☆ “दिवाळी… की हॅलोविन ???” लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆
आमच्या पुण्याच्या घरी सोसायटीतील काल काही लहान मुलं हॅलोवीनचे भुतांचे चेहरे रंगवून “ट्रिक ऑर ट्रीट” असं म्हणत कँडीज मागायला आली होती. त्यावर सोसायटीच्या व्हॉट्सॲप ग्रूपवर त्यांच्यातल्या काही मातांनी, “अवर हॅलोवीन गँग, सो क्यूट!” असे फोटो टाकले.
आज सकाळी त्याच ग्रूपवर त्याच फोटोंच्या खाली एका पुणेरी एकारान्त काकांनी हा मेसेज फॉरवर्ड केला. शेवटचे दोन परिच्छेद तर विशेष धमाल आहेत.
असं मनोरंजन फक्त पुण्यातच मिळू शकतं!
“हल्ली गेल्या काही वर्षात हॅलोविन नावाचा विदेशी बिनडोकपणा हिंदूंच्या घराघरात शिरतो आहे…
हाडके, घुबडे, फ्रँकस्तीन, भुते, हडळ ह्यांचे चेहरे, जळमटे, कोळी घरात लावायचे आणि म्हणायचे happy haloween!! 🤦♀️
हिंदूंचा आनंदमय दीपोत्सव साजरा करताना घरातले अमंगल, दारिद्र्य बाहेर जावो.. मंगलमय, लक्ष्मी सोनपावलांनी घरात येवो असे म्हणायचे आणि
दिवाळी नंतर हॅलोविनच्या मूर्खपणाच्या नावाने तीच घाण घरात परत घरात आणायची.. ??
आधी सर्वांगसुंदर सुख- समृद्धीचे प्रतीक नवीन कपडे घालून लक्ष्मी पूजन करायचे पाडव्याच्या दिवशी देवळात जाऊन
“अज्ञानत्व हरोनी बुद्धि मती दे आराध्य मोरेश्वरा
चिंता, क्लेश, दरिद्र दुःख अवघे, देशांतरा पाठवी”
अशी प्रार्थना म्हणायची नंतर थोड्या दिवसात भुतखेतांचे ड्रेस घालून हिंडायचे आणि त्यांना घरात घेऊन यायचं ही कसली अवदसा आहे??
मुलांना मुंज केल्यावर दोन घरी भिक्षेला जायला लाज वाटते आणि भुतांची चेहरे रंगवून घरोघरी चॉकलेट मागत फिरतात.. ही कसली विकृती साजरी करत आहोत??
आपली मुले हे प्रकार करत असतील त्याचं मूर्खासारखे कोडकौतुक न करता चांगले बदडून काढा.. आणि जे कोण हे करायला उद्युक्त करत असतील त्यांना चांगला दम द्या.. आणि आठवण करुन घ्या आपण थोड्या दिवसांपूर्वी हिंदू धर्मात होतो म्हणून मंगलमय दिवाळी साजरी केली..
परत जर हे प्रकार मुलांकडून करायला लावले तर तुमच्या दारात श्राद्धाचा स्वयंपाक, मिरची लिंबू, काळी बाहुली, पत्रावळीवर गुलाल घातलेला भात असं सगळं आणून ठेवू. हिंदूंमध्ये भुताखेतांची कमी नाही जी विदेशी भूत आयात करायची गरज पडते आहे” 🤣
☆ पैशाचं डाएट… लेखिका : डॉ. शिल्पा जोशी क्षीरसागर ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆
” रिया, लक्षात आहे ना ? उद्या लक्ष्मीपूजन आहे तर पैसे खर्च करायचे नाहीत. तुला काही हवं असेल तर आजच आणून ठेव ” आईने दम दिला.
” हो गं बाई, किती वेळा सांगशील ? मला तर हा फंडा कळला नाही, काय म्हणे पैसे खर्च करायचे नाही. ठीक आहे, जाऊ दे, एक दिवसाने फरक नाही पडत. दरवर्षी लक्ष्मीपूजनाला हेच असतं ” रिया चिडून म्हणाली.
दुसऱ्या दिवशी सकाळी अभ्यंगस्नान झालं आणि रियाच्या लक्षात आलं, शीट, यार moisturizer संपलय, काल आणता आणता विसरलो आपण. आता पैसे मागितले तर ही आई कटकट करेल म्हणून ती गप्प बसली. थंडी सुरू झालीये नेमकी, आज मेकप करायचा, बरं आईचा ब्रँड मला सूट होत नाही. पण नकोच, आई खवळेल चांगलीच! एक दिवस ऍडजस्ट करावंच लागेल.
” रिया, ए रिया, हे फराळाचं देऊन ये गं आत्याकडे. पटकन जा आणि पटकन ये, कुठे पैसे खर्च करू नको बरं ” आईने तिला पिटाळलं.
खाली येऊन रियाने चावीने तिची टू व्हिलर सुरू केली आणि बघते तर काय, पेट्रोलचा काटा आज माझी दिवाळीची सुट्टी आहे म्हणत शून्यवरून पुढेच सरकेना. रियाला समजलं, पेट्रोल भरलं नाही, उद्या भरू म्हणत तीन दिवस झाले आपण गाडी तशीच दामटतोय, आली का पंचाईत ? आईने काही पैसे दिले नाहीयेत, गुगल पे करून पैसे भरायचे म्हणजे हिला मेसेज जाणार म्हणजे परत आरडाओरडा ! जाऊ दे, पायी जाते आत्याकडे, तरी बरं जरा जवळ रहाते ती. छ्या, ही मात्र माझीच चूक हं अशी मनातल्या मनात रियाने कबुली दिली.
आत्याकडे डबा देऊन, दमून आलेल्या रियाला तिच्या मैत्रिणी खालीच भेटल्या. एका ऑनलाइन शॉपिंग ऍपवर सेल होता. कुर्ती, जीन्स, टॉप एकदम स्वस्त होते एक दिवसासाठी. खरं दिवाळीत आताच सगळ्याची खरेदी झाली होती पण सगळ्यांना खरेदी करताना पाहून रियाला मोह आवरेना. तिने न राहवून आईला फोन केला, ” आई, दोनच टॉप घेते, प्लिज, करू ऑर्डर ? ” आई पलीकडून उत्तरली, ” आज नाही, आज खर्च करायचा नाही ! ”
रिया जाम वैतागली. तणतणत घरी परतली. दिवसभर धुसफुसणाऱ्या रियाला कधी नेलपेंट आणायचं राहिलं आठवत होतं तर कधी अर्धवट राहिलेल्या डेकोरेशनसाठी आरसे आणायचं विसरल्याचं आठवत होतं. चिडल्यावर कॅडबरी खाऊन राग शांत करणाऱ्या रियाला आज ते ही करता येत नव्हतं.
संध्याकाळी मनासारखी नाहीच झाली तिची तयारी पण तरी चांगले कपडे घालून ती पूजेसाठी तयार झाली. पूजा सुरू असतानाच कामवाली सरुमावशी रडत रडत आली. ” ताई, पोरीला आठवा कालच लागलाय. पोटात दुखतंय म्हणून दवाखान्यात नेली तर डॉक्टर म्हणाले, पिशवीचं तोंड उघडलंय, डिलिव्हरी होईल. बाळाला काचपेटी लागेल म्हणे, दिस भरले नाहीत म्हणून. कसं करावं? थोडा ऍडव्हान्स द्याल का, लई उपकार होतील. दिवाळी दिली हाये तुम्ही पर आता हे अचानक आलंय. बघा ओ ताई, जमलं तर द्या ना ” सरुमावशीने हात जोडले.
आई उठली, कपाटातून तीन हजार आणून तिच्या हातावर टेकवले, तिला हळदीकुंकू लावलं, ओटी भरली आणि शिवाय “अजुन लागले तर सांग गं “म्हणत आश्वस्त केलं.
रिया, हे सगळं बघून चिडलीच. ” आता, आता, गेली ना लक्ष्मी घराबाहेर ? नियम फक्त आम्हालाच का ? आम्ही लहान आहोत म्हणून ? ” तिने मनातली आग ओकली.
आईने रियाला जवळ बसवलं. ” रिया, तुम्ही कसं वजन कमी करावं, हलकं वाटावं म्हणून डाएट करता तसं हे आज पैशाचं डाएट असतं. ह्यामागे दोन उद्देश, एक तर प्लँनिंग शिकणे. आपल्याला काय काय लागणार हा विचार, हे नियोजन आधीच केलं ना तर ऐनवेळी धावपळ होत नाही. गाडीत पेट्रोल नसल्यामुळे तू पायी गेलीस हे मी बघितलं गॅलरीतून. वेळेवर गोष्टी न केल्याने त्या इमर्जन्सी होतात आणि मग आपल्यालाच त्रास होतो, हो की नाही ? दुसरा उद्देश म्हणजे सय्यम ! कधी कधी काही वस्तू आपण उगाचंच घेतो, गरज नसतानाही! हेच बघ ना, एवढी खरेदी झाली तरी सेल लागला म्हणून आणखी खरेदी करायची का ? अगं मार्केटिंग स्ट्रॅटेजी असते ती, आपण नाही बळी पडायचं. आता बघ, शांतपणे, वेळ घेऊन विचार केला तर तुला उद्या वाटेल की गरजच नाहीये त्या extra टॉप्स ची, हो की नाही ? ”
रियाने होकारदर्शक मान हलवली तरी चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह आईने ओळखलं होतं. आई पुढे म्हणाली, ” रिया, देव ही भक्ती असावी, भीती नाही. कोणी पाहिलंय गं देवाला? काही चांगल्या सवयी अंगीभूत व्हाव्या म्हणून बऱ्याच गोष्टींना देवाचं नाव देण्यात आलं पण म्हणून ती अंधश्रद्धा होऊ नये ही काळजी आपणच घ्यायची. आज सरूच्या पोरीतला, माणसातला देव जर मी नाही ओळखू शकले आणि तिला तिचं बाळ वाचवण्यासाठी नाही मदत करू शकले तर खरा देव अस्तित्वात असेल जरी तरी तो मला माफ करेल का ? तीच आज लक्ष्मी बनून पूजेच्या वेळी आली आणि तिची तृप्तता झाली म्हणून जाताना तोंडभर आशीर्वाद देऊन गेली. अगं स्वतःला शिस्त लावत, माणसातला देव शोधायचा आणि तो सापडला की ती ज्योत पुढे पुढे न्यायची, हीच तर दीपावली ! आता नाही ना रुसलीस आईवर ? ” आईने विचारलं.
‘आली दिवाळी आणि कळली दिवाळी ‘ म्हणत रियाने आईला मिठी मारली आणि पूजेतली लक्ष्मीची प्रतिमा समाधानाने हसली.
लेखिका : डॉ शिल्पा जोशी क्षीरसागर
संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ दिवाळीच्या फराळामागील आहारशास्त्र – भाग- २ – लेखक : माहिती संग्राहक : श्री आनंद महाजन ☆ प्रस्तुती – सुश्री सुलु साबणे जोशी ☆
(या प्रत्येक पदार्थाचे एक विशिष्ट पांचभौतिक संघटन असते. म्हणून तर प्रत्येक पदार्थ बनविताना ठरलेल्या प्रमाणातच घ्यावा लागतो, त्यास पाणी, अग्नीसुद्धा ठरल्याप्रमाणेच द्यावा लागतो नाही तर त्या पदार्थाचे पांचभौतिक संघटन बिघडते व पदार्थ बिघडतो.) – इथून पुढे —
लाडू…
उदाहरणार्थ आपण लाडूचे पांचभौतिक महत्त्व जाणून घेऊ यात. लाडू हा पृथ्वी आणि आप महाभूत प्रधान असा पदार्थ आहे. त्यामुळे तो अत्यंत पौष्टिक व बलवर्धक आहे. लाडूचे प्रकार जरी अगणित असले तरी त्याचा आकार मात्र गोलच असतो. पृथ्वीसारखा स्थिर व आप महाभूतासारखा गोल आकार धारण करतो. मुळात पृथ्वीसारख्या त्याच्या दीर्घकाळ टिकण्याच्या गुणामुळे लाडू करण्याची पद्धत निर्माण झाली असावी. पूर्वीच्या काळी प्रवास मोठे असत. वाटेत आताच्यासारखी हॉटेल नसत. म्हणून खूप दिवस टिकणारा व प्रवासात नेता येणारा, सर्व लहान मुलांना आवडणारा, खाताना हात खराब न होणारा, कुठेही, केव्हाही, कधीही सहज खाता येणारा आणि यासोबत खाण्यासाठी कशाचीही गरज नसणारा, स्वादिष्ट व गोड असल्याकारणाने पटकन तरतरी आणून देणारा, खाताच पोट भरलेल्याची जाणीव करून देणारा, असा हा मजेशीर पदार्थ म्हणजे लाडू.
लाडूचे प्रकारही असंख्य आहेत. विविध डाळी, गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, नाचणी यांपासून विविध प्रकारचे लाडू बनविता येतात. बदाम, काजू, मनुके यांमुळे लाडू अधिकच पौष्टिकहोतात. तुपामुळे त्यांमध्ये स्निग्धपणा आलेला असतो. आपल्याकडे रव्याचे लाडू, हरभरा डाळीचे लाडू, बेसनाची जाड शेव तयार करून तिचे तुकडे गुळाच्या पाकात पाडून तयार केलेले शेवकांडीचे लाडू, फक्त चुरमुरे व गुळाचा पाक यांपासून बनविलेले लाडू असे अनेक प्रकार आहेत. मधुमेहाचे रुग्ण सोडले तर बाकी सर्वाना विशेषत: लहान मुलांना तर पोषक असा दिवाळीचा एक परिपूर्ण आहारीय पदार्थ म्हणजे लाडू. यापैकी दिवाळीत फारसा न केला जाणारा मात्र लहान मुलांसाठी अत्यंत वृष्य, बलदायक व पौष्टिक असा लाडू म्हणजे फक्त खजूर व गुलकंद वापरून तूप लावून केलेला लाडू. ज्यांनी केला नसेल त्यांनी या दिवाळीत हा आवर्जून करावा. मुले फार खूश होतात. तसेच गुलकंद पित्तशामक असल्याने याने फार उष्णताही वाढत नाही. मुलांना चॉकलेटपेक्षा हाच लाडू जास्त आवडतो. तसेच स्त्रियांनी या दिवाळीत हटकून ठरवून स्वत:साठीसुद्धा एक आयुर्वेदिक केश्य लाडू बनवावा. अहळीव, खोबरे, तीळ, बडिशेप, बाळंतशेप, डिंक, गोडांबी, बदाम, तूप, गूळ यांपासून बनविलेला हा लाडू उत्तम केश्यवर्धक, हाडांना बळकटी देणारा, केसांची वाढ करणारा व केसांना प्राकृत कृष्ण वर्ण प्रदान करणारा आहे.
करंजी
आता आपण करंजीबद्दल थोडी माहिती जाणून घेऊ यात. करंज या वृक्षाच्या बिया या करंजीप्रमाणे दिसतात. म्हणून यास करंजी असे म्हणतात. करंजी ही अर्धचंद्राकृती असते. अर्थातच वायू महाभूताचे अधिक्य यामध्ये असते. म्हणून करंजी जेवढी वायूने अधिक भरलेली असेल तेवढी छान लागते. दिसायलाही भरलेली खुसखुशीत कारंजी छान दिसते. म्हणून करंजी बनविताना याची काळजी घ्यावी लागते.
चकली
वर्तुळाकृती व अर्धचंद्राकृती आणखी एक पदार्थ म्हणजे चकली. यामध्ये आकाश व वायू महाभूताचे आधिक्य असते. म्हणूनच ती त्या त्या महाभूताचा आकारही धारण करताना दिसतात. यामध्ये आपण जेवढे तिखट मिसळू तेवढे त्याचे तेज तत्त्व वाढते. त्याचबरोबर तिच्यावर अग्निसंस्कार किती झाला आहे यावरून चकलीचे रूप ठरते. म्हणून चकलीची भाजणी उत्तम व्हावी लागते. तसेच ती तळणे हे सुद्धा एक अत्यंत कौशल्याचे काम आहे. चकली कमी तापलेल्या तेलात टाकली तर तिचे महाभूत संघटन बिघडते व ती मऊ होते. तिचा बाहेरील भाग कडक होत नाही. म्हणून योग्य प्रमाणात तापलेल्या तेलातच चकली तळली तर तिच्यातील संघटन उत्तम बनते व चकली कडक व खुसखुशीत बनते. यावरून आपल्याला एखाद्या पदार्थाच्या निर्मितीतील पंचमहाभूतांचे महत्त्व चटकन समजते.
चिवडा
तिखट पदार्थामधला आपल्या सर्वाचा आवडता आणि आकाश व वायू महाभूत प्रधान असा आणखी एक पदार्थ म्हणजे चिवडा. बहुतेक घरांमध्ये पातळ पोहय़ांचा चिवडा बनविला जातो. पोहे हा शब्दच मुळी ‘पृथु’ या शब्दापासून निर्माण झाला आहे. लाहय़ांना चपटे केले, पृथु केले की त्यास पोहे असे म्हणतात. त्यामुळे काही ठिकाणी लाहय़ांचा चिवडा केला जातो तर काही ठिकाणी त्याच लाहय़ांपासून बनविलेल्या पोहय़ांचा चिवडा केला जातो. लाहय़ांमधील आकाश महाभूत काढून टाकले व त्यास ‘पृथु’ करून त्यातील पर्यायाने अल्प पृथ्वी महाभूत वाढवले की झाले पोहे. मात्र या पोहय़ांमध्ये भरपूर प्रमाणात छिद्रे असल्याने यात वायू महाभूताधिक्य हे असतेच. म्हणून पोहे, भेळ, लाहय़ा असे पदार्थ खाल्ले की आपला वात वाढतो. असो. म्हणून पोहे नुसतेच जर कढईत भाजायला घेतले तर उष्णता जास्त असल्याने पोहय़ांमध्ये जागा व्यापलेल्या हवेचे प्रसरण होऊन ती बाहेर निघून जाते व पोहे आक्रसतात. म्हणून पातळ पोहय़ांचा चिवडा करताना ते आधी भाजू नयेत. फोडणी झाल्यावर त्यावर पोहे टाकून परतले की तेलाचे सूक्ष्म आवरण त्या पोहय़ांवर चढते. हवेची जागा तेलाचे सूक्ष्म रेणू घेतात. म्हणून पोहे अशा प्रकारे परतले की आक्रसत नाहीत. मंद विस्तवावर परतले की त्यातील अंगभूत पाण्याचा अंश निघून जातो. त्यामुळे तेलाचे रेणू आतपर्यंत जाऊ शकतात आणि पोहे कुरकुरीत होतात. दगडी पोहय़ांसारखे जाड पोहे असल्यास ते तेलात तळून त्यापासून चिवडा तयार करतात. तसेच काही ठिकाणी भाजक्या पोहय़ांचाही चिवडा करतात. ते आधीच भाजके असल्याने कुरकुरीतच असतात. त्यामुळे ते तळावे लागत नाहीत किंवा जास्त भाजावेही लागत नाहीत. तर थोडक्यात हा सर्व खेळ त्या पोहय़ांमध्ये दडलेल्या आकाश आणि वायू महाभूताचा आहे. त्यावर अग्नी महाभूताचा आपण संस्कार करतो व त्यास अधिकच रुचकर बनवतो.
अनारसे
अनारसे बनवताना मात्र जल महाभूताच्या संतुलनाला महत्त्व असते. म्हणून अनारशासाठी तांदूळ तीन दिवस भिजवून मगच कुटले जाते. तीन दिवस भिजल्याने त्यामध्ये आंबवण्याची क्रिया आधीच झालेली असते. त्यामुळे त्या पिठात वायू महाभूतही वाढलेला असतो. अर्थात या ठिकाणी हा वायू महाभूत म्हणजे आंबविण्याच्या क्रियेत तयार झालेला कार्बन डायॉक्साइड. त्यामुळे अनारसा तुपात टाकला की वायू व अंगीभूत पाण्याची वाफ बाहेर येऊ लागते. म्हणून अनारशावर तूप उडवीत राहिले कीत्या छिद्रांमधून ते आतपर्यंत जाऊ शकते आणि अनारशाला जाळी पडते. उष्ण तत्व योग्य प्रमाणात मिळाल्यास त्यास छान सोनेरी रंगही प्राप्त होतो.
… अशा प्रकारे आपल्याकडे दिवाळीच्या फराळामध्ये बनणाऱ्या प्रत्येक पदार्थामागे काही तरी शास्त्र दडलेले आहे. एवढेच नव्हे तर आपल्याकडे प्रत्येक सणाला बहुतांशी वेगवेगळा पदार्थ वर्णन केला आहे. त्यामुळे संक्रांत, दिवाळी, दसरा, कोजागरी, नवरात्र, श्रावण या प्रत्येक काळात आहारीय पदार्थ वेगवेगळे सांगितले आहेत. आपण मात्र एकसाखेच वागून किंवा त्यांचे चुकीचे अनुसरण करून आजार वाढवून घेतो. दिवाळीच्या काळात निसर्ग आपल्याला बल द्यायला सुरुवात करतो. बाहेर थंडी सुरू झालेली असते. त्यामुळे त्वचेवरील रोम रंध्रे बंद होऊ लागतात व अग्नी शरीरात कोंडला गेल्याने तो अधिकच वाढू लागतो. त्यामुळे आपल्याला भूक जास्त लागते. म्हणून ही भूक भागविण्यासाठी वेगवेगळे पदार्थ बनवून हा सण साजरा केला जातो. म्हणून प्रत्येकाने आपापल्या पचन शक्तीचा अंदाज घेऊन स्वत:च्या शरीराचे पांच भौतिक संघटन ओळखून दिवाळीतील पदार्थाचा आनंद घ्यावा.
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
– समाप्त–
लेखक : माहिती संग्राहक : श्री आनंद महाजन
योग प्रशिक्षक, अमरावती.
प्रस्तुती : सुश्री सुलु साबणे जोशी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ दिवाळीच्या फराळामागील आहारशास्त्र – भाग-१ – लेखक : माहिती संग्राहक : श्री आनंद महाजन ☆ प्रस्तुती – सुश्री सुलु साबणे जोशी ☆
… म्हणून दिवाळीत बनवले जातात करंजी, चकली, चिवडा अन् लाडू….
नुसते दिवाळीचे पदार्थ बनवून दिवाळी साजरी करण्यापेक्षा तिचे शास्त्रीय महत्त्व, वेगवेगळे पारंपरिक पदार्थ, त्या बनविण्याच्या पद्धती, खाण्याच्या पद्धती तसेच त्या प्रथम कोणी बनविल्या याचा शोध घेऊन या दिवाळीत आपल्या मुलांना आपल्या परंपरांबद्दल माहिती दिल्यास त्यांनाही याचा अभिमान वाटायला लागेल व ते खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी करतील. मग पाहा ‘हॅपी दिवाली’ ची कशी ‘शुभ दीपावली’ होतेय ते!
सगळीकडे दिवाळीचे फराळ बनविण्याची गडबड चालू होती. सगळे जण आपापल्या कामात व्यग्र होते.
कस्तुरीच्या डोक्यात मात्र भलतेच चालू होते.. आई, मामा, आत्या सर्वाना प्रश्न विचारून विचारून तिने अगदी भंडावून सोडले होते. शंकरपाळीचा आकार असाच कसा? करंज्या अशा कशा दिसतात? लाडू गोलच का करतात? प्रत्येक फराळाचा आकार वेगवेगळा का असतो? आणि त्या छोटा भीमला जो लाडू आवडतो तो हाच का? तिच्या या प्रश्नांचे उत्तर मात्र कोणाकडेच नव्हते.
आज कस्तुरीच्या आज्जीची प्रकर्षांने आठवण येत होती. ती असती तर तिने सांगितलं असतं सगळं. पण या आताच्या नवीन पिढीच्या ‘मम्मी’ला पण हे माहीत नाहीये. त्यात छोटा भीमने तर लहान मुलांवर वेगळीच छाप टाकली आहे. त्यामुळे भीम नक्की कोण होता हे आपल्यालाही माहिती करून घेतलं पाहिजे. कारण नुसते दिवाळीचे पदार्थ बनवून दिवाळी साजरी करण्यापेक्षा तिचे शास्त्रीय महत्त्व, वेगवेगळे पारंपरिक पदार्थ, त्या बनविण्याच्या, खाण्याच्या पद्धती तसेच त्या प्रथम कोणी बनविल्या याचे शोध घेऊन या दिवाळीत आपल्या मुलांना आपल्या परंपरांबद्दल माहिती दिल्यास त्यांनाही याचा अभिमान वाटायला लागेल व ते खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी करतील. मग पाहा ‘हॅपी दिवाली’ची कशी ‘शुभ दीपावली’ होतेय ते.
असो. तर भीम हा ‘पौरोगव बल्लव’ या नावाने राजा विराटाच्या सेवेत एक वर्ष पाकशास्त्रज्ञ म्हणून राहिला. ‘पौरोगवो बृवानो अहम बल्लावो नाम नामत:।.. महाभारत/विराट पर्व/ २/१-१०. भीमाला पाकशास्त्र चांगले येत होते. महाभारतात खूप ठिकाणी याचे वर्णनदेखील मिळते. बल्लव म्हणजे पाकशास्त्रज्ञ. पांडव वनवासात असतान जेव्हा श्रीकृष्ण त्यांना भेटायला आले तेव्हा भीमाने त्यांच्यासाठी खास एक नवीन प्रकारचा गोड पदार्थ तयार केला होता. तो खाल्ल्यावर श्रीकृष्णाने मोठय़ा आनंदाने भीमाचे कौतुक केले होते. व त्या पदार्थाचे नाव ‘रसाला’ असे ठेवले. तर हे ‘रसाला’ म्हणजेच आताचे श्रीखंड. म्हणजेच श्रीखंडाचा प्रथम निर्माता भीम आहे व त्याने तो खास श्रीकृष्णासाठी बनविला.
आपल्याला आपल्या प्राचीन आहारीय शास्त्राची माहिती करून देणाऱ्या ‘क्षेमकुतूहल’, ‘भोजन कुतूहल’, ‘पाकदर्पण’ अशा प्राचीन व सध्याच्या युगातील अगदी नुकत्याच प्रकाशित झालेल्या सूद्शास्त्र वर्णन केलेल्या ग्रंथांमध्ये आपल्याला याची अधिक माहिती मिळते. पूर्वीच्या काळी ‘पूपलिका’ म्हणजे पुरी, ‘पूपा’ म्हणजे छोटे वडे, ‘ईण्डरिका’ म्हणजे इडली, ‘घारिका’ म्हणजे डोसा, ‘कुंडलिका’ म्हणजे जिलेबी, ‘किलाट’ म्हणजे पनीर, ‘लाप्सिका’ म्हणजे हलवा आणि ‘चणक रोटिका’ म्हणजे हरभरा डाळीपासून बनवलेली रोटी अर्थात पुरणपोळी, ‘हिमाहवा’ म्हणजे बर्फी, ‘पिंडक’ म्हणजे पेढा व ‘लड्डूक’ म्हणजे लाडू असे सध्याच्या प्रचलित पदार्थाचे जुने संदर्भ व बनविण्याच्या पद्धतीचे वर्णन मिळते. त्याचबरोबर त्यासाठी लागणारी साधनसामुग्री, त्यांचा आपल्यावर होणारा परिणाम, त्याचे फायदे-तोटे, प्रत्येक पदार्थ खाण्याचे प्रमाण याबद्दल विस्तृत माहिती मिळते. गरज आहे ती फक्त आयुर्वेदीय सिद्धांत व आहारशास्त्रातील वर्णन केलेले पदार्थ यांची सांगड घालून त्यांचे कालानुरूप व प्रकृतीनुरूप सेवन करण्याची.
आपण दिवाळीत केलेल्या पदार्थानी युक्त भोजनाला ‘पंचपक्वान्नांचे भोजन’ असे म्हणतो. पैकी यातील पंच – पक्व -अन्न म्हणजेच पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पाच महाभूतांपासून बनलेले भोजन. या प्रत्येक महाभूतांचा आकार ग्रंथात वर्णन केलेला आहे. जसे की ‘पृथ्वी’ महाभूत हे स्थिर असल्या कारणाने चौकोनी सांगितले आहे. ‘जल आणि आकाश’ मात्र गोल सांगितले असून ‘अग्नी’चा आकार त्रिकोणी व वायूचा आकार अर्ध चंद्राकृती सांगितला आहे. आपल्या दिवाळीतील लाडू गोल, करंज्या अर्धचंद्राकृती, शंकरपाळ्या कधी त्रिकोणी कधी चौकोनी केलेल्या पाहायला मिळतात. या प्रत्येकाच्या मागे काही तरी गमक आहे. हे उगीचच नक्की आले नाही. या सर्व पंचमहाभूतांची आपल्याला आठवण राहावी, पुढच्या पिढीला त्याची माहिती मिळावी म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने ती आपल्या परंपरांमध्ये जतन करून ठेवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. आपल्या आहारातील सहा रस म्हणजे षड्रससुद्धा याच पाच महाभूतांपासून बनलेले असतात. यापैकी पृथ्वी आणि आप महाभूतापासून मधुर रस बनतो. पृथ्वी आणि तेज महाभूतापासून आम्ल रस बनतो. अग्नी व जल महाभूतापासून लवण रस म्हणजे खारट. आकाश व वायूपासून कडू. अग्नी व वायूपासून तिखट आणि पृथ्वी व वायूपासून तुरट रसाची निर्मिती होते, असे आयुर्वेद शास्त्राचे मत आहे. या सहा रसांच्या संतुलित सेवनामुळे आपल्या शरीराचे पोषण होत असते.
गंमत पाहा, आपल्या परंपरेत या सर्वाना महत्त्वाचे स्थान आहे. आपण दिवाळीमध्ये बनवीत असलेल्या प्रत्येक पदार्थाचा आकार व चव, त्यात वापरली जाणारी घटकद्रव्ये वेगवेगळी असतात. तसेच त्या प्रत्येक पदार्थाची अवस्थासुद्धा वेगवेगळी असते. थोडक्यात, या प्रत्येक पदार्थाच्या निर्मितीमागे हे पंच महाभूतांचे शास्त्र दडलेले असते. त्यांच्या कमी-अधिक संयोगानेच पदार्थ, त्यांचा आकार, त्यांची चव व टिकाऊपणा ठरलेला असतो. या पंचमहाभूतांमुळेच आपल्याला त्या पदार्थाचे पंच ज्ञानेंद्रियांच्या साहाय्याने ज्ञान होत असते. म्हणून तर पृथ्वी महाभूत त्या पदार्थातील गंध ठरवीत असते. आप महाभूत त्या पदार्थाची चव ठरवत असते, तेज महाभूत त्या पदार्थाचे रूप म्हणजे दिसणे ठरवत असते तर वायू महाभूत त्या पदार्थाचा स्पर्श ठरवत असते. तो पदार्थ खाताना येणारा विशिष्ट आवाज हा त्या पदार्थातील आकाश महाभूतांमुळे येत असते. कारण आकाश महाभूत त्या पदार्थातील शब्द व्यक्त करत असतो. म्हणून आपल्याला वेगवेगळ्या कारणांमुळे एखादा पदार्थ आवडत असतो. कोणाला भज्याचा वास आवडतो, कोणाला जिलेबीची चव आवडते, कोणाला शेव, चकलीचा कुरकुरीतपणा व खातानाचा आवाज आवडत असतो तर कोणाला स्पर्शाला अनारसे व दिसायला करंज्या आवडत असतात. त्यामुळे या पाचही महाभूतांचे त्या एकाच पदार्थातील उत्तम संतुलन हे प्रत्येकालाच त्या पदार्थाच्या मोहात पाडते. हीच त्या सुगरणीची खरी कसरत असते. दिवाळीच्या प्रत्येक पदार्थाचा रंग-रूप, आकार, चव, स्पर्श व आवाज वेगवेगळा आहे. म्हणून आपल्या पाचही ज्ञानेंद्रियांना आनंद देणारी अशी दिवाळी आपल्याला इतर सणांपेक्षा जास्त आवडते. कारण यात प्रत्येकाच्या प्रत्येक आवडीनिवडीची काळजी घेतली आहे.
बहुतांशी दिवाळीच्या फराळातील पदार्थ हे पार्थिव, आकाशीय व वायुवीय तत्त्वाचे असतात. त्यांच्यावर अग्नी व जल तत्त्वाचा संस्कार झालेला असतो. जसे की काही पदार्थ तेज व जल तत्त्व प्रधान अशा उष्ण तेलात तळलेले असणे. यामुळे त्या पदार्थावर या दोन महाभूतांचे संस्कार होतात. संस्कारांमुळेच त्या पदार्थात गुणपरिवर्तन होते. टणक पदार्थ मऊ होतात तर मऊ पदार्थ टणक होतात. म्हणून तर लाडू, करंज्या, शंकरपाळ्या, कापण्या, चिरोटे, शेव, चिरमुरे, अनारसे, चकल्या या प्रत्येकाचे पांचभौतिकत्व वेगवेगळे असते. त्यामुळे लाडू टणक असतात. करंज्या पटकन फुटतात. शंकरपाळ्या, चिरोटे मऊ असतात. शेव, चकल्या कुरकुरीत असतात. तर गुलाबजामून, रसगुल्ले जल महाभूत युक्त पार्थिव असतात. काही मधुर रसाचे गोड, काही तिखट तर काही आंबटगोड असतात. या प्रत्येक पदार्थाचे एक विशिष्ट पांचभौतिक संघटन असते. म्हणून तर प्रत्येक पदार्थ बनविताना ठरलेल्या प्रमाणातच घ्यावा लागतो, त्यास पाणी, अग्नीसुद्धा ठरल्याप्रमाणेच द्यावा लागतो नाही तर त्या पदार्थाचे पांचभौतिक संघटन बिघडते व पदार्थ बिघडतो.
— क्रमशः भाग पहिला
लेखक : माहिती संग्राहक : श्री आनंद महाजन
योग प्रशिक्षक, अमरावती.
प्रस्तुती : सुश्री सुलु साबणे जोशी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
आज आठवते ना आपल्या लहानपणीची दिवाळी. २५ पर्यंत पाढे पाठांतर, २१ दिवसांचे दहा ओळींचे शुद्धलेखन, कविता पाठांतर, निबंध. दिवाळी सुट्टी अभ्यासासाठी दोनशे पानी वही व शुद्धलेखनासाठी शंभर पानी दुरेघी वही.
गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी. इतका दिवाळीतला गृहपाठ करूनसुद्धा आपण दिवाळीत धम्माल करायचो. किल्ले बनवायचो, रांगोळीसाठी अगरबत्तीने ठिपके पाड़ून द्यायचो. मनसोक्त फटाके फोडायचो. सापाची गोळी आठवते ना… टेलिफोनचा फटाका आठवतो का… चिड़ी कुठून कुठे उड़ायची माहित आहे ना… राॅकेटसाठी कुठून पण बाटली शोधून आणायचो. रस्त्यावर लावलेला बाण आड़वा होऊन कोणाकोणाच्या ढेंगातून गेला होता…. आठवतंय ना. कधी कधी बाण कोणाच्या खिडकीतून घरात घुसायचा, मग त्या काकी भडकण्याच्या आधी सगळे तिथून धूम ठोकायचे.
खरंच, दिवाळीच्या दिवसात आम्ही श्रीमंत व्हायचो, कारण बाबा, मामा, काका, खिशात पैसे टाकायचे आणि उरलेल्या दिवसात अर्ध्या तासाचे 50 पैसे किंवा तासाचा 1 रुपया देऊन सायकल भाड़्याने घेऊन फिरायला जायचो ना…
आता फक्त हातात मोबाईल घेऊन त्यातच गर्क असलेली मुले दिसतात तेव्हा सांगावेसे वाटते,
“अरे बाबांनो.. दिवाळी म्हणजे व्हाॅटसअपवरचे मेसेज आणि व्हिड़ीओ नसतात रे…. ! “
असो…. !!
लेखक : अज्ञात
संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “धुक्यात हरवलेली ही पहाट…” – लेखक : श्री विलास कुमार ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆
धुक्यात हरवलेली ही पहाट…
अज्ञाताकडे घेऊन जाणारी ती वाट…
अशी धुक्याच्या दुलईमध्ये लपेटलेली पहाट ही पाहण्याची नसून अनुभवण्याची गोष्ट आहे. परतीचा पाऊस येऊन गेलेला असतो… थंडीची चाहूल लागण्यापूर्वीचा हा काळ… हवेत एक प्रकारचा उबदार गारवा असतो. आपल्या समोरचा काही भाग फक्त दृश्यमान असतो. जणू काही
नूतन जोडप्यामधील एकमेकांबद्दल समज! अजून एकमेकांच्या स्वभावाची पुरेशी ओळख झालेली नसते. नुसते काही ठोकताळे बांधलेले असतात. ते समज गैरसमज हळूहळू कळत जातात. खरे झाल्यावर कधी आनंद होतो, तर चुकल्यावर कधी किंचित निराशाही येते…. एकमेकांना समजून घेत संसाराच्या वाटेवर प्रवास सुरूच असतो.
कधी कधी वाट चुकू शकते…. धुक्यामध्ये हरवल्यासारखे अर्ध्या वाटेवर जोडीदाराला टाकून पुढे जावे लागते… नियतीच्या चकव्यापुढे कधी कधी शरण जावे लागते.
एकमेकांबद्दलचे गैरसमज नंतर हळूहळू वितळून जातात…. जणू काही धुके सरून लख्ख ऊन पडतं. भविष्यातील मार्ग स्वच्छ दिसायला लागतो. संसाररूपी उन्हाचा कडाका सहन करत जीवन प्रवास चालू होतो…. सहजीवनाच्या पहाटेस अनुभवलेल्या या धुक्याला मात्र कुणी विसरू शकत नाही…
पहाटेच्या ह्या स्वप्नाची कुपी जोडीदाराची ताटातूट झाल्यावरही मनपटलावर कायमची दिसत राहते…
धुक्या सारखीच…
अंधुक…
विरळ….
लेखक : श्री. विलास कुमार
प्स्तुती : सौ. मंजुषा सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ ‘खूप बोला’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री ब्रह्मानंद पै☆
वृद्ध लोक जेव्हा जास्त बोलतात तेव्हा त्यांची थट्टा केली जाते, परंतु डॉक्टर त्याकडे आशीर्वाद म्हणून पाहतात.
डॉक्टर म्हणतात की सेवानिवृत्तांनी (ज्येष्ठ नागरिकांनी) अधिक बोलले पाहिजे, कारण सध्या स्मरणशक्ती कमी होण्यापासून रोखण्याचा कोणताही मार्ग नाही. अधिक बोलणे हा एकमेव मार्ग आहे. ज्येष्ठ नागरिकांनी अधिक बोलण्याचे किमान तीन फायदे आहेत:
बोलण्याने मेंदू सक्रिय होतो, कारण भाषा आणि विचार एकमेकांशी संवाद साधतात. विशेषत: पटकन बोलत असताना. यामुळे स्वाभाविकपणे विचारांना गती मिळते आणि स्मरणशक्ती सुधारते. गैर-मौखिक ज्येष्ठ नागरिकांची स्मरणशक्ती कमी होण्याची शक्यता असते.
जास्त बोलल्याने तणाव कमी होतो, मानसिक आजार टाळता येतो आणि त्यामुळेही तणाव कमी होतो. अनेकदा काहीही न बोलता सर्व काही हृदयात ठेवणे, गुदमरल्यासारखे आणि अस्वस्थ वाटणे असे होऊ शकते. म्हणूनच, प्रौढांना अधिक बोलण्याची संधी देणे चांगले आहे.
भाषणामुळे चेहऱ्याच्या सक्रिय स्नायूंचा व्यायाम होतो, घशाचा व्यायाम होतो, फुफ्फुसांची क्षमता वाढते आणि डोळा आणि कानांना इजा पोहोचवणारे चक्कर आणि बहिरेपणाचे छुपे धोके कमी होतात.
थोडक्यात एक सेवानिवृत्त, म्हणजेच ज्येष्ठ नागरिक म्हणून, अल्झायमरपासून बचाव करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे जास्तीत जास्त लोकांशी बोलणे आणि सक्रियपणे संवाद साधणे. यावर दुसरा उपाय नाही.
लेखक :अज्ञात
प्रस्तुती : श्री. ब्रह्मानंद पै
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈