मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘ब्रेन बेड…’ भाग – 1 – डाॅ. प्रदीप सुरवशे ☆ प्रस्तुति – सुश्री पार्वती नागमोती ☆

? मनमंजुषेतून ?

☆ ‘ब्रेन बेड…’ भाग – 1 – डाॅ. प्रदीप सुरवशे ☆ प्रस्तुति – सुश्री पार्वती नागमोती ☆

पुण्‍याच्‍या कोलंबिया एशिया हॉस्‍पिटलला न्‍युरोसर्जरी कन्‍सल्‍टंट म्‍हणून जॉईन होऊन मला एखादाच महिना झाला असेल. मुंबईच्‍या जे. जे. हॉस्‍पिटल मधून न्‍युरोसर्जरीची पदवी संपादन करुन, तिथे केलेल्‍या ५००० पेक्षा अधिक शस्त्रक्रियांचा प्रदीर्घ अनुभव घेऊन मी पुण्‍याला आलो होतो.

शनिवारी रात्री पूर्ण परिवारासोबत जेवण चालू होते. तेवढ्यात माझा फोन खणखणला. कोलंबिया एशियाच्‍या इमर्जन्‍सी रुममधून फोन होता. डॉक्‍टर बोलत होते. “सर, एका २० वर्षाच्‍या तरुणाला त्याचे नातेवाईक घेऊन आलेत. तीन तासापूर्वी त्याची गाडी स्‍लीप होऊन तो रस्‍त्‍यावर पडला होता. डोक्‍याला मार लागला आहे. सुरुवातीला त्‍याला जवळच्‍या हॉस्‍पिटलमध्‍ये नेले होते. पण त्‍यांना तिथे कळले की, तो  जवळजवळ ‘ब्रेन डेड’ आहे. पुढे काही करुन फार उपयोग होणार नाही. त्‍यामुळे ते पेशंटला इकडे घेऊन आलेत.” 

‘ब्रेन डेड’ म्‍हणजे ज्‍या पेशंटचा श्‍वास बंद झाला असून मेंदूचे कार्य थांबलेले आहे व फक्‍त हृदय चालू आहे असा पेशंट ! मी डॉक्‍टरना विचारले की, “आता काय स्‍टेटस आहे? ” त्‍यांनी सांगितले की, ” सर त्‍याचा श्‍वास बंद पडलेला होता म्‍हणून आम्‍ही कृत्रिम श्‍वासाची नळी बसवली व व्‍हेंटिलेटरने श्‍वास देतोय. त्‍याचे दोन्‍ही प्‍युपिल्‍स (बुबुळ) डायलेट (पूर्णपणे प्रसरण पावलेले) झालेले आहेत.” सहसा नॉर्मल माणसामध्‍ये डोळ्‍यांच्‍या बुबुळावर लाईट पडला की, ती आकुंचन प्रसरण पावतात. (परंतू ब्रेन डेड पेशंटमध्‍ये ती रिअ‍ॅक्‍शन दिसत नाही.) ” सर, मी ब्रेनचा सी.टी. स्‍कॅन करून वॉट्सअ‍ॅपवर पाठवला आहे.”

मी स्‍कॅन उघडून पाहिला तर पेशंटच्‍या मेंदूमध्‍ये उजव्‍या बाजूला मोठा रक्‍तस्त्राव झालेला होता व पूर्ण मेंदू डाव्‍या बाजूला सरकला होता. स्‍कॅन बघितला आणि मी हातातला घास तसाच ताटात ठेऊन ताटावरून उठलो. कपडे बदलत बदलतच मी त्‍यांना सूचना दिल्‍या व ताबडतोब पेशंटला ऑपरेशन थिएटरमध्‍ये घेण्‍यास सांगितले. गाडीची चावी घेऊन पळतच मी घराबाहेर पडलो. तोच पप्‍पा म्‍हणाले, ” मी येतो सोडायला, तुम्‍ही केसच्‍या नादात गाडी फास्‍ट चालवाल !” सगळेजणं जेवणावरून उठले. पण मी त्‍यांना सांगितलं, ” काळजी करू नका. मी गाडी सावकाश चालवतो.” मला १० वाजता फोन आला होता. केवळ ०७ मिनिटातच मी हॉस्‍पिटलमध्‍ये पोहोचलो. गाडी मी इमर्जन्‍सी रूमच्‍या दारापर्यंत नेवून तशीच सोडून दिली. दार उघडे, चावी गाडीलाच आणि मी पळतच हॉस्‍पिटलमध्‍ये घुसलो. सिक्‍युरिटी गार्डनी सांगितले, ” सर पेशंट वरती आय.सी.यू. मध्‍ये शिफ्‍ट केलाय.” लिफ्‍टसाठी न थांबताच जिना चढून मी पळतच आय.सी.यू. मध्‍ये पोहोचलो. पेशंटला बघितलं तर त्‍याची दोन्‍ही बुबुळं प्रसरण पावलेल्‍या अवस्‍थेत होती. श्‍वास पूर्णपणे बंद पडलेला  होता आणि व्‍हेंटिलेटर द्वारा श्‍वास देण्‍यात येत होता. 

नातेवाईकांशी बोलणे गरजेचे होते. मी त्‍यांना म्‍हणालो, ” पेशंट वाचण्‍याचे चान्‍सेस ५% पेक्षाही कमी आहेत. तरी देखील ऑपरेशन करावं हा माझा निर्णय आहे. कारण पेशंट तरुण आहे व मार लागून फार वेळ झालेला नाही. पेशंटला जगण्‍याची एक संधी द्यायला हवी. थोडा देखील वेळ वाया घालवला तर पेशंट हाती लागणार नाही.तुम्‍ही ठरवा ! “

नातेवाईक चांगलेच हडबडले होते.त्यांचा अजूनही विश्‍वास बसत नव्‍हता. तीन तासांमध्‍ये सगळं होत्‍याचं नव्‍हतं झालं होतं ! ते कोणताही निर्णय घेण्याच्या परिस्थितीत नव्हते, पण त्‍यांची परवानगी येईपर्यंत मला थांबणं शक्‍य नव्‍हतं. मी जोरात ओरडलो, ” पेशंट ताबडतोब ऑपरेशन थिएटरमध्‍ये घ्‍या.” आजूबाजूला १०-१५ स्‍टाफ उभे होते. सर्वजण माझं ते रुप पाहून हादरले होते. बेडसकटच पेशंट ऑपरेशन थिएटरमध्‍ये शिफ्‍ट केला. १० वा. १० मि. नी पेशंट ऑपरेशन टेबलवर होता.  जनरली ऑपरेशन करण्‍याआधी इन्‍फेक्‍शन कंट्रोल म्‍हणून पेशंटचं डोकं बिटाडीन आणि सॅव्‍हलॉनने १० मिनिटं स्‍वच्‍छ धुतलं जातं. तसेच ऑपरेशन करणारे डॉक्‍टर व नर्स देखील ७ मिनिटे वॉश घेतात आणि मगच सर्जरीला सुरूवात होते. पण ती १७ मिनिटे सध्‍या मी देऊ शकत नव्‍हतो कारण मेंदूमध्‍ये प्रेशर खूपच वाढत होते, आणि अशा अवस्‍थेत एका सेकंदाला हजारो न्यूरॉन्‍सची(मेंदूच्या पेशी) डेथ होते(मरण पावतात). मेंदूमधील या मेलेल्या पेशी कधीही रिजनरेट (परत तयार )होत नाहीत. त्‍यामुळे लवकरात लवकर ऑपरेशन करून झालेला रक्‍तस्त्राव बाहेर काढणे व मेंदूवरील प्रेशर कमी करणे गरजेचे होते. वॉर्डबॉयनी पटकन पेशंटचे केस कापले आणि तोपर्यंत मी वॉश घेऊन आलो. सिस्‍टरना सांगितले, “ऑपरेशनच्‍या साहित्‍याची ट्रॉली लावत बसू नका. सर्व साहित्‍य पसरून ठेवा. लागेल तसे साहित्‍य मी घेतो.” ऑपरेशन थिएटरमधील सर्वजण अतिशय वेगाने काम करत होते, जणू काही प्रत्‍येकाला चार चार हात फुटले होते. आता प्रश्‍न होता भूलतज्ञांचा. त्‍यांना यायला ४-५ मिनिटे लागणार होती. आणि ते आल्‍यावरही पूर्ण भूल देण्‍यासाठी १०-१५ मिनिटे वेळ गेलाच असता, त्‍यामुळे मी पूर्ण भूल न देता जागीच भूल देऊन (लोकल अनेस्‍थेशिया) ऑपरेशन सुरू केले. मी कवटी ड्रील करण्‍यास सुरूवात केली आणि तोपर्यंत भूलतज्ञ आले. सहसा भूलतज्ञांनी परवानगी दिल्‍याशिवाय कोणताही पेशंट ऑपरेशन थिएटरमध्‍ये घेतला जात नाही, परंतू इथे सर्वच नियमांचे उल्लंघन झाले होते. पण त्‍यांनी प्रसंगाचे गांभीर्य ओळखून मला एक शब्‍दही न विचारता पेशंटचा ताबा घेतला. मी कवटी उघडून रक्ताच्या गाठीपर्यंत पोहोचलो. साधारणपणे अर्धा लिटर रक्‍त गोठून रक्‍ताची गाठ तयार झाली होती व मेंदूवर प्रेशर निर्माण करत होती. मी रक्‍ताची गाठ काढून टाकली व मेंदूच्‍या रिस्‍पॉन्‍सची वाट बघू लागलो. पुढच्‍या १-२ मिनिटात दबलेला मेंदू पूर्वस्‍थितीत आला आणि मेंदूचे पल्‍सेशन (हालचाल) दिसू लागली. आता मी डोके वर काढून घड्याळाकडे पाहिले तर १० वा. २७ मि. झाली होती. म्‍हणजेच मला फोन आल्‍यापासून केवळ २७ मिनिटात ऑपरेशन पूर्ण होऊन त्‍याच्‍या मेंदूवरील प्रेशर काढून घेतले होते. आता मी पूर्ण टीमला रिलॅक्‍स होण्‍यास सांगितले व उर्वरित ऑपरेशन पूर्ण केले.

ऑपरेशन पूर्ण झाले होते. परंतू अजूनही मन बैचेन होते. काहीतरी चुकत असल्‍याची जाणीव होत होती. आज माझा सिक्‍स्‍थ सेन्‍स मला सांगत होता की काहीतरी अपूर्ण आहे. म्‍हणून मी लगेचच सीटी स्‍कॅन करून बघायचे ठरवले. पेशंटला ओ. टी. मधून डायरेक्‍ट सी.टी.स्‍कॅन युनिटमध्‍ये शिफ्‍ट करण्‍यात आले. आणि माझा अंदाज खरा ठरला. आता पेशंटच्‍या मेंदूच्‍या दुसर्‍या बाजूला (डाव्‍या बाजूला) रक्ताची तेवढीच मोठी गाठ तयार झाली होती. पहिल्‍या स्‍कॅनमध्‍ये हा रक्‍तस्त्राव अजिबातच दिसला नव्‍हता. आता दुसरे ऑपरेशन करून तो रक्तस्त्रावही काढणे गरजेचे होते. मी पेशंटचे बुबुळ परत तपासले, त्‍यामध्‍ये कोणतीही रिअ‍ॅक्‍शन दिसत नव्‍हती.आता मला प्रश्‍न पडला की जवळपास ब्रेन डेड झालेल्या अशा पेशंटवर दुसरी सर्जरी करणे योग्‍य आहे का? पण मी घेतलेली जबाबदारी पूर्ण करावयाचे ठरवले. नातेवाईकांना सांगितले की, ताबडतोब दुसरे ऑपरेशन करावे लागेल. पेशंटचे नातेवाईक आधीच भेदरलेले होते.

— क्रमशः भाग पहिला 

लेखक : डॉ. प्रवीण सुरवशे

कन्‍सल्‍टंट न्‍युरोसर्जन, कोलंबिया एशिया हॉस्‍पिटल, पुणे 

फोन : ७७३८१२००६०

प्रस्तुती : पार्वती नागमोती 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘वंगण…’ – सौ विदुला जोगळेकर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? मनमंजुषेतून ?

☆ ‘वंगण…’ – सौ विदुला जोगळेकर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

सकाळच्या गडबडीत नेमकी ट्रॉली बाहेर ओढताना अडकली…धड ना आत धड ना बाहेर…वैतागच…नेमके चहा साखरेचे डबे आत अडकले…! आतल्याआत चडफड नुसती…आता सुतार बोलवावा लागणार…एवढ्याशा कामाकरता तो आढेवेढे घेणार…नाहीतर बजेट वाढवून या कशा मोडीत काढायला झाल्यात याची गाथा वाचणार…आजकाल मौड्यूलर किचन कसं जोरात चाललय…माझी इकडे कामं आणि तिकडं कामं…सगळं क्षणात मनात आणि डोळ्यासमोरुन तरळूनच गेलं. जोर देऊन जरा ओढून बघितलं तर कड्कट् आवाज काढलाच तिने. लादी पुसायला आलेल्या मावशी म्हणाल्या, खोबरेल तेलाचं बोट फिरवा ताई..कडेच्या पट्टीवर…सरकेल…तात्पुरते तरी निभावेल…!चांगली आयडिया… मी पट्कन तेलाचं बोट फिरवलं…दोन मिनिटांनी ट्रॉली मवूसरपणे आतबाहेर डोकावली…कसलं भारी काम झालं एकदम ! मी एकदम आनंदाने तिला धन्यवाद देत म्हणलं..” बरं झालं बाई वेळेत आलीस….नाहीतर… चहा पावडर विकत आणावी लागली असती…” ती हसली…” वंगण लागतय ताई…थेंबभर पुरतं…पण लागतं कधीमधी…ते मिळालं की सगळं सुरळीत होऊन जातं बघा क्षणात !”

खरंच…वंगण लागतं…!

फक्त मशीन,वस्तूंनाच नाही तर माणसालाही… अगदी त्याच्या देहाइतकच मनालाही,अगदी नात्यांनाही वंगण 

आवश्यक आहे. चार चांगल्या शब्दांचं, आश्वासक स्पर्शाचं, सदिच्छांचं, विचार वाचनाचं, सूरमैफिलींच, श्रद्धा भक्तीचं, नजरेतल्या भावाचं, योगनिद्रेचं, कलाकल्पनेचं…!की जे मनाला मोडकळीस येण्यापासून वाचवतं. मरगळ येऊन कोरड्या ठक्क पडलेल्या वृत्तीवर हे वंगण पूर्ववत जगण्याकडे अलगद घेऊन जातं.

लहानपणी आजी सगळ्या नातवंडांना ओळीत बसवून चहाबरोबर एरंडेल पाजायची…प्यायचं म्हणजे प्यायचं …कितीही आदळापट केली तरी ती तिचा हेका सोडायची नाही. पोट आतड्याचं ते वंगणच आहे…महिना दोन महिन्याने एकदा घेतलं की पोटाचं काम निर्धोक चालू राहतं…आणि तुम्ही मग आबरचबर हादडायला मोकळे…कानात तेल, नाकात दोन थेंब तूप, डोक्यावर बुदलीभर कोमट तेल… शनिवारी रात्रीचा हमखास वंगणाचा कार्यक्रम कित्येक वर्षे आमच्या पिढीने खरं तर अनुभवला. रात्री झोपल्यावर कधीतरी काशाच्या वाटीने तळपाय घासून द्यायची…शरीरातल्या उष्णतेवरचं तिचं ते वंगण होतं.खरं तर जन्मापासून हे वंगण वेगवेगळ्या रुपात आपली सोबत करत राहतं…आपले शारीरिक, आर्थिक, मानसिक मार्ग निर्धोक करत राहतं. कारण स्निग्धता हा भाव ओतप्रोत या वंगणात भरलेला आहे.

जाईल तेथे मऊपण पेरणं, कोरडेपण, गंज मिटवणं आणि पूर्वस्थितीत आणून सोडणं…. हा (स्व) भावच आहे वंगणाचा !

क्षमा, सोडून देणं, माघार घेणं, प्रसंगानुरूप मदतीला जाणं, हळूवार फुंकर घालणं, स्वच्छ शुद्ध अंतःकरणाने समोरच्याशी शांतपणे बोलणं…हेही नाती जपण्यासाठी लागणारं एक प्रकारचं वंगणच आहे.

वंगण नसतं तर जगात फक्त खडखडाटच ऐकू आला असता, असं मला नेहमी वाटतं…जीवनातले स्निग्धांश संपले तर फक्त कोरडेपण उरेल…आणि कोरडेपण क्षणात भस्मसात होऊन जातं ! त्यामुळे जगण्यात येणारे हरएक प्रकारचे वंगण जपणे, प्रसंगी ते वापरणे फार आवश्यक आहे. निर्जीव मशीनसामग्रीला जिथं त्याचं महत्व समजतं, तिथं तुमच्या आमच्यासारख्या जीवांनी ते जाणलंच पाहिजे….त्याचं जतन केलंच पाहिजे…तर जगणं लयीत..सुसह्य…होत राहील ! हो ना…?

लेखिका : सौ विदुला जोगळेकर

संग्राहिका : सौ उज्ज्वला केळकर 

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ भावाचे माहेरपण… ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ भावाचे माहेरपण… ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे☆

 “हे काय,चक्क स्वतःचा शर्ट स्वतः इस्त्री करतोयस, यावेळी इस्त्रीवाल्याला नाही का द्यायचा..?” अनुने पर्स टेबलावर ठेवत विचारलं आणि ती पाणी पिण्यासाठी किचनकडे वळली देखील,…

अभी जाम मूडमध्ये ओरडला, ” मै मायके चला जाऊंगा तुम देखती रहीयो,..” पाणी पिताना येणारं हसू दाबत..अनुने हातानेच खुणावलं,..आणि घोट गिळत विचारलं, ” नक्की बरा आहेस ना..?”– अभी अगदी फुल मूड मध्ये,..” हम तो चले परदेस,…हम परदेसी हो गये,..”

आता अनु त्याच्याजवळ जात त्याला दटावत म्हणाली,” अभ्या नाटकं नको हं, पटकन सांग काही दौरा आहे का कम्पनीचा,..?”

“ नाही मॅडम मी खरंच माहेरी चाललोय,..पुण्याला..” अनुने लाडाने त्याला पाठीत हलकी चापट देत म्हटलं,..

” ताईंकडे चाललास ना, मग असं सांग ना,.. हे काय नवीन,.. म्हणे माहेरी चाललो,..”

अभिने शर्टची घडी केली, इस्त्री बंद केली आणि तो वळला अनुकडे, तिचा हात हातात घेऊन म्हणाला..” म्हणू दे मला, हा शब्द छान वाटतोय,..यंदा तू माहेरी गेलीस दिवाळीत,.. मग तायडी आणि माझंच राज्य होतं,.. भाऊबीजेला ओवाळलं तिने मला आणि माझ्या हातात तिने हे तिकिटाचं पाकीट ठेवलं,..” मी म्हटलं, ” अग, मला ओवाळणी देतेस काय,.?”

तर ताई म्हणाली,..” ओवाळणी नाही रे, तुला माहेरपणाला बोलावतीये,..”

मी जोरजोरात हसायला लागलो,.. तसं तिने मला जवळ घेतलं..खूप रडली गळ्यात पडून. म्हणाली, ” आई बाबा गेले आणि तू किती मोठा होऊन गेलास अभ्या,..त्यांची उणीव आम्हाला भासू न देता आमचं माहेर जपत राहिलास,..तुझ्या बायकोचं श्रेय आहे त्यात. पण तिला माहेर तरी आहे,..तुला कुठे रे माहेर,..? कधीतरी मनात खोल दडलेल्या आपल्या लहानपणीच्या आठवणी आपण ज्याच्यासोबत जगलो, त्या उजळवण्याची जागा, माहेर असते,..आई बाबा गेले की पुरुषाची ती जागा नक्कीच हरवते ना..मग मला वाटलं आपण माहेरी जाऊन आलं की तुला माहेरी बोलवायचं- म्हणजे माझ्याकडे.. अनु आली की तू निघणार आहेस..तिकीट मुद्दाम बुक करून दिलंय म्हणजे उगाचच म्हणायला नको,..गाड्यांना गर्दी आहे,..मी वाट बघेन तुझी, “ एवढं सांगून तायडी गेली,..

“ आता मी चाललो माहेरी,.. जाऊ ना राणीसरकार,..?”

अनु म्हणाली, “आता मी तुला इमोशनल ब्लॅकमेल करते,..” नको जाऊस ना माहेरी,मला करमत नाही,..प्लिज, आपण मज्जा करू,..थांब ना,..” एवढं बोलून अनु खळखळून हसायला लागली,..तसं अभिने तिला जवळ ओढलं,.. कुजबुजत्या स्वरात म्हणाला, ” खरंच नको जाऊ का ग..?” अनु म्हणाली, ” जा बाबा जा, जिले तेरी जिंदगी,..तुलाही कळेल काय असतं क्षणभर तरी माहेरी जाणं,.. आपल्या विषयी फक्त प्रेम असणाऱ्या कुशीत शिरून येणं,.. मायेचा हात, आठवणींचा पाट सतत गप्पांमधून वाहणं… सगळी भौतिक सुख एकीकडे आणि हे अनमोल सुख एकीकडे असतं,..”

अभि म्हणाला, ” अस्सं….. मग येतोच हे सुख उपभोगून,..”

अनु त्याला बसमध्ये बसवून आली,.. तिला वाटलं, खरंच भारी कल्पना आहे ही, भावाला माहेरपण करायचं,….तिने लगेच स्वतःच्या भावाला फोन लावला,.. “ ये ना दोन दिवस, अभि गावाला गेलाय, मला सोबत होईल तुझी,..” दुसऱ्या दिवशी भाऊ हजर,..

दोन्हीकडे माहेरपण रंगलं,..बहिणीच्या मांडीवर डोकं ठेवून आठवणींच्या गप्पांना ऊत आला,..कधी झरझर डोळे वाहिले तर कधी खळखळाटाने डोळे गच्च भरून आले,..एक नातं घट्ट होतं, ते आणखी विश्वासाने घट्ट झालं,..भावाचं माहेरपण बहिणीच्या अंगणी फुलून आलं.

संग्राहिका: सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ भगवंताने हे जग तुम्हाला खेळायला दिलंय… श्री श्रीकांत कुलकर्णी ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

सुश्री स्नेहलता दिगंबर गाडगीळ

??

☆ भगवंताने हे जग तुम्हाला खेळायला दिलंय… श्रीकांत कुलकर्णी ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

१९८७ साल असेल. पार्टनरशिपमध्ये व्यवसाय सुरु करून ३-४ वर्षं झाली होती. आम्हा तीन पार्टनरपैकी एक पार्टनर विलास भावे छोट्याश्या ऑपरेशनचे निमित्त होऊन गेला. मोठा धक्का होता. पण शो मस्ट गो ऑन. मी आणि माझा पार्टनर श्रीहरी ह्या धक्क्यातून सावरलो. एक वर्षात नवीन जागा घेतली आणि तिथे स्थलांतर करून व्यवसाय वाढवायला सुरवात केली. नव्या जागेत जाताना, आज विलास हवा होता ही खंत होतीच. पण परमेश्वरी इच्छा वेगळीच होती. व्यवसाय वाढत होता. कामगार आणि स्टाफ वाढला, १८-२० पर्यत गेला. संख्या वाढली तशी दर महिन्याच्या ओव्हरहेडचे गणित आणि बँकेचे हप्ते जुळवणे सुरु झाले. ऑर्डर होत्या, पण त्या वेळेत पूर्ण व्हाव्यात म्हणून व्यवसायाला शिस्त आणि सिस्टीम लावणे सुरु होते. आम्हा दोघांचे वय तिशीचे आणि बहुतांश नोकर आमच्यापेक्षा २-३ वर्षेच लहान. दोघे-तिघे तर वयाने मोठेच होते. कधी कधी ताण येत असे. त्या काळात फोनचा नंबर लागायला १०-१० वर्षे लागत. नव्या जागेत OYT special कॅटेगोरीत तब्बल १०हजार रुपये भरून फोन कनेक्शन घेतले. या दहा हजाराची जुळवाजुळव अनेक महिने चालू होती. एकंदर घडी बसत होती. कॉम्प्यूटर नव्याने येऊ लागले होते. त्यासाठी लागणारे UPS आम्ही बनवत होतो. डिमांड होती. डीलर नेटवर्क होते. महिना सधारण ४०-५० UPS विकले जात. इतरही काही प्रॉडक्ट होती. electronic product असल्याने आवश्यक components सहज मिळत नसत. इम्पोर्ट करण्यास बंदी असल्याने अनेक गोष्टी राजरोसपणे स्मगल करून येत. कोणास ठाऊक कसे? पण 

लघुउद्योगांना त्या मिळत. अर्थात विक्रेते सांगतील त्या किमतीत. सभोवताली उद्योगास अनुकूल असे कोणतेच वातावरण नव्हते. पण तरुण वय, काहीतरी करायची जिद्द त्यामुळे जाणवायचं नाही. उद्योग हा अशाच प्रतिकूलतेत करायचा असतो, अशीच ठाम धारणा. त्यामुळे ठीक चालले होते. कधी कधी ताण यायचा पण पुन्हा सर्व विसरून काम सुरू व्हायचे.

नव्या ऑफिसच्या केबिनमध्ये आम्हा दोघा पार्टनरांची टेबले शेजारी होती. दोन खुर्च्यांमध्ये एका स्टुलावर फोन असे. फोनचे मध्ये असणे ही दोघांची सोय होती. एक दिवस सकाळी १०चा सुमार असेल, मी फोनवर कोणाशी तरी बोलत होतो. माझे बोलणे काहीसे लांबत चालले होते. श्रीहरीला देखील कोणाशी तरी बोलायचे असल्याने माझे संपण्याची वाट बघत होता. तेवढ्यात समोर एक भगवी कफनी घातलेले साधारण पन्नाशीचे गृहस्थ येऊन उभे राहिले. ‘कुलकर्णी आहेत का?’ असे विचारते झाले. त्यांना मी हाताने खूण करून थोडे थांबण्यास सांगितले व फोनवरचे बोलणे सुरूच ठेवले. त्यांनी मला उलटी खूण केली- ‘तुमचे चालू द्यात, मी थांबतो. काही घाई नाही.’ कदाचित मी कुणावर तरी रागावलो होतो, आवाज जास्तच चढत होता. फोनवर एका सप्लायरवर उशिरा मटेरियल देण्याबद्दल बहुदा रेशन घेत होतो. बोलता बोलता ५ मिनिटे झाली, १० झाली, १५ मिनिटे झाली. आमची नजरानजर झाल्यावर गृहस्थ शांतपणे ‘असूद्या असूद्या तुमचं चालू द्यात’ अशी खूण करत. मी बोलता बोलता मनात विचार करत होतो- ‘भगवे कपडे घातलेले माझ्याकडे कशाला आले असतील? काही देणगी वगैरे मागायला असतील बहुदा. देणगी मागितली तर यांना कसे कटवता येईल?’ आत येताना त्यांनी माझे नाव घेतल्याने श्रीहरीनेदेखील त्यांना कशासाठी आलात? काही मदत करू का? असे विचारले नाही. त्याच्या डोक्यातही भगव्या कफनीमुळे असाच काहीसा संभ्रम झाला असावा. माझे बोलणे संपले. मी फोन ठेवला, तर श्रीहरीने झडप घालूनच उचलला कारण तो फोनसाठी फार काळ ताटकळला होता. फोनवर मी तावातावाने बोलताना का कुणास ठाऊक उगाचच उभा राहून बोलत होतो. माझा बोलणे झाले, तोच त्या गृहस्थांनी मलाच बसायला सुचवले. ‘माझ्याच केबिनमध्ये मला बसायला सांगणारे हे कोण?’ असा मनात मी विचार करत होतो. तोच ते म्हणाले “नमस्कार कुलकर्णी, शांत झालात का?” मी थोड्या गुर्मीतच “होय” असे म्हटले. त्यानंतर ते गृहस्थ म्हणाले.  “कुलकर्णी आपण व्यवसायाचं नंतर बोलूयात का? मी बराच वेळ तुम्हाला फोनवर कोणाशीतरी बोलताना ऐकतोय. तुम्हाला एक सांगू का? अहो गरज नाहीये एवढे रागावण्याची. तुम्ही कोणाशी बोलत होतात हे तुम्ही मला सांगू नका. त्याची गरजही नाही. पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो, असा विचार करा की तुमच्या सभोवतालची सर्व माणसे तुम्हाला परमेश्वराने खेळायला दिली आहेत. खेळताना आपण रागावतो का? खेळताना आपण खिलाडूवृत्तीने खेळायचं. इतकं रागवायची गरज नसते.” मी एका सप्लायरबरोबर बोलत होतो, त्याने माल वेळेत न दिल्याने आमची डिलिव्हरी वेळेत होणार नव्हती. मी त्यांना म्हणालो “ अहो यांना Advance देऊनही  वेळेत माल देत नाहीत. मी कस्टमरला काय सांगू. तुम्ही माझ्या जागी असाल तर काय कराल.”

बाबा शांतपणे म्हणाले “ तुम्ही रागावलात. आता ते वेळेत माल देणार का?”

“अहो नाही ना. वेळेविषयी बोलतच नाहीत”…मी

“ हे बघा तुमच्या रागाने ते डिस्टर्ब झाले. त्याचीही काही मजबुरी असेल. तुमचा राग ते दुसऱ्यावर काढतील. बाकी वेगळे काय घडेल? मी तुम्हाला सांगतो. तुम्ही या सगळ्या गोष्टींकडे खिलाडूवृत्तीने बघा. अहो हे तुमचे शेजारी बसलेले पार्टनर, बाहेर काम करत असलेला तुमचा स्टाफ, तुमची बायको, मुलं, आई-वडील, सप्लायर, कस्टमर, सरकारी अधिकारी, आता तुमच्याशी बोलत असलेला मी– हे सगळंसगळं खेळायला दिलंय अशा दृष्टीकोनातून जीवनाकडे बघा. बघा कशी मजा येते ते. या खेळात जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळे भिडू मिळतील. गीता हेच सांगते. ”

महाराज बोलत होते त्यात तथ्य वाटत होते. कुठेतरी मी आतून हललो होतो. कुठेतरी प्रकाश पडत होता.  

“बरं आता मी माझ्या येण्याचे प्रयोजन सांगू का? मला माझ्या मुलासाठी एक UPS घ्यायचाय. मला तुमचे नाव श्री. अमुक यांनी सांगितले. ते म्हणाले कुलकर्णीचा UPS घ्या. मी २ वर्षे वापरतोय उत्तम आहे.”

“ बापरे, बसा ना. सर सॉरी मी तुम्हाला बसा देखील म्हटले नाही.” …मी. समोर उभे असलेले गृहस्थ देणगी मागायला आलेले साधू नसून माझे कस्टमर आहेत हे कळल्यावर माझी होणारी सहाजिक प्रतिक्रिया.

“ असू देत. मी माझी ओळख करून देतो. मी शितोळे. पुण्यातले प्रसिद्ध सरदार शितोळे तुम्हाला माहित असतील तर त्यांच्यापैकी. कसब्यात एकमेव उत्तम स्थितीत असलेला दगडी वाडा आमचाच. मोठे ऐतिहासिक घराणे आहे आमचे. पेशव्याचे सरदार होतो आम्ही. अर्थात आजची ती ओळख नाही. मी अमेरिकेत योग शिकवतो. गेली अनेक वर्षे देशात परदेशात योगाचा प्रसार करतो. माझे बहुतांशी वास्तव्य अमेरिकेत असते. या भगव्या कपड्यांवर जाऊ नका. तो माझा व्यावसायिक युनिफार्म आहे. तसा मी सांसारिक आहे. मुलाला कॉम्पुटर इंजिनीअरिंगला प्रवेश घेतला, त्याच्या कॉम्पुटरसाठी UPS हवा, हे आपल्या भेटीचे प्रयोजन. मला घाई नाही. UPSची किंमत सांगा. तुमचे सर्व पैसे आत्ताच देऊन टाकतो. तुम्ही म्हणाल तेव्हा मुलगा येऊन UPS घेऊन जाईल. तुमच्या बोलण्यावरून थोडा उशीर होणार असे दिसतेच आहे. हरकत नाही. पण उत्तम वस्तू द्या.”

मी अवाक होऊन बघत होतो. माझ्यासमोर एक योगी गुरुस्वरूप होऊन उभा होता. माझ्या करंटेपणामुळे त्यांना ओळखले नाही. माझे हे गुरु जाताजाता मला मंत्र देऊन गेले “ कुलकर्णी भगवंताने हे सर्व जग तुम्हाला खेळायला दिलं आहे. अनेक भिडू तुम्हाला मिळतील, येतील आणि जातील सुद्धा. तुमचा डाव आहे तोपर्यंत खेळायचं. आणि आनंदी राहायचं, आनंद द्यायचा आणि घ्यायचा देखील. बघा जमतंय का? जमलं तर मिळणारा आनंद तुमचाच. कोणी हिरावून घेणार नाही.”

शितोळेगुरूंना मी नंतर आजतागायत भेटलो नाही.  पण “ कुलकर्णी, भगवंताने हे जग तुम्हाला खेळायला दिलंय ” 

हे शब्द मात्र कायम कानात घुमतात. आयुष्यातले अनेक प्रसंग मी ह्या मंत्राने निभावून नेले आहेत.  आज गुरुपौर्णिमेनिमित्त सहज या गुरूंची आठवण झाली म्हटलं लिहून काढावं. जगण्याचा साधा मंत्र आहे- सर्वाना सांगावा.  

लेखक : श्री श्रीकांत कुलकर्णी

९८५००३५०३७

संग्राहिका : स्नेहलता गाडगीळ

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ एक संवाद… ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

? मनमंजुषेतून ?

☆ एक संवाद… ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

“अगं,अगं, किती ग त्रास देतीयेस ! अतीच करतीस बाई! तुला भूक लागलीय का? काय हवंय खायला? तुला भात आवडत नाही .पोळी आवडत नाही. सारखा खाऊ दे म्हणतीस, छोट्या छोट्या गोळ्या हो ना ? दूध दिलं तर नाटकं किती करतीस गं ! एकदम थंड असलं तरी चालत नाही. जरासं गरम असलं तरी चालत नाही. शिळं आवडत नाही. ताजंच हवं. तेही वारणा पिशवीचं असलं की मग कसं भराभर जातं बरं पोटात.

सकाळी, सकाळी उठल्याउठल्या तुला खेळायची हुक्की येते. माझी साडी धरून, ओढून खेळायला चल म्हणतीस. पण मला वेळ असतो का ग तेव्हा? आणि काय गं, तुला खेळायला दोन छोटे बॉल आणून दिले होते ना, एक पांढरा- एक लाल, ते कुठं घालवलेस बरं? नुसती माझ्याकडे बघत राहिलीयेस.

अगं तो रोज सकाळी गोरा, गोरा, गब्बू ,गब्बू राजकुमार येतो ना, त्यालाही भूक लागते. त्यालाही खाऊ हवा असतो म्हणून तो येतो. तुला तो आवडत का नाही बरं ?आणि त्याचा राग का येतो बरं? किती छान आहे दिसायला. आणि किती गरीब आहे ना ! घरात आला की, त्याला हाकलून लावतेस. तो पण मग म्हणतो, बाहेर ये- मग तुला दाखवतो बरोबर. अगं त्याची ताकद तुझ्यापेक्षा जास्त आहे ना ! बाहेर गेलीस की तुझ्याशी भांडतो ना ? मग कशी घाबरून घरात पळून येतीस गं.

तुझी झोपायची पण किती तंत्रं. गादीवर सुद्धा काहीतरी मऊ मऊ, म्हणजे माझी कॉटन साडी तुला लागते. मग महाराणी निवांत झोपणार. झोपायच्या अगोदर सगळ्यांच्याकडून “अंग चेपून द्या, लाड करा,” म्हणून मागे लागतेस, हो ना ? आणि मग घरातलं प्रत्येकजण तुझी कौतुकं करत बसतात. प्रत्येकजण तुला मांडीवर खांद्यावर घ्यायला बघतात. पण तुला ना, कोणी उचललेलंच आवडत नाही. कोणी पापे घेतलेले आवडत नाही. असं का ग ? किती गोड आहेस ग ! म्हणून तर तुझं नाव ‘ रंभा ‘ ठेवलंय ना ! तुला कपाळाला टिकली लावली की, किती सुंदर दिसतेस .अगदी तुझी दृष्ट काढावीशी वाटते बघ.

तुझी आई किती शांत आहे ना ! ती बाहेरून, दुसरीकडून आलेली, म्हणून ती घरातली सून. आणि तू तिची मुलगी. याच घरात जन्माला आलीस ना? तू नात म्हणून सगळ्यांची जरा जास्तच लाडूबाई. म्हणशील ते लाड पुरवतो आम्ही  सगळेजण. तरीपण जराही अंग धरत नाहीस. बारीक ती बारीकच राहिलीस बाई !.सारखी इकडून तिकडे धावत असतीस ना. चालताना सुद्धा, शांतपणे आणि सावकाशपणे चालणं कसं  ते तुला माहीतच नाही. मी तर तुला तुडतुडीच म्हणते.

अगं रंभा ,मी एकटीच बडबडत राहिलेय.  तू काहीच बोलत नाहीयेस. रागावलीस का ? कशी ग माझी मुलगी ! बोल ना काहीतरी .बोल की ग.  बोल. बोल.” — 

“ म्याव, म्याव,  मियाव  मियाव, म्याऊ, म्याऊ…….”  

(आमच्या घरातील तीन मांजरांपैकी एकीशी केलेला संवाद.) 

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ जन्मदिवस विशेष – राजकपूर ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? मनमंजुषेतून ?

☆ जन्मदिवस विशेष – राजकपूर ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

(१४ डिसेंबर हा हिंदी चित्रपट सृष्टीतील श्रेष्ठ अभिनेता,  दिग्दर्शक आणि Showman कै. राजकपूर यांची जयंती. त्यानिमित्त त्यांना श्रद्धांजली ! )

कलेसी बहार आणी तो दुजा तर नाही कोणी

राज कपूर तो जानी अंतर्यामी हिंदुस्थानी  ||ध्रु||

तहान वात्सल्याची जीवा प्रेमाची मायेची

वाट जीवना संस्काराची ना केवळ नात्याची 

द्याया संदेश हसवूनी येई आवारा घेऊनी

राज कपूर तो जानी अंतर्यामी हिंदुस्थानी    ||१||

देश ग्रासला बेकारीने शिकलेला भरडला

धनाढ्य लुच्चे लोभी फसविती दीनांना दुबळ्यांना

दावुनिया चारसोबीसी केले सकल जनांना ज्ञानी

राज कपूर तो जानी अंतर्यामी हिंदुस्थानी  ||२||

मुखड्यामागे पाप धनाच्या, तहानल्या ना पाणी

काळा पैसा खोट्या नोटा कोण गुन्ह्याचा धनी

करितो सर्वांना सावध जागते रहो सांगूनी

राज कपूर तो जानी अंतर्यामी हिंदुस्थानी  ||३||

©️ डाॅ. निशिकान्त श्रोत्री

श्रोत्री निवास, ४०/१-अ, कर्वे रस्ता , पुणे ४११००४

९८९०११७७५४

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ साला मी अडाणी होतो तेच बरं होतं … श्रीधर जुळवे ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? मनमंजुषेतून ?

☆ साला मी अडाणी होतो तेच बरं होतं … श्रीधर जुळवे ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

साला मी अडाणी होतो तेच बरं होतं …

साधा सर्दी खोकला झाला की आलं, तुळस काढा घ्यायचो,

पोट दुखलं की ओवा चावत जायचो – ताप आला की डोक्यावर पाण्याची पट्टी ठेवायचो

ना टेस्ट, ना स्पेशालिस्टच झंझट, ना हॉस्पिटलच्या एडमिशनमध्ये अडकत होतो…

निरोगी आयुष्य जगत होतो..

साला मी अडाणी होतो तेच बरं होतं … 

 

राम राम ला  राम राम, सलाम वालेकुम ला, वाले कुम अस सलाम 

आणि जय भीम ला जय भीम नेच प्रेमाने उत्तर देत होतो

ना धर्म कळत होता, ना जात कळत होती, माणूस म्हणून जगत होतो…

साला मी अडाणी होतो तेच बरं होतं … 

 

सकाळी न्याहारीला दूध भाकरी, दुपारी जेवणात कांदा भाकरी 

आणि रात्रीच्या जेवणाला कोरड्यास भाकरी पोटभर खात होतो, 

हेल्दी ब्रेकफास्टचा मेनू, लंचचा चोचलेपणा आणि 

डिनरच्या सोफेस्टिकेटेड उपासमारीपेक्षा दिवसभर भरपेट चरत होतो…

साला मी अडाणी होतो तेच बरं होतं … 

 

शक्तिमान सोबत गिरकी घेत होतो, रामायणात रंगून जात होतो,

चित्रहार सोबत आयुष्याची चित्र रंगवत होतो, ना वेबसिरीजची आतुरता, ना सासबहूचा लफडा , 

ना बातम्यांचा फालतू ताण सहन करत होतो… खऱ्या मनोरंजनाचा आस्वाद घेत होतो…

साला मी अडाणी होतो तेच बरं होतं … 

 

सण असो की जत्रा, सुट्टी मिळेल तेव्हा वेळ मस्त कुटुंबासोबत घालवत होतो, 

चार मित्रांमध्ये मिसळत होतो, लोकांमध्ये उठत बसत होतो…

ना टार्गेटची चिंता होती, ना प्रमोशनचं टेन्शन होतं, ना पगार वाढीची हाव होती,

तणावमुक्त जीवन जगत होतो…

साला मी अडाणी होतो तेच बरं होतं … 

 

गावातले वाद गावात मिटवत होते, झाली भांडण तरी रात्री मंदिरात एकत्र येत होतो, 

सकाळी पुन्हा एकत्र फिरत कामाला लागत होतो..

ना पोलीस केसची भीती, ना मानहानीचा दावा, ना कोर्टाच्या चकरा मारत होतो.

खरोखर सलोखा जपत होतो.

साला मी अडाणी होतो तेच बरं होतं … 

 

कुटुंबाला प्रेमाने पत्र लिहीत होतो, पत्राची वाट बघत होतो, 

पत्राच्या प्रत्येक ओळीत प्रेमाचा ओलावा अनुभवत होतो…

ना मोबाईलवर कोरडी बोलणी, ना फॉरवर्ड मेसेज,

ना ऑनलाइनची निरर्थक चॅटिंग, उगाचच फक्त दिखावा करत नव्हतो

साला मी अडाणी होतो तेच बरं होतं … 

 

मातीच्या घरात रहात होतो, सारवलेल्या अंगणात बागडत होतो, 

ऐसपैस अर्धा एकरभर जागेत सुखात सगळे नांदत होतो…

ना एक बी एच के मध्ये कोंबलो होतो, ना बाल्कनी साठी भांडत होतो , 

ना मास्टर बेडरूममध्ये स्वतःला कोंडून घेत होतो…

मस्त मोकळ्या हवेत ढगाखाली मोकळा श्वास घेत होतो…

साला मी अडाणी होतो तेच बरं होतं … 

 

अडाणी असताना सुशिक्षितात जाऊन त्यांचे आयुष्य जगावे अशी स्वप्न पाहत होतो , 

त्या साठी मेहनत करत होतो,

आणि जेव्हा सुशिक्षित झालो,– त्या भपकेबाजीत घुसू लागलो, ढोंगी ते जग बघू लागलो, 

आणि मग परत वाटू लागलं……. 

साला मी अडाणी होतो तेच बरं होतं ……. 

 

— श्रीधर जुळवे ( वॉलवरून )

प्रस्तुती : अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ || मालक ||…भाग 1 – शब्दांकन – श्री उपेंद्र चिंचारे ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ || मालक ||…भाग 1 – शब्दांकन – श्री उपेंद्र चिंचारे ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर  ☆

(११ नोव्हेंबर : वंदनीय माई मंगेशकर ह्यांच्या लेखाचे शब्दांकन करण्याची सुवर्णसंधी मला लाभली होती. “स्वरमंगेश” ह्या गौरवग्रंथामध्ये “मालक” ह्या शीर्षकाने, सोमवार दिनांक २४ एप्रिल १९९५ रोजी प्रसिद्ध झालेला हा लेख ! मा. लतादीदी, मीनाताई, आशाताई, उषाताई, पं हृदयनाथजी ह्या पंचामृताने माझं कौतुक केलं !) ……   

” माझ्या घरांत मी तुला काही काम पडू देणार नाही “, असं मालकांनी मला लग्नाच्यावेळीच सांगितलं होतं ! अगदी तांब्यासुद्धा उचलू दिला नाही कधी. एकदा मालक आंघोळीला निघाले म्हणून मी धोतराच्या निऱ्या करून ठेवल्या, तर किती रागावले माझ्यावर, ” तू काय हमालाची बायको आहेस का ?”

– आज माझ्या वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी मी मालकांच्या आठवणी आठवू पहाते, तर अगदी काल परवा घडल्या असाव्यात, अशा साऱ्या  स्मृती माझ्या डोळ्यांसमोर येऊ लागतात !

माझ्या माहेरी जेवणानंतर, मला पान खायची सवय होती ! लग्नानंतर दोन दिवसांनी मालकांना काय वाटले, कोणास ठाऊक ? ” यापुढे पान बंद “, असं मालक म्हणाले. पानाचे सगळे साहित्य मालकांनी फेकून दिले. नंतर काय झाले, मालक गड्याला म्हणाले, ” जेवण झालं की एक विडा करून हिच्या उशापाशी ठेवत जा. ” !

एक दिवस मालक, खालूनच “माई, माई”, अश्या मोठ्याने हाका मारीत आले. “अहो काय झालं?” मी विचारलं.  पाहते तर काय, एका खिशात पानाचं सगळ साहित्य, नि दुस-या खिशात पिकलेली पानं. म्हणाले, ” तुला लागतात ना, म्हणून पिकलेली पानं घेऊन आलोय “! मालकांचा असा भोळा अन् प्रेमळ स्वभाव !

माझी सासू फार कडक होती. मी खानदेशातली म्हणून सासू मला ” घाटी ” म्हणायची, पण मालक इतके शांत की, आईला कधीही काहीही बोलायचे नाहीत. मी थोडी रागावले की, मालक म्हणायचे, “अगं माई, कां रागावलीस ? प्रेमाच्या राज्यांत तलवारीचं आणि भाल्याचं काय काम ?” इतका शांत स्वभाव होता ह्यांचा ! हं दिवसभर शब्दांच्या कोट्या करायचे आणि दुसऱ्याला हसवायचे !

मालाकांचं जेवण अगदी कमी असायचं, पण षोक मात्र खूप जेवण करून ठेवायचा. ह्यांना ओल्या हरभऱ्याची भाजी फार आवडायची. मटण, मासे, कोंबडी सगळं एकदमच करून ठेवायचं. दर पंगतीला ह्यांना कुणीतरी लागायचं. कधीही एकटे जेवले नाहीत. कुणीच नसलं, तर गॅलरीत उभे राहायचे आणि लोकांना हाका मारायचे, ” काय रे बाबा, कुठे चाललास ? जेवलास का नाही ? नाही तर ये आणि जेवून जा.”

काही वेळा मालक अगदी बेफिकीर असायचे. एकदा गोव्याला रस्त्यानं आम्ही दोघे चाललो होतो. ते पुढे आणि मी मागे. ह्यांनी शर्टामध्ये गळ्याशी नोटा खोचून ठेवल्या होत्या. जोराचा वारा आला आणि शर्टामधल्या काही नोटा उडून खाली पडल्या. मी त्या नोटा उचलायला खाली वाकले, तर माझ्यावर ओरडलेच, ” खाली पडलेल्या नोटा भिकाऱ्यासारख्या उचलू नकोस, गेले पैसे तर गेले, त्याच्या मागे कधी जाऊ नये.”

प्रसंगी मालक अगदी लहान मुलासारखे हळवेही व्ह्यायचे. एकदा पुण्याला भाजीमंडईमध्ये, मी भाजी आणायला गेले होते, मुलं माझ्याबरोबर होती. घरी यायला आम्हाला जरा उशीर झाला तर इकडे जीव कासावीस होऊन, बायको-मुलं हरवली, अशी मालकांनी पोलिसात तक्रारही केली !

मालकांचा माझ्यावर प्रचंड विश्वास होता. मीही त्या विश्वासाला कधीही तडा जाऊ दिला नाही. बैठकीचं गाणं ठरवायला कुणी आलं, तर म्हणायचे, ” माईला विचारा, तिने सांगितलं तर एका रुमालावरही गाईन.”

मालक अगदी सनातनी होते. मुलींच्या लहानपणी, त्यांची सक्त ताकीद होती की, मुलींनी स्टेजवर यायचं नाही. मुलींनी पावडर लावायची नाही.

मालक उदार वृत्तीचे होते. एकदा मुंबईला रेडिओवर गायला गेले होते, तर हातातल्या अंगठ्या कुणाला तरी देऊन, रिकाम्या बोटांनी घरी आले. मैत्री कशी करावी, हे तर मी मालकांच्या स्वभावातूनच पाहिलं. आयुष्यात फार मोठा दानधर्म मालकांनी केलेला मी स्वतः जवळून पाहिला आहे. पण शेवटी मालकांच्या अंगावर काय आलं, तर भगवं धोतर !

मला चार मुली झाल्या, पण लोकांसारखे मालकांनी कधी, “मुलीच का झाल्या ?” असं नाही म्हटलं. त्यांना मुलींचीच भारी हौस होती. मुलींना रागे भरलेले त्यांना आवडायचे नाही. मुलींना ते जराही दृष्टीआड होऊ द्यायचे नाहीत.

– (क्रमशः भाग पहिला ) 

— माई मंगेशकर 

शब्दांकन : श्री उपेंद्र चिंचोरे

ईमेल – [email protected] 

संग्राहिका :सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆  पैसा ही अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे.!  – लेखक – श्री प्रसाद शिरगांवकर☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

❤️ मनमंजुषेतून ❤️

☆ पैसा ही अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे.!  – लेखक – श्री प्रसाद शिरगांवकर☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित  ☆

पैसा ही अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे. खिशात भरपूर पैसा असल्यावर आपण आनंदी असण्याची काहीही शाश्वती नसते. पण जवळ पुरेसा पैसा नसला की दुःख ग्यारंटेड असतं !! याची उप-गंमत म्हणजे ‘पुरेसा’ म्हणजे काय हे आयुष्यात कधीही समजत नाही… उप-उप-गंमत अशीये की पुरेसा म्हणजे किती हे ठरवलं आणि तेवढा मिळवलाच तरी तो ‘पुरत’ नाही आणि ‘पुरेसाची’ व्याख्या पुन्हा बदलते ! 

पैसा ही अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे. आपल्याला आपल्या शिक्षण, लायकी आणि कष्टांच्या मानानी कमीच मिळतो आहे असं वाटत असतं. आपल्यापेक्षा कमी शिक्षण किंवा लायकी असलेल्या आणि नगण्य कष्ट करणाऱ्यांना खूप जास्त मिळतोय असं वाटत असतं. आपल्याला जो मिळतो तो टिकत नाही, इतरांकडे मात्र टिकतो असं वाटत असतं. आपल्याला बेसिक गरजांनाही पुरत नाही, इतरांकडे अफाट उधळपट्टी करायला असतो असं वाटत असतं. आणि हे असं म्हणजे असंच सगळ्या सगळ्यांनाच वाटत असतं ! इतरांच्या तूलनेत आपला पैसा ही फार म्हणजे फार गंमतशीर गोष्ट आहे !! 

पैसा ही अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे. तो एका दरवाज्यानं येतो आणि हजार खिडक्यांवाटे पसार होतो ! आला की खूप छान, भारी, मस्त, बरं वगैरे वाटतं. पण तो नुसताच येऊन थांबल्यानं आणि घरात साचून राहिल्यानं त्यातून काही म्हणजे काही मिळत नाही. म्हणजे आपल्याकडे खूप पैसा आलाय हे भारी वाटलं तरी त्यानं पोटही भरत नाही आणि इतर सुखंही मिळत नाहीत. पोट भरायचं आणि इतर काही मिळवायचं तर त्याला अनंत खिडक्यांमधून बाहेरच जाऊ द्यावं लागतं. पैसा आल्यामुळे मिळणारं सुख मोठं? की खर्चल्यामुळे मिळणारं? हे ठरवता येत नाही, कारण पैसा अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे ! 

पैसा ही अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे. ‘दैव देतं आणि कर्म नेतं’ ही म्हण पैशाला लागू होत नाही. पैसा कष्ट केल्यानं, म्हणजे ‘कर्मानं’च मिळतो. क्वचित कधी दैवामुळंही मिळू शकतो, लॉटरी वगैरे लागल्यावर, पण तो काही शाश्वत मार्ग नाही. रेग्युलर, नियमित वगैरे पैसा मिळवायचा तर अफाट कष्ट पडतात, ‘कर्म’ करावं लागतं. पण ‘कर्मानं’ मिळालेला पैसा ‘दैवा’मुळे एका क्षणात नाहीसा होऊ शकतो. चोरी म्हणू नका, टॅक्स म्हणू नका, आजारपणं म्हणू नका, अपघात म्हणू नका, भूकंप म्हणू नका… काय वाट्टेल ते ‘दैव’ किंवा योगायोग समोर उभे ठाकतात आणि कर्मानं कमावलेल्या पैशाचं क्षणार्धात होत्याचं नव्हतं होऊ शकतं… ‘कर्म कमावतं अन दैव हिसकावतं’ ही पैशाच्या बाबतीतली म्हण असायला हवी !! 

पैसा ही अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे. दुसऱ्याकडून उधार घेतलेला पैसा कधीच लक्षात रहात नाही आणि दुसऱ्याला उधार दिलेला पैसा कधीच विसरला जात नाही !! जे उधारीचं तेच मदतीचं, तेच दान-धर्माचं, तेच खर्चाचं वगैरे. आपल्याला मिळालेलंही आपलंच आणि आपण दिलेलंही आपलंच हे फक्त पैशाच्या बाबतीत घडतं, कारण पैसा ही अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे !! 

पैसा ही अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे. ज्याच्याकडे नाही त्याला कमवावासा वाटतो. ज्याच्याकडे आहे त्याला अफाट कमवावासा वाटतो आणि ज्याच्याकडे अफाट आहे त्यालाही अजून जास्त अफाट कमवावासा वाटतो. माझ्याकडे आहे तेवढा पुरेसा आहे, मला अजून जास्त पैसा नको, असं कोणी म्हणजे कोणी म्हणत नाही. 

पैसा ही अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे. ‘पैशापाशी पैसा जातो!’ जिथे ऑलरेडी खूप पैसा आहे तिथे अजून अजून पैसा जात रहातो. जिथे खूप कमी पैसा आहे तिथून पैसा जमेल तेवढ्या लवकर कल्टी मारत रहातो. 

पैसा ही अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे . पैसा मिळवण्यासाठी आयुष्यभर आपण खपतो. मग एक दिवस आपण ‘खपल्यावर’, आपण निघून जातो, पैसा इथेच रहातो !! 

पैसा ही अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे.!

लेखक : – प्रसाद शिरगांवकर

प्रस्तुती : सुहास रघुनाथ पंडित. 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ टिकलीच्या_निमित्ताने…लेखिका : डॉ शरयू देशपांडे ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆

??

☆ टिकलीच्या_निमित्ताने…लेखिका : डॉ शरयू देशपांडे ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆

तशी ती मी माझ्या मर्जीनेच लावते किंवा लावत नाही. पण मनात कैक वर्षं तिचं असणं /नसणं घोंगावत होतं.. सध्याच्या चर्चेत त्यालाच  वाट करून देण्याचा हा प्रयत्न ….

आई जुन्या मताची. त्यामुळे ‘टिकली न लावणं’ ही पद्धत तिच्या गावीही नव्हती. कुंकू /गंध/ टिकली न लावणं म्हणजे ‘आपल्या संस्कृतीला नाकारणं  आणि अमुक एका संस्कृतीला मूक पाठींबा दर्शविणं ‘ असं तिचं साधं सरळ गणित होतं. अर्थात मी लहानपणापासून बंडखोर, त्यामुळे इतर पुढारलेल्या विचारांच्या कुटुंबातील मुलींचं पाहून मीही गंध/ टिकली याला विरोध केला. आई म्हणायची, ” निदान बाहेर जाताना तरी लाव “.. ते थोडंसं पाळलं.

शाळेतल्या शारीरिक शिक्षण विषयाच्या शिक्षिका, मुलींना ज्युदो कराटे शिकवण्यासाठी प्रोत्साहन देत आणि  शाळा भरताना कपाळावर गंध /टिकली नसेल तर २५ उठाबशा काढायला लावत. या परस्परविरोधी क्रियांमागची कारणमीमांसा समजून घेण्याची  मानसिक कुवत तेव्हा नव्हती. पण टिकलीविषयीचं गूढ निर्माण झालं ते तेव्हापासून. 

कॉलेजमधे आल्यावर वयानुसार येणारी परिपक्वता म्हणा किंवा आजूबाजूच्या विश्वाची थोडी अधिक जाण म्हणा, आईची बाजू थोडीथोडी पटायला लागली होती किंवा मुद्दाम विरोध करून तिला दुखवावंसं वाटेना. त्यामुळे जिन्स /western outfits घातले की टिकली नाही,आणि पंजाबी ड्रेसवर मॅचिंग टिकली असा आपला मधला मार्ग निवडला. तरीही टिकली /गंध याभोवतीचं गूढ आकर्षितच करत राहिलं…… ‘ लाव ‘ कुणी म्हंटलं की राग यायचा, पण ती लावल्यावर चेहरा जरा उठावदार, फ्रेश दिसतो  हे उघड उघड मान्य करायलाही कठीण जात असे.

सुट्ट्यांमध्ये गावी जात असू. तिथेही घरात आम्हाला मुली म्हणून कुठलीही बंधनं नव्हती. खानपान पेहराव याबाबत बऱ्यापैकी मोकळीक होती. आम्हीदेखील मुद्दाम जेष्ठांच्या समोर त्यांना आवडणार नाही असं काही करत नसू. गावात, इतरत्र बाहेर जाताना मात्र स्लिव्हलेस, बॉयकट असणं आणि टिकली नसणं हा चर्चेचा विषय ठरत असे. Obligatory झाल्या गोष्टी की मग उगाचच त्याविषयी तिटकारा निर्माण होतो. पण वय वाढत गेलं तसतसं मात्र ही जाणीव बोथट होत गेली. गावी गेल्यावर थोड्याशा मर्यादा पाळल्या की बाकी चैन असते हे लक्षात येत गेलं आणि बंडखोरी कमी होत गेली.

कॉलेजला असताना एक मुस्लिम मैत्रीण आमच्या पर्समधल्या टिकल्यांची पाकीटं घेऊन लेडीज रूममध्ये लावून आरशात बघत असे. कदाचित पहाण्याची सवय नसल्यामुळे असेल, पण तरीही साधारणच दिसणारी ती, टिकलीमुळे विशेष दिसत असे. पाच दहा मिनिटं ठेवत असे. त्या ५-१० मिनिटांत इवलीशी टिकली तिचा चेहेराच नव्हे तर मनही उजळून टाकत असे. साधं नेहमीचं टिकलीचं पाकीट कुणासाठी आनंदाचा स्त्रोत असू शकतो हे प्रथमच जाणवलं..

 Western Wardrobe असेल तर टिकली नाही लावायची हा पायंडा कायम ठेवला. भारतीय पोषाख परिधान केला की छोटीशी का होईना, पण  टिकली आपोआपच लावली जायची…  

पुढे पेशा निवडला तोही टिकलीचं महत्त्व वेगळ्या पद्धतीने दाखवून गेला. MA झाल्यावर लगेच हंगामी प्राध्यापिका म्हणून एका कॉलेजमधे जॉब मिळाला. माझे विद्यार्थी माझ्यापेक्षा मोठे दिसत. पंजाबी ड्रेसमधल्या, बारीक टिकलीच्या, लहानखुरी असलेल्या मला कुणी प्राध्यापिका समजेना. विशेषतः वर्गातील मागच्या बेंचवरची मुलं टिंगल टवाळी करतायत असं जाणवलं. या व्यवसायात थोडा पोक्तपणा दिसण्यातही हवा हे लक्षात आलं. मग साडी नेसून आणि ठळकपणे दिसून येणारी टिकली लावायला सुरुवात केली तशी आपसूकच विद्यार्थी आदरानं, अदबीनं बोलायला लागले. टवाळखोर पोरांपासून दूर ठेवायला टिकली अशी धावून आली. प्राध्यापक, निवेदिका या सगळ्याच भूमिकांमध्ये टिकलीचं असणं मान देत गेलं. किंबहुना ती लावली नाही तर विनाकारण गैरसमज आणि चर्चा होत रहातील या विचाराने  ती लावण्याचीच सवय लागली. संस्कृतीचा संदर्भ बाजूला ठेवला तरी ही टिकली कुठेतरी अनेक विचित्र नजरांपासून वाचवणारी ‘सहेली’ बनत गेली. …

लग्न झाल्यावर अमेरिकेत गेल्यावर, एरवी नाही तरी, महाराष्ट्र मंडळात जाताना आवर्जून टिकली लावून जाणं असे…परदेशात भारतीय संस्कृतीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न असा छोट्या टिकलीतूनही केला जाई.. 

सासुबाई सुरूवातीला एक दोन वेळा टिकलीची आठवण करून देत. पण कदाचित सवयीने त्याही काही बोलेनाशा झाल्या. आजेसासुबाई मात्र एकदा स्पष्ट म्हणाल्या, ” तुला एरवी काय करायचं ते कर हो.. पण माझ्यासमोर अशी बिना कुंकू गंधाची येत जाऊ नकोस ..” हे ऐकताना किंचित राग येतोय की काय असं होतानाच त्या म्हणाल्या, “आमच्या कपाळावर आहे टिकली, पण खरं अर्थ आहे का त्याला?!” ह्या प्रश्नानं मात्र गलबलून आलं. पुन्हा कधीही त्यांच्यासमोर बिना टिकलीची गेले नाही. इतकुशा गोल तुकड्यानं आज्जेसासुबाईंचं मन जिंकलं तेव्हा मात्र अट्टाहास बाजूला सारला.. 

एरवी सगळे लाड पुरवणारा, सगळ्या बाबतीत मुभा देणारा मोठा भाऊ, आजही, अजूनही, माहेरी गेल्यावर, बाहेर जाताना  कपाळावर टिकली नाही अशी आठवण करून देतो, तेव्हा याचा संबंध स्त्रीमुक्तीशी न जोडण्याइतकी परिपक्वता आता आलीये. यात मला फक्त जाणवते ती त्याची धाकटी बहीण म्हणून काळजी आणि चुकूनही आपल्या संस्कृतीशी फारकत न होण्यासाठीची तळमळ. 

सासुबाईंनी मला टिकली लावण्याची सक्ती करू नये असं मी त्यांना आडून सुचवत असे. पण सासरे गेल्यावर जेव्हा थोडा वेळ रिकाम्या कपाळाच्या सासुबाई पाहिल्या तेव्हा मात्र धस्स झालं . माझ्या टिकलीमागची त्यांची भूमिका वेगळ्या पद्धतीने समोर आली आणि आता टिकली लावण्याची सक्ती मीच त्यांना करत असते . 

टिकली, मंगळसूत्र,  साड्या यांना कडाडून विरोध करणारी एक जेष्ठ मैत्रिण, नवऱ्याच्या अकाली निधनानंतर मात्र टिकली लावायला लागली. मध्यंतरी भेटली, ” हल्ली  साड्या नेसाव्या वाटतात गं खूप .. किती भारी भारी साड्या आणायचा ‘तो’.. मी मात्र त्याला ‘टिपिकल नवरा’ म्हणून चिडवत होते.. आता त्याची आठवण झाली की नेसते साडी आणि वर मॅचिंग टिकली सुद्धा …तिथून सुद्धा मला डोळा मारत असेल बघ “.. मनात आलं, हिची टिकली अजून वेगळी..

हौसेनं वेगवेगळ्या प्रकारच्या  टिकल्या लावणारी एक मैत्रीण, वेगळ्या समाजात हट्टानं प्रेमविवाह करून गेली तेव्हा टिकली नसलेलं तिचं भकास कपाळ पाहून हळहळ वाटली .” आता या कपाळावर कधीही टिकली येणार नाही ” हे तिचं वाक्यं  का कोण जाणे खूप खोलवर रूतलं. साधी टिकलीच ती, पण तिच्या नसण्यानं मैत्रिणीचं आयुष्य मात्र पूर्णपणे बदललं. 

हैदराबादमध्ये आल्यावर, जॉब करताना जाणवलं की टिकलीचा आणि मॉडर्न असण्याचा काही संबंध नाही. Kafka, Derrida अशा विचारवंतांच्या क्लिष्ट संकल्पना सहज उलगडून दाखवणाऱ्या प्राध्यापिका भलं मोठं कुंकू लावून येत असत. आपण एका विशिष्ट धर्माचे आहोत (किंवा नाही आहोत) हे ठळकपणे दर्शविणं हैदराबादसारख्या ठिकाणी आवश्यक वाटत असावं आणि कदाचित त्याच जाणिवेतून इथल्या लहानथोर सर्व महिला टिकली आवर्जून लावताना दिसतात.

सुषमा स्वराज, स्मृती इराणी, निर्मला सिताराम, सुधा मुर्ती … यांच्या टिकल्या मला तळपत्या तलवारींसारख्या भासतात. बुद्धिमत्ता आणि सौंदर्य यांचा अनवट संगम त्यांच्या कपाळावरच्या टिकलीने अधोरेखित होतो. त्यांचं कर्तृत्वच असं आहे की त्यांच्या कपाळावर धारण होऊन टिकलीचाच मान वाढलाय असं वाटत रहातं… 

टिकली अशी वेगवेगळी रूपं, अनेकविध संदर्भ घेऊन समोर येत राहिली. ती माझ्यातली बंडखोरी कमी करत गेली. अर्थात ती लावणं, न लावणं हा सर्वस्वी माझाच निर्णय. आधीही होता, आजही आहे आणि पुढेही राहील. पण आता प्रत्येक वेळी तिच्याभोवती स्त्रीमुक्तीचं वारूळ चढवायला नको वाटतं . घरात  ‘टिकली सुद्धा न लावणारी लंकेची पार्वती’ असा अवतार आजही कायम असतो. .सक्ती केली जात असेल तर आवडत्या गोष्टी देखील नावडत्या होतात. लावण्याची असू नये तशी न लावण्याची पण असू नये इतकंच.  चाळीशीत आता एक जाणवतंय की उगाच विरोधासाठी विरोध करायची गरज नसते , विनाकारण प्रसिद्धीसाठी टोकाची भूमिका घ्यायची गरज नाही. 

बाकी हा लेख लिहीत  मी लहानपणापासून पहात असलेला , माझ्या काकूंचा कुंकूविरहित चेहरा सतत समोर होता. भर तारुण्यात ते पुसलं गेलं. घरात कुणीही न लावण्यासाठी बळजबरी केली नव्हती. पण त्या काळच्या प्रथेनुसार काकूंनी स्वतःच ते लावण्याचं नाकारलं…साजशृंगाराची आवड असणाऱ्या माझ्या काकूला हा निर्णय घेताना किती जड गेलं असेल ! ……. जी टिकली ” माझ्या कपाळावर माझ्या मर्जीनेच लागेल ” असा हट्ट करते, त्याच इलुशा टिकलीसाठी एक कपाळ गेली चाळीस वर्षे किती आसुसलेलं, अतृप्त राहिलंय याचा विचार करून मात्र अंगावर काटा येतो… 

लेखिका :  डॉ शरयू देशपांडे, हैदराबाद

प्रस्तुती : स्मिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print