मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ बाबा…अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

? मनमंजुषेतून ?

☆ बाबा…अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

हाफ चड्डीत सायकलच्या पुढच्या दांडीवर एका बाजूला दोन पाय टाकून तिरका बसायचो आणि बाबा अंगातला सगळा जोर लावून पायडल मारत सायकल पुढे न्यायचे. त्यावेळी मला फक्त सायकलला झूम करून येणारा वेगच समजायचा आणि मन सुखावून जायचं.. त्यामागे बाबांनी दातओठ खाऊन लावलेला तो जोर कधी जाणवलाच नाही! संसाराचा सगळा गाडा त्यांनी आणि आईनी असाच जोर लावून पुढे नेला. मला समजला तो माझ्या आयुष्याला मिळत राहिलेला वेग… समजली ती फक्त माझी होत असलेली प्रगती – शारीरिक वाढीतली, खेळातली, स्पर्धांमधली,  शिक्षणातली, व्यवहारज्ञानातली… आणि मी अभिमानानं सुखावत गेलो… त्यामागे आई-बाबांनी लावलेला जोर त्यांनी कुठून आणि कसा आणला हे समजलंच नाही.

ते वयच नव्हतं बहुदा, हे असलं काही समजून घेण्याचं. पण कालचक्राला सगळं समजतही असतं आणि उमजतही! प्रत्येक गोष्टीत बाबांना गृहीत धरणारा, ते आहेत, ते बघतील, ते करतील असं म्हणणारा मी अलगद स्वतः बाबांच्या भूमिकेत कधी शिरलो, समजलंच नाही.

तेव्हा आम्ही फरशीवरच्या बाजारात गणपती बाप्पा आणायला जायचो. ही मूर्ती घेऊ की ती घेऊ असं व्हायचं. वेगवेगळ्या मूर्ती बघत असताना त्यातून आपल्या घरी कुठली  न्यायची याची निवड माझं ‘वय’ करायचं तर बाबांचा अनुभव आणि सुजाणपणा ती निवड करायचा. ” पण बाबा ती कित्ती मस्त आहे? ती मूर्ती का नको? ” असा हट्ट करणारा, प्रसंगी रडणारा मी, ” अरे! ही बघ ही घेऊया. ती छान आहे, पण ती नाही चालणार आपल्याकडे.” हे उत्तर ठामपणे कधी देऊ लागलो समजलंच नाही.

” बाबा आज मी करू देवपूजा ?” ” बाबा आज मी करू बाप्पांची आरती? ” अशी हट्टपूर्वक विनंती करणारा मी कधी या सगळ्या गोष्टींना सरावलो समजलंच नाही.

–आणि “अजून थोडा मोठा झालास की कर “, “अरे हात दुखतील तुझे ताम्हन धरून, थोडा मोठा झालास की करायचीच आहे आरती,” असं म्हणणारे बाबा, अलगद आरतीच्या वेळी गर्दीत सगळ्यात मागे जाऊन कधी उभे राहू लागले तेही समजलंच नाही.

आज वयाच्या अशा नेमक्या टप्प्यावर आलोय की सगळा पट उलगडल्यासारखा वाटतोय. मला पडणारे प्रश्न माझ्या मुलाला पडू लागलेत, मी करायचो तो हट्ट मुलगी करू लागलीये. आणि त्यावेळी  बाबा द्यायचे तशी उत्तरं माझ्या तोंडी आलीयेत.

आजही बाप्पा आणायला आम्ही एकत्र जातो. ‘ सायकल ‘ची जागा आता ‘ फोर व्हीलर ‘ नं घेतलीये. पण ” तुम्ही या घेऊन, मी हिच्याबरोबर घरी थांबून स्वागताची तयारी करतो,” असं बाबा कधी म्हणायला लागले समजलंच नाही.

आरतीचं ताम्हन मला जड होईल, असा विचार करणाऱ्या बाबांना, आज चार आरत्या पूर्ण होईपर्यंत सलग उभं राहणं जड होऊ लागलंय. त्यांचा तो जोर कधी, कसा निघून गेला समजलंच नाही.. 

बाबा …  मला सायकलच्या दांडीवर बसवून वेगात पायडल मारण्याचा तो जोर तुम्ही कुठून, कसा आणला होतात, आणि तो कधी, कसा निघून गेला समजलंच नाही. पण तो जोर गेला कुठे?– याचा उलगडा झालाय मला..

तो सगळा जोर तुम्ही माझ्या मनगटात भरलाय आणि ती सगळी जिद्द मला वारसा म्हणून दिलीये हे आता मला नक्की समजलं आहे!

आजही मला तुम्ही खूप आवडता…. अगदी गणपती बाप्पांइतकेच !!!!

{सर्व बाबा लोकांना समर्पित.}

लेखक –  अज्ञात

संग्राहक – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

चंद्रपूर,  मो. 9822363911

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉ. रॉबर्ट्स— आमचा शेजारी ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

 ? मनमंजुषेतून ?

☆ डॉ. रॉबर्ट्स— आमचा शेजारी ☆ डॉ. ज्योती गोडबोले☆ 

सातआठ वर्षांपूर्वी अमेरिकेला लेकीकडे गेले होते तेव्हाची गोष्ट.

मुलीच्या शेजारी नवीन झालेल्या घरात  एक नवीन  कुटुंब खूप सामान उतरवताना दिसले. आफ्रिकन अमेरिकन कुटुंब दिसत होते ते. खूप मोठा ट्रक भरून सामान येत होते. ३ लागोपाठची मुले, आईवडील असे दिसले. 

इकडे लगेच शेजाऱ्याच्या घरात घुसून चौकश्या करायची अजिबात पद्वत नाही. पण चार दिवसानी तो तरुण शेजारीच आमच्या घरी आला. अतिशय अदबीने बोलत होता आणि मी डॉक्टर आहे म्हटल्यावर सहज त्याने सांगितले की तो  oncologist म्हणजे कॅन्सर तज्ञ आहे आणि त्याची बायको आहे स्त्रीरोगतज्ञ. हे ऐकून तर आमचे डोळेच मोठे झाले. आधीच अमेरिकेत डॉक्टर तुफान पैसा मिळवतात, आणि त्यात हा कॅन्सर तज्ञ म्हणजे विचारूच नका.

हळूहळू त्यांची मुले बॅकयार्डमध्ये खेळताना दिसली. मुलगी मोठी होती आणि दोन मुलगे लहान. एक माझ्या नातीएव्हढाच असेल.डॉमिनिक त्याचे नाव. बोलता बोलता डॉ. रॉबर्ट्सने सांगितले, की हे लोक मूळ जमैकाचे.

त्याच्या आई वडिलांनी अतिशय कष्ट करून या मुलांना न्यूयॉर्कमध्ये आणले. हा डॉ.रॉबर्टस खूप हुशार होता म्हणून तो शाळेत तरी जाऊ शकला. अफाट कष्ट आणि फार उत्तम  ग्रेडस मिळवून तो डॉक्टर झाला. तिथेच त्याला ही  सिंथिया भेटली. तीही अशीच हैतीहून आलेली गरीब मुलगी. पण जिद्दीने डॉक्टर झाली आणि पुढे स्त्रीरोगतज्ञ सुद्धा.

मला फार कौतुक वाटायचे या डॉक्टरचे. दिवसभर राबून घरी आला,की कपडे बदलून लागलाच बागेत कामाला. खूप छान छान झाडे आणली त्याने आणि राबराबून स्वतः लावली देखील. त्याला  बाहेरची माणसे बोलावून बाग करणे अशक्य होते का?– मी त्याच्याशी  बोलताना आमच्या कंपाऊंड मधून विचारायची हे. तो हसून म्हणाला,” ग्रँडमा, हा माझा आनंद आहे. माझा  स्ट्रेस रिलीव्हर आहे ही बाग. मला खूप आनंद मिळतो चिखलात हात भरले की.”   

हळूहळू डॉ.रॉबर्ट्सची बाग सुंदर रूप घेऊ लागली. त्याने लावलेल्या गुलाबांना अक्षरशः शंभर शंभर कळ्या आल्या. त्या उमलल्यावर तर  त्या झाडाचे देखणे रूप नजर ठरेना इतके सुरेख दिसू लागले. मला या तरुण मुलाचे फार  कौतुक वाटायचे.

या उलट त्याची बायको ! सिंथिया कधीही बागेत काम करताना दिसली नाही. तिला मी एकदा विचारले तर हसून म्हणाली,”ओह। तिकडे हॉस्पिटलमध्ये कामाने दमून जाते मी आणि घरी ही तीन पोरे कमी देतात का त्रास. मला नाही आवड बागेची . रॉबर्ट्स करतोय ते बास झाले.” 

तो  रॉबर्ट्स असा सज्जन की कधीही मदतीला बायकोला बोलवायचा नाही .तीही पठ्ठी खुशाल त्याला बोलवायची आणि म्हणायची,” डिअर, जरा पिझा लावतोस का ओव्हनला? मी जरा  वाचणारे उद्याच्या पेपर  प्रेझेंटेशनचे.” 

बिचारा निमूट हात धुवून आत जायचा – अदिती  म्हणायची, “ बघ बघ, .किती गुणी कामसू नवरा आहे. मनात आणले तर आपल्यालाही विकत घेईल तो. काय भारी पगार असेल ना त्याला? पण किती नम्र आहे बघ.” 

सिंथिया बाई जरा आळशीच होत्या. या तीन मुलांसाठी त्यांनी घरी २४ तास राहणारी गोरी मेड ठेवली होती. तिला वेगळी स्वतंत्र कार दिली होती. बघा तरी, एक काळा माणूस चक्क गोऱ्या लोकांना नोकर म्हणून ठेवू शकत होता.

खूप पगार तो सहज देऊ शकत  होता तिला.. ही गोष्ट पण कौतुकाचीच होती ना? मला हेही भारी कौतुक वाटले. 

पूर्वी वाचलेले ‘ एक होता कार्व्हर ‘ पुस्तक आठवले ,आणि त्या गरीब बिचाऱ्या बुकर टी.वॉशिंग्टनने अफाट सोसलेले कष्ट आठवून डोळ्यात पाणीच आले माझ्या. आज त्यांच्याच  वंशातला एक मुलगा, एक गोरी बाई सहज  नोकर म्हणून ठेवू शकतो हे केवढे कौतुक… आम्हाला या कुटुंबाचे नेहमीच कौतुक वाटायचे.

सिंथिया एकदा आमच्या घरी केक घेऊन आली होती. वर म्हणते, “ मी नाही हं केला.मला तितकीशी आवड नाही स्वयंपाकाची. डॉ.रॉबर्ट्सने केलाय. “— मनात म्हटले,’ बायो,अग किती ग गुणी नवरा मिळालाय तुला.” 

मग आम्ही तिच्या बाउलमध्ये साबुदाण्याची खिचडी पाठवली. लेक म्हणत होती, “ आई,कमालच आहे तुझी बाई. हे खिचडी बिचडी त्यांना आवडेल का तरी? आपण देऊ  कुकीज. उगीच काय तुझे काहीही.” 

मी म्हटले “ देऊ या ग.नाही आवडले तर न का खाईनात.”—  दोन दिवसानी हातात एक वही पेन्सिल घेऊन डॉ सिंथिया घरी आली.–“ ते काय होते केलेले ?ते डॉ.रॉबर्ट्स आणि माझ्या डॉमिनिकला खूप आवडले. काय आहे त्याचे नाव? त्याची रेसिपी सांगा ना प्लीज. मी करीन घरी.” 

मी मनातल्या मनात कपाळावर हात मारून घेतला. आता हिला मी साबुदाणा कुठे मिळतो इथपासून तो कसा भिजवायचा हे कसे काय सांगू .मी तिला म्हटले “ सिंथिया,बाई,ही रेसिपी इंडियन आहे,तुला जमणार नाही ग. जेव्हा केव्हा खावीशी वाटेल तेव्हा मला सांग.मी देईन करून.”

सिंथिया हसली आणि म्हणाली,” ओह! Seems difficult hmm।  ग्रँडमा, please u do it for me hmm.”

लाघवी होती खरी पोरगी. नंतरही आम्ही अनेकवेळा खिचडी करून दिली, आणि डॉमिनिक आणि त्याचा डॅडी  आम्हाला,’वावा’ असे हात करून दाद द्यायचे.

अदिती नेहमी म्हणायची, ‘ डॉ.रॉबर्टस इथे नक्की राहणार नाही. तो खूप मोठ्या आलिशान,४ गराज असलेल्या घरात शिफ्ट होईल बघ लवकरच. तो नक्की त्यांच्या हॉस्पिटलजवळ असलेल्या खूप  भारी आणि रिच कम्युनिटीमधेच घर घेणार एक दिवस. आमचीही कम्युनिटी आहेच भारी आणि उच्चभ्रू, पण हा याहूनही खूपच श्रीमंत वस्तीत जाणार बघ.” – अगदी तसेच झाले . मी भारतात परत आल्यावर काहीच महिन्यात रॉबर्ट्स कुटुंब  तिथून हलले.

त्यांनी अदितीच्या कुटुंबाला त्यांचे नवे घर बघायला बोलावले होते. अदिती म्हणाली, “ काय सुंदर आहे घर त्यांचे.

केवढेच्या केवढे प्रचंड. लेक साईडजवळचे, राजवाड्यासारखेच—इथे असली घरे प्रचंड किमतीलाच मिळतात.

डॉ.रॉबर्ट्स ने अतिशय हौशीने सजवलेही आहे फार सुरेख. तू आलीस की तुला घेऊन ये असे नक्की स्पेशल आमंत्रण आहे बरं तुला. “ 

कधी मी जाईन का नाही हे मला माहीत नाही, पण जमैकासारख्या ठिकाणाहून आलेल्या एका जिद्दी डॉक्टरची ही  झेप मला खरोखर फार कौतुकास्पदच वाटली.

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ विश्वस्त  – लेखक – श्रीरंग खटावकर ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? मनमंजुषेतून ?

विश्वस्त  – लेखक – श्रीरंग खटावकर ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

आमच्या सोसायटीतले जोशी आजी आजोबा, खाऊन पिऊन सुखी, दोन्ही मुलं अमेरिकेत. इथे आजी आजोबा मजेत. परवा काही कामानिमित्त त्यांच्याकडे गेलो तर आज्जी चक्क लॅपटॉपच्या समोर बसलेल्या ! 

म्हंटलं “आजी काय करताय !”

” काही नाही रे फेसबुकवर फोटो अपलोड करतेय, भजनी मंडळाचे !”

मी तीनताड उडालो. ” आजी तुम्ही फेसबुकला आहात? “

“ मग ! वाटलं काय तुला ! व्हाट्सप पण वापरते मी. आणि हे आजी काय रे?  ग्रॅनी म्हण! “

मी अवाक–आं !! म्हंटलं, आजोबा– sorry, ग्रॅंडपा कुठे गेलेत ? “

” गेलेत मार्केटला, बरमुडा का काय आणायला.”

माझा चेहरा बघून आजी हसल्या म्हणाल्या, ” बस जरा गम्मत दाखवते !”

डुलत डुलत आत गेल्या आणि एक पिशवी घेऊन आल्या. “आमच्या सुशनी पाठवलंय! ” बघितलं तर आत एक पंजाबी ड्रेस ! “अरे पुढच्या महिन्यात जायचंय ना यु एस ला! तयारी हो, तिथे नऊवारीत थंडी वाजते हो, ह्याच्या आत कसे ते थर्मल वेअर की काय ते घालता येतं ना ! “

” काय हो आजी, सॉरी ग्रॅनी तुम्हाला करमतं का हो तिकडे? “

” न करमायला काय झालंय, मला आवडते तिथे, तिथे भारतीय लोकांचा आमच्याच वयाचा एक ग्रुप केलाय. सगळे दर वीकएंडला भेटतो आणि धम्माल करतो. पॉटलक करतो, बर्थडे साजरे करतो, साठी, पंच्याहत्तरी, सहस्त्रचंद्रदर्शन अगदी सगळं करतो.  काही तिथेच स्थायिक झालेले, काही आमच्या सारखे……. वारकरी.”

” तिथे भेटताना अट एकच ! घरची गाऱ्हाणी कोणी सांगायची नाहीत. मग काय मज्जा मस्तीला तर उत येतो. तुला म्हणून सांगते, कोणाला सांगू नकोस हो, नाहीतर धपाटा घालीन.”

“बोला ना “

खुसपुसत म्हणाल्या, ” अरे गेल्या वेळी एकीचं बेबी शॉवर होतं, म्हणजे डोहाळजेवण. असा बावळटासारखा बघू नकोस. तर तिथे एका म्हातारीने मला टकीला की काय म्हणतात ना ती पाजली. आणि मी लागले ना झिंगायला ! 

बरं झालं तिने मला आत नेऊन झोपवलं, नाहीतर काय धिंगाणा केला कोणास ठाऊक? तरी हे दुसऱ्या दिवशी 

माझ्याकडे संशयाने बघत होते, मी आपलं तोंड लपवले.” असं म्हणताना त्या गोडश्या लाजल्या. आणि इथे हे ऐकताना माझी हसून हसून पुरेवाट!

” काय हो आजी हल्ली सकाळी तुम्ही फिरायला जाताना दिसत नाही?”

“अरे नाही उठवत रे, रोज रात्री आमच्या नातवंडांशी चॅटिंग फिटिंग करतो दोघं आणि मग झोपायला उशीर होतो.  आणि जाऊन तरी करायचंय काय तिथे, सुनेच्या, जावयाच्या कागाळ्याच ऐकायच्या ना ! नाहीतर तब्बेतीची रडगाणी ! अरे आता त्या गुप्तेआजी ! सून इतकी चांगली आहे. डॉक्टरेट केलंय, पण ह्या म्हणतात की ती घरी पोळीभाजी करत नाही. आता ती तिच्या कंपनीत मोठमोठ्या फाईली उपसत बसेल की पोळ्या लाटेल?” 

” दुसरी ती परांजपीण, सारखं मेलीला काही न काही होत असतं. आज काय अर्धशिशी, उद्या काय बद्धकोष्ठ, तर परवा काय जुलाब. कुठला रोग झाला नाही असे नाही. तरी बरं मुलगाच डॉक्टर आहे. पण हिला वाटतं की माझ्या उशापायथ्याशी सगळ्यांनी बसावं. गेल्या महिन्यात आली होती तेव्हा रडत होती की सारखं पाठीत दुखतंय. अस्सा राग आला. म्हंटलं उडी मार तळ्यात ज्या काठावर बसलोय तिथून, नाहीतर मी ढकलते तुला. तशी घाबरली आणि पळाली घरी. तेव्हापासून मला आजी कट्ट्यावर हिटलर म्हणतात.  मी सांगू का एक गोष्ट तुला, मला नाही आवडत हे सगळं. आपणच मुलांना शिकवलं ना? आणि ती मुलं शिकल्यावर त्याचा उपयोग नको का करायला? सारखं आपलं उणंदुणं काढायचं. आमच्या ह्यांची नोकरी होती फिरतीची, दर पाच वर्षांनी बदली, सारखं संसार मांडा- परत बदला, मुलांचीपण फरफट आमच्याबरोबर, तेव्हा मुलांनी तक्रार केली का? नाही ना? मग आता त्यांच्यामागे आपण गेलो तर कशाला रडायचं. माझी सून तर तिकडचीच आहे. पण तिथे गेले की सगळं छान करते, सुरवातीला पूर्ण अमेरिका फिरवलं आम्हाला, अगदी युरोप टूर पण केली. आणखी काय हवं म्हणते मी. “

” मी तर म्हणते मुलं मार्गी लागली, त्यांची लग्न झाली की आपण ज्येष्ठांनी विश्वस्त व्हावं घराचं,आपल्याला सल्ला विचारला तरच द्यावा, आणि सल्ला दिल्यावर तोच मानला जाईल असा अट्टहास करू नये. त्यामुळे भांडणं कमी होतात. आणि अपेक्षाभंगाचं दुःखही होत नाही. आणि आताच्या जमान्यात, ना आम्ही त्यांच्यावर अवलंबून, ना ते आमच्यावर ! आताच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात या मुलांना खूप माहिती असते, आणि त्यांच्या परीने ते आपली काळजी घेतातच की. आयुष्यात तक्रार न करता आणि दुसऱ्याचं कौतुक करत राहिलं ना की खूपसे प्रश्न चुटकीसरशी सुटतात. “

” चल आवरते आता ! तुझ्याशी बोलत बसले तर कामं कोण उरकणार, आमचा म्हसोबा येईलच एवढ्यात.

चल पळ तू पण!!”

मी निघालो खरा तिथून, पण त्यांचा ‘ विश्वस्त ‘ हा शब्द मनात कुठेतरी खोल जाऊन बसला. किती छान विचारसरणी ना ? 

— असे जर विचार आपल्या सगळ्याच ज्येष्ठांनी केले तर त्यांचे कितीतरी प्रश्न हे प्रश्नच राहणार नाहीत.

लेखक – श्रीरंग खटावकर

संग्राहक – सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सत्यासत्य ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? मनमंजुषेतून ?

सत्यासत्य ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री  ☆

जे आहे ते सत्य आहे; शब्दरूप घेऊन आले की ते असत्य होते’. 

आपल्या शिष्याला गीतेतील जीवनाचे तत्वज्ञान समजावून सांगतानाच्या वेळेचे हे साईबाबांचे उद्गार ! यातून बाबा केवळ भगवद्गीतेतील श्लोकाचेच विवरण करतात असे नाही, तर ते त्याबरोबरच संभाषण शास्त्र आणि कला यांचे मूलतत्व सांगतात. 

संभाषण हे मूलतः आपण व्यक्त होण्याचे, दुसऱ्याशी संपर्क साधण्याचे एक साधन आहे. आपण दुसऱ्यापाशी व्यक्त होतो म्हणजे काय करतो? आपण आपल्या मनातील काहीतरी समोरच्याला सांगतो. कसे? त्या बाबीवरील आपले ज्ञान दुसऱ्याच्या विश्वातील अनुभवांच्या जवळातजवळ जाऊन सांगायचा प्रयत्न करतो. जेव्हा बोलणाऱ्या व्यक्तीचे आणि ऐकणाऱ्याचे अनुभव विश्व एकच असते (जे फारच क्वचित घडते) तेव्हा हे अतिशय सुलभ होते. मात्र या दोघांच्या अनुभव विश्वात जितकी तफावत अधिक तितके हे कठीण होत जाते—आपण एका साध्या उदाहरणातून पाहू या—

माझ्या समोर गुळाचा खडा आहे. समोरच्याला हे काय आहे ते माहिती नाही. आता होणारे संभाषण कसे असेल?

‘ हे काय आहे?’

‘ गूळ ’

‘ याचं काय करायचं? ’

‘ हा खायचा.’

‘ कसा लागतो तो?’

‘ गोड ’

‘ गोड म्हणजे? ’ 

‘ तू साखर खाल्ली आहेस ना? साखर गोड असते.’ 

‘ म्हणजे गूळ साखरेसारखा लागतो? ’ 

(पाहिले ना सत्याचे शब्दरूपात कसे असत्य झाले!)

‘ तसे नाही रे. करंजी गोड असते.’

‘ म्हणजे हा करंजीसारखा लागतो?’ (आणखी एक असत्य!)

आता कितीही पदार्थांची नावे सांगितली तरी गुळाची चव त्यांचापेक्षा वेगळीच असणार ना ! मग किती असत्य सांगायचे?

‘आपल्या जिभेवर जे विशिष्ट रससंवेदक असतात ते जेव्हा चेतविले जातात ती चव,’– मी शास्त्राचा आधार घेतला आणि तो माझ्याकडे मोठा आ वासून भूत बघितल्यासारखा पाहू लागला. आता कशी समजावून सांगू मी त्याला गुळाची चव? त्याच्या अनुभवविश्वातून सगळ्या पदार्थांची यादी सांगूनही मला गुळाची चव सांगता येत नव्हती. 

अखेरीस मी त्याला म्हटले, ‘ तू खाऊन बघ ना, म्हणजे तुला समजेल याची चव.’ 

किती सोपा मार्ग ! पण इथे शब्द कुचकामी ठरले, कारण मी त्याला त्याची निश्चित अनुभूती देऊ शकत नव्हतो. म्हणजेच जे अनुभूतीजन्य असते ते सत्य असते आणि त्याला शब्दरूप द्यायचा प्रयत्न केला की ते असत्य होते. अध्यात्मिक भाषेत सांगायचे तर हा ‘ संप्रज्ञात आत्मसाक्षात्कार ‘ आणि ‘ असंप्रज्ञात आत्मसाक्षात्कार ‘ यांच्यातील  फरक आहे. प्रज्ञेच्या आधाराने झालेले ज्ञान हे कधीच निर्भेळ असू शकत नाही – संपूर्ण सत्य असू शकत नाही; ते अनुभूतीजन्यच असले पाहिजे. 

म्हणूनच संभाषणात शाब्दिक संभाषणापेक्षा चेहेऱ्यावरील आणि नजरेतील भाव व देहबोली अधिक परिणामकारक ठरतात. अन्यथा ‘ मला असे म्हणायचे होते की ….’ किंवा ‘ पण मला असं नव्हतं म्हणायचं ….’ असे सांगायची वेळ येते. 

संपूर्ण सत्य हे केवळ अनुभवजन्यच असते. ते शब्दरूप घेऊन आले की भेसळीने त्याचे असत्य होते. 

‘जे आहे ते सत्य आहे; शब्दरूप घेऊन आले की ते असत्य होते’.

©️ डॉ. निशिकान्त श्रोत्री

९८९०११७७५४

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मानाचा सॅल्युट… ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? मनमंजुषेतून ?

मानाचा सॅल्युट… ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

आज उद्या सुट्टी. नुकतचं मोठं मंगलकार्य पार पडल्यानंतचा शीण आलाय. गणपतीगौरी विसर्जनानंतर आलेला हा मानसिक आणि शारीरिक थकवा असतो.

घरच्या गौरीगणपतींचं विसर्जन झालं आणि घर सुनं सुनं वाटायला लागलं. घरं जरी सुनं सुनं झालं तरी जरा बाहेर पडलं की चौकाचौकात बसलेले गणपती, त्या भोवतालची आरास, स्पिकरवरील भक्तीगीतं आणि आरत्या ह्यामुळे उत्साहवर्धक मंगलमय वातावरण होतं.

काल अनंतचतुर्दशी झाली. गावातील  बाप्पांच्या मुर्तींचं पण विसर्जन झालं आणि मग खरोखरच सगळं शहर निस्तेज, शांत भासायला लागलं. सणसमारंभ आटोपले की एक प्रकारचं चैतन्यच नाहीसं होतं, एक मरगळ आल्याचा फील येतो.

हा सण सुखरूप, निर्विघ्न पार पडल्यानंतर सर्वप्रथम आभार मानायचे तर त्या पोलीस खात्याचे आणि रहदारी वर नियंत्रण ठेवणा-या ट्रॅफिक पोलिसांचे मानावे लागतील. खरंच किती ताण येतं असेलं नं ह्या दोन्ही खात्यांवर. गणपतीच्या मिरवणूकीतील गर्दीवर नियंत्रण ठेवणे, नागरिकांच्या सुरक्षेबाबत सतर्क असणे, ह्या प्रकारची अनेक महत्त्वाची कामे अक्षरशः तहानभूक विसरून पण पार पाडावी लागतात. ही कर्तव्ये पार पाडतांना बरेचदा त्यांना वैयक्तिक अडचणींकडे कानाडोळा करावा लागतो.

अमरावतीमध्ये गणपती आणि नवरात्रात चिक्कार गर्दी असते. गणपती बघायला आणि नवरात्रात देवींच्या दर्शनासाठी आजुबाजुच्या कित्येक गावागावांतून कुटूंबासहित लोक येतात. या सगळ्याचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष ताण हा पोलीस खातं, वाहतूक नियंत्रण खातं आणि आरोग्य खातं ह्यावर येतोच. कितीतरी पोलीस पुरुष व महिला कर्मचारी सुध्दा ही गर्दी आटोक्यात आणण्यासाठी तैनात असतात. ह्या कालावधीत ह्या खात्यातील कर्मचाऱ्यांना अजिबात रजाही मिळत नाही. कितीतरी वेगवेगळ्या प्रकारची कामे ह्या खात्यातील कर्मचाऱ्यांवर सोपवलेली असतात. गर्दीला आटोक्यात ठेऊन भक्तांची नीट रांगेत व्यवस्था करणे, कुणी लहान मूल चुकून त्या गर्दीत हरविले तर त्याला सुखरूप त्याच्या पालकांपर्यंत पोहोचविणे, वयोवृद्ध मंडळींकडे जातीने काळजीपूर्वक लक्ष पुरविणे, गर्दीचा फायदा घेऊन घुसलेल्या भुरट्या चोरांचा मागोवा घेणे, एकाच जागी जास्त व्यक्तींना वा वाहनांना थारा न देणे, आणि ही सगळी व्यवस्था त्यांना लगातार आठ दहा घंटे सतत फिरस्ती राहून चोख बघावी लागते. खरंच सलग इतके घंटे उभ्याने काम करुन अक्षरशः पायाचे तुकडेच पडत असतील त्यांच्या .

गणपतीत दहा दिवस, आणि मध्ये जेमतेम पंधरा दिवस तीन आठवडे उलटले की परत नवरात्रात सलग नऊ दिवस पुन्हा तीच व्यवस्था बघणे हे अतिशय अवघड, कष्टाचंच काम आहे. ही व्यवस्था बघतांना ते कर्मचारी तहानभूक विसरून ऊन,पाऊस ह्याची पर्वा न करता इमानेइतबारे आपले कर्तव्य बजावीत असतात. शिवाय वेगवेगळ्या निवडणूकांच्या काळात देखील ह्यांच्या संयमाची कसोटीच लागत असते. 

शेवटी काय प्रत्येक ठिकाणी व्यक्ती तितक्या प्रकृती .एखाद्या वाईट अनुभवाने सगळ्या खात्यालाच त्या पँरामीटर मध्ये तोलणे योग्य नव्हे. शेवटी ती पण आपल्यासारखीच हाडामाणसाची माणसे हो. त्यांना पण त्यांच्या आरोग्याच्या, वैयक्तिक, कौटुंबिक विवंचना ह्या असतातच.पण तरीही मनापासून सेवा देणा-या ह्या खात्यातील समस्त कर्मचाऱ्यांना मानाचा सँल्युट.  

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ काष्ठशिल्पाची कथा… ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

 ? मनमंजुषेतून ?

☆ काष्ठशिल्पाची कथा… ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

नारायण धारप, रत्नाकर मतकरी, या सिद्धहस्त लेखकांची मी जबरदस्त चाहती. त्यांच्या भयकथा, त्यातली पात्रे, त्या आफ्रिकेतली गूढ वर्णने, ते वाडे– सगळे मनावर विलक्षण गारुड करतात. असा त्यांचा एकही कथासंग्रह नसेल,जो मी वाचला नसेल. सांगायचे कारण, ते लिहितात त्या सगळ्याच काही कपोलकल्पित गोष्टी नसतात. काही सत्यकथाही असणारच—-कारण मलाही एकदा असाच एक भयंकर अनुभव आलाय—–

—–  गोष्ट आम्ही युरोप टूरला गेलो तेव्हाची. त्यालाही झाली  सहज १५  वर्षे. आम्ही तेव्हा फ्लोरेन्सला गेलो होतो.

तिथून पिसाही फार लांब नाही. आम्ही पिसाचा झुकता मनोरा बघितला,आणि हिरवळीवर छान पाय पसरून बसलो.

 रोम, इटलीला आफ्रिकन लोक फार मोठ्या संख्येने दिसतात. नाना वस्तू ते विकताना आढळतात. मी आणि माझी बहीण अशा दोघीच एका कंपनीबरोबर टूरला गेलो होतो.

“ ताई,चल ना जरा मार्केट मध्ये चक्कर मारू “, स्मिता म्हणाली.

बाकीचे लोक म्हणाले,’ जा तुम्ही,पण लवकर या बरं का.उगीच कुठे चुकलात तर पंचाईत होईल.’ 

आम्ही मार्केट बघायला निघालो. काय सुरेख सुरेख वस्तू मांडून ठेवलेल्या होत्या. अर्थात युरोमध्ये किमतीही अफाटच होत्या म्हणा. नुसत्या की चेन्स दहा युरो खाली नव्हत्या. अतिशय सुंदर, लेदरच्या टोट बॅग्स बघूनच समाधान मानावे.

पुढे गेलो तर दोन आफ्रिकन मुले अतिशय गुळगुळीत केलेले असे टेबलवर ठेवायचे लाकडी मोठे शोपीस विकत होती. काय सुरेख होते ते केलेले. काळेभोर शिसवी लाकडाचे. पाच गुळगुळीत डोके असलेले पुरुष एकमेकांना वेढून गोल करून वाकून उभे होते—-असे ते सुंदर काष्ठशिल्प बघून मी थबकलेच. मला अतिशय आवडले ते  .आमच्या हॉलमधल्या सेंटर टेबलवर काय मस्त दिसेल हे, असा विचारही आला मनात. मी जवळ जाऊन बघितले,तर त्यांचे चेहरे क्रूर वाटले मला. पण तरी मी त्या मुलाला विचारून उचलून बघितले ते शिल्प— आणि माझ्या अंगावर एकदम भीतीचा काटा उभा राहिला. मी ते पटकन खाली ठेवले—

— मला अशा  संवेदना,इतरांपेक्षा जास्त  तीव्र होतात आणि लगेचच समजते की हे चांगले नाही. हा सेन्स मला अगदी लहानपणापासूनच आहे. मला जाणवत होते की ते काष्ठशिल्प अगदी वाईट शक्तीने भारलेले आहे. पण तरीही मला ते घ्यायचा मोहच होत होता. तो मुलगा त्याची किंमत खूप कमी करायलाही तयार होता. मला तर तीव्रपणे असे जाणवले   की कसंही करून ते विकून त्याला मोकळं व्हायचंय.

मी त्याला विचारले, “ हे कुठून आणलंय तुम्ही? ”

सुदैवाने त्याला बऱ्यापैकी इंग्लिश येत होते. म्हणाला की असेच कोणीतरी त्याला विकलेय. “ पण तुम्ही घ्या ना हे. बघा ना किती सुंदर काम केलंय, अगदी गुळगुळीत केलंय. तुम्ही कुठून आलात? इंडिया का ? इंडिया चांगला देश आहे   असं ऐकलंय मी.” तो म्हणाला.  

मी पुन्हा त्या पुतळ्यांच्या चेहऱ्याकडे बघितले. माझ्या डोळयांसमोर अचानक अंधार आला— एकदम एखाद्या गूढ जंगलात कसले तरी पडघम  वाजताहेत असा भास झाला. पण काही केल्या मला त्या पुतळ्यासमोरून हलताच येईना. आता तर मला त्यांच्या चेहऱ्यावर रागाचे भाव स्पष्ट दिसत होते.  माझी बहीण स्मिता शेजारीच उभी होती.

तिलाही असं काहीतरी वेगळंच जाणवलं असावं. तिने माझा हात ओढला आणि म्हणाली, “ ताई नको घेऊ हे . फार भयानक दिसतंय. किती हिडीस दिसतायत ही माणसं. कसा काय आवडलाय हा पुतळा तुला .शी…. अजिबात नको घेऊ हं. “ 

त्या मार्केटमध्ये आम्हीच दोघी उरलो होतो. बाकी लोक निघून गेले होते. तो मुलगा तर आता असं म्हणायला लागला होता की “ मी हे तुम्हाला गिफ्ट देतो, पण हे घ्याच तुम्ही.”  तो ते माझ्या हातात कोंबूच लागला. आणि माझ्या अंगावर भीतीच्या लाटा  उसळू लागल्या—स्मिताला काहीतरी जाणवले. तिने माझा हात घट्ट धरला आणि म्हणाली, “ ताई इथे नक्की काहीतरी गडबड आहे. आपण अगदी मूर्खासारख्या उभ्या आहोत.– लवकर पळ इथून.” —-

तिने मला तिथून अक्षरशः खेचत पळत न्यायला सुरुवात केली . तरी मी मागे ओढ घेतच होते.

“ थांब ना !आपण घेऊया की ग तो गिफ्ट देतोय तर.” मी मागे बघत बघत म्हणत होते. स्मिताने आता धावायला सुरुवात केली. परका प्रदेश– परकी भाषा– रस्ते– काहीच माहीत नव्हतं .आणि आतातर आम्ही कुठे आलोय हेही आठवेना. तिने मला कसेतरी फरपटत लांब नेले. तो मुलगा हातवारे करून बहुतेक आम्हाला त्याच्या भाषेत वाईट शिव्या देत होता. धावत धावत आम्ही आमच्या लोकांना येऊन भेटलो तेव्हा जीव भांड्यात पडला स्मिताचा.

तरीही मी म्हणतच होते तिला, “ अगं, निदान परत एकदा जाऊन नुसतं बघून तरी येऊया. किती सुंदर केलेय ग ते.” 

आमच्या ग्रुपमधल्या लोकांनाही हे माझं सगळं काहीतरी वेगळं चालल्याचं जाणवलं असावं. त्यांनी घाईघाईने मला कडक कॉफी दिली आणि लगेचच आम्ही बसमध्ये बसलो.

सुदैवाने आमचा तिथे रात्री मुक्काम नव्हता. रात्री मला फणफणून ताप भरला. मलाच विचारून स्मिताने माझ्या बॅग मधल्या गोळ्या मला दिल्या. मला गाढ झोप लागली. स्मिताने सकाळी मला उठवलं—” ताई, बरं वाटतंय का?” 

“ हो मस्त वाटतंय ! का ग?” 

 “ का ग काय? मूर्ख कुठली। रात्रभर मी जागत बसलेय तुझ्या जवळ. काय बोलत होतीस अग रात्रभर. कोणत्या तरी अगम्य भाषेत कोणाशी तरी जोरजोरात वाद घालत होतीस. मला इतकी भीती वाटत होती ना ताई. मग कधीतरी तुझं ते विचित्र बोलणं थांबलं आणि तुला झोप लागली. नाही तर मी खरंच कोणालातरी आपल्या रूममध्ये झोपायला बोलावणार होते.– ताई,अग हे सगळे त्या पुतळ्याचे प्रताप बाई. काहीही नाहीये का आठवत?” 

“ नाही ग. पण सॉरी स्मिता !खूप  त्रास दिला ग मी तुला.खरंच सॉरी! पण तो पुतळा बघितल्यावर मला काहीच सुचेना.

जणू मोहिनीच पडली मला त्याची. कुठंतरी जाणवत होतं की ती वाईट शक्ती आहे. पण तरीही जणू ते शिल्पच म्हणत होतं की ‘ घे मला ‘. खरं सांगते आहे. “ 

स्मिता म्हणाली ,” अक्षरशः ओढत ओढत आणलं तुला तिथून.” पण मला हेही आठवत नव्हतं .

 मग आम्ही तिथून आणखी दुसऱ्या शहरात गेलो. नंतर पुन्हा मला असा काहीच त्रास झाला नाही. आमची सगळी ट्रीप खूपच सुंदर झाली.

आमच्या ग्रुपमधले नव्याने  दोस्त झालेले लोक म्हणाले, ‘ काय ज्योतीताई, आम्ही पण काय घाबरलो होतो त्या दिवशी. स्मिताताईंची तर वाटच लागली होती.” 

— मला  मात्र हे काहीही आठवत नाही. मी तो पुतळा बघितला एवढेच मला आठवते. पुढचे काहीही नाही.

म्हणूनच नेहमी लक्षात ठेवावे— परक्या माहीत नसलेल्या ठिकाणी  काही घेऊ नये असे आपले पूर्वीचे जुने लोक सांगतात ते मुळीच चुकीचे नाही— हा अनुभव तर हे चांगलेच शिकवून गेला मला–आणि स्मिताला पण.

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ अर्थपूर्ण प्रथा… ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? मनमंजुषेतून ?

☆ अर्थपूर्ण प्रथा… ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सोमवारी संध्याकाळी गौरीगणपतींचं विसर्जन झालं आणि घरं अगदी सुनंसुनं झालं. ह्या विसर्जनाच्या दिवशी सकाळपासूनच एक  हूरहूर लागलेली असते. वास्तविक पहाता माहित असतं बरं का, की हे गौरी गणपती आपल्याकडे पाहुणे म्हणून आलेत. तरीही त्यांच्या विसर्जनानंतर चैन पडत नाही ही पण गोष्ट खरीच. त्यांच्या आगमनाने आपले मन तसंच घरचं वातावरण खूप उत्साहवर्धक झालेलं असतं. घर कसं भरल्या भरल्यासारखं वाटतं.

ह्या सणावारांच्या निमित्ताने का होईना, आम्ही नोकरदार बायका देवासमोर चार घटका जरा शांत बसतो. नैवेद्य कुळाचार ह्या निमित्ताने चार निरनिराळे साग्रसंगीत पदार्थ करतो. ह्या निमित्तानेच आपल्याकडून रितीरिवाज, नेमधर्म पाळल्या जातात. चार माणसे, नातलग,आपले नेहमीचे रुटीन बदलून गौरीगणपतीच्या निमित्ताने एकत्र येतात. अशी  एकमेकांची मनं जुळण्यासाठी, एकमेकांचा सहवास लाभण्यासाठीच जणू ह्या सणावारांचं नियोजन असतं. परस्परांशी एकोप्याने वागणे आणि जमेल तितकी मदत करण्याचा आटोकाट प्रयत्न करतो.

आपण गौरीगणपतींना निरोप देतो खरा, पण निरोप देतांनाच पुढील वर्षी ह्याच मुहूर्तावर परत इतक्याच ओढीनं येण्याची कमिटमेंट घेतो. जणू पुढील वर्षी परतण्याच्या बोलीवरच आपण ह्यांना निरोप देतो. जरी गौरीगणपतींना निरोप देणं अवघडं जातं असलं, तरी ते एक संतुलित आखीवरेखीव ऋतूचक्र आहे हे पण विसरून चालणार नाही. गौरी म्हणजे माहेरवाशिणींचे प्रतिक आणि गणपती म्हणजे घरचा खंदा दिपकच जणू, ज्याला कर्तव्यपूर्तीसाठी एकाच जागी स्थिर राहताच येणार नाही. ज्याप्रमाणे माहेरवाशीण  एकदा माहेरी चक्कर मारून 

येते, तेथील सगळं क्षेमकुशल आहे ह्याची तिची खात्री पटली, की मग तिला आपल्या स्वतःच्या घराची ओढ लागते, त्याप्रमाणेच गौरी ह्याही माहेरवाशिणी. त्या औटघटकाच येणार. पण त्या अल्पकालावधीत पुरेपूर सौख्याचा आणि आनंदाचा शिडकावा करुन जाणार, प्रेमाची, मायेची पखरण करुन जाणार. त्यामुळेच मन त्यांच्या विरहानं जरा झाकोळलं असलं तरी आपल्याला गरज असतांना ह्या मदतीला धावून येणारच ही मनात खात्री आणि विश्वास पण तेवढाच असतो. जरी बाप्पाचे विसर्जन झाले तरी त्याच्या पूजेचा मान हा प्रथमच. त्यामुळे बाप्पाचंही अस्तित्व कायम मनात ठायी ठायी जाणवतं असतं बघा.

आपण गौरीगणपतींना निरोप देतांना शिदोरी म्हणून दहीपोहे किंवा दहीभात व मुरड-कानवला देतो. मुरड-कानवला म्हणजे हलक्या हाताने सारण भरून केलेली करंजी आणि त्याला हाताने घातलेली नाजूक एकसारखी मुरड. मुरड-कानवला दिल्यानंतर देव किंवा व्यक्ती मुरडून, म्हणजेच वळून परत आपल्याकडे येतेच असा समज आहे.

सहज करता येण्यासारख्या गोष्टी, आणि जुन्या प्रथा, ज्या केल्याने आपले नुकसान तर काहीच होत नाही, झालाच तर फायदाच होतो, त्या प्रथा करण्याचा प्रयत्न करावा. अर्थात हे माझे मतं. म्हणून सौ.आईने शिकविलेल्या  गोष्टी– उदाहरणार्थ प्रवासाला, परीक्षेला, महत्वाच्या कामाला निघालेल्या आपल्या माणसांच्या हातावर दही देणे,  तसेच कामानिमित्त प्रवासास बाहेरगावी जातांना देवाजवळ  पैसासुपारी ठेवणे, अशा सहज गोष्टी ज्या माझी आई अजूनही कटाक्षाने पाळते, त्या मनोमन  पटतात.खरचं ह्या प्रथा पूर्ण विश्वासाने केल्या तर अर्थपूर्ण असतात.

परत एकदा गौरीगणपतींना “ कायम आमच्यावर कृपादृष्टी असू द्या “ ही हक्काची विनंती करते. 

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ तटस्थता…लेखक – अज्ञात ☆ संग्राहक – श्री माधव केळकर ☆

? मनमंजुषेतून ?

 ☆ तटस्थता… लेखक – अज्ञात ☆ संग्राहक – श्री माधव केळकर ☆ 

वयाच्या एका टप्प्यावर माणसाला तटस्थता येते. आयुष्यभर माणसांचे, नातेवाईकांचे, मित्रमैत्रिणींचे अनुभव घेऊन प्रगल्भता आलेली असते किंवा ती येते. प्रत्येक गोष्टीकडे, घटनेकडे, प्रसंगाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो. घडून गेलेल्या प्रसंगाचे अवलोकन करता येते. हे खरंच घडलं का? मग घडलं तर का घडलं? आपलं काय चुकलं? ह्याचा विचार करण्याची क्षमता वाढते. माफ करण्याची  वृत्ती वाढते. साध्या साध्या गोष्टींवरून येणारा राग आता येत नाही. मनःशांती मिळायला सुरुवात होते. कशाचेही काही वाटेनासे होते. आता हे चांगले का वाईट, हे घडत असणाऱ्या गोष्टी ठरवत असतात. येणारा प्रत्येक प्रसंग किंवा घटना मनाला किती लावून घ्यायची ह्याचे जणू काही  प्रात्यक्षिकच आपल्याला मिळालेले असते. एखाद्या घटनेकडे तटस्थपणे बघता येते. आपली ह्यामध्ये काय भूमिका आहे? ती महत्वाची आहे का? आपल्या मताची गरज आहे का? हे सगळे समजून घेता येते. त्याची उत्तरे मिळत राहतात. जी उत्तरे मिळतात त्याने आपल्याला त्रयस्थपणे वागता येते.  

आता वारंवार डोळ्यात येणारे पाणी थोपवण्याची कला अवगत झालेली असते. आपले कोण परके कोण? किंवा जी आहेत ती खरंच आपली आहेत का? किंवा मग जी होती ती आपली होती का? ज्यांच्यासाठी डोळ्यात पाणी येत होतं  ती माणसे आता दुरावलेली असतात. आपल्याला  हवी तशी माणसे वागतच नाहीत हे समजायला लागतं. मग अपेक्षांचं ओझ हळूहळू कमी होत जातं आणि एक अंतर आपोआपच तयार होते. हा आलेला एकटेपणा जास्त सुंदर असतो. कुणाचेही बंधन नाही, अपेक्षा नाहीत आणि त्यामुळे होणारे दुःख नाही. त्यामुळे वागण्यातला ओलावा आपोआपच कमी होतो. बोलणे कमी होते. कर्तव्य भावनेने काही गोष्टी केल्या जातात. पण त्यातील गुंतवणूक कमी होते त्यामुळे तटस्थता येते.

आपल्या आजूबाजूचा गोतावळा आपोआप कमी होतो. आपले आपण उरत जातो आणि जग जास्त सुंदर होतं.  हा एकटेपणा जास्त सुंदर असतो. जग जास्त सुंदर दिसायला लागतं. खरं म्हणजे ते सुंदर होतंच पण आपण दुसऱ्याच्या नजरेतून बघत होतो. ही आलेली तटस्थता जगायला शिकवते. आजपर्यंत केलेल्या गोष्टी किंवा राहून गेलेल्या गोष्टी करायची एक उमेद देते. कारण आता कसलंही ओझं नसतं. कुणाकडून कसलीही अपेक्षा नसते, कोण काय म्हणेल ह्याची भीती नसते. आपण कुणाला बांधील नसतो. आपल्या कर्तव्यातून आपण मोकळे हौऊ शकत नाही, पण दूर राहून ती करू शकतो हे अनुभवायला येते. ज्या गोष्टींमध्ये विनाकारण गुंतून पडत होतो त्या गोष्टी किती फोल होत्या हे कळते. त्यामुळे आत्मपरीक्षण  केले जाते. 

नव्या आयुष्याला सुरुवात होते. आता माहित झालेलं असतं की कसं जगलं पाहिजे, काय केलं पाहिजे आणि काय केलं नाही पाहिजे. त्यामुळे आयुष्याच्या ह्या टप्प्यावर आलेली तटस्थताही छान वाटू लागते. हे ज्याला कळलं/उमगलं ती व्यक्ती खरंच भाग्यवान.

तर, काहींचे आयुष्य मात्र आम्ही अजूनही शिकतोय !— असे 

आधीच्या पिढीकडून पैसे वाचवायला शिकलो — नंतरच्या पिढीकडून पैसा वापरायला शिकतोय.

आधीच्या पिढीकडून सहवासाने नाती जपायला शिकलो – नंतरच्या पिढीकडून डिजिटली नवीन नाती जोडायला शिकतोय.

आधीच्या पिढीकडून मन मारून जगायला शिकलो –नंतरच्या पिढीकडून मन भरून जगायला शिकतोय.

आधीच्या पिढीने, Use and use more मधली उपयुक्तता शिकवली – नंतरच्या पिढीकडून Use and throw मधली नावीन्याची गंमत अनुभवायला शिकतोय.

आईकडून पिकनिकलाही घरच्या पोळीभाजीची लज्जत अनुभवायला शिकलो – मुलांकडून घरात असतांनाही पिकनिक एंजॉय करायला शिकलोय.

आधीच्या पिढीबरोबर निरांजन लावून दिवा उजळून वाढदिवस साजरा केला – नंतरच्या पिढीबरोबर मेणबत्ती विझवून अंधार करून वाढदिवस साजरा करायला लागलो.

आधीच्या पिढीने बिंबवले, घरचेच लोणी सर्वात उत्तम – नंतरची पिढी पटवून देत आहे, अमूल बटरला पर्याय नाही‌.

थोडक्यात काय, आधीच्या पिढीने शिकवले, अधिक वर्षे कसे जगायचे ते —

तर नंतरची पिढी शिकवत आहे, मरणापर्यंत आनंद घेत कसं जगायचं ते !!

— दोन्हीच कॉकटेल बनवलं तर आयुष्य किती मजेदार असेल…

लेखक – अज्ञात 

प्रस्तुती – श्री माधव केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मोदक… लेखिका – सुश्री शुभदा पाटकर ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

? मनमंजुषेतून ?

☆  मोदक… लेखिका – सुश्री शुभदा पाटकर ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

30 रुपयाला एक मोदक? काय मोदकात सोनं वगैरे घालतात की काय? काय ही लूट? तीस रुपयाला अख्खा नारळ मिळतो, त्यात अकरा मोदक सहज बनतात. अशा विचारांची आमची पिढी. नारळाची किंमत तीस रुपये असली तरी बाकीचे पैसे कौशल्याचे आहेत. मोदक बनवणं येऱ्या गबाळ्याचं काम नाही.

श्रावण महिन्यात खाण्यापिण्याची चंगळ असायची.  त्यांचा मुकुटमणी म्हणजे मोदक. श्रावण अखेरीस माळ्यावरून मोदकपात्र काढलं जायचं. हे वजनदार तांब्याचं. मग चिंचेने घासून मस्त लखलखित करायचं. त्या महिन्याच्या वाण्याच्या यादीत आंबेमोहर (जुना) तांदूळ असायचा. हा जुनाच असला पाहिजे, नाहीतर मोदक फसणार. गणेश चतुर्थीच्या आधी चार दिवस हे तांदूळ धुवून आजोबांच्या मऊसुत धोतरावर वाळत पडणार. फक्त आजीच त्यांच्यावरून अधून मधून हात फिरवणार. बाकी कोणी तिकडे जायचं नाही. गिरणीत दळायला द्यायचे; तर  कोणत्या तरी इतर धान्याचे पीठ त्यात मिसळेल म्हणून ते घरीच दळायचे .

जातं धुवा, त्याचा खुंटा शोधा, पीठ गोळा करायची झाडणी शोधा, असा सगळा सरंजाम पूर्ण झाला की आई ते तांदूळ दळणार. आम्ही खरंतर जातं ओढायला मदत करायला उत्सुक असायचो पण तिथे धसमुसळेपणा चालत नाही. विशिष्ट लईत जातं ओढलं तरच तांदळाची पिठी हवी तशी बारीक पडते. चला मोदकासाठी तांदळाची पिठी तयार झाली.

तेव्हा फ्रीज नव्हते त्यामुळे आदल्या दिवशी अर्धी तयारी वगैरे प्रकार नाही. आम्ही अंथरुणात असतानाच नारळ फोडण्याचे आवाज ऐकायला यायचे. हे काम पुरुषांचं .दहा नारळ फोडले तरी खोबरं सहा-सात नारळाचंच पडायचं. कारण ते पांढराशुभ्र असलं पाहिजे, बाकी करवंटी जवळचं खोबरं इतर कामासाठी. आजीच सोवळ्याने चून बनवणार. चून म्हणजे गूळ खोबऱ्याचं सारण. सारण कडक झालं तर मोदक फाटतो .सारण पातळ झालं तर मोदकातून गुळाचा पाक गळतो. त्यामुळे चून जमणं महत्त्वाचं. झोपेत असताना घरभर या चुनाचा सुगंध दरवळायचा. शेवटी त्यात वेलची टाकली की सोने पे सुहागा. खरोखरच जमून आलेलं सारण सोन्याच्या रंगाचे दिसतं. 

या वेळेपर्यंत तीन-चार काकवांच्या (काकूचं अनेक वचन) आंघोळी आटपलेल्या असतात . आजीकडून मोदकाची उकड होईपर्यंत त्या पाटावर बसून युद्धाला सज्ज होतात. आजीची  गादी यांना नंतर चालवायची असते. कशी करते सासू? मोदकाची उकड बघताना यांच्या तोंडाचे पट्टे चालू असतात. ” गेल्यावर्षीचे मोदक छान झाले होते. आता यावर्षीचे कसे होतात बाई देव जाणे वगैरे.” उकळत्या पाण्याच्या आधणात आजी रवाळ तूप सोडते. आता हा वेगळा सुगंध. थोडं मीठ. पाणी चांगलं खळखळ नाचायला लागलं की अधीरतेने तांदळाची पिठी यात उडी घेते .आता एकदम ताकदीने आणि लगबगीने पुढचं काम. वेगाने ढवळण्याचं. हुश्श्श झालं एकदाचं. ही उकड चांगली जमली की अर्ध काम फत्ते. या क्षणी सगळे आवाज बंद झालेले असतात. वारा वाहायचा थांबतो. संपूर्ण जगच ‘स्टॅच्यू’ अवस्थेत. फक्त उकड- बस्स. आजीच्या चेहऱ्यावर विजय स्मित. सगळ्या काकवांचे जीव भांड्यात. पाच मिनिटाचं मौन सुटतं .

परातीत उकड मळण्याचं काम मोठ्या काकूकडे. काही चुकार पीठ तसंच राहिलेलं असतं. जड, पितळी तांब्याने त्यांना दटावावं लागतं. गरम असतानाच हे करायचं नाही तर  एकदा का थंड झालं की त्यात लवचिकता आणता येत नाही. काकू हे काम मस्त करते. घरातल्या मोठ्या मुली उत्सुकतेने बघत असतात. निरीक्षण चालू असतं.

मग आजी किती आकाराचा उकडीचा गोळा घ्यायचा. त्यात किती सारण भरायचं ते ठरवून देते .उकडीच्या गोळ्याला वाटीचा आकार देणे कौशल्याचं काम आहे. बघणाऱ्यांना तर सोपं वाटतं पण करायला गेलं तर कठीण. वाटी न बनता ताटली बनते. कडा फाटतात. पाकळ्या चिकटत नाहीत. जेमतेम पाच नाहीतर सात  पाकळ्यातच मोदक संपतो. असं काहीसं होतं. हे प्रकरण जमलं तर जमलं नाही तर अंत पाहतं. काहीजण वाटी बनवताना तेल तर काहीजण पीठ वापरतात .हळूहळू या सर्वांना एकत्र करायचं आणि त्याचं तोंड बंद करायचं की मोदक झाला तयार.

जिला मोदक जमतात ती  कितीतरी वेळ  स्वतःचीच पाठ  थोपटून घेते. मोदक पातळ कळीदार देखणा झाला पाहिजे. दिसायला पांढराशुभ्र तरी पारदर्शक. आतलं सोनेरी सारण दिसलं पाहिजे. खायला मऊ लुसलुशीत .ही सगळी कमाल असते हस्तकौशल्याची. पुरुष हे काम करू शकत नाहीत कारण यासाठी पाहिजेत नाजूक बोटं.

आता मोदकपात्रात चाळणीवर ठेवायची हळदीची पानं . त्यावर ठेवायचे भरलेले मोदक आणि पंधरा मिनिटे उकडायचे. घरभर आंबेमोहोराचा, गुळ खोबरं वेलचीचा, हळदीच्या पानांचा सुगंध पसरतो. मखरातला गणपती पण काही क्षणासाठी चलबिचल होतो. कधी कधी त्याच दिवशी हरतालिका असते आणि मोदक करणाऱ्या बायकांना फक्त या सुगंधावरच समाधान मानावं लागतं. सगळे मोदक होत आले, आता आरतीला हरकत नाही असा आदेश यायची खोटी, भराभरा आवेशात आरत्या सुरू होतात. प्रकरण हातघाईवर येतं. तयार होणारे मोदक आणि आरती यांची जणू स्पर्धाच. 

नैवेद्य दाखवला जातो, पानं घेतली जातात. पानात गरम गरम वाफाळते , सारणाने गच्च भरलेले मऊ मऊ मोदक वाढले जातात. ते फोडून त्यावर रवाळ सुगंधी तूप. आहाहा, सगळे श्रम सार्थकी लागतात.

देवा तुझ्यामुळे आम्हाला असे मोदक खायला मिळतात. त्यासाठीच तर जगतो आपण. करणारे आणि खाणारे दोघेही तृप्त. आता एका नारळाचे, एक वाटी पिठाचे मोदक चिक्कार होतात. कोणाचं डायटिंग, कोणाचा डायबिटीस, कोणाचं पित्त चाळवतं, कोणाची नावड (यांना चायनीज डपलिंग, मोमो चालतात) त्यामुळे त्यातलेही दोन उरतात. पुढच्या वर्षी विकतचे आणू असं ठरवलं जातं.

माझी या मोदक प्रकरणातून सुटका झाली कारण सासरी सगळ्यांना तळणीचे मोदक चालतात- नव्हे आवडतात. ते एकदमच सोपे.  मी साध्या पोळीच्या कणकेचेच करते. कसे माहित नाही ते दुसऱ्या दिवसापर्यंत खुसखुशीत आवरणाचे राहतात. चिवट होत नाहीत की मऊ पडत नाहीत. पुरी लाटायची डाव्या हाताच्या पाचही बोटांच्या खळग्यात पकडायची, त्यात चमच्याने सारण भरायचं, पाचही बोट जवळ आणायची. झाला मोदक तयार . (धन्य ती सून, धन्य ते सासर .नशीबानेच असं सासर मिळतं)

मोदकाचेही आता प्रकार आलेत. खवा मोदक ,आंबा मोदक, ड्रायफ्रूट मोदक, रवा मोदक, पेढा मोदक, चॉकलेट मोदक,गुलकंद मोदक, इत्यादी. त्यातला सर्वात भन्नाट प्रकार म्हणजे ‘चिंगम’ मोदक .कोणावर सूड उगवायचा असेल तर त्यांच्याकडे हे ‘चिंगम’ मोदक न्यावेत.

मोदक  कसलेही असले तरी मोदकाची चव फक्त गणेशोत्सवातच. पुरणपोळी, खीर, गुलाबजाम,जिलबी जशी कोणत्याही सणाला चालतात, तसं मोदकांचं नाही. कोणी पाडव्याला किंवा होळीला मोदक करणार नाहीत आणि केलेच तरी त्याची चवही लागणार नाही. गणपती आणि मोदक  यांचे काही खास लागेबंधे आहेत हे नक्की.

लेखिका – सुश्री शुभदा पाटकर

संग्राहिका : स्मिता पंडित 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ हीच खरी महालक्ष्मी… लेखक – अनामिक ☆ संग्राहक – श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? मनमंजुषेतून ?

☆ हीच खरी महालक्ष्मी… लेखक – अनामिक ☆ संग्राहक – श्री सुहास सोहोनी ☆ 

पण काहीही  म्हणा —

 ज्या ज्या घरात सगळ्या सुना , मुलं , जावा , नातवंडं एकत्र येतात, सर्वजण मिळून कामं करतात,

तिथं खरंच प्रसन्न वाटतं, करमतं ! दोन तीन दिवस अगदी मजेत जातात !

 

मित्र हो ,

हे करमणं , मजा वाटणं , प्रसन्न वाटणं म्हणजेच आपल्याकडे लक्ष्मी आलेली असते !

 

ती येते , रहाते ,जेवते आणि जातांना म्हणते–

‘खुशाल रहा– असंच मिळून मिसळून रहात जा ! ‘ 

 

कुणी आणि का लावलं असेल आपल्यामागे हे सगळं ?

शास्त्रीयदृष्ट्या असेल का काही अर्थ या सणसमारंभांना ?

थोडा विचार केला , चिंतन केलं तर आपल्याला कळेल……….

 

या सणाच्या निमित्ताने आपलं घर भरून जातं–आपुलकीला उधाण येतं–माणसं एकत्र येतात ,भेटतात , बोलतात

आणि पुन्हा आपापल्या गावी पोट भरण्यासाठी निघून जातात ……! 

बैठकीत झालेली माणसांची गर्दी आणि दारासमोर झालेली पादत्राणांची , पावलांची दाटी हीच खरी लक्ष्मी …….!

 

चार दिवस सर्व कुटुंबाचं एका छताखाली येणं – गुण्यागोविंदाने रहाणं – आणि सुखदुःखाच्या गप्पा गोष्टी करणं …… हीच खरी लक्ष्मी !

 

पोरांनी आई म्हणून मारलेली प्रेमळ हाक– दिरानी वहिनींकडे हक्काने मागितलेला कपभर चहा –’ तुम्ही राहू द्या, मी करते ‘ असा एका जावेने दुसऱ्या जावेला केलेला प्रेमळ हट्ट …… हीच खरी लक्ष्मी ….!

 

मित्रहो त्यामुळे पूर्वजांना नाव ठेऊ नका. ते आर्थिकदृष्ट्या गरीब होते– पण मनाने श्रीमंत होते. 

सुशिक्षित नसतीलही– पण नम्र होते. 

एखाद्या वेळेस रागवत असतील– पण डुख धरत नव्हते. 

ते फॉरेन रिटर्न नव्हते– परंतू एखाद्या वादाच्या प्रसंगी नेमकं कुठून आणि कोणी माघार घ्यायची हे त्यांना चांगलं कळत होतं. 

योग्य वेळी योग्य वागणं आणि घर नावाच्या मंदिराच्या भिंतीला तडे न जाऊ देणं …… हीच खरी लक्ष्मी !

 

मला मला करण्यापेक्षा,  तू घे , तू घे चा आग्रह करणे—

आधी काहीतरी खाऊन घ्या आणि नंतर काम करा —अशी  ज्येष्ठांनी केलेली मायेची सूचना —

घर, कुटुंब आणि नातं टिकण्यासाठी प्रत्येक सदस्याने केलेला त्याग —

…हीच खरी महालक्ष्मी ….!

 

लेखक : अनामिक

संग्राहक : सुहास सोहोनी 

रत्नागिरी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares