मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ ‘उपरे विश्व. वेध मानवी स्थलांतराचा.’  – श्री शेखर देशमुख ☆ सुश्री सुमती जोशी 

सुश्री सुमती जोशी

☆  पुस्तकांवर बोलू काही ☆ ‘उपरे विश्व. वेध मानवी स्थलांतराचा.’  – श्री शेखर देशमुख ☆ सुश्री सुमती जोशी  ☆ 


पुस्तकाचे नाव : उपरे विश्व. वेध मानवी स्थलांतराचा.

लेखक  : श्री शेखर देशमुख

प्रकाशक : मनोविकास प्रकाशन

मूल्य : रू 299/-

पृष्ठ संख्या – 268 

ISBN : 978-93-90060-15-3

मनोविकास प्रकाशन लिंक >> उपरे विश्व. वेध मानवी स्थलांतराचा

पुस्तक परिचय : सुश्री सुमती जोशी 

उपरे विश्व

२०२० साल करोना महामारीचं. मार्च अखेरीस लॉकडाऊन झाला. पोटासाठी शहराकडे धाव घेतलेले हजारो कष्टकरी दोन पायांवर भिस्त ठेवून सामानाची पोटली डोक्यावर घेत गावी परतू लागले. माझ्यासारखी शहरी मंडळी घरात बसून दूरदर्शनवर हे सारं बघत होती. या दृश्याचा जबरदस्त प्रभाव मनात खोलवर असतानाच ‘उपरे विश्व’ हे शेखर देशमुख यांनी लिहिलेलं नुकतंच प्रकाशित झालेलं पुस्तक हाती आलं.

शेखर देशमुख गेली कित्येक वर्षे पत्रकार म्हणून काम करत आहेत. एच.आय.व्ही.-एड्स आणि मानवी स्थलांतर या विषयावरील संशोधनासाठी बिल आणि मेलिंडा गेट्स फौंडेशनची शिष्यवृत्ती, ‘लीडरशिप इन स्ट्रॅटेजिक हेल्थ कम्युनिकेशन’या अभ्यासासाठी जॉन हॉपकिन्स शिष्यवृत्ती मिळालेले आणि बहुविध जबाबदाऱ्या सहजी पेलून धरणारे शेखर देशमुख याना सर्वोत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारही(२०११) मिळाला आहे. शेखर देशमुख यांची ‘पॉझिटीव्ह माणसं’, लेखन सहभाग-दि प्राईस स्टोरीज, पन्नाशी सामाजिक महाराष्ट्राची’ ही पुस्तकं प्रकाशित झाली आहेत.

‘वेध मानवी स्थलांतराचा’ हे उपरे विश्व या पुस्तकाचं उपशीर्षक. आकाशाला गवसणी घालणारा हा व्यापक विषय २७० पानात बंदिस्त करणं, हे एक आव्हान होतं. ते त्यांनी अतिशय समर्थपणे पेललं आहे. हा विषय त्यांनी सहा प्रकरणात विभागला आहे.

‘अस्तित्व टिकवण्यासाठी’ या पहिल्या प्रकरणात अनादी अनंत कालापासून संघर्ष करत, लढा देत माणूस कसा स्थलांतर करत आलाय त्याचा आढावा घेतला आहे. अन्नपाणी आणि सुरक्षित निवारा या गरजा भागतील तिथे माणूस स्थलांतर करून राहू लागला. रोगराई, दुष्काळ, पूर, भूकंप यासारख्या अस्मानी संकटांपासून सुटका करून घेण्यासाठी माणसांनी जगभर स्थलांतर केलं. ब्रिटिशानी इथल्या शेतकऱ्याना भूमिहीन करून जावा सुमात्रा या बेटांवर मजूर म्हणून स्थलांतर करण्यास भाग पाडलं. १८४६ ते १९४० या कालखंडात जगभरात सामूहिक स्थलांतर कसं घडलं याचा लेखाजोखा इथे वाचायला मिळतो. त्या काळी उत्तर प्रदेश हा स्थलांतराचा केंद्रबिंदू होता. आज दोनशे वर्षानंतरही परिस्थिती बदललेली नाही, हे वाचून वाईट वाटलं. मला सर्वात भावला तो ‘स्त्री आणि स्थलांतर’ या विषयाचा उहापोह. लग्न झाल्यावर माहेर सोडून सासरी जाणं हे विधिलिखित स्थलांतर स्त्रीला टाळता येत नाही. पण परिस्थितीनं लादलेलं स्थलांतर स्त्रीला उद्ध्वस्त करणारं असतं.

‘खेडयाचं मूळ आणि शहराचं कूळ’ या दुसऱ्या प्रकरणात उत्तर प्रदेशातल्या खेडयांची स्थिती विस्तारानं सांगितली आहे. सवर्ण लोक ‘राजा’ आणि बहुजन-दलित ‘प्रजा’. सरंजामशाही मुरलेली. मालकाच्या लाथा खाण्यापेक्षा रोजी रोटीसाठी शहरात गेलेलं बरं, असा विचार करून होणारं स्थलांतर. त्यांना रहावं लागतं उघडी गटारं, कचरा कुंडया याच्या आसपास झोपडया बांधून. माणसांची ही फरपट वाचून मन उद्विग्न होतं.

‘आगीतून फुफाट्यात’ या तिसऱ्या प्रकरणात या स्थलांतरितांमुळे मुंबई. दिल्ली, कोलकाता यासारख्या शहरांची कशी वाताहत झाली त्याचं सविस्तर वर्णन आहे. ऑफिसच्या चार भिंतीत बसून केलेलं हे लेखन नाही. धारावी, प्रेम नगर, इंदिरा नगर यासारख्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन तिथल्या लोकांशी संवाद साधून केलेलं हे लेखन वाचकांना खिळवून ठेवतं.

‘धड आणि धडगत’ हे चौथं प्रकरण. स्थलांतरामुळे प्रगती होते असं म्हणतात, पण उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी केलेलं दिशाहीन स्थलांतर कसं घटक ठरतं, हे या प्रकरणात विस्तारानं मांडलंय. मनुष्यबळाचा विचार केला तर लोकसंख्यावाढ फायदेशीर ठरते, पण निरक्षरता हा शाप ठरणार आहे. क्वालिटी आणि क्वांटिटी या दोन्ही बाबतीत आपल्या देशातील परिस्थती किती चिंताजनक आहे, हे आकडेवारी देत सांगितलं आहे. हवामानात होणाऱ्या बदलामुळे बांगला देशातल्या स्थलांतरितांचा प्रश्न आपल्यासाठी जाचक ठरणार आहे.

काटेरी वाटा आणि मानवी चेहरे या पाचव्या प्रकरणात पुष्कर येथे असलेल्या ब्रह्मदेवाच्या एकमेव देवळातल्या उत्सवाचं उदाहरण घेत धर्माच्या नावाखाली होणारी लोकांची लूट, फसवणूक, मसाज पार्लरच्या नावावर सेक्स आणि ड्रग्ज यांचा व्यापार करणारे स्वार्थी या संबंधी विवेचन केलं आहे. जागतिक स्तरावर स्त्रियांची चाललेली फसवणूक आणि ससेहोलपट लेखकांनी सोदाहरण दाखवली आहे.

आजचे वास्तव आणि उद्याची बात या शेवटच्या प्रकरणात २०३० साली काय परिस्थिती असेल याचा अंदाज व्यक्त केला आहे.

एकंदरीत स्थलांतराचा एक फार मोठा दस्तऐवज तयार करण्याचं शिवधनुष्य लेखकांनी पेललं आहे. भविष्यात या विषयावर संशोधन करणाऱ्यांना हे पुस्तक दिशादर्शक ठरेल.

 

सुश्री सुमती जोशी

मोबाईल ९८३३२२२१०६. ई-मेल आयडी [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकावर बोलू काही ☆ कुत्रा छंद नव्हे संगत – भाग-2 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

 ☆ पुस्तकावर बोलू काही ☆ कुत्रा छंद नव्हे संगत – भाग-2 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆ 

“कुत्रा छंद नव्हे संगत “पुस्तकाचे अंतरंग  भाग २

पहिल्या प्रकरणात कुत्रा आणि माणसाचा संबंध कसा आहे याचे दाखले दिले आहेत. वेदकाळात सरमा ही इंद्राची कुत्री आणि शामला आणि अबला ही तिची दोन पिल्ल.तसेच  धर्मराजाचे श्वानप्रेम, दत्तात्रेयांजवळचे चार कुत्रे, शिवाजी महाराजांच्या वाघ्याची स्वामिनिष्ठा, शाहू महाराजांचा खंड्या अशी कुत्र्याबद्दलची आदरणीय उदाहरणे त्यांनी सांगितली आहेत. त्याचप्रमाणे  युद्धभूमीवर काम करणारी  श्वानपथके ,त्यांचे पराक्रम , पोलिसांना गुन्हेगार पकडण्यात मदत करणारे, अनेक ठिकाणी हेरॉईन  स्फोटकांचा शोध घेणारे, मेंढ्यांच्या कळपावर राखण करणारे अशी  कुत्र्यांच्या महती ची अनेक उदाहरणे त्यांनी दिली आहेत, चर्चिल यांचे लिखाण लॉर्ड बायरनच्या कविता श्वानाच्या सानिध्यातच झालेल्या आहेत.

कुत्रा घरात आणताना निवड कशी करावी , घराचा आकार, पाळण्याचा हेतू, आरोग्य कसे राखावे, शिक्षण कसे द्यावे, वेगवेगळ्या कुत्र्यांच्या जाती, रंग, बांधा, रुप, स्वभाव यासह माहिती त्यांनी आपल्या पुस्तकात सोप्या पद्धतीने सांगितली आहे. हाॅलीवुड मधील कोली जातीचा लसी कुत्रा कसा श्रीमंत झाला त्याचे रसदार वर्णन केले आहे.

श्वान प्रदर्शनांना  सुरुवात कशी झाली, केंनेल क्लब मध्ये कुत्र्यांच्या कुटुंबाचा इतिहासात कशी नोंद होते ,स्पर्धेचे परीक्षक कसे गुण देतात त्यांचे फॅन्सी ड्रेस, सगळ्या गोष्टींप्रमाणेच श्वान प्रदर्शन  का  भरवली जातात, त्यांचे फायदे काय, हेही सांगितले आहे. पुस्तकात त्यांनी आपल्या प्रिन्स ला शिकविताना चे फोटो व अनेक जातींच्या कुत्र्यांचे फोटो दिले आहेत.

युद्धभूमीवर अनेक सैनिकांचे प्राण वाचविण्याचे पराक्रम केलेल्या कुत्र्यांची नावे आणि मर्दूमकीही वर्णन केली आहे. त्याचप्रमाणे पोलीस खात्यातही जिथे पोलीस शोध घेऊ शकत नाहीत, तेथे कुत्रा कशी मदत करतो याची उदाहरणे वाचताना तोंडात बोट घातले जाते.

कुत्र्यांचे आजार त्यावर पथ्य आणि होमिओपाथी ची औषधे ही त्यांनी सांगितली आहेत. पुस्तकाच्या शेवटच्या प्रकरणात अनेक श्वान प्रेमींचे प्रश्न आणि त्यावर दिलेली उत्तरे यातून कितीतरी माहितीचे भांडार मिळते.

श्वान धर्माच्या उदाहरणाचा भाग पुढील भागात

क्रमशः….

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकावर बोलू काही ☆ कुत्रा छंद नव्हे संगत – भाग-1 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

 ☆ पुस्तकावर बोलू काही ☆ कुत्रा छंद नव्हे संगत – भाग-1 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆ 

“कुत्रा छंद नव्हे संगत ” पुस्तक

१९९९ साली, “स्वरमाधुरी” प्रकाशनने प्रकाशित केलेल्या श्री शांताराम नारायण दाते यांनी मराठीतून लिहिलेल्या “कुत्रा छंद नव्हे संगत” या पुस्तकात कुत्रा हा प्राणी आपल्यासाठी सर्व दृष्टीने किती महत्त्वाचा आहे याबद्दल सविस्तर सांगितले आहे.पुस्तकाचं मुखपृष्ठ हे त्यांचा स्वताचा  प्रिन्स हा कुत्रा आणि बाकीची इतर चार-पाच जातीची कुत्री यांचा फोटो असं आहे.

मिरज जवळील गणेश वाडी सारख्या गावात दाते यांचे मोठे भाऊ बेळगावहून कुलुंगी जातीची कुत्र्याची पिल्ले आणून त्यांना शिकवीत असत. ते सर्व पाहून त्यांना सगळ्या गोष्टी काही प्रमाणात माहित होत्या. पुढे नोकरीच्या निमित्ताने ते परगावी गेले. त्यांना गावाबाहेर मोठा बंगला असे. त्यामुळे कुत्र्याची गरज भासायला लागली. दरम्यान स्काॅटलडयार्डने प्रसिद्ध केलेलं एक पुस्तक त्यांच्या वाचनात आलं. त्याचबरोबर “लसी कम होम” आणि “रिन टिन टिन” हे कुत्र्याचे उत्कृष्ट काम असलेले दोन चित्रपट पहायला मिळाले. योगायोग असा की दोनचार दिवसातच एक कुत्र्याचे पिल्लू दाराशी आले. त्याला खायला प्यायला दिलं आणि त्याचा लळाच लागला. नामकरणही झालं. “प्रिन्स” तीन महिन्याचा झाला. आणि त्याला शिकवायला सुरुवात केली. अगदी साधा गावठी कुत्रा पण इतका उत्तम काम करायला लागला की केंनेल क्लबच्या प्रदर्शनात त्याने पुरस्कार मिळवलान. “राजकमल” च्या “फुलं और कलिया” या बोलपटात प्रिन्सने इतके उत्तम काम करून प्रेक्षकांची वहावा मिळवलीन की त्या बोलपटाला पंतप्रधानांचे सुवर्ण पदक मिळाले अनेकांनी प्रिन्सला  प्रदर्शनात पाहिले होते. बोलपटही पाहिला होता. त्यामुळे दातेंकडे डॉग ट्रेनिंग साठी चौकशची रांग लागली. नोकरी आणि डॉग ट्रेनिंग कस जमणार? संपूर्ण विचाराअंती निर्णय घेतला. आणि नोकरी सोडून आनंद देणारा डॉग ट्रेनर हा उद्योग सुरू केला. बारा वर्षे या उद्योगाला जणू वाहूनच घेतले. ठाण्यात राहून मुंबईत कुलाब्यापासून जुहू पर्यंत जवळ जवळ दोनशे कुत्र्यांना शिकवले. राजेश खन्ना, दिलीपकुमार, वामन हरी पेठे, डिंपल कपाडिया असे अनेक प्रतिष्ठित लोकांचे कुत्रे त्यांनी शिकवून तयार केले. अनेकांच्या ओळखी झाल्या. कितीतरी कामे सोपी झाली. सगळ्याचे श्रेय ते आपल्या प्रिन्स ला देतात. इंडियन कॅनेल क्लबच्या प्रदर्शनासाठी पाच वेळा त्यांना परीक्षक म्हणून बोलावले होते. त्यांचा कुत्र्यांच्या मानसशास्त्राचा अभ्यासही सखोल होता. देखणा काली,  ग्रेटडेन, अल्सेशियन, डॉबरमन, बाॅक्सर, लॅब्राडाॅर, डाल्मेशियन, पामेरियन किती नावं सांगावीत! पण प्रत्येक जातीचा स्वभाव, वैशिष्ट्य, रंग, बांधा अशी माहिती त्यांना पाठ होती. मुंबई दूरदर्शन वर कुत्र्यांसह मुलाखती आणि मार्गदर्शनही त्यांनी केले होते. चंपी, ग्लडी, रंभा, आणि प्रिन्स या चार श्वानांचा पंचवीस वर्षाचा घरात सहवास त्यांना लाभला होता.

शांत ना दाते हे माझे मामा. आम्ही भेटलो की कुत्रा या विषयावर तासन-तास गप्पा मारत बसायचो. तेव्हा मी त्यांना बरेच दिवस त्यांचे कुत्र्यांचे अनुभव आणि माहिती यावर मराठीत पुस्तक लिहिण्याचा आग्रह करत होते. त्यांनी ते मनावर घेतलं. आणि “कुत्रा छंद नव्हे संगत” या पुस्तकाचा जन्म झाला.

पुस्तकाचे अंतरंग पुढील भागात

क्रमशः….

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ ‘माझा गाव माझा मुलूख’ – श्री मधु मंगेश कर्णिक ☆ श्री गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर

 ☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ ‘माझा गाव माझा मुलूख’ – श्री मधु मंगेश कर्णिक ☆ श्री गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर ☆ 

पुस्तक – माझा गाव माझा मुलूख

लेखक – मधु मंगेश कर्णिक

परिचय – गुरुनाथ ताम्हनकर

प्रकाशक – मैजेस्टिक पब्लिशिंग हाउस 

पृष्ठ संख्या – 292

मूल्य – 300 रु 

मैजेस्टिक रीडर्स लिंक – >> माझा गाव माझा मुलूख

‘कोकण’ हा देवदेवतांच्या वरदहस्ताने पावन झालेला मुलुख. या मुलुखाप्रमाणेच येथील कोकणी माणूस आपल्या वेगवेगळ्या गुणांनी संपन्न. डहाणूपासून वेंगुर्ल्यापर्यंत पसरलेली कोकणपट्टी ही परमेश्वराने जन्माला घातलेली अद्भूत भूमी आहे. कोणाचाही मुलाहिजा न ठेवणे, कोणालाही फार उंचीवर न चढविणे, तरीही कोणाच्याही ख-याखु-या गुणवत्तेची मनापासून कदर करणे, ही इथली खासीयत.

या सर्वांवर प्रकाश टाकलाय “माझा गाव माझा मुलुख” या मधु मंगेश कर्णिक यांच्या पुस्तकातून. मॅजेस्टिक प्रकाशनाच्या या पुस्तकाचे मुखपृष्ठ सतिश भवसार यांनी निसर्गचित्राने छान सजविले आहे तर मलपृष्ठावर पुस्तक लेखनामागील लेखकाचा दृष्टीकोन सांगितला आहे. कोकणचे, विशेषत: सिंधुदुर्गातील विविध गावांचे कला, संस्कृती व नैसर्गिक वर्णन तसेच या मुलुखातील परंपरांवर प्रकाशझोत टाकला आहे.

प्रस्तावनेच्या सुरुवातीलाच लेखक बॅ. नाथ पै यांच्या स्मृतीस अभिवादन करतात. गावाच्या बदलत्या वास्तवाबद्दल विविध प्रसंगांचा उल्लेख करुन प्रस्तावनेतच लेखक संपूर्ण कोकणभूमीच्या वैशिष्ट्यांवर प्रकाशझोत टाकतात.

पुस्तकाचे दोन भाग केलेले असून ‘माझा गाव’ या भागात सिधुदुर्गातील 22 गावांचे प्रवासवर्णन आहे. तर ‘माझा मुलुख’ या दुस-या भागात मालवणी मुलुखाची लोकसंस्कृती सतरा प्रकरणांमध्ये मांडली आहे. एकूण 292 पृष्ठांचे हे पुस्तक म्हणजे साहित्याची एक मेजवाणीच म्हणायला हरकत नाही, असे मला वाटते.

काळाच्या ओघात कोकण भूमी व कोकणी माणूस बदलला. हा मुलुख आता पूर्वीसारखा दरिद्री राहिलेला नाही. रोजगार संधी निर्माण झाल्या आहेत. अनेक क्षेत्रात बदल घडला आहे. मात्र कोकणची प्राचीन संस्कृती तशी आमूलाग्र बदलणारी नाही. नव्यातील सारे पचवून ‘जुने ठेवणे’ ही इथल्या माणसाची खासीयत. जुन्या ट्रंकेच्या तळाशी जपून ठेवणारा हा जगावेगळा मुलुख आहे.

पहिल्या भाग़ात सिंधुदुर्गातील प्रत्येक गावाचे वर्णन वाचताना आपण त्या गावच्या रस्त्याने प्रत्यक्ष फिरतोय, नदी-ओहोळ भटकतोय,  नारळी फोफळीच्या, आंब्या-फणसांच्या झाडांचे दर्शन घेतोय, बकुळ- प्राजक्त फुलांचा सुवास अनुभवतोय असाच जणू भास होतो. लेखकाच्या लेखणीतला जीवंतपणा वाचकांच्या नजरेत भरतो. जे गाव आपण पाहिलेत, ते डोळ्यासमोर उभे राहतात. तर जे पहायचे राहिलेत, ते पाहण्याची इच्छा निर्माण होते.

प्रत्येक गावाच्या निसर्गाचे वेगळेपण वर्णन करताना लेखकाच्या साहित्यप्रतिभेची कल्पना येते. आपल्या जन्मगाव ‘करुळ’ बद्दल वर्णन करताना लेखक लिहितात, “या चिमुकल्या गावाने मला भरभरुन दिले. ऋतुचक्राचे सारे फेरे मी या माझ्या गावात बालपणापासून नजरेत साठवले. मान्सुनचे वारे झाडांना कसे मुळांपासून हलवतात आणि आषाढातला पाऊस कौलारांवर कसा ताशा वाजवतो, ते मी इथे अनुभवले.”

लेखक पुढे वर्णन करतात – ‘करुळ गावच्या माळावर उभे राहिले की ‘नाथ पै वनराईच्या क्षेत्रावरुन जरा पुर्वेकडे नजर टाकावी, सह्याद्रीचे निळे रुप असे काही दृष्टीत भरते की, तिथून डोळे बाजूला करु नये. चित्रात मांडून ठेवावा, तसा अवघा सह्याद्री इथून दिसतो.’

कोकणात अनेक देवस्थाने आहेत, त्यातील आचरे संस्थानचा श्री देव रामेश्वर, कुणकेश्वर, वेतोबा, सातेरी, भराडी अशा अनेकांची महती या पुस्तकात वर्णन केली आहे.

कोकणी माणसाच्या स्वभावावर पूर्ण प्रकाशझोत टाकला आहे. मालवणी मुलुखातल्या माणसाजवळ हापूसचा स्वादिष्ट गोडवा आहे, कर्लीचा काटेरीपणा आहे, तिरफळीचा मिरमिरीत झोंबरेपणाही आहे. शिवाय फुरशातला विखारही आमच्या वागण्या बोलण्याट आढळतो. याशिवाय अडसराचा कोवळेपणा, गोडपणा, फणसाचा रसाळपणा, कातळाचा खडबडीतपणा आणि आबोली – सुरंगीचा रसिकपणाही आहे. असे कितीतरी गुणदोष लेखकाने पुस्तकात मांडले आहेत.

या पुस्तकाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे गावचे वर्णन करताना वेगवेगळे राजकिय, सांस्कृतिक, ऐतिहासिक दाखले लेखक देतात. प्राचीन परंपरांवर अभ्यासपूर्ण विवेचन लेखकाने केले आहे. गावांच्या नावांची फोड करुन सांगितली आहे.

पुस्तकाच्या दुस-या भागात मालवणी मुलुख, येथील गावरहाटी व तिचे महत्त्व, मालवणी माणसांचे चित्रण, ऋतुचक्र व पारंपारिक उत्सव आणि ते कसे साजरे होतात याची सुंदर माहिती दिली आहे. मुंबईतील चाकरमानी व घरची ओढ या गोष्टींचे मनोहारी वर्णन केले आहे.

एकंदरीत हे पुस्तक वाचून एकदा तरी संपूर्ण कोकण भ्रमंती करावी असे मला वाटते. आपणही हे पुस्तक जरुर वाचा. कोकणचा बाहेरुन काटेरी पण आतून रसाळ माणूस नक्कीच आवडेल !

 

© श्री गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर

सदस्य, अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मालवण

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ ‘फादर टेरेसा आणि इतर वल्ली’ – डॉ शंतनू अभ्यंकर ☆ सुश्री सुमती जोशी 

सुश्री सुमती जोशी

☆  पुस्तकांवर बोलू काही ☆ ‘फादर टेरेसा आणि इतर वल्ली’  – डॉ शंतनू अभ्यंकर ☆ सुश्री सुमती जोशी  ☆ 

फादर टेरेसा आणि इतर वल्ली

पुस्तकाचे नाव : फादर टेरेसा आणि इतर वल्ली

लेखक  : डॉ शंतनू अभ्यंकर

प्रकाशक : समकालीन प्रकाशन

मूल्य : रू 160/-

पृष्ठ संख्या – 130 

ISBN13: 9789386622662

पुस्तक परिक्षण  : सुश्री सुमती जोशी 

‘फादर टेरेसा आणि इतर वल्ली’ हे डॉक्टर शंतनू अभ्यंकर यांनी लिहिलेलं समकालीन प्रकाशन यांनी प्रकाशित केलेलं पुस्तक वाचलं. ‘फादर टेरेसा’ हे शीर्षक ऐकल्यावर वाचकांच्या मनात उत्सुकता निर्माण होते. मदर टेरेसा माहितेय, पण फादर तेरेसा ही काय भानगड? डॉक्टर त्याचं स्पष्टीकरण देतात. खाष्ट, उंच, धिप्पाड नर्स. आवाज आणि बोलणं सारं पुरुषी. ‘नर्स कसली, नरसोबाच तो! म्हणून फादर टेरेसा’ असं सांगून ते तिचं व्यक्तिमत्त्व शब्दांच्या माध्यमातून साकार करतात. भुलेश्वर अनॅस्थटीस्ट प्राणसख्याविषयी इतक्या तळमळीनं लिहिलंय की कोणत्याही ऑपरेशनमध्ये त्याचं अनन्यसाधारण महत्त्व डॉक्टर प्रांजळपणे कबूल करतात. प्रसू ही गरोदर महिला आपल्या डॅनिष नवऱ्याबरोबर येते. बाळंत होईपर्यंत वरचेवर भेटायला येते. तिचे प्रश्न, मनातल्या शंका, हक्क याविषयी चर्चा करते आणि डॉक्टरांना पेशंटच्या हक्कांची जाणीव करून देते. कोणताही आडपडदा न ठेवता डॉक्टरांनी हे नमूद केलंय. असा हा अनोखा पेशंट प्रत्यक्ष भेटलाय, असा भास वाचकांना होत राहतो. महाडचे पेशंट चाफेकर बंधू, पण त्यांची नावं दाऊद, बशीर, रहीम. कोकणी मुसलमान. त्यांची भाषा आपलीच भाषा असल्याच्या थाटात डॉक्टर त्यांची कथा आपल्याला सांगतात. सय्यद गलाह हा अफगाणिस्तानातून आलेला, इंग्रजीचा गंध नसलेला विद्यार्थी मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतो आणि डॉक्टरांचा मित्र बनतो. नियतीच्या फेऱ्यात अडकल्यामुळे त्याच्या जीवनाची कशी फरपट होते हे त्यांनी आपल्या समर्थ लेखणीने साकार दिलंय. जीवनात नाटक आणि नाटकाच्या अनुषंगानं येणारे इतर विषय हेच जीवनसर्वस्व असणारे ‘मास्तर’ म्हणजे एक अवलिया. हे सदाहरित मास्तर सगळ्यांना हवेहवेसे वाटतात. ‘नाटक संपल्यावर गप्पांचा फड जमतो आणि हा चौथा अंक कधीकधी नाटकापेक्षा रंगतदार होतो’, असं लेखक म्हणतात तेव्हा आपण त्या आनंदाला मुकलोय, अशी हुरहूर वाचकांना वाटत राहते. गर्भपात करून घ्यायला आलेली कुंती, डॉक्टर च्यायला, चक्रधर, कुलीओ अशा एकापेक्षा एक सरस व्यक्ती आणि वल्लींचा परिचय डॉक्टर अचूक शब्दात करून देतात. ‘नाना’ हे त्यांच्या आजोबांचं व्यक्तिचित्र वाचल्यावर मला माझे आजोबा आठवले. त्यांचं धारदार बोलणं, तिरकस विनोद, पुण्याचा चालता बोलता शब्दकोश असलेल्या नानांचं शब्दचित्र अतिशय ह्रदयस्पर्शी झालंय.

अशी चित्रविचित्र माणसं आपल्यालाही भेटतात. पण ती शब्दबद्ध करायला भाषेवर विलक्षण प्रभुत्त्व असावं लागतं. त्या माणसाच्या मनात शिरता यावं लागतं. भाषा हवी तशी वळवता यावी लागते. इंग्लिश मिडीयममध्ये शिकूनही त्यांच्या शिक्षकांनी त्यांना मराठीची गोडी लावली. टी.व्ही. नसलेल्या त्या काळात आपलं वाचनवेड जोपासत त्यांनी सर्वस्पर्शी वाचन केलं. त्याचाच परिपाक आणि प्रचीती या पुस्तकाच्या पानोपानी येत रहाते. अवश्य वाचावं असं हे पुस्तक.

 

सुश्री सुमती जोशी

मोबाईल ९८३३२२२१०६. ई-मेल आयडी [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ कथा संग्रह – “माय नेम इश ताता” – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ सौ. राधिका भांडारकर ☆

☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ कथा संग्रह – “माय नेम इश ताता” – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ सौ. राधिका भांडारकर ☆ ☆

पुस्तकाचे नांव : कथा संग्रह – “माय नेम इश ताता”

मूळ लेखिका : डॉ सूर्यबाला 

अनुवाद : श्रीमती उज्वला केळकर

प्रकाशक : सुकृत प्रकाशन

प्रथम आवृत्ती : ०३ डीसेंबर २०१७

किंमत : रु ३१०

सौ. उज्ज्वला केळकर

“माय नेम ईश ताता “या  कथा संग्रहात २० कथा आहेत. सौ. ऊज्वला केळकर यांनी  मूळ हिंदी कथा,अनुवादित केल्या आहेत.

उत्कृष्ट कथांचा ऊत्कृष्ट अनुवाद  हीच या कथासंग्रहावरची पहिली छाप!!

या वीसही कथांमधून निरनिराळ्या प्रकारची माणसं, त्यांची संस्कृती, त्यांच्या भोवतालचं वातावरण, त्यांचं जगणं, त्यांचं भावविश्व, त्यांची सुख दु:खं,आशा निराशा   यांचा अनुभव येतो. प्रत्येक कथा वाचत असताना,सतत असं वाटत राहतं,आपण यांना भेटलोय्!

आपल्या भवतालचीच ही माणसं आहेत.. त्यांच्या जीवन पद्धतीशी, त्यांच्या जगण्याशी आपलं नातं जमतं..

कथेतल्या व्यक्ती आपल्या मनात रेंगाळत राहतात. रूतून बसतात.

सौ. राधिका भांडारकर

सरकारी यंत्रणेतून, अरुण वर्मा सारखी, प्रामाणिक व्यक्ती, सस्पेंड झाल्यावर म्हणते, “मला काही क्रांती’ विद्रोह घडवून नव्हता आणायचा, पण आज लोकं खर्‍याला खरं म्हणण्यासाठीही घाबरतात याचा खेद वाटतो.” हे वाचताना मन चिरुन जातं..

“माय नेम ईश ताता “या शिर्षक कथेत आई वडीलांच्या स्पर्धात्मक इर्शेला विद्रोह करणारी एक छोटी बालिका केवीलवाणी होऊन भेटते. पण तिच्यात आणि तिच्या आजीत निर्माण होणारं विश्वासाचं, भरवशाचं नातं मन भारावून टाकतं.

“कागदी नावा चांदीचे कुंतल” आणि “काय माहीत” या दोन्ही कथांमधलं, बाळपणीचं अव्यक्त प्रेम वाचताना मन हळुवार बनतं….!!

“हे घे किन्नी..” या कथेत, किन्नी, किन्नीचे लाचार बाळपण, मावशीची वर्चस्व गाजवणारी, उपकाराची माया, तिचं ऊध्वस्त प्रेम आणि एकंदरच कुणीतरी ताब्यांत घेतलेली तिच्या सुखाची दोरी…. ही किन्नी वाचताना मन विदीर्ण होतं.. या कथांमधून स्रियांच्या मनातले,जगण्यातले बारकावे जाणीवपूर्वक टिपले आहेत. शब्दरचना इतकी भक्कम आहे की कथेतलं अवास्तव वास्तवही विचार करायला लावतं…. कथा कुठेही घसरत नाही. पसरत नाही.

ती घडत जाते. जशी आहे तशी. कथा कशी सजीव भासू शकते, याचाच अनुभव हा कथा संग्रह वाचताना मिळतो.

“….ना सौंदर्य,ना सुघडपणा, ना कोमलता, ना विभ्रम… बाईपण शोधायचंच झालं तर दिसतात काळ्या ढुस्स मनगटात दोन चार मळकट बांगड्या, आणि नाकात सुंकली… संपली बाईपणाची मर्यादा…” “ती” या कथेची सुरवातच मनाची पकड घेते. कथा वाचत असताना वाचकाच्याच मनाची पडझड होते…. आयुष्यभर संघर्ष… पण तरीही ती म्हणते, “डोंगरासारख्या ऊरावर पडलेल्या आयुष्याची पर्वा नाही. माझ्यात कुवत आहे. माझं एक घर आहे. दोन हात आहेत. आई मुलाचं पोट भरायला ते समर्थ आहेत….”

“ती” या कथेतली ही ठिणगी अंधारातली दिवटीच वाटते.,,,!,

“आशिर्वादाचे व्यापारी…” ही कथा तर मानवी मनाचे सुंदर दर्शन घडवते. धर्म, जात पंथ या पलिकडचा माणूस बघणारा सय्यद, स्वत:ला “आशिर्वादाचे व्यापारी ” म्हणून

संबोधणारा सय्यद, कथेच्या अंतीम टप्प्यावर “मानवतेचा पुजारीच “भासतो.

“गजाच्या आरपार..” या कथेत शेवटी एक सुंदर संदेश दिलाय्.

“…..मुक्त कोण आहे? कदाचित कुणीच नाही. न पुरुष.. न स्त्री.. पूर्ण मुक्ती एक स्वप्न आहे. आणि जगणं एका यथार्थात असतं. यथार्थ म्हणजे मुक्त होण्याचं  एक रंगीत स्वप्नं… जीवनांत निम्म्यापेक्षा जास्त आनंद हे स्वप्नच देतं..”

या कथासंग्रहाबद्दल प्रामुख्याने म्हणावसं वाटतं की, या सर्वच लहान रुंदीच्या कथांमधून आभाळाला व्यापतील, इतकं मानवी जीवनावरचं भाष्य दडलेलं आहे.. ते वाचकापर्यंत परिणामकारक रीतिने पोहचतं, त्याचं  श्रेय केवळ ऊज्वलाताईंच्या प्रभावी लेखनशैलीला आहे. अचूक शब्द, भाषेचा ओघ आणि लावण्य याचा अखंड झरा वाचकाला  एका सुंदर कृतीचा महान आनंद देतो.. जाणीव आणि वैचारिक ऊंची त्यांच्या लेखनात नेहमीच जाणवते. अनुवादाचं एक सुंदर तंत्र त्यांच्याजवळ असल्यामुळे, तसेच हिंदी भाषेतलं सुंदर साहित्य, मराठी वाचकांपर्यंत पोहचवण्याची त्यांची प्रामाणिक तळमळ प्रशंसनीय आहे…

ऊज्वलाताई खूप खूप धन्यवाद….!!!

(या लेखांत मी काही कथांवरच विचार मांडले. मात्र या कथा संग्रहातील प्रत्येक कथा सुंदर,अर्थपूर्ण आशयसंपन्न आणि विचार करायला लावणारी आहे…)

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ पुस्तक – “कोपरखळ्या” – श्री बाबू गंजेवार ☆ श्री राजेंद्र एकनाथ सरग

श्री राजेंद्र एकनाथ सरग

संक्षिप्त परिचय 

संपूर्ण नाव – श्री राजेंद्र एकनाथ सरग

जन्‍मतारीख –   23 मे 1967

शिक्षण –   बी.कॉम, मास्‍टर ऑफ मास कम्‍युनिकेशन अँड जर्नालिझम, सन 1987 पासून विविध दैनिकांत–नियतकालिकांत वेगवेगळया विषयांवर लेखन

 ☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ पुस्तक – “कोपरखळ्या” – श्री बाबू गंजेवार ☆ श्री राजेंद्र एकनाथ सरग ☆ 

पुस्तक – कोपरखळ्या

व्‍यंगचित्रकार – बाबू गंजेवार

प्रथम व्‍यंगचित्र – साप्‍ताहिक गांवकरी, नाशिक (एप्रिल 1987 मध्‍ये प्रसिध्‍द)

प्रकाशक –दिलीपराज प्रकाशन, पुणे

पृष्‍ठ – 236

किंमत – 300 रुपये

मनोरंजक आणि प्रबोधनकारी ‘कोपरखळ्या’

व्‍यंगचित्र हा तसा लोकप्रिय साहित्‍य प्रकार. पण या विषयावर लिहीणारे आणि व्‍यंगचित्रे काढणारे खूप कमी आहेत. मराठीमध्‍ये तर व्‍यंगचित्रकारांची संख्‍या शंभराच्‍या आत आहे आणि लिहीणारे हाताच्‍या बोटावर मोजण्‍याइतके. व्‍यंगचित्र या विषयावरही खूप कमी पुस्‍तके आहेत. व्‍यंगचित्रकार बाबू गंजेवार यांचा ‘कोपरखळ्या’ हा व्‍यंगचित्रसंग्रह समीक्षक मधुकर धर्मापुरीकर, व्‍यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी, महेंद्र भावसार यांच्‍या लेखनामुळे आणि बाबू गंजेवार यांच्‍या मनोगतामुळे तसेच दोनशेहून अधिक व्‍यंगचित्रांमुळे ही उणीव काही प्रमाणात भरुन काढतो, असे म्‍हणावे लागेल.

गंजेवार यांची कर्मभूमी मराठवाड्यातील नांदेड जिल्‍हा. यापूर्वी त्‍यांचा ‘अक्‍कलदाढ’ हा व्‍यंगचित्रसंग्रह, ‘गुल्‍लेर’ हे विडंबनात्‍मक पुस्‍तक आणि ‘चाणाक्ष’ ही ऐतिहासिक कादंबरी वाचकांच्‍या पसंतीस उतरली आहे. ‘कोपरखळ्या’ही वाचकांना आनंददायी अनुभव देण्‍यात यशस्‍वी ठरणार, यात शंका नाही. ‘हजार शब्‍द जे सांगू शकत नाही ते एक व्‍यंगचित्र सांगून जाते’ हे घासून-घासून गुळगुळीत झालेले वाक्‍य असले तरी ते या व्‍यंगचित्रसंग्रहातील प्रत्‍येक व्‍यंगचित्राला लागू होते.  हे सांगण्‍याचं कारण म्‍हणजे व्‍यंगचित्रकाराचा नि:पक्षपातीपणा. स्‍वत:ची एक विचारधारा असतांनाही व्‍यंगचित्रकाराने व्‍यंगचित्र रेखाटतांना त्‍याचा यत्किंचीतही प्रभाव पडणार नाही, याची खबरदारी घेतलेली दिसून येते.

‘कोपरखळ्या’ या व्‍यंगचित्रसंग्रहातील राजकीय व्‍यंगचित्रांबाबत विश्‍लेषण केले तरी प्रत्‍येक जण आपापलया कुवतीनुसार, समजानुसार अर्थ काढेल. त्‍यामुळे राजकीय विषयाला हात न घालता इतर विषयांवरील व्‍यंगचित्रांवर भाष्‍य करु. व्‍यंगचित्रकार गंजेवार यांचे चौफेर वाचन, सभोवताली घडणाऱ्या घटना, प्रसंग यावरील चिंतन आणि मार्मिकपणे केलेले रेखाटन यामुळे प्रत्‍येक व्‍यंगचित्र काही तरी संदेश देवून जाते. काही व्‍यंगचित्रे गालावर हास्‍याची कळी खुलवतात तर काही अंतर्मुख करुन जातात. त्‍यांच्‍या व्‍यंगचित्रांमध्‍ये विनोद, काव्‍य, नाट्य, कल्‍पनाशक्‍ती, विडंबन, उपहास या सर्व गोष्‍टी आढळून येतात. व्‍यंगचित्रांत मानवी जीवनाविषयी, समाजजीवनाविषयी निर्माण झालेली जाणीव वाचकालाही जाणवल्याशिवाय रहात नाही. काही व्‍यंगचित्रे वास्‍तवाच्‍या जवळ जाणारी आहेत तर काही निखळ करमणूक करणारी आहेत. काही व्‍यंगचित्र तत्‍कालिन परिस्थिती, घटनांवर आधारित असल्‍याने वाचकांना भूतकाळातील संदर्भ आठवावा लागू शकतो. पण त्‍यामुळे पुन:प्रत्ययाचा आनंद आणि ती घटना नव्‍याने अनुभवण्‍याची संधी वाचकांना मिळते.

जंगलातील सर्व वृक्षतोड करुन कापलेल्‍या झाडाच्‍या बुंध्‍यावर रणरणत्‍या उन्‍हात छत्री घेवून घामाघुम होवून बसलेला माणूस, आतंकी धर्म आणि खरा धर्म या दोन पळत्‍या घोड्यांना आवरु पहाणारी मानवता, महात्‍मा गांधीजींच्‍या चरख्‍यावर चाकू-तलवारीला धार लावतांना दिसणारी छुपी हिंसावादी प्रवृत्‍ती, पारदर्शक व्‍यवहारावर विश्‍वास आहे हे दाखवण्‍यासाठी स्‍वत:चा एक्‍स-रे फोटो लावणारा महाभाग, ‘येथे कचरा टाकणारीचा नवरा मरेल’, अशी पाटी वाचून कचरा टाकणारी आशादायी विवाहित महिला, नापिकी किंवा कर्जबाजारीपणाला कंटाळून बैलांना कत्‍तलखान्‍यात न पाठवण्‍याचे आणि स्‍वत:ही जीव न देण्‍याचे शेतकऱ्याला वचन मागणारी बैलजोडी, वटसावित्री व्रतामुळे दोऱ्यांनी जखडलेल्‍या वडाची सुटका करण्‍यासाठी कात्री हातात घेवून वडाच्‍या झाडाकडूनच पुढच्‍या जन्‍मी बायकोपासून सुटका मागू पहाणारा पिडीत नवरा, पन्‍नाशीनंतर भेटलेली बालमैत्रिण आणि बालमित्र यांची अवस्‍था, बायकोसाठी साडी व मोलकरणीसाठी झाडू आणणारा नवरा पण देतांना झालेली गडबड आणि त्‍यानंतरची त्‍याची अवस्‍था, एकही पुरस्‍कार न मिळणाऱ्या साहित्यिकाचा रद्दीवाल्‍याकडून होणारा गौरव, मंदीत लागलेला सेल म्‍हणजे ‘सोने पे सुहागा’ ही बायकोची भावना याउलट हा तर ‘दुष्‍काळात तेरावा महिना’ ही नवऱ्याची प्रतिक्रिया, पायऱ्यांवरुन घसरुन पडलेल्‍या बापाला उचलण्‍याऐेवजी त्‍याची मोबाइलवर व्हिडीओ क्‍लीप बनवण्‍याची मानसिकता असलेली आजची पिढी, राज्‍याच्‍या एका भागात पाण्‍यासाठी आसुसलेली जनता तर दुसरीकडे पाण्‍यामुळे डोळ्यांत आसू असलेली जनता, ‘कोरोना’ म्‍हणजे मरीआईने सूया टोचून फेकलेले लिंबू म्‍हणून गैरफायदा उचलू पहाणारा भोंदूबुवा ही सारी व्‍यंगचित्रे मूळातून पहाणे एक वेगळाच अनुभव आहे.

व्‍यंगचित्राची ताकद काय आहे, हे सर्व जगाला माहीत आहे. हिटलर, मुसोलिनीसारखे हुकूमशहा व्‍यंगचित्रकाराला घाबरत असत. जिवंतपणी असणारी ही दहशत इतकी आहे की एका राजकीय नेत्‍याच्‍या पिंडदानाच्‍या वेळी व्‍यंगचित्रकार उपस्थित असल्‍याने त्‍याच्‍या पिंडाला कावळाही शिवायला घाबरत आहे. व्‍यंगचित्रकाराबाबत दहशत वाटली नाही तरी चालेल पण त्याच्‍याविषयी आदरयुक्‍त भीती समाजाला वाटली पाहिजे, अशी आशा आहे.

एखाद्या पुष्‍पगुच्‍छामध्‍ये वेगवेगळ्या रंगाची, सुगंधाची, आकाराची फुले योग्‍य जागी मांडून सजावट केलेली असते, तशीच ‘कोपरखळ्या’ या व्‍यंगचित्रसंग्रहात निखळ आनंद देणारी, संवेदना जागृत करणारी, चिंतन करायला लावणारी, मार्मिक भाष्‍य करुन वाचकाला अंतर्मुख करायला लावणारी, कल्‍पनाशक्‍तीच्‍या  ताकदीची जाणीव करुन देणारी अनेक व्‍यंगचित्रे आहेत.

©  श्री राजेंद्र एकनाथ सरग

9423245456

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ काव्य संग्रह – “पारिजात” – सुश्री संगीता कुलकर्णी ☆ श्री विशाल कुलकर्णी

☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ काव्य संग्रह – “पारिजात” – सुश्री संगीता कुलकर्णी ☆ श्री विशाल कुलकर्णी ☆ 

कवीमन हे कोणत्याही मानवी शक्तीद्वारा बनविले जात नसून ते जन्मावे लागते हे सरस्वती देवीचा वरदहस्त लाभलेल्या ठाणे येथील विदुषी संगीता कुलकर्णी यांचा  “पारिजात” हा काव्यसंग्रह..

या काव्यसंग्रहामध्ये उण्यापु-या ऐक्केचाळीस कवितांचं संचयन आहे.

या काव्यसंग्रहातील त्यांची पहिली कविता ” सद्गुरू स्तवन ” ही कविता म्हणजे कृतज्ञतेची एक भावांजलीच आहे अगदी मनापासून आळवलेली अशी सुंदर मनाला भिडणारी  जाणवणारी.. अस्सल प्रेमवीर आणि असली प्रेमिका ” पहिलं प्रेमपत्र ” या कवितेत उत्तम प्रकारे त्यांनी रंगवून टाकली हे त्यांचे कौशल्य मानावे लागेल.. प्रेमावरच्या कवितांनी बाजी मारलेली आहे..

सुश्री संगीता कुलकर्णी

सुगंध, पुस्तकाचे जग, स्पंदन, जागी अजून मी, काही क्षण स्वतःसाठी, साजणा,संजीवनी,माझ्या जीवनात, आस्वाद, रेशीमगाठी या कवितांमधील भावना अतिशय सुरेखरितीने  त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत. ” ना-ती” ही कविता तर मनाला चटका लावणारी तर ” अनोळखी ” ही कविता तर अतिशय वेगळी अशी. सर्वांनी अनुभवलेली काळजाला भिडणारी अतिशय सुंदर..

“असचं जगायचं” या कवितेत तर आपलं आयुष्य आपण असचं जगायचं? असा प्रश्न विचारला आहे..

आपले जीवन हा एक अनुभवप्रवाह आहे. प्रत्येक व्यक्तीचे जीवनाविषयीचे मत हे त्याला स्वत:ला येणार्‍या अनुभवांवर अवलंबून असते. जीवनात चढउतार हे हटकून येत असतातच. जीवन म्हणजे

ऊन-सावलीचा खेळ असतो. सतत सुख किंवा सतत दु:ख असे क्वचितच आढळते. जाईल त्या क्षेत्रात कोणी मागे तर कोणी पुढे अशी स्थिती आढळते. आपण गतिमान असावे व प्रगतिपथावर राहावे. ही प्रक्रिया सुरू होण्यात व चालू राहण्यात जीवनाचे खरे सार्थक आहे.खरे म्हणजे जगण्याइतके आनंददायक असे जीवनात काहीच असू शकत नाही असे म्हणतं आठवणींना घेऊन बसावं कधी समुद्र किना-यावर चारचौघात बसण्यापेक्षा आयुष्य जास्त सुंदर वाटतं असं त्या ” आयुष्य सुंदर असतं” या कवितेतून त्या सांगतात. तर  “श्रावणधारा” या कवितेत श्रावणातल्या ऊन- पावसाचे सुंदर खेळ मेघांवर उठलेला मल्हाराचा सूर

आभाळातल्या इंद्रधनूचा गोफ आवेग उत्कटता सारे या कवितेत सहजतेने उमटलेले आहेत..

सावली माणसाची साथ कधीच सोडत नाही. क्षणाचाही विलंब न करता जवळ येत असते.सावली सारख्या सोबत असणा-या आयुष्याला साजेशी असलेली ” माझी सावली” ही कविता.

रिमझिम ऊन पावसाच्या लपंडावात निसर्गाची गळाभेट पाहणारी निसर्गाचा खेळ हवाहवासा वाटणारी निसर्गाची समृद्धी अनुभवत पायवाटेवरून चालताना गुणगुणणारी कवयित्री ” रिमझिम ” या कवितेत भेटते..  पाऊस या विषयावरची गुंफण सुरेखच.. मृगजळ असलेल्या आपल्या जीवनात एक वेगळं आयुष्य घडविणारी, सुखाचा आसमंत फुलवणारी अखंड तेवणारी प्रेमाची ज्योत ” मृगजळ ” या कवितेत भेटते..

पुस्तकांच्या जगात आपण नेहमीच वावरतो पण ” पुस्तकांचे जग” ही आणखी एक वेगळी कविता..या कवितेच्या रूपात आपण आणखीच वावरतो…” महानायक ” ही कविता सृष्टीच्या ईश्वराशी दिलाने एकरूप होऊन जीवन गाण्याला ताल शब्दसूर मिळतील अशी कविता अप्रतिम..

कवयित्रीाने या संग्रहात वेगवेगळ्या विषयांवर अतिशय सुंदर सहज अशा कविता लिहिल्या आहेत. अध्यात्म, व्यक्तिरेखा निसर्ग, आत्मचिंतनवर प्रेम या विषयांवरही त्यांच्या कविता आहेत. मनाला भिडणा-या जणू काही स्वतःच अनुभवलेल्या..

अतिशय सुंदर वाचनीय अतिशय प्रगल्भ अशा कविता या पुस्तकात आहेत.

मनःपूर्वकता हा कवितेचा विशेष तर सहजता उत्स्फूर्तता हे अलंकरण आहे

 

©  श्री विशाल कुलकर्णी

ठाणे

9821554495

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ ‘तिफण’ – श्री दयासागर बन्ने ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित

श्री सुहास रघुनाथ पंडित

☆  पुस्तकांवर बोलू काही ☆ ‘तिफण’ – श्री दयासागर बन्ने ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ 

पुस्तकाचे नाव : तिफण

कवी : श्री दयासागर बन्ने

प्रकाशक : अक्षरवाड्मय प्रकाशन

मूल्य : रू 120/-

तिफण:भावभावनांची गुंफण

अनुभवांच्या विविधतेने नटलेले आणि विविध भावनांनी ओथंबलेले असे अनुभूतीचे पाचशेअकरा क्षण म्हणजे कविवर्य श्री दयासागर बन्ने यांचा ‘तिफण’ हा पाचशेअकरा हायकूंचा संग्रह.नुकताच वाचून झाला. त्यानिमीत्ताने…

शाळेत असताना पाठांतरासाठी अनेक श्लोक असत. दोन किंवा चार ओळींचे. नंतर आठवी ते अकरावी या वर्गात शिकताना संस्कृत भाषेतही दोन किंवा चार ओळींची सुभाषिते असत. हे श्लोक किंवा सुभाषिते त्यांच्या अर्थ पूर्णतेमुळे सहज पाठ होऊन जात. पुढे त्याचा अनेक ठिकाणी उपयोग ही झाला. त्याची आठवण यायचे कारण म्हणजे या ‘तिफणी’ तून बाहेर पडलेले हे टपोरे हायकू!

जपानी साहित्यातून आलेला हा काव्य प्रकार मराठीत रूढ केला तो ज्येष्ठ कवयित्री शिरीष पै यांनी. त्यानंतर अनेक कवींना हायकू ने आकृष्ट केले. त्यापैकी एक महत्वाचे नाव म्हणजे श्री दयासागर बन्ने. आपल्या संग्रहात त्यांनी या काव्य प्रकाराविषयी

माहिती दिलीच आहे. शिवाय संग्रहाचे शेवटी ‘मराठी हायकूंची चौदाखडी’ या लेखात हायकूच्या रचनेचे तंत्र आणि गुपीत सर्वांसाठी उघडे केले आहे. ते सर्वांनाच मार्गदर्शक ठरेल . या लेखात ते म्हणतात, “हायकूतून दृक्-श्राव्य-स्पर्श- गंध संवेदना येणे हे अनुभवांच्या गहिरेपणावर अवलंबून आहे.” या विधानाचा प्रत्यय ‘तिफण’ वाचल्यानंतर येतो.

या काव्यसंग्रहाच्या प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे हा काव्य प्रकार मूळचा जपानी भाषेतील. पण आपल्या मराठी भाषेत तो रूजवताना शिरीष पै यांच्याप्रमाणे श्री बन्ने यांनीही रचनेमध्ये काही बदल केले आहेत. जपानी भाषेत असलेले पाच सात पाच असे शब्द रचनेचे बंधन न पाळता, अर्थाच्या दृष्टीने आवश्यक तेवढे शब्द वापरले आहेत. त्यामुळे वाचकाला कविच्या भावना निःसंदिग्धपणे समजून येतात. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे विषयांचा सर्वस्पर्शीपणा! जपानी हायकू कारांप्रमाणे ते निसर्ग पुरते मर्यादित न ठेवता मानवी जीवनाच्या सर्व अंगांची नोंद घेतात. त्यात निसर्ग तर आहेच पण नात्यागोत्यापासून अगदी ग्लोबलायझेशनपर्यंत सर्व विषय हाताळले गेले आहेत.

काव्यसंग्रहाच्या ‘तिफण’ या नावाचा अर्थ स्पष्ट करणारे श्री विष्णू थोरे यांचे आकर्षक मुखपृष्ठ आणिअक्षरवाड्मय प्रकाशनच्या श्रीबाळासाहेब घोंगडे यांनी त्याचे आत्मियतेने केलेले प्रकाशन यामुळे समकालीन मराठी काव्यात मोलाची भर पडली आहे यात शंकाच नाही.

हा संग्रह त्यांनी लहान लहान चौदा विभागात आपल्या समोर ठेवला आहे. कविमनाचे,दुष्काळाचे, नात्यांचे, निसर्गाचे, असे विविध विषय हाताळले आहेत.यापैकी कोणत्याही विभागतील हायकू वाचल्यावर त्यांच्या भावनाशील मनाचे दर्शन होते.

नात्यांच्या हायकू इतकेच गावशिवाराचे हायकू मनातलं बोलून जातात. पाखरांचे आणि निसर्गाचे हायकू वाचताना नजर पुस्तकावर आणि मन खिडकीबाहेर असते. पावसाच्या हायकूत मन चिंब होते तर पडझडीचे हायकू डोळ्यातून पाणी काढतात.सर्वच विभागातील हायकू वाचनीय व स्मरणीय आहेत यात शंकाच नाही.

काव्यसंग्रहाविषयी लिहीताना कविच्या काव्यपंक्ती थोड्या प्रमाणात तरी वाचकाला वाचायला मिळाल्या पाहिजेत असे मला वाटते. त्याशिवाय कविप्रतिभेची लज्जत कशी चाखणार ? त्यामुळे मला इथे काही हायकू उद्धृत करावेसे वाटतात. पण गोंधळ असा होतो की नेमके कोणते तुमच्या समोर ठेवू? एक निवडला तर तो दुसरा का नको असे वाटते. कारण सगळेच चांगले वाटतात. मग ‘लकी ड्रॉ’ करावा लागतो.

काही हायकू नमुन्यादाखल :

कवी मेल्यावर पाऊस येतो

आयुष्यभर पेटला क्रांतीने

त्याला विझवू म्हणतो .

 

फुटले नाहीत

मेघांना पान्हे

पोरकी राने.

 

गालावरची खळी

मातीची का खुलली

पावसाची स्वारी आली.

 

झाडांना वाटतं पाखरांनी

फांद्यावर वसवावं गाव

त्यांची क्षितिजाकडे धाव.

 

आठवणींचे

साचून दवबिंदू

काळीज सिंधू.

 

टेबलाखाली

जुळून आले सूत

यंत्रणा भूत.

 

मेंदू गहाण पडला

जीभ अभिव्यक्तीची गळाली

पुरस्काराची रसद मिळाली.

असे किती सांगू? यावर उपाय एकच. संपूर्ण संग्रहाचे वाचन. अवघ्या तीन ओळींत बरच काही व्यक्त करणारा, सांगून जाणारा हा काव्य प्रकार आपल्या समोर आणल्या बद्द्ल श्री दयासागरजी बन्ने यांना धन्यवाद. त्यांच्या पुढील कसदार साहित्य शेती साठी त्यांना शुभेच्छा!

©  श्री सुहास रघुनाथ पंडित, संपादक, ई-अभिव्यक्ति (मराठी) 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ खचू लागली भूई – सौ.नीलम माणगावे ☆ श्री अभिजीत पाटील

 ☆  पुस्तकांवर बोलू काही ☆ खचू लागली भूई – सौ.नीलम माणगावे ☆ श्री अभिजीत पाटील ☆ 

नीलम माणगावे यांचा नवा कविता संग्रह भेटीस आला त्या संग्रहावरील अल्पस टिपण आपल्या आस्वादासाठी सामाजिक, वास्तव, निसर्ग,  ऐक गंगे, नातेसंबध, ती, आणि परिवर्तन, अशा विविध विचार मंथनाच्या खोल चिंतनातून आलेल्या काव्य भावनात्मक सहज सरळ तितकाच वेधक, कुठे भेदक, तर कुठे निरामय, काहीशी  आत्मसंवादी, तर नेमके वास्तव व्यक्त करणारी कविता,सध्याच्या आघाडीच्या लेखीका, नीलम माणगावे यांच्या खचू लागली भुई या नव्या कविता संग्रहामध्ये एकसंघ समाविष्ट असलेला कविता संग्रह भेटीस आला आहे.

सौ.नीलम माणगावे

प्रज्ञा दया पवार यांची नेमकी प्रस्तावना लाभलेला हा संग्रह सुरवातीला आपले मुखपृष्ठ लक्ष वेधून घेतो,आतील कवितेस उठावदार करणारी मंडणी आणि त्यांची कविता ही वाचकांची होऊन जाते, कविता तुमच्या, आमच्या, त्यांच्या

तुम्ही पेटवता आम्ही पेटतो,

तुमच्या हातावर ओरखडासुध्दा नाही

आमचे देह काळेठिक्कर !

तळहातावर शिर घेऊन

बंदुकीच्या चापवर फुलपाखरू

जिंकू किंवा मरू,

तुम्ही त्रिशूल वाटता

आम्ही फुले वाटतो

पाहूया, जास्त जखम कुणापासून होते !

अशा वास्तववादी कवितेची सुरूवातीला भेट घडते आणि आपण विचार करायला लागतो सध्याचा भोवतालच्या परिस्थितीचा

दात पाडलेले असले,म्हणून काय झाले?

साप तो सापच ना?

किती हळूवार पणे व्यक्त होतात या ओळी

म्हणून त्याची तिव्रता कमी नाही होत त्यातील भेदकपणा  मनाला डंख करतो,

धर्मा बद्दल भाष्य करतांना

भयहीन जगण्यात

प्रत्येकाच्या मनात हिरवं रोप

जिवंत राहील,

जे दुसऱ्याला जगवील

यालाच धर्म म्हटलं तर…?

अशी सोपी पण विचार करायला लावणारी कविता नव्याने आपल्याला आपल्याकडे बघायला शिकवते

चिमण्यांना हुसकावून

कावळ्यांनी घर केले

कावळ्यांना हुसकावून मग

बगळ्यांनी

अख्खे झाडच काबीज केले !

आता…

कावळे सैरभेर

चिमण्या दीशाहीन

बगळे स्वामी !

चिमण्यांनी पुन्हा एकदा उठाव केला

बगळ्यांनी प्रतिहल्ला केला

चिवचिवाट…कलकलाट..

फडफडाट…

यातून बरेच काही सांगून जाणारी जाणीव कवीला मांडायची आहे ती तुमच्या माझ्या पर्यंत येऊन पोहचते हे नक्की मृत्यू की सुटका ही अशीच एक भेदक कविता मनात कल्लोळ निर्माण करते वेग किती वाढला हे जाणून घेण्यासाठी वेग ही कविता जग किती जवळ आले आहे याची नोंद घेते,

चला, बोनसायांच्या जगात

चेह-याच्या शोधात

आता घरातून बाहेर पडताना

विश्वास वाटत नाही

की हा रस्ता…घरापर्यंत पुन्हा सोबत करेल…

मी माझा…अभिमन्यू बनवील?

हे वास्तव तुमचं – आमचं

या बोनसायांच्या जगात जग जवळ आले,

तुम्ही आम्ही कुठे कशासाठी कुणासाठी धावतो आहोत,

त्याचा शेवट काय?

आपण किती ठेंगणे झालोत,

आभाळाला आपण हात लावू शकत नाही,

प्रत्येकाच स्वतंत्र आभाळ स्वतःपुरत ही खुजी माणसं मनाने कधी मोठी होणर सार्वभौम आपण का नाही होत?

आपला बोनसाय झालाय हे मान्य करायला हवेच

घुशींचे काय करायचे?

हे घर…घराच्या भिंती

संरक्षणाच्या आहेत,पण…

घरच्या चोरांचे काय करायचे

हे नाक…श्वास घेण्यासाठी

पण नाकात वेसण घालणाऱ्या हातांचे काय करायचे?

हा वारा…जगण्याची आस देणारा

पण त्यात लपलेल्या

जीवघेण्या वादळांचे काय करायचे?

ही झाडं,पानं,फुलं,

आभाळ… माती

रानभर पसरलेली नाती

ही सगळी आपलीच !

 पण सगळीकडे लागलेल्या

घुशींचे काय करायचे?

ही समर्पक कविता अधिक बोलूच देत नाही, हीच अवस्था घर दार गल्लीत नगरात,राज्यात देशात आणि कधीकधी मनातही याचं काय करायचे हा प्रश्न याची उत्तरे शोधायला हवीत… जो जे वांछिल तो ते लाहो…. या कवितेत आपण साफ उघडे पडतो, तर सत्ता या कवितेत सत्तेचे सारे चेहरे डोळ्यासमोर येतात

काळ्या दगडावरची रेघ

तुम्ही द्रोणाचार्य असलात,तरी आम्ही एकलव्य नाही

तुम्ही उध्वस्त केलीत आमची स्वप्ने,पण-

माळरनावरही फुलं फुलतात..हे लिहून ठेवा !

ही भिमगर्जनाच आहे सत्व,नीतीनिष्ठ आणि सच्च्या मातीवर विश्वास असणाऱ्या मानवतेची प्रार्थना म्हणणा-या माणसांची, निसर्ग कवितेच्या वाटेवर नीलम माणगावे तितक्याच संथपणे निसर्गाच्या होऊन जातात तिथल्या विरोधाभासाचे,तर कधीकधी तिथल्या तरंगाच्या परागाच्या गोष्टी सांगतात

खूप पेरलेले…

उगवले काहीच नाही

कधीच नव्हते पेरले,त्यांनीच केली घाई

पोळपाटाला पानं..लाटण्याला आली फुलं

हिरवी झाडं कालबाह्य…

कारखान्यात पिकूलागली फळं

आता मातीने करावे काय

कसायाला विकली गाय

कुठं कोल्ड्रिंक धरून ठेवत नाही साय…

हे समजून घ्यायची गरज आहे केवळ शब्दांवर नव्हे तर त्याच्या मागील तगमग निसर्ग -हास होत चाललेला अक्रोशच प्रगट करतो आहे

झाडं म्हणजे इतिहासाची पाळंमुळं

भविष्याचा वेध

कु-हाडीवर कधी करत नाहीत क्रोध

हाच शांतीचा शोध !

ही निसर्ग आणि मन शांती अनुभवायला हवी त्यासाठी झाडांचे पानांचे फुलांचे होऊन जायला हवे आपल्या माणसांच्या चित्रविचित्र वागण्याने म्युझियममध्ये ऊन वारा पाऊस ठेवायला हवा असे आपल्या कवितेत कवयत्री म्हणतात म्हणजे आपण कुठे आहोत याचा विचार करायला हवा,

ऐ क गं गे

या सदरात

खरंच गंगे

अंधारून आलं की वाटतं

आपल्या डायरीतलं एक पान गळून गेलं

पण उगवतीला वाटतं

अरेच्या ! आपल्याला तर एक नवं पानं फुटलं

हा आशावाद नेहमी आपल्या जवळ पाहिजे, परंतु आपल्याला जाणीव ही पाहिजे भोवतालची

गंगे

हीच तर नव्हे

नव्या युगाची कमाई?

कुठला बाप…

कुठली आई

गावागावातली

खचू लागलीय भुई !

अशी जाणीवपूर्वक जाणीव करून देणारी सर्व घटकांच्या सूक्ष्म प्रतिबिंब उतरत गेलेल कधी हळूवार,कधी भेदक,कधी रोखठोक सवाल बनून अनेक अंगानी भाष्य करणारी चिंतनशील,तर कुठे निर्देश करणारी तर कुठे नोंद घ्यायला हवी अशी कवितेची भुई अधिक समृद्ध करणारी कविता नीलम माणगावे यांची नव्या संग्रहाच्या निमित्ताने भेटीस आली आहे त्याचे स्वागत आहे हा सुंदर देखणा कविता संग्रह आपल्या संग्रही असावा असाच आहे,

या मधील अनेक कविता स्पूट स्वरूपात तर काही दिर्घ अशा आहेत, त्या आपल्या विषयाशी घट्ट नाते सांगणाऱ्या आहेत अशी जात, धर्म, कर्म, मर्मभेदी वास्तव अवास्तव वाढलेल्या माणूसपण सुटू पाहणाऱ्या गोष्टीवर भाष्य करणारी कविता आपली होऊन जाते.

नीलमताई माणगावे या संग्रहातून अधिक व्यापक पध्दतीने समोर येतात त्यांची कविता निश्चितच ठळकपणे नोंद घेण्यासारखी आहे.

 

संपर्क – सुश्री नीलम माणगावे, जयसिंगपूर, जिल्हा कोल्हापूर, मो  9421200421

© श्री अभिजीत पाटील

सांगली

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares
image_print