मराठी साहित्य – विविधा ☆ विचार – पुष्प – भाग ३६ – परिव्राजक १४ – मध्यभारत ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार – पुष्प – भाग ३६ – परिव्राजक १४ – मध्यभारत ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

जुनागडहून स्वामीजी पालिताणा, नडियाद, बडोदा इथे फिरले. जुनागडच्या दिवाण साहेबांनी बडोद्याला जाताना ज्यांच्या नावे परिचय पत्र दिलं होतं ते बहादुर मणीभाई यांनी बडोद्याला स्वामीजींची व्यवस्था केली होती. तिथून स्वामीजी लिमडीच्या ठाकूर साहेबांखातर महाबळेश्वरला गेले. ठाकुर साहेबांनी स्वामीजींकडून दीक्षा घेतली होती. तिथे ते एक दीड महिना राहिले. त्या काळात महाबळेश्वर हे एक श्रीमंत व्यापारी आणि धनवंत संस्थानिक यांचं, दिवस आरामात घालवण्याचं एक ठिकाण मानलं जात होतं. इथला मुक्काम आणि ठाकूर यांची भेट आटोपून, ते पुण्याहून ते खांडवा इथं गेले आणि तिथले वकील हरीदास चटर्जी यांच्याकडे उतरले. दोन दिवसातच त्यांना स्वामीजी एक केवळ सामान्य बंगाली साधू नसून, ते असाधारण असं श्रेष्ठ व्यक्तिमत्व आहे हे कळलं. तिथे अनेक बंगाली लोक राहत होते, त्यांचीही स्वामीजींची ओळख झाली. काही वकील, न्यायाधीश, संस्कृतचे अभ्यासक असे लोक भेटल्यानंतर स्वामीजींचे उपनिषदातील वचनांवर भाष्य, संगीतावरील प्रभुत्व, आणि एकूणच त्यांचे प्रभावी व्यक्तिमत्व यामुळे हे लोक भारावून गेले होते.(खांडवा म्हटलं की आठवण झाली ती अशोक कुमार, अनुप कुमार आणि किशोर कुमार गांगुली यांची, हे सिनेसृष्टीतले गाजलेले कलावंत सुद्धा या खांडव्याचेच राहणारे.)

खांडव्याहून स्वामीजींनी इन्दौर, उज्जैन, महेश्वर, ओंकारेश्वर या ठिकाणी भेटी दिल्या. भारतातल्या  बारा ज्योतिर्लिंगापैकी एक शिवाचे स्थान असलेले उज्जैन शहर, महाकवी कालीदासांचे उज्जैन, दानशूर आणि कर्तृत्ववान असलेल्या अहिल्यादेवी होळकर यांचे  इन्दौर आणि महेश्वर, अशी पवित्र आणि प्रसिद्ध ठिकाणं पाह्यला मिळाल्याने स्वामीजींना खूप आनंद झाला. ही ठिकाणं फिरताना स्वामीजींना खेडोपाड्यातली गरीबी दिसली. पण त्या माणसांच्या मनाची सात्विकता आणि स्वभावातला गोडवा पण दिसला. हीच आपली खरी संस्कृती आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. याच्याच बळावर आपल्या देशाचं पुनरुत्थान घडवून आणता येईल असा विश्वास त्यांना वाटला होता. कारण त्यांना भारतातील सामान्य जनतेचं प्रत्यक्ष दर्शन झालं होतं.

या भागात त्यांनी जे पाहिलं आणि त्यांना जाणवलं ते वर्णन आपल्या दिवाण साहेबांच्या प्रवास वार्तापत्रात ते करतात. ते म्हणतात, “एक गोष्ट मला अतिशय खेदकारक वाटली ती म्हणजे, या भागातील सामान्य माणसांना संस्कृत वा अन्य कशाचेही ज्ञान नाही. काही आंधळ्या श्रद्धा आणि रूढी यांचे गाठोडे हाच काय तो सारा यांचा धर्म आहे आणि त्यातील सर्व कल्पना, काय खावे, काय प्यावे, किंवा स्नान कसे करावे एव्हढ्या मर्यादेत सामावल्या आहेत. धर्माच्या नावाखाली काहीही सांगत राहणारे आणि वेदातील खर्‍या तत्वांचा गंध नसलेले स्वार्थी व आप्पलपोटे लोक समाजाच्या अवनतीला जबाबदार आहेत”.

हा प्रवास संपवून स्वामीजी पुन्हा खांडव्याला हरीदास चटर्जी यांच्याकडे आले. हरीदास पण स्वामीजींच्या व्यक्तिमत्वावर भारावून गेले होते. त्यातच शिकागो इथं जागतिक सर्वधर्म परिषद भरणार आहे ही बातमी त्यांना समजली होती. हरीदास बाबू स्वामीजींना म्हणाले, आपण शिकागोला जाऊन हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व करावे. हा विषय स्वामीजींच्या समोर याआधी पण मांडला गेला होता. धर्मपरिषद म्हणजे, विचार मांडण्यासाठी योग्य व्यासपीठ. पण स्वामीजी म्हणाले, प्रवास खर्चाची व्यवस्था होईल तर मी जाईन. धर्म परिषदेला जायला तयार असल्याची इच्छा स्वामीजींनी पहिल्यांदाच व्यक्त केली होती.

हरीदास बाबूंचे भाऊ मुंबईत राहत होते. हरीदास बाबूंनी स्वामीजींना परिचय पत्र दिलं आणि सांगितलं की, माझे बंधू तुमची मुंबईत, बॅरिस्टर शेठ रामदास छबिलदास यांची ओळख करून देतील. त्यांची यासाठी काही मदत होऊ शकते. मध्यप्रदेशातली भ्रमंती संपवून स्वामीजी मुंबईला आले. हरीदास बाबूंच्या भावाने ठरल्याप्रमाणे स्वामीजींचा छबिलदास यांच्याशी परिचय करून दिला. छबिलदास यांनी तर स्वामीजींना आपल्या घरीच आस्थेने ठेऊन घेतले. छबिलदास आर्यसमाजी होते. स्वामीजी जवळ जवळ दोन महीने मुंबईत होते. छबिलदासांकडे स्वामीजींना काही संस्कृत ग्रंथ वाचायला मिळाले त्यामुळे ते खुश होते. छबिलदास एकदा स्वामीजींना म्हणाले, “अवतार कल्पना आणि ईश्वराचे साकार रूप यांना वेदांतात काहीही आधार नाही. तुम्ही तो काढून दाखवा मी आर्य समाज सोडून देईन”. आश्चर्य म्हणजे स्वामीजींनी त्यांना ते पटवून दिलं आणि छबिलदास यांनी आर्यसमाज खरंच सोडला. यामुळे त्यांच्या मनात स्वामीजींबद्दल खूप आदर निर्माण झाला हे ओघाने आलेच.

आता स्वामीजी मुंबईहून पुण्याला जायला निघणार होते. छबिलदास त्यांना सोडायला स्टेशनवर आले होते. रेल्वेच्या ज्या डब्यात स्वामीजी चढले त्याच डब्यात योगायोगाने बाळ गंगाधर टिळक चढले होते. ते छबिलदास यांच्या जवळचे परिचयाचे असल्याने त्यांनी स्वामीजींचा परिचय करून दिला आणि यांची व्यवस्था आपल्या घरी करावी असे टिळकांना सांगीतले. बाळ गंगाधर टिळक नुकतेच राजकीय क्षेत्रात सक्रिय झाले होते. तर स्वामीजींना राजकारणाशी काहीही कर्तव्य नव्हते पण, हिंदूधर्माविषयी प्रेम, संस्कृत धर्म ग्रंथांचा अभ्यास, भारतीय संस्कृतीचा जाज्वल्य अभिमान, अद्वैतवेदांताचा पुरस्कार या गोष्टी दोघांमध्ये समान होत्या. तसच भगवद्गीते विषयी प्रेम हा एक समान धागा होता. देशप्रेमाचे दोघांचे मार्ग फक्त वेगळे होते. दोघांचा रेल्वेच्या एकाच डब्यातून मुंबई–पुणे प्रवास सुरू झाला.

 © डॉ.नयना कासखेडीकर

क्रमशः…

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ नवरात्रोत्सव : देवीच्या मातृरूपाची उपासना ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

?  विविधा  ?

☆ नवरात्रोत्सव : देवीच्या मातृरूपाची उपासना ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

भाद्रपद सरत येतो, तशी पाऊसही ओसरू लागतो. मग घरोघरी सुरू होते लगबग नवरात्रोत्सवाची. कृषी संस्कृतीतून आलेला हा उत्सव. नवं धान्य शेतात तयार झालेलं असतं. वेगवेगळ्या पालेभाज्या, फळभाज्या, वेल-भाज्या यांनी शिवार डोलत असतं. सगळीकडे आनंदी – आनंद असतो. हा आनंद नवरात्रोत्सवातून प्रगट होतो. नवरात्रातील प्रथा, परंपरा बघितल्या, तर लक्षात येतं, ही देवीच्या मातृरूपाची उपासना आहे. तिच्या सृजनशक्तीचा गौरव आहे.

वर्षातून तीन वेळा आपण देवीचा उत्सव साजरा करतो. चैत्रगौर ही वैभवाची, समृद्धीची देवता आहे. तिचे सालंकृत रूप आपण मखरात बसवतो. तिच्यापुढे आरास केली जाते. गृहिणी क्ल्पकतेने नाना रूपात तिची सजावट करते. गृहिणी तिच्या त्या रूपात स्वत:ला बघते. तृप्त होते. समाधान पावते. यात सहभागी करून घेण्यासाठी नातेवाईक, शेजारणी-पाजारणी, मैत्रिणी-गडणी यांना हळदीकुंकवाला बोलावलं जातं.

भाद्रपदात येणार्याल गौरीकडे कन्यारूपात बघितलं जातं. माहेरवाशीणीसारखं तिचं कौतुक केलं जातं. तिला नटवलं, सजवलं जातं. भाजी-भाकरी, पुराणा-वरणाचं जेवण होतं. रात्री झिम्मा-फुगड्या, फेर-गाणी यांची धमाल उडते. तीन दिवसांचं माहेरपण उपभोगून गौर परत जाते.

नवरात्रात ती मातृरूपत घरोघरी अवतरते. आईच्या स्वागतासाठी घरोघरी धांदल उडते. घराचा काना-कोपरा झाडून-पुसून लख्ख केला जातो. हांतरूण-पांघरूण, जास्तीचे कपडे-लत्ते, गोधड्या-चिरगुटे धुवून स्वच्छ केली जातात. आईने म्हणायला हवे ना, लेक गुणवती आहे. घरोघरी थाळीत पत्रावळ घेऊन त्यावर माती पसरतात. त्यात गहू, ज्वारी, बाजारी, मूग, मटकी, चवळी अशी नऊ प्रकारची बी-बियाणे रुजत घालतात. या मातीच्या मधोमध असतो, मातीचा सच्छिद्र घट. त्यावर विड्याची पाने आणि त्यावर नारळ. त्यावर फुलांची माळ सोडली जाते. शेजारी अखंड तेवणारी समई किंवा निरंजन ठेवले जाते.  मातीचा घट हे पावसाची देवता, वरूणदेव याचे प्रतीक आहे तर तेवणारा दीप हे सूर्याचे. धान्य रुजण्यासाठी माती, पाणी, आणि सूर्यप्रकाशाची गरज असते. घरात असं प्रतिकात्मक शेत तयार केलं जातं. त्यातलं बियाणं हळू हळू रुजू-वाढू लागतं. अंकूर येतात आणि आई धनलक्ष्मी त्यातून प्रगट होते. नवमीपर्यंत हे अंकूर चांगले बोट-दोन बोट उंच होतात. नंतर शेजारच्या पाच मुलांना बोलावून त्याची कापणी केली जाते. ते अंकूर कानात, टोपीत खोवायचे, देवाला अर्पण करायचे, शेजारी पाजारी द्यायचे ( जशी काही आपण नव्या धान्याचा वानोळा शेजारी-पाजारी देत आहोत. ), अशी पद्धत आहे.

नवरात्राला ‘देव बसले’ असंही म्हणण्याची पद्धत आहे. या उत्सवाला आणखीही एक प्रथा जोडली आहे. त्याची मुळे पुराणकथेत आहेत. महिषासूर या उन्मत्त दैत्याने देव-मानवांना हैराण करून सोडले होते. जगणे मुश्कील केले होते. देवीने नवरात्राचे नऊ दिवस त्याच्याशी युद्ध करून, त्याचा दसर्यातच्या दिवशी वध केला. या काळात देव तपश्चर्येला बसले आणि त्यांनी त्याचे पुण्य देवीच्या पाठीशी उभे केले. देव तपश्चर्येला बसले, तेव्हा त्यांना हलवून त्यांच्या तपश्चर्येत व्यत्यय आणायचा नाही, म्हणून या काळात एरवी देवांची पूजा केली जाते, तशी पूजा केली जात नाही. आदल्या दिवशी पूजा करून एका डब्यात देव घातले जातात. याला म्हणायचं ‘देव बसले’  म्हणजे देव तपश्चर्येला बसले. दसर्या च्या दिवशी या बसलेल्या देवांना उठवतात व नेहमीप्रमाणे पूजा-अर्चा करून त्यांची देव्हार्यासत प्रतिष्ठापना केली जाते.

आई जन्म देते. पालन-पोषण करते. रक्षणही करते. तिचं जन्मदेचं रूप घरात शेत तयार करून साकार केलं जातं. देवीच्या नैवेद्याच्या रूपाने घरात वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात. यातून भरण – पोषण अधीकच रूचीसंपन्न होतं.  पण पोषण केवळ शरीराचं होऊन भागणार नाही. ते मनाचंही व्हायला हवं. नवरात्रीच्या निमित्ताने, भजन, कीर्तन, प्रवचन, भाषणे होतात. गीत-नृत्य, नकला, नाटुकल्या इ. संस्कृतिक कार्यक्रम होतात. या सार्यारतून मनाचे पोषण होते. व्यक्तिमत्वाचा विकास होतो.

आई रक्षणकर्तीही असते. शत्रू नेहमी बाहेरचेच असतात, असं नाही. आपले स्वभावदोष हेही आपले शत्रूच. खोटे बोलणे, अहंकार, द्वेष, मत्सर, असे किती तरी स्वभावदोष आपलं व्यक्तिमत्व काजळून टाकतात. आपल्या मुलात हे दोष वाढू  नयेत, म्हणून आई प्रयत्नशील असते. मुलांना प्रसंगी रागावूनसुद्धा त्यांच्यातील असले दोष दूर करण्याचा ती प्रयत्न करते. नवरात्रातील, भजन, कीर्तन, प्रवचन, व्याख्याने इ. मधून याची शिकवण दिली जाते. सुसंस्कार केले जातात.

आशा तर्हे ने जन्मदात्री, पालनकर्ती, रक्षणकर्ती या तीनही दृष्टीने नवरात्रातील देवीची उपासना ही तिच्या मातृरूपाची उपासना असते. नवरात्रात अनेक घरातून पिठा-मिठाचा जोगवा मागायची चाल आहे. एकनाथांनी या प्रथेवर एक अतिशय सुंदर ‘जोगवा’ लिहिला आहे. नि:संग होऊन वारीला निघालेली ही देवीची उपासक वरील स्वभाव दोष त्यजून वारीला कशी जाते, हे बघण्यासारखे आहे. ते लिहितात,

‘अनादि निर्गुण प्रगटली भवानी । मोहमहिषासूर मर्दनालागुनी ।

त्रिविध तापाची कारवाया झाडणी । भक्तालागी तू पावसी निर्वाणी ।

आईचा जोगवा जोगवा मागेन । आईचा जोगवा जोगवा मागेन ।

द्वैत सारुनी माळ मी घालीन । हाती बोधाचा झेंडा मी घेईन ।

भेदरहित वारिसी जाईन ॥ आईचा जोगवा जोगवा मागेन ।

नवविध भक्तीचं भक्तीचं नवरात्र । धरोनी सद्भाव अंतरीचा मित्र।

ओटी भरोनी मागेन ज्ञानपुत्र। दंभ सासरा सांडेन कुपात्र ।

आता मी साजणी झाले गे नि:संग। विकल्प नवर्या्चा सोडीयेला संग ।

केला मोकळा मारग सुरंग।  आईचा जोगवा जोगवा मागेन ।

नि:संग होऊन वारीला निघालेली ही देवीची उपासिका दंभ, सासरा, विकल्प नवरा असे  सर्व  स्वभाव दोष त्यजून, पोटी ज्ञानपुत्र मागते. भेदरहित होऊन वारीला जाते. त्या उपासिकेइतके नाही, तरी काही प्रमाणात आपल्याला आपल्या स्वभाव दोषांवर नियंत्रण मिळवता आलं तर? तर आपण खर्यान अर्थाने नवरात्रोत्सव साजरा केला, असे म्हणता येईल, होय ना?

© श्रीमती उज्ज्वला केळकर

मो. 9403310170 email-id – [email protected]  

संपर्क -17 16/2 ‘गायत्री’ प्लॉट नं. 12, वसंत दादा साखर कामगारभावन के पास , सांगली 416416 महाराष्ट्र 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सर्वपित्री अमावस्या… ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

?  विविधा  ?

☆ सर्वपित्री अमावस्या… ऋतू बरवा ☆ सौ राधिका भांडारकर  ☆

आपले सर्व ऊत्सव हे ऋतु चक्रावर अवलंबून असतात.

तसेच आपला देश हा शेतीप्रधान देश आहे. साधारणपणे भाद्रपद महिन्यांत शेतीची कामे संपलेली असतात. पीकं तयार होत असतात. गणेशोत्सव संपला की पितृपक्ष सुरु होतो. भाद्रपद, कृष्णपक्षातील पंधरवडा हा पितृपक्ष मानला जातो.

कृतज्ञता पक्ष असेही म्हणायला हरकत नाही.

पूर्वजांचे स्मरण, त्यांच्याविषयीची प्रेमभावना, आदर कृतज्ञता श्रद्धेने व्यक्त करण्यासाठी हा पंधरवडा.

ज्या तिथीला त्यांना देवाज्ञा झाली त्या तिथीस श्रद्धायुक्त मनाने सर्व कुटुंबीय श्रद्धांजली वाहतात.

पूर्वजांना पितर असे संबोधले जाते. त्या दिवशी त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवून, केळीच्या पानात वाढले जातात व ते पान कावळ्याला खाऊ घालतात. दूध वडे खीर पुरण हे पदार्थ मुख्यत्वे बनवले जातात.

अशी समजूत आहे की, या दिवसात पितर भूलोकी येतात.

ऊत्तर आकाशात देवांचा वास असतो तर दक्षिण आकाशात पितर वास करतात. सूर्य दक्षिणायनात जात असतो.या खगोलशास्त्रीय स्थित्यंतराला दिलेला हा धार्मिक आणि श्रद्घेचा  दृष्टीकोन. परंतु आपल्या पूर्वजांची आठवण ,आज त्यांच्यामुळे आपण जन्मलो, त्यांनी आपल्याला वाढवलं,शिक्षण संस्कार दिले. जगण्याची वाट दाखवली.. त्यांच्या ऋणाची जाणीव ठेवण्यासाठीच हा पितरोत्सव!!

शिवाय या निमीत्ताने पक्षी प्राणी गोरगरिबाच्या मुखी घास घातला जातो. कुणी पूर्वजांच्या नावे धर्मादाय संस्थांना दान देतात ..देणग्या देतात.. या रीतीमागे अतिशय चांगला हेतु आहे. मृतात्म्यांची शांती तृप्ती व्हावी ही भावना आहे. आणि त्यांचा आशिर्वाद सदैव असावा अशी भावना आहे.

आज अनेक वर्षे, पिढ्यानु पिढ्या परंपरेने हा पितृपक्ष मानला जातो. काळाप्रमाणे काही बदल होत असतात.

पण इतकंच वाटतं की पूर्वजांचं ऋण न फिटणारं आहे, पंधरा दिवसांचा हा पितृपक्ष. अत्यंत श्रद्धेने तो साजरा झाला. आज अमावस्या. शेवटचा दिवस. आजच्या या दिवसाला सर्वपित्री अमावस्या म्हणतात. ज्यांना पूर्वजांची तिथी माहित नसते, किंवा वंशातल्या सर्व पूर्वजांना, इतकंच नव्हे तर ज्यांनीआपल्या आयुष्याला दिशा दिली, संस्कार केले, घडवले, त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा, आजचा महत्वाचा दिवस !! मात्र एक सल मनात आहे.

आजच्या संवाद नाते संंबध हरवत चाललेल्या काळात जन्मदात्यांची अवहेलना त्यांच्या जीवंतपणी होऊ नये..

नाहीतर मरणानंतर केलेल्या अशा सोहळ्यांना काय अर्थ आहे……?

धन्यवाद!!

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सेल्फी फोटो… ☆ सुश्री प्रज्ञा मिरासदार ☆

? विविधा ? 

☆ सेल्फी फोटो… ☆ सुश्री प्रज्ञा मिरासदार ☆ 

तीसेक वर्षांपूर्वी नुकतेच मोबाईल फोन आले होते. पण आजच्या सारखे ज्याच्या त्याच्या हातात, खिशात मोबाईल नव्हते. ती काही लोकांचीच मक्तेदारी होती. इतरांना तो परवडायचाही नाही. मग त्यावर फोटो काढण्याची सोय झाली. निरनिराळ्या अॅप्स मधून, फीचर्समधून खूप झटपट सुधारणा झाल्या. आणि नंतर सेल्फीचा जमाना आला. पंधरा वर्षांपूर्वी पासून सेल्फी काढणे हे प्रेस्टिजचे लक्षण मानले जाऊ लागले. नंतरच्या काळात तर सेल्फींचा सुळसुळाट झाला.

विज्ञान तंत्रज्ञानांची प्रगती मानवाला सुखकारक ठरली. जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातून इतर कुठल्याही ठिकाणी संपर्क करणे सोपे झाले. तसेच फोटो पाठवणेही सोपे झाले. परदेशात असलेल्या जिवलगांचा दिनक्रमही त्यातून समजणे, प्रत्यक्ष पाहणे ही नित्याची गोष्ट झाली. याचे मुख्य कारण म्हणजे सेल्फी हेच होय.

सेल्फी स्टिक जवळ बाळगणे हेही कित्येकांना आवश्यक वाटू लागले. सहलीच्या वेळी आपल्याला हव्या त्या कोनातून फोटो सहज काढता येऊ लागले.  एवढ्या सगळ्या तंत्रज्ञान प्रगतीमध्ये ज्याने सेल्फीचा शोध लावला , त्याला खरोखरच सलाम !  बऱ्याच अंशी माणसाला त्याचा फायदाच जास्त होऊ लागला आहे. मलाही होतो. मी माझ्या परदेशात राहणाऱ्या मुलांना इतर कुटुंबीयांना सेल्फी द्वारा भेटू शकत नसले तरी भेटीचा आनंद आम्ही नक्कीच घेऊ शकतो.

पण जेव्हा एखाद्या गोष्टीचा अतिरेक होतो तेव्हा मात्र हे सेल्फी प्रकरण प्रसंगी जिवावर बेतू शकते. विशेषतः खोल पाण्यात, समुद्रात, धबधब्याखाली किंवा उंच डोंगरांवर, कठडे नसलेल्या गच्चीवर सेल्फी काढताना आजूबाजूचे भान बाळगणे अपरिहार्य असते. तसे ते न बाळगले तर सेल्फीच्या अट्टाहासाने अनेक लोक अपघातात बळी पडतात . पाण्यात बुडून, दगडावर आपटून, उंच कड्यावरून पाय घसरून पडल्याच्या घटना घडल्या आहेत.त्यात तरूण मुले मुली ही जीव गमावून बसले आहेत.

जेव्हा प्रगती होते तेव्हा माणूस अशा दुर्घटनांची कधीच अपेक्षा करीत नसतो.किंबहुना विचारही करीत नसतो. पण आपल्याच क्षणैक सुखाच्या आभासी धुंदीत आपला मौल्यवान जीव गमावण्याची वेळ कुणावर येऊ नये. आपले आनंदाचे क्षण आपण आता क्षणोक्षणी सेल्फी घेऊन कायमचे स्मरणात ठेवू शकतो. फुरसतीच्या वेळी त्या क्षणांच्या पुनर्प्रत्ययाचा आनंद घेऊ शकतो. त्यातही ते सेल्फी  इतरांना पाठवले तर त्यांना आनंद होऊन आपला आनंदही द्विगुणित होतो. त्यावर खूप लाईक्स, स्माईली, थंब्ज 👍 आले की आपला इगो सुखावतो 😀.

यामुळे आणखी एक गोष्ट सांगावीशी वाटते की कॅमेरा घेऊनच फोटो काढणे, ते फोटो स्टुडिओ हे सगळं या सेल्फीमुळे कालबाह्य झाले आहे. फोटोग्राफर लोकांची गरज यामुळे संपली आहे. त्यांना वेगळे व्यवसाय मिळाले असतील. पण आता नव्या युगात कुणीही फोटो, सेल्फी सहज क्लिक करू शकतो.

सेल्फी घेणे, इतरांना पाठवणे, पुन: पुन्हा पाहून आनंद लुटणे, कायम स्मरणात ठेवणे यात काहीच गैर नाही. ही जगरहाटी झाली आहे. मीही काढते सेल्फी . सर्वांना पाठवते.  पण खबरदारी घेऊनच!! ज्यांना पाठवायचा सेल्फी ,त्यांनाही त्यातून आनंदच मिळावा. त्याला आपला सेल्फी पहायचा नसेल तर ते लक्षात आले की नका पाठवू!

काही ठिकाणी जेव्हा अजिबात खबरदारी घेतली जात नाही तेव्हा कधी कधी तिथल्या निसर्गाचे, पर्यावरणाचेही नुकसान होते निसर्ग चुरगळला जातो याकडे लक्ष वेधणे आवश्यक आहे. तरूण वर्गामध्ये सेल्फी अधिक लोकप्रिय आहे. असू दे! पण त्याचवेळी इतर कर्तव्ये, जबाबदारी, खबरदारी विसरू नये. एकदा तर सेल्फीच्या नादात जलाशयात एक बोट बुडाली. त्यात बुडून मृत्युमुखी पडलेले लोक डॉक्टर होते. अशी एक बातमी होती. समाजातील या महत्त्वाच्या घटक असलेल्या सुशिक्षितांनी तरी यांचे भान ठेवणे आवश्यक आहे. प्रत्येक ठिकाणी सेल्फीचा आनंद जरूर घ्यावा ,पण जबाबदारी आणि खबरदारी पाळावी हेच खरे !!!!

© सुश्री प्रज्ञा मिरासदार

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ शब्दरंगी रंगताना… ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ शब्दरंगी रंगताना… ☆ श्री अरविंद लिमये ☆

‘शब्दरंगी रंगताना… साध्य आणि साधना’

शब्द हे भाषेचे अलंकार असतात.शब्द सूचक असतात.मार्गदर्शक असतात.ते अर्थपूर्णही असतात आणि कधीकधी फसवेही.शब्दांची अशी असंख्य रुपे असतात. शब्दांच्या या सगळ्या भाऊगर्दीत असा एक शब्द आहे जो त्याच्या वेगळेपणामुळे उठून दिसतो.तो ज्यांना हवं असेल त्यांना नेहमीच भरभरुन देतो आणि देताना गरीब-श्रीमंत, लहान-मोठा, स्त्री-पुरुष, खेडवळ-शहरी असा कोणताही भेदभाव करीत नाही. त्याला आपलंसं करणाऱ्या कोणत्याही व्यक्तिमत्त्वाला तो आदर्शवत बनवू शकतो. या अर्थाने खूप वेगळा आणि म्हणूनच मला मोलाचा वाटणारा  हा शब्द म्हणजे ‘बिनचूक’!

बिनचूक हा शब्द ऐकताच तो फक्त प्रश्न आणि त्यांची उत्तरं यांच्याशी संबंधित आहे असेच वाटते. विद्यार्थीदशेत कोणत्याही प्रश्नाचे उत्तर बिनचूकच लिहिता यायला हवे या दडपणाखाली वाहिलेल्या अभ्यासाच्या ओझ्यामुळे  तो अभ्यास,त्या परीक्षा, प्रश्नपत्रिका,आणि या सर्वांच्या धास्तीमुळे निर्माण झालेली अस्वस्थ घुसमट हे सगळं ‘बिनचूक’ या शब्दाला इतकं घट्ट चिकटून बसलेलं आहे की हा शब्द फक्त प्रश्नोत्तरांशीच संबंधित आहे असंच कुणालाही वाटतं. पण ते तसं नाहीय.’बिनचूक’हा शब्द फक्त चूक आणि बरोबर या टीचभर परिघासाठी आकाराला आलेलाच नाहीय. त्याची नाळ थेट एकाग्रता, नीटनेटकेपणा, निर्णयक्षमता या सगळ्यांशीच अतिशय घट्ट जुळलेली आहे.

बिनचूक म्हणजे जसं असायला हवं तसंच.अचूक. अतिशय काटेकोर.नीट. व्यवस्थित.नि:संदिग्ध ! बिनचूक या शब्दाचे खात्रीचा,विश्वसनीय, भरवंशाचा.. असेही अर्थ आहेत. या सर्व अर्थछटांमधील सूक्ष्मतर धाग्यांची परस्परांमधील घट्ट वीणच एखाद्या व्यक्तीमत्त्वाचा गुणविशेष ठरणारा बिनचूक हा शब्द आकाराला आणते. यातील ‘खात्रीचा’,’विश्वसनीय’, ‘भरवंशाचा’ ही सगळी वैशिष्ट्ये त्या व्यक्तीची अचूक निर्णय घेण्याची क्षमता,कार्यपद्धतीतील पारदर्शकता,त्याची सर्वसमावेशक वृत्ती यामुळे सभोवतालच्या लोकांच्या मनात निर्माण होणाऱ्या प्रतिमांची प्रतिबिंबेच म्हणता येतील. याउलट सतत चूका करणारी एखादी धांदरट व्यक्ती कुणालाच खात्रीची, भरवंशाची वाटत नाही. ती बेभरवंशाचीच वाटते. एखादे महत्त्वाचे अवघड काम एखाद्यावर तातडीने सोपवायची वेळ आली तर अशी धांदरट व्यक्ती ते काम बिनचूक पूर्ण करू शकेल याबद्दल कोणालाही विश्वास वाटणे शक्यच नसते. त्यामुळेच ती व्यक्ती जबाबदारीच्या, महत्त्वपूर्ण कामांसाठी अविश्वसनीयच ठरते.

अशा धांदरट व्यक्तींकडून होणाऱ्या चूका आणि कामचुकार माणसाने केलेल्या चूका यात अवगुणात्मक फरक नक्कीच आहे. धांदरट व्यक्ती आत्मविश्वासाच्या अभावी बिनचूकपणा पूर्णतः अंगी बाणवू शकणारही नाही कदाचित,पण आपल्यामुळे होणाऱ्या त्रासाची त्याला जाणीव असते. त्यामुळे स्वतःमधे सुधारणा घडवून आणण्यासाठी अशी व्यक्ती त्याच्यापरीने प्रयत्नशीलही असते. आळशी आणि कामचुकार व्यक्तींचं तसं नसतं. त्या वेड पांघरून पेडगावला निघालेले प्रवासीच असतात. कामं टाळायच्या वृत्तीमुळे आपल्या अंगाला तोशीस लावून घ्यायची त्यांची मुळात तयारीच नसते. येनकेन प्रकारेन त्यांचा कामे टाळण्याकडेच कल असतो.

अशा कामचुकार व्यक्तींना बिनचूकपणा अंगी बाणवणे हे अशक्यप्रायच वाटत असते. त्यामुळे ‘मी आहे हा असा आहे’ असं म्हणत स्वतःच लटकं समर्थन करीत रहाण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळे एकतर ते खऱ्या अर्थाने समाधानी नसतात आणि ते आयुष्याच्या परीक्षेतसुध्दा काठावरही पास होऊ शकत नाहीत.

याउलट बिनचूकपणा अंगी बाणवणे हे ज्यांच्यासाठी  जाणीवपूर्वक ठरवलेले ‘साध्य’ असते ते आवश्यक कष्ट, स्वयंशिस्त आणि सातत्यपूर्ण प्रयत्न याद्वारे प्रत्येक काम अचूक, दोषरहित व्हावे यासाठी प्रयत्नशील असतात.त्यांच्यासाठी ही एक साधनाच असते.अर्थात ही साधना ते स्वखुशीने मनापासूनच करीत असल्याने त्यांच्यासाठी ती कधीच कष्टप्रद, त्रासदायक नसते तर हळूहळू अतिशय नैसर्गिकपणे ती त्यांच्या अंगवळणी पडत जाते. अशी माणसे कधीच चूका करीत नसतात असं नाही. त्यांच्या हातूनही अनवधानाने क्वचित कधी चूका होतातही. पण ते अशा चुकांमधून काही ना काही शिकत जातात. एकदा झालेल्या चुकीची पुन्हा पुनरावृत्ती होऊ नये यासाठी सजग रहातात. स्वतःची चूक मान्य करण्यात कधीही कमीपणा मानत नाहीत. आपली चूक मनापासून स्वीकारतात आणि नेमकं काय आणि कसं चुकलंय हे समजूनही घेतात.’बिनचूकपणा’ हे साध्य प्राप्त करण्यासाठीची ही त्यांची साधनाच असते !

हे सगळे कष्ट घ्यायची तयारी नसलेलेच कामचुकारपणा करायला प्रवृत्त होत असतात. त्याना परिपूर्णतेची आस कधी नसतेच.अशा लोकांसाठी बिनचूकपणा हा कोल्ह्याला आंबट वाटणाऱ्या द्राक्षांसारखाच असतो.अन्यथा बिनचूकपणा किंवा नीटनेटकं काम त्यांना अशक्यप्राय वाटलंच नसतं. याउलट परिपूर्णतेचा ध्यास घेतलेली माणसं साधी साधी कामेही मन लावून करतात. त्यातच त्यांचा आनंद आणि समाधान लपलेलं असतं. अनवधानाने झालेली चूकही त्यांना अस्वस्थ करीत असते आणि मग त्या चूकांमधून ते स्वतःत सुधारणा घडवून आणायला प्रवृत्त होतात. स्वतःच्या शिस्तप्रियतेमुळे अंगी बाणलेला हा बिनचूकपणा हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वविकासासाठी प्रमुख घटक ठरत असतो.

परिपूर्णतेचा,अचूकतेचा असा ध्यास घेणाऱ्या व्यक्तींचेही दोन प्रकार असतात. जी माणसे कामात अगदी शिस्तशीर,बिनचूक असतात त्यातील कांहीना  त्याबद्दल वाटणाऱ्या अभिमानाचे रुपांतर कधीकधी अहंकारात होत जाते. त्यामुळे  त्यांच्या वागण्याला एक काटेरी धार येऊ लागते जी इतरांना जातायेता सहज ओरखडे काढत जाते. त्यामुळे इतरांना त्यांच्या कामाबद्दल किंवा परफेक्शनबद्दल एरवी कितीही आदर वाटला तरी ते त्यांच्याजवळ जायला घाबरतात. त्यांच्यापासून थोडं अंतर राखूनच वागतात. हा दोष अर्थातच त्या व्यक्तींच्या अहंकाराचा.त्यांच्या बिनचूकपणाचा नव्हे. अशा अहंकारी व्यक्ती इतरांपेक्षा आपण कोणीतरी वेगळे,श्रेष्ठ आहोत या कल्पनेत सतत तरंगत असतात. आणि स्वतःचा जगण्यातला आनंद मात्र हरवून बसतात.

या उलट यातल्या दुसऱ्या प्रकारच्या व्यक्तींना त्यांच्या बिनचूकपणाचा कधीच दुराभिमान नसतो. सर्वांना सामावून घेण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळे ते सगळ्यांना सोबत घेतात,त्यांना नेहमीच आपुलकीने समजावून सांगत स्वतःच्या कृतीने त्यांना कार्यप्रवृत्त करतात.जगणं असं कृतार्थ होण्यासाठी बिनचूक पणाचा अट्टाहास नव्हे तर असोशी आवश्यक असते!

विद्यार्थीदशेतील प्रत्येकाचीच वाटचाल ‘चूक की बरोबर?’ या प्रश्नाशीच बांधलेली असते. तिथे परीक्षेत येऊ शकणारे ‘अपेक्षित प्रश्न’ जसे सहज उपलब्ध होऊ शकतात, तशीच त्या प्रश्नांची बिनचूक उत्तरे इन्स्टंट पुरवणारी गाईडसही. आयुष्यातल्या जगण्याच्या वाटचालीत मात्र निर्माण होणारे असंख्य प्रश्न बऱ्याचदा अनपेक्षित असतात. त्या प्रश्नांचे नेमके आकलन आणि आपण शोधलेल्या त्या प्रश्नांच्या उत्तरांचा होऊ शकणारा दीर्घकालीन परिणाम याचा सारासार विचार करूनच त्या प्रश्नांची उत्तरे ठरवावी लागतात. अर्थातच ही उत्तरे निर्णयप्रक्रियेतूनच तयार होत असल्याने त्या उत्तरांची बिनचूकता हे ज्याच्या त्याच्या निर्णयक्षमतेच्या गुणवत्तेवर अवलंबून असते. म्हणजेच बिनचूक निर्णय घेणे हेही कामातील बिनचूकपणा आणि प्रश्नांची बिनचूक उत्तरे देण्याइतकेच महत्त्वाचे असते. अचूक निर्णय घेण्याची निर्णयक्षमतासुध्दा ‘बिनचूक’ या शब्दाने अशी गृहित धरलेली आहे. निर्णयक्षमता वृद्धिंगत होण्यासाठी स्वयंशिस्त, परिस्थितीचे अचूक आकलन आणि प्रत्येक प्रश्नाकडे पहाण्याचा ति-हाईत दृष्टीकोन हे घटक महत्त्वाचे ठरतात.

प्रत्येकाच्या आयुष्यात पदोपदी या ना त्या कारणाने निर्णय घ्यायची वेळ येतच असते. अशा प्रत्येकवेळी दुसऱ्यावर अवलंबून न रहाता ते निर्णय ज्याचे त्यालाच घ्यावे लागतात. तत्काळ निर्णय घ्यायची अशी कसोटी पहाणारी वेळ अचानक पुढे येऊन ठेपण्याची शक्यता अपवादात्मक नसतेच. अशावेळी कोणताही निर्णय घेताना मनात चलबिचल असेल तर ती निर्णय प्रक्रियेसाठी घातक ठरु शकते. काहीवेळा सखोल विचार न करता आतयायीपणाने निर्णय घेतले जातात. असे निर्णय चुकीचे तर ठरतातच शिवाय ते नवे प्रश्न निर्माण करायला निमित्तही ठरत असतात.त्यासाठीच अचानक निर्माण झालेल्या परिस्थितीचे नेमके आकलन आणि सारासार विचार हे घटक महत्त्वाचे ठरतात. कोणतीही परिस्थिती हाताळण्यासाठी आवश्यक असणारे कौशल्य प्रयत्नपूर्वक सरावाने प्राप्त करणे मग फारसे अशक्य रहात नाही.

आपल्या आयुष्यात निर्माण होणारं दु:ख असो किंवा असमाधान हा बऱ्याचदा आपण स्वतःच त्या त्या वेळी घेतलेल्या चुकीच्या निर्णयांचाच परिपाक असतो.त्यामुळे अचूक निर्णयक्षमतेचं महत्त्व वेगळं सांगण्याची गरज नाही.

सारांश हाच की बिनचूकपणा अंगी बाणवणे हे मनापासून स्विकारलेले साध्य आणि त्यासाठी कष्ट, स्वयंशिस्त आणि सातत्यपूर्ण प्रयत्न ही साधना जगणं आनंदी आणि कृतार्थ होण्यासाठी अपरिहार्यच ठरते !!

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मी आणि काॅफी… ☆ सुश्री संगीता कुलकर्णी

सुश्री संगीता कुलकर्णी

? विविधा ?

☆ मी आणि काॅफी… ☆ सुश्री संगीता कुलकर्णी ☆ 

कॉफी ही माझ्या आयुष्याशी चहाइतकीच जोडली गेलेली आहे. एखाद्या पावसाळी संध्याकाळी खिडकीत बसून गरम कॉफीचे घोट घेताना त्या निसर्ग सौंदर्याची, मोहक वातावरणाची मनावर होणारी जादू किंवा जेव्हा पहिल्यांदा डेटला जातात त्यावेळी त्या प्रेमळ क्षणांची साथ द्यायला सोबत असते ती कॉफी किंवा मग रात्रीच्या निरव शांततेत मंद गाण्याच्या सोबतीने वाफाळत्या कॉफीचा आस्वाद घेताना मिळणारी कमालीची स्वस्थता किंवा पुस्तक वाचताना कॉफीची सोबत असली तर वाचनाचा आनंद द्विगुणीत होतो.. एखाद्या सुंदर दिवसाची सुरुवात व्हावी ती गरमा-गरम कॉफी आणि चविष्ट केक स्लाईससोबत तर क्या बात है…!

कॉफी म्हणजे  विचार, निवांतपणा, संगीत, दरवळणारा सुगंध, मनाची तरतरी, हसू, गप्पा, वाचन, पाऊस, तो आणि ती, आनंद, मैत्र व मी आणि लिखाण…

कॉफीचे माझ्या आयुष्यात निश्चितच एक स्थान आहे. फिल्टर कॉफी असो की कॅफे मोका, कोल्ड काॅफी असो वा कॅपिचुना काॅफी इ. या साऱ्याच प्रकारांनी माझ्या मनात जागा केली आहे..

माझी दिवसाची सुरुवात कॉफीने होते…कॉफी नुसतं असं म्हटलं तरी माझ्या आजूबाजूला कॉफीचा सुगंध दरवळायला लागतो.. काॅफीचा मग ओठांना लावण्याआधीच तिचा मस्त सुगंध काहीतरी आत हलकेच जागं करतं असतो अगदी तसचं जसा पावसाच्या सरींनी दरवळणारा मातीचा गंध… येणा-या आठवणींच्या वर्षावाची जाणीव करून देत असतो.

आठवणींच्या सुगंधात मन चिंब चिंब भिजत असते… काय सांगायचे असते त्याला ? एक वेगळीच आभा का दाटते मनात ?

कारण काॅफीच नातचं असतं हळव्या  जगाशी बांधलेलं रूजू पाहणारं नवं नातं…हे नवं नात स्वीकारताना येणा-या आनंदाच्या सरी झेलू पाहणारं…  खरचं काॅफीचा तो मस्त सुगंध जेव्हा अलगद जवळ येतो तेव्हा नव्या जाणीवांचा बांध अलगद बांधला जातो…

माझ्यासाठी अतिप्रिय काही असेल तर ते म्हणजे गरम स्ट्राँग कॉफी. कॉफी म्हटलं की आठवते तिची जिभेवर रेंगाळणारी थोडी स्ट्राँग कडवट चव.. हो कडवट कारण कॉफी प्यायची तर स्ट्राँगच…कडवट

गोड आणि कॉफी… झोप उडवून तरतरी आणणाऱ्या पेयामध्ये कडक कॉफीचा नंबर पहिला असेल असे माझे मत .. कॉफीला पर्यायी एकतर काही नसावं आणि असलंच तरी कॉफीची सर त्याला नसावी… सुस्ती-आळस-कंटाळा दूर सारून स्फूर्ती आणि ताजंतवानं करण्यात कॉफी फायदेशीर असल्याचं मी तरी अनुभवलं आहे आणि अनुभवत आहे

कामाचा लोड कितीही असू द्या किंवा शीण आला असेल आणि त्याच वेळी समोर कॉफीचा वाफाळलेला कप जेव्हा समोर दिसतो त्या कॉफीचा घोट जेव्हा घशाखाली उतरतो ना तेव्हा हा सगळा शीण, कंटाळा व आळस क्षणार्धात कुठच्या कुठे पळून जातो..

कॉफीचं महत्त्व माझ्या लेखी खूप आहे कारण वेळोवेळी सुख-दुःखात, महत्त्वाच्या क्षणी माझा आत्मविश्वास वाढवण्यात आणि मला खंबीर करण्यात जर कोणाची साथ असेल तर ती माझी सखी कॉफीची..!

लेखन हा माझा आवडता छंद त्यामुळं काही सुचत नसेल आणि कॉफी प्यायली तर माझं डोकं जाम भारी काम करतं थोडक्यात काय तर  माझ्या रिफ्रेशमेंटसाठी कॉफी तिचं काम चोख पार पाडते..

माझ्यासाठी कॉफी म्हणजे बिस्मिल्ला खाँसाहेबांच्या सनईसारखी आहे… रोज हवी असे नाही पण जशी विशेष प्रसंगी ती असल्याशिवाय पूर्णता नाही तसेच काहीसे कॉफीचे आहे.. निवांत आहे, सुंदर माहोल आहे, निसर्ग त्याच्या सौंदर्याची उधळण करत आहे अशा प्रसंगी कॉफी हवीच.. ! त्याशिवाय त्या प्रसंगाला, त्या क्षणाला पूर्तता नाही…

मी एकटीनं एन्जॉय करायची जागा म्हणजे बुक कॅफे..  पुस्तकांच्या दुकानात असलेलं कॉफी शॉप किंवा कॉफी शॉपमध्ये असणारी लायब्ररी असं बुक कॅफेचं स्वरूप.. निवांतपणे, पुस्तक आणि कॉफीच्या सान्निध्यात वीकएंड साजरा करायला हे हक्काचं ठिकाण मनाला आनंद देऊन जाणारं असं मनापासून नमूद करीन.. शांत तरीही छान पॉझिटिव्ह वातावरण..,

पुस्तके वाचताना सोबतीला वाफाळत्या कॉफीचा कप आणि काही समविचारी मित्र- मैत्रिणी सोबत मैफल जमवता आली तर ? ही कल्पनाच भन्नाट नाही ..!

काॅफीचा घुटका घेताना फेसबुक न्याहाळणे हा माझा आवडता संध्याकाळचा कार्यक्रम.. माझ्यासाठी ते फार मोठे विरंगुळय़ाचे चार क्षण.. आजही मी तेच करते..

कॉफी हा प्रवास आहे ठिकाण नाही

जी चालण्यात मजा आहे ती पोचण्यात नाही…अशी ही बहुरंगी, बहुरूपी आणि अनेक आठवणींची साक्षीदार असलेली कॉफी मी तरी दैवी पेयच मानते..!

माझ्या आजवरच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर साक्षीदार म्हणून या कॉफीने मला सोबत केलीये..!

लव्ह यू कॉफी!

एक छोटेसे टेबल सोबत मी व काॅफी

©  सुश्री संगीता कुलकर्णी 

लेखिका /कवयित्री

ठाणे

9870451020

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ शारदोत्सव ☆ सौ. अमृता देशपांडे ☆

सौ. अमृता देशपांडे

? विविधा ?

शारदोत्सव ☆ सौ. अमृता देशपांडे  

घरोघरीचे गणपती विसर्जन झाले आणि अनंतचतुर्दशीला सार्वजनिक गणेशोत्सवाची धामधूम संपली की वेध लागतात ते शारदीय नवरात्रोत्सवाचे.

दरवर्षी नवरात्र आले की, हमखास आठवण होते ती आमच्या शाळेच्या

“शारदोत्सवाची.”

आमची शाळा फक्त मुलींची.  म.ल.ग.हायस्कूल, कोल्हापुर. मी पहिली ते अकरावी तिथेच शिकले. आमच्या शाळेत अश्विन नवरात्रीत ” शारदोत्सव ” साजरा केला जात असे.  त्यामुळे देवी उपासनेचे संस्कार घरात आणि  शाळेत ही झाले.

कोल्हापुरवासिनी श्री अंबाबाई, घरची देवी श्री एकवीरा, आणि शाळेतली श्री सरस्वती अशा पूजनाच्या उत्सवाचे नवरात्रीचे दिवस संस्मरणीय आहेत. संस्कारक्षम वयातला देवीशक्तीचा उत्सव आध्यात्मिक आणि वैचारिक मानसिकतेचा भक्कम पाया ठरला.

शारदोत्सवाच्या आधीच्या आठवड्यात तयारी करण्यासाठी वेगवेगळ्या कामांसाठी 4/4 मुलींचे ग्रुप केले जायचे. डेकोरेशन करणे, पूजेची तयारी करणे – यात पूजेची भांडी रोज स्वच्छ करणे, तेल,तूप, अगरबत्ती,  कापूर, हार फुले, प्रसाद ( फळे)याची जमवाजमव, खरेदी करणे, यातून टीम वर्क,  कुठलेही काम करण्याची तयारी हे गुण अंगवळणी पडत. आम्ही मैत्रिणी  या कुठल्याही कामामध्ये  दरवर्षी अतिशय उत्साहाने सहभाग घेत होतो . त्यावेळी शाळेत वातावरण खूप प्रसन्न असायचे.शाळेत आहोत असं वाटण्यापेक्षा एका ऊर्जेने भारावलेल्या मंदिरात आहोत, असेच वाटायचे.  अगरबत्तीच्या घमघमाटाने  सगळे वातावरण भारावून  गेलेले असायचे.

सर्व तयारी करून शाळा भरण्याच्या वेळी सामूहिक आरती होत असे.  संगीत हा विषय शिकवणारे टेंबेसर व नंतर सौ.शैलाताई कुलकर्णी पेटी ( हार्मोनियम) वाजवून साथ द्यायचे.

‘दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी , अनाथ नाथे अंबे करुणाविस्तारी  ‘ ही आरती झांज, हार्मोनियम च्या तालावर सुरात म्हणताना एक प्रसन्न आनंद व्हायचा.

पांढरे शुभ्र वस्त्र परिधान केलेली,  वीणा हाती असलेली,  कमळात आसनस्थ, नेत्रांतून अपार प्रेम,  माया बरसणारी देवी सरस्वतीची मूर्ती अजुनही डोळ्यांसमोर येते.

आरती-प्रसाद झाल्यावर शाळा सुरु होत असे. चार वाजल्यानंतरचे तास नसायचे. कारण त्यावेळेत रोज व्याख्यान आयोजित करण्यात येत असे. पहिल्या दिवशी वेदशास्त्र संपन्न प.पू.जेरेशास्त्री यांचे देवी शक्ती,  देवी अवतार अशा विषयांवर प्रवचन असे. त्यानंतर रोज प्रख्यात लेखक, वक्ते, निर्माते, चित्रकार,  उद्योगपती,  शिक्षणतज्ज्ञ,अशा थोर व दिग्गज व्यक्ती, कलाकारांचे व्याख्यान आयोजित करण्यात येत असे. प्रा.शिवाजी भोसले, श्रीमती लीलाताई पाटील,  भालजी पेंढारकर, सूर्यकांत मांढरे,  कॅप्टन थोरात, मृत्युंजयकार शिवाजी सावंत यांची व्याख्याने अजूनही आठवतात.

प.प.जेरेशास्त्री जे काही सांगायचे ते सगळेच तेव्हा समजायचे असे नाही,  पण ते काहीतरी भव्य दिव्य छान वाटायचे.

आपल्या प्रवचनामध्ये सुंदर मानव बनण्यासाठी तुमचे मन सुंदर असले पाहिजे, निर्मळ असले पाहिजे,  असे सांगायचे. त्याचा अर्थ पुढे आयुष्यात समजून आला. मोठ्या व्यक्ती कोण, त्या का मोठ्या आहेत, हे समजून घेणे याची शिकवण मिळाली.  एका जागी तीन तास बसून व्याख्यान कसे ऐकायचे, याची सवय झाली. शारदोत्सवाचे ते नऊ दिवस अतिशय उत्साहाचे व भारलेले होते. सरस्वती पूजनाने व व्याख्यानाच्या विषयांतील शब्दांचा, विचारांचा परिणाम नकळत मनावर होत होता. आमचे शिक्षक आणि शिक्षिका ( आमचे सर आणि बाई) त्या विचारांना अनुसरूनच शाळेतल्या इतर कार्यक्रमांची आखणी करत, आणि भाषणातले विचार दैनंदिन व्यवहारात ही कसे अंगिकारायचे,  हे आम्हां मुलींकडून करवून घेतले जाई. त्यामुळे दरवर्षी अकरावीची पास झालेली बॅच ही सुसंस्कारितच असेल, हेच आमच्या शाळेचे ध्येय, प्रयत्न आणि यश होते.

प्रत्येक स्त्री मध्ये देवीशक्तीचा अंश असतो. स्वतःतल्या शक्ती चा आदर ठेवून समाजात वावरणे, स्त्री अबला नाही तर सशक्त,  स्वयंपूर्ण आहे, याची जाणीव होणे, तसेच आत्मशक्तिचा अहंगंड न ठेवता किंवा आपण कुणापेक्षा वरचढ आहोत, या भ्रामक कल्पना न बाळगता  त्या शक्तीचा वापर स्वतःच्या प्रगतीसाठी, समाजाच्या सेवेसाठी,  देशसेवेसाठी करणे ह्याचे बाळकडू देणारा शाळेतला शारदोत्सव त्या काळातल्या आमच्या पिढीच्या मानसिकतेचा सुसंस्कारित पैलू होता.

नवरात्र म्हटले की शाळेचे ते दिवस अजूनही आठवतात. मनोमन देवीला नमस्कार केला जातो.

त्यावेळी म्हणत होतो ते,

” या कुंदेन्दु तुषार हार धवला ” हा श्लोक आणि

” विधी तनये शारदे कामदे” हे गीत प्रत्येक नवरात्रात ओठावर येते.

श्री शारदा देवी आणि माझ्या शाळेला भक्तीभावनेने नमन!

© सौ. अमृता देशपांडे 

पर्वरी – गोवा

9822176170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ डोळ्यांतले पाणी…भाग 8 ☆ सौ. अमृता देशपांडे ☆

सौ. अमृता देशपांडे

? विविधा ?

☆ डोळ्यांतले पाणी…भाग – 8  ☆ सौ. अमृता देशपांडे  

संतसाहित्य,  संतवाडॄमय , सद्गुरूंची चरित्रे,  देवदेवतांच्या पोथीवाचन हा एक वेगळाच अनुभव असतो. हे वाचन करताना दैवी लीला, सद्गुरुंचा शाब्दिक दिलासा आणि त्यानुसार येणा-या अनुभवांनी,  प्रीतीने मन भारावून जाते. ह्रदय भरून येते. नकळत डोळे पाझरू लागतात. ते पाणी असतं कृतज्ञतेचं. आस्तिकतेला आश्वस्त करणारं, श्रद्धा अधिक दृढ करणारं. ह्रदयस्थ आत्मा  अश्रूंच्या रूपाने गुरुचरणावर लीन होतो.  हा अनुभव वर्णनातीत आहे. तो ज्याचा त्यानंच अनुभवायचा असतो.

असं हे डोळ्यातलं पाणी म्हणजे भावना व्यक्त करण्याची भाषा. दुःख, यातना, वेदना, राग, प्रेम, ममता, असूया, विरह, कृतज्ञता,  अगतिकता अशा अनेक भावनांचं मूर्त स्वरूप.

” प्रेमस्वरूप आई वात्सल्यसिंधू आई……” हे गाणं ऐकताना केव्हा मी रडायला लागते तेच कळत नाही.  दुस-याच्या डोळ्यात पाणी बघून आपले डोळे भरून येतात.

परजीवास्तव जेथ आतडे

कळवळुनी येई

त्या ह्रदयाविण स्वर्ग दुजा या

ब्रम्हांडी नाही

रडणं ही क्रिया म्हणा किंवा भावना म्हणा , अगदी नैसर्गिक आहे.  हसण्याच्या  वेळी मनमुराद हसावं, तसंच मनमोकळेपणाने रडावं. आरोग्यासाठी दोन्ही चांगलं ! मोकळेपणाने हसता न येणं किंवा रडताही न येणं यासारखी निराशेची आणि लाजिरवाणी गोष्ट दुसरी नाही .

अर्थात काही जणांना उगीचच रडण्याची सवय असते. सतत तक्रार,  सतत रड.अशावेळी

” सुख दुखतःय” हा शब्दप्रयोग योग्य वाटतो. वरवरचे अश्रू म्हणजेच नक्राश्रू. काही जण दुसरा रडत असेल तर तायाला हसतात, चिडवतात. काही जणांना दुस-याला दुःखी बघून आनंद होतो. या वृत्तीसारखी वाईट गोष्ट दुसरी असूच शकत नाही.

जन्मापासून मृत्यूपर्यंत डोळ्यातलं पाणी मन, भावना,  यांचं खरेपण व्यक्त करत असतं.पुरूषांपेक्षा स्त्रियांचं मन हळवं असतं हा एक सर्व साधारण समज आहे. पुरूषांनी रडायचं म्हणजे अगदी बायकी पणाचं वाटतं हाही एक ” समजच ” आहे.पण तो योग्य नाही. एखादा कलाकार, पुरूष असो किंवा स्त्री,  आपली कला रंगमंचावर सादर करताना जर भूमिकेशी समरस झाला तर खोट्या अश्रूंसाठी ग्लिसरीन वापरण्याची गरज पडत नाही. त्याचं संवेदनाशील मन त्याला साथ देतं.  तोच अभिनय खरा असतो, आणि तोच प्रेक्षकांवर परिणाम करतो. म्हणून मन संवेदनशील असणं व ते तद्रूप होणं गरजेचं असतं.

(क्रमशः… प्रत्येक मंगळवारी)

© सौ. अमृता देशपांडे 

पर्वरी – गोवा

9822176170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग ३५ परिव्राजक १३.गुजरातचे दिवस ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग ३५ परिव्राजक १३.गुजरातचे दिवस ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

खेत्री म्हणजेच खेतडीहून स्वामीजी पुन्हा अजमेरला आले. श्री हरविलास सारडा यांच्याकडून तीन चार दिवसांनी ते बेबार इथं गेले असता, शामजी कृष्ण वर्मा अजमेरहून कामानिमित्त बेबारला आले होते, तेंव्हा ते स्वामीजींना बरोबर घेऊनच आले. हरविलास यांनी शामजींना स्वामीजींचं व्यक्तिमत्व, त्यांचे विचार आणि त्यांची देशभक्ती याबद्दल सर्व सांगितलं होतं. शामजींच्या घरी स्वामीजी पंधरा दिवस राहिले होते. तिथे स्वामीजींचा शामजींबरोबर धार्मिक आणि तत्वज्ञानवर संवाद होत असे. हरविलास यांचे राजस्थानमध्ये समाज सुधारणेचे मोठे काम होते तर, राजकीय क्षेत्रातल्या सर्वात जहाल क्रांतिकारकांच्या चळवळीला मदत करणारे पंडित शामजी कृष्ण वर्मा. (आपल्याला शामजी कृष्ण वर्मा हे व्यक्तिमत्व  स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या चरित्रात आपल्याला भेटले आहे.) या दोघांची भेट आणि झालेली वैचारिक देवाण घेवाण आश्चर्यकारकच आहे.

यानंतर स्वामीजी अबुच्या मार्गाने निघाले असता त्यांना तिथे ब्रम्हानंद आणि तुरीयानंद भेटले. यावेळी स्वामीजी फार उदास होऊन त्यांना म्हणाले, “ राजस्थान मधले लोकांचे दारिद्र्य पाहून माझे अंतकरण फाटून गेले आहे. त्यामुळे मला धड रात्री नीट झोप पण लागत नाही”. आणि त्यांच्या डोळ्यातून घळघळा अश्रु वाहू लागले. ते जरी खेत्रीला राजवाड्यात राहिले होते, तरी त्यांचा गावातील लोकांचा संपर्क आला होता. रोज कुठे ना कुठे खेडेगावात पण प्रवास झाला होता. तेंव्हा ग्रामीण भागातल्या लोकांचे दर्शन झाले होते. शेतकरी आणि झोपड्यातून राहणारी मुलेबाळे त्यांनी पहिली होती. अंगावर पुरेसे कपडे नाहीत, पोट खपाटीला गेलेलं, चेहरे निस्तेज हे दारिद्र्याचं दृश्य त्यांच्या अंतकरणाला भिडलं होतच. राजा अजीतसिंग यांच्याशी बोलताना सामान्य माणसापर्यंत शिक्षण कसं पोहोचवता येईल. शिक्षण हे दारिद्र्य कमी करण्यास कसं उपयोगी पडेल यावर चर्चा होत असत आणि एखादा छोटासा संस्थानिक आपल्या प्रजेचा कल्याणकारी विचार करेल तर हजारो माणसांचं जीवन तरी सुखी होईल हे स्वामीजींना समजत होतं म्हणून ते तशी दृष्टी देण्याचा प्रयत्न संस्थांनीकांच्या भेटीत सगळीकडेच करत होते.

राजस्थान मधला प्रवास आटोपता घेऊन स्वामीजी आता गुजरातेत अहमदाबादला आले. काही दिवस भिक्षा मागून मिळेल तिथे राहिले नंतर, उपन्यायाधीश श्री बालशंकर उमियाशंकर यांच्याकडे राहिले, जैन साधूंची भेट घेतली. त्यांच्या बरोबर जैन तत्वज्ञानवर चर्चा केली. पुढे लिमडी संस्थानला ते आले. लिमडीचे राजे, श्री ठाकुर जसवंतसिंग स्वामीजींच्या दर्शनाने प्रसन्न झाले. स्वामीजींना त्यांनी राजवाड्यातच काही दिवस ठेऊन घेतलं, ठाकुर जसवंतसिंग इंग्लंड आणि अमेरिकेचा प्रवास करून आले होते. त्यामुळे त्यांच्या विचारांना आधुनिकतेचा स्पर्श झाला होताच. पण तरी सुद्धा भारताच्या सनातन धर्माचा त्यांना अभिमान होता. त्यामुळे स्वामीजींचे विचार त्यांना पटले होते. वेदान्त विचारांचा प्रसार करण्यासाठी स्वामीजींनी पाश्चात्य देशात जावे ही कल्पना त्यांनीच प्रथम स्वामीजींना सुचवली असं म्हणतात. लिमडीहून जुनागडला जाताना ठाकुरांनी स्वामीजींना परिचय पत्र दिले.

भावनगर व सिहोरला राहून ते जुनागड इथं आले. इथल्या वास्तव्यात ते जुनागड संस्थानचे दिवाण श्री हरीदास बिहारीदास देसाई यांच्याकडे राहिले होते. इथला परिसर स्वामीजींच्या विचारांना अनुकूल होता. काही शतकांपूर्वी नरसी मेहता हे संत इथे होऊन गेले होते. शहरापासून जवळच गिरनार पर्वताचा पायथा इथं होता. तिथे जाण्याच्या मार्गावरच अनेक टेकड्यांवर पसरलेली हिंदू, बौद्ध आणि जैन धर्मांची मंदिरे होती. गिरनार पर्वताच्या पायथ्याशी सम्राट अशोकाने लिहिलेला प्राचीन शिलालेख दोन हजार वर्षापूर्वीच्या इतिहासाची साक्ष देत होता. त्यावर, प्रजेला सन्मार्गाने जाण्याचे आवाहन करणारी वचने कोरली होती. धर्म वचनांचा असा नम्रतेने पुरस्कार करणारा सम्राट अशोक खरं तर भारताचा एक वारसाच होता आणि हा इतिहास आपण कसा विसरून गेलो आहोत याची तिथल्या लोकांना स्वामीजींनी आपल्या विवेचनातून जाणीव करून दिली होती.

दिवाण साहेब स्वामीजींबरोबर अनेकांच्या भेटी आणि चर्चा घडवून आणत होतेच. हे संवाद मध्यरात्री पर्यन्त रंगत. स्वामीजींनी इथे, येशू ख्रिस्ताचे जीवन, त्याचा युरोप वर झालेला परिणाम तिथली संस्कृती राफेलची चित्रकला, धर्मोपदेशक, त्यांच्या संघटना, यामागे कशी येशू ख्रिस्ताची प्रेरणा आहे हे लोकांना समजून संगितले. युरोपमध्ये झालेली धर्मयुद्धे सांगितली. त्याच बरोबर भारतीय संस्कृतीतली तत्वे कशी युरोप मध्ये पोहोचली आहेत हे सांगीतले. मध्य आणि पश्चिम आशियाचा इतिहास सांगितला आणि जगत अध्यात्म विचारात आपल्या भारतीय संस्कृतीचा कसा महत्वाचा आणि फार मोठा वाटा आहे हे पण सांगीतले. स्वदेशीचा अभिमान आणि श्रीरामकृष्ण यांचा परिचयही तिथल्या सुशिक्षित लोकांना करून दिला. सर्वंकष विचार करणार्‍या अशा व्यक्तीचा सहवास लाभला आणि भेट झाली यात जुनागड च्या लोकांना धन्यता न वाटली तरच नवल होतं.

इथून स्वामीजी वेगवेगळ्या स्थळांना भेटी देऊन आले. भूज, कच्छ, वेरावळ आणि वेरावळ पासून जवळच असलेला, प्राचीन इतिहासाशी नातं सांगणारं प्रभासपट्टण इथे गेले. तेंव्हा त्यांनी गझनीच्या महंमदाने उध्वस्त केलेले सोमनाथचे भग्न मंदिर पाहिले. अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेले छोटे मंदिर पाहिले.  भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सरदार पटेल यांनी खंबीर धोरण स्वीकारून उभं केलेलं सोमनाथ मंदिर आज आपल्याला दिसतं.

प्रभास पट्टणहून स्वामीजी पोरबंदरला आले. हे ही एक संस्थान होते. तिथले प्रशासक श्री शंकर पांडुरंग पंडित यांच्या नावाने स्वामीजींना जुनागडहून परिचय पत्र दिल्याने स्वामीजी त्यांच्याकडे उतरले होते. हे पंडित वेदवाङ्ग्मयाचे अधिकारी व्यक्ति होते. त्यावेळी त्यांचे वेदांचे भाषांतराचे काम चालू होते. स्वामीजींची ओळख झाल्यावर सुरूवातीला त्यांनी स्वामीजींची कठीण भागाचे भाषांतर करण्यासाठी मदत घेतली. पण  नंतर स्वामीजी या कामात खूप रमले. भाषांतरासाठी मदत म्हणून ते तिथे राहिले.

शंकर पांडुरंग पंडित हे मोठे विद्वान होते. युरोपातील अनेक देशात ते प्रवास करून आले होते. त्यांना फ्रेंच आणि जर्मन भाषा येत होत्या. त्यांचं स्वतच मोठं ग्रंथालय होतं. याचं आकर्षण स्वामीजींना वाटलं होतं. पंडितांनी स्वामीजींना पहिल्या भेटीत सांगितलं होतं की, कितीही दिवस रहा आणि ग्रंथालयाचा हवा तेव्हढा वापर करा. या ओढीने स्वामीजी पुन्हा पोरबंदरला येऊन भाषांतरा साठी राहिले आणि त्यांची वेदांचा अभ्यास करण्याची फार दिवसांची इच्छा पण पूर्ण झाली.

स्वामीजींचे विचार अनेक वेळा ऐकल्यानंतर पंडित त्यांना म्हणाले होते, “स्वामीजी, आपल्या देशात तुमच्या विचारांचं चीज होणार नाही. तुम्ही पाश्चात्य देशात गेलं पाहिजे. भारतीय परंपरा आणि संस्कृती जाणण्याची जिज्ञासा असणारी माणसं तिकडं आहेत. तुम्ही तिथं जाऊन आपल्या धर्मातली सनातन तत्व स्पष्ट केलीत तर, त्याचा प्रभाव पाश्चात्यांवर झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही फ्रेंच भाषेचा अभ्यास केलात तर युरोप मध्येही खूप उपयोग होईल. यावर स्वामीजी म्हणाले, “मी एक संन्यासी आहे, माझ्या दृष्टीनं पूर्व काय आणि पश्चिम काय दोन्ही सारखी आहेत. तशी वेळ आली तर मी पश्चिमेकडे जाईन”. 

आधुनिक दृष्टी असलेल्या, जग पाहिलेल्या आणि हिंदुधर्माचा उत्तम व्यासंग असणार्‍या पंडितांची ओळख आणि भेट आणि वेदांचं भाषांतर करण्याची कष्टाची का असेना मिळालेली संधी यामुळे इथला स्वामीजींचा प्रवास फलदायी झालेला दिसतो. 

क्रमशः…

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ १५  सप्टेंबर अभियंता दिन / १७ सप्टेंबर विश्वकर्मा दिन ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ १५  सप्टेंबर अभियंता दिन / १७ सप्टेंबर विश्वकर्मा दिन ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

15 सप्टेंबर. ! अभियंतादिन. तमाम इंजिनिअर्सनां शुभेच्छा. अभियंतादिन ज्या व्यक्तीच्या अफाट, अचाट कर्तृत्वामुळे अस्तित्वात आला त्या व्यक्तीला आपण विसरुच शकणार नाही.

हे आदर्श अभियंता म्हणजे सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या, ज्यांना”‘नाईट कमांडर” म्हणून ओळखल्या जातं. त्यांचा जन्म 15 सप्टेंबर 1861 चा.

त्यांचे वडिल हे एक संस्कृत विद्वान होते व हिंदू ग्रंथांचे भाष्यकार असून आयुर्वेदिक वैद्य होते. मात्र हे पंधरा वर्षांचे असतानांच वडीलांचे निधन झाल्याने ह्यांच्यावर संकटाचा डोंगरच कोसळला होता. वडील खूप हुषार होते परंतु तेव्हाचा काळ हा सरस्वती व लक्ष्मी एकत्र नांदत नसते ह्या पध्दतीचा होता. त्यामुळे त्यांचे वडील बुध्दीमान असूनही पैसा गाठीशी न जोडून ठेवल्याने त्यांच्या पश्चात ह्यांच्या कुटूंबाला परिस्थीतीचे चटके खूप सोसावे लागले.

त्यांचे प्राथमिक शिक्षण चिकबळ्ळापूर येथे तर उच्चमाध्यमिक शिक्षण बंगलोर येथे झाले. ते १८८१ साली मद्रास येथुन बी. ए. ची परीक्षा उच्च श्रेणीत उत्तीर्ण झाले. स्थापत्य अभियांत्रीकीचे पुढील शिक्षण त्यांनी कॉलेज ऑफ इंजिनीयरींग, पुणे मध्ये पुणे येथे घेतले. १८८३ मध्ये ते इंजिनिअरिंगच्या पदवी परीक्षा प्रथम श्रेणीने उत्तीर्ण झाले.

अभियांत्रिकीमध्ये स्नातक झाल्यावर, त्यांनी मुंबई येथे सार्वजनिक बांधकाम विभागात नोकरी केली. नंतर त्यांना भारतीय पाटबंधारे महामंडळ येथून एका कामगिरीचा श्रीगणेशा करण्यासाठी निमंत्रित करण्यात आले त्यांनी, दख्खन क्षेत्रात पाटबंधाऱ्यांची एक अतिशय क्लिष्ट योजना राबविली. त्यांनी ‘सांडव्याची स्वयंचलीत पूरनियंत्रण द्वार प्रणाली’ विकसीत केली व त्याचे पेटेंट घेतले जी सन १९०३ मध्ये पहिल्यांदा पुण्याजवळील  खडकवासला धरणास लावण्यात आली. ही द्वारे, धरणातील साठ्याची पूरपातळी, पूर आल्यावर धरणास कोणताही धोका न होता, उच्चतम स्थितीस वाढविण्यास वापरण्यात आलीत. या द्वारांच्या कामात मिळालेल्या यशामुळे, ती दारं ग्वाल्हेर व म्हैसूर येथील धरणांवर बसविण्यात आली.

सर विश्वेश्वरैया ह्यांनी हैदराबाद शहराचे पूरापासुन संरक्षण करण्यासाठी जी प्रणाली विकसित केली त्याने त्यांना सत्कार मुर्ती च्या रांगेत बसविण्यात आले. विशाखापट्टणम  बंदरास समुद्री पाण्यापासुन गंजरोधक करण्याची प्रणाली तयार करण्यातही त्यांनी पुढाकार घेतला. सर मो. विश्वेश्वरैया ह्यांनी कावेरी नदीवर कृष्णराजसागर धरण बांधण्याच्या प्रस्तावापासुन ते उदघाटनापर्यंत सर्व कामांची संपूर्ण जबाबदारी स्विकारुन देखरेख केली. या धरणाचे बांधकामाने तेव्हाच्या काळातील हे आशियातील सर्वात मोठे सरोवर ठरले. ह्यामुळेच ते  ‘म्हैसूर राज्याचे पिता’ म्हणून ओळखले जावू लागले.

त्यांचे म्हैसूर राज्याचे नोकरीदरम्यान, त्यांनी सरकारच्या नियंत्रणा खालील म्हैसूर सोप फॅक्टरी, , किटकनाशक प्रयोगशाळा, भद्रावती आयर्न व स्टील वर्कस्, श्री जयचमाराजेन्द्र पॉलीटेक्निक इंस्टीट्युट, बंगलोर ऍग्रीकल्चरल युनिव्हर्सिटी, स्टेट बॅंक ऑफ मैसुर, सेंचुरी क्लब, मैसुर चेंबर ऑफ कॉमर्स असे अनेक औद्योगीक प्रकल्प सुरु केलेत. त्यांनी उद्योगात खाजगी गुंतवणुकीवर भर दिला. त्यांचे वेळेचे नियोजन, प्रामाणिकपणा आणि झोकून देऊन समोरील काम यशस्वीरीत्या पूर्णत्वास नेणे हीच त्यांची शेवटपर्यंत ओळख बनली. तिरुमला-  तिरुपती दरम्यानच्या रस्तेबांधणीत त्यांनी मोलाचे योगदान दिले.

सर विश्वेश्वरय्या ह्यांची सुरत येथून  पुण्याच्या सेन्ट्रल डिव्हिजनमध्ये असिस्टन्ट  चीफ इंजिनिअर या पदावर बदली झाली. पुणे विभाग हा मुंबई प्रेसिडेन्सीमध्ये मोडत असे. या पुणे विभागातच मुंबई प्रेसिडेन्सीमधील सर्वात मोठे असे दोन साठवण जलाशय होते. खडकी क्यानटोन्मेंट विभागाला गाळलेल्या पाण्याचा पुरवठा केला जात असे. मुळा नदीच्या एका कालव्यातून हे पाणी फिफे जलाशयात येत असे. मुळा नदी उन्हाळ्यात कोरडी पडायची तर पावसाळ्यात पूर येउन दगडी बंधाऱ्यावरून पाणी वाहून फुकट जात असे. अस्तित्वात असलेले दगडी धरण उंच करायचे तर पायाच्या भिंतीना अधिक  जलस्तंभामुळे धोका संभवला असत. मग अधिक पाणी साठवण्यासाठी काय मार्ग काढावयाचा ?हा सगळ्यांसमोर यक्ष प्रश्न पडला. श्री विश्वेश्वरय्या यांच्यावर मोठीच जबाबदारी पडलेली होती. परंतु अशा स्थितीत न डगमगता खंबीरपणे त्यांनी या सांडव्यावर ७ ते ८ फूट अधिक पाणी साठवू शकतील असे दरवाजे बनवण्याचे ठरवले आणि स्वतःच्या तल्लख बुद्धीने त्यांनी स्वयंचलित दरवाज्यांचे डिझाईन तयार केले. धरणाच्या  सांडव्यावर आणखी ८ फूट जलस्तंभ अडवतील असे ऑटोमाटिक दरवाजे त्यांनी बनवले. पावसाळ्यात या दरवाज्यांमुळे ८ फूट पाणी अडल्यानंतर जर आणखी अधिक पाणी वाढू लागले तर हे दरवाजे ऑटोमॅटिकली उघडत आणि जादाचे पाणी वाहून जात असे. एकदा का जादा पाणी येण्याचे थांबले की ते दरवाजे बंद होत. हा एक महान आणि क्रांतिकारी शोध त्यांनी लावला. सरकारने त्यांच्या नावाने ह्या  ऑटोमाटिक दरवाजांचे पेटंट त्यांना करून दिले. हे दरवाजे ग्वाल्हेरच्या   आणि कृष्णाराज सागर या धरणांवर बसवले गेले. तसे पाहता  ते  पूर्ण संशोधन श्री  विश्वेश्वरय्या यांचे होते. त्यामुळे त्याच्या पेटंट पोटी  सरकारने त्यांना पेटंट मनी देऊ केला परंतु अतिशय नम्रपणे त्यांनी ते नाकारले. मी ब्रिटीश सरकारच्या नोकरीत असताना हे डिझाईन केले आहे त्यामुळे  त्या पेटंटचे पैसे  घेणे माझ्या नीतिमत्तेला धरून नाही असे त्यांनी सरकारला सांगितले. स्वयंचलित दरवाज्यांचे हे डिझाईन इतके चांगले होते  की हे जलाशयावर बसवलेले हे दरवाजे पाहण्यास ते पन्नास वर्षांनी स्वतः गेले तरी ते दरवाजे उत्तम रीतीने काम करीत होते. पुण्याचा जलसिंचन विभाग पाण्याच्या मोठ्या साठ्यांमुळे आणि धरणांमुळे सन १९०० च्या सुमारास प्रसिद्ध होता. परंतु ज्या भागाला कालव्यांद्वारे पाणी पुरवठा होतो ते प्रांत सुबत्ता प्राप्त करत आणि धरणांच्या खालील भागांना किंवा कालव्याच्या उप शाखांना कमी पाणी पोचत असल्यामुळे तिथे पाणी कमी पडत असे. मोठे व धनवान शेतकरी मुख्य कालव्यातून जास्त पाणी घेत आणि दूरवर वसलेल्या कालव्याबाजूच्या शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी अपुरे पडत असे. ही विषमता दूर करण्यासाठी श्री विश्वेश्वरय्या यांनी पाळीपाळीने किंवा चक्राकार पद्धतीने पिकांना पाणी देण्याची विशेष योजना आखली. कालव्याच्या वरील भागातील श्रीमंत शेतकऱ्यांना या योजनेमुळे मन मानेल तसे पाणी घेता येणार नव्हतेह त्यामुळे त्यांनी आपले म्हणणे केसरीचे तत्कालीन संपादक लोकमान्य टिळक यांच्याकडे मांडले आणि केसरीतून दर आठवड्याला  या चक्राकार पद्धती विरुद्ध लिखाण छापून येऊ  लागले. विश्वेश्वरय्यानी आपली ही योजना सरकारला विशद केली आणि विरोध करणाऱ्या जमीनदार शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा करून ही योजना प्रत्यक्ष कार्यवाहीत आणली. ब्लॉक सिस्टीम या नावाने  ही योजना प्रसिद्ध आहे आणि अजूनही भारतभर हीच पद्धत अवलंबिली जाते.

सर विश्वेश्वरय्या ह्यांच्या बुद्धीमत्तेचे  भारतीयांबरोबरच इंग्रज लोकसुद्धा कौतुक करू लागले. ब्लॉक पद्धतीनुसार वर्षातून तीन पिके वर्तुळाकार क्रमाने घ्यायची आणि उपलब्ध पाणी वापरूनच अधिक लाभ क्षेत्रात पिके काढायची अशी पद्धत आहे. तीन पिकातील एक भात किंवा उस हे सर्वाधिक पाणी लागणारे पीक असावे आणि आणि दुसरे मध्यम पाण्यावर तयार होईल असे असावे तर तिसरे पीक कमीतकमी पाणी लागेल असे असावे असे विश्वेश्वरय्या यांनी निश्चित केले.  एकाच जमिनीत वेगवेगळी पिके पाळीपाळीने घेतल्यास मातीचा कस कमी होत नाही. सगळया  रयतेला हे पटण्यासाठी त्यांनी मोठ्या जमीनदारांना असा प्रयोग निदान एकदा तरी करून पाहण्याची सूचना केली. मोठ्या जमीनदारांनी ते मानले आणि हा प्रयोग कल्पनातीत यशस्वी झाला. सामान्य शेतकरीसुद्धा ब्लॉक सिस्टीमच्या जलसिंचनासाठी तयार झाला. मुंबई सरकारचे ज्येष्ठ सदस्य सर जोन  मूर माकेंझी यांनी या पद्धतीसाठी श्री.  विश्वेश्वरय्या यांचे तोंड भरून कौतुक केले. पाण्याच्या संयमित वापरामुळे डासांचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होउन मलेरिया सारख्या  रोगालाही आळा  बसला.

सन १९०८ मध्ये स्वेच्छानिवृत्ती नंतर म्हैसूर या भारतातील मोठ्या व महत्त्वाच्या राज्याचे दिवाण म्हणून त्यांना नियुक्त केले गेले. कृष्णराज वोडेयार चतुर्थ या म्हैसूरच्या महाराजांच्या पाठिंब्यामुळे सर विश्वेश्वरया यांनी राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी मोठे योगदान दिले. इतर अनेक कामांसोबत, सन १९१७ मध्ये बंगळूर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची त्यांनी स्थापना केली. ही भारतातील पहिली अभियांत्रिकी संस्था होती, जी अद्यापही कर्नाटकातील एक प्रतिष्ठित संस्था आहे.

म्हैसूर येथे असतांना त्यांनी जनतेसाठी केलेल्या कामांमुळे, त्यांना’नाईट कमांडर ऑफ दी ऑर्डर ऑफ दी इंडीयन एंपायर’ या सन्मानाने गौरविले गेले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर, त्यांना सन १९५५ मध्ये ‘भारतरत्न’ या देशाच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केल्या गेल.

सर मो. विश्वेश्वरैया यांना आंतरराष्ट्रीय इंस्टीट्युट ऑफ सिव्हिल इंजिनिअर्स ह्या लंडन स्थित संस्थेने सन्माननिय सदस्यत्व तर इंडियन इंस्टीट्युट ऑफ सायन्स च्या बंगलोर शाखेने फेलोशिप देऊन त्यांचा सन्मान केला. देशातील अनेक विद्यापिठांनी त्यांना ‘डॉक्टर’ ही अनेक विद्याशाखातली पदवी देऊन गौरविले. ते सन १९२३ च्या इंडियन सायन्स कॉंग्रेसचे अध्यक्ष होते.

अशी अद्वितीय, असामान्य माणसं आपल्या देशाची खरी संपत्ती असतात. वयाच्या 101 व्या वर्षी दिनांक 14 एप्रिल 1962 रोजी ह्यांनी अखेरचा श्वास घेतला. सरांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन आणि जगातील तमाम इंजिनिअर्स ना ह्या अभियंता दिनाच्या शुभेच्छा.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print