मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ कुटुंबातील सुसंवाद… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ कुटुंबातील सुसंवाद… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

“माझं अडलंय खेटरं!…मीच का म्हणून सारखं सारखं करायचं ? दादाला का सांगत नाही !”इति घरातलं कन्यारत्न.

“कारट्या दिवस आसरात्र गावभर उंडगत असतोस! घरात इकडची काडी तिकडे करत नाहीस!अभ्यासाच्या नावांने कायमची बोंबाबोंब..”इति घरातले बाबा. 

“मी म्हणून या घरात टिकले ! आणखी कुणी असती तरी केव्हाच हे घर सोडून गेली असती!तेव्हा कुठे कळली असती बायकोची किंमत!…”इति घरातली आई.

“अगं सुनबाई!आज घरात चहा अजून झाला नाही काय? माझ्या बीपीच्या गोळ्या राहिल्यात अजून घ्यायच्या! चहा मागितल्याशिवाय आपणहून कधीच नाही द्यायची बापडी! आम्हा म्हातार्‍यानचं नशीबचं फुटकं हो..म्हणून असली सून मिळाली..”इती घरातले आजोबा आजी( विशेषकरून तोंडाळ आजी)

“सरोजा वहिनी!आमची किल्ली तुमच्याकडे ठेवून देते बरं.त्या कामवालील्या दुपारी एव्हढी द्याल तेव्हढी. आणि केर भांडी स्वछ करून जा म्हणावं..”इति सखी शेजारीण.

“ वसंता ! नुसता पेपर डोळ्यासमोर धरून लोळत काय पडलास  ? आज अजून आंघोळ वगेरे आटपून कचेरीला कधी निघणार?”इती नातसुनबाई आपल्या पतीदेवांना…

आणी आणि आणि …या सारखे विविध विषयावरचे अगणित संवाद घरा घरात आणि दारा दारात घडत असतात. नवीन त्यात काय! घरोघरी त्याच मातीच्या चुली हो की नाही?बरे हे संवाद आजकालचे वाटत असले तरी फार पूर्वापार चालत आलेले आहेत.. हो आमच्या वेळी असं नव्हतं हे पालुपद मात्र त्यावेळी नसावं एव्हढाच काय तो फरक… पण पण संवाद घडत होते, होत होते,चालत होते. त्याशिवाय का घरं चालणार होत! कुटुंबाची जडणघडण होत वंश परंपरा पुढे पुढे गेली असणार ? जिथं कुटुंब तिथे संवाद आणि जिथे संवाद तिथे किमान दोन व्यक्ति तरी असायलाच हव्या.अपवाद मात्र आपुलाची वादु,संवादु आपुल्याशी करणारा तुर्‍याव्यवस्थेतला विरळाच कोणी…पण तिथे देखील तो संवाद आत्माचा परत्म्याशी चालेला असतोच…असो आपला तो विषय नाही.

वसुधैव कुटुंबकम अशी श्री ज्ञानदेवांनी या अखंड विश्वगोलालाच संबोधले आणि जो जे वांच्छील तो ते लाहो असे पसायदानात मागणे केले तेव्हा देखील संवाद अपेक्षित होताच..आत्म्याचे परत्म्याशी संवादरूपी बोलणं मग ते प्रत्यक्ष असो वा मौनातलं..अगणित कुटुंबानी मिळून होणारा समाज,अनेक समाज मिळून होणारे राज्य,राष्ट्र..आणि अशी अनेक राष्ट्रमिळून बनलेलं ते वसुधैव कुटुंबकमात जेव्हा सौहार्दपूर्ण सुसंवाद घडतो तेव्हा स्वर्गीय आनंद या भूमंडलावर अवतरलेला असतो.प्रेम,माया,आपुलकी,वात्सल्य,ममता,मैत्री,नातं गोतं…सारं सारं काही तिथे उपजत असत…अर्थात संवादाशिवाय या गोष्टीना जाणवता आले असते काय ?

एकाच घराच्या छताखाली अनेक नात्यागोत्याची माणसं एकत्र राहत होती,राहत असतात आणि पुढेही राहत असणार..अविभक्त कुटुंब पद्धती अस  याला म्हणतात.. यात पणजोबा,आजोबा,आजी (हयात असे धरून बरं)आई बाबा,काका काकू,मुले सुना,नातवंड,पतवंड,चुलत,मावस,लांबच्या नात्यातले जवळीकतेने राहणारे,अशी रक्ताची आपली म्हणवणारी घरची दारची असा नात्यांचा सोहळा असणारं घर…पाळण्यातल्या नवजात शिशु पासून ते नाबाद शतकीचे ज्येष्ठ वयोवृद्धा पर्यन्तची वेगवेगळ्या वयाच्या लहानथोरांनी गजबजलेले घर…अनेक शारीरिक वैशिष्ट्याने परिलुप्त असलेले.विविध स्वभावाच्या कंगोर्‍याने बनलेले,रंग रूपाने वेगळेपण जपणारी,आणि आणि उपजत मनुष्य स्वभावाला साजेशी असणारी…घरातल्या प्रत्येकाशी कस बोलत असतील,वागत असतील,आणि याचा सर्वाचा परिपाक त्या अवाढाव्य घरातून कसा प्रत्ययाला येत असेल..संवाद आहे तिथे वाद असणारच…घर म्हटलं म्हणजे भांड्याला भांडे लागणारच..हे तर ओघानेच येणार आहे. अहो हाताची पाच बोट कुठे एक सारखी असतात…हे  विश्वमान्य सत्य आहे ते नाकारून कसे चालेल नाही का?..त्या त्या घरा घरातले पूर्वापार चालत आलेली संस्कृती,परंपरा,घराणे चालीरिती…सर्व मागुन पुढे नेण्याच काम दर पिढी करत जाते..आदरयुक्त बोलणं ही त्यातली पहिली पायरी.गोड मृदु बोलणं दुसरी पायरी.ह्या दोन गोष्टी कटाक्षाने पाळल्या जातात तिथे वादाला वावं नसतोच मुळी..अरे ला का रे भाषा आली की संवाद संपुष्टात येऊन वादाची ठिणगी पेटू लागते.हसरं खेळत्या घरातली शांती बिघडायला वेळ लागत नाही. मग अवमान, अपमान,अपमर्द,सारखे अविवेकी चरे त्या घराच्या आजवरीच्या अभेध्य भिंतीला हळूहळू चरे पाडून,घराला उधवस्त करू पाहतात..घराची शकलं  शकल होण्यास वेळ लागत नाही. मग वादाचा विषय कुठला असो त्याचा परिणाम असाच होणार असतो.मग पश्चात बुध्दिने काय मिळवले आणि काय गमावल याचा लेखाजोखा करण्यात काही मतलबही नसतो.मतलबींचे मनसुबे साध्य झाल्या सारखे वाटतीलही पण त्यासाठी त्यांनी अनमोल नात्यांची किंमत मोजलेली असते हे उशिराने लक्षात येते.तोवर परतीचे मार्ग बंद करून बसलेले असतात..केवळ सुसंवाद घडला नाही म्हणून..वयाने ज्येष्ठ असणारे अनुभवाने समृद्ध असतात.चार पावसाळे,उन्हाळे त्यांनी पचवलेले,सोसलेले असतात त्यांचा सल्ला योग्यरीत्या विचारात घेऊन पुढील वाटचाल केली तर,पुढच्यास ठेच मागचा शहाणा चा फार तर फायदाच होणार असतो.पण हे केव्हा तर त्यांच्याशी सुसंवाद असेल तर.त्यांच्या या उतार वयात त्यांची ममतेने,आपुलिकेने केलेली विचारपूस,शुश्रूषेला थोडा दिलेला वेळ या सुसंवादातून त्यांनी मनापासून दिलेले आर्शिवाद पुढील वाटचालीत मोलाचे ठरतात. जसे पेरावे तसे उगवते या न्यायाने आपले हे वर्तन आपल्या भविष्यातही सुखाचेच अनुभवाला येते.जी गोष्ट ज्येष्टांबाबत तीच वडीलधारी करत्यांबाबत असणे तितकेच गरजेचे ठरते. त्यांचे कष्ट,श्रम,अनमोल असतात.कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवताना होणारी त्यांची न दिसणारी दमछाक नजरेआड करण्याचा करंटेपणा करू नये.शक्यतो होता होईल तो आपला भार आपणच उचलण्याची मदत केली तर त्यांना किती हुरूप येईल.सुसंवादाची गरज इथे फार असते.अत्यंत संवेदनशील विषय पैसा,मिळकत,खर्च,या केंद्राभोवती घर फिरत असते. घरातल्या प्रत्येकाची आवड निवड,मागणी इथ पुरविली जाते.अर्थात काहींची कारणपरत्वे मागे राहते..मग रूसवे फुगवे यांचे कोंब उगवतात..उणिदुणी काढली जातात..विसंगतीचा पंचनामा चव्हाट्यावर येतो…संवाद संपतो नि वाद सुरू होतो..वाटण्या कोर्टाचे दार ठोठावतात.. प्रेम आपुलकिचा गळा घोटला जातो.. स्वार्थापुढे नाती गोती ,मैत्री गाडली जाते.. विषय संवादाने सामोपचारने मिटवता आला असता पण मनातले कटुतेचे  भिनलेले विष तस करू देत नाही…

जी गोष्ट घरातली पुरुषवर्गाची ती तशीच घरातल्या स्त्री वर्गाची एक पायरीने वरचढ ठरणारी. नव्याने येणार्‍या सूनबाईला सासुरवासेचा छळवाद हाच पहिला विसंवादाचा पाया पक्का करतो.कितीही सुशिक्षित घर असो सासू सुनेतला विस्तव एनकेन प्रकारे पेटता राहतोच.धुसफूस,माजघरातले हुंदके,स्वैपाक घरातली आदळआपट बोलू लागतो तेव्हा सुसंवादाची ऐशी की तैशी होऊन जाते..घरभर फिरणारा गृहलक्ष्मीचा हात,तिचा हसतमुख असणारा वावर घराला घरपण देणारं तिचे कष्ट सुसंवादाने घरात आनंद,सुख,शांती ओतप्रोत भरून बाहात असते. पण जर का विसंवाद झालाच तर अख्या घराची उधवस्त धर्मशाळाच झाली म्हणून समजा.मग नात कुठलही असो,जाऊ,ननंद,आत्या,मावशी,काकी,आजी,सगळे एथून तिथून सारखेच..घरकामापेक्षा वाटणीचीच अपेक्षा जास्त..लेकी बोले सुने लागे असल्यावर संवादाचे धिरडे होईल नाही तर काय ?

घरातले शेतातले गडीमाणसं यांच्याशी घरातल्या सगळ्यांनी साधलेला संवाद तर खूप काही सांगुन जातो.नोकर चाकर म्हणून हीन दिन लेखून जर बोलणं केल तर त्याना तरी मालकाच्या बद्दल आणि त्याच्या घराबद्दल जिव्हाळा कोठून बरे येणार.त्यांची विचारपूस,हवं नको,वेळ प्रसंगी मदतीचा हात पुढे केला तरच जिवाला जीव देणारी आणि माया लावणारी माणस कामाची जोडली जातात..केवळ ओठावर गोड बोलण ठेवल्यान…अर्थात काही वेळा कडक परकड शब्दात बोलणं असण हेही तितकेच महत्वाचे नाही तर आपली मुखदुर्बलतेने आपलाच घात झाल्याशिवाय राहायचा नाही.

कालपरत्वे छोटे कुटुंबाची संख्या वाढीस लागली आहे. यास कारणे जरी अनेक असली तरी कुटुंब आणि संवादाचा ढाचा तसाच राहिला आहे. आजकाल शहरात नोकरी व्यवसायानिमित्ताने घरातील करत्या स्त्री पुरूषांना घडयाळ्याच्या गतीहून जास्त जोरात धावावे लागत असल्याने सूर्य उगल्याबरोबर बाहेर पडून चंद्र उगवल्यावरच घरी येण होत असल्याने घरातील स्ंवादच संकोचला गेला आहे. नेहमीचे ताण तणाव,शारीरिक दगदग,यात उत्साह गळपटून गेला आहे. मानसिक थकवा यातून चार शब्द बोलायला उसंत नसतो. तिथे संवाद कुठे घडावा. लहान मूल असतील तर त्यांची फारच कुचंबणा होते. आई जेउ घालीना बाप भीक मागू देना..मग कुठे तरी वडयाच तेल वांग्यावर निघत. अभ्यास,हट्ट हा सामायिक विषय असतो. तू तू मै मै घरात नवरा बायकोत सुरू होते आणि शेजारी पाजारी गेलाबाजार मित्र,नाते वाईक याना फुकाचा डेलीसोप बघयाला मिळतो.शेवट विसंवादाने घर मोडते…वेळीच प्रेमाने,आपुलिकेने,कळकळीने जर चार गोडीने शब्द पुसले गेले जाते तर ही वेळ टाळता का आली नसती…

देवकृपेने सर्व प्राणीमात्रा मध्ये फक्त माणसालाच देवाने तोंड दिले आहे.. भाषा माणसाने तयार केली.आणि त्या द्वारे तो दुसर्‍याशी बोलू लागला..ऐकण आणि बोलण हा संवादाचा पाया आहे. दुसर्‍याच नीट शांतपणे ऐकुन घेण हेही जास्त महत्वाच आहे. तरच आपल्या बोलण्याला काही अर्थ राहील.या दोन घटकात बोलणं कस असावं तर ऐकत राहावं अस गोड,मृदु नि हस्ता खेळता प्रवाही संवाद असावा.जेव्हढे शस्त्राने घाव घातलेले जातात ते कालांतराने भरून निघतात तरी पण शब्द असे अस्त्र आहे की याच्या घावाची जखम कधीही भरून निघत नाही.माणूस जोडणारा संवाद हवा  माणूस तोडणारा विसंवाद टाळावा. सगळ्या गोष्टीला पैशयाने विकत घेता येत नाही त्यातला सुसंवाद करायला,घडावयाला दाम मोजायची गरज नाही.

अलिकडे  रंगीत भित्तीपत्रके समुपदेशाचे डोस पाजताना मुरकत सांगतात की कुटुंब म्हणजे मायेची पाखर…कुटुंब म्हणजे विश्वासाची झालर..कुटुंब म्हणजे घर असतं… जिवाभावाच मोल असतं…तिथेच नातं समृध्द असतं…तेच खर घर असतं…कुटुंब म्हणजे आशा असते जीवनाची दिशा असते…घर जिथे एकमेंकांच्या भावभावनांचा आदर असतो..ते घर ते कुटुंब मंदिर असतं…आणि आणि या सर्वाला सुसंवादाची मात्र गरज लागते…तर  आणि तरच हे शक्य होतं…

आता वरचं दिलेलं चित्र पाहिलंत ना.. हि दगडाची केवळ एक रचना आहे.. भावनेने एकत्र आलो तर कुटुंब… नाहीतर सगळे दगडचं…

“अहो! किती वेळ अजून तो लेख लिहीत बसणार आहात ? जेवणासाठी आम्ही सगळेच खोळंबुन बसलो आहोत ना ?गारढोण जेवण झालं तर मला बोलायचं नाही ?” स्वयंपाक घरातून सौ. कडाडली आहे.. तेव्हा मंडळी आता इथेच आवरतं घेतो…पण तुम्ही तिकडे लक्षं देऊ नका…आमच्या घरी मात्र हे रोजजचं असतं…

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ माणुसकीचे कफन… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ माणुसकीचे कफन… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

“वाचवा. !.. वाचवा.. !. कोणी हाये का तिथं?… ऐका !… ऐका. !. मी बुडतोय!… अहो कुणीतरी लवकर मला बाहेर काढा हो!… नाका तोंडात पाणी गेलयं… श्वास कोंडलाय!… लवकर धावून या!.. नका उशीर करू… आता फार वेळ दम धरवणार नाही!… कसेही करा पटकन इथे उडी मारून या आणि मला इथून बाहेर काढा… “

जिवाच्या आकांताने तो ओरडून सांगत होता बिचारा… पाण्याच्या खोल डोहात फसला होता.. गरगर फिरत होता… त्याचे स्व:ताचे सुटकेचे प्रयत्न निष्फळ ठरले होते… तो अधिकाधिक डोहात गुरफटत गेला होता… त्याचा आरडाओरडा ऐकून बघ्यांची खूप गर्दी जमा झाली तेथे.. पण त्यांना या लाईव्ह ऑंखे देखा हालचं व्हिडिओ शुटींग करण्याचा मोह आवरला नाही.. ते बुडणाऱ्या माणसाला  म्हणाले,

” अरे थांब!लगेच असा बुडू नकोस.. दोन मिनिटे आधी शुटींग करून घेऊया मग तुला कसा यातून वाचविता येईल याची आम्ही आपआपसात चर्चा करतो… पट्टीचा पोहणारा तरी आमच्यात कुणी दिसत नाही.. एखादा मोठा दोरखंड मिळतोय का ते पहावे लागेल.. तो आणे पर्यंत तरी तुला असेच थांबणे गरजेचे आहे… आमच्या मोबाईल मध्ये व्हिडिओ शुटिंग करून झाले कि मग कुणाला तरी गावात पाठवतो.. तुझ्या घरी तसा निरोप देऊन ताबडतोब मदतीला या म्हणून सांगतो.. तू आता काळजी करू नकोस… तुझ्या जीवावर बेतलं आहे याची आम्हाला काळजी किती वाटते ते या व्हिडीओ शूटिंग व्हायरल झाले कि सगळ्यांना कळेल.. जो धाडसी आणि पट्टीचा पोहणारा असेल त्याने हा व्हिडिओ बघितला कि तो लगेच धावून आल्याशिवाय राहणार नाही… मग तू नक्की वाचशिल यात शंका नाही… तुला वाचताना पुन्हा आम्हाला शुटींग घेता येईल… एक  माणूस, सुजाण नागरिक या नात्याने आम्हाला आमचं माणुसकिचं कर्तव्य पार पाडल्याचं समाधान मिळेल… तू धिराचा आहेस, .. अखेर पर्यंत तुला लढा द्यायचा आहे… हिथं थांबून आम्ही हे शुटींग करता करता तुझं माॅरल कसं वाढेल हे आम्ही पाहतो… तू थोडावेळ असाच धीर धरून रहा मदतीला कोणी येईलच इतक्यात… आणि कुणी आलं कि तुला आम्ही मोठ्याने आवाज देऊ… होईल होईल तुझी सुटका नक्की होईल… मग आमच्या सोबत एक सेल्फी घेऊ… चॅनेलवर ब्रेकिंग न्यूज झळकवू  काळ आला होता पण वेळ आली नव्हती.. देव  तारी त्याला कोण मारी अशी सनसनाटी  हेड लाईन देऊन आम्हीच तुझ्या वतीने मुलाखत देऊ… या या व्हिडिओ शुटींगचा रिल व्हायरल झाल्याने बुडणाऱ्या माणसाचे प्राण वाचवले… पण पण हे केव्हा तूला मदत मिळून बाहेर काढल्यावरं.. बघं एका रात्रीत तू हिरो होणार आहेस.. तोवर हे तुला या डोहात गटांगळ्या खाऊन का होईना जिवंत राहावे लागणार आहे… अरे टि आर. पी. किती वाढेल याची तुला काहीच कल्पना करता येणार नाही.. ते सगळं आम्ही बघून घेतो.. तू मात्र डोहात लढते रहो हम कपडा संभालके देखते है… “

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ कालचा पाऊस… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ कालचा पाऊस… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

काल रात्री गाढ झोपेत असताना अचानक पाऊस बरसून गेला… कळलंच नाही मला… दारं खिडक्या घराची घट्ट बंद होती ना.. कुणास ठाऊक किती वेळ तरी कोसळून गेला असावा.. सकाळी जाग आली तेव्हा खिडकीची तावदाने न्हाऊन निघालेली दिसत होती… थंडीचेही दिवस असल्याने हवेतल्या गारठ्याने खिडक्यांच्या काचेवरील पावसाचे थेंब थेंब थरथर कापत  खाली ओघळून जात होते.. समोरचं आंब्याच्या झाडाने नुकतेच सचैल स्नान केल्यावर पानांपानांतुन  मंत्रोच्चाराची   सळसळ करताना प्रसन्न दिसला… मधुनच वाऱ्याची हलकी झुळूक त्याला लगटून गेलीं. जाता जाता होईल तेव्हढी पानं कोरडी करून गेली.. खिडकी उघाडण्याचं धैर्य मला होईना.. पाऊस पडून गेला असला तरी घरात शिरकाव करायचा होता गुलाबी थंडीला… एक हलकासा हात काचेवरून मी फिरवला.. हाताच्या उबदारपणा मुळे काचेवर जमा झालेल्या बाष्पानं सगळं अंग आकसून घेत काच  मला म्हणाली, “काल रात्री तुला जागं करायचा खूप प्रयत्न केला.. अगदी पावसानं गारांचा तडतड ताशा वाजवून पाहिला.. सरीवर सरी सप सप  चापट्या देत मला सांगत होत्या, अगं उठीव त्याला बघ म्हणावं ऐन दिवाळीच्या मोसमात पाऊस कसा कंदील, फटाके भिजवायला आलायं तो.. पण तू खरचं गाढ झोपेत होतास.. मग पाऊस हिरमुसला होऊन गेला.. हळूहळू थांबत गेला.. जाताना मला म्हणाला त्याला सांग रागावलोय त्याच्या वर.. आतापर्यंत बऱ्याच रात्री उशिराने घरी येत होतास, तेव्हा म माझं कारण घरात  आई, बाबा नि आजोंबाना सांगुन सुटका करून घेत होतास.. तुला तर कधीच मी भिजवलं सुध्दा नाही.. कारण तुझी माझी भेट कधीच झालेली नाही… पण आज अचानक येऊन तुला भेटायचं होतं.. तुला बघायचं होतं.. म्हणून रात्री उशिरानं आलो.. तू बेडरूममध्ये झोपलेला असताना तूला जागं करावं आणि एकदा डोळे भरून पाहावं… पण तू गाढ झोपेतून हलला सुद्धा नाही.. आता माझी कटृटी आहे कायमची असं सांग त्याला.. “. खिडकीची काच हे सारं मला सांगताना खूप हळवी झाली.. भरलेले डोळयांतली आसवं स्यंदन करत गेली…

… मी ही तिला सांगितले कि, ‘रात्री माझ्या स्वप्नात पाऊस आला होता मला भेटायला, आम्ही खूप दंगामस्ती केली.. त्यानं मला खूप खूप भिजवलं.. आम्हा दोघांना भेटून खूप आनंद झाला… बराचवेळ बोलत राहिलो, हसत राहिलो… मला म्हणाला आता त्यावेळी माझं खोटं कारणं सुटका करून घेत होतास ना.. म्हणून आज अचानक आलो तुला भेटायला नि मनसोक्त भिजवायला… ‘आणि तो  नेमकं हेच बोलून गेला.. ‘मला खूप नवल वाटलं पावसाचं.. रात्रभर झोपेत त्यालाच स्वप्नात तर पाहात होतो… आणि आता तर प्रत्यक्षात हिथं येऊन गेल्याच्या ठेवून गेलाय त्याच्या साक्षित्त्वाच्या खुणा… ज्या तू जपून ठेवल्यास मला दाखवायला… काचं आता स्वच्छ झाली होती नि मंद मंद हसत होती…

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ अभ्यंग स्नान… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ अभ्यंग स्नान… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा. अंगे भिजली जलौघाने सुस्नात झाली वसुंधरा. वारीचे ओहळ धावती मुक्तांगणी सैरावैरा. खळखळ नाद घुमवित जल निघाले भेटाया सागरा. कडाड चा थरार झंकारला तडितेचा… दुहितेची शलाका चमकली भेदून गेली अभंग नभाला… बावरले सारे चराचर भयकंपित तनमन झाले… कुर्निसात करती तरु लता त्या होऊनी नतमस्तक वर्षा पुढे, सांगती फक्त तुझीच सत्ता आम्ही कोण ते बापुडे… आडदांड खटयाळ दगड गोटे  पथा पथावरी येती वाट ती आडविती… असमंजास त्या वळसा घालून प्रवाह दावितो  चातुर्यगती. आले नवे नवे पाणी गाती गाणी बाकिबाबा… तृषार्त झाली धरित्री तृणपातीचा कोंब लवलवे इवला इवलासाबा. शाखा पल्लव तरू लतांचे सचैल न्हाऊन निघाले, हरित लेणीचें दीप उजळले… आज दिवाळीचे साऱ्या सृष्टीला अभ्यंगस्नान घडले…

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ गो माय ऽऽ… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ गो माय ऽऽ… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

 “आई आज असं अचानक तुला मला प्रेमानं जवळ घेऊन थोपटत का आहेत सगळे?… ते ओवळणं, हिरवा चारा खाऊ घालणं, अंगावर भरजरी शाल टाकणं!.. अगदी आपण देव असल्यासारखे पुजन का करताहेत?… नमस्कार तर कितीजण करताहेत… आज कुठला विषेश दिवस आहे वाटतं… आज अचानक आपल्या बद्दल त्यांना प्रेमाचा पान्हा फुटावा!.. सांग ना गं आई!.. “

“.. वासरा त्यांच्या या प्रेमाच्या दिखाव्याला भुलू नको बरं… अरे वर्षानुवर्ष चालत आलेली ती वसुबारसाची परंपरा  चालवताहेत झालं.. त्यांची दिवाळी सुरु होतेय ना आजपासून म्हणुन पहिला मान गोधनला देतात… आपणं भरपूर दुधदुभतं कायम देत राहावं असा मतलबी डाव असतो त्यांचा… वासरा पूर्वीचे आपले वंशज  प्रत्येक घराघरात गोठ्यात राहतं होते.. मोठ्या संख्येने.. मोठ्या घरात अविभक्त कुटुबाचा काबिला तसं गोठ्यात पण मोठ्ठ कुटुंब गाई, म्हशी, बैल, शेळ्या, कोंबड्या एकत्रित राहत होतो.. देखरेखीला चौविसतास माणसं असायची.. खाण्यापिण्याची तरतूद भरपूर, रानावनात भटकणे भरपूर, नदी तळ्यात मनसोक्त डुंबणं सारं सारं काही पाहिलं जात असे… मग ईतकी काळजी घेतल्याने आपणही संतत कासंड्या भरभरून फेसाळते दूध देत गेलो… वयोमानानुसार ज्यांची कास सुकत गेली, गाभण राहता येईना, दूध आटत गेले त्या भाकड गाईनां रेडा महणून पोसले गेले होते.. पण त्यांना कधीच गोठ्याबाहेर काढले गेले नाही.. दैववशात पंचत्त्व पावलेलीच घराचा गोठा कायमचा सोडून जात असे… अंगी धष्टपुष्टपणा आणि तजेलदारपणा असल्याने घरातली गोठ्यातले गोधनाची वाढती संख्या श्रीमंतीचं मापदंड ठरला जात असे… कडबा, वैरण, पेंड याने गोठ्यतला एक कोपरा कायम भरलेला असे… पाऊस भरपूर असल्याने कोरडा दुष्काळ कधी दिसलाच नाही… झाडं, डोंगर, कधी  छाटले नव्हते… आपल्यात देवत्त्वाचा अंश असल्याची त्यांची पुज्य भावना होती तेव्हा… पण पण हळूहळू  माणसांच्या प्रवृत्तीत बदल होत गेला.. आधुनिकतेचे वारे वाहू लागले.. गावात सुधारणेचा सोसट्याचे वादळ घुमले.. शिक्षणाचे फायदे दिसू लागले अन जुने संस्कार काटे होउन टोचू लागले.. भावकीत दरी पडली नि घरं दुभंगून मोडली.. शेताचा भार एकीकडे नि दुधाचा बाजार दुसरीकडे.. विभक्त कुटुंबाची घरचं टाचकी मग गोठ्यावर का न यावी टाच ती… हळूहळू एकेक गाई गुरं जनावरांच्या बाजारात गेली… दुधाच्या मिळकती पेक्षा वैरणीचा खर्च परवडेना, , माणसाच्या हातातलं घड्याळ देखभालीची वेळच दावेना.. काही गणित जुळेना म्हणून गाई गुरांना  ठेवले पांजरपोळच्या आश्रयाला.. तर काही हडखलेली, उताराला लागलेली कसायाने लाटली… शेण गोमुत्र सुद्धा आटले तिथे दुधाची काय कथा… मग आपल्याला पोसणार कोण?… कशाला बांधुन घेईल गळ्यात आपल्या फुकाची धोंड!… वासरा ! अरे हे माणसांचं जगचं मतलबी… इथे खायला कार नि भुईला भार होणारी त्यांना जड होतात ;अगदी वृद्ध असाह्य जन्मदात्या  माता पिता सुद्धा.. त्यांना देखिल त्या वयात वृद्धाश्रमाला पाठवतात तर तिथं तुमची आमची काय कथा… वर्षभर सांभाळताना, दुधाचा गल्ला वाढता राहताना, आखुडशिंगी, चारा कमी खाणारी नि शेणा गोमुत्राचा कमीत कमी उपद्रव देणारी गाई गुरं असतील तोवर आपला प्रतिपाळ करत राहणं फायद्याचं असतं.. यातलं एक जरी मागं हटलं कि लगेच त्याचं आपलं नातचं तुटलं… जोवरी हाती पैका तोवरी इथं बुड टैका हा जसा माणसाने माणसाला न्याय लावलेला असतो अगदी तसाच न्याय आपल्याला असतो… मग एक दिवस करतात आपली साग्रसंगीत  पुजा… वासरा आपल्यासाठी म्हणून ती काही पूजा नसतेच मुळी ती असते त्यांच्यासाठी… एक आदराची प्रेममय  कृतज्ञतेची दृष्टी असली आपल्यावर तरीही पुरेशी असते रे… कितीही झालं तरी ते माय लेकराचं नातं असते ते.. माय आपल्या लेकरावर माया लावणारी चिरतंन  असणारी.. मग ती माय कालची असो वा  आजची किंवा उद्याची असणारी… तिला कसही असलं तरी आपलं लेकरू कधी जड होत नसतं… पण हे लेकराला  कधीच कळत नसतं..

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ किरण शलाका… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ किरण शलाका… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

आज मलाही वाटलं  नभातून खाली उतरून यावे. तुझे चरण स्पर्शाने पवित्र व्हावे.. नेहमीच तुझ्या अवतीभवती असतो लता तरूंचा घनदाट काबिला,  श्वापदांच्या पदभाराने  त्या भुईवरची पिकली पानांचा नाद कुरकुरला..विविध रानफुलं नि पर्णांच्या  गंधाचा परिमळाचा अत्तराचा फाया कुंद हवेत दाटून बसला..पान झावळी अंधाराच्या कनातीत सुस्त पहुडलेला असतो धुक्याचा तंबू.. गगनाला भेदणारे इथे आहेत एकापेक्षा एक उंच च्या उंच बांबू.. विहंग आळवती सूर संगिताचे आपल्या मधूर कंठातून शाखा शाखा  पल्लवात दडून..दवबिंदुचे थेंब थेंब ओघळती टपटप नादाची साथ साधती  त्यासंगितातून…  तुझे ते वरचे शेंड्याचे टोक बघायला  रोजच मिळत असते मजला.. किती उंच असशील याचा अंदाज ना बाहेरून  समजला… नभ स्पर्श करण्याची तुझी ती महत्त्वकांक्षा पाहून मी देखील निश्चय केला आपणही जावे तुझ्या भेटीला आणि व्हावे नतमस्तक तुझ्या पुढे… सोनसळीच्या किरणाचे तुझ्या पायतळी घालावे सडे…अबब काय ही तुझी ताडमाड उंची..त्यावर काळाकुट्ट अंधाराची डोक्यावरची कुंची..किती थंडगार काळोखाचा अजगर वेटोळे घालूनी बसलाय तुला.अवतीभवती तुझ्या हिरव्या पिवळ्या पानांफुलाचा पडलाय पालापाचोळा.. कुठला दिवस नि कुठली रात्र याचे भान असे का तुला.जागं आणण्यासाठी रोजच यावे तुझ्या भेटीला  वाटे मजला.बघ चालेल का तुला? एक नवचैतन्य लाभेल मजमुळे तुजला..? प्रसन्नतेची हिरवाई हरखेल नि हसवेल तुझ्या भवतालाला.. पिटाळून लावेल तुझ्या उदासीपणाला.. मग बघ असा मी रोजच येत जाईन चालेल का तुला?.

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ मी मज हरवून बसले गं… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ मी मज हरवून बसले गं… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

कालिंदीची तटी  एकांती असता…

जळी पाहता पाहता मी मजला विसरून गेले गं..

प्रतिबिंबात माझ्या दिसे मज निळा सावळा कान्हा..

जलही झाले निश्चल तन मनात रुतले रूपही सुंदर..

मी तू पणाचे भान हरपले अद्वैताचे निधान गवसले…

कुठली राधा कुठला कृष्ण प्रेमभावनेचे उदीत उष्ण…

धुन मंजुळ बासरीची धुंद झाल्या लहरी लहरी..

श्यामल वर्णाचा शेला नभी पांघरला..

अन आज राधा नाही गेली घराला..

हुंबरती वासरे गोठयाला डोळे लावूनी वाटेला..

सासवेचा राग तो तांबडालाल झाला..

अनयाचे कुंकुमतिलकाचे नाव संसाराला

हद्द झाली  राधेची कान्हाने संसार तो नासला ..

  असे फुकाचे बोल कितीही लाव लाविला… परी

राधेच्या जिवनी तो कृष्ण एकची ठसावला…

राधा दामोदर आले नावरुपाला . .

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ गणपती बाप्पा मोरया… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ गणपती बाप्पा मोरया… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

हुश्श! कालचा अनंत चतुर्दशी चा दिवस आटोपला.. सगळया भाविकांचा निरोप देता घेता इतकी दमछाक झाली म्हणून काय सांगू… आणि तो गजर गुंजतोय अजूनही माझ्या कानात…

गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या… आजवर कित्येक वर्षे विसर्जनाच्या वेळी तुम्ही मला म्हणता आणि मीही तत्परतेने दरवर्षी न चुकता तुमच्याकडे येतोच येतो… यात तसूभरही बदल झाला नाही… कारण तो होणारच नसतो ना… सगळं कसं यांत्रिकपणे पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे ना ही… हां बदल फक्त सण साजरा करण्याच्या पद्धतीत झाला आहे… दर वर्षी मी नित्य चांगल्या गोष्टी देण्यासाठी हिथं मनात योजून येत असतो… पण इथं आल्यावर मला दिसतं कि आधीच सगळ्या  चांगल्या गोष्टींचा फज्जा उडालेला आहे… मग मी नविन काही न देताच निघतो  आणि तुम्ही तुमचं जुनं एकेक सोडून नव नवीन टुकार गोष्टी दाखवता.. तेव्हा माझ्या मनाला कितीतरी क्लेश होतात… अरे मी तो चौसष्ट कला नि चौदा विद्याचां अधिपती ही माझी ख्याती.. पण ऐकेक तुमच्या अंतरीच्या नाना कळा पाहून मलाच म्हणावेसे वाटते कि रे तेथे कर माझे जुळती… दिव्यांची रोषणाई, रंगीबेरंगी सजावट, वाद्यांचा  गजर, लाऊडस्पीकरच्या किंकाळ्या, छमछमत्या छम्मकछल्लूचां   नाचाचा धांगडधिंगा… यालाच खरच  हल्ली गर्दी जमते फार.. हवसे गवसे नि नवसेच फार… भक्तांच्या  अभिरुचीला पैशाचा पाऊस पडे धुंवाधार… आणि माझ्या  पुजाआरती करायच्या वेळी चार टाळकी जमे पर्यंत होतसे  नित्याची मारामार… मी मात्र मखरात बसून अर्धडोळे उन्मलित अवस्थेत पाहत असतो. ओठावर मंदस्मित आणत असतो.. लबाडांची मागण्यांची बाडची बाड भिडभाड न ठेवता  वाढता वाढे होत जातात… बदल्यात मलाही काही  द्यायचं हेच हेतूपुरस्सर विसरून जातात… अशाने होतील  कश्या पूर्ण तुमच्या मनोकामना.. राजाची बिरुदावलीचं लेबल माझ्या माथी मारून तुमचं उखळ पांढरं करून घेतात… तुम्ही बदललात मग मीच मागे का राहू आजकालच्या जमान्यात… मी ही नुसता देखावा करतो तुमचं ऐकून घेतल्यासारखं करतो.. दहा दिवस माझी करमणूक छान होते.. अन जाताना मी आठवतो यावेळेला नवे काय बरं दिसतं होते… बाकी काही असो दहा दिवस तरी मनापासून नसले तरी माझ्या भक्तीचा गुलाल तो उधळता… आपल्या घरातल्या, गल्लीतल्या, गावातल्या माणसांशी हसून खेळून राहता… तेव्हढचं एक बघून माझा उर भरून येतो… आणि केवळ हेच बघण्यासाठी दरवर्षी इथं येण्याचं मनात ठरवून निरोप घेत असतो… बरे वाटतं  तुमचं आपापसातलं त्या दिवसातले प्रेमाचं भरतं पाहून… मला निरोप देताना जड जातयं तुम्हाला हे कळतंय मला… एक मागणं मी ही मागतो तुमच्या जवळ नाही म्हणू नका मला.. जे दहा दिवस प्रेमाने तुम्ही सगळे एकत्र येऊन घालवले माझ्या सहवासात.. ते पुढच्या वर्षीच्या चतुर्थी पर्यंत तसेच ठेवाल का… तर मग दुखाचा कापूर, नैराश्याच्या अगरबत्या पेटवण्याची गरजच तुम्हाला उरणार नाही.. आनंदाचे निरांजन, समाधानाची समई तेवत राहील  अखंडपणे तुमच्या जीवनात.. दोन हस्तक नि एक मस्तक श्रद्धेने मजजवळ  झुकलेले पुरेसे असते मला.. साधी राहणी नि उच्च विचारसरणी पण तुम्ही करतायं ते अगदी उलटं असते उच्च राहणी नि टुकार विचारसरणी… अरे कुठलाच फापट पसाऱ्याचा सोस नको असतो मजला… चिंता करू नका, तरीही मी हो हो नक्की येईन बरं लवकरच पुढच्या वर्षाच्या चतुर्थीला… तो पर्यंत गणपती बाप्पा मोरया…     

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ काहूर मनी दाटले… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ काहूर मनी दाटले… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

या निर्जन निवांत स्थळी, आणि अश्याच रोजच्या कातर वेळी, वाट पहात बसते तुझी प्रेमात बुडालेली वेडी खुळी. तू हवा हवासा  असतोस जवळी..दिनवासर दिनकर निरोपाचे काळवंडलेले अस्तराचे पालाण घालून आसंमाताला जातो अस्ताला डोंगरराजीच्या पलिकडे दूर दूर. ते पाहून  हूरहूर मनातील उमटते  तरंग लहरी  लहरी ने तडागाच्या जलाशयावर. आता क्षणात येशील तू अवचित जवळी अशी मनास माझ्या समजूत घालते  आभासमय आशेवर. निराशेच्या काळ्या मळभाने गिळून टाकतात डोंगर, तलावाचे काठ, नि पाते पाते तरूलताचे, तृणपातीचे माझ्या मनासहीत..चाहूल पदरवांची येईल का , आतुर झालेले कान नि दाटून गेलेल्या  चोहिकडेच्या अंधकाराने भयकंपिताचे आलेले भान. आजची आशा निराशेत नेहमीप्रमाणे  लुप्त झाली, तसे उठून निघाले पाय ओढीत तनाचे मण मण ओझे घराकडे.चुचकारीले कितीतरी परी हटवादी मनास जोजवेना ते आढेवेढे..

.. अशी रोजच संध्याकाळी कातर वेळी, वाट पहात बसते तुझी प्रेमात बुडालेली वेडी खुळी. काहूर मनी दाटले नेत्रातून पाझरले.

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ अस्तासी गेला चंद्र काचेचा… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ अस्तासी गेला चंद्र काचेचा… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

… ‘थांब थांब!… असा करू नकोस अविचार… अधीर मनात उलट सुलट विचारांचे माजलेले तांडव घेऊन,.. मोडल्या शपथा, भाका, आणांचे पोकळ शाब्दिक वासे हाती धरून… ओल्या वाळूवरची कोरलेली आपली जन्माक्षरे पुसली जाताना बघून… आपणच बांधलेल्या किल्लाला ध्वस्त झालेला पाहून… चिडून दाणदाण पाय आपटत याचा अर्थ काय?,असा जाब त्या चंद्राला विचारायला निघालीस!… का तो आता हाताच्या अंतरावर आला आहे म्हणून?…तुझ्या प्रीतीचा एकमेव साक्षीदार होता म्हणून!.. त्यालाच विचारणार अशी का  प्रीती दुभंगली जी अक्षर आणि अमर अशी महती असताना तिची! . मग माझ्या वाटय़ाला हे आलचं कसं.?.. माझं ऐकतेस का थोडं!.. शांत हो शांत हो!..बेचैन मन स्थिर कर… अवघड असतं सुरूवातीला पण प्रयत्न केलास तर सवयीने हळूहळू स्थिरावतयं … मग कर आपुलाच संवादु आपुल्याच मनाशी..तुझ्या एकेक प्रश्नांची भेट घडेल तुझ्याच मनात दडलेल्या उत्तराशी… अविवेकाने करून घेतला असतास सर्वनाश जीवनाचा.. समोर दिसतयं ते क्षितिज त्याला तरी कुठं ठाऊक आहे का पत्ता अंताचा!.. तू जितके चालत निघालीस तसा तसा पावला पावलाने मागे मागे  सरकत निघालेय.. गवसले का ते कधी तुला!.. मनाच्या संभ्रमावस्था तुला कधीच नव्हत्या त्या कळणाऱ्या ,पण नाहक जन्मभर होत्या छळणाऱ्या…गोडगुलाबी रंगाची उधळण भिडली आकाशात.. निळया स्वप्नांचे पक्षी पंख पसरून बसलेत गगनात.. किरमीजी छटेचा काळोख नैराश्याची झालर लावतोय आकाशी मंडपात… अर्थाचे बुडबुडे तरंगले  भ्रामक शब्दांच्या वायूतून… विराणीचे उसासे  झंकारले तुटल्या तारातून…अन तो उदास चंद्र बापुडा पाहतो तुज कडे मान वाकडी करुन… ‘

‘अगं वेडे तो तुला सांगतोय…कालपर्यंत मी सगळ्यांच्या गुजगोष्टी बघता बघता साठवत गेलो.. रुपेरी,चंदेरी लखलखत्या कोंदणी…माझ्या कडून कोणी हिरावून घेणार नाही हा दिला होता विश्र्वास.. कारण मी तेव्हा खूप खुप दूर होतो.. पण काल चांद्रयान ते मजवर उतरले आणि मधले अंतरच नाही उरले गं…  वाटेवरच्या  बागेत जावे तसे आता येथेही वर्दळ वाढली ,अन जो तो  उदर माझे फोडू लागला कुतूहलापोटी.. गुपितं लपविण्याचा खटाटोप  व्यर्थ ठरला..माझा चंद्राचा बाजारभावच घसरला… म्हणून  आलो सांगायला.. सख्यांनो आता मला वगळा नि तुम्ही दुसरा चंद्र शोधा.. झालंगेल़ विसरून जाऊया तोच चंद्रमा नभीचा हवा  हट्ट सोडून द्या…तो एक दूर दूर  काचेचा चंद्र होता, हाती येता खळकन फुटूनी गेला… अस्तासी गेला चंद्र काचेचा… ‘

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print