ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ ६ जून – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सौ. गौरी गाडेकर

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ ६ जून – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर -ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

शांता शेळके

शांता शेळके (12 ऑक्टोबर 1922 – 6 जून 2002) या प्रतिभासंपन्न मराठी कवयित्री, लेखिका, अनुवादिका , साहित्यिका , पत्रकार व प्राध्यापिका होत्या.

आचार्य अत्रेंच्या ‘नवयुग’मध्ये 5वर्षे उपसंपादक म्हणून काम केल्यावर त्या अध्यापनाकडे वळल्या. नागपूरमधील हिस्लॉप महाविद्यालय, मुंबईतील रुईया व महर्षी दयानंद महाविद्यालयात त्या मराठीच्या प्राध्यापिका होत्या.

त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे लेखन केले आहे.’कविता स्मरणातल्या’, ‘गोंदण’, ‘तोच चंद्रमा’वगैरेसारखे काव्यसंग्रह, ‘आतला आनंद’, ‘धूळपाटी’ वगैरे ललित लेखसंग्रह,’आंधळी’, ‘ चौघीजणी’, ‘मेघदूत’ वगैरे इंग्रजी/ संस्कृतमधून केलेले अनुवाद, ‘नक्षत्रचित्रे’सारखे व्यक्तिचित्रसंग्रह  अशी त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत.

शांताबाईंनी असंख्य गीते लिहिली.अगदी ‘किलबिल किलबिल पक्षी बोलती’, ‘खोडी माझी काढाल तर’सारखी बालगीते, ‘गजानना श्री गणराया’सारखी भक्तीगीते,  ‘चांदण्या रात्रीतले ते’पासून ‘शारद सुंदर चंदेरी राती’पर्यंत, ‘शालू हिरवा पाच नि मरवा’पासून ‘मध्यरात्रीला पडे तिच्या’पर्यंत, ‘तोच चंद्रमा नभात’पासून ते ‘वादळवारं सुटलं रं ‘पर्यंत विविध प्रकारची, वेगवेगळ्या भावना व्यक्त करणारी गीते त्यांनी लिहिली आणि ती सर्व गीते रसिकांच्या पसंतीला उतरली, त्यांच्या ओठांवर रूळली.

शांताबाईंवर ‘आठवणीतील शांताबाई’, ‘शांताबाई’, ‘शांताबाईंची स्मृतिचित्रे’, ‘शब्दव्रती

शांताबाई’ वगैरे अनेक पुस्तके लिहिली गेली आहेत.

1996साली आळंदीला भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद शांताबाईंनी  भूषवले होते.

शांताबाईंना गदिमा गीतलेखन पुरस्कार, ‘मागे उभा मंगेश’साठी सूरसिंगार पुरस्कार, केंद्र सरकारचा उत्कृष्ट चित्रगीत पुरस्कार ( चित्रपट :भुजंग), साहित्यातील योगदानाबद्दल यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पुरस्कार  इत्यादी अनेक पुरस्कार मिळाले.

शांताबाईंच्या सन्मानार्थ शांता शेळके साहित्य पुरस्कार दिला जातो.

☆☆☆☆☆

रामचंद्र दत्तात्रेय रानडे

गुरुदेव रामचंद्र दत्तात्रेय रानडे (3 जुलै 1886 – 6 जून 1957) हे आधुनिक विद्याविभूषित तत्त्वज्ञ व संत होते.

कर्नाटकातील जमखंडीमध्ये त्यांचा जन्म झाला.

मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण करून त्यांनी पहिली शंकरशेठ शिष्यवृत्ती मिळवली.

एम.ए.(तत्त्वज्ञान)च्या परीक्षेत त्यांना ‘परीक्षकापेक्षा परीक्षार्थीला अधिक माहिती आहे’ असा शेरा मिळाला.

फर्ग्युसन व विलिंग्डन महाविद्यालयातील तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक गंगनाथ झा यांच्या निमंत्रणावरून गुरुदेव रानडे अलाहाबाद विद्यापीठातील तत्त्वज्ञान विभागात अध्यापक म्हणून रुजू झाले. पुढे त्यांनी तिथे अधिष्ठाता व कुलगुरू ही पदेही भूषवली.

गंगनाथ झा यांच्या शब्दांत ‘रानडे लौकिक व पारलौकिक अशा दोन जगात वावरत. म्हणूनच त्यांना ह्याच भौतिक जगात दिव्यानुभूती शक्य झाली.

‘द इव्हॅल्युशन ऑफ माय ओन फिलॉसॉफिकल थॉट्स’चा अपवाद वगळता त्यांनी आपले तत्त्वज्ञान कोठेही न मांडता विविध प्रदेशातील, संस्कृतीतील संतांचे साक्षात्कार अभ्यासून त्यातील साम्यस्थळे दाखवली. ग्रीक व लॅटिन भाषांच्या व्यासंगामुळे व कर्नाटक, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश येथील वास्तव्यामुळे मराठी, कानडी, हिंदी साहित्याच्या परिशीलनामुळे त्यांच्या चिंतनाचा परीघ विस्तारला.

गुरुदेव रानडेंनी विपुल लेखन केले. त्यातील बहुतांश इंग्रजीत आहे. ‘द इव्हॅल्युशन ऑफ माय ओन फिलॉसॉफिकल थॉट्स’, ‘ अ कन्स्ट्रक्टिव्ह सर्वे ऑफ उपनिषदिक फिलॉसॉफी’, ‘द भगवदगीता ऍज अ फिलॉसॉफी अँड गॉड रिअलायझेशन’, ‘ वेदांत :द कल्मिनेशन ऑफ इंडियन थॉट’, ‘ज्ञानेश्वरवचनामृत’, ‘संतवचनामृत’, ‘तुकारामवचनामृत’ इत्यादी अनेक ग्रंथ त्यांनी लिहिले.

‘इंडियन फिलॉसॉफीकल रिव्ह्यू’ हे त्रैमासिक सुरू  करण्यात त्यांचा मोठा वाटा होता.

त्यांचे निंबाळचे समाधिस्थळ अध्यात्म विद्यापीठ म्हणून प्रसिद्ध आहे. अकॅडेमी ऑफ कंपॅरेटिव्ह फिलॉसॉफी अँड रिलीजन ( बेळगाव) ही संस्था त्यांचे आध्यात्मिक विचार पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

गुरुदेवांवर ‘गुरुदेव रानडे :साक्षात्काराचे तत्त्वज्ञान व सोपान’, ‘गुरुदेव रानडे :ऍज अ मिस्टिक’ वगैरे आठ मराठी/इंग्रजी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत.

चरित्रकार शं. गो. तुळपुळे यांनी ‘परमार्थाचे पाणिनी’ या शब्दांत गुरुदेवांचा गौरव केला आहे.

शांताबाई शेळके व गुरुदेव रामचंद्र दत्तात्रेय रानडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना अभिवादन. 🙏

☆☆☆☆☆

सौ. गौरी गाडेकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ :साहित्य साधना, कऱ्हाड शताब्दी दैनंदिनी, विकीपीडिया, मराठी विश्वकोश

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ ५ जून – संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? ई-अभिव्यक्ती -संवाद ☆ ५ जून -संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

लक्ष्मण सिद्राम जाधव   (१९४१ – ५ जून २०१९)

लक्ष्मण सिद्राम जाधव  हे स्टेट बॅंकेत अधिकारी होते. त्र्यं. वि. सरदेशमुख यांची कादंबरी ‘डांगोरा एका नगरीचा’ ची मुद्रण प्रत तयार करताना त्यांना खर्यात लेखनाची वैशिष्ट्ये कळली. त्यानंतर त्यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी ‘होरपळ’ हे आत्मचरित्रात्मक पहिले पुस्तक लिहिले. हे आत्मकथन खूप गाजले. सुनीता दागा यांनी त्याचा ‘दाह’ म्हणून हिंदीत अनुवाद केला. तोही गाजला. त्याबद्दल अनुवादिकेला पुरस्कारही मिळाला. त्यानंतर ‘पराभूत धर्म’, ‘सुंभ आणि पीळ’, ‘मावळतीची उन्हे’ आशा सरस साहित्यकृती निर्माण केल्या.

लक्ष्मण सिद्राम जाधव यांची पुस्तके –

कविता संग्रह

१. केतकीची फुले, २. गुदमरलेले शालीन जगणे, ३. परतीचे पक्षी, ४. पाथेय

किशोर कादंबरिका – तुमचा खेळ होतो पण , शूर जवान

आत्मचरित्र – सूळकाटा ( होरपळच्या पुढचा भाग )

पुरस्कार – १.  महाराष्ट्र शासनाचा चा २०११-२०१२ सालचा आत्मचरित्रासाठीचा लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार ‘होरपळ’ साठी मिळाला.

२.        महाराष्ट्र शासनाचा, दलित साहित्य अण्णाभाऊ साठे पुरस्कार, ‘सुंभ आणि पीळ’ या पुस्तकासाठी २०१४ साली मिळाला.

३.        ‘सुंभ आणि पीळ’ या पुस्तकासाठीच मृत्युंजयकार शिवाजी सावंत पुरस्कार २०१५साली मिळाला.

४.       महाराष्ट्र साहित्य परिषदेचा वा. म. जोशी पुरस्कार ‘सुंभ आणि पीळ’ या पुस्तकासाठी २०१५ मध्ये मिळाला.

५.       सोलापूरचा, डॉ. निर्मलकुमार फडकुले प्रतिष्ठानचा साहित्य सेवा पुरस्कार त्यांना २०१६मध्ये मिळाला.

☆ ☆ ☆ ☆ ☆

ग. ह. खरे ( १०जानेवारी १९०१- ५जून ८५ )

ग. ह. खरे हे महाराष्ट्रातले नावाजलेले इतिहास संशोधक होते. दक्षिणेतील मध्ययुगीन इतिहास, शिवकालीन महाराष्ट्र , महाराष्ट्रातील दैवते, मूर्तिविज्ञान इ. विषयांवर त्यांनी संशोधनात्मक विपुल लेखन केले. त्यांनी मराठी फारसी भाषेतील, ऐतिहासिक काळातील कागदपत्रांची संपादनेही केली.

संशोधकाचा मित्र, मूर्तिविज्ञान, महाराष्ट्राची चार दैवते इ. पुस्तके त्यांनी लिहिली. भारत इतिहास मंडळाचे ते अध्यक्ष होते. त्यांनी मंडळाला २०,००० पोथ्या, ५००० नाणी, १५० चित्रे, ३० ताम्रपट व शेलालेख मिळवून दिले.

पुणे विद्यापीठाने त्यांना १९८४ साली सन्माननीय डी. लिट. पदवी दिली. पुणे विद्यापीठाच्या इतिहास विभागातर्फे डॉक्टरेट पदवीसाठी मार्गदर्शक व परीक्षक म्हणूनही त्यांनी काम केले.

लक्ष्मण सिद्राम जाधव व ग. ह. खरे यांचा आज स्मृतीदिन. त्या निमित्त त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. ? 

☆ ☆ ☆ ☆ ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गूगल विकिपीडिया

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ ४ जून – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ ४ जून – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

 १९ व्या शतकातले प्रसिद्ध भाषांतरकार व कवी रावसाहेब गोविंद वासुदेव कानिटकर यांचा आज स्मृतिदिन. 

( ९/१/१८५४–४/६/१९१८ ). 

काही वर्षें मुंबई उच्च न्यायालयात वकील म्हणून, आणि नंतर सरकारी न्यायालयात मुन्सफ म्हणून कार्यरत असणारे   

रावसाहेब कानिटकर हे उत्तम अनुवादक आणि कवी तर होतेच, आणि त्याचबरोबर चित्रकला आणि संगीत या कलांचेही ज्ञाते होते. १९०६ साली पुण्यात भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. 

त्यांची अनुवादित पुस्तके अशी—-

मॅक्समुल्लर यांच्या “ Origin and growth of religion “ या पुस्तकाचा मराठी अनुवाद – सन १८८३. 

शेक्सपिअरच्या “ हॅम्लेट “ या प्रसिद्ध नाटकाचा – “ वीरसेन “ किंवा “ विचित्रपुरीचा राजपुत्र “ या नावाने अनुवाद – सन १८८३. 

शेक्सपिअरच्याच -“ टाईमन ऑफ अथेन्स “ , “ कोरिओलेनस “ , आणि “ मर्चंट ऑफ व्हेनिस “ या नाटकांचेही मराठी अनुवाद . 

जॉन स्टुअर्ट मिलच्या “ Subjection of women “ या पुस्तकाचा -” स्त्रियांची परवशता  “ या नावाने अनुवाद –

 सन १९०२ . 

“ गीतांजली “– हा रवींद्रनाथ टागोर यांच्या गीतांजलीचा गद्य मराठी अनुवाद – सन १९१३ – “ अनुवादाचा आदर्श नमुना “ अशी या पुस्तकाची ओळख सांगितली जात असे. 

त्यांच्या प्रसिद्ध काव्यरचना —

“ श्रीमंत नारायणराव पेशवे यांचा वध “ हे दीर्घकाव्य – सन १८७८.  

“ अकबर बादशहा “ – दीर्घकाव्य – सन १८७९. 

“ संमोहलहरी “ – दीर्घकाव्य – सन १९००.

“ कविकूजन “ हा स्फुट कवितांचा संग्रह, जो त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कन्या अनुताई घोरपडे यांनी १९३३ साली प्रकाशित केला. या संग्रहाच्या प्रस्तावनेत त्यांनी श्री. कानिटकर यांचे अल्पचरित्र प्रसिद्ध केलेले आहे . 

रावसाहेब गोविंद वा. कानिटकर यांना विनम्र आदरांजली.   

☆☆☆☆☆

आचार्य धर्मानंद कोसंबी

“ The prominant Indian buddhist scholar “ अशीच ज्यांची ओळख होती, असे आचार्य धर्मानंद कोसंबी यांचाही आज स्मृतिदिन. (९/१०/१८७६ – ४/६/१९४७). गोव्यातील सांखवल या खेड्यातल्या एका सनातनी सारस्वत ब्राह्मण कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता. लहानपणापासूनच ज्ञानग्रहणाची उत्कट आस असणाऱ्या कोसंबी यांनी त्यासाठी घर सोडून जाण्याचा प्रयत्नही अनेकदा केला होता. आणि पुढेही याच हेतूने खूप भ्रमंतीही केली होती. बौद्ध धर्माचा अभ्यास आणि संस्कृत आणि पाली या दोन भाषांमध्ये प्राविण्य मिळवण्याचा ध्यास ही तेव्हा त्यांच्यासाठी मोठी प्रेरणा ठरली होती. पुढे पाली भाषेतून बुद्ध धर्माचे शिक्षण घेण्यासाठी ते नेपाळला गेले होते. पण या धर्माची तिथली निराशाजनक स्थिती पाहून तिथून ते आधी कलकत्त्याला आणि मग सिलोन ( श्रीलंका ) इथे गेले. तिथल्या विद्योदय विद्यापीठात त्यांनी या विषयाचे रीतसर शिक्षण घेतले, आणि १९०२ साली बौद्धभिक्षू म्हणून त्यांना दीक्षा देण्यात आली. तिथून बर्मा इथे जाऊन त्यांनी बौद्ध धर्माविषयीच्या ब्रह्मी भाषेतल्या पुस्तकांचा तौलनिक अभ्यास केला. सात वर्षांनी भारतात परत आल्यावर कलकत्ता, बडोदा, आणि पूर्ण पश्चिम भारतात त्यांनी या विषयावर अनेक व्याख्याने दिली. अध्यापनही केले. शेवटी ते पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये रुजू झाले. हार्वर्ड विद्यापीठातले डॉ. जेम्स वूड हे तेव्हा संस्कृत, अर्धमागधी आणि पाली या विषयातील तज्ञाच्या शोधातच होते. त्यांच्या आमंत्रणावरून श्री. कोसंबी हार्वर्डला गेले. तिथेच त्यांनी लिहिलेले  “ विशुद्धीमग्ग “ हे बौद्ध तत्वज्ञानावरचे पुस्तक नंतर फार गाजले. तिथे ते रशियन भाषाही शिकले . त्याबरोबर मार्क्सवाद जाणून घेण्यातही त्यांना फार रुची वाटत होती. १९२९ साली ते रशियाला गेले. लेनिनग्राड विद्यापीठात पाली भाषा शिकवण्याचे कामही त्यांनी केले. भारतात स्वातंत्र्य चळवळ सुरु झाल्यावर ते भारतात परतले. एकीकडे गुजरात विद्यापीठात विनावेतन अध्यापन करत, त्यांनी मिठाच्या सत्याग्रहासाठी स्वयंसेवक गोळा करण्यास सुरुवात केली. या सत्याग्रहासाठी त्यांनी सहा वर्षे तुरुंगवास भोगला. पण बौद्धधर्माचा मूलगामी शोध घेणे मात्र त्यांनी थांबवले नाही. नंतरच्या काळात त्यांनी मुंबईत अनेक बहुजन-विहारांची स्थापना करून बौद्ध भिक्षूंच्या राहण्याची सोय उपलब्ध करून दिली. गोवा मुक्ती संग्रामासाठी ते फार आग्रही होते. आमरण उपोषण करत असतांना त्यांचा मृत्यू झाला. 

आचार्य कोसंबी यांचे प्रकाशित साहित्य —-

१. “ जातककथा “ — मराठीत लिहिलेल्या बुद्धकथा — याचे अनेक भाग आहेत. 

२. “ निवेदन “ हे आत्मचरित्र 

३. “ भगवान बुद्ध “ हा बुद्ध-चरित्रात्मक ग्रंथ –  अनेक भाषांमध्ये याचा अनुवाद झालेला आहे. 

४. “ बोधिसत्व “ हे मराठी नाटक. 

५. “ विसुद्धिमग्ग “ हा पाली भाषेतील ग्रंथ . 

–दोन हजार वर्षांपेक्षाही जास्त काळ अर्ध्या जगात प्रचलित असणाऱ्या विवेकवादी बौद्धधर्माला, नव्या युगाच्या प्रेरणांशी सुसंगत असा नवा पाया पुन्हा रचून देण्याचे मोठेच काम करणाऱ्या आचार्य कोसंबी यांना आदरपूर्वक श्रद्धांजली.🙏

☆☆☆☆☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : विकिपीडिया, महाराष्ट्र टाईम्स.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ ३ जून – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ ३ जून – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

रामचंद्र वामन पटवर्धन

रामचंद्र वामन उर्फ राम पटवर्धन यांचे शिक्षण रत्नागिरी व मुंबई येथे झाले.मराठी व संस्कृत या भाषा घेऊन त्यांनी एम्.ए.केलं.त्यानंतर त्यांनी मुंबईत सिडनेहॅम,रूईया,पोद्दार,सिद्धार्थ व एम.डी.महाविद्यालयात मराठीचे अध्यापन केले.शिक्षण घेत असताना त्यांना श्री.पु.भागवत,न.र.फाटक यांच्यासारखे गुरू लाभले.पुढे श्री.पु.भागवतांच्या सूचनेनुसार त्यांनी मौज या साप्ताहिकाचे संपादक पद स्विकारले.तिथे 1960 पर्यंत त्यांनी कार्यकारी संपादक म्हणून काम पाहिले.नंतर 1960पासून सत्यकथा चे संपादक पद हे मासिक बंद पडेपर्यंत सांभाळले होते.

त्यांनी काही पुस्तकांचे संपादनही केले होते.मारूती चित्तमपल्ली यांच्या ‘चकवा चांदण’,मीना प्रभू यांचे ‘माझे लंडन’,अचला जोशी यांचे ‘आश्रम नावाचे घर’,आणि शांता शेळके यांचा ‘अनोळख’ हा काव्यसंग्रह ही ती पुस्तके होत.

संपादनाशिवाय त्यांनी काही पुस्तकांचे अनुवादही केले आहेत.मार्जोरी राॅलिंग्ज यांच्या द इयरलिंग चे ‘पाडस’ या नावाने पुस्तक अनुवादित केले आहे.योगाचार्य बी.के.अय्यंगार यांच्या योगविद्या विषयीचे पुस्तक ‘योगदिपिका’ हे नावाने अनुवादित केले आहे.

संपादन काळात त्यांनी अनेक नव लेखकांना प्रोत्साहन दिले .त्यातील आशा बगे, दीपा गोवारीकर,सानिया,नामदेव ढसाळ यासारखी नावे सर्वश्रुत आहेत.

अनुवाद आणि मुख्यतः संपादन क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण करणा-य् राम पटवर्धन यांचे वयाच्या 86 व्या वर्षी 2014 ला निधन झाले.आज त्यांचा स्मृतीदिन आहे.

मौज,सत्यकथा सारख्या मराठीतील नामवंत नियतकालिकांचे संपादक कै.राम पटवर्धन यांना आदरपूर्वक प्रणाम !🙏

☆☆☆☆☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : विकिपीडिया, महाराष्ट्र टाईम्स.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १ जून – संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? ई-अभिव्यक्ती -संवाद ☆ १ जून -संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

गोपाल नीलकंठ दांडेकर (८ जुलै १९१६ – १ जून १९९८)

गोपाल नीलकंठ दांडेकर हे गोनीदा म्हणून सर्वपरिचित आहेत. ते एक अंनुभावसनपन्न, सृजनशील, रसिक वृत्तीचे भटकण्याची आवड असलेले कलंदर कलावंत होते. ते दुर्गप्रेमी आणि कुशल छायाचित्रकारही होते.

गोनीदांचा जन्म परतवाडा इथे झाला. १२व्या वर्षी शिक्षण सोडून त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत उडी घेतली. पुढे ते गाडगे महाराजांच्या सहवासात आले. त्यांचा संदेश त्यांनी गावोगावी पोचवला. नंतर त्यांनी वेदांताचा अभ्यास केला. १९४७पासून त्यांनी लेखन कार्यावर उपजीविका करायचे ठरवले. त्यांनी पुढील आयुष्यात कुमार साहित्य, कादंबर्याी, ललित गद्य, चरित्र, आत्मचरित्र, प्रवास वर्णन, धार्मिक, पौराणिक इ. विविध प्रकारचे लेखन केले.  

कादंबरीचे अभिवाचन –

गोनीदांनी १९७५ साली कादंबरीच्या अभिवाचनाचा अभिनव प्रयोग सुरू केला. ग्यानेश्वर यांच्या जीवनावरील मोगरा फुलाला या कादंबरीपासून ही सुरुवात झाली. पुढे शितू, पडघवली. मृण्मयी, पवनाकाठचा धोंडी इ. अनेक कादंबर्यां अभिवाचन संस्कृतीतून वाचकांच्या भेटीला आल्या. त्यांचा हा उपक्रम त्यांच्या नंतरही त्यांच्या कुटुंबियांनी ( वीणा देव, विजय देव, रूचीर कुलकर्णी ) पुढे चालू ठेवला.

गोनीदांचे साहित्य –

बालवाङ्मय – आईची देणगी

कादंबरी – १.आम्ही भगीरथाचे पुत्र, २. शितू, ३.पडघवली, ४. पूर्णामायची लेकरं, मृण्मयी इये. १७ कादंबर्याो त्यांनी लिहिल्या. त्यापैकी ‘माचीवरला बुधा ‘ , जैत रे जैत, ‘देवकीनंदन गोपाला’ या कादंबर्यांनवर चित्रपट निघाले.  

चरित्र- आत्मचरित्र –

दास डोंगरी रहातो. गाडगे महाराज, तुका आकाशाएवढा इ. ६ पुस्तके

ललित गद्य –  छंद माझे वेगळे , त्रिपदी

ऐतिहासिक – कादंबरीमय शिवकाल – यात हे तो श्रींची इच्छा, झुंजर माची, दर्याभवानी, बाया दर उघड इ. छोट्या छोट्या कादंबर्यां चा समावेश आहे.

प्रवास आणि स्थल वर्णन – कुणा एकाची भ्रमण गाथा, दुर्ग दर्शन, महाराष्ट्र दर्शन इ. ११ पुस्तके

धार्मिक, पौराणिक, संत चरित्रे –श्रीगणेशपुराण, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम इ. १४ पुस्तके

गौरव – अकोला येथे १९८१ साली झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

पुरस्कार –

१. ‘स्मरणगाथा’ साथी साहित्य अॅरकॅडमीचा पुरस्कार – १९७६

२. महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती  पुरस्कार

३.  महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन यांचा उत्कृष्ट चित्रपट कथा पुरस्कार

४. महाराष्ट्र गौरव पुरस्कार – १९९०

५. जीजामाता पुरस्कार- १९९०

स्मृती पुरस्कार – गोनीदांनी वयाच्या पंचाहत्तरीत चांगल्या लेखकाला मृण्मयी पुरस्कार देण्याचे चालू केले. त्यांच्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी १९९९ पासून हा पुरस्कार गोनीदांच्या नावे देणे सुरू ठेवले. तसेच त्यांच्या पत्नी नीरा दांडेकर यांच्या स्मरणार्थही सामाजिक क्षेत्रात केलेल्या महत्वाच्या कामाबद्दल पुरस्कार  दिला जातो.

☆ ☆ ☆ ☆ ☆

श्रीपाद कृष्ण कोल्हटकर ( २९ जून १८७१ – १ जून १९३४ )

श्री. कृ. कोल्हटकर यांनी  मराठीत विनोदी लेखनाची परंपरा रुजवली. ते नाटककार, कवी आणि समीक्षकही होते. ‘बहू असोत सुंदर संपन्न की महा…’ हे सुप्रसिद्ध गीत त्यांच्याच लेखणीतून उतरले.

श्री. कृ. कोल्हटकर यांना लहानपणापासूनच नाटकाची आवड होती. त्यांनी त्या वयात अनेक नाटके पाहिली. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर पुण्यात डेक्कन कॉलेजमध्ये शिकताना  शि.म.परांजपे, एस.एस.देव, वी.का.राजवाडे यासारखे शिक्षक त्यांना शिकवायला होते. त्यांचा खूप प्रभाव कोल्हटकरांवर पडला. १८९१ मध्ये ‘मृच्छ्कटिकम्’ या नाटकात त्यांनी प्रथमच काम केले. शिकत असतानाच त्यांनी ‘विक्रम शशिकला’ या नाटकावर लिहिलेली समीक्षा ‘विविधज्ञानविस्तार’ मध्ये प्रसिद्ध झाली. १८८७मध्ये ते एल.एल.बी. झाले व अकोला येथे व्यवसाय करू लागले.      

 श्री. कृ. कोल्हटकर यांची साहित्य संपदा –

नाटके – १. गुप्तमंजुषा , २. जन्मरहस्य, ३. परिवर्तन, ४. मातीविकार, ५. मूकनायक ६. वधूपरीक्षा इ. १२ नाटके त्यांनी लिहिली.

विनोदी लेखसंग्रह – १. सुदामयाचे पोहे, २. अठरा धान्याचे कडबोळे

कादंबरी – ज्योतीषगणीत, श्यामसुंदर

गौरव –

१.        पुणे येथे झालेल्या दुसर्या्  कविसंमेलनाचे ते अध्यक्ष होते.

२.        १९२७ साली झालेल्या १३व्या साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.     

३.        ते ज्योतिषतज्ज्ञही होते. तिसर्याद ज्योतिष परिषदेचे ते अध्यक्ष होते.  

श्री. कृ. कोल्हटकर यांच्यावरील साहित्य

१.  गंगाधर देवराव खानोलकर यांनी त्यांचे चरित्र लिहिले आहे.

२. कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर यांनी ‘श्री. कृ. कोल्हटकर- व्यक्तिदर्शन’ हे समीक्षात्मक पुस्तक लिहीले आहे. 

 गो. नी. दांडेकर आणि श्री. कृ. कोल्हटकर या दोघा प्रतिभावंतांचा आज स्मृतीदिन. त्या निमित्त त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. ? 

☆ ☆ ☆ ☆ ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गूगल विकिपीडिया

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ ३१ मे – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ ३१ मे – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

दिवाकर कृष्ण केळकर:

मराठी लघुकथेचे शिल्पकार श्री. दिवाकर कृष्ण केळकर यांचा जन्म कर्नाटकातील गुंटकल येथे झाला.त्यांनी मुंबई,पुणे आणि सांगली येथे आपले शिक्षण पूर्ण केले.नंतर हैद्राबाद येथे वकिलीचा व्यवसाय सुरू केला.

‘अंगणातला पोपट’ ही त्यांची पहिली कथा मनोरंजन या मासिकातून 1922 मध्ये प्रसिद्ध झाली. त्यानंतर तीन कथासंग्रह,दोन कादंब-या आणि एक नाटक त्यांनी लिहीले.पण    मराठीतील लघुकथा हेच त्यांचे प्रमुख लेखन म्हणावे लागेल.भावनाविष्कार हे त्यांच्या कथांचे वैशिष्ट्य होते.त्यांच्या कथेमुळे मराठी कथेला मनोदर्शनाचे तिसरे परिमाण लाभले असे सुप्रसिद्ध लेखक भालचंद्र फडके म्हणतात.

मुंबई येथे 1950 साली भरलेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनातील कथा संमेलनाचे ते अध्यक्ष होते.1954 मध्ये लातूर येथे भरलेल्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते .

श्री.केळकर यांची साहित्य संपदा:

कथासंग्रह—

समाधी व इतर सहा गोष्टी

रूपगर्विता व इतर  गोष्टी

महाराणी व इतर कथा

कादंबरी—

किशोरीचे ह्रदय

विद्या आणि वारूणी

नाटक—

तोड ही माळ

मराठीतील दीर्घ कथा लघुकथेकडे घेऊन जाणा-या दिवाकर कृष्ण यांचा आज स्मृतीदिन(1973)आहे.🙏

☆☆☆☆☆

माधव  यशवंत गडकरी

माधव गडकरी या नावाने प्रसिद्ध असलेले लेखक व पत्रकार यांचा आज (2006)स्मृतीदिन.

सुमारे साठ वर्षे त्यांनी पत्रकारितेसाठी खर्च केली. विविध नियतकालिके,साप्ताहिके यामध्ये त्यांनी उपसंपादक,संपादक,स्तंभलेखन,वृतकलेखन अशा विविध जबाबदा-या समर्थपणे पेलल्या.त्यांची वृत्तपत्रीय कारकीर्द महाराष्ट्र टाईम्स,गोमांतक,मुंबई सकाळ,लोकसत्ता,सांज लोकसत्ता अशा नामवंत समुहातून झाली.निर्झर,क्षितीज,निर्धार ही त्यांची स्वतःची नियतकालिके.1992मध्ये ते लोकसत्ता प्रकाशन समुहातून निवृत्त झाले.परंतु त्यांचे विविध सदरांतील लेखन चालूच होते.याशिवाय 1955ते1962 या काळात त्यांनी दिल्ली आकाशवाणीत नोकरीही केली.

पत्रकार या नात्याने त्यांनी जगातील अनेक देशांना भेटी दिल्या व आपल्या लेखनातून वाचकांना जगातील अनेक घडामोडींचे दर्शन घडवले. इंग्लंड, जर्मनी, अमेरिका, पोर्तुगाल, माॅरिशस, क्यूबा, जपान, अफगाणिस्तान, तुर्कस्तान अशा अनेक लहान मोठ्या देशांना त्यांनी भेटी दिल्या होत्या.

प्रकाशित साहित्य:—

अष्टपैलू आचार्य अत्रे

असा हा गमक

असा हा महाराष्ट्र ..दोन भाग

इंदिरा ते चंद्रशेखर

एक झलक पूर्वेची

गाजलेले अग्रलेख

गुलमोहराची पाने

चिरंतनाचे प्रवासी

प्रतिभेचे पंख लाभलेली माणसे

सत्ता आणि लेखणी

कुसुमाग्रज गौरव…इ.इ इ .

प्राप्त पुरस्कार   :—-

पद्मश्री, पुढारीकार जाधव पुरस्कार, अनंत हरी गद्रे पुरस्कार, भ्रमंती पुरस्कार, लोकश्री,आचार्य अत्रे, संवाद,भारतकार हेगडे देसाई पुरस्कार.

प्रतिभा सम्राट रा.ग.गडकरी पुस्तकासाठी व्ही.एच.कुलकर्णी पुरस्कार, गोवा अकॅडमीचा सोनार बांगला या पुस्तकासाठी पुरस्कार,

मराठी साहित्य परिषद पुरस्कार, याशिवाय महाराष्ट्र राज्य सरकारचे अनेक लेखन पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत.

आज त्यांच्या स्मृतीदिनी त्यांना विनम्र अभिवादन.🙏

☆☆☆☆☆

डाॅ.मधुकर सु.पाटील

अत्यंत प्रतिकूल  परिस्थितीतही प्रथमपासून शैक्षणिक गुणवत्ता प्राप्त करून श्री.म.सु.पाटील यांनी मराठी साहित्यात एक उत्तम काव्यसमीक्षक व वैचारिक लेखक म्हणून आपले स्थान निर्माण केले आहे.शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी मनमाड महाविद्यालयात प्राध्यापक पद स्विकारले व तेथूनच प्राचार्य पदावरून निवृत्त झाले.

त्यांची कवितेवरील समीक्षा ही विशेष उल्लेखनीय होतीच पण त्याबरोबरच त्यांचा संत साहित्य  व दलित साहित्य यांचाही सखोल अभ्यास होता.त्यांनी काही पुस्तके,अनुवादीतही केली होती.’स्मृतीभ्रंशानंतर’ या अनुवादित पुस्तकाला 2014 चा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता. तसेच सर्जनप्रेरणा आणि कवित्वशोध या पुस्तकाला 2018 चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता.2007मध्ये झालेल्या को.म.सा.परिषदेच्या उल्हासनगर येथील दहाव्या कोकण साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. अनुष्टुभ हे मासिक चालू करून त्यांनी अनेकांना लिहीते केले.

साहित्य संपदा:—

इंदिरा यांचे काव्यविश्व

दलित कविता व दलित साहित्याचे सौंदर्यशास्त्र

बदलते कविसंवेदन

सर्जनप्रेरणा आणि कवित्वशोध

ज्ञानेश्वरीचा काव्यबंध

ज्ञानेश्वरीचा तृष्णाबंध

लांबचा उगवे आगरी(आत्मचरित्र) इ.इ.

2019 साली वयाच्या 88व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

त्यांच्या स्मृतीस अभिवादन!🙏

☆☆☆☆☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : मराठी विश्वकोश, विकासपिडीया, विकिपीडिया, महाराष्ट्र टाईम्स.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ २९ मे – संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? ई-अभिव्यक्ती -संवाद ☆ २९ मे -संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

गणेश प्रभाकर प्रधान – ( २६ ऑगस्ट १९२२ – २९ मे २०१० )

ग. प्र. प्रधान हे समाजवादी विचारवंत, राजकरणी, मराठी भाषेचे लेखक होते. ते १८ वर्षे आमदार होते. २ वर्षे विरोधी पक्षनेते होते. महाराष्ट्र विधानसभेचे ते सभापतीही होते. त्यांनी मराठी व इंग्रजीत विपुल लेखन केले आहे.

साधना साप्ताहिकाचे ते मानद संपादक होते. सानेगुरुजींचे ते वारसदार समजले जातात. विविध सामाजिक चळवळीत त्यांचा सक्रीय सहभाग आसे.

त्यांनी एकूण १४ पुस्तके लिहिली. त्यापैकी मराठीत खालील पुस्तके लिहिली आहेत.

१. आगरकर लेखसंग्रह, २. डॉ. आंबेडकर त्यांच्याच शब्दात, ३. महाराष्ट्राचे शिल्पकार – ना.ग. गोरे ४. माझी वाटचाल, ५. सत्याग्रही गांधीजी, ६. साता उत्तराची कहाणी ७ ओकमान्यांची राजकीय दूरदृष्टी आणि ज्ञानाचे उपासक

याव्यतिरिक्त लेटर टू टॉलस्टॉय, लो. टिळक ए बायोग्राफी इ. इंग्रजीतूनही पुस्तके लिहिली.

‘साता उत्तराची कहाणी’ हे त्यांचे पुस्तक खूप गाजले. ‘डॉ. आंबेडकर त्यांच्याच शब्दात’ या पुस्तकाचे स्वरूप वेगळे आहे. एक तरुण पत्रकार डॉ. आंबेडकरांची मुलाखत घेतो, अशी कल्पना करून त्यांनी हे पुस्तक लिहिले आहे.

पुरस्कार – राज्यशासनाचा वाङ्मय पुरस्कार त्यांना मिळाला आहे.

समीर शिपूरकर यांनी ग. प्र. प्रधानांच्या जीवनकार्याचा आणि आणि समाजसेवेचा परिचय करून देणार्याश लघुपटाची निर्मिती केली आहे.

☆ ☆ ☆ ☆ ☆

संजय व्यंकटेश संगवई  (२३ डिसेंबर १९५९ – २९ मे २००७ )

संजय संगवई  हे मराठी लेखक, पत्रकार, संपादक, माध्यम तज्ज्ञ , माध्यम चिकित्सक होते. ’अभिव्यक्ती’ या नाशिक इथून प्रकाशित होणार्यार माध्यंविषयक त्रैमासिकाचे ते संपादक होते. ‘माणूस’ साप्ताहिकात त्यांनी विविध सामाजिक, राजकीय विषयांवर तसेच शास्त्रीय संगितावर विपुल लेखन केले आहे. पर्यायी पत्रकारिता ही विकासाभिमुख पत्रकारिता असते, ही संकल्पना, संगवई यांनी आपल्या लेखनातून रुजवली. त्यांच्या मृत्यूनंतर काढलेल्या ‘अभिव्यक्ती’च्या अंकात, ‘सान्यासी माध्यमकर्मी’ असा त्यांचा गौरवास्प्द उल्लेख करण्यात आला आहे.

’नर्मदा बचाव आंदोलनाचे ते पूर्णवेळ कार्यकर्ते होते. त्यांना ह्रदयविकाराचा त्रास होता. त्यावरील उपचारासाठी ते केरळयेथील कोचीला गेले असता तिथेच त्यांचा अंत झाला. 

संजय संगवई यांची पुस्तके –

१. अस्मिता आणि अस्तित्व ( वैचारिक लेख ) २. उद्गार ( वैचारिक लेख ) ३. नद्या आणि जनजीवन – नर्मदा खोर्याैतील लोकांच्या संघर्षाचा ऐतिहासिक दस्तावेज ४. माध्यमवेध ५. कलंदर सुरांच्या स्मृतीची मैफल ( संगीतविषयक )       

संजय संगवई यांना मिळालेले पुरस्कार –

१.    राम आपटे प्रतिष्ठानचा सामाजिक कृतज्ञता निधी पुरस्कार

२.    महाराष्ट्र फाऊंडेशनचा सामाजिक कार्यासाठी पुरस्कार

३.    पर्यायी पत्रकारितेसाठी महानगर पुरस्कार

४.    ४. श्री. ग. माजगावकर कृतीशीलता पुरस्कार

५.    समाज विज्ञान शिक्षण मंडल न्यास – मुंबई तर्फे अस्मिता आणि अस्तित्व या पुस्तकासाठी पुरस्कार

बालवाडी तालुका खानापूर, जि. सांगली येथे त्यांच्या स्मरणार्थ ‘संजय संगवई मंच’

हे चर्चापीठ स्थापन करण्यात आले आहे.

☆ ☆ ☆ ☆ ☆

चारुता सागर. – (२१ नोहेंबर १९३०)

मोजक्याच कथा लिहूनही, मराठी कथाविश्व समृद्ध करणारे ग्रामीण लेखक म्हणून ज्यांच्याविषयी आदराने म्हंटलं जातं, ते चारुता सागर म्हणजे दिनकर दत्तात्रय भोसले. त्यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील, कवठे महांकाळ तालुक्यातील मळणगाव इथे झाला. त्यांनी चारुता सागर या नावाने कथा लेखन केले, तर धोंडूबुवा या नावाने कीर्तने केली.

बंगालमध्ये भ्रमंती करताना त्यांनी शरदचंद्र चट्टोपाध्याय यांच्या कादंबर्या् वाचल्या, त्यातील एका कादंबरीतील एका पात्राचे नाव होते, चारुता सागर. त्यांना हे नाव खूपच आवडले म्हणून त्यांनी कथालेखनासाठी हे नाव घेतले. 

१२व्या वर्षी आईच्या दु:खद निधनामुळे व्यथित होऊन त्यांनी घर सोडले. साधू, बैरागी, संन्यासी बनून, रामेश्वर, हरिद्वार, काशी असे फिरत राहिले. वयाच्या २६व्या वर्षी ते पुन्हा गावी परतले. लोणारवाडी या गावात कोंबड्या, बकर्यां च्या मागे फिरणार्याा मुलांसाठी त्यांनी शाळा काढली. पण ती शाळा बेकायदेशीर ठरवून सरकारने ताब्यात घेतली. पुढे त्यांनी लोणारवाडी हे गाव सोडले. नंतर त्यांनी मळणगावला प्राथमिक शिक्षकाची नोकरी केली.

लोणारवाडी या गावात कृष्णा नावाचा मुलगा होता. धुतला तर शर्ट फाटेल म्हणून त्याने अंगातला शर्ट कधी धुतलाच नाही. त्याच्यावर ‘न लिहिलेले पत्र’ ही कथा चारुता सागर यांनी लिहिली. त्यांनी लिहिलेली ती पहिलीच कथा सत्यकथा मासिकात छापून आली. पुढे त्यांच्या बहुतेक सगळ्या कथा सत्यकथेने छापल्या. जी. ए. कुलकर्णी, पु. ल. देशपांडे, हातकणंगलेकर अशी दिग्गज मंडळी त्यांच्या कथांची चाहती होती.  

चारुता सागर यांची पुस्तके –

१. नदीपार, २. नागीण – यात १६ कथा आहेत , ३. मामाचा वाडा – यात १४ कथा आहेत.

पुरस्कार –

१.    चारुता सागर यांच्या ‘नागीण’ या कथेला कॅ. गो.गं लिमये पुरस्कार १९७१ साली मिळाला.

२.    सर्वोत्कृष्ट लघुकथाकाराचा पुरस्कार त्यांना १९७७ साली मिळाला.

जोगवा या राष्ट्रीय विजेत्या चित्रपटाची कथा चारुता सागर यांच्या ’दर्शन’ या कथेवर आधारलेली आहे.

चारुता सागर यांच्या ‘नागीन’, ‘म्हस’ , ‘न लिहिलेले पत्र’, ‘मामाचा वाडा’, ‘पुंगी’, ‘पूल’, ‘दर्शन’, ‘वाट’, ‘नदीपार इ. अनेक कथांचा, श्री. चंद्रकांत पोकळे यांनी कन्नडमध्ये अनुवाद केला आहे.

सध्या ‘चारुता सागर प्रतिष्ठानतर्फे’ दरवर्षी कथास्पर्धा घेतली जाते आणि एका उत्कृष्ट कथेला परितोषिक दिले जाते.

आज, ग. प्र. प्रधान, संजय सांगवई, चारुता सागर यांचा स्मृतिदिन आहे. त्या निमित्ताने या तीनही प्रतिभावंतांना विनम्र श्रद्धांजली. ? 

☆ ☆ ☆ ☆ ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गूगल विकिपीडिया

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ २७ मे – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सौ. गौरी गाडेकर

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ २७ मे – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर -ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री  बाळाजी जोशी (27 जानेवारी 1901 – 27 मे 1994) हे थोर विचारवंत, संस्कृत पंडित, मराठी विश्वकोशाचे प्रमुख संपादक, पुरोगामी विचारांचे प्रकांड पंडित, सृजनशील साहित्यिक व चिकित्सक तत्त्वज्ञ होते.

प्रथम वडिलांकडून व नंतर वाईच्या प्राज्ञ पाठशाळेत त्यांनी अध्ययन केले. पुढील अध्ययनासाठी ते वाराणसीला गेले.कलकत्त्याच्या शासकीय संस्कृत महाविद्यालयातून त्यांनी ‘तर्कतीर्थ’ ही पदवी संपादन केली.

भारताच्या स्वातंत्र्यआंदोलनात, सन 1930-32च्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीतील सहभागाबद्दल त्यांना कारावास भोगावा लागला.

मानवेन्द्रनाथ रॉय यांच्या ‘रॅडिकल डेमोक्रॅटिक’ पक्षाचे ते क्रियाशील सदस्य होते.

अनेक सामाजिक व धार्मिक सुधारणांना धर्मशास्त्रांचा आधार असल्याचे दाखवून आपल्या अभ्यासाचा उपयोग त्यांनी परिवर्तनवादी शक्तींना पाठबळ मिळवून देण्यासाठी केला. त्यासाठी त्यांनी शंकराचार्य व इतर सनातनी मंडळींचा रोष ओढवून घेतला.

तर्कतीर्थांनी विपुल लेखन केले आहे. त्यापैकी महत्त्वाचे काही ग्रंथ : ‘शुद्धिसर्वस्वम’, ‘आनंदमीमांसा’, ‘हिंदू धर्माची समीक्षा’, ‘जडवाद’, ‘वैदिक संस्कृतीचा विकास’, ‘आधुनिक मराठी साहित्याची समीक्षा’ व ‘रससिद्धांत’ इत्यादी.

वाईच्या प्राज्ञ पाठशाळेतर्फे करण्यात आलेल्या धर्मकोशाचे प्रमुख संपादक म्हणून त्यांनी काम केले.

मराठी विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष व विश्वकोशाचे प्रमुख संपादक म्हणूनही त्यांनी काम केले. सुमारे एक हजार पृष्ठांचा एक, असे चौदा खंड त्यांच्या संपादकत्वाखाली तयार झाले. यावरून त्यांच्या कार्याची व्याप्ती स्पष्ट होते.

 महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष या पदावरही त्यांनी बरीच वर्षे काम केले.

1954मध्ये दिल्लीला भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

त्यांच्या ‘वैदिक संस्कृतीचा विकास’ या ग्रंथाला साहित्य अकॅडमी पुरस्कार मिळाला.

1973 मध्ये राष्ट्रपतींनी त्यांना ‘राष्ट्रीय संस्कृत पंडित’ ही पदवी दिली . मुंबई विद्यापीठाने त्यांना ‘एलएल.डी.’ ही पदवी दिली. भारत सरकारने त्यांना ‘पद्मभूषण’ हा किताब देऊन त्यांचा गौरव केला.

☆☆☆☆☆

रा. ग. जाधव

रावसाहेब गणपतराव जाधव (24 ऑगस्ट 1932 – 27 मे 2016) हे वेगळ्या वाटेचे आणि स्वतंत्र प्रतिभेचे कवी व समीक्षक होते.

पुणे विद्यापीठातून एम.ए.झाल्यावर मुंबईतील एल्फिन्स्टन कॉलेज, अमरावतीचे विदर्भ महाविद्यालय, औरंगाबाद येथील मिलिंद महाविद्यालय येथे त्यांनी 11 वर्षे मराठीचे अध्यापन केले. त्यापूर्वी ते एस.टी. मध्ये 10 वर्षे कार्यरत होते.

नंतर तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या मराठी विश्वकोश प्रकल्पात दोन दशके काम करून जाधव यांनी संपादनाची कौशल्ये आत्मसात केली. 2000ते 2002 या कालावधीसाठी ते विश्वकोशाचे मुख्य संपादक व मराठी विश्वकोश निर्मिती  मंडळाचे अध्यक्ष झाले. त्यांनी कोशाच्या सतराव्या खंडापर्यंत काम केले. या खंडांतून त्यांनी साहित्यविषयक महत्त्वाचे लेखही लिहिले. त्याचप्रमाणे विश्वकोश आकर्षक होण्यासाठी त्यातील लेखांसोबत चित्रे लावण्यातही त्यांनी पुढाकार घेतला.

ग. प्र. प्रधान यांच्यासमवेत जाधव यांनी ‘साधना’ साप्ताहिकाच्या साठ वर्षांतील अंकांचे आठ खंडांत संपादन केले.

‘निळी पहाट’, ‘ निळी क्षितिजे’ व ‘निळे पाणी’ या जाधवांच्या पुस्तकांनी दलित साहित्यप्रवाहाचे  मराठी वाङ्मयातील स्थान सुनिश्चित झाले. केवळ विद्रोहाचा डांगोरा पिटण्यापेक्षा विद्रोह समजून घेऊन त्याच्या पलीकडची दिशा पाहावी, असे त्यांचे म्हणणे होते.

याशिवाय जाधवांची ‘अश्वत्थाची सळसळ’, ‘आनंदाचा डोह’, ‘कला, साहित्य व संस्कृती’, ‘बापू’ (गांधीजींवरील 91 कवितांचा संग्रह), ‘कविता आणि रसिकता’, ‘काव्यसमीक्षेतील धुळाक्षरे’, ‘ खेळीमेळी'(ललित), ‘निवडक समीक्षा’, ‘वाङ्मयीन प्रवृत्ती आणि प्रमेये ‘ वगैरे अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत.

मराठी विश्वकोश व ‘साधना’चे खंड याव्यतिरिक्त जाधवांनी ‘आधुनिक मराठी कवयित्रींची कविता'(1980 ते 1995 या काळातील), ‘ निवडक साने गुरुजी’, तसेच मराठी साहित्य परिषदेच्या ‘मराठी वाङ्मयाचा इतिहास’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामध्ये 1950 ते 2000 या कालखंडातील साहित्यावर प्रकाश टाकणाऱ्या 4 खंडांचेही संपादन केले.

‘निवडक समीक्षा’ या जाधवांच्या पुस्तकाला टागोर वाङ्मय पुरस्कार मिळाला.

औरंगाबाद येथील 2004 मध्ये भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

फेब्रुवारी 2016 मध्ये त्यांना महाराष्ट्र सरकारने विंदा करंदीकर यांच्या नावाचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केलं.

☆☆☆☆☆

प्रल्हाद नरहर देशपांडे

डॉ. प्रल्हाद नरहर देशपांडे (17सप्टेंबर 1936 – 27 मे 2007)हे लेखक, संपादक व इतिहास संशोधक होते.

पदवी व पदव्युत्तर शिक्षण औरंगाबादला पूर्ण करून तिथेच ते केंद्र सरकारच्या पुरातत्त्व विभागात सर्वेक्षक म्हणून रुजू झाले. त्यावेळी देवगिरी (दौलताबाद) या किल्ल्याचे सर्वेक्षण करताना ऐतिहासिक दृष्टिकोनातून किल्ल्यांचा अभ्यास कसा करावा, याचा वस्तुपाठ त्यांना मिळाला. पुढे जाऊन ‘महाराष्ट्रातील किल्ले’ या विषयावर डॉ. अ. रा. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पुणे विद्यापीठातून पीएच.डी.ची पदवी मिळवली.

नंतर ते धुळ्याच्या विद्यावर्धिनी महाविद्यालयात इतिहासाचे व्याख्याते म्हणून रुजू झाले.

त्या दरम्यानच इतिहासाचार्य वि. का. राजवाडे संशोधन मंडळाच्या मुख्य चिटणीसपदी त्यांची नियुक्ती झाली.मंडळातील ऐतिहासिक दस्तऐवज व इतर सामग्रीची जपणूक करणे, त्यात भर घालणे, त्यासाठी संग्रहालय उभे करणे, खानदेशातील ऐतिहासिक, पुरातात्त्विक सर्वेक्षण करणे,’थाळनेर’सारख्या ठिकाणी उत्खनन करणे, मंडळात येणाऱ्या  संशोधकांना मदत व मार्गदर्शन करणे ही कामे त्यांनी मनोभावे केली.

‘छत्रपती शिवाजी महाराजांची पत्रे’ व  ‘109 कलमी बखर’ हे दोन्ही ग्रंथ त्यांनी प्रस्तावनेसह संपादून प्रसिद्ध केले. राजगड व रायगड या छत्रपतींच्या दोन राजधान्यांवर स्वतंत्रपणे लिहिलेल्या पुस्तिका, ‘महाराष्ट्र संस्कृती – जडणघडण, मराठ्यांचा उदय व उत्कर्ष’ हे क्रमिक पुस्तक तसेच अनेक इतिहासविषयक संशोधन लेख त्यांच्या नावावर आहेत.

स. मा.गर्गे यांच्या मराठी रियासतीच्या पहिल्या खंडाच्या संपादनास त्यांनी हातभार लावला.

राजवाडे मंडळाच्या ‘संशोधक’ या त्रैमासिकाचे त्यांनी 25 वर्षे संपादन केले.

राजवाडे संपादित ‘मराठ्यांच्या इतिहासाची साधने’ या दुर्मिळ झालेल्या मालिकेचे त्यांनी पुनःसंपादन केले.

 डॉ. देशपांडे हे उत्तम संस्थापकही होते. ‘अखिल महाराष्ट्र इतिहास परिषद’, ‘खानदेश इतिहास परिषद’ इत्यादी संस्थांच्या स्थापनेमध्ये त्यांचा मोलाचा सहभाग होता. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कक्षेतील कागदपत्रे गोळा करणे, त्यांच्या आधारे शोधनिबंध लिहिणे यासाठी खानदेशातील तरुण संशोधकांना त्यामुळे प्रेरणा मिळाली.

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ, तंजावर पेपर्स कमिटी, इंडियन हिस्टॉरिकल रेकॉर्ड कमिशन, नवी दिल्ली इत्यादी मंडळावर त्यांची नियुक्ती झाली होती.

त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी पीएच.डी मिळवली.

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, रा. ग.जाधव व प्रल्हाद नरहर देशपांडे यांचा आज स्मृतिदिन आहे. त्या तिघांनाही आदरांजली.🙏

☆☆☆☆☆

सौ. गौरी गाडेकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ :साहित्य साधना, कऱ्हाड शताब्दी दैनंदिनी,  विवेक  महाराष्ट्र नायक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ २६ मे – संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? ई-अभिव्यक्ती -संवाद ☆ २६ मे -संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

श्रीपाद वामन काळे

श्रीपाद वामन काळे यांचा जन्म ५ मार्च १९१०चा. ते निबंधकार आणि अर्थतज्ज्ञ होते. अर्थशास्त्रविषयक नियतकालिकांचे ते संपदक होते. ’पुढे पाऊल, तुमचे स्थान कोणते?, कौटुंबिक हितगुज, दाणे आणि खडे , नवे जीवन, नव्या जीवनाची छानदार घडी’ अशी त्यांची अनेक पुस्तके आहेत. समाजाचे सूक्ष्म निरीक्षण, व्यापक विचारसरणी, ओघवती भाषा, नाजुक, मार्मिक विनोदाची पखरण ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये.

मराठी ग्रंथसंग्रहालय ठाणे या संस्थेचा गौरवशाली इतिहास त्यांनी लिहिला आहे.

आज त्यांचा स्मृतीदिन. त्यानिमित्ताने त्यांना विनम्र श्रद्धांजली. ? 

☆ ☆ ☆ ☆ ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गूगल विकिपीडिया

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ २४ मे – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सौ. गौरी गाडेकर

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ २४मे – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर -ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

राजाराम भालचंद्र पाटणकर (पीएच. डी.)

राजाराम भालचंद्र पाटणकर(9 जानेवारी 1927 – 24 मे 2004) हे विचारवंत, समीक्षक, सौंदर्यमीमांसक होते.

ते श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांचे नातू होते. रा.भा. पाटणकरांचे वडील भा. ल. पाटणकर हे नाशिकच्या हंसराज प्रागजी महाविद्यालयात इंग्रजीचे प्राध्यापक होते.भा.ल.पाटणकरांनी  बालकवींच्या सर्व कवितांचे सर्वप्रथम संकलन केले.

रा. भा. पाटणकर हंसराज प्रागजी  महाविद्यालयातूनच एम. ए. झाले. नंतर त्यांनी 1960मध्ये ‘कम्युनिकेशन इन लिटरेचर’ या विषयावर प्रबंध लिहून पीएच. डी.  मिळवली.

ते भावनगर, अहमदाबाद, भुज, अमरावती येथील शासकीय महाविद्यालयात इंग्रजीचे प्राध्यापक होते.1964साली मुंबई विद्यापीठात ते प्राध्यापक म्हणून रुजू झाले. नंतर इंग्रजीचे विभागप्रमुख होऊन ते तिथूनच निवृत्त झाले.

तत्त्वज्ञान, आर्थिक इतिहास, इंग्रजी साहित्य यांत त्यांना विशेष रस होता.

‘पुन्हा एकदा एकच प्याला’ हा त्यांचा पहिला लेख 1951साली ‘नवभारत’मध्ये प्रसिद्ध झाला. त्यानंतर त्यांनी ‘एरिअल’ या टोपणनावाने कथा, कविता लिहिल्या.

सौंदर्यशास्त्र हा त्यांचा व्यासंगाचा विषय होता. ‘सौंदर्य मीमांसा’,  ‘क्रोचेचे सौंदर्यशास्त्र:एक भाष्य’, ‘कांटची सौंदर्यमीमांसा’ हे त्यांचे प्रकाशित ग्रंथ आहेत. कांट, हेगेल, क्रोचे, बोझांकीट इत्यादी तत्त्ववेत्त्यांनी स्वीकारलेला सिद्धांत पाटणकरांनी या ग्रंथांतून स्पष्ट केला आहे.

‘कमल देसाई यांचे कथाविश्व ‘, ‘मुक्तीबोधांचे साहित्य ‘, ‘कथाकार शांताराम ‘ या तिन्ही लेखकांच्या साहित्यावर पाटणकरांनी लिहिलेल्या पुस्तकांच्या प्रस्तावनांत त्यांनी मानवी आणि तात्त्विक भूमिका स्पष्ट केल्या आहेत.’अपूर्ण क्रांती’ या त्यांच्या पुस्तकात सांस्कृतिक परिवर्तनाचा संदर्भ आला आहे.

त्यांचे सर्वच लेखन तर्कशुद्ध व समीक्षाक्षेत्रात मोलाची भर घालणारे आहे.

‘इकॉनॉमिक हिस्टरी ऑफ इंडिया’ व ‘ड्युरिंग ब्रिटिश रूल ‘ही त्यांची पुस्तके अपूर्ण राहिली.

☆☆☆☆☆

अनंत रामचंद्र कुलकर्णी

 डॉ.अनंत रामचंद्र कुलकर्णी (19 एप्रिल 1925 – 24 मे 2009) हे मध्ययुगीन महाराष्ट्राच्या इतिहासाचे अभ्यासक, संशोधक, इतिहासकार होते.

ते बेळगाव, अहमदनगर, सोलापूर, मराठवाडा, औरंगाबाद वगैरे ठिकाणच्या महाविद्यालयात / विद्यापीठात प्राध्यापक होते.

1964मध्ये ‘Maharashtra in the Age of Shivaji’ हा प्रबंध सादर करून त्यांनी मराठवाडा विद्यापीठाची डॉक्टरेट मिळवली.

नंतर ते पुण्याच्या डेक्कन कॉलेजात व पुढे पुणे विद्यापीठात इतिहासाचे प्राध्यापक होते. नंतर ते टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे मानद कुलगुरू झाले.

कुलकर्णीनी उपलब्ध साधनांचा समर्पक उपयोग करून शिवकालीन महाराष्ट्राचा सामाजिक व आर्थिक अंगाने विशेष अभ्यास केला व त्या कालखंडाची अधिक परिपूर्ण मांडणी केली.

‘Maharashtra in the Age of Shivaji’ (1969) व ‘शिवकालीन महाराष्ट्र ‘(1978) हे त्यांचे ग्रंथ अत्यंत वस्तुनिष्ठ व मौलिक ठरले.

ग्रॅण्ट डफ या इतिहासाकारावर त्यांनी सहा व्याख्याने दिली. ती व्याख्याने पुणे विद्यापीठाने ग्रंथरूपाने प्रकाशित केली.त्यापूर्वी काही इतिहासकारांनी डफच्या इतिहासातील दोष दाखवले होते. कुलकर्णी यांनी, ज्या परिस्थितीत डफने इतिहासलेखन केले, त्याचा विचार केला पाहिजे, असे सैद्धांतिक विवेचन केले. त्याच्या इतिहासाची घडण कशी झाली, हे स्पष्ट केले. त्यामुळे ग्रॅण्ट डफची वेगळी प्रतिमा निर्माण झाली. कुलकर्णी यांचा पूर्वग्रहविरहित निकोप दृष्टिकोन हा इतिहास अभ्यासकांसाठी वस्तुपाठ आहे.

कुलकर्णी यांच्या ‘शिवकालीन महाराष्ट्र’, ‘पुण्याचे पेशवे’, ‘अशी होती शिवशाही’, ‘जेम्स कनिंगहॅम ग्रॅण्ट डफ’ वगैरे मराठी, तसेच ‘Maharashtra in the Age of Shivaji’, ‘Medieval   Maharashtra’,  ‘Maharashtra Society and Culture’, ‘Maratha Historiography’ इत्यादी इंग्रजी ग्रंथांमुळे मराठा इतिहासलेखनाचे क्षेत्र संपन्न झाले आहे.

राजाराम भालचंद्र पाटणकर व अनंत रामचंद्र कुलकर्णी यांचा आज स्मृतिदिन आहे. त्यानिमित्त त्यांना आदरांजली.🙏

☆☆☆☆☆

सौ. गौरी गाडेकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ :साहित्य साधना, कऱ्हाड शताब्दी दैनंदिनी,  विवेक  महाराष्ट्र नायक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print