मराठी साहित्य – काव्यानंद ☆ व्यथेला शब्द लाभावे… कवयित्री : सुश्री आश्लेषा महाजन ☆ रसग्रहण – सुश्री नीलिमा खरे ☆

सुश्री नीलिमा खरे

? काव्यानंद ?

☆ व्यथेला शब्द लाभावे… कवयित्री : सुश्री आश्लेषा महाजन ☆ रसग्रहण – सुश्री नीलिमा खरे ☆

☆ कविता ☆ व्यथेला शब्द लाभावे

व्यथेला शब्द लाभावा,

अशी बांधीव ती नाही 

तुला देऊ कशी लाही? 

तशी आटीव ती नाही…

 *

मनाच्या खोल अंधारी 

स्मृतींचा कालवा दाटे 

तमा पिंजून एखादा 

दिठीला काजवा भेटे…

 *

क्षणाला लख्ख बिल्लोरी 

उजेडा, अर्थ दे ना तू 

धुनीसाठी हवी ऊर्जा,

असे अंतस्थ हा हेतू…

 *

नको वरपांग काहीही,

उरातिल आर्त उसळू दे 

मनाच्या मंथनापोटी 

खरा उद्गार मिसळू दे…

 *

व्यथेला शब्द लाभाया,

युगे तिष्ठूनिया पाही

लिपीला भार का व्हावा?

अनर्था, बोल ना काही…

 *

— आश्लेषा महाजन.

Mob. 9860387123

रसग्रहण 

 व्यथेला शब्द लाभावा,

अशी बांधीव ती नाही 

तुला देऊ कशी लाही? 

तशी आटीव ती नाही..

“व्यथेला शब्द लाभावे “हे काव्यशीर्षक वाचताच स्मृतींचा कालपट क्षणाचा कालावधी न सरताच नजरेसमोर तरळतो. प्रत्येकाच्या काळजात व्यथेची कथा नांदतच असते. या व्यथेला बोल, शब्द लाभावेत व ती तिच्या परिमाणासकट परिणामांना व्यक्त करणारी असावी असा आंतरिक घोष कानी निदादतो. व्यथेची भावना तशी सार्वत्रिकच आहे. प्रत्येक जण कधी ना कधीतरी तिला सामोरा गेलेला असतो. व तो दाहक अनुभव, ती अनुभूती माणसाच्या काळजाला निरंतर छळत राहते. साहजिकच कवितेच्या अंतरंगाकडे हृदय आकृष्ट होते. कवयित्रिच्या शब्दभात्यातले सुयोग्य शब्दबाण आपल्या व्यथेला घायाळ करतील आणि तिचे ते शब्दरूप पाहायला मिळेल अशी सुप्त इच्छा वाचकाच्या मनात मूळ धरू लागते. व्यथेची व्याप्ती व्यक्त करायला शब्द लाभावेत, ते पुरेसे यथार्थ व अर्थपूर्ण असावेत ही भावना कवितेत व्यक्त होताना दिसते. असामान्य वाटणारी प्रत्येकाची व्यथा निराळी! तिचा भार अर्थवाही शब्दांनी वाहून न्यावा ही कामना प्रत्यक्षात येणे सहज सोपे नाही हे वास्तव कविता वाचताना ध्यानात येते. कवयित्री म्हणते व्यथेला शब्द लाभावा, ती अबोल राहू नये, तिने व्यक्त व्हावे, तिला व्यक्त करावे. व्यथा भोगणाऱ्याला ती व्यक्त करण्यासाठी तसेच खुद्द व्यथेलाही शब्द लाभावेत असा अर्थ अभिप्रेत असावा. मनातली ही इच्छा फलद्रूप व्हावी. पण यासाठी तिचे रूप, स्वरूप व्यक्त करण्याजोगे दृष्यमान असायला हवे ना ! तिचे मनात वसत असलेले रुप कल्पनेच्या कुंचल्यातून व शब्दमाध्यमातून व्यक्त करणे वा तिचे वर्णन करणे हे कठीणच! ही व्यथा बांधीव, एकसंध नाही. विस्कळीत, दुभंगलेली, पसरलेली, इत:स्तत: विखुरलेली आहे. जणू काही ती सर्वव्यापी आहे. तिची जमवाजमव करून तिला शब्दरूप देणे गरजेचे आहे. हे आकळले तरी ते प्रत्यक्षात कसे घडवून आणावे, कसे घडावे? व्यथेला शब्दात बांधणे म्हणजे शब्दांकित करणे तसेच “बांधून टाकणे” हाही अर्थ अभिप्रेत असावा. व्यथेला शब्द लाभावा असे जरी वाटत असले तरी तिच्या रूपामुळे तिला तो लाभणार नाही असा काहीसा सूचक निर्देश निदर्शनास येतो. या व्यथेची लाही, तिचा लहानसा कण कसा कुणाला द्यावा?कारण ती आटीव म्हणजे आटलेली, घट्ट झालेली, संपृक्त नाही. अजून ती धगधगती आहे, लाहीसम तडतडणारी आहे, बेचैन करणारी आहे, प्रवाही आहे. नानाविध व्यथा असल्याने तिचे रूप एकसमान नाही.

मनाच्या खोल अंधारी 

स्मृतींचा कालवा दाटे 

तमा पिंजून एखादा 

दिठीला काजवा भेटे…

कुठेही कसेही न सामावणाऱ्या अदृश्य, अथांग अशा मनाच्या आत आत अगदी तळघरात, खोल खोल अंधारात स्मृतींचा कालवा दाटलेला आहे. कालवा या शब्दाचा सुंदर अर्थ मनाला भावतो. मानवनिर्मित प्रवाह म्हणजे कालवा. येथे व्यथेचा प्रवाह हा कालव्यासम आहे हा अर्थ अभिप्रेत आहे. अर्थात ही व्यथा मानवनिर्मित आहे हे लक्षात आणून दिले आहे. तसेच अंतरंगात कालवाकालव करणारा तो कालवा. व्यथेचे मूळ व कूळ, तिची उत्पत्ती व व्याप्ती दर्शवणारा हा शब्द!! व्यथेचा हा काळाकुट्ट तम अंतरंगात व्यापून उरलेला आहे. तो काळोख अगदी पिंजून काढला तर नजरेला एखादा काजवा जो क्षणिक आणि स्वयंप्रकाशी आहे तो कधीतरी भेटतो. येथे “पिंजून काढणे” हा वाक्प्रचार म्हणजे खूप प्रयत्न केल्यावर गवसणे. कवितेतील आशयाला हा एकदम समर्पक आहे. एखादा आशेचा किरण व्यथा भोगताना अथक प्रयत्नाने कधीतरी खुणावतो ही भावना व्यक्त केली आहे. तसेच व्यथा दूर करण्यासाठी स्वतःच्या प्रयत्नांचे महत्त्व सांगितले आहे.

क्षणाला लख्ख बिल्लोरी

उजेडा, अर्थ देना तू 

धुनीसाठी हवी ऊर्जा,

असे अंतस्थ हा हेतू…

काजव्याच्या सानुल्या उजेडाकडे कवयित्री याचना करते आहे की हे उजेडा! त्या विविक्षित क्षणाला लखलखीत बिल्लोरी अर्थ दे. अर्थात त्या अंधारात लाभलेल्या उजेडाने आयुष्याला चमक, झळाळी लाभो. बिल्लोरी या शब्दातून केवळ चमकदार उजेड अंतर्भूत नाही तर तो इंद्रधनु सम सतरंगी असावा अशी भावना व्यक्त केली आहे. या प्रकाशामुळे जगण्याचे अर्थपूर्ण भान येऊ दे, आयुष्याला चांगला मार्ग मिळू दे असा भावार्थ!! आणि हे सर्व गरजेचे आहे कारण ही धुनी पेटती राहावी, यासाठी तिला ऊर्जेची गरज आहे. येथे धुनी ही शरीराची आहे. ती पेटलेली आहे, धगधगती आहे हे लक्षात येते. तसेच जगण्याचा जो यज्ञ, धुनी आहे त्यात समिधा म्हणून अर्पण करण्यासाठी जगण्याचीच ऊर्जा लाभावी. आशेच्या अर्थपूर्ण ऊर्जेचा एखादा तरी किंचितसा स्त्रोत लाभावा अशी मनीषा व्यक्त केली आहे, कारण अंतरंगात स्थित असणारा, नेहमी वसणारा हा आंतरिक हेतू आहे. अंतस्थ म्हणजे आतला, खोल मनाच्या गाभ्यातला हेतू!!जगण्याची इच्छा सोडलेली वा सुटलेली नाही. व्यथेच्या अटळ स्थानाचे भान राखून जीवन आशेच्या किरणावर जगण्याचा प्रयत्न आहे.

नको वरपांग काहीही 

उरातील आर्त उसळू दे 

मनाच्या मंथनापोटी

खरा उद्गार मिसळू दे….

कवयित्रीला कुठले ही काही ही वरवरचे, उथळ, वरपांगी, सकृतदर्शनी आहे असे दिसणारे, खोलवर विचार न करणारे काहीही नकोय. दुसऱ्याच्या व्यथाभावनेला लाभणारे वरवरचे सहानुभूतीपर शब्द ही नकोत. अर्थात व्यथा भोगताना कुणाच्या अर्थहीन निरुपयोगी सहाय्याची अपेक्षा कवयित्रीला नाही. आपल्या वेदनेवर तिला स्वतःच आधार शोधायचा आहे. यासाठी उरातील, काळजातील आर्त भावना उसळून येऊ देत. व्यथा या नेहमी उरात दडलेल्या, दडविलेल्या असतात हे सत्य लक्षात घेतले आहे. त्या उसळून येऊन एक प्रकारे त्यांचा उद्रेक व्हावा व तसे झाल्याने व्यथेच्या भोगातून बाहेर पडण्याची प्रखर व तीव्र जाणीव स्वतःला असल्याशिवाय व झाल्याशिवाय व्यथेपासून सुटका नाही, यावर दुसरा उपाय नाही. मनाचे मंथन यातून सखोल चिंतन अपेक्षित आहे. जीवनात समाधान मिळावे व ते मिळवण्यासाठी व्यथेच्या चक्रातून बाहेर पडण्याचा मार्ग मिळावा. काय करायचे याचे विश्लेषण करून त्यातून निष्कर्ष काढणे हे गरजेचे आहे. असे झाले तर तो खरा अर्थपूर्ण उद्गार लाभेल. उद्गार या शब्दाचा अर्थ अभिव्यक्ती करण्यासाठी योग्य वचन, बोल उक्ती मिळणे हा आहे. या शब्दयोजनेतून मनाच्या मंथनाप्रती मनात असलेली कवयित्रीची तळमळ किती प्रांजळ आहे हे लक्षात येते. ताकदीचा व खरा उद्गार लाभला व मनाच्या मंथनात मिसळला तरच मार्ग मिळेल, मार्ग दिसेल याची खात्री आहे.

व्यथेला शब्द लाभाया 

युगे तिष्ठूनिया पाही 

लिपीला भार का व्हावा?

अनर्था, बोल ना काही…

व्यथेची भावना, तिची तीव्रता व खोली सापेक्ष आहे. तिची जाण संपूर्णपणे होणे सर्वथा अशक्य आहे याचे सजग भान कवयित्रीला आहे. त्यामुळे व्यथा व व्यथेला स्वतःला व्यक्त करण्यासाठी, बोलके होण्यासाठी यथार्थ शब्द लाभावेत अशी अपेक्षा केली आहे. यासाठी व्यथा युगानुयुगे तिष्ठत उभी आहे असे कवियत्रीने म्हटले आहे. यातून कालातीत असलेली व्यथा काळाशी सुसंगतपणे व्यक्त होणे अशक्यप्राय आहे हे कळते. व्यथेला अभिव्यक्त करण्याची घाई न करता योग्य शब्द-भाव-रसनिष्पत्ती होईपर्यंत थांबायची तयारी आहे. अगदी युगानुयुगे वाट पाहायची तयारी आहे. वाट पाहत राहून ही, तिष्ठत असूनही ते शब्द, ते बोल मिळू शकत नाहीत. “तिष्ठत” शब्दातून आतुरतेने बराच काळ वाट पाहणे हे जाणवून दिले आहे. लिपीला म्हणजे लिखाणाच्या सूत्रबद्ध पद्धतीला, अक्षरांना व्यथेचा भार होतोय. अर्थात ती अक्षरेही असमर्थ ठरत आहेत व्यथा व्यक्त करण्यासाठी !कवितेतील आशय अगदी खोलवरपणे लक्षात येतो व मनाला भिडतो ही. तसेच लिपीने का व कशासाठी व्यथेचा भार वाहायचा असा मूलभूत प्रश्न पडला आहे. अशा परिस्थितीत कवयित्री मनात व जीवनात भरून राहिलेल्या अनर्थालाच काही बोलायची विनंती करते आहे. लिपी तर बोलत नाही, बोलू शकत नाही तर अनर्था आता तूच बोल असे अतिशयोक्तीपूर्ण मागणे कवयित्रीने केले आहे.

व्यथेची सार्वत्रिक भावना व्यक्त करण्यासाठी योग्य शब्द लाभणे अत्यंत अवघड आहे कारण व्यथा ही भावना समजून घ्यायची आहे, तिचे दृश्यरूप दृष्टीस पडत नाही. अत्यंत संवेदनशील मनाचा आविष्कार या कवितेत जाणवतो. उचित, वेचक व वेधक शब्दांचा समर्पक प्रयोग, भावनेचा स्तर कळावा म्हणून योजलेले विविध साहित्यिक अलंकार कवितेतील आशयाला पूरक व पुष्टी देणारे आहेत. व्यथेला शब्द लाभावा, मनाचा खोल अंधार अशी अनेकानेक चेतनागुणोक्तीची उदाहरणे या कवितेत सुंदर रीतीने मांडली आहेत. त्यांना चेतना प्रदान करून त्यांचे व्यक्ती स्वरूप वर्णिले आहे. काळोखाला पिंजणे मधील अतिशयोक्ती अलंकार, स्मृतींचा कालवा मधील रूपक तसेच कवितेला असलेली लयबद्धता असे अनेक काव्यविशेष मनाला मोहविणारे आहेत. हे वियद्गङ्गा वृत्त आहे. कवितेचा “काव्यप्रकार” म्हणून मोल वृद्धिंगत करणारे आहेत. कवयित्रीने कवितेतून व्यथेला शब्द लाभावा असे म्हणताना तिला बोलके केले आहे. तिच्या मूकपणात तिचे अस्तित्व प्रकर्षाने लक्षात येते.

मनाचा वेध घेणारी ही कविता आहे. वाचक जेव्हा आपल्या मनाची नाळ कवितेशी जुळवतो तेव्हा ती सार्वत्रिक होते आणि यातच त्या कवितेचे महत्त्व अधोरेखित केले जाते. अशी ही नितांत सुंदर भावपूर्ण कविता मनात रेंगाळत राहील व निरंतर स्मरणात राहील या बद्दल दुमत होणे नाही.

© सुश्री नीलिमा खरे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ स्वत्व… – सौ राधिका भांडारकर ☆ रसग्रहण… सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

सुश्री अरुणा मुल्हेरकर

? काव्यानंद ?

☆ स्वत्व… – सौ राधिका भांडारकर ☆ रसग्रहण… सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

राधिका भांडारकर हे नाव माझ्या मते आपणा सर्वांनाच माहित आहे, कारण त्या स्वतः या अभिव्यक्ती ई दैनिकांसोबत जोडलेल्या आहेत आणि सातत्याने त्यांचे गद्य /पद्य लेखन चालू असते.

रसग्रहणासाठी ही कविता मला खास निवडावीशी वाटली याचे कारण म्हणजे, मनस्पर्शी साहित्य परिवार या समूहातर्फे नुकत्याच घेण्यात आलेल्या एका काव्य स्पर्धेत राधिका ताईंच्या या कवितेला उत्कृष्ट कविता असे मानांकन मिळाले आहे. अभिव्यक्तीनेसुद्धा ही खबर वाचकांपर्यंत पोहोचवली होतीच.

 सर्वप्रथम आपण ही कविता पाहूया.

सौ राधिका भांडारकर

☆  स्वत्व ☆

*

नकोच वाटते मला दया माया

आहेत वाटा कितीतरी अजून

चालेन त्यावर जरी एकटी मी

जाज्वल्य आहे स्वाभिमान अजून

*

सारे मुखवटे भासतात मजला

का घ्यावे दान मी त्यांच्याकडून?

कशाला व्हावे मिंधे कुणाचे

जाज्वल्य आहे स्वाभिमान अजून

*

नको लाचारी वा हाजी हाजी

प्रतिमाच माझी ठेवेन टिकवून

मन्यात आहे सळसळता प्रवाह

जाज्वल्य आहे स्वाभिमान अजून

*

खोट्यापुढे का तुकवायची मान

मुलाम्याला का जायचे मोहून 

स्वत्वचा राखेन प्रश्नाला भिडून

जाज्वल्य आहे स्वाभिमान अजून

*

आक्रमण माझ्या जर अस्तित्वावरी 

केले कुणी तर त्यांना डावलून

सिद्ध करेन मी माझ्या स्त्रीत्वाला

जाज्वल्य आहे स्वाभिमान अजून

*

ही संपूर्ण कविता वाचल्यावर पटकन आपल्यासमोर उभी राहते ती या कवितेतील मी म्हणजे एक अत्यंत कर्तुत्ववान, करारी, स्वाभिमानी, असत्याची चीड असणारी आणि प्रचंड आत्मविश्वासाने समाजात वावरणारी कणखर निडर अशी स्त्री ! या स्त्रीमध्ये मला माझी आजीच दिसली आणि त्यामुळेच ही कविता मला अत्यंत जवळची वाटली.

नकोच वाटते मला दया माया

आहेत वाटा कितीतरी अजून 

चालेन त्यावरी जरी एकटी मी

जाज्वल्य आहे स्वाभिमान अजून

या पहिल्याच कडव्यात कवितेतील नायिका म्हणते की तिला उगीचच कोणाची दया माया नको आहे. कितीही अडचणींनी तिला व्यापले असले, तिचे रोजचे रस्ते बंद झाले असले तरी आणखी कितीतरी वाटा तिच्यापुढे मोकळ्या आहेत. ती एकटीने त्या वाटांवरून चालण्यास समर्थ आहे. सहानुभूतीची तिला गरज नाही कारण तिचा स्वाभिमान अजूनही जाज्वल्य आहे.

सारे मुखवटे भासतात मजला

का घ्यावे मी दान त्यांच्याकडून

कशाला व्हावे मिंधे कुणाचे

जाज्वल्य आहे स्वाभिमान अजून

तिला आयुष्याच्या प्रवासात अनेक माणसे भेटली. अनेकांनी तिला मदतीचे हात देण्याचा प्रयत्न केला, परंतु खरे आणि खोटे चेहरे कसे ओळखावे हा मोठा प्रश्न तिच्यापुढे आहे. ती अत्यंत सतर्क आणि सजग अशी स्त्री आहे. त्यामुळे मुखवट्या मागचा चेहरा तिला दिसत असावा बहुदा. मायावी कांचन- मृगापाठी पळणारी ती स्त्री नाही, आणि म्हणूनच तिच्या आयुष्यात येणारे अनेक जण तिला वरवरचे मुखवटेच वाटतात. तिला असंही वाटतं की स्वतः सक्षम असताना उगीच कुणाचे उपकार घेऊन मिंधे का व्हावे? ती पुढे म्हणते,

नको लाचारी वा हाजी हाजी

प्रतिमाच माझी ठेवेन टिकवून

धमन्यात आहे सळसळता प्रवाह

जाज्वल्य आहे स्वाभिमान अजून

कितीही अडचणी आल्या, संकटांना सामोरे जावे लागले, तरी तिला तिच्या कर्तुत्वाने समाजात मिळविलेली तिची प्रतिमा कायम ठेवायची आहे. यासाठीच तिला कोणाची लाचारी नको, कोणाची हाजी हाजी नको.

खोट्यापुढे का तुकवायची मान

मुलाम्याला का जायचे मोहून

स्वतःच राखेन प्रश्नाला भिडून

जाज्वल्य आहे स्वाभिमान अजून

हे जग, ही माणसं म्हणजे वरवरचा मुलामा आहे. या मुलाम्याला मोहून मी खोट्याची साथ देणार नाही, त्यापुढे माझी मान तुकवणार नाही. स्वत्वाला सांभाळून मी खोटं पितळ उघडं पाडीन. केवढा हा आत्मविश्वास आणि कणखरपणा!

आक्रमण माझ्या जर अस्तित्वावरी

केले कुणी तर त्यांना डावलून

सिद्ध करेन मी माझ्या स्त्रीत्वाला

जाज्वल्य आहे स्वाभिमान अजून

या शेवटच्या कडव्यात ती समाजातील पुरुषांना आव्हान देते की मी स्त्री आहे म्हणून मला कोणी कमी समजू नका. माझ्या अस्तित्वावर जर तुम्ही हल्ला केलात तर याद राखा. मी माझं स्त्रीत्व सिद्ध करेन.

या ठिकाणी मला सीतेच्या अग्नी दिव्याची प्रकर्षाने आठवण आली. आजची स्त्री ही खरंतर कोणत्याही क्षेत्रात तसूभरही मागे नाही. मात्र असे असून सुद्धा कितीतरी निर्भया आपण पाहतोच.

राधिका ताईंची ही कविता अशा विकृतींना शह देणारी आहे. ही कविता वाचताना आपल्याही नसानसातून रक्त खवळते. या मनोविकृतींचा अगदी संताप संताप होतो, हेच या कवितेचे यश आहे.

वीर रसाची एक सकारात्मक दृष्टिकोन असलेली ही कविता आहे.

यात तसे कोणतेही काव्यमय शब्द नाहीत, परंतु साध्या शब्दातूनही अंगार फुलणारे असे हे काव्य आहे.

दिंडी वृत्तातील ही कविता. प्रत्येक चरणात ९+१० अशा मात्रांचे बंधन असूनही चरणातील कोणताही शब्द मात्रा जुळविण्यासाठी वापरला आहे असे मुळीच वाटत नाही

‘धमन्यात आहे सळसळता प्रवाह ‘ – – मात्राबद्ध असूनही किती चपखल बसले आहेत पहा हे शब्द! वृत्तबद्ध काव्य करताना हीच तर कवीची खरी कसोटी आहे. राधिकाताई या कसोटीला पूर्ण उतरल्या आहेत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

त्यांनी अशाच विविध विषयांवर प्रकाश टाकणाऱ्या, आणि समाज प्रबोधन करणाऱ्या कविता लिहाव्या आणि वाचकांचे मनोरंजनही करावे. त्यांच्या पुढील लेखन प्रवासासाठी मी त्यांना सुयश चिंतीते.

© सुश्री अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ बाळकृष्ण गोजिरा… – कवी : डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण.. सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? काव्यानंद ?

☆ बाळकृष्ण गोजिरा… डॉ निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण.. सौ राधिका भांडारकर ☆

प्रथमच मातृत्वाची चाहूल लागते तेव्हा स्त्रीच्या मनात अनामिक भावनांचा सागरच उसळतो. स्त्रीत्व आणि मातृत्व या स्त्री जीवनातल्या अनमोल बाबी आहेत. मातृत्व जणू काही स्त्रीत्व सिद्ध करतं. मातृत्व म्हणजे एक प्रकारे तिच्या स्त्री जीवनाची सफलता असते. “आपण आई होऊ शकतो किंवा आपण आई होणार” ही भावनाच स्त्रीसाठी त्रिभुवनातला आनंद देणारी असते. एकाच वेळी हर्ष, हुरहूर, जबाबदारीच्या जाणिवेनं आलेलं भय, देहात होणारे बदल आणि हे “गुपित कुणाला सांगू कसे?” अशा एका निराळ्याच मानसिकतेत ती असते पण सर्वप्रथम हे गोड गुपित तिला “त्यालाच” सांगायचे असते कारण निर्मितीच्या या सुखद वाटेवरचा प्रवास हा केवळ त्या दोघांचाच असतो म्हणूनच या आनंदाच्या क्षणाचा खरा भागीदार तोच असतो. अशाच अर्थाचं एक द्वंद्व गीत म्हणजे बाळकृष्ण गोजिरा जे डॉ. निशिकांत श्रोत्री यांच्या सिद्धहस्त लेखणीतून सहज उतरलेलं आहे. मातृत्वाची चाहूल लागल्यानंतर स्त्रीच्या अंतरंगातले तरंग त्यांनी अत्यंत जाणतेपणाने आणि हळुवारपणे टिपले आहेत. स्त्री जीवनातला असा हा अनमोल क्षण, आणि त्यातला जोडीदाराचा सहभाग नेमकेपणाने वेचणारे हे एक गोड युगुल गीत आहे.

*

वसविला बाळकृष्ण गोजिरा

 वसविला बाळकृष्ण गोजिरा”ध्रु।।

*

 ती: दान घेऊनी तव तेजाचे

 सार्थक झाले या ओटीचे 

 उजविण्या ज्योत अपुल्या घरा

 वसविला बाळकृष्ण गोजिरा।।१।।

*

 तो: प्रेमरज्जुंचे धागे अपुले

 ती: रेशीमगाठी बंध जाहले 

 तो : गुंफिला नवा साजिरा 

 ती :वसविला बाळकृष्ण गोजिरा।।२।।

*

तो: मुकुंद अथवा आदिशक्ती 

ती :कलिका अपुल्या वेलीवरती 

 माझ्या पोटी उमलु लागली 

 वसविला बाळकृष्ण गोजिरा।।३।।

*

कवी : डॉ. निशिकांत श्रोत्री. (निशिगंध काव्यसंग्रह)

तीन कडव्यांचं, फक्त पंधरा ओळींचं काव्य पण किती अर्थपूर्ण किती बोलकं! मातृत्वाशी गोड धागा विणला जात असतानाच तिच्या मनातलं अगाध आंदोलन आणि तिच्या स्वप्नरंगात दंग झालेल्या “त्याचे” मन.. किती साध्या आणि सोप्या शब्दांतून या गीतात उलगडलं आहे!

 वसविला बाळकृष्ण गोजिरा

 या ध्रुवपदातला बाळकृष्ण हा शब्दच मनाला हळुवार मोरपिसाचा स्पर्श करतो. लहान बालकांसाठी बाळकृष्णाची ही एक सुंदर उपमा नेहमीच दिली जाते. कृष्ण, कन्हैया, कान्हा या शब्दातच लडिवाळपणा आहे. कृष्णाला कोणी पाहिले आहे? पण त्याचं लडिवाळ, बाळपणीचं रूप सगुणात्मक आहे आणि ते अत्यंत सुंदर गोजीरं आहे म्हणूनच उदरात वाढणाऱ्या गर्भाला या बाळकृष्णाचं रूप लाभावं ही प्रत्येक स्त्रीची मनोकामना असते आणि सहजपणे ती म्हणते, स्वतःशी आणि त्याला सांगताना,

 वसविला बाळकृष्ण गोजिरा

 *मला दिवस राहिलेत किंवा आता आपण आई-बाबा होणार बरं का?” याच भाष्याला सौंदर्याने सजविणारी,

वसविला बाळकृष्ण गोजिरा ही ओळ किती काव्यात्मक आहे! इथे बाळकृष्ण हा रुपकात्मकही आहे.

 ती: दान घेऊनी तव तेजाचे 

 सार्थक झाले या ओटीचे 

 उजविण्या ज्योत अपुल्या घरा

 वसविला बाळकृष् गोजिरा।१।

द्वंद्वगीत म्हणजे एक संवाद असतो. हाही एक आनंददायी संवाद आहे. या चार ओळी वाचताना वाचकाच्या मनात एक सहजीवनाचे सुंदर चित्र साकारते. “ती अगदी सुखाने त्याच्याजवळ बसलेली आहे. जे गुपित तिला त्याला सांगायचं आहे त्यासाठी हवा असलेला एकांत आणि निवांतपणा दोन्हीही आहे आणि तिला काहीतरी सुखाचं, आनंदाचं आपल्याला सांगायचं आहे पण नक्की काय याचा अंदाज घेत उत्सुकतेने तोही तिच्याजवळ तितक्याच उत्कट प्रेमभावनेने आलेला आहे. ”

ती पण पटकन त्याला काही सांगत नाही. म्हणते, दान घेऊनी तव तेजाचे… “तुझ्या बीजाचं दान तू मला दिलंस ते फळलं आहे. आता माझी ओटी भरली आहे आणि माझ्या देहातल्या गर्भाशयाच्या अस्तित्वाचे, पर्यायाने माझ्या स्त्रीत्वाचे आता सार्थक झाले आहे. अरे! एक नवा पाहुणा येतोय बरं का आपल्या अंगणी आणि त्याच्या आगमनाने आपल्या घरात नवा प्रकाश उजळणार आहे. असा हा बाळकृष्ण माझ्या उदरात वाढत आहे. ”

संपूर्ण कडवं तसे रूपकात्मक आहे.

दान, तेज, ज्योत, बाळकृष्ण या सर्वच शब्दांवर भावनांचा सौंदर्य साजआहे. मिलनाच्या क्षणी स्त्री ही धारक असते आणि पुरुष हा दाता असतो म्हणून स्त्रीसाठी तिला त्याच्याकडून मिळालेलं शुक्रबीज हे जणू काही पवित्र दानासारखे असते. दान शब्दाची उत्प्रेक्षा खूपच भावनिक आणि सुंदर वाटते. शिवाय हे दान असंतसं नसून तेज:पुंज आहे. इथे तेज हा शब्दही खूप अर्थपूर्ण आहे. घेणे आणि देणे या प्रक्रियेत जेव्हा उदात्तता असते तेव्हा त्या दानाला एक वेगळंच तेज प्राप्त होतं आणि अशा तेजाचं दान मिळालेलं बीज अंकुरताना प्रकाशमय असणार याची खात्री असते.

बाळकृष्ण या शब्दात गोजिरेपण, लाडिकपण, सौंदर्य तर आहेच पण त्याचबरोबर एक सात्विकता, मंगल्य, पावित्र्य, देवरुपत्व आहे आणि प्रत्येक स्त्रीला जन्माला येणारं आपलं बाळ असं गुणसंपन्न असावं असं वाटत असतं.

 तो: प्रेम रज्जूचे धागे अपुले 

 ती :रेशीमगाठी बंध जाहले

 तो : गुंफिला गोफ नवा साजिरा

 ती: वसविला बाळकृष्ण गोजिरा।२।

किती प्रेमळ संवाद! या संवादात झुळझुळ निनादणारा सूर आहे. या ओळी वाचताना सहजच कवी बी यांच्या काव्यपंक्ती मनात गुणगुणल्या.

*हे विश्वाचे आंगण 

आम्हा दिले आहे आंदण

उणे करू आपण दोघेजण

शुद्ध रसपान करण्याच्या भावनेतून जणू काही त्याला ती गर्भवती झाल्याचे कळताच तो म्हणतो, “आपलं नातं प्रेमाच्या धाग्यात विणलं आहे”. त्यावर तीही म्हणते “आता मात्र आपल्या नात्याची वीण माझ्या उदरात वाढणाऱ्या गर्भामुळे अधिकच घट्ट होणार आहे. ”

त्यालाही तिचेही भाष्य मनोमन पटते आणि तोही त्यास दुजोरा देऊन सहज म्हणतो, ” खरोखरच आपल्या प्रेमाचं हे प्रतीक आहे. हा एकमेकात गुंफलेला सुंदरसा गोफच आहे. ”

गोफ हा शब्दही नात्यांच्या संदर्भात मला खूप आवडला. विणलेल्या गोफात धाग्यांचा सहज न सुटणारा पीळ असतो. तिच्या उदरातल्या बीजाशी त्याने दिलेल्या अंशाचा संयोग झाल्यामुळे त्यांचे नाते विणलेल्या गोफासारखे घट्ट झाले आहे.

कडव्यातला एक एक शब्द मोत्यासारखा पाणीदार आणि गोजिरवाणाही आहे. दोघांच्या नात्याला दिलेली “प्रेमरज्जुचे धागे” ही उपमा अगदी निखळ आहे. रेशीमगाठी बंध जाहले … देवाधर्माच्या साक्षीने प्रेमाची एक रेशीमगाठ बांधली तर जातेच पण या गाठीचा बंध तेव्हाच होतो जेव्हा दोघांच्या मिलनातून झालेल्या निर्मितीच्या क्षणाची अनुभूती मिळते. स्त्री —पुरुषांचं नातं, प्रीत आणि प्रणयाचं फलित या स्त्री जीवनातल्याच नव्हे तर सहजीवनातल्या किती महत्त्वाच्या पायऱ्या आहेत यावर डॉ. श्रोत्री अगदी सहजपणे भाष्य करून जातात.

 तो: मुकुंद अथवा आदिशक्ती 

ती: कलिका अपुल्या वेली वरती 

 माझ्या पोटी उमलू लागली

 वसविला बाळकृष्ण गोजिरा।३।

मातृत्वाची चाहूल लागताक्षणीच दोघांच्याही मनात तेव्हाच एक उत्सुकताही सहजपणे जागृत होते. मुलगा होणार की मुलगी?

या काव्यपंक्तीत उल्लेख असलेला “तो। मात्र अत्यंत समतोल, समंजस वृत्तीचा आहे अथवा विनाकारणच ताण देणारा किंवा घेणाराही नाही. त्याला गर्भधारणेच्या प्रक्रियेतील नैसर्गिकता पूर्णपणे ज्ञात आहे आणि त्या बाबतीत त्याची मनापासून स्वीकृती आहे म्हणून तो तिला म्हणतो,

मुकुंद अथवा आदिशक्ती या संज्ञा किती सुरेखपणे साधल्या आहेत! युगंधराचं तत्व घेऊन जन्माला येणारा मुलगा असो अथवा शक्तीचं साक्षात रूप घेऊन जन्माला येणारी मुलगी असो दोघांचे स्वागतच आहे. मुकुंद आणि आदिशक्ती या दोन्ही शब्दातून, जन्म घेणाऱ्या नवजाताचा अत्यंत सात्विकपणे आणि महात्म्य अधोरेखित करून गौरवच केलेला आहे आणि तीही त्याच्या विचारांना अनुमोदन देऊन स्वीकृत भावनेने म्हणते, “खरोखरच आपल्या संसार प्रीतीच्या वेलीवर उमलणारी ही कलिका आता माझ्या उदरात वाढत आहे आपण दोघेही तिचे स्वागत करूया. ?

असं हे अत्यंत गोजिरवाणं आणि भावनिक गीत ! छोटसं, साध्या शब्दातलं! उपमा उत्प्रेक्षांनी सजवलेलं प्रतीकात्मक रूपकात्मक असं गोड गोजिरंगाणं! या गाण्यांमध्ये जाणवतं ते नात्यातलं मांगल्य, साफल्याची भावना, सार्थकतेचा अनुभव आणि स्त्री जीवनाचा मातृत्वाशी जोडलेला एक अभंग भावनांचा बंध आणि या सर्वांशी एकरूप, समरस होऊ शकणारं कवीचं संवेदनशील मन!

या गीतात साधलेली तेजाचे/ ओटीचे घरा/ गोजिरा/ साजिरा/ अपुले/ जाहले आदिशक्ती/ वेलीवरती ही सहजयमके गीताला एक ताल आणि लय प्राप्त करून देतात*

डॉक्टर श्रोत्रींच्या काव्यातले एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे शब्दांचा अजिबात नसलेला फापटपसारा, नगण्य काठिण्य, अलंकारांचा अवजडपणा टाळून सहजपणे फुलणारा शब्दांचा साज! डॉ. श्रोत्री तुमच्या काव्यप्रतिभेला माझा मनापासून प्रणाम!

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ माणुसकीचा ठाव नसे… कवी – डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण – सुश्री नीलिमा खरे ☆

सुश्री नीलिमा खरे

? काव्यानंद ?

☆ माणुसकीचा ठाव नसे… कवी – डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण – सुश्री नीलिमा खरे ☆

☆ माणूस हरवला माणुसकीचा ठाव नसे ☆

जिव्हा चटावली बाजारा कोपऱ्यात चूल रुसे

पंगती आग्रह भरपेटी भुकेल्या तोंडी घास नसे

सुधारलेल्या या देशी संस्कृती ना कोणी पुसे

माणूस हरवला माणुसकीचा ठाव नसे

*

पेले फेसाळले मदीरा स्तन आटले ओठ सुके

दूध रस्त्यावरी ओतता बालकांची क्षुधा सुके

आंसू आटलेले मातृत्वाची मान झुके

माणूस हरवला माणुसकीचा ठाव नसे

*

माय अपुली बहिण तरी गर्भातच लेक खुडे

समाजा ना घोर कुठे कुणाचे काय अडे

मी माझे हे खरे समाजाचे तर भान नसे

माणूस हरवला माणुसकीचा ठाव नसे

*

उत्तुंग इमले धनिका दीनदुबळ्यांना वास नसे

दारी गाड्यांची रांग असे कोण नेसाया साडी नसे

निर्दयी कठोर धरती गगनालाही कणव नसे

माणूस हरवला माणुसकीचा ठाव नसे

*

मंचकी लावणी रंगली सुवासिनीचा अश्रू सुके

बैठकी खणखण पडती विद्येसाठी मोल थके

विभ्रमे मन भरे दूरदृष्टीचा अभाव दिसे 

माणूस हरवला माणुसकीचा ठाव नसे

*

आता कसली आशा नाही स्वप्न ही ना पहायची

मनात आतल्या आत जळून ती गुदमरायची

हाची का समाज हेचि असेच का जगायचे

माणूस हरवला माणुसकीचा ठाव नसे

© डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम. डी. , डी. जी. ओ.

☆ रसग्रहण :  माणूस हरवला माणुसकीचा ठाव नसे ☆

जिव्हा चटावली बाजारा कोपऱ्यात चूल रुसे

पंगती आग्रह भरपेटी भुकेल्या तोंडी घास नसे

सुधारलेल्या या देशी संस्कृती ना कोणी पुसे

माणूस हरवला माणुसकीचा ठाव नसे

माणूस स्वतः हरवला आहे यातील गर्भितार्थ मनाला भिडतो. तो माणुसकीला ही विसरला. त्याला याविषयी काहीही घेणेदेणे नाही.

“जिव्हा चटावली म्हणताना भुकेविषयीचा सात्विक भाव नाहीसा झाला आहे हे अधोरेखित केले आहे.. “चटावली” शब्दांतून परिस्थितीचे गांभीर्य व तीव्रता नेमकेपणाने ध्यानात येते. बदलत्या परिस्थितीमुळे घरातील चूल रुसली आहे अशी कल्पना करून उत्तम चेतनगुणोक्ती अलंकार योजिला आहे. “कोपऱ्यात” या शब्दातून होत असलेले दुर्लक्ष कळते. पंगतीत पोट भरलेल्या लोकांना आग्रह केला जातो. पण भुकेल्या माणसाला घासही मिळत नाही याची जाणीव व पाश्चिमात्य देशांचे अंधानुकरण करताना देश स्वतःच्या संस्कृतीला विसरतो आहे. “अतिथी देवो भव” ही भारतीय संस्कृतीतील भावना दुर्लक्षित होते आहे.

पेले फेसाळले मदीरा स्तन आटले ओठ सुके

दूध रस्त्यावरी ओतता बालकांची क्षुधा सुके

आंसू आटलेले मातृत्वाची मान झुके

माणूस हरवला माणुसकीचा ठाव नसे

वर्तणुकीचे व हरवलेल्या माणुसकीचे वर्णन केल्यानंतर समाजाचे बदलते भान आणि वर्तन विशद केले आहे.. मदिरापानाची अवाजवी व गैरवाजवी प्रतिष्ठा देताना तिचे पेले फेसाळताना दिसतात. पण लहान बालकांना पूर्णान्न ठरणारे आईचे दूध मात्र आटत चाललेले आहे. माया व लहान मुलांना स्तनपान न देण्याकडे स्त्रियांचा वाढता कल लक्षात येतो. लहान मुलांचे ओठ सुकून गेले आहेत. त्यांची तहान भूक भागत नाही. मूलभूत गरजांविषयी माणुसकी जपली जात नाही. नात्याने पाहिले जात नाही हे सूचित केले आहे. अपेक्षित भाव न मिळाल्याने दूधाचा नाश झाला तरी बालकांची क्षुधा नजरेआड होते. ती भूकही सुकून जाते असे म्हणून अतिशयोक्ती अलंकाराचा समर्पक वापर केल्याने परिस्थितीची तीव्रता समजते.. असे असूनही कुणालाही दुःख होत नाही. या अर्थी आंसू, अश्रू आटून गेलेले आहेत. मातृत्वाच्या भावनेला प्रामाणिक न राहणारी ही भावना फैलावल्यामुळे मातृत्वाची मान ही झुकली आहे असे म्हणताना “मातृत्वाची मान झुकणे” यातून मांडलेला गर्भितार्थ अतिशय भेदक आहे. मातृत्वही शरमून गेले आहे. चेतनागुणोक्ती कवितेच्या आशयाला उंची व खोली प्रदान करतो.

माय अपुली बहिण तरी गर्भातच लेक खुडे

समाजा ना घोर कुठे कुणाचे काय अडे

मी माझे हे खरे समाजाचे तर भान नसे

माणूस हरवला माणुसकीचा ठाव नसे

प्रत्येक माणूस हा स्त्रीच्या पोटी जन्म घेतो. स्त्रीच्या रूपात माय, बहिण व लेक ही मिळते. या सत्याकडे दुर्लक्ष करून स्त्री गर्भ मात्र खुडला जातो. “खुडे” या शब्दातून “कळी खुडणे” या अर्थाने कळी व तिचा विकास अशा जीवन क्रमाशी स्त्री गर्भाचा मेळ साधला आहे. समाजाची मूल्ये वर्धन करणारी, संस्कार करणारी स्त्रीचे अस्तित्व आवश्यक आहे. हा व्यापक विचार करण्यात समाज भावनिक दृष्ट्या कमी पडत आह. मी आणि माझेच खरे व स्वतः पुरते आत्मकेंद्री जगणे हा जणू आयुष्याचा नियम झाला आहे. अपवाद म्हणूनही समाजाचे भान ठेवण्याचे भान जपले जात नाही.

उत्तुंग इमले धनिका दीनदुबळ्यांना वास नसे

दारी गाड्यांची रंग असे कोण नेसाया साडी नसे

निर्दयी कठोर धरती गगनालाही कणव नसे

माणूस हरवला माणुसकीचा ठाव नसे

भूक तहान या नंतर या निवारा अर्थात घर याविषयी कवी सांगतो कि श्रीमंतांना व श्रीमंतांची उत्तुंग मोठी घरे असतात. परंतु दीनदुबळ्यांना मात्र “वास नसे” म्हणताना त्यांना घर, अधिवास नसणे हा भाव मांडला आहे. गरजेपेक्षाही जास्त असणे व गरजेपुरते ही नसणे हा विरोधाभास, विषमता लक्षात येते. श्रीमंतांच्या घरी गाड्यांची रांग लावताना पैशाचा अपव्यय दिसून येतो. त्याच वेळेस स्त्रियांसाठी लज्जा रक्षणार्थ वस्त्रही उपलब्ध नसते. धरतीवरील निर्दयी कठोरवृत्ती प्रकर्षाने मांडली आहे. “निर्दयी कठोर धरती” मधील श्लेषात्मक अर्थ ही अतिशय उच्च प्रतीचा आहे. पृथ्वीतलावर वास करणारे लोक निर्दयी व अन्न वस्त्र निवारा या गोष्टींची गरज भागवणारी धरती ही निर्दयी बनलेली आहे. गगनालाही कणव नसे म्हणताना वरुणराजाची कृपा नसल्याने लक्षात येते.. देव गगनात वास करतो असा समज आहे. त्या दृष्टीनेही त्याला कणव येत नाही असा श्लेषात्मक अर्थ आशयाला पूरक ठरतो. संपूर्णपणे विपरीत परिस्थिती मांडून माणुसकी कशी हरवत चालली आहे हे प्रत्येक कडव्या गणिक उदाहरणे देत स्पष्ट केले आहे.

मंचकी लावणी रंगली सुवासिनीचा अश्रू सुके

बैठकी खणखण पडती विद्येसाठी मोल थके

विभ्रमे मन भरे दूरदृष्टीचा अभाव दिसे 

माणूस हरवला माणुसकीचा ठाव नसे

समाजाचे अध:पतन दाखवताना माणुसकीप्रमाणे त्याचे नैतिक पतनही कसे होत आहे सांगितले आहे. लावणी पाहताना दंग झालेले लोक त्या नादामध्ये स्वतःच्या संसाराकडे दुर्लक्ष करतात. घरातील सुवासिनीचा, स्त्रीचा अश्रूही सुकून गेला आहे याचे भानही पुरुषजात ठेवत नाही. “अश्रू सुके “असे म्हणताना दुर्लक्षित परिस्थितीचा सामना दीर्घकाळ चाललेला कळतो आहे. लावणीच्या बैठकीत पैशाची उधळण होते. मुलांच्या विद्याप्राप्तीसाठी पैसा उपलब्ध होत नाही. व शैक्षणिक फीया थकून जातात, बाकी राहतात. विभ्रमांनी मन रमवून काळाचा व पैशाचा अपव्यय केला जातो. क्षणिक सुखात दूरदृष्टीचा अभाव दिसतो.. संपूर्ण घराघराचा ऱ्हास, विध्वंस होऊ शकतो याकडे तीळमात्र लक्ष दिले जात नाही. आर्थिक, मानसिक शारीरिक व नैतिक पातळीवरील चांगला समाज चांगला देश निर्माण करू शकतो. परिपूर्ण समाजाची आस न ठेवल्यामुळे एकूणच माणूस म्हणून जगण्याच्या विविध भागांवर कवीने प्रकाश टाकला आहे. व माणुसकीच्या लोप पावण्याने अंध:कारमय परिस्थितीची जाणीव करून दिली आहे.

आता कसली आशा नाही स्वप्न ही ना पहायची

मनात आतल्या आत जळून ती गुदमरायची

हाची का समाज हेचि असेच का जगायचे

माणूस हरवला माणुसकीचा ठाव नसे

विविध पातळ्यांवर हरवलेली, लोपलेली माणुसकी कवीने उदाहरणे देत शब्दांकित केली आहे. विपरीत वातावरणात विकल, हतबल, उदास मनाला आता कसलीही आशा नाही. काही बदल, सुधारणा होईल असे स्वप्न पहायचीही आशा उरली नाही. ” स्वप्न ही ना पहायची ” यातील श्लेषात्मक अर्थ अत्यंत अर्थपूर्ण. स्वप्न पाहायची नाहीत म्हणजे ती सत्यात उतरणार नाहीत याची जाणीव असल्याने ती पाहायची नाहीत व परिस्थितीमुळे स्वप्न पहायची आशा उरली नाही हा दुसरा अर्थ. ही गोष्ट सत्यात उतरेल याची शाश्वती मनाला उरलेली नाही. विस्तवासम दाहक वास्तवाने आशा मनातल्या मनात जळून जाणार, गुदमरून जाणार. “गुदमरणे” या शब्दातून तगमग, कळकळ, जीवाची काहिली लक्षात येते. हा समाज आता असाच राहणार का, यालाच समाज म्हणायचे का आणि इथे असेच जगायचे का असे विविध प्रश्न कवीच्या सजग व खिन्न मनाला पडलेले आहेत. या प्रश्नातूनच त्याचे नकारात्मक उत्तरही अध्याहृतपणे दिलेले आहे.

संपूर्ण कवितेत यमक, अनुप्रास या बरोबरच साहित्यिक अलंकारांची योजना केल्याने नादमयता व अर्थपूर्णता दिसून येते.

डोळ्यांत अंजन घालून वास्तवाची प्रखर जाणीव करून देणारी, विचार करायला प्रवृत्त करणारी ही कविता ! अत्यंत हृदयस्पर्शी तर आहेच तिचे सामाजिक मोलही अनमोल आहे. समाजभान असणारे लोक प्रयत्नशील असतात. स्वतःचा व्यावसायिक पेशा समर्थपणे व यथार्थपणे सांभाळून, सामाजिक भान सजगपणे साहित्यातून सक्षमपणे व भाषेचे सौंदर्य जपून मांडण्याचे अनमोल कार्य डॉक्टर निशिकांत श्रोत्री यांनी नेहमीच केलेले आहे.

© सुश्री नीलिमा खरे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ शतजन्म शोधतांना – (नाट्यपद) – स्वा. वि. दा. सावरकर ☆ रसग्रहण – प्रा. भारती जोगी ☆

प्रा. भारती जोगी

 काव्यानंद

☆  शतजन्म शोधतांना – (नाट्यपद) – स्वा. वि. दा. सावरकर ☆ रसग्रहण – प्रा. भारती जोगी ☆

संगीत नाटकांच्या वैभवशाली परंपरेत सुवर्णाक्षरांनी कोरलेलं नाव म्हणजे सावरकरांनी, मा. दीनानाथ मंगेशकर यांच्यासाठी लिहिलेली अजरामर नाट्यकृती “ संन्यस्त खड्ग ! “ १८ सप्टेंबर १९३१ या दिवशी या नाटकाचा पहिला प्रयोग झाला. आता शतकाकडे वाटचाल सुरू झाली आहे याची! 

या नाट्यकृतीतल्या… वैश्विक अनुभूती आणि एका वेगळ्याच विरहानुभूतीचा स्पर्श लाभलेल्या, भैरवी रागातल्या अवीट आणि अमीट सुरांची झालर असलेल्या एका नाट्य पदाचे रसग्रहण करण्याचा प्रयत्न मी करणार आहे. खरंतर सावरकरांच्या भावना, कल्पना आणि विचारांचं… उदात्त, उन्नत आकाश दोन बोटांच्या चिमटीत धरणं, सामावणं शक्यच नाही. पण तरीही हे शिवधनुष्य… काही क्षणांपुरतं का असेना… पेलून बघणार आहे…

नाट्यपद…

शत जन्म शोधितांना। शत आर्ति व्यर्थ झाल्या। 

शत सूर्य मालिकांच्या। दीपावली विझाल्या |

*

तेव्हा पडे प्रियासी| क्षण एक आज गांठी |

सुख साधना युगांची| सिद्धीस अंती गाठी। 

*

हा हाय जो न जाई| मिठी घालू मी उठोनी |

क्षण तो क्षणात गेला | सखी हातचा सुटोनी |

हे नाटक गौतम बुद्धांच्या काळाशी संबंधित आहे. बुद्धांच्या सांगण्यावरुन ‘शाक्य’ सेनापती विक्रमसिंह आणि शाक्य जनता, शस्त्र त्याग करून संन्यास घेतात. काही काळ जातो. दरम्यान विक्रमाचा मुलगा वल्लभ सुलोचना नावाच्या युवतीशी प्रेमविवाह करतो. लग्नाला वर्ष उलटल्यानंतर वल्लभ आणि सुलोचना यांच्या मिलनाचा / भेटीचा योग येतो. आणि… तो बहुप्रतिक्षित मधुर मिलनाचा क्षण येतो… पण हाय रे दैव! 

त्याचवेळी, कोसल देशाचा राजा… विद्युतगर्भ याने आक्रमण केल्याची वार्ता येते आणि शाक्य राष्ट्राला वाचवण्यासाठी, वल्लभालाही पाचारण केले जाते. कपिलवस्तुचा पाडाव टळावा म्हणून संन्यस्त खड्गाला आवाहन केले जाते. वल्लभही मग संन्यास धर्माचा संन्यास घेत… युद्धात उतरतो. म्हणून नाटकाचं नाव.. “संन्यस्त खड्ग!!”

मिलनाच्या क्षणीच झालेली ताटातूट, त्यामुळे सुलोचनेच्या मनाची झालेली अवस्था, विरह वेदनेचे, हतोत्साहित, विकल, असहाय असे मनोभाव… सगळ्याच… विभाव, अनुभाव आणि संचारी भावांसह, रस निष्पत्ती पर्यंत पोहोचविणारं हे नाट्यपद!! 

 सुलोचना आपल्या प्रिय सखीला… नलिनीला, वल्लभाच्या ऐनवेळी असं निघून जाण्याने, तिच्या मनात उठलेलं भावनांचं वादळ, विचारांचा कल्लोळ… कथन करते आहे…. ते शब्दांकन म्हणजे हे पद! 

सुलोचना अगतिक होते आणि म्हणते… असा पती लाभावा म्हणून मी शत जन्म शोधत राहिले गं! त्यासाठी मी शत-शत/अगणित, आरती केल्या. परमेश्वराच्या आळवण्या केल्या. तो भेटावा म्हणून शतजन्म वाट पाहिली. पण सखी, बघ ना, काय झालं…

‘शत आर्ति व्यर्थ झाल्या, शत सूर्य मालिकांच्या दीपावली विझाल्या! ‘

… या ओळींमध्ये शब्द.. शत सूर्य मालिका…. सावरकरांचं विश्वाच्या भव्यतेचं आकर्षण आणि विराटतेची ओढ व्यक्त झाली आहे. उत्तुंग कल्पना शक्ती, आशयातील भावोत्कटता जाणवते आहे. त्यातूनच सुलोचनेची मनोवस्था डोळ्यासमोर येते. ‘ दीपावली विझाल्या ‘ यातला विझाल्या हा अगदी अनवट असा शब्द प्रयोग…. तिच्या मनातले, मिलनोत्सुक आशेचे… शत-शत दीप विझले.. हे सूचित करतो… अगदी प्रत्यक्षानुभूतीच दिलीयं!

पुढील ओळीत सुलोचना म्हणतीये…

‘ तेव्हा पडे प्रियासी, क्षण एक आज गांठी!

सुख साधना युगाची, सिद्धीस अंति गाठी!‘

… या ओळी म्हणजे… यमक आणि श्लेष या दोन्ही अलंकाराच्या गाठभेटीचा उत्तुंग आणि उत्कट क्षण!! 

प्रिय मिलनाचा, शत जन्म वाट पाहिलेला क्षण, आज गांठी आला, गाठला एकदाचा, प्राप्त झाला, मिळाला…. असं वाटतंय! आणि मनात एकच विचार येतोयं की… शतजन्माच्या माझ्या साधनेने, सिध्दी गाठली. साधना आणि सिद्धीची गाठ पडली!! प्रिय आराधना, तपस्या, साधना सफल झाली.

 गाठी या शब्दांत, यमक आणि श्लेष या भाषालंकारांचा उपयोग करून… या पदातल्या, सुलोचनेच्या भावनांची अगदी… ये हृदयीचे, ते हृदयी…. म्हणजे प्रेक्षक वृंद हृदयी… गाठी घातली अंती… हीच भावना येते.

शेवटच्या दोन ओळी तर… कल्पनेची उत्तुंगता, आशयघनता, शब्दकळा, आणि भावनोत्कटता या सगळ्याचाच परिपूर्ण, परिपक्व, परिणाम म्हणावा ! 

सुलोचना सांगतीये… अगदी सजीव, सगुण, साकार दर्शन… त्या एका कृतीची साक्षात्कारी अनुभूती देत की…

हा हाय जो न जाई, मिठी घालू मी उठोनी

क्षण तो क्षणात गेला, सखी हातचा सुटोनी!! 

… सखी, बघ ना, तो मधुर मिलनाचा क्षण आला… मी उठून माझ्या वल्लभाला मिठी घालायला गेले… आणि… आणि, निमिषार्धात्.. तो क्षण.. क्षणात निसटून गेला गं माझ्या हातून.. अगदी काही कळायच्या आत!… किती ही वैश्विक अनुभूती! आध्यात्मिक किनार लाभलेली! कुठेतरी याच ओळी आठवतात… ‘ पाया पडू गेले तव, पाऊलचि ना दिसे!!! ‘ 

विरहाची काळ हा प्रदीर्घ भासतो, मात्र मिलनाचा काळ अत्यल्प भासतो.. असंही सुचवलयं ! ‘ क्षण तो क्षणात गेला…. ’ या सावरकरांच्या ओळीचं खरं मोल जाणून, भाषाप्रभू पु. ल. म्हणतात… ‘ या एका ओळीसाठी सावरकरांना नोबेल द्यायला हवं. ‘ 

हा खरा गौरव आहे त्या… ओळी सुचलेल्या क्षणांचा, सुलोचनेच्या हातून निसटलेल्या त्या हुरहुर लागलेल्या क्षणांचा ! 

या पदाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे… हे मिलनाच्या आधीचं नाही तर नंतरचं विरह गीत आहे. हे गाणं आपण ऐकतो तेव्हा एक विचित्र हुरहुर लागते. भैरवी रागातल्या सुरांची झालर असलेलं हे नाट्यपद… ‘आर्ति व्यर्थ झाल्या’ मधली आर्तता आणि ‘ क्षण तो क्षणात गेला ’ मधली क्षणभंगुरता स्पष्ट करतं… प्रेक्षकांच्या हाती मात्र खूप काही, मनाच्या गाभाऱ्यात स्थिरावून गेलं… असंच म्हणावसं वाटतं.

© प्रा. भारती जोगी

पुणे.                            

९४२३९४१०२४.📚📖🖋️

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ भय इथले संपत नाही – कवी:- माणिक सीताराम गोडघाटे उर्फ ग्रेस ☆ रसग्रहण – प्रा. भारती जोगी ☆

प्रा. भारती जोगी

 🌸 विविधा 🌸

☆  भय इथले संपत नाही – कवी:- माणिक सीताराम गोडघाटे उर्फ ग्रेस ☆ रसग्रहण – प्रा. भारती जोगी ☆

☆ भय इथले संपत नाही ☆

*

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते

मी संध्याकाळी गातो तू मला शिकविली गीते…..

*

ते झरे चंद्र सजणांचे ती धरती भगवी माया

झाडांशी निजलो आपण झाडांत पुन्हा उगवाया…..

*

तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शूनी गेला

सीतेच्या वनवासातील जणू अंगी राघव शेला…..

*

स्तोत्रात इंद्रिये अवघी गुणगुणती दु:ख कुणाचे

हे सरता संपत नाही चांदणे तुझ्या स्मरणाचे !!

*

कवी:- माणिक सीताराम गोडघाटे उर्फ ग्रेस

… लता दीदींचे स्वर आणि हृदयनाथ मंगेशकर यांचा साज, यांतून ज्या एका कवितेचं ग्रेसफूल गाणं झालं… ती ही, गूढरम्य कवी मानलं गेलेल्या कवी ग्रेस यांची कविता वाचनात आली. आणि… भय… या सारख्या आदिम आणि अत्यंत खोलवर रुजलेल्या संवेदनेवरची ही कविता आहे हे लक्षात आलं. आणि मग ग्रेस यांच्या अतर्क्य, अनाकलनीय, पण अपरिमित सुंदर अशा भावविश्वात प्रवेश करायचं ठरवलं.

ग्रेस यांच्या कविता अतिशय दुर्बोध, दुर्गम आहेत असं म्हंटलं जातं… पण असंही म्हंटलयं की… ग्रेस यांच्या कवितांच्या शब्दांच्या अर्थाच्या उंबरठ्यावर थबकू नका. त्यांच्या वेदनेशी रममाण व्हा… मगच ही कविता कळेल.

कवी ग्रेस यांना त्यांची आई सोडून गेल्याचं दु:ख ते पचवूच शकले नाहीत. तिच्या आठवणी, संध्याकाळच्या कातरवेळी अधिकच दाटून यायच्या. आणि अंधार व्हायला सुरुवात झाली की तो काळोख त्यांचं आख्खं मन काबीज करायचा आणि एका अनामिक अशा भयाने, भीतीने ते व्यापून जायचं आणि मग अशावेळी त्यांच्यातल्या त्या बालकाला आपल्या आईची तीव्रतेने आठवण व्हायची. कारण भीती वाटली की मूल आईचा आधार, पदर शोधतं!

 भय…. तसं म्हंटलं तर… आपल्या आनंदाचं निधान असलेली प्रत्येकच गोष्ट, व्यक्ती, तिचा आधार तुटण्याचं भय असतंच आपल्या मनात ! नाती, मैत्री, जुळलेले अनुबंध तुटण्याचं, कायमचे दुरावण्याचं, विपन्नता येण्याचं, अवहेलना नशिबी येण्याचं… अशा अनेकविध गोष्टींच भय सतत आपल्या मनात असतंच ! आणि मग संध्याकाळी मनाची व्याकुळता, कातरता अधिकच गहिरी होते.

कवीच्या मनाची इथे तीच अवस्था झाली आहे. कवी म्हणतो……

काहीही झालं तरी, केलं तरी, भय इथले संपत नाही ! आणि मग माझं व्याकुळ मन तुझ्या आठवणींनी भरून येतं. एक अनामिक अशी भीती दाटून येते मनात ! मग मी ती घालविण्यासाठी तू मला शिकविलेली  शुभंकर अशी गीते म्हणू लागतो. कारण… बाहेरचा आणि मनातलाही काळोख दूर करण्याचं, त्या येऊ घातलेल्या तमाला दूर सारण्याचं सामर्थ्य आहे त्या लावलेल्या दीपज्योतींमध्ये आणि भोवताल उजळवून टाकणा-या त्या मंद, शांत, स्निग्ध प्रकाशात, त्या उच्चारलेल्या पवित्र अशा शब्दरवांत ! हे तुझेच तर संस्कार आहेत ना ! 

आठवणींत रमलेला कवी अचानक आपल्याला… आसक्ती-अनासक्तीच्या, जन्म-मृत्यूच्या फेऱ्याच्या अनाकलनीय अशा विश्वात घेऊन जातो. आणि मग सुरू होते रूपकांची बांधणी आणि उभारणी… आणि वाहू लागतो प्रतिमा आणि प्रतिकांचा एक ओघ, एक खळाळता, शुभ्र, फेनिल प्रवाह ! 

एकीकडे रोमा-रोमांत, रंध्रा-रंध्रात झिरपत जाणारं, झरत जाणारं ते चंद्र-चांदणचु-याचं.. सुखाचं चांदणं मन प्रसन्न करून जातं. पुन्हा अशाच वेळी मनाला… धीर धरी रे… असं समजावत… आकाशातून… जमिनीवर यायचं असतं. धरतीची भगवी माया….

विरक्त वृत्ती समजून घ्यायची असते. सगळं तिचंच आहे, तिच्यातूनच निर्माण झालयं… पण ती धरती किती अलगद तिच्यातलं मीपण कातरून टाकते… नि:संग होते, अलिप्त होते, अगदी निरपेक्ष भावनेने. तिची भगवी माया, विरक्त वृत्ती या रूपकातून व्यक्त होते… सगळं देऊन मोकळी होते ही माया! आईची माया तरी याहून कुठे वेगळी आहे?? 

कवीने… जन्म-मृत्यूचं रहाटगाडगं स्पष्ट करतांना  झाडाचं फार सुंदर रूपक वापरलं आहे. झाड मोठं झालं की त्याची बीजं परत त्याच्या पायाशी निजतात… म्हणजे रुजतात… पुन्हा झाडाचा जन्म होतो… अशी ही संपणं… रूजणं… उगवणं… बहरणं… संपणं… हे चक्र सातत्याने सुरुच असतं. तद्वतच जन्म-मृत्यूचं ही आहे. जन्माला आलेल्याला मृत्यू अटळ आहे. म्हणूनच मृत्यू चं  भय बाळगू नये.

पुढील ओळींत कवीला, आईचे मंद, हळवे, वात्सल्य, ममतेने भरलेला  बोल आठवला. त्याच्या भय व्याप्त मनाला हा हळुवार, अलवार प्रेमाचा स्पर्श आठवला. आणि कवीने तो…

सीता वनवासात जातांना सोबत घेऊन गेलेल्या राघव शेल्या च्या स्पर्शाच्या रूपकाच्या कोंदणात अगदी अलगद, चपखल बसवला. अतिशय देखणी बांधणी रूपकाची !! 

आठवणींचं असं असतं ना की त्या सरता सरत नाहीत. आठवणींचं चांदणं झरतंच असतं… स्त्रवतंच असतं… झिरपतंच असतं… आणि मनाला वाटतं असतं… अजुन ही चांदरात आहे!! त्यामुळे च मग त्याच आठवणींचं दु:ख, त्या वेदना, तो सल… सतत सतत असतो… बोच जाणवंत असते अहर्निश! मग होतं काय…. की… परमेश्वराच्या प्रार्थनेत आपण आपल्या दु:खाचं रडगाणं गात रहातो, स्तोत्र म्हणावं तसं! आपलं दु:खच उगाळत बसतो, गुणगुणत बसतो. आणि त्याच्यातच अडकून बसतो. अलिप्त होता आलं पाहिजे खरं तर! इंद्रियसुखा च्या पलीकडे जाऊन, माया, मोह त्यागून विरक्त होता आलं पाहिजे. असंच अभिप्रेत असावं यात असं वाटतं.

यमन रागातलं हे गीत ! यमन…. पाण्यासारखा तटस्थ राग! जो रंग मिसळला तसा होतो, आणि कानाला गोड वाटतो. त्यामुळे ग्रेस नी जरी हे गीत आईला उद्देशून, आईसाठी लिहिले असेल तरी… आपल्याला प्रिय असणाऱ्या कुणाही व्यक्तीसाठी ते व्यक्त होणं असू शकतं. म्हणूनच तर ग्रेसच्या कवितांच्या गाभा-यातलं गूढ, आत थेट उतरून प्रवेश केल्यानंतरच उकलतं आणि अंतरंग प्रकाशित होतं… हेच खरं ! 

© प्रा. भारती जोगी

पुणे.                            

९४२३९४१०२४.📚📖🖋️

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ थैमान – कवयित्री : सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆ रसग्रहण.. सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? काव्यानंद ?

☆ थैमान – कवयित्री : सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆ रसग्रहण.. सौ राधिका भांडारकर ☆

थैमान  या शब्दातच रौद्र रसोत्पत्ती आहे.  थैमान निसर्गाचे असो,  एखाद्या विषाणूचे असो, सामाजिक राजकीय घडामोडींचे असो  किंवा  व्यक्तीच्या मनात उसळलेल्या विचारांचे असो पण थैमान  या शब्दात एक भयानकता आहे, हिंसाचार आहे.  कुठलाही सौम्यपणा अथवा सौंदर्य त्यात जाणवत नाही.  तांडव आणि थैमान हे तसे एकाच अर्थाचे दोन शब्द.  थैमानात  तांडव असते आणि तांडवात थैमान असते. एकच तीव्र सुरावट घेऊन ते अंगावर आढळतात.  थैमान बाहेरचे असो किंवा आतले असो ते काहीही करून ओसरावे याची आस लागून राहते.  थैमान म्हणजे नको असे काहीतरी आणि त्यापासून दूर जाण्यासाठी चाललेली झुंज म्हणजेच नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे जाण्याची धडपड. 

सुश्री अरुणा मुल्हेरकर

साधारण अशाच अर्थाची  थैमान या शीर्षकांतर्गत, माननीय कवयित्री अरुणा मुल्हेरकर यांची एक गझल वाचण्यात आली आणि त्यातल्या भावभावनांचा मागोवा घ्यावासा वाटला.

अगोदर आपण कविता वाचूया.

☆ – थैमान – कवयित्री : सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

काळोख दाटलेला काहूर माजलेले

अस्वस्थ का असे मन माझेच जाहलेले

*

नाही कधी सुखाच्या पाठीस धावले मी

सुख नेमके समोरी होतेच ठाकलेले

*

दिन सारखेच सांगा असतात का कधीही

होणार अस्त नक्की ऋतुचक्र चाललेले

*

अर्ध्यावरीच माझा संसार का तुटावा

कोडे कधी न सुटले मज तूचि घातलेले

*

घन दाटतात गगनी दिसते धरा सुहासी

दावानलात एका सर्वत्र जाळलेले

*

आयुष्य शिकविते मज खोटे नि काय असली

पाऊस शांत होतो  विश्रांत भागलेले

*

आता मला कळाले हे सार जीवनाचे

सारे पळून गेले थैमान दाटलेले

*

कवयित्री : सुश्री अरूणा मुल्हेरकर

आनंदकंद  वृत्तातील ही संपूर्ण गझल वाचताक्षणीच मनात आले की हे कवयित्रीच्या मनात चाललेलं विचारांचं थैमान आहे.  विचारांचं ओझं पेलवेनासे झालं की माणूस हतबल होतो आणि नकळतपणे गतायुष्याच्या आठवणीत खेचला जातो आणि त्या क्षणापासून आठवणींशी मनाचा संवाद सुरू होतो. 

अरुणाताई गझलेतल्या मतल्यात म्हणतात,

 काळोख दाटलेला काहूर माजलेले अस्वस्थ का असे मन माझेच जाहलेले

 ही एक मनाची बेचैन स्थिती आहे. काहीशी उदास,  निराश. मनातले

विचारांचे काहूर,  विचारांचे वादळ अजिबात स्वस्थता मिळू देत नाहीत.  वरवर,  दर्शनी जरी एखादी व्यक्ती स्थिर आणि शांत भासत असली तरी अंतर्मनातल्या वादळी लाटा धक्के  देत असतात आणि मग सहजपणे मनात येतं की का घायाळ माझे मन? कशासाठी मी अस्वस्थ आहे? बेचैन आहे? 

 एकदा का मनाशी संवाद सुरू झाला की अनेक भेंडोळी उलगडायला लागतात…

 नाही कधी सुखाच्या पाठीस धावले मी   सुख नेमके समोरी होतेच ठाकलेले

 आयुष्यात जपलेल्या सुखाच्या कल्पना काही अवास्तव  नव्हत्या आणि विशेष म्हणजे सुख माझ्या दारातच होते.  ते शोधण्यासाठी मला कधी धावाधाव करण्याची गरजच पडली नाही. अरुणाताईंनी लिहिलेल्या या पहिल्या शेरातच आनंदी राहण्याची,  आहे त्यात समाधान आणि सुख वेचण्याची त्यांची वृत्ती दिसून येते. 

 नाही कधी सुखाच्या पाठीस धावले मी हा उला फार अर्थपूर्ण आहे.   आयुष्यभर माणूस सुख समजून मृगजळापाठीमागे  धावत राहतो कारण खरं सुख कशात आहे हेच त्याला उमगलेल नसतं आणि परिणामी त्याच्या पदरी दुःख आणि निराशाच येते पण कवयित्री आपल्या या शेरात स्वतःबद्दल खात्रीपूर्वक सांगतात की “उंबरठ्यावरच्या सुखाला डावलून त्या पळत्याच्यापाठी कधीही गेल्या नाहीत.”

 घरात असता तारे हसरे 

मी पाहू कशाला नभाकडे?

*

 अशीच त्यांची वृत्ती असावी.

*

 दिन सारखेच सांगा असतात का कधीही

 होणार अस्त नक्की ऋतुचक्र चाललेले

 हा  तिसरा शेर अरुणाताईंच्या मनाची अध्यात्मिक बैठक दर्शवणारा आहे.  काळ स्थिर नसतो, तो बदलत असतो. जे आज आहे ते उद्या नसणार आहे  हा निसर्गाचा नियम आहे.  बदलणारे ऋतू म्हणजे निसर्गात घडणारी स्थित्यंतरे. मानवी जीवनातही अशी स्थित्यंतरे होत असतात.  सुखदुःखाचा लपंडाव चालू असतो.  हा शेर वाचताना असे वाटते की यात जीवनाविषयीची स्वीकृती आहे,  स्वतःच्या मनाला बजावणं आहे आणि मनाला समजवण्याच्या प्रक्रियेतूनच हे विचारांचं थैमान उठलेलं आहे.

अर्ध्यावरीच माझा संसार का तुटावा  कोडे कधी न सुटले मज तू चि  घातलेले

 मनात प्रचंड दुःख आहे, तीव्र घालमेल आहे.

 भातुकलीच्या खेळामधले राजा आणिक राणी 

अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी

 या गीताची आठवण करून देणारा आहे. अरुणाताईंचा हा शेर मन कातरून टाकतो. 

सुखासमाधानात दिवस चालले होते, खाच— खळगे, काटेकुटे तुडवतही एकमेकांच्या साथीने हसऱ्या सुमनांची ओंजळ भरली होती मग मध्येच हात सोडून माझा जिवलग हे जग सोडून का गेला? 

काही प्रश्नांना उत्तरेच नसतात आणि म्हणून ते न सुटणारी कोडी बनून आयुष्य व्यापून टाकतात मग या कोड्याचं उत्तर कोणाला विचारायचं?  एका अज्ञात शक्तीला, आकाशातल्या त्या बापाला… “तू मला अनंत सुखं देता देता हे न पेलवणारे दुःख का माझ्या झोळीत टाकलेस?  असा मी काय गुन्हा केला होता?”

हा संपूर्ण शेर म्हणजे मनात तुडुंब भरलेल्या वेदनेचीच घागर आहे. कुठल्यातरी अलवार क्षणी ती डचमळते आणि मग मनातलं हे वादळ अधिकच थैमान घालू लागतं. 

घन दाटतात गगनी दिसते धरा सुहासी दावानलात एका सर्वत्र जाळलेले

ग्रीष्माने फाटलेली,  भेगाळलेली धराही  शांत होते जेव्हा आभाळात मेघ  दाटतात. एकाच वेळी वादळ आणि सांत्वन,  वेदना आणि शमन या भिन्न भावाविष्काराचे सुंदर वर्णन या ओळींमध्ये आहे.  हा संपूर्ण शेर रूपकात्मक आहे.  सानीमध्ये वापरलेला दावानल हा शब्द  मनासाठी रूपक म्हणून वापरला आहे.  शांत दिसणाऱ्या अर्णवाच्या उदरात वणवा पेटलेला असतो तसा मनाच्या सागरातही विचारांचा वणवा पेटलेला असतो.  भावनांचा उद्रेक झालेला असतो.  

 घन दाटतात गगनी

 दिसते धरा सुहासी

मनात शांत वारे अचानक वाहू लागतात,  सकारात्मक विचार येऊ लागतात,  हरवलं जरी असलं  खूप काही तरी अजूनही बरंच बाकी आहे. आठवणींच्या रूपात,  त्याच्या अंशांच्या रूपात.. जे आनंददायी आहे.  इथे या विचारांना घन  दाटले  गगनी  ही उत्प्रेक्षा म्हणजेच कवयित्रीची काव्यात्मकता ! 

मनातला नकोसा कचरा जळत आहे आणि पुन्हा सुखाचा भास होत आहे. नकळत थैमान ओसरत आहे.

आयुष्य शिकविते मज खोटे नि काय असली 

पाऊस शांत होतो विश्रांत भागलेले

आयुष्याच्या प्रवासात खूप काही शिकले.  खरं काय,  खोटं काय,  काय अस्सल काय हीणकस याची धक्के खात का होईना ओळख झाली आहे आता.

मनाची अशी एक स्थिती असते की आता साऱ्या लाटा ओसरून गेल्यात, किनाऱ्यावरचा गाळ,  कचराही त्या लाटांबरोबर वाहून गेलाय आणि आता किनारा स्वच्छ,  सुंदर आणि स्थिर झाला आहे. 

सहजच  केशवसुतांच्या या ओळी आठवतात. 

* शांतच वारे शांतच सारे*

 शांतच हृदयी झाले सारे

कवयित्रीचे मनातले वादळ आता असेच  शमत आहे.  मनातल्या विचारांच्या पावसाचे  थैमान आता ओसरत आहे कारण आता गतकाळातल्या सुखी जीवनाच्या आठवणीतच मन रमू लागलं आहे.  या शेरात अरुणाताईंनी त्यांच्या हृदयातला एक अव्यक्त सरगम  व्यक्त केला आहे.

 आता मला कळाले हे सार जीवनाचे

 सारे पळून गेले थैमान दाटलेले 

या शेवटच्या शेरामध्ये जीवन यांना कळले हो असा एक अध्यात्मिक विचारच जणू मांडला आहे. 

जीवन हे एक मंथन आहे. साऱ्या सुखदुःखाची घुसळण होते आणि मग हाती सार लागते.  सुखा मागून दुःख आणि दुःखा मागून सुख हा नियतीचा नियमच आहे.  दुःखातून सुखाचा मार्ग काढणे म्हणजे जीवन जगणे.  विचार करता करता कवयित्री अरुणाताईंना याची जाणीव झाली आहे आणि त्या म्हणतात,

 आता मला कळाले हे सार जीवनाचे 

“दुःख उगाळत राहण्यापेक्षा सुखाला दार उघडून द्यावे”  हे मी जाणते आणि आता हे मनातल्या काळोखातलं थैमान कसं ओसरत आहे याचाही अनुभव घेत आहे.

ही गझल म्हणजे मनाचा एक प्रवास आहे.

अस्वस्थतेकडून स्थैर्याकडे नेणारा.

मिटलेलं दार उघडून देणारा.

अस्तापासून उदयाकडे नेणारा.

अतिशय सुंदर, अर्थपूर्ण, अशी ही गझल.  साध्या साध्या पण सुंदर रूपकातून जीवनाविषयीचा एक सखोल संदेश ही गझल वाचत असताना मिळतो. वादळातून शांततेकडे,  नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे नेणारा एक विचार प्रवाह या गझलेत अतिशय नेमकेपणाने,  सुटसुटीत शब्दात मांडलेला आहे

 माजलेले,  जाहलेले,  ठाकलेले, चाललेले, घातलेले यासारखे लगावली साधणारे काफीया  शेरामधली खयालत आणि राबता यांची खोली दर्शवतात.

 थोडक्यात अरुणाताई मुल्हेरकर यांची थैमान म्हणजे एक सुंदर गझल,  एक सुंदर खयालत,  एक सुंदर संदेश.

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ माणूस… कवी – डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण – सुश्री नीलिमा खरे ☆

सुश्री नीलिमा खरे

? काव्यानंद ?

☆ माणूस… कवी – डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण – सुश्री नीलिमा खरे ☆

आपण सध्याच्या युगात वेगवेगळे “डेज” साजरे करत असतो.आज १जुलै चा दिवस डॉ.बी सी.राय यांचा जन्म दिवस.. हा दिवस

“डॉक्टर्स डे” मानला जातो .   आजचा दिवस समाजातील वैद्यकीय व्यावसायिक लोकांप्रती आदरभाव व कृतज्ञता व्यक्त करण्याचा!! किमान या एका दिवशी तरी आपण सारे मनापासून,अंत: करण्यापासून त्या सर्वांप्रती व्यक्त होऊ या.

वैद्यकीय व्यवसाय हा थेट माणसाच्या जीवनाशी निगडीत असल्याने समाजाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे.

संपूर्णपणे  ज्ञानाधिष्ठित  असा हा व्यवसाय. वेळेवर व योग्य औषधोपचार झाल्यास संबंधित माणूस जगण्याची /आजारातून बरा होण्याची शक्यता निर्माण होते.बहुतांश डॉक्टर या पेशाकडे केवळ अर्थार्जनाचा व समाजात मानाने व प्रतिष्ठित पणे जगण्याचा दृष्टिकोन ठेवून जगत नसतात.तर एक माणूस म्हणून समाजासाठी आपल्या वैद्यकीय ज्ञानाचा उपयोग करण्यात आनंद मानत असतात.आपले विधित कार्य करत असताना डॉक्टर लोकांना ही समाजाने त्यांच्या विषयी काही भावना जपाव्यात असे वाटले तर त्यात गैर काहीच नाही.

पुण्यातील अनुभवी,ज्येष्ठ व प्रथितयश स्री रोग तज्ञ डॉ. निशिकांत श्रोत्री हे मान्यवर साहित्यिक ही आहेत.त्यांनी स्वतःच्या भावना “माणूस”या कवितेतून व्यक्त केल्या आहेत.

आज या कवितेचा आस्वाद घेऊ या. त्यातील भाव भावना, कवितेतील आंतरिक तळमळ ,कळकळ समजून घेऊ या. त्यातून कवीचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही आपल्याला समजून येणार आहे.

☆ माणूस ☆

*

नका देऊ देवत्व मजला म्हणू नका राक्षस

भावभावनांतुन हिंदोळत साधा मी  माणूस

*

माझे ते जवळी होते अपुले जाणून

कोणाला ना दूर लोटले परके मानून

सेवा हे तर ब्रीद मानले आशा नाही फलास

कधि सावरलो कधी घसरलो परी ना हव्यास

*

देवपूजा करीत आलो मनात ठेवुन भक्ती

मानवसेवा माधवसेवा नाही मनी विरक्ती

मानवतेला कर्म जाणुनी मानिली न तोशीस

भुकेजल्या पाहुनी भरविला मम मुखीचा घास

*

निज आत्म्याचे दर्शन मजला सकलांच्या अंतरी

परमात्म्याची जाण काही नाही मजला जरी

सकल जनांच्या नेत्री मोद बघण्याचा ध्यास

अन्य काही आशा नाही रुचली मन्मनास

©️ डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

रसग्रहण

“माणूस” हे कवितेचे शीर्षक कवितेचा विषय व आशय अगदी सुस्पष्ट करते. त्यामुळे वैयक्तिक माणूस म्हणूनही या कवितेशी आपला संबंध सहजपणे जुळून येतो. डॉक्टर श्रोत्रींनी जीवनाशी संबंधित अनेक भावनांना त्यांच्या कवितांमधून स्पर्श केला आहे .आज माणूस या कवितेतून ते त्यांच्या स्वतःविषयीच्या /स्वतःच्या मनातल्या भावना आपल्यासमोर मांडत आहेत. कवी पेशाने स्त्रीरोगतज्ञ आहेत .

अनेक स्त्रियांच्या प्रसुतीचे वैद्यकीय कार्य डॉक्टर या नात्याने त्यांनी  समर्थपणे पार पाडले आहे. अनेक वेळेला अडल्या-नडल्यांचे ते जणू देवच ठरले असतील किंवा तसे भासले असतील. तसेही वैद्यकीय

व्यवसाय हा संपूर्णपणे माणसाच्या जीवनाशी थेट निगडित असल्याने डॉक्टरांकडे “पृथ्वीवरील देव” या भूमिकेतून आपण  सर्वसामान्य जण बघत असतो. खरंतर असे देवत्व बहाल झाले असता /लाभले असता कुणी ही माणूस सुखावून जाईल,आनंदून जाईल.परंतु सत्याशी प्रामाणिक असलेला आणि जाणीवेने जाणींवाविषयी आणि जाणिवांशी बध्द असलेला डाॅ. श्रोत्री सरांसारखा कवी  माणूस या भूमिकेशी फारकत घेताना दिसतो.या विषयीचे विचार अत्यंत स्पष्टपणे कवीने कवितेतून मांडले आहेत.

नका देऊ देवत्व मजला म्हणू नका राक्षस

भावभावनांतुन हिंदोळत साधा मी  माणूस

मी केवळ डॉक्टर आहे म्हणून मला देवत्व बहाल करू नका असे कवी स्पष्ट करत आहे . कवी पुढे म्हणतो की कदाचित काही लोक ,काही माणसे यांच्या मते ते (डॉक्टर किंवा माणूस म्हणून ) राक्षस किंवा दानव ही असू शकतील. कारण काही वेळेला रुग्णाच्या भावनेशी ,परिस्थितीशी डॉक्टरांना काही घेणे दिले नसते असे समजणारे ही खूप लोक समाजात वावरत असतात. त्यांच्याकडे निर्देश करून कवी म्हणतो की असे जर वाटत असेल तर मला राक्षस मात्र म्हणू नका. मी देवही नाही व राक्षस ही नाही. तर मी एक सर्वसामान्य माणूस आहे ज्याने वैद्यकीय ज्ञान प्राप्त केले आहे .व त्या ज्ञानार्जनामुळे  वैद्यकीय व्यावसायिक म्हणून समाजात वावरत आहे, त्या दृष्टीने कार्यरत आहे. कवी पुढे म्हणतो की मी  सर्वांसारखाच भावभावनांच्या हिंदोळ्यावर  झुलणारा माणूस आहे.चांगले /वाईट ,भले /बुरे अशा भावनांना सामोरे जाणारा मी ही एक सर्वसामान्य माणूस आहे हे  अत्यंत स्पष्टपणे मान्य केले आहे..द्विधा मनस्थितीचा कदाचित खुद्द कवीला सामना करावा लागलेला असू शकतो हे सूचित केले आहे. मनात आलेल्या/ उद्धवलेल्या भावनांचा प्रांजळपणे / प्रामाणिक पणे स्वीकार करणे /ते मान्य करणे यासाठी मनाची एक विशिष्ट धारणा लागते ती या कवितेतून आपल्याला प्रत्ययास येते. खरंतर ही भावना व्यक्त करून कवीने आपण एक चांगला माणूस आहोत हे जाणवून दिले आहे. अशाप्रकारे देव नाही व राक्षस नाही परंतु एक अतिशय निरपेक्ष भावनेने वैद्यकीय क्षेत्रात काम करणारा माणूस म्हणून समाजाने आपल्याकडे पहावे अशी माफक अपेक्षा कवीने या ध्रुवपदातून व्यक्त केली आहे. ती सूज्ञ माणसाला नक्कीच रास्त वाटेल.

माझे ते जवळी होते अपुले जाणून

कोणाला ना दूर लोटले परके मानून

सेवा हे तर ब्रीद मानले आशा नाही फलास

कधि सावरलो कधी घसरलो परी ना हव्यास

कवितेच्या पहिल्या कडव्यातून कवी म्हणतो/ आपल्याला सांगतो की अपुले ज्यांना जाणले म्हणजे जे कवीला आपले वाटले व ज्यांना कवी आपला वाटला ते लोक कवीच्या नेहमीच जवळ होते. “अपुले” या शब्दावरील हा श्लेष अतिशय समर्पक आणि कवितेतील आशयाला पुष्टी देणारा. कवी मनाची प्रगल्भता व साहित्यिक जाण नेमकेपणाने दाखवणारा ही!!

कवीने सर्वांना अपुले जाणून जवळ केले, कुणालाही परके म्हणून दूर लोटलेले नाही . सर्वांना आपले मानून सर्वांशी एकसमान व्यवहार केला. त्यांना वैद्यकीय सेवा प्रदान केली ती रुग्ण आणि डॉक्टर या भावनेने व माणूस व माणुसकीच्या नात्याने सुध्दा.. हे सर्व करण्याचे  कारण म्हणजे समाजातील गरजू लोकांची सेवा हेच जीवन असे ब्रीद कवीने मानले आहे. अशा वेळी सेवा करेल त्याला मेवा मिळेल अशा आशयाची वृत्ती मात्र कदापी मनात ठेवलेली नाही .फळाची आशा मनात कधीच धरली नाही.”आशा नाही फलास” मधील दुसरा श्लेषात्मक अर्थ असा  की फळाला आशा लाभली नाही. कदाचित गरजू लोकांनी कवीच्या मनातील वैद्यकीय व्यावसायिक व माणूस म्हणून जगण्याची भावना जाणली नाही .तशा प्रकारे कधीतरी निराशाही वाट्याला आली असावी .कवी प्रांजलपणे कबूल करतो अशा वातावरणाचा/परिस्थितीचा सामना करावा लागला तेव्हा कधी तरी कवी त्याच्या निरलस मनोवृत्ती पासून दूर झाला.लोकांच्या वागणूकीने बैचेन झाला.तरी ही त्याने कुणाकडून कसली ही अपेक्षा केली नाही.त्याच्या ब्रीदापासून/ ध्येयापासून तो कधी थोडा  घसरला असला तरी बाजूला सरला  नाही.व कुठल्याही प्रकारचा हव्यास  मनात ठेवलेला नाही. निरपेक्षपणे /तटस्थपणे आपले सेवेचे कार्य कवीने अव्याहत चालू ठेवले.वर उल्लेख केल्याप्रमाणे या कडव्यात योजलेले दोन ठिकाणचे श्लेष अलंकार व जाणून,मानून तसेच फलास, हव्यास मधील यमक सुंदर तऱ्हेने  जुळले आहे.साहजिकच यामुळे कवितेला लाभलेली नादमयता मनाला मोहविते.अतिशय साधे,सहज सोपे शब्द पण अर्थ आशयपूर्ण आहे.

देवपूजा करीत आलो मनात ठेवुन भक्ती

मानवसेवा माधवसेवा नाही मनी विरक्ती

मानवतेला कर्म जाणुनी मानिली न तोशीस

भुकेजल्या पाहुनी भरविला मम मुखीचा घास

उच्च शिक्षण घेतले आहे किंवा माणसाला जीवनदान देण्याचे पुण्य किंवा मह्तकार्य करतो आहे अशी भावना मनात येऊन स्वतः देव असल्याची भावना कवीच्या मनात कधीच डोकावली नाही.करता करविता देव आहे ,जी अदृश्य शक्ती आहे तिच्या प्रती त्याने मनोमन श्रद्धा जपली आहे. त्याची मनापासून पूजा केली, त्यामागील खरा भक्ती भाव जपून ,जाणून व ठेवून .हे सर्व केवळ उपचार म्हणून नव्हे. स्वतःचे नेमस्त काम करता करता ते करण्याची प्रेरणा देणारा, ताकद देणारा जो ईश्वर त्याच्या प्रती अगदी मनोमन, खरेपणाने श्रद्धा भाव कवीने जपलेला लक्षात येतो.

मानव सेवा करता करता माधव सेवा म्हणजे कृष्ण सेवा/ कृष्णाची भक्ती ही केली.मानवसेवा हीच माधवसेवा म्हणजे ईशसेवा ही भगवान श्री सत्यसाईबाबांची सुप्रसिद्ध शिकवण कवीने आचरणात आणली आहे.पण महत्वाचे म्हणजे हे करताना मनाला विरक्तीची भावना मात्र जाणवली नाही.माणूस म्हणून जगण्याची ही प्राथमिक जाणीव कवीने  कसोशीने पाळली. रुग्ण सेवा करताना जरी कधी काही निराशा जनक प्रसंग उद्भवले असले तरीही त्यापासून दूर होण्याचा विचार चुकून सुद्धा कवीच्या मनात आलेला नाही. त्या क्षेत्रापासून/ त्या व्यवसायापासून विरक्ती घेण्याचा विचार कधीच मनात आलेला नाही. विरक्ती या शब्दावरील श्लेषही अतिशय सुंदर . आध्यात्मिक विरक्ती व व्यावसायिक विरक्ती असे हे दोन अर्थ अतिशय चपखलपणे येथे कवीने मांडलेले आहेत. त्यातील भावार्थाची सखोलता मनाला स्पर्शून उरणारी. व्यावहारिक पातळीवरील जीवन जगण्याचा आटोकाट व प्रामाणिक प्रयत्न कवीने केला आहे हे सहजपणे लक्षात येते.मानवतेला कर्म मानल्यामुळे त्या प्रतीचे कर्तव्य निभावताना कुठल्याही प्रकारची वेगळी तोशीस स्वतः ला लागत आहे अशी भावना कधीही कवीच्या मनात उद्भवलेली नाही. मानवतेचे कर्म हा कवीच्या जीवनाचा धर्म बनला.

“भुकेजल्या पाहुनी भरविला मम मुखीचा घास” या चरणातील “भुकेजल्या” या शब्दावरील श्लेष अतिशय मार्मिक व मर्मभेदी आहे. भुकेजला म्हणजे केवळ अन्नाच्या दृष्टीने नव्हे तर जो गरजवंत आहे, जो गरजू आहे ,ज्याला कुठल्या तरी प्रकारची भूक आहे तो भुकेजला असा व्यापक अर्थ येथे अभिप्रेत असावा असे वाटते. या ठिकाणी वैद्यकीय व्यवसायातील सेवेची ज्याला गरज आहे तो भुकेजला.. अशा व्यक्तिला सेवा तर दिलीच पण वेळ प्रसंगी स्वतःच्या मुखातील घासही भरवला. “मुखातील घास “या शब्द योजनेतील श्लेष ही अतिशय समर्पक आहे व विलक्षणही आहे. लौकिक अर्थाने “मुखीचा घास” म्हणजे कुणा गरजवंताला /भुकेल्या व्यक्तिला खायला देणे. असे करताना कदाचित देणाऱ्याला स्वतःच्या तोंडचा घास काढून भुकेल्या व्यक्तिला द्यावा लागेल.

येथे या बरोबरच दुसरा अर्थ असा की जी वैद्यकीय सेवा रुग्णाला प्रदान करुन  कवीने त्या बद्दलचा मोबदला म्हणून अर्थार्जन केले असते व त्याला स्वतःच्या व त्याच्याशी संबंधित इतरेजनांच्या मुखात घास घालता आला असता तो त्याने बाजूला सारला/ त्यागला म्हणजे मोफत रुग्णसेवा देली.

या दुसऱ्या कडव्यात ही वर निर्देश केलेले श्लेष अलंकार उत्तम. भक्ती, विरक्ती आणि तोशीस,घास मध्ये  यमक छान साधले आहे.

मानवसेवा,माधवसेवा मधील “मा”चा अनुप्रास लक्षवेधी आहे.साध्या , सोप्या व सुयोग्य साहित्यिक अलंकारांच्या वापरातून कवीने त्याच्या मनातली भावना अतिशय उच्च प्रतीवर नेऊन ठेवलेली आहे.

निज आत्म्याचे दर्शन मजला सकलांच्या अंतरी

परमात्म्याची जाण काही नाही मजला जरी

सकल जनांच्या नेत्री मोद बघण्याचा ध्यास

अन्य काही आशा नाही रुचली मन्मनास

तिसरे कडवे म्हणजे आचरणातली व आचरणाची परिसीमा ठरेल अशी.कवीने ही  भावना स्पष्ट पणे विशद / व्यक्त केलेली जाणवते. स्वतःच्या आत्म्याचे जो खरतर अदृश्य आहे पण त्याची जाण आहे आणि जो प्रत्येकाला प्रिय आहे  त्याचे दर्शन कवीला सगळ्यांच्या अंतरी झाले. सगळ्यांच्यात त्याने स्वतःला पाहिले . स्वतःचा  आत्मा प्रत्येकाला सर्वात जास्त प्रिय असतो.त्या विषयीची भावना /आसक्ती वेगळीच असते.तो भाव, तसे प्रेम इतरांच्या आत्म्यात पाहणे हे खरं तर दुरापास्त.. सर्व साधारणतः कुणी तो विचार ही करणार नाही.परंतु कवीने मात्र जाणीवपूर्वक तो विचार केला व प्रत्यक्षात आणण्यासाठी जीवाचे रान केले.अर्थात स्वतः कवी व इतरेजन यांच्यात भेदभाव केला नाही.स्वत:ला स्वतः साठी जे अपेक्षित असते तोच भाव आ‌जूबाजूच्या , संपर्कात आलेल्या लोकांसाठी ठेवला असा भावार्थ. इतरांच्या अस्तित्वाशी, त्यांच्या भाव भावनांशी अतिशय प्रामाणिक पणे तो समरस होऊन गेलेला आहे.हे सर्व घडताना कवी मान्य करतो की त्याला परमात्म्याची /ईश्वराची जाण जराही नाही. म्हणजे ईश्वराविषयी /त्याच्या अस्तित्वाविषयी त्याला ज्ञान नाही हे कबूल करण्याचा प्रामाणिकपणा कवीने बाळगला आहे /दर्शवला आहे.परोपकारी वागण्याने इतरांना आनंद दिल्याने परमात्मा प्राप्त होतो ,मोक्ष मिळतो अशी जन सामान्यांची समजूत असते.प्रत्यक्षात असे होते का, परमात्मा खरंच अस्तित्वात आहे का याची जाणीव कवीला नाही . अर्थात कवीने अशा प्रकारचा कुठला मोह मनात बाळगला नाही.स्वत:चा लाभ ही कल्पना ही कवीच्या हृदयात नाही.केवळ सद्भाव व  विवेकी विचारांना प्राधान्य देणे हे कवीने महत्वाचे मानले आहे.सर्वांच्या डोळ्यात आनंद बघणे ,सर्वांना सुखी बघणे हाच एक ध्यास कवीच्या मनाने घेतलेला आहे .इतर कसलीही आशा नाही .धन, संपत्ती, पैसा अडका, कीर्ती, प्रसिद्धी त्याच्या मनाला रुचलेली नाही .त्यांची आस नाही.केवळ या साऱ्या गोष्टींकडे पाहून कवीने रुग्णसेवेचे व्रत आचरले नाही.स्वत:च्या कृतीने दुसऱ्या च्या डोळ्यात आनंद पाहणे हा सर्वश्रेष्ठ आनंद आहे अशी कवीची मनोधारणा आहे.आयुष्यभर जतन केलेले तत्वज्ञान कवीने अंत:करणापासून आचरणात आणले आहे.विचाराला आचाराची जोड दिली आहे. “निज आत्म्याचे दर्शन मजला संकलांच्या अंतरी” हा चरण वाचताना श्री शंकराचार्यांनी विशद केलेला अद्वैतवाद प्रकर्षाने आठवतो.मी व समोरची व्यक्ती ही मीच अशी भावना/भूमिका कवीने निरंतर मनात जाणीवपूर्वक जपलेली आहे.व महत्वाचे म्हणजे तसेच आचरण ही कायम केले आहे.ते ही कुठल्याही प्रकारची स्वार्थ भावना मनात न ठेवता!! तसेच दुसरा श्लेषात्मक अर्थ आत्मा व परमात्मा ही एकच आहेत. त्यांच्या अस्तित्वाचा अद्वैत भाव कवीने जाणला आहे.म्हणून कवी स्पष्ट करतो की त्याला परमात्म्याची कुठल्याही प्रकारे जाण जराही नाही.कारण कवीने स्वतःचा आत्मा परिपूर्ण परिपक्व पध्दतीने जाणला आहे.त्या विषयी कसलाही, कुठलाही संदेह अगदी कणभर सुध्दा त्याच्या मनात नाही.त्यामुळे आत्म्याला जे योग्य वाटते,पटते ते कवी मनापासून करतो आहे.त्या आत्म्याला दुसऱ्याच्या डोळ्यातील आनंद पहाण्यात आनंद/मोद होत असल्याने त्याच्या वागण्यात बदल होत नाही.स्वत:च्या आनंदाच्या शोधात व तो प्राप्त करण्यात कवी मनापासून प्रयत्न करत आहे.असे वागताना साहजिकच दुसऱ्या आत्म्याला/परमात्म्याला (पर -दुसरा)ही आनंद लाभणार याची कवीला खात्री आहे.इतरे जनांना आनंद देताना आत्म्याला परमोच्च आनंद मिळणार हे कवी जाणून आहे.

या तिसऱ्या व अंतिम कडव्यात योजलेले श्लेष,यमक अलंकार अतिशय परिणाम कारक आहेत.कवितेतील भावनेला वाचकांपर्यंत समर्थ पणे पोहचवितात.

माणूस या संकल्पनेशी बांधिलकी जपत कवीने आयुष्यात आपला मार्ग कसा अनुसरला व त्यानुसार निरंतर मार्गक्रमणा केली हे या कवितेत सांगितले  आहे. स्वतःच्या जगण्याबद्दलचे व त्याविषयीच्या दृष्टिकोनाचे स्वरूप साध्या ,सुलभ पण तरीही परिणामकारक शब्दात कवीने व्यक्त केले आहे. जगण्याचा आशावाद आणि आदर्शवाद जपताना कवीने स्वतः एक आदर्श घालून दिला आहे असे वाटते, नव्हे  खात्री पटते.अशा पद्धतीने प्रत्येक व्यक्ती/माणूस जर खऱ्या अर्थाने माणूस म्हणून जगला तर साऱ्या मानव जातीचे कल्याण/ हित व तदनुषंगिक संपूर्ण समाजाचे कल्याण होईल हे निर्विवाद. डॉक्टर श्रोत्री यांच्यासारख्या वैद्यकीय व्यावसायिक व्यक्तीने कर्म करताना त्यातील धर्म भाव सश्रद्ध भावनेने  कसा जगावा/जपावा याचा वस्तुपाठ घालून दिला आहे.वैद्यकीय व्यावसायिक व्यक्ती, जागरूक  कवी मन व या दोन्ही गोष्टींचा सुरेख संगम या कवितेत आपल्याला दिसून येतो..

जगण्याचा परिपूर्ण पाठ देणारी व आयुष्याला दिशा देणारी अशी ही कविता आहे. ही सर्व स्तरावर नक्कीच पोहोचली पाहिजे असे वाटते.

मला येथे आवर्जून एक निरीक्षण/मत नोंदवायचे आहे.रसग्रहणासाठी जेव्हा ही कविता पहिल्यांदा वाचली तेव्हा साधी, सोपी वाटली.तेव्हा  यात एवढा खोल व गहन अर्थ सामावलेला आहे हे लक्षात आले नाही.परंतु जसं जसं रसग्रहण लिहायला सुरुवात केली तेव्हा यात मांडलेला जीवनाचा /जीवन विषयक दृष्टीकोनाचा पैस ध्यानात आला..वरवर साधी वाटणारी ही कविता तिच्या अंतरंगात शिरल्यावर किती प्रांजळ, सुसंगत, सुसंवादी, सुसंस्कृत विचार धारा उलगडून दाखविणारी आहे हे लक्षात आले.ही जाणीव या कवितेचे बलस्थान आहे हे मुद्दाम नमूद करावेसे वाटते.चांगल्या/उत्तम काव्याचे हे यश आहे हे निश्चित.. अर्थात याचे सर्व श्रेय कवीला!!

© सुश्री नीलिमा खरे

१४-६-२०२४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ भिंगरी घर… – सौमित्र ☆ रसग्रहण – श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? काव्यानंद ?

☆  भिंगरी घर… – सौमित्र ☆ रसग्रहण – श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

आज आपण एक आगळीवेगळी कविता या ठिकाणी पाहणार आहोत… जीवन स्थिर नसतं,पण आपल्याला स्थैर्य हवं असतं… तुम्ही आम्ही सर्व जण कधीच एका जागी स्थिर असत नाही… सतत फिरते … प्रगती विकास च्या नावाखाली हलत राहतो… कधी स्वता तर कधी दुसरा आपल्याला हलवत असतो… गती देत असतो… जशी गती मिळते तेव्हढं आपण स्वता भोवती गिरकी घेत राहतो..

स्वताच्या पायावर उभे राहतो काही क्षण… गती संपताच आपण कलडूंन पडतो..पायाच नसल्या सारखं… एखादी भिंगरी सारखं…. होय आपण ओळखलंत .. कवि सौमित्र यांची भिंगरी घर या कवितेबद्दल बोलतोय…

☆ भिंगरी घर ☆

आधी घर छोटं होतं म्हणून तू बाहेर झोपायचास

नंतर डोक्याला शांतता हवी म्हणून बाहेर असायचास

*

मग गेले वडील तेव्हा त्यांची जागा तुझी झाली

काही दिवसांनी भावाचं लग्न,त्याची बायको घरात आली

गुपचुप उचललास बिछाना आणि हळुच देऊळ गाठलंस

फुटपाथ रस्ता देऊळ दुकान यानांच आपलं मानलंस

*

अचानक मग अधून मधून तू शहराबाहेर जायचास

एकटा एकटा एकटा फिरून पुन्हा परत यायचास

*

पैसे देऊन हक्काची जागा हाॅटेलमधे शोधायचास

काही दिवस काही रात्री काॅंफीडंटली वागायचास

*

एक दिवस प्रेमात पडलायस असं कुठुन कळलं

तुझं सारंच आठवलं अन् काळीज उगाच जडलं

*

एका जागी स्थिरावणार,तू याचंच हायसं वाटलं

शेवटी एकदाचं तुझ्या हक्काचं कुणी तुला भेटलं

*

आणि मग तू लग्न केलंसन घर घेतलस स्वत:च

खरंच खूप छान केलंस,ऐकलंस फक्त मनाचं

*

मग एक दिवस आई म्हणाली,’घर मोठ्ठं आहे तरी?’

तुझी बायको म्हणते,तू अधूनमधूनच असतोस घरी?

*

अंग थरथर कापू लागलं जीभ माझी कोरडली

आईनं हातात पट्टी घेतली,आई माझी ओरडली

*

सांग…सांग तुझी जागा तू कुठे जाऊन फेकलीस?

अशी कशी भिंगरी बाळा पाया लावून घेतलीस?

… छोट्या घरात राहणाऱ्या मोठ्या कुटुंबाची कहाणी… झोपायची अडचण … वडीलधारी मंडळी घरी झोपावीत म्हणून बाहेर झोपणारा मी सतत दुसऱ्याची सोय बघत गेलो… वडील गेले नि घरात जागा झाली हक्काची काही क्षणाची… भावाने लग्न केले मुहूर्तावर बायको आली घरी नि माझी वरात फिरून दारी…पाहता पाहता त्या निरंकुशतेच्या कुशीत शिरलो… तिनं दाखवले ते आकर्षणाचं जगं… एक जागा अशी राहिली नाही सतत बदलत गेलो… फुटपाथ रस्ता देऊळ दुकान सगळा फुकटचा आणि उघडयावरचा कारभार… मग शहाराची लागली चटकं.. ते सुख सुखासुखी सोडवत नव्हते… कधी खिसा गरम असला तर चार पैसे टाकून हाॅटेलच्या गादीवर रात्र काढू लागलो बिनधास्त…

… प्रेमाचं बिंग फुटलं,.. आईला बरंच वाटलं..चंचलेला लगाम बसेल .. मी स्थिर होईन हि आशा वाटली… हक्काची सावली मिळणार होती… लग्न हि झालं तसं स्वताच घरही झालं… आता भिरभिरणाऱ आयुष्य संपलं असं त्यांना वाटलं…. पण ते माझं मन मला कासाविस करू लागलं… हक्काचं ते असून बाहेरचं सुख सुखासुखी सोडवत नव्हते…बायकोची तडफड आईला समजली… फैलावर घेत ती मला म्हणाली… घर असताना का भिकेचे डोहाळे लागले…. भिंगरी लावून घर घर का भिरभिरतोस … आता तरी स्थिर हो…

भिंगरीचं घर रुपक  सतत दुसऱ्यानं गती दिली तर फिरते… तेव्हा ती स्वताचं भान हरपते.. स्वताच्या पायावर तोल सा़भाळते स्थिर दिसते पण गती संपताच कलंडून कोलमोडून पडते… पायाच नसल्या सारखी.. अडगळीत पडल्या प्रमाणे…  माणसं भि़गरी सारखी गरगर फिरतात स्वताच्या जीवनामध्ये … स्थैर्य हवं असतं म्हणून… कुणाला लाभलं असं वाटतं तर कुणाला नाही … साराच भासआभासाचा खेळ असतो तो….

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ विरुपा…. कवयित्री – सुश्री आश्लेषा महाजन ☆ रसग्रहण – सुश्री नीलिमा खरे ☆

सुश्री नीलिमा खरे

? काव्यानंद ?

☆  विरुपा…. कवयित्री – सुश्री आश्लेषा महाजन ☆ रसग्रहण – सुश्री नीलिमा खरे ☆

माझ्या सुदैवानेच कवयित्री आश्लेषा महाजन यांची विरुपा ही कविता वाचनात आली. आणि स्पदनांनी मनातल्या जाणिवा जागृत केल्या. काही विचार मनात आले . मला या कवितेतून जे जाणवले, कळले , समजले  ते मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे.

☆ कविता  – विरुपा ☆

इथे फक्त काळोख डोहातला अन्

फणा कालियाचा विषारी निळा

इथे जीवघेणी मिठी प्राक्तनाची

तथा प्राणमोही व्यथांचा टिळा

*

इथे लौकिकाचा जगद्व्याळ गुंता

तथा संभ्रमांची न येथे क्षती

कसोटी सदाचीच कर्तव्य मूढा

तुझ्या उद्धृतांची कुठे संगती?

*

कधीची उभी अष्टवक्रा विरुपा

तुझ्या दर्शनाचीच तृष्णा खरी

कुठे गुंतला व्यापतापामध्ये तू

कळेना कशी हाय! कुब्जा तरी —

*

तुझ्या पंचप्राणातुनी फुंकलेली

हवी सानिका- सुर -संमोहिनी

किती येरझारे जरी या ललाटी

उपेक्षाच मी जन्महिना कुणी —

*

असू दे तुझी वेद -शास्त्रे- पुराणे

नको त्यातली गूढ अर्थांतरे

हवा मृण्मयी देह बुद्धीस माझ्या

तुझा सावळा मानवी स्पर्श रे!!!

कवयित्री – सुश्री आश्लेषा महाजन

रसग्रहण

आयुष्यात प्रत्येकाला कधी ना कधी परिस्थितीच्या किंवा विचारांच्या वादळाला सामोरे जावे लागते. त्यावेळी सभोवती संपूर्णपणे अंधःकार दाटलेला भासतो. आजूबाजूची प्रत्येक गोष्ट न् गोष्ट त्या अंधाराशी संधान बांधून त्या अंधाराची भयावहता वाढवणारी वाटू लागते .मनाला हतबलता ,अगतिकता ,विवशता या भावनांशिवाय दुसरे काहीच सुचत नाही. संपूर्ण परिस्थिती या अंधाराशी नाळ बांधून आली आहे असे वाटत राहते. या कवितेतील “ती” म्हणजे विरूपा! तिच्या मनातल्या अशा भावनांशी समरस होऊन तिचे मनोगत कवयित्रीच्या संवेदनशील मनातून उलगडू लागते. तिच्या जाणीवांना कवयित्रीने बोलते केले आहे.

विरुपा

इथे फक्त काळोख डोहातला अन्

फणा कालियाचा विषारी निळा

इथे जीवघेणी मिठी प्राक्तनाची

तथा प्राणमोही व्यथांचा टिळा

कवितेचे विरूपा हे शीर्षक अतिशय लक्षवेधी!! कवितेतील आशयाकडे सजगतेने, सूचकतेने बघण्याचे भान वाचकांच्या मनात जागवणारे. या विरूपेच्या अवती भोवती फक्त आणि फक्त काळोखच जाणवतो आहे .कुठेही थोडासाही आशेचा कवडसा ,बदलत्या परिस्थितीचा किरण दृष्टिक्षेपात येत नाही. हा काळोख ही असा तसा नाही तर डोहातला. परिस्थितीचे गांभीर्य जाणवून देणारा.. अगम्य , गूढ वातावरण निर्माण करणारा—-अशा या गूढ डोहात दाटलेला काळोख न हलणारा, अचल असा. त्यात काहीही बदल होणार नाही याची जणू ग्वाही देणारा ..आशावादास तिलांजली देणारा हा काळोख पुरेसा नाही म्हणूनच की काय तेथे कालिया ही  आपला विषारी निळा फणा उभारून तयार आहे. तिला डसण्याचा ,दंश करण्याचा निग्रही निर्धार/विचार त्याच्या मनात आहे. हा काळोख, कालियाचा दंश नशिबात लिहिलेलाच आहे.मनात दहशत निर्माण करणारा आहे.कारण या डोहातुन तरुन जाण्यासाठी आवश्यक असलेली प्राक्तनाची मिठी /प्राक्तनाची साथ ही आधाराची नसून केवळ जीवघेणीच आहे.अर्थात दैवाची हवीहवीशी वाटणारी साथ मिळणार नाही याची जाणीव झाली आहे.

संपूर्ण आयुष्याला प्राणमोही /प्राणघातक व्यथांचा टिळा लाभलेला आहे.कुठून ही कुणाची ही कसली ही मदत नाही हे स्पष्टपणे दिसून आले आहे.त्यातून सुटका कशी आणि कुणी करावी?? हा प्रश्न अनुत्तरित राहणार याची खात्री होते.

इथे लौकिकाचा जगद्व्याळ गुंता

तथा संभ्रमांची न येथे क्षती

कसोटी सदाचीच कर्तव्य मूढा

तुझ्या उद्धृतांची कुठे संगती?

लौकिकार्थाने जगताना जगव्यापी गुंत्याचा सामना करावाच लागतो .असे करताना मनाला पडणाऱ्या संभ्रमांनाही इथे क्षती नाही,अंत नाही. ते क्षितिजापर्यंत पसरलेले आहेत .ते वारेमाप ,अपरंपार आहेत. समजूतींना भेद व छेद देणारे आहेत .त्या संभ्रमांना सोडून व आपलेसे करून जगण्याचे ठरवले तर कर्तव्यदक्ष व कर्तव्य मूढ मनाची कसोटी ही सदाचीच आहे. कर्तव्यदक्ष मन हे बरेचदा कर्तव्याच्या मूळ व मूढ कल्पनेशी परंपरेने व पारंपरिकतेने गुंतले जाते हे सत्य ही कवयित्रीने स्पष्ट केले आहे. या सर्वाला अपवाद विरळाच!! देवावर श्रद्धा असणाऱ्याने त्याच्या (देवाच्या) वचनांचा /बोलांचा आधार घ्यावा म्हटले तर त्याचीही संगती न लागण्या सारखी परिस्थिती दृष्टीस पडते .त्याच्या वचनांची संगती आजूबाजूच्या परिस्थितीशी मेळ साधत नाही . किंबहुना बरेचदा फारकतच दिसून येते .अशा वेळी सर्व बाजूने विवश झालेली अष्टवक्रा विरुपा मात्र कधीची ताटकळत उभी आहे त्याच्या दर्शनाच्या प्रतीक्षेत!! तिच्या मनाला आणि मनात त्याच्या दर्शनाची आस आहे . तिला त्याच्या रुपाची ओळख व्हावी याची तहान, तृष्णा लागलेली आहे .आणि जगात इतर बाबी जरी भ्रामक असल्या तरी तिची आस ही मात्र एकमेव खरी गोष्ट आहे हे ती ठासून सांगते आहे. बाकी सारे संभ्रमाचे राज्य याची जाणीव ती करून देते. तिच्या प्रतिक्षेला अजूनही फळ आलेले नाही, त्याचे प्रत्यक्ष दर्शन तिला झालेले नाही. त्यामुळे ती म्हणते की जगाच्या व्यापा-तापामध्ये तू गुंतलेला आहेस ,गुंतून पडला आहेस .अशावेळी माझ्यासारख्या विरूपेचे/कुब्जेचे अस्तित्व ,तिचे मन तुला कसे कळणार ?अशी कुणी “एक” आहे याचे भान तरी तुला कसे असणार? हे सर्व जाणूनही ती त्याला त्याच्याकडून तिला जे काही हवे आहे ते स्पष्टपणे सांगण्याचा प्रयास करते.

तुझ्या पंचप्राणातुनी फुंकलेली

हवी सानिका- सुर -संमोहिनी

किती येरझारे जरी या ललाटी

उपेक्षाच मी जन्महिना कुणी —

तिच्या मनातल्या “त्याने” मनापासून अगदी पंचप्राण लावून फुंकलेल्या बासरीतून उमटलेल्या सुरांची संमोहिनी तिला हवी आहे ,ती तिला खुणावते आहे. तिला इतर काहीही नको. त्या सूर संमोहिनीत तिला तिचा जीव ,तिचे अस्तित्व विसरायचे आहे. तिला त्या सुरांच्या अस्तित्वात तिचे अस्तित्व मिसळून टाकायचे आहे .तिला कल्पना आहे की हे सारे अगदी सोपे, सहज नाही .यासाठी तिच्या ललाटी किती जन्म लिहिले असतील कोण जाणे !ही सुर संमोहिनी लाभण्याकरता तिला अनेक जन्म घ्यावे लागतील ही!! कदाचित नुसत्या येरझारा ही घालाव्या लागतील आणि तरीही हाताला काहीच लाभणार नाही. “जन्म हिन कुणी “असे आणि हेच वास्तव तिच्या नशिबी असेल .त्या सूर संमोहिनीचे सौभाग्य तिला लाभणारं ही नाही कदाचित..

असू दे तुझी वेद -शास्त्रे- पुराणे

नको त्यातली गूढ अर्थांतरे

हवा मृण्मयी देह बुद्धीस माझ्या

तुझा सावळा मानवी स्पर्श रे!!!

जीवनातील साऱ्या सत्याला सामोरे जाण्याची तिच्या मनाची तयारी आहे.. सर्व जाणूनही ती त्याला म्हणते वेद ,शास्त्र , पुराणे यातील तत्त्व, वचने, त्यातील ईश्वराचे अस्तित्व, जगण्याचे तत्वज्ञान, द्वैत अद्वैताची विस्तृत चर्चा, त्याचे अनुभव, गूढ गर्भित अर्थ तसेच, त्यांच्या अर्थांतरात तिला  स्वारस्य नाही.मत मतांतरे जाणून घेण्याची तिला अजिबात आस नाही .या सर्व ज्ञानाचा मोह तिला अजिबात नाही. मातीत मिसळणाऱ्या तिच्या नश्वर देह बुद्धीला मात्र आस आहे ती तिला भावलेल्या त्या सावळ्या रूपा सारखी वर्तणूक असणाऱ्या मानवी स्पर्शाची.. अर्थात वेद,शास्त्रातले तत्त्वज्ञान कागदोपत्री न राहता ते प्रत्यक्षात आचरणाऱ्या, ते जगणाऱ्या मानवाची. केवळ कल्पना ,संकल्पना यात अडकून न राहता जगण्याचे प्रत्यक्ष भान असणारा मानवी स्पर्श तिला हवा आहे . कुब्जा /विरूपा हे प्रतीक आहे प्रत्येक मानवाच्या मनाचे .त्याला सूज्ञ व सम्यक विचारांनी जगणाऱ्या मानवाचीच प्रतीक्षा आहे . दुर्दैवाने ते दुर्मिळ आहे असे वाटते. माणसाने माणसातच देव शोधावा, पहावा आणि तो सुदैवाने त्याला मिळावा यासारखे सद्भाग्य ते कोणते! हा सारा मला वाटलेला अर्थ आहे. तो व्यक्त करावासा वाटला मनापासून इतकेच ..

ही कविता वाचकांना अंतर्मुख करते ,विचार करायला लावते. कुठेही ,काहीही स्पष्टपणे न सांगता किंवा त्याकडे निर्देशही न करता अपेक्षित परिणाम साधणारी ही कविता मनाला भुरळ घालते हे मात्र नक्की. त्याची वृत्तबद्धता ,समर्पक शब्दांची योजना त्या कवितेला लय ताल आणि गेयता ही प्राप्त करून देते हे विशेष.

© सुश्री नीलिमा खरे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares