मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ दुसरी बाजू… श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆ परिचय – सौ. वंदना अशोक हुळबत्ते ☆

सौ. वंदना अशोक हुळबत्ते

? पुस्तकावर बोलू काही?

दुसरी बाजू… श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆ परिचय – सौ. वंदना अशोक हुळबत्ते

पुस्तक – “दुसरी बाजू”

लेखिका – मीनाक्षी सरदेसाई

प्रकाशक – श्री नवदुर्गा प्रकाशन. कोल्हापूर

पृष्ठ संख्या – २१६

किंमत – ३९०

समाज मनाचा आरसा म्हणजे कथासंग्रह” दुसरी  बाजू”

ज्येष्ठ साहित्यिका मीनाक्षी सरदेसाई् यांनी ललितलेखन, बालसाहित्य, कादंबरी, कविता संग्रह, कथासंग्रह,अनुवाद लेखन असे लेखनाचे विविध प्रकार हाताळले आहेत. चाळीस पुस्तके प्रकाशित आहेत.त्यांतील काही पुस्तकांना मानाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

त्यांचा “दुसरी बाजू”हा कथासंग्रह फेब्रुवारी २०२३ मध्ये प्रसिद्ध झाला.हा कथासंग्रह नुकताच वाचण्यात आला.या कथासंग्रहात एकूण अठरा कथा आहेत.या सर्व कथा यापूर्वी विविध दिवाळी अंकातून प्रसिद्ध झालेल्या आहेत.प्रत्येक कथा वाचनीय आहे.समाजातील लग्नव्यवस्थे विषयी  झालेले बदल,त्या बद्दलचा तरूणांचा बदलता दृष्टिकोन, वयोवृद्ध व्यक्तीच्या समस्या.वयोवृध्दांची अगतिकता, हतबलता.लेखिकेने आपल्या कथेतून मांडली आहे.लेखिकेची भाषा शैली सोपी आहे.विषयाची थेट मांडणी करतात.कथेच्या मांडणीत,विषयात कुठे ही अतिशयोक्ती आढळत नाही.सगळ्या कथा समाजातील वास्तव स्थितीवर प्रकाशझोत टाकतात.कथेतील घटना आपल्या अवतीभवती घडणाऱ्या आहेत.कथेची भाषाशैली संवादात्मक आहे.प्रत्येक कथा सहज उलगडत जाते.कुठे ही ओढूनताणून कथा पूर्ण केली आहे असं वाचणाऱ्याला अजिबात वाटत नाही.कथेतील नायक,नायिका सामान्य घरातील आहेत.त्यांचे प्रश्न रोजच्या जीवनातील आहेत.

“दुसरी बाजू” हा कथासंग्रह वाचताना वाचक आपले अनुभव कथेला जोडू पाहतो.वाचकाला ही कथा आपलीच आहे असे वाटते.वाचकाच्या मनात कथेचे एक  स्थान निर्माण करण्याचे सामर्थ्य लेखिकेच्या लेखनीत आहे.काही कथा विनोदी शैलीत आहेत तर काही कथा वाचकाला अंतर्मुख करतात .तर काही कथा नवा संदेश देतात.तरी कोणत्याही कथेतून लेखिका तत्वज्ञान सांगत नाही.काही कथा हलक्याफुलक्या आहेत.बऱ्याच कथेचे विषय सामान्य माणसाच्या जीवनातील असल्याने वाचकाला कथा आपल्या जीवनात घडत आहे असे वाटते. कथा वाचताना वाचक कथेशी एकरूप होतो.

‘दुसरी बाजू’ या कथासंग्रहात एकूण अठरा कथा आहेत.’दुसरी बाजू’ हीच कथासंग्रहातील पहिली कथा आहे.समाजात लग्न व्यवस्थेत वेगाने बदल होत आहेत.जुन्या चालीरीती बदलत आहेत.तरूणांची जीवनशैली फास्ट झाली आहे.थांबत बसायला वेळ नाही.पूर्वी सारखे पोहे खाऊन मुलगी बघायचा प्रोग्राम आज होत नाही.मुलेमुली आपल्या सवडीने हाॅटेल मध्ये भेटतात.मोकळेपणाने भेटतात.विचार जुळले तर लग्न ठरवतात.हे चांगले आहे.पण मुलींच्या अपेक्षा बदलेल्या आहेत.सगळं कसं रेडिमेड हवं असतं त्यांना.एक वेळ मुलीची बाजू लंगडी असली तरी चालेल.पण मुलांची बाजू शंभर टक्के परफेक्ट हवी.तसे नसेल तर काही कारण देऊन मुली मुलांना रिजेक्ट करू शकतात.या कथेत घरात जास्त माणसे आहेत, मला स्पेस कशी मिळणार? म्हणून,घराला लिफ्ट नाही म्हणून मुली मुलांना नकार देतात.घरातील म्हातारी माणसं मुलींना डस्टबीन वाटतात.आजच्या तरूणीचा लग्नाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलेला आहे.आपले लग्न स्वतः ठरवण्यास त्या समर्थ झालेल्या आहेत.पण मुला मुलींच्या लग्न विषयीच्या अपेक्षा ही बदलेल्या आहेत.भौतिक सुखाचा अधिक विचार केला जात आहे. लग्न ठरवताना येणाऱ्या अडचणीचे  अनेक पैलू लेखिकेने या कथेत मांडले आहेत.तसे प्रसंग लेखिकेने या कथेत मांडली आहेत.एकीकडे शुल्क कारणांमुळे नाती सांभाळणे दिवसेंदिवस कठीण झाले आहे तर दुसरी कडे मुलांना मुलींशी कसे वागावे हे समजेनासे झाले आहे.मुलांच्या मनाचा विचार करणे महत्त्वाचे आहे.या कथेत मुले मुलींना कसा धडा शिकवतात हे वाचनं रंजक आहे.ही कथा वाचकाला लग्न व्यवस्थेवर विचार करायला भाग पाडते.

आज काल प्रत्येक व्यक्तीला कामानिमित्त घराबाहेर पडावे लागते.चारपैसे कमवून घरी आणने ही काळाची गरज झाली आहे.घर आणि नोकरी सांभाळताना महिलेची मोठी कसरत होत आहे. अशा वेळी घरात वडिलधारी माणसं असतील तर थोडे सोपे होते.वडीलधारी मंडळी म्हणजे खरं तर संस्काराचे विद्यापीठ. मुलांना,नातवंडांना संस्कारक्षम बनवण्यासाठी वडीलधारी मंडळी जीवाच रान करतात. त्यांच्या सानिध्यात मुले आली की ती संस्कार बनतात. संवेदनशील होतात.पण आजकाल हे दिसते कुठे ? वडिलधारी माणसं घरात नकोच आहेत. संकुचित वृत्ती मूळे, स्वार्थ बोकाळल्याने , आपमतलबीपणा वाढल्यामुळे, घरातील वृध्द माणसे ओझे वाटू लागली आहेत.त्याचा तिरस्कार केला जात आहे.हाच विषय अधोरेखित करणारी  आज्जू ही कथा आहे. आजोबा आणि नातू यांच्या नात्यावर प्रकाश टाकणारी एक सुंदर कथा.सुनेला म्हाताऱ्या सासऱ्याची अडचण वाटते. नातवाचे मात्र आजोबांन वर नितांत प्रेम असते.आईचे आजोबांशी असणारे तुटक वागणे त्याला कळते.पण तो आईला काही बोलू शकत  नाही.आपल्या परीने आजोबांची काळजी घेत असतो.त्यांना जपतो. त्याच्या सानिध्यात राहतो.

ही कथा वाचताना वाचकाला आपले आजोबा नक्की आठवतील.

होम मिनिस्टर कार्यक्रमाने अवघ्या महाराष्ट्रातील महिलांना वेड लावले.आपली कामे भराभर  आवरून महिला हा कार्यक्रम न चूकता बघतात. एखाद्या एपिसोड चुकला तर रिपिट डेलीकास्ट बघतात.’ पैठणी ‘ ही कथा लेखिकेने याच विषयावर बेतली आहे.महागडी पैठणी भेट म्हणून मिळणार,आपण टिव्ही दिसणार, पैठणी मिळाली की नवरा आपल्या उचलणार आणि आदेश भावजी आपल्या भेटणार या साऱ्या गोष्टींची महिलांच्यात क्रेझ आहे.आदेश भावजीना फोन लागला  म्हटल्यावर महिला कशा पद्धतीने या खेळाची तयारी करतात,आपल्या नवऱ्यांना कसे मर्जीत आणतात, त्यांना खेळ कसे शिकवतात हे सारं लेखिकेने विनोदी शैलीत रंगतदार मांडले आहे.ही हलकीफुलकी आहे. ही कथा मन ताजे करून जाते.

जगात मातृत्व हा सर्वात मोठा सन्मान आहे.आई शिवाय आईच्या मायेने सांभाळ करणारा जगात विरळाच असतो.त्यातल्या त्यात बाईला लेकराची माया येवू शकते.पण पुरूषाला आईची माया करायला येण  अवघडच.संतांन मध्ये हा गुण दिसला की आपण त्यांना माऊली ही उपाधी जोडतो.आई थोरवी सांगणारी ” आई म्हणोनी कोणी” ही कथा आहे.ही कथा आहे सानियाची.आपल्या मुलांचे पालनपोषण कोण ही करेल. पण आपल्या सवतीच्या मुलांचा,सवतीच्या  पहिल्या नवऱ्यापासून झालेल्या मुलांचा सांभाळ सानियाची आई करत असते.घडल्या प्रसंगात बिचाऱ्या मुलांचा काय दोष ? म्हणून ती आई पण स्विकारते.पण या दुसऱ्याच्या चार मुलांच्या लादलेल्या मातृत्वामुळे आईची झालेली कुंचबना सानियाने लहानपणापासून बघितलेली असते.या अशा  विचित्र भेळमिसळ असलेल्या मुलांना एकत्र वाढत असताना समाजातून,शाळेतून झालेली कुचेष्टा सानियाने सोसलेली असते.आपल्या आईने सोसलेली यातना बघितलेली असते.अशी वेळ कुणाच्या ही वाट्याला येवू नये असे तिला वाटे.आपल्या आईला  स्वतःचे व्यक्तीमत्व, अस्तित्वच कधीच मिळाले नाही तिचे असे हे आईपण काय कामाचे? हा विचार लहानपणापासून सानियाच्या मनात घट्ट रूतून बसलेला असतो.म्हणूनच ती मनिषला मुलांची आवड असताना सुद्धा स्वतःआई होण्यासाठी नकार देते.मुलांचा सांभाळ करण्याचा ठेका काही  बायकांनी घेतला नाही.पुरुष ही वेळप्रसंगी आपले ममत्व सिध्द करू शकतो.हेच ” आई म्हणून कोणी”  या कथेत दिसते. मनिषचे ममत्व या कथेत दिसते.ही कथा उत्कंठता वाढवणारी आहे.लेखिकेने पात्राच्या संवादातून कथा पुढे नेहली आहे.

“आली लग्नघटी” ही कथा म्हणजे लग्नाच्या आदल्या दिवशी नवरदेव सोहम याच्या मनात येणाऱ्या विचाऱ्यांचे काहूर आहे.लग्न झाले की आपले व्यक्ती स्वातंत्र्य संपले.लग्नाच्या आदल्या दिवशी आपण आपले स्वातंत्र्य उपभोगावे असे सोहमला वाटत असते.उशिरा उठावे, मनाप्रमाणे वागावे अशी साधी अपेक्षा असते.पण घरातील बायका काही त्याची ही अपेक्षा पूर्ण करू देत नाहीत.तस ही

आपल्याला वाटते की लग्न म्हटलं की फक्त मुलीना खुप धडधडते,मनावर दडपण येते,आपण आपले घर सोडून परक्या ठिकाणी जाणार म्हणून मुली अस्वस्थ होतात.पण या कथेत मुलाच्या मनाची अस्वस्थता छान रंगवली आहे.हे ही होवू शकते.हे लेखिकेने दाखवून दिले आहे.

जेव्हा नवरा बायको दोघे करियर करत असतात तेव्हा एक पुढे एक मागे असेल तर स्विकारले जाते.समजून घेतले जाते.पण जेव्हा एकाच वेळी दोघाचे भाग्य उजळण्याची संधी येते तेव्हा माघार कुणी घ्यायची हा खरा प्रश्न असतो.दोघे समंजस असले तरी बऱ्याच वेळा  इगो आडवा येतो.”काही हरकत नाही” ही कथा म्हणजे अशाच समंजस पति पत्नीच्या नात्याची सुंदर गुंफण आहे.घर दोघांचे असते दोघांनी त्यासाठी समजूतदार दाखवावा लागतो. वेळप्रसंगी इगो आडवा न आणता आपल्या स्वप्नांना बाजूला करता आलं पाहिजे तर संसार टिकतो.कोण पुढे ,कोण मागे असे न मानता  दोघांचा समजूतदार पणा महत्वाचा असतो हेच सांगणारी ही कथा.ही कथा लेखिकेने खुप सुंदर हाताळली आहे

सूर जुळताना,बहिणा,सेम टू सेम ,आज काय स्पेशल?गुन्हा,खारीचा वाटा अशा एका पेक्षा एक सरस कथा या कथा संग्रहात आहेत.प्रत्येक कथेचा आपला एक नूर आहे.या कथा ही समाजातील विविध विषयावर भाष्य करणाऱ्या आहेत त्या वाचताना नक्की आनंद होईल.हा कथासंग्रह एकदा तरी वाचला पाहिजे असा आहे.” दुसरी बाजू” हा कथासंग्रह वाचल्यावर माझ्या मनात जे विचार आले ते मी इथं मांडले आहेत.मिनाक्षीताईना पुढील लिखाणासाठी अनेक शुभेच्छा.

© सौ.वंदना अशोक हुळबत्ते

संपर्क – इंदिरा अपार्टमेंट बी-१३, हिराबाग काॅनर्र, रिसाला रोड, खणभाग, जि.सांगली, पिन-४१६  ४१६

मो.९६५७४९०८९२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – पुस्तकावर बोलू काही ☆ “रमाई…” — लेखक : बंधु माधव (माधव दादाजी मोडक) ☆ श्री कचरू सूर्यभान चांभारे ☆

श्री कचरू सूर्यभान चांभारे

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “रमाई…” — लेखक : बंधु माधव (माधव दादाजी मोडक) ☆ श्री कचरू सूर्यभान चांभारे ☆

पुस्तक  : रमाई 

लेखक :  बंधु माधव (माधव दादाजी मोडक)

प्रकाशन :  विनिमय पब्लिकेशन मुंबई  

पाने : २९५ . 

२७ मे, रमाईमातेचा स्मृतिदिन.रमाईंच्या स्मृतिदिनी त्यांच्या कर्तृत्वाचा जागर मांडताना त्यांच्याविषयीच्या एखाद्या ग्रंथाचा परिचय मांडावा ,असा मानस होता.माझ्या जवळ उपलब्ध असलेल्या रमाई नावाच्याच चार पुस्तकांपैकी बंधु माधव यांचे रमाई पुस्तक परिचयासाठी निवडले.पुस्तकाचे लेखक आज हयात नाहीत पण हे भूलोक सोडण्यापूर्वी त्यांनी रमाईबाबत विपुल लेखन केलेले आहे ,शिवाय याच कादंबरीचे आकाशवाणीवरून नभोना#e-abhivyaktiट्य सादर केलेले आहे.सदर पुस्तकाची भाषा रसाळ आहे.डॉ.बाबासाहेबांसाठी चंदनासारख्या झिजलेल्या रमाईची कथा वाचताना डोळ्याच्या कडा ओलावतात.रमाई हे पुस्तक सुरस ,सुगंधी ,सुंदर आहे की नाही ते वाचकाने ठरवायचे आहे पण लेखक व माझ्या मते रमाई म्हणजे सोशिकता,सात्विकतेचा महामेरू आहे.फूल फुलावं म्हणून झाड रात्रंदिवस धडपडत असतं.लोकांना ते फुललेलं फूल तेवढं दिसतं .वर्षानुवर्षे झाडानं त्यासाठी केलेली धडपड मात्र लोकांना दिसत नाही.विश्ववंद्य डॉ.बाबासाहेब हे कोट्यावधी दलितांच्या हृदयातलं फूल असतील ,तर ते फूल फुलण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतलेलं झाड म्हणजे रमाई होय.

रमाई कादंबरीची सुरूवात रमाईच्या जन्म प्रसंगापासूनच सुरू होते.तिच्या रडण्याचा ट्याँ ट्याँ हा कादंबरीचा पहिला शब्द व रमाईने सोडलेला शेवटचा श्वास म्हणजे कादंबरीचा शेवटचा शब्द.तिच्या रडण्याचा  पहिल्या पानावरचा पहिला शब्द ते 295 पानांवर जगणं थांबल्याचा तिचा शेवटचा शब्द …. असा रमाई कादंबरीचा प्रवास.प्रत्येक पानावर रमाई भेटते ,अगदी पुस्तकाच्या शेवटच्या पानापर्यंत ;पुस्तक संपल्यावर ती पुस्तकातून बाहेर येते व वाचकाशी बोलत राहते.रमाई वाचून संपत नाही ,तर ती वाचून सुरू होते.

दापोली जवळचं वणंद,एक छोटं गाव हे रमाईचं जन्मगाव.गावकुसाबाहेरील पाचपंचवीस महारांच्या झोपडीपैकी एक झोपडी भिकू – रुक्मिणी या सालस कष्टाळू जोडप्याची.अंग मेहनतीचं काम करायचं अन् पोटाला पोटभर खायचं हा त्यांचा नित्यक्रम.शेजारी असलेला समुद्र यांना कधी उपाशी मरू देणार नव्हता.भजनी मंडळात दंग असलेला भिकू धोत्रे मासेमारी व्यवसायाकडे माशाचे टोपले उचलण्याचे काम करत असे.पोटाला काहीतरी देणारा ,संसाराला हातभार लावणारा रुक्मिणीचा बिन भांडवली उद्योग होता. तो उद्योग म्हणजे रस्त्यावरचं शेण गोळा करून शेणी (गवरी) लावणं व त्या शेण्या विकणं.सारं काही खूप मजेत नसलं तरी चंद्रमौळी झोपडीत पसाभर सुख नांदावं ,असा त्यांचा संसार होता.रमाईच्या जन्माआगोदर रूक्मिनीची कुस प्रसव झालेली होती.आक्काच्या रूपानं एक कन्या चंद्रमौळी झोपडीच्या अंगणात खेळत होतीच.आता रूक्मिन दुस-यांदा बाळंत होणार होती.परंपरेचा पगडा म्हणून मुलगाच व्हावा ,हा मानस कळा देताना रूक्मिनीचा व अंगणात बसलेल्या भिकूचाही ,पण पदरात पडली रमाई.मुलगी झाली म्हणून भिकू-रूक्मिनीची थोडी नाराजीच व्हायला हवी होती पण पदरात पडलेली मुलगी नक्षत्रावाणी गोड होती.गावातल्या अनुभवी नाणु सुईनीचं म्हणणं होतं की असलं राजबिंड गोड रूप म्या कंदी कंदी पायिलं नाही.महार गल्लीत आनंदीआनंद झाला.गावभटानं पचांग पाहून मुलीचं भविष्य सांगितलं  पोरगी मायबापाचं नाव काढणार.राजाची राणी होणार. रमा वाढत होती ,अन् भिकू-रूक्मिनीला गावभटाची सुखावह भविष्यवाणी आठवत होती.चंद्राची कोरीप्रमाणे ही चंद्रकोर वाढत होती.रमानंतर भिकू-रूक्मिनीला गौरी व शंकर ही दोन अपत्य झाली.कायमचं शारीरिक कष्ट  व एकापाठोपाठची एक अशी चार बाळंतपणं   ………….  रखमा खंगत चालली होती.तिच्या अशक्त देहाला आता मरण दिसू लागलं होतं.नव-याची व लेकरांची काळजी तिच्या डोळ्यात दिसत होती पण प्राणानं तिचा देह सोडण्याचा निर्णय घेतला होता.मरताना तिला एकाच गोष्टीचं समाधान होतं ते म्हणजे लेक रमा … पाच सात वर्षाचंच पोर खूप समजंस होतं … ते पोर तान्हया लेकरांची व बाप भिकूचीही आई व्हायला समर्थ होतं.बस्स एवढाच विश्वास शेवटच्या नजरेत ठेऊन ,एके रात्री तिन्ही लेकरांची जेवणं झाली की रख्माईनं प्राण सोडला.सात वर्षाची पोर रमा आईला पोरकी झाली.नियतीनं पायाखालची धरती अलगद काढून घेतली होती.काही दिवस जातात, न जातात तोच खंगलेला भिकूही धरणीमाईवर आडवा होतो ,तो कायमचाच.रमाईची धरणीमाय आधीच गेली होती अन् आता आभाळही हललं होतं.आभाळाखाली उघडी पडलेली ही तीन्ही लेकरं मामानं मुंबईला आणली.रमाईचे सख्खे मामा-मामी व चुलत मामा-मामीसहित चाळीतले सगळेच शेजारी पाजारी भिकू-रुक्मिणीच्या अनाथ अंशाला काही कमी पडू देत नव्हते.

सुभेदार रामजी आंबेडकर म्हणजे महारांसाठी भूषण नाव. भजन ,कीर्तन ,देवपुजेतलं एक सात्विक संस्कारी  नाव .विद्येची आराधना ,कबीराची प्रार्थना करणारा कडक शिस्तीचा भोक्ता पण कमालीचा कुटुंब वत्सल माणुस म्हणजे सुभेदार.सुभेदाराचा भिवा/ भीमा मॕट्रिकीत शिकत होता.तो काळ बालविवाहाचा असल्यामुळे शिक्षण चालू असलं तरी लग्न टाळण्याचा नव्हता.भीमासाठी रमा सुभेदारांच्या मनात निश्चित झाली.महारातला उच्च शिक्षित – बुद्धीमानतेचं शिखर भीमा व अडाणी निरक्षर रमा  यांचा विवाह फक्त शिक्षणात अजोड होता पण संस्कार ,कष्ट ,नम्रता याबाबत रमाच्या तोडीचं कोणी नव्हतं.हे सुभेदार जाणून होते.भीमाचा विश्ववंद्य बाबासाहेब  झाला ,याला कारण माता रमाई आहे.

मातापित्याचे छत्र हरवलेल्या दुर्दैवी रमाईच्या नशिबी नातलगांचे मृत्यू पाहणं जणू विधिलिखितच होतं. सासरे रामजीबाबांच्या रूपाने तिला पून्हा पितृछत्र मिळालं होत. पण हे सुख फार काळ टिकलं नाही. वृद्धापकाळानं सुभेदारांची सुभेदारी खारिज केली. एका जावेचा मृत्यू ,सासुबाईंचा मृत्यू ,आनंदरावांचा मृत्यू  हे दुःख रमाईसाठी आभाळ ओझ्याचं होतं पण नियतीला ते कमी वाटलं असावं, म्हणून लेक गंगाधर ,रमेश व मुलगी इंदू या पोटच्या लेकरांचा मृत्यू  रमाईच्या मांडीवरच नियतीने घडवून आणला. लाडक्या राजरत्नचा घासही नियतीने एके दिवशी गिळलाच. पदराच्या कपडात गुंडाळून ,लेकराच्या कलेवरावर माती ढकलताना आईच्या हृदयाच्या किती चिंधड्या चिंधड्या होत असतील ? नाही का ? 

बाबासाहेबांनी स्वतःला अस्पृश्य उद्धाराच्या कार्यात झोकून दिलेलं होतं. सुरूवातीच्या काळात बाबासाहेबांची आर्थिक अवस्था दैन्याची होती. त्यातच त्यांचे उच्च शिक्षण चालू होते. खूप खूप मोठ्या माणसाची बायको आहे ;हे समाधान रमाईसाठी आभाळभर ओझ्याचं कष्ट पेलण्याची ताकद देणारं होतं. बाबासाहेबांच्या संसारासाठी भावी बॕरिस्टरच्या बायकोने खूप कष्ट सोसले. दादर – वरळीपर्यंत पायी हिंडून गोव-या गोळा केल्या. त्या विकून अर्धपोटी संसार चालविला पण परदेशात शिकत असलेल्या नव-याचं लक्ष विचलित होऊ नये म्हणून त्या पत्रात सतत इकडची खुशालीच कळवत राहिल्या. वराळे मामांच्या वसतिगृहात धारवाड मुक्कामी असताना ,अनुदानाच्या विलंबामुळे मुलांची उपासमार  होत असल्याचे लक्षात येताच ,क्षणाचाही विलंब न लावता ,स्वतःजवळचं तुटपुंज सोनं गहाण ठेऊन ,आलेल्या पैशातून त्या मुलांना जेऊ घालतात. आईपण हे काही फक्त लेकरास जन्म देऊन साधता येतं असं नाही तर ते घास भरवूनही साधता येतं. म्हणूनच बाबासाहेब हे दलितांसाठी पिढी उद्धारक पितृतुल्य बाबा होते तर रमाई या आईसाहेब होत्या. बाबांचा व रमाईंचा पत्रव्यवहार वाचताना ,वाचकाचा जीव तीळतीळ तुटतो. पेपरातला बाबांचा फोटो पाहून रमाईचं काळीज मोठं व्हायचं पण त्याच पेपरात बाबाच्या जीवाला धोका असल्याची बातमी वाचून रमाईचं काळीज तुटायचं.  गोलमेज परिषदेला अस्पृश्यांचे पुढारी म्हणून डॉ.बाबासाहेब लंडनला जायला निघतात ,तेव्हा निरोपासाठी जमलेला जनसागर पाहून रमा मनाशी म्हणते ….. गावभटानं सांगितलेली भविष्यवाणी खरी ठरलीय. एवढ्या मोठ्या प्रजेच्या राजाची मी राणी हाय बरं.होय… मी राजाची राणी हाय.

पुरूषांना गगनभरारी कीर्ती मिळविण्याचं वेड असतं हे खरे आहे, पण गगनभरारीच्या पंखातलं बळ त्याची स्त्री असते.हे इतिहासानं वारंवार सिद्ध केलेलं आहे. बाबांसाठी रमा म्हणजे पंखातलं बळ होतं ,घरटं जतन करणारं प्रेमकाव्य होतं. रमाईच्या खडतर ,सोशिक आयुष्याचा प्रवास वाचनीय आहे. रमाईच्या लहानपणी आई रुक्मिणीनं रमाईला बिनामरणाचा नवरा नावाची गोष्ट सांगितलेली असते. या गोष्टीतल्या पार्वतीला मरण नसलेला नवरा असतो. त्यासाठी ती खडतर तपश्चर्या करते व महादेवाला मिळविते. बाळबोध रमा ,तेव्हा आईला म्हणते  “आई,मलाही मिळेल का गं बिनमरणाचा नवरा ?” तेव्हा रख्मा रमाईला पोटाशी कवटाळते व म्हणते नव-यासाठी कष्ट उपसशील तर माझ्या राणीला मिळेल ना बिनमरणाचा नवरा.  रमाईच्या आईची वाणी खरी ठरली. डॉ.बाबासाहेब या नावाला कधीही मरण येणार नाही. भयावह कष्ट सोसून ,शील – करूणेचा साज अलंकारून रमाई मातेने बाबांचा संसार  राखला ,फुलविला. आयुष्यभर झालेल्या अविश्रांत दगदगीने वयाच्या अवघ्या सदतिसाव्या वर्षी रमाईला नियतीने स्वतःच्या कुशीत चिरनिद्रा दिली. पण बिनमरणाच्या नव-याची बायको होऊन ,शुद्र म्हणून हिणवलेल्या जातीत जन्माला येऊनही राजा बाबासाहेबांची ती राणी झाली होती. करोडो दलितांची आई म्हणून रमाईच जिंकलेली होती. लोकदिलातला राजा राजर्षी शाहू महाराज ,बडोदा नरेश सयाजीराव महाराज ,विदेशातल्या विद्वान बुद्धिवंतांनी गौरविलेल्या बुद्धीच्या शिखराची ,रमाई मजबुत पायाभरणी होती. शेवटच्या क्षणी डोळे झाकताना ती कृतकृत्य  होती कारण आता तिचे भीमराव — बाबासाहेब झालेले होते.

स्त्री जीवनाची अनोखी ही कहाणी —  रमाई 

परिचयकर्ता – श्री कचरू सूर्यभान चांभारे

संपर्क – मुख्याध्यापक, जि. प. प्रा. शाळा, मन्यारवाडी, ता. जि. बीड

मो – 9421384434 ईमेल –  [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – पुस्तकावर बोलू काही ☆ “वयात येताना” – लेखिका – सौ. अर्चना मुळे ☆ परिचय – सौ. अलका ओमप्रकाश माळी ☆

सौ. अलका ओमप्रकाश माळी

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “वयात येताना” – लेखिका – सौ. अर्चना मुळे ☆ परिचय – सौ. अलका ओमप्रकाश माळी ☆ 

पुस्तकाचे नाव.. वयात येताना

लेखिका.. सौ. अर्चना मुळे

पहिल्या उकळीचा कडक चहा, मोगऱ्या ची कळी नुकतीच उमलताना त्याचा येणारा सुगंध.. तप्त धरेवर पडणाऱ्या पहिल्या पावसाच्या सरी नंतर येणारा मृद्गंध.. ह्या सगळ्या पहिल्या गोष्टींची मजा, चव काही निराळीच असते.. तसचं ह्या वयात येताना ह्या पुस्तकाबद्दल मला वाटतं.. कालच ह्या पुस्तकाविषयी माहिती होणं, त्यानंतर माझं पुस्तकं ऑर्डर करणं आणि त्याची वाट बघत असतानाच दस्तुरखुद्द लेखिकेकडून ते ताज ताज नवं कोर पुस्तकं आपल्याला मिळणं हे म्हणजे भाग्यच म्हणावं लागेल..आणि मग अशावेळी ते पुस्तक एका बैठकीत नाही वाचून काढलं तर आपल्यासारखे करंटे आपणच म्हणावं लागेल..असो.. वयात येताना हे पुस्तक म्हणजे प्रत्येक आई ने आईनेच कशाला बाबाने ही वाचलंच पाहिजे असं पुस्तकं आहे..

छोटंसं अगदी फक्त 80 पानांचं हे पुस्तकं म्हणजे.. आदर्श पालक होण्याची गुरुकिल्ली आहे.. मासिक पाळी हा तसा दबक्या आवाजात बोलला जाणारा विषय पण लेखिकेने एका मध्यम वर्गीय कुटुंबात घडलेला प्रसंग इथे मांडून अनेक कठीण प्रश्नांची उत्तर सोप्पी करून सांगितली आहेत.. अवनी शाळेत जाणारी एक मुलगी आई, बाबा आणि आजी यांच्या सोबत राहणारी.. अचानक आई बाबा ऑफिस मध्ये असताना तिची पाळी येते आणि आजी तिला ज्या प्रकारे समजावून सांगून आईला बोलवून घेते.. आई आजी मिळून तिला पडलेल्या प्रश्नांना योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करतात पण देवपूजा धार्मिक विधी इथे मात्र थोडीफार अंधश्रद्धा येतेच.. पण मग तिच्या शाळेच्या टीचर आणि शुभाताई मिळून एक कार्यशाळा घेतात आणि मुलींच्या मनातील भिती, लाज, अंधश्रद्धा ह्या सगळ्या प्रश्नांना अगदी खेळाच्या रूपातून उत्तर देतात आणि अवनी ला तिच्या प्रश्नांची उत्तर मिळतात..ह्याचं बरोबर आहार, व्यायाम या गोष्टींबद्दल असलेले समज गैर समज अतिशय सोप्पे करून मांडलेले आहेत.. पुढे येणारा विषय म्हणजे मैत्री, प्रेम आणि आकर्षण ह्यातील फरक.. ह्या टॉपिक मधे दोन तीन प्रसंगातून हा कठीण वाटणारा प्रश्न अगदी साधी साधी उदाहरण देऊन समजावून सांगितला आहे.. कॉलेज वयीन मुलींमध्ये तारुण्यसुलभ असणारे भाव आणि त्यांना मुलांबद्दल वाटणारे आकर्षण हे सगळं खरतर नैसर्गिक आहे त्यात गैर काहीच नाही पण ह्या आकर्षणालाच प्रेम समजण्याची केलेली घाई मुलींना कशी अडचणीत आणू शकते हे दोन  मैत्रिणी सरिता आणि गायत्री ह्यांच्या संवादातून अतिशय छान शब्दात इथे मांडलेली आहे..  दुसऱ्या एका भागात सुरेखा आणि एक मुलगा फक्त बोलताना दिसतात त्यातून घरी होणारे गैर समज.. समाजाने दिलेली वागणूक ह्यातून सुरेखा आणि आई मध्ये आलेला दुरावा.. मग त्यांना समजावून देणाऱ्या डॉक्टर मॅडम क्षणभर आपल्या ताई सारख्याच भासतात.. प्रेम आणि आकर्षण हा  विषय हाताळताना लेखिकेने मांडलेले विचार प्रत्येकाने वाचलेच पाहिजेत असे आहेत..

खर तर मुलगी मोठी होते वयात येते ह्याच्या चर्चा होतातच पण मुलगा वयात येताना त्याच्या शरीरात होणारे बदल ह्यांचा फारसा कोणी विचार करताना दिसत नाही.. खर तर अशा वयात मुलांना ही समजावून सांगण्याची समुपदेशनाची गरज असते अन्यथा कुठून तरी काहीतरी पाहून ऐकून ह्या वयातील मुलांवर फार गंभीर परिणाम होतात.. मुलं एकाकी एकटी बनातात स्वभाव विचित्र बनत जातो.. मुलींना फार आधी पासूनच आई आजी ह्यांच्याकडून थोडीफार कल्पना असते आईला, ताईला बोलताना ऐकलेल असत पण मुलांच्या बाबतीत सगळचं नवीन कुठल्याच घरात मुलगा वयात येताना त्याच्याशी चर्चा गरजेची आहे ह्याचा विचार केलेला मी तरी पाहिला नाहीय.. पण ह्या पुस्तकात ह्याचा विचार करून मुलगा वयात येताना ह्या शेवटच्या  टॉपिक मधे तो  अतिशय वेगळ्या प्रसंगातून  पण समर्पक शब्दात मुलांच्या वडिलांसोबत  दोघांना एकत्र समजावून सांगताना खूप छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करून लेखिकेने आपले मुद्दे समजावून दिलेले आहेत.. मी प्रत्येक टॉपिक मधले अगदी सगळे डिटेल्स इथे देत नाही कारण अगदी 10 वर्षा पुढील सगळ्यांनी हे पुस्तक किमान एकदा तरी वाचावच असं मला वाटतं.. आणि ज्यांच्या घरात चौथी पाचवी मध्ये शिकणारी मुलगा मुलगी आहेत त्यांनी तर हे पुस्तकं संग्रही ठेवावे असे पुस्तकं आहे.. सो चला तर मग वयात येताना काय काय घडलं, घडू शकतं हे आपल्या मुलाबाळांना लेखिकेच्या शब्दात समजावून सांगू जेणे करून आपल्यातील आई ला आपल्या मुलांशी बोलणं संवाद साधणं सोप्प होईल..

© सौ. अलका ओमप्रकाश माळी

मोब. 8149121976

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – पुस्तकावर बोलू काही ☆ “गुंफीयेला शेला” – लेखिका – संपदा जोगळेकर, सोनाली लोहार, हर्षदा बोरकर, निर्मोही फडके ☆ परिचय – सौ विजया कैलास हिरेमठ ☆

सौ विजया कैलास हिरेमठ

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “गुंफीयेला शेला” – लेखिका – संपदा जोगळेकर, सोनाली लोहार, हर्षदा बोरकर, निर्मोही फडके ☆ परिचय – सौ विजया कैलास हिरेमठ ☆ 

पुस्तक – गुंफीयेला शेला  

लेखिका – संपदा जोगळेकर,सोनाली लोहार,हर्षदा बोरकर,निर्मोही फडके….

अभिप्राय- विजया हिरेमठ, संवादिनी,सांगली

 प्रत्येक व्यक्ती वेगळी असते हे जरी सत्य असले तरी काही व्यक्तींमध्ये काही समान धागे असू  शकतात.. या समान धाग्यांमुळेच त्या व्यक्ती एकत्र येऊन समूहाने एखादे चांगले काम करू शकतात असा विश्वास देणारे हे पुस्तक…

पाहून एकच चित्र

विणला प्रत्येकीने कथेचा धागा

त्या एक एक धाग्यांला घेवून

विणला त्यांनी एक सुंदर शेला.. 

चार मैत्रिणी शरीर, मन, विचार, व्यवसायाने वेगवेगळ्या.. वाचन- लेखन हाच एक समान धागा.. उत्तम भाषाभ्यास, निरीक्षण क्षमता व कल्पनाशक्ती यांच्या जोरावर

त्यांनी आपल्या भेटीसाठी गुंफियेला शेला…

तो हाती माझ्या येता उबदार मज भासला….

हे पुस्तक म्हणजे एक आगळा वेगळा प्रयोग आहे . यामध्ये चारही लेखिका आग्रही,जागरूक आणि संयमाने व्यक्त झाल्याची जाणीव प्रत्येक कथेतून होते. या चौघींनी ही एकाच चित्रकृतीचा आपापल्या दृष्टीकोनातून घेतलेला शब्दवेध आणि त्यातून निर्माण झालेल्या आगळ्या वेगळ्या कथांचा हा संग्रह…

प्रत्येकीची कथा अगदी एका पानाची, वीस वाक्यांची, पण खूप काही सांगून जाणारी, कुठेच अधुरेपण नसणारी.. चित्राचा आकार, रूप, रंग आणि प्रत्यक्ष मतितार्थापलीकडच्या जाणीवांना चार लेखकांनी कथा रुपात बांधले आणि 48 चित्रप्रेरीत कथांचा हा शेला गुंफला गेला. पुस्तकातील डॉ आनंद नाडकर्णी यांची प्रस्तावना, हा शेला गुंफण्यापूर्वीचा लेखिकांचा प्रवास उलगडतो तर अच्युत पालव यांची प्रस्तावना या शेल्यास एक नाजूक किनार म्हणून शोभते. चारही लेखिकांचे मनोगत वाचताना प्रत्येकीच्या कथा वाचण्याची उत्कंठा वाटते तसेच प्रत्येकीकडून एक प्रेरणा नक्की मिळते..

एकच चित्र पाहून प्रत्येकीला कितीतरी वेगवेगळ्या आशयाच्या कथा सुचल्या त्यांची शीर्षके वाचूनच हे लक्षात येत गेलं. खूपदा वाटलं ही या चित्राशी या शिर्षकाचा काही संबंध असू शकतो का?  चित्र पाहून आपल्या भावविश्वात एक कथा निर्माण होते  पण प्रत्येक कथा एका वेगळ्याच विश्वाचा प्रवास घडवते. एकाच चित्राकडे पाहून चार लेखिकामधील निर्माण होणाऱ्या वेगवेगळ्या भाव भावनांचे आणि संवेदनशील मनाचे आपल्याला घडणारे दर्शन खरोखर मन थक्क करते. उदाहरणादाखल सांगायचं तर या पुस्तकात एक चित्र आहे.. एका मुलीने रंगीबेरंगी फुगे हातात घट्ट धरले आहेत आणि त्यावर लेखिका हर्षदाने लिहलेली कथा “पॅलेट” एका सुंदर क्षणी एकत्रच असताना अपघाताने कायमची ताटातूट झालेल्या रसिका आणि पुनीतची कथा.

याच चित्रावरून  लेखिका सोनालीने लिहिलेली कथा-“फुगा” यात भेटते छोटीशी सुमी जी गेली पाच वर्षे आईची माय म्हणून जगत आहे आणि एकेदिवशी तिच्या आईने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्यानंतरचे तिचे आजण भावविश्व आपल्याला हळवं करतं…

लेखिका निर्मोही या चित्रावरून कथा लिहिते “स्टॅच्यू” गंमतीने खेळल्या जाणाऱ्या खेळाची एक हृदयस्पर्शी कथा..

लेखिका संपदा या चित्रावरून कथा लिहिते ” श्वेता” दत्तक बाळ वाढवताना त्याच्या वर्तमान आणि भविष्याचा विचार करायचा भूतकाळ मन गढूळ करत राहील आणि काळाबरोबर त्याचा चिखल होत राहिल. ती आपला अंकुर नसली तरी आपली सावली म्हणून वाढवावी असा सुंदर संदेश देणारी प्रबोधनात्मक कथा… 

शेवटी चारही लेखिकांनी आपल्याला आवडलेलं एक एक चित्र निवडून त्या चार चित्राला एकत्रित अशा समर्पक कथा लिहिल्या. या चार चित्रांना एकाच चौकटीत आणून सलगपणे समोर ठेवून चार चित्रांची मिळून एकच कथा प्रत्येकीने लिहून आणखी एक आगळंवेगळं पाऊल उचललं आणि आत्तापर्यंत विणलेल्या सुंदर शेल्याची शेवटी एकत्रित गाठ बांधून एक सुंदर गोंडा ओवला असंच म्हणावसं वाटतंय.

एखादं चित्र फक्त चित्रच नसतं त्यामागे चित्रकाराच्या भावना दडलेल्या असतात. चित्रकाराव्यतिरिक्त फार कमी जाणकार माणसांनाच त्या जाणवतात किंवा चित्रातून दिसतात.  नाहीतर चित्र म्हणजे नुसताच आकार आणि रंग- रेषांचा खेळ.. कोणी चित्र पाहून नेत्रसुख अनुभवतो. कोणी काही वेळाचं सुख – समाधान शोधतो. कोणी चित्रात असं गुंतून जातो की स्वतःच्या संवेदना मग कथेत शब्दबद्ध करतो. 

‘प्रत्येकीच्या दृष्टीकोनाची न्यारी ही किमया

शब्दांच्या धाग्यांनी,  ” त्यांनी गुंफियेला शेला”

पुस्तकरूपी  भेटीस तो आपुल्या आला’

प्रत्येकाने पुस्तक वाचू या आणि शेल्याचा उबदारपणा अनुभवू या. या शेल्याचा उबदारपणा अनुभवू या.

परिचय – सौ विजया कैलास हिरेमठ

पत्ता – संवादिनी ,सांगली

मोबा. – 95117 62351

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 




मराठी साहित्य – ☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ “साद अंतर्मनाची“ – लेखक अरुण पुराणिक ☆ परिचय – सौ. राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “साद अंतर्मनाची“ – लेखक अरुण पुराणिक ☆ परिचय – सौ. राधिका भांडारकर  

पुस्तकाचे नाव : साद अंतर्मनाची (काव्य संग्रह)

लेखक : श्री अरुण पुराणिक

प्रकाशन : आर्य  प्रकाशन आणि डिस्ट्रीब्युटर्स.

आवृत्ती : ०३ डिसेंबर २०२२

 पृष्ठे : ५२

 किंमत : रु. १००/—

श्री अरुण पुराणिक यांचा साद अंतर्मनाची हा कवितासंग्रह नुकताच वाचला आणि त्यावर मत, अभिप्राय वगैरे देण्याची माझी योग्यता नसली तरीही मित्रत्वाच्या नात्याने काही लिहावसं वाटलं म्हणून हा लेखनप्रपंच.

तसं पाहिलं तर श्री.अरुण पुराणिक यांचा आणि माझा परिचय तीन-चार वर्षांपूर्वींचा.  पण साहित्य, कला, काव्याच्या माध्यमातून एक मैत्रीचं नातं सहज जुळत गेलं.  त्या मैत्रीच्या धाग्याचा मान ठेवूनच ‘ साद अंतर्मनाची ‘ या कवितासंग्रहावर भाष्य करावसं वाटलं. 

या काव्यसंग्रहात एकूण ३२ कविता आहेत, आणि प्रत्येक कवितेच्या वाचनानंतर ओंजळीत अलगद जणू दवबिंदूच ओघळतात.  जीवनशिडीच्या ८० व्या पायरीवर उभे असलेल्या  या कवीने अत्यंत संवेदनशीलतेने आणि जाणतेपणाने जीवन जगले आहे.  सुखदुःखाची अनेक प्रकारची वादळं  झेलत असताना त्यांनी जे जे अनुभवातून टिपलं, अंतर्मनात डोकावून पाहिलं, तपासलं ते ते शब्दांतून साकारलं.  अगदी सहजपणे.  त्यामुळेच या सर्व कविता सामान्यपणे अथवा निराळेपणानेही जगणाऱ्या सर्वांच्याच मनाला भिडतात.  …. भिडतील. 

कवितांतले सहज स्फुरलेले शब्द जणू वाचकांच्या अंतर्मनाशीही नातं जुळवतात, त्यामुळेच साद अंतर्मनाची हे कवितासंग्रहाचे शीर्षकही अगदी चपखल वाटते.

आता त्यांच्या कवितांविषयी मला काय वाटले ते सांगते.  सर्वप्रथम श्री. पुराणिक ही अत्यंत धार्मिक भावनेने जगणारी, एक श्रद्धाळू आणि निर्मळ व्यक्ती आहे.  त्यांच्या या पुस्तकाची सुरुवात ते आद्य देवता गणेश पूजनाने  करतात आणि समारोप श्री स्वामी समर्थांविषयी समर्पित भाव व्यक्त करून करतात. अक्षरशः ३२  कवितांमधून त्यांनी विविध विषयांना स्पर्श केला आहे.  विविध काव्यप्रकार त्यांनी हाताळले आहेत.  सर्वच कवितांतून रचलेली स्वरयमके सहजपणे कवितेला लय प्राप्त करून देतात आणि वाचकाच्या मनाचा  ठेका धरतात. 

या नुसत्याच काव्यरचना नाहीत तर अनुभवांतून मांडलेले विचार आहेत, दिलेले संदेश आहेत, 

होळीनिमित्त केलेल्या ‘ रंग उत्सवाचे ‘ या कवितेत  ते जाता जाता म्हणतात .. 

 रंग नवे भरताना ।

 जीवनाला घडवावे।

 रंग संपता द्वेषाचा।

 आयुष्याला सजवावे ।।

रंगांची ही दुसरी कविता बघा… शीर्षक आहे ‘ रंगांचे रंग.’

 सर्व रंगांची जननी होते ।

 प्रकाशदायी नारायणाने।

 जीवनात रंग आणता।

 जगणे आहे अभिमानाने।।

मैत्रीविषयी लिहिताना ते म्हणतात 

भाव माझ्या मनातले ।

मुक्तपणे प्रसवले।

मैत्री त्याचेशी जडता।

सुख माझे गवसले।।……  वा! क्या बात है !!

‘जीवन धडे‘, *तरी अश्रु ओघळले.*. या मनात जपलेल्या व्यथांना वाट करून देणाऱ्या कविता केवळ अप्रतिम आहेत. ‘ पाऊलखुणा आता दिसणार कशा। ‘ , किंवा व्यथा वृद्धिंगत होता ना *अवघड झाले जगताना।*। हे शब्द जिव्हारी लागतात.  चटकन डोळे पाणावतात.

बळीराजाच्या दुःखाविषयी ते सहअनुभूतीने व्यक्त होतात. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या अश्रुंनीच आधी माती भिजते जणू.

 होते नष्टच सगळे 

ओले चिंबच ते शेत 

स्वप्न बळीराजाचे या

 होते उद्ध्वस्त राखेत।।

बालकवींच्या सुप्रसिद्ध ‘ फुलराणी ‘ या कवितेच्या पहिल्या चार ओळी घेऊन त्यांनी रचलेली कविता ही खरोखरच आल्हाददायक आहे.

त्या सुंदर मखमालीवरती

सूर्यकिरणेही अलगद पडती।

भास त्यांचा मोती जणू

नयनरम्यता अद्भुत घडली।।

‘ मृगजळ ‘ या कवितेत सुखाच्यापाठी पळपळ पळणार्‍या मनुजाला ते सावध करतात… 

दिसले जरी दूर ते पाणी

 जाशील शोध घेण्या त्याचा 

थकशील जाता जाता तरी

हव्यास राहतो फुकाचा।।

‘प्रवास साहित्याचा‘, ‘विद्याधन‘ या कवितांतून त्यांनी स्वतःजवळ असलेल्या कलेविषयीही कृतज्ञता बाळगली आहे.  विद्यारूपी धनाला शाश्वत ठरवताना 

 विद्याधन ही प्रतिष्ठा

 लाभो सदा समृद्धीला।।….  असे ते म्हणून जातात.

या कवितासंग्रहातील विशेष उल्लेखनीय कविता मला वाटली ती म्हणजे ‘आई ‘.  हा एक वेगळाच काव्यप्रकार त्यांनी हाताळलेला आहे. द्विपंचदशम या प्रकारातील ही काव्यरचना आहे.  पहिल्या दोन ओळीत पाच अक्षरे आणि तिसऱ्या ओळीत दहा अक्षरे असा तीन ओळींचा द्विपंचदशम (१५अक्षरांचा) चरण. या माध्यमातून त्यांनी आई विषयीच्या नेमक्या हळुवार भावना उलगडल्या आहेत.  ही पहा एक झलक.

 तिचे दर्शन 

ते आकर्षण 

जीवनी अर्थ आणते  छान ..

आयुष्यात जशी दुःख झेलली, प्रियजनांचे वियोग सोसले, तसे आनंदाचेही मुलायम क्षण वेचले.  हिरवळीवरून चालण्याचे सुखद अनुभव घेतले.  याची जाणीव त्यांच्या ‘साथ’, ‘मनाची हिरवळ’ या कवितांमधून वाचताना होते. त्याचबरोबर ‘माझ्या श्वासात तू’ , *छाया.. माहेर माझ्या लेकीचे.*. या कविता वाचताना मन भरून, हेलकावून जाते.

खरं म्हणजे प्रत्येक कवितेविषयी लिहावं  तितकं थोडं आहे पण वाचकांसाठी काही रस राखून ठेवावा या भावनेने लेखणीस आवर घालते.  एक मात्र नक्की की यातली कुठलीही कविता ही ‘केवळ उगीच’ ‘बोजड” “ओढून ताणून” या सदरातली नाही.  प्रत्येक कवितेत विचार आहे, संदेश आहे आणि ती दिशादर्शकही आहे. म्हणून केवळ वाचनीय.  सोसण्यातून प्राप्त झालेली सकारात्मकता आहे म्हणून पुन्हा पुन्हा वाचावी अशीच प्रत्येक कविता आहे.

या कवितासंग्रहाचे आर्या ग्राफिक्सने केलेले मुखपृष्ठ ही अर्थपूर्ण आहे.  निष्पर्ण झाडावरचा एक पक्षी जणू जीवनाचे गाणे गातोय आणि अस्वस्थ झालेल्या वादळात अडकलेल्या माणसाला काहीतरी शिकवण देतो आहे, आणि त्याच्या राखाडी जीवनाला हिरव्या छटा प्राप्त होत आहेत, असे या चित्रातून अर्थ झिरपतात.

 ‘साद अंतर्मनाची‘ ही शीर्षक कविता या चित्राशी जणू नाते सांगते. 

 मना असता अती अशांत

 नसते दिशा विचारांना 

समृद्ध जीवनाचे विचार 

उजळणी काव्य किरणांना।।

परतावा, पाऊलवाट, अर्थमाला अशी आणि यासारखी सर्वच कवितांची  शीर्षके आकर्षक आहेत. 

या काव्यसंग्रहाला मीरा श्री भागवत– मितेश्री या रसिक, जाणकार आणि गुणी व्यक्तीने अप्रतिम प्रस्तावना दिलेली आहे. आर्या प्रकाशन आणि डिस्ट्रीब्यूटर्सने श्री.अरुण पुराणिक यांचा हा सुंदर काव्यसंग्रह प्रकाशित करून काव्यप्रेमींना उपकृत  केले आहे. त्यांना मनापासून धन्यवाद !

श्री अरुण पुराणिक  यांचे मनापासून अभिनंदन आणि त्यांच्या पुढील लेखन प्रवासास खूप खूप शुभेच्छा ! 

हीच अंतर्मनाची साद मीही त्यांना देते.

 धन्यवाद !

 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – ☆ पुस्तकावर बोलू काही ☆ “स्वातंत्र्यायण” – लेखक : श्री सचिन शरद कुसनाळे ☆ परिचय – श्रीशैल  चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “स्वातंत्र्यायण” – लेखक : श्री सचिन शरद कुसनाळे ☆ परिचय – श्रीशैल  चौगुले ☆ 

स्वातंत्र्यायण 

लेखक : श्री सचिन शरद कुसनाळे

प्रकाशक : तेजश्री प्रकाशन इचलकरंजी.

पृष्ठे :  २०५.

मूल्य “ रु. २००/-

नुकतेच “स्वातंत्र्यायण” हे अभ्यासात्मक चिंतनयुक्त पुस्तक वाचून हातावेगळे झाले.

 शिक्षक आदरणीय सचिन कुसनाळे यांनी हे पुस्तक अतिशय चोखंदळ विचार व अंतर्मुख चिंतनातून तात्वीक दृष्टीकोनातून सूक्ष्म अध्ययनातून लिहिलेले दिसून येते.

सचिन कुसनाळे सर यांचे “ मी अस्तिक का? “ हे पुस्तक अस्तिक नास्तिक या विषयातून स्वविचारातून अस्तिकच का हा मुलभूत प्रश्न वैचारिक, तात्वीकतेने मांडले होते. तद्नंतर “ स्वातंत्र्यायण ” या पुस्तकात नेमकी स्वातंत्र्याची व्याख्या, अतिशय व्यापक व सजीव निर्माल्य स्वरुपात कशी आहे याचे विस्तारात्मक विचार आध्यात्मिक, तात्विक, सामाजिक ,राजकीय, नैतिक-अनैतिक व बऱ्याच अर्थाने आपणास ज्ञान देऊन जाणारे अभ्यासात्मक लेखन या पुस्तकाद्वारे दिसून येते.

स्वातंत्र्य म्हणजे केवळ ‘ सामाजिक राजकीय क्रांती ‘ ही मर्यादित वैचारिकता नसून, ती ‘स्व’ पासून ‘स्व’ च्या  भौतिक अभौतिकत्वाचे कारणातूनही निर्माण होणे गरजेचे आहे असे लेखक यातून स्पष्ट करतात.

मुक्तानुभाव हा स्वातंत्र्याचा प्राण आहे. या वाक्यापासूनच या पुस्तकातील विवेकबुद्धी विचाराची प्रचिती येऊ शकते.

एकुण ५४ पाठात हे पुस्तक विविधांगाने, स्वातंत्र्य  म्हणजे काय ? यातील नेमकेपणा साधून – “ स्वातंत्र्य म्हणजे इतिहास नागरिकशास्त्र राजकारण नसून, एक सर्वांनी आत्मसात करणेचे जीवनतंत्रच आहे “असे प्रबोधनात्मक अंतर्मुख विचार ते मांडतात. ‘ स्वातंत्र्यायण ‘ हे पुस्तक एक अभ्यासास अनुकूल असे पुस्तक आहे. आज स्पर्धापरीक्षेच्या विद्यार्थ्यांनाही सामान्य ज्ञानासाठी उपयुक्त अशी यशस्वी लेखननिर्मिती सचिन कुसनाळे सरांच्याकडून झाली आहे असे म्हटले, तर मराठी भाषेतील चिंतनात्मक दर्जा उंचावणारे हे लेखन  आहे असेच म्हणावे लागेल.

सर्वांनी फक्त एकवेळ नाही, तर अनेकवेळा वाचन करून संग्रही ठेवण्यासारखी ही उज्वल ग्रंथनिर्मिती आहे., असेच म्हणावेसे वाटते. 

लेखकांना या निर्मीतीसाठी ज्ञानदायी शुभेच्छा !

परिचय – श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ Energize Your Mind – लेखक – गौर गोपाल दास ☆ परिचय – सौ. वीणा आशुतोष रारावीकर ☆

सौ. वीणा आशुतोष रारावीकर

☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ 

☆ Energize Your Mind – लेखक – गौर गोपाल दास ☆ परिचय – सौ. वीणा आशुतोष रारावीकर ☆ 

पुस्तक – Energize Your Mind

लेखक – गौर गोपाल दास

पृष्ठ संख्या – ३०९

प्रकाशक – पेंग्विन इंडिया

किंमत – रुपये २९९

सध्याच्या काळात अध्यात्मिक, आयुष्याला प्रेरणा देणारे विचार विनोद बुद्धीने जगासमोर मांडणारा एक योगी पुरुष — अशी ज्याची जगभर ख्याती आहे असा आघाडीचा योगीपुरुष…. गौर गोपाल दास. स्वामी प्रभुपादजी यांच्या पंथाचा एक शिष्य. प्रभु गौर गोपाल दासजी सकारात्मक ऊर्जा देणारे,जीवनशैली प्रशिक्षक आणि प्रेरक वक्ते आहेत .

“Energize Your Mind“ हे त्यांचे दुसरे इंग्लिश पुस्तक. स्वतःच स्वतःचे विचार, मनाची अवस्था,  भावना यांवर ताबा कसा मिळवायचा आणि आयुष्यात यशस्वी कसे व्हायचे, यावर बाजारात अनेक पुस्तके, सोशल मिडियावर अनेक व्हिडिओ उपलब्ध आहेत. असे असताना या पुस्तकाचे वैशिष्ट्य काय? 

“आपल्याला आनंदी राहायचे असेल तर आपण कसे बदलले पाहिजे?” हे सांगताना लेखक लोकांना पोकळ सल्ले देत नाही. तर त्या अनुषंगाने स्वतःला आलेले अनुभव तो कथन करतो. स्वतःच्या उदाहरणांवरून त्यांनी एक एक मुद्दा विशद केला आहे. त्यातून मी कसा घडत गेलो हे त्यांनी मांडले आहे. एका योगीचे जीवन आणि सर्व सामान्य माणसांना येणारे रोजच्या आयुष्यातील प्रश्न यात फरक आहे, याची त्यांना जाणीव आहे. म्हणूनच हे पुस्तक वाचताना, आपण आपल्या आयुष्याशी त्याचा संबंध सहजरित्या जोडू शकतो.

दुसरे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, या पुस्तकाची भाषा. अतिशय साधी सरळ सोपी भाषा. भाषा इंग्रजी असली तरीही सर्व साधारण वाचकांना तितक्याच सहजपणे समजेल आणि आत्मसात होऊ शकेल, असे हे पुस्तक. प्रत्येक प्रकरणाची सुरवात एखादे सुंदर वाक्य उद्‌घृत करून केली आहे. तसेच प्रकरणाच्या शेवटी सारांश दिलेला आहे. यात आपल्याला अभ्यास करायला प्रश्न दिलेले आहेत. यातून आपण आपल्या स्वतःच्या आयुष्याकडे वेगळ्या नजरेने बघू शकतो.

आपले आयुष्य, आपल्या मनात येणारे विचार, त्यामुळे होणारी मनाची स्थिती आणि त्यातून निर्माण होणाऱ्या भावना याला कारणीभूत कोण असतो? यावर आधारित लेखकाने पुस्तकाचे चार विभाग पाडले आहेत. ते अतिशय चपखल आहेत. पहिला भाग, मी व  माझे मन. दुसरा भाग इतर व माझे मन. तिसरा, मी व इतरांचे मन आणि शेवटचा भाग म्हणजे हे चराचर विश्व व माझे मन. चार विभागात मिळून एकूण पंधरा प्रकरणे या पुस्तकात आहेत.

या पुस्तकाची सुरवातच अशी होते की , “आपण सोफिया नाही. आपण माणूस आहोत.” म्हणजे काय तर आपण रोबो नाही. मनुष्य आहोत. याचाच अर्थ आपल्याला भावना आहेत. त्याची जाणीव व अनुभव घ्यायला शिकले पाहिजे. त्यांच्याशी सामना करता आलं पाहिजे. त्यांना बरं करता आलं पाहिजे. आपल्या मनातल्या भीती, चिंता- काळजी, नैराश्य आणि सर्वात शेवटची व महत्वाची भावना म्हणजे अपराधीपणाची यातून बाहेर पडण्याची गरज असते. या भावना बऱ्या करताना गरज पडली तर बाहेरच्या समुपदेशनाची मदत घ्यायला काहीच हरकत नाही. हे स्वानुभवातून लेखकाने सांगितले आहे. एकाच भावनेला अनेक छटा असतात. त्याचा एक तक्ताच या पुस्तकात दिला आहे.

इतरांच्या वागण्याचा आपल्या मनावर किती परिणाम होऊ द्यायचा? यासाठी त्यांनी स्वतःबद्दल एक किस्सा सांगितला आहे. हा योगी पुरुष आयुष्यातील तत्व किंवा अध्यात्मिक विचार हलक्या फुलक्या रितीने आपल्या भाषणातून मांडत असतो. विनोद करत आयुष्यातील विरोधाभास उलगडून दाखवणे, ही त्यांची खासियत आहे. पण याच कलेवरून त्यांना त्यांच्याच आश्रमातील एक वरिष्ठ योगी उलट सुलट बोलून जातो, ते देखील पहाटेच्या वेळी ध्यानाला बसलेले असताना. अशावेळी योगी असला तरी लेखकाची काय अवस्था होते? ते या गोष्टीला कसा प्रतिसाद देतात? ही गोष्ट आपण वाचून समजून घेतली पाहिजे. लोकांच्या नकारात्मक वागण्याची यादी दुसऱ्या भागात दिली आहे. प्रत्येकामध्येच यातील गुण कमी-अधिक प्रमाणात असतात. ते प्रसंगानुरूप दिसून येत असतात. त्यापासून आपला बचाव करत स्वतःला शक्तिशाली करण्याची जबाबदारी आपली असते. वाईट आठवणी पुसून टाकायच्या व आयुष्यातील तीव्र दुःखाच्या वेदनेतून जातांना स्वतःला वृध्दिंगत करायचे असते. दुःखाचे पाच टप्पे असतात. नाकबूल असणे, राग, दुःखाचा सौदा, नैराश्य व नंतर त्याचा स्वीकार. दुःखाचे हे पाच टप्पे आपण कदाचीत परत परत अनुभवत असतो. पण त्याला सामोरे जायला आपण खंबीर झालेले असतो.

लोकांच्या वागण्या-बोलण्याचा आपल्या आयुष्यावर परिणाम होत असेल; तर आपल्या वागण्या-बोलण्याचा लोकांच्या आयुष्यावर परिणाम नाही का होणार? याचा सुध्दा विचार आपण केला पाहिजे. आपल्यामुळे लोकांमध्ये सकारात्मक उर्जा निर्माण होत आहे ना, याकडे थोडे लक्ष दिले पाहिजे. समोरच्या माणसाच्या भावना समजून घेता आल्या पाहिजेत. आणि सुरी, खंजीर व बाण यापेक्षा शब्द हे किती धारदार अस्त्र आहे, याचा विसर पडता कामा नये.

भारतीय संस्कृती, रामायण-महाभारतातील दाखले देत, योगविद्येने या पुस्तकाचा शेवट होतो. आपल्या मनाचा अन्नमय कोषापासून सुरु होणारा प्रवास सरतेशेवटी आनंदमयकोषात कसा करता येईल, याचे सविस्तर वर्णन या पुस्तकात लिहिले आहे. आपण योगी नसून योग्यासारखे म्हणजे आनंदमय जीवन जगू शकतो. ही जाणीवच मनाला आनंद देते.

लेखकाने पुस्तकात अगदी थोडे संस्कृत श्लोक उद्धृत केले आहेत. संस्कृत श्लोक इंग्रजी लिपीमध्ये वाचायला आपल्याला थोडे कठीण वाटते. लेखकाने मानसशास्त्राचा अभ्यास केला आहे. पुस्तकात अनेक ठिकाणी त्याचे संदर्भ दिले आहेत. त्याचबरोबर आपला मुद्दा सांगताना वेळोवेळी अनेक छोट्या- छोट्या गोष्टी लेखकाने सांगितल्या आहेत. कधी कधी त्या लांबवल्यासारख्या वाटतात.

असे असले तरी हे छोटे पुस्तक एकदा हातात घेतल्यानंतर आपण झपाटल्यासारखे वाचून पूर्ण करतो व मगच खाली ठेवतो.

© सौ. वीणा आशुतोष रारावीकर

चर्चगेट, मुंबई

मो ९८१९९८२१५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – ☆ पुस्तकावर बोलू काही ☆ “माझं चीज कोणी हलवलं?“ – मराठी अनुवाद – शरद माडगूळकर ☆ परिचय – सुश्री मधुमती वऱ्हाडपांडे ☆

सुश्री मधुमती वऱ्हाडपांडे

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “माझं चीज कोणी हलवलं?“ – मराठी अनुवाद – शरद माडगूळकर ☆ परिचय – सुश्री मधुमती वऱ्हाडपांडे ☆ 

मूळ इंग्रजी पुस्तक – “Who Moved My Cheese?“

मराठी अनुवाद – शरद माडगूळकर

प्रकाशक – मंजुल पब्लिशिंग हाऊस प्रायव्हेट लिमिटेड 

किंमत – 125-/ रुपये

पुस्तकं तर आपण अनेक वाचतच असतो नेहमी. काही वरवर चाळतो, काही अर्धवट वाचतो, काही काही पुनः पुन्हा वाचतो. काही तिथल्यातिथे विसरून जातो तर काही मनात खूप दिवस घोळत राहतात. काही खूप काही शिकवतात, काही अंतर्मुख करतात. आज ज्या पुस्तकाबद्दल सांगतेय ते एक लहानसे पण फार मोठं तत्व शिकवणारे पुस्तक आहे. “माझं चीज कोणी हलवलं?” हे ते पुस्तक! अगदी छोटेसे, एका बैठकीत पूर्ण होणारे, खूप काही सकारात्मक बदल आपल्यात घडवण्याची शक्ती असलेले डॉ. स्पेंसर जॉनसन ह्यांच्या ओघवत्या भाषाशैलीतील हे पुस्तक. मूळ इंग्रजीतील “Who Moved My Cheese?“ ह्या पुस्तकाचा शरद माडगूळकर ह्यांनी केलेला हा अनुवाद.

 ह्या पुस्तकात आपल्याला भेटतात दोन छोटे उंदीर, स्निफ आणि स्करी नावाचे आणि त्याच आकाराची दोन छोटी माणसेही हेम आणि हॉ! या चार काल्पनिक पात्रांचा आधार घेऊन जगण्यातील एक शाश्वत सत्य लेखकाने मांडलंय. जगात प्रत्येकालाच केव्हा ना केव्हा संघर्षाचा सामना करावा लागतो. ह्यात अनेकदा आपण रस्ता चुकतो, भरकटतो, गोंधळून जातो. पण आपण ज्या परस्थितीत आहोत ती परिस्थिती कायम तशीच राहावी अशी आपली अपेक्षा असते. त्यामध्ये काहीही बदल झाला तर आपण गडबडून जातो. तो बदल आपल्याला अजिबात सहन होत नाही.

 अगदी साधे उदाहरण द्यायचे तर आपल्याकडे रोज येणारी कामवाली बाई! ती आपलं सगळं काम व्यवस्थित करत असते. घरातलं तिला सगळं माहिती झालेलं असतं. त्यामुळे आपण निश्चिंत असतो. तिचे दोन तीन खाडे वगैरे आपण गृहीत धरलेले असतात. अन अचानकच एका दिवशी ती सांगते की ती उद्यापासून येणार नाही. ती कुठेतरी जाणार आहे किंवा तिची काहीतरी वैयाक्तिक अडचण आहे. आता त्या क्षणाला कुठल्याही गृहिणीची काय अवस्था होते ते सांगायलाच नको. अगदी आभाळ कोसळल्यासारखी गत होते! कारण तिची आपल्याला इतकी सवय झाली असते की त्या क्षणी सगळं त्राणच निघून जातं. आता कसं होणार आपलं म्हणून? वास्तविक पाहता दुसरी बाई शोधणं काही फार कठीण नसतं. थोडंसं चार दोन दिवसात तिलाही कामाचं तंत्र अवगत होणारच असतं. पण बदल म्हटला की मनुष्यस्वभाव त्याचं स्वागत करायला तयार होत नाही पटकन! खरं तर असलेल्या बाई बद्दल अनेक तक्रारी असतात आपल्या. पण दुसरी बाई हिच्यापेक्षाही चांगली मिळू शकते असा सकारात्मक विचार फार क्वचित करतो आपण! 

 तर हे छोटेखानी पुस्तक माणसाच्या नेमक्या ह्या स्वभाववैशिष्ट्यावर प्रकाश टाकते. वर उल्लेख केलेली चारही पात्रे चीज च्या शोधात एका भुलभुलैय्यात जातात. खूप शोधल्यावर एके दिवशी त्यांना हवे असलेले भरपूर स्वादिष्ट चीज त्यांना सापडतं. चौघेही निश्चिंत होऊन त्याचा मनसोक्त आस्वाद घेतात. भरपूर स्वादिष्ट चीज आपल्याला मिळतच राहणार हे ते गृहीत धरायला लागतात. थोडक्यात त्याची त्यांना सवय होऊन जाते. असे अनेक दिवस मजेत गेल्यावर हळूहळू कमीकमी होत जाणारे ते चीज एकदा पूर्णपणे संपते. आता मात्र ‘असंही कधी होऊ शकतं!’ हे अजिबातच गृहीत न धरल्याने चौघेही हतबल होतात. पण त्यानंतर चौघे त्या परिस्थितीला कसे कसे सामोरे जातात आणि त्याचा काय परिणाम होतो ते लेखकाने खूप छान परिमाणकारक रीतीने रंगवले आहे.

 ह्या छोट्याश्या गोष्टीत चीज म्हणजे तुमचा जॉब, तुमचा उद्योग, पैसे, ऐश्वर्य, स्वातंत्र्य, आरोग्य ह्यापैकी काहीही जे तुम्हाला आयुष्यात मिळवावेसे वाटते ते ते! आपली प्रत्येकाची चीज ची कल्पना वेगवेगळी असते आणि आपण ह्या जगरूपी भूलभुलैय्यात ते शोधत असतो. कधीनाकधी ते आपल्याला मिळतंही. एकदा मिळाल्यावर हे चीज आपण सहजासहजी सोडत नाही. मात्र हे कधी परिस्थितीनुरूप हरवले किंवा नाहीसे झाले तर आपल्याला सहन होत नाही. थोडक्यात आपल्या दैनंदिन आयुष्यात कालानुरूप झालेला बदल आपण सहजासहजी पचवत नाही. पण ज्या व्यक्ती बदल घडल्यावर योग्य निर्णय घेऊन त्याला सामोरे जातात त्याच शेवटपर्यंत तग धरू शकतात. ज्या चीजचा तुम्ही आम्ही आस्वाद घेताय ते कधीतरी संपणारच आणि ते संपल्यावर नवीन चीज शोधायला तुम्हाला हातपाय हलवावेच लागणार, त्या बदलाचा स्वीकार केला तरच पुन्हा नवीन चीज सापडेल आणि तुम्ही परत आनंदी व्हाल हा सोपा पण महत्वाचा जगण्याचा मंत्र ह्या छोट्याश्या रूपकात्मक गोष्टीतून आपल्यासमोर येतो. पुस्तकाची आणखी एक खासियत म्हणजे ह्यात मधून मधून चीजच्या मोठमोठ्या तुकड्यांची चित्रे आहेत अन प्रत्येक तुकड्यावर सारांश रूपाने सोप्या भाषेतली सकारात्मक वाक्ये आहेत जी आपणाला खूप काही शिकवून जातात अन सोबतच आनंददायी जगण्याचा एक सुंदर, सोपा मंत्र देऊन जातात.

© सुश्री मधुमती वऱ्हाडपांडे

मो 9890679540

अकोला

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – ☆ पुस्तकावर बोलू काही ☆ “नाॅट विदाउट माय डाॅटर“ – लेखिका – बेट्टी महमुदी / सहलेखिका – विल्यम हॉफर ☆ परिचय – सुश्री स्वाती भापकर ☆

सुश्री स्वाती भापकर

परिचय 

Owner Amrapali Beauty Care &Acadamy

अध्यक्ष विशाखा महिला मण्डळ, माजी अध्यक्ष इनरव्हील क्लब ऑफ जयसिंगपूर। 

लिखाण. कविता, चारोळी.. पुस्तकांचे अभिप्राय लिहिणे

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “नाॅट विदाउट माय डाॅटर“ – लेखिका – बेट्टी महमुदी / सहलेखिका – विल्यम हॉफर ☆ परिचय – सुश्री स्वाती भापकर ☆ 

पुस्तक- नॉट विदाऊट माय डॉटर

लेखिका – बेट्टी महमुदी

सहलेखिका – विल्यम हॉफर

अनुवाद – लीना सोहोनी

पृष्ठ संख्या – 309

परिचय – सुश्री स्वाती रा भापकर

नोट विदाउट माय डॉटर सतत प्रेरणा देणारं पुस्तक…

किती वेळेस मी  वाचलं असेल ह्याची गिनतीच नाही  “नॉट विदाऊट माय डॉटर ” कुठलाही निराशेचा क्षण अलगद पुसून काढते हे पुस्तक. परक्या देशात परक्या माणसात आपल्या मुलींसाठी दिलेला एका आईचा एकाकी  लढा. प्रत्येकाने आवर्जून वाचावी अशी ही सत्य कथा.

बेट्टी महमुदी यांचे पती मुडी महमुदी हे अमेरिकेत डॉक्टर होतें. मूलतः इराणी आणि कट्टर धार्मिक, त्यांची मुलगी महातोब यांच्या भोवती ही कथा फिरते. लग्नानंतर चार वर्ष अमेरिकेत वास्तव्य केल्यानंतर स्वतःच्या कुटुंबियांशी भेट घडवून आणायला मुडी दोघीना इराण मध्ये घेऊन जातो. तुम्हाला तिथलं वातावरण खूप आवडेल तुम्हाला हवं तेव्हा परतव येवू ह्या अटीवर दोघीना घेऊन इराण ला येतो.पण इथे आल्यावर तो एकदम बदलतो. आपल्या कुटुंबियांसमवेत मिळून अनेक बंधने लादतो.कट्टर धार्मिक वातावरण असलेल्या घरात  तो बेट्टी आणि माहतोब ला घेऊन येतो. तिथे कट्टर धार्मिकता  पाळाली जातं असतें. अस्वच्छता अज्ञान आणि सामाजिक दृष्ट्या मागासलेल्या ठिकाणी दोघी राहण्यासाठी अजिबात खूष नसतात मोकळ्याविचारांच्या बेट्टीला हे सहन करणे आणि बुरखा सॉक्स चादोर सह वावरणे असहाय्य होतें. ती अमेरिकन एम्बसीतून मदत मिळवण्याचा प्रयत्न करते पण पकडली जाते आणि तिच्या शारीरिक व मानसिक अत्याचारांना सुरुवात होते सुटकेचे सगळमार्ग संपलेले  असताना  बेटीने पुन्हा तसे करू नये म्हणून महातोब ला ठेवुन घेऊन तिला अमेरिकेत जायचे असल्यास जावे असेही तिला सांगण्यात आले. पण बेट्टी अजिबात तयार नव्हती योग्य संधी मिळे परियंत ती  परिस्थितीशी समझोता करते आणि  मुलीला जराही डोळ्याआड न करता जगत असतें अशातच अमेरिकेसोबत इराण चे युद्ध सुरूहोते आणि बेट्टीच्या हलामध्ये जास्त वाढ होतें. एका खासगी एजंटच्यामदतीने डोंगराळ भागातून बर्फाने आच्छादलेल्या डोंगरांमधून कधी चालत कधी घोड्यावर कधी टेम्पोने असा प्रवास करत ती तुर्कस्तानात दाखल होतें तिथे अमेरिकन एंबसी ची मदत घेऊन अमेरिकेत आपल्या आई वडिलांना जवळ पोहचते.

मुली साठी वाट्टेल ती हाल अपेष्टा सहन करत बेट्टी अमेरिकेत पोहचते पण मुलीशिवाय परतणे तिला नामंजूर असते.

एका आईच्या सहसची आणि चिकाटीची सत्य कथा प्रत्येकाने जरूर वाचावी.

कथेत खूप काही असे प्रसंग आहेत जिथे बेट्टीची जिद्द आपल्याला अतिशयोक्ती वाटते पण एक आई म्हणून विचार केला की एक आईसाठी हे अशक्य नाही असेही वाटते..

© सुश्री स्वाती भापकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “विवेकी पालकत्व” – डॉ. अंजली जोशी ☆ श्री ओंकार कुंभार ☆

☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ “विवेकी पालकत्व” – डॉ. अंजली जोशी ☆ श्री ओंकार कुंभार ☆ ☆ 

पुस्तक -विवेकी पालकत्व

लेखिका – डॉ. अंजली जोशी

प्रकाशक – शब्द प्रकाशन

पृष्ठ संख्या – 204

किंमत – 275

नावावरून पालकांसाठीच वाटणारं हे पुस्तक पालकांसाठी तर महत्वाचे आहेच, त्याचबरोबर सर्वच स्री-पुरूषांसाठी अतिशय उपयुक्त असे आहे.

या पुस्तकाच्या लेखिका डॉ. अंजली जोशी यांनी डॉ. अल्बर्ट एलिस यांनी विकसित केलेल्या विवेकनिष्ठ मानसोपचारशास्राच्या अनुषंगाने संशोधन करून पी.एच.डी ही पदवी संपादन केली आहे. एवढेच नाही तर स्वतःच्या मुलांचे संगोपन ही या पद्धतीने केले आहे. त्यामुळे हे लेखन अनुभवसिद्ध असे आहे.

विवेकी पालक होणे ही तशी सोपी गोष्ट नाही. परंतु, निश्चितच ती अशक्य गोष्ट नाही. फक्त त्यासाठी नियमित सजगता मात्र हवी. आपल्या धारणा तपासून घ्यायला हव्यात. आपल्यात बदल झाल्याशिवाय त्याची रुजवात पाल्यात होणार नाही हेही लक्षात घ्यायला हवे.

त्यासाठी आपल्याला हे पुस्तक सर्वतोपरी मदत करते. पुस्तकाची मांडणी खूपच सुंदर आहे. विविध उदाहरणांद्वारे रंजक पद्धतीने विवेकी पालकत्व हा विषय लेखिकेने मांडला आहे. त्यामुळे विषय व आषय समजायला सोपे जाते.

हे पुस्तक ज्यांच्यामुळे माझ्या वाचनात व संग्रहात आले व सातत्याने आम्हा मंडळींना वाचनास नेहमी प्रोत्साहित करत असतात, त्या श्री. राजेंद्र घोडके सरांना मी मनःपूर्वक धन्यवाद देतो.

शेवटी सर्वांना विनंती की, आवर्जून सर्वांनी हे पुस्तक लवकरात लवकर वाचावे.🙏

 धन्यवाद!

©️ श्री ओंकार कुंभार

श्रीशैल्य पार्क, हरिपूर सांगली.

मो.नं. 9921108879

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈