मराठी साहित्य – विविधा ☆ नदीचे प्रदूषण थांबविण्यासाठी वैयक्तिक व सामाजिक जबाबदारी – भाग २ ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

?  विविधा ?

☆ नदीचे प्रदूषण थांबविण्यासाठी वैयक्तिक व सामाजिक जबाबदारी – भाग २ ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

(निबंध स्पर्धेतील प्रथम पुरस्कार प्राप्त निबंध)

(मला माणसाला विचारावसं वाटतं, “तुमची जीवनदायी मी  माझे उपकार फेडणार, कृतज्ञ होणार, की माझ्या अस्तित्वाशीच खेळणार रे ? माझ्या अस्तित्वाची भवितव्याची मला घोर काळजी लागलीय.)

नदीची अशी व्यथा ऐकत असताना मन बेचैन झालं तिच्याविषयी सहानुभूती आणि काळजी वाटायला लागली पुढील पिढ्यांना काय सांगायचं असं वाटायला लागलं तिच्या व्यथा निराकरण आणि उपचार गांभीर्याने करायला हवेत

त्यांना आरोग्यदायी करायला हवं तरच जीवसृष्टीचे आरोग्य चांगले राहणार आहे एका व्यक्तीपासून म्हणजे स्वतःपासून पुढे कुटुंबापासून सुरुवात करायला हवी . उत्सव सणवार याचे निर्माल्य,

तसेच मृत्यू पावलेल्यांच्या अस्थी, रक्षा या गोष्टी नदीत विसर्जन करतात .ते टाळण्यासाठी समुपदेशन करणे अत्यंत

गरजेचे आहे. नदीमध्ये जनावरे धुणे, कपडे धुणे कसे अपायकारक आहे, हे समजवायला हवे .गणपती उत्सवाच्या वेळी मूर्तींना दिले जाणारे रंग विषारी असतात. प्लास्टरच्या मूर्ती विरघळत नाहीत. जलचरांना या गोष्टींचा धक्का पोहोचतो. पूर्वी कुंभाराच्या मातीचे ‘ गणोबा ‘ केले जायचे. ( लहान मूर्ती ) त्याचीच पूजा केली जायची. त्याला रंग नसायचा .जल प्रदूषणाचा प्रश्न नव्हता .पंचगंगा नदी तर जलपर्णीने झाकून गेल्याने तिचा प्रवाहच दिसत नाही ,अशी अवस्था आहे .कोयना प्रकल्पामध्ये काम केलेल्या श्री वी. रा .जोगळेकर यांनी जलपर्णी पासून उत्तम कंपोस्ट खत बनवले. असे प्रयोग ,त्याचा प्रचार आणि प्रसार व्हायला हवा. चांगले आचरण आणि शुद्ध विचारांचा सर्वांनी अंगीकार करायला हवा. नद्यांचे संरक्षण करून त्यांना पुनरुज्जीवन  द्यायला हवे. राजस्थानचे एक आदर्श उदाहरण म्हणून अंगीकार करायला काहीच हरकत नाही.

व्यष्टी पासून सुरुवात करून, समष्टी पर्यंत प्रत्येकाने जबाबदारी घ्यायला हवी. भारतीय संस्कृतीचा आणि सभ्यतेचा आधार म्हणून नदी शुद्धीकडे पाहायला हवे. नद्यांच्या काठावर बांबूची झाडे लावायला हवीत. कारखान्यांमधून बाहेर पडणाऱ्या पाण्यावर प्रक्रिया प्लांट उभे करणे व ते कार्यरत ठेवणे सक्तीचे करायला हवे. अन्यथा कडक शासन आणि मोठे दंड करायला हवेत .याबाबत सांगायचं तर पैशाच्या आमिषाने सगळे कायदेभंग करून कारखाने खुशाल घाण पाणी नदीत सोडतात. तात्पुरती डागडुजी होते. पुन्हा तोच प्रकार चालू राहतो .आणि नदीवर माशांचा खच दिसायला लागतो. कोण कोणाला जबाबदार धरणार!. प्रथम भ्रष्टाचार बंद व्हायला हवा. अलीकडे कृष्णा प्रदूषणाबद्दल, काही सहकारी साखर कारखान्यांना चार कोटी 46 लाखांचा दंड ठोठावण्यात आला. (प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून) तसेच सांगली महापालिकेला लागू होणाऱ्या दंडाची रक्कम मोठी असल्याने त्याची गणती करण्यासाठी मुदत मागितली गेली. शहरातील सांड पाण्यावर प्रक्रिया व्हायला हवी .साखर कारखान्यांनी सोडलेल्या पाण्यात 1000 ते 1500 मिलिग्रॅम पर्यंत बी . ओ. डी . सेंद्रिय पदार्थ, मळीपासून अल्कोहोल तयार करणाऱ्या आसवाणी मधून  स्प वॉश नावाचे अत्यंत दाहक लाल सेंद्रिय पदार्थ असलेले क्षार असणारे सांडपाणी बाहेर पडते. त्याचा सर्वात जास्त (बि.ओ.डी. चार हजार ते पाच हजार मि. लि.) प्रदूषणाचा धोका असतो. स्पेसमड या टाकाऊ घनपदार्थाच्या मिश्रणातून कंपोस्ट खत बनविण्याचा प्रकल्प करायला हवा. शहराच्या सांडपाण्यावर म्हणावे तितके लक्ष दिले जात नाही. उपसा व शुद्धीकरणातही बऱ्याच त्रुटी आहेत. बंधाऱ्यांमुळे प्रवाह नसल्याने हवेतील ऑक्सिजन योग्य प्रमाणात पाण्यात मिसळत नाही . तसेंच रेठरे नाला आणि शेरी नाला यांचे प्रश्न अजून चालूच आहेत. शेतकरी शेतीला भरमसाठ नको इतके पाणी पाजतो. एक तर जमीन खराब होते. आणि खते कीटकनाशके मातीत मुरून ते पाणी नदीत उतरते .रसायनिक खतांपेक्षा सेंद्रिय खतांच्या वापराबद्दल समुपदेशन व्हायला हवे. नवीन उद्योगधंद्यांना परवानगी देताना, त्यावर प्रदूषण मंडळांनी कडक बंधने घालायला हवीत. वाळू तस्करांवर कडक कारवाई करायला हवी.आदर्श उदाहरण म्हणून देता येईल . किर्लोस्कर ऑइल इंजिनच्या सामाजिक बांधिलकी, उपक्रमाच्या माध्यमातून मोरेवाडी आणि राजेंद्र नगर या कोल्हापूरच्या उपनगर परिसरातून वाहणाऱ्या सांडपाण्यावर जलशुद्धीकरणाच्या एक छोटा प्रयोग आणि प्रयत्न केला आहे आणि तो यशस्वी झाला आहे .हे सांडपाणी शिवाजी विद्यापीठ परिसरातून पुढे जयंती नाल्याला मिसळते .आणि पुढे ते पंचगंगा नदीत जाते .मोरेवाडी आणि राजेंद्रनगर येथून जे पाणी वाहते, त्याच ठिकाणी लुप्त झालेली ‘ ‘गोमती ”  नदी आहे .या प्रवाहाचे पात्र न बदलता , तेच पाणी दोन तीन ठिकाणी वळवून घेऊन, वरच्या भागातला प्रवाह स्वच्छ करून, थोडा रुंड केला .तीन चार ठिकाणी दगडी भिंती, बांध घालून नैसर्गिक रित्या गाळणीची प्रक्रिया केली. तीन-चार ठिकाणी पाणी स्थिर झाल्याने ऑक्सिडेशन ची प्रक्रिया जलद व्हायला लागली. दुर्गंधी कमी झाली .तिथेच एक लाख लिटर पाणी मावेल असा खड्डा खणला ,आणि त्यामध्ये पाणी साठवण होत आहे. असे प्रयोग अनेक ठिकाणी राबवता येतील .रोज प्रक्रियाविना हजारो लिटर पाणी जयंती नाल्यात मिसळत होते. ते स्वच्छ होऊन वापरात आले. मोठमोठी झाडे व पक्षांचा अधिवास वाढला .एक नवी परिसृष्टी  विकसित होताना दिसत आहे .यासारखे प्रयोग त्याचा प्रचार आणि प्रसार सर्वत्र व्हायला हवा.

आज 75 नद्यांच्या पुनरुज जीवनासाठी निधी मंजूर झाला आहे .पण त्यावर कृती व्हायला हवी .प्रत्येक गाव ,तालुका, जिल्हा ,राज्य, आणि देश अशा पातळीवर कृती व्हायला हवी. जागतिक स्तरापर्यंत ,” पाणी आणि नद्या” यावर परिषदा घ्यायला हव्यात .नदी – -समाज– शासन यांचा समन्वय साधायला हवा .नद्यांवर लिहिलेल्या पुस्तकांची प्रसिद्धी व्हायला हवी. नदी स्वच्छतेविषयी काढलेली पत्रके घरोघरी वाटप करून लोकांमध्ये जागृती व्हायला हवी. शालेय पातळीवर प्रत्येक इयत्तेत हा विषय शिकवायला हवा. चार भिंतीत शिकवत असताना पंधरा दिवसात किंवा महिन्यात मुलांना नदीवर नेऊन सर्व गोष्टी दाखवायला हव्यात .नद्या पुन्हा अमृतवाहिनी ,शुद्ध ,निर्मळ ,पवित्र व्हाव्यात या दृष्टीने आराखडे केले जात आहेत .” चला जाणूया नदीला” अभियान सुरू आहे. निसर्ग प्रतिष्ठान ,माझी माय कृष्णा   (,महाराष्ट्रात ) ,आभाळमाया, देवराई फाउंडेशन ,नेचर कॉन्सर्वेशन,  यांनी चळवळ सुरू केली आहे .गंगाशुद्धीसाठी जपानने हात पुढे केला आहे. सामाजिक प्रयत्न चालू आहेत, ही समाधानाची गोष्ट आहे .

हे काम एकट्या दुखट्याचे नाही, तर व्यक्ती ते समाजापर्यंत प्रत्येकाने , ” सहना ववतु सहनौभुनक्तु अशी जबाबदारी स्वीकारायला हवी. पाणी हे जीवन समजून, नदीला जीवनदायिनी समजून निरामय जीवन जगायचंय. मग सर्वांनीच प्रयत्न करायला हवेत ना? झालेली घाण काढून नवीन घाण नदीत जाणार नाही याची कटाक्षाने काळजी घ्यायला हवी. नद्यांच्या जलप्रवाहाचा खळखळणारा मधुर आवाज, संगीत पूर्वीप्रमाणेच ऐकायला मिळावं असं प्रत्येकालाच वाटतं ना !नदी म्हणते,

 गंगा यमुना गोदा कृष्णा.

 तृप्त करतो सजीवांची तृष्णा.

 विकसित झाली इथे संस्कृती.

 बांध घालूनी वीज निर्मिती.

 असूनही आम्ही जीवनदायीनी.

  भय अस्तित्वाचे संपत नाही.

  वंदन करिते देवा तुजला.

  सदबुद्धी दे या मानवाला.

— समाप्त — 

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ नदीचे प्रदूषण थांबविण्यासाठी वैयक्तिक व सामाजिक जबाबदारी – भाग १ ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

?  विविधा ?

☆ नदीचे प्रदूषण थांबविण्यासाठी वैयक्तिक व सामाजिक जबाबदारी – भाग १ ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

(निबंध स्पर्धेतील प्रथम पुरस्कार प्राप्त निबंध)

गंगेच, यमुनेचैव, गोदावरी सरस्वती।

नर्मदे , सिंधू ,कावेरी ,जलेस्मिन संन्निधिं कुरु ।।

दररोज सकाळी देवाची पूजा करत असताना, देवा जवळच्या कलशात सर्व नद्यांना आपण आवाहन करतो. त्यावरूनच नदीचे महत्व किती आणि कसं असतं पहा बरं!

पण आज ती व्यथित आणि दुःखी झालीय . तिची व्यथा कोणी तिर्हायितानी सांगण्यापेक्षा तिने स्वतः सांगितली तर ते जास्त सयुक्तिक ठरेल. आणि मग तिच्या व्यथेवरील उपचार, व्यष्टी ते समष्टी पर्यंत कसे आणि काय करायचे याचा विचार करावा लागेल .ती स्वतःची महानता प्रथम सांगायला लागली .भारतीय संस्कृतीमध्ये आम्हाला देवत्व दिलं.राष्ट्रगीतातही नावं घेतली. ऋग्वेदामध्ये आमच्या अनेक प्रार्थना आहेत. आम्हाला केवळ पाण्याचा प्रवाह न मानता, ईश्वरी तत्त्वाचा अविष्कार , देवता स्वरूप मानून, मंदिरं बांधली. मानव, प्राणी, पक्षी, जंगलं, शेती, वीज निर्मिती, जल पर्यटन किती किती सांगू ! या सगळ्यांच्या जीवनदायीनी आहोत आम्ही! स्कंद पुरणात एक श्लोक आहे”, न विभाती  नदी हीनो पृथ्वीय भूसुरत्तमं। नदीहीनो हय्यं देश प्रसिद्धोपि न शोभते”।। देशातल्या जणू रक्तवाहिन्या आहोत आम्ही.

पण हाय ,हाय! ही सगळी माझी महानता असली तरी आज माझी काय दूरदशा आहे, असं म्हणण्यापेक्षा, या माणसाने काय दुर्दशा केलीये असं म्हणावं लागेल .मी, आम्ही अमृत गंगा. पण घाणीची अंघोळ घालून विषगंगा करून टाकलय आम्हाला .त्यामुळे माझ्या अंगा खांद्यावर खेळणारे मासे, कासव, मगरी, वगैरे जलचर आजारी पडून मरत आहेत. आणि ते खाऊन माणसंही मेंदू आणि पोटाच्या विकाराने आजारी पडत आहेत. चार लाख लोक मृत्यू पावत आहेत. आणि ही गोष्ट डब्ल्यू. एच. ओ. चा अहवालच सांगतो. शहरांमधली विसर्जित केलेली घाण, कचरा ,औद्योगिक उत्सर्जक वस्तू, किरणोत्सारी पदार्थ माझ्या पोटात टाकून माझी नरकावस्था करून टाकलीय. कुठवर सहन करू मी हे सगळं? 2009 मध्ये केंद्रीय प्रदूषण मंडळाच्या अहवालात माझ्यासह दीडशे अशा माझ्या भगिनी प्रदूषित असल्याच सांगितलंय. आणि 2019 मध्ये ती संख्या 300 इतकी झाली . हे चित्र जीवसृष्टीचा संकट काळ जवळ येत असल्यासच आहे ना? मला माणसाला विचारावसं वाटतं, “तुमची जीवनदायी मी  माझे उपकार फेडणार, कृतज्ञ होणार, की माझ्या अस्तित्वाशीच खेळणार रे ? माझ्या अस्तित्वाची भवितव्याची मला घोर काळजी लागलीय.

क्रमशः… 

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मी एक असमंजस… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

🔅 विविधा 🔅

मी एक असमंजस ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

या पूर्वी माझा डोळसपणा व माझा कानसेन पणा आपण वाचला आहे. आज तर मला माझ्या समजुती की गैरसमजुती ? शहाणपणा की मूर्खपणा ? यातच गोंधळ होऊ लागला आहे. आणि मी सामान्य नसावी असे वाटू लागले आहे. हे असे वाटण्याची कारणे पण सांगते. मलाच माझ्यावर शंका येऊ लागली आहे.

तर काही दिवसांतील अनुभव सांगते. मी अनेक वर्षे सकाळी लवकर चालायला जात असते म्हणजे आपले मॉर्निंग वॉक. तर यात विशेष काय? सगळेच जातात ना ? असे मला वाटते. पण चालायला आल्यावर छान निसर्ग ( असेल तर ) बघावा. गवतावर चालावे, फुलांचा,गवताचा,झाडांचा मंद सुगंध भरून घ्यावा. स्वतःशी मस्त संवाद करावा. काही काळ फोन,इतर साधने यांना विश्रांती द्यावी. अशी माझी समजूत आहे. म्हणून मी फोन शक्यतो घरी ठेवते. पण यात रमणारी मी मूर्ख ठरते. कारण बघावे त्यांच्या कानात निरनिराळी बटणे ( आपले हेडफोन्स ) दिसतात. एकदा तर चांगलीच गंमत झाली. माझ्या शेजारून चालणारी मुलगी अचानक माझ्याशी बोलू लागली. मला तेच हवे असते. मी कुठेतरी वाचले होते, दोन माणसे एकमेकांशी बोलत आहेत हे सर्वात सुंदर दृश्य आहे. मी तर माणूस वेडी. ती बोलत आहे हे बघितल्यावर मी पण बोलू लागले. आणि थोड्याच वेळात ती माझ्याकडे विचित्र नजरेने बघू लागली. कारण ती त्या बटण सदृश्य हेडफोन मधून अनेक कि.मी. जवळ असलेल्या व्यक्तीशी बोलत होती. आणि मी तिच्याशी. मग माझ्या विषयी तिचे गैरसमज होणारच. अजून एक गंमत अनुभवास येते. बरीच मंडळी जाता येता झाडाची पाने तोडतात व काही अंतरावर टाकून देतात. हे बघून मला मात्र वाईट वाटते. असे वाटते त्या झाडांनी तुमचे काय बिघडवले आहे? तसे सांगण्याचा प्रयत्न केला तर लोक विचित्र नजरेने बघतात. काही मंडळी तर गवतावर बसतात. आणि हाताने त्याच जागेवरचे गवत उपटतात. बरेचदा आपण हे करत आहोत हे पण त्यांच्या लक्षात येत नाही. मी लक्षात आणून दिले की तेच विचीत्रपणे बघणे अनुभवते.

माझा अजून एक मूर्खपणा सांगते. त्याच मॉर्निंग वॉक वरून परतत असताना मला एक वेगळाच छंद जडला आहे. ज्यांचे नळ चालू आहेत व पाणी वाया जात आहे ते बंद करायचे. ज्यांच्या पाण्याच्या टाक्या ओसंडून वहात आहेत त्यांना त्यांच्या घरात जाऊन सांगायचे व वाहणारे पाणी बंद करायला लावायचे. आणि रस्त्यावर वाहणाऱ्या नद्या बंद करायच्या म्हणजेच रस्ते स्वच्छ करणे थांबवायचे. आहे ना वेडेपणा? कारण आम्ही बिल भरतो, आमचा नळ आहे तुम्हाला काय करायचे आहे? अशी मुक्ताफळे ऐकून घ्यावी लागतात. तरी मी काही सुधारत नाही. याच पाण्या बाबत आमचा वेडेपणा सांगते. तर आम्ही काय करतो ते सांगते म्हणजे तुम्हाला पण पटेल. आम्ही  डाळ,तांदूळ,भाज्या धुतलेले पाणी एका छोट्या बादलीत घेतो आणि ते कुंड्यातील झाडांना घालतो. कपडे धुतलेले पाणी सडा टाकायला वापरतो. कपडे पिळलेले पाणी संडास,बाथरुम धुवायला वापरतो.पाणी प्यायला देताना शक्यतो अर्धा ग्लास देतो. लागले तर पुन्हा देता येते. आणि तरीही उरलेच तर एका भांड्यात साठवतो. ते कुठेही वापरता येते. गाड्या नळीने न धुता अशा साठवलेल्या पाण्यातून धुणे/पुसणे करतो. पण पक्ष्यांना मात्र एका मोठ्या भांड्यात आवर्जून पाणी ठेवतो.

आहे ना वेडेपणा?

हीच गोष्ट लाईटची घराबाहेरील लाईट रात्र रात्र चालू असतात. बरे हे काम करायला रस्त्यावरील सरकारी दिवे चालू असतात. काहींच्या घरात संडास, बाथरुम यातील लाईट चोवीस तास चालू असतात. आपल्याला खटकले आणि विनंती करून सांगितले तरी उत्तर तेच मिळते. आम्ही बिल भरतो. आमच्या घरात किंवा बाहेर लाईट ठेवतो. तुम्हाला काय करायचे आहे? आम्ही मात्र प्रत्येकाच्या हाताला व मनाला सवय लावून घेतली आहे, ज्या खोलीतील काम होईल त्या खोलीतील लाईट बंद करायचे. आहे ना वेडेपणा?

एक असाच वेडेपणा नुकताच अनुभवला. मतदान करण्यासाठी सुट्टी मिळाली होती. शनिवार रविवार याला जोडून सुट्टी होती. म्हणजे उत्तम योग. आणि त्याचा फायदा उच्च विद्या विभूषित हुशार लोकांनी घेतला. मस्त जोडून रजा घेऊन छान थंड हवेची ठिकाणे गाठली की. आणि आमच्या वयाची काही मूर्ख माणसे ७/८ तास प्रवास करुन मतदानासाठी पोहोचली. आणि आमच्या सारखे कर्मचारी तर ऊन,तहान सगळे विसरून,स्वतःला होणारे त्रास विसरुन मतदान अधिकारी म्हणून काम करत होते. आहे ना मूर्खपणा?

असे बरेच वेडेपण आहे. जाता जाता अजून एक वेडेपणा सांगते. हल्ली मस्त रात्री केक कापून मोठ्या आवाजात गोंधळ करुन  Happy Birthday साजरा करतात. केक तोंडाला फासतात. आम्ही मात्र वाढदिवस सकाळी साजरा करतो. सुवासिक अंघोळ घालतो. गोडाचे जेवण करतो. औक्षण करतो. देवळात जाऊन आशीर्वाद घेतो. एखाद्या संस्थेत त्या दिवशी जेवणाचा होणारा खर्च देतो. आहे ना वेडेपणा?

इतरांचे उच्च आवाजातील संगीत, डीजेचे व अपरात्री फटाक्यांचे आवाज ऐकणारे आम्ही. स्वतःच्या घरात कुलर लावताना त्याचा आवाज इतरांना त्रास देईल का? हा विचार करून आपला फॅन लावून झोपणारे आम्ही. आहोत ना वेडे?

तर मंडळी असे वेडेपणाचे बरेच किस्से आहेत. नमुना म्हणून काही सांगितले. आणि आपल्याच मंडळींचा सल्ला घ्यावे वाटले. म्हणून हा लेखन प्रपंच केला आहे.

© सुश्री विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक.

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग १२ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग १२ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र – “युवर मेडिकल रिपोर्ट इज नॉट फेवरेबल. यू आर मेडिकली अनफिट..” रिसेप्शनिस्टचे शब्द ऐकून मला धक्काच बसला.

“यू मे कॉल ऑन अवर मेडिकल ऑफिसर डाॅ.आनंद लिमये.ही इज अ राईट पर्सन टू टेल यू द करेक्ट रिझन.” ती म्हणाली.

मी नाईलाजाने जड पावलांनी पाठ फिरवली. ‘कां?’ आणि ‘कसं?’ या मनातल्या प्रश्नांना त्याक्षणी तरी उत्तर नव्हतं. आता डॉ.आनंद लिमये हाच एकमेव आशेचा किरण होता! मला अचानक बाबांनी दिलेल्या दत्ताच्या फोटोची आठवण झाली.एखाद्या प्रतिक्षिप्त क्रियेसारखा मी माझ्या शर्टचा  खिसा चाचपला.पण..पण तो फोटो मी नेहमीसारखा आठवणीने खिशात ठेवलेलाच नव्हता.सकाळी निघतानाच्या गडबडीत माझ्या नकळत मी तो फोटो घरीच विसरलो होतो.तीच रुखरुख मनात घेऊन मी डॉ. आनंद लिमये यांच्या क्लिनिक समोर येऊन उभा राहिलो..)

माझं तिथं येणं त्यांना कदाचित अपेक्षित नसावं.मला पहाताच ते काहीसे अस्वस्थ झाल्याचा भास मला झाला.मी तिथे येण्यामागची सगळी पार्श्वभूमी त्यांना थोडक्यात सांगितली. अतिशय पोटतिडकीने त्यांना माझी सगळी कर्मकहाणी सांगून स्टेट बँकेतली ही नोकरी या परिस्थितीत माझ्या जगण्याचा एकमेव आधार आहे हे त्यांना पटवून द्यायचा माझ्यापरीने प्रयत्न करीत राहिलो. ते काहीसे चलबिचल झाल्याचे जाणवले.

“पण तुमच्या ब्लड, यूरिन, स्टूल सगळ्याच रिपोर्ट्समधे निगेटिव्ह ईंडिकेशन्स आहेत. अशा परिस्थितीत मी फेवरेबल मेडिकल रिपोर्ट कसा देणार? आणि आता तर मी ऑलरेडी माझा रिपोर्ट ब्रॅंचला सबमिट केलेला आहे.अशा परिस्थितीत…”

“पण डॉक्टर, मुंबईला आयुष्यात मी प्रथमच आलोय. त्यामुळे हवापाण्यातल्या बदलामुळे मला नुकताच ताप येऊन गेला होता.मेडिकल टेस्टच्या एकदोन दिवस आधीच ताप उतरला होता. रिपोर्ट्समधल्या त्या त्रुटी हा त्याच्याच परिमाण असणार ना?माझी औषधं अजून सुरु आहेत आणि या त्रुटी औषधाने यथावकाश दूर होणाऱ्याच तर आहेत.मग केवळ त्यामुळे बँकेत नोकरी करण्यासाठी मी कायमस्वरूपी अनफिट कसं काय ठरु शकतो?” 

“हो, पण तुम्ही तुमच्या आजारपणाबद्दल मला आधी कल्पना द्यायला हवी होतीत ना? मेडिकल टेस्ट कांही दिवस पुढे ढकलता आली असती. अॅट धीस स्टेज… आय ॲम हेल्पलेस. सॉरी.. आय कान्ट डू एनिथिंग…”

खूप आशेने मी इथे आलो होतो. निराश होऊन बाहेर पडलो. खूप एकटं.. खूप निराधार वाटू लागलं.अंधारुन आलेल्या मनात प्रकाशाची तिरीप यावी तशी ‘त्या’ची आठवण झाली आणि… ‘त्या’नेच मला सावरलं! हो.. ‘त्या’नेच..! कारण त्याची आठवण झाली त्याच क्षणी ‘सगळं सुरळीत होईल काळजी नको’ हे बाबांचे शब्दही आठवले. मनात ध्वनित झालेल्या त्या शब्दांनी ‘तो’च मला दिलासा देतो आहे असा भास झाला आणि मी सावरलो!आता स्वस्थ बसून चालणार नाही, अखेरपर्यंत शक्य असतील ते सगळे प्रयत्न आपणच करायला हवेत याची जाणिव झाली. लहानपणापासून वेळोवेळी कानावर पडलेले बाबांचे शब्द मला आठवले आणि मी सावरलो….!मनात उमटत राहिलेले त्याच शब्दांचे प्रतिध्वनी मला दिलासा देत माझ्या विचारांना योग्य दिशा  देत राहिले…

‘त्याच्याकडे कधीच कांही मागायचे नाही. जे घडेल ते मनापासून स्वीकारायचे. खंबीरपणाने त्याला सामोरे जायचे. आपल्या हिताचे काय आहे ते आपल्यापेक्षा तोच जाणतो. आणि योग्य वेळ येताच आपल्याला तो ते न मागता देतोही. आपण कर्तव्यात कसूर करायची नाही. प्रयत्नांची पराकाष्ठा सोडायची नाही. तो यश देतोच. क्वचित कधी अपयश आलंच, तर ते दीर्घकाळाचा विचार करता आपल्या हिताचंच होतं हे नंतर जाणवतंच…’ मनात घुमणारा बाबांचा शब्द न् शब्द मला त्या हताश मनोवस्थेत योग्य मार्ग दाखवून गेला. मनावरचं दडपण थोडं कमी झालं.

‘काहीही अडचण आली तरी बँकेच्या नंबरवर मला लगेच फोन कर’ हे निरोप घेतानाचे भावाचे शब्द मला आठवले.मनात उलटसुलट विचारांनी पुन्हा गर्दी केली…..

‘त्याला फोन करायलाच हवा. हे सगळं त्याला सांगायलाच हवं… पण.. पण कसं सांगायचं? काय वाटेल त्याला हे सगळं ऐकून? त्याने आणि घरी आई-बाबांनीही आपण आज स्टेट बँकेत जॉईन झालोय हेच गृहीत धरलंय.आता हे सगळं ऐकून काय वाटेल त्यांना..?”

मी मनावर दगड ठेवून  जवळच्याच पोस्टात गेलो. भावाला फोन लावला खरा पण रिसीव्हर धरलेला माझा हात भावनातिरेकानं थरथरु लागला. मोजक्या शब्दात सगळं

सांगतांनाही आवाज भरून येत होता. सांगून संपलं तरी क्षणकाळ त्याच्याकडून काही प्रतिसादच आला नाही. त्याला सावरण्यासाठी तेवढा वेळ तरी आवश्यक होताच.

“हे बघ, तू स्वतःला सावर. डिस्टर्ब होऊ नको. अजूनही यातून काही मार्ग निघेल” तो म्हणाला.

“नाही निघणार…”मी रडवेला होऊन गेलो..”कसा निघणार..?”

“आपण प्रयत्न तरी करु.मी माझ्या मॅनेजरसाहेबांशी बोलतो. स्टाफ डिपार्टमेंटमधे त्यांच्या चांगल्या ओळखी आहेत. ते नक्की मदत करतील. काळजी करू नकोस.मी आधी माझ्या साहेबांशी बोलून बघतो.तू थोड्या वेळाने मला फोन कर. आपण बोलू सविस्तर”

मी रिसिव्हर खाली ठेवला. त्याक्षणी मन स्वस्थ झालं. काहीतरी मार्ग निघण्याची थोडीशी कां असेना पण आशा निर्माण झाली होती.

हा आशानिराशेचा खेळ पुढे अनेक महिने असाच सुरु राहिला. अथक प्रयत्न, संपर्क,गाठीभेटी, रदबदल्या सगळं झाल्यानंतर अखेर या सगळ्या प्रकरणाला अनपेक्षित पूर्णविराम! हाती कांही न लागताच अखेर सगळं हातून निसटून गेलंच. स्टेट बँकेची पूर्वीची वेटिंग लिस्ट रद्दसुद्धा झाली आणि नवीन भरतीसाठी पेपरमधे पानभर जाहिरातही झळकली..!

केवळ भावाच्या आग्रहाखातर त्या जाहिरातीस प्रतिसाद म्हणून मी स्टेट-बँकेत पुन्हा नव्याने अर्ज केला. याच दरम्यान पूर्वी मेहुण्यांच्या ओळखीतून खाजगी नोकरीसाठी त्यांनी शब्द टाकला होता त्याची परिणती म्हणून शिवडीच्या ‘स्वान-मिल’मधल्या पीएफ् डिपार्टमेंटला मला दिवसभर चरकातून पिळून काढणारी तुटपुंज्या पगाराची नोकरी मिळाली. नव्या खेळाला नव्याने सुरुवात झाली..!

पुढे जे काही घडत गेलं ते सगळं योगायोग वाटावेत असंच होतं. पण तरीही जणू काही कुणीतरी ते मुद्दाम घडवत होतं. ‘कुणीतरी’ म्हणजे माझ्या मनात मी श्रद्धेनं जपलेला ‘तो’च होता! कारण वरवर योगायोग वाटणाऱ्या पुढे घडत गेलेल्या सगळ्याच घटना अघटीत वाटाव्यात अशाच होत्या हे माझं मलाच जाणवत होतं. आणि आत्तापर्यंत घडलेल्या या सगळ्या नकारात्मक  बारीकसारीक घटना म्हणजे ‘त्या’नेच केलेले या सगळ्या अनिश्चिततेतून मला अलगद बाहेर काढण्यासाठीचे पूर्वनियोजन होते याचा प्रत्ययही आला. पण तोपर्यंतचा संघर्षाचा काळ मात्र माझी आणि माझ्या ‘त्या’च्यावरील श्रद्धेची कसोटी पहाणाराच होता!

‘क्वचित कधी अपयश आलंच तरी ते आपल्या हितासाठीच होतं हे कालांतरानं जाणवतंच’ हे कधीकाळी ऐकलेले बाबांचे शब्द मी त्या संघर्षकाळात घट्ट धरून ठेवले होते आणि पुढे ते आश्चर्यकारकरित्या शब्दशः खरेही ठरले!!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ दान… दृष्टीचे ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ दान… दृष्टीचे 👁️ ☆ सौ कल्याणी केळकर बापट

(१० जून..आंतरराष्ट्रीय दृष्टीदान दिनानिमित्त)

नेत्रदानाचे महत्व लक्षात घेऊन दरवर्षी 10 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय दृष्टिदान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या माध्यमातून लोकांमध्ये नेत्रदानाची जनजागृती केली जाते.

नेत्रदानाचे महत्व या बद्दलची जनजागृती करून लोकांना मृत्यूनंतर डोळे दान करण्याची प्रतिज्ञा घेण्यास प्रवृत्त करणे, हे दृष्टीदिनाचे उद्दिष्ट आहे. विकासशील देशांमध्ये प्रमुख सार्वजनिक आरोग्याच्या समस्यांपैकी अंधत्व ही मुख्य समस्या आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार कार्निया संबंधित आजार, मोतीबिंदू आणि काचबिंदू नंतर होणाऱ्या दृष्टी हानि आणि अंधत्वच्या मुख्य कारणांपैकी आहे.

कुठलही दानं हे उत्स्फूर्तपणे करावं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण ज्यांना काही देऊ करतो त्या गोष्टींची आवश्यकता, गरज ही समोरील व्यक्तीला हवी. तुमच्याकडे अतिरिक्त असणाऱ्या गोष्टी दुसऱ्या ला फारशी गरज नसतांना देऊ करणे हे दान ह्या परिभाषे खाली नक्कीच येत नाही हे देणा-यांनी आवर्जून लक्षात ठेवावे.

नुकत्याच उमलू लागलेल्या आमच्या वयात “धनवान”ह्या चित्रपटातील “ये आँखे देखकर हम सारी दुनिया भूल जाते है”हे गाणे किंवा “आँखोंही आँखोमे ईशारा हो गया,बैठे बैठे जिने का सहारा हो गया”ह्यासारखी अवीट गोडीची अविस्मरणीय गाणी दिसण्याच्याही पलीकडील नजरेच,दृष्टी चं महत्व आम्हाला सांगू लागली. खरचं सगळ्या जगाची,ज्ञानाची, माहिताची ओळख पटविण्याचं काम हे डोळेच तर करतात. लहानसं इटुकलं पिटुकलं बाळ सुद्धा जन्म झाल्याबरोबर आपल्या मिचमिच्या डोळ्यांनी उजेडाचा क्षणभर त्रास सहन करीत अवतीभवतिच  हे जग बघायला सुरवात करतं. मग हळुहळू हे डोळे आपल्याला नुसतीच नजर, दृष्टी देतात असं नाही तर सभोवतालचे ज्ञान मिळवित एक नवा दृष्टिकोन पण देतात.

हे डोळेच तर आपल्याला नवनवीन संकल्पना सहज समजवायला मदत करतात , हे डोळेच आपल्याला नवनवीन क्षेत्रात प्रगती करायला मदत करतात, हे डोळेच आपल्याला ह्या आणाभाका, कस्मेवादे निभवायला शिकवितात. हे डोळेच आपल्याला परस्परांची ओळख पटवायला शिकवितात. त्याचबरोबर ह्या डोळ्यांनी स्वतःला कसं ओळखावं हे पण शिकवितात. ह्या डोळ्यांमध्येच आपल्याला माया,ममता,प्रेम दिसून येतं,जीवन खूप सुंदर आहे ह्याची ग्वाही पटते, तर कधीकधी ह्या डोळ्यांमध्येच आपल्याला चीड, राग,संताप दिसून आल्याने आपलं नेमकं कुठं, काय, किती चुकलं ते आपण शोधायला लागतो. ह्य डोळ्यां मध्येच कधी आपल्याला वासनेची झलक आढळून आल्यास आपण लगेच सतर्क होतो. खरोखरच हे डोळे आपल्याला सगळी ओळखं पटवून देऊन जगात सक्षमपणे जगणं शिकवितातं.

आपल्याला निरामय, अव्यंग,सुदृढ शरीर नशीबाने देवाने दिले तर आपल्याला त्या अवयवांच्या किंमतीचा अंदाजच लागत नाही. ज्या कुणाजवळ ह्यातील एखाद्या अवयवाचा जरी अभाव असेल तर त्यालाच त्याच्या खरी किंमत ही कळते.आजकाल बरीच जनजागृती झाल्याने, त्याचं महत्त्व पटल्याने लोक आजकाल अवयवदानाचा त्यातल्यात्यात नेत्रदानाचा संकल्प सोडतात.

मी माझ्यापुरती तरी नेत्रदानाची व्याख्या बदलली आहे. मी ह्याला नेत्रदान न म्हणता नेत्रभेट म्हणते. “दान दिले” ह्या संकल्पनेपेक्षा “भेट दिली”ही संकल्पना वापरल्याने माणसासाठी जास्त घातक असलेल्या “मी”पणा किंवा “अंह”चा स्पर्श होत नाही, शिवाय दान ह्याचा अर्थ तुम्हाला कामी असतांना, गरज असतांना सुद्धा तुम्ही ते दुस-याला दिले तर त्या त्यागाला दान म्हणणं उचित ठरेल. परंतु नेत्रदान तर आपण आपला शेवटला श्वास सोडल्यावर, त्यांची आपल्याला गरज संपल्यावर दुसऱ्या ला देतो म्हणून नेत्रभेट हे नाव जास्त समर्पक असं मला वाटतं.

त्या ईश्ववराची लीला पण अगाध असते बरं का,

एखादा अवयव नसलेल्या व्यक्तीत त्याची उणीव,कमतरता भरून काढायला पर्यायी ईश्वराने दुसरी एखादी शक्ती त्याला खास म्हणून दिलेली असते. त्यामुळे डोळे नसून सुद्धा दया, प्रेम,कणव, संस्कार, कृतज्ञता,समजूतदारपणा, सुसंस्कृतपणा ह्या बाबतीत अग्रेसर असलेल्या अंध व्यक्ती आपल्या सभोवती सहजतेने, विनातक्रार वावरतांना आढळतात.

आजच्या दिनी जास्तीत जास्त लोकांनी नेत्रदानाचा संकल्प सोडून अंधांना दृष्टी देण्याचं मोलाचं कार्य करावं एवढचं मी म्हणेन.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ पोहे इंदौरी ?  की… ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ पोहे इंदौरी ?  की…  ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

पडला ना प्रश्न ?  ‘ पोहे ‘ महाराष्ट्रातल्या सामान्य नागरिकांचे कधी सकाळच्या न्याहरीचे, पाहुणे आले कि पाहुणचाराचे, मधल्या वेळचे खाण्याचे, मुलगी दाखविण्याच्या पारंपारिक कार्यक्रमातले, आजकाल रात्रीच्या जेवणाचे सुद्धा. पोहे आमचा राष्ट्रीय पदार्थ म्हणा न हवा तर. कारण इंदौरला गेलात तर कळेल की संपूर्ण मध्यप्रदेशात आपले हे मराठी पोहे  किती प्रसिद्ध आहेत. इंदौरचे पोहे, गरम जिलेबी आणि शेव जगभर प्रसिद्ध आहे. “हां भाई हां इसकी चर्चा दुनियाभर में है. पोहा इंदौर के जनजीवन का हिस्सा है”.

महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशची बॉर्डर गाठलीत कि या पोह्यांचा सिलसिला सुरु होतो. ३० वर्षापूर्वी आम्ही  जळगावहून देवासला जात होतो. पहाटे पावणेपाचला बडवाहला गाडी आली. सर्व प्रवासी उतरून गरम-गरम पोहे खात होते. रात्रभराच्या प्रवासाने डोळे तारवटलेले होते. मी बसमध्ये बसल्या बसल्याच, “काय मूर्खपणा आहे हा? ” अशा अविर्भावात ते दृश्य नाईलाज म्हणून पाहत होते. या पोह्यांची प्रसिद्धी आम्हाला माहिती  नव्हती. देवासला गेल्यावर मध्य प्रदेशातील पोह्यांची महती कळली. आपण याला मुकलो असे क्षणभर दुःख झाले. त्याची भरपाई इंदौरला केली.

तीस वर्षानंतर पुन्हा इंदौरला जाण्याचा योग आला. यावेळी मांडव पाहायला जायचे होते. अचानक ठरलेल्या दोन दिवसाच्या ट्रीपमध्ये मांडवला मुक्कामी जाण्यापेक्षा इंदौरला मुक्काम करावा म्हणून ठरले आणि खरेदी करण्यापेक्षा सराफ्यातल्या खाऊ गल्लीला भेट देऊ व जेवणाऐवजी प्रसिद्ध पोहे-जिलेबी चा आणि इतर पदार्थांचा बढीया आस्वाद लेऊ असे उद्दिष्ट ठरविले. कारण ‘सराफा – सराफा’. हा सराफा काय आहे आणि इंदौरची खाद्यसंस्कृती काय आहे हे बघायचेच होते.

इंदौर मुक्कामी पोहोचलो. हॉटेलच्या वेटरने उद्या सकाळच्या चहा व ब्रेकफास्ट बद्दल विचारले होते. त्याला फक्त चहा हवा असे सांगितले, कारण बाहेर जाऊन इंदौरी पोह्यांची चव घ्यायची होती. चक्क सकाळी उठून, चहा घेऊन, हॉटेल खालीच समोर एका गल्लीत टपरीवजा दुकाने थाटली होती. तिथे आमची टीम दाखल झाली. दुकानात इतर पदार्थही होते. पण पोहे नक्की असतात कसे? आपल्यापेक्षा काय वेगळे आहे त्यात? उत्सुकता होती. मुलांना दटावलं. वडा-पाव वगैरे काहीही घ्यायचं नाही. फक्त पोहे आणि पोहेच घ्यायचे.

सर्व मुलांची नाराजी होतीच. “पोहे काय घरी कायमच असतात. इथेही तेच का खायचे?” त्यांचं बरोबरच होतं. “वेगळं ट्राय करू”.

कोणी म्हणालं, “इथे छपन्न भोग आहेत तिथे आपल्याला जायचंय”.

“म्हणजे हॉटेलचं नाव का बाबा?”

“अरे ५६ भोग म्हणजे ५६ प्रकारची मिठाई असते”.

“नाही नाही, ५६ मिठाईंची दुकाने आहेत त्या भागात”. असा प्रत्यकाने स्वताचा अर्थ काढला होता.

पण या ठिकाणी संध्याकाळी जायचे होते. हा विषय थांबवत पोहे खायला समोरच्या टपरीवर आम्ही गेलो. बागेत भेळ खातो तसे कागदात पोहे, त्यावर फरसाण, कांदा, कोथिंबीर आणि लिंबू  असे प्रत्येकाने हातात घेऊन खाल्ले. गरम जिलबी ची चव घेतली. इंदौरी पोहे असं म्हटलं कि माझ्या मनात मराठी अस्मिता जागी व्हायची. पोहे ‘आमचे’ आणि नाव ‘इंदौरी’? कुठेतरी मराठीपणाची सूक्ष्म शंका वाटायची.

या पोटभर केलेल्या ब्रेक फास्ट वर सबंध दिवस निघाला. शहरात फेरफटका मारला. प्रसिध्द राजवाडा, होळकर साम्राज्याचा इतिहास असलेल म्युझियम पाहिलं. अहिल्याबाई होळकरांचा इतिहास वाचताना आमची मान उंचावली. पण पोहे? अहिल्याबाई होळकरांकडे करत असतील नं पोहे? तुम्हाला हा प्रश्न म्हणजे मूर्खपणा वाटेल. होय, होळकर परिवारासाठी पोहे बनवले जात होते अण्णा उर्फ श्री. पुरुषोत्तम जोशी यांच्या प्रशांत उपहार गृहात.

श्री पुरुषोत्तम जोशी. लागली लिंक. मराठी माणूस जिथे जाईल तिथे आपली मराठी संस्कृती रुजते. जोशी आपल्या आत्याकडे इंदौर ला गेले आणि तिकडचेच झाले. गोदरेज कंपनीत सेल्समनशिप केली. पण स्वतःचा उद्योग  सुरु करावा असं मनात होत. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दोनच वर्षांनी त्यांचे स्नॅक्स सेंटर सुरु झाले. इंदौर मधल्या मिल कामगारांसाठी पोहे सुरु झाले. महाराष्ट्रातील पोहे इथे आले आणि इंदौरच्या खवय्या रसिकांवर राज्य करू लागले. अजूनही करताहेत. इंदौरच्या ८० % लोकांची आवडती डिश पोहेच आहे. आज सुद्धा इथे तयार झालेले पोहे मुंबई आणि दिल्लीच्या अनेक कुटुंबासाठी विमानाने पाठवले जातात. ही डिश सर्व थरातल्या लोकांसाठी तेव्हढीच आवडती आहे. त्यामुळे गरीब श्रीमंत असा भेदच उरत नाही. छुट्टी हो या वर्किंग डे इंदौरच्या हजारो घरांमध्ये रोज पोह्यांचा आस्वाद घेतला जातो. आज मितीला वीस हजार किलो पोहे रोज खाल्ले जातात, असे एका पाहणीत समजले आहे. नवी जीवनशैली आणि नव्या संस्कृतीचा काहीही परिणाम न झालेले असे पोहे हे इंदौरचे आयकॉन आहे.

इंदौरच्या मिल कामगारांसाठी सुरु केलेलं हे मेस वजा पोह्याचं दुकान आज त्यांची तिसरी पिढी चालवतेय जेलरोड, ए. बी. रोड, यशवंत रोड, आणि नवरतन बाग असे चार आऊटलेट्स. इथे पोहे रसिकांसाठी रोज सकाळी आठ ते रात्री आठ पर्यंत ४० ते ५० किलो पोहे तयार होतात. जवळ जवळ ६५ माणसे हे काम करतात. १९५० मध्ये पंडित नेहरू कॉंग्रेस अधिवेशनासाठी इंदौरला आले असताना त्यांनी या पोह्यांचा आस्वाद घेतला. त्यांनी प्रभावित होऊन अण्णांना बोलावले आणि सांगितले, “यह तो अवाम का नाश्ता है”. इंदिरा गांधी, अटल बिहारी वाजपेयी, माधवराव सिंधिया आणि ब-याच जणांनी याचा आस्वाद घेतला आहे. असा हा पोह्यांचा इंदौरी प्रवास.

रायपूर शहरातही जयस्तंभ चौकात कांदा पोह्याचा ठेला आहे. सकाळी सहा ते दहा या वेळेत पोहे विक्रेते साहू महिना दोन लाख रुपये कमावतात. नागपूरच्या ‘के. पी की टपरी’ वाले प्रसिध्द पोहे विक्रेते रूपम साखरे पोहे व्यवसायातून वर्षाला लाखो रुपये कमावतात आणि दरवर्षी कुटुंब घेऊन वर्ल्ड टूर ला जातात. गेली ३५ वर्षे ते हा व्यवसाय करतात. रोज सकाळी भाजी घ्यायला आपल्या होंडा सिटी गाडीने जातात. त्यांची ‘चना पोहा डिश’ प्रसिध्द आहे. बघा आपल्या पोह्यांनी कसा बिझिनेस दिलाय. हे झालं मराठी पोह्याचं राज्याबाहेरील चित्र.

कोकणातल्या वाडीत डोकावलं तर पोह्यांची परंपरा अजून वेगळी दिसेल. परंपरेनुसार दिवाळीत फराळाच्या पदार्थांमध्ये लाडू, चकली, चिवडा, करंज्या,.. ही यादी. पण कोकणातल्या दिवाळीत म्हणजे नरक चतुर्दशी ‘चावदिस’ या दिवशी या फराळाच्या पदार्थांना स्थान नाही, तर फराळाला आलेल्या लोकांसाठी केलेले पारंपारिक पद्धतीचे पोहे याचे महत्व असते. या दिवशी सकाळी नातेवाईक आणि शेजा-यांना एकमेकांच्या घरी पोहे खायला यायचं आमंत्रण दिलं जातं. तिखट पोहे, गोड पोहे, दुध पोहे, गुळ पोहे, बटाटा पोहे असे प्रकार आणि त्या बरोबर  केळीच्या पानात सजवलेली रताळी, काळ्या वाटण्याची उसळ देतात. सिंधूदुर्गात ही प्रथा आजही पाळतात. म्हणजे घरात भातापासून तयार केलेले पोहेच या दिवशी वापरतात.

हा सिझन भाताचं नवं पीक येण्याचा असतो. हा भात, पोहे तयार करण्यासाठी आदल्या दिवशी भिजत घालतात, तो सकाळी गाळून घेऊन, मडक्यात भाजला जातो. नंतर उखळीत मुसळीने कांडला जातो. या कांडपणी नंतर तयार झालेले हे पोहे चुलीवरच शिजवले जातात. या वाफाळलेल्या अस्सल गावठी भाताच्या पोह्यांची चव असते निराळीच. या सिझनच्या पहिल्या पोह्यांचा नेवैद्य  देवाला दाखवून मग आस्वाद घायची ही परंपरा.

इंदौरी पोह्यांचे ‘उर्ध्वयू’ अण्णा उर्फ पुरुषोत्तम जोशी कोकणातलेच हो.

© डॉ. नयना कासखेडीकर.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆सहा जून : शांताबाई शेळके स्मृतीदिनानिमित्त – “आठवणीतील कविता…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर  ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? विविधा ?

☆ सहा जून : शांताबाई शेळके स्मृतीदिनानिमित्त – “आठवणीतील कविता…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

आज शांताबाई शेळके यांची वर्षा काव्यसंंग्रहातील हिरवळ ही कविता पाहणार आहोत… सात जूनला मृगाचं नक्षत्र लागलं … खऱ्या अर्थाने पाउस सुरू होतो असा पारंपारिक प्रघात आहे… कधी तो वेळेत उगवतो तर कधी उशीराने…

दडी मारुन जरी बसला तरी त्याच्या आगमनाची आतुरताही तितकीच असते… माणसाला,धरीत्रीला,साऱ्या सृष्टीला… आणि तो जेव्हा कधी पहिल्यांदा बरसून जातो… तेव्हा सगळं चराचर पुलकित होतं… तना मनाची तलखी शांत होते… जमीनीवर वरचा धारोळा धुतला जातो… जणू काही वसुंधरा पावसात सुस्नात न्हाऊन निघते… आनंदाच्या लहरी पसरवत जाते… हळूहळू ते पावसाचं पाणी जमिनीत मुरू लागतं … तृप्त जमीनीवर हिरवे हिरवे गवताचे कोंब उगवतात… वसुंधराचा आनंद ती गवताची पाती दवबिंदूत भिजून प्रगट करतात… आनंदाने न्हाऊन निघतात…हि कविता हेच सांगतेय…

हिरवळ

वर्षांची पहिली पर्जन्याची धारा

न्हाणुनिया गेली भूमिभाग सारा

लागली खुलाया अन् आताचं तिजवरती

या तृणांकुरांची हिरवी,कवळी नवती

*

किती उल्लासानें डोलतात हीन पाती

इवलाली सुन्दर फुलें मधूनी खुलती

चिमुकली फूलपांखरें डुलती मौजेनें

पाहुनी चित्त मम भरून ये हर्षानें

*

जणुं गालिचेच हे अंथरले भूवरतीं

जडविले जयांवर दंवबिंदूंचे मोती

या शाब्दलांगणी वाटे लोळण घ्यावी

अन्  सस्यशामल भूमी ही चुंबावी.

*

चैतन्य किती या उसळे तृणपर्णात!

किति जीवनरस राहिला भरोनी यांत!

जो झटे येवढा तृणासही सुखवाया

किती अगाध त्याच्या असेल हृदयीं माया!

 – शांता शेळके…

ती पहिली पावसाची सर भूमीला आलिंगन देते तेव्हा पहिला पाऊस शोषून घेते… कोवळी कोवळी गवताची तृणांकुरे जमीनीवर गालीच्या सारखी पसरतात… त्यातच काही गवती फुलं नाजूकपणे  उमलतात… त्याच्या वर छोटी छोटी फुलपाखरं बागडतात… किती मनमोहक नजारा दिसतो तो…हि उगवलेली छोटी छोटी कोवळी गवताची तृणांकुरे किती रसरसलेली आणि टवटवीत दिसतात … साऱ्या सृष्टीला उल्हसित करतात….

…. सृष्टीचे चक्र माणसाला कळावे… दुखाचा उन्हाळा संपला की सुखाच्या पावसाची सर येतच येते… किती आनंदाने न्हाऊन निघाल, तो तुम्हाला जीवनामध्ये उल्हास वाढवेल… आता तृणांकुराचा आकार तो किती नगण्य पण त्याला दिलेला तो आनंद कितीतरी मोठा असतो… हि पाउसाची एक सर देउन जाते तेव्हा तिचं विशाल मायेचं हृदय दिसतं….. श्रीमंताने गरीबांना आणि  उच्चवर्णीयांनी कनिष्ठ वर्णी यांना  असे मायेने ममतेने पाहिले ..सांभाळले तर ते ते देखिल महतपदाला निश्चितच पोहचतील…

… हिरवळ हे आनंदाचं रूपक आहे… पाऊस हे साधन आहे… तृणांकुर  छोटी गरीब दयनीय माणसं.. त्यांचा आनंद तो छोट्या छोट्या गोष्टीत असतो… तो जर त्यांना मिळाला  तर जगणंच आनंदाचं होईल असं या कवितेचं सार आहे असं मला वाटतं…अशी हिरवळ प्रत्येकाला हवी असते आणि ती मिळण्याची धडपड चाललेली असते…

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मनाचे प्रोग्रामिंग… ☆ सौ. अंजोर चाफेकर ☆

सौ. अंजोर चाफेकर

🔅 विविधा 🔅

☆ मनाचे प्रोग्रामिंग… ☆ सौ. अंजोर चाफेकर

आपल्या मेंदूमधे 1000 कोटी न्यूराॅन्स असतात.

आणि हे न्यूरल नेटवर्क खूप प्रभावी असते.

जर आपण या नेटवर्कला चांगला इनपुट दिला

तर नक्कीच चांगले आउटपुट मिळेल.

 

आर्टिफिशियल इंटेलिजन्स (कृत्रिम बुद्धिमत्ता) मधे सुद्धा कृत्रिम न्यूराॅन नेटवर्क बनविले ते.

आणि मग पाहिजे ते इनपुट देऊन नेटवर्क ऑपरेट करतात.

 

धीरूभाई अंबानीजी त्यांच्या आत्मचरित्रात म्हणतात, माझ्यापुढे खूप आव्हाने उभी होती. अडचणींचे डोंगर मार्गात आडवे होते.अपयशाचे अनेक फटके बसले. पण मी अडचणींकडे  शिकण्याची संधी म्हणून बघितले. मनाला असे प्रोग्राम केले की प्रत्येक अडथळा मला नवीन दिशा दाखवत गेला.

जेव्हा आपण मोठी स्वप्ने साकारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा लहान गोष्टींमधे घुटमळू नये. संत ज्ञानेश्वर एक दाखला देतात.

सांगे कुमुद दळाचिने ताटेl

जो जेविला चंद्रकिरणे चोखटेl

तो चकोरू काय वाळुवंटी l

चुंबितु असे।

जो चकोर चन्द्रकिरण चाखतो तो कशाला वाळूचे कण चाखेल?

मनाला असे प्रोग्राम करायचे की क्षुल्लक गोष्टींकडे लेट गो करता आले पाहिजे.

कुठलीही कृती करताना आपली सत् सद विवेकबुद्धी जागृत असली पाहिजे. कारण कधी कधी भावनेच्या भरात किंवा मोहात पडून चुकीच्या गोष्टी आपल्या हातून घडतात पण मग अपराधीपणाची भावना सतत टोचत राहते.

उदा. महान सायन्टीस्ट ओपनहायमर यांनी अमेरिकेसाठी  ऑटमब्माॅम्ब बनवला.जेव्हा मेक्सिकोच्या डेझर्टमधे त्याचे टेस्टिंग झाले तेव्हा ते इतके आनंदात होते. “गाॅड इज अब्सेंट” असे ते म्हणाले. परंतु नंतर मरेपर्यंत त्यांना गिल्ट फिलींग राहिले. अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी मात्र ऑटमबाॅम्ब बनवायला नकार दिला.

मनात कुठल्या गोष्टी साठवायच्या व कुठल्या गोष्टी डिलीट करायच्या याचेही प्रोग्रामिंग करता आले पाहिजे. आपले मन वाईड लेन्स कॅमेरा सारखे असते. प्रत्येक पिक्चर क्लिक करत जाते. शिवाय मनाची स्टोरेज कपॅसिटीही प्रचंड असते. परंतु मनाला त्रास देणा-या गोष्टी, मत्सर, असुया, राग, द्वेष ताबडतोब डिलीट करता आल्या पाहिजेत.

©  सौ.अंजोर चाफेकर

मुंबई.

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ हितगूज एकटीशी… ☆ सुश्री संगीता कुलकर्णी ☆

सुश्री संगीता कुलकर्णी

? विविधा ?

हितगूज एकटीशी… ☆ सुश्री संगीता कुलकर्णी ☆

निवांत क्षण मला खूप आवडतात.स्वतःशी स्वतःचे हितगुज करायला.

कुठलीच साथसोबत न घेता कधी एकट्यानं कुठं भटकायला गेला आहात ? नाही ना.. तर मग रोजच्या या धावपळीत कधीच न जमलेलं स्वतःकडं पाहणं इथं सहज जमून जाईल..

स्वतःचीच सोबत करत एकटं…!

एकटीनं भटकणं मला नेहमीच आवडतं. मुळात ही स्वतः स्वतःला दिलेली वेळ असते. तिथं तुम्हाला फक्त तुमच्या विचारांसाठी वेळ देता येतो.. स्वतःच परीक्षण करणं फार महत्त्वाचं असतं ते अशावेळी आवडून जातं.

आपण कुठलाही मुखवटा न चढवता मुक्त असतो. मला यात वेगळंच समाधान मिळतं…

मनसोक्त उनाड दिवस..!

मगाशी म्हटल्याप्रमाणेच मला एकटीला भटकायला जाणं जाम आवडतं. रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातून, त्याच-त्याच माणसांमधून निवांतपणा हवा असतो ना तेव्हा मी हमखास बाहेर पडते.. मी मित्र- मैत्रीणी बरोबरही खूप भटकते तेव्हा मजा येतेच पण एकट्यानं भटकण्याचीही मजा काही औरच आहे…!

निसर्गाशी संवाद साधण्यासाठी एकटीनच बाहेर पडावंस वाटतं.. निसर्ग हा हक्काचा दोस्त कारण तो बोलत काहीच नाही फक्त ऐकत राहतो.. एकटं भटकण्यातलं सुख हा उपदव्याप केल्यावरच कळतं. एकट्या रानवाटांवर स्वतःची सोबत अनुभवणं, स्वतःला वेळ देणं अवचित जमून जातं…निसर्गाशी हितगुज करण्यासाठी…

एकांतामध्ये निसर्गाशी हितगुज करायला मिळतं.. निसर्ग माझ्याशी बोलतोय असंच वाटतं. शांतपणे विचार करायला मिळतो. एक प्रकारची प्रसन्नता मिळते… मी स्वतःला आजमावते…यातून स्वतःला चांगल्या-वाईट अनुभवातून ही आजमावता येतं बरं…

निर्णय घेता येतात..

     मनाशीच मी बोलते

   साठवणीचे बोल माझे

  गुज माझे स्वतःशी खोलते

माझी सगळं काही एकटीनं करायची इच्छा असते…

मला एकटीनं भटकण्याची कधी भीती वाटत नाही आणि वाटलीही नाही पण मला असं भटकणं खास करुन याच्यासाठी आवडतं की त्यामुळं स्वतःशी संवाद साधणं जमून जातं. अनेकदा स्वतःला वेळ देणं जमतच नाही. अशावेळी एकटं भटकायला जाणं मन शांत करणारं ठरतं. मनाच्या शांततेसह मला स्वतःशी संवाद साधण्याची संधी मिळते.. निसर्ग तर तुमची प्रत्येक पावलापावलावर सोबत करत असतो. असे अनेक अनमोल क्षण निसर्गानं या भटकंतीत मला दिले आणि नंतर आलेल्या अनुभवातून समृद्ध झाल्याचं समाधान ही मिळालं…

अचिव्हमेंटनं मन भरून आले.. येतं… आयुष्यात आणखी काय हवं नाही ?

      माझ्यात मी गुंतले

   ध्येय माझे माझ्या परीचे

    अंतरीच मी जागविले

©  सुश्री संगीता कुलकर्णी 

लेखिका /कवयित्री

ठाणे

9870451020

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ‘शाळेचा पहिला दिवस’ – ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

? विविधा ?

☆ ‘शाळेचा पहिला दिवस’ – ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

नमस्कार मैत्रांनो!

आजच्या लेखाचा विषय भूतकाळातील मंतरलेल्या मोरपिशी दिवसांच्या रम्य आठवणींत गुंतवून टाकणारा! आठवतेय, उन्हाळी सुट्टीच्या एक एक क्षणाचा आनंद लुटून झाला. कधी मित्रमैत्रिणींबरोबर खेळ, गप्पा टप्पा, तर कधी मामाच्या गावाला जाणाऱ्या आगगाडीत सफर, झालंच तर एखाद्या रम्य ठिकाणी घालवलेले आनंददायी दिवस, अगदीच कांही नसेल तर भावंडांबरोबर घरीच राहून केलेली मजा अन लुटीपुटीची भांडणे! एक ना दोन! एक मात्र खरे, यांत ‘अभ्यास’ नामक गनिमाला अजिबात एन्ट्री नव्हती. हेच तर उन्हाळ्याच्या सुट्टीच्या सुखसागरात मनसोक्त पोहण्याचे गमक आणि ‘गमभन’ होते.

बदलत्या काळानुसार या शाळेच्या उन्हाळी सुट्ट्यांचे तंत्र थोडे वेगळे झाले. अभ्यासक्रमानुसार (स्टेट, सी बी एस इ अथवा आय सी एस इ इत्यादी) सुट्यांचे वेळापत्रक अन शाळा सुरु होण्याची तारीख थोडीफार वेगळी झाली. मात्र त्यातला आत्मा अबाधितच राहिला आहे हे महत्वाचे! इयत्तेनुसार या पहिल्या दिवसाचे स्वागत करण्याचे मुलांचे अन पालकांचे वेगळे गणित असते. नर्सरी अन के जी वगैरेत जाणाऱ्या चिमुकल्या मुलांचे बहुदा रडणे जास्त कॉमन, शाळेत जातांना गोड हसत आईला निरोप देणारे गोजिरवाणे बाळ फक्त टी व्ही वर असते असे मला वाटते. आईच्या पदराला (किंवा ओढणीला) गच्च पकडत ‘मी नाही जात’ असा घोष करीत मूल शाळेच्या ‘मावशीबरोबर’ एकदाचे आत जाते. अशा वेळेस आत्तापर्यंत मुश्किलीने रोखलेले अश्रू माऊलीच्या डोळ्यातून घळ घळ वाहायला लागतात.

कांही शाळांत (फक्त) ‘पहिल्या दिवशी’ गेट पासून तर वर्गापर्यंत मुख्याध्यापिकेपासून तर शिक्षक अन शिक्षिका दुतर्फा गुलाबाची फुले घेऊन मुलांचे स्वागत करायला अटेन्शन मध्ये उभे असतात. त्यांचे चित्रीकरण बऱ्याचदा आपण बघतो. मला हे बघून पोलिसांच्या ‘सौजन्य सप्ताहाची’ आठवण येते. यातला छुपा अजेंडा जाणती अन हुशार मुले लगेच ओळखतात. गुलाबाचे काटे उद्यापासून कसे अन केव्हां बोचकारणार याचा ते अंदाज घेत असतात. (शारीरिक इजा नाही बरे का, आता नियमावली नुसार ‘छडी लागे छम छम, विद्या येई घम घम’ हे सर्व कालातीत विचार समजावेत!)

 मुले शाळेत पहिल्या दिवशी जायला बहुदा इतकी उदासीन का असतात? घरी मुक्तपणे खेळणे, बागडणे, खाणे पिणे अन झोपेच्या वेळा इच्छेनुसार ठरवणे, झालेच तर मोबाईल, टीव्ही, मॉल, चित्रपट बघणे असे विस्कळीत अन बहुदा अनियोजित टाइमटेबल, या सर्वांची सवय मुलांना जर सुट्टीत सवय लागली तर शाळेकरता अचानक घड्याळाचे काटे उलटे फिरायला लागणारच. पहिल्याच दिवशी उशीर नको म्हणून आईचा उठ रे बाळा/ उठ ग राणी असा (सुरुवातीला) मधाळ तगादा सुरु होतो. अन मग त्यापुढे सर्व रुटीन! ‘काय कटकट आहे!’ हा ऍटिट्यूड घेऊन शाळेच्या प्रथम दिवसाचे स्वागत कां होते मुलांकडून? हा विचार मला नेहमी व्यथित करतो. या उलट शाळेच्या प्रथम दिनाची मोजकी मुले वाट पाहत असतात. वरच्या इयत्तेत गेल्याचा अपरिमित आनंद असतो, चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झाले असल्यास हा आनंद अभिमानाने उजळून निघालेला असतो. सक्काळी सक्काळी लवकर शाळेचा नवा कोरा युनिफॉर्म (वयाबरोबर उंची वाढल्याने नवा युनिफॉर्म अत्यावश्यक असतोच), वर्षभर वापरून झालेले जोडे, दप्तर, कंपास, वॉटर बॅग इत्यादी नव्या दिवसाचे स्वागत करायला कसे चालतील? तेही नवे कोरेच हवेत! मंडळी या नव्या आयटम्सच्या गर्दीत कव्हर घातलेली नवथर सुगंधाने रसरसलेली नवीन वर्षाची पुस्तके यांच्याहून अधिक रोमांचक काय असू शकते बरे?

जर इयत्ता बदलली तर यासोबत अनोळखी वर्गमित्र, वर्गशिक्षिका, नवीन वर्ग आणि नवीन बसायची जागा! मुले हे सगळे हळू हळू अनुभवायला लागतात अन मग त्यातील ‘गंमत जंमत’ मजेने स्वीकारायला लागतात. सर्वात मुख्य म्हणजे शाळेचा पहिला दिवस सगळीकडे ‘ओरिएंटेशन’ (अभिमुखता) चा असतो. त्या दिवशी फक्त सर्व नवीन गोष्टींची पहिली ओळख करून देणे हे शिक्षकांचे महत्वाचे कार्य असते.

शाळेतील अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे ‘मधल्या सुट्टीतील डब्बा’! प्रत्येक मुलाच्या डब्यात कांहीतरी वेगळे असते, मला वाटते मुलांच्या सर्वांगीण आरोग्याचा विचार केला तर ‘भाजी पोळी’ ला पर्याय नाही. रोज वेगवेगळ्या पौष्टिक भाज्या दिल्या तर मुलांना त्या खाण्याची सवय लागते. या बाबतीत एक आठवले, आमच्या लहानपणी डब्यात रोज सुक्की बटाटा भाजी असायची. इतर भाज्यांच्या आवडीबद्दल आम्हा भावंडांचे कधीच एकमत व्हायचे नाही. कधी काचऱ्या, कधी खूप कांदे घालून, तर कधी फक्त मिरचीची फोडणी देऊन उकडलेल्या बटाट्यांची भाजी इतकीच व्हेरायटी असायची. मात्र आई याची भरपाई रात्रीच्या जेवणात वेगवेगळ्या भाज्या खायला घालून करीत असे. गंमत अशी की बहुदा सर्वांच्या डब्ब्यात बटाटा असूनही प्रत्येक बट्टूची चव मात्र निराळी असे. आजकाल आर्थिक दृष्ट्या संपन्न असलेल्या मुलांच्या डब्यात काय काय व्हरायटी असते हा स्वतंत्र लेखनाचा विषय ठरावा. मात्र मुलांची शारीरिक आणि मानसिकरित्या जोमाने जोपासना करायची असेल तर आईने ‘मधल्या सुट्टीचा जेवणाचा डब्बा’ याविषयी आहारतज्ञाच्या भूमिकेत जाऊन ‘इष्ट भोजन’ रांधण्याची गरज नक्कीच आहे.

एक बदल निश्चितच जाणवतो, तो म्हणजे विद्यार्थी आणि शिक्षकांचे नाते! आमच्या लहानपणी प्रायमरी शाळेत एकच शिक्षक किंवा शिक्षिका वर्षभर सर्व विषय शिकवत असत. त्यांना अभ्यासाच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांची समग्र माहिती असायची, एक सुंदर भावनिक नाते गुंफले जायचे. पुढील वर्षीच्या पहिल्या दिवशीच जर ते शिक्षक वर्गावर नसतील तर विद्यार्थ्यांना चुकल्या चुकल्यासारखे वाटायचे. आता मात्र विषयानुसार तेच शिक्षक पुढील वर्षी भेटत राहतात. इमोशनल बॉण्डिंगचे प्रमाण कमी झालेले वाटत असले तरी, मायेचा ओलावा अजूनही निश्चितच टिकून आहे असे मला वाटते. एक सुचवावेसे वाटते. पालकांनी आपल्या मुलाचा/ मुलीचा मागील वर्षीचा धडधाकट असलेला गणवेश, पुस्तके आणि शाळेला लागणाऱ्या इतर वस्तू नुसत्याच फेकून न देता गरजू मुलांना द्याव्यात. यासाठी डोळस नजरेने बघितले तर, ही गरजवंत मुले आपल्या आसपासच आढळतील, अथवा अशा कामात हातभार लावणाऱ्या समाजसेवी संस्था देखील उपलब्ध आहेत. हे समाधान आगळे वेगळे असते.

मंडळी, हा शाळेचा पहिला दिवस अगदी नवसंजीवनी दिल्यासारखा पालकांनाच नव्हे तर, प्रत्येकाला सुखदायी वाटतो. जून महिना असला तरी वसंत ऋतू असल्याचा भास होतो. वेगवेगळ्या वयाच्या अन विविध रंगांच्या नव्या कोऱ्या गणवेशात, नवे दप्तर, नवी पुस्तके, नवा कंपास, नवी वॉटरबॅग अन डबे यांच्या जामानिम्याने नवथर उत्साहाने सळसळत बागडणारी गोड गोजिरी मुले शाळेच्या बस मध्ये, रिक्षात किंवा पायी जात असतात. मित्र मैत्रिणींसोबत त्यांची ‘मन उधाण वाऱ्याचे’ अशी अवस्था होत असते. कधी तर जिवलग मैत्रिणीसोबत ‘गमाडि गंमत जमाडि जंमत ये ग ये सांगते कानांत’ असे प्रायव्हेट संभाषण सुरु असते. मग त्यांचे आल्हाददायी बोलणं अन किंचाळत केलेला कल्ला देखील पक्षांच्या कलरवासारखंच मधुर वाटत असतं. जणू कालपावेतो उन्हाने कोमेजून गेलेल्या बागेत आज अवचित नवचैतन्य आलंय, वृक्षवेलींना नवीन पालवी फुटलीय अन रंगीबेरंगी फुलांचे उमलले आहेत, त्यांच्या सुगंधाने अख्खी बाग मोहरून गेलीय असे जाणवते. मैत्रांनो, चला तर मग बिगी बिगी! आपण देखील ‘मातीला सुगंध फुलांचा’ या परिपाठाप्रमाणे या नवोन्मेषात ‘शाळेचा पहिला दिवस’ साजरा करीत आपल्या बालपणात हरवून जाऊ या!

धन्यवाद!

डॉ. मीना श्रीवास्तव

मोबाईल- ९९२०१६७२११

टीप- एका समूहगीताची लिंक जोडत आहे.

 

‘आनंदाची शाळा आमुची आनंदाची शाळा’ (स्वाध्याय)

©  डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares