☆ ‘आनंद वाटणाऱ्या ओंजळी…!’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री ब्रह्मानंद पै☆3
☆
एखादा माणूस रोज हसतमुखाने दुसऱ्यांना मदत करतो. त्यांच्यासाठी वेळ देतो. प्रेम आणि माया वाटतो. तो खरोखरच श्रीमंत असतो. ह्या श्रीमंतीचा संबंध पैशाशी नसतो, तर अंतःकरणाच्या समृद्धीशी असतो.
कधी कधी वाटते, आपल्याकडे काय आहे दुसऱ्याला देण्यासाठी? पैसा नाही, मोठं घर नाही, भरगच्च वस्त्रालंकार नाहीत. पण या गोष्टींचा खरा अभाव नसतो. अभाव असतो तो आनंद वाटण्याच्या वृत्तीचा. ज्यांच्याकडे ही वृत्ती असते त्यांची ओंजळ कधी रिकामी राहत नाही.
मला आठवतेय, माझ्या गावातली एक आजी कायम उत्साहाने दुसऱ्यांच्या मदतीला धावून जायची. कुणाच्या घरी अडचण आली, की ती कधी डबा पाठवायची, कधी धीर द्यायची, कधी अंगणातली मोगऱ्याची फुलं गजऱ्यात गुंफून एखाद्या सूनबाईंना हसवत राहायची. तिच्या या प्रेमळ स्वभावामुळे सारा गाव तिला आपलीच म्हातारी मानायचा.
मी एकदा आजीला विचारलं, “आजी, तू एवढ्या सगळ्यांना मदत करतेस त्या बदल्यात तुला काय मिळतं?”
ती हसली आणि म्हणाली, “बाळा, आनंद वाटणाऱ्या ओंजळी कधी रिकाम्या राहत नाहीत. परमेश्वर त्यांना पुन्हा भरून टाकतो. जशी विहीर पाणी देते, पण कधी कोरडी पडत नाही. अगदी तशीच माझीही ओंजळ आहे. “
मी विचार करत राहिलो. खरंच. आनंद, प्रेम, माया ही अशी संपत नसतात. उलट, जितकी जास्त वाटली, तितकी वाढत जातात.
संपन्नता ही केवळ गोष्टींमध्ये नसते. ती मनात असते. आणि जी माणसं दुसऱ्यांना आनंद देतात, ती आयुष्यभर कधीच रिकामी होत नाहीत!
☆
लेखक :अज्ञात
प्रस्तुती : श्री. ब्रह्मानंद पै
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ Be cool आई ! – लेखिका: सौ. योगिता कुलकर्णी ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम ☆
☆
लॅपटॉप आहे तो आई..! एवढ्या जोरात बटनं दाबायची गरज नाहीए त्याला….
ठक काय आई? किती वर्ष झाली माॅलला येतेस! तरी काय त्या एस्कलेटरजवळ घुटमळतेस….?
नेट बॅंकिग करत जा ग. किती सेफ आहे आई…
स्मार्टफोन फक्त फेसबुक आणि व्हॉटस अॅप साठीच बनलाय असं वाटतं का तुला..?
अशी वाक्ये फक्त माझ्याच घरात ऐकू येतात, असं नाही, तर सगळ्यांच्याच घरात ऐकू येतात…कारण हल्लीची मुलं टेक्नोस्मार्ट आहेत आणि आपण टेक्नो ढं.
पण डरने का नहीं. Cool रहनेका.
……आणि यांना तर एवढंच येतं, मला तर काय काय येतं! अख्खं घर चालवते मी !
अशी स्वतःचीच समजूत काढायची……
मुलांची काही काही मतं ऐकली की खूप मज्जा येते…..कधी त्यांचे फोटो काढले की लगेच म्हणणार….cool हां आई..टाकू नको लगेच फेसबूकवर किंवा लावू नको स्टेटसला…का रे…?असा प्रश्न आपण विचारला की उत्तर ठरलेलं असतं..Be cool, आई….आपले फोटो आपल्या साठीच असतात…..दुसर्यांसाठी नाही..
परवा एक ओळखीच्यांचं लग्न होतं
भरपूर मंडळी नाचून आनंद घेत होती..म्हणून मुलालाही म्हटलं, नाचला का नाही तू?..नाचायचं थोडं…तर म्हणाला, Be cool आई….लग्न करताना एवढं नाचण्यासारखं काय आहे…त्याचं लग्न होतंय….मी का एवढं नाचू…..?
आपली मुलं कितीही मोठी झाली तरी आपल्याला लहानच वाटतात….
मुलगी परीक्षेला निघाली तेव्हा हे घेतलं का, ते घेतलं का…? असं विचारताना मला आलेलं टेन्शन बघून तीच मला म्हणाली….Coooooool आई….सगळं घेतलंय…….
गाडी चालवताना पण तेच होतं..
मी शक्यतो मुलांच्या मागे बसत नाही..त्यामुळे कुठे जाताना मुलगा मागे असेल तर म्हणतो….आजच पोचायचंय ना आपल्याला…..? नाही, सायकलवाले पण ओव्हरटेक करुन चाललेत म्हणून म्हटलं…..
हाॅटेलमध्ये गेलं की अन्न गरमागरम असावं, असं सगळ्यांना वाटतं..त्यासाठी त्या वेटरची जास्त ये-जा व्हायला लागली की मी म्हणते जाऊ दे रे. नको बोलावूस आता…हे ऐकलं की मुलं नक्की म्हणतात chill, आई. आपण थंड खाण्यासाठी एवढे पैसे भरणार का..?
आणि तो तुला दहा पैसेतरी सोडणार आहे का..?
फेसबुकवर फ्रेंडशिपबद्दलच्या खुप सार्या पोस्ट फिरत असतात. ते वाचून अशा फ्रेंड रिक्वेस्ट घेऊ नका, असं सांगितलं की मुलं म्हणतात, Cool आई! सगळेच काही आतंकवादी नसतात…
मुलगी तर कुठेही जाणार असेल, तर मी नेहमी सांगते कुणाही अनोळखी व्यक्तीशी बोलू नको..कुणी काही दिलं तर खाऊ नको….या सगळ्या सूचना तिला आता पाठ झाल्यात. त्यामुळे मी सांगायच्या आधीच ती म्हणते…हो..कळलं…Chill, आई! कुण्ण्णाशी नाही बोलणार….काही नाही खाणार..
एकंदर असं आहे..हल्लीची मुलं खुप clear आणि smart आहेत आणि आपली पिढी खूप मायाळू आणि सर्वांना सामावून घेणारी…
आणि या दोन्हीचा समन्वय साधून अजूनतरी दोन्ही पिढ्या मस्त मजेत चालत आहेत….चालत रहातीलच…
आपण फक्त एकच मंत्र जपायचा…
Be Cool, आई….
☆
लेखिका: श्रीमती योगिता कुलकर्णी
प्रस्तुती : सौ. दीप्ती गौतम
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
माहीतच नसतं आपल्याला, नियती मांडून बसली आहे वेगळाच खेळ!
आता हे घर निशब्द आहे,
यात नाही तुझ्या मायेची ओल,
आजही तुझा फोटो पाहिला की,
काळजात उठते कळ खोल!
आजही आनंद झाला की तुझ्यापुढे येऊन नाचतो, आजही कुणी दुखावलं
तर तुझ्यासमोर रडतो,
चूक झाली तर तुझ्यापुढे येऊन कान धरतो, नवीन काही सुरु करताना
नमस्कार करतो.
पण, फोटोत तुझे शब्द नाहीत,
तुझा स्पर्श नाही,
आई, तुझ्याशिवाय कशालाच अर्थ नाही!
बघ ना जमेल तर,
बोलता येईल का प्रत्यक्ष भरभरून,
खरंच का ग, एकदा गेलेली माणसं येत नाहीत परतून ?
☆
I miss you, Aai. ज्यांना आई आहे ना त्यांनी त्या मातेला कधीही अंतर देऊ नका… कारण मातेची किमया फारच निराळी आहे बरं..! आई म्हणोनी कोणी. आईस हाक मारी. ती हाक येई कानी…
कवी: अज्ञात
प्रस्तुती: डॉ. श्रीमती भारती माटे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
बैठकीत विश्वास मिळतो, तर माजघरात आपुलकी ! स्वैपाकघरातील प्रेम तर दुधाच्या मायेनं ऊतू जातं! तुझ्या आतल्या देव्हाऱ्यात बसलेली मूर्ती मनातील भीती पळवून लावते.
खरंच वास्तुदेवते, या सगळ्यामुळे तुझी ओढ लागते.
तुझी शिकवण तरी किती बहुअंगी! खिडकी म्हणते, ‘दूरवर बघायला शिक’.
दार म्हणतं, ‘येणाऱ्याचं खुल्या मनाने स्वागत कर’.
भिंती म्हणतात, ‘ मलाही कान आहेत. परनिंदा करू नकोस’.
छत म्हणतं, ‘माझ्यासारखा उंचीवर येऊन विचार कर’.
जमीन म्हणते, ‘ कितीही मोठा झालास तरी पाय माझ्यावरच असू देत’.
तर बाहेरचं कौलारू छप्पर सांगतं, ‘स्नेहाच्या पंखाखाली सगळ्यांना असं काही शाकारून घे की बाहेर शोभा दिसेल आणि आत ऊन, वारा लागणार नाही’.
इतकंच नाही तर तू घरातील, मुंग्या, झुरळ, पाली, कोळी यांचाही आश्रयदाता आहेस. त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्थाही बघतोस आणि निसर्गाच्या अन्न साखळीला हातभार लावतोस. इतकं मोठं मन आमचंही व्हावं असा आशीर्वाद दे.
तुझ्या वाटणीसाठी दोन भाऊ कोर्टात जातात आणि वकिलाची घरं उभी रहातात, याचं खरंच वाईट वाटतं.
एकत्र कुटुंबपद्धतीकडून एकल कुटुंब पद्धतीकडे वेगाने निघालो आम्ही. पण तरीही शेवटी ‘घर देता का कोणी घर?’ ही नटसम्राटाची घरघर काही संपली नाही रे !
कारण जिथे तुझ्या प्रसन्नतेच्या खाणाखुणा नाहीत, ते घर नसतं. बांधकाम असतं रे विटामातीचं.
पण एक मात्र छान झालं, की लॉकडाऊनमुळे ज्या सामान्य माणसाने तुला उभारण्यासाठी जिवाचे रान केले ना, त्याला तू घरात डांबून, घर काय चीज असते ते मनसोक्त उपभोगायला लावलेस रे.
खरंच हा आमूलाग्र बदल कोणीच विसरणार नाही रे.
वास्तू देवते, पूर्वी आई आजी सांगायच्या, “शुभ बोलावं नेहमी. आपल्या बोलण्याला वास्तुपुरूष नेहमी ‘तथास्तु’ म्हणत असतो.
मग आज इतकंच म्हणते की “तुला वस्तू समजून विकायचा अट्टहास कमी होऊन तुझ्या वास्तूत वर्षातून काही क्षण तरी सगळी भावंडं, मित्रमैत्रिणी, आप्तेष्ट एकत्र वास्तव्यास येऊ देत. “
आणि या माझ्या मागण्याला तू “तथास्तु” असंच म्हण, हा माझा आग्रह आहे.
तथास्तु!
लेखिका: अज्ञात
प्रस्तुती : श्री कमलाकर नाईक
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर
☆ महिला मुक्ती… कवी : श्री अनिल दाणी ☆ प्रस्तुती : श्री मिलिंद जांबोटकर☆
☆
चिरायू होवो जागतिक महिला दिन !
पण खेदाने म्हणावे लागते
महिला मुक्तीचं शिखर अजून खूप दूर आहे.
त्याची वाट काटेरी व बिकट आहे
आजही संस्कृती रक्षकांच्या गराड्यात सापडलेली
धर्म, रुढी, परंपरेने ग्रासलेली
समाज बंधनात अडकलेली
गर्भलिंगचिकित्सेमध्ये मुलगी असल्याचे निष्पन्न झाल्यास भ्रूणहत्येचा बळी ठरलेली ती
मुलगी झाली म्हणून जाचाला, त्रासाला सामोरी जाणारी अभागी माता ती
स्त्री म्हणून जन्मापासून दुय्यम स्थानाचा शाप लाभलेली ती
तारुण्यात पदार्पण करताच
चहू बाजूने तिच्यावर पडणारी
कामांधांची वखवखलेली नजर
त्यामुळे ओशाळं झालेलं तिचं मन, शरीर
दोन चिमुरड्यांवर शाळेत शिपायांकडून झालेले अमानुष अत्याचार
एस टी बसमध्ये नराधमाने केलेला बलात्कार
तिने आरडाओरडा केला नाही म्हणून तो सहमतीने केलेला संभोग होता,
असा वकिलाने कोर्टात केलेला उद्वेगजनक युक्तिवाद
मंत्र्याने त्याला केलेलं पूरक विधान
19 वर्षाच्या तरुणाने 35 वर्षाच्या महिलेवर केलेला अत्याचार
व चाकूने तिच्या शरीरावर केलेले अमानुष वार
रेल्वे स्थानकात, एकांतात केले जाणारे सामुहिक बलात्कार
म्हातारपणी पंधरा वर्षाच्या नातीचा सांभाळ करणे पुढे शक्य नाही म्हणून नात्यातील तिच्यापेक्षा वयाने खूप मोठ्या व्यक्तीशी लावून दिलेलं लग्न व दोन लाखात केलेली तिची विक्री
कधी वडिलांच्या, आप्तेष्टांच्या वासनेची झालेली बळी
स्त्री म्हणून विविध स्तरांवर होणारी तिची मानसिक गळचेपी
यावर मलमपट्टी करण्यासाठी दरवर्षी साजरा केला जाणारा महिलादिन !
म्हणून मनात आलेले हे विद्रोही विचार
या दिवशी तिला, दिल्या गेलेल्या फुलांच्या पाकळ्यांनादेखील काटे असल्याची भीती वाटते, दडलेला कामवासनेचा दुर्गंध येतो.
तिच्या अमानुष अंधाराचे जाळे लवकर नष्ट व्हावे व तिला निर्भयतेने व्यापलेले मोकळे आकाश मिळावे ही शुभेच्छा !
☆
कवी: श्री. अनिल दाणी
प्रस्तुती: श्री. मिलिंद जांबोटकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “भाजलेल्या शेंगा” – लेखक – अज्ञात☆ प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर ☆
खूप दिवसांनी छान गाढ झोप लागली. जाग आल्यावर हॉस्पिटलमध्ये आहोत, हे लक्षात यायला काही क्षण लागले. बेल वाजवल्यावर रुममध्ये नर्स आल्या.
“गुड ईव्हिनिंग सर. ”
“कोणी भेटायला आलं होत का?”
“नाही. ”
“बराच वेळ झोपलो होतो, म्हणून विचारलं. ” मोबाईलवरसुद्धा एकही मिस्ड कॉल किवा मेसेज नव्हता.
“आता कसं वाटतंय?” नर्स.
प्रचंड बोअर झालंय. ”
“तीन दिवसात ते प्यून काका सोडून तर भेटायला दुसरं कोणीच कसं आलं नाही?”
“सगळे बिझी असतील. ”
“आपलं माणूस म्हणून काळजी आहे की नाही?” नर्स बोलत होत्या, पण मी काहीच उत्तर दिलं नाही.
“सॉरी, मी जरा जास्तच बोलले, ” नर्स.
“जे खरं तेच तर बोललात!”
ब्लडप्रेशर तपासताना दोन-तीन वेळा ‘सॉरी’ म्हणून नर्स निघून गेल्या.
त्यांनी सहजपणे म्हटलेलं खोलवर लागलं. दोन शब्द बोलायला, विचारपूस करायला हक्काचं, प्रेमाचं कोणीच नाही, याचं खूप वाईट वाटलं. एकदम रडायला आलं. भर ओसरल्यावर बाहीने डोळे पुसले. डोक्यात विचारांचा पंखा गरागरा फिरायला लागला. अस्वस्थता वाढली.
आज मला काही कमी नाही. मोठा बंगला, फार्म हाउस, तीन तीन गाड्या, भरपूर बँक बॅलन्स, सोशल स्टेटस सगळं आहे, तरीही मन शांत नाही. कशाची तरी उणीव भासतेय. प्रत्येकजणच स्वार्थी असतो, पण मी पराकोटीचा आहे. प्रचंड हुशार, तल्लख बुद्धी; परंतु तिरसट, हेकेखोर स्वभावामुळे कधीच कोणाचा आवडता नव्हतो. फटकळ बोलण्यामुळे फारसे मित्र नव्हते. जे होते, तेसुद्धा लांब गेले. माझ्या आयुष्यात कधीच कोणाला ढवळाढवळ करू दिली नाही. अगदी बायकोलासुद्धा. तिला नेहमीच ठरावीक अंतरावर ठेवलं. लौकिक अर्थाने सुखाचा संसार असला, तरी आमच्यात दुरावा कायम राहिला. पैशाच्या नादात म्हातारपणी आई-वडिलांना दुखावले. मोठ्या भावाला फसवून वडिलोपार्जित संपत्ती नावावर करून घेतली. एवढं सगळं करून काय मिळवलं, तर अफाट पैसा. सोबत विकृत समाधान आणि टोचणारं एकटेपण. विचारांची वावटळ डोक्यात उठली होती. स्वतःचा खूप राग आला. मन मोकळं करायची इच्छा झाली. बायकोला फोन केला पण “उगीच डिस्टर्ब करू नकोस. काही हवं असेल तर मेसेज कर, “असं सांगत तिनं फोन कट केला. तारुण्याच्या धुंदीतल्या मुलांशी बोलायचा तर प्रश्नच नव्हता.
…… फोन नंबर पाहताना दादाच्या नंबरवर नजर स्थिरावली. पुन्हा आठवणींची गर्दी. दादाचा नंबर डायल केला; पण लगेच कट केला; कारण आमच्यातला अबोला. तीन वर्षांपूर्वी आमच्यात कडाक्याचे भांडण झालं होतं. त्यानंतर पुढाकार घेऊन दादानं समेटाचा प्रयत्न केला; पण माझा ईगो आडवा आला. म्हणूनच आता तोंड उघडायची हिंमत होत नव्हती. तरीपण बोलावसं वाटत होतं. शेवटी धाडस करून नंबर डायल केला आणि डोळे गच्च मिटले.
“हं!” तोच दादाचा आवाज
“दादा, मी बोलतोय. ”
“अजून नंबर डिलीट केलेला नाही. ”
“कसायेस?”
“फोन कशाला केलास?”
“तुझा राग समजू शकतो. खूप चुकीचा वागलो. गोड गोड बोलून तुला फसवले. ” ठरवलं नसताना आपसूकच मनात साठलेलं धाडधाड बोलायला लागलो.
“मुद्द्याचं बोल. उगीच शिळ्या कढीला ऊत आणू नकोस. आपल्यात आता काही शिल्लक राहिलेलं नाही.”
“दादा, इतकं तोडून बोलू नकोस.”
“मी तर फक्त बोलतोय. तू तर….]”
“पैशाच्या नादानं भरकटलो होतो. चुकलो.”
“एकदम फोन का केलास. सगळ्या वाटण्या झाल्यात. आता काहीच शिल्लक नाही. ”
“मला माफ कर, ” म्हणालो पण पलीकडून काहीच उत्तर आलं नाही.
“दादा!!!”
“ऐकतोय, काय काम होतं?”
“माझ्याकडून डोंगराएवढ्या चुका झाल्यात. ”
“मुद्द्याचं बोल. ”
“झालं गेलं विसरून जा. ”
“ठीकय. ”दादा कोरडेपणाने बोलला; परंतु मी मात्र प्रचंड भावूक झालो.
“झालं असेल तर फोन ठेवतो. ”
“आज सगळं काही आहे अन नाहीही. ”
“काय ते स्पष्ट बोल. ”
“हॉस्पिटलमध्ये एकटा पडलोय”
“का, काय झालं?” दादाचा आवाज एकदम कापरा झाला.
“बीपी वाढलंय. चक्कर आली म्हणून भरती झालोय. डॉक्टरांनी आराम करायला सांगितलंय. ”
“सोबत कोण आहे? ”
“कोणीच नाही. दिवसातून दोनदा बायको आणि मुलं व्हिडीओ कॉल करून विचारपूस करायचं कर्तव्य पार पाडतात. ”
“अजबच आहे. ”
“जे पेरलं तेच उगवलं. मी त्यांच्याशी असाच वागलोय. कधीच प्रेमाचे दोन शब्द बोललो नाही. फक्त व्यवहार पाहिला. स्वार्थासाठी नाती वापरली आणि तोडली. आता एकटेपणाने कासावीस झाल्यावर डोळे उघडलेत. ”
कंठ दाटल्याने फोन कट केला. अंधार करून पडून राहिलो.
बऱ्याच वेळानंतर नर्स आल्या. लाईट लावून हातात कागदाचा पुडा दिला. मस्त घमघमाट सुटला होता. घाईघाईने पुडा उघडला, तर त्यात भाजलेल्या शेंगा. प्रचंड आनंद झाला.
“नक्की दादा आलाय. कुठंय????”
“मी इथंच आहे, ” दादा समोर आला.
आम्ही सख्खे भाऊ तीन वर्षानंतर एकमेकांना भेटत होतो. दोघांच्याही मनाची विचित्र अवस्था झाली. फक्त एकमेकांकडे एकटक पाहत होतो. नकळतपणे माझे हात जोडले गेले.
“राग बाजूला ठेवून लगेच भेटायला आलास!”
“काय करणार तुझा फोन आल्यावर राहवलं नाही. जे झालं ते झालं. आता फार विचार करू नकोस. ”
“तुला राग नाही आला?”
“खूप आला. तीन वर्षे तोच कुरवाळत होतो; पण आज तुझ्याशी बोलल्यावर सगळा राग वाहून गेला. तुला आवडणाऱ्या भाजलेल्या शेंगा घेतल्या आणि तडक इथं आलो. ”
“दादा!!!!!…. ”मला पुढे काही बोलता येईना. दादानं डोक्यावरून हात फिरवला. तेव्हा खूप शांत शांत वाटलं.
“राग कधीच नात्यापेक्षा मोठा नसतो. मग ते रक्ताचं असो वा मैत्रीचं. चुका, अपमान काळाच्या ओघात बोथट होतात. जुन्या गोष्टींना चिकटून बसल्याचा त्रास स्वतःलाच जास्त होतो. एक गोष्ट कायम लक्षात ठेव – आपलं नातं म्हणजे फेविकोल का जोड….. ”
दादा लहानपणी द्यायचा तसचं शेंगा सोलून दाणे मला देत बोलत होता. त्या भाजलेल्या खरपूस दाण्यांची चव अफलातून होती.
सहज कचऱ्याच्या डब्याकडे लक्ष गेलं. त्यात शेगांच्या टरफलांच्या जागी मला माझा इगोच दिसत होता!
लेखक : अज्ञात
प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर
अमरावती
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ ‘म्हातारपण…‘– लेखक : श्री जयंत विद्वांस ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆
☆
हा प्रसंग माझ्या सास-यांच्या बाबतीत मी पाहिलेला आहे. त्यांना जाऊन आता चार वर्ष होतील.
दहा वर्ष झाली, माझी मुलगी दीड दोन वर्षाची असेल. तिला आणि बायकोला आणायला मी निवळीला (रत्नागिरी) गेलो होतो. त्यांना घेऊन आम्ही तसेच पुढे गणपती पुळ्याला गेलो. परतीचा रस्ता तोच असल्यामुळे जाताना परत भेटायचं असं ठरल होतं. हॉर्न दिला की घाटात एका वळणावर ते येणार होते.
आम्ही परत आलो तर ते कोकणातल्या मे महिन्याच्या उन्हाळ्यात, रस्त्याच्या कडेला एका दगडावर थोडी सावली धरून, हातात काठी घेऊन बसून होते. म्हटलं, “आधीच आलात का?” तर सासूबाई म्हणाल्या, दीड तास झाला येउन त्यांना.
आम्हांला यायला दोनेक तास लागणार हे माहित असूनही, चुकामूक होऊ नये म्हणून, चुकामूक झालीच तर नात परत वर्षभर दिसणार नाही या भीतीपोटी असेल, ते तिथे बसून होते.
आधीच ते कमी बोलायचे. मुलीचा पापा घेऊन त्यांनी आभाळ दाटलेल्या डोळ्यांनी तिच्याकडे बघितलं. “आत्ता बघतोय, पुढच्या वर्षी?” हेही त्यात होतंच. निघाल्यावर गाडीचा ठिपका होईपर्यंत ते तिथेच थांबले असणार हे मागे न बघताही जाणवत होतं. खोटं नाही सांगत पण आत्ताही ते दृश्य माझ्या डोळ्या समोर उभं आहे.
म्हातारपण वाईट.
कारण मायेचे पाश तुटत नाहीत. माणसं महिनोनमहिने दिसत नाहीत. ती त्यांच्या कारणांमुळे आणि हे वयोमानामुळे मनात आलं तरी उठून जाऊ शकत नाहीत. मग सुरु होतं ते वाट बघणं. शिक्षाच आहे ती. गणपती, होळी किंवा मे ची सुट्टी याच वेळी येणार हे माहित असतं. अचानक काहीतरी कारण निघावं आणि त्यांनी यावं अशी स्वप्न काही दिवस बघितली जातात. रोज तेच स्वप्नं कितीवेळा बघणार? मग फोनवरून चौकशा चालू होतात, “जमेल का यायला?”, एवढे तीन शब्द जिभेच्या टोकावर तयारच असणार, पण ते बाहेर पडत नाहीत.
असे न उच्चारलेले पण ऐकायला आलेले शब्द फार फार आतवर रुतून बसतात.
म्हातारपण खरच वाईट. झाडावरून आंबा पडला तर, मोगरा अमाप आला तर, काही चांगलंचुंगलं खायला केलं तर, टी. व्ही. वर एखादं छान मूल दिसलं तर, यांना नातींचे चेहरे दिसतात.
“आत्ता इथे असत्या तर?”
आणि हे सततचं वाटणं सहन झालं नाही की मग अश्रू कुणाच्या परवानगीची वाट बघत नाहीत.
म्हणूनच, रडणारी म्हातारी माणसं मला कधीच दयनीय वाटत नाहीत. ते साठवलेलं रडणं असतं. अनेक महिने थोपवलेलं असतं ते.
खूप जणांना रडू येणं हे कमीपणाच वाटतं, अश्रू थोपवण्यात कसब आहे असं कुणाला वाटत असेल तर वाटू दे. पण मोकळं होण्याचा तो साधा, सोपा, सरळ, बिनखर्चिक उपाय आहे असं मला वाटतं. वेदना झाल्या की रडू येतं आणि संवेदना जिवंत असतील तर दुस-याच्या वेदना दिसल्या, वाचल्या, अनुभवल्या तरी पण रडू येतं.
मराठीत सहानुभूती असा एक सुंदर शब्द आहे. सह+अनुभूती, दुसरा जे काही आनंद, दु:खं किंवा इतर कुठलीही भावना अनुभवतोय, ती त्याच्यासह अनुभवणे, असा खरं तर त्याचा अर्थ आहे. दुर्दैवाने आपण तो फक्त दु:ख या एकाच भावनेशी चुकीचा अर्थ लावून जोडून टाकलेला आहे.
म्हातारपण गरीब असो वा सधन, मायेचा तुटवडा फार वाईट.
☆
लेखक : श्री जयंत विद्वांस
संग्रहिका : सौ. अंजली दिलीप गोखले
मोबाईल नंबर 8482939011
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈