मराठी साहित्य – विविधा ☆ साॅरी… ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆

सौ. दीपा नारायण पुजारी

?विविधा ?

☆ साॅरी… ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆

‘सॉरी’ हा इंग्रजी शब्द खूपच कॉमन आहे. सरसकट तो सगळीकडं वापरलेला दिसतो. गंमत म्हणजे तान्हुल्या बाळालाही आई साॅरी म्हणताना आढळते. विनोदाचा भाग सोडला तरी हा खरोखरच एक जादुई शब्द आहे हे मात्र नक्की. सॉरी जितक्या सहजपणानं तोंडी येतं तितकं सहज; ‘ माफ करा हं!’,म्हंटलं जात नाही. तसं पाहिलं तर हे दोन्ही शब्द कानावर पडताच रागाचा पारा खाली जातोच.

आपल्या नकळत जेव्हा काही चूक घडते तेव्हा सॉरी म्हणताच वातावरण निवळते. उदा. एखाद्याला चुकून धक्का लागला तर सॉरी म्हणताच त्याच्या चेहऱ्यावर इट्स ओके ची स्मितरेषा उमटतेच. पण खरच चूक होते तेव्हा? ज्या व्यक्तीची चूक असते तीनं सॉरी म्हणणं अपेक्षित असतं. परंतु मीच का सॉरी म्हणू अशी आढ्यता बाळगणारे अधिक असतात.

हा शब्द नाती जपतो. मान, अपमान, अहंकार यापेक्षा नाती ज्याला महत्त्वाची वाटतात तो सहजपणानं माफी मागून रिकामा होतो. तर ज्याला अहंकार , मी पणा महत्त्वाचा वाटतो, तो दुसऱ्याला नाक  कसं खाली घालायला लावलं यातच समाधानी राहतो. अशी अहंकाराची वाळवी लागलेली नाती टिकणं दुरापास्त असतं. गंमत म्हणजे असे लोक जिथं गरज नाही तिथं साॅरी म्हणताना दिसतात.

सॉरी योग्य वेळी म्हणणं ही तितकंच गरजेचं असतं बरं. समजा एखाद्या ची काही वस्तू हरवली किंवा आपल्याकडून कोणाचं काही नुकसान झालं तर लगेचच सॉरी म्हणावं. नुकसानभरपाईचा प्रयत्न ही जरुर करावा. परंतु बघू, म्हणू केंव्हातरी किंवा त्यात काय एवढं असा विचार केला , माफी मागायला वेळ झाला तर नात्यातील तणाव वाढत गेलेला दिसतो. बऱ्याचदा अशा नात्यातून बदसूरच उमटतो.

सॉरी वेळेवर म्हणणं जसं महत्त्वाचं तसंच माफी मागण्याची पद्धत ही महत्त्वाची! रागारागानं, आदळ आपट करत सॉरी म्हणताना माफी मागणाऱ्याची नाराजी व्यक्त होते. आक्रस्ताळेपणानं चिडचिड करत माफी मागणं अयोग्यच. तर गोड लडिवाळ आवाजात सॉरी म्हणणारी व्यक्ती मनापासून माफी मागतेय हे जाणवतं. हात जोडून किंवा कान हातात पकडून माफी मागितली की समोरच्याचा पारा एकदम उतरतो.

एखादी जादूची कांडी फिरवावी तसा हा शब्द काम करतो. समोरच्या माणसाला हसवतो. त्याच्या चेहऱ्यावरील शंका दूर करतो. पुन्हा नव्यानं संवाद साधायला मदत करतो. रागाला पळवून लावतो. जाने दो म्हणत पुन:श्च हातात हात गुंफले जातात. खांद्याला खांदा लावून कामं केली जातात. माणसा माणसांमधील सहकार्य वाढतं. खेळीमेळीचं वातावरण निर्माण होते. हा शब्द मैत्री टिकवायला, मैत्री निभावून न्यायला, मैत्री निर्माण करायला देखील धावून येतो.

हा शब्द आपल्या शब्द कोशातला नाही आहे. तसा तो परकीय आहे. तरीही तो आपला मित्र आहे. कितीतरी गोष्टींसाठी सीमा, प्रांत, देशाच्या सीमा आपण ओलांडल्या आहेत. रितीरिवाज, परंपरा, वेषभूषा, खाद्यसंस्कृती अशा खूपशा बाबतीत आपण बदल करतो.गरजेपेक्षा सोयीचा विचार करुन वेषांतर  किती सहज केले ना आपण? धोतरा ऐवजी शर्ट पॅंट आले, साडी ऐवजी देखील ट्राऊझर्स- टॉप्स आले. हे बदल जितके आवश्यक तितकेच चांगलेही आहेत. मग शिष्टाचाराचे नियम तितक्याच प्रमाणात वापरायला काहीच हरकत नसावी.

ग्लोबल च्या नावाखाली लोकल विसरतो. अगदी रोज बोलताना देखील कितीतरी इतर भाषेतील शब्द वापरतो.पण सॉरी म्हणण्यात बहुतेक वेळा कमीपणा समजतो. या लहानशा शब्दाला ओठांवर आणायचे टाळतो.

तसंही नकळतपणे का होईना, दुसऱ्याचं मन दुखावलं गेलं की आपणही थोडे उदास होतो. खरं ना? मग काय हरकत आहे या जादूवाल्या शब्दाशी दोस्ती करायला?

माणूस हा सोशल प्राणी आहे. तो एकटा राहू शकत नाही.  समाजात, नातेवाईंकांबरोबर, मित्रमैत्रिणींबरोबर तो करतो ते व्यवहार भावनांनी युक्त असतात. कोरडेपणानं होत नाहीत. एकूण काय , नात्यातील, व्यवहारातील, सकारात्मकता वाढवण्यासाठी, नाती अधिक सुदृढ करण्यासाठी थॅंक्यू इतकंच सॉरी म्हणणं महत्त्वाचं.

© सौ. दीपा नारायण पुजारी

इचलकरंजी

9665669148

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ स्त्री कालची आणि आजची…! भाग 2 ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

?  विविधा ?

☆ स्त्री कालची आणि आजची…! भाग 2 ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

‘कशी आहे ती?’  शेवटी तिच्या कष्टानाही मर्यादा असतेच ना!

 आताची स्त्री समाजाभिमुख झाली. तिचे कार्यक्षेत्र बदलले. त्यानुरूप पोषाख ही बदलला. स्त्री सौंदर्याच्या कल्पना ही बदलल्या. लांबसडक केसांची निगा राखण्यास वेळ कमी मिळू लागला. त्यामुळे तिथेही शॉर्टकट शोधण्यात आले. आताच्या काळात खऱ्या दागिन्यांनी मढण्यापेक्षा  आर्टिफिशियल, आकर्षक दागिने बाजारात आले. अर्थात सोन्याच्या दागिन्यांना चोरीचा धोकाही होताच! कामाला जाण्यासाठी लागणारा वेळ, कामाच्या तासाच्या वेळा जर वेगवेगळ्या असतील तर असे नटून-थटून जाणे स्त्री ला आवडत तर नाहीच पण सोयीचेही नसते!

त्यामुळे स्त्रीची एक वेगळीच प्रतिमा गेल्या दहा-वीस वर्षात आपल्या डोळ्यासमोर उभी झाली आहे. पारंपारिक गोष्टींचा काही प्रमाणात त्याग करावा लागला आहे. तरीही स्त्रीची नटण्याची हौस ही संपलेली नसते. ती स्वतःला सोयीनुसार सजवून आकर्षक ठेवते.यातून  तिची जगण्याची उर्मी दिसते. लोकल मधून जाणाऱ्या मुंबई-पुण्याच्या स्त्रिया लोकल मध्येच सण उत्सव साजरे करतात. अगदी केळवण, डोहाळजेवण, हळदीकुंकू यासारखे कार्यक्रम सुध्दा हौसेने करतात. स्त्री अशी उत्सवप्रिय आहे. ती मायाळू आहे. आयुष्य जगण्याची तिला आस आहे. स्त्रीचे सारे जगणे एक उत्सव आहे. लहानपणापासूनच मुलगी म्हणून स्त्री स्वतःला व्यक्त करत असते. संसार मांडण्याची तिला आतून ओढ असते. पूर्वीच्या काळी छोट्या मुली चूल,बोळकी घेऊन खेळत असत. आत्ताच्या मुलींच्या खेळात मायक्रोवेव्ह, फ्रीज, गॅस या  सारख्या उपकरणांची खेळण्यात भर पडली आहे. परकर पोलकं घालणारी आणि आईला साडीत पाहणारी मुलगी आता लहानपणापासून च ड्रेस,मिडी,मॅक्सी यामध्ये सहजतेने वावरते. हे बदल आपल्याला आता दिसतात.

स्त्रीचे पोषाखा बरोबरच व्यक्तीमत्व ही बदलत गेले आहे.

काळ बदलला, आता स्त्री ही पायपुसण्यासारखी नसून ती समाजात स्वतंत्रपणे वावरणारे व्यक्तिमत्व आहे! शैक्षणिक सामाजिक अशा सर्वच क्षेत्रात आपला ठसा ती उमटवत असते. अजूनही खेड्यापाड्यातल्या स्त्रीला अजूनही हे स्वातंत्र्य पूर्णतः मिळालेले नाही, तरीही शिक्षणाची धडपड आणि इतरही क्षेत्रात तिचा कार्यभाग नक्कीच वाढला आहे. नजीकच्या काळात असे भाग्य, उत्कर्ष स्त्रीच्या वाट्याला येणार हे नक्कीच! तिला समानतेच्या सर्व संधी उत्तरोत्तर मिळोत हीच परमेश्वर चरणी प्रार्थना!

                      क्रमशः ….

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चं म त ग ! भन्नाट ट्रॅकर! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

? चं म त ग ! ⭐ श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

💃 भन्नाट ट्रॅकर! 😅

“नमस्कार पंत ! हा तुमचा पेपर !”

“मोऱ्या रोज गपचूप पेपर ठेवून गुल होतोस, आज वेळ आहे वाटत बोलायला ?”

“थोडा वेळ आहे खरा पंत आणि तुमचा सल्ला सुद्धा हवा होता, म्हणून हाक मारली !”

“म्हणजे कामा पुरता पंत आणि चहा पुरती काकू ! काय बरोबर नां ?”

“पंत कसं आहे नां सध्या कामाच्या गडबडीत, बरेच दिवसात काकूंच्या हातचा आल्याचा चहा पोटात गेला नाही त्यामुळे पोट जरा कुरकुर करतच होतं, म्हणून म्हटलं एकात एक दोन कामं उरकून टाकू !”

“बरं, बरं, कसा काय चालला आहे तुझा नवीन लघुउद्योग ?”

“एकदम मस्त ! तुम्हीच तर गेल्या वेळेस बोलणाऱ्या कुकरची आयडिया दिलीत आणि त्याला भरपूर रिस्पॉन्स मिळतोय समस्त भगिनीवर्गाचा !”

“चांगलं आहे ! आज काय कामं काढलं आहेस मोऱ्या, कुठल्या बाबतीत सल्ला हवा आहे तुला ?”

“पंत, आता बोलणाऱ्या कुकरची प्रॉडकशन लाईन सेट झाली आहे माझी ! आता लोकांना आवडणार, उपयोगी पडणार तसंच दुसरं कुठलं तरी नवीन प्रॉडक्ट काढायचा विचार मनांत येतोय, पण काय प्रॉडक्ट काढावं तेच कळत नाही ! म्हणून म्हटलं तुमच्या डोक्यात काही नवीन आयडिया वगैरे आहे का हे विचारावं, म्हणून आलोय !”

“आहे नां, नसायला काय झालंय ? उगाच का डोक्यावरचे गेले ?”

“काय सांगता काय पंत, नवीन प्रॉडक्टची आयडिया….”

“अरे आज सकाळीच माझ्या या सुपीक डोक्यात आली आणि आज तू जर का भेटला नसतास ना, तर मीच तुला बोलावून घेवून सांगणार होतो ती नवीन आयडिया !”

“पंत आता मला धीर धरवत नाहीये, लवकर, लवकर सांगा तुमच्या डोक्यातली नवीन आयडिया !”

“अरे मोऱ्या, आमच्या  सगळ्या सिनियर सिटीझनचा हल्ली एक हक्काचा आजार झालाय, त्यावर एखाद औषधं…..”

“काय पंत ? आजारावर औषधं द्यायला मी डॉक्टर थोडाच आहे ?”

“अरे गाढवा, आधी माझं बोलणं तरी नीट ऐकून घे, मग बोल !”

“सॉरी पंत, बोला !”

“अरे, आजकाल स्मरणशक्ती दगा देते आम्हां सिनियर सिटीझन लोकांना आणि साधा डोळ्यावरचा चष्मा कुठे काढून ठेवलाय तेच वेळेवर आठवत नाही बघ !”

“बरं मग ?”

“मला एक सांग मोऱ्या, तुम्हां हल्लीच्या तरुण पोरांना सुद्धा, तुमचा मोबाईल तुम्हीच तुमच्या हातांनी, कुठे ठेवला आहे ते पण कधी कधी आठवत नाही, काय खरं की नाही ?”

“हॊ पंत, मग आम्ही लगेच…..”

“दुसऱ्या मोबाईल वरून कॉल करतो आणि रिंग वाजली की मोबाईल कुठे आहे ते तुम्हाला बरोब्बर कळतं, होय नां ?”

“बरोबर पंत ! पण त्याचा इथे काय संबंध ?”

“सांगतो नां ! आता तू काय कर, चष्म्याला GPS tracker लावून द्यायचा नवीन उद्योग सुरु कर ! म्हणजे काय होईल अरे माझ्या सारखी सिनियर सिटीझन मंडळी कुठे चष्मा विसरली, तर मग तो शोधायला प्रॉब्लेम यायला नको, काय कशी आहे नवीन उद्योगाची आयडिया ?”

“काय भन्नाट आयडिया दिलीत पंत ! मानलं तुम्हाला ! धन्यवाद !”

© श्री प्रमोद वामन वर्तक

०४-०३-२०२२

(सिंगापूर) +6594708959

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ स्त्री कालची आणि आजची…! भाग १ ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

?  विविधा ?

☆ स्त्री कालची आणि आजची…! भाग १ ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

‘कशी आहे ती?’ नारीशक्ती वरील एक लेख सहज वाचनात आला! खरंच कशी आहे स्त्री?-स्त्री ही घराची शोभा! संसाराचा गाडा ओढणारी, कुटुंबाशी निगडित असलेली व्यक्ती! फार प्राचीन काळी गार्गी, मैत्रेयी सारख्या विद्वान स्त्रिया होऊन गेल्या. त्यानंतरच्या काळातही अहिल्या, द्रौपदी, तारा,सीता, मंदोदरी यासारख्या पंचकन्यांना स्त्री सन्मान मिळाला.त्यानंतर जिजाऊ,राणी लक्ष्मीबाई, ताराराणी यांसारख्या कर्तृत्ववान स्त्रिया होऊन गेल्या. पण मध्यंतरी चा एक काळ असा आला की स्त्रीला चूल आणि मूल या चक्रात अडकून पडावे लागले. तेव्हा स्त्रीशिक्षणाचा अभाव होता. पुरुषप्रधान संस्कृतीच्या वलयाखाली स्त्री चे अस्तित्व दडपले गेले. कुटुंब सांभाळणारी, आल्या गेल्याचे स्वागत करणारी, वेळप्रसंगी एक हाती संसार करणारी हेच  स्त्रीचे रूप राहिले. संसार रुपी रथाची दोन चाके म्हणून स्त्री आणि पुरुष दोघांचा विचार आपण करतो. स्त्री हे चाक असे काही पेलून धरते की, कधीकधी दोन्ही चाकांचा बोजा तिच्या अंगावर असतो. स्त्री ही अशी गृहिणी, सहधर्मचारिणी असते!

  पूर्वी स्त्रियांना शिक्षण कमी होते, पण व्यवहारज्ञान मात्र खूप होते. पैसा कमी होता पण असणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा उपयोग जास्तीत जास्त कसा करता येईल याकडे लक्ष असे. त्यामुळे स्त्री काटकसरीने संसार करून तो यशस्वी करून दाखवत असे.

श्यामची आई मधील आई ही अशीच गरिबीत राहून स्वाभिमानाने संसार करणारी स्त्री होती. त्याकाळी कित्येक विधवा स्त्रियांना संसार करून मुलांची, कुटुंबाची जोपासना करावी लागली आहे. माझीच आजी एका मोठ्या घरातील होती.पतीच्या निधनानंतर शिक्षण नाही, हातात पैसा नाही, मुलांची शिक्षणे व्हायची होती, अशावेळी तिने न डगमगता संसार केला. मोठ्या घरातील फक्त दोन-तीन खोल्या स्वतःकडे ठेवून बाकी सर्व खोल्या विद्यार्थ्यांना रेंट वर दिल्या आणि त्या भाड्याच्या पैशात रोजचे व्यवहार भागवायला सुरुवात केली. घर हाच तिचा मोठा आधार होता. हातात असलेले दागिने विकून मुलांची पुढील शिक्षणे केली. त्यानंतर सुनांसाठी पुन्हा सोने खरेदी करून दागिने करून घातले. स्वतःच्या कर्तृत्वाने असे घर सांभाळणाऱ्या त्या काळातील अनेक महिलांच्या गोष्टी आपण ऐकतो.

    काळाच्या ओघात शिक्षणाबरोबर स्त्रीच्या कर्तृत्वाच्या कक्षा रुंदावल्या आणि स्त्री पुरुषाशी बरोबरी करता करता त्याच्यापुढे कधी निसटून गेली हे कळलेच नाही! आज प्रत्येक आघाडीवर स्त्री पुढे आहे. अवकाश क्षेत्र, संशोधन, संरक्षण क्षेत्र, राजकारण यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रात स्त्रिया कार्यरत आहेतच पण रोजच्या जीवनातही बरेचसे व्यवहार स्त्रिया सांभाळतात. पूर्वी मुलांवर असलेली माया, प्रेम स्वयंपाकघरातील कुशलतेवर अधिक दिसत असे. मुलांना स्वतः  करून चांगले चांगले खाऊ घालणारी, प्रेमाने घास देणारी,कोंड्याचा मांडा करणारी स्त्री आदर्श होती. पण नंतरच्या काळात नोकरी करून, स्वतःची ओढाताण करून मुलांसाठी घरी पदार्थ बनवणारी स्त्री हळूहळू कालबाह्य झाली. कामावरून घरी येतानाच वडापाव, दाबेली, केक यासारखे पदार्थ घरी येऊ लागले, तर काही वेळा ऑर्डर करून आणलेल्या पिझ्झा मुलांना  खुश करू लागला. काही ठिकाणी घरी स्वयंपाकाला बाई ठेवून ती गरज भागवू लागली. काही तडजोडी कराव्या लागल्या, पण त्याला इलाज नव्हता. त्यांची मुलांवरील माया, प्रेम कमी झालं असं नाही, पण दिवसभर ऑफिस काम करून घर  सांभाळणे ही तिच्यासाठी तारेवरची कसरत होती. शेवटी तिच्या कष्टानाही मर्यादा असतेच ना!

                      क्रमशः ….

 

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆☆ महिला दिना निमित्त – स्त्री शक्तीला मानाचा मुजरा ☆☆ सौ. विद्या वसंत पराडकर ☆

सौ. विद्या वसंत पराडकर

?विविधा ?

☆ महिला दिना निमित्त – स्त्री शक्तीला मानाचा मुजरा ☆ सौ. विद्या वसंत पराडकर ☆

(नमस्कार रसिकहो! जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सर्व महिलांवर शुभेच्छांचा वर्षाव करून भारतीय स्त्रीशक्तीला प्रस्तुत लेखाद्वारे मानाचा मुजरा प्रदान करीत आहे.)

भारतीय संस्कृतीत ‘स्त्रीला’ अनन्य साधारण स्थान आहे. पुरातन काळापासून आजच्या अत्याधुनिक युगापर्यंत ती ‘शक्ती देवता’ म्हणून ओळखल्या जाते.  ती मांगल्य, सुचिता, पावित्र्य यांची मूर्ती आहे.  प्रेम, वात्सल्य, ममता यांची कीर्ती आहे.  नररत्नांची खाण आहे. कुटुंबाची शान आहे. समाजाची मान आहे.

आजची स्त्री उच्चविद्याविभूषित आहे. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून ती आपल्या कर्तव्य कर्मात उभी आहे.  चूल व मूल ही दोन्ही क्षेत्रे सांभाळून तिने आर्थिक बाजूही सांभाळली आहे.  खरेच कुटुंबाची ती ‘कणा’ आहे. स्वाभिमान,अस्मिता हा तिचा बाणा आहे.  जवळ जवळ सर्वच क्षेत्रे तिने आज पादाक्रांत केली आहे.  केवळ पृथ्वीवरच नव्हे तर अंतराळात जाणारी भारतीय पहिली स्त्री कल्पना चावला हिने हा मान मिळविला आहे.

स्वतंत्र भारताच्या पहिल्या पंतप्रधान इंदिरा गांधी होत्या.  प्रतिभाताई पाटील यांनी पहिल्या राष्ट्रपती पदाचे स्थान भुषविले आहे. अगदी अलीकडचे उदाहरण द्यायचे असेल तर स्वाती महाडिक व सुप्रिया म्हात्रे यांचे देता येईल.  तसेच अगदी अलीकडे अंतराळात गेलेली भारतीय महिला म्हणजे शिरीष बंदला ही होय.

स्त्रीचे महत्व हे नदीसारखे असते. म्हणून केवळ प्रसंगोचित तिचा उदो उदो न करता नेहमीच तिला शाश्वत मानबिंदू देणे समाजाचे कर्तव्य नव्हे का?  कोणत्याही विकृत भावनेला बळी न पडता समाजाने तिच्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे.  या नवीन दृष्टिकोनाचे पालन केल्यास आज आपण समाजात तिचे भेसुर, भयान, निंदास्पद अपमानकारक चित्र बघतो ते मिटविण्यास मदत होईल.  स्त्री एक आदर्श माता आहे. याचा अंगीकार केल्यास जिजाबाई ला शिवबा निर्माण करता येईल.  नव्या युगाला औरंगजेबाची गरज नसून शिवबाची नितांत गरज आहे.  शिवरायाचा आदर्श व आदर म्हणजेच स्त्रीत्वाचा गौरव होईल व स्त्रीत्वाचा गौरव हाच तिला केलेला  मानाचा मुजरा होईल. म्हणूनच कवी म्हणतो,

| मूर्तिमंत लक्ष्मी तू घरादारांची

     कुशल अष्टपैलू मंत्री तू जीवनाची

    शिल्पकार तू नवनिर्मितीची

     खाण असे तू नररत्नांची |

  | दुर्गा असे तू जीवन संघर्षाची

    कालिका भासे तू रौद्ररुपाची

    राणी असे तू स्वातंत्र लक्ष्मीची

    संगम देवता तू शक्तीयुक्तीची |

  | ढाल असे तू कुटुंब देशाची

    प्रतिकाराच्या तलवारीची

    कीर्तिवंत तू कर्मभूमीची

    सदा वंदनीय तू युगायुगांची |

या स्त्रीच्या यशोगाथेचा गौरव करून माझ्या लिखाणाला पूर्णविराम देते

 

© सौ. विद्या वसंत पराडकर

पुणे.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ स्त्री…रंग जीवनाचे … ☆ सौ राधिका भांडारकर

सौ राधिका भांडारकर

?विविधा ?

☆ स्त्री…रंग जीवनाचे … ☆ सौ राधिका भांडारकर☆

स्री म्हणजे देवाने निर्माण केलेली एक अद्भुत चमत्कृती आहे…

अनेक दैवी तेजापासून उत्पन्न झालेली स्त्री म्हणजे दिव्य शक्तीचाच साक्षात्कार आहे..

निसर्गानेच स्त्रीला निर्मीतीचे वरदान दिले आहे.

म्हणूनच स्त्री ही सृष्टीची सर्वश्रेष्ठ अपूर्व कलाकृती आहे..

जीवनातला प्रमुख रंग आहे…

तरीही स्त्री पुरुषांच्या एकत्रित जीवनाचा विचार केला तर ती दुय्यम स्थानावर असते.. तिला अबलाच मानले जाते. तिची जीवनपद्धती, तिच्या वर्तणुकीचे नियम तिच्या चारित्र्याविषयीचे आराखडे हे पुरुषप्रधान संस्कृतीने बांधल्यामुळे ही महान स्त्रीशक्ती दडपल्यासारखी वाटते मात्र… पण जेव्हा या परंपरेच्या साखळ्या तोडून ती लखलखत्या रंगात अवतरते तेव्हांच घडते तिच्यातले दिव्यत्वाचे तेज….!! मग हीच गौरी दुर्गा बनते… दुष्ट वृत्तीची, असत्याची, अनैतिकतेची संहारक बनते… ही नम्र, शालीन, शांत सात्विक, त्यागमूर्ती तेजमूर्ती संभवते… आणि एका वेगळ्याच रंगाने नटते…

माझे काका मला नेहमी सांगायचे, तुझी काकु अशक्त वाटते ंना.. दुर्बल वाटते ना… गरीब वाटते ना.. परावलंबी वाटते ना…

नाही बरं.. जेव्हा संसारात काही समस्या. संकट निर्माण होते तेव्हा हीच काकु बलदंड बनते. मी पार ढेपाळून  गेलेला असतो तेव्हा ही शक्ती बनून रणरागिणी बनते…

बहु शस्त्रधारिणी बनते… संकट पार होई पर्यंत तिची ताकद संपत नाही. श्रद्धेचं विलक्षण बळ तिच्या पाठी असते.. तेव्हा जाणवते, मीच सगळा वेळ एक अबला स्त्री होतो. आणि ती योध्याच्या भूमिकेतील पुरुष असते… स्त्री म्हणून तिचे हे रंग जेव्हा मी अननुभवतो तेव्हांच तिच्याशिवाय माझे जीवन व्यर्थ आहे….. हे  तीव्रतेने जाणवते…

माता भगिनी पत्नी या नात्यांत तिचे मूलभूत रंग असतातच, पण तिच्या व्यक्तीमत्वात अनेक सुप्त रंग असतात, जे जीवनात रंग भरतात… ओळखणारे ओळखतात आणि त्यांच्या जीवनाची सफर सुखदायी करतात…. माझे आजोबा नेहमी म्हणायचे,

“ज्या घरात स्त्रीला मान दिला जातो तिथे लक्ष्मीचा वास असतो…..”

म्हणून स्री शक्तीची पूजा फक्त गाभार्‍यात नको ती घराघरात हवी…

स्त्री …जीवनाचे रंग निरनिराळे…

जीवन  अनेकांगाने रंगवणारे…

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग 7 – कृतज्ञता ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

[भारतीय संस्कृतीतमध्ये आपल्या जीवनात असणार्‍या गुरूंना अर्थात मार्गदर्शन करणार्‍या व्यक्तिंना अत्यंत महत्वाचे स्थान आहे, हे महत्व आपण शतकानुशतके वेगवेगळ्या पौराणिक, वेदकालीन, ऐतिहासिक काळातील अनेक उदाहरणावरून पाहिले आहे. आध्यात्मिक गुरूंची परंपरा आपल्याकडे आजही टिकून आहे. म्हणून आपली संस्कृतीही टिकून आहे.

एकोणीसाव्या शतकात भारताला नवा मार्ग दाखविणारे आणि भारताला आंतरराष्ट्रीय विचारप्रवाहात आणणारे, भारताबरोबरच सार्‍या विश्वाचे सुद्धा गुरू झालेले स्वामी विवेकानंद.

आपल्या वयाच्या जेमतेम चाळीस वर्षांच्या आयुष्यात, विवेकानंद यांनी  गुरू श्री रामकृष्ण परमहंस यांचे शिष्यत्व पत्करून जगाला वैश्विक आणि व्यावहारिक अध्यात्माची शिकवण दिली आणि धर्म जागरणाचे काम केले, त्यांच्या जीवनातील महत्वाच्या घटना आणि प्रसंगातून स्वामी विवेकानंदांची ओळख या चरित्र मालिकेतून करून देण्याचा हा प्रयत्न आहे.] 

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग 7 – कृतज्ञता ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

“कोणावरही उपाशी राहायची वेळ येऊ नये”, अशी राजकीय वाक्यं सध्या करोनाच्या पार्श्वभूमीवर सतत ऐकायला मिळत आहेत. एरव्ही रस्त्यारस्त्यात कुणी अडवून काही मागायला लागलं तर चीड येते आणि भीक मागण्यापेक्षा काहीतरी काम करावं असं आपण सुचवित असतो. त्याउलट, मंदिराबाहेर दान देणारे  श्रद्धावान भाविक खूप असतात, तर हे दान स्वीकारणार्‍या व्यक्तीही मंदिराबाहेर खूप दिसतात. पण आजची उपाशी राहण्याची परिस्थिति वेगळी आहे. लॉक डाउन काळात आपआपल्या गावी परत जाणारे मजूर, कामगार व काही लोक यांच्यावर अशी वेळ आली आहे. हे बघून आपल्याला दु:ख होते. असच कलकत्त्यात एक माणूस उपासमारीने मेला अशी बातमी पेपर मध्ये छापून आली, ती वाचून स्वामी विवेकानंद, “देशाचा सर्वनाश ओढवणार, देश रसातळाला जाणार” असे दु:खाने म्हणू लागले. या दुखाचे कारण त्यांचे मित्र हरिपाद मित्र यांनी विचारलं. त्यावर स्वामी म्हणले, “ इतर देशात कितीतरी अनाथ आश्रम, गरीबांना कामं पुरवणार्‍या संस्था, धर्मादाय, सार्वजनिक फंड असूनही शेकडो लोक दरवर्षी उपासमारीने मेल्याचं आपण वर्तमानपत्रात वाचतो. पण भुकेलेल्याला मूठभर अन्न देण्याची  प्रथा आपल्या देशात असल्यामुळे कधी कोणी मेल्याचे ऐकिवात नव्हते. आज प्रथमच वाचले की, दुष्काळाचे दिवस नसतानाही उपासमारीने एक मनुष्य अन्नान्न दशा होऊन कलकत्त्यासारख्या शहरात मृत्यूमुखी पडला”.

आपण नेहमीच अनुभवतो की आज काही पैसे दान दिले तर फुकट मिळतात म्हणून त्या पैश्यातून व्यसनाधीन होऊन खितपत पडणारे लोक आहेत. तशी सवय लागते त्यांना. पण स्वामी विवेकानंद म्हणतात, दारात भिकारी आला तर, आपल्या ऐपतीनुसार त्याला काहींना काही देणेच योग्य आहे. त्याचा सदुपयोग होईल की नाही याची नसती चिंता कशाला करायची? कारण तुम्ही त्याला दान दिले नाही तर तो  पैशांसाठी तुमच्याकडे चोरी करेल, त्यापेक्षा दोन पैसे भीक मिळाली तर स्वस्थ तरी बसेल घरात. त्यामुळे निदान चोर्‍या होणार नाहीत.

त्यांच्या मते, आपले कर्तव्य म्हणजे लोकांना सहाय्य करणे. त्यांच्याशी कृतज्ञतेचे वर्तन ठेवणे. कारण तो गरीब असल्यामुळेच मागतोय. लक्षात ठेवा दानाने धन्य होत असतो तो देणारा, घेणारा नव्हे. जगावर आपल्या दयाशक्तीचा प्रयोग करण्यास वाव मिळाल्यामुळेच तुम्ही स्वताला समर्थ बनवू शकता या बद्दल तुमच्या मनात कृतज्ञता असली पाहिजे.  

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ माझी पूजा अपूर्ण आहे…. अनामिक ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

?विविधा ?

☆ माझी पूजा अपूर्ण आहे…. अनामिक ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

पूजेसाठी रोज मी उपकरणं स्वच्छ करतो! पण जोपर्यंत विकारांच्या मलीनतेपासून मन स्वच्छ होत नाही, तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे!

रोज मी देवासमोर पांढरी रांगोळी काढतो! पण त्या पांढर्‍या रंगाप्रमाणे माझे मन धवल, निर्मळ होत नाही, तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे!

रोज ताम्हनात देवांवर मी पाणी घालतो! पण मनातल्या आसक्ती वर मी जोपर्यंत पाणी सोडत नाही, तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे!

रोज मी देवाजवळ दिवा लावतो!

पण जोपर्यंत समाधानी वृत्तीचा नंदादीप मी मनात लावत नाही, तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे!

रोज मी देवाजवळ उदबत्ती लावतो! पण संसारतापाने मंदपणे जळत असताना चित्तशुद्धीचा अंगारा जोपर्यंत मला लाभत नाही, तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे!

रोज मी देवाजवळ कापूर जाळतो! पण त्या कापराच्या वडीप्रमाणे मनातले कुविचार क्षणात जळून जात नाहीत, तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे!

रोज आरती करताना मी देवाचा गुणगौरव करतो! पण माझ्या आजूबाजूच्या माणसांमधले गुण जोपर्यंत मी शोधत नाही, तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे!

रोज मी देवासमोर स्थिर बसुन तासभर ध्यान करतो! पण जोपर्यंत माझ्या चंचल चित्तवृत्ती स्थिर होत नाहीत, तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे!

वृक्षवेलींनी प्रयत्नपूर्वक निर्मिलेली फुले मी देवाला रोज वाहतो! पण माझ्या कष्टसाध्य सत्कर्माची फुले मी जोपर्यंत समाजाला वाटत नाही, तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे!

देवासमोर मी रोज प्रसाद ठेवतो!

पण त्याने मला दिलेला हा जीवनरूपी प्रसाद परोपकारी वृत्तीने मी इतरांना देत नाही, तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे!

 श्री गुरुदेव दत्त .

संग्रहिका – सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

९८२२८४६७६२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ गौरव मराठी भाषेचा… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

?विविधा ?

☆ गौरव मराठी भाषेचा… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त्ताने…. सकाळपासून मोबाईल वर भाषा दिनानिमित्त चे विशेष वाचताना सहज लक्षात आलं ! महाराष्ट्राची प्रमाणित मराठी भाषा म्हणून जी आपण वापरतो ती पुस्तकातील भाषा ! पण बोली भाषा दर पाच मैलागणिक बदलते असे पूर्वी पासून ऐकून आहे! त्याप्रमाणे महाराष्ट्रात सुध्दा देश, कोकण, खानदेश,वर्हाड या प्रत्येक भागातील मराठी आपले वेगळेपण दाखवते!

मी महाराष्ट्रातील या सर्व भागात थोडा थोडा काळ राहिले आहे.आणि अनुभवली आहे वेगवेगळी मराठी भाषा.मिरज- सांगली तील भाषेवर कर्नाटक जवळ असल्याने कानडी भाषेची छाप दिसून येते.प्रत्येक वाक्यात शेवटी ‘की’ चा उपयोग!’काय की,कसं की..इ.’खानदेशाजवळ गुजरात राज्य असल्याने तेथील मराठीत गुजराथी, अहिराणी भाषेचे शब्द आपोआपच येतात!

तर नागपूर च्या मराठी भाषेत हिंदी शब्दांचा वापर जास्त दिसून येतो.’करून राहिले, बोलून राहिले,होय बाप्पा’ असे शब्द प्रयोग वर्हाडी भाषेतच दिसतात!

भाषेचा प्रवास हा असाच चालतो.व्यवहारात,बोली भाषेत अशी भिन्नता दिसत असली तरी पुस्तकी भाषा ही साधारणपणे एकच असते. ज्ञानेश्वरांनी सर्वसामान्य लोकांना कळावी म्हणून संस्कृतमधील भगवद्गीता त्याकाळात प्राकृत मराठीतून लिहिली पण आपण आता ज्ञानेश्वरी वाचायला घेतली तर ती भाषा आपल्याला पुष्कळ वेळा कळत नाही. त्यातील कित्येक शब्दांचे अर्थ लागत नाहीत! त्यातील भाषेचे सौंदर्य कळायला पुन्हा शब्दार्थ बघावे लागतात!

काळानुरूपही भाषा बदलत असते.लहान बालकाला बोलायला शिकताना अनुकरण हेच माध्यम असल्याने आई जे शब्द उच्चारेल तेच ते बाळ बोलते. म्हणून मातृभाषेचे महत्त्व फार आहे!आपण कितीही शिकलो, वेगवेगळ्या देशात गेलो तरी कोणतीही तीव्र भावना व्यक्त करताना आपण मातृभाषेतून च बोलतो.आपली मराठी भाषा इतकी समृद्ध आहे की तिची अभिव्यक्ती करताना शब्द संपदा कधी अपुरी पडत नाही! ओष्ठव्य, दंतव्य, तालव्य, कंठस्थ..

अशा सर्व प्रकारच्या अक्षरांनी ती संपन्न आहे! मराठी भाषा आपल्या शरीर मनाशी एकरूप झालेली असते.म्हणून ती मातेसमान आहे. त्या मराठी भाषेला आपण जतन केले पाहिजे,   

मराठी दिनासाठी ची शुभेच्छा!

एक  मराठीप्रेमी…

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ रंग संवेदना… ☆ सौ ज्योती विलास जोशी ☆

सौ  ज्योती विलास जोशी

?  विविधा ?

☆ रंग संवेदना… ☆ सौ ज्योती विलास जोशी

एक रंगसंवेदना असते.आवडत्या रंगाला त्याच्या मनःपटलावर एक स्थान असतं. रंगीबेरंगी दुनियेतला तोच एक रंग त्या व्यक्तीला भावतो आणि आनंदही देतो.

‘रंग रंग के फुल खिले है भाए कोई रंग ना’ ह्या प्रेमिकेच्या ओळीतून तोच अर्थ प्रतीत होतो.’प्रेमरंगा’चा शोध घेत तिचे डोळे भिरभिरत असतात. नेमक्या परावर्तित होणाऱ्या किरणांच्या (प्रेमिकाच्या) शोधात ते असतात.आणि तसे एकदा झालं की मग,’ मुझे रंग दे, मुझे रंग दे’ असं म्हणत हर्षोल्हासात ती रंगून जाते.

लहानपणी इंद्रधनुष्यातले रंग ‘जातानाहीपानीपी’ असा ठेका धरून पाठ केलेले…..तेव्हाच मनांत आलं की या इंद्रधनुष्यात गोरा रंग कुठे आहे?धाडसानं तसं बाईंना विचारलं देखील होतं. विज्ञानाची शिडी धरून बाईंनी ‘सात रंग मिळून जो होतो तो गोरा म्हणजे पांढरा रंग.’  असही सांगितल्याचं आठवतंय. माझ्या बाल मनानं सोयिस्कर अर्थ असा लावला होता की सगळे रंग नसले की ‘अंधार’ म्हणजे काळा रंग…. मग या अंधाराला पारंब्या फुट्याव्यात तसा काळा रंग मला दिसू लागला आणि आठवली ती संत नामदेवांची गवळण… ‘रात्र काळी घागर काळी जमुना जळे ही काळी ओ माय’. … ‘देव माझा विठू सावळा’ या गाण्यातील सावळ्या रंगाचं सौख्यही विठूला पाहिल्यावर डोळ्यात भरलं. डोळे आणि मन सावळ्या रंगाचा शोध घेत घेत श्यामलसुंदर अजिंठा-वेरूळची लेण्या पर्यंत पोहोचलं. या स्त्रियांचं सौंदर्य सावळ्या रंगा व्यतिरिक्त आणखी कोणत्याही रंगानं खुललं नसतं हे मनोमन पटलं.

लोकसाहित्यात चंद्रकलेचा उल्लेख पैठणी पेक्षाही जास्त आढळतो. त्यातही तांबड्या चन्द्रकळेपेक्षाही काळी चंद्रकळा जास्ती रूढ…. त्या काळ्या चंद्रकळेतील नारी काळे मणी आणि काजळ यांनी खुलून दिसते. त्यात तिने काळी गरसोळ घातलेली असेल तर मग त्या श्यामलेचे वर्णन ते काय करावे?

विठ्ठलाला माउली म्हणत ज्ञानोबांनी’ रंगा येई वो’ अशी हाक मारली आहे. रंगांच्या यादीत काळ्यासावळ्या रंगाला अव्वल स्थान मिळालं ते त्यांच्या या हाकेनं…

‘निळा सावळा नाथ’ असे आपल्या पतीचे वर्णन करताना निळ्या रंगाच्या आडून सावळेपण दाखवताना नारीच्या भावनेतील शीतलता, घनता आणि गारवा जाणवतो. कृष्ण आणि विष्णू यांच्या सावळ्या रंगात निळसर रंगाची झाक आहे. निळ्या सावळ्या रंगांसोबतच पांढऱ्या रंगाच अप्रूपही तितकंच आहे. लेखक कवी साहित्यिक यांनी आपल्या साहित्यातून या रंगीबेरंगी दुनियेतील सर्व रंगांची उधळण केली आहे.

पद्मजा फेणाणी यांचं ‘शुभ्र ज्वाला’ या अल्बम मधील ‘पेटून कशी उजळेना ही शुभ्र फुलांची ज्वाला’ हे गीत पांढऱ्या रंगाचं सौंदर्य खुलवतं. ‘पुस्तकातली खूण कराया दिले पण एकदा पीस पांढरे’ या त्यांच्याच गाण्यात त्यांच्या आवाजातून शुभ्र पांढऱ्या पिसार्याचं सौंदर्य झाकोळतं.

लावणीतील रंग बरसातही अनुभवण्यासारखी आहे. होळीच्या सणातली रंगांची उधळण करताना ‘खेळताना रंग बाई होळीचा म्हणत… तर ‘कळीदार कपूरी पान केशरी चुना रंगला कात’ म्हणत सुलोचना बाईंनी खाऊ घातलेलं पान लावणीचा ठसका देतं.’पिवळ्या पानाचा देठ की हो हिरवा’म्हणत हिरव्याकंच शालूतील लावणीसम्राज्ञी मन जिंकते. ‘श्रावणाचं ऊन मला झेपेना पिवळ्या पंखाचा पक्षी नाव सांगेना. हिरव्या मोराची थुईथुई थांबेना’ अशी लडिवाळ तक्रार करत लावणीसम्राज्ञी रंगात येते तेव्हा मन लावणीत रंगून जातं.

इंद्रधनुष्यातले रंग, काळा पांढरा रंग यांच्यासोबतच लिंबू, पारवा, श्रीखंडी, चिंतामणी  गुलबक्षी पोपटी, आकाशी, डाळिंबी, तपकिरी, शेवाळी, मोतिया, राखाडी, केतकी,  आमसुली याआ णखीन अशा अनेक रंगानी माझं आयुष्य रंगीबेरंगी करून टाकलं. लहानपणी एका रंगानं मात्र मला कोडयात टाकलं होतं. ‘गणराज रंगी नाचतो’ हा रंग कोणता? तो कलेचा रंग होता हे मोठे झाल्यावर लक्षात आलं.’अवघा रंग एक झाला’ असं म्हणत सोयराबाईंनी मानव जातीतील सारे भेद मिटवले. हा रंग देखील समजायला मोठं व्हावं लागलं….

अशा अनेकविध गाण्यांच्या लोलकातून गीतकारांच्या प्रतिभेचे किरण जाऊन माझ्या मनःपटलावर रंगीबेरंगी इंद्रधनुष्य उमटलं. या इंद्रधनुष्यात अगणित रंग होते. त्या रंगात मनानं  रंगून जायचं ठरवलं.रंग उडलेल्या मनाच्या पापुद्र्यांवर आता आगळे वेगळे रंग चढू लागले. आयुष्याचं चित्र रंगीबेरंगी रंगांनी रंगवून टाकायचं त्यानं ठरवलं…..

© सौ ज्योती विलास जोशी

इचलकरंजी

मो 9822553857

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares