मराठी साहित्य – जीवनरंग ☆ एका रेषेच्या पलिकडे..भाग 5 ☆ सौ राधिका भांडारकर

सौ राधिका भांडारकर

? जीवनरंग ❤️

☆ एका रेषेच्या पलिकडे..भाग 5 ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सकाळी घरी आल्यापासून आक्का कधी नव्हे त्या शांत होत्या. चहा नाश्ता नकोच म्हणाल्या. आंघोळ करुन रोजच्याप्रमाणे मंदीरातही गेल्या नाहीत. घरातच खिडकीजवळ बसून होत्या.

खिडकीच्या एका कोपर्‍यात चिमणी ये जा करत होती. चोचीत बारीक बारीक काड्या घेऊन येत होती.घरटं बांधत होती.

एरव्ही आक्का म्हणाल्या असत्या “काय कचरा करुन ठेवलाय…

या चिमण्यांनी..”पण या क्षणी मात्र त्या घरट्याकडे एकटक पाहत होत्या..

सुनबाईला थोडं विचीत्र वाटलं. त्यांच्या कडवट बोलण्यानं ती दुखावयाची पण आक्कांचं शांत बसणंही तिला मानवत नव्हतं…

“आक्का नाना बरे आहेत ना?”

“छाssन आहेत…”

“तुम्हाला बरं नाही का..?”

“मला काय झालंय्… चांगली आहे मी..?”

संवाद लांबतच नव्हता…

“तुम्ही गावी जाऊन येणार होतात ना…?”

“कां ग बाई कंटाळा आला का तुला सासुचा? तुम्हाला स्वातंत्त्र्य हवं… चार माणसं आलेली खपायची नाहीत.. आणि आम्ही का नेहमी येतो? आता देवानंच हा प्रसंग आणलाय् .. कोण काय करणार…?”

आक्का आता ठीक रेषेवर आल्या.

“कांग सुनबाई .. नाना आता असेच राहणार का? काल विठाबाई आल्या होत्या. त्यांच्या नात्यांतले कुणी, गेली तीन वर्ष झोपूनच आहेत म्हणे… हळुहळु त्यांचे एकेक अवयव निकामी होणार म्हणे…

असं काही ऐकलं की जीव ऊडुन जातो माझा.. भीती वाटते.

अग! सगळं आयुष्य रगाड्यात गेलं. एकीकडे मी. एकीकडे नाना..

मुलं आठ झाली पण संसार झाला असं वाटलंच नाही. पण आता संसार सुरु होतोय् असं वाटत असतानाच वाट संपून जाणार का..? अजुन गंगोत्री जम्नोत्री राहिलं आहे… नानांनी मला वचन दिलंय्.. पण ते असेच राहिले तर…?

“आक्का मी नेईन तुम्हाला…आपण जाऊ. आणि नाना बरे होणारच आहेत…”

आक्कांनी सुनेकडे एकवार पाहिलं. त्यांचे डोळे भरुन आले.

त्यांनी सुनेला जवळ घेतले. अन् त्यांच्या डोळ्यांतली नदी भळभळ वाहू लागली. सुनबाई त्यांच्या विरळ केसातून हात फिरवत राहिली..

नानांच्या दुखण्यापायी आक्का सैरभैर झाल्या होत्या. त्यांच्या कणखरपणाला टक्कर देताना त्या घायकुतीस आल्या होत्या.

मनांत एक सुंदर रांगोळी रेखाटली होती. ती विस्कटण्याची त्यांना भीती वाटत होती…

नानांना म्हणावा तसा आराम पडला नव्हता.. कुठेतरी त्यांची इच्छाशक्तीच कमी पडत होती..

पण आज सुनेनं काहीतरी वेगळंच ठरवलं होतं..

“हे बघा आक्का ,आज मला थोडा वेळ आहे. आपण पिक्चर बघायला जाऊ..मराठी चित्रपट आहे. मी नानांना सांगीतलंय् ते हो म्हणालेत…”

संध्याकाळ चांगली गेली. पिक्चरही छान होतं. आक्का मनमुराद हसल्या. अवतीभवती माणसं आहेत हेही त्या विसरल्या.मध्यंतरात आईसक्रीम घेतलं. पिक्चर सुटल्यावर मोगर्‍याचे गजरेही घेतले.. ताजे सुवासिक..

संध्याकाळ गडद झाली. आकाश जांभळटलं. वारं सुटलं आक्का कासावीस झाल्या…

“चल सुनबाई.. ऊशीर झाला. नाना वाट पहात असतील.

मुलं असतील जवळ. पण त्यांना मनातलं सांगणार नाहीत..

मीच लागते त्यांना.. नानांनी चहासुद्धा घेतला नसेल… उगीच गेलो आपण… आता अपराधी वाटतंय्…”

सुनबाईंला रात्री आवरुन  झोपताना वाटलं, आक्का कशा आहेत? रागीट की प्रेमळ..

कठोर की हळुवार..

आक्कांनी नानांच्या अंगावर शाल पांघरली असेल..

नाना विचारतील”बरा होईन ना मी?”

आक्का म्हणतील,

“मग.. चांगले बरे होणार तुम्ही. काहीही झालेलं नाही तुम्हाला..

अजुन तर कितीतरी वाट उरलीय आपल्या दोघांची… काही कण घट्ट मुठीत जपलेत…ते कसे घरंगळतील…..??

समाप्त

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ एका रेषेच्या पलिकडे..भाग 4 ☆ सौ राधिका भांडारकर

सौ राधिका भांडारकर

? जीवनरंग ❤️

☆ एका रेषेच्या पलिकडे..भाग 4 ☆ सौ राधिका भांडारकर ☆

त्या दिवशी नानांच्या दूरच्या नात्यातील कुणी विमलताई आल्या होत्या.त्यांना आक्का सांगत होत्या,

“इथं सगळं चांगलं चाललंय् नानांचं..पावलोपावली काळजी घेणारी माझी सून आहे.ती काहीच कमी पडू देत नाही.कामाचा ऊरक तरी केव्हढा आहे तिला. घरातलं,नोकरी, मुलींचे अभ्यास.. सगळं सांभाळून शिवाय आमचंही आनंदाने करते… पण आक्का घरी आल्या आणि एकच रट लावली.

“तुम्ही सगळे नानांसाठी एव्हढे खपता.त्यांच्या सुखासाठी झटता. पैसा आहे ना त्यांच्याजवळ…आम्हाला बरं बाई कधी दुखणंच येत नाही…”

नानांच्या शेजारच्या रुममधे एक आक्कांच्याच वयाची बाई आजारी होती.तिला डॉक्टरांनी तीन अठवडे पूर्ण विश्रांती घ्यायला सांगितले होते…बाईला मुलंबाळं नसावीत. तिचा नवराच रात्रंदिवस तिच्या ऊशापायथ्याशी असे.खूप प्रेमाने काळजीने करायचे ते…कुणी एक व्यक्ती त्यांचा डबा घेऊन येई… त्यांना भेटायला येणारी ती एकमेव व्यक्ती होती..

एक दिवस आक्का सहज त्यांच्या खोलीत डोकावल्या, तेव्हां ते गृहस्थ हळुवारपणे पत्नीच्या केसांची गुंत सोडवत होते.. मग सकाळपासून आक्कांच्या डोक्यात तोच विषय घोळत होता.

“ती बाई किती भाग्यवान!! पहा..नवरा कशी सेवा करतोय् “

सुनेला वाटायचं, आक्का अशा का कातावलेल्या असतात. त्यांना काय कमी पडतं..?? त्यादिवशी सून स्वत: नानांना सुप भरवत होती.

म्हणाली, “नाना! आज मला वेळ होता म्हणून मीच आले.. आणि आक्कांचं अंग जरा कसकसतंय्…”

“..हो बरोबर आहे. तीही आता थकली आहे. मला समजतं ते. एकत्र कुटुंबात खूप राबली आहे. इतक्या वर्षांचा संसार झाला आमचा.तिनं सुखदु:खांत साथ दिली.ती होती म्हणूनच मी कुटुंबाचे व्यवसाय विस्तारु शकलो. तिनं कधीच गार्‍हाणं केलं नाही. पण आताशा चिडचिड करते. तोडून बोलते.. बदलली आहे ती…”

सुप पिऊन झाल्यावर सुनेनं नानांना मानेखाली आधार देऊन झोपवलं. डोळे मिटून घेतलेल्या नानांचा चेहरा करुण. कष्टी. वेदनामय भासत होता. सुनेला सहज वाटलं, नको असं दुखणं.. आणि नानांनी खूप चांगलं आयुष्य जगलंय्.. त्यापेक्षा..

पण नाना रोज विचारतात.. “मी बरा होईन ना?”

परवा बोलता बोलता आक्का म्हणाल्या, “पाण्यासारखा पैसा चाललाय् ..एरव्ही पैशापैशाचा विचार करतात..तुला ठाऊक आहे ,नानांबरोबर कुठे जावे ना तर पायीपायीच.. ऊन असो पाउस असो.. छत्री घेऊ पण भाड्याची गाडी नको… एकदा मुंबईला गेलो होतो. मला व्हिक्टोरियात बसायचं होतं.. तर दोन आण्यांवरुन ठरलेली घोडागाडी रद्द केली… असे नाना.. जाऊ दे..

आमच्या अंगात सहनशक्ती होती..हट्ट केलाच नाही…ते म्हणतील तसं.. ते ठरवतील तसं… किती विचीत्र नातं हे!!

प्रेम का राग? लोभ की द्वेष..! आक्का नानांच्या सतत तक्रारी करतात.पण दुसर्‍या कोणी नानांबद्दल वेडंवाकडं काही बोललं तर मात्र त्यांना खपायचं नाही… लगेच फटकारायच्या…

“खूपच केलंय् त्यांनी कुटुंबासाठी.. विसरले आता सारे… काके—पुतणे. पुतणसुना. त्यांची मुलं. आले का कुणी भेटायला..? नानांना सगळे लागतात.. वेळ पडली तर आपल्यासाठी कुणी ऊभं राहतं का?..”

मात्र आक्कांची बेचैनी सुनेला जाणवायची…

“आक्का बरं वाटत नाही कां.?”  तेव्हा प्रश्नाला डावलून त्या म्हणाल्या, ” कां ग आम्हाला इथे येऊन पंधरा वार झाले ना… ते हाॅस्पीटल आणि तुमचं हे दोन खणी घर… जीव आक्रसून गेलाय. गावी जाऊन येते.. गाय व्यायली असेल. खळ्यात बाजरी ओसंडली असेल. वडे पापड कुरडया राहतील ना. ऊन्हाळा संपेल…  धाकटीला काही आवरणार नाही सारं….”

यावेळेस मात्र सुन जरा रागातच उत्तरली…

“तुम्हाला जायचं  असेल तर जा…आम्ही नानांचं करु..मी रजा घेईन…”

मग आक्का चपापल्या. सून आफीसला निघून गेली. आक्का खिडकीतून तिला वळणापर्यंत पहात राहिल्या. त्यांचे डोळे झाकोळले…

हे असं काय होतय् आपल्याला? त्यांना खूप एकटेपणा जाणवू लागला..नानांजवळ जावं.. सांगावं त्यांना. “तुम्ही लवकर बरे व्हा.. तुमच्याशिवाय कोण आहे हो मला…?”

क्रमश:…

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ एका रेषेच्या पलिकडे..भाग 3 ☆ सौ राधिका भांडारकर

सौ राधिका भांडारकर

? जीवनरंग ❤️

☆ एका रेषेच्या पलिकडे..भाग 3 ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(मागील भागात….तशी अवती भवती मुलं होती पण एका रेषेच्या पलीकडे त्या दोघांना फक्त एकमेकांची सोबत होती..)

आक्का सकाळी घरी आल्या की सूनबाई आक्कांना विचारी..

“कसे आहेत नाना? रात्री झोप लागली का?”

“कसली झोप..? स्वत:ला झोप नाही, दुसर्‍यालाही झोपू देत नाहीत. डोक्यात विचारांचं नुसतं पोळं. मी म्हणते आजारी माणसाने विचारच कशाला करायचा? शांत पडून रहावं. अर्ध्या रात्री ऊठून म्हणतात, आज तू मला पेपर नाही वाचून दाखवलास… आता तरी काही वाचून दाखव…”

“मग..?”

“मग काय? उठले. दिवा लावला. आणि घेतला पेपर हातात.. वाचायला त्यांनीच शिकवलंना… आता अक्षर लागत नाहीत मला. पण त्यांच्यापुढे जायची सवय कुठे आहे… आयुष्यभर ऐकतच आले…..”

सुनेला हंसुही यायचं. आणि “कमाल आहे नानांची ” असंही वाटायचं. आक्कांची पण दया यायची… “आणि तुम्ही बायका.. नवर्‍याला पाण्याचा पेलाही देत नाही… भाऊ माझा तर सारं हातानं करतो.. वाढून घेण्यापासून ते ताट उचलण्यापर्यंत… तू घरी आलीस कधी त्याच्यानंतर तर चहाही तयार ठेवतो… मी म्हटलं त्याला “अरे मी टाकते की चहा.? तर म्हणाला, “पडली आहेस जरा, तर कर आराम…”

सुनेला वाटलं, म्हणावं, “नवर्‍याला हातात पाण्याचा पेला दिला म्हणजेच गृहिणीधर्म झाला का? आर्थिक, बौद्धिक मानसिकतेचा जो वाटा उचलला आहे त्याला काहीच किंमत नाही का? हे अंतर तुटणार नाही. काही बोलण्याआधी सुनेचा सुशिक्षितपणा आणि संस्कृती आड यायची. शिवाय ती आक्कांचं मन जाणत होती. अनेक वर्षं दडपलेल्या वाफा, त्यांचे फडाफड बोलणे हे सुनेसाठी नसेलही. हरवलेल्या अनेक क्षणांची खंत असेल ती…

जे मिळवण्यासाठी मनानं आतल्या आत धडपड केली असेल, तिथपर्यंत काळानने पोहोचू दिलं नसेल म्हणूनही आक्कांची तगमग असेल.

आक्कांचं बोलणं कडवट. विखारी. पण का कोण जाणे सुनेला राग यायचाच नाही. तिला आक्का एकदम लहान मुलासारख्या वाटायच्या. प्रवाहात पडलेल्या आणि पोहता येत नसलेल्या बालकासारख्या.

तिला वाटायचं, त्यांना या लाटेतून बाहेर काढावं. त्यांच्या पाठीवर हात फिरवावा. त्यांना आधार द्यावा.

आणि नेमकं, सुनेच्या या वागण्यापायीच आक्का चकित व्हायच्या. त्यांना वाटायचं, ही रागवेल, त्रागा करेल, भांडेल, भाऊला सांगेल.

त्यांना त्यांच्या एकत्र कुटुंबातील भांडणे आठवायची.वरवर गोडवा पण आतून नासलेली मनं. मग क्षुल्लक कारणावरून स्फोट व्हायचा. कधी कामांच्या पाळ्यावरून. कधी धान्य निवडण्यावरुन. मुलांवरुन. कपडे दागिने … एक ना अनेक. किती वेळा वाटायचं, पिशवीत कपडे भरावेत आणि माहेरी जावं… आता यांचे  नवे संसार!!

चौकटीतले, आखीव. आपल्याला इतकी मूलं झाली.. त्यांची आजारपणं… गोंवर कांजीण्या वांत्या.. मांडीवर मुलं आणि परातीत एव्हढा मोठा कणकेचा गोळा!! कुणी शाळेत गेलं, कुणी अभ्यास केला,किती मार्क्स मिळाले, पुढे जाऊन कोण काय करणार… कसलं काय? कामाचाच रगाडा.. सूर्याच्या पहिल्या किरणापासून ते शेवटच्या किरणापर्यंत दिवस ढकलायचा. जो ज्या मार्गाने जाईल ते ठीकच.. त्याचं खाणं पिणं सांभाळायचं. बाकी भविष्य घडवण्यासाठी निराळं काही करावं लागतं याची ना कधी भावना झाली ना कधी तसे विचार मनात आले…

सूनबाई तीन तीन तास मुलांचे अभ्यास घेते. एकेक गोष्ट समजेपर्यंत शिकवत राहते.. हीला कंटाळा कसा येत नाही? मग त्या म्हणायच्या, मुलीच तर आहेत!!काय करणार आहेस एव्हढं शिकवून.. एखादा मुलगा तरी होऊ द्यायचा.. दोनच आहेत म्हणून जमतंय्. आम्ही  आठआठ मुलं वाढवली. इतका वेळच कुठे होता…??

सुनही गंमतीत म्हणायची,”खरंच आक्का कशी वाढवलीत हो तुम्ही इतकी मुलं… आम्हाला दोनच भारी वाटतात..”

कुठेतरी आक्कांना लगेच श्रेष्ठत्व प्राप्त व्हायचं..

“आणि काय सांगू? तुझ्या सासर्‍यांना घरात कुणी आजारी पडलेलं ही चालायचं नाही मुलांची दुखणी असायचीच. पण नानांनी कधी कुणाला सांभाळलं नाही. ते त्यांच्याच व्यापात.. मी आजारी पडलेलं तर त्यांना चालायचंच नाही. कधी कणकण वाटायची. डोक्याला घ ट्ट रुमाल गुंडाळून झोपू वाटायचं.. पण नानांना चालायचं नाही.म्हणायचे,

“असे अवेळी झोपायला काय झाले? घरात प्रसन्न चेहर्‍यांनी वावरावं.. औषधं, डाॅक्टर लागले कशाला..?”

आणि आता बघ, स्वत:साठी किती डॉक्टर. ही एव्हढी कागदांची आणि फोटोंची भेंडोळी झाली आहेत!! आणि त्या औषधाच्या बाटल्या तरी किती.. खरं सांगू ,ऊभ्या आयुष्यात मला दुखणं कधी माहीत नाही… एव्हढी बाळंतपणं झाली पण मी कशी धडधाकट….”

आक्कांच्या बोलण्याला किनाराच नसायचा.. नानांवर सतत राग. त्यांचं बोलणं ऐकलं की वाटायचं की आक्कांच्या आयुष्यांत वजाबाक्याच फार.

पण कधी नाना जेवले नाहीत तर स्वत: लसणीची खमंग फोडणी देऊन मुगाच्या डाळीची नरम खिचडी, कोकमचा सार बनवून दवाखान्यात डबा घेऊन जायच्या…

एक दिवस म्हणाल्या… “कारलं केलस का तू आज… घरी कारल्याच्या भाजीला हातही लावत नाही…”

“मग? काहीच खाल्लं नाही का त्यांनी?..”

“कशाला? चाटुन पुसून खाल्लं. तुझ्या हातचं कार्लंही कडु लागलं नाही..”

आक्कांच्या बोलण्याचा बोध होणंच कठीण… त्यांच्या मनस्थितीचा हा गोंधळ उलगडत नसे कधीकधी….

क्रमश:…

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ एका रेषेच्या पलिकडे..भाग 2 ☆ सौ राधिका भांडारकर

सौ राधिका भांडारकर

? जीवनरंग ❤️

☆ एका रेषेच्या पलिकडे..भाग 2 ☆ सौ राधिका भांडारकर ☆

खेड्यावरुन मोहन माधव आळीपाळीने फेर्‍या मारत.इथेच रहात.आक्का सकाळी नानांचं अटोपून आंघोळीला वगैरे घरी येत.
सुनबाईची धांदल चाललेली असायची.नातींचे अभ्यास.एकीकडे स्वयंपाक.नाश्ते.नानांचा डबा.अॉफीसात जाताजाता डबा पोहचता करायचा .सारं काही घड्याळाबरहुकुम. वेळेवर. रोजच. मिनीटाचाही फरक नाही.

आक्का आल्या की स्वयंपाक घराच्या खूर्चीवर बसत.

सुनबाई ओट्याजवळ.भाजी चिरणे.डाळ तांदुळ धुणे.

“..कां ग आज पारुबाई आल्या नाहीत?”

“आल्यात ना दळण आणायला गेल्यात..”

“तू आतापासून का स्वयंपाक करुन ठेवतेस? भाऊ जेवायला येईपर्यंत गार नाही होत? नानांचा डबाही आतापासून भरुन ठेवतेस..त्यांनाही थंड जेवण…राम राम!!..”

“मीआॉफीसात गेल्यावर कोण करणार? आणि नानांचं जेवण गार नाही होत.या टिफीनमधे गरम राहतं.. नानांनी कधी तक्रार केली का?”

आक्का जरा बिचकल्या.

“असेल बाई.आता सारंच बदललंय्.आमच्या वेळी , नव्हतं बाई असं काही.तुझ्या सासर्‍याला तर इथे भाजी अन् इथे पोळी लागायची. सारं काही गरम आणि नरम. चिकीत्सा तरी किती? शिवाय कुणी वाढलेलं चालायचं नाही. केलेलं चालायचं नाही.तूच कर सारं….”

सूनबाई ओठातच हसायची. काहीच बोलायची नाही.

“चहा देऊ कां आई तुम्हाला?”

“दे बाई थोडा.सकाळी दवाखान्यात पाठवलेलाचहा काही प्यायलासारखा वाटत नाही.आणि थोडी साखर घाल बाई,दूध नको फार….”

सूनबाई सारं काही हसत मुखानं करायची.चहाचा कप,

गरम पोहे तिने आक्कांसमोर प्रेमाने ठेवले.

पोहे खाता खाता आक्का मधेच थांबल्या…

“केव्हढा मोठा ग केस? दुसर्‍यांदा आला बघ. कसं काम तुझ.? बाई ग ,आमच्या आजे सासुबाई होत्या…डोळ्यांना धड दिसायचं नाही,पण खाताना केस आला तर घर डोक्यावर घ्यायच्या,.. नुसत्या थरथरायचो आम्ही त्यांच्यापुढे… कसलं स्वातंत्र्य नव्हतंच आम्हाला दूध काढून भांडं खरडलेली साय सुद्धा खायला जीव धडधडायचा. गेले ग बाई ते दिवस!! आतां तुमचे नवे संसार. आमच्या सारखं तुम्ही सोसलं तरी काय??”

मग आक्का भराभर खाणंपिणं संपवायच्या.नळाखाली कपबशी धुवायच्या .पालथी ठेवायच्या.हात झटकत आतल्या खोलीत जाऊन ,अंगावर शाल पांघरुन अंमळ पडायच्या…

सुनबाईंला माहीत असायचं,नानांनी रात्री झोपू दिलं नसेल त्यांना..आक्कांना जाग्रण सहन होत नाही. शिवाय दवाखान्यातले वास ,वर्दळ ..आक्कांना शांत झोप मिळते कुठे?नानांनी दहा वेळा उठवलं असेल…कूस बदलून दे..पाय जवळ कर..एक ऊशी कमी कर. नाना तरी काय करतील?त्यांचीही करुणा येते.वार्धक्य. असहाय्य .अगतिक.नाना आणि आक्का दोघेही.पिकलेले.कुणी कुणाची सेवा करायची?तशीअवतीभवती मुलं होती.सुना होत्या.सारेजण झटत होते.पण आयुष्याचा एक हिस्सा होता.तो मात्र फक्त त्या दोघांचाच होता.एका रेषेच्या पलीकडे त्या दोघांना फक्त एकमेकांचीच सोबत होती….

क्रमश:…

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ एका रेषेच्या पलिकडे..भाग 1 ☆ सौ राधिका भांडारकर

सौ राधिका भांडारकर

? जीवनरंग ❤️

☆ एका रेषेच्या पलिकडे..भाग 1 ☆ सौ राधिका भांडारकर ☆

आज सकाळपासून आक्कांचं बिनसलंय्..त्या एक सारखी चिडचीड करताहेत..जो दिसेल त्याला फटकारताहेत.त्यांना काहीच पटत नाहीय्. आवडत नाहीय्.सारं काही त्यांच्या मनाविरुद्ध होतंय्.कारण कळत नाही पण त्या अत्यंत अस्वस्थ आहेत.कदाचित त्यांनाही समजत नसेल ते.पण जणू त्यांच्या भोवतालचं सारंच वातावरण त्यांना इतकं कडवट वाटतंय् की समोर आलेल्या प्रत्येक व्यक्तीशी त्या आडून,वाकडं,आडवं बोलत आहेत.जणू सर्वच त्यांच्या शत्रु पक्षातले.नानांशी सुद्धा त्या आज टाकून बोलल्या होत्या.

गेले सहा अठवडे नाना हाॅस्पीटलमध्ये आहेत. एक्एकीच त्यांना दुखणं आलं.त्यांना सकाळपासून थोडं मळमळत होतं.अतिसार जाणवत होता.अशक्तपणाही वाटत होता.

“भाऊला फोन कर.त्याला बोलावून घे.असे ते सारखे आक्कांना सांगत होते.पण आक्कांनी जरा दुर्लक्षच केले.

“कशाला बोववायचं भाऊला. तो त्याच्या कामाच्या व्यापात.त्याला का सवड असते? आणि आहोत ना आम्ही सारे घरात.त्या मोहन माधवना कुट्ठे जाऊ देत नाही तुम्ही.जरासं काही झालं की सारे लागतात तुम्हाला तुमच्याभोवती..मुलं का रिकामी आहेत..बसा गुपचुप.काही होत नाहीय् तुम्हाला आणि होणारही नाही.

आता वयोमानाप्रमाणे तब्येत नरम गरम राहणारच.झोपा जरा वेळ.मी आहेच इथे.”

नाना गप्प बसले. विकल होऊन, अगतिकपणे,न बोलता शांत पडून राहिले.

संध्याकाळी काठी घेऊन अंगणात फेर्‍या मारल्या.घरात आले.कॉटवर बसले आणि एकदम त्यांनी आरोळी मारली.

“अग् ए आक्का..आक्का ग..हे बघ मला कसं होतंय्..

उठता येत नाही.हातपाय हलत नाहीत..बघ अंग कसं बधीर..ताठर झालंय्.मला आधार दे ग..पाय जवळ करुन दे..”

मग आक्काही घाबरल्या.धावाधाव.डॉक्टरना बोलावणी.

शेजारी आले.वाड्यात गर्दी  झाली.

डाॅक्टर म्हणाले,जिल्ह्याला घेऊन जा.भाऊंना कळवा.इथे आपल्या खेड्यात उपचार होणार नाहीत.तिथे सारी यंत्रणा आहे.स्पेशालिस्ट्स आहेत.ऊशीर करू नका..”

नानांना इथे आणलं. भाऊने आणि सुनेने खूप धावपळ केली.दहा डॉक्टर अर्ध्या तासात उभे केले.एक्स रे,ब्लड टेस्ट आणि इतर अनेक टेस्ट्स…तीन दिवस तर नुसत्या डाॅक्टरमधे चर्चा चालू होत्या.

नाना सुनेला विचारायचे,”मी बरा होईन ना..मला पुन्हा चालता येईल ना..ऊभे राहता येईल ना..?

सुन प्रेमळ. समंजस, नानांचे हात धरुन म्हणायची

“तुम्ही अगदी पूर्ण बरे व्हाल.ऊद्यापासून ट्रीटमेंट सुरु होईल. निदान झालंय्.  तुमच्या स्पायनल काॅर्ड मध्ये व्हायरल ईनफेक्शन झाले आहे. गोळ्या  इंजेक्शन आणि फिजीओथेरेपीने  तुम्ही पूर्ववत व्हाल. तुम्ही फक्त निगेटीव्ह विचार करु नका..”

आक्का सार्‍यांचे संवाद लक्ष देउन ऐकायच्या.काही समजायचे काही नाही समजायचे.पण त्या नानांच्या भोवती सदैव असत.

त्या नानांना म्हणायच्या,”डाॅक्टर काहीही सांगतात.कालपर्यंत तर चांगले होतात.मनाचं बळ वाढवा.

प्रयत्न करा. हातपाय हलवा.उठा पाहू…”

आता नानांचं सारं गादीमध्ये..आक्कांना खूप पुरायचं..

त्यांचंही उतरतं वय.ब्लडप्रेशर..दवाखान्यातले वास..नानांच्याच खोलीत दुसर्‍या लहानशा बेडवर अवघडून बसायचे…बाहेर जाऊन थोडा मोकळा श्वास घ्यावासा वाटे. पण नाना त्यांना नजरेसमोरुनही हलु द्यायचे नाहीत.

“मला सोडून जाऊ नकोस.कंटाळलीस का मला?

परावलंबी झालोय् ग मी….”

आक्कांना आतून कळवळायचं.नानांची स्थिती पाहून तुटायचं.अट्ठेचाळीस वर्षं ज्या व्यक्ती सोबत संसार केला, मुलंबाळं वाढवली, ऊनपाऊस पाहिले.. वयाच्या चौदाव्या वर्षापासून. नाकळत्या वयात., एका अनोळखी व्यक्तीच्या हातात हात देऊन इतकी वर्ष चाललो..

मग त्या ऊठत. नानांजवळ जात.त्यांच्या छातीवर एक हात आणि मानेखाली एक हात ठेऊन मोठ्या प्रयासाने,नानांना झोपवत.नानांचं जड शरीर त्यांना पेलवायचं नाही.त्यांच्या अंगावर  प्रेमाने शाल ओढत..

डोळ्यांतून गळलेले अश्रु हातानं निपटत…!

क्रमश:…

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ऋण….भाग 2 ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले

सौ अंजली दिलीप गोखले

? जीवनरंग ❤️

☆ ऋण….भाग 2 ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले

(‘अरे आप्पाच्या कोणा विद्यार्थिनीचे शुभेच्छापत्र आहे हे..आरती नावाच्या…’) इथून पुढे —-

आप्पा विचारात पडले. पस्तीस वर्षांच्या शिक्षकी कारकीर्दीत, आरती नावाच्या अनेक मुली त्यांच्या विद्यार्थिनी होत्या.  तीन चार विद्यार्थिनी त्यांना आठवतही होत्या.  पण ‘ही’ त्यातली नक्की कोण हे त्यांना लक्षात येत नव्हते. 

‘ते बघ आत एक चिठ्ठी देखील आहे ती वाच..’ 

आतून एक छान गुळगुळीत पण उच्च प्रतीच्या स्टेशनरीचा कागद बाहेर आला व त्यावर सुवाच्य अक्षरात एक पत्र लिहिले होते. आश्रमात ‘पत्र वाचन’ हा बापू देशपांडेंचा प्रांत.

आप्पांनी त्यांच्याकडे ते पत्र वाचायला दिले. 

बापू देशपांड्यांनी आपल्या खणखणीत आवाजात पत्र वाचायला सुरु केले..

‘प्रिय सर,

मी तुमची विद्यार्थिनी आरती देसाई. 

मला ठाउक नाही की तुम्हाला मी पटकन चेह-यानिशी आठवेन की नाही. कारण ‘देसाई बाल अनाथ आश्रमा’ त वाढलेल्या माझ्यासारख्या  बहुतेक मुला मुलींची आडनावे ही देसाईच असायची व अशी बरीच मुले मुली आपल्या शाळेत होती. तुमच्या हातून कुठल्या न कुठल्या इयत्तेत इंग्रजी शिकला नाही असा एकही विद्यार्थी विद्यार्थिनी आपल्या शाळेतून बाहेर पडला नसेल. त्यातली एक भाग्यवान विद्यार्थिनी मीही होते. 

सर, आम्ही अनाथालयात राहणारी मुले. इतर मुलांसारखे मधल्या सुट्टीत डबे नसायचे आम्हाला. मला अजूनही आठवतं..वर्गातल्या प्रत्येक देसाई आडनावाच्या मुला मुलीला तुम्ही रोज मधल्या सुट्टीत पाच रुपये द्यायचात. खरे तर आम्हीच मिळून तुमच्याकडे यायचो व ते तुमच्याकडून हक्काने घ्यायचो. आपल्याच गुरूकडून पैसे मागायला भीड नाही वाटायची तेव्हा आम्हाला. त्यात तुम्ही आम्हाला जवळचे वाटायचात. 

तुम्ही दिलेल्या त्या पैशातून आम्ही ‘देसाई मुले मुली’ मिळून कधी चिरमुरे, कधी बिस्कीटे, कधी भडंग पाकीट असे काही एकत्र घेउन खायचो. बिकट परिस्थितीला एकत्र लढण्याची ताकत व हिंमत, दोन्ही, तुम्ही आम्हा मुलांना त्या न कळत्या वयात दिलीत. तुमच्यामुळेच आज ही मुले कुठे ना कुठे सुव्यवस्थित पोझिशनवर कार्यरत आहेत.

मला तुम्ही मी आठवीत असताना  शिकवलेली ती कविता,  जशी तुम्ही शिकवली, तशीच अजूनही आठवते

‘The Woods are lovely dark and deep

But I have promises to keep 

And miles to go before I sleep..’

या कवितेतून तुम्ही दिलेली प्रेरणा मला आजन्म पुरणारी होती..आहे. मी आता गेल्यावर्षी  IAS ची परिक्षा उत्तीर्ण होउन दिल्ली मधे अर्थखात्यात Planning Department मधे Assistant Secretary या पदावर गेल्या सहा महिन्यांपासून रुजु झाली आहे. इथे आल्यापासून मी तुमचा शोध सुरु केला व मला काही जुन्या मित्रांकरवी ही माहिती मिळाली की तुम्ही..’इथे’ आहात. 

सर, मी आता स्वतःच्या पायावर उभी आहे. माझ्या बाबांच्या जागी असलेल्या माझ्या सरांना आज वृद्धाश्रमात रहावे लागत आहे, ही कल्पनाच मी सहन करू शकत नाही.  या लिफाफ्यात एक विमानाचे तिकीट पाठवत आहे. तुम्ही दिल्लीला माझ्याकडे, आपल्या मुलीकडे या, हवे तितके दिवस, महिने माझ्याबरोबर रहा. कायमचे राहिलात तर सर्वात भाग्यवान मुलगी मी असेन..

असे समजू नका की मी तुमचे ऋण फेडत आहे. कारण मला कायम तुमच्या ऋणातच रहायचे आहे…

खाली माझा ऑफीस व मोबाइल दोन्ही नंबर आहेत.

मला फोन करा सर..

वाट बघते आहे..

याल ना सर………बाबा…?

तुमचीच, 

– आरती देसाई

पत्र वाचताना नानांचा आवाज कधी नव्हे ते कापरा झाला..

त्यांनी आप्पांकडे पाहिले..

आप्पा ते पाकीट छातीशी धरून रडत होते…

शेवटी एवढेच म्हणेन  

माणसाचे अश्रू सांगतात तुम्हाला

            दुःख किती आहे.

संस्कार सांगतात कुटुंब कसे आहे.

    गर्व सांगतो पैसा किती आहे.

   भाषा सांगते माणूस कसा आहे.

 ठोकर सांगते लक्ष किती आहे.

    आणि सर्वात महत्त्वाचे —

वेळ सांगते नाते कसे आहे..!

समाप्त 

प्रस्तुती : संग्रहिका अंजली गोखले 

मोबाईल नंबर ८४८२९३९०११

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ऋण….भाग 1 ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले

सौ अंजली दिलीप गोखले

? जीवनरंग ❤️

☆ ऋण….भाग 1 ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले

पोस्टमनने आणलेले पोस्ट हातात तोलत दत्तू ऑफिसकडे आला. चार पाच चेहरे त्याच्याकडे नेहमीच्या आशेने पहात होते. हो..कारण या ‘आशा दीप’ नावाच्या वृद्धाश्रमात पन्नास एक वृद्ध रहात असले, तरी पत्र यायची ती फक्त मोजक्या चार पाच जणांनाच. त्यामुळे अधूनमधून पोस्टमन येऊन पोस्ट गेटवरच दत्तूकडे देउन जायचा,  तेव्हा हे ठराविक लोकच त्यांच्या नावाचे पत्र आलय का हे ऐकायला उत्सुक असायचे. बाकीचे सिनीयर सिटीझन्स आपले त्याच्याशी काही देणे नाही या 

आविर्भावात,  बाजूच्या वाचन कट्ट्यावर पेपर किंवा पुस्तक घेऊन वाचत बसलेले असत.  किंवा मग कोप-यावरच्या हॉलमधे जाउन कैरम, पत्ते खेळत बसत असत. 

त्यामुळे दत्तूने जेंव्हा हाक दिली–” देशमुख काका… तुमच्या नावाचं पाकीट आलय..घेऊन जा “  

–तेव्हा पुस्तक वाचनात गढून गेलेले आप्पा देशमुख आधी चपापलेच. 

‘आपल्याला कोणाचे पत्र आले असेल?’ असा आधी विचार करुन त्यांनी शेजारी बसलेल्या नाना वर्टीकर यांच्याकडे पाहिले. नानांनी तोंडात ‘बार’ भरला होता. मानेनेच ‘ जाउन या..बघा काय आलय..’ असे नानांनी आप्पांना सुचवले, तसे आप्पा  लगबगीने ऑफिसमधे आले. रजिस्टरला नोंद करुन ते जाडजूड envelope आपल्या हातात घेउन ते उठले. 

पाकीट दिल्लीवरून स्पीड पोस्टने पाठवलेले होते. 

त्यावर पाठवणा-याचे नाव नव्हते. फक्त एवढेच लिहिले होते

If undelivered, please return to

Assistant Secretary-Planning

Ministry of Finance

10, Sansad Marg, New Delhi-01

आप्पा देशमुखला दिल्लीवरून कसलेसे जाडजूड टपाल आलय हे एव्हाना दत्तूकरवी सर्वांना समजले होते. 

सारेजण आप्पांभोवती जमा झाले..

मग एक एक प्रतिक्रिया येऊ लागल्या..

“ काय रे आप्पा, या वयात लव्ह लेटर आले काय तुला? एवढे दिवस सांगितलं नाहीस आम्हाला ते..”  आबा क्षीरसागरने आप्पांची खेचली आणि एकच हास्य कल्लोळ झाला.

“ अरे आबा..लव्ह लेटर नसेल..उत्कृष्ट शिक्षकाचा पुरस्कार घ्यायला दिल्लीला बोलावलं असेल राष्ट्रपतींनी आप्पाला—तो मास्तर म्हणून रिटायर होउन पाच वर्षे झालीयेत हे लक्षात नसेल आले त्यांच्या—”  बापू देशपांडे बोलले तसे सगळे पुन्हा एकदा हसले. 

“ छे रे..बापू..अरे पत्र बघ कोणाकडून आलय..Department of Planning, Ministry of Finance. आयला, म्हणजे आप्पाला planning commission मधे घेताहेत की काय ? अभिनंदन आप्पा..!!”  पांडूकाका पवार बोलले. 

तेवढ्यात आपला तंबाखूचा तोबरा थुंकून परत जागेवर आलेल्या नाना वर्टीकरने सगळ्यांना शांत केले—

“ अरे बाबांनो..असा अंदाज लावत बसण्यापेक्षा आप्पाला ते पाकीट उघडू तरी द्यात. काय ते कळेलच…ए आप्पा.. उघड रे ते पाकीट..” 

आप्पानी नानांच्या आदेशा प्रमाणे पाकिटाची एक कड कात्रीने सावकाश कापली. आता तसेही त्यांच्या आयुष्यात काही सिक्रेट्स नव्हते. तीन वर्षापूर्वी पत्नी गेली अन सुनेबरोबर पटेनासे झाले,  तसे ते मुलाला सांगून स्वतःच या वृद्धाश्रमात येऊन राहिले होते. मुलगा महिन्यातून एकदा येऊन त्यांना भेटून जायचा. शाळेची पेन्शन यायची त्यात त्यांचे भागायचे. आता हा वृद्धाश्रम आणि इथले मित्र हेच त्यांचे कुटुंब झाले होते. आता त्यांचे खाजगी, वैयक्तिक असे काही नव्हतेच. म्हणूनच हे पाकीट सर्वांसमक्ष उघडायला त्यांना कुठली भिड वाटली नाही. 

पाकिटात तीन चार गोष्टी होत्या. आधी एक ग्रिटींग कार्ड निघाले. त्यावर गुरु आणि शिष्याचे एक सुंदर भित्तीचित्र होते व त्यावर सुवाच्य अक्षरात एक मेसेज लिहीला होता..

‘माझ्या शालेय जीवनातच मला जीवनाची खरी दिशा दाखवणारे माझे देशमुख गुरुजी यांना शिक्षक- दिना निमित्त सप्रेम नमन.’

खाली फक्त नाव होते..आरती.

नानांनी ते ग्रिटींग पाहिले व म्हणाले..’अरे आप्पाच्या कोणा विद्यार्थिनीचे शुभेच्छापत्र आहे हे..आरती नावाच्या…’

—– ( क्रमशः भाग पहिला )

प्रस्तुती : संग्रहिका अंजली गोखले 

मोबाईल नंबर ८४८२९३९०११

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ आयडिया ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

? जीवनरंग ❤️

☆ आयडिया☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

एका लग्नाला गेलो होतो. बायकोकडच्या नातलगांकडचं लग्न होतं. तिच्या माहेरच्यांकडे जाताना मी साधे कपडे घातले तर ते तिला चालत नाही. ती मला चांगलेचुंगले कपडे घालून नटवून नेते. तस्मात तिच्याबरोबर लग्नाला जाताना मी शेरवानी परिधान केली होती.

कार्यालयात प्रवेश केल्यावर दारातल्या मुलीने कागदाची सुबक पुडी दिली. पुडीत अक्षता होत्या. मी पुडी उघडली, अक्षता हातात घेतल्या आणि माझ्या व बायकोच्या पुडीचे कागद खिशात कोंबले. मंगलाष्टके संपली. चारसहा मुली उपस्थितांना पेढे वाटू लागल्या. आम्ही पेढे तोंडात टाकले आणि वरचे कागद मी खिशात कोंबले. सर्वजण माझ्यासारखे नव्हते. वधूवरांचे अभिनंदन करायला आम्ही स्टेजकडे निघालो. वाटेत सर्वत्र पायांखाली अक्षता आणि पेढ्यांच्या कागदाचे कपटे पडलेले होते. तेवढ्यात माईकवरून घोषणा झाली – “ उपस्थितांना उभय परिवारांतर्फे नम्र विनंती– भोजनाचा आस्वाद घेतल्याशिवाय कोणीही जाऊ नये. दुसरी महत्त्वाची विनंती— सर्वांनी कृपया आपापल्या जवळील अक्षतांचे आणि पेढ्यांच्या पुड्यांचे कागद जपून ठेवावेत. त्या कागदांवर नंबर छापलेले आहेत. पाचच मिनिटात त्यातून तीन लकी नंबर्स काढून त्यांना वधूवरांतर्फे खास पारितोषिके दिली जाणार आहेत.”—

ही घोषणा ऐकल्यावर तुंबळ धुमश्चक्री उडाली. आपापल्या तुंदिलतनू आणि त्यावर ल्यालेले जडशीळ पोषाख सावरीत अनेकजण-अनेकजणी खाली वाकण्याचे आणि जमिनीवर दिसतील ते कागद उचलण्याचे प्रयास करू लागले-लागल्या. थोडा वेळ गोंधळ झाला. पण लवकरच हॉल बऱ्यापैकी स्वच्छ झाला. पाच मिनिटांनी माईकवरून लकी नंबर्स घोषित झाले. आणि अहो आश्चर्यम्— माझ्या खिशातल्या नंबरला पहिला पुरस्कार मिळाला होता. माझा आनंद फार टिकला नाही. पहिला पुरस्कार म्हणून साडी मिळाली होती. ती बायकोने बळकावली. घरी आल्यावर आमचा संवाद झडला.

“कागद खाली न टाकता खिशात ठेवायची माझी सवय कामी आली.”

“माझ्या माहेरच्या माणसांनी ही अभिनव कल्पना राबवली आणि पाहुण्यांकडून हॉल स्वच्छ करून घेतला. त्याचं तुम्हाला कौतुकच नाही.”

“तुझ्या भावाला विचार. ही सगळी आयडिया त्याला मीच सुचवली होती. पेढा खाल्ल्यावर मी लगेच त्याला कागदावरचा नंबर एसएमएस केला होता. म्हणून तुला साडी मिळाली.”

“अच्छा. म्हणजे ही साडी दादाने दिली आहे मला. आता तुम्ही मला एक साडी घ्या. बरेच दिवस झाले, घेतली नाही.”

मी कपाळावर हात मारून घेतला.

☕?☕

प्रस्तुती :- संग्राहिका मीनाक्षी सरदेसाई 

सांगली

मो. – 8806955070

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कर्तव्य – भाग-2 ☆ संग्राहक – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

☆ जीवनरंग ☆ कर्तव्य – भाग-2 ☆ संग्राहक – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

(“सगळं जमेल. मी आहे ना !” सर त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले. गजूने खाली वाकून त्यांचे पाय धरले.) इथून पुढे —–

“सर खूप करताय माझ्यासाठी”—

“अरे ते माझं कर्तव्यच आहे !” त्याला उठवत ते म्हणाले. ” माझे बाकीचे विद्यार्थी परदेशात नोकऱ्या करताहेत. कोणी इथे मोठे अधिकारी आहेत. तूच एकटा मागे रहावा हे मला कसं पटावं?” गजूच्या डोळ्यात पाणी आलं.

दोन वर्षात गजू खुप पुढे गेला. फॅक्टरी वाढली. एकाची तीन दुकानं झाली. गजूचा गजानन शेठ झाला. झोपडपट्टीतून तो थ्री बी.एच.के. फ्लॅटमध्ये रहायला गेला. भाऊ बहिणी चांगल्या शाळा काँलेजमध्ये जाऊ लागले. दरम्यान त्याचे वडील वारले. वडील गेल्यावर एका वर्षाने त्याचं लग्न झालं. मुलगी पसंत करायला तो गायकवाड सरांनाच घेऊन गेला होता. काही दिवसांनी त्याची आई वारली.

इकडे गायकवाड सरांना निवृत्त होऊन पाच वर्षे झाली होती. सर आता थकले होते. त्यांच्या मुलाने इंग्लंडमध्येच स्थायिक होण्याचा निर्णय घेतला होता. मुलगी अगोदरच आँस्ट्रेलियात स्थायिक होती. त्यामुळे सर दुःखी होते. त्यात त्यांच्या पत्नीची तब्येतही आजकाल ठीक नसायची.

एक दिवस सरांची पत्नी गेल्याचा संदेश गजूला मिळाला. सर्व कामं सोडून तो त्यांच्या घरी धावला. सरांचा मुलगा, मुलगी वेळेवर पोहचू शकले नाहीत. ते येण्याअगोदरच अंत्यविधी पार पाडावा लागला. पण गजूने सरांना कोणतीच कमतरता तर जाणवू दिली नाहीच, शिवाय तेराव्या दिवसापर्यंतचा सगळा खर्चही त्यानेच केला.

सगळं आटोपल्यावर सरांच्या मुलाने त्यांना इंग्लंडला चलायचा खुप आग्रह केला, पण सरांनी मायदेश सोडायला साफ नकार दिला. सगळे निघून गेल्यावर सरांचं एकाकीपण सुरु झालं, आणि ते गजूला बघवत नव्हतं, पण त्याचाही नाईलाज होता…

एक दिवस बायकोला घेऊन तो सरांच्या घरी पोहचला. त्याला पाहून सरांना आश्चर्य वाटलं.

” सर तुमचे माझ्यावर खुप उपकार आहेत. आज मला अजून एक मदत कराल.?”

“अरे आता तुला मदतीची काय गरज? तू आता खुप मोठा झाला आहेस . बरं ठीक आहे, सांग तुला काय मदत हवी आहे?”

“सर माझे वडील व्हाल?”

सर स्तब्ध झाले. मग म्हणाले, “अरे वेड्या मी तर तुला कधीचंच आपला मुलगा मानलंय !”

“तर मग मला मुलाचं कर्तव्य करु द्या. मी तुम्हाला माझ्या घरी न्यायला आलोय. तुमचं उरलेलं आयुष्य तिथंच काढावं, अशी माझी तुम्हाला विनंती आहे !” गजू हात जोडत म्हणाला.

“अरे पण तुझ्या बायकोला विचारलं का?”

“सर तिला विचारुनच मी हा निर्णय घेतलाय. तिलाही वडील नाहीयेत. तुमच्यासारखे सासरे वडील म्हणून मिळाले तर तिलाही हवेच आहेत. शिवाय पुढे मुलं झाल्यावर त्यांनाही आजोबा हवेतच की! “

“बघ बुवा. म्हातारपण फार वाईट असतं. मी आजारी पडलो तर तुलाच सर्व करावं लागेल.”

“मुलगा म्हटलं की ते सगळं करणं आलंच. सर तो सारासार विचार करुनच मी आलोय !”

सर विचारात पडले. मग म्हणाले, “ठीक आहे, येतो मी.  पण माझी एक अट आहे. मला तू सर म्हणायचं नाही.”

“मी माझ्या वडिलांना अण्णा म्हणायचो, तुम्हालाही तेच म्हणेन !”

सर मोकळेपणाने हसले.

“अजून एक अट, तुझ्यासारखे अनेक गजू आहेत, ज्यांना मदतीची गरज आहे. त्यांना गजानन शेठ व्हायला मला मदत करायची !”

गजूला गहिवरुन आलं. त्यानं सरांना मिठी मारली. दोघंही बराच वेळपर्यंत रडत होते…

समाप्त 

(सत्य घटनेवर आधारित—-शिक्षक हा असा असतो, आणि असाच असायला हवा.) 

– अज्ञात 

संग्राहक – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

चंद्रपूर,  मो. 9822363911

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कर्तव्य – भाग-1 ☆ संग्राहक – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

☆ जीवनरंग ☆ कर्तव्य – भाग-1 ☆ संग्राहक – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

बाजारातल्या कोपऱ्यात बसून गजू आपलं नेहमीचं चपला-बुट शिवण्याचं काम करत होता. कुणाची तरी चाहूल लागली, म्हणून त्याने आपली मान वर केली. “अरे ही चप्पल शिवायची आहे ?” समोरची व्यक्ती त्याला ओळखीची वाटली.

“तुम्ही गायकवाड सर ना?”

त्याने विचारलं.

“हो !  तू?”

“मी गजानन. गजानन लोखंडे. झेड.पी. च्या शाळेत दहावी ब च्या वर्गात होतो बघा. तुम्ही आम्हांला इंग्रजी आणि इतिहास शिकवायचे.”

“बरोबर. पण तुझा चेहरा ओळखू येत नाहीये !” गायकवाड सर त्याला निरखत म्हणाले.

“असू द्या सर. मी कुणी हुशार विद्यार्थी नव्हतो, की तुमच्या लक्षात राहीन !”

“पण तू हा व्यवसाय का…..?”

“सर हा आमचा पिढीजात व्यवसाय! आजोबा, वडील दोघंही हेच करायचे. दहावी सुटलो, तेव्हापासून वडिलांची तब्येत ठीक नाहीये. त्यामुळे शिक्षण सोडून गेली तीन वर्षे हेच करतोय.”

“काय झालं वडिलांना?

“सतत दारु पिऊन त्यांचं लिव्हर खराब झालंय. त्यामुळे ते नेहमी आजारीच असतात.”

“ओह! आणि तुझे भाऊ?”

“दोन भाऊ आणि एक बहीण तिघंही लहान आहेत. शिकताहेत. आई अशिक्षित.”

“अच्छा” गायकवाड सर विचारात गढून गेले. गजूनं त्यांची चप्पल शिवून दिल्यावर तो नाही नाही म्हणत असतांनाही, त्याच्या हातात दहा रुपये कोंबून निघून गेले.

काही दिवसांनी ते परत आले. गजूला म्हणाले “अरे माझ्या मापाचा एक बूट तयार करुन देशील?”

गजू तयार झाला. त्याने माप घेऊन दोन दिवसात बूट तयार करुन दिला. सरांना तो आवडला. त्यांनी गजू नाही म्हणत असतानाही पाचशे रुपये दिले. गजूला खूप आनंद झाला. इतके पैसे त्याला आजपर्यंत मिळाले नव्हते.

आता त्याच्याकडे नियमितपणे चपला बुट बनवण्यासाठी ग्राहक येऊ लागले. सगळे गायकवाड सरांनी पाठवलंय असं सांगायचे.

काही दिवसांनी सर आले. गजू त्यांना ग्राहक पाठविल्याबद्दल धन्यवाद देऊ लागला. त्यांनी त्याला थांबवलं. म्हणाले,  “गजू तुझ्या हातात कला आहे. तू असं का करत नाहीस, इथंच एक टपरी टाकून त्यात वेगवेगळ्या साईजचे डझनभर चपला बूट ठेवले तर गिऱ्हाईकाला थांबावं लागणार नाही.”

” सर कल्पना चांगली आहे, पण त्याला दहा पंधरा हजार लागतील. तेवढे पैसे नाहीयेत माझ्याजवळ!”

“हरकत नाही. मी देतो तुला. पण मला तू ते सहा महिन्यात परत करायचे. चालेल?”

गजू तयार झाला. आठवड्यातच तो बसायचा तिथं टपरी उभी राहिली. महिन्याभरातच गजूचे पंधरा हजार वसूल होऊन दहा हजार नफाही हातात पडला. गायकवाडसर आल्यावर त्याने त्यांना पंधरा हजार दिले. त्यांनी ते त्याला परत केले.

“मी तुला सहा महिन्यांची मुदत दिली होती. सहा महिन्यानंतरच मला परत कर. तोपर्यंत तुझा धंदा वाढवण्यासाठी त्याचा उपयोग कर.”

गजूचा आता उत्साह वाढला. त्याने जास्त माल ठेवायला सुरवात केली. उत्तम दर्जा आणि कमी किमतीमुळे त्याच्या टपरीवर खुप गर्दी व्हायला लागली. आता त्याला वेळ पुरेनासा झाला.

सहा महिन्यांनी सर आले. गजूच्या चेहऱ्यावर आनंद आणि आत्मविश्वास फुलून आला होता.

“सर खूप चांगलं चाललंय. पण आता पुढं काय करायचं ?”

“गजू आता चांगल्या मार्केटमध्ये दुकान भाड्याने घ्यायचं. तिथे हे सगळं शिफ्ट करायचं. मी पाहून ठेवलंय दुकान. अगदी मोक्याच्या ठिकाणी आहे. आणि हो! स्मॉल स्केल इंडस्ट्रीसाठी जे कर्ज मिळतं ते तुला मिळवून देतो. एम.आय.डी.सी. मध्ये फँक्टरी टाकून दे!!”

“काय? फॅक्टरी ?” गजू थरारला. “सर मला जमेल का?”

“सगळं जमेल. मी आहे ना !” सर त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले.

गजूने खाली वाकून त्यांचे पाय धरले.

क्रमशः ….

– अज्ञात 

संग्राहक – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

चंद्रपूर,  मो. 9822363911

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares