मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ अशीच वाचलेली काही माहिती… माहिती संकलक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ अशीच वाचलेली काही माहिती… माहिती संकलक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

1. गरम पाणी गार पाण्यापेक्षा लवकर गोठते.

मोनालिसाच्या चित्राला भुवया नाहीत.

3. “The quick brown fox jumps over the lazy dog” ह्या इंग्रजी वाक्यात इंग्रजीतीलसर्व अक्षरे आलेले आहेत.

4. जीभ हे आपल्या शरीरातील सर्वात जास्त मजबूत स्नायू आहे.

5. मुंग्या अजिबात झोपत नाहीत.

6. “I am.” हे इंग्रजीतील सर्वात संक्षिप्त पूर्ण वाक्य आहे.

7. कोका कोला हे शीत पेय मूलतः हिरव्या रंगाचे होते.

8. जगात सर्वात जास्त ठेवले जाणारे नाव मोहम्मद

9. जेव्हा चन्द्र बरोबर आपल्या डोईवर येतो तेव्हा आपले वजन नेहमी पेक्षा जरासे कमी भरते.

10. वाळवंटातील उडणाऱ्या वाळूच्या कणापासून बचावासाठी उंटाला तीन पापण्या असतात.

11. “abstemious” आणि”facetious” हे फक्त दोनच शब्द आहेत ज्यात इंग्रजीचे स्वर क्रमबध्द आले आहेत.

12. सर्व खण्डांची इंग्रजीतील नावे ज्या अक्षराने सुरू होतात त्याच अक्षराने संपतात.

13. अमेरिकेत दर माणसी दोन क्रेडिट कार्डस् आहेत.

14. TYPEWRITER हा इंग्रजी टंकलेखन यंत्रावरील एकाच ओळीतील कळदाबून टाईप होणारा सर्वात लांब शब्द आहे. 

15. उणे चाळीस डिग्रीला सेल्सिअस व फॅरेनहाइट दोन्ही उणे चाळीसच असतात.

16. चाॅकलेट खाल्ल्याने कुत्र्याचा मृत्यू होऊ शकतो. कारण चाॅकलेटमधील थिओब्रोमाईड या रसायनाचा कुत्र्याच्या हृदयावर व नर्वस सिस्टम वर विपरित परिणाम होतो.

17. स्त्रिया तेवढ्याच वेळात पुरुषांपेक्षा दुप्पट वेळा पापण्या ब्लिंक करतात.

18. आपलाच श्वास रोखून आपण आत्मघात करू शकत नाही.

ग्रंथालयातून सर्वात जास्त चोरले गेलेले पुस्तक”गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्ड” — तशी नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्ड मध्ये नमूद आहे.

20.  डुकरांना आकाशाकडे पाहता येत नाही.

21. “sixth sick sheikh’s sixth sheep is sick” हे इंग्रजीतील उच्चारण्यास सर्वात अवघड वाक्य मानले जाते. 

22. “Rhythm” हा इंग्रजीतील स्वर रहीत सर्वात लांब शब्द आहे.

23. आपण खूप जोरात शिंकलो तर बरगडी फ्रॅक्चर होवू शकते व जर शिंक दाबली तर डोक्यातील वा मानेतील रक्तवाहिनी फुटून मृत्यू ओढवू शकतो.

24. पत्त्यातील चारही राजे महान राज्यांचे चित्र आहेत.

     – इस्पिक – राजा डेव्हिड

     – किलवर – अलेक्झांडर

     – बदाम – चार्लमॅगने

     – चौकट – जुलियस सीझर

25. आपल्या जिभेने आपल्याच भुवया चाटणे अशक्य आहे.

26. 11,11,11,111 × 11,11,11,111 = 12,34,56,78,98,76, 54, 321

27. ज्या पुतळ्यातील घोड्याचे दोनही पाय हवेत असतात त्याचा स्वार युध्दात मरण पावलेला असतो, तर एक पाय हवेत असेल तर स्वाराचा युध्द-जखमांमूळे मृत्यू झालेला असतो व जर घोड्याचे चारही  पाय जमीनीवर असतील तर स्वाराचा नैसर्गिक मृत्यू झालेला असतो.

28. गोळीरोधक जॅकेट, अग्निरोधक, कारचे वायपर व लेझर प्रिंटर्स … ही सर्व स्त्रियांनी  शोधलेली साधने आहेत.

29. मध हे एकमेव खाद्यान्न चिरकाल टिकते.

30. मगरीला आपली जीभ बाहेर काढता येत नाही.

31. साप तीन वर्षांपर्यंत झोपू शकतो.

32. सर्व विषुववृत्तीय अस्वलेडावरी असतात.

33. विमानात द्यावयाच्या सॅलड मधून प्रत्येकी केवळ एक ओलिव्ह कमी करुन अमेरिकन विमान कंपनीने 1987 मध्ये 40,000 डाॅलर्स वाचवले होते.

34. फुलपाखरे पायांनी चव अनुभवतात.

35. हत्ती हा एकमेव प्राणी आहे जो उडी मारु शकत नाही.

36. मागल्या 4000 वर्षांमध्ये एकही प्राणी माणसाळला गेलेला नाही.

37. मृत्यूपेक्षा कोळ्याला घाबरणाऱ्यांची संख्या मोठी आहे.

38. Stewardesses हा इंग्रजी टंकयंत्रावर डाव्याहाताने टाईप केलेला सर्वात लांब शब्द आहे.

39. मुंग्या विष प्राशनानंतर नेहमी आपल्या उजवीकडे कलतात व मरतात.

40. वीज-दाहिनीचा शोध एका दंतवैद्याने लावला आहे.

41 रक्ताचा तीस फूट फवारा मारु शकेल इतका फोर्स हृदय निर्माण करते. 

42. उंदरांची संख्या अकल्पित प्रमाणात वाढते; अगदी दोन उंदीर अठरा महिन्यात दहा लाख होवू शकतात. 

43. इअरफोन एक तास वापरल्यास कानात नेहमीपेक्षा 700 पट विषाणू वाढतात.

44. सिगरेट लायटरचा शोध आगपेटीच्या आधी लागलेला होता.

45. बोट-ठशांप्रमाणेच प्रत्येकाचे जीभ-ठसेसुध्दा वेगवेगळे असतात.

 

माहिती संकलक : अज्ञात 

प्रस्तुती: सुश्री मीनल केळकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ साठीच्या पुढचा म्हातारा… – कवी :अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

?  वाचताना वेचलेले  ? 

☆ साठीच्या पुढचा म्हातारा… – कवी :अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

थंड हवेच्या ठिकाणी जसा

नेहमीच गारवा असतो

तसाच — 

साठीच्या पुढचा म्हातारा

थोडा जास्तच हिरवा असतो !

 

उजेडाचा त्रास होतो म्हणून

गॅागल वापरत असतो

काळ्याभोर काचेमागून

निसर्गसौंदर्य न्याहाळीत असतो!

शेजारीण घरी आली की

आनंदाने हसत असतो

बायकोला चहा करायला लावून

स्वत: गप्पा मारीत बसतो

 

कारण — 

साठीच्या पुढचा म्हातारा

थोडा जास्तच हिरवा असतो!

 

पाय सतत दुखतात म्हणत

घरच्या घरी थांबत असतो

बाकी सगळ्या दिवशी मात्र

मित्रांबरोबर भटकत असतो!

चार घास कमीच खातो

असं घरात सांगत राहतो

भजी समोसे मिसळपाव

बाहेर खुशाल चापत असतो

 

कारण — 

साठीच्या पुढचा म्हातारा

थोडा जास्तच हिरवा असतो!

 

औषधाचा डोस गिळताना

घशामध्ये अडकत असतो

पार्टीत चकणा खाता-खाता

चार चार पेग रिचवत असतो

अध्यात्माच्या गप्पा मोठ्या

चारचौघात झोडत असतो

मैत्रिणींच्या घोळक्यात मात्र

रंगेल काव्य ऐकवत असतो

 

कारण— 

साठीच्या पुढचा म्हातारा

थोडा जास्तच हिरवा असतो!

 

साठीच्या पुढचा म्हातारा

आता निवृत्तीत गेलेला असतो

विरंगुळ्याला जुन्या-जुन्या

आठवणीत रमत असतो

काम नसतं हातामध्ये

किंमत नसते घरामध्ये!

म्हटलं तर ज्येष्ठ असतो

तरी बराच तरूण असतो

संपून गेलेलं तारुण्य

पुन्हा आणू पहात असतो

 

कारण —

थंड हवेच्या ठिकाणी जसा

नेहमीच गारवा असतो

तसाच — 

साठीच्या पुढचा म्हातारा

थोडा जास्तच हिरवा असतो

कवी :अज्ञात

संग्राहक  : श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘निरागसता आणि इमानदारी…’ लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ ‘निरागसता आणि इमानदारी…’ लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

निरागस आणि मनातल्या रामासोबत इमान जपणारी सोन्यानं बनलेली माणसं..

साधारण आठ दहा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळी विनावाहक विनाथांबा अशी सांगली कोल्हापूर बससेवा सुरू होती. बरोबर सकाळी आठ वाजताची बस मी पकडली. नवरात्र आणि त्यात शुक्रवार असल्यामुळे बसला बर्‍यापैकी गर्दी होती. माझ्या शेजारी 65 ते 70 वर्षाची वृद्ध महिला बसली होती. तिच्या पेहरावावरून ती सांगलीच्या कुठल्यातरी खेडेगावातनं आली होती हे कळत होतं. गाडी सुरू झाली. खिडकीतून येणारं गार वारं मनाला आनंद देत होतं. साधारणतः हातकणंगले ओलांडल्यानंतर आजी मला म्हणाल्या, “व्हय दादा, मास्तर बरं न्हाय आलं अजून?” मास्तर मंजे कंडक्टर.

मी म्हटलं आजी, ह्या गाडीला मास्तर नसतंय. गाडीवर लिव्हलया की तसं.

आरं देवा… मंग तिकीट??

त्ये खालीच, ST मध्ये बसायच्या आधीच काढायचं असतंय.

मग आता???

“तिकीट तपासायला वाटेत कुणी चढलं, आणि पकडलं तर दंड भरावा लागेल. तरी पण आपण समजावू त्यांना की वाचायला नाही येत, त्यामुळं चढल्या तुम्ही.”

“दुसरी इयत्ता पास हाय म्या. म्होरंबी शिकले असते,पण बानं चुली पुढं बशीवलं.

त्ये मरुदे तिकडं. वाचाय येतंया मला.

सांगली कोल्हापूर पाटी बघूनच तर चढले. गडबडीत बाकी न्हाय वाचलं.”

“अहो आज्जी. आपण फक्त सांगू तसं. असंबी त्ये बेंन कुणाचं काय ऐकत नाहीत, तरिबी उगा वाईच खडा टाकून बघू. त्येबी, तपासणीसाठी आले तर मग बघू…”

दोन मिनिटं म्हातारी काहीच बोलली नाही.

डोक्यावरचा पदर सावरत, हळूच म्हणाली,

“नशिबी गरिबी पूजल्या, त्ये परवडलं, पण अडाणीपणाचा शिक्का लई बेक्कार.”

ह्या सगळ्या झांगड गुत्त्यात गाडी केव्हा कोल्हापूर स्टॅण्ड मध्ये शिरली कळलंच नाही. मी खिडकीतून डोकावून पाहिलं, बाहेर कुणी तपासनीस नव्हता. आजीला म्हटलं, “आज्जी, आता सुमडीत उतरा. अन हिकडं तिकडं न बघता लगेच स्टँडच्या भैर पडा.”

आजी कैच बोलली नै.

बाहेर आल्यावर मी गाड्यावर मस्त चहा मारला. तेवढ्यात पुन्हा आज्जी दिसली. म्हंटलं…

“आज्जी अजून इथंच?”

आज्जीनं चोळीत खुपसलेलि पर्स काढली, त्यातून एक तिकीट बाहेर काढलं आणि माझ्या हातात दिलं.

आज्जीनं उतरल्यावर कोल्हापूर सांगली असं तिकीट विना वाहक विना थांबाच्या काऊंटर वरनं काढलं होतं. मला म्हणाली

“टाक फाडून. म्या भैर आल्यावर फाडणारंच व्हते.

माघारी जाताना मात्र, न इसरता आधी तिकीट काढील.”

म्हटलं, आज्जी…. “पैकं जास्त झालं असतील तर नाष्टा द्या हॉटेलात…”

आज्जी हसली…. म्हणाली “जिच्या दर्शनाला आले, त्या अंबा बाईनं तिची जबाबदारी पार पाडली.

कुठलं गालबोट नं लावता आणलं इथवर. वाटेत उतरवलं असते मला, पकडलं गेले अस्ते तर. पण त्या अंबा बाईनं चार चौघात लाज राखली.

दंड भराय इतकं पैकं न्हाईत पण मग आता म्या किमान हाय तेव्हढं तिकीट काढून, फाडून टाकलं म्हंजे झालं की रं हिशेब बराबर….आता जाताना मात्र इस्रायची न्हाई तिकीट काढायला.

महालक्ष्मीच्या दारात जायचं अन त्येबी कुणाची तरी लक्ष्मी लुबाडून… हे बरं न्हाई …”

मी काहीच नं बोलता हातातलं तिकीट फाडून टाकलं. आज्जी गेली अंबाबाई च्या दर्शनाला. मी मात्र तिथनंच हात जोडले.

ढीग इयत्ता गिरवल्या तरी ही अशी नीतिमत्ता येतेच असं नाही, हेच खरं.

असली गोडं माणसं म्हणजे आपल्या समाजातली श्रीमंती आहे, एखादेवेळी आर्थिकदृष्ट्या दुबळं असतीलही, तो भाग अलाहिदा पण निरागस आणि मनातल्या रामासोबत इमान जपणारी ही लोकं, मातीशी घट्ट जोडलेली आपल्या महाराष्ट्राची मुळ ओळख म्हणजे हीचं सोन्यानं बनलेली माणसं.

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : श्री अनंत केळकर.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ जेथे गुणांची पारख नाही तेथे गुणी जनांनी जाऊ नये… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ जेथे गुणांची पारख नाही तेथे गुणी जनांनी जाऊ नये… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – डॉ. ज्योती गोडबोले  

एक छान संस्कृत सुभाषित आहे आणि त्याला साजेशी जी एं ची एक भन्नाट कथा…

रे राजहंस, किमिति त्वमिहागतोऽसि?

योऽसौ बकः स इह हंस इति प्रतीतः।

तद्गम्यतामनुपदेन पुनः स्वभूमौ

यावद्वदन्ति न बकं खलु मूढलोकाः॥

हा हंसान्योक्ति अलङ्कार

हे राजहंसा, तू इथे आलास कशाला? इथे तर हा जो बगळा आहे त्यालाच हंस समजतात. तेव्हा जोवर हे मूर्ख लोक तुला बगळा म्हणत नाहीत तोवरच तू तुझ्या मायभूमीला जा कसा!

(जेथे गुणांची पारख नाही तेथे गुणी जनांनी जाऊ नये. )

जी. एन च्या ‘ काजळमाया ‘ मधील एक कथा….

एकदा असंख्य कावळे मानस सरोवराजवळ जमले. त्या ठिकाणी शुभ्र पंखांचा, लाल चोचीचा एक हंस आपल्या हंसीबरोबर जलक्रीडा करत होता. कावळ्यांनी एकदम कलकलाट केला नि त्यांनी हंसास मानससरोवर सोडून जाण्यास सांगितले, कारण त्यांच्या आगमनाच्या क्षणापासून मानससरोवरावर त्यांची सत्ता चालू झाली होती.

“अनादिकालापासून मानससरोवर हंसांसाठीच आहे.” हंस म्हणाला.  ‘शिवाय तुम्हाला पोहता येत नाही, तर मानससरोवर हवे कशाला?”

“आम्हाला पोहता येत नसेल, पण त्याचा आणि स्वामित्वाचा काय संबंध आहे? आपल्या सत्तेची नृत्यशाला अथवा गायनशाला असेल तर आपल्याला नृत्य-गायन आलंच पाहिजे असं कोठे आहे?” कावळ्यांच्या नेत्याने राजकारणी हसून विचारले. हा नेता मोठा व्युत्पन्न होता व त्याने कृष्णद्वीपात जाऊन न्याय नि राजनीतीचा प्रगाढ अभ्यास केला होता.

“आणि आत्ताच्या आत्ता तू मानससरोवर सोडून गेला नाहीस, तर आम्ही सगळे तुझ्यावर तुटून पडू व तुझा आणि तुझ्या निवासस्थानाचा पूर्ण नाश करू!” एका तरुण कावळ्याने गर्जून सांगितले. परंतु त्याच्या या कर्कश शब्दांनी नेत्यास क्रोध आला व त्याचे संस्कारित मन फार व्यथित झाले. त्याने आपल्या उतावीळ अनुयायांस गप्प बसवले. अशा तर्‍हेच्या आततायी उपायांची योजना आता रानवट झाली होती आणि तिला कृष्णद्वीपात स्थान नव्हते. त्याने पुन्हा सौजन्यपूर्वक हसून म्हटले “आपलं म्हणणं मला मान्य आहे. मानससरोवर हे हंसांसाठीच आहे. ही आपली प्राचीन परंपरा मला अढळ राखायची आहे. उलट त्या पवित्र परंपरेच्या सामर्थ्यशाली आश्रयाने मला मातृदेशाची कीर्ती वृद्धिंगत करायची आहे. पण त्यासाठी ‘हंस कोण’ हे आधी ठरलं पाहिजे. आपण हंस आहात कशावरून?”

हंसाला या प्रश्नाचाच मोठा विस्मय वाटला. त्याने आपल्या शुभ्र पंखांकडे पाहिले. त्याला जलातील प्रतिबिंबात आपली डौलदार मान, तिच्या अग्रभागी असलेली कमलदलासारखी लाल चोच दिसली. पण आपणच हंस आहो हे सांगण्यास त्याल प्रमाण सुचेना. कावळ्यांचा नेता नम्रपणे हसला. तो म्हणाला “तेव्हा आपण त्या प्रश्नाचा प्रथम निर्णय लावू. येथे उपस्थित सर्वांना आपण एकेक पान आणावयास सांगू. जर आपण हंस असाल तर त्यांनी ‘लाल’ पान आणावं. जर त्यांना मी हंस आहे असा विश्वास असेल तर त्यांनी हिरवे पान आणावं.” “पण या ठिकाणी कावळेच संख्येने जास्त आहेत.” हंसी म्हणाली. “देवी, आपले शब्द सत्य आहेत. पण तो आमचा का अपराध आहे?” नेता विनयाने म्हणाला.

थोड्याच वेळात तिथे हिरव्या पानांचा ढीग जमला. हंसीने जाऊन कमळाची एक अस्फुट कळी आणून ठेवली.

कावळ्यांचा नेता म्हणाला “पाहिलंत. न्यायनीतीनुसार निर्णय होऊन मी हंस ठरलो आहे. हे इतर सारे माझेच आप्तगण असल्याने अर्थात ते देखील हंसच आहेत. आणि आता आपणच मान्य केलंत की मानससरोवर हंसांसाठीच आहे. तेव्हा आता तुम्ही येथून जावं हेच न्यायाचं होईल.”

हंस खिन्न होऊन सरोवराबाहेर आला. हंसीने त्याचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. “प्रिया तू खिन्न का?” ती म्हणाली. “पानांच्या राशीने का हंसत्व ठरत असतं? चल, आपण येथून जाऊ. तू ज्या जलाशयात उतरशील ते मानससरोवर होईल. जेथे तू दिसशील ते तीर्थक्षेत्र ठरेल.”

हंस हंसीबरोबर जाण्यासाठी उठून सिद्ध झाला. तोच वेगाने उडत चाललेल्या सुवर्णगरुडाशी त्याची भेट झाली. त्याने विचारले की “हंस म्हटला की त्याचे मुख मानससरोवराकडे असायचे. पण तू असा विन्मुख होऊन कुठं चाललास?” मग हंसाने सारी हकीकत सांगताच गरुडाच्या अंगावरील पिसे उसळली व डोळ्यात अंगार दिसला.

“मित्रा, मी गरुड आहे की नाही हे पानं गोळा करून ते क्षुद्र ठरवणार? माझ्या चोचीचा एक फटकारा बसला की त्या गोष्टीचा तात्काळ निर्णय होत असतो. त्या क्षुद्रांची तू गय करणार? जा आणि आपल्या देवदत्त मानससरोवराकडे पाठ वळवू नकोस. उद्या हेच कावळे पानांचे भारे जमा करत माझ्या नंदादेवी कांचनगौरीवर अधिकार सांगू लागतील.”

हंसीने त्याला आवरण्याचा प्रयत्न केला पण हंस आता प्रज्वलित झाला होता. त्याला शब्दांची धुंदी चढली होती. हंसी हताश चित्ताने त्याच्याबरोबर मानससरोवरापाशी आली. त्यांना पाहून कावळ्यांचा समुदाय त्यांच्यावर धावून आला. कावळ्यांचा नेता म्हणाला “मी अत्यंत शांतताप्रिय आहे.” त्याचा स्वर खेदापेक्षा दु:खाने कंपित झाला होता. “पण आमच्या न्याय्य हक्कासाठी आम्ही प्राणार्पण करू. हंस कोण याचा न्याय आणि नि:पक्षपाती निर्णय लागलेला आहे.” आता त्याचा स्वत दु:खापेक्षाही अनुकंपेने आर्द्र झाला होता. त्याची अनुज्ञा होताच ते असंख्य कावळे हंस-हंसीवर तुटून पडले व त्यांचे शुभ्र पंख आणि लाल चोची यांचा विध्वंस झाला.

पण झाडाच्या ढोलीतून एक खार ती हत्या पहात होती. ती चीत्कारत म्हणाली “गरुडाची गोष्ट निराळी. त्यानं एकदा नखं फिरवली की दहा कावळ्यांच्या चिंध्या होतात. पण तुम्ही झुंजणार कशानं? पांढर्‍या पंखांनी, डौलदार मानेने की  माणकांसारख्या चोचीने? प्रतिपक्षप्रतिपक्षाला चांगलीच समजेल अशी भाषा वापरण्याचं सामर्थ्य नसेल तर शहाण्यानं त्या ठिकाणी सत्य खपवायला जाऊच नये.

खारीचा चीत्कार काही कावळ्यांनी ऐकला आणि त्यांनी तिला देखील टोचून मारून टाकले. म्हणजे ते सत्य माहित नसलेला हंस आणि ते सत्य माहित असलेली खार या दोघांचाही सर्वनाश झाला.

तात्पर्य काय, स्वसंरक्षणाच्या संदर्भात सत्याचे ज्ञान-अज्ञान या गोष्टी पूर्णपणे असंगत आहेत. कारण अनुयायांच्या रक्षणाबाबत सत्य पूर्णपणे उदासीन असते. दुसरे एक शेष तात्पर्य असे की, तो स्वर मग कितीही तात्त्विक असेना, भोवती कावळे असताना खारीने चीत्कारू नये.

कथासंग्रह:  काजळमाया –  जी. ए. कुलकर्णी.

संग्रहिका : डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ एका वडाची गोष्ट… – लेखक : श्री श्रीनिवास चितळे ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे ☆

डाॅ.भारती माटे

? वाचताना वेचलेले ?

 ☆ एका वडाची गोष्ट… – लेखक : श्री श्रीनिवास चितळे ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे 

१९६७  साली चिपळूणला मोठा भूकंप झाला आणि चिपळूणच्या इतिहासाचा शे, दीडशे वर्षाचा साक्षीदार उन्मळून पडला, वडाच्या नाक्यावरचा वड भुईसपाट झाला, काही दिवसांनी एका समारंभात देवळात आधी भंगलेली मूर्ती विसर्जित करून नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना करतात तशी नवीन वडाची फांदी त्या जागी स्थापित केली गेली, आमच्या दादानी घरातील भालावर खडूने लिहिले वड. दिनांक ४/२/१९६७. पूर्वी घरात मुल जन्माला आल कि अशी नोंद, घरातील भालावर खडूने करून ठेवायची जुन्या लोकांना सवय होती, माझ्या जन्माची नोंदही अद्याप तिथे होती. ” २८ मे १९५६, सकाळी ११. २० वाजता सिंधू प्रसूत झाली, मुलगा झाला “.

 चार, पाच  वर्षांनी गावातील स्त्रिया माझ्या चुलत्यांकडे आल्या व म्हणाल्या बन्या काका, वड मोठा झाला आहे, यावर्षी याची पूजा केलीतर चालेल का ? खूप लांब पागेवर पुजेला जायला लागत. दादा म्हणाले ठीक आहे, करतो सोय.

दादा तसेच उठले व वाण्याळीत खेडेकरांकडे गेले व म्हणाले महादेवशेठ, नाक्यावरच्या वडाची मे मध्ये मुंज करायला हवी, वडपौर्णिमेच्या पुजेला मुंज झालेला वड हवा.

महादेवाशेठ म्हणजे राजा माणूस, “बन्या, दणक्यात करू मुंज, सगळी तयारी कर, खर्च वाटेल तेवढा होऊदे “.

मुहूर्त काढला गेला, रीतसर मुंजीच्या पत्रिका छापल्या गेल्या, साग्रसंगीत बहिरीबुवा ते विन्ध्यवासिनी अशी देवाची आमंत्रण झाली. गावाला  सनई चौघाडयासह मिरवणूकीने आमंत्रणाची अक्षत फिरवली गेली, आणि सगळ गाव, तेव्हा लहान होत, घरातील मुलाची मुंज असावी अशा तयारीला लागला.

प्रत्यक्ष मुंजीच्या दिवशी तर धमाल, वडा भोवती मांडव घातलेला होता, प्रवेश दारावर केळीच तोरण, मुलीनी रांगोळ्या काढलेल्या, गावातील नवविवाहित जोडप्याकडे यजमानपद दिलेलं होत. दोन दिवस आधी ग्रहमक झाला होता, घरचे केळवण झाले त्याला शे शंभर माणसांची पंगत उठली होती. देवक ठेऊन झाल, अष्टवरघ्य, मातृ भोजन झाले आणि बरोबर १०. २३ मिनिटांनी कुर्यात बटोर मंगलम झाल, सनई, चौघडे, ताशे यांनी सर्व आसमंत दणाणून गेला. संध्याकाळी पालखीतून वडाच्या प्रतिकृतीची भिक्षाळा निघाली होती.

वड द्विज झाला. यज्ञोपवीत घातलेला, दृष्ट लागू नये म्हणून काजळाची तीट लावलेला, हळदी कुंकू लावलेला तो वड हि बटू सारखा देखणा व तेजःपुंज दिसायला लागला.

खेडेकरशेठ ना एक नवीन पैसा हि खर्च करावा लागला नाही, प्रत्येकाने स्वतःच्या घरच कार्य समजून सर्व सेवा फुकट दिली होती.

बासुंदी पुरीचा व १५० माणसांचा जेवणाचा खर्च मुंबई, पुण्यात स्थायिक झालेल्या चिपळूणकरानी उचलला होता.

त्या नंतर आलेल्या वड पौर्णिमेला स्त्रियांचीच नव्हे तर पुरुषांचीही रीघ वडावर लागली होती बटू पादोदक तीर्थ घ्यायला.

त्याकाळी माणसं  खूप साधी होती, हि अंधश्रद्धा नाही का अस विचारणारा एकही सूर तिथे नव्हता, होता तो एक उत्कृष्ठ सार्वजनिक कामाचा जल्लोष आणि आनंद.

श्रीनिवास  चितळे 

(फोटोत तो वड दिसतोय, ज्याची ही गोष्ट आहे.)

 

लेखक : श्री श्रीनिवास चितळे 

संग्रहिका : डॉ. भारती माटे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “हेच तर ते देवदूत…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? वाचताना वेचलेले ?

☆ “हेच तर ते देवदूत…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

भर पावसात भिजत उभ्या असलेल्या तरूणास विचारले , “नुसताच भिजतो कश्याला?”

 तो उत्तरला “नही साब”.. त्याच्या डाव्या बाजूला जमिनीकडे बोट दाखवतं तो म्हणाला,

“इधर निचे बडा पाईपलाईन है. ढक्कन निकल गयेला है”

तो त्या मॅनहोलमध्ये कोणी पडू नये, म्हणून तिथे ऊभा होता!

रस्त्याखालचा पाईप पूर्ण भरला असावा, अन्यथा पाणी चक्राकार आत घुसताना दिसले असते. फुटभर ऊंचीचे पाणी वरून वेगाने जात होते. पायी चालणाऱ्याला वा दुचाकीवरून जाणाऱ्या कोणाला जाणवलेही नसते, की खाली खोल सांडपाण्याचा पाईप आहे!

मी अवाक झालो!

कोण होता हा? कोणासाठी हा असा पाण्यात ऊभा राहिलायं?

मी भरं पावसातं खाली ऊतरलो. त्याला म्हंटले, “बहोत बढिया, भाई!”

तो फक्त कसनूसं हसला आणि म्हणाला,

“बस, कोई गिरना नै मंगता इधर”

“कबसे खडा है?”

“दो बजे से”

घड्याळातं पाच वाजले होते..!

३ तास तसेचं ऊभे राहून याला भूक लागली असणारं. दुर्दैवाने माझ्याकडे काहीच नव्हते. सगळी दुकानेही बंदं. हा भूक लागल्यामुळे जागा सोडेल, असे काहीच चिन्ह नव्हते!

कुठल्या प्रेरणेने तो हे करतं होता? त्या घाण गुडघाभर ऊंचीच्या पाण्यात उभे राहून तो तीन तासांपासून कोणाला वाचवतं होता? आणि का? दोन वाजल्यापासून त्याने कित्येक  जणांना वाचवले असणार. कोणाला त्याची जाणीवही नव्हती. खुद्द याला तरी त्याची कुठे पर्वा होती?

ही अशी छोटी छोटी माणसें हे जग सुंदर करून जातात!

मागच्या डिसेंबरमध्ये दादरला फुटपाथवर एक आंधळा म्हातारा ‘कालनिर्णय’ विकतं बसलेला दिसला.

दुकानातून घेण्याऐवजी, याच्याकडून घेतलेले काय वाईट, असा विचार करून थबकलो.

“केवढ्याला ‘कालनिर्णय’, काका?”

“फक्त बत्तीस रूपये, साहेब” केविलवाणे तो म्हणाला. सकाळपासून एकही विकले  गेलेले दिसतं नव्हते. मी एक घेतले. पन्नासची नोट होती. ती त्याला दिली. हाताने चाचपडत तो ती नोट तपासतचं होता, की अचानक उंची कपडे घातलेला साठीतला एक देखणा गृहस्थ खाली वाकला.

“कितने का है ये?”

“बत्तीस रुपया”

“कितने है?”

“चौदा रहेंगे, साब”

ज्याला मराठी येतं नाही, असा हा माणूस मराठीतले कालनिर्णय कशासाठी विकत घेतोयं?

त्या माणसाने खिशातून साडेचारशे रुपये काढून त्याला दिले आणि ते सगळे कालनिर्णय बखोटीला मारले! 

मी आश्चर्यचकित..! छापील किंमतीत विकतं घेतोय, म्हणजे पुनर्विक्रीसाठी निश्चितच घेतं नाहीये. तसाही, कपड्यांवरूनही हा असले किरकोळ धंदा करणाऱ्यातला वाटतं नव्हता.

तो गृहस्थ थोडा पुढे गेला असेल. मला राहवलेचं नाही. मी थांबवून त्यांना विचारलेच!

हे मुळचें लखनौचे महोदय एअरइंडियातल्या मोठ्या पदावरून नुकतेचं निवृत्त झाले होते. शिवाजीपार्कात स्वत:चे घर होते. एकुलता एक मुलगा अमेरिकेत स्थायिक झाला होता. लठ्ठ पेन्शन येत होती.

“वो बेचारा पंधरा कालनिर्णय बेचके कितना कमाता होगा? सौ, डेढसौ? वैसे भी बेचारे को सौ रुपये के लिए दिनभरं ऐसेही धुप मे बैठना पडता था. मैने ऊसका काम थोडा हलका करं दिया. बस इतनाही!”

मला काही बोलणेचं सुचले नाही! पण एवढ्या चौदा कालनिर्णयांचे तो करणारं काय होता?

“सोसायटी मे बहोत मराठी फ्रेंडस है, उन को बांट दूंगा!”

मी दिग्मूढ!

“तु एक मिनीट लेट आता, तो तुझे भी फोकट मे देता!” मला डोळा मारतं, हसतं तो लखनवी देवदूत रस्ता पार करून गेला सुद्धा!

माणूसकी याहून काय वेगळी असते? 

एखाद्या हॉस्पिटलबाहेर ‘तात्काळ रक्त हवे’ असा फलक वाचून, ऑफिसला वा घरात जायला ऊशीर होईल, याची तमा न बाळगतां रक्त देणारे कोण असतात? ते ही रांग लावून! 

कोण असतात हे? कुठल्या जातीचे? कोणत्या धर्माचे? ‘भैये’ असतात की ‘आपले’ मराठी?

मुंबईत रस्त्यावर चहा विकणारे लाखो ‘चायवाले’ आहेत. 

बहुतांश उत्तरेकडले. सकाळी चहा बनवल्यावर पहिला कपभरं चहा ते रस्त्यावर फेकतात.

दिवसाचा पहिला चहा रस्त्यावर न फेकता भिकाऱ्याला पाजणारा बांद्र्याचा एक ‘चायवाला’ मला माहिती आहे! सकाळी सकाळी भिकारी आलाचं नाही, तर एका भांड्यात तेवढा चहा बाजूला काढून, धंद्याला सुरूवात करतो!

“बर्कत आती है” एवढीचं कारणमिमांसा त्याने दिली होती.

डोळे ऊघडून पाहिले, तर असे असंख्य अज्ञात देवदूत आपल्याला ठायीठायी आढळतात, पण आपली नजरचं मेलेली असते.

परवा थायलंडमध्ये गुहेत अटकलेल्या मुलांना बाहेर काढण्यासाठी हजारो अनामिक हात मदतीस आले. 

गुहेतले पाणी पंपाने बाहेर काढावे लागले. ते पाणी कुठे फेकले?

ज्याच्या शेतातं ते पाणी फेकावे लागले, त्या शेतातलें तीन एकरातले ऊभे पिक या पाण्याने अक्षरशः वाहून गेले. एका छोट्या शेतकऱ्यासाठी हे प्रचंड नुकसान.

एका पत्रकाराने त्या शेतकऱ्याला या नुकसानीविषयी खोदून खोदून विचारले.

“नुकसानीचे काय एवढं? मुले वाचली ना? पेरणी परतं करता येईल. मुलांचे प्राण परतं आणता आले असते का?”

हे ऊत्तर ऐकूनचं डोळ्यात पाणी आल!

हे जग सुंदर आहे. ते सुंदर करणारे अनामिक देवदूत आजही या जगात आहेत आणि राहतीलही.

फक्त तो तिरस्काराचा, आत्मकेंद्री स्वार्थाच्या काळ्या काचांचा गॉगल डोळ्यावरून काढला पाहिजे!

लेखक : अज्ञात

संग्राहक : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ अन्नपूर्णा – लेखिका : सुश्री पूजा साठे पाठक ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ क्षणभर – लेखिका : सौ. कांचन दीक्षित ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर 

हल्लीच्या काळात चोवीस म्हणजे तसं फारच लवकर लग्न झालं होतं तिचं. कोकणातल्या एका गावात , खटल्याच्या घरात राहत असलेली ती. माहेरी नारळी पोफळीच्या बागा, अस्सल हापूस दारात आणि घरामागे समुद्राची गाज. एकत्र कुटुंब असल्याने तिला भरपूर लोकांची सवय होतीच पण घरात लहान असल्याने स्वयंपाक घरात जायची फार वेळ आली नव्हती. 

तिचं लग्न होऊन ती गेली जवळच्याच गावात. अंतराने जवळ असलं तरी शेवटी दुसरं गावच. इथे प्रत्येक गावाची वेगळी पद्धत. नवीन गावाहून आलेल्या मुलीला बघायला पुर्ण गाव येणार आणि बायका अगदी बारीक निरखून बघणार तिला. कोणी कौतुकाने, कोणी असुयेने तर कोणी असच मायेने. 

लग्नानंतर आलेला पहिलाच सण गुढी पाडव्याचा. दोन दिवस आधी बेत ठरला. गोणीतून समान काढून झालं. आंब्यांची रास लागली. दुसऱ्या दिवशी कोणी कधी उठून काय काय करायचं याची उजळणी झाली. ती नवीन नवरी असल्याने तिला अर्थात च लिंबू टिंबू कामे दिली होती, पण ही लगबग तिला नवीन नव्हती. 

जसा पाडवा जवळ आला तशी ती वेगळ्याच चिंतेने ग्रासली. ते एकमेव कारण ज्यामुळे तिला या पंक्ती च जेवण अजिबात आवडत नसे, ते म्हणजे बायकांची पंगत बसेपर्यंत होणारी उपासमार!

लहान होती तेव्हा मुलांच्या पंगतीत तिचं जेवण व्हायचं, पण मोठी झाल्यावर तिलाही थांबावं लागायच च. सकाळपासून तयारीची गडबड, स्वयंपाक घरातल्या धुराने चुरचुरणारे डोळे, वाढताना वाकून वाकून दुखायला लागलेली कंबर याने ती अगदी वैतागून जायची. बायकांची पंगत बसायला जवळ जवळ चार वाजायचे, मग समोर यायच्या गार भजी, उरलेल्या मोडक्या कुरडया, तळाशी गेलेला रस आणि कोमट अन्न. कितीही सुग्रास असलं तरी दमल्याने, भूक मेल्याने आणि गार अन्नाने तिची खायची इच्छा मरून जायची.

तिथे तरी आई मागे भुणभुण करता यायची. इथे? भूक तर सहन होत नाही आपल्याला, मग काय करायचं? असो, होईल ते होईल म्हणत ती झोपी गेली. 

सकाळी पाच वाजता बायका उठल्या. अंगणात सडा पडला, दोन धाकट्या नणंदा रांगोळी काढायला बसल्या. सगळ्यांना चहा फिरला आणि बायका जोमाने स्वयंपाक घरात कामाला लागल्या.चटणी , कोशिंबीर, पापड, गव्हल्यांची खीर, कुरडया, भजी , कोथिंबीर वडी,बटाटा भाजी,मटकी उसळ, पोळ्या, पुऱ्या, वरण भात , रस, रसातल्या शेवया आणि नावाला घावन घाटलं. पटापटा हात चालत होते. फोडण्या बसत होत्या. विळीचा चरचर आवाज येत होता. खमंग वास दरवळत होते. 

हिने दोन चार सोप्या गोष्टी करून मदत केली.अध्येच पोहे फिरले. वाटी वाटी पोहे असे काय पुरणार? पण पोटाला आधार म्हणून खाल्ले.

बारा वाजत आले. नैवेद्याचे ताट तयार झाले. देवाचा , वास्तूचा, गायीचा, पितरांचा नैवेद्य वाढला गेला.

आता पंगती बसणार! ती तयारीतच होती. माजघर पुन्हा एकदा केरसुणीने स्वच्छ झाले. ताटे मांडली, रांगोळ्या घातल्या गेल्या. पोरी सोरींनी लोटी भांडी ठेवली. 

मुलांची पंगत बसली. अर्धेमुर्धे खाऊन मुले उठली. तिने खरकटे काढले आणि माजघर पुसून घेतले. पुन्हा ताट मांडली, रांगोळ्या काढल्या.

आणि आतून सर्व पुरुष मंडळी आत आली. “चला सर्व अन्नपूर्णा !” आजे सासर्ऱ्यांचा दमदार आवाज आला तशा सगळ्या जणी बाहेर आल्या. “बसा पानावर” ते म्हणाले.

ही गांगरलीच ! हे काय वेगळंच? आता पुरुष मंडळींची पंगत असते ना?

पण सगळ्या बायका जाऊन पानावर बसल्या. हिलाही सासूबाईंनी हाताने खूण केली. ही पण अवघडून एका पानावर जाऊन बसली.

आजे सासर्ऱ्यांनी तिथूनच सर्वांना नमस्कार केला आणि पान सुपारी ठेवली.

“आज काय आणि रोज काय, पण या अन्नपूर्णा आपल्यासाठी जेवण रांधतात आणि आपल्याला गरम जेवू घालतात. म्हणून आजचा मान त्यांचा. त्यांनी केलेले गरम अन्न आधी त्यांना मिळावे म्हणून हा खटाटोप. अर्थात तो गरम घास आधी आपल्याला मिळावा हीच त्यांची धडपड असते पण आज आपण त्यांना आग्रह करायचा. सूनबाई, तुला माहित नसेल म्हणून सांगतो” ते तिच्याकडे बघत म्हणाले “तुझी आजे सासू एकदा अशीच उपाशी पोटी चक्कर येऊन पडली सणाच्या दिवशी. तेव्हा कुलदेवी स्वप्नात येऊन म्हणाली की जी अन्नपूर्णा राबते ती उपाशी राहून कशी चालेल? तेव्हापासून प्रत्येक पंगत ही पहिली मुलांची आणि दुसरी बायकांची असते आपल्याकडे!”

ती स्तिमित राहून ऐकत होती. 

इतक्यात खड्या थरथरत्या आवाजात “वदनी कवळ घेता” सुरू झाले. “रघुवीर समर्थ” चा घोष झाला आणि जेवणं सुरू झाली. मागून मुलं, पुरुष एक एक वाढायला आली. आग्रह कर करून भजी, रस वाढला जात होता. ती अजूनही धक्क्यातच होती ! गरम गरम पोटभर जेवण झालं आणि आपसूकच तिच्या तोंडून उद्गार निघाले

“अन्नदाता सुखी भव !”

लेखिका : सुश्री पूजा खाडे पाठक

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ वटपॊर्णिमा तुझी… कवयित्री : सुश्री संजीवनी बोकील ☆ प्रस्तुती – डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ वटपॊर्णिमा तुझी… कवयित्री : सुश्री संजीवनी बोकील ☆ प्रस्तुती – डॉ. ज्योती गोडबोले 

मैत्रिणींसारखी सज धज 

नव्या पैठणीची घडी मोड

नाजूक कलाकुसरीचे दागिने घाल अंगभर 

पण आरशात बघशील

स्वतःकडे

ते तुझ्या नजरेनं,

तुझ्यासाठी,

माझ्या नाही…..

दुसऱ्यासाठी सजवणं 

हा अपमानच तुझ्या 

आभूषणांसाठी !!

*

असणं सिद्ध केल्यावर

दिसणं सिद्ध करायचा

हा आटापिटा कशासाठी ?

गळ्याला काचणा-या,

बोटांना रुतणाऱ्या,

कानांना टोचणाऱ्या

या दागिन्यांपेक्षा

तुला- मला सुखवणारे किती दागिने

आहेत ना आपल्यापाशी?

*

चढावर बळ देणारा तुझा धीर, 

उतारावर थोपवणारा माझा संयम, 

होडी बुडत असताना

आलटून पालटून मारलेल्या

वल्हयातील इच्छाशक्ती….

माझ्या आधी तुला वाचवण्याची

माझी असोशी…. 

तुझ्यापेक्षा माझ्या उपाशी पोटानं

तुझी कासाविशी….

जिव्हाळ्याच्या एकाच विहिरीत सापडणारे

किती किती अस्सल मोती…!

*

वडाच्या फेऱ्यांपेक्षा 

घाल मला बाहूंची मिठी

आणि माझा विळखा

तुझ्या कमरेभोवती….

*

सवाष्ण म्हणजे सवे असणं

मध होऊन दुधात राहणं

सात जन्म पाहिलेत कोणी 

साथ निभावण्याची शपथ घेऊ…

माझ्यासाठी तू धागा

तुझ्यात मला गुरफटून घेऊ…

*

तू आधाराचा पार 

बांध माझ्या भोवती,

पारंबी होऊन मी 

झेपावेन तुझ्यासाठी…

*

अंगण असेल तुझ्या

आरस पानी हृदयाचे, 

पौर्णिमा होऊन

बरसेन मी तिथेच… 

अवतीभवती !

 

कवयित्री : संजीवनी बोकील

संग्रहिका : डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ बघता बघता… – कवि : अज्ञात ☆ प्रस्तुती सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) ☆

सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ बघता बघता… – कवि : अज्ञात ☆ प्रस्तुती सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) 

बघता बघता आई,

मी तुझ्यासारखी व्हायला लागले.

संध्याकाळ झाली की

हात जोडायला लागले.

 

आठवणीने तुळशीला दिवा लावते.

झोपाळ्यावर बसून

रामरक्षा ही म्हणायला लागले.

आणि झोपाळ्यावर डोलताना

कुठल्याही आठवणीनी डोळ्यात

पाणी साठवायला लागले.

 

चहाच्या कपाचा डाग पुसायला

पटकन फडकं शोधायला लागले.

धुतले नाही तरी त्यात

पाणी भरून ठेवायला शिकले.

 

कॉटनचे कपडे आणि मऊ स्पर्श

दोन्ही आठवणीने वापरायला लागले.

कपड्याचा दिसण्यापेक्षा

स्पर्शाचा आनंद 

शरीराला कळायला लागला.

 

रात्रीच्या जेवणानंतर 

थोडंसं गोड खावसं वाटायला लागलं.

स्वतःच्या पांढऱ्या होत जाणाऱ्या केसांकडे  पाहताना

तुझे काळे पांढरे लांब केस आठवायला लागले.

तुझ्या हातावरच्या सुरकुत्या

आता माझ्या हातावर उमटणार

याची वाट पाहायला लागले.

 

“म्हातारी झाले मी”

असं तू म्हणलीस कि मी,

अट्टाहासाने नाही म्हणायची.

आता मी म्हातारी झाले.

बघता बघता तुझ्यासारखी झाले.

 

काही दिवसांनी

दिसेनही तुझ्यासारखी.

आईची सावली अस कुणी म्हटलं

तर हरखून जायला लागले.

आई 

…. मी तुझ्यासारखी व्हायला लागले

 

कवयित्री : अज्ञात 

प्रस्तुती :  शुभदा भा.कुलकर्णी (विभावरी)

कोथरूड-पुणे

मो.९५९५५५७९०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ सासू सासरे नकोत – मग अनाथ मुलाशी लग्न करा… लेखिका : श्रीमती प्राजक्ता गांधी ☆ प्रस्तुती : सुश्री उषा नाईक ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ सासू सासरे नकोत – मग अनाथ मुलाशी लग्न करा… लेखिका : श्रीमती प्राजक्ता गांधी ☆ प्रस्तुती : सुश्री उषा नाईक 

मुलींनो,

तुम्ही तुमच्या आईबापाच्या काळजाचा तुकडा असता, तसा तुमचा नवराही खूप लाडा-कोडात वाढलेला असतो. त्यालाही कळा देऊनच आईने जन्माला घातलेला असतो. तुम्हांला वाटतं, तसं गटाराच्या बाजूने उचलून आणलेला नसतो.

लग्नापर्यंत तोही शिक्षण, करिअर, मित्रपरिवार यात छान बिझी असतो. तेव्हा संसार करायचा त्याचा अनुभव तुमच्या सोबतच सुरू होतो.

आईबापाच्या संसारात तुमचा जितका नॉमिनल रोल असतो, तितकाच त्याचाही असतो. त्याला सगळंच समजायला हवं, ही अपेक्षा आणि त्याला काहीच समजत नाही, हा तर्क दोन्ही अतिरेकी आहेत.

तुमची पाळी आल्यावर लगाबगीने तो तुमच्या उशा-पायथ्याशी बसेल, डोकं हातपाय चेपून देईल, अशी अपेक्षा करु नका. लाखो मुलांना असा काही त्रास असतो, हे माहीत नसतं. कारण त्यांच्या आईला (कदाचित्) तेवढा त्रास झालेला नसतो. तेव्हा गेट व्होकल. तोंड उचकटून सांगायचं, अमुक कर किंवा तमुक कर. सांगायचंही नाही आणि केलं नाही म्हणून तोंड पाडून बसायचं हे जमणार नाही.

नवऱ्याची आर्थिक लायकी काढताना, आपल्या बापाने आपल्याला काय लाईफस्टाईल दिलीय ते बघावं. आपण आपल्या हिकमतीवर काय करू शकतो ते आजमावावं आणि मग विषय काढावा.

तुम्ही जसं उंची, अनुरूपता, पगार, स्थावर जंगम इस्टेट, घरातलं स्थान बघून लग्न करता, तसं तो रुप, रंग, फिगर वगैरे बघून करतो. व्यवहार आहे तो. इमोशनल व्हायची गरज नाही. तुम्ही ठोकून वाजवून लग्न करणार आणि त्याने बघताक्षणी ‘हो’ म्हणावं, असं होत नसतं.

तुम्हाला तुमची आई प्रिय आहे, तशी त्यालाही त्याची आई प्रिय आहे. तुमच्या आईला जसा लेकीच्या संसारात इंटरेस्ट असतो, तसा त्याच्या आईलाही असतो. मुलगा म्हणजे काही देवीला सोडलेलं कोकरू नव्हे, विसरुन जायला. तो मजेत आहे न, त्याला काही त्रास नाही न, हे वेळोवेळी त्याचे आईबाप चेक करणारच.

सासूसासरे नक्कोच असतील, तर अनाथ मुलाशी लग्न करावं !

तुम्ही तासनतास आईशी बोलणार आणि तो दहा मिनिटं बोलला की तुमचा जळफळाट होणार, हे चालणार नाही. तुम्ही यायच्या खूप आधीपासून आई आहे त्याच्या आयुष्यात. तेव्हा शांत रहा. या मुद्द्यावरुन फालतू ब्लॕकमेंलिंग करु नका.

आईबरोबरच मित्र, मैत्रिणीही त्याच्या जगण्याचा अविभाज्य भाग असणार. त्या बाबतीत अडवणूक नको.

दळण, लाँड्री, स्वयंपाक, आला- गेला, स्वच्छता, आर्थिक बाबी, प्रवासाचं नियोजन इत्यादी बाबींत परफेक्ट नॉलेज असणाराच नवरा हवा असेल तर विधुराशी किंवा घटस्फोटीत मुलाशी लग्न करावं. त्यांना नक्कीच जास्त अनुभव असतो.

आणि परत एकदा, आपलं काय म्हणणं असेल, ते समोरून सांगावं. मुलांना आईने ‘मनातलं ओळखून दाखव बरं‘ सारखे फालतू गेम्स शिकवलेले नसतात. आणि हो, तुमच्या आईला त्याच्याकडून मान हवा असेल तर तुम्हीही त्याच्या आईशी नीट वागा.

खरे तर जनमानसात हा बदल होणे गरजेचे आहे.तेव्हाच मुलामुलींचे संसार खुशहाल  होतील व ते आनंदात राहतील.

लेखिका :श्रीमती प्राजक्ता गांधी

प्रस्तुती : श्रीमती उषा नाईक

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares