☆ “दृष्टिकोन बदला, विचार बदलेल – –” ☆ श्री जगदीश काबरे ☆
खूप खूप वर्षांपूर्वी वाचलेली गोष्ट. एका छोट्याशा गावात आकाशवाणी होते, “ज्यांना स्वर्गप्राप्ती हवी असेल त्यांनी संध्याकाळी गावाच्या वेशीवर जमावे. ” संध्याकाळी जवळजवळ सारा गाव वेशीवर जमा होते. काळोख पडण्याच्या सुमारास पुन्हा आकाशवाणी होते, “आता सर्वांनी आपापल्या डोळ्यांवर पट्ट्या बांधाव्यात आणि जंगलाच्या दिशेनं वाटचाल सुरू करावी. ”
त्याप्रमाणे डोळ्यांवर पट्ट्या बांधून गावकरी चालू लागतात. पडत, ठेचकाळत, तोंडाने शिव्याशाप उच्चारत काही तास वाटचाल केल्यावर पुन्हा आकाशवाणी होते, “तुमच्यापैकी तिघांनी माझी आज्ञा पाळली नाही. त्यांनी डोळ्यांवर पट्टी का बांधली नाही ह्याची कारणे सांगावीत!”
“मी व्यवसायाने वैद्य आहे”, पहिला इसम बोलला, “ह्या जंगलात बर्याच औषधी वेलीवनस्पती आहेत. मी त्यांचे वर्णन आणि उपयोग लिहून ठेवत आहे. तो कागद इथेच सोडणार. पुढेमागे ह्या वाटेनं जाणाऱ्या कुणाला तरी तो सापडेल आणि समाजासाठी उपयोग करेल!”
“मी चालू लागल्यावर लगेचच ठेचकाळून पडलो. ” दुसरा इसम बोलला, “मनात विचार आला की, असे बरेचजण पडत असतील म्हणून मी पट्टी काढून टाकली आणि पडणार्यांना आधार देऊ लागलो!”
“मी पट्टी बांधलीच नाही, ” तिसरा इसम म्हणाला, “कुणीतरी सांगतो म्हणून तसं वागायचं माझ्या स्वभावात नाही. माझा मार्ग मी निवडतो. मग खड्ड्यात पडलो तर मी मलाच दोष देईन. मजल गाठली तर ते यश माझेच असेल!”
“तुम्हा तिघांनाही आपापला स्वर्ग सापडला आहे”, पुन्हा आकाशवाणी झाली, “तुम्ही इथून परत फिरलात किंवा असेच पुढे चालत राहिलात तरी चालेल. इतरांनी मात्र आपली वाटचाल चालू ठेवावी!”
थोडक्यात काय तर, प्रत्येक माणसाचा स्वर्ग हा पृथ्वीवरच आहे आणि ह्या पृथ्वीचा स्वर्ग करायचा की नरक हे त्या माणसाच्या हातातच आहे.
उदाहरणार्थ, नदीला देवी म्हणून पुजत असतानाच नदीचे गटार करण्याचा नीचपणा आपल्याला सोडावा लागेल. स्त्रीची देवी म्हणून आरती करताना स्त्री ही उपभोग्य वस्तू आहे, असे समजणे सोडून द्यावे लागेल. चातुर्वर्ण्य व्यवस्थेतून आलेलीच श्रेष्ठ-कनिष्ठतेची वृत्ती सोडून द्यावी लागेल. प्रत्येक माणसाशी माणसासारखा माणुसकीने व्यवहार करावा लागेल. स्वतःच्या जबाबदारीवर जगायला शिकावे लागेल. मगच दृष्टिकोन बदलला तर विचार बदलेल आणि विचार बदलले तर पृथ्वीचा स्वर्ग होईल.
तो म्हणाला.. “हे बरोबर नाही नववर्षाचं स्वागत करायचं नाही. आपलं वर्ष गुडीपाडव्याचं.. “त्यां”चं अनुकरण करायचं नाही”
मी म्हणालो.. “ आजची तारीख काय?”
“३१ डिसेंबर”
“आजची तिथी काय?’
“माहीत नाही”
“मग आपलं नक्की काय?”
“ मला रोजची तारीख माहिती.. माझं सगळं नियोजन तारखेवर… म्हणून माझं नववर्षही तारखेवर.
“ मग पाडवा? “
“ तो ही माझा आहेच. मी आनंदाचा प्रवासी, जिथे आनंद तिथं मी. ‘शादी किसीकी हो, अपना दिल गाता है. ’
ही माझी वृत्ती, हा माझा पिंड… खरं तर प्रत्येक सकाळ ही एका नववर्षाची सुरुवात असते. ‘ सवेरेका सूरज हमारे लिये है ‘ असं म्हणणारा कलंदर मी…..
…. ‘ न जाने कौनसा पल मौत की अमानत हो.
हर एक पलको खुशी से गले लगाते जियो
.. हीच वृत्ती असावी. खरं म्हणजे प्रत्येक क्षणच नवा असतो, नवा जगायचा असतो. कोणता क्षण अंतिम असेल हे काय ठाऊक? म्हणूनच प्रत्येक क्षण साजरा करावा. प्रत्येक दिवस साजरा करावा. पण रोज साजरा करायला जमतंय कुठं? जमलं तर तेही करावं. कुणाच्याही आनंदात आपला आनंद शोधावा.
आनंदाला ना जात ना धर्म ना देश. म्हणूनच – –
.. ‘ आनंदाचे डोही आनंद तरंग…’ असं म्हणत मित्रांनो साजरा करूया “ निखळ आनंद “….
बोलता बोलता 2024 सरल निरोप देतांना आपण या वर्षात काय मिळवलं, काय सोडलं, काय चुकलं आणि काय राहून गेलं हे मनातील विचार मंथन चालू झालं….
” माणुसकी हरवली का, ती जपली का?. हेच प्रश्न मनाला विचारले…
स्वतः साठी किती जगलो, समाजासाठी किती पळालो, दुसऱ्यांना किती उपयोगी आलो…
” मनातील वाईट विचार काढून चांगले विचार आत्मसात केले हे महत्वाचे…
” सकारात्मक विचाराने तर प्रगल्भ विचारांची देवाण घेवाण होते व समाज प्रबोधन होते एक सुंदर संदेश समाजास मिळतो…
” नकारात्मक विचार आनंद मिळू देत नाही, गैरसमज निर्माण करून नाती टिकू देत नाही हे लक्षात घ्यायला हवं…
आपण, समाजाचे काहीतरी देणं लागतो हे लक्षात ठेऊन कार्य केल तर निस्वार्थी समाज सेवा घडली जाते यात शंकाच नाही…
सात्विक विचार दुसऱ्याप्रति आपुलकीची भावना कळकळ हे आदर्श माणुसकीचा ठेवा आहे तो सर्वांना मिळावा थोडं तरी दुःख हलकं होईल…
” एक अशीच पोळीभाजीच कामं करणारी महिला होती, खूप गरीब आणि प्रामाणिक होती…
” बिचारीला पतीदेवांचे सुख अजिबात नव्हते सतत भांडणं तिला मारणे चालू होते…
एक दिवस तिला खूप मारलं रक्त आलं तोंडातून हिरवं निळं अंग झालं…
त्याही परिस्थितीमध्ये ती माझ्याकडे आली बॅग घेऊन म्हणाली “. मी आता इथे राहत नाही मी माहेरी जाते… मी तिला म्हणाले तू आज इथे रहा आपण उद्या बोलू.
” तिला चार दिवस ठेऊन घेतलं, समजून सांगितलं थोडा राग शांत झाला तब्बेत सुधारली… ” तिला म्हणाले तू वेगळी रहा, इथेच कामं करतेस ते कर.. जून वाढव … पण माहेरी जाऊ नको…
जो मान तुला इथे राहून मिळेल तो माहेरी काम करूनही मिळणार नाही ” तिला ते पटलं आणि ती रूम घेऊन राहायला लागली…
” बऱ्याच वर्षांनी मी तिच्याकडे गेले तर चाळीतील घर जाऊन दोन माजली माडी झाली होती. तो एक योग्य सल्ला योग्य निर्णय तिच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरला आणि तीच आयुष्य सुधारलं….
, ” माणुसकी, सकारात्मक विचार योग्य दिशा दाखवतात…
” नवीन वर्ष सुरु झाल्यावर मनाशी संकल्प करावा आणि तो वर्षात पूर्ण करावा…
” मी, स्वतःसाठी जगेनच पण इतरांना वेळेनुसार मदत करेल…
गरिबांना मदत करेल परिस्थिती नुसार गरीब मुलांना शिक्षण देईल…
” निराधारांना आधार अनाथ मुलांना आश्रय देईल, माझ्या कुवतीनुसार मी नक्कीच प्रयत्न करेन….
” आज पैसा, यश, समृद्धी सगळीकडे आहे नाही फक्त ” वेळ “.. तो देता आला पाहिजे…
” आई वडील वयस्कर झाले मुलं परदेशीआहेत, त्यांना सांभाळायला 50 हजार पगार देऊन केअरटेकर ठेवले सर्व सुविधा दिल्या…. तरीही आई वडील नाराज राहू लागले त्यांचं मन उदास असल्याने तब्येत बिघडू लागली…
” त्यांना हे काही नको होत, फक्त मुलांचं प्रेम आणि नातवंडाचं सुख हवं होत…
“मुलांनी आई वडिलांच्या प्रेमाच्या मायेच्या बदल्यात काय दिल तर पैसे फेकून केअरटेकर… हे प्रेम आहे कि उपकाराची परतफेड… तसं असेलतर आई वडिलांचे उपकार कुणीच फेडू शकत नाही.
विचार आला मनात ” आपण माणुसकी जपली ना, काहीतरी कार्य केल ना… तेंव्हा मन म्हणतं हे वर्ष सुंदर गेलं, नवीन वर्षात अजून कामं करेन…
“खूप प्रश्न भेडसावत आहेत समाजात खूप प्रश्न सोडवायचे बाकी आहेत.
“वाढते वृद्धाश्रम, बेकारी, मुलांचे लग्न हा तर फार मोठा प्रश्न निर्माण झाला आहे…
“समाजात परिवर्तन घडवणं आपलं काम आहे, अपेक्षा करण्यापेक्षा आव्हानाला सामोरं जाऊन स्व कष्टाने मिळवलेलं कधीही चांगलं…
“ज्या आईवडिलांनी घडवलं पायावर उभं केलं याची जाणीव ठेवून दोन शब्द प्रेमाने बोलून त्यांना सांभाळणं हे लक्षात ठेवले तर वृद्धाश्रमाची गरज कशाला लागेल.
“सरते शेवटी काय झालं, काय केलं, हा आनंद मनात ठेवून काय राहिलं, याचा संकल्प करून 2024 ला निरोप देऊन 2025 च स्वागत करूया…
☆ माझी कामाठीपुर्यातली भिक्षुकी – मी धूपार्तीचा भिक्षुक.. ! – भाग – २ – लेखक : श्री तात्या अभ्यंकर ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆
(साला, मी एक पांढरपेशा उच्चभ्रू? जाऊ दे, तो चर्चेचा विषय आहे! झमझम बारमध्ये महिन्याकाठी सताठशे रुपये पगार मिळणारा मी उच्चभ्रू? ) – इथून पुढे
त्या गल्लीच्या मागल्या बाजूसच एका चाळवजा इमारतीत वेश्यायवसाय चालतो.. मला त्या लहानश्या खुराड्यातील तेवढ्याच लहानश्या मोरीवजा बाथरुमात नेण्यात आले.. त्या घरची मावशी अन् आजूबाजूच्या वेश्या यांनी मला वाट करून दिली.. एरवी बाराही महिने फक्त पोटातल्या भुकेच्या डोंबाचा अन् पर्यायाने केवळ वासनेचाच वावर असणार त्या खोलीत.. परंतु त्या दिवशी मला तसं काही जाणवलं नाही.. सण-उत्सवाचा, गणपतीच्या वातावरणाचा परिणाम? भोवती त्या वेश्यांची दोन-चार कच्चीबच्ची घुटमळत होती. कुणाच्या हातात गणपतीच्या पुढ्यातलं केळं तर कुणाच्या हाताता आराशीमधली चुकून सुटलेली रंगेबेरेंगी नकली फुलांची माळ, कुणाच्या हातात साखरफुटाणे तर कुणाच्या हातात कुठुनशी आलेली एखादी झांज! मला क्षणभर अभिमान वाटला तो माझ्या उत्साही व उत्सवप्रिय मुंबापुरीचा! काय काय दडवते ही नगरी आपल्या पोटात!
सोबत तो टकला हिजडा होता. त्यानं माझ्या हातात एक नवीन साबणाची वडी आणि स्वच्छ टॉवेल ठेवला..
मी स्नान करून, टॉवेल नेसून बाहेर आलो.. आसपासच्या वेश्यांचं तोंड चुकवून अंगात शर्टप्यान्ट चढवली.. त्या टकल्या हिजड्याचं मात्र मला खरंच खूप कौतुक वाटत होतं.. तो मोरीच्या बाहेरच थांबला होता.. ‘हा आज आपला पाहुणा आहे आणि याला काय हवं नको ते आपण पाहिलं पाहिजे. ‘ एवढी एकच तळमळ दिसत होती त्याच्या चेहर्यावर.. ! उच्चभ्रू समजातल्या सो कॉल्ड हॉस्पिटॅलिटीचा त्यानं कोणताही कोर्स केलेला नव्हता.. !
तेवढ्या पाच मिनिटात त्या मावशीने चा करून माझ्या पुढ्यात कप धरला.. कोण ही मावशी? ८-१० वेश्यांचं खुराड सांभाळणारी.. तिनं मी अंघोळीहून येईस्तोवर माझ्याकरता चा देखील टाकाला?!
कपडे घातल्यावर त्या टकल्यानं ते अय्यप्पाचं पवित्र मानलं गेलेलं कुठलंसं वस्त्र उपरण्यासारखं माझ्या खांद्यावर घातलं.. आम्ही त्या खोलीतून बाहेर गणपतीपाशी आलो आणि मी मुख्य गाभार्यात शिरलो..
“तात्यासेठ, ये लक्ष्मी है.. इसको बोलो पूजा कैसे करनेका, क्या करनेका.. !”
त्यांच्यातला एक लक्ष्मी नावाचा एक तरूण रूपवान हिजडा छानशी साडीबिडी नेसून तिथंच पूजा करायला म्हणून उभा होता.. माझं सहजच समोरच्या तयारीकडे लक्ष गेलं.. फुलं, अक्षता, अष्टगंध, समया, उदबत्त्या.. सगळी तयारी अगदी अपटूडेट होती.. ते सगळं पाहिल्यावर मी स्वत:ला विसरलो.. आपण एक सुशिक्षित सुसंस्कृत पांढरपेशे आहोत आणि मुंबैच्या कामाठीपुर्यात उभे आहोत ही गोष्ट मी विसरून गेलो. माझं मन एकदम प्रसन्न झालं..
सुसंस्कृत, सुसंस्कृत म्हणजे तरी काय हो? नस्ता एक बोजड शब्द आहे झा़लं.. त्या क्षणी माझ्या आजुबाजूचे ते सारे हिजडे सुसंस्कुत नव्हते काय?!
“प्रारंभी विनती करू गणपती.. “
दशग्रंथी तात्या अभ्यंकराने पूजा सांगायला सुरवात केली.. तशी त्या पार्थिवाची प्राणप्रतिष्ठा वगैरे पहिल्या दिवशीच झाली असणार.. मी सांगत होतो ती केवळ संध्याकाळची धूपार्ती!
‘प्रणम्य शिरसा देवं’, ‘शांताकारं भुजगशयनं. ‘, गणपती अथर्वशीर्ष… ‘ च्यामारी येत होते नव्हते ते सारे श्लोक तिथे बिनधास्तपणे आणि मोकळ्या मनाने म्हटले! अगदी गेला बाजार शिवमहिन्म स्तोत्रातल्याही सताठ ओळी मला येत होत्या त्याही म्हटल्या –
महिन्मपारंते परमविदुषो यद्यसदृषि
स्तुतिर्ब्रह्मादिनाम् अपितदवसंनास्त्वयिगिरा:
अथावाच्य..
आता आठवत नाही पुढलं काही.. पण कधी काळी ल्हानपणी मामांकडून शिवमहिन्माची संथा घेतली होती ती आता कामी येत होती. आपल्याला काय हो, शंकर तर शंकर.. तो तर बाप्पाचा बापुसच की!
ओल्या बोंबलाच्या कालवणाने चलबिचल होणारा मी, अगदी पूर्णपणे एका भिक्षुकाच्या भूमिकेत शिरलो होतो… सहीसही ती भूमिका वठवत होतो.. ‘काय साला विद्वान दशग्रंथी ब्राह्मण आज आपल्याला लाभला आहे!’ असे भाबडे कृतज्ञतेचे भाव आजुबाजूच्या हिजड्यांच्या चेहर्यावर मला दिसत होते.. त्यांचा तो म्होरक्या टकला हिजडा तर अक्षरश: कृतकृत्य होऊन रडायचाच बाकी होता.. श्रद्धा, श्रद्धा म्हणजे दुसरं तरी काय असतं हो?!
‘गंधाक्षतपुष्पं समर्पयमि.. ‘ असं म्हणून लक्ष्मीला गंध, अक्षता व फुलं वाहायला सांगितलं..
“अबे … उस्मान … वो फुल उधर नजदिक रख ना.. !”
फुलाचं तबक थोडं दूर होतं ते रागारागाने एका हिजड्याने कुणा उस्मानला नीट गणपतीच्या जवळ ठेवायला सांगितलं.. !
गणेशपुजन सुरू असतांनाच, “अबे … उस्मान …”?
पावित्र्याच्या अन् शुचिर्भूततेच्या व्याख्या प्रत्येकाच्या, किंबहुना प्रत्येक समाजाच्या वेगळ्या असतात.. !
“धूपं समर्पयामि, दीपं सर्पमर्पयामि.. ” दशग्रंथी अभ्यंकर सुरूच होते! आणि माझ्या सूचनांनुसार लक्ष्मी सगळं काही अगदी यथासांग, मनोभावे करत होती.. की होता?!
सरते शेवटी पूजा आटपली, आरती झाली.. मला पुन्हा एकदा आतल्या एका खोलीत नेण्यात आलं.. त्या मंडळातले सारे कमिटी हिजडे अगदी कृतकृत्य होऊन माझ्याभोवती जमले होते..
‘अब मुझे जाना होगा.. देर हो गई है.. ‘ असं मी म्हटल्यावर थोडं तरी काही खाऊन गेलंच पाहिजे असा मला त्या टकल्यासकट इतर हिजड्यांनी आग्रह केला.. पाचच मिनिटात कुणीतरी गरमागरम पुर्या, छोले, गाजरहलवा असा मेनू असलेलं ताट माझ्या पुढ्यात घेऊन आला..
अखेर दशग्रंथी विद्वान तात्या अभ्यंकर अल्लाजनसोबत तेथून निघाले.. एक वेगळाच अनुभव घेतला होता मी.. गणपतीकडे त्या यजमान हिजड्यांकरता काय मागणार होतो मी? ‘यांचा शरीरविक्रयाचा धंदा चांगला होऊ दे’ – हे मागणार होतो? आणि मुळात त्यांच्याकरता देवाकडे काही मागणारा मी कोण? माझीच झोळी दुबळी होती.. त्यांच्या झोळीत माप टाकायला गणपती समर्थ होता.. !
निघण्यापूर्वी त्या टकल्या हिजड्यानं माझ्या हातात एक पाकिट आणि हातात एक पिशवी ठेवली आणि मला नमस्कार करू लागला.. वास्तविक मलाच त्याच्या पाया पडावसं वाटत होतं.. वयानं खूप मोठा होता तो माझ्यापेक्षा… !
तेथून निघालो. पाकिटात शंभराची एक कोरी नोट होती.. सोबत ही पिशवी कसली?
‘आमच्याकडे जाताना भिक्षुकाला शिधा द्यायची पद्धत आहे.. ‘ अल्लाजानने माहिती पुरवली..
मी पिशवी उघडून पाहिली तो आतमध्ये एका पुढीत थोडे तांदूळ, दुसर्या पुडीत थोडी तूरडाळ.. आणि दोनचार कांदेबटाटे होते.. डाळ-तांदुळाचा तो शिधा पाहून मला क्षणभर हसूच आलं..
‘अरे हे काय? डाळ-तांदुळाचा शिधा?’ मी अलाजानला विचारलं..
“डालचावल के अलावा इन्सानको जिंदगीमे और क्या लगता है?!”
अल्लाजानच्या तोंडून सहजच निघालेलं ते वाक्य बी ए, एम ए, पीएचडी… सार्या विद्यांना व्यापून त्यांच्या पल्याड जाणारं होतं, गेलं होतं.. !
मला आजही त्या शिध्यातले डाळतांदूळ पुरत आहेत.. !
– समाप्त –
लेखक : श्री तात्या अभ्यंकर
प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ माझी कामाठीपुर्यातली भिक्षुकी – मी धूपार्तीचा भिक्षुक.. ! – भाग – १ – लेखक : श्री तात्या अभ्यंकर ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆
१९९१-९२चा सुमार. मी तेव्हा नौकरी करत होतो.. फोरासरोडवरील झमझम नावाच्या सरकारमान्य देशी दारूच्या बारमध्ये.. कॅशियर कम मॅनेजर होतो मी.. आजूबाजूला सारी वेश्यावस्ती, दारुवाले, मटकेवाले, पोलिस, गुंड.. यांचंच सारं राज्य.. आयुष्यात एके से एक अनुभव आले त्या दुनियेत. कधी सुखावणारे, कधी दुखावणारे, कधी विचार करायला लावणारे, काही चित्र, काही विचित्र, काही नैसर्गिक, काही अनैसर्गिक.. अस्वस्थ करणारे.. आजूबाजूला अनेक प्रसंग रोजच्या रोज घडत होते.. स्वाभाविक, अस्वाभाविक.. पण प्रत्येक प्रसंग एक अनुभव देऊन गेला..
बारमध्ये असंख्य प्रकारची माणसं येत.. रोजचे नियमित-अनियमित बेवडे हजेरी लावायचेच.. त्याशिवाय रोज एखादी ‘काय अभ्यंकर, सगळं ठीक ना? काय लफडा नाय ना?” असं विचारणारी नागपाडा पोलिस स्टेशनच्या कदम हवालदाराची किंवा त्याच्या सायबाची फेरी.. मग कुठे बरणी उघडून फुकट चकली खा, चा पी असं चालायचं.. कधी हलकट मन्सूर किंवा अल्लाजान वेश्यांकरता भूर्जी, आम्लेट, मटन सुका, खिमपाव असं काहीबाही पार्सल न्यायला यायचे.. कधी अफूबाज, चरसी डब्बल ढक्कन यायचा.. कधी बोलबोलता सहज सुरा-वस्तरा चालवणारे हसनभाय, ठाकूरशेठ सारखे गुंड चक्कर काटून जायचे.. “क्यो बे तात्या, गांडू आज गल्ला भोत जमा हो गया है तेरा.. साला आजकल बंबैकी पब्लिकभी भोत बेवडा हो गएली है.. साला, एक हज्जार रुप्या उधार दे ना. ” असं म्हणून मला दमात घ्यायचे..
कधी त्या वस्तीत धंदा करणारे हिजडे यायचे.. उगीच कुठे ठंडा, किंवा अंडापाव, असंच काहीबाही पर्सल न्यायला यायचे.. ‘ए तात्या… म्येरा पार्सल द्येव ना जल्दि.. कितना मोटा है तू.. ‘ अश्या काहितरी कॉमेन्टस करत माझ्या गल्ल्याशी घुटमळत.. मी त्रासाने हाकलून द्यायला लागलो की काडकन टाळी वाजवून ‘सौ किलो.. !’ असं मला मिश्किलपणे चिडवायचे! अक्षरश: नाना प्रकरची मंडळी यायची त्या झमझम बारमध्ये आणि केन्द्रस्थानी तात्या अभ्यंकर!
गणपतीचे दिवस होते.. रस्ता क्रॉस केल्यावर आमच्या बारच्या समोरच्याच कामाठीपुर्यातल्या कोणत्याश्या (११ व्या की १२ व्या? गल्ली नंबर आता आठवत नाही.. ) गल्लीत हिजड्यांचाही गणपती बसायचा. हो, हिजड्यांचा गणपती! वाचकांपैकी बर्याच वाचकांना कदाचित ही गोष्ट माहीत नसेल. परंतु मुंबैच्या कामाठीपुर्यात अगदी हिजड्यांचाही गणपती बसतो.. साग्रसंगीत त्याची पूजा केली जाते.. कामाठीपुर्यात काही तेलुगू, मल्लू भाषा बोलणारे, तर काही उत्तरप्रदेशी हिजडे आहेत ते दरसाल गणपती बसवतात.. बरेचसे मुस्लिम हिजडेही त्यात आवर्जून सहभाग घेतात..
झमझम बारचा म्यॅनेजर म्हणून मला आणि आमच्या बारच्या सार्या नौकर मंडळींना त्या हिजड्यांचं सन्मानपूर्वक बोलावणं असायचं.. ‘तात्यासेठ, गनेशजीको बिठाया है.. ‘दरसन देखने आनेका.. खाना खाने आनेका.. ‘ असं आग्रहाचं बोलावणं असायचं.. ! अल्लाजान मला घेऊन जायचा त्या गणेशोत्सवात..
संध्याकाळचे सात वाजले असतील.. मी गल्ल्यावर होतो.. पूजाबत्ती करत होतो. तेवढ्यात अल्लाजान मला बोलवायला आला.. “गनेशके दरसन को चलनेका ना तात्यासेठ?”
मी दिवाबत्ती केली.. अर्जून वेटरला गल्ल्याकडे लक्ष द्यायला सांगितलं आणि हिजड्यांच्या गणपतीच्या दर्शनाला अल्लाजानसोबत निघालो. कामाठीपुर्याच्या त्या गल्लीत गेलो.. खास दक्षिणेकडची वाटावी अशी गणेशमूर्ती होती.. नानाविध फुलं, मिठाई, फळफळावळ, थोडे भडक परंतु सुंदर डेकोरेशन केलेला हिजड्यांचा नानाविध अलंकारांनी नटलेला ‘अय्यप्पा-गणेश’ स्थानापन्न झाला होता.. एका म्हातार्या, स्थूल व टक्कल पडलेल्या हिजड्यानं माझं स्वागत केलं.. तो त्यांचा म्होरक्या होता. बसायला खुर्ची दिली.. झमझम बारचा म्यॅनेजर तात्याशेठ! म्हणून मोठ्या ऐटीत माझी उठबस त्या मंडळींनी केली.. अगदी अगत्याने, आपुलकीने.. !
हिजड्यांबद्दल काय काय समज असतात आपले? परंतु ती देखील तुमच्याआमच्यासारखी माणसंच असतात.. आपल्यासारख्याच भावभावना, आवडीनिवडी, रागलोभ असतात त्यांचे.. ते हिजडे कोण, कुठले, या चर्चेत मला शिरायचं नाही. ते धंदा करतात एवढं मला माहित्ये. चक्क शरीरविक्रयाचा धंदा.. पोटाची खळगी भरणे हा मुख्य उद्देश. आणि असतातच की त्यांच्याकडेही जाणारी आणि आपली वासना शांत करणारी गिहाईकं! कोण चूक, कोण बरोबर हे ठरवणारे आपण कोण?
मला सांगा – एखाद्या सिने कलाकाराने म्हणा, किंवा अन्य कुणा सेलिब्रिटीने म्हणा, दगडूशेठला किंवा लालबागच्या राजाला भेट दिल्यानंतर त्याचं होणारं आगतस्वागत आणि कामाठीपुर्यातल्या हिजड्यांच्या गणेशोत्सवाला तिथल्याच एका देशीदारूच्या बारच्या तात्या अभ्यंकराने भेट दिल्यावर हिजड्यांनी त्याच आपुलकीनं त्याचं केलेलं आगतस्वागत, यात डावंउजवं कसं ठरवायचं?
लौकरच एक अतिशय स्वच्छ प्लेट आली माझ्या पुढ्यात. वेफर्स, उतम मिठाई, केळी, चिकू, सफरचंद इत्यादी फळांच्या कापलेल्या फोडी, दोनचार उत्तम मावा-बर्फी, काजुकतलीचे तुकडे.. !
तो म्हातारा हिजडा मोठ्या आपुलकीनं आणि प्रेमानं मला म्हणाला..
“मालिक, थोडा नाष्टा करो.. “
“बादमे तुम्हे हमारा गणेशका पूजा करना है. और बादमे खाना भी खानेका.. !”
बापरे.. ! ‘मला यांच्या गणपतीची पुजा करायच्ये?’ मला काही खुलासा होईना.. ‘बघू नंतर काय होईल ते होईल, आपण आपली पुढ्यातली ही डिश खाऊन काहितरी कारण सांगून सटकू इकडनं.. ‘ अस ठरवून मी समोरच्या बर्फीचा एक तुकडा तोंडात टाकला.. सुरेखच होती बर्फी.. अगदी ताजी!
समोरच्या डिशमधलं थोडंफार खाल्लं मी. जरा वेळ तसाच तिथे बसून राहिलो. ‘आता दर्शन घ्यायचं आणि निघायचं’ असा मनाशी विचार केला आणि उठलो.. तोच तो मगासचा टकल्या हिजडा आणि इतर दोघेचौघे हिजडे पुढे सरसावले. त्यापैकी एकाच्या हातात मोठासा स्वच्छ नॅपकीन!
“आओ तात्यासेठ, अब न्हानेका और पूजा करनेका.. !”
न्हानेका और पूजा करनेका? मला काहीच समजेना. अल्लाजान होताच माझ्यासोबत. तो त्यांच्यातलाच.. त्याच्याशी बोलताना मला कळलं की आज मी त्यांचा पेश्शल पाहुणा आहे आणि मला पूजा करायच्ये किंवा सांगायच्ये!
ही कुठली पद्धत? कुणाला विचारून? मला क्षणभर काय करावं ते कळेचना! ‘सगळं झुगारून निघून जावं का इथून?’ हा विचार माझ्या मनात सारखा येत होता. पण माझ्या आजुबाजूला जमलेल्या, माझी इज्जत करणार्या त्या हिजड्यांच्या चेहर्यावर मला खूप आनंद दिसत होता, उत्साह दिसत होता..
‘देखे क्या होता है.. जो भी होगा, देख लेंगे.. ‘ या माझ्या नेहमीच्या स्वभावानुसार मी ती मंडळी म्हणतील ते करायचं ठरवलं. अधिक माहिती विचारता अल्लाजानकडून मला असं समजलं की मी एक पांढरपेशा उच्चभ्रू आहे असा त्यांचा समज आहे आणि माझ्या हातून आज त्यांच्या गणपतीची पूजा व्हावी अशी त्या मंडळातल्या हिजड्यांची इच्छा आहे आणि तशी पद्धतही आहे.. !
साला, मी एक पांढरपेशा उच्चभ्रू? जाऊ दे, तो चर्चेचा विषय आहे! झमझम बारमध्ये महिन्याकाठी सताठशे रुपये पगार मिळणारा मी उच्चभ्रू?!
— क्रमशः भाग पहिला
लेखक : श्री तात्या अभ्यंकर
प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
आपल्याकडं “जातो” असं म्हणत नाही …. म्हणूनच “येतो” म्हटलं.
नमस्कार !!
मी २०२४ …. निरोप घ्यायला आलोय, पुन्हा भेट नाही. आता ‘मी’ फक्त आठवणीत,
अवघ्या वर्षभराची आपली सोबत. तरीही ऋणानुबंध बनले. वर्षभरातल्या सुख-दु:ख, चांगल्या-वाईट
घटनांचा ‘मी’ साक्षीदार…
कोणासाठी खूप आनंद, कोणासाठी अतीव दु:ख, कोणासाठी लकी तर कोणासाठी दरिद्री.
.. कोणासाठी दोन्हीही….. या निरोपाच्या वेळी हितगुज करावसं वाटलं म्हणून हा लेखन प्रपंच.
नवीन वर्ष सुरू होत असलं तरी आपलं आयुष्य मात्र तेच ते आहे.
नेटवर्क, टेंशन्स आणि ट्राफिक हे आता अन्न, वस्त्र, निवाऱ्या इतकेच जगण्याचा भाग आहेत.
तुम्ही म्हणाल की, , जातोयेस तर गप जा. उगीच उपदेश कशाला?’
– – बरोबर आहे. आजकाल कोणाला शिकवलेलं आवडत नाही. पुढच्यास ठेच अन मागचा शहाणा या म्हणीला आता काही अर्थ उरलेला नाहीये….. सगळं कळत असूनही लोकं ठेचा खातात. त्याच त्याच चुका करतात. काही वेळीच शहाणे होतात. अनेकजण दुर्लक्ष करतात… पुन्हा पुन्हा ठेचकळत राहतात.
असो..
अनुभवावरुन सांगतो, आज जगण्यातल्या वाटा निसरड्या आहेत. आयुष्य असुरक्षित झालयं.
कधी, कुठं, काय होईल याचा नेम नाही. व्यवहाराला अतोनात महत्व आल्यानं, प्रेम, आपुलकी यावर ‘तात्पुरतेपणाचा’ गंज चढलाय. सर्व काही असूनही अस्वस्थता आहे. माणसं एकटी आहेत….
जो तो आपापल्या कोषात राहतोय. नात्यातलं अंतर वाढतयं. गॅझेटस कितीही अडव्हान्स झाली तरी भावनिक आधार देत नाही. मायेचा, विश्वासाचा, प्रेमाच्या स्पर्शासाठी माणसाचीच गरज पडते.
तुम्ही वर्षानुवर्षे सांभाळलेले, अपमान, राग, द्वेष, मत्सर, असूया, अहंकार, ईगो, मीपणा.. त्या गाठोड्यात टाका. मी सगळं घेऊन जातो. मनावरचा ताण हलका होईल. प्रसन्न वाटेल.
अजून एक,
नवीन वर्षात संकल्प वैगरेच्या भागडीत पडू नका.
जे येईल त्याला सामोरे जा. तुमच्यामुळे जर कोणी आनंदी होत असेल तर तुमच्याइतका श्रीमंत दुसरा नाही.
ही संधी सोडू नका कारण आनंद वाटला की वाढतो……
2025 मध्ये तुमचा आनंद सदैव वाढता राहो हीच शुभेच्छा !!
☆ “सर, एक अवघड काम आहे…”☆ श्री संजय जगन्नाथ पाटील☆
“सर, एक अवघड काम आहे.. “
तरुण भारत चे ज्येष्ठ पत्रकार शिवराज काटकर यांचा फोन..
म्हटलं.. ” काय झालं ? “
” कृष्णाकाठ दिवाळी अंकासाठी तारा भवाळकर यांचा लेख हवाय.. त्यांच्यापुढं जायची भीती वाटते.. दडपण येतं.. जरा मिळवून द्या की तेवढा लेख.. “
शिवराजचा स्वतःचा दिवाळी अंक आहे कृष्णाकाठ नावाचा..
ही घटना सहा सात वर्षांपूर्वीची..
(हा फोटो.. सह्याद्री वाहिनीवरून प्रसारित झालेल्या मायवाटेचा मागोवा.. या सिरीयलच्या रेकॉर्डिंग वेळचा.)
वयोमानानुसार ताराबाईंना लिहीताना त्रास होतो. त्यामुळं त्या लिहिण्याचं काही अंगावर घेत नाहीत हे ठाऊक होतं.. त्या काळात लिहिणं आणि प्रकृती मुळं बाहेरचे कार्यक्रम घेणं त्यांनी बऱ्यापैकी कमी केलेलं..
मग हे लेखाचं जमावं तरी कसं.. ?
प्रयत्न करून बघतो म्हणालो..
पण फारशी आशा नव्हती..
ताराबाईंशी बोललो.. अशानअसं म्हणून सांगितलं..
” सगळं तुझं ठीक रे.. पण मला आता सलग लिहिणं जमत नाही.. हात भरून येतात.. “
बाईंचं खरंच होतं..
लोकसाहित्यावर निगुतीनं काम करणाऱ्या सरोजिनीआक्का बाबर आणि तारा भवाळकर यांच्या विषयी मला आदरयुक्त गुढ आकर्षण होतंच.. सरोजिनी आक्कांचं लोक वाङ्मयाचं प्रचंड संकलन, त्यावरचं कृष्णामाईच्या तीरावरच्या तोंड भरून बोलल्या जाणाऱ्या साजीवंत शैलीतलं स्मरण रंजनात्मक लेखन.. याची भुरळ पहिल्यापासून..
तर याबरोबरच लोकसाहित्याची सूत्रबद्धपणे मांडणी करून लोक संस्कृतीचे अंतर्गत अदृश्य ताणेबाणे दागिन्यांच्या घडणावळीप्रमाणे उलगडून वस्तूनिष्ठपणे समोर मांडणाऱ्या लखलखीत ताराबाई..
या ना त्या अर्थानं दोघीही सांगलीच्याच..
इथल्या मातीचा गुण त्यांच्या अंगी भिनलेला.. अगदी ऐसपैस.. दोघीही लोक साहित्याच्या प्रांतातल्या जुळ्या बहिणीच…
कोणत्याही निमित्तानं त्यांच्याशी बोलणं हा साक्षात्काराचाच योग…
बोलणं म्हणण्यापेक्षा त्यांचं ऐकणं हेच अचंबित करणारं… ओघंवतं आणि रसाळ.. विषयाचे पापुद्रे अलगद उलगडत आतल्या गाभ्या पर्यंत कसे पोहोचलो ते ऐकणाऱ्याला समजणार सुद्धा नाही..
मी आकाशवाणीतून स्वेच्छा निवृत्ती घेऊन बाहेर पडल्यावर एक छोटा रेकॉर्डर विकत घेतलेला.. त्याला माईक जोडून थोडंसं जुगाड करून आवडीचं काही दिसलं की रेकॉर्डिंग करायचो.. तशी ही जुळणी होतीच.. मी ताराबाईंना सुचवलं.. “तुम्ही बोलत रहा.. विषयानुरूप.. मी त्याचं ध्वनिमुद्रण करून घेतो.. ते ऐकून नंतर लिहून काढू..”
हा उपाय त्यांना आवडला..
सीतेसंबंधीच्या निरनिराळ्या प्रांतातल्या काही पारंपारिक रचनांचा मागोवा घेत सजग नितळ तर्काधिष्टित सम्यक नजरेने सितेकडं पाहूया असं त्यांचं म्हणणं पडलं..
ही आमच्या रेकॉर्डिंग ची पहिली सुरुवात..
ताराबाई, मी आणि शिवराज..
हा लेख दिवाळी अंकात छापून आला.. पुढं ताराबाईंना वाटू लागलं की या लेखातून व्यक्त झालंय त्याहूनही बरंच काही सांगता येण्यासारखं शिल्लक आहे.. तत्पूर्वी त्यांनी या विषयावर थोडं फार कुठंकुठं लिहिलंही होतं..
म्हटलं आहे डोकीत तर जसं जमेल तसं ध्वनिमुद्रण करत राहू..
मग पुढचं ध्वनिमुद्रण ठरलं.. पुढच्या एक दोन रेकॉर्डिंग ला आम्ही दोघंच.. त्या बोलायच्या आणि मी ऐकत बसायचो..
अधिकाधिक सहजता येण्यासाठी ताराबाईंच्या साहित्यावर प्रेम करणाऱ्या काही मंडळींना बोलावून त्यांच्यासमोर सीता अख्यान लावलं तर आणखी मजा येईल असं वाटत होतं.. कारण समोर श्रोते असले की बाई अधिक खुलतात हे ठाऊक होतं..
मंडळी जमत गेली.. सगळ्यांचीच विषयातली गोडी वाढत गेली.. प्रा. अविनाश सप्रे, प्रतिमा सप्रे, नीलम माणगावे, आशा कराडकर, उज्वला परांजपे, प्रतिभा जगदाळे, सुनीता बोर्डे असा दरबारच भरू लागला, सीता समजून घेण्यासाठी…. एक वेगळाच भारून जाण्यासारखा माहोल तयार झालेला.. ध्वनिमुद्रण झालं की नंतर या विषयावर सगळ्यांच्या चर्चा रंगायच्या.. शंका निघायच्या आणि बाई उत्तरं द्यायच्या.. पुण्याच्या प्रतिभा गुडी यांनी संपूर्ण ध्वनिमुद्रण ऐकून त्याची संहिता तयार केली..
आज ते पुस्तक ‘सीतायन ; वेदना विद्रोहाचे रसायन.. ‘ या नावानं प्रकाशित झालंय.. सध्या हे बहुचर्चित पुस्तक जाणकारांच्या नजरेत आहे..
ताराबाईंनी मनोगतात लिहिलंय…
” कोरोना महासाथीच्या जागतिक आणि अनेकांच्या आयुष्यातील वैयक्तिक पडझडीच्या काळानंतर लगेच सीतायनातील प्रमुख कथाकथन मी सर्वांसमोर केलं होतं.. या सर्जक कामामुळे आम्ही सगळे सावरलो.. विशेषतः मला आयुष्याच्या उत्तरायणात या सीतायनाने खूप आधार दिला… “
या ध्वनीमुद्रणाच्या निमित्तानं सगळे एका प्रचंड ताणातून मोकळे झाले.. सीतेच्या वेदनांच्या कहाण्या ऐकताना आमची दुःखं छोटी वाटू लागली..
हे ध्वनिमुद्रण झालं आणि पुन्हा पूर्ववत पोकळी जाणवू लागली.. ताराबाई सतत अभ्यासात मग्न असल्या आणि त्यांच्या मेंदूत सतत काही उलथापालथ चालू असेल तर त्या ठणठणीत असतात हे आम्हाला जाणवलेलं.. त्यातूनच त्यांना रिकामं ठेवायचं नाही हे ठरवून वेगवेगळे विषय त्यांच्यासमोर काढत गेलो.. त्यातून बरीच ध्वनीमुद्रणं झाली..
जुन्या तरी नव्या कथा’ या नावानं त्यांनी काही कथा कथन केल्या.. जुन्यापुराण्या सांगीवांगीच्या कथांना नव्या आशयानं अभिव्यक्त करण्याचा एक वेगळा प्रयत्न त्यांनी केला.. त्याचंही पुस्तक झालं.. नंतर, “एक ओवी, एक कथा, एक प्रथा “ या नावानं बरंच ध्वनिमुद्रण केलं.. पारंपरिक ओवीच्या अनुषंगानं त्याच्या मागचं कथासूत्र शोधणं आणि इथल्या परंपरेचे त्यांचे अंत:संबंध उलगडणं असा एक वेगळाच आकृतीबंध ताराबाईंनी शोधला.. हा एक वेगळाच प्रयोग होता.. यात गीत होतं, कथा होती आणि सजगपणे सर्जकतेनं बुद्धीनिष्ठपणे या गोष्टीकडं पाहण्याची एक दृष्टी होती..
आकाशवाणी सांगलीनं ताराबाईंची पूर्वी एक प्रदीर्घ मुलाखत घेतली होती.. त्यांचा लोकसाहित्याचं संशोधन, त्यांनी लिहिलेल्या कथा, अनुवाद, एकांकिका आणि नाटक याचं लेखन, नाट्यविषयक लेखन असे बाईंचे अनेक अभ्यासाचे विषय आहेत.. त्याच धर्तीवर या सर्व अभ्यासाची एक सारभूत मुलाखत ध्वनिमुद्रित करायची तयारी केली.. अविनाश सप्रे यांनी त्यांची मुलाखत घेतली.. जवळजवळ सात ते आठ तासाचं अभ्यासपूर्ण ध्वनिमुद्रण हाताला लागलं.. यावेळी सदानंद कदम या प्रक्रियेत सामील झाला.. त्याने याची व्हिडिओ केली.. या अभ्यासपूर्ण मुलाखतीचं पुस्तक लवकरच आता भेटीला येईल..
नंतरच्या काळातील ताराबाईंचे वेगवेगळ्या विषयांवरचे लेख, त्यांनी इतरांच्या पुस्तकांना दिलेल्या प्रस्तावना, परिसंवाद, विविध विषयांवरचं त्यांचं लेखन, भाषणं, मनोगतं असं अनेक प्रकारचं मौलिक ध्वनिमुद्रण जमत गेलं.. सोयीसाठी ते सदानंदकडं एकत्रित ठेवलं आहे…
साधारण तीन साडेतीन वर्षांपूर्वी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीच्या कल्पक कार्यक्रम अधिकारी उमा दीक्षित यांची आकाशवाणीकडून दूरदर्शनकडे बदली झाली.. उमा दिक्षित यांनी त्याआधी आकाशवाणी मुंबईसाठी ताराबाईंची तीन भागात मुलाखत घेतलेली.. त्यावेळी त्यांचा माझा परिचय गडद झालेला..
दूरदर्शन आणि आकाशवाणीचं खातं एक असलं तरी माध्यम नवं..
दूरदर्शनला आल्याआल्या एखादा मोठा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरुवातीलाच हाती घ्यावा असं उमा ताईंच्या संवादातून ठरलं.. पाऊल धाडसाचं होतं.. त्याचाच एक भाग म्हणून तेरा भागात लोक साहित्य संबंधातली ताराबाईंची समग्र मुलाखत घ्यायचं ठरलं.. अडीच तीन महिने या विषयावर चर्चा झाल्या.. विषय ठरले.. मुकुंद कुळे यांनी मुलाखत घ्यावी असा विचार केलेला.. माय वाटेचा मागोवा’ ही अभ्यासपूर्ण मालिका दूरदर्शन साठी रेकॉर्ड झाली.. बाई अखंडपणे रोज पाच पाच सहा सहा तास हातात कागदाचा चिटोराही न घेता बोलत राहिल्या.. हे विस्मयकारक होतं.. ताराबाईंच्या जीवनभरातल्या अभ्यासाचा प्रदीर्घ अनुभव चित्रीत झाला.. एक महत्त्वाचा दस्तऐवजच दूरदर्शनच्या प्रयत्नानं आकाराला आला.. लोकसहित्याचं सगळं संचित दृकश्राव्य माध्यमात जपलं गेलं.. त्यासाठी उमा दिक्षित यांची संपूर्ण टीम सांगली जवळच्या बुरुंगवाडी या गावात पाच दिवसाच्या मुक्कामाला आली.. तिथल्या निसर्गरम्य परिसरात रमली. बुरुंगवाडी चे विजय जाधव आणि ग्रामस्थांचं लाख मोलाचं सहकार्य लाभलं.. अगदी कमी वेळात अथक प्रयत्न करत मोलाचं काम केलं गेलं.. लोक संस्कृतीच्या अभ्यासातलं सार लोकांसाठी, पुढच्या पिढींसाठी टिपून ठेवलं गेलं..
बघता बघता, आज जवळजवळ 40 ते 50 जीबी इतका डाटा तोही mp3 ऑडिओ फॉर्मेट मध्ये आमच्याकडे संकलित झाला आहे.. बाकी इतर माध्यमांकडं असलेला संग्रह वेगळाच..
कृष्णाकाठ मधल्या एका लेखासाठी हा छोटा प्रवाह उगम पावला.. हळूहळू या कामाचं स्वरूप इतकं वाढत जाईल असं वाटलं ही नव्हतं..
ताराबाईंच्या या प्रचंड अभ्यासानं त्यांच्या कार्यानं दिपून जायला होतं.. 85 वय होऊन गेलं तरी अजूनही त्या नव्या उमेदीनं कार्यमग्न असतात.. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निमित्तानं चक्रधर ज्ञानेश्वर तुकाराम, सगन, होनाजी, पठ्ठे बापूराव, ते वाडीवस्तीतल्या, तुमच्या माझ्या घराघरातल्या माय माऊलींच्या तोंडची लोकभाषा त्यांनी मराठी सरस्वताच्या मखरात मानानं मिरवली आहे.. असंच काहीसं वाटतं आहे.
आपणाला त्या सोबत घेत आहेत यानंच हुरळून जायला होतं…
बर्याच वर्षापूर्वीची गोष्ट आहे. सुमारे तीसपेक्षा जास्त वर्षं झाली असतील. त्या वेळी नियमीतपणे रेडिओ ऐकला जायचा. तसा रेडीओ ऐकत असताना वेगळ्या विषयावरचं ते व्याख्यान ऐकलं. लोकसाहित्यातून दिसणार्या स्त्री-मनाचा आढावा घेणारं ते व्याख्यान होतं. त्यावेळी व्याख्यानातून काही लोकगीतांचेही संदर्भ सांगितले गेले होते. संपूर्ण भाषण लक्ष देऊन ऐकल्यावर व्याख्यातीचं नावही समजलं, सांगलीच्या प्रा. तारा भवाळकर. त्या संपूर्ण संदर्भानिशी ते नाव तेव्हा डोक्यात पक्कं कोरलं गेलं. कायमचं.
याच सुमारास कमल देसाई यांच्याशी ओळख झाली आणि बघता बघता स्नेह वाढला. कधीतरी त्यांच्या तोंडून ताराबाईंचा `तारी.. ‘ असा उल्लेख ऐकला होता, पण तेव्हाही त्यांच्याशी कधीकाळी मैत्री होईल असं वाटलं नव्हतं.
पुढे एका व्याख्यानाच्या निमित्तानं सांगलीला जायचा प्रसंग आला. कदाचित तेव्हा माझं नाव ताराबाईंनी सुचवलं असावं. तेव्हा ताराबाईंची प्रत्यक्ष भेट झाली. त्यांच्या घरी गेले. तिथे उषाताईही भेटल्या. ताराबाई काही वेळासाठी कॉलेजमध्ये गेल्या होत्या. तेव्हा उषाताईंची सैपाकघरात काम करायची पद्धत आणि त्यांचा कामाचा उरकही पाहिला. कमलताईंकडून नावं ऐकल्यामुळे मला तरी काहीही अवघडल्यासारखं वाटलं नाही. ही लक्षात राहाण्यासारखी पहिली भेट होती.
अतिशय तरतरीत आणि भरपूर उंचीचं हे व्यक्तीमत्व तेव्हा कायमचं नजरेत आणि मनात भरलं. त्यांचं रंगभूमीशी असलेलं नातं त्या वेळी तरी मला माहीत नव्हतं. पण त्यांचं व्यक्तीमत्व मात्र ठसठशीत असल्याचं त्याच वेळी जाणवलं होतं.
तेव्हा ताराबाई अजूनही नोकरीत होत्या. बहुधा तेव्हा त्या प्रिन्सिपॉलही होत्या. नोकरीतली शेवटची काही वर्षं राहिल्याचं त्यांनी सांगितल्याचंही आठवतं. त्यामुळे त्यांचा तिथला तरी वेळ अतिशय महत्वाचा होता. पण तरीही वेळ काढून मी पुण्याला निघायच्या वेळी त्या घरी आल्या, स्टँडपर्यंत पोचवायला आल्या आणि, अजूनही आठवतं, त्यांनी खास सांगलीचे पेढेही आणून दिले होते (हे त्यांचं आतिथ्य अजूनही कायम आहे). त्याच वेळी त्यांनी अतितच्या बसस्टँडवर मिळणार्या खास भजी आणि बटाटेवड्यांविषयीही सांगितलं होतं. त्या क्षणी मला त्यांच्या त्या जिंदादिलाचं अपरुप वाटलं होतं. त्यांची आज्ञा पाळून परतीच्या प्रवासात मीही ते विकत घेऊन चवीनं खाल्ले होते.
कमल देसाईशी आमचं नातं आणि स्नेहही जुळला होता. दत्ता देसाई हा तर विरूपाक्षांचा सख्खा आतेभाऊ. त्याच्याकडूनही ताराबाईंचं नाव ऐकलं होतं. कमलताईंची भावंडं मिरज-सांगलीत असल्यामुळे त्या दोघींचा खूप पूर्वीपासून स्नेह होता. एकमेकीला `तारी.. ‘- `कमळी.. ‘ म्हणण्याइतकी जवळीक होती. कमलताई जेव्हा पुण्यात असत तेव्हा सांगलीच्या आठवणी निघाल्या की त्यात ताराबाईंची आठवण निश्चितच असे. त्यामुळे ताराबाईंच्या भेटी वरचेवर होत नसल्या तरी नाव सतत परिचयाचं होऊन राहिलं होतं.
नंतरच्या एकदोन भेटी कमलताईंमुळे झालेल्या आठवतात. त्याहीवेळी ताराबाईंकडून पेढे न चुकता मिळायचेच. कमलताईंचा पंचाहत्तराव्वा वाढदिवस सांगलीकरांनी मोठ्या थाटात साजरा केला होता. मुंबई-पुणे-बेळगाव आणि इतर गावांमधून कमलताईंचे चाहते आले होते. विद्या बाळ, सुमित्रा भावे, पुष्पा भावे, अशोक शहाणे असे मोठमोठे लेखक-विचारवंत त्यासाठी हजर होते. त्या सगळ्यांशी आस्थेनं वावरणार्या ताराबाई मला आजही आठवतात.
त्या नंतरही कुठल्याही निमित्तानं सांगलीला गेले तरी ताराबाईंची भेटही ठरलेलीच. एक मात्र मला आठवतंय तसं कमलताईंच्या वाढदिवसांनंतर आमच्यामधला औपचारिकतेचा बुरखा गळून पडला आणि नात्यात मोकळेपणा आला.
कमलताई वारल्या, आणि मी आणि ताराबाई जास्त जवळ आलो. त्याच सुमारास फोन करणंही सुकर होत चाललं. बोलायला मुबलक विषयही मिळत गेले. लोकसाहित्य हा माझ्याही आस्थेचा विषय होता आणि आहे. तसंच कर्नाटक आणि कन्नड संस्कृतीविषयी ताराबाईंनाही आस्था असल्यामुळे विषयांना अजिबात वानवा नव्हती. त्यांनी लोकसाहित्याच्या निमित्तानं संबंधित कर्नाटक पालथा घातलेला असल्यामुळे आमच्या गप्पा कधीच एका बाजूनं राहिल्या नाहीत. माझं कुतुहल, त्यातून निघालेले प्रश्न आणि ताराबाईंचा व्यासंग यामुळे गप्पांना रंगत जायला वेळ लागााायचा नाही. मला काही कन्नड लोककथा आढळल्या की मी त्यांना हमखास फोन करे. त्याही तशाच प्रकारची मराठीत एखादी कथा माहीत असेल तर सांगत. ऐकताना मात्र एखाद्या लहान मुलीचं कुतुहल त्यांच्यामध्ये असे.
अनेकदा गिरीश कार्नाडांच्या नाटकांमागील लोककथेवरून विषय सुरू होई आणि भारतभरच्या तशा प्रकारचा धांडोळा घेण्यात अक्षरश: तासच्या तास निघून जात. तसंच चंद्रशेखर कंबारांच्या जोकुमारस्वामी सारख्या नाटकाचा विषय निघाला तर त्या ती प्रथा मानणार्या काहीजणींना भेटून, त्याचा आणखी तपशिल गोळा करून मला सुपूर्द करत. त्यातूनच त्यांची `जोकुमारस्वामी’ या नाटकाची प्रस्तावना तयार झाली.
डॉ तारा बाई व सुश्री उमा कुलकर्णी
ताराबाईंचा सांगलीकरांनी केलेला वाढदिवस मला आजही आठवतो. ज्या स्नेहभावानं सगळ्यानी कार्यक्रम योजला होता, साजरा केला होता त्यातून त्यांचं ममत्व स्पष्ट दिसत होतं. पुण्यासारख्या गावात माझं साहित्यजीवन गेल्यामुळे मला तेव्हा त्याचं खूपच अपरूप वाटलं होतं. त्याच बरोबर ताराबाईंनी संपूर्ण गावातल्या जीवनाशी कसं स्वत:ला आत्मियतेनं जोडून घेतलंय हेही जाणवलं होतं. ते मी सार्वजनिकरित्या त्या वेळी बोलूनही दाखवलं होतं.
आता ताराबाईंची अखिल भारतीय मराठी साहित्य संम्मेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यावर या परिसरात जो आनंदाचा जल्लोष उसळला, त्याचं मला अजिबात नवल वाटत नाही.
या कार्यक्रमात सहभागी करून घेताना त्यांनी माझ्याविषयी जो विश्वास आणि स्नेह दाखवला, त्याला मी लायक होते की नाही, या विषयी मी तेव्हाही साशंक होते, आताही आहे.
असाच संकोच वाटण्यासारखा आणखी एक प्रसंग ताराबाईंनी आमच्यावर आणला. एका कार्यक्रमासाठी आम्ही दोघेही सांगलीला गेलो असताना तिथल्या आकाशवाणीवर `आर्काईज’साठी त्यांनी आम्हा दोघांची, म्हणजे मी आणि विरुपाक्ष, मुलाखत घेतली. मुलाखत खूपच मोठी होती. विरूपाक्षांचा पंचाहत्तरावा वाढदिवस होता तेव्हा त्यांनी `साधना’च्या विनोद शिरसाटांशी बोलून त्या आठवड्याच्या अंकात प्रकाशित केली आणि आम्हाला आनंदाचा धक्काच दिला. पुढे तीच मुलाखत एका ग्रंथात रा. चिं. ढेरें, कमलताई आणि त्या स्वत: यांच्या मुलाखतीच्या सोबत प्रकाशितही केली! एवढ्या मोठ्या संशोधकांच्या मांदियाळीत समाविष्ट व्हायची आमची खरोखरच लायकी आहे काय, हा प्रश्न मला तेव्हाही पडला होता आणि आजही पडतो.
०००
कोरोना आला आणि आम्हा दोघींच्याही जीवनात उलथापालथ करून गेला. सुपारे पन्नास वर्षांच्या सहवासानंतर उषाताईं कोरोनामध्ये वारल्या. त्यांच्या जाण्यानं ताराबाईंच्या जीवनातही एक मोठी पोकळी निर्माण झाली होती. सांगलीतला त्यांचा मित्रपरिवार त्यांची मोठ्या प्रमाणात काळजी घेत असला तरी काही व्याकूळ क्षण पेलण्यासाठी आम्हा दोघींनाही एकमेकीची गरज लागत होती. त्यामुळे निरुद्देश आणि काहीही कारण नसताना केवळ भावनिक विसाव्यासाठी अक्षरश: केव्हाही एकमेकींना फोन करणं सुरू झालं. त्या वेळी तर रात्री अकरा-बारा वाजताही आम्ही एकमेकीना फोन करत एकमेकीना आधार देत-घेत होतो. या वेळी सामोर्या येणार्या विविध व्यावहारीक आणि मानसिक अडचणींविषयी आम्ही सतत बोलत होतो. त्या नाशिकला गेल्या तरी आमच्या बोलण्यात खंड पडत नव्हता. अशाच मनस्थितीत एकदा आमची सांगलीला त्यांच्या घरीही भेट झाली. तेव्हाची गळाभेट दोघींनाही शांतवणारी होती.
ताराबाईंच्या पुण्यातल्या कार्यक्रमांना न चुकता हजेरी लावणे ही माझ्या दृष्टीनं पर्वणीच होती. मग पुणे विद्यापिठाचा असो, साहित्य अकादमीचा असो किंवा महाराष्ट्र फौंडेशनचा मोठा पुरस्कार-समारंभ असो. आधी किंवा नंतर त्यांना भेटून विशेष गप्पा मारणं ही दोघींच्या दृष्टीनंही पर्वणीच! अशाच गप्पांमधून त्यांच्या हरीवंशराय बच्चन यांच्या `मधुशाला’च्या अनुवादाची माहिती कळाली. पाठोपाठ त्यांनी अनेक अनुवाद म्हणूनही दाखवले.
करोनाच्या काळात त्या काही कथांचं रेकॉर्डिंग करून पाठवायच्या. त्यातल्या काही कथा इतक्या उत्तम होत्या की मी त्यांना लिहिलं, `तुम्ही उत्तम कथाकार आहात. तुम्हाला केवळ लोककथाच्या अभ्यासक या सदरात का टाकलं जातं? मला तर काही कथा अनंतमूर्तींच्या तोडीच्या वाटतात.. ‘
त्यांचं `सीतायन’ आलं. त्या सुमारास त्या पुण्यात माझ्याकडे होत्या. पुस्तकाचा झालेला आनंद व्यक्त करण्यासाठी आम्ही एक छोटा कार्यक्रम केला. माझ्या घरासमोर राहाणार्या रवी परांजपे यांच्या घरासमोरच्या जागेत कार्यक्रम घ्यायला स्मिताताई परांजपेंनी परवानगी दिली आणि मुकुंद कुळे यांनी ताराबाईंची मुलाखत घेतली. अत्यल्प वेळात केलेल्या पब्लिसिटीला प्रतिसाद देत बरीच माणसे जमली आणि सगळ्यांनीच त्या मुलाखतीचा आनंद घेतला. मुलाखत आवडल्याचे नंतरही कितीतरी दिवस फोन येत होते.
इथे माझं एक निरिक्षण मला नोंदवलंच पाहिजे. साहित्य-जीवनात आम्हाला बर्याच जणांचा स्नेह मिळाला. त्यातल्या प्रत्येकाची विचारधारा वेगवेगळी होती. सगळेच एकमेकाच्या विचारधारेचा सन्मान करत असल्यामुळे, कुणाचाही कल कुठेही असला तरी आम्ही कडवे बनलो नाही. विविध विचारप्रवाह समजून घेऊन समृद्ध होत जायचं, या आमच्या मानसिकतेला कुणीच अटकाव केला नाही. उलट ती ती विचारधारा सामावून घेत आम्हाला अधिकाधिक श्रीमंत करत गेले.
त्यातलंच एक महत्वाचं नाव तारा भवाळकर हे आहे. मग त्यांचं ऋण नको का मानायला?
मृणाल म्हणजे माझी आतेबहीण. माझ्यात आणि तिच्यात फार फार तर एखाद्या वर्षाचं अंतर असेल म्हणजे आम्ही तशा बरोबरीच्याच. एकत्रच वाढलो, एकत्र खेळलो, बागडलो, मोठ्या झालो आणि आयुष्याला जशी वळणं मिळत गेली तसं तसे आपापल्या विश्वात रमलो.
पण आज मागे वळून बघताना, मृणाल एक व्यक्ती म्हणून तिचा विचार करताना माझ्या मनात अनेकविध अनेक रंगी भावना जागृत होतात. कळत नकळत आपण या व्यक्तीमधल्या कोणत्या आदर्श मूल्यांकडे आकर्षित होत गेलो किंवा आजही आकर्षित होतो याचा विचार माझ्या मनात येतो आणि एकाच वयाच्या जरी असलो तरी त्या त्या वयातल्या वैयक्तिक गुणांचे मापन करताना मृणाल माझ्यापेक्षा अनेक बाबतीत सरस्, सर्वश्रेष्ठ होती—आहे आणि तिच्या या श्रेष्ठत्वाचा पगडा अथवा सरसतेचं प्रभुत्व माझ्या मनावर लहानपणापासूनच होतं असं वाटतं.
गोष्टी अगदी किरकोळही असतील. म्हणजे ज्या वयात मला साधी कणिक भिजवता येत नव्हती त्या वयात मृणाल अगदी सफाईदारपणे सुंदर मऊ गोलाकार पोळ्या करत असे. कुमुद आत्या कधी आजारी असली तर क्षणात ती साऱ्या घर कामाची जबाबदारी लीलया उचलत असे. अगदी तिच्या आईप्रमाणे घरातलं स्वयंपाक पाणी व इतर सारी कामे, शिवाय आईच्या औषधपाण्याचं वेळापत्रक सांभाळून, सर्व काही आवरून शाळेत वेळेवर पोहोचायची. शाळेतही अत्यंत हुशार विद्यार्थिनी म्हणून तिची ख्याती होती. एकही दिवस गृहपाठ केला नाही म्हणून तिला शिक्षा झाली नसेल. सुंदर हस्ताक्षरातल्या तिच्या वह्यांची आठवण आजही माझ्या मनात आहे. शिवाय ती नुसतीच अभ्यासू किंवा पुस्तकी किडाही नव्हती. लहान वयातही तिचं वाचन दांडगं होतं. तिला कोणतंही पुस्तक द्या ते ती एका बैठकीत वाचून काढायची. वाचनाचा वेग आणि आकलन या दोन्हीचा समतोल ती कसा काय साधायची याचं मला आजही नवल वाटतं. जे पुस्तक वाचायला मला एक दोन दिवस तरी लागायचे ते ती काही तासातच कशी काय संपवू शकते याचं मला नेहमी आश्चर्य वाटायचं आणि अशा अनेक कारणांमुळे असेल पण ही समवयस्क आतेबहीण मनातल्या मनात माझी गुरुच बनायची. नकळत मी ही माझ्या मनाला सांगून पहायची,” मृणाल सारखं आपल्यालाही हे आलं पाहिजे…जमलं पाहिजे.”
एक मात्र होतं तिचं लहानपण आणि माझं बालपण -काळ एकच असला तरी आमच्या भोवतालचं वातावरण वेगळं होतं. मृणाल भावंडात मोठी होती म्हणून तिला जन्मत:च मोठेपण लाभलेलं होतं. आई-वडिलांची, भावंडांची ती अतिशय लाडकी होती हे नि:संशय. तिचे पप्पा ज्यांना आम्ही “बाळासाहेब” म्हणत असू- ते एक चतुरस्त्र व्यक्तीमत्त्व नक्कीच होतं. शिक्षण क्षेत्रामधील एक नामांकित व्यक्ती म्हणून त्यांचा लौकिक होता. शिक्षणाचे महत्त्व त्यांना फार होतं. शिक्षण याचा अर्थ केवळ पाठ्यपुस्तकीय किंवा केवळ जगण्यासाठी उपयुक्त साधन एवढंच नव्हे तर ते कसं चौफेर आणि अवधानयुक्त असावं याबद्दल ते खूप आग्रही होते. आपल्या तिन्ही मुलांनी नेहमीच उच्च स्थानावर असायला हवं म्हणून ते जागरूकही होते. त्याबाबतीत ते काहीसे कडक आणि शिस्तप्रिय मात्र होते. काहीसं छडी लागे छम छम विद्या येई घमघम या काव्यपंक्तीचा लाक्षणिक अर्थ त्यांच्या कृतीत जाणवायचा. त्यामुळे त्यांचा धाक वाटायचा. आदराबरोबर भीती वाटायची आणि मला असंही तेव्हा वाटायचं की मृणालभोवती एक धाक आहे, काहीसं दडपण आहे. ज्या मुक्त वातावरणात मी वाढत होते त्यापेक्षा मृणालभोवतीचं वातावरण नक्कीच वेगळं होतं. बाळासाहेबांची आणि माझ्या वडिलांची वैचारिक बैठक, दोघांच्याही व्यक्तिमत्त्वातील भव्यता जरी समान असली तरी कुठेतरी विचारांच्या प्रतिपादनात नक्कीच साम्य नव्हतं आणि याच फरकाचा परिणाम आमच्या जडणघडणीत होत असावा पण असे जरी असले तरी माझ्या आणि मृणालच्या अनेक आघाडीवरच्या प्रगतीत महत् अंतर होतं. हे अंतर पार करण्याची जिद्द माझ्यात नव्हती पण मी विलक्षण प्रभावित मात्र व्हायची.
सुट्टीत आम्ही नेहमी एकत्र खेळायचो. विशेषतः आमचे बैठे खेळ खूपच रंगायचे. त्यातले ठळक खेळ म्हणजे कॅरम, पत्ते आणि बुद्धीबळ. कॅरम आणि पत्ते खेळताना माझ्या मनात नेहमीच छुपा विचार असायचा की, “मृणालच आपली पार्टनर असावी. तिच्या विरोधात नको बाई खेळायला.” कारण त्यातही ती अग्रेसरच होती पण त्यात मला जाणवायचा तो तिचा समजूतदारपणा. खेळताना “कुठे चुकले” हे मात्र ती सांगायची पण ते सांगताना तिचा सूर अगदी विलंबित लईत असायचा.
तिच्यात आणि माझ्यात खेळताना एक फरक जाणवायचा तो म्हणजे मला खेळायला खूप आवडायचे, माझी वृत्ती खेळकर होती पण “खेळाडू” हा किताब मला मिळू शकला नाही. याउलट मृणाल मैदानी खेळात, बैठ्या खेळात, बॅडमिंटन, टेबल टेनिस सारख्या खेळातही प्रवीण होती. आमच्या शाळेच्या टीमची तर ती कॅप्टनच होती. अंतर शालेय जिल्हास्तरीय क्रीडा क्षेत्रात तिची उल्लेखनीय कामगिरी होती आणि खेळातलं हे प्राविण्य तिने महाविद्यालयीन स्तरावरही गाजवलं. तिला मिळणाऱ्या ट्रॉफीज पाहून त्या बालवयात, उमलत्या वयात तिच्याविषयी वाटणाऱ्या कौतुकानेच नव्हे तर “मी का नाही तिच्यासारखी होऊ शकत?” या वैष्यम्यानेसुद्धा मी भारावून जायचे.
खरं म्हणजे आमच्या परिवारामध्ये वेगवेगळी गुणसंपदा तशी प्रत्येकात होती पण मृणाल मला नेहमीच सर्वगुणसंपन्न वाटायची. दिवाळीत तिने काढलेल्या मोठमोठ्या सुबक रांगोळ्या, तिचे भरत काम, तिचे शिवणकाम, तिने बनवलेला फराळ या सगळ्यातला तिचा जो उत्कृष्टपणा असायचा त्याने मात्र मी थक्क व्हायचे. केवळ तिच्या गुणांची यादी देणे हा मात्र माझा या लेखनाविषयीचा उद्देश नक्कीच नाही.
तिच्या आयुष्याचा आलेख मांडताना म्हणजे अगदी शाळेत सतत पहिला नंबर मिळवणाऱ्या शाळकरी मुलीपासून ते इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या गव्हर्नमेंट कॉलेजच्या डीन पदी पोहोचणारी, पीएचडीचे अनेक विद्यार्थी घडवणारी, विद्यार्थीप्रिय एक बुद्धिमान स्त्री म्हणून तिच्याकडे पाहताना टप्प्याटप्प्यावर माझ्या मनात अनेक प्रश्न आहेत. अनेकविध गुणांची शिदोरी बांधून देताना त्या अज्ञात परमेश्वराने तिच्या भविष्यातल्या नियतीविषयीचा विचार आणि तरतूद करून ठेवली होती का?
कुमुदआत्या गेली तेव्हा मला वाटते मृणाल कॉलेजच्या पदवी क्रमाच्या शेवटच्या वर्षाला असेल. विनू, अनिल (तिचे धाकटे भाऊ) तर लहानच होते. खरं म्हणजे अर्धवट वयात ज्यांचं मातृत्व हरवतंं तेव्हा त्यांचं बिथरलेपण काय असू शकतं याची मी नक्कीच साक्षीदार आहे आणि त्याहीपेक्षा जास्त एका क्षणात प्रौढत्वात विरघळणारी बाल्याची रेषा मला अधिक कंपित करून गेली. क्षणात तिने डोळ्यातले अश्रू पुसले होते आणि लहान भावांचे भविष्य आणि वडिलांचं पोरकेपण, एकाकीपण अत्यंत प्रेमाने आणि जबाबदारीने स्वतःच्या झोळीत पेललं. एका क्षणात तिने एक वेगळं मातृत्वच स्वीकारलं जणू आणि आनंदाने नसलं तरी विनातक्रार तिनं ते सांभाळलं. सामान्यातलं असामान्यत्व म्हणजे काय, साधुत्व म्हणजे काय, संतपण कशाला म्हणायचं याविषयीचे अदृश्य सूक्ष्म सूत्र मला मृणालच्या व्यक्तिमत्त्वात नक्कीच शोधता आलं.
कुमुदआत्या गेल्यानंतरचं तिचं आयुष्य म्हणजे खरोखरच एक यज्ञ होता, एक तपस्या होती. जगण्याची तिची भूमिकाच पार बदलून गेली होती. भावंडांना आईची उणीव तिने कधीच भासू दिली नाही आणि पहाडासारख्या शिस्तप्रिय, कडक व्यक्तिमत्त्वांच्या वडिलांसाठीही ती सावली बनून राहिली. स्वतःच्या साऱ्या कायिक, ऐहिक सुखाच्या तिनं जणू काही समिधा केल्या पण आईविना जगताना परिवारातला आनंद टिकवण्यासाठी ती धडपडत राहिली. विनू आणि अनिल मार्गी लागल्यानंतर तिने स्वतःच्या आयुष्याचा विचार करायला सुरुवात केली. तोपर्यंत ती चाळीशीत पोहचली होती. अर्थात तिने स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर, करिअरचे उच्चतम टप्पे पार केलेलेच होते. अपार जिद्दीने आणि चिकाटीने शिष्यवृत्ती मिळवल्या, परदेशी सेमिनार गाजवले. विद्यार्थ्यांचे प्रेम मिळवले. शैक्षणिक क्षेत्रात अत्यंत गरजेचा घटक म्हणजे गुणांकनातला प्रामाणिपणा. तिने तो कायम जपला. स्पर्धात्मक परीक्षेसाठीच्या परीक्षकांच्या पॅनलवर असताना तिला करोडपती बनण्याची अनेक प्रलोभने दाखवली गेली पण तिने ती अत्यंत तात्विकपणे झुगारून लावली आणि त्यासाठी तिला ते पदही सोडावे लागले पण त्यामुळे ती यत्किंचितही विचलित झाली नाही.
खरं सांगू जेव्हा मी आणि मीच नव्हे तर तिच्या आजूबाजूचे सारे समवयस्क एका ठराविक चाकोरीतलं सुखी आयुष्य जगत होते तेव्हा मृणाल मात्र जीवनातली अडथळ्यांची शर्यत अथकपणे नेटाने खेळत होती. सर्वगुणसंपन्नतेची शिदोरी तिला कोणा अज्ञात शक्तीने बांधून दिली होती त्या बळावर ती खंबीरपणे स्वाभिमानाने तिचं जीवन जगत होती.
अनेकवेळा मला ती काहीशी घट्ट विचारांची वाटते. तिच्यात एक क्रिटीक आहे असंही जाणवतं. ती पटकन् किंवा उगीचच समोरच्याला बरं वाटावं म्हणून कौतुक करण्याच्या भानगडीत पडत नाही.हा गुण समजायचा की तिच्या व्यक्तीमत्त्वातला अभाव मानायचा हे मला माहीत नाही. पण ती एक आवडती प्राध्यापिका, प्राचार्य होती. तिने अनेकांना घडवलं याचा अर्थ तिने कुणाही गुणवंताचं मानसिक खच्चीकरण न करता किंवा अवास्तव कौतुकही न करता त्याचा यशाचा मार्ग त्याला दाखवून दिला हे सत्य आहे. शिक्षक कसा असावा याचा ती वस्तुपाठच आहे.
एका अपघातात तिला कायमस्वरूपी अपंगत्व प्राप्त झालं तरी पण कधी असहाय्यतेचं अथवा अधूपणाचं भांडवल करून जगणं तिने मान्य केलं नाही. अशाही परिस्थितीत आजही कौटुंबिक सुखदुःखाच्या प्रसंगी, सामाजिक वा इतर अनेक ठिकाणी तिची मनापासून उपस्थिती असते.
इतक्या मोठ्या पदावर विराजमान असतानाही निवृत्तीनंतर मिळणाऱ्या वेतनासाठी केवळ सामाजिक करंटेपणाशी, संकुचित जळाऊ वृत्तीशी तिला विनाकारण लढा द्यावा लागला होता. स्वतःच्या शारीरिक व्याधींचाही बाऊ न करता केवळ “भागधेय” असं समजून ती कणखरपणे लढत राहिली. ती शरण कधीच गेली नाही.
आजही आजारी नवऱ्याची मनापासून सेवा करताना तिचा तोल ती कधीही ढळू देत नाही. आम्हीच तिच्यावरच्या प्रेमामुळे तिला काहीबाही सूचना देत असतो पण ती एकच सांगते,” ठीक चाललंय् माझं. करू शकते मी. इतका काही त्रास नाहीये.”
अमेरिकेवरून येणाऱ्या धाकट्या भावासाठी आजही त्याच वात्सल्याने ती त्याच्या आवडीचे खाद्यपदार्थ स्वतःच्या हाताने बनवते. माझ्या मनात नेहमी येतं इतक्या गुणसंपन्न बुद्धिमान व्यक्तीचं आयुष्य कसं असायला हवं होतं..? निवांत आरामदायी… असं नक्कीच नाही जे आज तिचं आहे. जगत असताना कदाचित तिच्या हातून फार मोठ्या भावानिक चुका झाल्या का? कुठेतरी व्यवहारात ती कमी पडली का? की तिच्या आयुष्यातल्या सुखाच्या वेळाच चुकल्या?
ती मला एकदा म्हणाली होती, “ सुख म्हणजे नक्की काय असतं ते मला माहीत नाही पण मी माझ्या दुःखाला, वेदनांना शंभर टक्के देऊन त्यांना मात्र माझ्या ताब्यात ठेवलेलं आहे.” अशावेळी मला तिच्या स्त्रीत्वात एक कणखर पौरुष दिसतं.
पुन्हा पुन्हा मी मृणालचा विचार करते तेव्हा मला वाटतं मृणालसारख्या व्यक्ती इतरांनाच उदाहरणादाखल असतात, आधारभूत असतात आणि मुख्य म्हणजे अशा व्यक्ती कधी निराधार नसतातच. त्यांच्या अंतरातलं बळ हाच त्यांचा आधार असतो. बाह्य जगाच्या आधाराची त्यांना गरज नसते का? एक मात्र नक्की की स्थितप्रज्ञतेचे प्रवाह मला तिच्या जगण्यात नेहमी जाणवतात. खिंड लढवणाऱ्या योध्याचे दर्शन मला तिच्यात होते. मी असं म्हणणं म्हणजे अतिशयोक्ती आहे किंवा अवास्तव केलेलं ग्लोरीफिकेशन आहे असं मला या क्षणीही अजिबात वाटत नाही.
मृणाल या शब्दाचाही मला खरा अर्थ तिच्यात सापडतो… .. कमळाचा देठ .. .. तो कुठे दिसतो का? चिखलात घट्ट रुतलेला असतो. आपल्याला दिसतात ती फक्त पाण्यावरची गोजिरवाणी सुरेख उमललेली कमळं… … मृणालही अशीच आहे. जीवनरूपी दलदलीत पाय घट्ट रोवून रुतलेली. चेहऱ्यावर मात्र सदैव हास्याचं कमळ फुललेलं.