मराठी साहित्य – जीवन रंग ☆ मृगजळातील हिरवळ (भाग – 2) (भावानुवाद) ☆ सुश्री सुमती जोशी

सुश्री सुमती जोशी 

☆ जीवनरंग ☆ मृगजळातील हिरवळ (भाग – 2) ☆ सुश्री सुमती जोशी 

अशोक खूप चालला होता. सोमेश्वर शाळा अजून किती दूर आहे, हे त्याला समजेना. खेडवळ लोकांना विचारून खरा अंदाज येणं कठीण. एक सायकलस्वार समोरून येताना दिसला. अशोकनं त्याला विचारलं, “सोमेश्वर शाळा किती दूर आहे?”

सायकल चालवता चालवता तो उत्तरला, “लई दूर हाय.”

पाण्याचा एक ओहळ होता. आंब्याच्या एका झाडाची छोटीशी सावली पडली होती. बॅग ठेवून तो मटकन खाली बसला. बायकोनं निघताना न्याहारी आणि पाणी बरोबर दिलं होतं. रोजच देत असे. केव्हापासून तो तहानेनं व्याकूळ झाला होता. बॅग उघडून चाचपडूनही हाती काही लागलं नाही. न्याहारीची पिशवी गेली कुठे? पुस्तकं बाहेर काढून बघितलं. पिशवी कुठेही दिसेना.

क्षणभर विचार केल्यावर त्याच्या लक्षात आलं. प्रकाशनसंस्थेच्या कार्यालयात पुस्तकं घेताना आपण खाण्याची पिशवी बाहेर काढली होती. घाईघाईत ती पुन्हा आत टाकायची राहिली. एखादा दिवस असा काही वाईट उगवतो…असा विचार करत अशोक उठला. ऊन मी म्हणत होतं. भुकेमुळे पोटात खड्डा पडला होता. अशा ठिकाणी एखादं हॉटेल सापडणंही मुश्कील. बस स्टँडपर्यंत तरी असंच चालत राहायला हवं. समोरून एक मध्यमवयीन माणूस येत होता. कदाचित शेतावरचं काम उरकून येत असावा. अशोकनं त्यालाच विचारलं. समोर बोट दाखवत तो उत्तरला, “याच रस्त्यानं सरळ जा.”

हाच रस्ता शाळेकडे कुठे वळण घेतो, ते अशोकला समजेना. आता सरळ चालत राहायचं. कोणाला विचारायच्या भानगडीत पडायचं नाही. चालता चालता शाळेपाशी पोचेन.

उशीर होत होता. रणरणत्या उन्हाचा ताप वाढतच होता. नदीकिनाऱ्याच्या तापलेल्या वाळूवरून येणाऱ्या गरम वाऱ्यामुळे डोळे चुरचुरू लागले होते. डोकं तापलं होतं. अशोक झपाझप पावलं टाकू लागला. समोर झाडापानांच्या आडोशाला वस्ती दिसू लागली. तेच गाव असावं, असं त्याला वाटलं.

नदीच्या काठावरून रस्त्यानं एक वळण घेतलं आणि तुरळक घरं दिसू लागली. सगळी सिमेंटची पक्की घरं. सुखवस्तू लोकांचं गाव आहे तर! दोन वर्षांपासून गावं पालथी घातल्यामुळे आता अशोकला गावात पाय टाकल्याबरोबर त्या गावाची कुंडली मांडता येऊ लागली होती. या गावातली मुलं पुस्तकं खरेदी करू शकतील, अशोकनं अंदाज केला. गावातले रस्ते बरेच रुंद दिसत होते, पण रस्त्यावर फारशी रहदारी नव्हती. एक अद्भुत स्तब्धता वातावणात पसरली होती. जुन्या काळातलं एक घर दिसत होतं, बाजूला तळं. आमराई मोहरली होती. त्याचा सुगंध वातावरणात भरून राहिला होता. आता कोणाला विचारायची गरज नाही. समोरच दिसतंय खेळाचं मोठं मैदान आणि बाजूला शाळेची दुमजली इमारत. भिंतीवर मोठया अक्षरात पाटी लटकावली होती, ‘सोमेश्वर हायस्कूल.’

खेडेगावात शहरासारखी एवढी मोठी शाळा असेल, असं अशोकला वाटलं नव्हतं. या शाळेत नक्कीच खूप मुलं शिकत असतील. आता मात्र कोणी दिसत नव्हतं. सगळीकडे निरव शांतता, स्तब्धता भरून राहिली होती. तो चपापला. शाळा का बरं बंद असावी? इतकं चालून आलो खरा, पण…

तो थबकला. आता मात्र त्याचे प्राण कंठाशी आले. इतक्यात व्हरांडयात कोणाची तरी चाहूल लागली. मुलांना शाळेला सुट्टी असेल, पण शिक्षक शाळेत काम करत असतील. शाळेच्या चारी बाजूला मजबून भिंत आणि समोर लोखंडी दरवाजा. अशोकनं आत डोकावून पाहिलं. दोन्ही बाजूंना मोठा व्हरांडा होता आणि ओळीनं सगळ्या वर्गांचे दरवाजे बंद होते. दुसऱ्या मजल्यावर शाळेचं ऑफिस असावं. समोरच्या जिन्यावरून तो दुसऱ्या मजल्यावर आला. तिथेही तीच निरव स्वब्धता. त्यानं इकडेतिकडे पाहिलं. माणसांचा वावर नव्हता. तेवढयात त्याला समोर कोणाची तरी चाहूल लागली. बॅगेच्या ओझ्यानं त्याच्या पाठीला रग लागली होती. बॅग खाली टेकवून पुढे जाऊन त्यानं मोठयानं विचारलं, “कुणी आहे का तिकडे?”

जवळच्या एका खोलीतून एक मध्यमवयीन, धोतर-शर्ट घातलेला, किरकोळ माणूस बाहेर आला. अशोककडे एकटक पहात त्यानं विचारलं, “कोणत्या प्रकाशनसंस्थेतून आलात?”

“एका छोटया संस्थेतून. आपण कोण?”

“मी सनातन. शाळेचा शिपाई. आज कोणी शिक्षक नाहीत, त्यामुळे आज काम होणार नाही.”
”कोणीच नाही?” अशोकाचा कंठ दाटून आला.

“उद्या सुट्टी आहे. परवा सगळे भेटतील. तुम्ही परवा या.”

क्रमश: ….

श्री चंचलकुमार घोष यांनी लिहिलेल्या ‘मरुद्यान’ या बंगाली कथेचा भावानुवाद.

अनुवाद – सुश्री सुमती जोशी

मोबाईल ९८३३२२२१०६. इ मेल आयडी [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवन रंग ☆ मृगजळातील हिरवळ (भाग – 1) (भावानुवाद) ☆ सुश्री सुमती जोशी

सुश्री सुमती जोशी

परिचय 

  • मायक्रोबायॉलॉजी या विषयात पदवी संपादन
  • नवी क्षितिजे या नियतकालिकासाठी विविध विषयांवर लेखन
  • २००४ साली ‘तीन पाश्चिमात्य लेखिका’ हे पुस्तक प्रकाशित झालं.
  • २००९ साली ‘उत्क्रांती’ हे डार्विनचा उत्क्रांती सिद्धांत सोप्या भाषेत समजावून सांगणारं पुस्तक राजहंस प्रकाशनातर्फे प्रकाशित. राज्य पुरस्कारानं सन्मानित
  • २०१० साली वयाच्या साठाव्या वर्षी बंगाली भाषा शिकले. त्यानंतर अनेक बंगाली कथा अनुवादित केल्या. ‘बंगगंध’ हे अशा कथांचं पुस्तक उन्मेष प्रकाशनातर्फे प्रकाशित. तिलोत्तमा मझुमदार यांनी लिहिलेली ‘वसुधारा’, सुचित्रा भट्टाचार्य यांनी लिहिलेली ‘तुटलेली तार’, स्मरणजित चक्रवर्ती यांनी लिहिलेली ‘आकाशप्रदीप’, चंचल कुमार यांनी लिहिलेली ‘काही जमणार नाही तुला’ या अनुवादित कादंबऱ्या उन्मेष प्रकाशनाच्या मेधा राजहंस यांनी प्रकाशित केल्या. मैत्र, संवाद सेतू, अक्षरधारा, हंस, अंतर्नाद अशा दिवाळी अंकात अनुवादित कथा प्रकाशित.
  • वास्तव्य मुंबईचं पश्चिम उपनगर बोरीवली येथे.

☆ जीवनरंग ☆ मृगजळातील हिरवळ (भाग – 1) ☆ सुश्री सुमती जोशी 

पाठीवर मोठया बॅगेचा बोजा घेऊन अशोक कच्च्या रस्त्यावरून चालला होता. दोन्ही बाजूला हिरवी शेतं. कोवळी कोवळी रोपं वाऱ्यावर डुलत होती. थंडी पळाली होती. वसंताची चाहूल लागल्यामुळे हवेत उबदारपणा आला होता. अशोक घामानं निथळत होता. लहान चणीचा अशोक एका छोटया प्रकाशन संस्थेत पाठयपुस्तकांचा विक्रेता म्हणून काम करत होता. शाळा सुरू होण्याआधी तीन महिने विश्रांतीचं नावही घेता आलं नसतं. सारा दिवस वेगवेगळ्या शाळांमध्ये जाऊन तिथल्या सरांना नवीन पुस्तकांच्या नमुनाप्रती द्यायच्या होत्या.

‘सर, आमची ही पुस्तकं बघता का? इतर पुस्तकांपेक्षा ती वेगळी आहेत.’

बहुतेक सर दोन-चार पानं उलटून गंभीर आवाजात म्हणत, ‘ठेवून जा. मग बघीन.’

‘पुन्हा कधी येऊ, सर?’

‘आणखी कितीतरी पुस्तकं आहेत. चाळायला वेळ लागेल.’

अगतिक होत अशोक पुन्हा प्रश्न विचारी, ‘तरीपण अंदाजे किती दिवसांनी येऊ?’

आता मात्र मान वर करून सर उलट प्रश्न विचारीत, ‘किती देणार?’

‘विक्रीच्या दहा टक्के.’

‘दुसरा एकजण पंधरा टक्के देणारेय.’

‘ठीक आहे, सर. मी पण तेवढेच देईन. शिवाय मी एखादी भेटवस्तूसुद्धा देईन.’

सरांच्या चेहऱ्यावर मंद स्मित झळकतं, ‘बरंय, मग दोन आठवडयांनी ये. काय करता येईल, ते बघतो.’

अशी उत्तरे ऐकल्यावर अशोकला खूप वाईट वाटे. आईवडिलांखालोखाल प्रत्येक माणसावर ऋण असतं शिक्षकांचं. म्हणून तर…सुरुवातीला तोसुद्धा हे ऋण मानायचा, पण आता मात्र तसं होत नाही. त्याच्या प्रकाशनसंस्थेची पाठयपुस्तकं जिल्ह्यातल्या पाच शाळांमध्ये लावण्यात तो यशस्वी झाला होता. आणखी दोन-चार शाळांमध्ये तरी आपल्या पाठयपुस्तकांची वर्णी लावली पाहिजे, नाहीतर नोकरीवर केव्हा गदा येईल, ते सांगता येणार नाही, असं तो मनाला पुन:पुन्हा बजावत होता. पूर्वीची गोष्ट वेगळी होती. आई आणि मुलगा, दोन तोंडाची व्यवस्था करावी लागे. गावच्या घरी जे काही थोडंफार असेल, त्यावर भागवता येत असे. पण सहा महिन्यांपूर्वी लग्न केलं आणि  जबाबदारी एकदम कशी वाढली, ते अशोकच्या लक्षात आलं नाही.

पायाबरोबर मनातली विचारचक्रंही वेगानं फिरू लागली. गेले तीन दिवस पायपीट करत होता, पण एकाही शाळेत पुस्तकं खपवता आली नव्हती. सकाळीही तो एका शाळेत गेला होता, पण प्रवेशद्वारापासून शिपायानं ‘आमची पुस्तकांची व्यवस्था झालीय. आता आणखी पुस्तकं घेता येणार नाहीत.’ असं सांगून त्याला परतवून लावलं.

बस स्टँडपासून चालून चालून अशोक दमला होता. खेडेगावातल्या शाळांना भेटी देणं काही सोपं नव्हतं. बस मिळत नसे, रिक्षा नाही, सायकल मिळाली तर ठीक, नाहीतर टांगा टाकत चालत राहायचं! अशोकनं धप्प करून बॅग खाली टाकली आणि तो मटकन खाली बसला.

कशी कोणास ठाऊक, पण शिपायाला त्याची दया आली. म्हणाला, ‘तुला सोमेश्वर हायस्कूल बघता येईल.’

‘किती लांब आहे?’ अशोकनं विचारलं.

डांबरी रस्त्यानं गेलास तर खूप लांब आहे. पण नदीच्या काठानं गेलास तर लवकर पोचशील. मोठी शाळा आहे. खूप मुलं शिकायला येतात तिथे.’

दोन वर्षांपासून पाठयपुस्तकांच्या प्रचाराचं हे काम चालू होतं. सोमेश्वरनाथ शाळेचं नाव ऐकलं होतं, पण तिथे जायचं सुचलं नव्हतं. बॅगेचं ओझं पुन्हा एकदा खांद्यावर टाकून अशोक चालू लागला. थोडं पुढे गेल्यावर रस्त्यानं वळण घेतलं. माळरानातून जाणारी पायवाट. आजूबाजूला फारशी वस्ती नव्हती. एका बाजूला शेतं, कोवळ्या रोपांमुळे सगळीकडे हिरवगार दिसत होतं. दुसऱ्या बाजूला झाडापानांच्या पलीकडे दामोदर नदीचं पात्र दिसत होतं. नदीला फार पाणी नव्हतं. पाण्यापेक्षा वाळूच जास्त होती. उन्हात चमचम करत होती. पलीकडच्या तीरावर दूर अंतरावर झाडाझुडपात लपलेलं गाव दिसत होतं. नदीचं पाणी नागमोडी वळणं घेत वाहात होतं. कुठे कमी, कुठे जास्त. अनेक दिशांना पसरलं होतं. पात्रात मध्येमध्ये पाण्यात इंग्रजी व्ही अक्षरासारखे बांबूचे खुंट रोवून ठेवले होते. मासे जाळ्यावर आपटून व्हीच्या कोपऱ्यात गोळा होणार. एक कोळी जाळं टाकून मासे गळाला लागायची वाट बघत होता. जवळच्या काठीवर बसून पक्षी आशेनं जाळ्याकडे डोळे लावून बसला होता. एखादा तरी मासा मिळायची अधीर होऊन वाट बघत होता. अशोक थबकला. त्या दृष्याकडे काही काळ बघत राहिला आणि मनाशी काहीतरी पुटपुटत पुढे चालू लागला.

 क्रमश: ….

श्री चंचलकुमार घोष यांनी लिहिलेल्या ‘मरुद्यान’ या बंगाली कथेचा भावानुवाद.

अनुवाद – सुश्री सुमती जोशी

मोबाईल ९८३३२२२१०६. इ मेल आयडी [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अनुवादित लघुकथा – सुवार्ता ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

 

 

 

 

☆ जीवनरंग ☆ अनुवादित लघुकथा – सुवार्ता ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ 

आजी गुरुप्रीतकौरचा ताप उतरतच नव्हता. त्यांची सून ज्ञानप्रीत हिने डॉ सतवीर सिंह यांना सांगितलं  की, “डॉ. ह्या ना कुणाचंच अजिबात ऐकत नाहीत. काल रात्री त्या गच्चीवर कधी गेल्या, आणि तिथेच अंथरूण घालून,रजई लपेटून कधी झोपल्या, हे घरातल्या कुणालाच कळलंही नाही. सकाळी उठल्यावर विचारलं तर म्हणाल्या की “अगं दिल्ली बॉर्डरवर इतक्या थंडीत आणि सलग इतके दिवस,हे आणि कीरतबेटा उघड्यावर कसे झोपत असतील?”

डॉ. सतवीर त्यांचे फॅमिलीडॉक्टर होते. त्यांनी आजीला तपासलं तर त्यांच्या अंगात खूप ताप होता. पूर्ण शरीर थरथर कापत होतं. तापाचं कारण कळल्यावर ते म्हणाले “मी औषधं लिहून देतो, ती आणून यांना द्या . ठीक होईल सगळं.” आणि आजीला बजावलं–”आजी, आता अंथरुणातून अजिबात उठायचं नाही. आणि काळजीही करायची नाही. तिथे खूप माणसं आहेत एकमेकांची काळजी घेण्यासाठी.”

थंडीने कुडकुडत आजी म्हणाली–”अरे बाळा,पण मी टीव्हीवर पाहिलंय, की दिल्ली बॉर्डरवर खूप बॅरिकेड्स लावलेत, पोलिसांच्या तुकड्या तैनात आहेत. शिवाय अश्रूधुराची नळकांडी, पाणी याचीही व्यवस्था दिसतेय.”

त्यावर डॉक्टरांनी समजावलं, “आजी ती दिल्ली-बॉर्डर आहे. वाघा-अटारी बॉर्डर नाहीये. आणि बॅरिकेडच्यापलीकडे पोलिसांच्या ज्या तुकड्या आहेत,त्यात सगळे आपले भाऊबंदच तर आहेत. काळजी करू नका. लवकरच चांगली बातमी मिळेल.”

पण यामुळे आजीचं मन थोडंच शांत होणार होतं?आणि त्यांना काळजी वाटणंही स्वाभाविकच होतं. आजोबांची बायपास-शस्त्रक्रिया झालेली होती. शिवाय त्यांच्या लग्नाला पन्नास वर्षे होऊन गेली असली तरी,लग्न-कार्य, आणि कुणा नातेवाईकाचे निधन, याव्यतिरिक्त ते दोघे एकमेकांपासून असे लांब कधीच राहिले नव्हते—-त्यांचा नऊ वर्षांचा नातू गुरमीत आपल्यापरीने आजीची सेवा करत होता. मागेल ते पळत जाऊन आणून देत होता. आजी जेवल्याशिवाय त्याच्या घशाखाली घास उतरत नव्हता.

ज्ञानप्रीत बघत होती–जेव्हापासून गुरमीतचे आजोबा सरदार गुरुशरणसिंह, आणि वडील सरदार कीरतसिंह, दोघेही गावातल्या इतर लोकांबरोबर दिल्लीला गेले होते, तेव्हापासून त्याचा चेहेरा कोमेजल्यासारखा झाला होता. त्याच्या अजीतकाकांच्या घरीच आपल्या इतर मित्रांसोबत तो दिवसभर रेंगाळत रहायचा.

आज आजी तापाच्या ग्लानीत दिवसभर सारखी काहीतरी बडबड करत होती—”विचित्रच आहे सगळं…… प्रजासत्ताक राष्ट्र म्हणे….. लोकांनी इतक्या जागांवर यांना जिंकून दिलंय…… ,आणि लोकांच्या भल्यासाठी, लोकांना हितकारक असणारे कायदे करण्याचा हक्कही दिलाय…..पण हक्कासाठी लढण्याच्या हक्काबरोबर, राजकारणही खेळण्याचा हक्क नाही दिलाय….. राजकारण काय? काल टेबलाच्या या बाजूला होतं….. आज टेबलाच्या त्या बाजूला आहे…. उद्या पुन्हा या बाजूला येईल…… एक मुलगा देशाची सेवा करण्यासाठी आहे… त्याला करू दे देशसेवा…. एक या मातीची सेवा करण्यासाठी आहे…. त्याला मातीची सेवा करू दे….”आपल्या नवऱ्याच्या  आणि मुलाच्या आठवणीने ती अस्वस्थ झाली होती. गुरमीतला मात्र त्यातलं काहीच समजत नव्हतं… प्रजासत्ताक… कायदे… हक्क… राजकारण… हे शब्द त्याला विचित्रच वाटत होते. एव्हाना संध्याकाळ झाली होती. जरा वेळाने आजीचा ताप थोडा उतरला, आणि गुरमीत मित्रांसोबत पळतच अजीतसिंहांच्या घरी पोहोचला.

सासूची प्रकृती सुधारलेली पाहून ज्ञानप्रीतला बरं वाटलं. दिवसभरात दोनदा किरतसिंहचा फोन आला होता, पण तिने त्यांना काहीही सांगितलं नव्हतं. तितक्यात सासूने तिला हाक मारली…” ज्ञानप्रीत, यांना जरा फोन लावून दे. मला त्यांच्याशी बोलावसं वाटतंय.”

ती काही बोलणार, इतक्यात गुरमीत पळत आला.स्वयंपाकघरातून त्याने थाळी आणि चमचा आणला. आजीच्या खोलीतून टॉर्चही आणला. आणि तो गच्चीवर जायला लागला…. “अरे गुरमीत काय झालं? सांग तरी आम्हाला..”आजीने विचारलं .

“आजी, जोपर्यंत आजोबा त्यांचं म्हणणं पटवून देऊन परत येणार नाहीत, तोपर्यंत मी आणि माझे मित्र रोज संध्याकाळी सात वाजता एक मिनिटभर चमच्याने थाळी वाजवणार  आणि एक मिनिट टॉर्च लावून ठेवणार….”गुरमीतने पळतापळताच सांगितलं.—–हे ऐकताच त्या दोघी हतबलपणे एकमेकींकडे पहात राहिल्या…..त्याच्या बोलण्याचा मनातल्या मनात   आपापला अर्थ लावत राहिल्या—-.

मूळ हिंदी कथा : श्री हेमन्त बावनकर

अनुवाद :  सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अजि म्या भूत पाहिले…. भाग-5 ☆ सौ ज्योती विलास जोशी

सौ ज्योती विलास जोशी

☆ जीवनरंग ☆ अजि म्या भूत पाहिले…. भाग-5 ☆ सौ ज्योती विलास जोशी

(करोनाचं हे दुसरं भूत….)

आता भूतही इरेला पेटलं…..

“भूत म्हणालं, मीच करोना भूत आहे.”

मी हादरलो. ज्या विठुरायाकडे याच करोनाला नष्ट कर म्हणून आम्ही वारकरी साकडं घालतोय त्याचीच तक्रार मी करोनाकडे केली.

काय करून बसलो मी हे? आता विठुराया माझ्यावर नक्कीच रुसणार! मी अगदी दिग्मूढ झालो!”

“अरे बापरे! काय करायच रेआता?” आम्ही तिघांनी पाटणकरला आणखी संकटात टाकलं.

“मी भुताच्या हाता पाया पडू लागलो. विनवणी करू लागलो. काही चुकलं असेल तर माफ कर म्हणून आर्जव करू लागलो.

त्यावर ते म्हणालं,माझ्याकडे एक करारनामा आहे.त्यावर अखिल मानवजातीची सही हवी आहे ती घेऊन दे, मग मी जातो.

मी करारनामा वाचला आणि क्षणाचाही विलंब न लावता सर्वांच्या वतीने सही केली.

भुताची माझ्या मानेवरची हाताची पकड सैल झालीआणि ते गडगडाटी हास्य करीत छूमंतर झालं. मीही पळत सुटलो.”

“अरे पण होतं तरी काय त्या करारनाम्यात ? पूर्ण वाचलास का करारनामा? कशावर सही करून आलास?” पाटणकर स्वप्न वर्णन करतो आहे हे आम्ही एव्हाना विसरलो होतो. आम्हा सर्वांच्याच मनामध्ये प्रश्नांचे काहूर माजलं होते.

“वृक्षवल्लीशी सोयरीक करा, प्रदूषणविरहित हवा राखण्यासाठी पर्यावरणाचे रक्षण करा, प्राणी मात्रांवर दया करा, निसर्गाशी मिळतेजुळते घ्या हे आणि असे बरेच मुद्दे त्यात होते.”

“आणि तू सही केलीस?”

“होय, पर्यायच नव्हता दुसरा! कधी माझी या भुतापासून सुटका होते असू झालं होतं मला. मी त्या करारनाम्यावर सही केली आणि सुटकेचा श्वास सोडला. ‘करोना गेला, करोना गेला’ असे ओरडत सुटलो जणू हर्षवायू झाला होता मला.”

“मग?”

“अरे, मग काय? मला कोणीतरी जोरजोरात हलवत होतं…. आणि म्हणत होतं…… उठा! आज आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी सकाळी त्या दळभद्री, कपाळ करंट्या करोनाच नाव कशाला घेताय ? विठुरायाला आळवा. उठा!”

“मग?”

आमचं ‘मग’ काही संपेना. पाटण्या बोलतच राहावा असं वाटत होतं. “मग काय……  उठलो तर साक्षात रुक्मिणी डोळ्यासमोर! आणि रेडिओवर आशाताई गात होत्या…….

‘अजि म्या ब्रह्म पाहिले.’

समाप्त

© सौ ज्योती विलास जोशी

इचलकरंजी

मो 9822553857

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ बोध कथा – तीन मासे ☆ अनुवाद – अरुंधती अजित कुळकर्णी

☆ जीवनरंग ☆ बोध कथा – तीन मासे ☆ अनुवाद – अरुंधती अजित कुळकर्णी ☆ 

||कथासरिता||

(मूळ –‘कथाशतकम्’  संस्कृत कथासंग्रह)

? बोध कथा?

कथा १३ . तीन मासे

एका नदीच्या खोल जलाशयात  तीन मासे राहत होते.  त्या तिघांपैकी एका बुद्धिमान माशाने  पाण्याची स्थिती लक्षात घेऊन यापुढे जलाशयात  पाणी राहणार नाही  हे जाणले.  त्याने त्या दोघा माशांना बोलावून सांगितले की “ उन्हाळ्यात या जलाशयातील पाणी कमी होईल तेव्हा कोळी येऊन  जाळे पसरवून  आपल्याला पकडतील व ठार मारतील. तेव्हा आपण जर प्रवाहाबरोबर हळूहळू दुसऱ्या जलाशयाकडे किंवा  समुद्राकडे गेलो तरच आपले प्राण वाचतील. इथेच  राहिलो तर संकटे ओढवतील.” बुद्धिमान माशाचे बोलणे ऐकून इतर दोघे त्याला हसले व त्यांनी त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. तेव्हा तो मासा एकटाच ते  जलाशय सोडून प्रवाहाबरोबर दुसऱ्या जलाशयात गेला.

काही काळानंतर उन्हाळा आल्यावर जलाशयाचे पाणी कमी कमी होऊ लागले.तेव्हा ही संधी साधून एक कोळी तेथे आला. त्याने जाळे पसरवून त्या दोघा माशांना पकडून जलाशयाच्या तीरावर आणले.  त्यातील एक मासा एक उपाय करून स्वतःला मृतवत् भासवत निश्चल राहिला.  दुसरा मात्र वारंवार उड्या मारत होता.  तेव्हा  कोळ्याने त्याच्यावर आघात करून त्याला मारले. कोळी दूर गेलेला दिसताच   तो पहिला मासा हळूहळू जलाशयापर्यंत  सरकून झटकन उडी मारून त्यात प्रवेश करून सुरक्षित राहिला.

तात्पर्य – भविष्यात येणाऱ्या संकटांचा आधीच विचार करणारा सहज सुखी होतो. संकट आल्यावर बुद्धिबलाने योग्य उपायांनी प्रतिकार करणाऱ्याला  सुखप्राप्ती होते.  दैवावर अवलंबून  राहिल्याने अनभिज्ञ व्यक्तीचा विनाश होतो.

अनुवाद – © अरुंधती अजित कुळकर्णी

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अजि म्या भूत पाहिले…. भाग-4 ☆ सौ ज्योती विलास जोशी

सौ ज्योती विलास जोशी

☆ जीवनरंग ☆ अजि म्या भूत पाहिले…. भाग-4 ☆ सौ ज्योती विलास जोशी

(करोनाचं हे दुसरं भूत….)

पाटणकर पोटतिडकीने सांगत होता……

“भूत दादा,आई-बापाविना आम्ही भावंडे!मोठ्या प्रेमाने भावाने आम्हाला इथवर आणले. उच्चशिक्षित झालो,डॉक्टर झालो. आता गावात राहून कसं चालणार ?पोटापाण्याचं काही बघू की नको? पण खरं सांग, सेवाच करतोय ना रे मी सर्वांची ? मग, विठू का रुसला ? वारी का नको म्हटला?” असे म्हणून पाटणकर रडू लागला. आम्ही त्याला सावरलं.  आत्ता कुठे पाटणकर खरं खरं बोलायला लागला होता.

“मग तुझी सुटका कशी झाली?” मी मुद्द्याचा प्रश्न विचारला.

“अरे काय सांगू तुम्हाला?” असे म्हणून पाटणकरचे डोळे चमकले. आम्ही त्याला नकळत हरभऱ्याच्या झाडावर चढवले होते.

“भूतच मला सांगू लागले; अरे तुझा विठू ना परवा मला तुझ्या सोबतच दवाखान्यात दिसला. तो पीपीई किट घालून अगदी आम्हा भुतांसारखा  दिसत होता. तुझ्या बरोबरीने काम करत होता तो! तूहि त्याला ओळखलंच नाहीस. आम्हा सारखी अशी अनेक भूतं मानव सेवेत लागली आहेत. भुतासारखच काम करतात सगळे. त्यात तूहि आहेस. काय सांगतोस? तुला कसे ठाऊक की विठुराया माझ्यासोबत होता ते? मी भुताला विचारले.

अरे, मला नंतर भेटला तो आणि  म्हणाला,यंदा मानवजातीवर कसलेसे संकट आले आहे म्हणे! त्यानं अनेक माणसे आजारी पडायला लागली आहेत त्यामुळे दवाखान्यात काम प्रचंड वाढलं आहे.

माझे वारकरी अथक काम करताहेत. देशाचे पंतप्रधानही अहोरात्र काम करतातहेत. सर्वजण त्यांच्या सादेला प्रतिसाद देत आहेत. पण हात अपुरे  पडायला लागलेत रे!
मी ठरवलं, यंदा आपणच मदतीलाधावून जायचं भक्तांच्या. तेवढाच खारीचा वाटा! पंढरी सोडून इथेच आलो आहे मी! म्हणून माझ्या वारकऱ्यांना भक्तांना मी वारीला येऊ नका,कायिक नाही तर मानसिक वारी करा असं म्हणालो.

बरं, सर्वांना चंद्रभागा रुसली आहे असे का बरं वाटलं? ती तर दुथडी भरून वाहते आहे व सगळ्यांना आलिंगन द्यायला उत्सुकआहे.सगळ्या वारकऱ्यांनी उगाच गैरसमज करून घेतला आहे झालं.

बाबा रे, मग तू का माझ्या मानगुटीवर बसला आहेस ?का माझा पिच्छा पुरवतो आहेस? काय हवय तुला? मी भुताला मार्मिक प्रश्न विचारला.”

सडेतोड स्वभावाच्या पाटणकर कडून स्वप्नातही असा बिनधास्त जाब विचारणं अपेक्षितच होतं. उत्सुकता होती ती भुताच्या उत्तराची!…….

क्रमशः….

© सौ ज्योती विलास जोशी

इचलकरंजी

मो 9822553857

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अजि म्या भूत पाहिले…. भाग-3 ☆ सौ ज्योती विलास जोशी

सौ ज्योती विलास जोशी

☆ जीवनरंग ☆ अजि म्या भूत पाहिले…. भाग-3 ☆ सौ ज्योती विलास जोशी

(करोनाचं हे दुसरं भूत….)

पाटणकर फॉर्मात आला होता. कारण आता त्याची गाठ भूताशी होती. थापा मारायला आणि बाता ठोकायला त्याला आता बराच वाव होता.

“आमच्या गावच्या विठोबाच्या देवळाचे आम्ही पुजारी.”  पाटणकर भूताशी वार्तालाप करीत होता. “पूर्व परंपरागत चालत आलेला हा मान आम्ही प्रयत्नपूर्वक जपत होतो. लहानपणी माझ्या मानेला एक गळू झालं होतं.काही केल्याने ते बरे होईना. तेव्हा माझ्या आईने विठ्ठल चरणी नवस बोलला  ‘देवा माझ्या लेकराला बरं कर, तो तुझी जन्मभर यथासांग पूजा करेन.’

विठुराया तिच्या नवसाला पावला. मी ठणठणीत बरा झालो.

यथावकाश मोठा झालो डॉक्टर झालो अन् मुंबईत आलो. विठुरायाची पूजा करायला दुसरे पुजारी आले. विठुरायाच्या पूजेत कधीच खंड पडला नव्हता. सर्वकाही यथासांग चालले होते. मी विठुरायाची वारी ही कधी चुकवली नाही.

आत्ताच करोनामुळेआमची वारी चुकली” म्हणून पाटणकरने करोनाच्या नावाने कडाकडा बोटं मोडली.

“भूत काय करत होतं रे? ऐकत होतं तुझं सगळं?”जोश्याचा बालिश प्रश्न!त्यावर पाटणकर म्हणाला, “आता तुम्ही कसे तल्लीन होऊन ऐकताहात ना ? तसेच ते पण माझे बोलणे तल्लीन होऊन ऐकू लागलं. माझ्या मानेवरची त्याची पकड थोडी सैल झाली होती”

पाटणकरच स्वप्न खूपच रंजक होत चाललं होतं आणि आमची उत्सुकताही शिगेला जाऊन पोहोचली होती.

“पुढे काय झालं?”मी पाटण्याला बोलत केलं.

“मी भुताकडे विठुराया बद्दल तक्रार केली. यंदा या करोनामुळे आम्हा वारकऱ्यांची वारी चुकली यात आमचा काय दोष? पणआता विठुराया आम्हा वारकऱ्यांवर रुसलाय.’ठेयेची बैसुनी मन करा रे प्रसन्न’ असं म्हणायला लागलाय आम्हा वारकऱ्यांना! मन अगदी व्याकूळ झालं आहे आम्हा वारकऱ्यांच ! काय करू ? आज दगडावर बसून त्यालाच आळवत होतो रे भुता… आणि गाणं म्हणत होतो ‘अजि म्या ब्रह्म पाहिले”

“मग? पुढे?” आमची प्रश्नांची सरबत्ती सुरू होती.

तू अगदी खरं बोललास. मी तुझ्यावर खुश आहे! भूत माझ्यावर खूश झालं होतं.

“चला! भूताशी तरी खरं बोललाआमचा पाटणकर.”असे म्हणून पेंडसेने मला चिमटा काढला.

“पण जोवर विठुराया का रुसला? चंद्रभागा का नाही हसली ? या प्रश्नांची उत्तरे तू शोधून काढत नाहीस तोवर मी तुझ्या मानगुटीवरच बसणार.

मी भुताला अगदी खरं खरं सांगायचं ठरवलं. ”पाटणकरचा चेहरा अगदी निरागस वाटू लागला होता.

“काय सांगितलंस?” आमची उत्सुकता ताणली गेली. पाटणकरने स्टोरी सांगायला सुरुवात केली….

क्रमशः….

© सौ ज्योती विलास जोशी

इचलकरंजी

मो 9822553857

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अजि म्या भूत पाहिले…. भाग-2 ☆ सौ ज्योती विलास जोशी

सौ ज्योती विलास जोशी

☆ जीवनरंग ☆ अजि म्या भूत पाहिले…. भाग-2 ☆ सौ ज्योती विलास जोशी

(करोनाचं हे दुसरं भूत….)

‘मनी वसे ते स्वप्नी दिसे’ असे म्हणतात ना, अगदी तसेच झाले. मी एका दगडावर बसून ‘अजि म्या ब्रह्म पाहिले’ हे गाणे गुणगुणत होतो तितक्यात माझ्या मानेवर एक भूत येऊन बसलं.

पाटणकरने आमचे मनोरंजन विक्रम आणि वेताळ यांच्या सुरस आणि चमत्कारिक कथेचा आधार घेऊन करायला सुरुवात केली.

“भुताने मला विचारले, कोणते गाणे म्हणत होतास? माझी अगोदरच भीतीने गाळण उडाली होती आणि त्यातच त्याने मला हा प्रश्न विचारला मी थरथर कापायला लागलो. त्याची माझ्या मानेवरील पकड आणखीनच घट्ट व्हायला लागली.

गाणं ना? ते, हे, आपलं, मी त, त, प, प करू लागलोआणि गडबडीने उत्तर दिले ‘अजि म्या भूत पाहिले’ झालं! त्यानं मला शब्दातच पकडलं!

तुझं भूत, इथंभूत सांग, नाहीतर तुझ्या शरीराची शंभर शकलं होऊन तुझ्याच पायात लोळण घेतील. भुताने मला दम दिला.”

“भूत तुलाच तुझा भूतकाळ विचारत होतं?”पेंडसेने पाटण्याला विचारले. “होय! पण मी घाबरून गाणेही विसरलो आणि भूतकाळही!”

“मग काय झालं?” आम्ही सरसावून बसलो.

पाटण्याची कल्पनाशक्ती, सांगण्याची लकब, प्रसंग हुबेहूब मांडण्याची धाटणी इतकी अप्रतिम आहे की त्याच्या वक्तव्यातील निम्मे खरे-निम्मे खोटे असे गृहीत धरले असले तरी पठ्ठ्य प्रसंग असा उभा करतो की ‘एैसा भी होता है?’ असा प्रश्न मनात आल्याशिवाय राहत नाही.

एव्हाना पाटण्याने त्याच्या स्वप्ननगरीत आम्हाला बरोबर खेचलं होतं अन् तो बोलू लागला.“माझ्या मानेवरची त्याची पकड आणखीनच घट्ट करीत ते माझ्याशी बोलू लागले,

भूतकाळ बदलता येत नाही पण तो आठवता येतो. म्हणून तर भूतकाळ या शब्दात भूत म्हणजे मी आहे. ते म्हणालं.”

पाटण्या अशी संकटाची वेळ कशी मारून नेतो ही उत्सुकता आम्हाला लागून राहिली होती. तल्लीन होऊन आम्हीऐकू लागलो…..

त्याच्या बोलण्याच्या दिशेने कान टवकारले. पाटणकरने आपल्या स्वप्ननगरी चे दार उघडले.

क्रमशः….

© सौ ज्योती विलास जोशी

इचलकरंजी

मो 9822553857

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अजि म्या भूत पाहिले…. भाग-1 ☆ सौ ज्योती विलास जोशी

सौ ज्योती विलास जोशी

☆ जीवनरंग ☆ अजि म्या भूत पाहिले…. भाग-1 ☆ सौ ज्योती विलास जोशी

(करोनाचं हे दुसरं भूत….)

‘करोना’ नावाच्या एका अस्मानी संकटाने सगळ्यांची बोलती बंद केली हे जरी खरं असलं तरी,आम्ही मात्र सर्व त्याच्याविषयीच बोलू लागलो.

आताशा करोनाच्या नावाने बोटं मोडीत दिवस सुरु होतो अन् त्याला शिव्या शाप देत संपतो. आम्हा चांडाळ चौकडीच्या गप्पांच्या कट्ट्यावर देखील या करोनानेच धुमाकूळ घातला आहे.

त्यात आमचा ‘पाटण्या’ म्हणजे पाटणकर रोजची करोना अपडेट देणार! मग काय विचारता…तो येताच करोना जणू आम्हा सर्वांच्या काया प्रवेश करतो आणि आपले अस्तित्व दाखवू लागतो.

पाटणकर म्हणजे एक अजब रसायन आहे. भविष्याची चिंता नसलेला, भूतकाळात डोकावणारा, आणि वर्तमानाला प्रेझेंट समजून चालणारा असा हा, थापा मारतो की बाता हे आम्हाला अजून उमगलेले नाही.

त्याच्या थापा म्हणाव्यात तर तो आम्हा कुणाचेही थापा मारून नुकसान करीत नाही किंवा त्याच्या बोलण्याने आम्हा कुणाचीही फसवणूक होत नाही. आणि बाता म्हणाव्यात तर त्याच्या बोलण्याला एक सत्याची झालर असते.

थापा असोत वा बाता, स्वतःची टिमकी वाजवायला तो कधीही विसरत नाही.

असाच तो आजही कट्ट्यावर आला ते ‘अजि म्या ब्रह्म पाहिले’ हे गाणे गुणगुणत.

“आज अचानक करोनाला बगल देऊन एकदम विठुरायाचा काया प्रवेश? ‘गो करोना’ म्हटलेलं ऐकलं की काय करोना ने?” मी पाटणकरला टोकलं.

“अरे,आज एकादशी. सकाळी-सकाळी कानावर पडलेलं गाणं मनात रुंजी घालतय तेच गुणगुणत  आलोय झालं!” पाटणकरने  गाणे गाण्याचं प्रयोजन सांगितलं.

“आता पूर्ण गाणं म्हण” आम्ही आग्रह धरला. आणि आशा ताईंच्या आवाजातील हे गाणे पठ्ठ्याने पूर्ण म्हटलं की हो!

आज ना तो नेहमीसारखा न्यूज रीडरच्या भूमिकेत होता, ना करंट विषयावर बोलायच्या मूडमध्ये! स्वतःचे बूड स्थिरस्थावर करून तो म्हणाला, “अरे यार, मी काल एक स्वप्न बघितले.आणि त्या स्वप्नात एक भूत!”

आम्ही तिघांनीही एकदम एकमेकांकडे पाहिलं. पाटणकरचे स्वप्न म्हणजे एक शुद्ध आणि स्वच्छ थाप असणार असे आम्हा तिघांना एकाच क्षणी वाटलं असा वे. पण दुसऱ्याच क्षणी रोजच्या, करोना भूताच्या चावून चोथा झालेल्या विषयापेक्षा पाटणकरच्या स्वप्न नगरीत जायचे आम्ही तिघांनी ठरवले.

“अरे पाटणकर रात्रभर पाहिलेले स्वप्न एक तासात सांगून पूर्ण होणार का? माझा खोचक प्रश्न त्याला विशेष आवडला नाही. “नाही म्हणजे तीन तासाचा पिक्चर पण त्याची स्टोरी सांगायला तुला सहा,साडे सहा तास लागतात म्हणून म्हटलं, ”मी माझी सफाई दिली.

“अरे ऐका रे” त्याने दटावले. स्वतःच्या स्वप्न सफरीवर आम्हाला न्यायला तो उतावळा झाला होता.

करोनामय वातावरण रंजक होईल म्हणून आम्ही ही त्याच्या बोलण्याच्या दिशेने कान टवकारले. पाटणकरने आपल्या स्वप्ननगरी चे दार उघडले.

क्रमशः….

© सौ ज्योती विलास जोशी

इचलकरंजी

मो 9822553857

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सहवेदना – भाग 2 ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

 

 

 

 

☆ जीवनरंग ☆ सहवेदना – भाग 2 ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ 

सईचं मन आणि डोळे दोन्ही भरून आले . पळत लांब निघालेल्या त्या स्त्रीला तिने मनापासून आश्वासन दिलं, आणि त्या क्षणी त्या तान्हुलीची जणू खरीखुरी आई झाली ती.–

हॉर्न वाजला तशी सई भानावर आली. हळूच डोळे पुसत ती सलोनीला अलगद हातात धरून गाडीत बसली. अगदी शांत गाढ झोपलेली त्यांची छकुली—दोघेही एकटक तिच्याकडे पहात राहिले होते काही वेळ, आणि मग निघाले—सलोनीच्या घरी—त्यांचा हा निर्णय सासर -माहेरच्या सगळ्यांनीच मनापासून स्वीकारला होता. त्यामुळे घरी सलोनीचं जोरदार स्वागत झालं.

आणि मग एखादी कळी अलवार उमलावी, तशी सलोनी हळुवार उमलत गेली–आणि हे दोघं तृप्त होत राहिले. घरात कशाचीच वानवा नव्हती. ती अगदी लाडाकोडात वाढत होती. तिला हवं ते शिक्षण घेण्याचं स्वातंत्र्य होतं. आणि आता शिक्षण उत्तमरित्त्या पूर्ण झालं होतं–बघताबघता ती लग्नाला आली होती .

तिला अठरा वर्षे पूर्ण झाली होती, तेव्हाच मानसोपचार-तज्ञांच्या सल्ल्याने आणि मदतीने, सई आणि सचिन तिचे खरे आईवडील नसल्याचं तिला योग्यप्रकारे सांगितलं होतं. अशावेळी अशी बहुतेक मुलं, आपण ज्यांना आईवडील म्हणत आलोय, ते आपले खरे जन्मदाते नाहीत, आणि खरे आईवडील कोण हे कुणालाच माहिती नाही, हे पचायला अतिशय अवघड असं कटुसत्य कळल्यावर प्रचंड बिथरतात, विचित्र, बेताल वागायला लागतात हे  डॉक्टरांनी त्यांना सांगितलं होतं–आणि दोघांनाही त्याचंच प्रचंड टेन्शन आलं होतं. सलोनी आपल्याला दुरावणार तर नाही ना, या भीतीने मने धास्तावली होती. पण तिला कधीतरी हे कळणं गरजेचं होतं. आजपर्यंत इतर कुणी भोचकपणाने  तिला हे सांगितलं नव्हतं ही त्यातल्यात्यात जमेची बाजू होती. सलोनीला सत्य कळताच तीही अपेक्षेप्रमाणेच वागायला लागली होती. ७-८ दिवस त्या दोघांशीही अजिबात बोलली नव्हती. पण डॉक्टरांचं कॉन्सेलिंग प्रभावी ठरलं आणि एक दिवस उठल्याउठल्याच रडत येऊन ती सईच्या गळ्यात पडली. हमसून-हमसून रडली. मग हळूहळू शांत झाली. तिच्या मनावरचं मळभ दूर झाल्याचं जाणवत होतं. — ”आई, मला पटलंय — मला जन्माला कुणीही घातलं असलं तरी माझे खरे आई-बाबा तुम्हीच आहात  आणि तुम्हीच रहाल . तुमचं माझ्यावर जिवापाड प्रेम आहे हे मला माहितीये . आणि माझंही तुमच्यावर तितकंच प्रेम आहे. तुम्ही सोडून दुसरे कोणी माझे आई-बाबा असूच शकत नाहीत.” —आणि सगळ्यांच्याच मनाचा बांध फुटला. त्या क्षणी तिघांमध्येही एक समृद्ध घट्ट नातं नव्याने जन्माला आलं. दोघांच्याही आनंदाला पारावार राहिला नव्हता. तिला आश्रमातून आणतांना झालेला आनंद मोठा, की हा या क्षणाचा आनंद मोठा ,हा प्रश्नच निरर्थक ठरला असता. —-आणि आता बघताबघता सलोनी लग्न करण्याइतकी मोठी झाली होती. तिचा तिनेच जोडीदार निवडला होता—अतिशय डोळसपणे. उत्तम स्थळ होतं . मुलगा अमेरिकेत जॉब करत होता. –आणि लग्न आता अवघ्या चार दिवसांवर आलं होतं .लग्नानंतर अर्थातच ती अमेरिकेला जाणार होती—यापुढे सलोनी दुसऱ्या कुणाचीतरी होणार या विचाराने तिच्या डोळ्यात टचकन पाणी आलं –आणि आज इतक्या वर्षांनी अचानक तिला ती बाई आठवली— झाडामागे लपून का होईना, स्वतःच्या मुलीला शेवटचं बघण्यासाठी आसुसलेली– इतक्या दुरून तिला आशिर्वाद देणारी–मनावर कायमचा दगड ठेवून तिथून लांब पळत गेलेली—– सईला प्रकर्षाने जाणवलं —–त्या बाईला समाजाने लाथाडलं होतं , आणि आपण अतिशय सन्मानाने जगत आहोत, हा जमीन-अस्मानाचा फरक दोघींमध्ये असला, तरी दोघींमधली आई अगदी एकसारखीच तर आहे—–दोघींच्या भावनाही त्याच–कासाविशी तीच– आणि मुलीच्या विरहाने मनाला होणाऱ्या वेदनाही त्याच——पण कदाचित तिच्या या सगळ्या भावना जरा जास्तच तीव्र होत्या-असतील, कारण ती तर आयुष्यात पुन्हा कधीही तिच्या मुलीला दुरूनही पाहूसुद्धा शकणार नाहीये. पण माझं तसं नाही——सईला प्रकर्षाने जाणवून गेलं ….

समाप्त 

© सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares