मराठी साहित्य – विविधा ☆ पाठीशी रहा! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? विविधा ?

☆ पाठीशी रहा! ☆ श्री संभाजी बबन गायके 

केस मोकळे सोडलेले,कपाळावर ठसठशीत कुंकू,डोईच्या मधोमध पाडलेल्या भांगामध्ये कुंकवाची जाडसर रेघ,गळ्यात लांब मंगळसूत्र…अशी ती,बहुदा नवविवाहिता,अनवाणी पायांनी लोकल रेल्वेगाडीच्या पुढ्यात उभी होती. मोटरमनने शक्य होईल तितक्या जोराने हॉर्न वाजवला तेंव्हा ती पटकन बाजूला झाली….आणि गाडी आणखी पुढे सरकताच पुन्हा गाडी समोर आली. यावेळी मात्र ती दोन्ही रूळांच्या मधोमध पालथी पडली…मान एका रूळावर ठेवून. ‘हे भगवान! मध्यम वयाचा तो मोटरमन उदगारला…त्याची इच्छा असूनही गाडी थांबू शकणार नव्हती! गाडी तिला स्पर्श करणार त्या अगदी शेवटच्या क्षणाला तिने चटकन आपली मान बाजूला घेतली! पण तिचं शरीर तर दोन्ही रूळांच्या मधोमध होतंच….मोटरमनने एक क्षणासाठी डोळे बहुदा मिटून घेतले असावेत. खाडकन आवाज झाला…रेल्वेचा एक डबा तिला ओलांडून पुढे गेला होता…मोटरमनने पटकन गाडीमधून खाली उडी मारली. ती गाडीखाली निपचित पडलेली. तो पुन्हा गाडीत चढला आणि गाडी मागे घेतली. तिच्या किंकाळ्यांनी ऐकणा-यांची मनं बधीर झाली होती! उजव्या हाताची चार बोटं जागेवर नव्हती आणि डोक्याला डाव्या बाजूला मोठी खोल जखम! तिला दवाखान्यात न्यायला किमान वीस मिनिटे लागणार होती….ती वाचण्याची शक्यता नव्हती आणि तिच्या डोळ्यांतली जगण्याची आशा केविलवाण्या नजरेने सभोवार पहात होती…….का नाही बघणार? कुणाला मरायचं असतं?

तो कितीतरी वेळ त्या उंच पुलाच्या अलीकडे असलेल्या दिव्याच्या खांबाखाली बसून राहिला. पुलाखाली खोल समुद्र शांतपणे वा-यावर डुलत होता. येणारे-जाणारे आपापल्या येण्या-जाण्यात मश्गूल होते. तो तिथून उठणार इतक्यात तिथून जाणारी एक महिला त्याच्याजवळ थांबली. तिला तिच्या लहानग्या मुलीसोबत त्या पुलाच्या आणि समुद्राच्या पार्श्वभूमीवर एक छानसा फोटो काढून हवा होता. त्याने मोठ्या आनंदाने त्या मायलेकींचे फोटो काढून दिले. ती महिला आणि ती लहान मुलगी त्याला हसून टाटा करीत तेथून निघून गेले. कुणीतरी थोड्यावेळासाठी का होईना,खोटं खोटं का होईना छान बोललं, याचं समाधान त्याला मिळालं. पण पुन्हा त्याचं मन त्याच्या खाजगी आयुष्यात डोकावलं आणि तो पुलाकडे निघाला. कितीतरी वेळ त्या पुलाच्या कठड्यावर खोल समुद्राकडे पाय सोडून बसून राहिला….आणि एका क्षणी त्याने स्वत:ला खाली झोकून दिले! खाली पाण्यापर्यंत त्याचं शरीर पोहोचायला काही सेकंद तर लागणारच…ते पाच-सहा सेकंद त्याला युगासारखे भासले…आपण चूक करतो आहोत…नव्हे केलीच  आहे याची त्याला जाणीव झाली! आता फार उशीर तर झाला नाही ना….हा विचार करायला? कुणीतरी आपल्याला वाचवायला हवं! आता त्याला मरायचं नव्हतं! कुणाला असं मरायचं असतं?

तिला जणू आता काहीही जाणवत नव्हतं…वेदनेच्या संवेदना मेंदूकडे वाहून नेणा-या नसा काळवंडून गेल्या होत्या…स्वत:चाच चेहरा आरशामध्ये बघण्याची सोय नव्हती राहिली….आणि दुसरं कुणीही या तिच्या चेह-याकडे पाहण्याची हिंमत दाखवत नव्हतं! त्यांना माहित होतं की आगीच्या धगीनं हिच्या शरीरातली धुगधुगी जवळ जवळ विझवत आणलेली आहे…फक्त काही दिवसांचा प्रश्न आहे…हीची सुटका होईल आणि आपलीही! तिने तिच्या आयुष्यात असं कुणाला तरी मरताना पाहिलं होतं…पण तिला नाही मरायचं असं..आणि इतक्यात. कुणाला असं मरायचं असतं?

आपलं अस्तित्व टिकवून ठेवणं ही तर समस्त प्राणी जगताची अंत:स्थ प्रेरणा. मग का कुणी असं या स्वत:च्या अस्तित्वच्या जीवावर उठतं? एरव्ही आपल्याला वेदना होतील,आपला जीव जाईल म्हणून स्वत:ला पदोपदी जपणारं माणूस,अगदी एवढ्याशा काट्यच्या एवढ्याशा टोकालाही बिचकणारा माणूस असा एकदम स्वत:ला त्या अंध:कारात का बरं झोकून देत असेल…काही समजत नाही!

दुस-या कुणीतरी आपल्याला जन्माला घातलं आहे…त्यामुळे दिला गेलेला जन्म आपला आपण मरणात परावर्तीत करण्याचा अधिकार आपल्याला नाही…असा विचार शहाणी माणसं करतात आणि प्राक्तन भोगत जीवनाच्या वाटेवर रक्ताळलेल्या पावलांनी चालत राहतात. त्यांना ठाऊक असतं की या वाटेवर कुठे न कुठे तरी एखादं सावलीचं झाड असतंच,त्याच्या खाली चार-दोन मखमली फुलं पडलेली असतात. इथं क्षणभर विश्रांती घेता येईल की. कुठंतरी एखादा झरा आढळेल आणि जन्माची तृष्णा निववता येईल. अगदीच आणि काहीही सुख नाही असं आयुष्य असूच शकत नाही मूळी. श्वास घेणं काय कमी सुखावह आहे? पाण्याखाली मिनिटभर डोकं बुडवून पाहिल्यावर कळतं की श्वासांमधलं सुख!

एखाद्या जागी पोहोचण्याचे दोन मार्ग असतात…लांबचा मार्ग अवघड पण सुरक्षित. जवळचा मार्ग त्याचं हशील वसूल करून घेतो वाटसरूंकडून. याच जवळच्या मार्गावरून काहीजण जाण्याचा प्रयत्न करतात आणि अकाली मरणाच्या वाटमारांना बळी पडतात!

समस्त जगताच्या कल्याणासाठी प्राणार्पण करणारे दधिची मान्य आणि पुज्य! पण संघर्षाला पाठ दाखवून पळणारे कोणत्याही दयेस पात्र नाहीत. किमान त्या दुस-या दुनियेत तर नाहीतच नाहीत. अर्थात हा विचार धर्मपरत्वे बदलत जात असावाही. पण कुठंही गेलं तरी आगंतुकपणे जाणे स्वत:ला अपमानास्पद तर आहेच पण जिथं जातो आहोत त्यांनाही संकोचून टाकणारं!

राग,चिंता,निराशा,वैफल्य,मान-सन्मानाच्या,अपमानाच्या बेगडी कल्पना इत्यादी शेकडो कारणांनी माणसं आपल्याच हातांनी जेंव्हा आपली जीवनपुष्पे कुस्करून टाकतात तेंव्हा ती मागे राहिलेल्यांसाठी दुर्गंधीच सोडून जातात… वेदनांची! मृत्यूनंतर काय? हा प्रश्न कदाचित जगन्नियंत्यास कायम अनुत्तरीत रहावा, असं वाटत असावं असं वाटतं…कारण आजवर त्याचं विश्वासर्ह उत्तर नाही गवसलेलं! किंवा मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही या लोकोक्तीनुसार प्रत्यक्ष अनुभवता न येणारं हे उत्तर असल्यानं…ते अविश्वसनीय वाटणंही साहजिकच आणि क्षम्यही! पण जाणारा कदाचित सुटून गेला असं वाटत असलं तरी त्याच्या मागे राहणारे आयुष्यभर पितामह भिष्मा सारखे बाणांच्या शय्येवर निजत असतात….हे मात्र अनुभवास येऊ शकते!

एखाद्याला आपल्यातून उठून जावंसं वाटतं याचाच अर्थ आपलं त्याच्याकडे पुरेसे लक्ष नव्हतं. त्याचं ऐकून घेण्याची तसदी आपण नाही घेऊ शकलो..उलट त्यालाच ऐकवत राहिलो आपण..आपलंच रडगाणं!

मग त्यांनाही वाटूच शकतं ना…आपण गेल्यावर यांनाच त्रास होईल,मग कळेल यांना आपली किंमत!

दरवर्षी असं जगातल्या सात लाख लोकांना वाटतं! १० स्पटेंबर हा दिवस अशाच माणसांसाठी आहे. आपल्या प्रेमाच्या माणसांच्या सतत आगेमागे रहा..त्यांना उपद्रव होणार नाही अशा बेतानं. देवानं आपल्याला दोन कान दिलेत…एक हृदय दिलंय…दोन डोळे दिलेत…ऐकायला,विचार करायला आणि बघायला. एक मेंदू दिलाय अंदाज घ्यायला…धोके ओळखायला. आपल्या लोकांना याचा लाभ द्यायला आपण मागे राहून चालणार नाही!

कुणालाही मरायचं नसतं…स्वत:चं स्वत: तर कधीच मरायचं नसतं…म्हणूनच मरू पाहणारी शेवटच्या क्षणी जगू पाहतात! चला, या जागतिक आत्महत्या विरोधी दिनाच्या निमित्ताने आपल्या माणसांशी संवाद साधायला आरंभ करूयात! ज्यांच्याशी आपण रक्ताने,नात्याने आणि समाजाने बांधले गेलो आहोत..ती सर्व आपलीच माणसे आहेत. कुणालाही एकटं पडू देता कामा नये!

कुणाला जगण्यानं छळलं असलं तरी मरणानं सुटका करेपर्यंत थांबण्याचं धैर्य त्याच्यात निर्माण करणं म्हणजे आपण त्याचं हितचिंतक असणं! शतदा नव्हे तर अगणितदा प्रेम करावं, असा जन्म लाभलेले आपण….प्रेम करीत रहावे…बोलावणे येईपर्यंत!  

(दहा सप्टेंबर…जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन. यानिमित्त सुचलेलं. यातील पहिला प्रसंग नजरेसमोर घडलेला पंचवीस वर्षांपूर्वी घडलेला…अजून जसाच्या तसा नजरेसमोर तरळणारा. यातून सकारात्मक विचार प्रसारीत व्हावेत, अशी भाबडी आशा मनात ठेवून केलेला अभिनिवेशविरहीत शब्दप्रपंच. संभाजी बबन गायके. ९८८१२९८२६०)

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “आले रे आले…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “आले रे आले…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

कालपासूनच खुप प्रसन्न वातावरण झालंय कारणं आपल्या लाडक्या आराध्य दैवताच आगमन होणार होत. खरचं गणपती गौरी हा मंगल सणांचा काळ खुप उत्साहाचा आल्हादकारक वाटतो.सणावरांच्या निमीत्त्याने का होईना आम्ही नोकरदार बायका देवासमोर चार घटका जरा शांत बसतो. नैवेद्य कुळाचार ह्या निमित्ताने चार निरनिराळे साग्रसंगीत पदार्थ करतो, ह्या निमीत्त्यानेच आपल्या कडून रितीरिवाज, नेमधर्म पाळल्या जातात. चार माणसे,नातलग आपले नेहमीचे रुटीन बदलवून गौरीगणपतीच्या निमीत्त्याने एकत्र येतात.ही एकमेकांची मनं जुळण्यासाठी, एकमेकांचा सहवास लाभण्यासाठीच जणू ह्या सणावारांच नियोजन असतं. परस्परांशी एकोप्याने वागणे आणि जमेल तितकी मदत करण्याचा आटोकाट प्रयत्न करतो. त्यामुळें ह्या दिवसात कामाची खुप जास्त धांदल असूनही आम्हा बायकांची अजिबात चिडचिड होत नाही. सगळं कसं मनापासुन करावस वाटत.

आता दहा दिवस धार्मिक कार्यक्रमांची रेलचेलच जणू. दुर्वा, लाल फुल व्हायलेली ती हसरी, प्रसन्न, आश्वासक गणरायाची मुर्ती खुप चैतन्य देते.

परत एकदा गणेशचतुर्थीच्या सगळ्यांना शुभेच्छा.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आल्या गौराई अंगणी… ☆ सौ.वनिता संभाजी जांगळे ☆

सौ.वनिता संभाजी जांगळे

🌸 विविधा 🌸

☆ आल्या गौराई अंगणी… ☆ सौ.वनिता संभाजी जांगळे ☆

गौरी गणपतीचा सण म्हटले की ,आपल्या आनंदाला सिमाच नसते. लहानांपासून थोरांपर्यंत उत्साह भरलेलेला असतो. गल्ली-गल्लीतून गणरायांच्या स्वागताची तयारी सुरू होते. ढोलतासे , लेझीम ही वाद्ये सुर धरण्यास सज्ज होतात.सगळीकडे आनंदाचे , जल्लोषाचे वातावरण असते. पण या सगळ्यात गोरी गणपतीचा सण म्हटले की ,खेड्यातून  विशेष करून कोकणातून लक्ष वेधले जाते ते झिम्मा-फुगडीच्या खेळाकडे .  गणपतीचे आगमण झाले की तिसर्‍या दिवशी  जेष्ठागौरीचे आगमण होते. तेंव्हा तरी स्त्रियांमधील उत्साह शिगेला पोहचतो. तेंव्हा हा खेळ खेळला जातो.

विशेष म्हणजे झिम्मा-फुगडीचा खेळ हा खेड्यातून जास्त खेळला जातो.  नागपंचमीच्या सणानंतर या खेळाची तालीम सुरू होते .तसे पाहिले तर हे दिवस शेतावरील हातघाईच्या कामाचे दिवस आसतात . तरीसुध्दा दिवसभर थकूनभागून आलेली बाई  रात्री बारा-एक वाजेपर्यंत आपला कंटाळा विसरुण या खेळात दंग होते. जणू झिम्मा -फुगडीच्या खेळातून ती आपल्या कष्टाचा शीण घालविते. इतकी ती या खेळात रमून जाते.  गौरी गणपतीच्या  पारंपारिक गाण्यांवर एकमेकींच्या हातात हात गुंफून फेर धरला जातो. तेव्हा बाईचे एकमेकीच्या सोबतीने एकजूट असणाऱ्या संघटित रूपाचे दर्शन दिसून येते. आपला कंटाळा,  सुख-दुःख, व्यथा , संकटे हे सर्वकाही विसरुण बाई या खेळात दंग होते.

काही दशकापुर्वीचा विचार केला तर बाई सणासुदीच्याच निमित्ताने घरा बाहेर यायची. या झिम्मा-फुगडीच्या खेळात तर स्वतःस पूर्ण झोकून द्यायची. फेर झिम्मा , उडत्या चालीचा झिम्मा ,फुगडी  ,मंगळागौरीचे खेळ यात ती देहभान विसरुण रमायची. झिम्मा-फुगडीच्या पारंपरिक गाण्यातून ती आपले माहेर ,सासर  ,सर्व नातीगोत्यांना तसेच बाईचे जगणे , तिचे राहणीमान  हे सर्व गोवत असे. यातून खेड्यातील  तिच्या संस्कृतीचे दर्शन घडायचे. लोकपरंपरेतून चालत आलेला आणि आपला सांस्कृतिक  वारसा जपणारा हा झिम्मा-फुगडीचा खेळ आजही तितकाच लोकप्रिय आहे.  गाण्याच्या तालावर धरला जाणारा ठेका आणि गमती-जमतीचे हावभाव हे सर्व पाहणारे सुध्दा दंग होतात .  ग्रामीण स्त्रीया विस-पंचवीस जणींचा मेळ करून गावचौकीत रात्री एकत्र येतात  आणि या खेळात रमून जातात. झिम्मा-फुगडी खेळाच्या विविध प्रकारातून बाईच्या शरिराचा सुध्दा व्यायाम होतो.

झिम्मा फुगडी ,मंगळागौर हे खेळ आपल्या महाराष्ट्रीय संस्कृतीचे विशेष आकर्षण आहे. मला या खेळाचे जास्त विशेष वाटते ते  खेड्यातील ग्रामीण स्त्री या खेळातून मनातून मोकळी होते. एरवी तिचे कष्टाचे हात शेतकाम  ,घरकाम  ,मोलमजूरीत बांधलेले असतात. पण गौरी गणपतीचा सण आला की आपले दागीणे,  साडी, चोळी याकडे तिचे लक्ष वेधते. घरातील साफसफाई पासून गौराईचे स्वागताची तयारी ती खुपच आनंदाने आणि उत्साहात करते .सणाची सगळी तयारी आटपून ती कितीतरी वेळ या खेळात जाऊन रमते. चारचौघी एकत्र येतात. भेटीगाठी होतात. माहेरवाशीण परतून येते. जिवाभावाच्या मैत्रीणी भेटतात. तसे सणवार आला की, आम्हा स्त्रीयांचा उत्साह अगदी शिगेलाच पोहचतो.  पण ग्रामीण स्त्रीला मात्र सणातून मिळणारा   हा आनंद वेगळाच.तिच्या दैनंदिन जीवनातून मिळणाऱ्या आनंदापेक्षा थोडा वेगळा आनंद. हा आनंद ती आपल्या सणासुदीच्या विविध चालीरूढीतून व्यक्त करू शकते. तिचा आनंद सणासुदीच्या काळात शिगेला पोहचतो. आणि गौरी-गणपतीचा सण म्हटलेकी ,माहेरच्या आठवणी जागून नकळत ओठावर गीत येते ,

”  बंधू येईल माहेरी न्यायला

गौरी गणपतीच्या सणाला “

आणि

” बंधू रे शिपाया  ,दे मला रूपाया

गौरीच्या सणाला रे ,चोळीच्या खणाला “

तसेच

“रूणूझुणूत्या पाखरा, जा माझ्या माहेरा”,

अजून म्हणजे गौराईच्याअलंकाराचे लेणं सांगताना गीत आहे

” पाटाची आरूळी बाय, पाण्यानं तुंबली

आमची गौराई इथं का बसली, का जोडव्या रूसली

…पाटल्या रूसली,.. डोरल्या रूसली”

असे एक एक करून अलंकार गोवले जातात. आणि हे सगळे बाईच्या रंग रूपाचे वर्णन आहे .इत्यादी गाण्याच्या ठेक्यावर झिम्मा रंगात येतो. अशी कितीतरी पारंपारिक गाणी आहेत ज्यांच्या अर्थामध्ये आपण खोल जाऊ तितकेच ते आपणास भावूक करतात.या गाण्यांचा अर्थ शोधत गेलो तर त्या काळच्या स्त्रीयांचे राहणीमान ,त्याचे जगणे, सुख-दुःख, सासर-माहेरचा अभिमान ,नात्यांचा आदर  अशा कित्येक बाबींच्या तळाशी आपण जाऊ. आज आपणा स्त्रीयांना स्वातंत्र्य आहे ते पुर्वीच्या स्त्रीयांना नव्हते. अगदी काही दशकांपुर्वीचा विचार केला तर बाई ही घर आणि संसार याच साखळदंडात बांधलेली होती. मग जात्यावरच्या ओव्यांतुन म्हणा नाहीतर सणासुदीच्या या पारंपारिक गाण्यातून ती व्यक्त होत होती.

झिम्मा-फुगडी हा फक्त खेळ नाही  तर तो एका पिढीने दुसर्‍या पिढीला दिलेला आपला सांस्कृतिक वारसा आहे. हा खेळ  त्यामधील  गाणी हे एकेकाळी बाईचे संपुर्ण जगणे आहे. आपण सगळ्याजणींनी हा सांस्कृतिक वारसा जतन करणे आणि येणाऱ्या पिढीला देणे हे आपले कर्तव्य आहे. आपला हा सांस्कृतिक वारसा चिरकाल टिकून रहावा हेच मागणे मी गणरायाकडे मागते.

© सौ.वनिता संभाजी जांगळे

जांभुळवाडी-पेठ, ता. वाळवा , जि. सांगली

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “शेतकरी शेतमाल आणि भाव….” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

🌸 विविधा 🌸

☆ “शेतकरी शेतमाल आणि भाव…” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

खरं म्हणजे याबाबतीत कित्येक वर्षै तेच चर्वित चर्वण ऐकतो आहे. शेतमालाला भाव का मिळत नाहीत ?  तसं पाहिलं तर भाज्या महाग झाल्या तर असा किती फरक कोणाचेही बजेटमध्ये पडणार आहे ?  नाही म्हणलं तरी कांदे बटाटे हे सुद्धा शंभरीच्या जवळपास अनेक वेळेला जाऊन आलेले आहेत. शेतमालाचे भाव वाढले की सगळ्यांचेच एकदम वाढत नाहीत. कुठल्यातरी  दोन तीन गोष्टींचेच भाव वाढतात. बाकीच्यांचे कमीच असतात. त्यामुळे ज्यांना बजेट सांभाळायचे आहे त्यांनी जास्त भाव असलेल्या भाज्या काही दिवस खाऊ नयेत.  भाव वाढले तरी किती दिवस वाढलेले राहतात? महिना दोन महिन्यात पुन्हा शेतकऱ्याला भाव मिळत नाहीतच. शेतकऱ्यांच्या हिताची सगळीच सरकारे येऊन गेली. प्रत्येक सरकार शेतकरी हिताचे निर्णय घेते असे म्हणतात.  तरीही शेतकऱ्यांना शेतमालाला भाव मिळावेत यासाठी आंदोलन करावेच लागते.  अगदी शरद जोशींच्या रस्ता रोको पासून आम्ही पाहतो आहोत.  कोणतेही सरकार शेतमालाच्या भावाच्या बाबतीत उदासीन का असते ? शेतमालाचे भाव वाढल्यास साधारण  मध्यमवर्गीयांमध्येच काहीशी नाराजी पसरते.  मला असे वाटते की मध्यमवर्गीयांची मते ही कोणत्याही पक्षाच्या दृष्टीने महत्त्वाची असतात. कारण तेच मोठ्या संख्येने मतदान करणारे मतदार असतात.  या मतदारांच्या नाराजीला घाबरून कोणतेही सरकार शेतमालाच्या भावांबद्दल निर्णय घेत नाही असे वाटते.

खरं म्हणजे सगळ्याच शेतमालाचे कमीत कमी भाव म्हणजेच बेसलाईन एकदा ठरवून घ्यावी आणि दरवर्षी सरकारी कर्मचाऱ्यांना जशी महागाई निर्देशांकाप्रमाणे वाढ मिळते त्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या भावालाही महागाई निर्देशांका प्रमाणे वाढ मिळावी असे ठरवून टाकावे.  काय हरकत आहे ? सर्व पक्षांनी येत्या निवडणुकीत आम्ही निवडून आल्यावर शेतमालाच्या भावासंबंधी आम्ही काय करणार आहोत आणि शेतमालाला नक्की कमीत कमी किती भाव देणार आहोत हे जाहीर करून मते मागावीत. शेतकऱ्यांकडे पैसा आला तर शेतकरी तो खर्च करतोच. शेतकऱ्याकडून पैसा खर्च झाला की तो मार्केटमध्ये येतो. मार्केटमध्ये आला की मार्केट सुधारेल. मार्केट सुधारल्यावर उत्पादन सुधारेल उद्योग सुधारतील.  संपूर्ण अर्थव्यवस्थाच मजबूत होऊ शकेल असे आपले माझ्या अल्पमतीला वाटते. यात अडचण काय आहे हे सुद्धा सर्व राजकीय लोकांनी एकदा जाहीर करावे.  पण आम्ही शेतकरी हिताचे निर्णय घेणार एवढेच म्हणून मते मागून सत्ता मिळाल्यावर, कुठलाही शेतकरी हिताचा निर्णय घेतला जात नाही. असे मागील पन्नास साठ वर्षे मी पाहतो आहे. तर मला वाटते एकदा असे होऊन जाऊ द्या. सर्व राजकीय पक्षांनी ते निवडून आल्यानंतर शेतमालाला कमीत कमी कसा आणि किती भाव देतील आणि त्याची अंमलबजावणी कशी करतील हेच त्यांच्या निवडणूक जाहीरनाम्यात जाहीर करून टाकावे.  आहे कोणी डेरिंगबाज? अर्थात जो कधीच निवडून येऊ शकणार नाही अशांनी डेरिंग दाखवण्यात अर्थ नाही हेही खरे. परंतु महत्त्वाच्या मोठ्या राजकीय पक्षांनी याबाबत निश्चित योजना आकडेवारी सह जाहीरनाम्यात जाहीर करावी. करा तर खरं एकदा डेअरिंग! माझ्यासारखे मध्यमवर्गीय सुद्धा नक्की मत देतील अशा डेरिंगबाजांना !

©  श्री सुनील देशपांडे

मो – 9657709640

Email: [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “प्रसाद…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “प्रसाद” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

काल परवा दोन तीन ठिकाणी गोपाळकाला प्रसाद म्हणून मिळाला.तो अगदीं घास घास मिळालेला गोपाळकाला खाल्ला अन् काय स्वादिष्ट लागला म्हणून सांगू, आणि शिवाय पोट शांत, तृप्त झाल्याची अनुभुती. खरचं ही किमया पदार्थाची नसून त्या प्रसादाची असतें.

ह्या प्रसादा वरील दोन तीन खुप छान पोस्ट वाचनात आल्या.सोशल मिडीया मुळे खूप सा-या पोस्ट वाचायला मिळतात. त्यापैकी काही पोस्ट ह्या खूप आवडतात,पटतात आणि नकळतच आपल्या मेंदूमधील एका कप्प्यात हलकेच विराजमान होतात. कधी त्या आवडलेल्या पोस्टच्या लेखकाचं नावं त्यावर असल्यास कळतं तर कधी त्यावर नाव नसल्याने ही आवडलेली पोस्ट कुणी बरं लिहीली असेल हा प्रश्न कायम मनात रेंगाळत राहातो.

सध्या सणवार,उत्सव,सोहळे ह्यांचे दिवस. त्यामुळे सर्वत्र मंगलमय ,धार्मिक वातावरण. ह्या सोहोळ्याची सांगता कशाने होत असेल तर ती होते प्रसादाने.

प्रसाद हा शब्द उच्चारल्याबरोबर तो एक पदार्थ, एक जिन्नस न राहता त्यांच रुपांतर एका अतूट विश्वास, भक्कम आधार, शांती,तृप्ती, समाधान देणा-या एका जादूमय शक्तीत होतं. एकवेळ आपल्या मनात पदार्थांविषयी मनात संदेह निर्माण होईल पण त्याचं प्रसादात रुपांतर झालं की मनात ना कुठली शंका येतं ना कुठला विकल्प येतं.

एखाद्या पदार्थाचं प्रसादात रुपांतर झालं की त्या पदार्थांचं एका चविष्ट, जिभेवर रेंगाळणा-या,मनाला शांती,समाधान आणि पोटाला तृप्ती पुरविणा-या पदार्थांत होतं.  

प्रसादाची खासियत म्हणजे तो जिन्नस प्रसादामध्ये जितका चविष्ट बनतो तितका तो एरवी कधी होतं नाही. उदाहरण घ्यायचं झालं तर कुठल्याही पुजेनंतर वा भजनानंतर केलेल्या गोपालकाला ह्या प्रसादाची चव एरवी खायला मुद्दाम केलेल्या काल्याला कधीच येत नाही. प्रसादाची अजून एक खासियत म्हणजे कितीही मोठा व्यक्ती असला तरी हात समोर करून प्रसाद मागण्यात कधीच कमीपणा मानत नाही, जी व्यक्ती प्रसाद मागायला काचकुच करते तेव्हा एकतर श्रद्धेचा अभाव तरी असतो वा त्या व्यक्तीची प्रसाद आणि अन्य पदार्थ ह्यांच्यातील फरक ओळखण्याची ताकदच नसते.  गणपती, महालक्ष्मी वा अन्य कुठलाही महाप्रसाद ह्यांच्या प्रसादाच्या जेवणातील तृप्ती, समाधान हे फार आगळवेगळं असतं.

अशीच काल “प्रसाद”हा विषय घेऊन एक अनामिक पण अतिशय विलक्षण पोस्ट वाचनात आली. त्यातीलच काही आवडलेल्या मुद्द्यांची  आजच्या माझ्या पोस्ट मध्ये मदत घेते आहे.

 एकदा खूप अग्निदिव्य,संकट ह्यातून भरडल्या गेलेल्या एका अत्यंत धार्मिक,आस्तिक अशा गुरुजींना “हे सगळं कसं सहनं केलंत हा प्रश्न विचारल्या गेल्यावर  गुरुजी उत्तरले, “आयुष्यात जे आपल्याला मिळते तो देवाचा प्रसाद मानला. चिकित्सा नाही. चिरफाड नाही. चिडचिड नाही त्यामुळे सगळं सहज,सोप्पं आणि अनिवार्य, आवश्यक भाग म्हणून आपोआप स्विकारल्या गेलं” अजून पुढे मास्तर म्हणतात,”प्रसाद हातात आला की चटकन तोंडात टाकतो की नाही आपण? चवीचा विचार नाही करत. ताजे-शिळे म्हणत नाही. त्याला पेढा, मला गूळ का? म्हणत नाही. घेतो. खातो. धन्य होतो. हे कधी विसरलो नाही”. प्रसाद हा माझ्या देवाचा प्रतिसादच मानला !’खरोखरच खूप काही शिकवून जाते ही मास्तरांची शिकवण.

खरोखरच मंदिरात आपल्याला प्रसाद मिळतो त्याची आपण चिकित्सा तर दूरच पण साधी चर्चाही करत नाही. आपण प्रसाद घेतो, खातो आणि कृतकृत्यतेने हात जोडतो. खरंच देवळातल्या प्रसादासारखेच मानावेत आयुष्यात आलेले सगळे आंबट,गोड,कडू चवींचे प्रसंग. जणू ह्या शिकवणीने मनातील घालमेल, तळमळ सगळं जणू निमायला होतं.

प्रसादावरुनच अजून एक प्रसंग त्या पोस्ट मध्ये सांगितला. एका वृद्ध स्त्रीला प्रवचन झाल्यावर प्रसाद न मिळाल्याने ती प्रसाद मागायला येते. प्रसाद संपुष्टात आल्याने त्या वृद्धेला एक भक्त स्वतःजवळील लाडू देतो . तेव्हा ती आजीबाई त्यातील कणभर लाडू प्रसाद म्हणून घेते आणि उरलेला लाडू असचं कोणी बिनाप्रसादाचे जाईल त्यांच्यासाठी म्हणून वापस करते. ती आजीबाई खूप मौलिक गोष्ट सांगून जाते, ती म्हणते,”परसाद जीव निवण्यासाठी पायजे.. पोट भरण्यासाठी नाय् !’’ आपल्या हव्यासापोटी आपण ब्रह्मांडच खिशात घालायचे म्हणतो. मग हट्ट सुरू होतो. आणखी मिळवेन, खूप मिळवेन, जास्तीत जास्त मिळवेन,हाव वाढतच जाते,कुठे थांबायचं ते कळतचं नाही आणि  शेवटी ओंजळ रिती ती रितीच राहते. खरतरं आयुष्य हाच एक महाप्रसाद आहे. तो वाटता वाटता स्वतः घेतला तरच परमानंद मिळतो. त्या पोस्ट मधील एका आवडलेल्या वाक्याने आजच्या पोस्टची सांगता करते,”परमार्थ म्हणजे जवळचे उत्तम सर्वांना देणे. थोड्यातलाही आनंद घेणे. आपले अश्रू रोखून हसण्याचे चांदणे पसरणे. बस्स, हव्यास आणि हट्ट सोडण्याची तयारी करायला पाहिजे…”

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आँखों से जो उतरी हैं दिल में… ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे ☆

श्री विश्वास विष्णु देशपांडे

? विविधा ?

☆ आँखों से जो उतरी हैं दिल में… ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे  

माझ्यासाठी वाचन हा दिव्यानंदाची अनुभूती देणारा अनुभव आहे.  एखादी छान पौर्णिमेची रात्र असावी आणि खिडकीतून चांदणं आत झिरपत यावं तसा शांत, दिव्य आणि प्रसन्न अनुभव वाचन आपल्याला देतं. या प्रसन्न अनुभवाचं माध्यम असतं एखादं आवडतं पुस्तक, कथा किंवा कविता. डोळ्यांच्या मार्गानं हे चांदणं थेट आतपर्यंत झिरपतं आणि आत्मानंदाचा प्रसन्न अनुभव देतं . एखाद्या पट्टीच्या गायकाला जसा मैफलीत सूर गवसावा आणि मैफल उत्तरोत्तर रंगत जावी तसाच हा अनुभव असतो. या मैफलीत श्रोते जसे सुरांच्या वर्षावाने सचैल न्हाऊन निघतात, तसाच आनंद चांगल्या पुस्तकाचं वाचन आपल्याला देतं.

बरं हे वाचन आणि त्याचे प्रकारही वेगवेगळे. मार्ग वेगवेगळे आणि माध्यमही वेगवेगळे. पण परिणाम मात्र एकच असतो आणि तो म्हणजे आनंदाची अनुभूती. जेव्हा मी माझ्यासाठी वाचतो, तेव्हा पुस्तकातील ती अक्षरे अमूर्त रूप धारण करून डोळ्यांच्या खिडकीवाटे थेट मनाच्या गाभाऱ्यात प्रवेश करतात. येताना ती अक्षरे एकेकटी येत नाहीत. ते आपल्यासोबत आनंद, प्रसन्नता कणाकणाने घेऊन आत शिरतात. काळोख्या रात्रीत जसे एखाद्या काचेच्या बरणीत काजवे एकत्र गोळा करावेत आणि ती काचेची बरणी प्रकाशमान व्हावी, तिचा प्रकाश आपल्या चेहऱ्यावर पडावा आणि आपला चेहरा काळोखातही उजळून निघावा तसेच वाचन माझ्या अंतरंग प्रकाशाने भरून टाकते. मनाचा कोपरा न कोपरा उजळून निघतो. उन्हाळ्यात तहानलेल्या धरणीवर जसे पावसाचे थेंब पडावेत आणि थोड्याच वेळात आपल्या शीतलतेने त्यांनी धरित्रीला शांत करावे तसे उत्तम वाङ्मय मनाच्या तहानलेल्या धरणीवर अमृताचे सिंचन करते. मग उन्हाने कोमेजलेले, करपलेले अंकुर टवटवीत होऊन वर येतात आणि ते ‘हिरवे हिरवे गार गालिचे ‘ मनाला प्रसन्नता आणि शांतता देतात.

जेव्हा एखादे बुवा, पुराणिक, कथाकार, कीर्तनकार आपल्या रसाळ वाणीद्वारे रामायण, भागवत, हरिविजय, पांडवप्रताप यासारखा एखादा ग्रंथ श्रोत्यांसमोर वाचतात, तेव्हा ते स्वतःबरोबर इतरांनाही आनंदाची अनुभूती देतात. मुळातच हे ग्रंथ भक्तिरसाने ओतप्रोत भरलेले आहेत, त्यात सांगणाऱ्या बुवांची वाणी रसाळ आणि प्रासादिक असेल तर मग विचारायलाच नको. श्रोते त्या वर्षावात चिंब न्हाऊन निघतात. आताही माध्यम तेच असते. म्हणजे बुवांच्या समोर असलेला प्रासादिक ग्रंथ. पण त्या ग्रंथातील अक्षरे आता बुवांच्या हृदयातील ओलावा, आनंद, प्रसन्नता घेऊन ध्वनीचे रूप धारण करतात. आता त्यांचा हृदयात उतरण्याचा मार्ग बदलतो. डोळ्यांच्या ऐवजी ती कानावाटे प्रवेश करती होतात. कानावाटे हृदयापर्यंत पोहोचतात. पण परिणाम मात्र तोच असतो. आणि तो परिणाम म्हणजे दिव्यानंदाची अनुभूती.

ज्ञानेश्वर माऊलींनी जेव्हा ज्ञानेश्वरी सांगितली आणि तेव्हा जे श्रोते हजर असतील, ते किती भाग्यवान म्हणावेत ! ते दृश्य जेव्हा मी कल्पनेने डोळ्यासमोर आणतो, तेव्हा मला दिसते ते मंदिर. माऊली खांबाला ( पैस ) टेकून बसल्या आहेत. समोर त्यांचे बोल आपल्या कानात साठवून घेण्यासाठी चातकाप्रमाणे आतुर झालेला श्रोतृवर्ग बसलेला आहे. बाजूला निवृत्तीनाथ आहेत. माऊलींच्या दोन्ही बाजूला दोन समया प्रकाशमान आहेत. त्या समयांच्या प्रकाश माऊलींच्या मुखमंडलावर पडला आहे. मुळातच तेजस्वी असलेली माऊलींची मुद्रा त्या प्रकाशात आणखीनच दिव्य प्रकाशाने उजळून निघाली आहे. माऊलींच्या मुखातून आता अमृतासमान अशा एकेक ओव्या बाहेर पडताहेत. ओम नमोजी आद्याने सुरुवात झाली आहे. एकामागून एक निरनिराळी रूपके, उपमा घेऊन त्या ओव्या श्रोत्यांच्या हृदयाचा ठाव घेत आहेत. इथे श्रोत्यांची अवस्था फारच बिकट झाली आहे. हा आनंद किती आणि कुठे कसा साठवावा हे त्यांना उमजत नाही. जणू त्यांच्या सर्वांगाचे कान झाले आहेत. ज्ञानेश्वर माऊलींचे अमृतमयी बोल ते आपल्या हृदयात साठवून घेत आहेत. हृदयीचे हृदयी घातले अशी ही अवस्था !

‘तरी आता अवधान दिजे, मग सर्व सुखाते पात्र होईजे‘ असे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात ते उगीच नाही.

महर्षी वाल्मिकींनी लिहिलेलं रामायण लव कुश यांनी जेव्हा श्रीरामांच्या दरबारात श्रीराम आणि श्रोत्यांसमोर गायिले तेव्हा सर्वांची काय अवस्था झाली ते आपण रामायणात वाचतोच. ज्यांना आपण आधुनिक वाल्मिकी म्हणतो ते ग दि माडगूळकर गीतरामायणाच्या लेखनामुळे अजरामर झाले. हेच गीतरामायण बाबूजी उर्फ सुधीर फडके यांनी गाऊन अजरामर केले. यातील ते गीत सहजच ओठांवर येते

स्वये श्रीरामप्रभू ऐकती, कुश लव रामायण गाती.

मग ही गाणारी मुले कशी आहेत याचे चित्रमय वर्णन गदिमा करतात. ते म्हणतात

राजस मुद्रा वेष मुनींचे, गंधर्वच ते तपोवनींचे

अशा एकेक ओळी आठवत जातात. या सगळ्यांचा श्रोतृवृंदावर काय परिणाम होतो, तो पण गदिमा जणू सचित्र आपल्या डोळ्यांसमोर उभा करतात. ते म्हणतात

सामवेदसे बाळ बोलती, सर्गामागुनी सर्ग चालती

सचिव मुनिजन प्रिया डोलती, आसवे गाली ओघळती.

प्रत्यक्ष श्रीरामांवर काय परिणाम झाला तर…

सोडून आसन उठले राघव, उठुनि कवळती अपुले शैशव

पुत्रभेटीचा घडे महोत्सव, परी जो उभया नच माहिती.

अशी जादू जणू हे शब्द करतात ! मग ते शब्द वाल्मिकींचे असोत वा गदिमांचे. ती अमूर्त अक्षरे ध्वनीचे रूप घेऊन कानावाटे हृदयापर्यंत पोहोचतात. आनंदाच्या चांदण्याची बरसात होते. कर्तव्यकठोर असलेल्या श्रीरामांचे देखील डोळे पाणावतात. माया, ममता, प्रेम, करुणा सगळे सगळे भाव हे शब्द उभे करतात.

असं म्हटलं जातं की प्रख्यात जर्मन कवी गटे यांनी कालिदासाच्या शाकुंतल या नाटकाचं जर्मन भाषेत केलेलं भाषांतर जेव्हा वाचलं, तेव्हा त्यांना इतका आनंद झाला की हा जर्मन कवी आपलं देहभान विसरून शाकुंतल डोक्यावर घेऊन नाचला. कुठून आला हा आनंद ? पुस्तकाच्या वाचनातूनच ना ? या आनंदाला उपमा नाही आणि त्याची तुलना इतर कुठल्या आनंदाशी होऊ शकत नाही. त्या काळात पाश्चात्य साहित्यात सौंदर्यवाद ( romanticism ) मूळ धरू लागला होता. अशा काळात कालिदासाने लिहिलेलं शकुंतलेचं आणि निसर्गाचं वर्णन वाचून हा कवी अक्षरशः वेडा झाला. त्याने त्यावेळी शाकुंतल या ग्रंथाबद्दल काढलेले उद्गार असे आहेत. ‘ वसंतऋतूतला मोहोर आणि ग्रीष्म ऋतूतलं फळ हे सर्व एकाचवेळी ( युगपद्) ज्यात आहे, जे ( एकाच वेळी) मनाला शांत करणारे ( संतर्पणम्) आणि मोहितही करणारे आहे. किंवा स्वर्ग आणि पृथ्वी यांचं ऐश्वर्य जर एकाच वेळी एकत्र हवं असेल तर प्रियमित्रा, तू शाकुंतलाचा आस्वाद घे. ‘ मला वाटतं  हेच उद्गार सर्व ग्रंथांना लागू होतात .

ज्ञानेश्वर माऊलींची माफी मागून त्यांच्या भाषेत मला असे सांगावेसे वाटते

ग्रंथ सर्व रसांचा आगरु, ग्रंथ सर्व सुखांचा सागरु

तरी ग्रंथ हाती घेईजे, मग सर्व सुखाते पात्र होईजे.

जशी प्रेशर कुकरमध्ये कोंडलेली वाफ बाहेर पडणे आवश्यक असते त्याचप्रमाणे आपल्या मनात साठलेल्या भावनांचे सुद्धा मुक्त होणे, निचरा होणे  किंवा ज्याला आपण विरेचन असे म्हणू तेही आवश्यकच असते.  पुस्तके आणि त्यांचे वाचन अशा प्रकारचे भावनांचे विरेचन ज्याला इंग्रजीत कॅथर्सिस म्हटले जाते ते घडवून आणतात. मी वाचकही आहे आणि लेखकही. माझा तर श्वास म्हणजे वाचन ! मी जेव्हा आनंदी असतो तेव्हा एखादे आवडते पुस्तक हातात घेतो आणि माझा आनंद दुणावतो. मी जेव्हा दुःखात असतो तेव्हाही एखादे पुस्तक हातात घेतो आणि माझे दुःख उणावते. थोडक्यात म्हणजे गणपतीच्या आरतीत म्हटल्याप्रमाणे चांगल्या पुस्तकांचे वाचन हे ‘ सुखकर्ता दुःखहर्ता’ अशा प्रकारचे आहे. स्वानंदासाठी वाचन करावे, विचार, अनुभव आणि भावना समृद्ध होण्यासाठी वाचन करावे. ‘मेरा पढने में नही लागे दिल…‘ असे न म्हणता ‘मेरा पढने मे हीं लागे दिल ‘ असे म्हणू या.

©️ श्री विश्वास विष्णु देशपांडे

चाळीसगाव.

 प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ स्वाभिमान… ☆ श्री उमेश सूर्यवंशी ☆

श्री उमेश सूर्यवंशी

? विविधा ?

स्वाभिमान…— ☆ श्री उमेश सूर्यवंशी ☆

स्वाभिमान …किती जणांना असतो ? तुम्ही म्हणाल ” स्वाभिमान तर प्रत्येक मनुष्याला असतोच “. तुमच्या म्हणण्यात खोट नाही परंतु त्यामध्ये यथार्थता नाही हे अधिक खरं आहे. बहुतांशी लोकांचा एक गोड गैरसमज असा असतो की ते स्वाभिमानी आहेत.या गोड गैरसमजात माणसे जगतात आणि मरतात देखील . पण स्वाभिमान या शब्दाची नेमकी जाणीव व त्याचा गाभा किती जणांना आकळलेला असतो ? कोण जाणे. स्वाभिमान हा शब्द मानवी जीवनात अगदी अलिकडे दाखल झाला असावा.याचे कारण असे की , मुख्यतः विज्ञानयुगानंतरच मनुष्याच्या वैयक्तिक व विश्वात्मक भावनांना काही एक निश्चित अशी चौकट उपलब्ध झाली आहे. तत्पूर्वी स्वाभिमान हा शब्द इतर वेगळ्या अर्थाने कार्यरत असावा. त्याच्या मध्ये सखोलतेची व व्यापकतेची त्रुटी असावी.

स्वाभिमान …शब्द उच्चारताना अंग किती मोहरून येते. आपण स्वाभिमानी बाण्याचे आहोत हा गोड गैरसमज बहुतांशी लोकांना सन्मान पुरवत असतो. पण या बहुतांशी लोकांनी स्वाभिमान या शब्दाची परीक्षा आपल्या जीवनात सखोलपणे अभ्यासलेलीच नसते हे कटू वास्तव आहे. स्वाभिमान या शब्दाचा शब्दशः अर्थ स्वतः विषयीचा अभिमान असा होईल. पण हा अर्थ या शब्दाला सखोलपण पुरवत नाही . स्वाभिमान या शब्दांत जोपर्यंत ” स्व जाणण्याची प्रक्रिया ” पार पडत नाही तोवर मनुष्याला स्वाभिमान कळणार नाही .हा ” स्व जाणण्याची प्रक्रिया ” अध्यात्मवादी धारणेची नसून ती वेगळ्या पण योग्य अर्थाची आहे. स्व जाणणे म्हणजे ज्या नैसर्गिक घडणीतून तुमची जडणघडण झाली आहे ती नैसर्गिक प्रक्रिया जाणून तिच्यानुसार प्रामाणिक वर्तन करणे होय. यामध्ये नक्कीच कालसुसंगत लवचिकता असतेच मात्र यामध्ये आशयाला धक्का पोचेल असे असत्य असू नये.मनुष्याच्या नैसर्गिक स्वभावाला मुरड घालून काही अन्य स्वार्थापोटी जेव्हा तो दुसरा एखादा मुखवटा चढवून समाजात वावरतो तेव्हा ” स्वाभिमान ” हा शब्द गळून पडलेला असतो. तुम्ही तुमच्या नैसर्गिक धाटणीशी प्रामाणिक राहून वर्तन करत असाल तर तुम्ही ” स्व ” जाणलेला आहे आणि त्या ” स्व ” चा योग्य अभिमान तुमच्या मनाच्या तळाशी आहे. हा तळ म्हणजेच तुमचा स्वाभिमान असतो. हा तळ ढवळावा लागतो आणि त्या मंथनातून बाहेर पडते तुमचे नैसर्गिक रुप. हे रुप जसेच्या तसे समाजात घेऊन वावरणे म्हणजेच स्वाभिमान जागृत ठेवणे असा होतो. हीच आहे स्वाभिमान शब्दाची जाणीव व यथार्थता …

बहुतांशी लोकांना वरवरचा व शाब्दिक अर्थच अपेक्षित असतो. शब्दाच्या तळाशी असणारे रंग त्यांना जाणवत नाहीत की पृष्ठभागावर तरंगणारे नैसर्गिक तवंग त्यांना दिसत नाहीत . त्यांना फक्त शब्दाच्या समुद्रात दिसतो आपला चेहरा .हा चेहरा फसवा असतो. कारण या चेहऱ्याने ” स्व ” जाणण्याची प्रक्रिया पार पाडलेली नसते. अशावेळी केवळ शब्दजंजाळात अडकून स्वाभिमान बाळगण्यात कोणतीही यथार्थता नाही . स्वाभिमान बाळगायचाच असेल तर पहिल्यांदा ” स्व जाणण्याची प्रक्रिया ” पार पाडा. नंतर त्या ” स्व ” चा मनापासून स्विकार करा. त्यानुसार तुमचे वर्तन करा…” स्वाभिमान ” तिथेच सापडेल.

©  श्री उमेश सूर्यवंशी

मो 9922784065

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “सुखी व्हा,समाधानी रहा…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “सुखी व्हा, समाधानी रहा” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

काल एका गुरुजींनी आशिर्वाद देताना म्हंटले “सुखी व्हा, समाधानी रहा,” आशिर्वाद जाम आवडला आणि पटला. समाधान ह्या शब्दामध्ये मन गुंतले आणि विचारात देखील पाडले.समाधान ही गोष्ट आपल्याला मिळवावी लागते, अनुभवावी लागते.”स्वाद लियो तो जानो”ह्या सारखं ती अनुभवल्या वरच खरी तिची लज्जत, खुमारी ही कळते.समाधान म्हणजे खरतंर वर्णन करायला शब्दही तोकडे पडतात अशी गोष्ट.समाधान ही अनुभवण्याची एक गोष्ट.बरं ही गोष्ट अनुभवली तर अगदी इटुकल्या पिटुकल्या ,साध्यासुध्या गोष्टीतही मिळते.फक्त ही गोष्ट मिळवण्याचं कसब मात्र हवं हं.

अलार्म बंद केल्यानंतर जी पुन्हा डुलकी लागले ती खरी झोप.आणि ह्या साखरझोपेतून मिळतं एक वेगळंच स्वप्नाळू  समाधान.

महिनाअखेर अचानक साडीच्या घडीतून मिळालेले पैसे म्हणजे खरा धनलाभ. आणि ह्या अचानक धनलाभातून मिळतं घबाडाएवढं समाधान.

कडकडून भूक लागली असता मस्त जमून आलेली पिठलं भाताची पंगत म्हणजे खरी मेजवानी.आणि ह्या मेजवानीतून मिळतं एक भरपेट ओतप्रोत,तुडुंब आनंदायी समाधान.

एखाद्या गोष्टीचे अप्रुप वाटत असतांनाच अचानक अलगद ओंजळीत पडलेली ती  गोष्ट म्हणजे खरे सुदैव.आणि ह्या सुदैवातून मिळतो  “अच्छे दिन” वालं साक्षात्कारी समाधान.

आपल्याला काय मिळाले ह्याचा ताळेबंद बघुन यापेक्षा आपल्याला खूप काही मिळाले ह्याची जाणीव म्हणजे खरी त्रुप्ती.आणि ह्या त्रुप्तीतुनचं मिळते उद्याचे उज्ज्वल आशादायी समाधान.

रात्री गादीवर पाठ टेकताच लागलेला डोळा म्हणजे खरे सुख.आणि ह्या सुखातुनचं मिळतं एक आत्मिक समाधान.

मी तरी स्वतः ला खूप नशीबवान समजते.कारण ह्याची अनुभुती मी पावलोपावली घेते.तुम्हीही समजून बघा खूप मस्त वाटेल. ह्या जन्मावर,ह्या  जगण्यावर,शतदा प्रेम करावे.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ॥ श्रीकृष्ण ज्ञानदेव मैत्रभाव ॥ ☆ सुश्री विनिता तेलंग ☆

सुश्री विनिता तेलंग

🌸 विविधा 🌸

☆ ॥ श्रीकृष्ण ज्ञानदेव मैत्रभाव॥ ☆ सुश्री विनिता तेलंग

देवकीया उदरी वाहिला, यशोदा सायासे पाळिला, का शेखीं उपेगा गेला, पांडवासी..

असा तो.देवकीने प्रसवला,यशोदेने वाढवला,आणि तो झटला पांडवांकरता.वसुदेवाचा अंश होता, पण नंदाचे भाग्य झाला.अष्टनायिकांचा नाथ,सोळा सहस्रांचा आधार.गोपिकांचे सुखनिधान,राधिकेचा प्राण.गोपालकांचा सखा,गोधनाचा पाठीराखा.दुष्टांचा मारक,सज्जनांचा तारक.अधर्माचा विच्छेदक आणि धर्माचा संस्थापक.परम ईश्वराचा पूर्णावतार आणि मानवपणाचा साक्षात्कार.

सर्वांना तो त्यांचा वाटे.कदंबाखाली गोपालांशी खेळताना किंवा वृंदावनात रस रचताना त्यातल्या प्रत्येकाला वाटे,तो आपलाच.सुदाम्याला वाटले हा माझा सहचर ,कुब्जेला वाटले ‘हे माझ्यास्तव.’

पण साऱ्यांचा असून तो कुणाचाच नव्हता. गोकुळ सोडलं,प्राणप्रिय बासरी परत कधी अधरावर धरली नाही.अष्टनायिकांच्या मोहात, राधिकेच्या त्यागात, कृष्णेच्या सख्यत्वात,कुंतीच्या ममत्वात कशा कशात गुंतला नाही तो.

जिथे गेला तिथे पूर्णांशाने त्यात होता. तिथले प्रयोजन संपताच कमलपत्राच्या निर्लेपपणे आपला आभाळासारखा निळा शेला उचलून निघून जायची त्याची रीत. पण एका जागी मात्र हा जगन्नायक गुंतून पडला.त्याच्या शेल्याचं टोक अडकून पडावं अशी एकच जागा होती -अर्जुन !

धर्म भीमांना नमस्कार करणारा,नकुल सहदेवांना आशीर्वाद देणारा कृष्ण अर्जुनाला मात्र उराउरी भेटत असे.’पांडवांमध्ये मी अर्जुन’ असे त्याने म्हणावे इतके त्याचे याचे एकत्व! ‘अप्रांतमती’ लेखात द.भि. कुलकर्णी म्हणाले, ‘देवकी,यशोदा,गोप-गोपी,राधा,द्रौपदी सारेजण कृष्णाला दर्पण करून आत्मदर्शन घेत होते;एकटा अर्जुन असा होता की जो कृष्णाचा आरसा झाला होता-कृष्ण अर्जुनात आत्मदर्शन घेत होता!’ काय नितळ मन असेल अर्जुनाचं!

हे कृष्णाचं गुंतणं जाणलं ज्ञानदेवांनी.गीतेचं तत्त्वज्ञान सांगताना योगेश्वराचा स्वर कुठे हळुवार झाला, कुठे त्याचा कंठ दाटून आला, कुठे त्याला अर्जुनप्रीतीचे भरते आले, कुठे त्याला काळजी वाटली, कुठे तो हलके रागे भरला,हे त्यांच्या हळुवार अंतःकरणानं हलकेच टिपलं.त्या अर्थी ज्ञानेश्वरही आरसा झाले.ज्ञानेश्वरीत त्यांनी कृष्ण होऊन श्रोत्यांना अर्जुनाच्या जागी बसवलं,आणि कृष्णाहून हळुवार होऊन आपल्यातील अर्जुनाला समजावलं!

दभि म्हणाले तसं ‘ज्ञानेश्वरांना कृष्णाचे सर्वस्पर्शित्व नेमके आकळले आणि त्याचे केंद्रही गवसले होते. त्याचे पूर्णकाम,निरिच्छ,जीवन्मुक्त असणे त्यांनी जाणले.आणि तसेच अर्जुनातले त्याचे गुंतणेही!’ ज्ञानेश्वरांचे निर्मळ,उन्नत आणि संवेदनशील मनच हे जाणू शकते.

ज्ञानेश्वरीतले कृष्णार्जुन प्रेमाचे दाखले फार लोभस आहेत!

पाचव्या अध्यायात योगशास्त्राचे महत्व ऐकल्यावर अर्जुन म्हणतो की हे सारं फार छान आहे. हे मला पुन्हा एकदा नीट समजाव .आणि अर्जुनाला योगमार्गाविषयी गोडी निर्माण होते आहे हे जाणून आनंदलेल्या कृष्णाचे वर्णन करताना माऊलींनाही आनंदाचे भरते आले आहे .

आधींच चित्त मायेचे, वरी मिष जाहले पढियंताचे, आता ते अद्भुतपण स्नेहाचे, कवण जाणे!

आधीच प्रेमाचं माणूस ,त्यात शिकायची इच्छा,त्यामुळे आता जो अपूर्व भाव उमलेल तो अद्भुत असेल खास !

ते म्हणो कारुण्य रसाची वृष्टि,की नवया स्नेहाची सृष्टि,हे असो नेणिजे दृष्टी,हरीची वानू.

जे अमृताची वोतली,की प्रेमचि पिउनी मातली,म्हणोनि अर्जुन मोहे गुंतली,निघो नेणे!

श्रीहरीचे ते पार्थाकडे पाहणे कसे होते म्हणून सांगू ?त्यात कारुण्याची वृष्टी आहे की नव्याने उचंबळलेल्या स्नेहाने परिपूर्ण अशी भगवंताची दृष्टी आहे ? ती दृष्टी म्हणजे जणू अमृताची वोतीव पुतळी होती, जी त्या अद्भुत क्षणात निर्माण झालेला प्रेमरस पिऊन अशी मातली, की अर्जुनाच्या प्रेमाच्या विळख्यातून तिचा पाय निघेना !

पुढे ज्ञानदेव म्हणतात की ही कल्पना किती फुलवावी तितकी फुलेल पण मला त्या प्रेम दृष्टीचे अचूक वर्णन करता येणार नाही .परमात्म्याचे प्रेम इतके अथांग आहे त्याचे वर्णन कसे शक्य आहे? पण ज्याअर्थी त्यांनी अर्जुनाला आधी ‘परिस बापा’ असे संबोधले त्या अर्थी हा प्रेमाचा गुंता आहे असे मला खचित वाटते !

पुढे सहाव्या अध्यायात ब्रह्मविद्या सांगताना तर ज्ञानदेवांच्या योगेश्वराच्या मनात भय दाटून येते. की खरेच मी ही गुह्यविद्या याला देणे योग्य आहे का ? अर्जुनाच्या मनात जर अद्वैताचा भाव जागा झाला आणि हा याचा देहाचा अहंभाव विसरून माझ्यात मिसळून गेला तर मी याच्या प्रेमाच्या सुखाला मुकेन !मी एकटा करू काय ?

विपाये अहंभाव याचा जाईल, मी तेची हा जरी होईल, तरी मग काय कीजेल, एकलेया..

दिठीचि पाहतां निविजे, कां तोंड भरुनी बोलिजे, नातरी दाटून खेंव दीजे,असे कोण आहे!

आपुलिया मना बरवी, असमाई गोठी जीवी, ते कवणेंसी चावळावी, जरी ऐक्य जाहले..

ज्याला पाहताच दृष्टी निवावी आणि ज्याच्यापाशी मन मोकळे करावे किंवा उत्कटपणे ज्याला मिठी मारावी असं अर्जुना वाचून दुसरं आहे कोण ? हा जर माझ्याशी एकरूप झाला तर माझ्या मनाला भावलेली एखादी गोष्ट मी सांगावी कुणाला ?आनंदाने माझे अंतःकरण उचंबळून येईल आणि मनात हर्ष अगदी मावेनासा होईल तेव्हा मी ते कुणापुढे ओतावे ? आणि मग योगेश्वराने एक तलम पडदा तसाच ठेवला जेणे करून दोघांचे द्वैत अबाधित राहील.

या ओव्या वाचताना वाटलं,ज्ञानदेवांनी भोगलेलं एकटेपणच या ओव्यांमधून हळुवार संयतपणे व्यक्त झालंय.कोवळ्या वयात हरपलेले मायबापांचे छत्र,सोसावे लागलेले समाजाचे वार,निवृत्तीनाथांची योग्यता जाणून त्यांची गुरु म्हणून केलेली सेवा,लहानग्या मुक्ता सोपानाची काढावी लागणारी समजूत,समाजापुढे स्वतःला सिध्द करण्यासाठी करावी लागलेली दिव्ये ..या साऱ्या झंझावातात हा बालयोगी निचळ एकटा उभा राहिला.या साऱ्या सोसण्याचा अस्फुटसाही उद्गार साऱ्या साहित्यात कुठेही नाही.पुसटसाही नाही.पण साऱ्या विश्वाचा भार वहाणारा जगजेठी एकटा असतो,अगदी एकटा,हे ज्ञानदेवांइतकं कुणाला समजेल ?

ज्याला आपले बालसुलभ हर्षखेद सांगावेत,कधी शोक झाला,हृदय विव्हल झालं तर खांद्यावर डोकं ठेवावं,आनंदाने विभोर होऊन मिठी मारावी असं बरोबरीचं मैत्र त्यांच्या वाट्याला होतं कुठे ? मग साऱ्या भूतमात्रांनाच मित्र केलं त्यांनी.गुरु-शिष्य,माता-बालक, ईश्वर-भक्त अशी अनेक नाती ज्ञानेश्वरीत उलगडली पण पसायदानात स्थान मिळालं ते मैत्रभावाला.भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे !

गीता समजून घेताना कृष्ण त्यांचा सखा बनला असणार.गीतेचं तत्त्वज्ञान आत्मसात करताना त्यांच्या तरल प्रज्ञेला गीतेतलं कृष्णार्जुनाचं भावविश्व जाणवलं असणार.त्यामुळंच कृष्ण जे थेट बोलला ते आणि न बोलताही त्यानं जे सांगितलं ते,दोन्ही त्यांनी आपल्याला उलगडून दाखवलं..

एकाच तिथीला जन्मलेली ही दोन अप्रांतमती व्यक्तित्वे एकमेकांत अशी मिसळून गेलेली वाटतात.

तूं तो माझें, मी तो तुझे ,ऐक्य जाले तेथें कैचें दुजें !

© सुश्री विनिता तेलंग

सांगली. 

मो ९८९०९२८४११

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ने मजसी ने… ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

ने मजसी ने… ☆ श्री अरविंद लिमये ☆

पुढे धाव घेण्याची, झोकून देण्याची, समर्पणाची, एकरूप होण्याची असोशी आपल्या  अल्पाक्षरी रूपात व्यक्त करणारा लक्षवेधी शब्द म्हणजे ओढ!

ओढ म्हणजे अंतर्मनात अस्वस्थ खळबळ माजवणारी अनिवार भावना!

आकाशात झेप घेणाऱ्या पक्षाच्या मनातली घरट्याकडे परतण्याची असो, आईच्या मनातली बाळाला कवटाळण्याची वा बाळाच्या अबोध मनातली आईच्या कुशीत शिरण्याची असो,एखाद्याच्या मनातील मैत्रीची असो,कलासक्त मनातील नवनिर्मितीची असो वा भक्तियुक्त अंत:करणातील ईश्वरप्राप्तीची असो या सर्व विविधरुपरंगी ओढींचे उत्कटता हे अविभाज्य अंग असते.उत्कट भावनेशिवाय  ओढ निर्माण होऊच शकत नाही आणि मनात कळकळ,तळमळ नसेल तर उत्कटताही निर्माण होत नाही.ही अशी तळमळ निर्माण व्हायला त्या क्षणापुरता कां होईना ‘स्व’चा विसर अपेक्षित असतो आणि अपरिहार्यही.

प्रेम, माया, कल, प्रवृत्ती, पसंती, आवड,ओढा,आकर्षण असे ओढ या शब्दाचे विविध अर्थरंग या शब्दातला भाव व्यक्त करण्यास पुरेसे नाहीत.कारण  सकारात्मक भावनांनी युक्त अशा या अर्थशब्दांना परस्पर छेद देतात ते गरीबी,अभाव दर्शवणारा ओढग्रस्त, जोर लावणे,ताणणे या अर्थाचा ओढणे,दडपण व्यक्त करु पहाणारा ओढाताण मनाची चंचलता,स्वैरता,द्वाडपणाचं प्रतिबिंब सामावून घेणारा ओढाळ असे अनेक शब्द! ही सगळी ओढ या शब्दाचीच विविधरंगी रुपे!

पण तरीही ही होती सर्वसामान्य माणसांच्या भावविश्वातली,मर्यादीत पैस असणारी ओढ! सर्वसाधारण माणसाच्या मनातली उत्कटता ध्वनित करणारी! या प्रकारची ओढ व्यक्तिगत परिघात वावरणाऱ्या सामान्य माणसाच्या सुखदु:खातून निर्माण होत असते. या परिघाला अंगभूत मर्यादा असणे स्वाभाविकच.पण स्वतःच्या सुखाचा,स्वास्थ्याचाच नव्हे तर सर्वस्वाचा होम करुन देशहितासाठी हालअपेष्टा सोसणाऱ्या देशभक्तांच्या मनातली मातृभूमीची ओढ ही सर्वांनाच सतत प्रेरणादायी ठरणारी अशीच असते.

काळ्यापाण्याच्या प्रदीर्घ काळातील जन्मठेपेची शिक्षा भोगताना स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या वीरयोध्यांच्या मनातील मातृभूमीची ओढ त्यांच्याच शब्दांत व्यक्त होते तेव्हा त्या शब्दाशब्दांत भरुन राहिलेले असते ते हेच देशप्रेम!

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मनातली ही ओढ जेव्हा काव्यरूप धारण करते तेव्हा त्या ओढीतली असोशी आणि तळमळ….

‘ ने मजसी ने s परत मातृभूमीला….

सागरा प्राण तळमळला..’

अशा उस्फुर्त,उत्कट शब्दातून नेमकी व्यक्त होते..!

स्वार्थाचा लवलेशही नसलेली उत्कट देशप्रेमातून निर्माण झालेली ही तळमळ कुणीही नकळत नतमस्तक व्हावे अशीच म्हणावी लागेल!!

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print