मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ वारकर्‍याची श्रीमंती… ☆ संग्राहिका – श्रीमती अनिता जयंत खाडीलकर ☆

श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

? वाचताना वेचलेले ?

☆ वारकर्‍याची श्रीमंती… ☆ संग्रहिका – श्रीमती अनिता जयंत खाडीलकर☆ 

वारकर्‍याची काळजी पांडुरंग घेतो असे म्हणतात. खरोखर हे खरे असेल का ? नेमकी  वारकर्‍याची श्रीमंती कोणती ? तर ती असते त्याची पांडुरंगावरची श्रद्धा.

नोकरी निमित्त फिरतीवर असायचो. तेव्हा कंपनीच्या गाडीने महाराष्ट्रात  फिरण्याचा योग यायचा.

असाच एकदा सोलापूर -जत मार्गे  कोल्हापूरकडे येत होतो. आषाढी एकादशी संपून ५-६ दिवस झालेले  होते. वारकरी मंडळी आपापल्या मार्गाने घरी परतत होती. सकाळी  सोलापूरहून लवकर निघालो होतो. सांगोला सोडलं होतं. भूक लागलेली होती. बरोबर दोघे assistant होते. त्यांनी सुचवलं एखाद्या ढाबा वजा टपरीवर नाष्टा चहा चांगला मिळेल. ९.३० चा सुमार. मंडळींनी गाडी एका ढाबा वजा टपरी जवळ थांबवली. उतरलो, पाय मोकळे केले आणि नाष्ट्याला काय विचारपूस केली. कांदे पोहे, उसळ पाव आणि चहा काॅफी अशी ऑर्डर दिली. २०-२५  मिनिटे लागणार होती. ऊन खात उभे होतो.

तेव्हढ्यात एक  60 – 65 वयाचं वारकरी जोडपं चालत चालत  आमच्याच टपरीपर्यंत आलं. अंगावरचा एकही कपडा धड नाही. बाईंच्या डोक्यावर तुळस आणि खाकेत एक बोचकं. बाबांच्या डोकीवर एक बोचकं नी खांद्यावर एक भली मोठी पिशवी. पायताणं यथा तथाच .बरीच दमलेली वाटत होती. टपरीच्याच बाजूला सारं सामान उतरवून ठेवत  जमिनीवरच बसले.

मी आपलं सहज कौतुकाने विचारपूस केली. मंडळी वारी वरूनच परतत होती. मी विचारलं नाष्टा करणार का  ? बाबांनी एकदा बाईकडे पाहिलं आणि होकारार्थी मान हलवली. मी सहज सुचवलं- बाबांनो पोटभर खाऊन घ्या. मला उगीचच वाटलं, चला तेव्हढच पुण्य . मी बाबांना विचारलं,” वाटेत चालता चालता काय करता ?” ते म्हणाले,

“ कधी अभंग तर कधी पाडुरंगाचं नाव घेत जातो. म्हनजे अंतर कसं पार झालं उमगत नाय. “

मी आपली विनंती केली की एखादा अभंग ऐकवाल का  ? बाबांनी क्षणाचा विलंब न लावता अभंगाला सुरुवात केली आणि बाईंनी टाळावर साथ दिली. खरंच वेळ कसा गेला समजलंच नाही.

नाष्ट्यावर ताव मारला. त्या वारकरी जोडप्याला आग्रहानी आमच्या बरोबर बसवलं. सहज चौकशी केली की अजून यांना घरी पोहचायला किती दिवस .लागतील ? तर कळले की अजून ४-५ दिवस. निरोप घेण्याची वेळ आली. आम्ही त्यांचे आणि त्यांनी आमचे  आभार मानायचे सोपस्कार पार पडल्यावर निघालो.

सहज मनात आले की यांना घरी पोचायला अजून ४-५ दिवस आहेत. त्यांना काहीतरी मदत करूया. वारकरी बाबा आणि बाईंना थांबवलं आणि 100 रुपयांची नोट त्यांना मदत म्हणून पुढे केली. बाबांनी अदबीने मदत नाकारली. मला आश्चर्य वाटले. न राहवून मी विचारले, “ का ?”

बाबांनी उत्तर दिलं –

“वारीला निघताना घरून एक छदाम घेतला नाही. आत्ता या क्षणालाबी खिशात छदाम नाही. पूर्ण वारी तो पांडुरंगच आम्हा जिवांची काळजी घेतो की. त्यापुढे दादा तुमची ही १०० रुपयांची नोट आमच्या काय हो कामाची. “

मी अवाक झालो. क्षणभर काय react व्हावं मला सुधरत नव्हतं. केवळ सुन्न. क्षणात मला माझी लायकी समजली, डोळ्यातून खळ्ळं आसू आले आणि मी त्या माउलीच्या पायावर डोकं ठेवलं.

सुमारे 30 वर्षांनंतर………

आज जवळपास 30 वर्षांनी ही घटना आठवली आणिक सारा क्रम आणि संवादातील शब्द नी शब्द परत ताजे तवाने होउन डोळ्यासमोर फिरू लागले.

त्या वारकरी बाबा आणि बाईंच त्यावेळचं वय आज माझं होतं. आज माझ्याकडे सगळं आहे. घर, गाडी, उर्वरित आयुष्य बर्‍यापैकी सुखात पार पडेल एव्हडी व्यवस्था. तरीही मला उद्याची निश्चिंती नक्कीच नाही. पण मग त्या वारकरी बाबांना अंगावर धड कपडे नाहीत, धड अंथरूण पांघरूण बरोबर नाही. वेळ पडली तरी खिशात छदाम नाही. असं असून सुद्धा एक emergency साठी म्हणून मी पुढे केलेले १०० रुपये सुद्धा हा भला माणूस अव्हेरतो, आणि प्रचंड आत्मविश्वासानी सांगतो की माझ्या पुढच्या प्रत्येक क्षणाची काळजी तो पांडुरंगच करेल. त्याला आयुष्यात कसलीही पुंजी  करून ठेवावं असं नाही वाटलं कारणं त्याने जमवली होती पांडुरंगाच्या श्रद्धेची पुंजी. त्यामुळे त्याला ना उद्याची भ्रांत ना आयुष्याची चिंता.

ती त्याची श्रीमंती पाहिली आणि  नजर स्वतः कडे वळली. त्यांनी शाश्वत श्रद्धेची नी भक्तीची पुंजी जमवली आणि मी अशाश्वत पुंजी जमवण्यात धन्यता मानत राहिलो.

— हे परमेश्वरा अजूनही वेळ गेलेली नाही. त्या वारकर्‍याची श्रद्धा आणि भक्ती मला सुद्धा जमवता यावी अशी बुद्धी मला दे, हीच कळकळीची प्रार्थना तुझ्या चरणी.

संग्रहिका –  श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

सह्याद्री अपार्टमेंट, खाडीलकर गल्ली, बालगंधर्व नाट्यमंदिर समोर, ब्राह्मणपुरी, मिरज,जि. सांगली

मो 9689896341

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ महानैवेद्य — पंढरपूरच्या “श्री विठ्ठल रुक्मिणीचा!”… भाग – 2 – श्री मंदार केसरकर ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ महानैवेद्य — पंढरपूरच्या “श्री विठ्ठल रुक्मिणीचा!”… भाग – 2 – श्री मंदार केसरकर ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

(तर कधी आंबटगोड जायफळ-केशर घातलेलं घट्ट “श्रीखंड” … तर कधी उच्च प्रतीच्या आंब्याचा रस असे…!) इथून पुढे —-

थंडीच्या दिवसात बासुंदी…. उन्हाळ्यात श्रीखंड.. आम्ररस… असे. बदलत्या ऋतूप्रमाणे पदार्थ बदलत असत. त्या गंजाशेजारील वाटीत… मैदा दुधात भिजवून केलेल्या नाजूक “वळवटाच्या खिरीची” वाटी.. त्याच्याबरोबरच हाटून एकजीव केलेली “वरणाची” वाटी असायची.! त्याशेजारी ओल्या नारळाचं सारण घातलेल्या “करंज्या”… मुरडीचे पुरणाचे “कानवले”…. अन राहिलेल्या मोकळ्या जागेत… लाल तिखट- मीठ- ओवा घातलेली खुसखुशीत तिखट चव असणारी “भजी”.. अन त्याच पिठात थोडा चिंचगुळाचा कोळ घालून तळलेली हिरव्यागार पानांची “आळूवडी” …! या सर्व पदार्थांवर टप्पोरी तुळशीची पानं ठेऊन “शुद्ध” केलेला … “महानैवेद्य”.. !

या महाप्रसादानंतर हिरव्यागार पाच पानांचा, चुना- कात- सुपारी- बडीशेप- साखर- वेलदोडा- खोबऱ्याचा खिस- ज्येष्ठमध घालून, त्या पानांची विशिष्टप्रकारे घडी घालून लांबसडक लवंगेने बंद केलेला त्रयोदशगुणी “विडा” मुखशुद्धीसाठी असायचा…! असा पंचपक्वान्नाचा.. “साग्रसंगीत”… गोड, तिखट, आंबट, खारट, तुरट, कडू ..या “आयुर्वेद शास्त्रावर” परिपूर्ण अवलंबून असणारा “षडरस”युक्त.. “महानैवेद्य” खाण्याचं परमभाग्य अनेकवेळा वाट्याला आलं…!

हा “महानैवेद्य” खाण्याचा योग पंढरपूरात वास्तव्यास असणाऱ्या अनेकांच्या नशिबी आला… काहींनी याचा आनंद रोज घेतला असेल. हा नैवेद्य खाऊन संपल्यावर ती सर्व प्रासादिक भांडी मीठ- लिंबाने घासून लखलखीत करून त्या रेशमी कापडात गुंडाळून देतानाचा “भाव” एखादी षोडशोपचारे पूजा केल्याच्या तोडीचा होता.

पूर्वी “महानैवेद्य” बडवे- उत्पातांच्या घरी एखादी “माऊली” करायची… आता मंदिराच्या मुदपाकखान्यात हा “नैवेद्य” केला जातो..!

या “महानैवेद्या”च्या प्रसादाबरोबर.. सकाळच्या न्याहरीसाठी ..आंबूस-गोड तसेच लवंग-दालचिनीच्या चवीची हिंग- जिरे- कढीपाल्याची साजूक तुपाची फोडणी घातलेली गरमागरम “कढी” अन… मऊसूत मूगडाळ- तांदळाची…. वरून भरपूर कोथिंबीर- खोबरं… मधोमध साजूक तुपाची वाटी अन वर तुळशीचं पान घातलेल्या “खिचडी”ची चव… अवर्णनीय असायची. त्याचाही कित्येकवेळा लाभ झाला. कधी कधी मधूनच सकाळी ‘रामभाऊ बडवे’ सारख्या एखाद्या “सेवाधारी” मित्राचा फोन यायचा… “मन्द्या… आज “पांडुरंगाचा” दिवस घेतलाय … किटली घेऊन ये… महापूजेचं “पंचामृत” देतो..”… ते अस्सल दूध, दही, तूप, पिठीसाखर, मध, अन वरून तुळशीची पानं घालून केलेलं प्रासादिक ‘पंचामृत’ तांब्याभर प्यायल्यावर २ -४  तास भुकेची जाणीवसुद्धा व्हायची नाही. घरातल्यांनी पोटभर पिऊन राहिलेल्या पंचामृताचे “धपाटे” पुढे दोन दिवस टिकायचे… असा “प्रसाद”.. पोटभर पुरायचा. नुसत्या “महानैवेद्या”च्या ताटावरून कापड बाजूला केलं तरी… पहाटेपासून स्वयंपाकघरात स्वयंपाक केल्यासासारखा “सुवास” घरभर पसरायचा…! “पंचामृताच्या” किटलीचं झाकण उघडलं तरी त्यातील तुळशीच्या घमघमाटानं “गाभाऱ्यात” असल्याचा भास व्हायचा..!

एखाद्यावेळी थंडीच्या दिवसात थंडी बाधू नये म्हणून … “देवाला” दाखवलेला “सुंठ- लवंग- तुळशी”बरोबर अनेक औषधी वनस्पती घालून केलेला आयुर्वेदिक “काढा” घेऊन जायचा आग्रह एखादा मित्र करायचा…! उन्हाळ्याच्या दिवसात आपल्यासारखीच “देवाच्या” अंगाची ‘तलखी’ होऊ नये म्हणून भल्या मोठ्या “सहाणेवर” उगाळलेला “रुक्मिणी- पांडुरंगाच्या” मूर्तीला लेप दिलेला “चंदन उटीचा” चंदनाचा गोळा कागदात गुंडाळून एखादा मित्र द्यायचा. त्या गोळ्यातील एखादा तुकडा काढून पाण्यात कालवून कपाळावर थापल्यावर मिळणारा “थंडावा” बरेच वेळा अनुभवलाय. काही काळ मूर्तीच्या अंगावर थापलेला लेप औषधाइतकाच गुणकारी आहे. बऱ्याच जणांच्या देवघराच्या एखाद्या कोनाड्यात हा पांडुरंग-रुक्मिणीच्या मूर्तीवरील “थंडावा” कागदाच्या पुरचुंडीत गुंडाळून जपून ठेवलेला असेलही…! या सगळ्या गोष्टी आम्ही पंढरपूरकरांनी “महानैवेद्या” इतक्याच “प्रासादिक” मानल्या…!

एवढं वाचल्यावर … एखाद्या निर्जीव दगडाच्या मूर्तीसाठी एवढ्या पक्वान्नांचा सोस कशाला…? असा प्रश्नही एखादा उभा करेल. पण एवढं भरलेलं ताट बघून “किती… अन काय काय खावं..?”… असा प्रश्न न पडता… “काय खावं अन कसं खावं..”… याचं  उत्तर मिळालं.

ते भरलेलं “नैवैद्या”चं ताट बघून “डाव्या” बाजूचे आंबट- तुरट- खारट- तिखट- कडवट पदार्थ कमी प्रमाणात खावे… अन “उजव्या” बाजूकडील गोड पदार्थ “डाव्या”पेक्षा थोड्या जास्त प्रमाणात खावे, हे सूत्र या ताटावरून सांगितल्यासारखं वाटतं…!

समाजामध्ये वावरताना “डावं-उजवं” समजण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो…. हे आपलं माझं अडाणी तत्त्वज्ञान…! सांप्रत परिस्थितीत आपल्याला जे शक्य आहे त्याचा “नैवेद्य” दाखवावा या मताचा मी पण आहे. त्यासाठी अट्टाहास करायची गरज नाही. नुसत्या “शर्कराखंडखाद्यानी…” एवढ्या एखाद्या साखरेच्या दाण्यावर… भक्तवत्सल “विदुराच्या” हुलग्यावर… “चोखोबारायांच्या” शिळी भाकरी अन गाडग्यातल्या दह्याच्या दही- भाकरीच्या “काल्यावर” ही प्रसन्न होणारा आमचा “वासुदेव” आहे..! फक्त “नामदेव- चोखोबां”च्या ठायी असलेली आर्तता आपल्या अंगी आणण्याची गरज आहे. तेवढी आर्तता यायला आपल्यासारख्या मर्त्य जीवांना हजारो जन्म घ्यावे लागतील. तोपर्यंत …. ताटातली पोळी श्वानाच्या वेशात असणाऱ्या “भगवंताने” हिसकावून नेली तरी … नुसत्या कोरड्या पोळीने पोट दुखेल म्हणून.. त्याच्यामागं तुपाचं तामलं (एक भांड्याचा प्रकार) घेऊन पळत सुटणाऱ्या “संतश्रेष्ठ नामदेवरायांच्या” इतकी भाबडी सजगता अंगी आली की… एकमेकांच्या “भुकेशी” तरी आपण एकरूप झाल्याचं समाधान लाभेल…!

बाकी आपण दाखवलेला “नैवेद्य” प्रत्यक्ष “भगवंतानं” जेवण्याइतकी आपली “हाक” मोठी नसली तरी… आर्त भावनेने… कधीतरी सणावारी केलेलं साग्रसंगीत “नैवेद्याचं” ताट उचलून देवाच्या तोंडापुढं धरून खाली ठेवताना … वाऱ्याच्या हलक्याशा झुळकेनं म्हणा…  किंवा धक्क्यानं म्हणा…  देवाच्या डोक्यावर असणारं टप्पकन खाली पडणारं  एखादं फुल असू दे..  किंवा.. एखादी ढासळणारी भाताची मूद…  अथवा त्या मुदेवरून खाली घरंगळणारं  “तुळशीचं पान”… जरी पडलं तरी…  “खाल्ला बाबा देवानं नैवेद्य…!” —  अशी “देऊळ सताड उघडं” असतानाही…  अन “देऊळ बंद” असतानाही आपली भाबडी समजूत करून घेणारा … आधुनिक काळातील पाडगावकरांच्या भाषेत… “भावभोळ्या भक्तीची ही एकतारी…. भावनांचा तू भुकेला रे मुरारी…”.. म्हणणारा… भगवंतापुढं त्याच्या इतकीच गेली “अठ्ठावीस युगं” त्याच्या पायाशी बसणारा….. साधा-भोळा…”पंढरीचा वारकरी” आहे…  असा विचार मनात चमकून जातो … अन अंगावर शहारे येतात…!

— समाप्त —

लेखक – श्री मंदार मार्तंड केसकर

पंढरपूर, मो. 9422380146

संग्राहिका : सुश्री प्रभा हर्षे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ महानैवेद्य — पंढरपूरच्या “श्री विठ्ठल रुक्मिणीचा!”… भाग – 1 – श्री मंदार केसरकर ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ महानैवेद्य — पंढरपूरच्या “श्री विठ्ठल रुक्मिणीचा!”… भाग – 1 – श्री मंदार केसरकर ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

घरात पहिल्यापासून कोणताही गोडाधोडाचा म्हणा किंवा बिगर कांद्यालसणाचा स्पेशल पदार्थ असो… तो तयार झाला की, एखाद्या वाटीत घालून आज्जी म्हणायची..

“मनू… देवापुढं नैवेद्य ठेव … मग खाऊन चव सांग… कसा झालाय ते..”

तसा प्रत्यक्ष माझ्या तोंडात पहिला पदार्थ गेला असला, तरी…. देवापुढं पहिल्यांदा ठेवल्यामुळं घरातला मी second taster…पहिल्यांदा ‘देवच’…! त्यामुळे…

“पाहे प्रसादाची वाट…द्यावे धावोनिया ताट…

शेष घेउनि जाईन…तुमचें जालिया भोजन…”

—अशी जगद्गुरु तुकोबारायांच्या या अभंगाप्रमाणे माझी लहानपणापासून अवस्था…!

“आज्जी… तुझं काहीतरीच असतं बघ.. देव कुठं खात असतो का..?” …. असले ‘डावे’ प्रश्न सुरुवातीला विचारले… पण… माझ्या प्रश्नाला संतश्रेष्ठ नामदेवांच्या लहानपणीची कथा सांगत…… .. 

“ प्रत्यक्ष भगवंताला जेवण्याचा हट्ट करून शेवटी कंटाळून “नामदेवराय” भोवळ येऊन पडायला लागल्यावर…   मग… पांडुरंग जेवला बघ..” असे म्हणून …… 

” ऐसी ग्लानी करिता विठ्ठल पावला…. नैवेद्य जेविला… नामयाचा …।” — या अभंगानंतर, ” उजव्या ” हाताने ठेव बरं…वाटी..” अशा संभाषणाने ” नामदेवरायांच्या ” कथेचा शेवट झाल्यावर मगच ” प्रसाद ” तोंडात पडायचा…!

रोजच्या देवपूजेनंतर दूधसाखरेबरोबर… कधी एखादा रवा-बेसन-लाडू, करंजी … उपवास असेल तर राजगिरा-शेंगदाण्याचा लाडू… खजूर… गूळ-खोबरं.. सकाळच्या कोवळ्या उन्हात बसून केलेलं ताजं लोणी-साखर.. एखादं केळ.. असं काहीही असायचं.

सणावाराला मात्र पक्वांनांनी भरलेलं ताट ‘नैवेद्याला’ असायचं..! पण प्रत्यक्ष देवळात… ” काय नैवेद्य असेल…?” अशी उत्सुकता बोलून दाखवल्यावर… ” आपण “महानैवेद्य” आणू बरं का.. ” असं म्हणून वडील तसा निरोप द्यायचे. 

त्यावेळच्या विठ्ठल-रुक्मिणीच्या मंदिरातील अनेक “बडवे-उत्पात” मंडळी चांगल्या घरोब्याची… काही जवळच्या नात्यातली असल्यानं ” महानैवेद्य ” घरी आणण्यासाठी जास्त खटाटोप करावा लागला नाही. दोनचार दिवस आधी निरोप दिला तरी ” महानैवेद्य ” घरपोच यायचा.

ज्या दिवशी ” महानैवेद्य ” घरी यायचा, त्यादिवशी स्वयंपाकघरात चहापाण्याशिवाय जास्त काही करायची गरज नसायची… एखादा भाताचा डबा लावला तरी पुष्कळ व्हायचं….! दुपारी “नैवैद्या”चं जेवणार असल्यानं… आई-आजी सकाळी… “दूध, फळं, चिवडा”… अशा कोरड्या पदार्थाशिवाय काही खाऊ द्यायची नाही. “प्रसादिक” अन्न पोटात जायच्या आधी पोटात दुसरं शिळं-पाकं अन्न असू नये हा एक प्रांजळ हेतू… “त्याला काय होतंय…?..” अशी उद्धट बोलण्याची कधी हिंमत झाली नाही.

दुपारी साधारण साडेबारा नंतर…. परातीयेवढ्या मोठ्ठया आकाराच्या लखलखीत चांदीच्या ताटावर लाल रेशमी कापड झाकून… त्यावर चांदीचं पळी-पंचपात्र अन मुखशुद्धीसाठी पानाचा विडा घेऊन… कडक सोवळ्यात “बडवे-उत्पातांच्या” परिवारातील एखादा काका-मामा ‘ते’ वजनदार ताट दोन्ही हातांनी एका खांद्यावर घेऊन..”महानैवेद्य” आणायचा. प्रथम तो “नैवेद्य” घरातील देवासमोरील पाटावर ठेवून घरच्या देवाला .. “नैवेद्यम्‌ समर्पयामि…” म्हणून पळीने पाणी फिरवून दाखवला जायचा. ‘नैवेद्य’ घेऊन येणाऱ्या व्यक्तीस त्याच्या वयाकडे न बघता त्याच्या हाती दक्षिणा देऊन घरच्या सगळ्यांनी नमस्कार करण्याचा “आज्जीचा” शिरस्ता असायचा.

त्या अवाढव्य ताटावरील कापड बाजूला सारून ते भरगच्च ताट बघण्याची उत्सुकता मोठेपणीपर्यंत तशीच कायम राहिली… कारण ते नैवेद्याचं ताट… असायचंच तेवढं… “देखणं”… आणि पाच-सात व्यक्तींना भरपेट पुरेल एवढं “पूर्णब्रह्म”…! ताटाच्या मधोमध मोठ्या चांदीच्या वाडग्यात खचाखच शिग लावून भरलेला उत्तम प्रतीच्या वासाच्या तांदळाचा भात… त्यावर नुसता पांढरा भात नसावा म्हणून शास्त्रासाठी पिवळं धम्मक डावभर वरण…त्या भाताच्या शिगेवर अस्सल लोणकढी तुपाची वाटी खोचलेली…. त्याच्या शेजारी थोड्या छोट्या वाडग्यात तसाच शिग लावलेला केशरी रंगाचा अस्सल तुपातला “साखरभात”… त्यावर मस्तपैकी काजू, बदाम, बेदाणे, लवंग, वेलदोडे अन चार दोन केशराच्या काड्यानी सजावट केलेली…! त्या भाताच्या भांड्याच्या खालच्या बाजूला घसघशीत आकाराच्या पातळ पदर सुटलेल्या… वेलदोडा.. जायफळाच्या सुवासाने मोहित करणाऱ्या पिवळसर रंगाच्या तुपाने माखलेल्या “पुरणपोळ्या”…. तशाच पातळ साध्या “पोळ्या”… त्यावर पुरणाचा गोळा.. त्या गोळ्यावर वरच्यावर पापुद्रा काढता येणाऱ्या… चवीला नकळत मिठाळ लागणाऱ्या, वरून थोडं तूप टाकलेल्या पातळ “पुऱ्या”….! त्याच्या डाव्या बाजूला एका हाताच्या ओंजळीत बसतील एवढ्या आकाराचे तुपात खरपूस भाजलेले… टाळ्याला न चिकटणारे तुपाळलेले दोन “बेसन लाडू”…!

त्या लाडवाशेजारील एका वाटीत दह्यात मीठ- साखर- लालतिखट- दाण्याचं कूट घालून कालवलेली… वरून जिरे-मोहरीची फोडणी दिलेली.. आंबट-गोड-तिखट मिश्र चवींची “शेंगादाण्याची चटणी”… तर दुसऱ्या वाटीत बारीक खिसलेल्या काकडीची… मीठ- साखर- दही घालून कालवलेली आंबट-तुरट चवीची “कोशिंबीर”…! त्याच्या शेजारील अजून एका वाटीत त्या ऋतूत उपलब्ध असेल त्या पद्धतीने कधी पीठ पेरलेली “मेथीची”… अथवा मीठ- मिरची- साखर घालून.. वरून लिंबू पिळुन… बारीक किसलेलं खोबरं-कोथिंबिरीनं सजवलेली “बटाट्याची” सुकी भाजी असे….. त्याच वाटीत वर दोन लिंबाच्या फोडी असत….! ताटाची डावी बाजू झाल्यावर उजव्या बाजूच्या एका तांब्यात हरभऱ्याची डाळ, मेथ्या, शेंगादाणे, खोबऱ्याचे बारीक काप, मिरच्यांचे तुकडे घालून… चिंचगुळाचा कोळ घालून केलेली “आळू-चुक्याची” पातळ भाजी असे…

कधी शेंगदाण्याचं कूट… चिंचगुळ.. हिरव्या मिरच्या.. हिंग- मोहरी- जिरे- कढीपाल्याची फोडणी घातलेलं… चटकदार “मिरच्यांच पंचामृत”…! तर दुसऱ्या तांब्यात… खास पुरण करताना बाजूला काढून ठेवलेल्या कटाची अन थोड्या पुरणाचा गोळा एकत्र केलेल्याची… कढीपाल्याच्या फोडणीची… वरून कोथिंबीर.. खोबऱ्याचा खिस तेलावर तरंगताना दिसणारी चिंचगुळाचा कोळ घातलेली थोडी झणझणीत- आंबट- गोड चवीची “कटाची आमटी”… असायची. ज्या “कटाच्या” आमटीच्या एका ‘भुरक्यात’… तोंडं- घसा- नाक- कान- डोकं … हे सगळे अवयव refresh करायची ताकद आहे, ज्या आमटीच्या “भुरक्यात” … बेसनाचा लाडू अन साखरभाताने तुपाळलेला घसा… पूर्ववत करण्याची किमया आहे… ती कटाची आमटी..! त्या आमटीच्या बाजूलाच कधी एका गंजात (गंज – एक भांड्याचा प्रकार) दुधापासून आटवलेली.. जायफळाची चव खाताना जाणवणारी घट्ट “बासुंदी” असे… तर कधी आंबटगोड जायफळ-केशर घातलेलं घट्ट “श्रीखंड” … तर कधी उच्च प्रतीच्या आंब्याचा रस असे…!

– क्रमशः…

लेखक – श्री मंदार मार्तंड केसकर

पंढरपूर, मो. 9422380146

संग्राहिका : सुश्री प्रभा हर्षे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ सदगुरु ही एकच व्यक्ती नसते, नसावी— बा. भ. बोरकर ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

?  वाचताना वेचलेले ? 

☆ सदगुरु ही एकच व्यक्ती नसते, नसावी— बा. भ. बोरकर ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे☆

सद्गुरू ही एकच  व्यक्ती नसते ; नसावी ! गुरु केवळ मानवस्वरुपातच असतो असेही नाही ! सारी सद्गुणी माणसे आपल्यासाठी गुरुवत् असतात . कधी एखादे पुस्तक , एखादे मूल्य , एखादे तत्व , एखादा अनुभव आपल्याला बरेच काही शिकवीत असतो . एखाद्याला गुरुपण दिले तरी ते डोळस असावे ! असा प्रवास करत जाता आपण पोहोचतो विवेकापर्यंत ! म्हणूनच बोरकर आठवतात ! 

देखणे ते चेहरे 

जे प्रांजळाचे आरसे

गोरटे वा सावळे 

या मोल नाही फारसे !

तेच डोळे देखणे 

जे कोंडिती सार्‍या नभा

वोळती दुःखे जगाच्या 

सांडिती चंद्रप्रभा !

देखणे ते ओठ जे 

की ओविती मुक्ताफळे

आणि ज्यांच्या लाघवाने 

सत्य होते कोवळे !

देखणे ते हात 

ज्यांना निर्मितीचे डोहळे

मंगलाने गंधलेले 

सुंदराचे सोहळे !

देखणी ती पाऊले 

जी ध्यासपंथे चालती

वाळवंटातून सुध्दा 

स्वस्तिपद्मे रेखिती !

देखणे ते स्कंध ज्या ये 

सूळ नेता स्वेच्छया

लाभला आदेश प्राणी 

निश्चये पाळावया !

देखणी ती जीवने 

जी तृप्तीची तीर्थोदके

चांदणे ज्यातून फाके 

शुभ्र पार्‍यासारखे !

देखणा देहान्त तो 

जो सागरी सूर्यास्तसा

अग्निचा पेरून जातो 

रात्रगर्भी वारसा !!!

~ बा. भ. बोरकर

संग्राहिका : मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गीतांजली भावार्थ … भाग 20 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

? वाचताना वेचलेले ?

☆ गीतांजली भावार्थ …भाग 20 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

२७.

प्रकाश? अरे, कुठं आहे प्रकाश?

सतत चेतलेल्या इच्छेच्या अग्नीने तो फुल्ल!

 

दीप आहे, पण थरथरणारी ज्योत नाही,

हे ह्रदयस्था! हे माझे दैव आहे!

तुझा दुरावा मरणप्राय वाटतो!

 

दु:ख तुझ्या दाराशी क्वचित येतं

 

त्याचा संदेश आहे, तुझा स्वामी जागा आहे.

रात्रीच्या अंधारातून

तो तुला प्रेमसंकेत देतो आहे.

 

आभाळ भरून आलंय,

पाऊस संततधार कोसळतोय.

 

माझ्या अंत: करणात कसली कालवाकालव होते

त्याचा अर्थ उमगत नाही.

 

क्षणात चमकून जाणारी वीज

माझ्या नजरेला अंधारी आणते.

रात्र- संगीताकडे नेणारा मार्ग

माझं काळीज शोधू लागतं.

 

कुठाय प्रकाश?

ज्वलंत इच्छेच्या ज्योतीनं तो चेतव.

विजांचा लखलखाट होतोय.

आकाशाच्या पोकळीतून सुसाट वारा वाहतोय.

काळ्या दगडासारखी रात्र काळीकुट्ट आहे,

अंधारातच सारी रात्र जायला नको.

 

प्रेमाचा दीप आयुष्य उजळू दे.

 

मराठी अनुवाद – गीतांजली (भावार्थ) – माधव नारायण कुलकर्णी

मूळ रचना– महाकवी मा. रवींद्रनाथ टागोर

 

प्रस्तुती– प्रेमा माधव कुलकर्णी

कोल्हापूर

7387678883

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ सारं काही स्वतःसाठी ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

?  वाचताना वेचलेले ? 

☆ सारं काही स्वतःसाठी ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे☆

देवधर्म पूजाअर्चा

सारं असतं स्वतःसाठी

देवाला यातलं काहीही 

नको असतं स्वतःसाठी

 

फुलं अर्पण करतो देवाला

ती काय त्याच्याकडे नाहीत म्हणून?

सारी पृथ्वीच ज्याचा बगीचा

त्याला काय करायचंय फुलं घेऊन?

 

नैवेद्य जो आपण दाखवतो

तो काय देव खातो?

तो तर स्वतःच प्राणीमात्रांचं

भरणपोषण करीत असतो

 

निरांजनाच्या इवल्या ज्योतीने

ओवाळतो आपण प्रभूला

चंद्रसूर्य जातीने

हजर ज्याच्या दिमतीला

 

स्तोत्रं त्याची गातो ती काय

हपापलाय म्हणून स्तुतीला ?

निर्गुण निराकार जो

त्याला अवडंबर हवंय कशाला?

 

देऊन देऊन आपण किती ‘दान’ पेटीत टाकणार ?

या भूतलावरीलच नव्हे ,

तर समग्र सृष्टीचा सकळ संपदेचा मालकच तो ….

 

सारं काही जे करायचं

ते स्वतःसाठीच असतं करायचं —-

प्रार्थनेनं देव बदलत नसतो

स्वतःच स्वतःला असतं सुधारायचं…

जास्त काही नाही ,

फक्त ‘ माणूस ‘ म्हणून जगायचं ..…

 

हीच खरी भक्ती आणि खरी पूजा

पटतंय का बघा ,

—— नाही तर चालू द्या …

 

कवी : अज्ञात 

संग्राहिका : मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आजी आणि नातवंडे… श्री संदीप खोरे ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆  आजी आणि नातवंडे… श्री संदीप खोरे ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

आजी आणि तिची नातवंडं यांच्या नात्यावरची एक खूप सुंदर कविता आहे, संदीप खरे यांची…

आजी म्हणते काढल्या खस्ता

जन्मभर मी केले कष्ट

तू म्हणजे त्या सगळ्याची

शेवट गोड असलेली गोष्ट

 

सगळं कथा पुराण झालं

देव काही दिसला नाही

कुशीत येतोस तेंव्हा कळतं

कृष्ण काही वेगळा नाही . . .

 

– संदीप खरे

 

ह्या  कवितेला  नातवाने दिलेले  उत्तर :

 

प्रश्न खूप पडतात ग, आजी,

देशील का मज उत्तरं त्यांची?

ठाऊक आहेत देवकी-यशोदा,

पण . . . .

आजी होती का कृष्णाची?

 

खाण्यासाठी चोरून माखन

उगाच करी सवंगड्यांसी गोळा?

खडीसाखरेवरती आजी

देई न त्या लोण्याचा गोळा?

 

बांधुन ठेवी माय यशोदा

उखळासी करकच्चुन त्याला,

धावूनी का ग गेली नाही

आजी त्याला सोडविण्याला?

 

कधी ऐकले, त्यास आजीने

दिला भरवुनी मऊ दूधभात?

निळ्या मुखावर का ना फिरला

सुरकुतलेला थरथरणारा हात?

 

असेल मोठ्ठा देव, तरी पण

आजी त्याला नव्हती नक्की,

म्हणूनी सांगतो मी सर्वांना ..

कृष्णापेक्षा मीच लकी.

 

– सर्व आज्यांना समर्पित 🙏🌹

  – श्री संदीप खोरे

प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गीतांजली भावार्थ … भाग 19 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

? वाचताना वेचलेले ?

☆ गीतांजली भावार्थ …भाग 19 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

२६.

       तो आला, माझ्या शेजारी बसला,

       पण मला जाग आली नाही.

 

       मी अभागी मला कसली

       शापमय निद्रा लागली.

 

      शांत रात्री तो आला.

     त्याच्या हाती वीणा होती.

     त्या वीणेच्या संगीताने,

     माझी स्वप्नं नादमय झाली.

 

    अरेरे! माझ्या रात्री अशा वाया का गेल्या?

 

      त्याचे श्वास माझ्या निद्रेला स्पर्श करतात,

     पण मला त्याचे दर्शन होत नाही.

मराठी अनुवाद – गीतांजली (भावार्थ) – माधव नारायण कुलकर्णी

मूळ रचना– महाकवी मा. रवींद्रनाथ टागोर

प्रस्तुती– प्रेमा माधव कुलकर्णी

कोल्हापूर

7387678883

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ फुले ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ☆

सुश्री स्नेहलता दिगंबर गाडगीळ

?  वाचताना वेचलेले  ? 

☆ फुले ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

किती छान लिहिले आहे फुलांविषयी—

फुले माळावी मोगर्‍याची

फुले वेचावी परिजातकाची

फुले जपावी फुले जपावी बकुळीची

फुले दरवळावी चाफ्याची

फुले खुलावी गुलाबाची

फुले वहावी अनंताची

फुले बहरावी बहाव्याची

फुले घमघमावी रातराणीची

फुले फुलावी कमळाची

फुले रंगावी जास्वंदाची

फुले झुलावी मधुमालतीची

फुले भरावी केळ्याची

फुले मोहरावी आंब्याची

फुले ओघळावी बुट्ट्याची

फुले दिखावी बोगनवेलीची

फुले स्मरावी बाभळीची

फुले लाघवी अबोलीची

फुले निगर्वी गोकर्णीची

फुले उधळावी झेंडूची

फुले तोलावी केशराची

फुले उमलावी ब्रम्हकमळाची

फुले निरखावी कृष्णकमळाची !

संग्राहिका : स्नेहलता गाडगीळ

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ काय बदलले आहे ? ☆ संग्राहक – श्री माधव केळकर ☆

?  वाचताना वेचलेले  ? 

☆ काय बदलले आहे ? ☆ संग्राहक – श्री माधव केळकर ☆

काय बदलले आहे ? असे विचारल्यावर नेहमी ऐकिवात येते की, “ जग बदलत आहे “. पण जरा विचार करा, नेमके काय बदलले आहे जगात…!!!

आजपर्यंत मिरचीने तिखटपणा नाही सोडला.., तर आंब्याने गोडपणा नाही सोडला…!!!

वृक्षांच्या पानांनी हिरवेपणा नाही सोडला…., तर वृक्षांनी सावली देणे नाही सोडले…!!!

सूर्याने तळपणे नाही सोडले.., तर चंद्राने शीतलता नाही सोडली…!!!

फुलाने सुगंध नाही सोडला..,  तर वा-याने वाहणे नाही सोडले…!!!

नदीने आपला मार्ग नाही बदलला.., तर सागराने आपली मर्यादा नाही सोडली…!!!

पक्षांनी विहार करणे नाही सोडले.., निसर्गाने कोमलता नाही सोडली.., ईश्वराने दयाळूपणा नाही सोडला…!!!

मग नेमके बदलले आहे ते काय ?—–

 बदलला आहे तो फक्त माणूस.., माणसाने माणूसकी सोडली…!!!

सृष्टी त्रेतायुगात अशीच होती. सत्ययुगात पण अशीच होती. द्वापार युगातही अशीच होती. आणि आता कलियुगातही तशीच आहे…!!!

बदलला आहे फक्त केवळ माणूस आणि त्याचे विचार. पण तो मात्र साऱ्या जगाला दोष देत असतो…!!!

 माहीत नाही उद्या आम्ही असू की नसू म्हणून आज जे आपल्याकडे आहे ते भरभरून जगा…!!!

आयुष्यात पैसा तर नक्कीच कमवा पण तो एवढाही साठवून ठेऊ नका की, आयुष्याची खरी मजा आपण कधीच घेऊ शकत नाही…!!!

 तसेच जग बदललेय म्हणून जगरहाटीला दोष देऊ नका, समाधानी रहा सर्वांचे आभार माना…!!!

आयुष्य सुंदर आहे. आनंदात जगा, आपला जिव्हाळा कायम राहो…!!!                              

संग्राहक : माधव  केळकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares