कारण नाही, असं सांगत होते. पण अन्य पेशंटकडे मिनिट दोन मिनिटांत चौकशी करून, सल्ला देऊन पुढे जात होते, आणि हिच्या पलंगाशी मात्र पंधरा वीस मिनिटे डेरा ठोकून बसले असायचे सगळे !

काय प्रकार काय आहे हा नक्की ?

त्याने ही शंका बायकोला, बहिणीला बोलून दाखवली. पुढच्या वेळी त्यांनीही पाहिलं, आणि खरंच होतं त्याचं observation.

दुसऱ्या केमो आणि त्याच्या फॉलो अपच्या वेळीही हाच सीन राहिल्यावर मात्र लेकीच्या काळजाचा ठाव सुटला, डोळ्यांत छप्पन सशांची व्याकुळता घेऊन ती डॉक्टरांकडे धडकली.

“सर, आईबद्दल एक विचारायचं होतं.”

क्रमश:  भाग १

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड, पुणे.  मो 8698053215

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ इच्छापूर्ती…– भाग- १ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली ☆

श्री व्यंकटेश देवनपल्ली

अल्प परिचय 

श्री व्यंकटेश देवनपल्ली, एम् ए. एल.एल.बी.

बॅंकेतील एक्केचाळीस वर्षाच्या सेवेनंतर असिस्टंट जनरल मॅनेजर पदावरून सेवानिवृत्त. मातृभाषा तेलुगु. शिक्षण मराठी माध्यमातून. मूळ सोलापूर. सध्या बेंगलुरू येथे वास्तव्य व वकिली व्यवसाय.  

श्रीकृष्णदेवराय रचित ‘आमुक्तमाल्यदा’ ह्या तेलुगु काव्यप्रबंधाचा मराठी व हिंदी गद्यानुवाद, साहिती समरांगण सार्वभौम- श्रीकृष्णदेवराय (चरित्र ग्रंथ), राजाधिराज श्रीकृष्णदेवराय (ऐतिहासिक कादंबरी) व ‘इंद्रधनु’ आणि ‘स्वानंदी’ (लघुकथासंग्रह) प्रकाशित.

? जीवनरंग ❤️

☆ इच्छापूर्ती…– भाग- १☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली

दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रभू रामचंद्रांच्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त राघव आणि जानकी पुण्यात हजर होते. श्रीराम, लक्ष्मण, सीता यांच्या छोटेखानी देवळातल्या दर्शनासाठी भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. मंदिरात अखंड रामनाम जप सुरू होता. दुपारी बारा वाजता श्रीरामजन्माचा सोहळा भाविकांच्या जयघोषांत संपन्न झाला.

श्रीरामास अभ्यंगस्नान घातल्यानंतर पाळण्यात घालण्यात आले. ‘राम जन्मला गं सखे.., राम जन्मला!’ हे गीत उपस्थित स्त्रियांनी मोठ्या उस्त्फूर्तपणे गायलं. पुरोहितांनी विधीवत पूजा आणि  पौरोहित्य विधी संपन्न केला. प्रभू श्रीरामांच्या जयघोषांत व गुलालात सगळेच भाविक पूर्णपणे न्हाऊन गेले.

रात्रीच्या भजन-कीर्तनाने रामनवमीच्या महोत्सवाची सांगता होणार होती. वामन शास्त्रीबुवांचे कीर्तन, भजन ऐकणे ही एक मोठी पर्वणी असायची. त्यांच्या कीर्तनात सगळंच असायचं. उत्तम वक्तृत्व, संगीत, काव्य-नाट्य-विनोद यांचा अंतर्भाव असायचा. धर्मशास्त्रातला त्यांचा दांडगा व्यासंगच सर्व श्रोत्यांना बांधून ठेवायचा. कीर्तनाला खचाखच गर्दी असायची. त्यांचं निरूपणही तसंच गहन गंभीर असायचं.  परंतु क्षणभरात एखादी विचारज्योत पेटवून, ते मिट्ट काळोखात हरवलेल्या श्रोत्यांच्या अंत:करणात प्रसन्न प्रकाश पसरवत असत. राघवला आज बुवांच्या कीर्तनासाठी थांबता येणार नव्हते. जानकीला दुसऱ्या दिवशी सकाळी शाळेत हजर व्हायचं होतं. रात्री साडेआठच्या सुमारास ते दोघे कारने पुण्याहून कोल्हापूरकडे निघाले. रस्त्यात शुकशुकाट होता. घुप्प अंधारातून गाडी वेगाने निघाली होती. काहीतरी बोलावं म्हणून जानकीनं विचारलं, “राघवा, आज काय मागितलंस श्रीरामाकडे?” गीतरामायणातील गदिमांची अलौकिक शब्दकळा आणि बाबूजींचे स्वर्गीय सूर यात हरवलेला राघव क्षणभरात भानावर आला आणि स्मितहास्य करीत म्हणाला, “जानकी, तुला ठाऊक आहे. मी श्रीरामाकडे कधीच काही मागितलं नाही. मागणारही नाही. मी आज जो काही आहे, तो श्रीरामामुळेच आहे. मी फक्त त्याचे आभार मानतो. माझा राम अंतर्यामी आहे. मला काय हवंय, ते त्याला पक्कं ठाऊक असतं. असो. आपण निम्म्या रस्त्यावर आलो आहोत. पुढचा रस्ता थोडा कच्चा आहे. थोडे सावकाश जावे लागेल.” 

का कोण जाणे, जानकीला आज थोडंसं अस्वस्थ वाटत होतं. तिच्या मनात उलटसुलट विचार येत होते. अशा किर्र अंधारात गाडी बंद पडली तर… आसपास कुणी मदतीला धावून येणार नव्हता. तिच्या मनात शंकाकुशंका घोळत होत्या आणि अचानक कारच्या एका बाजूला खडखडल्यासारखं झालं.

राघवनं गाडी बाजूला घेतली. पाहिलं तर काय, समोरच्या एका चाकाचं टायर पंक्चर झालं होतं. अवतीभवती काहीच दिसत नव्हतं. तितक्यात पावसाची भुरभुरही सुरू झाली. डिक्कीतून जॅक आणि स्पॅनर काढून मोबाईलच्या फ्लॅश लाईटमध्ये राघव टायर काढण्याचा प्रयत्न करत होता. बोल्ट घट्ट झाले होते. काही केल्या फिरत नव्हते. तितक्यात मोटारसायकलवरून जाणारे दोघे आडदांड युवक येऊन थांबले. त्यांनी विचारलं, “काय झालं काका?”

टायर पंक्चर झाल्याचं राघवनं सांगितलं. ते आपणहून म्हणाले, “आम्ही काही मदत करू शकतो का?”

जानकीला मात्र मनातून भीती वाटत होती. कोणी चोर दरोडेखोर असतील तर काय करायचं? ती हळूच बाहेर आली. त्या मुलांनी सांगितलं, “काकू तुम्ही आतच बसा. तुमच्या हातातला मोबाईल द्या. त्या उजेडात लगेच स्टेपनी लावून देऊ.”

‘मोबाईल आणि तो कशाला?’ या विचारानं जानकीच्या मनात धडकीच भरली. तिने नाईलाजाने मोबाईल दिला. त्या दोघा बलदंड युवकांनी घट्ट झालेले बोल्ट ढिले केले. काही वेळातच स्टेपनी बदलली आणि मोबाईल परत केला. जानकीने त्यांना देण्यासाठी पर्समधून आधीच पाचशेची नोट काढून ठेवली होती. युवकांनी पैसे घेण्यास नकार दिला.

“आम्हाला काही द्यायची तुमची इच्छा असेल तर इथे देवळात चाललेल्या कीर्तनाला थोडा वेळ तरी हजेरी लावून जा.” असं म्हणताच राघवने जानकीकडे पाहिलं आणि त्यांची कार निमूटपणे त्या मोटरसायकलच्या पाठोपाठ निघाली. लगतच असलेल्या रामाच्या देवळाजवळ जाऊन पोहोचले. राघव आणि जानकी आत गेले.

कीर्तनकार बुवांनी नुकतीच सुरूवात केलेली होती. गुराखी कसं चुकार गुरांना चुचकारत घराकडे वळवत असतो, तसं श्रोत्यांना धार्मिक प्रवचनाकडं वळवायचं होतं म्हणून बुवांनी सगळ्यांना भजनात ओढलं.

“म्हणा, रघुपति राघव राजाराम। पतितपावन सीताराम… सुंदर विग्रह मेघश्याम गंगा तुलसी शालग्राम ॥” सगळे श्रोते गाण्यात तल्लीन होऊन गेले.

त्यानंतर बुवा बोलायला लागले, “ज्या श्रीरामचंद्रांनी त्यांच्या जीवनातून जगण्याचा आदर्श निर्माण केला, त्यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने आपण जमलो आहोत. श्रीरामभक्ती आणि श्रीरामकथा ही आपल्यासाठी जगण्याची एक ताकद देते….” 

बुवा श्रोत्यांच्या अंतरंगाला हात घालत होते. एक एक ओवी बुलंद आवाजात ऐकवत होते. पाठोपाठ निरूपणही करीत होते. हळूहळू गर्दी वाढत होती. विशेष म्हणजे त्यात युवकांचीही संख्या मोठी होती. पण त्यात ते दोघे युवक मात्र कुठेच दिसत नव्हते.

समोर बसलेल्या एका आजोबाने मधेच विचारलं, “बुवा, श्रीरामाचं दर्शन होतं का हो?”

त्यावर बुवा हसून म्हणाले, “आमचे कीर्तनकार गुरू वामनशास्त्री म्हणतात की जवाहिऱ्याचं दुकान थाटायचं असेल तर भक्कम भांडवल लागतं. त्यासाठी चणेदाणे, लाह्या करून विकणाऱ्या भडभुंजाचं भांडवल असून चालत नाही. काया-वाचा-मनसा रामाला भेटण्याची अनिवार ओढ, तळमळदेखील तेवढीच भक्कम असावी लागते. फार कशाला, तुम्ही आपल्या छातीवर हात ठेवून सांगा. या रामाच्या देवळात वर्षभरात दर्शनासाठी किती वेळा आलात? मला वाटतं, आजच रामनवमीच्या दिवशी आलात! जागोजागी असलेली मारूतीरायांची देवळे बघा. कशी वर्षभर तुडुंब भरलेली असतात. कशासाठी? तर प्रत्येकाच्या मनात एक अनामिक भीती घर करून बसलेली आहे. भीतीचं निर्मूलन फक्त मारूतीरायाच करू शकतात, या श्रद्धेपोटी लोक त्यांच्या देवळात जातात. प्रभू श्रीरामचंद्र म्हणजे मर्यादापुरुषोत्तम. त्यांनी धैर्य, शौर्य, स्नेह, त्याग, संयम, कर्तव्यनिष्ठेचं महत्व दाखवून दिलं. जिथे श्रीराम आहेत तिथे मारूतीराया निश्चित असतात. समर्थ रामदासस्वामी, भद्राचलमचे भक्त रामदासु आणि तुलसीदासजी यांच्या ठायी ती ओढ, ती तळमळ होती म्हणूनच त्यांना श्रीरामचंद्र प्रभूंचे दर्शन झाले.

समर्थ रामदासस्वामी त्यांच्या एका हिंदी रचनेत म्हणतात, “जित देखो उत रामहि रामा। जित देखो उत पूरणकामा।” तर भद्राचलमचे भक्त रामदासु म्हणतात की “अंता राममयम, जगमंता राममयम अंतरंगमुना आत्मारामुडु। अंता राममयम..” तुलसीदासजींनी “सिय राममय सब जग जानी, करहु प्रणाम जोरी जुग पानी॥“ ही चौपाई लिहिली. या प्रभृतींना संपूर्ण विश्वच श्रीराममय झाल्याचे जाणवत होते, तेव्हा कुठे त्यांना श्रीरामचंद्रप्रभू भेटले. यावरून तुलसीदासजींची एक गंमतीशीर गोष्ट आठवलीय. ऐका तर.

क्रमश: – भाग १

© श्री व्यंकटेश देवनपल्ली.

बेंगळुरू

मो ९५३५०२२११२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ वादळ – भाग – २ ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर

? जीवनरंग ❤️

☆ वादळ – भाग- २☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

(मागील भागात आपण पाहिले – त्याने एक-दोन वर्षे एका गॅरेजमध्ये काम करून, दुचाकी गाड्या दुरूस्तीचं काम शिकून घेतलं. त्याला या विषयात गती होती. मग काकाच्या मदतीने, बँकेकडून कर्ज काढून स्वतःचं गॅरेज काढलं. पोटापाण्यापुरतं उत्पन्न मिळत होतं त्याला. तो काकाकडेच पोखरणला राहात होता. जमेची बाजू म्हणजे राजा मेहनती आणि निर्व्यसनी होता. मागच्या वर्षी बहिणीचं लग्न करून दिलं होतं. आता इथून पुढे)

वसंतराव उद्विग्न झाले होते. फार श्रीमंत नसले तरी आपल्या दोन्ही मुलांना त्यांनी लाडाकोडात वाढवलं होतं. एकीकडे लेकीची चिंता तर दुसरीकडे तिनं असं लग्न केल्यामुळे संताप, यामुळे त्यांचं डोकं काम करेनासं झालं होतं. वसुमतीनं काही बोलायचा प्रयत्न केला तर, ‘मुक्ताचं नावही काढायचं नाही या घरात आता! तिनं लग्न केलंय ना आई-बापांना न सांगता, बघेल तिचं ती!’ असं त्यांनी तिला बजावलं होतं. वसुमती आता जरा सावरून, शांत डोक्याने विचार करत होती. तिनं लेकीला भेटून यायचं ठरवलं. पण वसंतराव काही या गोष्टीला तयार होणार नव्हते आणि रागाच्या भरात काही उलट-सुलट बोलून बसतील, अशी धास्ती होती तिला. साधनाबरोबर जाऊन आपण गुपचूप भेटून यावं, असं तिनं ठरवलं. सुरेशला काकांचा पत्ता शोधायला सांगितला.

पण राजाच्या मित्राकडून, लेक आणि जावई सावंतवाडीला गेल्याचं समजलं. आंब्याचा सीझन असल्याने तिथे कामही होतं. त्यामुळे दोन महिने ते तिकडेच राहणार होते. शिवाय इथे राहायच्या जागेची पंचाईत होतीच. काही न सांगता कळवता, पुतण्याने लग्न केल्यामुळे काकाही नाराज होता. तसंही काकांचं घर वन बीएचके, त्यामुळे आता तिथे राहाणं शक्य नव्हतंच. 

एक आठवडा असाच गेला . वसंतराव घरीच बसून होते. मिहिरही गुमसुम झाला होता. ही कोंडी फोडायची तरी कशी! वसुमतीनं मनाशी काही एक ठरवलं आणि मिहिर शाळेत गेल्यावर ती वसंतरावांशी बोलायला आली. वसंतराव डोळे मिटून सुन्नपणे बसले होते. वसुमतीची चाहुल लागताच त्यांनी डोळे उघडले आणि प्रश्नार्थक नजरेनं तिच्याकडे बघितलं. वसुमती म्हणाली, ‘ हे बघा मी काय म्हणते ते जरा शांतपणे ऐकणार आहात का?’ 

त्यांची नजर वसुमतीवर स्थिरावली. रडून रडून तिचे डोळे सुजले होते.  चेहरा भकास दिसत होता. या आठ दिवसांत तिची रयाच गेली होती. तिची अवस्थादेखील आपल्यासारखीच झाली आहे. पण ती कोणाला सांगणार? वसंतरावांच्या मनात आलं. 

‘ बोल ‘ असं म्हणत ते ती काय सांगते या अपेक्षेने बघू लागले. 

मुक्ता चुकीचं वागली हे तर खरंच आहे. पण आपलं लेकरू चुकलं तर आपणच नको का सांभाळून घ्यायला तिला? त्यांची बाजूपण समजून तर घेतली पाहिजे. थांबा, चिडू नका. तुम्ही तरी किती दिवस तोंड लपवून घरात बसणार आहात? आणि तिनं लग्न केलंय. नसते रंग उधळून लाज आणण्यासारखं तरी काही वागली नाहीयेत ती दोघं! तरूण आहेत पण बेजबाबदार नक्कीच नाही. नाहीतर आजकाल आपण काय काय ऐकतो आणि बघतो, एकेका मुलांचं! सुरेशरावांनी माहिती काढली, त्यावरून मुलगा सज्जन वाटतो. आपण एकदा भेटलं तर पाहिजे ना त्याला? आणि आपण आपल्या मुलीच्या पाठिशी उभं आहोत हा विश्वास तिला द्यायला नको का? चूक झाली तर ती सुधारण्याची संधी, तिच्या दुष्परिणामांपासून आपणच मुलांना वाचवायला हवं ना? का खड्ड्यात उडी मारलीत, आता तिथंच अडकून राहा, म्हणून हातावर हात धरून बघत बसायचं आहे? ‘

‘ काय म्हणणं आहे तुझं? त्यांची काय आरती ओवाळायची आहे का? ‘

‘ शांतपणे विचार करा जरा! आणि एक सांगते. माझ्या लेकीच्या पाठिशी मी उभी राहणार हे नक्की. ती लहान आहे, अजून विचारांची परिपक्वता नाही तिच्याकडे. आयुष्यातल्या टक्क्याटोणप्यांचा अनुभवही अजून यायचा आहे. त्यांना सावध करणं, आधार देणं हे आपलं कर्तव्य नाही का? तिचं नाव काढू नका म्हणता॰  असं रक्ताचं नातं तोडून टाकता येतं का हो? आणि मग रात्र-रात्र अस्वस्थपणे फेऱ्या कशाला मारत बसता तुम्ही? लेकीच्या काळजीनंच ना!  आपण तिच्या पाठीशी उभे राहिलो की बोलणाऱ्यांची तोडंपण आपोआप गप्प होतील. आणि सासरच्या लोकांनाही थोडा चाप राहिल. ते कसे आहेत हे अजून आपल्याला माहीत नाही, पण माझी मुलगी असहाय्य नाही, हे त्यांना माहीत असलं पाहिजे. ‘

‘ काय करायचं आहे तुला ते स्पष्ट सांग ना. ‘

‘ आपण सावंतवाडीला जायचं का त्यांना भेटायला? ‘

‘ काय?  तुझं म्हणजे ना.. ‘

‘ अहो ते आले नाहीत तर आपण जायचं. त्यानिमित्ताने त्यांचं घर आणि एकूण परिस्थिती पण पाहता येईल ना! आपल्या लेकीला आयुष्य काढायचं आहे, ती माणसं, त्यांचं वागणं, ठाऊक नको? लग्न ठरवलं असतं लेकीचं, तर हे सगळं केलं असतंच ना? मग आता करायचं. हवं तर साधना आणि सुरेशना पण सोबत घेऊया. ‘

मग त्या दोघांशी बोलून वसंतरावांनी कोकणरेल्वेची तिकिटं बुक केली. सावंतवाडीचा राजाच्या घरचा पत्ता मिळवला. दुसर्‍या दिवशी संध्याकाळी मंडळी तिथे पोचली. आधी तर राजा आणि त्याच्या घरचे चपापले. हे लोकं आता काय गोंधळ घालणार म्हणून! पण सुरेश आणि साधनानं त्यांना आश्वस्त केलं. सावंत कुटुंबाने मग प्रेमानं स्वागत केलं.

तीन खोल्यांचं पण प्रशस्त घर होतं. शिवाय मागेपुढे ओसरी. आंबे आणि नारळ-सुपारीची बरीच झाडं होती. पण ते उत्पन्न सामाईक होतं. राजाची आई साधी पण प्रेमळ वाटली. तिनं लेक आणि सुनेला स्वीकारलं होतं. ” त्या म्हणाल्या, ‘वय वेडं असतं. चुका होतात मुलांकडून, पण आपलीच आहेत ना, घ्यायचं सांभाळून! ‘ बहीण आणि मेव्हणे पण आले होते. आनंदात जेवणखाण पार पडलं.

रात्री जावयाशी आणि लेकीशी सविस्तर बोलणं झालं. मुक्तानं आईला मिठी मारून, दोघांची माफी मागितली. 

ठाण्याला घराच्या येण्या-जाण्याचा वाटेवर राजाचं गॅरेज होतं. मुक्ता आणि राजा एकमेकांकडे आकर्षित झाले. ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं आणि ठरवून गाठीभेटी होऊ लागल्या. कॉलेजला, क्लासला येता-जाता. लोणी विस्तवाजवळ आलं तर वितळणारच. दोघांना मोह टाळता आला नाही. पण दोन-तीनदा असं झाल्यावर मुक्ताला भयंकर अपराधी वाटायला लागलं. आई-बाबांना हे कळलं तर याची भितीही वाटायला लागली. आणि स्वतः कोणत्या तोंडाने सांगणार ती? तिनं राजाकडे लग्नाचा हट्ट धरला. त्यालाही तिच्याशी लग्न करायचं होतंच. पण हातात थोडे पैसे जमायची वाट बघत होता तो. राहायला जागा तर हवी. शिवाय संसार थाटायचा म्हणजे सगळं आलंच की! आता गॅरेजच्या मागच्या भागातच थोडी सोय करून त्यांना सध्या राहावं लागणार होतं. 

बाबांनी गहिवरून दोघांना जवळ घेतलं. ते आणि सुरेशकाका त्यांना ठाण्यात भाड्याचं घर घ्यायला मदत करणार होते. मुक्तानं आपलं शिक्षण पूर्ण करावं असं त्यांना वाटत होतं. पण मुक्ताला तिचं ब्युटी पार्लर काढायचं होतं. ठाण्यात आल्यावर ती ब्युटिशियनच्या कोर्सला अ‍ॅडमिशन घेणार होती. बाबांनी तिची फी भरायची तयारी दर्शवली. जमेल तेवढी आर्थिक मदत ते करणार होते. लग्नाचा खर्च आपण केला असताच ना! मग तोच पैसा मुलांना आपल्या पायावर उभं राहण्यासाठी खर्च झाला तर छानच की!

वसुमतीनं मुक्ताचे कपडे असलेली बॅग आणि तिचा मोबाईल तिच्याकडे सोपवला. मुक्ता आणि राजा भारावून गेले होते. असं काही घडेल याची त्यांनी कल्पनाच केली नव्हती. त्यांनी तसं बोलूनही दाखवलं.

वसुमती त्यांना म्हणाली, ‘असेच तर असतात आई-बाप!’ 

आठवड्यापूर्वी उठलेलं वादळ आता शांत झालं होतं.

– समाप्त – 

© सुश्री प्रणिता खंडकर

संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.

वाॅटसप संपर्क.. 98334 79845 ईमेल [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ वादळ  – भाग-१ ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर

? जीवनरंग ❤️

☆ वादळ  – भाग-१ ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

‘हुश्श, संपली बाबा एकदाची परीक्षा!’ असं म्हणत वसुमती सोफ्यावर आरामात पसरली. मुलांच्या परीक्षा म्हणजे आई-वडिलांनासुद्धा ताण असतो हल्ली! मुक्ताचा तिच्या लेकीचा आज शेवटचा पेपर होता बारावीचा. सगळे कैदी मोकाट सुटणार होते आज! वर्षभर कॉलेज, क्लास आणि अभ्यास या चक्रात अडकले होते.

‘आई, आज आम्ही सगळेजण पिक्चरला जाणार आहोत हं परस्पर! खादाडी पण होईलच तिकडे. पिक्चर सुटला की श्रीमतीच्या घरी दादरला नाईटआउट! तिच्या बाबांची दिल्लीला बदली झाली आहे. ते मागच्या आठवड्यातच तिकडे जॉईन झालेत. आता दोन-तीन दिवसांनी श्रीमती आणि तिची आई पण जाणार. मग कधी भेट होईल आमची कोण जाणे! ‘

‘ अग, हो हो! तुमचं प्लॅनिंग म्हणजे काय विचारता? पण कोण कोण येणार आहे तिच्याकडे? म्हणजे राहायला.’

‘ आर्या, सुनिधी आणि शमिका, आम्ही चौघीजणीच! बाकीचे फक्त पिक्चरला येणार आहेत.’ 

‘कपडे घेतलेस का रात्री बदलायला? आणि उद्या कधी उगवणार आहात आपण?’ 

‘हो आई, उद्या संध्याकाळी येणार . आज रात्री उशिरापर्यंत गप्पा, म्हणजे उठायला उशीरच. आणि परीक्षा संपल्यावर आता कशाला लवकर उठायचंय? मग सगळं आवरून निघायला ४-५ वाजतीलच.’ असं म्हणत आपली सॅक पाठीवर लटकवून मुक्ता बाहेर पडली सुद्धा. 

मुक्ताच्या या कार्यक्रमामुळे आता संध्याकाळपर्यंत वसुमतीला निवांतपणा होता. 

ठाण्याला राहणारं गोखलेंचं कुटुंब टिपिकल मध्यमवर्गीय!  वसुमती गृहिणी. वसंतराव, मुक्ताचे बाबा नरिमन पॉइंटला बँक ऑफ इंडियामध्ये हेडक्लार्क ! साडेसातपर्यंत यायचे घरी कामावरून. मुक्ता माटुंग्याच्या रूईया कॉलेजला. मिहीर, त्यांचा लेक  आठवीत होता. साडेपाचला शाळेतून आला की तो काहीतरी नाश्ता करून फुटबॉल खेळायला जायचा ग्राउंडवर! साडेसातच्या आसपासच तो पण घरी यायचा.  मग थोडावेळ एकत्र टी. व्ही. बघणं, आणि जेवणं आवरून, साडेदहाला मंडळी गुडुप! सकाळी सहा वाजता  परत वसुमतीचा दिवस सुरू व्हायचा. मुक्ता आणि मिहीर, दोन्ही मुलं अभ्यासात तशी चांगली होती, ७०-७५% मिळवणारी आणि सरळमार्गी. एकूण सुखी कुटुंब! 

दुसऱ्या दिवशी दुपारी जेवण झाल्यावर वसुमतीनं मोबाईल हातात घेतला आणि वॉटसप उघडलं आणि….. तिला एकदम गरगरायला झालं. कुठल्यातरी अनोळखी नंबरवरून एक फोटो आला होता. राजा सावंत आणि मुक्ता गोखले यांचा शुभविवाह नुकताच पार पडला, हार्दिक शुभेच्छा! वसुमतीनं खात्री करून घेण्यासाठी पुन्हा पुन्हा तो फोटो बघितला. हो, शंकाच नाही, ही आपलीच लेक आहे. पण…. तिला जबरदस्त धक्का बसला होता. काय करावं तेच सुचेना. कितीतरी वेळ ती तशीच विमनस्क अवस्थेत बसून राहिली.

कोण हा राजा? आणि लग्नापर्यंत मजल गेली तरी मुक्तानं एका शब्दानं आपल्याला सांगितलं नाही? आणि आत्ता कुठे अठरावं पूर्ण झालंय, शिक्षण व्हायचंय. ही काय दुर्बुद्धी सुचली हिला. तिच्यावर जबरदस्ती तर झाली नसेल? एक ना हजार विचारांनी वसुमती भेंडाळून गेली. तिच्या मैत्रिणींना फोन करावा का? पण कोण जाणे त्यांना हे माहीत आहे की नाही ? तरी तिने आर्याला फोन लावलाच. ती पण ठाण्यातच राहणारी. मुक्ता आणि ती कॉलेजला बरोबरच जायच्या.

दोनदा प्रयत्न केल्यावर, तिसऱ्यांदा एकदाचा फोन लागला. ‘काय झालं काकू? काही काम आहे का? तुमचा आवाज नीट ऐकू येत नाही. मी ट्रेनमध्ये आहे, आम्ही सगळे कोकणात निघालोय ना, आजीकडे!’

‘बरं, बरं!’ म्हणून वसुमतीनं फोन बंद केला. सुनिधीचा नंबर काही मिळेना. मग तिनं शमिकाला फोन केला. तर ती कोणत्या तरी कार्यक्रमात होती. जरा विचार करून तिनं ज्या नंबरवरून फोटो आला होता, तिथे फोन लावला. पण तो फोन स्वीच्ड ऑफ़!’ काय उपयोग आहे का या मोबाईलचा!’ म्हणत ती नवऱ्याला  कळवावं का आणि काय सांगावं या विचारात बऱ्याच वेळ अडकली.

मनाच्या या सैरभैर अवस्थेत तिनं तिच्या मैत्रिणीला,  फोन केला. बाजूच्या सोसायटीतच राहायची ती!

‘ साधना, प्लीज, येतेस का लगेच माझ्याकडे?’

‘अगं वसू काय झालं काय? ‘

‘ तू ये तर खरी, आल्यावर सांगते ना’, म्हणून फोन बंद करून वसुमती तशीच बसून राहिली.

दहा मिनिटात साधना हजर झाली. वसुमती तिच्या गळ्यात पडून ओक्साबोक्शी रडू लागली आणि तिने तिला मोबाईलमधला तो फोटो दाखवला. साधना पण चकित झाली. काय बोलणार ना? तो फोटो निरखून बघितला आणि ती म्हणाली,’ हा राजा सावंत म्हणजे आपल्या गल्लीच्या कोपऱ्यावर चौकात ते गॅरेज आहे ना, तोच वाटतोय. काय शिकलाय माहित नाही, पण दिसायला देखणा आहे. त्याचीच तर भूल नाही पडली आपल्या मुक्ताला?  हे वय असंच वेडं असतं ग! पण तुला काहीच कल्पना नव्हती याची?’

‘नाही ग! मी समजावलं नसतं का तिला? बघ ना काय करून बसली? आता ह्यांना कसं सांगायचं हे? ‘

मग साधनानेच वसंतरावांना फोन लावला,’ वसूची तब्येत जरा बरी नाहिये, चक्कर येतेय तिला. तुम्ही जरा लवकर येऊ शकाल का घरी? मी थांबते इथे तोपर्यंत. ‘

साधनाच्या फोनमुळे वसंतराव गडबडून गेले. साहेबांना सांगून लगेच निघतो म्हणाले. पण तरी त्यांना घरी पोचायला पाच वाजून गेले असते. 

साधनानेच चहा केला आणि वसुमतीला बळजबरीने प्यायला लावला .वसंतराव घरी आले. साधनाने त्यांच्या कानावर घडला प्रकार घातला. ते पण हडबडून गेले. तोवर मिहिरही घरी आला, त्यामुळे त्यालाही सगळं समजलं. 

‘ झालं ते झालं! दोन्ही मुलं सज्ञान आहेत, त्यामुळे आपण विरोध करून काही उपयोग नाही. आता जरा शांत डोक्याने विचार करून काय ते ठरवा. काही लागलं तर कळवा.’ असं म्हणून साधना घरी गेली. तिची लेक शाळेतून येण्याची वेळ झाली होती.

दोन-तीन दिवस तणावातच गेले. वसंतराव आणि वसुमतीला हा धक्का पचवणं सोपं नव्हतं. लेकीची चिंता सतावत होतीच. शिवाय सोशल मिडियामुळे ही बातमी सर्व नातेवाईकांपर्यंत पोचायला वेळ लागला नव्हता. फोनवरून, वॉटसपवरून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत होत्या. सध्या कोणाला काही उत्तर देण्याच्या मनःस्थितीत ही दोघं नव्हतीच. साधना आणि तिचा नवरा मात्र सर्व प्रकारची मदत करत होते. साधना दोन्ही वेळचं जेवण घेऊन येत होती. वसुमतीला चार गोष्टी सांगून, मानसिक आधार देत होती. सुरेशने तिच्या नवऱ्याने, त्या मुलाची माहिती काढली होती.

राजा सावंतचं कुटुंब, मुळचं सावंतवाडीचं. तिकडे त्यांचं वडिलोपार्जित राहातं घर आणि बागायत होती. राजा पाचवीत असतानाच त्याचे वडील वारले काविळीने. मग ठाण्यात राहणारा काका, राजाला शिक्षणासाठी आपल्याकडे घेऊन आला. काकाचा केबल नेटवर्कचा व्यवसाय होता. शिवाय  घरचे आंबे, सुपाऱ्या, नारळ आणि इतर कोकणातील उत्पादनं विकण्यासाठी ठाण्यात एक दुकानही टाकलं होतं. राजाची काकी आणि चुलत भाऊ ते दुकान चांगलं चालवत होते. राजाची आई आणि मोठी बहीण गावाकडे  बाग सांभाळत होती आणि लोणची, मसाले, कोकम सरबत इ. बनवून ठाण्यात पाठवत होती. राजा बारावीत नापास झाला. त्याला पुढे शिकण्यापेक्षा स्वतःच्या पायावर उभं राहणं जास्त गरजेचं होतं. त्याने एक-दोन वर्षे एका गॅरेजमध्ये काम करून, दुचाकी गाड्या दुरूस्तीचं काम शिकून घेतलं. त्याला या विषयात गती होती. मग काकाच्या मदतीने, बँकेकडून कर्ज काढून स्वतःचं गॅरेज काढलं. पोटापाण्यापुरतं उत्पन्न मिळत होतं त्याला. तो काकाकडेच पोखरणला राहात होता. जमेची बाजू म्हणजे राजा मेहनती आणि निर्व्यसनी होता. मागच्या वर्षी बहिणीचं लग्न करून दिलं होतं. 

क्रमश:  भाग १

© सुश्री प्रणिता खंडकर

संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.

वाॅटसप संपर्क.. 98334 79845 ईमेल [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘एक नंबर शिवणार’… भाग २ – लेखक – श्री राजेंद्र परांजपे ☆ प्रस्तुती – श्री मेघःशाम सोनवणे ☆

श्री मेघःशाम सोनवणे

?जीवनरंग ?

☆ ‘एक नंबर शिवणार’… भाग २ – लेखक – श्री राजेंद्र परांजपे ☆ प्रस्तुती – श्री मेघःशाम सोनवणे ☆

(मागील भागात आपण पाहिले – दुर्दैवाने राजारामने लिहून दिलेला त्याचा नंबर माझ्याकडून हरवला. त्यामुळे नंतर त्याच्याशी कुठलाच संपर्क झाला नाही. बाबासाहेबांकडून त्याचा नंबर घेईन म्हंटलं, पण तेही राहूनच गेलं.  आता इथून पुढे)

ह्या घटनेनंतर साधारण नऊ दहा वर्षांनी एकदा दुपारी ठाण्याला मी एका मित्राच्या लग्नाला गेलो होतो. तिथून जेवून परत घरी येताना, हॉल स्टेशनजवळ होता, म्हणून जेवण जिरवायला चालत स्टेशनकडे निघालो. नेमकं त्याचवेळी माझ्या बुटाच्या सोलने मला दगा दिला. बुटाला सोडून सोल लोंबकळू लागला. मात्र माझ्या नशिबाने तिथून पन्नास फुटावरच मला एक चांभराचं दुकान दिसलं. कसातरी खुरडत मी त्या दुकानापर्यंत पोचलो. तिथला चांभार खालमानेने काहीतरी शिवत होता. मी त्याच्या पुढ्यात माझा सोल सुटलेला बुट टाकला.

“सोल सुटलाय का, आत्ता शिवतो बघा.” तो म्हणाला.

“दादा, जरा चांगला शिवा हं. मला लांब जायचंय.” मी म्हणालो.

“साहेब, अगदी एक नंबर शिवणार बघा. काळजीच नको.” त्याच्या तोंडचे हे शब्द ऐकून मी चमकलो. हा राजाराम तर नव्हे?

“राजाराम?” मी सरळ हाकच मारली.

हाकेसरशी त्याने वर बघितलं. तो राजारामच होता. माझ्याकडे त्याने दोन मिनिटं बघितलं आणि म्हणाला, “साहेब, तुम्ही ते अंधेरीचे इतिहास संशोधनवाले ना?” मी हो म्हणालो. पठ्ठ्याच्या लक्षात होतं तर. मला बरं वाटलं. एकमेकांना ओळखल्यावर साहजिकच आम्ही गप्पा मारु लागलो. बोलता बोलता तो म्हणाला, आता मी कामासाठी पूर्वीसारखा फिरत नाही. हे खोपटं भाड्याने घेतलय. रोज इथे मी आणि मुलगा येतो, आणि काम करतो. माझ्या फिरण्यामुळे आणि चोख कामामुळे बरेचजण मला ओळखतात. ते फाटकी पुस्तकं, वह्या वगैरे इथे घेऊन येतात. माझा मुलगा ते शिवतो आणि मी चपला, बुट वगैरे शिवतो.

मुलगा? मी चमकलो. माझ्या आठवणीप्रमाणे राजारामला मूलबाळ नव्हतं, मग हा मुलगा कुठून आला? माझ्या चेहऱ्यावरील प्रश्न ओळखून राजारामच पुढे म्हणाला,    

“साहेब, माझा सख्खा मुलगा नाही. त्याचं काय झालं, सात आठ वर्षांपूर्वी एक दिवशी मी ठाण्याला स्टेशनवर उतरलो, तेव्हा पुलाखाली मला एक लहान पांगळा मुलगा दिसला. कुठल्या तरी भिकाऱ्याचा असावा. चेहऱ्यावरून उपाशी दिसत होता. मला त्याची दया आली म्हणून मी एक बिस्कीटचा पुडा घेऊन त्याला द्यायला गेलो, तेव्हा तो गुंगीत आहे असं लक्षात आलं. मी त्याच्या अंगाला हात लावून बघितलं, तर अंग चांगलंच गरम लागलं. सणकून ताप भरला होता. मग मी तसाच त्याला उचलला आणि स्टेशनजवळच्या एका ओळखीच्या डॉक्टरांकडे घेऊन गेलो. डॉक्टरांनी तपासून त्याला औषध दिलं.  तोपर्यंत हे सगळं ठीक होतं. त्यानंतर आता ह्या मुलाचं काय करायचं हा विचार माझ्या मनात आला. पण मी धाडस करुन आणि काय होईल ते बघू असं ठरवून त्याला थेट माझ्या घरीच घेऊन गेलो. बायकोने आणि आईने त्या मुलाला बघून बरेच प्रश्न विचारले. मी त्यांना काय घडलं ते सविस्तर सांगितलं. आधी त्यांनी दुसऱ्याच्या अनोळखी मुलाला घरात घ्यायला काचकूच केलं. पण नंतर त्याची अवस्था बघून त्या तयार झाल्या. थोड्या दिवसांनी औषधांनी आणि चांगल्या खाण्यापिण्याने तो मुलगा बरा झाला. म्हणून मी त्याला, परत होता तिथे सोडून येतो म्हणालो, पण तोपर्यंत त्या दोघींना त्याचा लळा लागला. त्यांनी नेऊ दिलं नाही. तसंही आम्हाला मूलबाळ नव्हतं आणि इतक्या दिवसात त्याची चौकशी करायला कुणीही आलं नव्हतं. हा अपंग मुलगा कुणाला तरी जड झाला असेल, म्हणून दिला असेल सोडून. दुसरं काय? राहू दे राहील तितके दिवस. माझ्या आईने त्याचं नाव किसन ठेवलं. आधी आम्हाला तो नुसता पांगळाच वाटला, पण नंतर त्याची जीभही जड आहे हे लक्षात आलं. तो तोतरा बोलतो. पण ह्या दोन गोष्टी सोडल्या तर अगदी हुशार आहे. घरी मी पुस्तकं शिवायचं काम करायचो, तेव्हा माझ्या बाजूला बसून माझं काम तो लक्षपूर्वक बघायचा. तीन चार वर्षातच त्याने माझं काम आत्मसात केलं. आता तो लिहा वाचायला पण शिकतोय. साहेब, आमचं हातावर पोट आहे. त्याला घरी ठेवला तर माझ्या बायकोला किंवा आईला त्याच्यासाठी घरी थांबायला लागतं, त्यांचा कामावर खाडा होतो. त्यात त्याच्या तोतरेपणामुळे आजूबाजूची मुलं त्याला चिडवून बेजार करतात, म्हणून मी त्याला पाठूंगळीला मारुन रोज इथे माझ्या मदतीला घेऊन येतो.” एका दमात राजारामने सगळं कथन केलं.

“अरे पण आहे कुठे तो, मला तर दिसत नाही.” सगळं ऐकून आणि आश्चर्यचकित होऊन मी म्हणालो.

“या, दाखवतो,” असं म्हणून राजाराम मला त्याच्या दुकानाच्या मागच्या बाजूला घेऊन गेला.

तिथे कंपाऊंडची भिंत आणि राजारामचं दुकान याच्या मधल्या, प्लॅस्टिकचं छप्पर असलेल्या छोट्याश्या जागेत एक पांगळा मुलगा अगदी तन्मयतेने एक जुनं पुस्तक शिवत बसला होता. राजारामने उजेडासाठी तिथे एका बल्बची सोय केली होती. त्या मुलाच्या आजबाजूला काही फाटकी आणि काही शिवलेली वह्या, पुस्तकं होती. कामातली त्याची सफाई अगदी राजारामसारखीच वाटत होती. राजारामने त्याची आणि माझी ओळख करुन दिली. माझ्याकडे बघून त्याने हात जोडले व तो छान हसला. मला राजारामचं आणि त्या मुलाचं खूप कौतुक वाटलं. त्याचबरोबर मला त्या मुलाची दयाही आली, म्हणून मी राजारामला विचारले,

“राजाराम, तू ह्याला मागे का बसवतोस? पुढे तुझ्या बाजूला बसव. तिथे उजेड चांगला आहे आणि जागाही मोठी आहे.”

“साहेब, आधी त्याला मी पुढेच बसवायचो. पण नंतर लक्षात आलं, की लोकं एकाच ठिकाणी चपला आणि पुस्तकं शिवायला द्यायला बिचकतात. त्यातूनही काहींनी काम दिलं तर ते पैसे किसनच्या कामाकडे न बघता त्याच्या पांगळेपणाकडे बघून द्यायचे. ते मला आवडत नव्हतं. म्हणून मग मी त्याला मागे बसवायला लागलो. त्या अरुंद जागेची त्याला आता सवय झालीय. आता तो कुणाला दिसत नाही. त्यामुळे सगळेच प्रश्न सुटले. साहेब, तो त्याच्या पांगळ्या पायांवर कधीच उभा नाही राहिला तरी चालेल. पण आपल्या हिमतीवर उभा राहीला पाहिजे. कुणाच्या दयेवर नको.” राजारामने स्पष्टीकरण दिलं.

राजारामच्या ह्या विचारांनी मी थक्क झालो. अशा विचारांची माणसं आजच्या जगात खरंच दुर्मिळ आहेत. राजारामचं आणि किसनचं पुन्हा एकदा कौतुक करुन, त्यांचा निरोप घेऊन मी निघणार, इतक्यात राजाराम म्हणाला,

“साहेब आणखी एक सांगू? आजवर आम्ही तिघांनी चपला, वह्या, पुस्तकं, गोधड्या, पिशव्या ह्या निर्जीव वस्तू खूप शिवल्या, त्यावर आमचं पोट भरलं. पण आता आम्ही ह्या पांगळ्या मुलाचं फाटलेलं आयुष्य शिवणार. आणि अगदी एक नंबर शिवणार बघा. हे देवाने दिलेलं काम आहे, ते करायलाच पाहिजे.”

राजारामचं ते वाक्य माझ्या मनावर कायमचं कोरलं गेलं आणि माझ्या मनातली त्याची प्रतिमा शतपटीने उंचावली.

 – समाप्त –

मूळ लेखक – राजेंद्र परांजपे  

संग्राहक – मेघःशाम सोनवणे

मो 9325927222

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares