मराठी साहित्य – विविधा ☆ भाकरीयन … भाग पहिला ☆ सौ. सुचित्रा पवार

सौ. सुचित्रा पवार

?  विविधा  ?

☆ भाकरीयन … भाग पहिला ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

‘अरे संसार संसार जसा तवा चुल्हावर

        आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर.’

भाकरीचे उदाहरण देऊन संसाराचा सार्थ अनुभव बहिणाबाईंनी सांगितलाय. भाकरी हवी असेल तर त्यासाठी तव्याचे चटके, चुलीची धग सहन करायलाच हवी. कोणतीही इच्छित गोष्ट सहज प्राप्त होत नाही असेच बहिणाबाईंना सुचवायचे आहे. सुख हवे असेल तर दुःख झेलावे लागते,हिरवळ हवी असेल तर उन्हातानातून चालावे लागते,परमेश्वरभेट हवी असेल तर कठोर तपश्चर्या करावी लागते, मोह मायेपासून अलिप्त रहावे लागते. थोडक्यात एखादी गोष्ट विनासायास मिळाली की तिचे महत्व रहात नाही मात्र तीच वस्तू प्रयत्नातून,परिश्रमातून मिळाली असेल तर तिचा आनंद अवर्णनीय तर असतोच पण चिरंतर देखील असतो.

एखादी माऊली एकाग्र होऊन चटचट भाकरी थापते आणि प्रत्येक भाकरी टम्म फुगते.चुलीवरच्या त्या भाकरींचा ढीग आपण भान हरपून पहातो आणि तिच्या कौशल्याचे मनातून कौतुक करतो,किती छान वाटते आपल्याला!पण तिने हे कौशल्य आत्मसात करायला बराच वेळ घालवलेला असतो,निरीक्षण,प्रयोगातून आणि सरावातून हे कौशल्य तिला सहज प्राप्त होते. ‘Practice makes man perfect’ एखाद्या गोष्टीच्या सरावाने माणूस त्यात अव्वल होतो.

तरीही भाकरी करायला शिकण्यापासून ती परफेक्ट जमणे आणि सराव होणे ही तशी किचकटच प्रक्रिया आहे.चांगली भाकरी जमणे हे करणारीच्या हातोटीवर तर अवलंबून आहेच पण बाकीच्या गोष्टी पण त्यास कारणीभूत असतात.

खरे तर चांगल्या पिठापासूनच भाकरीची सुरुवात होते.गिरणीवर पीठ कसे दिले?यावर चांगल्या भाकरीची यशस्वीता अवलंबून असते.ज्वारी खूप जुनी असेल किंवा पावसात भिजलेली असेल तर पीठ वसवसते आणि भाकरी थापता येत नाही,कितीही पट्टीची सुगरण असली तरीही!

गिरणीत गव्हाच्या किंवा डाळीच्या दळणावर ज्वारी दळून दिली असेल तरीही भाकरी तव्याला चिकटते किंवा भाकरी डागलते.आजकाल बऱ्याच ठिकाणी ज्वारीची वेगळी आणि गव्हाची वेगळी गिरण असते त्यामुळं ती समस्या नसते मात्र ग्रामीण भागात अजूनही एकच गिरणी सगळ्या दळणाला वापरली जाते.हल्ली भाकरी गॅसवर हेंदालीयमच्या तव्यात भाजली जाते त्यामुळं भाकरीला सर्व बाजूने हवी तशी आच देऊन भाकरी चांगली करता येते.त्याचबरोबर आता पहिल्यासारखी कसलीपण ज्वारी नसते,प्रतवारीनुसार व गुणवत्तेनुसार बाजारात ज्वारी मिळते व अशा ज्वारीची  भाकरी चांगलीच होते.एकूण काय तर हल्ली चांगली भाकरी यायला फारसे कष्ट पडत नाहीत किंवा नवशिकिला भाकरी लगेचच जमू लागते शिवाय हल्लीच्या मुलींना आत्मविश्वास खूपच आहे कारण काही बिघडले,चुकले किंवा पीठ,भाकरी वाया गेली तरी घरचे रागवत नाहीत.त्यामुळं थोड्याशा सरावाने तिला चांगल्या भाकरी जमू लागतात.पण आमच्या लहानपणी आम्ही मुळाक्षरापासून शब्द शिकण्यासारखे भाकरी करायला शिकलो.

सर्वसाधारण वय वर्षे बारा किंवा अगोदरच भाकरी करायला आली पाहिजे असा अलिखित दंडक होता. स्वैपाक प्रथम, शाळा दुय्यम होती, त्यामुळं तितक्या वर्षाची मुलगी झाली की लगेच कुणीपन घरात आले की लगेच पोरीला बघून विचारायचे,’स्वैपाक पाणी येतोय की नाही अजून?’ मग येत असला की कौतुक व्हायचं, नसला येत की नावे ठेवत, त्यामुळं आपल्याला स्वैपाक आला पाहिजे ही आंतरिक हुरहूर आणि तळमळ प्रत्येकीला असायची. पण एकदम भाकरी शिकणे किंवा नुसती भाकरी येण्यालाही महत्व नव्हतं;तत्पूर्वी घरातील बारीक सारिक कामे पहिली यायला हवीत, ती अगदी पहिली दुसरीपासून सुरू होत. झाडलोट, राखकेर भरणे, भाज्या निवडणे,पाणी भरणे, चुलीपुढं जळण आणून ठेवणे, दुकानातून काहीबाही घरच्या गरजेच्या वस्तू आणणे,आई स्वैपाक करताना तिथंच बसून हाताखाली लागणाऱ्या वस्तू देणे आणि हे करतच स्वैपाकाचे म्हणजेच भाजी कशी फोडणीला टाकायची, आमटी कशी करायची, कशात काय घालायचं आणि कशात काय घालायचे नाही? याचे अचूक निरीक्षण करायचे त्याचबरोबर आई, आजी किंवा घरातील मोठी स्त्री भाकरी कशी करते हेही स्वैपाकघरात बसून बघावे लागे. यातूनच मग स्वैपाकाचे तंत्र शिकता यायचे आणि गोडीही लागायची.अधे मध्ये एखादा छोटा गोळा घेऊन भाकरी थापता येते का याचे प्रात्यक्षिक करून बघायला मिळायचे.

अचानक एखादे दिवशी कोणीतरी म्हणे,’आज भाकरीला बस.’ त्यावेळी आनंद ही होई आणि भीतीही वाटे, भाकरी जमणार का नाही? प्रथम चुलीतला जाळ एकसारखा करायचा, लोखंडी जडशीळ तवा चुलीवर ठेवायचा, त्यात उसुळला (उथवणी) भाकरीच्या अंदाजाने पाणी ओतायचे. परातीत पिठाचे गोल आळे करायचे, त्यात तव्यातलं उकळलेले पाणी ओतायचे.उलथण्याने पीठ हळुवार कालवून बाजूला सारायच. तोपर्यंत तिकडं हलक्या बोटांनी चुलीचा जाळ एकसारखा करायचा,चार काटक्या आत सारून फडक्याला बोटं पुसून पीठ मळायला सुरुवात करायची.इथंच हाताला पहिला चटका बसतो.

क्रमशः….

© सौ.सुचित्रा पवार

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ रावण- दहन ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे

श्री उदय गोपीनाथ पोवळे

? विविधा ?

☆ रावण – दहन ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆ 

रावणाचे  मनोगत 

दसऱ्याच्या दिवशी रावणाला जाळताना हजारोंनी माणसं जमली होती. त्यामध्ये कितीतरी रावणच होते. एक दोघे राम होते पण हतबलतेने ते गप्प होते. लढवय्या राम मात्र एकही नव्हता. तो रामराज्यात फक्त सीतेच्या वाटेला आला होता. 

जळताना रावणाने मोठयाने ओरडून सांगितले—-” बघा तुमच्याच आतमध्ये डोकावून आणि करा हिशोब स्वतःच्या चारित्र्याचा.” 

हो.. हो, केला आहे मी गुन्हा सीतेच्या अपहरणाचा.– पण मी कधीच मर्यादेच्या सीमा नाही ओलांडल्या. कायम विचार केला तिच्या मानाचा. 

तुम्हीतर दिवसाढवळ्या नुसत्या वखवखलेल्या नजरेनेच अब्रूचे लचके तोडता, वर दिमाखाने मिरवत, सभ्यपणाचा बुरखा लावून मलाच जाळता. 

हो.. हो, केला आहे मी गुन्हा सीतेच्या अपहरणाचा.– पण मी कधीच विचार नाही केला तिच्या अत्याचाराचा.– निर्भयासारख्या कितीजणींना भक्ष्य केलय तू मानवा, कळस झाला आहे तुझ्या अविचाराचा.– विचार कर तुझ्यातल्या राक्षसाला जाळायचा. 

हो.. हो, केला आहे मी गुन्हा सीतेच्या अपहरणाचा– पण मी कधीच विचार नाही केला जबरदस्तीचा. 

तुझ्यासारखा तूच नीच, जो जोर दाखवितो अबलांवरती आपल्या बळाचा. जरा तरी विचार कर त्यांच्या नाजूक मनाचा. 

हो..हो, केला आहे मी गुन्हा सीतेच्या अपहरणाचा– पण मी कधीच विचार नाही केला आक्रमकतेचा. 

तू तर मान नाही राखत कुठच्याच स्त्रीचा, मानवा कधीतरी तूच खून कर तुझ्यातल्या दानवाचा. 

हो..हो, केला आहे मी गुन्हा सीतेच्या अपहरणाचा—-पण कधीच  नाही विचार केला तिच्या अपमानाचा. 

अरे मला जाळण्याआधी मानवा जरा स्वतःला विचार, हुंड्याच्या मोहापायी तू किती सीता जाळल्या आणि वंशाच्या दिवट्यासाठी गर्भात किती कळ्या मारल्या. 

हो..हो, केला आहे मी गुन्हा सीतेच्या अपहरणाचा— पण कधीच नाही विचार केला बीभत्सपणाचा.– 

तुम्ही तर करता चुराडा, न उमललेल्या फुलांचा आणि त्यांच्या भावी स्वप्नांचा. 

मानवा लाज बाळग नाव घ्यायला मर्यादा पुरुषाचे.

मानवा लाज बाळग नाव घ्यायला मर्यादा पुरुषाचे.—

कधी न कधी तुलाही भोगायला लागेल फळ आपल्या कर्माचे.

हो.. हो..शंभरदा सांगेन, हो.. हो.. हो. शंभरदा सांगेन,– केला आहे मी गुन्हा सीतेच्या अपहरणाचा —-कारण मला रामाकडूनच पाहिजे होता मोक्ष मानाचा. 

मानवा तूच प्रयत्न कर स्वतःचे चारित्र्य सुधारण्याचा, मला जाळताना विचार कर–

स्वतःतला मी जाळण्याचा. 

स्वतःतला मी जाळण्याचा. 

स्वतःतला मी जाळण्याचा. 

रावणाच्या मनोगताला दिलेले मानवाचे उत्तर 

(दसऱ्याच्या दिवशी जळताना रावणाने मोठयाने ओरडून दिले स्पष्टीकरण आपल्या गुन्ह्याचे,  आणि मानवाला विचार करायला लावत  सांगितले-’ स्वतःतला मी जाळायला ‘-) 

त्यावर मानवाचे उत्तर ——–

हो.. हो, आहेत रावणा आमच्यामध्ये, वखवखलेल्या नजरेनेच अब्रूचे लचके तोडणारे,—-

पण त्याहूनही जास्त जण आहेत आपल्या जरबी नजरेनेच,  त्या समाजकंटकांना वठणीवर आणणारे.—- 

हो.. हो, आहेत रावणा आमच्यात, काही निर्भयासारख्याना भक्ष्य करणारे—- 

पण त्याहूनही कितीतरी जण आहेत त्यांच्यासारख्या राक्षसांना लक्ष्य करणारे.—-  

हो.. हो, आहेत रावणा आमच्यात, काही जण अबलांवरती जबरदस्ती करणारे—–

पण अनेक जण आहेत स्वतःच्या बळावरती, त्यांना फाशी देऊन जमीनदोस्त करणारे—- 

हो. हो, आहेत रावणा आमच्यात, काहीजण स्त्रीचा अपमान करणारे,—-

पण अनेक भारतपुत्र आहेत, सीमेवर आमच्याच माय लेकींची रक्षा करणारे—-

रावणा तू नको विचार करूस, 

रावणा…… तू नको विचार करुस—-  

आमच्यात राहून तुझ्या नातलगांनी हुंडयापायी किती सीता जाळल्या आणि गर्भात किती कळ्या मारल्या—–

त्याही पेक्षा जास्त आम्ही कितीतरी सीता वाचवल्या आणि उमलत्या कळ्यांना लक्ष्मी मानल्या.—-

रावणा,२६/११ च्या हल्ल्यात तुझ्यासारख्याच नराधमानी निरागसांचा नरसंहार केला—- 

तेव्हा आमच्यातल्याच असंख्य रामांनी सामोरे जाऊन त्यांचाच खात्मा केला—– 

रावणा लाज बाळग, 

रावणा लाज बाळग—-

स्वतःच्या गुन्ह्याची कबुली देऊन, वर गमज्या मारतोस—

सीतेच्या अपहरणाचा गुन्हा करून–

मोक्ष रामाकडून मानाचा मागतोस—- 

तुझ्यासारख्या असंख्य रावणांना मारायला आता नाही गरज आमच्यातल्या रामाची,

तुझ्यासारख्या असंख्य दानवांना जाळायला आता—-

झाली आहे नजर सक्षम— सीतेची.

झाली आहे नजर सक्षम— सीतेची.

झाली आहे नजर सक्षम— सीतेची.

© श्री उदय गोपीनाथ पोवळे

मो. नं. ९८९२९५७००५. 

ठाणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ उदे ग अंबे उदे भाग ३ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

? विविधा ?

☆ उदे ग अंबे उदे  भाग ३ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

(मागील भागा. दसरा हा देवीच्या विजयोत्सवाचा दिवस. भागात आपण पहिले – . दसरा हा देवीच्या विजयोत्सवाचा दिवस. )

या घटनेचा किंवा  पुराणकथेचा, मिथकाचा, लौकिक व्यवहाराशी अनुबंध कसा जोडला जातो,  तेही पहाणे योग्य होईल. नवरात्रात अनेक घरातून कुलाचार असा आहे, की नवरात्राच्या आदल्या दिवशी देवांची पूजा करून ते पेटीत,  डब्यात घालून ठेवतात. पुढे नऊ दिवस देवांची पूजा केली जात नाही. त्याचे कारण एकीला विचारले असता कळले, की देव या काळात तपश्चर्येला बसलेले असतात, म्हणून त्यांना हलवायचे नाही. त्यासाठी त्यांची पूजा करायची नाही. म्हणजे ते हलवले, तर त्यांच्या तपश्चर्येत विघ्न येईल. ‘आता देव बसणार’, वा ‘देव बसले’ असा शब्दप्रयोग व्यवहारात अनेकदा ऐकला होता, पण त्याचा खरा अर्थ तेव्हा कळला.

महिषासुरमर्दिनीने अहोरात्र नऊ दिवस महिषासुराशी युद्ध करून, त्याला आणि धूम्रवर्ण,  शंभु-निशुंभ इ. अनेक दैत्यांचा वध करून स्वर्ग आणि पृथ्वी भयमुक्त केली, पण लोकाचार बघितला, तर लक्षात येतं,  की नवरात्रोत्सव हा देवीच्या केवळ शक्तिरुपाचा उत्सव नाही. तो तिच्या मातृरुपाचा,  तिच्या सृजन शक्तीचाही उत्सव आहे.   नवरात्रात अनेक घरातून देव बसतात,  म्हणजे वर सांगितल्याप्रमाणे तपश्चर्येलाबसतात. त्या काळात त्यांची पूजा होत नाही. पण त्याचवेळी अनेक घरातून विशेषत: कृषीसंस्कृतीशी संबंधित घरातून घटस्थापना केली जाते. म्हणजे पत्रावळीवर माती पसरून त्यात नवविधा बियाणे रुजत घातले जाते. वर मातीचा घट ठेवून त्यात पाणी घातले जाते. शेजारी दिवा ठेवला जातो. त्यावर रोज एक फुलांची माळ चढवून घटाची पूजा केली जाते. हे म्हणजे भूदेवीची पूजा,  उपासना असते. इथे घरात प्रतिकात्मक शेतच तयार केले जाते. घट हा पाण्याच्या स्त्रोताचे प्रतिक आहे, तर दिवा सूर्याचे. पीक उगवून येण्यासाठी माती,  पाणी,  सूर्यप्रकाशाची गरज असते. ते इथे प्रतिकात्मक स्वरुपात आणले जाते. मातीच्या घटातील पाणी पाझरते. बियाणे रुजतात. अंकुरतात. हळूहळू वाढू लागतात. दसर्‍याच्या दिवशी सोने म्हणून ते अंकूर कापून सोने म्हणून देण्याची प्रथा अनेक घरातून आहे. कृषी संस्कृतीचे धान्य हेच धन,  हेच सोने नाही का? या प्रथेप्रमाणे लक्षात येते,  नवरात्रातील देवीचा उत्सव हा तिच्या मातृरुपाचा उत्सव असतो.

आई जन्मदात्री असते. पालनकर्ती,  रक्षणकर्तीही असते. घटस्थापनेच्या रुपाने तिच्या सृजन शक्तीची उपासना केली जाते. ती पालनकर्तीही असते. नवरात्रात विविध पक्वान्ने केली जातात,  आणि शरिराचे पोषण अधीक अस्वाद्य रुपात होते. पण पोषण केवळ शरिराचेच होऊन भागणार नाही. मनाचेही व्हावयास हवे. नवरात्रीच्या निमित्ताने भजन, कीर्तन, प्रवचन,  व्याख्याने,  गीत-नृत्य,  तसेच अनेकविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. या सार्‍यातून मनाचे पोषण होते. व्यक्तिमत्वाचा विकास होतो. आई रक्षणकर्ती असते. शत्रू नेहमी बाहेरचेच असतात,  असे नाही. आपले स्वभाव दोष हेही आपले शत्रूच. खोटे बोलणे,  अहंकार,  द्वेष,  मत्सर असे किती तरी स्वभावदोष आपले व्यक्तिमत्व काजळून टाकतात. आपल्या मुलात हे दोष रुजू, वाढू नयेत,  म्हणून आई प्रयत्नशील असते. मुलांना प्रसंगी रागावूनसुद्धा त्यांच्यातील असले दोष दूर करण्याचा प्रयत्न करते.  नवरात्रातील भजन, कीर्तन, प्रवचन, व्याख्याने, इत्यादीं मधून देखील त्याची शिकवण दिली जाते. सुसंस्कार करण्याचा प्रयत्न होतो.

अशा तर्‍हेने जन्मदात्री,  पालनकर्ती,  रक्षणकर्ती या तिन्ही दृष्टीने नवरात्रातील देवीची उपासना ही तिच्या मातृरुपाचीही उपासना असते. नवरात्रात अनेक घरातूनपिठा-मिठाचा जोगवा मागायची चाल आहे. एकनाथांनी एक अतिशय सुंदर रुपकात्मक ‘जोगवा’ लिहिला आहे. नि:संग होऊन वारीला निघालेली ही देवीची उपासक वर सांगतलेले स्वभाव दोष त्यजून वारीला कशी जाते, हे बघण्यासारखे आहे. त्यांनी लिहिले आहे,

अनादि निर्गुण प्रगटली भवानी । मोहमहिषासुरमर्दनालागुनी।

त्रिविध तापाची करावया झाडणी । भक्तालागी तू पावसी निर्वाणी।

☆ ☆ ☆ ☆ ☆ 

नवविध भक्तीचं भक्तीचं नवरात्र ।  धरोनी सद्भाव अंतरीचा मित्र।

ओटी भरोनी मागेन ज्ञानपुत्र । दंभ सासरा सांडेन कुपात्र ।।

आता मी साजणी झाले गे नि:संग। विकल्प नवर्‍याचा सोडियेला संग।

केला मोकळा मारग सुरंग । आईचा जोगवा जोगवा मागेन ।।

समाप्त

© श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चं म त ग ! मोरूचा आगाऊ दसरा ☆ श्री प्रमोद वामन वर्तक

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

? चं म त ग ! ⭐ श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

? ? मोरूचा आगाऊ दसरा ?

“नमस्कार पंत !”

“नमस्कार, नमस्कार ! काय रे मोरू, आज बरेच दिवसांनी शुक्राची चांदणी…..”

“काय पंत, मी तुम्हाला चांदणी वाटलो की काय ?”

“सॉरी सॉरी मोरू, अरे पेपर मधे तो आपला चांदणी बार……”

“आपला चांदणी बार ?”

“अरे तसं म्हणायची एक पद्धत असते मोरू, आपला या शब्दाचा अर्थ तसा शब्दशः घ्यायचा नसतो !”

“ते माहित आहे मला, पण तुमच्या त्या चांदणी बारच काय ?”

“मोऱ्या, माझा कुठला आलाय चांदणी बार, आम्ही सगळे…… “

“अरे हो, मी विसरलोच पंत, तुमचे ‘खाऊ पिऊ मजा करू’ हे पेन्शनरांचे मित्र मंडळ दर महिन्याला वेगवेगळ्या बार मधे जाते ना !”

“अरे हळू बोल गाढवा, हिच्या कानावर गेलं, तर आत्ता दिवसा ढवळ्या मला चांदण्या दाखवायला कमी करणार नाही ही !”

“ओके, पण त्या चांदणी बारच काय सांगत होतात तुम्ही पंत ?”

“काही नाही रे मोरू, त्या बारची एक बातमी आली आहे पेपरात, ती वाचत असतांना नेमका तू टपकलास, म्हणून चुकून तुला चांदणी म्हटलं एव्हढच !”

“कसली बातमी पंत, हॅपी अवर्सचा टाइम वाढवला की काय ?”

“मोरू एक काम कर, आता घरी जाताना हा पेपर घेवून जा आणि सावकाश चांदण्या बघत… सॉरी सॉरी.. सावकाश सगळ्या बातम्या वाचून, संध्याकाळी आठवणीने तो परत आणून दे ! आणि आता मला सांग इतक्या दिवसांनी, सकाळी सकाळी शुचिर्भूत होऊन किमर्थ आगमन ?”

“काही नाही पंत, सोनं द्यायला आलो होतो !”

“कमाल आहे तुझी मोरू, तू दुबईला गेलास कधी आणि आलास कधी ? चाळीत कोणाला पत्ता नाही लागू दिलास !”

“तसं नाही पंत, मी काय म्हणतोय ते जरा…. “

“आणि तुझ ही बरोबरच आहे म्हणा, तिकडे जायला वेळ तो कितीसा लागतो, फक्त अडीच तासाचा काय तो प्रवास ! अरे इथे हल्ली लोकांना दादर ते वाशी जायला तीन….. “

“पंत, सोनं काय फक्त दुबईला मिळत ?”

“तसंच काही नाही, पण दुबईला स्वस्त असतं असं म्हणतात आणि सध्या IPL पण चालू आहे ना, म्हणून म्हटलं तू एका दगडात दोन….. “

“पंत, खरं सोनं देण्या इतका मी अजून ‘सुरेश अंधानी’ सारखा श्रीमंत नाही झालो !”

“आज ना उद्या होशील मोरू, माझे आशीर्वाद आहेत तुझ्या पाठीशी !”

“पंत, नुसते आशीर्वाद असून चालत नाहीत, त्यासाठी कापूस  बाजारात उभे राहून, सूत गुंड्या विकणाऱ्या बापाच्या पोटी, मोठा मुलगा म्हणून जन्मावं लागत, त्याला एक धाकटा निक्कमा भाऊ असावा लागतो, जो परदेशातल्या भर कोर्टात हात वर करून, मी कफल्लक आहे, असं अर्मानी सूट बूट घालून छाती ठोक पणे सांगू शकेल आणि…. “

“अरे मोरू, तू सोन्या वरून एकदम अँटिलीया… सॉरी सॉरी… भलत्याच सत्तावीस मजली अँटिनावर चढलास की !”

“पंत, आता तुम्ही विषयच असा काढलात, मग मी तरी किती वेळ …. “

“बरं बरं, पण तू ते सोनं का काय ते…. “

“हां पंत, हे घ्या सोनं, नमस्कार करतो !”

“मोरू, अरे ही तर आपट्याची पानं, यांना सोन्याचा मान दसऱ्याच्या…… “

“दिवशी, ठावूक आहे मला पंत !”

“आणि अजून नवरात्र यायचे आहे, संपायचे आहे आणि तू आत्ता पासूनच हे का वाटत फिरतोयसं ?”

“अहो पंत, त्या दिवशी यांची किंमत खऱ्या सोन्यापेक्षा कितीतरी जास्त असते ना, म्हणून !”

“धन्य, धन्य आहे तुझी मोरू !”

© श्री प्रमोद वामन वर्तक

(सिंगापूर) +6594708959

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ उदे ग अंबे उदे भाग २ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

? विविधा ?

☆ उदे ग अंबे उदे  भाग २ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

 ( मागील भागात आपण पहिले –  तिथे जाऊन त्यांनी विष्णू हाच हविर्भागदेण्यासाठी योग्य आहे,  असे सांगितले. तेव्हापासून भक्तवत्सलांछनहे बिरुद विष्णूदेवाने अलंकाराप्रमाणे मिरवले आहे. आता इथून पुढे )

भृगुऋषी निघून गेले, पण लक्ष्मीला मात्र त्यांच्या वर्तनाचा राग आला. ती म्हणाली, ‘तुमच्या हृदयातील माझ्या निवासावर,  आलिंगन स्थानावरच त्यांनी लाथ मारली. हा माझा घोर अपमान आहे. तुम्ही त्यांना काहीही न बोलता, त्यांचे आगत-स्वागत केलेत. पण मला हे सहन होत नाही. मी आपल्या सान्निध्याचा व या वैकुंठाचा त्याग करून, परमदिव्य अशा महाक्षेत्री करविरास ( म्हणजेच  कोल्हपुरास) जाते. विष्णूने तिला खूप समजावण्याचा प्रयत्न केला. पण तिने ऐकले नाही. ( देव-देवताही माणसांसारख्याच रुसतात,  फुगतात तर! – देव,  दानवा नरे निर्मिले – केशवसुत ).

पुढचा कथा भाग असा,  लक्ष्मी गेल्यानंतर विष्णूला चैन पडेना. तिच्या लाभासाठी त्याने दहा वर्षे तपश्चर्या केली. मग नंतर आकाशवाणी झाली, की सुवर्णमुखरी नदीच्या उत्तर तिरावर तपोभूमी तीर्थ स्थापन कर. तिथे देवलोकातील दिव्य कमळे,  नाना परिमळाचे वृक्ष लाव. तिथे १२ वर्षे तप कर. त्याप्रमाणे विष्णूने सरोवर निर्माण केले. वृक्ष लावले व तपश्चर्या केली. तिथे पद्मतीर्थात लक्ष्मी प्रगटली. तीच पदमवती होय. तिने कल्हार (कृष्णकमळ) फुलांची माळ विष्णूच्या गळ्यात घातली. विष्णूने त्यानंतर पुष्करणी जवळिल शेषाचलावर वस्तव्य केले. हे पुढे वेंकटगिरी या नावाने प्रसिद्धीस आले. इथे वेंकटेशाच्या हृदयावर लक्ष्मीची मूर्ती आहे, पण त्याच्याशेजारी ना लक्ष्मी आहे, ना पद्मावती. पद्मावतीचे  मंदीर खाली सरोवराजवळ आहे. लक्ष्मीचा निवास कोल्हापुरी आहे. त्यामुळे कोल्हापूर हे वैष्णव क्षेत्रही झाले. जनमानसावरील हा ठसा स्पष्ट आणि गडद होण्याच्या दृष्टीने,  पुढे नवरात्रात तिरुपती देवस्थानहून महालक्ष्मीसाठी किती तरी लाखांचे शालूही येऊ लागले. ही प्रथा कधीपासून सुरू झाली, हेही अभ्यासकांनी अभ्यासायला हरकत नाही.

सर्वसामान्य श्रद्धाळू भाविकांच्या दृष्टीने मात्र देवी जगदंबा,  मग ती पार्वती असो,  की लक्ष्मी,  जगाची माता आहे. शक्तिमान आहे. भक्तांच्या  मनोकामना  पूर्ण करणारी आहे. दुष्टांचे निर्दाळण करणारी आहे. एवढेच त्यांना पुरेसे असते.

देवीने अनेक असुरांचा नाश केला. शुंभ-निशुंभ, धूम्रवर्ण, रक्तबीज आणखी किती तरी… देवी महात्म्यात त्याचे वर्णन आहे. प्राचीन काळी कोलासुर नावाचा दैत्य स्त्रियांना फार त्रास द्यायचा. तेव्हा सर्व स्त्रियांनी ब्रह्मा, विष्णू, महेश यांची प्रर्थना केली. मग त्यांनी कोलासुराचा नाश करण्याचे कार्य महालक्ष्मीवर सोपवले. महालक्ष्मीने कोलासुराला मारून लोकांना संकटमुक्त केले. या घटनेवरून त्या नगरीला कोल्हापूर हे नाव प्राप्त झाले. कोलासुर म्हणजे रानडुक्कर. ते शेतीची नासधूस करते. देवीने त्याला मारून शेतीचे रक्षण केले. म्हणून महालक्ष्मी ही समृद्धीची देवताही मानली जाते.

दुर्गा, महिषासुरमर्दिनी हेही त्या महालक्ष्मीचेच रूप. त्याबद्दल अशी कथा सांगितली जाते, की देव-दानवांचा संग्राम झाला. त्यात असुरांचा जय झाला. असुरांचा राजा महिषासुर इंद्र झाला. त्याने देवांचे अधिकार हिरावून घेतले. देव दीन झाले. ते ब्रह्मदेवाकडे गेले व त्याच्यासह शंकर आणि विष्णू यांच्याकडे गेले.  ते ऐकून शंकर क्रोधित झाले. त्यांच्यामुखापासून तेज निघाले, तसेच सर्व देवांच्या मुखातून तेज निघाले.  ते तेज एकत्र झाले. ते तेज एकत्र मिळून एक नारी झाली. पुढे देवी महात्म्यात म्हंटले आहे, ‘तीच भवानी जगदंबा । त्रैलोक्याची जननी अंबा । जी हरिहराते स्वयंभा। उत्पन्न करिती जाहली । म्हणजे, जिने देवांना उ्पन्न केले,  त्यांच्या तेजापासून तिनेभक्तकार्यासाठीपुन्हा अवतार घेतला, असे वर्णन आहे. शंकराच्या तेजापासून तिचे मुख झाले. यमाच्या तेजापासून केस,  विष्णूच्या तेजापासू नबाहू,  अशाप्रकारे विविध देवांच्या तेजापाससून तिचे विविध अवयव बनले. नंतर  सतत नऊ दिवस व नऊ रात्री तिने महिषासुर व असुर सैन्याशी युद्ध केले आणि महिषासुराचा व सर्व असुर सैन्याचा वध केला आणि देवांना आणि पृथ्वीला असुरांच्या तावडीतून मुक्त केले. या कालावधीत देवही तपश्चर्येला बसले होते. आपल्या तपाचे पुण्य त्यांनी देवीला अर्पण केले. अखेर नऊ दिवस आणि नऊ रात्रींच्या तुंबळ युद्धानंतर महिषासुराचा वध झाला. दसरा हा देवीच्या विजयोत्सवाचा दिवस.

क्रमशः......

© श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ उदे ग अंबे उदे  भाग १ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

? विविधा ?

☆ उदे ग अंबे उदे  भाग १ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

अश्विन महिना लागला, की शुद्ध प्रतिपदेपासून  नवमीपर्यंत नऊ दिवस, आणि हो, नऊ रात्रीसुद्धा नवरात्रोत्सवाची धामधूम सुरू होते. नवरात्रोत्सव हा देवीचा उत्सव. महाराष्ट्रातीलच नव्हे, तर अखील भारतातील देवीस्थाने गजबजून जातात. देवीच्या मंदिरातून श्रद्धाळू भाविकांची अपार गर्दी उसळते. ‘उदे ग अंबे  उदे’  म्हणत देवीच्या उदयाची आकांक्षा बाळगली जाते. तिला आवाहन केलं जातं.

आदिशक्तीच्या मातृस्वरुपाला अंबा,  जगदंबा़, किंवा अंबाभवानी म्हणतात. याच शक्तीने, प्रकृतीने,  निर्गुणाला चेतवून अखंड ब्रह्मांडाची निर्मिती केली. तीच जन्मदात्री,  धात्री, पालनकर्ती आणि रक्षणकर्तीही. हीच महालक्ष्मी,  महासरस्वती,  महाकाली या रुपांनी त्रिविध आणि त्रिगुणात्मक बनते. तिची नाना रुपे आहेत. तिला नाना नावांनी ओळखले जाते. तिची स्थाने जशी अनेक आहेत, तशीच तिच्याठायी मानवी मनाने वेगवेगळी सामर्थ्ये कल्पिली आहेत. भवानी,  रेणुका,  चामुंडा,  शांतादुर्गा,  पद्मावती, संतोषी, जोगेश्वरी,  शाकांबरी  ही त्यापैकीच काही नावे.

महालक्ष्मी हे जगदंबेचेच एक रूप आहे. महाराष्ट्रात कोल्हापूर,  मुंबई,  केळशी,  आडिवरे, कुडाळ, वाई इ. ठिकाणी महालक्ष्मीची मंदिरे आहेत,  तथापि कोल्हापुरातील महालक्ष्मीच्या स्थानाचे महात्म्य खूप आहे. तिच्या नावाने पिठा-मिठाचा जोगवा’ मागत कोल्हापूरला जाताना भाविक महिला म्हणतात,

‘कोल्हापूरवासिनी ग अंबे दे दर्शन मजसी

तुझ्या कृपेने जाती लयाला पापांच्या राशी’

आपल्याला पिठा-मिठाचा जोगवा’ सत्वर’ घालायला ती सांगते. कारण तिला दूरवर कोल्हापूरला जायचय. देवीला बांगड्या,  हार-गजरे अर्पण करायचेत. साडी-चोळी नेसवून खण-नारळाने तिची ओटी भरायचीय. ती सौभाग्याची देवता आहे,  असा स्त्रियांचा विश्वास आहे. लोकमानसात हे विचार,  संस्कार,  श्रद्धा,  भावना खूप खोलवर रुजलेल्या आहेत.

कोल्हापूरवासिनी अंबाबाई, हे पार्वतीचं रूप, की लक्ष्मीचं, याबद्दल अभ्यासकांमध्ये मतभेद आहेत. पुराणकथा व अन्य ग्रांथिक आधार बघितले, तर ती शिवाची पार्वती आहे, तसेच विष्णूची लक्ष्मीही आहे, असे सांगणार्‍या कथा आपल्याला वाचायला मिळतात.

कोल्हापूर हे आद्य आणि महत्वाचं शक्तिीपीठ आहे. महत्वाच्या साडेतीन पीठातील ते पहिले महत्वाचे पीठ. या शक्तिपीठांबद्दल अशी कथा सांगितली जाते, की दक्ष प्रजापती आणि असिक्वीनी यांना जगदंबेच्या वरदानाने सती नावाची एक सर्वज्ञ व अवतारी कन्या झाली. तिने शंकराशी विवाह केला. दक्षाला ते पसंत नव्हते. पुढे दक्षराजाने एक यज्ञ केला. त्यात सतीचा अपमान झाला, म्हणून तिने यज्ञवुंâडात उडी घेतली. त्यामुळे शंकर संतप्त झाला. त्याने यज्ञकुंडातून अर्धवट जळलेले निष्प्राण शरीर बाहेर काढले व ते खांद्यावर टाकून त्याने तांडव सुरू केले. त्यामुळे सगळी पृथ्वी भयभीत झाली, तेव्हा नारायणाने शिवालायातून बाहे काढण्यासाठी आपल्या सुदर्शन चक्राने व धनुष्यबाणाने मागच्यामागे सतीच्या देहाचे अवयव तोडण्यास सुरुवातकेली. या पवित्र देहाचे अवयव पृथ्वीवर १०८ ठिकाणी पडले. तिथे  तिथे शक्तिपीठे निर्माण झाली. कोल्हापूर (किंवा  पूर्वी यालाच करवीर नगरी म्हणत) इथे सतीच्या हृदयापासूनचा वरचा भाग पडला. सर्व अवयवात मस्तक हे प्रधान,  त्यामुळे सर्व शक्तिीपीठात कोल्हापूर हे सर्वोच्च व आद्य शक्तिपीठ मानले जाते. दुसरे शक्तिपीठ म्हणजे तुळजापूरची भवानी. तिसरे म्हणजे माहूरची रेणुका व अर्धे पीठ म्हणजे वणीची सप्तशृंगनिवासिनी.

कोल्हापूरवासिनी अंबाबाई, हे लक्ष्मीचं, रूप आहे,  असं सांगणारी कथाही पुराणातआहे. एकदा काश्यपऋषी यज्ञ करत असताना, त्याचा हविर्भाग कुणाला अर्पण करणार असे नारदाने विचारले,  असता कोणती देवता यासाठी योग्य, असा विचार सुरू झाला. मग ते ठरण्याची जबाबदारी भृगु ऋषींवर टाकण्यात आली. ते प्रथम ब्रह्मलोकी गेले. नंतर कैलासावर शंकराकडे गेले, पण या दोघांनीही त्यांची दखल घेतली नाही. ते रागावून वैकुंठाला गेले. तिथेही विष्णू-लक्ष्मी बोलत होते. त्यांचे  काही भृगुऋषींकडे लक्ष गेले नाही. ते संतापले आणि  त्यांनी विष्णूच्या छातीवर लाथ मारली. पुढे विष्णुचे त्यांच्याकडे लक्ष गेले. त्यांनी ऋषींचे स्वागत केले आणि म्हणाले, ‘आपल्यासारख्या महात्म्याचे दर्शन मोठ्या पुण्याईने होते. माझ्या खडकासारख्या छातीवर लाथ मारल्याने आपले पाऊल दुखावले तर नाही ना?  बोला मीआपले काय प्रीयकरू?’ त्यांचा हा दिव्य भाव पाहून भृगुऋषींचा राग पळून गेला. त्यांनी आपल्या पावलाचे चिन्ह कायमचे छातीवर धारण करायला सांगितले व ते मृत्यूलोकी निघून गेले व तिथे जाऊन त्यांनी विष्णू हाच हविर्भागदेण्यासाठी योग्य आहे,  असे सांगितले. तेव्हापासून’ भक्तवत्सलांछन’ हे बिरुद विष्णूदेवाने अलंकाराप्रमाणे मिरवले आहे.

© श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ स्त्रियांमधील नवदुर्गेची रूपं ☆ सौ. मंजुषा सुधीर आफळे

सौ.मंजुषा सुधीर आफळे

?  विविधा ?

☆ स्त्रियांमधील नवदुर्गेची रूपं☆ सौ. मंजुषा सुधीर आफळे ☆ 

आजपासून नऊ दिवस, नऊ रात्री जगद्जननी, “जगदंबा” मातेचा उत्सव सुरू होत आहे. सर्वत्र तिच्या विविध रूपांची खूप श्रद्धेने पूजा केली जाते. सुमधुर स्तुति स्तोत्र गात तिला प्रसन्न करून घेऊ या. शिवशक्तीच्या कृपेनेच या विश्वात सर्व प्राणीमात्रांचा संसार सुरू आहे. तिचा गौरव, जागर करण्याने सर्वत्र नवाचेतना जागृत होते. त्यामुळे या पूजे कडे डोळसपणे पाहू या. नऊ दिवसांसाठी नऊ आदर्श संकल्प करू या. व ते सिद्धीस नेण्याचा मनापासून प्रयत्न करू या.

१) आपल्या आसपास कितीतरी सुबोध, सगुण संपन्न, सुविचारी, प्रेमळ स्त्रिया विविध क्षेत्रात वावरताना दिसतात. त्यांच्या गुणांचा गौरव करण्याचा निश्चय करू या. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊ या.

२) प्रत्येक स्त्री मध्ये माता पार्वती अंश रूपात सामावली आहे. याचा कधीही कोणत्याही स्त्रीला विसर न व्हावा.असा प्रयत्न करू या.

३)पीडित महिलांना त्यांच्या जीवन प्रवासात सोबत करू या. योग्य मार्गक्रमण, करण्यासाठी प्रोत्साहन देऊ या. धीर देऊ या.

४)वृद्ध स्त्रियांना हळुवार आधार देऊन, आनंदाने त्यांची सेवा करू या.

५) कुमारिकांच्या डोळ्यांतील सुंदर स्वप्न पूर्ण होण्यासाठी त्यांना सर्वतोपरी मदत करू या.

६) कष्टकरी महिलांना प्रेम व सन्मान देऊ या. त्यांच्या आरोग्याची काळजी घेऊ या. त्यांचा आत्मविश्वास वाढवू या.त्यांना आधार देऊ या.

७)गुरुस्थानी असलेल्या महिलां कडून चार चांगल्या गोष्टी शिकून घेऊ या.

८)निरागस मैत्रिणींच्या, बहिणींच्या प्रेमळ हाकेला प्रतिसाद देऊ त्यांची प्राधान्याने सोबत करू या.

९)विविध क्षेत्रात सर्वोच्च पातळीवर कार्यरत असणाऱ्या असणाऱ्या स्त्रियांचा जीवनप्रवास अभ्यासू या.इतिहास समजून घेऊ या.

मैत्रीणींनो, प्रत्येक दिवशी अशी पूजा बांधून नवरात्रीचा नंदादीप अखंड तेवत ठेवू या. मग, नक्कीच सरतेशेवटी नवरात्र आपल्या स्वतःमध्येच आमूलाग्र सकारात्मक बदल घडवून आणेल. ज्यामुळे आपण नव विचारांना अंगीकारण्यात आनंदाने व उत्साहाने सिद्ध होऊ. म्हणजे खऱ्या अर्थाने नवरात्र पूजा सुफळ संपूर्ण होईल.असा आज विश्वास वाटतो.

 

© सौ.मंजुषा सुधीर आफळे

७/१०/२०२१

विश्रामबाग, सांगली.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ नवरात्र उत्सव ☆ प्रा. विजय जंगम

⭐ विविधा ⭐

⭐ नवरात्र उत्सव ⭐  प्रा. विजय जंगम⭐ 

भारतीय वर्षा मधील नवरात्र उत्सव…  दसरा..हा सण विशेष महत्वाचा सण समजला जातो. आपला देश शेतीप्रधान देश या नावाने ओळखला जातो. म्हणून , आपली भारतीय संस्कृती ही शेती प्रधान संस्कृती समजली जाते. त्यामुळे आपण जे सण साजरे करतो,  त्या सणांच्या मूळाशी प्रामुख्यानं पर्यावरण, निसर्ग आणि हवामानाचा विचार केलेला आहे. या व्यतिरिक्त हे सण कोणत्या तरी पौराणिक, धार्मिक आणि सामाजिक कथांशी , विचारांशी जोडलेले असल्याने ,ते साजरे करण्यामागे पारंपरिक श्रध्दा निर्माण झालेली आहे. म्हणूनच या सणांची आपणाला आपूर्वाई असते.

काल पासून सुरू झालेला नवरात्र उत्सव हा या सगळ्यांचंच प्रतिक आहे. हा उत्सव प्रामुख्याने स्त्री शक्तीची थोरवी सांगणारा आहे. महिषासुराशी नव दिवस युद्ध करून त्याचं मर्दन करणारी देवी ही साक्षात किती सबला आहे , याचं उदाहरण तमाम स्त्री वर्गाला प्रेरणादायी ठरेल याची खबरदारी आपल्या पूर्वजांनी घेतली आहे.

हा सण साजरा करताना , निसर्गाला किती प्रमाण मानले आहे , हेही आपल्या लक्षात येते. त्याचबरोबर आप ,तेज ,वायू , आकाश आणि अग्नी या पंचमहाभूतांचाही किती खुबीने वापर केला आहे हे सुद्धा समजून येते.

नवरात्र उत्सवाची सुरुवात घटस्थापनेने होते. हा घट म्हणजेच आकाश तत्व आहे. त्या घटात पाणी भरून ठेवले जाते .ते जल तत्व.घटा खाली काळी माती पसरली जाते .ते भूमी तत्व . त्या मातीत धान्य टोकलं जातं . तो त्या भूमीचा रजोगुण . नवरात्रात अखंड नंदादीप तेवत असतो. ते अग्नी तत्व. त्या घाटावर पिवळ्या फुलांची माळ रोज वाहिली जाते. पिवळा रंग हा रजोगुण आहे.

अशी नव दिवस पुजा करून , खंडे नवमीला शस्त्रांची म्हणजेच शेती अवजारांची पूजा केली जाते.शेवटी दशमीला शमी वृक्षाची , म्हणजेच आपट्यांची पानं सोन्याच्या मोलानं वाटली जातात. एका वृक्षाच्या पानांनां सोन्याची किंमत देणारा भारत देश जगात एकमेव देश असावा. आणि त्या देशात साजरे केले जात असलेले सणही त्याच किंमतीचे असावेत ,यात शंकाच नाही.

 

© प्रा. विजय जंगम

सांगली 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ शट्डाऊन – रिस्टार्ट ☆ श्री अमोल अनंत केळकर

श्री अमोल अनंत केळकर

? विविधा ?

☆ शट्डाऊन – रिस्टार्ट ⚜️ ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆ 

संगणकावर काम करणाऱ्यांना  हे शब्द नवीन नाहीत. यातील पहिला शब्द शट्डाऊन हा जेंव्हा पहिल्यांदा ऐकला / संगणाकवर वापरला तेंव्हा मला एखादे दुकान/ गोडाऊन चे वरुन खाली शटर डाऊन करुन आजच्या दिवसापुरते दुकान बंद करायचा फिल आला.

रिस्टार्ट चे ही तसेच. एखादा ट्रक किंवा बस वाटेत थांबलीय आणि परत नव्या जोमाने पुढील प्रवास सुरु करण्यासाठी ड्रायव्हर स्टार्टर मारतो तोच हा रिस्टार्ट.

संगणकाच्या दुनीयेत शट्डाऊन आणि रिस्टार्ट या दोन गोष्टी एकाच ठिकाणी असल्या तरी त्या दोन वेगळ्या घटना घडवून आणतात. शट्डाऊन हे त्यामानाने सरळ. त्या दिवशी चे काम झाल्यावर संगणक बंद करुन ठेवायची आज्ञा ही प्रणाली देते. मात्र काही तांत्रिक अडचणी आल्या तर त्या सोडवून किंवा नवीन प्रणाली संगणकावर टाकली की आपण संगणक रिस्टार्ट करतो.

कधी कधी वाटत की मानवी मन हे जर संगणक मानले तर आपल्यासाठी ही आपण शट्डाऊन/ रिस्टार्टचा उपयोग अनेक प्रकारे करु शकतो किंवा करत आहोत.

उदा. परीक्षेच्या आधी आता रात्री अभ्यास पुरे झाला. उद्या पहाटे फ्रेश अभ्यास करु, असं म्हणून शट्डाऊन व्हायचे

काही सुचत नाही आहे,  उद्या बघू काही तरी मार्ग सापडेल,  करा शट्डाऊन

किंवा ब्रेन स्ट्राॅमींग करुन एखाद्या निर्णयाप्रत येऊन परत एकदा कामाला रिस्टार्ट करणे

अगदी अलिकडच्या मिशन मंगळ सिनेमात त्या महिला शास्त्रज्ञाने अचानक सर्व उपकरण स्विच आॅफ करुन आॅन केल्यावर परत यान संपर्कात येणे हे रिस्टार्टच

एखाद्या परीक्षेतील अपयश पचवून नव्या जोमाने अभ्यास करुन परत रिस्टार्ट करणे.

आयुष्यातील सेकंड इंनिग  ही पण एक प्रकारे अनेकांसाठी प्रभावी रिस्टार्ट ठरली आहे

लांब कशाला तुम्ही हे लेखन ज्यावर वाचत आहात तो मोबाईल? कधीकधी हँग होतो ना?

मग काय करतो आपण कळ दाबून स्विच आॅफ करतो, रिबूट करतो किंवा सिमकार्ड काढून परत घालतो आणि रिस्टार्ट करतो ( आजारी माणसाला बरं होण्यासाठी लावलेल सलाईन आणि मोबाईलचे चार्जींग यात मला कमालीचे साम्य वाटते.उद्देश हाच की दोघांना परत उभारी देणे)

आता ब-याचदा सगळं व्यवस्थित राहण्यासाठी आणि चुकुन संगणकात काही व्हायरस आला तर तो घालवण्यासाठी, अॅन्टी व्हायरस साॅफ्टवेअर घालून सरळ shutdown करणे आवश्यक ठरते.

मानवासाठी ही ही वेळ आलीय. आलेल्या व्हायरस घालवण्यासाठी जाणीवपूर्वक शट्डाऊन होऊन नव्या जोमाने परत रिस्टार्ट होण्याची.

आधुनिक सुविधांनी जगाला एवढं जवळ केलयं की हा शट्डाऊन ही सर्वत्र एकाच वेळी घ्यावा लागेल अशी कल्पना ही आली नव्हती. पण ती वेळ आली आहे.

याच वेळेने जुन्या गोष्टी/ परंपरा यांचे अनुकरण करणे ( रिस्टार्ट करणे)  भाग पाडले आहे.

ट्वेन्टी- ट्वेन्टी च्या या जमान्यात निदान १४ दिवसाचा विलगीकरणातून मानवाला प्रभू रामचंद्राने १४ वर्षाच्या कठोर अशा वनवासाची आठवण करुन देणे ही योजना तर नियतीच्या मनात नसेल?

काहीही असो.  सध्या काही दिवस आपण सगळ्यांनीच शट्डाऊन मोड मधे राहणे हा शहाणपणाचा निर्णय ठरु शकतो.

क्षणभर विश्रांती घेऊन गुढी पाडव्या पर्यत सगळेच जण परत रिस्टार्ट मोड मधे येऊन त्या

अरुणोदयाची वाट बघू..

अमोल

©  श्री अमोल अनंत केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चं म त ग ! छत्री आणि मास्क ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

? चं म त ग ! ⭐ श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

? ? छत्री आणि मास्क ! ?

“नमस्कार पंत, शुभ सकाळ !”

“अरे मोरू, ये, ये, आज बरेच दिवसांनी स्वारी उगवली म्हणायची !”

“तसं नाही पंत, मी तुमचा पेपर तुमच्या आधी रोज घरी नेवून वाचतो आणि गुपचूप आणून ठेवतो, हे तुम्हाल माहित आहेच.”

“अरे हो, आमचा पेपर माझ्या आधी तू वाचणे, हा मी तुझा जन्मसिद्ध हक्कच मानतो रे, पण आज पेपर ठेवतांना हाक मारलीस नां म्हणून विचारलं !”

“पंत काय आहे ना, आज जरा फुरसत आहे आणि दुसरं महत्वाचं कारण म्हणाल तर, बरेच दिवसात काकूंच्या हातचा, फडक्यातून गाळलेल्या फक्कडशा आल्याच्या चहाने घसा ओला झाला नाही नां, म्हणून म्हटलं हाक मारावी तुम्हाला, म्हणजे गप्पा मारता मारता आपोआप चहा पण मिळेल !”

“असं होय, कळलं, कळलं ! अग ऐकलंस का, मोऱ्या आलाय बरेच दिवसांनी, जरा चहा टाक बरं.”

“पंत, तुमचा पण व्हायचाच असेल ना अजून ?”

“अरे गाढवा, मला काय तुझ्या सारखा सूर्यवंशी समजलास की काय ? माझा झालाय एकदा, पण आता या पावसाळी वातावरणात घेईन परत ! बरं मोरू मला एक सांग, तू हल्ली एवढा बिझी कसा काय झालास एकदम ?”

“अहो एकुलत्या एक बायकोला मदत, दुसरं काय ?”

“एकुलत्या एक बायकोला म्हणजे ? आम्ही बाकीचे सगळे नवरे तुला काय कृष्णाचे अवतार वाटलो की काय ?”

“तसं नाही पंत, माझी ही एक बोलायची स्टाईल आहे, इतकंच !”

“कळली तुझी स्टाईल आणि हो, आलंय माझ्या कानावर, आजकाल तुझ्या कौन्सीलींग करणाऱ्या बायकोची प्रॅक्टिस खूपच जोरात चालली आहे म्हणे ? चांगलंच आहे ते, पण तिची प्रॅक्टिस अशी अचानक वाढायचं कारण काय मोरू ?”

“काय सांगू पंत तुम्हांला, ही सगळी त्या करोनाची कृपा !”

“आता यात करोना कुठनं आला मधेच ?”

“सांगतो, सांगतो पंत, जरा धीर धरा ना प्लिज !”

“अरे धीर काय धरा मोरू ? तुझ्या बायकोच्या वाढलेल्या प्रॅक्टिसचा आणि करोनाचा सबंध असायला ती काय डॉक्टर थोडीच आहे ?”

“नाही पंत!”

“मग, अरे कौन्सीलींग करते ना ती ? का तिनं कौन्सीलींग करता करता, स्वतःची कुठली नवीन लस करोनावर शोधल्ये आणि ती तर नाही ना देत सुटल्ये लोकांना ?”

“काही तरीच काय हो तुमच पंत, अहो ती कौन्सीलींगच करते आणि डायव्होर्स घेण्यापूर्वी कौन्सीलींग करून डायव्होर्सघेण्या पासून दोघांना परावृत्त करण्याचा प्रयत्न करण्यात तिची स्पेशालिटी आहे, हे तुम्हाला पण …..”

“माहित आहे रे, पण तिची प्रॅक्टिस अशी एकदम वाढण्याचा आणि करोनाचा सबंध काय ?”

“अहो पंत, हल्ली करोनामुळे  नवरा बायको दोघं घरात, कारण वर्क फ्रॉम होम !”

“बरोबर, पण…”

“आणि हल्ली कामवाल्या मावशीपण कामाला येऊ शकत नाहीत, मग रोज रोज ‘होम वर्क’ कोण करणार ?”

“बरोबर नव्या नवलाईचे कामाचे नऊ दिवस संपले की……”

“त्या वरून प्रथम वाद, रुसवे फुगवे, मग त्यातून विसंवाद आणि पुढे कधीतरी त्याचे पर्यवसान कोणीतरी हात उचलण्यात आणि मग त्याची परिणिती घटस्फोट मागण्या पर्यंत गेली की अशा नवरा बायकोच्या केसेस….”

“तुझ्या बायकोकडे, बरोबर ?”

“बरोब्बर पंत !”

“मोरू, ही आजची तुमची पिढी अशा क्षुल्लक कारणावरून घटस्फोटा पर्यंत जाते म्हणजे कमालच झाली म्हणायची !”

“अहो पंत, हे वाद विवाद म्हणजे अनेक कारणांपैकी एक कारण !”

“म्हणजे, मी नाही समजलो !”

“अहो याच्या जोडीला, नोकरीचे टेन्शन, वेगवेगळे स्ट्रेस, कोणाची नोकरी गेलेली, करोनामुळे फायनांशिअल क्रायसिस, एक ना अनेक कारण !”

“असं आहे तर एकंदरीत !”

“पण पंत या सगळ्यात, सध्या अशा केसेस मध्ये एक नंबरवर, घटस्फोटापर्यंत केस जाण्याचं एक नवीन आणि वेगळंच कारण गाजतंय!”

“परत तू कोड्यात बोलायला लागलास मोऱ्या ! अग ऐकलंस का ? चहा नको टाकूस, मोरूला वेळ नाही चहा प्यायला, असं म्हणतोय तो !”

“काय पंत एका चहासाठी…..”

“बघितलंस, आम्ही कसं सरळ सगळ्यांना कळेल असं बोलतो ! उगाच ताकाला जाऊन भांड लपवायची सवय नाही आमच्या पिढीला !”

“सांगतो सांगतो पंत, सध्या एक नंबरवर कुठलं भारी कारण आहे ते !”

“हां, आता कसं, बोल !”

“पंत, हल्ली काय होतं ना, लॉकडाऊन शिथिल झाला रे झाला, की तमाम जोडपी खरेदीला बाहेर पडतात ! मग हीsss झुंबड उडते बाजारात !”

“अरे पण मोरू त्यांचे ते वागण बरोबरच नां, सरकारने दिलेल्या वेळेत जीवनावश्यक वस्तूंची खरेदी नको का करायला प्रत्येकाने ?”

“हवी नां, मी कुठे नाही म्हणतो ?”

“मग !”

“अहो पण बाजारातून येतांना, आपल्याच नवऱ्या किंवा आपल्याच बायको बरोबर आपण घरी परत आलोय याची खात्री नको का करायला ?”

“अर्थात, पण त्याचा येथे काय संबंध मी नाही समजलो ?”

“अहो पंत, आजकाल मास्क लावल्यामुळे अशा गर्दीच्या ठिकाणी नवरा बायको, चुकून बदलण्याच प्रमाण खूपच वाढलंय, आता बोला !”

“काय सांगतोस काय मोऱ्या, हे असं खरंच घडतंय ह्याच्यावर विश्वास बसत नाही माझा !”

“सांगतोय काय मी पंत आणि अशा प्रसंगात मग गैरसमज, दोघांचे एकमेकावर आरोप, प्रत्यारोप, तुझं आधी पासूनच लफडं असणार, वगैरे वगैरे.”

“अरे बापरे, खरंच कठीण आहे तुमच्या पिढीच.”

“आणि म्हणून माझ्या बायकोच्या कौन्सीलींगच्या केसेस वाढायला करोना कारणीभूत आहे असं म्हटलं मी पंत !”

“हां, हे पटलं मला मोरू, पण यात तुझी बायको बिझी झाली तर मी समजू शकतो, पण तू बिझी कशामुळे झालास ते सांग ना !”

“अहो तिला मदत करतो ना म्हणून…”

“अरे गधड्या कसली मदत करतोस तुझ्या बायकोला ते सांगशील की नाही ?”

“अहो माझं भरत कामाचं शिक्षण मला या कामी उपयोगी पडलं बघा!”

“तू आता परत कोड्यात बोलायला लागलायस, आता चहाच काय पाणी पण नाही मिळणार तुला ! अगं ए…”

“थांबा थांबा पंत, सांगतो!”

“बोल मग आता चट चट.”

“पंत, अशा मास्कच्या 99% केसेस या निव्वळ गैरसमजातून हिच्याकडे आलेल्या असतात आणि काट्याने जसा काटा काढतात, तसा यावर उपाय म्हणून त्यांना आम्ही स्वतः बनवलेले मास्कच वापरायला देतो !”

“म्हणजे, मला नीट कळलं नाही, जरा उलगडून सांगशील का ह्या मास्कची भानगड ?”

“अहो सोप्प आहे, ही प्रथम दोघांची समजूत काढते आणि नंतर त्या दोघांना आम्ही त्यांच संपूर्ण नांव ठळक अक्षरात असलेले मास्क वापरायला देतो !”

“अच्छा !”

“आणि त्या दोघांना ताकीद देतो की घराबाहेर पडतांना आम्ही दिलेलेच मास्क वापरायचे, म्हणजे आपली बायको कोण आणि आपला नवरा कोण हे ओळखणे सोपे जाईल आणि…..”

“चुकून नवरा किंवा बायकोची अदलाबदल होणार नाही, असंच ना ?”

“बरोबर !”

“अरे पण मास्क धुतांना त्याच्यावरचे नांव गेले तर, पुन्हा पंचाईत नाही का दोघांची ?”

“अहो पंत, म्हणून तर मी मगाशी म्हटलं ना, की माझं भरतकामाचं शिक्षण कामी आलं म्हणून !”

“म्हणजे रे मोरू ?”

“अहो म्हणजे मी प्रत्येकाला द्यायच्या कापडी मास्कवर, त्यांची सबंध नांव रंगीत रेशमाने भरतकाम करून लिहून देतो !”

“अस्स होय, म्हणून तू हल्ली बिझी असतोस तर !”

“हो ना पंत !”

“म्हणजे मोऱ्या जुनी झालेली फ्याशन नंतर परत येते म्हणतात, ते खोटं नाही तर !”

“आता पंत तुम्ही कोड्यात बोलायला लागलात ! तुमच्या लहानपणी कुठे करोना होता आणि त्यामुळे मास्कची भानगड असायचा प्रश्नच नव्हता तेंव्हा.”

“बरोबर, पण आता फक्त तेंव्हाच्या छत्रीची जागा या मास्कने घेतल्ये इतकंच !”

“म्हणजे काय पंत ?”

“अरे तेंव्हा बाजारातून घरी नवीन छत्री आली की, त्याच्यावर नांव पेंट केल्यावरच ती छत्री आम्हाला वापरायला मिळत असे ! कारण तेव्हा सगळ्याच छत्र्या काळ्या रंगाच्या, मग आपली छत्री चुकून हरवली तर….”

“आपले छत्रीवरचे नांव बघून ओळखायची, बरोबर पंत ?”

“बरोब्बर, म्हणजे मोरू शेवटी ‘नामाचा महिमा’ म्हणतात ते काही खोटं नाही तर!”

“धन्य आहे तुमची पंत !”

 

© श्री प्रमोद वामन वर्तक

(सिंगापूर) +6594708959

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares
image_print