☆ माझी पूजा अपूर्ण आहे! — लेखक – अज्ञात ☆ अनुवाद व प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆
पूजेसाठी रोज मी सोवळे स्वच्छ करतो! पण जोपर्यंत विकारांच्या मलीनतेपासून मन स्वच्छ होत नाही, तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे!
रोज मी देवासमोर पांढरी रांगोळी काढतो! पण त्या पांढर्या रंगाप्रमाणे माझे मन धवल, निर्मळ होत नाही, तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे!
रोज देवांवर मी पाणी घालतो, अभिषेक करतो! पण मनातल्या आसक्ती वर मी जोपर्यंत पाणी सोडत नाही, तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे!
रोज मी देवाजवळ दिवा लावतो!
पण जोपर्यंत समाधानी वृत्तीचा नंदादीप मी मनात लावत नाही, तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे!
रोज मी देवाजवळ उदबत्ती लावतो! पण संसारतापाने मंदपणे जळत असताना चित्तशुद्धीचा अंगारा जोपर्यंत मला लाभत नाही, तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे!
रोज मी देवाजवळ कापूर जाळतो! पण त्या कापराच्या वडीप्रमाणे मनातले कुविचार क्षणात जळून जात नाहीत, तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे!
रोज आरती करताना मी देवाचा गुणगौरव करतो! पण माझ्या आजूबाजूच्या माणसांमधले गुण जोपर्यंत मी शोधत नाही, तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे!
रोज मी देवासमोर स्थिर बसुन तासभर ध्यान करतो! पण जोपर्यंत माझ्या चंचल चित्तवृत्ती स्थिर होत नाहीत, तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे!
वृक्षवेलींनी प्रयत्नपूर्वक निर्मिलेली फुले मी देवाला रोज वाहतो! पण माझ्या कष्टसाध्य सत्कर्माची फुले मी जोपर्यंत समाजाला वाटत नाही, तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे!
देवासमोर मी रोज प्रसाद ठेवतो!
पण त्याने मला दिलेला हा जीवनरूपी प्रसाद परोपकारी वृत्तीने मी इतरांना देत नाही, तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे!
— का.. कसं कोण जाणे.. एक दिवस माझं मलाच हे सगळं जाणवलं.. खरं तर खटकलंच. मग मी स्वतःच स्वतःला विचारलं – –
बघ तुला जमतं का? ……
तू उपवास कर किंवा नको करूस मर्जी तुझी. जीभेवर ताबा नाही जमला तरी चालेल, पण तुझ्या मोहांवर मात्र ताबा मिळव, बघ तुला जमतं का…
तू देवळात रोज जा किंवा नको जाऊस.. इच्छा तुझी. तिथे नतमस्तक झाला नाहीस तरी चालेल, पण तुझ्या अहंकारावर मात्र कर मात, बघ तुला जमतं का…
तू सोवळं मान किंवा नको मानूस, हक्क तुझा.. ते सर्व मानलं नाहीस तरी चालेल, पण तुझे आचार मात्र ठेव पवित्र, बघ तुला जमतं का…
तू १ माळ जप, स्वाध्याय कर, शास्त्र वाच किंवा नको वाचूस.. निवड तुझी. त्यासाठी वेळ नसला तरी चालेल, पण आपल्या माणसांची मनं जरूर वाच, बघ तुला जमतं का…
तू मंदिरात सेवेला ये किंवा नको येऊस.. आवड तुझी, त्यासाठी सवड नसली तरी चालेल, पण सेवेत असलेल्या भक्तांमधे देव पाहायला नक्की शिक, बघ तुला जमतं का???
माझी मनोमन पक्की खात्री झाली आहे आता की …. माझी पूजा अपूर्णच आहे ….
लेखक : अज्ञात
प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे
पुणे, भ्रमणध्वनी:- 9860006595
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ आजी, आजची आणि कालची– लेखक : श्री पराग गोडबोले ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता सुहास पंडित ☆
काही दिवसांपूर्वी एका मॉल मध्ये गेलो होतो. ठाण्याचा अतिशय सुप्रसिद्ध मॉल. तरुणाईची पसंती असलेला. कुटुंबवत्सल जोडप्यांची आवडीची जागा.
मुलांना घेऊन फिरायला, खरेदीला आणि खादाडीला भरपूर वाव देणारी आणि त्यासोबतच खिसा हलका करणारी. पोरांच्या भाषेत hangout आणि chill करण्यासाठी perfect place.
या मॉल नामक जागेच्या मी जरा दहशतीतच असतो. एक तर भयंकर तंगडतोड होते उगाचंच. चकाचक दुकानं आणि नावाजलेले brands बघत नुसतं गरगर फिरतो आपण.
नको असलेल्या अनेक वस्तू, महागडे कपडे, चपला आणि बरंच काही ओझं घेऊन मग सगळ्यात वर असलेल्या खादाडीच्या विभागात पोहोचतो.
खाण्याचे एवढे विविध प्रकार पाहून हा भुलभुलैय्या बरा, की चक्रव्यूह बरा, अशी शंका यावी अशी परिस्थिती.
अशा गोंधळलेल्या अवस्थेतच लेकीने सूत्रं हातात घेतली आणि मॅकडॉनल्ड्स च्या दुकानात ती अदृश्य झाली. मी आणि बायको बावचळलेल्या अवस्थेत इकडेतिकडे बघत बसलो शुंभासारखे. माझ्या भिरभिरणाऱ्या नजरेला तेवढ्यात ‘ ते ‘ दिसले.
एक आधुनिक, पण नवथर आज्जी आणि दोन नातवंडं, साधारण एकाच वयाची. जुळी असावीत बहुतेक, असं त्यांच्याकडे बघून वाटत होतं.
लाल T-Shirt, (बायकोच्या मते टोमॅटो रंग, लाल नव्हे) जीन्स आणि तोकडे, रंगवलेले केस. पायात Nike चे बूट आणि खांद्याला भारी पर्स लटकावलेली आजी.
आजीच्या हातात पिशव्या पण होत्या खरेदीच्या. नातवंडांना घेऊन आली होती धमाल करायला ही नव्या युगाची नवी आजी. काळ कुठलाही असला तरी दुधाच्या सायीवरची माया मात्र अबाधित असते याची खात्री पटवून देणारी.
मुलांना दटावून, शांत बसा, मी आलेच असं म्हणून आजीही अदृश्य झाली मॅकडोनाल्डस मध्ये. पोरांची चुळबूळ, खोडकरपणा सुरूच होता, पण नशिबाने जागा सोडून पळत नव्हती इकडे तिकडे.
गोंडस, लोभस छानशी मुलं होती अगदी. टुकुरटुकूर बघत होती इकडेतिकडे विस्फारल्या डोळ्यांनी. आजीबरोबर यायचा असा त्यांचा पहिलाच अनुभव असावा बहुतेक. मी बघत होतो त्यांच्याकडे आणि माझीच तंद्री लागली.
मलाही माझी आजी आठवायला लागली. नऊवारी लुगडं नेसलेली, पायात चपला अगदी कधीतरीच घालणारी, पांढऱ्या केसांचा सुपारीएवढा का होईना पण अंबाडा घालणारी. अंघोळीला अंग धुणं, पोलक्याला झंपर, नाहीतर चोळी म्हणणारी. आमची सालस आजी.
आजची आजी घेऊन आली होती नातवंडांना मॅकडोनाल्डस मध्ये खाऊ घालायला. आमच्या आजीच्यावेळी ही असली चैन नव्हती आणि आमची तशी कधी अपेक्षाही नव्हती.
तसलं काही नव्हतंच हो तेंव्हा. खेळून दमल्यावर आजी काहीतरी खायला द्यायची. कधी राजगिऱ्याचे लाडू, कधी एखादा रव्याचा लाडू, घावन नाहीतर थालीपीठ, पोह्याचा पापड कुस्करून घातलेले दडपे पोहे किंवा कधी पोळीचा लाडू. काहीच नाही तर गुळ घातलेले दही दूध पोहे, आणि आम्ही खात असताना बघत बसायची कौतुकाने.
माझी दहावीची परीक्षा होती, तेंव्हा आमच्याकडे मुक्कामाला होती दहा दिवस आणि रोज नवा पदार्थ करून खाऊ घालायची पेपर संपवून आल्यावर.
अमृताची चव असायची तिच्या साध्यासुध्या घरगुती पदार्थाना. इतर काही सोडा, पण बाहेरचे वडे, भजी आणि सामोसे पण खाल्लेले नाही स्मरत मला.
नाही म्हणायला, पुण्यात असताना, रविवारी सकाळी एकाद्या छानश्या बेकरीचे गरमागरम पॅटिस मात्र असायचे बदल म्हणून, कधीतरी. ते पण भारी वाटायचे तेंव्हा.
आता टाळ्याला चिकटणारं त्यातलं वनस्पती तूप, प्राण कंठाशी आणतं. नको वाटतं खायला, पण तेंव्हा ती परमोच्च चैन असायची.
आज्या नऊवारीतून पाचवारीत संक्रमित झाल्या. त्यावेळी पण प्रचंड विरोधाला त्यांना सामोरं जावं लागलं म्हणे, पण म्हणतात ना, change is the only constant in life ‘ या न्यायाने विरोधावर मात करून त्या जिंकल्या.
पुढची अवस्था होती पंजाबी ड्रेसची. तो बदल मात्र बऱ्यापैकी विनासायास झाला आणि आता जीन्स वाली आजी पण समाजाने विनातक्रार स्वीकारली. आपल्या समाजाची ती प्रगल्भता आहे, निश्चितच.
अंबाडा ते दोन वेण्या, मग एका वेणीचा शेपटा आणि आता पार्लर मध्ये जाऊन छानपैकी कापलेले, रंगवलेले केस. हे स्थित्यंतर पण जाणवण्याजोगं.
आजोबांचं पण तसंच संक्रमण झालं असणार. कोट, टोपी, पगडी, उपरणं ते सदरा लेंगा, शर्ट पॅन्ट आणि आता जीन्स, शॉर्ट्स आणी t-shirt.
हम बदल रहें है. निश्चितच.
तेव्हढ्यात लेकीची हाक आली, बाबा… दोन हातात दोन बर्गर चे ट्रे, त्यात fries आणि Coke असं सगळं सावरीत ती येत होती. मी उठून ते घेतलं तिच्याकडून आणि ती तिसरा ट्रे आणायला पळाली.
आधुनिक आजी पण ते सगळं सावरीत त्यांच्या टेबलाकडे वळली आणि नातवंडांशी गप्पा मारत, ते खाण्यात तिघेही गुंग झाले.
मी पण मग दडपे पोहे आणि घावन विसरून बर्गर हाती घेतला. French Fries, ketchup मध्ये dip करून खायला लागलो. पर्यायच नव्हता.
विचार केला, उसासे टाकून काय उपयोग? जमाना बदल रहा है, हमें भी बदलनाच पडेगा.
चला, ‘ जुने जाऊ द्या मरणालागुनी, जाळुनी किंवा पुरुनी टाका’ ही केशवसुतांची तुतारी आठवून बदल स्वीकारून मार्गक्रमण करुया. त्यातच सुख आहे…
लेखक : श्री पराग गोडबोले
(९३२३२ ७७६२०)
प्रस्तुती : सौ. स्मिता सुहास पंडित
सांगली – ४१६ ४१६
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
(आईच्या मार्गदर्शनानुसार, आमच्या लोकांनी तयार केलेले बुके आम्ही सर्व लोकांना घेण्याची विनंती करू, देणगी म्हणून ते जे काही मूल्य देतील ते आपल्याकडे काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस पगार म्हणून दिला जाईल.)– इथून पुढे
लिक्विड वॉश
कपडे आणि भांडी सोडून सर्व डाग (फरशी, किचन कट्टा, गाड्या, टॉयलेट, खिडकीच्या काचा, टीव्ही अथवा इतर वस्तूंच्या ग्लासेस, आणखीही बरेच काही) साफ करणारे लिक्विड वॉश आपले लोक या ठिकाणी तयार करणार आहेत.
यासाठी लागणारे सर्व तंत्रज्ञान आणि फॉर्म्युला मेहता सोप कंपनी यांनी आपल्याला विनामूल्य देऊ केले आहे.
हे लिक्विड वॉश आपण, समाजामध्ये लोकांनी घ्यावे यासाठी विनंती करणार आहोत,
यातून मिळणारा निधी, पगार देण्यासाठी वापरणार आहोत.
फेकलेल्या कपड्यांपासून कापडी पिशव्या तयार करणे… प्लास्टिक पिशव्या न वापरण्यासाठी समाजाला विनंती करणे
ज्यांना शिवणकला येते अशा वृद्धांना आपण या ठिकाणी बसवून त्यांच्याकडून कापडी पिशव्या शिवून घेणार आहोत. अंध आणि अपंग लोकांना या पिशव्या विकायला लावणार आहोत.
समाजामध्ये प्लास्टिक पिशव्या न वापरण्याविषयी भिक्षेकर्यांच्या माध्यमातून आवाहन करणार आहोत.
या सर्वातून जे देणगी मूल्य मिळेल तो निधी, पिशव्या शिवणाऱ्या, पिशव्या विकणाऱ्या आणि समाजात प्रबोधन करणाऱ्या लोकांना आपण देणार आहोत.
– – तर असे या प्रकल्पाचे… आमच्या संसाराचे प्राथमिक स्वरूप आहे…!
भविष्यात हळूहळू आणखीही प्रकल्प या माध्यमातून सुरू करण्याचे डोक्यात आहे बघूया कसं जमतं ते…!
ज्यांच्या आयुष्यात अंधार आहे ते लोक दुसऱ्यांनी दिलेल्या उसन्या प्रकाशावर आतापर्यंत चालत होते, या प्रकल्पाच्या माध्यमातून, स्वतःच्या काळ्याकुट्ट आयुष्याच्या मध्यरात्री, ते स्वतःच सूर्य म्हणून उगवतील… स्वयंप्रकाशित होतील… स्वयंपूर्ण होतील… आणि स्वतःच्या प्रकाशात चालायला सुरुवात करतील आणि म्हणून या प्रकल्पाचे नाव *’मध्यरात्रीचे सूर्य…!!! “
आपल्या या लोकांनी केलेल्या कामाचा मोबदला म्हणून…
प्रत्येक व्यक्तीस रुपये 200 प्रतिदिन देणार आहोत
सकाळचा चहा नाष्टा आणि दुपारचे जेवण.
याचसोबत कुटुंबाला पंधरा दिवस पुरेल इतका कोरडा शिधा / किराणा इ. काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस देणार आहोत.
आपल्या आशीर्वाद आणि शुभेच्छा यामुळे हा प्रकल्प भरभराटीस येईल असा विश्वास आहे!
माझ्यासाठी हा प्रकल्प नव्हेच, ज्यांना कोणाचाही आधार नाही अशा वृद्ध आणि दिव्यांग व्यक्तींच्या जगण्याचा हा सोहळा आहे.
आपली साथ आणि सोबत आजपर्यंत मिळाली तशीच ती इथून पुढे सुद्धा लागणार आहे, आपण नेमकी कशी मदत करू शकता हे येत्या दोन दिवसात पुन्हा कळवतो.
मध्यरात्रीचे सूर्य पत्ता :
Jayanti Apartments Hos Soc Swami Vivekanand Rd and Bibwewadi Kondhwa Rd/Sitaram Thakare Rd. Bibvewadi, Pune
(आमची काम करणारी मंडळी सोमवार ते शनिवार (रविवारी सुट्टी) 11 ते 4 या वेळात इथे असणार आहेत, सकाळची रस्त्यावरची कामे करून दुपारी दीड ते चार या दरम्यान मी तिथे असेन)
नेमकं काय घडलं त्या दिवशी – –
– अक्षय्य तृतीयेच्या दिवशी कोणत्याही परिस्थितीत प्रोडक्शन सुरू झाले पाहिजेच हा माझा हट्ट होता.
– या दिवशी प्रकल्पात करू इच्छिणारे 50 दिव्यांग आजी आजोबा यांनी येथे हजेरी लावली.
– संपूर्ण एप्रिल महिन्यात, कोणत्या बस स्टॉप वर जायचे, कोणत्या बसमध्ये बसायचे, कुठे उतरायचे, कंडक्टरला काय सांगायचे, तिकीट कसे काढायचे, ते किती असते, कुठे उतरायचे याचे ट्रेनिंग झाले.
– सेंटरवर आल्यानंतर माझे लोक काम करतील की नाही हे माझे चॅलेंज नाहीच, बसचा पास काढून देऊन सुद्धा, व्हीलचेअर घेऊन, ज्यांना दंडाला धरल्याशिवाय उभे राहता येत नाही अशा माझ्या माऊलींनी बस मध्ये कसे बसायचे, प्रवास कसा करायचा, सेंटरवर कसे पोचायचे हे माझे मुख्य चॅलेंज आहे, आणि यावर मला तोडगा सुचत नाही.
– सर्वांसाठी एक प्रायव्हेट बस करायची म्हटलं, तर ते कमीत कमी महिन्याचे 80 हजार रुपये घ्यायचे म्हणतात… डोनेशन मधून मिळालेले पैसे फक्त बससाठी द्यायची माझी इच्छा नाही.
बघू…. तर हे सर्व दिव्य करून 50 आजी आजोबा आणि दिव्यांगलोक अक्षय तृतीयेला कामासाठी हजर झाले.
– फुलांचे वर्गीकरण करणे, पावडर करणे, गिफ्ट आर्टिकल तयार करणे अशी अनेक कामे अक्षय्य तृतीयेला सुरू झाली.
– अक्षय्य तृतीयेच्या दिवशी आई-वडिल, ज्यांनी जागा दिली ते दानिश भाई, जे हा प्रकल्प चालवायला मदत करणार आहे ते विपुल भाई, लिक्विड वॉश चे सर्व तंत्रज्ञान देणारे मेहता भाई, आणि ज्यांनी सर्व मशीन दिले असे निलेश लिमये, सेंचुरी एन्का यांच्या हस्ते सर्व मशीनची पूजा केली.
– इथे काम करणाऱ्या सर्वांना आपण आयडेंटीटी कार्ड आणि युनिफॉर्म दिला आहे.
– काम केलेल्या सर्व वृद्ध आजी आजोबा आणि दिव्यांग यांना पुरणपोळी तूप आणि चितळे यांची लस्सी दिली आहे, कोरडा शिधा दिला आहे.
लेख वाढत चालला आहे… आता थांबतो…
30 एप्रिल… संध्याकाळी, सेंटरला कुलूप लावताना एका मान्यवरांनी विचारले, ‘उद्या सुट्टी का मग? ‘
‘का? कसली सुट्टी? उद्या काय आहे? ‘ मी म्हणालो.
‘उद्या एक मे… कामगार दिन… कामगारांना सुट्टी द्यायची असते.. ‘ ते म्हणाले.
मी त्यांना म्हणालो, ‘ काम करायला आलेले आमचे भिक्षेकरी हे कामगार नाहीत, प्रकल्पाचे पार्टनर आहेत, सुट्टी कामगार घेतात… पार्टनर नाहीत…! ‘
यानंतर सेंटरला कुलूप लागले आणि त्यांच्या तोंडालाही…!
☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-२९ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆
जागृत दैवत.. माय माझी जोगेश्वरी…
माझे काका (अण्णा)दुपारी मंदिरात ओट्यावर विश्रांती घ्यायचे. दुपारी बारानंतर गुरव जोगेश्वरीचा पोशाख बदलायचे. एकदा आम्ही भावंड तिथेच लपंडाव खेळत होतो. दोन्ही दरवाजे बाराला बंद व्हायचे. गुरव काहीतरी आणायला म्हणून वरच्या मजल्यावर गेले आणि दोन मिनिटातच खाली आले तेव्हां त्यांच्या लक्षात आलं, देवीचा चांदीचा मुकुट गायब झाला आहे. त्यावेळी फोन नव्हते. पण फरासखाना अगदी जवळ होता. आमच्यातल्याच एका जाणत्याला काकांनी तिकडे पिटाळलं, पोलिसांचं भलं मोठ्ठ पथक धावत आलं, काहीजण मंदिराचा कोपरान् कोपरा धुंडाळू लागले काहींनी मंदिराला घेराव घातला, तर काही पोलिसांनी उलट सुलट प्रश्न विचारून आमची भंबेरी उडवली. पोलीस पथक, अथक दोन दिवस धावपळ करीत होते पण यश आले नाही, आणि काय सांगू तुम्हाला! एक दिवस अचानक चोर मुकुट घेऊन देवीसमोर उभा राह्यला. त्यानी लोटांगण घालून देवीपुढे नाक घासले, डोळ्यातून घळघळा पश्चातापाचे अश्रू ओघळत होते. शब्द फुटले, ” आई मी चुकलो, मी चोरी केली माझ्या हातून पाप घडलंय, पण मला मुकुट परत आणून देण्याची सद्बुद्धी तू दिलीस. मला क्षमा कर देवीआई, माझे अपराध पोटात घाल. ” देवी पुढे क्षमा याचना करणाऱ्या त्याच्या भोवती पोलिसांनी घेराव घातला. चोर पुराव्यानिशी अगदी सहज सांपडला होता आपणहून तो पोलिसांच्या समोर आला आणि म्हणाला, ” इन्स्पेक्टर साहेब बेड्या घाला मला, फटके मारून माझी ‘ ‘खाल ‘उडवा, माझ्या कडून फार मोठं पाप, घडलंय मी अपराधी आहे. मला या पापाचं प्रायश्चित्त मिळायलाच हवं. असं म्हणून त्यानी बेड्या घालून घेण्यासाठी हात पुढे केले, थरथरत्या पायांनी कसंबसं उभं रहात तो म्हणाला, ” पण साहेब मी तुम्हाला एक विनंती करतो, मला फक्त अर्धा कप चहा आणि एक बनपाव द्याल का? दोन दिवसाचा उपाशी आहे हो मी! या पोटासाठी चोरी केली. रात्रभर तळमळत होतो मी. चोरी केल्याची टोचणी मनाला पोखरत होतीच, अपराधी भावनेने, मानसिक ओढाताणीने, उपासमारीने मला ग्लानी आली, मी जमिनीवर कोसळलो. — आणि आणि –पहाटे जोगेश्वरी माझ्या स्वप्नात आली आणि म्हणाली, “उठ! माझा मुकुट परत मंदिरात नेऊन ठेव. ” सत्य की स्वप्न मला कळेना, साहेब, उठायची पण ताकद नव्हती माझ्या अंगात, मी जागा झालो आणि एक प्रकारचं चैतन्य आलं माझ्या हातापायात. खरं सांगतो, मी आईसमोर कसा? कधी? आलो हे मला कळलंच नाही. ” पश्चातापाने रडणाऱ्या त्या तरुणाला बेड्या घालण्यासाठी, आपलं कर्तव्य पार पाडण्यासाठी पोलीस सरसावले. इतका वेळ शांतपणे हा प्रकार बघत असलेले माझे काका आता पुढे झाले, आणि म्हणाले, “इन्स्पेक्टर साहेब मला कल्पना आहे कायद्याने तुमचे हात बांधले गेले आहेत. चोरांनी आपणहून गुन्हा कबूल केला तरी तो कायद्याने गुन्हेगारच ठरतो. पण बेडया ठोकण्याआधी माझी तुम्हाला एक कळकळीची, हात जोडून विनंती आहे, फक्त, फक्त दहा मिनिटं थांबा, ह्याला थोडा वेळ द्या, अपराधी बेकारी मुळे सैरभैर झाला होता, त्यातून उपासमार, पोटात अन्नाचा कण नाही. साहेब माणूस चोरी कां करतो? तर पोटासाठी. रिकाम्या पोटात कावळे ओरडत असतात तेव्हांच रिकाम्या डोक्यात सैतान शिरतो. आणि मग सदविवेक बुद्धी मागे पडून माणसाच्या हातून गुन्हा घडतो. भरल्या पोटी कोण कशाला करेल हो चोरी? जोगेश्वरी च्या दरबारातून त्याला उपाशी जाऊ देऊ नका, फक्त थोडावेळ थांबा. समोरच्या गुंडींच्या हॉटेलमधून मी चहा पाव मागवला आहे, तो या तरुणाला पोटभर खाऊ द्या मग खुशाल त्याला फरासखान्यात न्या”. माझ्या काकांचं बोलणं ऐकून भीतीने आणि भुकेने थरथर कापणारा तो तरुण माझ्या काकांच्या पायावर कोसळला. त्याला प्रेमाने उठवत अण्णा म्हणाले, ” उठ बाळा! माझ्या पाया कशाला पडतोस? जोगेश्वरी आईचे पाय धर. ही सारी तिची कृपा. तिनेच तुला विवेक बुद्धी दिली आहे. ” आणि मग पुन्हा एकदा तो कैदी जोगेश्वरीच्या पायाशी कोसळला. अश्रुंचा अभिषेक माय माऊलीच्या चरणावर झाला.
मंडळी आपणही त्या जोगेश्वरी माय माऊलीच्या चरणावर नतमस्तक होऊ या.
नाकी डोळी छान, साडेपाच फूट उंच, वर्ण गोरा, स्वयंपाकात निपुण, अत्यंत सोज्वळ, डबल ग्रॅज्युएट, सासू-सासरे घरात चालणार आहेत, नवऱ्याला सरकारी नोकरी नसली तरी चालेल, फक्त निर्व्यसनी हवा… इतके गुण असलेली मुलगी, लग्न होत नाही म्हणून दहा वर्षे घरात बसलेली…
काही कारणाने तिला कोणी पसंत करत नाही किंवा तिला तो पसंत पडत नाही….
असं न सांगता येणारं दुखणं…
अशा या मुलीच्या बापाला जो काही त्रास असेल, तोच मला त्रास!
भीक मागणारे आमचे वृद्ध आणि दिव्यांग आई-वडील, आजी-आजोबा यांना काम करण्याची इच्छा आहे परंतु कोणी काम देत नाही, यांच्या पुनर्वसनासाठी रोजगार केंद्र निर्माण करावे यासाठी जागा (स्थळ) शोधतो आहे, परंतु गेली दहा वर्षे कोणी “स्थळ” देत नाही.
काहींनी आम्हाला रोजगार केंद्र सुरू करण्यासाठी “स्थळे” पाठवली, पण ती स्थळे आम्हाला पसंत नव्हती.
जी “स्थळे” आम्हाला पसंत होती… त्यांनी काही ना काही स्वरूपात माझ्याकडे बराच “हुंडा” मागितला…!
नोकरी सोडून वर संशोधन करणारा मी बाप… इतका हुंडा या “स्थळांसाठी” देणं मला कसं परवडेल?
याच परिस्थितीत श्री दानिश भाई धावून आले आणि मध्यरात्रीचे सूर्य या नावाचे रोजगार केंद्र नव्हे, आमची मुलगी त्यांनी आपल्या पदरात घेतली…
बिबवेवाडी येथील स्थळ दिले, नववधूचा विवाहापूर्वी करतात तो मेकअप करून दिला, इथे टीव्ही, फ्रिज, कार्पेट अशा सर्व बाबींचा इंतजाम केला. तोरणे लावली, हार फुले माळा लागल्या, “संसाराला” लागतील त्या सर्व गोष्टी दिल्या…!
खऱ्या अर्थाने त्यांनीच कन्यादान केले…!
मी माझ्या डोक्यावरची पगडी त्यांच्या पायाशी ठेवली… त्यांनी ती उचलून परत माझ्या डोक्यावर घातली…
नावातच “दान” आणि “इश” असलेल्या माणसा पुढे पगडीच काय, संपूर्ण आयुष्य बहाल केले तरी त्यांचे उपकार फिटणार नाहीत…!
तर 30 एप्रिल 2025 रोजी, अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर, हा सोहळा संपन्न झाला.
दहा वर्षांपूर्वी भीक मागणाऱ्या लोकांसाठी स्वतंत्र प्रशिक्षण व रोजगार केंद्र सुरू करायचे पाहिलेले स्वप्न सत्यात उतरले. आमच्या वृद्ध आणि दिव्यांग आई-वडील आणि आजी आजोबा यांच्यामार्फत या रोजगार केंद्रात अक्षय तृतीयेच्या दिवसापासून प्रोडक्शन सुरू झाले.
या सोहळ्याविषयी पुढे लिहिलेच आहे, परंतु मला एवढीच एक “मुलगी” नाही… इतरही अनेक मुलींची अर्थ प्रकल्पांची… जबाबदारी बाप म्हणून माझ्या डोक्यावर आहे.
त्या विषयी अगदी थोडक्यात सांगतो, :
– अत्यंत गंभीर अवस्थेतील 5 रस्त्यावर पडलेल्या रुग्णांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले, त्यांचे जीव वाचले आणि त्यांना आपापल्या गावी स्वखर्चाने पाठवले.
– एक धडधाकट (भीक मागणारा) मुलगा, याला श्री भाटे यांच्या वृद्धाश्रमात नोकरी मिळवून दिली आहे. तिथल्या आजी आजोबांची तो सेवा करेल. मी श्री आणि सौ भाटे यांचा ऋणी आहे.
– रस्त्यावर पडलेल्या आणि हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या अनेक लोकांना अन्नपूर्णा प्रकल्पातून रोज जेवण दिले आहे.
– अनेक आजा मावश्या यांच्याकडून (खराटा पलटण) सार्वजनिक स्वच्छता करून घेऊन त्यांना किराणा (Grocery) दिला आहे.
– या महिन्यात जवळपास 900 लोकांना वैद्यकीय सेवा, लॅब टेस्ट तसेच वैद्यकीय उपकरणे दिली आहेत.
आणखी सुद्धा बरंच काही आहे…
पण सध्या आमच्या मुलीचा नवीन संसार सुरू झाला आहे… त्याचं कौतुक यावेळी जास्त आहे, म्हणून त्याविषयी जास्त सांगतो…
तर, आपणा सर्वांच्या मदतीने शुभाशीर्वादाने, भिक्षेकर्यांच्या पुनर्वसनासाठी वाहिलेले पहिले “प्रशिक्षण व रोजगार केंद्र” अक्षय्य तृतीयेला सुरू झाले
आता नेमका काय आहे हा प्रकल्प ते सांगतो…
याचना करत; भिक मागत जगणाऱ्या लोकांना कोणताही रोजगार उपलब्ध होत नाही, या कारणामुळे त्यांना प्रशिक्षण देऊन, त्यांच्याकडून काही प्रॉडक्ट तयार करून घेऊन, त्यांच्या “हाताला काम” आणि “पोटाला अन्न” सन्मानाने देण्यासाठी हा प्रकल्प निर्माण केलेला आहे.
या प्रशिक्षणा दरम्यान कोणालाही इजा होऊ नये, प्रदूषण कमीत कमी व्हावे किंबहुना प्रदूषणाला आळा बसावा आणि कमीत कमी भांडवलात जास्तीत जास्त उत्पन्न मिळावे
या आधारावर खालील चार प्रकल्प या जागेत सुरू असतील*
रस्त्यावर पडलेल्या फुलांची पावडर (चुर्ण)
डोक्याला लावण्यासाठी आयुर्वेदिक तेल, विविध आजारांवर उपयुक्त असे मसाजसाठी तेल, अनेक मलम, त्वचेची निगा राखणारे क्रीम यासाठी अनेक फार्मा कंपन्यांना खरोखरच्या फुलांची पावडर (Natural/ Organic)हवी असते.
धार्मिक स्थळांमध्ये किंवा रस्त्यावर पडलेल्या अशा फुलांचे निर्माल्य / कचरा आमचे भीक मागणारे लोक (तरुण मुलं) फिरून आम्हास देतील, किलोच्या भावाने आपण त्या विकत घेऊन त्यांना पैसे देऊ.
वृद्ध आणि दिव्यांग लोक बैठ्या स्वरूपात रंगानुसार या फुलांचे वर्गीकरण करतील.
* यानंतर या फुलांचे शुद्धीकरण करून, विशिष्ट तापमानात सुकवून फुलांची पावडर (चूर्ण / फाईन पावडर) केले जाईल. *
* स्वच्छतेचे सर्व निकष पाळून (Extremely hygienic conditions) याचे पॅकिंग केले जाईल, त्यावर स्टिकर लावले जाईल. *
आयुर्वेदिक प्रॉडक्ट बनवणाऱ्या कंपन्यांना, तयार झालेली फुलांची ही नैसर्गिक पावडर आपण देणार आहोत.
आपल्या या प्रकल्पात स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही साधले जात आहेत….
रस्त्यावरचा कचरा आणि निर्माल्य उचलले जाईल… (जे नदीत जाते आणि नद्या प्रदूषित होतात)
कचरा आणि निर्माल्या मधून तयार होणारी लक्ष्मी… कितीतरी भुकेल्यांची भूक भागवून अन्नपूर्णा होईल… भीक मागणाऱ्या लोकांना स्वयंपूर्ण बनवून सन्मानाने जगण्याचा आशीर्वाद देईल!
शोभेचा बुके
तुळशी बागेत खोटे परंतु अत्यंत आकर्षक मोती मिळतात, सोन्यासारख्या दिसणाऱ्या तारा मिळतात. माझी आई या सर्व बाबींचा उपयोग करून अत्यंत सुंदर असा एक बुके तयार करते. फुलांचा बुके कितीही महाग असला आणि छान असला तरी तो चार दिवसांपेक्षा जास्त टिकत नाही. आपण कोणालाही तो भेट दिला तरी ती व्यक्ती, पुन्हा कचऱ्यात फेकून देते.
माझी आई, जो बुके बनवते, तो दिसतो इतका सुंदर, की कुणीही प्रेमात पडावं…!
आणि याचे सौंदर्य किमान पाच वर्षे टिकते.
आईच्या मार्गदर्शनानुसार, आमच्या लोकांनी तयार केलेले बुके आम्ही सर्व लोकांना घेण्याची विनंती करू, देणगी म्हणून ते जे काही मूल्य देतील ते आपल्याकडे काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस पगार म्हणून दिला जाईल.
☆ माझी जडणघडण… अंजु.. – भाग – ४३ ☆ सौ राधिका भांडारकर ☆
(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)
अखेर तुझी झुंज संपली. आज तू अनंतात विलीन झालीस.
या चिरनिद्रेत तुझ्या सार्या यातना, वेदना मिटून गेल्या. तुला अखेरचा अश्रुपूर्ण निरोप देताना म्हणेन, ‘ जिथे असशील तिथे सुखात रहा. ’
आठवणी खूप आहेत. साठ पासष्ट वर्षांची आपली निखळ मैत्री. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपण एकत्र होतो. त्यात निरागस बालपण होतं, तारुण्यातलं उमलणं होतं. दोघींच्याही वैवाहिक जीवनातले असंख्य क्षण, अनुभव, भलं-बुरं-आनंदाचं-दु:ख्खाचं सारं सारं सतत अगदी या संध्यापर्वातही कालपर्यंत शेअर केलं.
मैत्रीतली पारदर्शकता आपण सतत जपली.
तू अमेरिकेला गेलीस पण हे साता समुद्राचे अंतर सुद्धा आपल्यात मात्र अंतर पाडू शकले नाही.
अगदी परवा परवाच तू म्हणालीस, “तुझी आणि माझी मैत्री” हाच माझा खरा आनंदाचा ठेवा..!! “
अंजु, मी सुद्धा हेच म्हणेन. आपल्या या मैत्रीनेच आपल्याला घडवलं.
तुझी जीवनाबद्दलची सकारात्मकता, सदैव आनंदातच राहण्याची वृत्ती, एखाद्या गुलाबदाणीसारखा, गुलाबपाणी शिंपडणारा तुझा सहवास मला लाभला. मी किती भाग्यवान!!
झुंजार वृत्तीने तू या असाध्य व्याधीशी हसतमुखाने, स्वीकृत भावनेने लढत होतीस. कायम प्रसन्न राहिलीस. तुझा खिलाडुपणा, सारं काही सहज आणि आनंदाने विनातक्रार स्वीकारण्याचा तुझा स्वभाव शेवटच्या क्षणापर्यंत टिकून होता.
आजकाल तुझा, खूप दिवस फोन आला नाही, मेसेज आला नाही की काळीज धडधडायचं. तुला फोन करण्याचं धाडसही व्हायचं नाही. “नो न्यूज ईज अ गुड न्यूज” असं समजून शांत रहायचा मी प्रयत्न करायची. आणि मग एक दिवस तुझा फोन यायचा,
“मी अगदी बरी आहे. मस्त आहे. चिंता नको करुस. इतक्यात नाही जाणार. अगं! उरलेले दिवस फक्त आनंदच वेचणार. “
मग खूप गप्पा. काॅलेजचे दिवस. त्या टिंगल टवाळ्या, काही गंमतीदार लोकांच्या आठवणी आणि खूप काही. तेव्हां माझेही जडावलेले श्वास स्थिर व्हायचे. तू खूप चांगल्या मूडमध्ये होतीस.
म्हणालीस, “ऐक हं! तुला एक छान गाणं म्हणून दाखवते.. ” किती सुंदर, भावपूर्ण, मधुर आवाजात गायचीस!
ते सूर मी माझ्या मनात ठेवलेत.
अंजु, आता तुझे नसणे सोसणं कठीण असलं तरी मी ठरवलंय्, रडायचं नाही. तुझ्या आठवणीतच रमायचं मी ठरवलंय्. तुझ्या मैत्रीचं दान तू मला दिलंच आहेस. तू नसलीस तरी माझी झोळी रिकामी नाही.
प्रत्येक चार चाकी वाहनात सामान ठेवण्यासाठी छोटीशी जागा असते. त्या डिकीत आपण आपले सामान ठेवत असतो. चोखंदळ लोकं त्या डिकीची धारण क्षमता पाहून गाडीची निवड करीत असतात….!
समजा गाडीला डिकी नसती, तर मनुष्याला सामान मांडीवर ठेवून प्रवास करावा लागला असता, आणि तो सुखावह झाला असता…?
पहा कल्पना करून….
जीवनप्रवास आनंदाने करायचा असेल तर आपल्या मनावरील, मनातील, मनाच्या आजूबाजूचे ओझे ठेवायला एखादी डिकी शोधून ठेवायला हवी, नाही का?
गोरेगाव, मुंबई येथे माझी सन्मित्र मंडळाची शाळा. तळमजल्यावर बालवाडी ते चौथीपर्यंतच्या इटुकल्या पिटुकल्यांचा कलकलाट ऐकू येतो, हीच ती ‘बैरामजी जीजीभॉय प्राथमिक शाळा’. याच शाळेत १९७९ साली सौ. गीता वासुदेव नलावडे – आमच्या नलावडे बाई (8655846810) यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि माझ्यासकट शेकडो मुलांच्या आयुष्याला वेगळीच कलाटणी दिली.
बाई शिक्षिका म्हणून रुजू झाल्या तेव्हा त्यांचे शिक्षण फक्त ११वी मॅट्रिक व DEd पर्यंतच होतं. लग्नानंतर नोकरीबरोबरीने शिक्षण चालू ठेवण्याचा आग्रह व सक्रिय पाठिंबा नवऱ्याचा हे त्या आग्रहाने नमूद करतात. MA, DEd झालेल्या बाई वयाच्या अवघ्या तिसाव्या वर्षी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका झाल्या होत्या.
तुमच्या पैकी ज्यांना १ – २ मुलं आहेत, त्यांनी त्या मुलांची लहानपणाची वयं आठवा. त्यांची दंगामस्ती, क्षणाक्षणाला बदलणारे त्यांचे मूड व रंगढंग आठवा. दर वर्गात अशा ४०-५० मुलांना बरोबर घेऊन वर्षानुवर्षं स्वत:चं डोकं शांत ठेवत या मुलांना ठाकून ठोकून तयार करण्याच्या आपल्या कामात बाईंनी स्वत:ला गुंतवून घेतलं. मला वाटतं देव प्राथमिकच्या शिक्षकांना जास्ती पेशन्सचा बोनस देत असावा.
मुलांनी चावटपणा करून ‘बाई तुमचं अक्षर चांगलं नाही, वाचता येत नाहीये’ असं म्हटले किंवा उगाच व्याकरणाच्या चुका काढल्या तरी अशा घटनांचा बाऊ न करता बाईंनी या गोष्टी आपल्याला सुधारणेला वाव आहेत म्हणून स्वीकारल्या – त्या मुलांबद्दल कोणताही राग वा आकस न बाळगता.
सगळ्यांच्यातच काही ना काही चांगले आहे हा बाईंचा ठाम विश्वास. ते शोधून काढणे व त्यांना तशी कामं देणे यात बाईंचा हातखंडा. त्यामुळे आपण इकडचे कामाचे डोंगर तिकडे केलेत याचे भान ना त्या सह-शिक्षिकांना रहातं ना त्या मुलांना. कोणाचं चुकलं की त्याला ‘धपाटे देईन हं’ असे म्हणायचं (बाई मारायच्या नाहीत कधी, नुसतीच शाब्दिक धमकी) आणि बरोबर आले की पैकीच्या पैकी मार्क देऊन टाकायचे असा सगळा रोखठोक कारभार.
कोणतीही अवघड परिस्थिती आल्यावर न डगमगता तिचा सामना करणे ही बाईंची खासियत. मग बोरिवलीच्या नॅशनल पार्कमध्ये चाळीस विद्यार्थी सहलीला घेऊन गेल्या असता वाघोबा आमने सामने येणं असो किंवा कोकणात किर्र अंधाऱ्या रात्री सुनसान रस्त्यावर मुलांना सोबत घेऊन बसची वाट पहाणं असो किंवा सिंहगड किल्ल्यावरून वांड मुलांना घेऊन अंधारात खाली येणं असो.
कुठेही गैरप्रकार दिसला किंवा आपल्या मुलांना कोणी त्रास देताना दिसलं की तिथे मात्र दयामाया हा शब्द बाईंच्या शब्दकोशात नसतो. आमच्याच माध्यमिक शाळेतल्या मुलीची एका मवाल्याने – स्थानिक गुंडाने – छेड काढल्यावर, पुरुष सहकारी चाचरताना, रणरागिणीचे रूप घेऊन बाईंनी भर रस्त्यात त्याच्या मुस्कटात भडकावून पोलिसांच्या स्वाधीन केले होते.
मुलांच्या विकासासाठी, अनेकानेक सामाजिक कामांसाठी बाईंनी विविध उपक्रम शाळेत राबवले. ‘श्वास’ चित्रपटासाठी मुलांनी स्वत: आकाशकंदील बनवून विकले व आलेले पैसे अभिनेता अरुण नलावडे यांना दिले होते.
खुर्चीत असले की मी शिक्षक / मुख्याध्यापिका आहे, शाळा सुटली की मी तुमच्यातलीच आहे – तुमची मैत्रीणच आहे – असं सहशिक्षिकांना आवर्जून सांगणाऱ्या बाई सतत नवीन गोष्टी शिकण्याचा आग्रह धरतात. बाईंचे सर्व सहकाऱ्यांशी इतके घरच्यासारखे संबंध होते की सर्वोत्कृष्ट शिक्षकाच्या महापौर पुरस्कारासाठी करावयाचा अर्ज व फाइल सहशिक्षिकांनीच तयार केली व पाठवली. बाईंना १९९७-९८ सालाचा महापौर पुरस्कार मिळाला व पुढे अतिशय बहुमानाचा २००९-१० चा आदर्श शिक्षिकेचा राष्ट्रपती पुरस्कारही. बाईंच्या अथक प्रयत्नांनी व सोमण बाई, बर्वे बाई, पाटील बाई, धारप बाई, सुमन ताई आणि त्यांच्या अगणित सहकाऱ्यांच्या साथीने शाळेला २०००-०१ सालचा ‘आदर्श शाळा’ पुरस्कार मिळाला, A ग्रेडसुद्धा मिळाली व मिळत राहिली.
बाईंनी आम्हा दिवट्यांच्याच आयुष्यात प्रकाश पाडला असं नाही तर त्या आम्हा विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचा एक अविभाज्य घटकच होत्या – आहेत. कुटुंबाला उभं करताना बाईंनी विद्यार्थ्यांच्या आई वडिलांना मदत केली आहे, आर्थिक मदत तर केलीच पण कित्येकांचे संसारही मोडण्यापासून वाचवले आहेत.
“असंही माझ्या डोळ्यात पटकन पाणी येतं. पण एकदा तर फारच अवघड परिस्थिती झाली होती, ” बाई सांगत होत्या, “एक गरीब मुलगा होता, त्याला आपल्या शाळेत शिशु वर्गात प्रवेश घ्यायचा होता. त्याची आई धुणी भांडी करायची. शाळेत प्रवेश घेण्यापूर्वी १, ००० रुपये refundable deposit घ्यायचं असायचं. हे म्हटल्यावर तिने रुमालाची पुरचुंडी काढली. त्यात तिने वेळोवेळी साठवलेल्या रुपया, दोन-पाच रुपयाच्या नोटा होत्या. पण ते सगळे पैसे जेमतेम चार – पाचशेच भरत होते.
मी तिला सांगितलं ‘तुमच्या मुलाचं नाव लागलंय, तुम्ही काळजी करू नका. पण शक्य तेवढ्या लवकर उरलेले पैसे भरून टाका म्हणजे प्रवेश पक्का होईल’, तर ती दुसऱ्याच दिवशी हजर. हातात पन्नासच्या नव्या नोटा. ‘क्लार्कला पैसे द्या’ म्हणून सांगणार इतक्यात माझं लक्ष तिच्या ओक्याबोक्या गळ्याकडे गेलं. तिने तिचं मंगळसूत्र गहाण ठेवून पैसे उभे केले होते. बापरे, तिला ते पैसे तसेच परत केले आणि मंगळसूत्र सोडवून आणायला सांगितले. माणसं चांगली असतात रे, परिस्थिती त्यांना वाईट बनवते. “
बाईंच्या कुंडलीत मुलांशी गट्टी असा एक मोठ्ठा योग आहे. शाळा सोडून वर्षे उलटून गेली तरी जगाच्या कानाकोपऱ्यातून बाईंना फोन येत असतात. कुठल्याही गोष्टीचा मुलांच्या angle ने विचार करणे, त्यांच्या मनात शिरणे ही हातोटी साधलेल्या बाई विद्यार्थीप्रिय झाल्या नसत्या तरच नवल होतं.
आणि ही गट्टी मुलांनी शाळा सोडल्यावर, त्यांची शिक्षणं पूर्ण झाल्यावर, अगदी नोकऱ्या लागल्यानंतर, पार लग्नानंतरसुद्धा तितकीच घट्ट रहाते. फक्त नंतर झुकतं माप मुलांपेक्षा कुटुंबातील नव्या members ना – सुना-जावयांना दिलं अशी जरा एक गोड तक्रार मात्र येते.
देश विदेशी विखुरलेल्या आम्हा नर रत्नांना बाईंना प्रत्यक्ष भेटण्याची सुवर्णसंधी मिळाली गेल्या वर्षीच्या जानेवारीत (२०१९). निमित्त होतं शाळेच्या ६० वर्षं पूर्ण होण्याचं. माजी विद्यार्थी संघाने शाळेच्या सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्याचा घाट घातला होता. कार्यक्रम संपल्यावर बाईंनी सांगितलं की राष्ट्रपती पुरस्काराच्या वेळेला खूप बंधनं होती, नियमावली होती. इथं तसं नव्हतं. इथं माझ्यात आणि माझ्या मुलांच्यात कोणताच अडथळा नव्हता, त्यामुळे त्या पुरस्कारापेक्षा हा पुरस्कारच मला जास्त भावतो.
निवृत्तीनंतर बाई आता DSK विश्व, पुणे येथे स्थायिक झाल्या आहेत. निवृत्तीनंतर म्हणजे शाळेतून निवृत्ती, बरं का! कारण सोसायटीत सगळ्यांनी गळ घालून बाईंना कमिटीवर घेतले. मग गरजेनुसार ‘धपाटे देईन हं’ म्हणून आणि पैकीच्या पैकी मार्क्स देऊन काम करवून घेण्याचा त्यांचा शिरस्ता आता या मुक्कामी चालू आहे.
बाईंची धावपळ व सामाजिक बांधिलकी अजून चालूच आहे. मुंबईत रात्र शाळेच्या त्या सह सचिव (joint secretary) आहेत. पुण्यात त्यांचं भगवद्गीता, सप्तशतीचा पाठ शिकणे, पठण करणे चालू असतं. DSK विश्वमधील ज्येष्ठ नागरिक संघाच्या सदस्य व बाई यांनी एके दिवशी प्रत्येकी एक एक समास हाती लिहून काढून एका दिवसात संपूर्ण दासबोध लिहूनही घेतला, त्या हस्तलिखिताचं binding करून घेतलं आणि ते बाड शिवथरघळीत पादुकांवर ठेवलंही.
समर्थ दासबोधात दहाव्या समासात म्हणतात :
महंते महंत करावे,
युक्तीबुद्धीने भरावे,
जाणते करून विखरावे,
नाना देशी.
समर्थच असेही म्हणतात की
आपणासी जे ठावे,
ते ते दुसऱ्यासी सांगावे,
शहाणे करून सोडावे,
सकळ जन.
हल्लीच्या काळात पु ल आपल्या चितळे मास्तरांच्या मुखाने सांगतात – आयुष्यात व्रत एकच केले. पोरगं सापडलं तावडीत की त्याला घासूनपुसून जगात पाठवून देणं. बाई अख्खं आयुष्य याच तत्वांवर जगत आल्या आणि अजूनही ती वाटचाल चालूच आहे.
जुन्या काळच्या एकत्र कुटुंबांत आजीची ढीगभर नातवंडे असत. सगळ्याच नातवंडांना वाटायचे की आपणच आजीचे लाडके. बाईंच्या आम्हा सगळ्या विद्यार्थ्यांचं तसंच आहे. आणि या प्रेमाचा अभ्यासातील गुण किंवा जीवनातील यशस्वी होण्या न होण्याशी अर्थाअर्थी काही संबंध नसतो बरं का!
आणि हो, बाई शाळेतून कधीच निवृत्त झाल्या पण आजही मुंबईत, सरकार दप्तरी गोरेगावची बैरामजी जीजीभॉय शाळा “नलावडे बाईंची शाळा” म्हणूनच ओळखली जाते, बरे का!
सोलापूर मध्ये अनेक शाळांची मिळून एक विज्ञान दिंडी निघालेली होती. त्यावेळेला एक विज्ञान प्रदर्शन ‘नॉर्थकोट टेक्निकल हायस्कूल’ मध्ये भरले होते. त्याचे उद्घाटन आदरणीय डॉक्टर जयंतराव नारळीकर यांच्या हस्ते झाले. त्यानंतर शालेय मुलांसाठी हुतात्मा स्मृती मंदिर येथे नारळीकरांचे व्याख्यान होणार होते. विज्ञान दिंडी निघाली होती. या दिंडीमध्ये अनेक विद्यार्थी, शाळा सहभागी झालेल्या होत्या. सरस्वती मंदिर पासून हि विज्ञान दिंडी निघून, ती नवी पेठ मार्गे मेकॅनिक चौकातून हुतात्मा स्मृती मंदिर जवळ विसर्जित झाली. एका मोठ्या उघड्या टेम्पोमध्ये मी एक रोबोट बनवला होता. त्या रोबोटच्या आत श्रद्धा कुलकर्णी नावाची एक विद्यार्थिनी होती. ती आता अमेरिकेत सी. ए. आहे. उंचीने लहान असल्यामुळे तिला रोबोटचा पूर्ण पोशाख घातला होता. अर्थातच् संपूर्ण रोबोट थर्माकॉलचा बनवलेला होता. हात ताठ होते. मुंडके मात्र हालत होते.
लोक रस्त्यावरून त्या रोबोटला फुलं देत होते, खाऊचे पुडे देत होते. रोबोट सर्वांना हात हालवून अभिवादन करीत होता. अशा पद्धतीने ती विज्ञान दिंडी हुतात्मा स्मृती मंदिर पाशी विसर्जित झाली. त्याचे स्वागत डॉक्टर नारळीकरांसह अनेकांनी केले. रोबोटने नारळीकरांना एक पुष्पगुच्छ दिला. नारळीकरांनी तिला शुभेच्छा दिल्या आणि डोक्यावर हात ठेवला. पण मानवी संस्कारी सवयीप्रमाणे ती खाली वाकली आणि तिचे रोबोटचे तात्पुरते घातलेले मुंडके नकळत खाली पडले. नारळीकर सर पटकन म्हणाले, ‘‘सो द ट्रुथ कम्स आऊट”…
मी त्यांच्या शेजारीच उभी होते. मी त्यांना म्हणाले, ‘‘सत्य शोधणे हेच तर विज्ञानाचे काम आहे ना! ! ” त्या माझ्या अपेक्षित आणि पटकन् आलेल्या उत्तरावर ते खूप खुश झाले. त्या दिवशी त्यांचे व्याख्यान खूप सुंदर झाले. त्यांच्या स्वागतासाठी एक खास ‘स्वागत गीत’ मी लिहिले होते आणि आमच्या विश्वकर्मा बाईंनी ते सादर केले होते. झपतालामध्ये ते गीत होते. मला संगीतातला तो ताल-बिल काही कळत नव्हता. मग त्यांनी मला त्या तालातले एक गाणं दिलं… ‘‘अजी रुठ कर अब कहा जाईयेगा… ” आणि मी त्याच चालीवरती एक स्वागत गीत तयार केले होते. स्वागत गीताला खूप टाळ्या पडल्या. संपूर्ण हुतात्मा स्मृती मंदिर प्रेक्षकांनी भरले होते. त्यांचे व्याख्यान विद्यार्थ्यांसाठी खूप सुंदर झाले. आमच्या विज्ञान दालनाचेही त्यांनी भरपूर कौतुक केले.
अतिशय विद्वान असा हा माणूस होता. भारतीय संस्काराने परिपूर्ण आणि विज्ञानावर विलक्षण निष्ठा होती. खगोलशास्त्रावरती अनेक पुस्तके त्यांनी लिहीली आहेत. अनेक सन्मान त्यांना प्राप्त झाले होते. अशा व्यक्तीच्या सहवासात पाच तरी मिनिटे घालवता आली… हे आमचे भाग्यच!
आजच्या खगोलशास्त्रीय विज्ञान संशोधनात त्यांचा खूप मोठा असा ‘सिंहाचा वाटा’ आहे. अशा या महान खगोलशास्त्रज्ञाला आमचा मानाचा मुजरा आणि भावपूर्ण श्रद्धांजली. खूप मोठा ऐवज आज आम्ही हरवला आहे. त्यांच्या जाण्याने एक विज्ञान तपस्वी नाहीसा झाला. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.