मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ दिसलीस तू फुलले ऋतू.… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “दिसलीस तू फुलले ऋतू…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

भावना त्यालाच कळतात ज्याला त्याची जाणीव असते.

तारुण्याच्या त्या टप्प्यावर तुझं माझ्या आयुष्यात येणं.. हा खरोखरच नियतीचा योगायोग होता… पहिल्या नजर भेटीतच कलिजा खलास झाला होता… कळले नाही कधी मी नजरकैदेत बंदिस्त कसा झालो… हरवले भान स्व:ताचे…. जगणेच विसरून गेलो… बस्स तोच एक क्षण आला नसता आयुष्यात तेव्हा! .. असे त्या भेटीनंतर कैकदा वाटून गेले… मिळणार नाही साथ तिची हेही तेव्हाच कळून चुकले.. सौंदर्यवतीचे चाहते लाखो असले, तरी भाग्यवान तो एकच असतो… पण पण जुनी ओळख ती कुठे तरी हृदयाच्या कप्यात दडून राहीली होती तिच्याही नि माझ्याही.. पुन्हा कधीच न उचंबळून न येणारी… ताटातूट ठरलेली घडलीच काही क्षणातच… अन दोन वळून वळून बघणारे चेहरे काही अनामिक भावनांचे कंगोरे घेऊन समोरून निघून गेले.. दोन ओंडक्यांची पुन्हा कधीच घडणार नसते गाठभेट हे ही तितकेच सत्य असते… अबोल नि असफल प्रीतीच्या वेलीचे सलणारे काटे… मनाला घायाळ करतात.. समजूत घालता घालता मनं थकून जातं.. काळाचं औषध विरहाचं दु:ख विसरायला लावतो… आणि दुसऱ्या प्रेमाच्या तडजोडीने मनाची तगमग दूर करायची मदत घेतो… आता सारं काही आलबेल नि आनंदाच्या लहरीवर जीवनाचे तरंग तुषार उधळण करत जात असतं… आणि आणि एक दिवस नियतीला पुन्हा खोडसाळपणा करण्याची हुक्की येते…

ध्यानीमनी नसताना एक दिवस सकाळी मार्निंग वाॅकला बागेत असताना तिचे माझ्या सामोरी येणे… अगदी तसेच पहिल्या त्या भेटीसारखे… नजरेला नजर मिळताना… ओळख आहे का? असा निशब्द प्रश्न त्यातून विचारला जाताना.. डोळेच ते एकमेकांना भिडल्या भिडल्या अनेक गोष्टी नजरेने नजरेला नजर करूनही गेले… शब्दांची वाट न पाहता… काही क्षणातच आम्ही दोघं एकमेकांच्या समोरूनच गेलो… आणि गुंतलेले हट्टी मन ओढून घेण्यासाठी पुन्हा पुन्हा मागे वळून पाहताना मात्र मनाची चलबिचल वाढवत गेले… ती जुनी ओळख कुठे तरी हृदयाच्या कप्यात दडून बसलेली, तिच्याही नि माझ्याही.. पुन्हा एकदा उचंबळून येते… तेही क्षणैक ठरते… आता देहाचं तारूण्य ओसरून कधीच गेलेलं असतं, वार्धक्याची रूपेरी देहावर पसरलेली असते… तरीही अजूनही मनात कोवळे तृणांकूर उमलू पाहतात… आम्ही एकमेकांना पाहिलेलं असतं तेव्हा… भावभावनांची खळबळ उरात उठते.. अजूनही आपण तुला विसरलेलो नाही हेच नजरेतून सांगणे असते… काही गोष्टींमुळे आपण एकत्र जरी आलो नाही, आणि कितीही दूर दूर अंतरावर आपण असलो तरीही मनातल्या प्रेमरज्जूने आपण एकमेकांशी कायमचे बांधले गेलो आहोत… हे ही नसे थोडके… होय ना! …

©  श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ आय. टी.… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “आय. टी.” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

ऐ चला गं भराभर… इतके दिवस नुसतं बेंचवर बसून तो नवा प्रोजेक्ट येण्याच्या आशेवर बसून काढले… वाटलं नव्हतं नवीन प्रोजेक्ट येईल असा… कंपनी ने तर पंधरा दिवसांनी बेंचवर च्या फोर्सला नारळ देण्याचं पक्क केलेलचं होतं… पण समहाऊ नवा प्रोजेक्ट एकदाचा मिळाला… आज त्याची रिव्ह्यू मिटींग काॅल केलीय अरली इन दी मार्निंग… त्यात नेमका उशीर झालाय आपल्याला… बाॅस कधीचा उखडला असणारं… प्रोजेक्ट सुरू करून आठवडाच झालायं…. चार महिन्याची डेड लाईन आहे त्याची… पण बाॅस ने प्राॅडक्शन मॅनेजरला आपल्याला विश्वासात न घेताच जंटलमन वर्ड दिलाय तिसऱ्या महिन्यातच अलाॅटेड जाॅब पूर्ण करून देतो म्हणून… त्याचं कायं गं सांगायला जातयं.. शेवटी आपल्या मानगुटीवर बसून रात्रंदिवस पिळून काढणार आपल्याला आणि हा शेवटी एक नंबरचे रॅंकिंग घ्यायला मोकळा… ॲप्रिसिएशनच्या दिवशी हे श्रेय माझ्या सिनसियर टिमचं आहे असं कोरडं पोकळ शब्दबापुडे कौतुक भरलेल्या मिटींग मधे करताना आपल्या ओठांवर पडलेल्या मधाचा थेंब जिभेने चाटत.. (ए. जी. एमची हांजी हांजी करत) बोलणार आणि सगळं तूप आपल्याच पोळीवर ओढून घेणार आणि आपल्याला… रॅंकिंगच हॅंगिंग करणारं… वर म्हणणार… मॅनेजमेंट ने यंदाच्या वर्षी काॅस्ट कटींगचं टारगेट ठेवल्यानं सगळ्यांना रॅंकिंग नि इयरली इनरक्रीमेंटला कट दिला आहे… म्हणजे वर्षाचा मलिदा कंपनीच्या डायरेक्टर नि मॅनेजमेन्टने खाऊन घ्यायचा आणि प्रत्यक्षातल्या टास्कफोर्सला धतुरा दाखवायचा… मी तर बाई ठरवलयं एप्रिलला जो बोनस, इन्सेटीव्ह जमा झाला कि या कंपनीला कल्टी मारणारं… तसं माझ्या प्रोफाईलला बघून दोन तीन कंपन्यांनी चांगली ऑफर देऊ केलीय.. फिनॅशियल बेनिफिट खात्यावर जमा झाले रे झाले दुसऱ्या मिनिटाला पेपर टाकणार… कोण काम करणारं या आसल्या टाईट पोझिशन्स मधे… आपल्या काय कंपनीचा तुटवडा आहे काय… तू नही तो और सही… साखर कधी संपत नसते.. हंटिंग करत राहिलं म्हणजे साखरेच्या गोडीचा वास लगेचच जाणवतो… मग मोर्चा तिकडे का वळवू नये… आणि पुन्हा तिथं ही असाच अनुभव येतोय असं दिसलं कि आहेच पुन्हा नवा शोध घेणे… हि मु़ग्यांची रांग कधीही संपत नाही.. कुठून नि कशी सुरू होते काही कळत नाही… पण एक मात्र खरं त्यांची हि येजा कधीही एकट्याने होत नसते कायमच मोठी रांगच्या रांग लागलेली असते… ते बाहेर पडलेत कि आत निघालेत हे त्या निघालेल्या रांगेवरून कळत नाही.. पण एक आहे तो साखरेचा कण जेव्हा आपल्या चिमटीत पकडून वाहून नेतात तेव्हा दोन मुंग्या कश्या समोरासमोर आल्यावर संवादाचं शेअरिंग करतात… तसंच आपल्या आय. टी. वाल्यांचं देखील आहे… पर्कची साखर गोडीला कुठली चांगली आहे आणि जास्त काळ पुरणारी आहे इतकी बाब समजलं म्हणजे झालं… चल तर आपण दोघी कॅन्टीन मधे जाऊन कप ऑफ टी घेऊन एकमेंकांना गुडबाय म्हणूया…

©  श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ शिक्षा… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “शिक्षा…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

“अगं आई दार उघड जरा… बाहेर पाऊस कधीचा सुरू झालाय… संतत धार लागलीय जणू… बाहेरचं अंगण देखील ओलं ओलं झालयं… एकही कोरडी जागा शिल्लकच उरली नाही.. कि जिथं बसून पाऊस कधी थांबेल याची वाट पाहता येईल… इतका वेळ त्या डाॅली नि लिली माझ्या सोबत खेळत होत्या… त्या पाऊस जसा सुरू झाला तसा त्यांच्या आया नि मालकीण बायांनी त्यांना आपापल्या घरी उचलून घेऊन गेल्या… मलाही डाॅली नि लिली दोघी घरी चल म्हणत होत्या आणि पाऊस थांबल्या वर घरी जा असं सांगत होत्या… पण त्यांच्या मालकीण बाईंनी त्यांनाच तेव्हढं घेऊन गेल्या आणि मला बाहेरच्या बाहेर हुसकावून लावल्या… व्हॅगाबाॅंन्ड कुठला असं काहीसं मला पाहून पुटपुटल्या… कानपाडून नि तोंड खाली लावून त्यांच्या दारातून परत फिरलो.. डाॅली नि लिली घरातून बराच वेळ आपल्या आईशी आणि मालकिण बाईशी भुंकुन भुकुंन बेजार करून सोडत राहिल्या… पण ते त्या दोघींच्या बहिऱ्या कानाला ऐकू गेलंच नाही… मी बराचवेळ तू मला न्यायला येशील याची वाट पाहत बसलो… पण तुझा पत्ताच नाही… आणि हा पाऊस काही थांबायचं नाव घेईना… थोडावेळ तसाच बसलो.. पण वाढता वाढे पावसाचा तो जोराने अंग भिजायला लागलं आणि सुटलेल्या गार हवेने अंगात हुडहुडी भरू लागलीय… आणि तशी मला आता भुकही लागलीय… मग आई उघडना दारं लवकर आणि घे की गं घरात मला लवकर… “

“.. टाॅमी आज तुला घरात घेणारं नाही… समजलं.. तू दिवस दिवसभर नुसता उनाडक्या करत असतोस.. घरात किंवा आजुबाजूला मिनिटभर तुझं बुड टेकत नाहीस… सतत बाहेर बाहेर त्या टवळ्यांच्या नादाला लागून खेळत बसतोस… आता तू काही लहान नाहीस.. वयाच्या मानानं तुला चांगली जाणं आलेली आहे… तरीपण तू असा माणसा सारखा थिल्लर वागतोस… तुझा नुसता खायला कार नि भुईला भारच झालाय… अलिकडे तू कुणाचचं ऐकेनासं झाला आहेस.. असं माणसा सारखं मनमौजी आपल्याला राहून कसं चालेल… घरातल्याशीं आपण कसं नीट वागलं तरचं ते आपल्याला ठेवून घेतील कि नाही.. नाही तर घराबाहेर हाकलून दिल्यावर उकिरडे फुंकत जावे लागेल… आपण काही रस्तावरील भटक्या, बेवारशी कुत्र्याच्या गोत्रातले नाहीत… आपली घरंदाज जातीची उच्च भ्रू परंपरेच्या समाजातील आहोत.. हे तुला कितीतरी वेळा कानीकपाळी ओरडून सांगितलयं.. पण तू ते लक्षात घेत नाहीस… त्यात तुझे वडील आता आपल्यासोबत असत नाहीत. मी आणि तू दोघंच मायंलेकरं एकमेकांना असताना.. घरच्या मालकांनी आणि घरातल्या सगळ्या माणसांशी कसं प्रेमानं नि जीव लावुन राहायला पाहीजे.. मी तसं वागत राहिलेय म्हणून आपला दोघांचा इथं टिकावं लागलाय बरं… हे तू लक्षात घेत नाहीस… खरचं तुझं वागणं व्हॅगाबाॅंन्ड सारखंच आहे… अश्या तुझ्या वागण्याने एक दिवस आपल्या दोघांना एव्हढ्या चांगल्या आधाराचं प्रेमळ सहवासाला मुकावं लागेल असेच वाटतयं… मी तुला सांगून सांगून थकलेय… कधीतरी तुला चांगला धडा शिकवायचाच होता. तो आज हा दिवस उगवला.. दाराच्या मागेच मी बसलेय… घरातले सगळे ते दारं उघडून तुला आत घ्यायला गडबड करायला लागले तसे मी त्यांना तिथं बसून अटकाव करतेय… नको नको आज त्याला आत घेऊया नको… बसू दे त्याला बाहेर.. होऊ दे जरा भुकेने कासावीस नि गारठू दे चांगला थंडीने कुडकुडून.. पावसाने सगळा ओला कच्च चिखल झालाय. कि बसायला नि झोपायला देहाचं मुटकुळं करण्या इतकी जागा देखील मिळाली नाही कि मग कळेल घराची आणि माझ्यासकट घरातल्यांची किंमत.. आज त्याला हि कडक शिक्षा आहे.. त्याशिवाय काही तू वठणीवर यायचा नाहीस… आता तू कितीही दारावर पायाने खुसूखुसू केलास, गळा काढून विव्हळून भुंकत रडत भेकत राहिलास तरी मी काही तुला दारं उघडून आत घेणार नाही म्हणजे नाही… तुला काय वाटलं आपली आई करारी नसेल म्हणून… कळू दे तुला आज आपल्या आईकडे वात्सल्य आहे तितकचं करारीपणा देखील आहे… जसं प्रेम द्यावं तसं प्रेम घ्यावं.. फाजील लाड बिलकुल सहन करून घेतले जाणार नाहीत… अजून तुला आईचा खरा स्वभाव कळला नाही… आज तो तुला चांगला कळू दे… पुढच्या भवितव्यात तुला त्रास होऊ नये म्हणून आज तूला हा धडा शिकवणार आहे… “

“आई माझी चुक मला समजून आलीयं.. पुन्हा मी तसं वागणारं नाही.. तू सांगशील तसचं वागेन.. इथून पुढे तुला आणि घरच्यांना कुठलाच त्रास देणार नाही… पण झाली एव्हढी शिक्षा पुरे गं… आणि मला घरात. घे… “

©  श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ पडछाया… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “पडछाया…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

उरात ठसली माझ्या तुझ्या प्रतिमेची पडछाया…

आणि तू जेव्हा जातोस समोरून तेव्हा ढवळून काढते अंतःकरणाला माझ्या… आणि नसतोस दिसत तेव्हा तुझ्या विरहात एकेक आठवणींचा पापुद्र्यांचे फोपडे उन्मळून पडतात.. भळभळ वाहणाऱ्या जखमेवरची खपली पडून जावी तशी…. जसे कढत आसवांचे डोळ्यातून कढ ओघळत जावे तसे…. मी अचल.. मी निर्जीव… मला कुठे असावे भावनांचे कोमल अंत:करण.. असा असतो तुझा मुळी माझ्याबाबतीतला गैरसमज… पण तुला सांगू पाषाण हृदयाला सुद्धा प्रेमाचा फुटतो पाझर असचं म्हणतात सारे…. त्याचं अंतरग आतून असतयं मृदू नि कोमल… मी जरी वरून दिसली तशी राकट दगड, पण मी तशी नाहीए… स्व:ताची सुखदुःख नसली म्हणून काय झालं! माझ्या सानिध्यात जे जे म्हणून आले त्यांच्या त्यांच्या सुखदुःखात मीही सहभागी झाले! … माझ्या भावलेले त्यांच्या भावनांचे कंगोरे मला दिलेल्या अंर्तबाह्य रंगरंगोटीतून प्रकट करते झाले…. मग मला तू असं कसं म्हणू शकतोस कि भावनाहीन आहे म्हणून! … उलट मी तर म्हणते तूच खरा भावनाहीन आहेस… फक्त आपल्या मुसक्या आवळून लगाम दुसऱ्याच्या हाती सोपवून तू त्यांच्या तालावर नाचत सारं आयुष्य काढतोस… आणि तुझ्यावर स्वारहोणाऱ्याची सुख दुखाची ओझी वावगत राहतोस… तुला काय वाटतं हे तुला सांगावसं वाटलं तरी बोलायचं स्वातंत्र्य तुला कुठे असतं! … अगदीच असह्य होतं तेव्हा पुढच्या पायाच्या टापा उंचावून जोरजोराने खिंकाळत राहतोस! … समजणाऱ्याने कसं समजावं रे ते तुझे आनंदाचे पडसाद आहेत की दुःखाचे.! . की ज्याने त्याने लावून घ्यावेत आपल्या मन स्थितीनुसार मतितार्थ… आणि तसा तुला दुसऱ्याच्या सुखदु:खाशी काहीही देणंघेणं असते कुठे म्हणा? … डोळ्यावर झापड लावलेली असतात आणि ते फक्त तुला गंतव्यस्थानाचा मार्गच तेव्हढा दाखवतात… कानात वारू शिरलेला असल्याने तू उधळत निघतोस.. तहानभूक विसरून नि देहभान हरपून.. वायू गतीने दौडत जाणे इतकंच तुला ठाऊक असल्यानं तुला वारू म्हणूनही तुला ओळखतात एव्हढंच… याच्या पलीकडे काय? काहीही नाही… इतकचं काय अवतीभवती पाहणं तुझ्या नशीबीही नाही कोणंतरी आपल्यावर फिदा आहे याची तुला शुद्धही नाही! … माझ्या मनीचा मी राजा याच भावनेत तू कायमच गुरफटलेला… रस्त्यावरून जातोस तेव्हा तुझ्या तगडक तगडक पदरवाचा ध्वनी घुमतो तेव्हा त्या नादाची कंपने माझ्या शरीरावर उमटतात… शहारून जाते काया सारी… अन तुला बघायला मला डोळे नसले जरी संवेदनाचे अंर्तचक्षू तुला टिपून घेतात… एक आनंदाची लहर सगळ्या कायाभर लहरून जाते… एक गोड शिरशिरी ची अनुभूती येते… पण तुझं लक्ष असतं का तिकडे… खुळ्या मनाची समजूत घालता शब्दही किती पडती तोकडे…. प्रत्यक्षात तुला भेटता येणं शक्य नसलं तरी तुझ्या प्रतिमेवरच मी वेडी अभिसारिका होते… बघं तुला जमेल का काही क्षण माझ्याजवळ उभा राहता येतेय का? बघशील का मला क्षण एक टक लावून… जाणून घेशील का माझ्या डोळ्यात दडलेले भाव मनीचे… तुला ते नक्कीच आवडेल.. मग करशील मान डोलावून दुजोरा देशील.. याच केवळ एका प्रतिसादाची मी अपेक्षा करतेय… मुकी असली तरी गुज माझ्या मनीचे तुला कळावेत म्हणून धडपडतेय… बाकी काही नाही जमलचं तरी स्थित प्रज्ञा सारखे जागी निश्चल उभं राहणं का कुठं चुकलयं…

… त्या रस्त्यावरून रोज ठरल्या वेळी मी जात असताना केतकी खिडकीतून मला पाहत असे आणि एक दिवस अचानक तिची माझी नजरानजर झाली आणि केतकीने ती खिडकीच बंद करून घेतली… आणि मी पुन्हा इकडे तिकडे न पाहता सरळ रस्त्यावरून चालत पुढे निघून गेलो…

©  श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ हिरवा निर्सग हा भवतीने… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “हिरवा निर्सग हा भवतीने… जीवन सफर करा मस्तीने…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

ये ये आलास! .. अरे इकडे इकडे बघ वेड्या.. मी बोलवतोय तुला… इतक्या कडकडीत उन्हातान्हातून, धुळवटीच्या फुफाट्यातून तंगडे तोड करुन कुठं बरं निघालास.. बरं निघालास ते निघालास घरी सांगून सवरुन तरी निघालास आहेस ना.. कुठं जाणारं आहेस.. किती लांब जाणार आहेस.. कसा जाणार आहेस.. परत कधी येणार आहेस… घरी विचारलेल्या तुझ्या मायेच्या माणसांच्या प्रश्नांची नीट उत्तरे दिली आहेस ना.. नाहीतर ते उगाच तुझ्या काळजीत पडतील… दिवसभरात दिसलास नाहीस आणि अंधार पडल्यावर घरी परतला नाहीस तर त्यांच्या जीवाला किती घोर लागेल…. बघं मी सुद्धा किती किती प्रश्नांचाच भडिमार करतोय तुझ्यावर नाही का… अरे अजूनही तू उन्हातच का उभा राहिला आहेस… घामाने सगळंच अंग तुझं चिंब झालयं की… आणि चेहरा तर किती क्लांत झालेला दिसतोय… उन्हाच्या तावाने चेहरा लाल लालबुंद झालाय.. जसं काही घरातल्या माणसांवर रागावून चिडून संतापून तडकाफडकी घरा बाहेर पडलेला असावास असाच दिसतोस.. अरे ये रे या माझ्या हिरव्यागार थंड सावलीत येऊन बैस जरा.. हं हं त्या तापलेल्या मातीच्या पायवाटेवर बसू नकोस… या शांत हिरव्यागार कोमल अश्या तृणपातीवर बैस… वाटल्यास जरा पहुडशील… उन्हाच्या कावात चेचले अंगाला जरा थंडावा लागू दे.. वाऱ्याची झुळुकेने घाम सुकून गेला की थोडं तुला हायसं वाटेल.. बाहेरच्या रखरखीने मनात उसळलेल्या रूखरूणाऱ्या काळजी चिंता या इथं बसवल्यावर बघ कशा निभ्रांत होऊन जातील त्या… आणि हो आल्या आल्या तू मला सगळं सांगावासं असं माझं बिल्कुल म्हणणं नाही बरं… मला ठाऊक आहे ते.. तु घरापासून किती लांब आला आहेस.. एकही गोष्ट तुझ्या मनासारखी कुठेच कधीही घडून येत नसल्याने आणि तरीही सगळ्या गोष्टीला तुचं जबाबदार असल्याने.. कारण तुझं उत्तरदायित्त्व तुलाच निभाऊन न्यायला हवं असताना.. काळ किती प्रतिकुल असताना.. सगळंच प्रतिकुल घडत जातयं हे समोर दिसताना आपण किती हतबल आहोत याची जाणीव जेव्हा होते… तेव्हा राग, संताप, अनावर होतो… वादाच्या ठिणग्याने वणवा पेटतो तेव्हाच कुठलाही माणूस डोक्यात राख घालून घराबाहेर पडतोरे पडतोच.. जाउ दे सारे मसणात हाच टोकाचा विचार येतो मनात आणि पाय नेतील तिकडे माणसाचा दिशाहीन प्रवास सुरू होतो.. बाहेरही उन्हाळा आणि मनातही उन्हाळा… या उन्हाच्या लाही लाहीने जीव नकोसा होतो… वाटेत कुणी भेटलं.. का बरं म्हणून विचारलं तरी वाळली चौकशीने सुद्धा जखमेवरची खपली निघाल्यासारखी वाटते.. त्याचा सुद्धा अधिकच त्रास वाटतो… पण तू माझं ऐकलास इथं सावलीत घटकाभर बसलास मलाच फार फार बरं वाटलं बघं… इथं तुला गारव्यानं तनाला नि मनाला विश्रांती मिळाली.. मस्तक नि मनही शांत झालं.. डोळे ही निवले.. आणी संतापलेल्या विचारांचा धूरळाही खाली बसला असच दिसतयं तुझ्या या देहबोलीतून..

आता अविचार सोडून देऊन पुन्हा परतीचा घराकडचा मार्ग धरावास.. संध्यासमय जवळ येत चालला आहे.. आणि तुझ्या येण्याकडे तुझी घरातली सारी तुझी माणसं वाटेला डोळे लावून बसलेत…. कारण त्यांना तू आणि तूच हवा आहेस.. तुझ्या शिवाय त्यांना दुसरा कुठलाच आधार नाही हे तुलाही चांगलचं ठाऊक आहे… तेव्हा तू असाच घरा कडं जा.. आणि पुन्हा म्हणून अविचाराने असं पाऊल उचलू नकोस….

आज मी तुझ्या आजोबांनी लावलेल्या या झाडाने तुझी होत असलेली तगमग ओळखली म्हणून तुला या टोकाच्या निर्णया पासून परावृत्त तरी करु शकलो… तुझ्या आजोबांनी अगदी हाच विचार समोर ठेवून मला म्हणजे झाडाला उभं केलं.. वाढवलं.. त्यांना देखील तसाच अनुभव आलेला असणार… आणि असही वाटलं असणार की पुढे येणाऱ्या प्रत्येक पिढीलाही असाच अनुभव येत राहणार त्यात बदल काही होणार नाही तेव्हा त्या सगळ्यांना शांतता मिळावी विचारात परिवर्तन व्हावं असं वाटून मला इथं वाटेवर उभं करून गेलेत… मगं मी देखील पहात असतो असा कुणी रंजलेला गांजलेला पांथस्थ या वाटेवरून जाताना दिसतो का ते…. पण तू पुन्हा असं केलास आणि दुसऱ्याच रस्याला गेलास तर न जाणो माझ्या सारखं कुठलं झाडं तुला वाटेत भेटेल न भेटेल… पण माझी तुला सतत आठवण रहावी असं वाटंत असेल तर तू मात्र एक करू शकशील या गावाच्या माळरानाच्या वाटेवर माझ्यासारखी कितीतरी झाडं लावू शकशील की जेणेकरून त्याच्या सावलीत हिरव्यागार थंडाव्याने तिथं येणाऱ्या पांथस्थांना सुख समाधानाचा लाभ होईल…

©  श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ “चल उड़ जा रे पंछी… की अब ये देश हुआ बे़गाना…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “चल उड़ जा रे पंछी… की अब ये देश हुआ बे़गाना…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

“अहो ताई माई आक्का.. आम्हाला तुम्ही बेघर करू नका हो… मी या जंगली प्राणीमात्रांचा राजा या नात्याने तुम्हा माणसांना हात जोडून विनंती करतो… मी एकटाच नाही तर या आमच्या जंगलातील माझी राहणारी विविध प्रकारच्या प्राण्यांच्या रयतेचे प्रतिनिधीचं शिष्टमंडळ सुध्दा तुम्हाला विनम्रपणे विनंती करायला आले आहेत… आम्हाला तुम्ही बेघर करू नका… अहो दाट जंगलामध्ये शांतता होती, पक्ष्यांचे कूजन, वाऱ्याची सळसळ, आणि हिरवळीत मिसळलेला निसर्गाचा श्वास… पण एका दिवसाने सर्व काही बदललं. सरकारी अधिकाऱ्यांचा एक चमू जेसीबी, कुऱ्हाडी आणि नकाशे घेऊन त्या जंगलात उतरला. कारण एकच — विकासाच्या नावाखाली जंगलतोड.

तुम्ही तुमचा विकास का काय ते जरूर साधा बरं पण त्यासाठी या जंगलातील आमच्या घरादारावर तुमचा जेसीबी फिरवू नका… तुम्ही खुशाल तुमच्या जगात जगा आणि आम्हाला आमच्या या दुनियेत जगू द्या..

ताई माई आक्का एक सांगतो तुम्हाला, आम्हाला तुमच्या माणसांचं ना राजकारण कळतं, ना विकासाचे प्रकल्प. आम्हाला फक्त आमचं घर हवं आहे. झाडांच्या आडोशात निवारा, नदीच्या काठावर पाणी, आणि जंगलाचा मुक्त श्वास. आणि जर तुम्ही ते घर उध्वस्त केलं, तर कुठं बरं जायचं आम्ही?

हवंतर आपण सामोपचाराने आपल्यातले काही मतभेद असतील तर सोडवूया… पण आम्हाला नि आमच्या कुटुंब काबिल्याला असं उघड्यावर आणू नका… अहो इथं कुणाची लहान लहान नवजात बाळं अजून आपल्या घरट्यात, गुफेत, गुहेत आहेत.. कुणी आजारी आहेत तर कुणी वयानं म्हातारे कोतारे जराजर्जर असे आहेत.. आमच्या कडील मादी आपल्या कुटुंबाच्या पालनपोषण साठी दिवसरात्र बाहेर भटकतेय.. घरची कर्ती नर मंडळी कुटूबाचं संरक्षण आणि त्याच्या अन्न पाण्याची सोय करण्यासाठी दिवसभर जंगलात वणवण करत हिंडतोय… त्या सर्वांना ठाऊक आहे की या जंगलात सुरक्षितता आहेच शिवाय इथं पोटभर दाणा पाणी ही उपलब्ध आहे… माझी हि जनता आपआपसात गोडीगुलाबीने राहतेय… एकमेकांशी सौहार्दपूर्ण वागतेय.. एक दुसऱ्या साठी वेळप्रसंगी स्वताचं बलिदान ही देतेय पण त्याला उपाशी ठेवत नाही… अश्यावेळी त्या दुसऱ्याला नाईलाजास्तव त्याची शिकार करणं भागं पडतं… पण ते भक्ष्य जर त्याला मिळालं नाही तर त्याच्या जीवनाचा तरणोपाय तरी दुसरा कुठला असणार… हा मनावर आणि हृदयावर दगड ठेवून कठोरपणे हा निर्णय अंमलात आणावा लागतो… आमच्या जंगल कायद्यात हा गुन्हा समजला नाही.. जीवो जीवस्य जीवनम हेच तत्व वापरलं जातं… या जंगलात राहणारे आम्ही सर्व प्राणी जंगली असलो, हिंस्र असलो तरी आम्हाला मन आहे, भावना आहेत.. म्हणून तर निराधार दुर्बल नि अशक्त प्राण्यांचे आम्हीच निगुतीने काळजी सांभाळ करतो…

ताई माई आक्का आता केलेल्या आमच्या निवेदनावर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही.. आणि ते ही बरोबरच आहे म्हणा कारण आपण दोघे तेव्हढे कधी एकत्र राहिलोच नाही… कायम आपण एकमेकांना आपआपले शत्रू भावनेतूनच बघत गेलोय… त्यामुळे आमच्या जंगलात येऊन तुम्ही कायम आमची शिकार करत गेलात… अश्या तुमच्या अमानवी आणि माणूसकिला काळिमा फासणाऱ्या कृत्याकडे आम्ही गांभिर्याने न बघितल्याने आमची प्रणीमात्रांची संख्या रोडावत गेली. तरीसुद्धा आम्ही तुमच्या विरुद्ध आजपर्यंत कुठलाच संघर्ष केला नाही.. पण जिथं जिथं आमच्या जीवन मरणाचा प्रश्न उभा राहतोय असं वाटलं तेव्हा तुम्हाला आमच्या पासून थोडं दूर राहिलात तर बरं हे जाणवून देण्यासाठी कधी कधी तुमच्या मानव वस्तीत अचानक फेरी टाकून जावी लागते… पण हे ही तेव्हढ्या पूरतच झालं… पण तुम्ही आता अशी आणीबाणीची परिस्थिती आमच्या समोर उभी केली आहे की आम्ही आता बेघर होऊन उघड्यावर आलो आहे आणि ते जरं का तसचं घडलं तर ते आमच्या पेक्षा तुम्हालाच जास्त धोकादायक असणार आहे… आमचं जगणं तर आज आहे तर उद्या नाही, पण तुमचं जगणं कायमं मरणाच्या दाढेत असणार हे नक्की… तेव्हा आम्ही आमच्या या निवेदनात एक प्रस्ताव आम्ही मांडला आहे. हवंतर आम्ही तुम्हाला इथे वचननामा लिहून देतो की आताच्या घडी पासून आम्ही आमचा तुम्हा माणसांच्या बाबतीला हिंस्र पणा काढून टाकतो… तुमच्या सगळ्यांशी विनयाने आणि आदराने आम्ही आमचं वर्तन ठेवू… चुकुन माकून कुणी तुमच्या माणसांपैकी कधीही जंगला च्या वाटेवरून जात असेल तर आमच्या पैकी कुणीही त्याच्यावर प्राणघातक हल्ला करणार नाही आणि इतरांनाही तो करू देणार नाही… तसंच इथून पुढे आमच्या पैकी कुणीही तुमच्या मानव वस्तीत अचानकपणे येऊन हल्ला वगैरे करणार नाही… तुम्ही तुमच्या मानवांच्या वस्तीत मस्त मजेत जगा आणि आम्ही या जंगलात सुखानं जगतो… म्हणजे तुम्ही जगा आणि आम्हालाही जगू द्या… जंगलाचं संरक्षण संवर्धन केल्यानं किती फायदे मिळतात हे मी काही तुम्हाला नव्याने सांगायला पाहिजे अश्यातला भाग नाही…. तुम्हालाही पाऊस पाणी, हवा, अन्न धान्य विपुल नि मुबलक प्रमाणात मिळत राहिलं… आणि इतरही अनेक फायदे तुम्हाला मिळत राहतीलच… पण जर का तुम्ही तुमच्या विकासाचा विघातक विचारच अंमलात आणायचा असेल तर एकवेळ तुमच्या जगण्याला धक्का बसणार नाही. पण जंगलच नाहीसं झालं तर आम्ही प्राणीमात्रांनी कसं जगावं… आमचा कोण तारणहार असेल… मग का आमची तुम्ही अशी ससेहोलपट करू पाहतायं… आमच्या बद्दल थोडी तरी सहानुभूती दाखवा.. तुमच्या मनात आमच्या बद्दल भूतदया जागृत होऊ द्या… जे तुम्ही माणसांमाणसामधे माणूसकी हिनतेने वागत असता ते तसं आमच्या बाबतीत वागू नका… आमच्या पासून तुम्हाला काडी इतकाही उपद्रव आम्ही इथून पुढे देणार नाही हि सगळ्या प्राणी मात्रांच्या वतीने आणि त्यांचा नेता म्हणून ग्वाही देतो…. आणि आमचं नव्हे आपलं हे आणि अशी जी जंगल जिथं जिथं आहेत त्याचं संरक्षण नि संवर्धन करूया…

ताई माई आक्का माझ्या या बोलण्याचा तुम्ही आणि तुमच्या मानवजातीने गांभिर्याने विचार करावा आणि आम्हाला आशवस्त करालं… नुसतं पोकळ आश्वासन नका बरं देऊ जी काही कृती करणार ती विधायक आणि ठोस हवी बरं..

‘चल उडी जा रे पंछी.. कि अब ये देश हुआ बे़गाना’ असं तुम्ही आम्हाला म्हणायला सांगणार नाही हि एव्हढीच माफक अपेक्षा ठेवतो…

©  श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ “स्वामी निष्ठा…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “स्वामी निष्ठा…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

… काय रे श्वाना तू इथं माणसांच्या गावात!… एव्हढ्या रात्रीत एकट्याने जोर जोराने भों भों करत भुंकत का म्हणून राहिलास?… आधी तुझं ते केकाटणं बंद कर पाहू… मी कोण आहे ओळखंलस का मला?… अरे शेजारच्या जंगल राज्यातील शेर सिंग प्रधानजी आहे मी नव्हे का? आपल्या सिंह महाराजांनी या गावातील माणसाची एक तरी शिकार घेऊन येण्याची आज्ञा केलीय… अरे तिकडं आपल्या जंगलात काही काहीही खायला मिळेनासं झालंय गड्या… जंगल खाद्या बरोबरच आपणच आपल्या दुर्बल रयतेची शिकार करत करत इतके दिवस तग धरला होता.. पण अलिकडे असं लक्षात आलयं कि हळूहळू आपलीच रयतेची संख्या खूपच कमी कमी होऊ लागलीय… रोडावलीय… म्हणून आपल्या महाराजांनी आता आपल्या रयतेची शिकार इथून पुढे बंद असा फतवा काढला आहे.. तुला काय हे ठाऊक कसे असणार म्हणा… तिथं जंगलातल्या आपल्या माणसांची भुके कंगाल झालेले हाल काय असतात ते… तू इथं या माणसांच्या घोळक्यात माणसळाला गेला आहेस ना त्याच्याच एक दुष्परिणाम असाही झालाय की हि निर्दयी माणसांची जात राजरोसपणे जंगलात घुसून दिसेल त्या प्राण्यांची शिकार करत सुटलेत.. जंगलतोड तर अहोरात्र करत असतातच शिवाय त्यात अशी सावज शिकार करत फिरतात.. आपली स्तिथी न घर का न घाट का करून टाकलीय… जरा कुठे बंदूकीच्या गोळ्यांचा ठो ठो आवाज जंगलात घुमतो न घुमतो तोच झाडावरचे पक्षीगण जसे पंख फडफडवीत नि भीतीच्या कलकलटाने अख्खं जंगल भिरभिरत राहतात नि सगळ्यांना धोक्याची सुचना देतात.. तेव्हा सिंह महाराजांसकट आमची सगळ्यांची कि रे चड्डी पिवळी पडते… थरथर अंग भीतीने कापत जाते आणि आधी स्वताचा बचाव करण्यासाठी संरक्षित जागा शोधत बसावी लागते.. मग उरलेल्या जनतेकडे लक्ष देण्याची बुद्धी येते… अरे जंगलातले हिंस्र प्राण्यांचा समुह कळीकाळालाही कधीही न भिणारा.. तर आपल्या भीतीने इतरांच्या जीवावर शक्तिशाली हल्ला करणारे आपण आता असे गलितगात्र होऊन गेलोय… आता आपण नाही तर हा माणूस नावाचा प्राणी आपल्या पेक्षाही दसपटीने हिंस्र झालाय… आपल्या अस्तित्वाचा प्रश्नच ऐरणीवर आलाय… त्यामुळे आर या पार मग जशाच तसं लढा करताना या गनिमी काव्याचा आधार घेऊन अश्या अंधारातून त्या माणसांच्या गावात शिरून एक तरी शिकार करायचीच आणि त्या भुकेलेली, दुर्बल झालेल्या जनतेच्या भुकेची व्यवस्था करायची… असा एव्हढा मोठा जीवावर उदार होऊन धोका स्वीकारायला माझ्या शिवाय दुसरं कोण तयार होणारं… म्हणून मीच तो विडा उचलला आणि आज पहिल्यांदा इकडच्या माणसांच्या गावाकडे वळलो.. काल परवा पर्यंत त्या पलिकडे च्या माणसांच्या गावाकडे आठवड्यातून दोन तीनदा जात होतो.. पण माझ्या येण्याने त्यांच्यातील दोनचार जणं नाहीशी झालेली त्यांना त्यांच्या कसल्याशा यंत्रात दिसलं आणि जी त्याच्यांत घबराट निर्माण झाली म्हणतोस… आता रात्र रात्रभर खडा पहारा ठेवून एक दोन बंदूकधारी त्यांनी तैनात ठेवले की… अशी ती डोकेबाज माणसांची जात… पण आपणही काही कमी नाही बरं.. तल्लख बुद्दीचं दान आपल्यालाही मिळालयं… मग दिला सोडून तो माणसांचा गाव नि आजपासून दूसरा नवा गावाकडे मोर्चा वळवला… माणसांना जसं जंगलाची कमतरता नाही तशी आपल्याला माणसांच्या गावाचीही कमतरता नाही बरं… अरे तु बघितंल नसशील पण आजही माणसांच्या मनात आपल्या बद्दल खूप खूप भीती आहे बरं… आता त्यांनी रात्री अपरात्री शिकारीसाठी जंगलाकडे येणं हळूहळू बंद केलयं पण आपण आता जंगल सोडून त्यांच्याच गावातच हल्ला करायला येत असतो.. करावं तसं भरावं असते रे… आमच्या जीवन मरणाचा प्रश्न आम्हालाच सोडवायला लागणार नाही का… आता कशी नवी नवी युक्त्या काढून आम्हाला पकडून जेरबंद करायला धावू लागलेत… आम्ही असे तसे त्यांना सापडतोय होय वाट बघ… ते जाऊ दे… हे नंतरही तू जंगलात परत आलास की समजेलच.. या बोलण्यात आता जास्त वेळ नको घालवायला… हं तर तू मला मदत कर कुठल्या घरात माणसांची संख्या कमीत कमी आहे आणि डरपोक स्वभावाची आहेत. ती घरं ती माणसं मला दाखवशील.. मी मग दोन तीन दिवसाड येऊन एकेकाची शिकार करून घेऊन जाईन… या कामी तू मला मदत केल्याबद्दल आपले सिंह महाराज सैन्याचा सेनापती पद तुला बहाल करतील… आणि आपलं जंगल राज्य अधिक सुरक्षित राहील त्याचा विस्तार वाढत जाईल… हं मग श्वानमित्रा करतोस ना मदत मला.. म्हणजे माझं काम फारच सोयीचं होईल… चल चल बघू.. “

” हे पहा जंगलराज प्रधानजी महाशय तुम्ही आला तसे मुकाट्याने परत फिरा… तुम्हाला इथं माणसांची शिकार बिलकुल करता येणार नाही.. कारण मी इथला त्यांचा रखवालदार आहे… आमचा तुमच्या त्या जंगल राजशी सुतराम संबंध नाही.. आमच्या कैक पिढ्या इथं या माणसांच्या गावात राहून माणसाळाल्या आहेत.. आम्ही त्याचं मीठ खाल्लेल आहे.. तेव्हा इमानी पणाला जागणं हेच आमचं कर्तव्य ठरतं… सारं गावं माझ्यावर विश्वास ठेवून गाढ झोपेत असतं तेव्हा कोणी एक तस्कर किंवा तुमच्यासारखे जंगलातले हिंस्र प्राणी या गावात येण्याची हिंमत धरत नाहीत… आणि कदाचित तुम्हाला ठाऊक नसेल मी असा तसा जंगली शिकारी कुत्र्या पैकी नसून जर्मन शेफर्ड कुत्र्याच्या वंशातला आहे… मलाही गावात वट आहे.. मी पहाऱ्याला असताना इथं वाकड्या मार्गाने येण्याची कुणाची माय अजून तरी व्यालेली नाही… तेव्हा मला वाटतं तुम्ही आता फारवेळ हिथं न घालवता ताबडतोब दुसऱ्या ठिकाणी निघून जावं हेच बरं.. यात तुमचेच हित आहे.. तेव्हा माझं ऐका… “

” अरे जर्मन शेफर्ड असलास तरी शेवटी तू एक य:कश्चित् श्वान आहेस.. आणि तुझ्या असल्या पोकळ धमकीला मला घाबरण्याचं काही एक कारण नाही… हे पहा तुला जर मला मदत करायची नसेल तर तु मुकाट्याने बाजूला हो.. मला माझ्या सावज टिपून शिकार करण्यास अटकाव करू नकोस.. आणि त्याहूनही जर तू माझ्या वाटेत अडथळा करणार असशीलच तर सगळ्यात आधी मला तुझीच शिकार करावी लागेल… एकदाचा तुझाच कायमचा बंदोबस्त केला म्हणजे माझा मला मार्ग निर्वेध होईल.. कसं.. त्या माणसांनी तुला पाळून तुझी खरी ओळख च विसरायला लावली आहे.. चारपायाचां पशू तू आणि दोन पायांच्या माणसांपुढे आपलं शेपुट हलवतं आपल्या एकनिष्ठेची टिमकी वाजवून दाखवतोस आणि ते ही का तर तुझ्या पुढे टाकलेल्या त्या चतकोर भाकर तुकड्या साठी.. का कशासाठी इतकी लाचारी… का तुझ्या अंगात धमक नाही का तुझ्या तंगड्यात चपळपणा नाही… स्वताची भुक स्वता भक्ष्य शोधून आणण्याची स्वावलंबी वृत्ती नाही.. परावलंबित्व स्विकारून इतकं भिंधेपण तुझ्या रोमारोमात भिनलयं पहा कसं.. आधी स्वताची नीट ओळख करून घे.. त्या मतलबी ढोंगी आणि दगाबाज माणसाच्या नादाला लागू नकोस.. माझं ऐक.. अरे शेवटी आपलं जंगल राज्य हेच सुखाचं आणि सुरक्षित असतयं बरं.. तेव्हा यावर मी शिकार करून येईपर्यंत गंभीरपणे विचार कर आणि मग आपण जंगलाकडे जाऊया… कसं… “

” नाही नाही ते कदापि शक्य होणार नाही.. आता आम्हा कुत्र्याचं जगणं हे जीना यहां मरना यहा इसके सिवा जाना कहा.. असं कायमस्वरूपी ठरलेलं आहे.. जिथलं मिठं खाल्लं तिथे एकनिष्ठ राहायचं हेच आमच्या वाडवडिलांच्या पासून शिकवण मिळाली आहे.. आणि घेतलेल्या वसा प्राणपणाने जतन करायचा.. मग भले त्यात आपल्या जीवनाची आहूती पडली तरी चालेल.. ते जीवन सार्थकी लागले म्हणून समजलं जाईल.. तेव्हा आपण इथं निष्कारण बडबड करण्यात वेळ न दवडता तुम्ही आलात तसे परत जा.. आणि या गावातली शांतता अढळ राहू द्या… “

” मी इतका वेळ तुला बऱ्याबोलानं समजावून सांगितलं तरी तुला आपल्या या प्रधानजीच ऐकायचं नाही ठरवलसं तर ठिक आहे आज तुझ्या शिकारी पासूनच शुभारंभ करतो… ” जबरदस्त ताकदीच्या वाघाने त्या जर्मन शेफर्ड कुत्र्याच्याअंगावर झेप घेतली दोघांनी झुंज देण्यास उलटं पालटं होत एकामेंकाच्या उरावर बसत हाताच्या पंजाने एकमेकाला ओरबाडत आणि तोंडाने मोठ मोठ्याने चित्कारत झटापट करत राहिले… त्यांच्या या गदारोळाने अख्खा गाव जागा झाला.. आ वासून जो तो समोरचं दृश्य पुतळ्या सारखा स्तब्ध होऊन बघत राहिला.. पण पुढे जाण्याची एकाचीही शामत नव्हती… त्या वाघाच्या आणि शेफर्ड कुत्र्याच्या झटापटीत शेफर्ड कुत्र्याने जीवाची बाजू लावून लढत दिली पण अखेर त्या वाघाच्या ताकदीपुढे त्याचा टिकाव लागला नाही.. त्याचे त्राण संपत आले तसे तो ढिला पडला… ते पाहताच वाघाने त्याला आता आपल्या कराल दाढेत धरून त्याचे तंगडे ओढत नेऊ लागला.. पण तिथं जमलेल्या माणसांची गजबज पाहून त्या वाघाने तिथून लवकर बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.. शेफर्ड कुत्र्याच्ं तंगड तोंडात घट्ट धरून तो धावत सुटला… पण त्याच वेळी त्या शेफर्ड कुत्र्याच्या अंगात एक विज सळसळत गेली आणि त्यानं तेव्हढ्याच जोरजोराने आपल्या अंगाला असे काही हिसडे दिले कि त्या पळणाऱ्या वाघाला ने डरकाळी फोडताना त्या शेफर्डचं धरलेलं तंगड सोडून दिल्याचं त्याच्या लक्षात आलं नाही.. तो तसाच आधी जंगलाकडे पळत सुटला… वाघ गेलेला पाहून सगळे गावकरी त्या शेफर्ड भोवती जमा झाले आणि मग जो तो त्याचं कोडकौतुक करू लागला… शेफर्ड च्या अंगावर काही जखमा झाल्या होत्या त्याच्या कडे त्याने लक्ष दिलं नाही.. त्याला ठाऊक होतं आता माझी काळजी घेणारी माझी माणसं ते सारं पाहतील असा विश्वास त्याला होताच… आज आपण स्वामीनिष्ठेला जपलो याचं समाधान त्याच्या चेहऱ्यावर झळकत राहिलं…

©  श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ “कल्पवृक्ष…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “कल्पवृक्ष…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

अस्मादिकांच्यां जन्मदात्यांनी बाहेरुनच आल्या आल्या तोफ डागली…

गध्येपंचवीशी पर्यंत तुमच्या शिक्षणात गुंतवणूक केली आहे..

तीला आता चांगली भरभरून फळं आणून दाखवा बरं..

म्हणजे पिताश्रींचे या जन्मीचे पांग फेटलेच म्हणून समजा..

कुठे ते दिनानाथ निस्वार्थपणे आपल्या लेकीसाठी गाण्याचा कल्पवृक्ष लावून गेले…

आणि कुठे आमच्या घरातले…

थर्ड क्लास मधे इतिहास घेऊन बी. ए. च्या पदवीच्या भेंडोळीला…

चणेफुटाणे वाला सुद्धा बाजारात किंमत देत नसताना..

तिथं वरावरा नोकरीच्या दारात हिंडून नकाराचा कटोरा भरलेला घेऊन..

मुळातच बुद्यांकाचा अभाव असलेली माझी मस्तकपेटी…

पिताश्रींच्या अवास्तव अपेक्षेच्या ओझ्याखाली चपटी झाली…

त्यांनी मलाच आपला कल्पवृक्ष मानून घेतला होता की कोण जाणे…

अहो इथे साधे नैसर्गिकरित्या लागणारे नारळ लागण्याची वानवा…

आणि पिताश्रींची तर नारळच काय तर कल्पिलेल्या सगळ्याच फळांची अपेक्षा धरलेली…

छान नोकरी… सुशील सुन… वन बिच एच के.. सायकलच्या ठिकाणी स्पेलंडर… वगैरे.. वगैरे..

इतनो साल कि जो इन्व्हेस्टमेंट की थी उसका मुनाफा लेना तो पडेगाही ना…

सगळीकडे सगळं त्याचंच चाललेलं…

पण मला काय वाटतं तिकडे…

तुला काय लेका कळतंय याच प्रश्नात मला अडवलेला..

पण देवाची करणी नि नारळात पाणी तशी

किमया घडली नि अस्मादिकांना पोस्टमनची नोकरी मिळाली..

दोनवेळेच्या जेवणाची भ्रांत मिटली.. नि आयुष्याची चिंता..

पिताश्रींना जरा हायसं वाटलं पोरगं हाताशी आलं..

तसं दोनाचे चार हात वेळेसरशी झाले तर लेकराचा संसार रांगेला लागेल..

पण कल्पवृक्ष त्यांच्या हयातीत मोहरला नाहीच…

खूप उशीराने सारं सुरळीत पार पडत गेलं..

… पोस्टमास्तरचं प्रमोशन.. घराला घरपण आणणारी पत्नी… दारी मध्यमवर्गीय श्रीमंतीची इलेक्ट्रॉनिक दुचाकी.. ओसंडून वाहणारी घरातली सुखाची अनेक साधनं.. आणि वंशाचं नाव पुढे नेणारा दिवटा…

बस्स यही थी तमन्ना माझ्या पिताश्रींची…

एक दिवस दिवट्या चिरंजीवांनी शाळेतून एक चित्र रेखाटून आणलेलं दाखवलं…

कल्पवृक्षाच्या झाडाला नारळाबरोबर केळीचे घड लगडलेले दाखवले..

अरे वेड्या नारळाच्या झाडाला फक्त नारळच लागतील… केळी कशी येतील…

… पप्पा हा तर कल्पवृक्ष आहे. आंबा, फणस सुध्दा त्यासोबत काढणार होतो..

अरे वेड्या नुसत्या कल्पना करून आपल्याला हवं ते मिळत नसतं.. तुला कोणी सांगितलं हे..

आजोबांनी… काल स्वप्नात आले होते.. मला म्हणाले, तुझ्या नजरेतून हा फळलेला फुलेला कल्पवृक्ष पाहून समाधान वाटलं… आता तू तुझ्या पप्पांचा कल्पवृक्ष झाला पाहिजेस… त्याची तेव्हा सत्यात न उतरेली स्वप्न तुलाच पूर्ण करून दाखवायची आहेत…

… दूरवरून

कल्पवृक्ष कन्येसाठी लावूनिया बाबा गेला…

लताचं भाव व्याकुळ गाण्याचे सुर…

अस्मादिकांच्यां कानावर आले… नि

क्षण दोन क्षणाची धुंदीत माझे तनमन हरवले

सारखं सारखं राहून मनात दाटून यायचं…

त्यांचा कल्पवृक्ष फळला फुलेला… यालं का हो बाबा बघायला…

आणि तो वंशाचा दिवा माझ्याकडे पाहून मंदस्मितात तेवत राहिला…

©  श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ “राजं…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “राजं…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

आई मी आता मोठा झालोय बघ.. करून येऊ दे कि मला एकट्याने जंगलची सफर… घेऊ दे कि मला शिकारीचा अनुभव… कळू दे इतर प्राण्यांना या छोट्या युवराजची काय आहे ती ताकद… जंगल राजांच्या दरबारात मलाही जायचं राजांना मुजरा करायला… आलो आहे आता तर सामिल करुन घ्या मला तुमच्या सैनिक दलात.. मी लहान कि मोठा याचा फारसा करू नका विचार तुम्ही खोलात… बऱ्या बोलानं जे तुमचा हुकूम पाळणार नाहीत… त्यांची काही मी खैर ठेवणार नाही.. जो जो जाईल विरोधात या राजाच्या त्याचा त्याचा करीन मी फडशा फडशा… मग तो कुणी का असेना दिन दुबळा वा बलवान… त्याला राजा पुढे तुकवावी लागेलच आपली मान… राजाच्या पदरी मुलुखगिरीचा होईन मी शिपाईगडी.. स्वारीला जाऊन लोळवीन ना एकेका शत्रूची चामडी.. गाजवीन आपली मर्दुमकी मग खूष होऊन राजे देतीलच मला सरदारकी… मग दूर नाही तो दिवस चढेल माझ्या अंगावरती झुल सरसेनापतीची.. बघ आई असा असेल तुझ्या लेकराचा दरारा… भितील सारी जनाता कुणीच धजणार नाही माझ्या वाऱ्याला उभा राहायला.. मिळेल मला मग सोन्या रूप्याची माणिक मोत्यांची नि लाख होनांची जहागिरी.. जी माॅ साहेब म्हणतील तुला सदानकदा कुणबिणी वाड्यात करताना चाकरी… ते दिवस नसतील कि फार दूरवर बघ यशाचे आनंदाचे नि सुखाचे आपले दारी गज झुलती.. आई मी आता मोठा झालोय बघ करू दे कि मला राजाची चाकरी… “

“अरे तू अजून शेंबडं पोरं आहेस.. अजूनही तुझं तुला धुवायचं कळतं तरी का रे… नाही ना.. मग आपण नसत्या उचापतींच्या भानगडी मध्ये नाक खुपसू नये समजलं… आपला जन्म गुलामगिरी करण्यासाठी झालेला नाही.. ताठ मानेने नि स्वतंत्र बाण्याने जगणारं रे आपलं आहे कुळ… जीवो जीवस्य जीवनम हाच आहे आपल्या जगण्याचा मुलमंत्र… पण म्हणून काही उठसुठ विनाकारण आपण दीनदुबळ्यांची शिकार करत नाही… जगा आणि जगू द्या हाच निर्सागाचा नियम आपण पाळत असतो… आणि अत्याचार कुणी करत असेल इथे तर त्याला सोडत नसतो.. पण जे काही करतो ते स्वबळावर… कुणाच्या चाकरीच्या दावणीला बांधून गुलामगिरीचं जिणं कधीच जगत नाही… त्यांनी म्हटलं पाहिजे असा कनवाळू राजा दुसरा आम्ही कधी पाहीलाच नाही… असा ठेवलाय आपण प्रेमाचा दरारा सगळ्या जंगलाच्या वावरात… म्हणून तर आजही आपलं आदरानं नावं घेतलं जात घराघरात… तुला व्हायचं ना मोठं मग हे स्वप्न तू बाळगं आपल्या उराशी… राज्यं असलं काय नि नसलं काय काही फरकच पडत नसतो आपल्याला असल्या टुकार, लबाड, विचाराशी… आपणच आपल्याला कधी राजे म्हणवून घ्यायचंय नाही ते रयतेने विनयाने, आदराने म्हणत असतात ते पहा ते निघालेले दिसताहेत ना ते आमचे राजे आहेत… समजलं…

©  श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ – तुझ्याविना… – ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

“तुझ्याविना…” ☆ श्री आशिष  बिवलकर ☆

तुझ्याविना…..

जीवन पुढे खूप आहे… पण तूझ्या विना जगण्याचा यक्ष प्रश्न आहे.. रडून रडून किती दिवस रडणार… आता अश्रू ही सुकले आहेत कारण तो /ती गेली आहे पण उरल्या संसाराच्या जवाबदाऱ्या तिला /त्याला पार पाडायाच्या आहेत…

आयुष्य किती शिल्लक आहे यांची माहित नाही.. जुन्या आठवणीत रमलो /रमले तर वर्तमान कठीण आहे.. वर्तमाना अस्तित्व नष्ट करेल… अस्तित्वाची लढाई एकट्याने लढायची आहे

आयुष्यात पुढे काय ताट वाढल आहे.. काय आव्हान आहेत.. ते सर्व अनामिक आणि खडतर असणार पण जीवन गाडं दुःखच्या चिखलात रुतले तरी ते आपल्याच प्रयत्नांनी बाहेर काढायचा आहे…. काळ लोटायचा आहे…

जो वर तो / ती सोबत होती… त्याच्या संगतीचा उजेड होता तेव्हा त्या उजेडाची किमंत कळली नाही पण अचानक तो उजेड गेला आणि पायाशी अंधार दाटलाय… चाचपडत चाचपडत पुढे जात ध्येय गाठणे हेच प्रारब्ध आहे…

जोवर सोबत.. सहवास होता तो वर ती सुखसुमने होती पण त्या सुख

सुमनांची आता निर्माल्य झाली आहेत.. त्या सुख सुमनांचा गंध आता हरवला आहे…. एखादी वाऱ्या

ची झुळूक आली तरी त्या तरल.. हलक्या फुलक्या आठवणी आत आठवून कसं चालेल… आये है दुनिया में तो जीना ही पडेगा…

जोवर श्वास चालू आहे तो पर्यंत जगण्याची धडपड, इच्छा शक्ती ठेवायची आहे.. आव्हानावर मात करायची आहेत… कर्तव्य ती पार पाडायची आहेत… पण जेव्हा धडधड थांबेल तेव्हा त्या सावलीला मला अर्ध्या वाटेवर का सोडून गेलीस /गेलास हा प्रश्न विचारायला गाठायाचं आहेत… भेटायच हा शब्द मुद्दामहून टाळला आहे.. कारण त्याच्या/तिच्या नंतर जगाचा सामाना त्याला /तिला करायचा आहे…

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares