मराठी साहित्य – विविधा ☆ हिंदुस्थानवालो, अब तो मुझे पहचानो ! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? विविधा ?

☆ हिंदुस्थानवालो, अब तो मुझे पहचानो ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

हिंदुस्तानवालों! अब तो मुझे पहचानो!

८१ वर्षांनंतरही हे शब्द अगदी समर्पक आहेत, असे म्हणावे लागेल. १९४३ ते २०२४ हा सुमारे ८१ वर्षांचा कालखंड. या सर्व वर्षांतला एकही दिवस असा नसेल की एक आवाज कुठे ऐकला गेला नसावा. मास्टर विनायक (अर्थात विनायक दामोदर कर्नाटकी. मागील काळातील प्रसिद्ध अभिनेत्री नंदा यांचे वडील) यांनी एक चित्रपट काढण्याचा प्रयत्न केला होता ‘गजाभाऊ’. चित्रपट जरी मराठी भाषेत काढला जात असला तरी यातलं एक गाणं हिंदीत होतं…कवी होते पंडित नरेंद्र इंद्रा. आणि गाणं होतं या लेखाचं शीर्षक. दुर्दैवाने हा चित्रपट आणि गाणं कुठंही उपलब्ध नाही. या चित्रपटात लता दीनानाथ मंगेशकर ही चौदा पंधरा वर्षांची मुलगी निव्वळ आई,भावंडांचा उदरनिर्वाह होण्यास दोन पैसे मिळावेत म्हणून अभिनय करीत होती. त्याकाळी पार्श्वगायन फारसे प्रचलित झालेले नव्हते. कलाकार आपापली गाणी स्वत:च गात (खरे तर म्हणत!) असत. यासाठी अभिनयासोबत गाणंही येणं आवश्यक असे. आणि हा योग काही फारसा जुळून येत नसे. लतादीदींना आवडत नसतानाही अभिनय शिकावा लागला होता आणि गाणं आवडत असूनही तोपर्यंत तशी संधी मिळत नव्हती. त्यामुळेच लतादीदींनी हे गाणं अगदी पोटातून, अतिशय समरसून गायले असावे, यात शंका नाही.

लता दीनानाथ मंगेशकर नावाच्या एक अलौकिक व्यक्तिमत्वाचा १९४३ पासून सुरू झालेला जीवनप्रवास सुमारे आठ दशके सुरू राहिला. दीदींचा हा प्रवास म्हणजे एक इतिहासच म्हणाव. दुर्दैवाचे सर्व अवतार जवळून पाहिलेल्या या शूर स्त्रीने आपल्या उपजत गानकलेने गायन क्षेत्रातील सम्राज्ञीपदाला गवसणी घातली हाही इतिहासच.

गायन,अभिनयासोबतच ज्योतिषाचा उत्तम अभ्यास असलेल्या मास्टर दीनानाथांनी आपल्या या लेकीच्या गळ्यात जसा गायनाचा उज्ज्वल भविष्यकाळ पाहिला होता तसा तिच्या ललाटावरील कर्माचा लेखही वाचला होता. त्यांनी दीदींना त्यावेळी असे सांगितल्याचं वाचनात येतं की, “लता, तु फार मोठी गायिका होशील. तुझे हे यश पहायला मी या जगात नसेन. आणि तुझे लग्न होणार नाही!” पहिल्या दोन भविष्यवाणींप्रमाणेच तिसरीही भविष्यवाणी अप्रिय असली तरी खरी ठरली याला दैव असं नाव आहे! कदाचित दैवाला दीदींना त्यांच्या त्यावेळी खूप संकटात असलेल्या कुटुंबासाठी आणि कोट्यवधी कानांना तृप्त करण्याची अपार शक्ती असलेल्या गायनकलेसाठी अधिक वेळ द्यायचा असावा! तसंच तर झालं किंबहुना तसंच केलं दीदींनी…हा इतिहास आहे!

आयुष्यात खूप नंतरच्या काळात त्यांनी असं म्हटलं होतं…पुन्हा जन्म नाहीच मिळाला तर बरेच आहे…पण पुनर्जन्म मिळालाच तर तो लता मंगेशकर म्हणून नको! लता मंगेशकर बनना आसान नहीं!

अगदी कोवळ्या वयातच आपल्या आईची आणि चार भावंडाची आई होण्याची जबाबदारी स्वत:हून पत्करणं आणि ती अखेरपर्यंत निभावून नेणं हे जावे त्याच्या वंशा तेंव्हाच कळू शकेल! सामाजिक व्यवहारातला त्यांचा करारी बाणा त्यांनी भोगलेल्या परिस्थितीतून आला असावा असं समजण्यास पूर्ण वाव आहे. ‘बहोत लोगों ने मेरे पैसे खाये!” असं एका मुलाखतीत दीदींना हसत सांगितलं आहे. आणि या बुडव्यांची नावे न उघड करण्याचा दिलदारपणाही त्यांनी दाखवला!

गाण्याचं ध्वनिमुद्रण करायला कक्षात जाताना आपली पादत्राणे त्या बाहेरच काढीत असत हे सर्वांनी पाहिलं आहे. कला ही देवता आणि कलाकार भक्त हा विचार त्यामागे होताच शिवाय ज्यामुळे पोटाला दोन घास मिळतात त्या कलेप्रती आदर व्यक्त करण्याची त्यांची ती पद्धत होती. सार्वजनिक जीवनात एका प्रसिद्ध स्त्रीने,त्यातून अविवाहीत स्त्रीने कसे वागावे याचा वस्तुपाठ म्हणजे दीदी. व्यवसायानिमित्त पुरूषांच्या गराड्यात राहणे अपरिहार्य असताना त्यातील प्रत्येकला दीदी म्हणावंसं वाटावं यासाठी सर्वोत्तम चारित्र्य आणि प्रचंड इच्छाशक्ती असावी लागते.

सामान्य माणूस म्हणूनच जन्माला आलेल्या व्यक्तीला त्याने असामान्यत्वाची पायरी गाठेपर्यंत अडचणी,समस्या,नैमित्तिक प्रलोभनं,मानवी स्वभावातील गुणदोष यांच्याशी संघर्ष करावा लागतोच. किंबहुना असामान्य होण्यापूर्वी माणूस सामान्यच असतो. या सर्वच अनुभवांतून तावून सुलाखून निघालेल्या दीदींनी स्वत:च्या वैय्यक्तिक आयुष्यात कुणालाही डोकावू दिले नाही. आणि यामुळे लोक काय आणि किती काय काय म्हणतील याची पर्वा केली नाही. जसा अंगभर पदर तसेच संपूर्ण आयुष्य नीटसपणे झाकून घेतलेले. एकतर गद्यात बोलणं अगदी नेमके आणि गाण्यासारखेच मधुर. शब्द अतिशय निगुतीने निवडलेले आणि उत्तरादाखल केलेल्या स्मितहास्यात माझे अबोलणेही विपरीत होत आहे अशी अवस्था अजिबातच नसे.

जगाच्या शब्दशस्त्राने क्लेश झाले नसतील असं नाही. पण जग होता वन्ही…संते आपण व्हावे पाणी हे त्यांनी माऊलींकडूनच शिकलेले असावे. त्यामुळे सार्वजनिक जीवनात कुठेही आक्रस्ताळेपणा जाणवला नसावा. सत्य असत्यासी मन केले ग्वाही…नाही मानियेले बहुमता हे तुकोबारायांचे शब्दही त्या जगत राहिल्या. जगाला सातत्याने ऐंशी वर्षे तोंड देत राहणे हे सामान्य जीवाचे कामच नव्हे, हेच खरे! दीदींच्या मौनात सर्व मिटून गेले आणि आता तर त्याही अंतर्धान पावल्या आहेत.

हिंदी-इंग्लिश वृत्तपत्रे,हल्लीच्या दूरचित्रवाहिन्यांमध्ये प्रसिद्ध झालेल्या सर्वच ब-यावाईट बाबींकडे दीदींनी अतिशय प्रयत्नपूर्वक दुर्लक्ष केले. मराठी वृत्तपत्रे आणि दृकश्राव्य वाहिन्यांनी मात्र दीदींच्या बद्द्ल कधी वावगे लिहिले,बोलल्याचे आढळत नाही….याला दीदींचे असाधारण व्यक्तिमत्व कारणीभूत आहे! भगवदगीता ध्वनिमुद्रित करण्याआधी पहाटे लवकर शुचिर्भूत होऊन दोन तीन तास श्लोक बिनचूक म्हणण्याचा सराव करणा-या आणि मगच ध्वनिमुद्रणासाठी जाणा-या दीदी, अत्यंत पीडादायक शारीरिक व्याधी असतानाही संत मीराबाईंची भजने ध्वनिमुद्रित करण्यासाठी तासनतास उभे राहणा-या दीदी,परदेशात शेकडो कार्यक्रम करून भारताचे नाव जगभर पोहोचवणा-या दीदी, ऐ मेरे वतन के लोगों गाण्यातील भावना चिरंजीव करून ठेवणा-या दीदी, १९८३ चा क्रिकेट विश्वचषक जिंकून आलेल्या खेळाडूंना मानधन देण्यासाठी गाण्यांचा कार्यक्रम करणा-या दीदी…अशा शेकडो गोष्टी आहेत आणि सामान्यांना अज्ञात अशा अनेक गोष्टीही असतीलच.

स्वत: कुठला मानसन्मान मिळवण्याचा प्रयत्न न करणा-या लतादीदींनी आपल्या वडिलांच्या मास्टर दीनानाथांच्या स्मृती जतन करण्याचा मनोभावे आणि यशस्वी प्रयत्न केला आहे. त्यांच्या हयातीतच त्यांच्याच नावाचा पुरस्कार दिला जाणं हे ही मोठेपणाचंच द्योतक. असो. लिहावं तेवढं कमीच आहे आणि आजवर अक्षरश: शेकडो लोकांनी दीदींबद्दल लिहिले आहे.

गेल्या काहीवर्षांत प्रसिद्ध व्यक्तींच्या आयुष्यावर आधारीत चित्रपट काढले गेले. आणि त्यात वावगे काहीच नाही. यामुळे या मोठ्या लोकांच्या आयुष्यात लोकांना डोकावता येते. परंतू, जेंव्हा जेंव्हा लतादीदींच्या आयुष्यावरील चित्रपटाचा विषय निघाला तेंव्हा तेंव्हा दीदींनी स्पष्ट नकार दिला. तरीही काही लोकांनी त्यांच्या आयुष्याशी साधर्म्य असणा-या कथा लिहून त्यावर चित्रपट काढला. साज (साझ) नावाचा एक चित्रपट आला होता. त्यात शबाना आझमी प्रमुख भूमिकेत होत्या. मेरी आवाजही पहचान है नावाची एक दूरदर्शन मालिकाही येऊन गेली. लतादीदींच्या आयुष्यावर (अनाधिकाराने) भाष्य करणारे युट्यूब विडीओज विशेषत: हिंदीत अनेक दिसतात. पण मंगेशकर कुटुंबियांनी या गोष्टीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत या गोष्टींना अजिबात महत्त्व दिले नाही.

दीदींच्या हयातीत त्यांना त्यांच्या बायोपिक (चरित्रचित्रपट) विषयी अनेकांनी विचारणा केलेली होती. पण त्यांनी स्पष्ट शब्दांत नकारच दिला होता. त्यांच्या मृत्यूनंतर तर याबाबत खूपच जोरात प्रयत्न झाले असतील. कारण लता मंगेशकर हा विषयच अत्यंत वेगळा आहे. पण एरव्ही काहीही माहित नसताना दीदींबद्दल विविध गोष्टी सांगत आणि पसरवत बसलेल्या व्यावसायिक लोकांकडून लता या विषयाला कितपत न्याय मिळाला असता हा ही प्रश्नच आहे.

एका खाजगी वृत्तवाहिनीने नुकत्याच घेतलेल्या एका मुलाखतीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनीही अशा चित्रपटास परवानगी देण्याचे स्वच्छ शब्दांत नाकारले आहे. दीदींच्या प्रतिमेला न्याय देऊ शकेल असं कुणी असावं असं त्यांना वाटत नाही. समाजानेही त्यांच्या या भूमिकेला न्याय दिला पाहिजे. पण लतादीदींचे आयुष्यही लोकांना समजणे गरजेचे आहे. आणि त्यासाठी हृदयनाथ मंगेशकर यांच्यापेक्षा पात्र अन्य कुणी व्यक्ती नाही. आठ दशके हृदयनाथ आणि दीदी सातत्याने एकत्र राहिलेत. हृदयनाथ स्वत: दीदींबद्द्ल लिहित आहेत. इतर कोणत्याही लेखकापेक्षा त्यांचे लेखन जास्त विश्वसनीय आहे यात दुमत नसावं. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आजवर त्यांनी प्रकृती अत्यंत नाजूक असतानाही साडे तीनशे पाने मजकूर लिहिला असून आणखी तितकीच पाने भरतील एवढ्या आठवणी,गोष्टी त्यांच्या स्मरणात आहेत. आणि हृदयनाथांची लेखनशैली सुद्धा अतिशय उच्चदर्जाची आहे. यापैकी आरंभीचे तीन लेख दैनिक सकाळच्या सप्तरंग पुरवणीत प्रसिद्ध झाले आहेत. कदाचित आणखीही होतील. बाळासाहेबांनी अर्थात हृदयनाथ मंगेशकर यांनी हे काम लवकरात लवकर पूर्ण करावे,या लेखांचे पुस्तक निघावे अशीच रसिकांची इच्छा आहे. कारण तेच हे काम योग्य पद्धतीने पूर्ण करू शकतील! कारण हिंदुस्थानवालों, अब तो मुझे पहचानो असे सुरूवातीलाच म्हणून गेलेल्या लता मंगेशकर नावाच्या भारतरत्न स्वरचमत्काराला अजून हिंदुस्तानाने नेमके ‘पहचानलेले’ आहे, असे म्हणता येत नाही. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या या मनोवांच्छित कार्यास शुभेच्छा!

(मनातले सर्वच लिहिता येते असे नाही. अनेक बाबी निसटून जातात लिहिता लिहिता. पण तरीही एक प्रयत्न. संभाजी बबन गायके.)

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ५ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ५ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र – “नाही वहिनी. आम्ही आणि डॉक्टरांनी काहीच केलेले नाही. आम्ही फक्त निमित्त होतो. बाळ वाचलंच नाहीय फक्त तर ते ‘वर’ जाऊन परत आलंय.” लेले काका सांगत होते,”आत्ता पहाटे आम्ही इथे आलो ते मनावर दगड ठेवून पुढचं सगळं अभद्र निस्तरण्याच्या तयारीनेच आणि इथे येऊन पहातो तर हे आक्रित! दादा, तुम्हा दोघांच्या महाराजांवरील अतूट श्रद्धेमुळेच या चमत्कार घडलाय.बाळ परत आलंय.”

या आणि अशा अनेक अनुभवांचे मनावर उमटलेले अमिट ठसे बरोबर घेऊनच मी लहानाचा मोठा झालोय.सोबत ‘तो’ होताच…!)

पुढे तीन वर्षांनी बाबांची कुरुंदवाडहून किर्लोस्करवाडीला बदली झाली ते १९५९ साल होतं. कुरुंदवाड सोडण्यापूर्वी आई न् बाबा दोघेही नृसिंहवाडीला दर्शनासाठी गेले.आता नित्य दर्शनाला येणं यापुढे जमणार नाही याची रुखरुख दोघांच्याही मनात होतीच. आईने दर पौर्णिमेला  वाडीला दर्शनाला येण्याचा संकल्प मनोमन सोडून ‘माझ्या हातून सेवा घडू दे’ अशी प्रार्थना केली आणि प्रस्थान ठेवलं!

किर्लोस्करवाडीला पोस्टातल्या कामाचं ओझं कुरुंदवाडपेक्षाही कितीतरी पटीने जास्त होतं.पूर्वी घरोघरी फोन नसायचे.त्यामुळे ‘फोन’ व ‘तार’ सेवा पोस्टखात्यामार्फत २४ तास पुरवली जायची.त्यासाठी पोस्टलस्टाफला दैनंदिन कामांव्यतिरिक्त जादा

रात्रपाळीच्या ड्युटीजनाही जावे लागायचे. त्याचे किरकोळ कां असेनात पण जास्तीचे पैसे मिळायचे खरे, पण ती बिले पास होऊन पैसे हातात पडायला मधे तीन-चार महिने तरी जायचेच. इथे येऊन बाबा अशा प्रचंड कामाच्या दुष्टचक्रात अडकून पडले.त्यांना शांतपणे वेळेवर दोन घास खाण्याइतकीही उसंत नसायची. दर पौर्णिमेला नृसिंहवाडीला दत्तदर्शनासाठी जायचा आईचा नेम प्रत्येकवेळी तिची कसोटी बघत सुरू राहिला होता एवढंच काय ते समाधान. पण तरीही मनोमन जुळलेलं अनुसंधान अशा व्यस्ततेतही बाबांनी त्यांच्यापध्दतीने मनापासून जपलं होतं. किर्लोस्करवाडीजवळच असलेल्या रामानंदनगरच्या आपटे मळ्यातल्या दत्तमंदिरातले नित्य दर्शन आणि सततचे नामस्मरण हा त्यांचा नित्यनेम.कधीकधी घरी परत यायला कितीही उशीर झाला तरी त्यांनी यात कधीही खंड पडून दिला नव्हता!

मात्र बाबांच्या व्यस्ततेमुळे घरची देवपूजा मात्र रोज आईच करायची. माझा धाकटा भाऊ अजून लहान असला तरी त्याच्यावरच्या आम्हा दोन्ही मोठ्या भावांच्या मुंजी नुकत्याच झालेल्या होत्या. पण तरीही आईने पूजाअर्चा वगैरे बाबीत आम्हा मुलांना अडकवलेलं नव्हतं. या पार्श्वभूमीवरचा एक प्रसंग…

पोस्टलस्टाफला किर्लोस्कर कॉलनीत रहायला क्वार्टर्स असायच्या. आमचं घर बैठं,कौलारू व सर्व सोयींनी युक्त असं होतं. मागंपुढं अंगण, फुलाफळांची भरपूर झाडं, असं खऱ्या ऐश्वर्यानं परिपूर्ण! आम्ही तिथे रहायला गेलो तेव्हा घरात अर्थातच साधी जमिनच होती. पण कंपनीतर्फे अशा सर्वच घरांमधे शहाबादी फरशा बसवायचं काम लवकरच सुरू होणार होतं. त्यानुसार आमच्याही अंगणात भिंतीना टेकवून शहाबादी फरशांच्या रांगा रचल्या गेल्या.

त्याच दिवशी देवपूजा करताना आईच्या लक्षात आलं की आज पूजेत नेहमीच्या दत्ताच्या पादुका दिसत नाहीत. देवघरात बोटांच्या पेराएवढ्या दोन चांदीच्या पादुका होत्या आणि आज त्या अशा अचानक गायब झालेल्या!आई चरकली.अशा जातील कुठ़ न् कशा?तिला कांहीं सुचेचना.ती अस्वस्थ झाली. तिने कशीबशी पूजा आवरली. पुढची स्वयंपाकाची सगळी कामंही सवयीने करीत राहिली पण त्या कुठल्याच कामात तिचं मन नव्हतंच. मनात विचार होते फक्त हरवलेल्या पादुकांचे!

खरंतर घरी इतक्या आतपर्यंत बाहेरच्या कुणाची कधीच ये-जा नसायची. पूर्वीच्या सामान्य कुटुंबात कामाला बायका कुठून असणार?

धुण्याभांड्यांसकट सगळीच कामं आईच करायची. त्यामुळे बाहेरचं कुणी घरात आतपर्यंत यायचा प्रश्नच नव्हता. आईने इथं तिथं खूप शोधलं पण पादुका मिळाल्याच नाहीत.

बाबा पोस्टातून दुपारी घरी जेवायला आले. त्यांचं जेवण पूर्ण होईपर्यंत आई गप्पगप्पच होती. नंतर मात्र तिने लगेच ही गोष्ट बाबांच्या कानावर घातली.ऐकून बाबांनाही आश्चर्य वाटलं.

“अशा कशा हरवतील?”

“तेच तर”

“सगळीकडे नीट शोधलंस का?”

“हो..पण नाही मिळाल्या”

आई रडवेली होऊन गेली.

“नशीब, अजून फरशा बसवायला गवंडीमाणसं आलेली नाहीत.”

“त्यांचं काय..?”

“एरवी त्या गरीब माणसांवरही आपल्या मनात कां होईना पण आपण संशय घेतलाच असता..”

त्या अस्वस्थ मनस्थितीतही बाबांच्या मनात हा विचार यावा याचं त्या बालवयात मला काहीच वाटलं नव्हतं,पण आज मात्र या गोष्टीचं खूप अप्रूप वाटतंय!

नेमके त्याच दिवशी गवंडी आणि मजूर घरी आले. पूर्वतयारी म्हणून त्यांनी जमीन उकरायला सुरुवात केली. त्यानिमित्ताने घरातले सगळे कानेकोपरेही उकलले गेले. पण तिथेही कुठेच पादुका सापडल्या नाहीत. पूजा झाल्यानंतर आई ताम्हणातलं तीर्थ रोज समोरच्या अंगणातल्या फुलझाडांना घालायची. ताम्हणात चुकून राहिल्या असतील तर त्या पादुका त्या पाण्याबरोबर झाडात गेल्या असायची शक्यता गृहीत धरून त्या फुलझाडांच्या भोवतालची माती खोलवर उकरून तिथेही शोध घेतला गेला पण पादुका मिळाल्याच नाहीत.

मग मात्र आईसारखेच बाबाही अस्वस्थ झाले. नेहमीप्रमाणं रोजचं रुटीन सुरू झालं तरी बाबांच्या मनाला स्वस्थता नव्हतीच.कुणाकडूनतरी  बाबांना समजलं की जवळच असणाऱ्या पलूस या गावातील सावकार परांजपे यांच्या कुटु़ंबातले एक गृहस्थ आहेत जे पूर्णपणे दृष्टीहीन आहेत.ते केवळ अंत:प्रेरणेने हरवलेल्या वस्तूंचा माग अचूक सांगतात अशी त्यांची ख्याती आहे म्हणे.बाबांच्या दृष्टीने हा एकमेव आशेचा किरण होता! बाबा स्वत: त्यांनाही जाऊन भेटले. आपलं गाऱ्हाणं आणि मनातली रूखरूख त्यांच्या कानावर घातली. त्यांनीही आपुलकीने सगळं ऐकून घेतलं. काहीवेळ अंतर्मुख होऊन बसून राहिले.तोवरच्या त्यांच्या चेहऱ्यावरच्या शांतपणाची  जागा हळूहळू काहीशा अस्वस्थपणानं घेतलीय असं बाबांना जाणवलं. त्यांची अंध,अधूदृष्टी क्षणभर समोर शून्यात स्थिरावली आणि ते अचानक बोलू लागले.बोलले मोजकेच पण अगदी नेमके शब्द!

“घरी देवपूजा कोण करतं?” त्यांनी विचारलं.

“आमची मंडळीच करतात”

बाबांनी खरं ते सांगून टाकलं.

” तरीच..”

“म्हणजे?”

” संन्याशाची पाद्यपूजा स्त्रियांनी करून कसं चालेल?”

“हो पण.., म्हणून..”

” हे पहा ” त्यांनी बाबांना मधेच थांबवलं.” मनी विषाद नको, आणि यापुढे हरवलेल्या त्या पादुकांचा शोधही नको. त्या कधीच परत मिळणार नाहीत.”

” म्हणजे..?”

” त्या हरवलेल्या नाहीयत. त्या गाणगापूरच्या पादुकांमध्ये विलीन झालेल्या आहेत.”

बाबांच्या मनातली अस्वस्थता अधिकच वाढली.कामात मनच लागेना ‘घडलेल्या अपराधाची एवढी मोठी शिक्षा नको’ असं आई-बाबा हात जोडून रोज प्रार्थना करीत विनवत राहिले.भोवतालच्या मिट्ट काळोखातही मनातला श्रध्देचा धागा बाबांनी घट्ट धरुन ठेवला होता. कांहीही करून हरवलेल्या त्या पादुका घरी परत याव्यात एवढीच त्यांची इच्छा होती पण ती फरुद्रूप होण्यासाठी कांहीतरी चमत्कार होणं आवश्यक होतं!आणि एक दिवस अचानक……?

क्रमश: दर गुरुवारी

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – विविधा ☆ निर्माल्य! ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’ ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

🔅 विविधा 🔅

निर्माल्य! ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

बाजारात अनेक फुले होती. मोगरा होता, गुलाब होता, जाई होती, जुई होती, सोनचाफा होता. शेवंती होती, झेंडू होता, सायली होती, मखमल होती,अनेक फुलं होती. सर्व लोकं ही फुले घेण्यास उत्सुक होती. प्रत्येक फुलाची ऐट वेगळीच. प्रत्येकाचे मूल्य वेगवेगळे आणि सुगंधाप्रमाणे वाढत जाणारे.

मी तगर!! कुठेही सापडणारे, सहज उपलब्ध असलेले नि त्यामानाने ‘नगण्य’ मूल्य असलेले सामान्य फुल. मला मनमोहक ‘गंध’ नाही, रूप नाही, रंग ही सामान्य (पांढरा). मला कोण देवाच्या पायी वाहणार ? परमेश्वराच्या मंगल आणि पावन चरणांना स्पर्श करण्याचे भाग्य मला कसे लाभणार ?

मनात असलेली, ध्यास लागलेली गोष्ट यथावकाश घडतेच असे म्हटले जाते. मलाही त्याची अनुभूती आली. भगवंताच्या रूपाने एक साधू महाराज आले, त्यांनी मला ‘खुडून’ घेतले आणि भगवंताच्या चरणावर अर्पण केले. माझी सुप्त इच्छा पूर्ण झाली. मला मूल्य नाही मिळाले, किंमत मिळाली नाही, सुगंध मिळाला नाही, पण एक गोष्ट मिळाली की ज्यामुळे मी कृतकृत्य झालो. कोमेजताना निर्माल्य होण्याचे भाग्य मला मिळाले यापेक्षा पुण्य काय असू शकते ? भगवंताच्या सहवासात माझे ‘निर्माल्य’ झाले. निर्माल्य!

मनुष्याचे जीवन फुलासारखे तर असते. नाना तऱ्हेची फुले तशी नाना तऱ्हेची माणसे. फक्त निर्माल्य होणे गरजेचे. किमान तसा प्रयत्न आपण करायला हवा.

© श्री संदीप रामचंद्र सुंकले

थळ, अलिबाग. मो. – ८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – विविधा ☆ २२ एप्रिल – वसुंधरा दिनानिमित्त – “वसुंधरा दिन…” ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

☆ २२ एप्रिल – वसुंधरा दिनानिमित्त – “वसुंधरा दिन…” ☆ सौ राधिका भांडारकर 

वसुंधरा दिनाची संकल्पना अमेरिकेतील गेलार्ड नेल्सन मंडेला यांनी मांडली. त्यांनी पर्यावरणाच्या समस्यांबाबत जागृती केली. प्रदूषण आणि वन्यजीवांचा ऱ्हास या मुद्द्यांवर तेथील सर्व थरातील लोकांनी आवाज उठवला. हवा, पाणी वने, आणि वन्यजीव निसर्ग यांच्या संरक्षणासाठी तेथे राजकीय दबाव निर्माण झाला. आणि १९७० सालापासून अर्थ डे म्हणजेच वसुंधरा दिन २२ एप्रिल रोजी जगभर साजरा केला जातो.

वाढते प्रदूषण, विकासाच्या अवास्तव कल्पना, अयोग्य जीवनशैली हेच पृथ्वीच्या सद्यस्थिती मागील मुख्य कारण आहे. अवकाळी पाऊस, वाढते तापमान अकल्पित नैसर्गिक वादळे, भूकंप जंगलातले वणवे,भूजल पातळी खालावणे,  या सगळ्यांचं मूळ कारण म्हणजे पर्यावरणाचा न साधलेला समतोल.

माणसाची प्रत्येक गरज पृथ्वी पूर्ण करू शकते पण लोभ नसावा अशा अर्थाचे महात्मा गांधींचे एक वचन आहे. विकासाच्या भ्रामक कल्पनांपायी पृथ्वीवरच्या नैसर्गिक साधन संपत्तीचा अविचारी वापर केल्याने वाढत्या प्रदूषणाचे परिणाम दिसत आहेत आणि हे असेच चालू राहिले तर मानवी जीवनाचे भविष्य अंधकारमय आहे हे निश्चित. याबाबत प्रबोधन करण्यासाठी २२ एप्रिल हा वसुंधरा दिन मानला जाऊ लागला.

पृथ्वीचे संरक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे याचे स्मरण करून देणे हे या वसुंधरा दिना मागचे उद्दिष्ट आहे. पृथ्वीवरील पर्यावरणाचा समतोल राखण्यात सर्वात मोठी भूमिका आहे ती जंगलची. मधल्या काही वर्षांमध्ये वाढती लोकसंख्या, वाढत्या गरजा, रस्ते, दळणवळण यानिमित्ताने प्रचंड वृक्षतोड झाली.  रानेच्या राने उद्ध्वस्त झाली. वन्य जीवांच्या वसाहती असुरक्षित झाल्या, पर्जन्यमान विस्कटले आणि सारा नैसर्गिक तोलच ढासळला. आता गरज आहे ती याविषयी अत्यंत सावध राहण्याची. पर्यावरण जागृती हा पृथ्वीवरच्या प्रत्येकाचा महामंत्र बनला पाहिजे.

 भरपूर झाडे लावा, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मार्गाने जंगलतोड वाचवा, पर्वत नद्या यांचा पर्यावरणातला सहभाग लक्षात घ्या, आणि त्यानुसार योग्य जीवनशैली राखून सर्वांगीण जागृती व प्रसार करणे ही या वसुंधरा दिन साजरा करण्यामागची खरी संकल्पना आहे.

प्लास्टिक आणि ई कचरा या सध्याच्या जागतिक समस्या आहेत. ज्यामुळे प्रदूषणाची पातळी वाढत आहे. माऊस, कीबोर्ड, मोबाईलचे खराब झालेले स्पेअर पार्ट्स, किंवा सध्याच्या स्थितीत न चालणारी उपकरणे ही या ई कचरा प्रकारात येतात. जुन्या डिझाईनचे कम्प्युटर, मोबाईल फोन, टेलिव्हिजन, इलेक्ट्रॉनिक खेळणी, क्षमता संपलेले सेल आणि अन्य उपकरणे हा सुद्धा ई-कचराच आहे. हा कचरा जाळल्यास यातून निघणाऱ्या घातक वायूमुळे पर्यावरणावर गंभीर परिणाम होतो.  शिवाय मानवी आरोग्यासाठीही हे धोकादायक आहे.

प्लास्टिक हे सर्वात घातक असे प्रदूषक आहे. विसाव्या शतकाच्या अखेरीस माऊंट एव्हरेस्ट पासून समुद्राच्या तळापर्यंत अनेक पर्यावरणीय कोनाड्यांचे प्लास्टिकने प्रदूषण केले आहे. प्राण्यांच्या अन्नामधून त्यांच्या पोटात प्लास्टिक जाणे अथवा ड्रेनेज सिस्टीम मध्ये अडकून सखलभागात पूर येणे, जागोजाग साचलेल्या प्लास्टिकच्या कचऱ्यामुळे परिसरातील सौंदर्य नष्ट होणे वगैरे अशा कितीतरी बाबींचा जाणीवपूर्वक आणि पर्यावरण पूरक अभ्यास हा झालाच पाहिजे आणि त्यावर उपाय यंत्रणा उभारली पाहिजे. वसुंधरा दिनाच्या निमित्ताने या महत्त्वाच्या समस्येवर प्रकाश टाकला जावा ही अपेक्षा.

हरितगृह वायू म्हणजे कार्बन डाय-ऑक्साइड, नायट्रस ऑक्साईड, ओझोन व पाण्याची वाफ.  मात्र यांचे संतुलन राखणे अत्यंत आवश्यक आहे. यांचे वातावरणातले वाढते प्रमाण ही सध्याची ज्वलंत समस्या आहे. औद्योगिक क्रांती झाली, मात्र या हरितवायूंचा समतोल ढासळून पृथ्वीचे पर्यावरण धोक्यात आले आहे. जीवाश्म इंधन, (पेट्रोल डिझेल वगैरे) कोळसा, तेल, जंगलतोड, जमीन वापरातील बदल, मातीची धूप, शेती, पशुधन, घनकचरा, सांडपाणी या द्वारे मानववंशिक वायूंचे उत्सर्जन होते. पृथ्वीच्या वातावरणात होणारा बदल आणि उपरोक्त घटक यांचा समन्वय योग्य रीतीने साधला गेला पाहिजे.नुकतीच दुबईत झालेली ढगफुटी आणि प्रचंड पाऊस हा याचाच परिणाम असू शकतो. कृत्रिम पाऊस पाडण्याच्या आणि पर्यायाने निसर्गनियमाच्या विरोधात केलेल्या खटाटोपाचाही हा परिणाम असू शकतो.

साऱ्या जगाचे डोळे आता उघडले आहेत. अनेक जागतिक परिषदा घडत असतात, उपाययोजनांचे आराखडे आखले जातात पण सारे फक्त कागदावर राहते. वसुंधरा दिनानिमित्त यावर प्रत्यक्ष ठोसपणे पाऊले उचलणे जरुरीचे आहे.

त्यासाठी आपण बरेच काही करू शकतो सर्व प्रसार माध्यमातून समाज जागृती करणे, पर्यावरण मित्र  गट बनवून प्रदर्शने, स्पर्धा, चित्रपटांच्या माध्यमातून प्रबोधन करणे, शक्यतो नैसर्गिक जीवनशैलीचा अवलंब करणे, पर्यावरण संरक्षण संबंधित अभ्यासक्रम बनवणे आणि त्याची अंमलबजावणी करणे, वृक्ष लागवडीचे महत्त्व पटवणे वेळ पडल्यास सक्ती करणे.. अशा अनेक माध्यमातून प्रयत्न व्हायला हवेत.वसुंधरा दिनाच्या निमित्ताने निसर्ग संवर्धन व्हावे हीच अपेक्षा आणि एक महत्त्वाचं.. हे चरितचर्वण फक्त एका दिवसापुरताच मर्यादित नसावं तर ती मानवाची आचार संहिता ठरावी हा दुर्दम्य आशावाद बाळगूया.

वसुंधरा दिनाच्या पृथ्वीवासीयांना लाख लाख शुभेच्छा!

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – विविधा ☆ युगंधरा स्त्री शक्ती… ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी ☆

प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी

🌸 जीवनरंग 🌸

☆ युगंधरा स्त्री शक्ती…  ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी 

अनादी, अनंत!

किती युगे,  किती वर्षे लोटली!  तरी मी आजतागायत आहे, तशीच आहे. कीती उन्हाळे,  कीती पावसाळे,  कीती ऋतु किती वर्षे,  माझ्या पद स्पर्शाने तुडवली गेली, ते  मलाच माहीत! पण मी आहे  तशीच आहे,  तिथंच आहे!

परिवर्तने  बरीच झाली,  किती तरी युगे, काळ रात्री शृंगारात  गप्प झाली, पण माझ मूळ रूप  हा स्थायी भाव झाला, आहे आणी तो तसाच राहणार ही काळ्या दगडावरची रेघ!

मी कुठे नाही ? जगात कुठल्याही प्रांतात जा मी असणारच. तिन्ही काळ अष्टौप्रहर माझं अस्तित्व आहेच की. माझ्या शिवाय ह्या जगाचे सुद्धा पान इकडचे तिकडे होणार नाही!

देवादिकांच्या काळापासून माझं अस्तित्व मी पुढे पुढे नेत आहे. संख्याच्या प्रकृती सिद्धांता पासूनच! त्यांच पण सदैव साकडं माझ्या पुढेच! मी त्यांचा बऱ्याच वेळा उद्धार केला. आज पण मी च सर्व मानवाचच नाहीतर, सर्व सृष्टीतील सर्व प्राणी पशु पक्षी जीवजंतु यांचं पण पोषण करतेय! किंबहुना मीच सृष्टी आहे. जगातील  सर्व घटकावर माझीच नजर असते!

मला कोण आदिमाता म्हणतात, तर कोणी मोहमाया, तर कोणी आदिशक्ती, तर कोणी प्रकृती! माझं कार्य हे मी कधीच बदलेल नाही,  बदलणार नाही,  हे त्रिवार सत्य.

मी च ती “त्रिगुणात्मक” सृजनशील शक्ती. मी सृष्टी! मी धरा,

मी मेदिनी मी च पृथा!  “मी माता,”  मी अनेक प्रकारची “माती”  मी स्त्री!, मी प्रजनन करणारी!. पालन,पोषण संगोपन, करणारी! मी जीवसृष्टीची  निर्माती, मी  

“माता ते मी माती”  पुर्णस्वरूप जगत्रय जननी! विश्व दर्शन! देणारी. तमोगुणी असलेतरी, दीप, पणती उजळणारी ज्ञानाची ज्योत!

हो पण माझ्या काही सवयी आहेत,  त्या मी पुर्ण करून घेण्यासाठी सर्व काही क्लुप्त्या वापरते. मी च हट्ट पुरवून घेणार ना ?

कोण नाही हो मी ? ऋतुनुसार माझे रूप पालटले जातात. मी प्रत्येक ऋतूत निराळीच असते. माझं सौंदर्य हेच माझं अस्त्र, माझ्या शिवाय तुमच्या जगण्यात पूर्णत्व येत नाही!

मी साज शृंगारा शिवाय राहू शकत नाही. मी च तर करणार ना  साज शृंगार तो माझा निसर्गदत्त अधिकार!  मी अवखळ  कन्या,  तरुणी, कल्याणी, प्रेमिका, अभिसरीका,  मी भार्या,  मी च ती, सर्व हट्ट पुरवुन घेणारी तो ही अगदी सहज पणे! 

मी साज, मी दागिना, नटणे, लाजणे, मुरडणे, नखरा करणे. मनमुरादपणे हौस करून घेणारी.  स्वर्गातील अप्सरा रंभा मेनका  उर्वशी हे माझेच पूर्वज ना! माझेच रूप ना ?

मी च “सांख्य तत्वाची” प्रकृती!   जड,  अचेतन त्रिगुणात्मक, मोहमयी, गुढ, आगम्य, सर्वव्यापी, बीजस्वरूप कारण, मी सर्वत्र एकच आहे! स्वतंत्र स्वयंभु पण निष्क्रिय!

मी कोण! अस का वाटत तुम्हाला  ?   मी फुलात, पानात, फळात आहेच की. सुगंधच माझी ओळख.

विविध  रंगाच्या  आकाराची,  फुले त्यांचं विविध गंध,  वर्ण त्यांची झळाळी,  हिरव्यागार झाडात वेलीत, त्यांचं मनमोहक रूप, तरीपण निष्क्रिय!   माझे अस्तीत्व मृदुमुलायम स्पर्शात, कोकिळेच्या कंठात, पौर्णिमेच्या शीतल चांदण्यात, गायीच्या हंबरण्यात, मयुर केकात! 

आजचे माझे अस्तित्व, काळानुसार  जरी सुधारले असले तरी, मी सगळीकडे आहेच की, माझा पोशाख माझं राहणीमान माझ्यातल परिवर्तनाचाच भाग आहे.

मुळात माझ्याकडे निसर्गाने जी दैवी शक्ती दिली आहे,  तीच आदिशक्तीचे अधिष्ठान आहे. अधिक जबाबदारी निसर्गाने घालून दिली.

म्हणूनच देवादिकांच्या पासुन ते आजच्या मानवापर्यंत माझी स्तुती चालत आली आहे.

।।  दुर्गे दुर्घटभरी तुझं वीण संसारी

अनाथ नाथे आंबे करुणा विस्तारी ।।

।। वारी वारी जन्म मरणा ते वारी

हरी पडलो आता संकट निवारी ।।

अशी आरती करून तुम्ही माझ्या स्त्रीत्वाचा सत्कार आक्ख जग अजुनी करतच की!

अनादी अनंत चार युगे उलटली!  महिला आहे,  म्हणुनच जग आहे,  हे खरं!  जगाला आजच का सजगता आली, स्त्री केव्हा पासुन पूजनीय वाटु लागली  ? पुर्वी ती पूजनीय नव्हती का ? चाली रूढी परंपरा ही तर भारतीय संस्कृती. विसरलात का!  मग आजच नारीचा नारीशक्तीचा डांगोरा पिटण्यात, कुठला पुरुषार्थ  आला बुवा ?

पाश्चात्य संस्कृतीचे अंध अनुकरण का ? पूर्वी इतकी स्त्री पुज्यनिय आता आहे असं वाटत नाही का ? बिलकुल नाही,पूर्वी जेवढी स्त्री पुजनिय होती, तेवढी आता नाही! होय मी ह्या विधानाचा समर्थन करतोय.

“यात्र  नार्यस्तु पुज्यन्नते रमंते” ह्या विधानात सर्व काही आले, व ते खरे केले. पुरुष प्रधान संस्कृतीच आत्ता ज्यास्त फोफावली आहे हे लक्ष्यात ठेवा. बस म्हटले की बसणारी उठ म्हटले की उठणारी स्त्री म्हणजे  हातातील खेळणं आहे असं वाटत काय ?

हल्ली काळा नुसार सोई सुविधांचा वापर करणे इष्टच, कारण ती गरज आहे, गरज शोधाची जननी! काळ बदलला नारी घरा बाहेर पडली कारण परिस्थितीच तशी चालुन आली. एकाच्या कमाई वर भागात नाही म्हणुन, प्रत्येक क्षेत्रात ती उतरली. व ते साध्य साधन करून दाखवत, ती सामोरा गेली व उभी राहिली. ती साक्षर झाली, मिळवती झाली, अर्थ कारण हा पुरुषर्थ तिने सहज साध्य केला. अस जरी असलं तरी तिच्या मागच  चुल मुलं बाळंतपण पाळणा ह्या गोष्टी परत आल्याच! त्या पण साध्य केल्या, हे त्रिवार सत्य!

पुर्वीच्या काळात ही परिस्थितीला अनुसरून महिलांनी घर खर्चाला आधार कैक पटीने ज्यास्त दिला! आठवा त्या गोष्टी, पिठाची  गिरणी नव्हती हाताने दळणकांडणच काय घरातील जनावरांचा पालन पोषण, गाय म्हैस बकरी इत्यादीच धारा, चारा पाणी, इत्यादी करून दुध दुभत त्या विकुन घरार्थ चालवीत होत्या अजुनी खेड्यात ही प्रथा चालु आहेच. जोडीला शेती कामात पण स्त्रिया मागे नव्हत्याच! आता ही नाहीत.

मथुरा असो की द्वारका तिथं पण हे वरील सर्व व्यवहार सुरळीत चालु होतेच की, नुसतं गौळण श्रीकृष्ण राधा, रासक्रीडा काव्यात जे मांडतो ते, तिथं अस्तित्वात होतच ना ? कपोलकल्पित गोष्टी नाहीतच ह्या. स्त्रीया पुरुषा बरोबरीने अंग मेहनत करत त्या अर्थार्जन करत होत्या!!!

लग्न झालेली नवं वधु तिचे आगमन, तिच्या हाताचे पायाचे कुंकवाचे ठसे, जोडीने केलेली पुजा, असो वा कुलदैवत दर्शन, असो मंगळागौर असो किंवा डोहाळ जेवण इत्यादि गोष्टी ह्या, स्त्री जन्माला आलेला मानपानच होता. गौरवच  सत्कार  होता ना!  प्रत्येक गोष्टीत तिचा पुढाकार हा महिला दिनच होता ना!

सावित्री, रमा, जिजाऊ, कित्तूर राणी चांनाम्मा, झाशीची राणी ह्या सर्व लढाऊ बाण्याची प्रतीक च होती ना ?

काळ बदलला आस्थापना कार्यशैली बदलली. युग नवं परीवर्तन घेऊन आलं. नवं कार्याचा भाग पण बदलला तरी स्त्री आजुनी खम्बीर आहे. कामाचा व्याप क्षेत्र बदलले. पूर्वीपेक्षा अत्याचार बलात्कार गर्भपात मात्र दिवसा गणिक वाढते आहे!  पूर्वी पेक्ष्या नारी सुरक्षित आहे का ?

कारण स्पष्टच,  चित्रपट टेली व्हिजन येणाऱ्या मालिका, चंगळवाद यांनी मनोवृत्ती बिघडली आहे.

महिला दिनाच्या निमित्ताने नारी संघटित होऊ पाहत आहे, पूर्वीही संघटीत होत्या, नाही असे नाही तरीपण आज मात्र ही काळाची गरज आहे! 

तिच्या अस्मितेची लढाई अजून चालू आहे. प्रत्येक क्षेत्रांत स्त्री आहे, घर कुटुंबा पासून ते सैन्य भरती पर्यंत! मजल दरमजल करत ती पुढे पुढे जात आहे अलिकडेच खेडे गावात राहणारी राहीबाई पोपोरे पासून ते कल्पना चावला पर्यंत!  अशी कित्येक उदाहरणे देता येतील. प्रत्येक क्षेत्रात स्वतःच्याअस्मितेवर तिने आघाडी घेतली आहेच. कोणतंही क्षेत्र तिने सोडलं नाही! तरीपण कैक पटीने ती तीच अस्तिव सिद्ध करत आहे. स्त्री जीन पॅन्ट घालो अगर नऊ वारी सहा वारी साडीत असो, मातृत्वाची जबाबदारी खांद्यावर घेतलीच ना ? गरीब असो वा श्रीमंत, घरात असो वा कार्यालयात तिला मुलाप्रति जिव्हाळा हा तसूभरही कमी झाला आहे का ?

साक्षात भगवान शंकरांनीही पर्वतीकडे भिक्षा मागितलीच ना.

।। अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राण वल्लभे ।।

ज्ञान वैराग्य सिद्धर्थम

भिक्ष्यां देही च पार्वती ।।

बघा हं गम्मत साक्षात भगवान शंकर, पार्वती कडे

भिक्षा मागतात!

काय म्हणतात हो ?

अन्नपूर्णे मला ज्ञान आणि वैराग्यासाठी भिक्षा घाल! भुकेसाठी ? हो भूक ही नुसती पोटाची नसते बर का! खर  ज्ञान मिळण्यासाठी! भूक पण अनेक प्रकारची असतेच की! वैराग्य प्राप्तीसाठी पण!  वैराग्य केव्हा प्राप्त होत ?  तर विश्व दर्शन झाल्यावर. ही झाली देवादिकांची कथा त्यापुढे मानवाचे काय ? स्त्री शक्ती ही कालातीत आहे. असे असूनही तिच्यावरचे बलात्कार, स्त्रिभुण हत्या का थांबत नाहीत ?

© प्रो डॉ प्रवीण उर्फ जी आर जोशी

ज्येष्ठ कवी लेखक

मुपो नसलापुर ता रायबाग, अंकली, जिल्हा बेळगाव कर्नाटक, भ्रमण ध्वनी – 9164557779 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – विविधा ☆ “चैत्र…” ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

☆ “चैत्र…” ☆ सौ राधिका भांडारकर 

आंब्याच्या झाडावर कोकीळ पक्षाचे “कुहू” ऐकू येते आणि वसंत ऋतुच्या आगमनाची वर्दी मिळते.   चैत्राची चाहूल जाणवते. नववर्षाची सारीच नवलाई घेऊन सृष्टीही बहरते. 

सूर्य जेव्हा मेष राशीत प्रवेश करतो, त्यावेळी हिंदू पंचांगातल्या शालिवाहन शकानुसार चैत्र महिना सुरू होतो. फाल्गुन पौर्णिमेच्या होळीची बोंबाबोंब आणि रंगपंचमीच्या रंगात नहाल्यानंतर वसंत ऋतु एखाद्या राजासारखा, दिमाखात अवतरतो.  नवा उत्साह, नवी उमेद, चैतन्याचे नजराणे  घेऊन तो कसा ऐटीत येतो.

जुने जाते नवे येते. वृक्ष नव्या, कोवळ्या, हिरव्या रंगाच्या पालवीने बहतात.  गुलमोहराला अपूर्व रक्तीमा चढतो.  पिवळा बहावा फुलतो.  पलाश वृक्षाची अग्नी फुले डोळ्यांना सुखावतात.  मोगऱ्याचा सुगंध दरवळतो. आणि कोकणचा राजा रस गाळतो. उत्तम उत्तम गोष्टींची मनमुराद पखरण करणारा हा वसंत!  ना कशाची वाण  ना कशाची कमतरता.  सारेच साग्रसंगीत, उच्च अभिरुची दर्शवणारे.

।। गंधयुक्त तरीही उष्ण वाटते किती ..।।

आसमंत उष्णतेने भरून जातो.  उन्हाच्या झळा जाणवतात. तप्त वारे वाहतात पण तरीही हे वारे गंधयुक्त असतात.  अनंत आणि मोगऱ्यांचा दरवळ जाणवतो. जंगलात कुठेतरी पिवळी धमक सुरंगीची फुलं उमलतात. आणि त्याचा सुगंध साऱ्या सृष्टीला व्यापून राहतो.

चैत्र महिना— वसंत ऋतु म्हणजे सृजनोत्सव.  चैत्र महिन्याच्या साक्षीने आनंदाचे एक महोत्सवी स्वरूपच प्रकटते.  या मासाचे आपल्या सांस्कृतिक जगण्याशी  उत्कट नाते आहे.

या आनंदोत्सवाचे स्वागत उंच गुढ्या उभारून शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडव्याच्या दिवशी केले जाते.  दृष्टांचा संहार  आणि सुष्टांचा विजय म्हणून हा विजयोत्सवही ठरतो.  या ब्रह्मध्वजाच्या पूजेनेच हिंदू नववर्षाची सुरुवात होते. तोच हा चैत्रमास!  चंद्र, चित्रा नक्षत्राच्या सानिध्यात असतो म्हणून हा चैत्र मास.

संस्कृतीची, धार्मिकतेची, सृजनाची, सौंदर्याची जाण देणारा हा टवटवीत, तजेलदार, तालबद्ध मास— वसंत आत्मा— मधुमास.

चैत्रगौरी पूजनाच्या निमित्ताने आंब्याची डाळ,कैरीचे  पन्हे याचा रसास्वाद घेणे म्हणजे परमानंदच.  अंगणात चैत्रांगण सजते.

या महिन्याला जसे श्रद्धा, भक्तीरसाचे वलय आहे तसेच शृंगार रसात न्हालेल्या  प्रणय भावनेचाही अनुभव आहे.

पक्षी झाडावर घरटी बांधतात.  त्यांची मधुर किलबिल मिलनाची हाक देतात.  मधुप  फुलातल्या परागाशी प्रीतीचे नाते जुळवतात.  तरुण-तरुणींची सलज्ज कुजबुज ऐकू येते.  कवी कल्पनांना प्रणय गीतांचे धुमारे फुटतात.  चाफा फुलतो आणि बोल घुमताँँं

“या विश्वाचे आंगण आम्हा दिले आहे आंदण

उणे करु आपण दोघेजण रे..”

साऱ्यासृष्टीतच या शृंगार रसाची झलक जाणवत असते. निर्मितीच्या, सर्जनशीलतेच्या भावनांना हळुवारपणे गोंजारणारा हा चैत्र महिना, राधा कृष्णाच्या प्रीतीत रमणारा हा चैत्र महिना,  कुणाच्या कवितेत असाही फुलतो..

      सिंगार सिसकता रहा

      बिलखता रहा हिया

      दुहराता रहा गगन से चातक

     पिया पिया …

 

     किंवा,

      ऋतू वसंत से हो गया कैसा ये अनुराग

      काली कोयल गा रही

     भान्ती भान्ती के राग…

तर असा हा नवीनतेचा, प्रेमाचा, उत्पत्तीचा,  चैतन्याचा संदेश घेऊन येणारा,  सुगंधाचा दरवळ पसरवणारा, हसरा बागडणारा,  धुंद करणारा चैत्र मास …किती त्यास वर्णावे?

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – विविधा ☆  वृद्धावस्था…. एक जबाबदारी — लेखक – श्री अरुण पुराणिक ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

🔅 विविधा 🔅

☆ वृद्धावस्था…. एक जबाबदारी — लेखक – श्री अरुण पुराणिक ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

(आजी आजोबा दिना निमित्त)

मानव जेव्हा जन्माला येतो ती त्याच्या जीवनातली पहिली अवस्था आणि किनाऱ्याला आणते ती वृद्धावस्था. ही अवस्था सर्व अवस्था पार करून आलेली असते, त्यामुळे ती परिपक्व असते, असू शकते, असलीच पाहिजे.

एकेक क्षण मोलाचा

विचार करीत मी निघालो ।

आयुष्य सार्थकी होण्या

घडवीत मी निघालो ।।

माणसाचे कळतेपण वाढीस लागते तेव्हा आपण काय करावयास पाहिजे याचा प्रामाणिक विचार करू शकतो, आणि आणि मग जसजसं वय वाढत जाईल, तसा अनुभव संपन्न होऊन मार्गदर्शन करण्याइतपत येतो आणि तसंच ते झालं ही पाहिजे.

जीवनाचा उत्तरकाळ

मार्ग दाखविला अनुभवांचा ।

त्यातून घडला जीव

सार्थकी तो त्या क्षणांचा ।।

आपल्याकडून अनुभव संपन्न आयुष्याने एखादा उभरता जीव हा योग्य मार्गी होऊन यशोदायी जीवन जगला पाहिजे.

आपल्या अनुभव संपन्नेतून उभरदायी आयुष्य घडतांना, योग्य मार्ग दाखविणं हे वृद्धावस्थेतील महत्त्वाचे कार्य आहे. आपण किनारा गाठलेला असतो आणि त्यांना गाठावयाचा असतो. त्यामुळे त्यांना योग्य मार्ग दाखविणं ही त्यांची गरज असते. ती गरज भागविणं हे वृद्धांचे कार्य आहे.

कोणतेही काम म्हणजे पूजा असते, म्हणून ती विश्वासानेच झाली पाहिजे. जीवनावश्यक वस्तू आपणास लागतात, त्या विकत घ्याव्या लागतात म्हणून आधी खर्च करण्यापूर्वी मिळवायला शिकविले पाहीजे.

आपले विचार दुसऱ्या पर्यंत पोहोचविण्यासाठी लिहावं लागत, म्हणून लिहिण्यापूर्वी आपले विचार हे सुविचार कसे असतील ह्याचं मार्गदर्शन झालं पाहिजे.

आपण काय बोलावं, ते योग्य की अयोग्य? यासाठी अगोदर दुसऱ्याचे बोलणे ऐकावयास शिकले पाहिजे.

“प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेल ही गळे. ” ही म्हण आपणांस माहित आहे. त्यामुळे कोणत्याही गोष्टीत हार न स्विकारता प्रयत्नशील राहता आलं पाहिजे.

आपण जगतो ते कसं असलं पाहिजे, यासाठी मी एक गोष्ट सांगेन…

… समजा, मला कोणी २ रुपये दिले तर मी १ रुपयाचे काही खायला आणेन. ‘जगायचं म्हणून’ आणि दुसऱ्या रुपयाचं फुल आणेन ‘कसं जगावं?’ हे शिकवण्यासाठी.

आपण मनुष्य म्हणून जन्माला आल्यावर सर्वात बुद्धिमान म्हणून विचार करत असतो. तिचा उपयोग करता आला पाहिजे, हे सांगता आलं पाहिजे की, मरण्या अगोदर जगावयास शिका.

चुका करणे हा माणसाचा स्थायीभाव आहे. पण तीच चुक परत करू नका. चुक करतो तो माणूस, चुक सुधारतो तो देव माणूस, याचं ज्ञान दिलं पाहिजे.

“तारूण्य म्हणजे चुका,

प्रौढत्व म्हणजे लढा,

वृद्धत्व म्हणजे पश्चाताप. “

पण वृद्धत्व हा पश्चाताप व्हावा असं नको असेल तर…

… वृद्धावस्थेत मार्गदर्शक व्हा. जीवन आणि जीव घडवा आणि घडवित असतांना आपले शरीर स्वास्थ्य जर सांभाळले व पुरेसा आर्थिक स्तर स्वतःचा ठेवला तर वृद्धत्वाच्या समस्या येणार नाहीत आणि आल्या तरी त्या निवारता येतील.

आपल्या वर्तनानं ज्या गोष्टी शिकविल्या पाहिजेत, त्या म्हणजे “मान, दान आणि ज्ञान. “

मान देता आला पाहिजे, दान निरंतर केले पाहिजे आणि ज्ञान आपल्याकडे आहे ते दुसऱ्यास दिले पाहिजे.

हे सांभाळले तर वृद्धावस्था ही समस्या राहणार नाही आणि त्यामुळे तुम्ही किती जगलात? यापेक्षा कसे जगलात? याला जास्त महत्त्व असेल.

आयुष्यात अशा गोष्टी करू नका की, जेणेकरून झोपेचं कर्ज होईल आपल्यावर कारण त्यामुळे रक्तदाब, मधुमेह यासारखे भयानक त्रास आयुष्य उध्वस्त करतील.

म्हणून वृद्धावस्था ही स्वतःला जपण्याची व जपत असताना दुसऱ्यास अनुभव देणारी एक अवस्था आहे यावर विश्वास असला पाहिजे.

घरातील ज्येष्ठ व्यक्ती या नात्याने वावरत असतांना, ज्ञानाचा सूर्य, प्रेमाचा महासागर आणि शांतीचा हिमाचल असं आपलं स्थान असलं पाहिजे आणि ते आपण निर्माण करून आदराच्या स्थानी दिसलचं पाहिजे.

 House is built by bricks, but Home is built Hearts.

 हे वचन सिद्ध करणे ही ज्येष्ठ व वृद्ध म्हणून कर्तव्य आहे आणि ही वृद्धावस्थेतील सर्वात मोठी जबाबदारी आहे, हे लक्षात असलं पाहिजे. 🙏

लेखक : श्री अरुण पुराणिक

संग्राहक : अनंत केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈



मराठी साहित्य – विविधा ☆ मतदान..काही आठवणी..भाग – १ – ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

🔅 विविधा 🔅

☆ मतदान..काही आठवणी..भाग – १ – ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

मतदानाचे वारे वाहू लागले की या काही आठवणी हमखास येतातच. तसे आम्ही शिक्षक खूप भाग्यवान! कारण आम्हाला प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन मतदान करण्याचे भाग्य सेवानिवृत्ती नंतरच मिळते. पूर्वी मतदान करण्याचे वय २१ होते. आणि बहुतेक शिक्षकांचे जॉब १८ किंवा १९ व्या वर्षी सुरू झालेले असतात. मी तर प्रथम मतदान अधिकारी म्हणून काम केले आणि नंतर मतदानाचे वय झाले. मग पोस्टल मतदान करावे लागे.

सुरुवातीच्या काळात संपूर्ण शाळेतील सगळे शिक्षक,शिपाई एकाच केंद्रावर असायचे. पण नंतर बरेच बदल झाले. आणि सगळे वेगवेगळ्या ठिकाणी नेमले जाऊ लागले. आणि आपली नेमणूक कोणत्या ठिकाणी असेल हे घरातील मंडळींना पण समजायचे नाही. एखाद्या गाडीत बसवून कामाच्या ठिकाणी नेले जायचे. तिथे गेल्यावरच कळायचे आपल्याला दोन दिवस इथे काम करायचे आहे. बरेचदा अती संवेदशील भागात काम करावे लागायचे. त्यातील एक आठवण…. आत्ता हसू येते. पण त्या वेळी जीवाचे पाणी होणे म्हणजे काय,किंवा पाचावर धारण बसणे या सारखे सगळे वाक्प्रचार व म्हणी आठवल्या होत्या.

असेच एका ठिकाणी नेऊन सोडले. कोणत्या भागात जायचे कोणालाच माहित नव्हते. दोन दिवस तर काम करायचे,कुठे कायमचे रहायचे आहे? या विचारात गेलो. प्रत्येक गोष्ट आनंदाने स्वीकारून काम करायचे अशी शिकवण. हे सतत लक्षात ठेवून गेलो. हळूच कोणीतरी म्हणाले अती संवेदनशील भाग आहे काळजी घ्या. एकंदर पोलिसांच्या जास्त असलेल्या गाड्या बघून हे लक्षात येऊन थोडी धाकधूक होतीच. पण कोणी काही न बोलता कामाला सुरुवात केली. आपापल्या जागी आसनस्थ झालो. आणि मतदान सुरू झाले. रांगा तर खूप मोठमोठ्या होत्या. अक्षरशः जागेवरून हलता पण येत नव्हते. साधारण तीन तास शांततेत पार पडले.आणि हळूहळू भीती कमी झाली.

तेवढ्यात आम्ही काम करत असलेल्या केंद्राच्या पत्र्यावर कोणीतरी उड्या मारत आहे असे जाणवले. मुले पतंग वगैरे काढत असतील असे वाटले. पण तितक्यात त्या पत्र्यातून हातात तलवार घेऊन धप्पकन उडी मारून एक व्यक्ती प्रगट झाली. आणि कोण रांगेत थांबवतो? बघतोच त्याच्याकडे… मला प्रथम मतदान करु द्या. असा आरडा ओरडा सुरु केला.  सगळे हादरून गेले. आणि त्याचा हा अवतार बघून आमचे वरिष्ठ अधिकारी अतिशय चपळतेने बाहेर पडले. ते बाहेर का गेले हे अद्याप कोडेच आहे. आणि शिपाई त्या रुमच्या बाहेर… मग आमचे कौशल्य कामी आले. पटकन दोन बोटे तोंडात घातली आणि शिट्टी मारली ( कधी नव्हे ती वेळेवर वाजली ) सगळे बघतच राहिले. पण ती शिट्टी ऐकून आमचे शिपाई व दोन हवालदार देवासारखे पटकन दाखल झाले आणि त्या तलवार धारी व्यक्तीला बाहेर नेले. आणि आम्ही सुटलो. आणि आता त्या आठवणीने हसत सुटतो.

ही वार्ता बाहेर गेल्यावर लगेच स्थानिक लोक तत्परतेने आले आणि काही काळजी करु नका असा धीर व पाणी,चहा देऊन गेले. त्यानंतर अधून मधून येऊन आमची विचारपूस करुन जात होते. एकच वेळी दोन अनुभव येत होते. अशा दोलायमान परिस्थितीत मतदान

संपे पर्यंत जीव मुठीत धरून काम केले. आणि रात्री नऊ नंतर आम्हाला पोलीस बंदोबस्तात तेथून बाहेर काढले.

एक अनुभव तर फार चटका लावणारा आहे. आपल्या केंद्रा  वरील टीमची शेवटच्या प्रशिक्षणाला ओळख होते. आणि एकमेकांचे नंबर घेतले जातात. असेच एका ट्रेनिंगच्या वेळी ओळखी झाल्या. आम्ही आपापल्या घरी निघालो. निम्म्या रस्त्यात आल्यावर आमच्या टीम मधील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा फोन आला. फोन घेतला तर एक अनोळखी व्यक्ती बोलत होती. आणि त्या व्यक्तीने धक्का दायक बातमी सांगितली. “हा फोन ज्यांचा आहे,त्यांचा आत्ता अपघात झाला आहे व जागेवर मृत्यू झाला आहे. डायल नंबर मध्ये तुमचा शेवटचा नंबर होता म्हणून तुम्हाला फोन केला आहे.” आम्हाला तर त्यांची काहीच माहिती नव्हती. फक्त ऑफिस माहिती होते. मग तिकडून त्यांच्या इतर सहकाऱ्यांचा नंबर घेऊन त्यांना कळवले.

असे अनेक भले बुरे अनुभव येतात. नवीन ओळखी होतात.

अशा प्रत्येक वेळच्या निरनिराळ्या आठवणी निवडणूक तयारी सुरू झाली की मनात दाटून येतात. आता मात्र मुक्तपणे मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा आनंद घेते. आता तर केंद्राच्या बाहेर बऱ्याच ठिकाणी सेल्फी पॉइंट्स ठेवतात. मग काय छान कृत्रिम महिरपीत उभे रहायचे आणि शाई लावलेले बोट ( या फोटोत ते महत्वाचे असते ) समोर धरुन सेल्फी ( दुसऱ्याने काढलेला) घ्यायचा आणि फेसबुक,whatsapp आणि इतर मीडियावर पोस्टून टाकायचे. आणि आम्ही किती कर्तव्यदक्ष आहोत मिरवायचे.

© सुश्री विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक.

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ४ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ४ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र – “नाही वहिनी. आम्ही आणि डॉक्टरांनी काहीच केलेले नाही. आम्ही फक्त निमित्त होतो. बाळ वाचलंच नाहीय फक्त तर ते ‘वर’ जाऊन परत आलंय.” लेले काका सांगत होते,”आत्ता पहाटे आम्ही इथे आलो ते मनावर दगड ठेवून पुढचं सगळं अभद्र निस्तरण्याच्या तयारीनेच आणि इथे येऊन पहातो तर हे आक्रित! दादा, तुम्हा दोघांच्या महाराजांवरील अतूट श्रद्धेमुळेच या चमत्कार घडलाय.बाळ परत आलंय.”

या आणि अशा अनेक अनुभवांचे मनावर उमटलेले अमिट ठसे बरोबर घेऊनच मी लहानाचा मोठा झालोय.सोबत ‘तो’ होताच…!)

पुढे तीन वर्षांनी बाबांची कुरुंदवाडहून किर्लोस्करवाडीला बदली झाली ते १९५९ साल होतं. कुरुंदवाड सोडण्यापूर्वी आई न् बाबा दोघेही नृसिंहवाडीला दर्शनासाठी गेले.आता नित्य दर्शनाला येणं यापुढे जमणार नाही याची रुखरुख दोघांच्याही मनात होतीच. आईने दर पौर्णिमेला  वाडीला दर्शनाला येण्याचा संकल्प मनोमन सोडून ‘माझ्या हातून सेवा घडू दे’ अशी प्रार्थना केली आणि प्रस्थान ठेवलं!

किर्लोस्करवाडीला पोस्टातल्या कामाचं ओझं कुरुंदवाडपेक्षाही कितीतरी पटीने जास्त होतं.पूर्वी घरोघरी फोन नसायचे.त्यामुळे ‘फोन’ व ‘तार’ सेवा पोस्टखात्यामार्फत २४ तास पुरवली जायची.त्यासाठी पोस्टलस्टाफला दैनंदिन कामांव्यतिरिक्त जादा

रात्रपाळीच्या ड्युटीजनाही जावे लागायचे. त्याचे किरकोळ कां असेनात पण जास्तीचे पैसे मिळायचे खरे, पण ती बिले पास होऊन पैसे हातात पडायला मधे तीन-चार महिने तरी जायचेच. इथे येऊन बाबा अशा प्रचंड कामाच्या दुष्टचक्रात अडकून पडले.त्यांना शांतपणे वेळेवर दोन घास खाण्याइतकीही उसंत नसायची. दर पौर्णिमेला नृसिंहवाडीला दत्तदर्शनासाठी जायचा आईचा नेम प्रत्येकवेळी तिची कसोटी बघत सुरू राहिला होता एवढंच काय ते समाधान. पण तरीही मनोमन जुळलेलं अनुसंधान अशा व्यस्ततेतही बाबांनी त्यांच्यापध्दतीने मनापासून जपलं होतं. किर्लोस्करवाडीजवळच असलेल्या रामानंदनगरच्या आपटे मळ्यातल्या दत्तमंदिरातले नित्य दर्शन आणि सततचे नामस्मरण हा त्यांचा नित्यनेम.कधीकधी घरी परत यायला कितीही उशीर झाला तरी त्यांनी यात कधीही खंड पडून दिला नव्हता!

मात्र बाबांच्या व्यस्ततेमुळे घरची देवपूजा मात्र रोज आईच करायची. माझा धाकटा भाऊ अजून लहान असला तरी त्याच्यावरच्या आम्हा दोन्ही मोठ्या भावांच्या मुंजी नुकत्याच झालेल्या होत्या. पण तरीही आईने पूजाअर्चा वगैरे बाबीत आम्हा मुलांना अडकवलेलं नव्हतं. या पार्श्वभूमीवरचा एक प्रसंग…

पोस्टलस्टाफला किर्लोस्कर कॉलनीत रहायला क्वार्टर्स असायच्या. आमचं घर बैठं,कौलारू व सर्व सोयींनी युक्त असं होतं. मागंपुढं अंगण, फुलाफळांची भरपूर झाडं, असं खऱ्या ऐश्वर्यानं परिपूर्ण! आम्ही तिथे रहायला गेलो तेव्हा घरात अर्थातच साधी जमिनच होती. पण कंपनीतर्फे अशा सर्वच घरांमधे शहाबादी फरशा बसवायचं काम लवकरच सुरू होणार होतं. त्यानुसार आमच्याही अंगणात भिंतीना टेकवून शहाबादी फरशांच्या रांगा रचल्या गेल्या.

त्याच दिवशी देवपूजा करताना आईच्या लक्षात आलं की आज पूजेत नेहमीच्या दत्ताच्या पादुका दिसत नाहीत. देवघरात बोटांच्या पेराएवढ्या दोन चांदीच्या पादुका होत्या आणि आज त्या अशा अचानक गायब झालेल्या!आई चरकली.अशा जातील कुठ़ न् कशा?तिला कांहीं सुचेचना.ती अस्वस्थ झाली. तिने कशीबशी पूजा आवरली. पुढची स्वयंपाकाची सगळी कामंही सवयीने करीत राहिली पण त्या कुठल्याच कामात तिचं मन नव्हतंच. मनात विचार होते फक्त हरवलेल्या पादुकांचे!

खरंतर घरी इतक्या आतपर्यंत बाहेरच्या कुणाची कधीच ये-जा नसायची. पूर्वीच्या सामान्य कुटुंबात कामाला बायका कुठून असणार?

धुण्याभांड्यांसकट सगळीच कामं आईच करायची. त्यामुळे बाहेरचं कुणी घरात आतपर्यंत यायचा प्रश्नच नव्हता. आईने इथं तिथं खूप शोधलं पण पादुका मिळाल्याच नाहीत.

बाबा पोस्टातून दुपारी घरी जेवायला आले. त्यांचं जेवण पूर्ण होईपर्यंत आई गप्पगप्पच होती. नंतर मात्र तिने लगेच ही गोष्ट बाबांच्या कानावर घातली.ऐकून बाबांनाही आश्चर्य वाटलं.

“अशा कशा हरवतील?”

“तेच तर”

“सगळीकडे नीट शोधलंस का?”

“हो..पण नाही मिळाल्या”

आई रडवेली होऊन गेली.

“नशीब, अजून फरशा बसवायला गवंडीमाणसं आलेली नाहीत.”

“त्यांचं काय..?”

“एरवी त्या गरीब माणसांवरही आपल्या मनात कां होईना पण आपण संशय घेतलाच असता..”

त्या अस्वस्थ मनस्थितीतही बाबांच्या मनात हा विचार यावा याचं त्या बालवयात मला काहीच वाटलं नव्हतं,पण आज मात्र या गोष्टीचं खूप अप्रूप वाटतंय!

नेमके त्याच दिवशी गवंडी आणि मजूर घरी आले. पूर्वतयारी म्हणून त्यांनी जमीन उकरायला सुरुवात केली. त्यानिमित्ताने घरातले सगळे कानेकोपरेही उकलले गेले. पण तिथेही कुठेच पादुका सापडल्या नाहीत. पूजा झाल्यानंतर आई ताम्हणातलं तीर्थ रोज समोरच्या अंगणातल्या फुलझाडांना घालायची. ताम्हणात चुकून राहिल्या असतील तर त्या पादुका त्या पाण्याबरोबर झाडात गेल्या असायची शक्यता गृहीत धरून त्या फुलझाडांच्या भोवतालची माती खोलवर उकरून तिथेही शोध घेतला गेला पण पादुका मिळाल्याच नाहीत.

मग मात्र आईसारखेच बाबाही अस्वस्थ झाले. नेहमीप्रमाणं रोजचं रुटीन सुरू झालं तरी बाबांच्या मनाला स्वस्थता नव्हतीच.कुणाकडूनतरी  बाबांना समजलं की जवळच असणाऱ्या पलूस या गावातील सावकार परांजपे यांच्या कुटु़ंबातले एक गृहस्थ आहेत जे पूर्णपणे दृष्टीहीन आहेत.ते केवळ अंत:प्रेरणेने हरवलेल्या वस्तूंचा माग अचूक सांगतात अशी त्यांची ख्याती आहे म्हणे.बाबांच्या दृष्टीने हा एकमेव आशेचा किरण होता! बाबा स्वत: त्यांनाही जाऊन भेटले. आपलं गाऱ्हाणं आणि मनातली रूखरूख त्यांच्या कानावर घातली. त्यांनीही आपुलकीने सगळं ऐकून घेतलं. काहीवेळ अंतर्मुख होऊन बसून राहिले.तोवरच्या त्यांच्या चेहऱ्यावरच्या शांतपणाची  जागा हळूहळू काहीशा अस्वस्थपणानं घेतलीय असं बाबांना जाणवलं. त्यांची अंध,अधूदृष्टी क्षणभर समोर शून्यात स्थिरावली आणि ते अचानक बोलू लागले.बोलले मोजकेच पण अगदी नेमके शब्द!

“घरी देवपूजा कोण करतं?” त्यांनी विचारलं.

“आमची मंडळीच करतात”

बाबांनी खरं ते सांगून टाकलं.

” तरीच..”

“म्हणजे?”

” संन्याशाची पाद्यपूजा स्त्रियांनी करून कसं चालेल?”

“हो पण.., म्हणून..”

” हे पहा ” त्यांनी बाबांना मधेच थांबवलं.” मनी विषाद नको, आणि यापुढे हरवलेल्या त्या पादुकांचा शोधही नको. त्या कधीच परत मिळणार नाहीत.”

” म्हणजे..?”

” त्या हरवलेल्या नाहीयत. त्या गाणगापूरच्या पादुकांमध्ये विलीन झालेल्या आहेत.”

बाबांच्या मनातली अस्वस्थता अधिकच वाढली.कामात मनच लागेना ‘घडलेल्या अपराधाची एवढी मोठी शिक्षा नको’ असं आई-बाबा हात जोडून रोज प्रार्थना करीत विनवत राहिले.भोवतालच्या मिट्ट काळोखातही मनातला श्रध्देचा धागा बाबांनी घट्ट धरुन ठेवला होता. कांहीही करून हरवलेल्या त्या पादुका घरी परत याव्यात एवढीच त्यांची इच्छा होती पण ती फरुद्रूप होण्यासाठी कांहीतरी चमत्कार होणं आवश्यक होतं!आणि एक दिवस अचानक……?

क्रमश: दर गुरुवारी

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – विविधा ☆ चैत्रांगण… ☆ सुश्री मानसी चिटणीस ☆

सुश्री मानसी विजय चिटणीस

? विविधा ?

☆ “चैत्रांगण…” ☆ सुश्री मानसी विजय चिटणीस

चैत्र शुक्ल तृतीयेपासून चैत्रगौर म्हणजे अन्नपूर्णा आसनावर किंवा झोक्यावर बसवली जाते. रेशमी वस्त्रे, मोगरीची फुलं, चंदनगंधाचे विलेपन यांनी तिला सजवले जाते..माहेरपणाला आलेली लाडाची लेकच जणू.. त्या झोक्यात बसलेल्या गौरीला पाहून मला इंदिराबाईंची, ‘आली माहेरपणाला’ ही कविता आठवते नेहमी..

               “आली माहेरपणाला

                 आणा शेवंतीची वेणी

                 पाचू मरव्याचे तुरे

                 जरी कुसर देखणी “

सासरी राबून थकलेल्या लेकीला विसाव्याचे चार क्षण मिळावेत, तिला आनंद व्हावा, तिच्या चेहऱ्यावर हसू फुलावे म्हणून आईची कोण धडपड..लेक माहेरपणाला आलीय, कुठे तिच्यासाठी शेवंतीची वेणी कर, कुठे तिच्या पोलक्यावर पाचू जडव तर तिला सुगंध आवडतो म्हणून तिच्यासाठी मरव्याचे अत्तर बनव..आईची ही सारी धडपड संसारीक वैशाखाने रणरणलेल्या लेकीच्या मनाला थोडा तरी गारवा मिळावा..

चैत्र, चांद्रवर्षाचा पहिला महिना. या महिन्यातल्या पौर्णिमेच्या आसपास चित्रा नक्षत्र अवकाशात असते म्हणून हा चैत्र महिना. ऋतूराज वसंताचा लाडका महिना..आणि म्हणूनच या काळात येणाऱ्या नव्या तांबूस पोपटी पालवीला चैत्रपालवी म्हणतात. साऱ्या सृष्टीचे सृजन या काळात होते. म्हणूनच आदिशक्ती आणि शिव या सृष्टीच्या उगमकर्त्यांचे पूजन या महिन्यात करण्याचा प्रघात पडला असावा. भारतात अनेक ठिकाणी या काळात गणगौरी पुजन युवती आणि विवाहित स्त्रीया करतात. आपल्या घरी हळदीकुंकू करतात. मनाला आणि शरीराला गारवा देणारे मोगरीची फुले, ओले हरभरे, विड्याचे पान-सुपारी, कलिंगड, आंंब्याची डाळ आणि पन्हे यांचे वाण दिले जाते. या हळदीकुंकवाच्या निमित्ताने माय-लेकी, बहिणी-बहिणी, मैत्रीणी एकमेकांना भेटतात..एकमेकींची सुखदुःख निगूतीने ऐकतात..त्यावर फुंकर घालताना आपल्या डोळ्यांतील पाणी लपवतात.

मला आठवतंय..लहानपणी, जेव्हा गौरीला झोक्यात बसवलं जायचं तेव्हा मी ही आईकडे झोक्यासाठी, गौरीसारखं नटवण्यासाठी हट्ट करायचे तेव्हा कधी आई गालातल्या गालात हसायची तर कधी डोळ्यांत पाणी आणायची. आज तिच्या त्या वागण्याचा अर्थ कळतोय. स्त्रीचे भावविश्व अशा सणवार व्रतवैकल्य यांच्याशी जोडलं गेलयं. चैत्रगौर ही सृजनदेवता आणि स्त्री देखील..हे मांडलं जाणारं चैत्रांगण किंवा हळदीकुंकू हे याच सृजनाचं संक्रमण असावं. एका उर्जेचा एकीकडून दुसरीकडे चालणारा प्रवास असावा. चैत्र हा ही सृजनसखाच..तर चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून सुरू होणाऱ्या चैत्र महिन्यात अंगणात; मग ते अंगण ग्रामिण असो की शहरी.. चैत्रांगण रेखाटले जाते. ६४ शुभचिह्नांनी युक्त अशा या रांगोळीत चैत्रगौर, तिचे पती शंभू महादेव, तिचे सौभाग्यालंकार, मोरपीस, बासरी, ती जगत्जननी असल्याने सूर्य चंद्रापासून साप-हत्तीपर्यंतचा तिचा संसार रेखला जातो. तिची पावले, तिच्या अस्तित्वाचे प्रतिक असलेले स्वस्तिक आणि तिचे आवडते कमळ, तिच्या पुजेसाठीचे शंख, घंटा, ध्वज असे सारे ऐवज रेखले जातात. ते चैत्रांगण बघताना वाटते की कुणा चिमुकलीची भातुकलीच मांडली आहे की काय? या साऱ्या रांगोळीचे रेखाटन चैत्र महिना संपेपर्यंत केले जाते.

माहेरपणाला आलेल्या गौरीला पाळण्यात बसवले जाते. पाळण्यात बसवण्यापूर्वी देवीच्या मुर्तीला अंघोळ घालून, पूजा-अर्चा करून नैवेद्य दाखविला जातो. फुलांची सजावट केली जाते. देवीसमोर वेगवेगळे पदार्थ, देखावे यांची आरास मांडली जाते. खिरापत म्हणून सुके खोबरे व साखर दिली जाते. छोट्या तांब्यात देवीसाठी पाणी भरून ठेवले जाते.बत्तासे, कलिंगड, काकडी, कैरीची डाळ, भिजवलेले हरभरे, पन्हे आदी पदार्थ देवीसाठी केले जातात व नंतर हळदी कुंकू करून वाण म्हणून दिले जातात. सुगीच्या हंगामात केल्या जाणाऱ्या या व्रतात आपली मुले-बाळे, घर-दार यांच्या सुखसमृद्धी ची मनोकामना केली जाते.

अशा या माहेरपणासाठी आलेल्या लेकीचे कौतुक करण्यासोबतच सृजनाचीही पूजा केली जाते. लेकीचे कोडकौतुक करताना लेकीने आईपासून लपवलेले अश्रू असोत की मनातले सल.. चैत्रांगण टिपतेच असे स्त्रीभावनांचे गूढ पदर..

डोळ्यांत आसू अन् ओठांवर हसू

सुखाच्या ओंजळीत दुःखाचे पसू…

या आणि अशा अनेक झळांवर गारव्याचे लिंपण म्हणून तर झोक्यातले झुलणे आणि चैत्रातले रेखाटन असेल का?

चैत्रांगण

© सुश्री मानसी विजय चिटणीस

केशवनगर, चिंचवड, पुणे. फोन : ०२०२७६१२५३१ / ९८८११३२४०७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈