सौ. गौरी गाडेकर
वाचताना वेचलेले
☆ ‘देवाचे लक्ष आहे बरं का !’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆
एके दिवशी सकाळी दारावरची बेल वाजली. मी दरवाजा उघडला तेव्हा पाहिले, एक आकर्षक बांद्याची व्यक्ती सस्मित समोर उभी होती. मी म्हटले, “बोला! काय काम आहे?”
ते म्हणाला, “भाऊ, तुम्ही रोज माझ्यासमोर प्रार्थना करत होता, म्हणून म्हटले आज भेटूनच घेऊ.” मी म्हटले, “माफ करा, मी तुम्हाला ओळखले नाही.”
तेव्हा ते म्हणाले, “बंधू! मी भगवान आहे. तू रोज प्रार्थना करत होतास, म्हणून मी आज पूर्ण दिवस तुझ्याबरोबर राहणार आहे.”
मी चिडत म्हटलं, “ही काय मस्करी आहे?”
“अहो, ही मस्करी नाही सत्य आहे. फक्त तूच मला पाहू शकतोस. तुझ्याशिवाय मला कुणीही पाहू किंवा ऐकू शकणार नाही!”
काही बोलणार इतक्यात मागून आई आली…
“एकटा काय उभा आहेस? इथं काय करतोस? चल आत, चहा तयार आहे, आत येऊन चहा पी. “ आईला काही तो दिसला नाही.
आईच्या या बोलण्यामुळे आता या आगंतुकच्या बोलण्यावर थोडा विश्वास होऊ लागला. माझ्या मनात थोडी भीती होती. चहाचा पहिला घोट घेतल्याबरोबर मी रागाने ओरडलो, “अग आई, चहामध्ये इतकी साखर रोज रोज का घालतेस?”
एवढे बोलल्यानंतर मनात विचार आला, जर आगंतुक खरोखर भगवान असेल तर त्याला आईवर रागावलेलं आवडणार नाही. मी मनाला शांत केले आणि समजावले, “अरे बाबा, आज तू नजरेत आहेस. थोडे लक्ष दे.”
“बस् मी जिथं असेन, प्रत्येक ठिकाणी ते माझ्यासोबत आले. थोड्या वेळाने मी आंघोळीसाठी निघालो, तर ते सुद्धा माझ्यापुढे… मी म्हटले, ” प्रभू, इथे तरी एकट्याला जाऊ दे.”
आंघोळ करून, तयार होऊन मी देव पूजेला बसलो. पहिल्यांदा मी परमेश्वराची मनापासून प्रार्थना केली. कारण आज मला, माझा प्रामाणिकपणा सिद्ध करायचा होता.
ऑफसला जाण्यास निघालो. प्रवासात एक फोन आला. फोन उचलणार इतक्यात आठवले, आज माझ्यावर प्रभूची नजर आहे. गाडी बाजूला थांबवली. फोनवर बोललो, आणि बोलत असताना म्हणणार होतो की या कामाचे पैसे लागतील. पण का कोण जाणे, तसे न बोलता म्हटले तू ये! तुझे काम होईल आज.
ऑफिसमध्ये पोचल्यावर मी माझे काम करत राहिलो. स्टाफवर रागावलो नाही किंवा कुठल्याही कर्मचऱ्याबरोबर वादविवाद केला नाही. रोज माझ्याकडून विनाकारण अपशब्द बोलले जायचे. पण त्यादिवशी तसे काही न बोलता, “काही हरकत नाही, ठीक आहे, होऊन जाईल काम” असे म्हणत सहजपणे सर्व कामे केली.
आयुष्यातील हा पहिला दिवस होता, ज्या दिवशी माझ्या दिनचर्येत राग, लोभ,अभिमान, दृष्टता, अपशब्द, अप्रामाणिकपणा, खोटेपणा कुठेही नव्हता. संध्याकाळी ऑफिसमधून निघून घरी जायला निघालो. कारमध्ये बसलो आणि बाजूला बसलेल्या प्रभूंना म्हणालो, “भगवान, सीटबेल्ट बांधा. तुम्ही पण नियमांचे पालन करा.” प्रभू हसले. माझ्या आणि त्यांच्या चेऱ्यावर समाधान होते.
घरी पोहोचलो. रात्रीच्या भोजनाची तयारी झाली. मी जेवायला बसलो आणि, “प्रभू! प्रथम तुम्ही घास घ्या.” मी असे बोलून गेलो. त्यांनीही हसून घास घेतला.
जेवण झाल्यानंतर आई म्हणाली, “आज पहिल्यांदा तू जेवणाला नावे न ठेवता, काही दोष न काढता जेवलास! काय झाले? आज सूर्य पश्चिमेला उगवला की काय?”
मी म्हटले, “आई, आज माझ्या मनात सूर्योदय झाला आहे. रोज मी फक्त अन्नच खात होतो. आज प्रसाद घेतला. माता आणि प्रसादात कधी काही उणीव नसते!”
थोडा वेळ शतपावली केल्यानंतर मी माझ्या खोलीत गेलो आणि निश्चिंत व शांत मनाने उशीवर डोके टेकवले. झोपी जाण्यासाठी.
प्रभूनी माझ्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. म्हणाले, “आज तुला झोप येण्यासाठी, संगीत, औषध किंवा पुस्तकाची गरज भासणार नाही.” खरोखर, मला गाढ झोप लागली.
ज्या दिवशी आपणास कळेल की, “तो पहात आहे”, त्या दिवशीपासून आपल्या हातून सर्व काही चांगले घडेल.
लेखक : अज्ञात
संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈