मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “लेखन…” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

परिचय

शालेय शिक्षण कोयनानगर व महाविद्यालयीन शिक्षण सायन्स कॉलेज कराड

  • अनेक वर्षे वास्तव्य नाशिक सध्या वास्तव्य पुणे (बाणेर).
  • स्वरचित तीन मराठी कविता संग्रह प्रसिद्ध
  • ‘संवाद’ या संस्थेच्या चार स्मरणिकांचे प्रकाशन.
  • ‘संवाद’ च्या चार दिवाळी अंकांचा  उपसंपादक
  • ‘महादान’ या अवयवदाना संबंधीच्या विशेषांकाचे संपादन.
  • अवयवदाना विषयी दोन पुस्तिकांचे लेखन व प्रकाशन.
  • पंघरा वर्षे रोटरीच्या विविध बुलेटिन्सचे संपादन व प्रकाशन.
  • विविध नियतकालिकांमध्ये नैमित्तिक स्फुटलेखन.
  • अवयवदाना संबंधी सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर.
  • फेडरेशन ऑफ ऑर्गन ॲन्ड बॉडी डोनेशन या राज्यस्तरीय संस्थेचा  उपाध्यक्ष.
  • ‘अंगदानकी चार लाईना’ – हा हिंदी चारोळ्यांचा ई-बुक संग्रह प्रकाशनाच्या मार्गावर.
  • स्वत: शब्दांकन केलेली अवयवदान प्रतिज्ञा सरकारमान्य झाली असून ती सर्व अवयवदानाच्या कार्यक्रमात अधिकृत प्रतिज्ञा म्हणून घेतली जाते.
  • माजी अवयवदान विभागीय अध्यक्ष, आंतरराष्ट्रीय रोटरी विभाग क्र ३०३०
  • मृत्युंजय ऑर्गन फाउंडेशन नाशिक या संस्थेचा संचालक
  •  महाराष्ट्र शासनाच्या मानवी अवयव प्रत्यारोपण विभागीय प्राधिकरण समितीचा (Divisional Authorisation Committee) सदस्य.

? मनमंजुषेतून ?

☆ “लेखन…” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

लेखनाचा किती मोठा प्रवास आमच्या पिढीने अनुभवला तसा क्वचितच दुसऱ्या कोणत्या पिढीने अनुभवला असेल.  लहानपणी मला आठवते चौथीपर्यंत आम्हाला पाटी-पेन्सिल होती.  चौथीला पहिल्यांदा वही आणि शिसपेन्सिल आली.  पेन नव्हतंच.  पण पाचवीपासून सुरू झाली टाक-दौत. दौत हातामध्ये घेऊन जायची.  शाळेच्या बाजूला दुकानात जायचं, त्या दुकानातून शाईची पुडी विकत घेऊन यायची.  त्या दौत नामक बाटलीमध्ये नळाचे पाणी भरायचं.  त्या पाण्यामध्ये शाईची पुडी टाकायची.  हे टाकत असताना हात निळेजांभळे व्हायचे.  

बऱ्याच वेळेला कुणाचा तरी पाय लागून कुणाची तरी दौत सांडायची किंवा लाथाडली जायची.  या लाथाडलेल्या दौतीचा प्रसाद अनेकांना मिळायचा. त्या वेळेला बाक नव्हतेच.  तेव्हा बस्करं तरी असायची, नाहीतर पाट तरी असायचे. त्यावर बसून टाक आणि दौत यांचा वापर करुन वहीत लिहिणे हा एक वेगळाच थ्रिलिंग अनुभव. संध्याकाळी घरी आल्यावर सगळे हात निळेजांभळे झालेले. बऱ्याच जणांचे शर्ट-पॅंट वर निळेजांभळे डाग पडलेले.  पायाचे गुडघे निळेजांभळे झालेले. दप्तरं तर सगळ्यांचीच निळ्या जांभळ्या डागांनी भरलेली असायची. आईला अत्यंत त्रासदायक ठरणाऱ्या अशा अवतारात आम्ही घरी पोहोचायचो.  बऱ्याच वेळेला बाबांचा मारही खायचो. त्या वेळेला कपडे धुण्यासाठी आईला जो त्रास व्हायचा त्याची आम्हाला तेंव्हा फारशी कल्पना नसायची.  त्यावेळेला साबण म्हणजे 501 नावाचा बार.  तो सगळ्यात चांगला साबण समजला जायचा.  त्या बाराचा एक तुकडा घेऊन कपडे घासायचे आणि शक्यतो ते निळेजांभळे डाग पुसट पुसट करण्याचा प्रयत्न आई करत असे.  

सहसा निळ्या जांभळ्या डागांचे हे युनिफॉर्म घातलेला बहुदा प्रत्येक जणच असायचा.  शाईच्या डागांचं सगळ्यात मोठं कर्तृत्व शर्ट पॅन्टवर वागवत आम्ही पाचवी सहावी सातवी या तीन वर्षांचा प्रवास केला.  त्यानंतर आठवीमध्ये दाखल झाल्यावर पहिल्यांदा आमच्या हातात पेन आलं. अर्थात ते पेन म्हणजे शाईचं पेन.  त्या पेनमध्ये शाई भरणे हा एक प्रचंड मोठा सोहळा असायचा. अर्थात त्यालाही दौत असायचीच.  फक्त टाकाबरोबर सतत बाळगायला लागयची नाही,  त्या ऐवजी दिवसातून एकदा कधीतरी त्या पेनमध्ये शाई भरायला लागायची. आणि आमचे हात पुन्हा निळेजांभळे व्हायचेच. अर्थात एकदा पेनमध्ये शाई भरल्यानंतर पुन्हा सतत निळेजांभळे हात करावे लागायचे नाहीत.  परंतु कुणीतरी खोडी काढायची म्हणून किंवा कुणीतरी गंमत म्हणून किंवा भांडणाचा सूड उगवायचा म्हणून पाठीवर पेन झटकलेले असायचे. ते पाठीवरचे निळेजांभळे डाग हे घरी आल्यावर आईने धपाटा घातल्यावरच आम्हाला दिसायचे.  त्यानंतर अकरावीपर्यंत म्हणजेच एस एस सी पर्यंत शाईची पेनं वापरली. 

कॉलेजला आल्यावर मग बॉलपेनं सुरू झाली. सुरुवातीला बॉलपेनसुद्धा अधूनमधून बंद पडणारी, न उठणारी वगैरे असायचीच. मग पुढचं धातूचं टोक दाताने  काढून नळीला फुंकर मारून पुन्हा चालू करायची. ते चालू करत असताना त्यामागच्या प्लास्टिकच्या नळीतून अचानक जास्त शाई बाहेर यायची आणि पुन्हा हात निळे करणे आलेच. या अशा सर्व प्रवासातून आता बऱ्यापैकी बॉलपेन आलेली आहेत. बॉलपेन रिफिल बदलणे हा प्रकार बंद झाला आहे. आता पेन बिघडले की पेनच फेकून द्यायचे आणि दुसरे घ्यायचे.  

तरीसुद्धा आता मला वाटते पेनचा वापर सुद्धा हळूहळू बंद होत जाणार. आता मी सुद्धा हा लेख लिहिलेला आहे तो पेनच्या मदतीशिवाय लिहिलेला आहे.  येथून पुढे मोबाईल, कॉम्प्युटर यावरील टायपिंग या प्रकाराने पेनचे संपूर्ण उच्चाटन होईल असे वाटते. आता आमची नातवंडेसुद्धा ऑनलाइन शिक्षणाला सरावत आहेत.  बहुतेक काही वर्षातच परीक्षागृहांमध्ये  कॉम्प्युटरच असतील, आणि त्यावर बोलून टायपिंग करून उत्तरे लिहिता येतील. अशा तऱ्हेच्या परीक्षाही सुरू होतील. सध्या मोबाईलवर आपण बोलून टायपिंग करू शकतो. पण नंतर चुका सुधारत बसावे लागते. त्यात बर्‍याच सुधारणा नजीकच्या काळात होतीलच. 

… आपण बोलून बरोबर अक्षरे टाईप होत राहतील.  

याच पद्धतीने नजीकच्या काळात अक्षर लेखनाचे संपूर्ण उच्चाटन होईल हे नक्कीच.  पण तरीसुद्धा अक्षर लेखनाचा आमचा भूतकाळ आठवून खूप खूप मज्जा येते हे सांगायला हवे का ?

 श्री सुनील देशपांडे

मो – 9657709640

email : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “नमामि देवि नर्मदे…” – लेखिका : सुश्री शेफाली वैद्य ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? मनमंजुषेतून ?

☆ “नमामि देवि नर्मदे…” – लेखिका : सुश्री शेफाली वैद्य ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

कधीतरी शाळकरी वयात दुर्गाबाई भागवतांचा ‘महेश्वरची महाश्वेता’ हा अहिल्यादेवी होळकरांवरचा लेख वाचनात आला आणि मी पार भारावून गेले. देवी अहिल्याबाईंचं सोज्वळ, शालीन व्यक्तिमत्व, व्यक्तिगत आयुष्य एकामागोमाग एक अंगावर कोसळणाऱ्या डोंगराएवढ्या दुःखांनी चिणून गेलेलं असतानाही त्यांनी केवळ इंदूर संस्थानच्या रयतेवरच नव्हे, तर पूर्ण भारतातल्या गरीब, पीडित जनतेवर धरलेला आपल्या मायेचा पदर, देवासाठी, हिंदूधर्मासाठी करून ठेवलेली कामे, आणि त्यांची व्रतस्थ राहणी, सगळ्यांनीच माझ्या कोवळ्या मनावर खूप परिणाम केला होता. तेव्हापासूनच अहिल्याबाई आणि त्यांचे लाडके महेश्वर मनात घर करून बसले होते. कुणीतरी दिलेलं मोरपीस जपून पुस्तकाच्या पानांमध्ये ठेवावं तसं मनात जपून ठेवलेलं. महेश्वरच्या विस्तीर्ण दगडी बांधीव घाटांच्या पायऱ्यानां हळुवार गुदगुल्या करणारी नर्मदा,  महेश्वरमध्येच विणलेल्या महेश्वरी साडीइतका नितळ, झुळझुळीत नर्मदेचा विशाल प्रवाह, शुभ्र साडीतली अहिल्याबाईंची कृश मूर्ती, त्यांच्या हातातलं बेलपत्राने सुशोभित झालेलं शिवलिंग, सारं काही न बघताही माझ्या मनात खोल रुतून बसलेलं होतं. पुढे पाच वर्षांपूर्वी मी महेश्वरला पहिल्यांदा गेले तेव्हा मला खूप वर्षांनी माहेरी गेल्याचा आनंद झाला होता. 

इंदूर. मल्हारराव होळकरांनी आपल्या कर्तबगारीने उभारलेलं तत्कालीन मध्य भारतातलं एक इवलंसं संस्थान. मल्हाररावांना एकच मुलगा, अहिल्याबाईंचा नवरा खंडेराव   होळकर. कुंभेरीच्या लढाईत खंडेराव तोफेचा गोळा वर्मी लागून मृत्यू पावले. तत्कालीन प्रचलित चालीरीतींप्रमाणे अहिल्याबाई त्यांच्यामागे सती जायला निघाल्या तेव्हा मल्हाररावांनी डोळ्यात पाणी आणून त्यांना मागे खेचलं. अहिल्याबाईंचा वकूब त्यांना माहिती होता. पुढे पूर्ण राजकारभार मल्हाररावांनी आपल्या ह्या कर्तबगार सुनेच्या हाती दिला. अहिल्याबाईंनी सासऱ्यांचा विश्वास सार्थ ठरवत आपलं इंदूर संस्थान तर उत्तम प्रकारे सांभाळलंच, पण त्यांच्या पदराची सावली फार मोठी होती. देशभरातल्या हिंदू जनतेसाठी अहिल्याबाईंनी जे काम करून ठेवलंय तसं काम क्वचितच दुसऱ्या कुठल्या भारतीय राजा किंवा राणीने केलं असेल. 

धर्मांध मुसलमानी आक्रमकांनी हिंदू मंदिरे उध्वस्त केली होती. त्यांनी घातलेले घाव केवळ दगडांच्या भिंतीवर पडले नव्हते तर त्या घावांनी हिंदूंची मनेही छिन्न-विछिन्न करून टाकली होती. जेव्हा अहिल्यादेवीनी सोमनाथ आणि काशीला नवीन शिवालये बांधण्याचा घाट घातला तेव्हा त्या नुसती दगड मातीच्या इमारती उभारत नव्हत्या , त्या उभारत होत्या सर्वसामान्य हिंदूंची हिंमत. सततच्या पराभवांनी गांडुळासारख्या लिबलिबीत झालेल्या सामान्य हिंदू समाजमनाला अहिल्याबाई फिरून एकवार सामर्थ्याचा फणा काढायला डिवचत होत्या, शिकवत होत्या.

अगदी आजही भारताचा नकाशा बघितला तर अहिल्याबाईंच्या पाऊलखुणा तुम्हाला जागोजागी दिसतील. त्यांनी बांधलेल्या नदीवरच्या घाटांवर अजूनही भारतातले लोक तीर्थस्नानाला जातात. काशी-सोमनाथ पासून ते गयेमध्ये त्यांनी घडवलेल्या, जीर्णोद्धार केलेल्या मंदिरांमध्ये आजही हिंदू दर्शनासाठी रांगा लावतात. त्यांनी बांधलेल्या धर्मशाळा आपल्याला हिमालयामध्ये बद्रिकेदार ते दक्षिणेत रामेश्वरम पर्यंत सापडतील. त्या धर्मशाळा अजूनही थकलेल्या, गांजलेल्या हिंदू यात्रेकरूंना आश्रय देतात. हे सगळं प्रचंड काम अहिल्याबाईंनी केलं ते आपल्या अवघ्या अठ्ठावीस वर्षांच्या कारकिर्दीत, स्वतः व्रतस्थ राहून, आपल्या वैयक्तिक गरजा अत्यंत कमी करून. आपल्या खासगी मिळकतीतला पैसानपैसा वापरून अहिल्याबाईनी धर्मासाठी हे डोंगराएवढं काम केलं. 

औरंगझेबाने त्याच्या अखेरच्या दिवसात स्वतः टोप्या विणून आणि कुरणाच्या प्रती हाताने लिहून स्वतःच्या कफनापुरते पैसे जमवले होते ह्याचे गोडवे आपण खूपदा ऐकलेत, पण अहिल्याबाई कित्येक वर्षे एकभुक्त राहिल्या, राणी असताना काठ-पदर नसलेल्या साध्या पांढऱ्या माहेश्वरी सुती साडीखेरीज कधी त्यांच्या अंगाला दुसरं वस्त्र लागलं नाही. एका रुद्राक्षांच्या माळेखेरीज त्यांनी कधी दुसरा दागिना अंगावर ल्यायला नाही. त्यांचा महेश्वर मधला वाडा ‘राजवाडा’ म्हणून घेण्यासारखा कधी भव्य-दिव्य आणि दिमाखदार दिसला नाही. हे सगळं करून अहिल्याबाईंनी जो पैसा वाचवला तो सगळाच्या सगळा देवळांची बांधकामं, नदीवरचे घाट, धर्मशाळा इत्यादी धर्मकार्यात खर्च केला हा इतिहास किती जणांना माहित आहे?

गेल्या आठवड्यात परत एकदा महेश्वरला जायचा योग आला. माहेश्वरी साड्या कश्या विणतात ते बघायला तामिळनाडूच्या को-ऑप्टेक्स चे एमडी वेंकटेश नरसिंहन ह्यांनी आयोजित केलेल्या दौऱ्याचा एक भाग म्हणून आम्ही काही समानधर्मी लोक महेश्वरला गेलो होतो. माझी ह्याआधीची पहिली महेश्वर वारी भर उन्हाळ्यात होती त्यामुळे नर्मदेचा प्रवाह थोडा क्षीण झालेला आणि धापा टाकायला लावणारी निमाडची गरमी. ह्यावेळी मात्र आम्ही महेश्वरचा सुखद हिंवाळा मनसोक्त अनुभवला. ह्यावर्षी पाऊस खूप झाला त्यामुळे नर्मदेचा प्रवाह खूपच विशाल आणि विस्तीर्ण भासत होता. आम्ही घाटावर पोचलो तेव्हा सरती संध्याकाळ होती, उन्हे नुकतीच कलायला लागली होती. नर्मदेपारच्या गावांमधले लोक बाजारहाट करून आपापल्या गांवी परत निघाले होते. नर्मदेचा प्रवाह शांत वहात होता. आम्ही ज्या ठिकाणी उभे होतो त्या ठिकाणी कधीतरी अहिल्यादेवीही उभ्या राहिल्या असतील ह्या विचारानेच माझ्या अंगावर काटा आला. आजही महेश्वर वासियांसाठी अहिल्याबाई ‘रानी माँ’ आहेत. त्यांचं अस्तित्व आजही आपल्याला महेश्वरमध्ये जाणवतं. 

बघता बघता सूर्य हळूहळू क्षितिजाकडे झुकायला लागला. प्रवाहात उभा असलेला एक मोठा खडक प्रदीप्त झाल्यासारखा दिसत होता, दूरवर गांवकऱ्यानी भरलेल्या बोटी संथपणे नर्मदेचा प्रवाह कापत पलीकडे चालल्या होत्या. आता सूर्याचा रसरशीत लालभडक गोल अलगद नदीच्या प्रवाहाला टेकला होता, जणू आई नर्मदेच्या कपाळावरचा ठसठशीत कुंकवाचा टिळा. आता घाटावरची गर्दी कमी झाली होती. प्रवाहाच्या अगदी जवळ, घाटाच्या शेवटच्या पायरीवर एक बाई उभ्या राहून मावळत्या सूर्याला अर्घ्यदान करत होत्या. सगळीकडे नीरव शांतता, फक्त नर्मदेच्या मंद वाहत्या लाटांचा आवाज आणि आमचे दीर्घ श्वास. अंगावर शिरशिरीच आली एकदम.

तेवढ्यात पूजेची तयारी असलेले तबक घेऊन एक गुरुजी आले. रोजच्या नित्य नर्मदाआरतीची वेळ झाली होती. ही आरती म्हणजे ऋषिकेशच्या किंवा वाराणसीच्या गंगा आरतीसारखी दिमाखदार नव्हे, अगदी साधी सुधी, घरगुती, अगदी अहिल्याबाईंच्या व्यक्तिमत्वासारखी सोज्वळ आणि शांत. आरती करणारे एक गुरुजी, त्यांच्या मागे टाळ वाजवणारे दुसरे आणि मागे कोरसमध्ये गाणारा एक तिसरा तरुण. बस एवढंच. फक्त तीन माणसं आणि आमचा ग्रुप. आरती झाली आणि त्या गुरुजींनी स्वच्छ स्वरात आदी शंकराचार्यांचे नर्मदाष्टक म्हणायला सुरवात केली. 

सबिन्दुसिन्धुसुस्खलत्तरङ्गभङ्गरञ्जितं

द्विषत्सु पापजातजातकारिवारिसंयुतम् ।

कृतान्तदूतकालभूतभीतिहारिवर्मदे

त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे… 

मंतरलेली संध्याकाळ होती ती, आदी शंकराचार्यांचे अलौकिक शब्द, नर्मदामैय्याचा चिरंतन प्रवाह, देवी अहिल्याबाईंचा आशीर्वाद, नर्मदेच्या प्रवाहाबरोबर वाहत चाललेले द्रोणांचे दिवे आणि मंत्रमुग्ध होऊन ऐकणारे आम्ही. आयुष्यात काही क्षण असे येतात की ते अनुभवताना जिणं सार्थक झाल्यासारखं वाटतं. नर्मदेकाठची ती संध्याकाळ तशी होती. 

लेखिका : सुश्री शेफाली वैद्य

प्रस्तुती : सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “रुजण्या” वरून सहजच… ☆ सुश्री मधुमती वऱ्हाडपांडे ☆

सुश्री मधुमती वऱ्हाडपांडे

??

☆ “रुजण्या” वरून सहजच… ☆ सुश्री मधुमती वऱ्हाडपांडे ☆ 

मध्यंतरी lockdown मुळे बाहेर फिरणं बंदच होतं. त्यामुळे सकाळ संध्याकाळ एखादी चक्कर गच्चीवर असायचीच. आमचं राहणं फ्लॅट मध्ये. त्यामुळे गच्ची सगळ्यांचीच कॉमन. आमचा फ्लॅट तिसऱ्या अन सगळ्यात वरच्या मजल्यावर. आमच्या खाली राहणाऱ्या बिऱ्हाडकरुंना गॅलरीतल्या बागेची मोठी हौस. आमच्या गॅलरीतून त्यांची विरुद्ध बाजूची गॅलरी व्यवस्थित दिसते. सुंदर सुंदर फुलं बघून मन प्रसन्न होतं नेहमीच.  त्यांच्या गॅलरीत सतत कुंडयांची भर पडतांना दिसायची. शेवटी  इतक्या कुंड्या झाल्या की त्यांनी त्यातल्या  बऱ्याचशा कुंड्या गच्चीवर आणून ठेवल्या. आता गच्चीवरचं  फिरणं अजूनच प्रसन्न व्हायला लागलं. त्यात त्यांनी दोन मोठ्ठ्या थम्प्स अप च्या बाटल्यांना गोल गोल छिद्र करून त्यात माती भरली अन प्रत्येक छिद्रात ऑफिस टाइम (टेन ओ क्लॉक) ची एक एक काडी लावलेली. सकाळी 10 च्या सुमारास त्या राणी कलरच्या पिटुकल्या फुलांनी भरलेल्या बॉटल्स इतक्या सुंदर दिसायच्या की मलाही मोह आवरला नाही. मी त्यातल्या दोनतीन  काड्या तोडल्या अन आमच्या हॉल च्या खिडकीत एका छोट्याश्या बोळक्यात दिल्या टोचून.  

पावसाळी हवा असल्याने म्हणा किंवा काय माहिती तीन चार दिवसातच  त्या इतक्या छान भराभरा वाढल्या अन त्या दिवशी बघते तर काय! तीन पिटुकली टवटवीत  फुलं मस्त डोलताहेत मजेत! सहजच  विचार आला मनात की  किती पटकन, विनासायास ही रुजली नवीन मातीत, नवीन जागेत. आणि इथेही उधळून देताहेत आनंद सभोवती. जागा बदलली, माती बदलली म्हणून कुठ्ठे कुरकुर नाही, खेद नाही, कुढणं नाही की नाखुषी नाही. गच्चीवर आनंदाची उधळण होतीच त्यांची अन तिथून उचललं तरी बहरणं सुरूच! 

आणि ह्याउलट आपण केवढे सवयीचे गुलाम! अगदी सकाळच्या टूथपेस्ट पासून आपल्याला कुठ्ठे, कुठ्ठे म्हणून बदल सहन होत नाही. टूथपेस्ट तीच हवी, चहा तोच अन त्याच चवीचा आवडणार, दूध अमुक एकच, वर्तमानपत्राची सुध्दा सवय झालेली. बदलून बघितला की, “छे बुवा! हयात काही राम दिसत नाही. आपला नेहमीचाच बरा शेवटी” असंच म्हणणार हे पक्के! दिवसभरात कितीतरी गोष्टी असतात आपल्या “अमुकच हवं” वाल्या. अगदी सकाळच्या टूथपेस्टपासून  ते थेट  झोपायची जागा, उशी आणि पांघरूण पर्यंत सर्व! माणूस शेवटी सवयीचा गुलामच!  वाटलं ह्या टेन ओ क्लॉक ला गुरु करून कुठेही पटकन ऍडजस्ट होणं शिकायला हव माणसांनी. किती सोपं होईल सगळ्यांचं आयुष्य! 

अर्थातच सगळ्या परिस्थितीत स्वतःला सहज बदलवू शकणारेही बघतोच आपण आजूबाजूला. नक्कीच त्यांचे आयुष्य तुलनेने सहज, सोपे जात असणार ह्यात शंकाच नाही. रुजणं शब्दावरून मग सहजच मनात आले की अगदी जुन्या काळामध्ये मुलामुलींची फार लवकर लग्न व्हायची त्यामुळे बालवयातच सासरी आलेल्या मुलींना त्या नवीन वातावरणामध्ये स्वतःला रुजवून  घेणे तितकेसे कठीण जात नसे नंतर नंतर म्हणजे आमच्या पिढीमध्ये थोडा बदल झाला. मुलींची लग्न वयाच्या वीस-बावीस च्या वयात व्हायला लागलीत त्यामुळे थोडा त्यांना सासरी जमवून  घ्यायला किंचित वेळ लागू लागला पण तरीही लहानपणापासून शेवटी सासर हेच तुझं खरं घर आहे असं मनावर पक्क बिंबवले गेले असल्याने बहुतांश जणीनी हे सहज मान्य केले आणि विनातक्रार रुजल्या. त्यानंतरची पिढी म्हणजे सध्याची तरुण पिढी (आपल्या मुला-मुलींची पिढी) ह्यामध्ये आणखी थोडा बदल झाला आता मुलं किंवा मुली अजून जास्त परिपक्व झाल्यानंतर लग्न व्हायला लागलीत. कदाचित त्यामुळेही असेल पण “थोडं तुझं थोडं माझं” असं म्हणत व्यवस्थित संसार होतांना दिसत आहेत, (अर्थात अपवाद असतातच म्हणा!) आजकालच्या मुलामुलींना हे तेवढं कठीण जात नाही कारण बहुतेक सगळीकडे राजाराणीचे संसार असतात. दोघेही समजदार पणा दाखवत  “थोडं तुझं,थोडं माझं” करत एकमेकांशी जुळवून घेत गोडीगुलाबीने, गुण्यागोविंदाने  राहतांना दिसतात. त्यात बहुतांश ठिकाणी दोघेही नोकरी करणारेच असतात. त्यामुळे खूप कमी वेळ एकमेकांच्या सहवासात राहतात. अर्थात स्वतंत्र मनोवृत्तीमुळे  थोडे फार संघर्ष अटळ असतात पण ते त्यांचे निभावतात. आणि ह्या पिढीमध्ये मुलांच्या विश्वामध्ये, संसारामध्ये आई-वडिलांनीही स्वतःला थोडं बदलवत रुजवून घेतलेलं आहे. यानंतरच्या पिढीमध्ये मात्र काय होईल सांगता येत नाही. मला तरी वाटतं “थोडं तुझं,थोडं माझं” असा सुवर्णमध्य न गाठता “तू तुझं नी मी माझं”  ह्या प्रकारात जर सर्व व्यवहार चालणार असतील तर बाकी कठीण आहे! कारण संसार सुरळीत चालण्यासाठी हे एकमेकांच्या विश्वात  “रुजणं” दोघांनाही व्यवस्थित जमलं तरच  संसार रुपी रोपटे छान सुंदर बहरणार हे नक्की! अगदी टेन ओ क्लॉक सारखे!

तसं पाहिलं तर अगदी शाळेत पहिल्यांदा जाणाऱ्या  मुलालाही त्या नव्या वातावरणात रुजावंच लागतं आणि थेट रिटायर्ड झालेल्या आजोबांनाही नव्याने आपल्या स्वतःच्याच घरात पुन्हा रुजावंच लागतं! थोडक्यात काय तर रुजणं म्हणजे बदललेल्या परिस्थितीशी, वातावरणाशी जुळवून घेता येणं! सध्याच्या आमूलाग्र बदललेल्या युगात सगळं नवीन तंत्रज्ञान नीट माहिती करून घेणं आणि वेगवेगळ्या माध्यमांचा योग्य रीतीने वापर करणं म्हणजे तरी काय शेवटी? स्वतःला डिजिटली रुजवण्याचाच एक प्रकार! आयुष्यातल्या असंख्य टप्प्यांवर वेळोवेळी प्रत्येक ठिकाणी जितकं सहज स्वतःला रुजवता येतं तितकं तुमचं आयुष्य कमीअधिक सोपं होत जातं हे निश्चित! रुजणं टेन ओ क्लॉक चं असो का तुमचं आमचं! शेवटी तात्पर्य एकच हो!

© सुश्री मधुमती वऱ्हाडपांडे

मो 9890679540

अकोला

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘कुचंबले किचन’ – श्री दिवाकर बुरसे ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

सुश्री सुलू साबणे जोशी

??

☆ ‘कुचंबले किचन’ – श्री दिवाकर बुरसे ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी

जिथे नव्या हाऊसिंग स्कीम्स उभारल्या जात आहेत, सोसायट्यांचा पुनर्विकास झाला आहे/ होत आहे, नवीन टाॕवर्स, नव्या इमारती बांधल्या गेल्या आहेत किंवा जात आहेत, त्यांच्या १-२-३ बीएचके फ्लॅटमध्ये किचनचा एवढा संकोच करून ठेवला आहे की, जेमतेम एक माणूस कसाबसा उभा राहू शकतो ! गेल्या ५-७ वर्षात मुख्यतः महानगरातून हे विशेषत्वाने आढळून येते. 

नक्की काय खूळ (कदाचित व्यावसायिक लाभाचे गणित?) बसले आहे या पुनर्विकासक/ बिल्डर/इंटीरियर करणाऱ्या लोकांच्या डोक्यात काही कळत नाही.

ह्या लोकांना असे का वाटते की, हल्ली कोणी घरी स्वयंपाक करतच नाही. सगळे रोज सकाळ संध्याकाळ बाहेरील हाॕटेलांत आॕर्डर देऊन तिथून घरी पार्सल मागवून खातात.

हल्ली कोणी कोणाच्या घरी जात नाही की येत नाही. कुटुंबे लहान आहेत. (घरात जास्तीत जास्त तीन सदस्य!) घरी पाहुण्यारावळ्यांचा राबता नसतो. मामाच्या घरी येऊन धुडगूस घालणारी, मामीकडे शिक्रण पोळीचा हट्ट धरणारी व्रात्य भाचरे नसतात. त्यामुळे भांडी, ताटे, वाट्या, पातेली, डाव, ओगराळी किंवा गेला बाजार क्रोकरी असले अवजड सामान ठेवायला कशाला जागा लागते? तेव्हा ती वाचवलेली जागा या नवीन रचनेत बेडरूम, हॉल मोठा करण्यात वापरू या. त्यांचे मानस खरेच असे आहे का?

ज्या लोकांचे १९८५ ते ९५ सालापर्यंत घेतलेले फ्लॕट आहेत, ते लोक नवीन फ्लॕट  बघायला जातात, तेव्हा तिथले किचन पाहिल्यावर त्यांचे डोकेच सटकते. 

मी काय म्हणतो, बांधकाम व एफ एस आय इ.चे नियम बदलले आहेत/असतीलही. त्यामुळे घराच्या – साॕरी फ्लॕटच्या, रचनेत बरेच बदल करावे लागत असतील, हेही मान्य करूया. पण भारतीय संस्कृतीमध्ये  घरातील सगळ्यात महत्त्वाचे असलेले स्वयंपाकघर म्हणजे किचन, चक्क त्याचाच बळी पडत आहे. किचनचा असा श्वास कोडणारा संकोच करणे अमान्य आहे. अहो, असे करुन कसे चालेल बरे?

पुनर्विकास करताना या किचन कुचंबणेचा गांभीर्याने विचार व्हायला हवा. गृहिणींनीही नव्या फ्लॕटमधे मोठ्या किचनचा आग्रह धरावा. मला वाटते की, हा स्त्रीहट्ट योग्य आहे आणि तो पुरवायला हवा.

सोसायट्यांच्या पुनर्विकास समित्यांनी व विकासकांनी या सूचनेचा गंभीरपणे विचार करावा. या सूचनेला महत्व व प्राधान्य द्यावे. 

घरोघरीच्या (गृह) लक्ष्मींना प्रसन्न करण्याची, पुनर्विकासाच्या निमित्ताने घर चालत आलेली ही सुवर्णसंधी, कोणाही ‘धूर्त व चाणाक्ष’ पुरुषाने अजिबात दवडू नये.

लेखक : श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५

संग्राहिका : सुश्री सुलू साबणे जोशी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “टिप टॉक !” —☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

 

? मनमंजुषेतून ?

☆ “टिप टॉक !—  ☆ श्री संभाजी बबन गायके 

टीप हा शब्द अगदी मनाच्या तळाशी जाऊन बसला आहे लहानपापासूनच ! जो पर्यंत टीप द्यावी लागत नव्हती तो ही टीप तशी तळटीपच होती !

ही टीप पुस्तकांत खाली छापलेली दिसायची. आमंत्रण पत्रिकेत जवळ जवळ धमकी या शब्दाला पर्यायी शब्द म्हणून नजरेस पडायची.

कपडा फाटला की त्याला टेलर काकांना विनंती करून ही टीप मारून घ्यावी लागे ! त्यांनी जास्त पैसे मागितले की डोळ्यांतून टिपे गळायची बाकी रहात ! अशावेळी एवढ्याशा कामाचे एवढे पैसे? असे शब्द अगदी tip of my tongue यायचे ! पण घाबरून जिभेची हीच टीप चावावी आणि गप्प बसावे,असे होई !

काही लोक पोलिसांना टीप देतात, किंवा त्यांना ती कुठून तरी मिळते,असेही वाचनात येते अधून मधून !

टीपटॉप नावाची टेलरिंग दुकाने असतील तर अशी टीप मारून देणे ते लोक कमी पणाचे समजतात ! असो.

शहरातल्या हॉटेलात जायला लागल्यापासून टीप शब्दाचा आणि त्यामागचा ‘ अर्थ ‘ समजू लागला.

खरं तर या कल्पनेमागे खूप सुंदर कल्पना आहे,असे वाटते ! विशेषतः hospitality industry मध्ये नम्रता, ग्राहकाभिमुख सेवा, आणि अचूक सेवा या बाबी महत्त्वाच्या असतात. लोक सारं काही छान, भारी मिळावं म्हणून पैसे खर्च करतात. हल्ली तर hospital industry आणि hospitality industry सारख्याच महाग असतात. कोरोना काळात या दोन्ही सेवा मेवा मिळवत राहिल्या ! श्रीमंतांनी five star उपचार घेतले आणि गरिबांनी दिवसा star पाहिले डोळ्यांसमोर ..बिलाचे आकडे पाहून ! असो. .. तर ..वेटर इत्यादी मंडळी हसतमुख सेवा देतात, काय खावे, काय परवडेल याचे मार्गदर्शन करतात, वेळेवर पदार्थ आणून देतात, उरलेले पदार्थ तत्परतेने पार्सल करून देतात, इत्यादी शेकडो कारणांनी या सेवकांना काही रक्कम स्वखुशीने देणे,अपेक्षित असते. यात आता स्वखुशीे दूर गेली आहे ! काही हॉटेल मध्ये काम करणाऱ्या वेटर मंडळीमध्ये सुका आणि ओला असे दोन प्रकार असतात म्हणे ! सुका म्हणजे फक्त पगार घ्यायचा ! तिथले अन्न मिळणार नाही. ओला म्हणजे अन्न आणि पगार ! या ओलाचा पगार तसा कमीच असणार !

मुळातच या व्यवसायात बिचारी नाडलेली मंडळी दिसतात. नाईलाजाने हा डगला अंगावर चढवलेली… बँडवाल्यांसारखी ! अन्न वाढणारे वेटर आणि आनंदाच्या धुना वाजवणारे वादक यांचे चेहरे पाहून घ्यावेत !

या लोकांची काही वरकमाई करण्याची इच्छा असते. ग्राहकाने झालेलं Bill पूर्ण देऊन काही रक्कम यांच्यासाठी ठेवावी,अशी त्यांची मूक मागणी असते. विशेषतः आपण त्यांच्याकडे bill चे पैसे दिले, त्याने ते pay करून आणून त्या पाकिटात ठेवले तर उरलेले सुट्टे पैसे ग्राहकाने तसेच ठेवावेत,असे त्यांना वाटते. त्यासाठी हे सेवक आपल्या टेबलच्या आसपास अदबीने आणि छुप्या रीतीने घुटमळत राहतात. आपली पाठ वळताच लगबगीने त्यातील पैसे खिशात घालतात. अपेक्षेनुसार रक्कम नसेल तर एकमेकांना नजरेने इशारे करत राहतात. अर्थात हे हॉटेलनुसार बदलते. भारी हॉटेलात जाणारे भारी लोक काही वेळा keep the change असं म्हणून उठून जातात. त्यांच्यामुळे इतर सामान्य लोकांना change व्हायला लागले आहे.  मोठ्या हॉटेलांत पहिल्यांदा गेलेले लोक चक्क तिथल्या स्मार्ट वेटर बांधवांना काहीसे बिचकुन असतात !

मोठ्या हॉटेलच्या bill मध्येच काही टक्के रक्कम आधीच कापून घेतात म्हणे ! काही ठिकाणी टीप टाकण्यासाठी box असतात. ही रक्कम वेटर आपसात वाटून घेत असावेत. जास्त महागडे पदार्थ मागणाऱ्या ग्राहकांकडून जादा टीप मिळण्याची शक्यता असल्याने तिथे अधिकचे सौजन्य दाखवले जात असावे का? टिप देण्यास टाळाटाळ केली किंवा अगदीच कमी दिली तर कदाचित पुढल्या वेळच्या सेवेत काही बदलही होऊ शकतात ! आपला नवरा किंवा मुलगा वेटरसाठी किती रक्कम मागे ठेवतो,यावर काही पत्नी,माता लक्ष ठेऊन असतात. आणि त्यातील काही रक्कम परस्पर कमीही करतात !

पण टीप देणे ही एक नाजूक गोष्ट असते. याचे चलन आपल्याकडे परदेशातून आले असले तरी दिवाळी पोस्त,बक्षिसी इत्यादी प्रकार आहेतच आपल्याकडे आधीपासून. राजे लोक तर चक्क त्यांच्या हातातल्या, गळ्यातल्या सोन्याच्या वस्तू सेवकांना बहाल करीत असत. 

परदेशात आणि आता आपल्याकडेही महिला वेटर मोठ्या प्रमाणात असतात. गोष्ट परदेशातील आहे…एक गरोदर महिला वेटर…ती धावपळ करीत होती..तिला आणखी काही महिने तरी काम करण्याशिवाय पर्याय नव्हता. एका टेबलवरील चार मित्रांनी तिची अवस्था जाणली..आणि तिला तीन महिने पुरेल एवढी रक्कम आपसात जमा करून टीप म्हणून दिली…तिच्या डोळ्यांतील भाव अवर्णनीय होते !

एक आणखीन गोष्ट ! दुपारी हॉटेल बंद होण्याची वेळ. एक आठ दहा वर्षांचा मुलगा सायकलवर घाईघाईत आला. महिला वेटर वैतागली..आता हा कशाला आला काम वाढवायला ! तिने विचार केला. काहीशा नाराजीनेच त्याच्यापुढे मेन्यू कार्ड ठेवले. त्याला ice cream पाहिजे होते. एक छान ice cream १०० रुपयांचे होते आणि त्यापेक्षा स्वस्त आणि साधेसे ८० रुपयांचे. त्याच्याकडे १०० रुपये होते ! पण त्याने ८०चे मागवले. वेटर महिलेने काय भिक्कार ग्राहक म्हणून नाराजीने order serve केली आणि ती आवरायला निघून गेली. ती परत टेबलाशी आली तोवर तो मुलगा निघून गेला होता…तिने bill ठेवतात ते पाकीट उघडलं.. त्यात २० रुपये ठेवले होते…टीप म्हणून ! तिला टीप देता यावी म्हणून त्यानं कमी किमतीचे ice cream order केलं होतं ! ती वेटर महिला आपल्या डोळ्यांतले अश्रू रोखू शकली नाही !

टिप: इथेच थांबतो. बाकी तुम्ही सांगा… शेवटी या विषयाच्या हिमनगाचे हे मी लिहिले ते फक्त एक tip म्हणजे टोक आहे !

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ टिपकागद व्हावे… सौ विदुला जोगळेकर☆ सौ उज्ज्वला केळकर ☆

सौ उज्ज्वला केळकर

??

☆ टिपकागद व्हावे… सौ विदुला जोगळेकर☆ सौ उज्ज्वला केळकर ☆

जाड बुडाच्या कढईत साजूक तुपातले बेसन…हलकेच रंग बदलत होते…

तुपात लपथपलेले…थुलथुलीत…उलथन्याने जरा हलवता कढयीभर गोळा होत फिरणारे…अजून किंचित भाजायला हवे आहे…पिठीसाखर पडली की बेसनाचा रंग फिका होईल…आता मात्र खमंग तांबूस रंग दिसायला लागला..तिने गँस बंद करून टाकला.आच संपताच पीठ स्थिरावले….तुपाचा चकचकीतपणा अंगाखांद्यावर लेऊन मस्त कढईभर सैलावून बसले. ‘ तूप जास्त होणार कदाचित ‘, तिच्या मनाला सराईत नजरेने सांगितले… व्याप वाढणार…तिने कोरडे पीठ भाजून घालावे या विचाराने डब्याकडे बघितले…घर म्हणून ठेवलेले जेमतेम वाटीभर पीठ होते…पिठीसाखर घातल्यावर किती आळते ते बघून ठरवू काय करायचे ते … तिने लाडवातून डोके काढून पुढच्या कामांना सुरुवात केली. तरीही मनाच्या एका कोपऱ्यात अति सैलावलेला लाडू ठाण मांडून बसलाच होता.

निवलेल्या पिठाच्या गोळ्यात पिठीसाखर घालून…ती लाडू आळण्याची वाट बघत बसली…साखर मुरल्यावर जरा आळले तर आळतील…वाऱ्याच्या दिशेला जरा पसरुन ठेवले तर आळतील…सतराशेसाठ वाटा…चुकलेल्या दिशेला जागेवर आणायला धावत येतात…! पण छेः … बाहेरच्या तापमानाशी सख्य साधत लाडवातलं तूप अगदी मनसोक्त साखरेसहित परत ऐसपैस पहुडलेलं बघून…आता या अतिरिक्त स्निग्धतेचं काय करावं हा प्रश्न तिला पडला. 

कमी पडलं तर वरुन पटकन घालता येतं.  पण जास्त झालं तर मात्र त्यातून सहजासहजी काढून घेणे होत नाही….. मग ते पदार्थ असो, नाहीतर माणुस असो. समत्वाला ममत्व येऊन मिळाले की अतिरिक्त स्नेह वाढतोच…आणि गोष्टींचा थोडा तोल ढळल्यासारखा होतो, आणि मग तो कधीकधी असा तापदायक ठरतो.

याचं जिवंत उदाहरण म्हणजे हे स्वयंपाकघरातले पदार्थ ! अशी अतिरिक्तता माणसांच्या स्वभावातूनही वेगवेगळ्या तऱ्हेने ओसंडून वहात असते…!

काही काळापुरता टिपकागद होऊन जडलेले नाते…ती अतिरिक्तता शोषून घेते आणि अलिप्त होऊन पुढचा मार्ग चालू लागते….. 

… येस्स…खरंच की…थोड्या कोरड्या कणिकेवर तिने टिश्यू पेपर (टिपकागद) पसरला आणि त्यावर ते लाडवाचं मिश्रण पसरुन ठेवलं…हलके हलके मिश्रणातील तूप टिश्यूवर दिसू लागले….आणि खालची कणिक तो स्निग्धांश स्वतःत शोषून घेऊ लागली…! लेकीने विचारले, “ आई साखरेचा गोडवा तर नाही 

ओढून घेणार तो टिपकागद…?” 

“ नाही ग…शोषून फक्त ओलावा आणि स्निग्धता घेता येते. कोरडेपण फक्त आपलं अस्तित्व जपत मिसळून जाते फार तर ! “

न सांगता काय अन् किती टिपावं हे त्या कागदाला स्वभावतःच समजलेलं असतं …उगाच गरजेपेक्षा जास्त लगट ते इतक्या जवळ असूनही करत नाही…हे जर ज्या त्या नात्याला कळलं तर…टिपकागद होऊन प्रत्येक नात्यातली भूमिका निर्लेपपणे पार पाडता येईल. अतिरिक्त ओल/स्निग्धता तेव्हढी शोषून घेउन ,परत ज्याचं त्याचं स्वातंत्र्य मान्य करुन…अलिप्त होणारा टिपकागद तिला फार आपलासा वाटला. कागदावरचे लाडवाचे मिश्रण आता लाडू बांधण्याइतके नक्कीच आळले होते…कणकेतला मिसळून गेलेला स्निग्धांश वायाही गेला नव्हता…मधला कागद मात्र आपलं काम बजावून शांतपणे बाजूला झाला…!

नात्यात ही असा टिपकागद होता आलं पाहिजे… म्हणजे नाती आकारात, गोडव्यात, आणि व्यवहारातही देखणी राहतात …… होय ना !

लेखिका : सौ विदुला जोगळेकर

प्रस्तुती : सौ उज्ज्वला केळकर

संपर्क –17 16/2 ‘गायत्री’ प्लॉट नं. 12, वसंत दादा साखर कामगारभावन के पास , सांगली 416416 महाराष्ट्र

मो. 9403310170, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ उमलत्या वेळा… ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे ☆

श्री विश्वास विष्णु देशपांडे

?मनमंजुषेतून ?

☆ उमलत्या वेळा… ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे 

सकाळी उठून बाहेर आलो आणि बागेत एक फेरफटका मारला. सूर्याची सोनेरी कोवळी किरणं सगळ्या सृष्टीला न्हाऊ घालत होती. झाडं, पानं, फुलं जणू चातक होऊन त्या सूर्यप्रकाशाचं रसपान करीत होती. पक्ष्यांची किलबिल सुरु होती. रात्री मिटलेली कमळाची कळी आपले डोळे अर्धवट उघडून साऱ्या परिस्थितीचा अंदाज घेत होती. हळूहळू तिला उमलून यायचंच होतं. गुलाबाच्या कळ्यांनाही आता जाग आली होती. जाई, जुई तर सूर्यदेवांचं स्वागत करण्यासाठी कधीच्या तयार होत्या. झेंडूची फुलं उमलली होती. सोनेरी, पिवळसर झेंडूच्या फुलांवर सोनेरी सूर्यकिरणे पडल्यामुळे त्यांचं सौंदर्य काही आगळंच भासत होतं. मोगरा, जाई, जुई आपल्या अत्तराच्या कुपीतून सुगंधी शिडकावा करून वातावरण सुगंधित करीत होते. वाऱ्याच्या शीतल लहरी हा सुगंध अलगद वाहून नेत होत्या. रंगीबेरंगी फुलपाखरं फुलांवर अलगद नर्तन करून आपला आनंद व्यक्त करीत होती.

सृष्टीच्या अंगणात हा प्रभातोस्तव रंगला होता. विविधरंगी पानं, फुलं, पक्षी यांनी हा रंगसोहळा साकार केला होता. सृष्टीमध्ये अव्यक्त असलेल्या निर्गुण निराकाराची पूजा निसर्गानं आपल्या परीनं मोठी सुरेख मांडली होती. या पूजेसाठी फुलं आपल्या पूर्ण शक्तीनिशी पूर्णपणे उमलून आली होती. त्यांच्या अंतरंगातून सुगंधाच्या भक्तीलहरी बाहेर पडत होत्या. पक्षी आपल्या सुरात त्याची आरती गात होते. सूर्यदेवांच्या सोनेरी प्रकाशात सृष्टीचा गाभारा उजळून निघाला होता.

कुठूनतरी भूपाळीचे सूर अलगद कानी आले.

मलयगिरीचा चंदनगंधीत धूप तुला दाविला 

स्वीकारा ही पूजा आता उठी उठी गोपाळा…

माझ्या तोंडून आपोआप उद्गार बाहेर पडले. ‘ वा, किती सुंदर! ‘ मनात एक प्रश्न आला. हे सगळं कशासाठी? काही विशेष कारण आहे का? इतका सुंदर असलेला हा सोहळा, हा उत्सव रोज कशासाठी?

माझ्या मनातल्या प्रश्नाला सगळ्यांनी आपापल्या परीनं उत्तर दिलं. सूर्यकिरणं म्हणाली, ‘ कालची रात्र अंधारात गेली ना! तुला उद्याची चिंता होती. मावळलेल्या दिवसाबरोबर तुझ्या कोमेजलेल्या आशा अपेक्षांना पुन्हा नवसंजीवनी देण्यासाठी आम्ही आलो आहोत. या प्रकाशाप्रमाणेच तुझा आजचा दिवसही प्रकाशमान होवो. ‘ 

फुलं म्हणाली, ‘ अरे रोजचा दिवस नवा. रोज आपल्या आयुष्याच्या पुस्तकाचे एक नवीन पान आपण उघडतो. मग तो रोजचा दिवस हा आपल्या जीवनातील एक सोहळाच नाही का? म्हणून त्याची सुरुवात आम्ही पूर्णपणे फुलून करतो. उमलता उमलता सौंदर्याची बरसातही करतो. आम्ही कसे टवटवीत असतो! तसंच प्रसन्न, टवटवीत तुम्हीही राहावं असं आम्हाला वाटतं. तुम्हीही आपला दिवस आपले निहित कार्य, चांगली कामं करण्यात घालवावा. तोही आम्हाच्यासारखा प्रसन्न, हसतमुख आणि टवटवीतपणे. आणि जमलं तर सुगंधाची उधळण करावी. तुमच्या कर्तृत्वाचा सुगंध परिसरात दरवाळावा असं आम्हाला वाटतं. ‘ 

मी म्हटलं, ‘ अहो, थांबा थांबा. जीवनाचं सारं तत्वज्ञानच तुम्ही उलगडून सांगितलंत. तुमचे हे शब्द मला माझ्या अंतरंगात साठवू द्या. ‘ खरंच रोजची पहाट म्हणजे आमच्यासाठी त्या विधात्यानं दिलेलं अमूल्य वरदान आहे. प्रत्येक दिवस आमच्या आयुष्यातील सोनेरी पान आहे. कधी ऊन, वारा, पाऊस असेल. वादळे झेलावी लागतील. थंडीचा कडाका असेल. फुलं उमलण्याची थोडीच थांबली आहेत. त्यांना माहिती आहे की आपल्या या छोट्याशा आयुष्यात संकटे, सुखदुःख येणारच! त्यासाठी उमलण कशाला सोडायचं? कोमेजायचं कशाला? दुर्मुखलेलं का राहायचं? जमेल तसं फुलून यायचं. आपल्या सुगंधाची बरसात करायची.

फुलांचं मनोगत समजून घेता घेता शीतल सुगंधी वायू लहरी कानाशी येऊन गुणगुणू लागल्या. ‘ अरे, रोजचा दिवस म्हणजे सगळ्या गेलेल्या इतर दिवसांसारखाच एक असतो का? कदाचित तुला तसं वाटेल. पण आपल्या आयुष्यातला प्रत्येक दिवस आगळावेगळा असतो. जे काल होतं ते आज नाही. आणि जे आज आहे ते उद्या असणार नाही. बदल हा सृष्टीचा स्थायीभाव असतो. म्हणूनच या बदलाला रोज नव्या उत्साहानं, उमेदीनं सामोरं जायचं असतं. तुला माहिती असेलच की आम्ही सदा सर्वकाळ वाहत असतो. कधीही थांबत नाही. आम्ही थांबलो तर ही सृष्टी थांबेल. तुझ्या श्वासात आणि रोमारोमात आम्ही असतोच. तेव्हा मित्रा, या सकाळच्या प्रसन्न वेळी मोकळा प्रसन्न श्वास घे. आपल्या तनामनात नवीन ऊर्जा भरून घे आणि आजच्या दिवसाला सामोरा जा. ‘

मी वाऱ्याच्या लहरींना म्हटलं, ‘ अगदी खरं आहे तुमचं. तुम्ही आमचा प्राण आहात. जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत सोबत असते तुमची. तुमचा संदेश मी लक्षात ठेवीन. नवीन ऊर्जेनं भारून माझ्या कामाला सुरुवात करीन.

तेवढ्यात फुलाफुलांवर नाचणाऱ्या, बागडणाऱ्या फुलपाखरांकडे माझं लक्ष गेलं. त्यांचे विविध रंग मनाला प्रसन्न करीत होते. त्यातलं एक डोळे मिचकावीत म्हणालं, ‘ आमचंही थोडं ऐकशील का रे? ‘ मी म्हटलं, ‘ जरूर. आज तुम्ही सगळेच मला अतिशय सुंदर संदेश देत आहात. तुमचं मला ऐकायचंच आहे. ‘ 

फुलपाखरू म्हणालं, ‘ आमच्या पंखांवरचे रंग तुला आवडतात ना? पण नुसतं त्यावर जाऊ नकोस. तुला कदाचित माहिती नसेल आम्हा सुरवंटाचं फुलपाखरू होताना आम्हाला किती दिव्यातून जावं लागतं! पण आम्ही त्याचा विचार करत बसत नाही. आम्हाला जमतील तसे निसर्गाचे रंग आमच्या अंगावर माखून घेतो. तसं आमचं आयुष्य अल्पजीवी असतं. पण आम्ही ते जगतो मात्र आनंदानं. दुसऱ्यालाही आनंद देतो. किती जगलो यापेक्षा कसं जगलो हे महत्वाचं आहे, नाही का? ‘ असं म्हणून आपल्या पंखांची सुंदर उघडझाप करीत ते दुसऱ्या फुलावर जाऊन बसलं.

सूर्यदेवांची किरणं आता थोडी अधिक प्रखर होऊ लागली होती. निसर्गातले सगळेच घटक आपापल्या कामाला लागले होते. सगळी फुलं पूर्णपणे उमलली होती. दिवस उमलला होता. उमलत्या वेळा मला प्रसन्न करून गेल्या. माझं मनही उमललं होतं. रोमारोमात नवचैतन्याचा संचार झाला होता. उमलत्या वेळी होणारा सृष्टीचा सोहळा मी अनुभवला होता. तोच सोहळा माझ्याही जीवनात प्रतिबिंबित व्हावा म्हणून त्या निर्गुण निराकाराला मी हात जोडले.

©️ श्री विश्वास विष्णु देशपांडे 

चाळीसगाव.

 प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सारे प्रवासी घडीचे !… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

??

☆ सारे प्रवासी घडीचे !… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

कोणताही प्रवास म्हटला की निघायचे ठिकाण नक्की असते. कुठे पोहोचायचे तेही ठरलेले असते. कसे आणि कधी निघायचे तेही ठरवलेले असते . लहानपणापासूनच मला प्रवासाची फार आवड ! वडिलांच्या बदली निमित्ताने आम्ही वेगवेगळ्या गावी गेलो. बदली झाली की आई वडिलांना टेन्शन असे. नवीन गावात जागा मिळवणे, मुलांच्या शाळा बघणे अशा अनेक गोष्टींचा विचार करावा लागे. आम्हाला मात्र या सगळ्याची गंमत वाटत असे. जसजसे मोठे होत गेलो, हायस्कूल शिक्षण संपले तशी प्रवासाचीही सवय झाली आणि त्यातील गंमत कमी होऊन जबाबदारीची जाणीव वाढू लागली !

अजूनही प्रवास म्हटला की माझी तयारी जोरात चालू असते. कुठलीही ट्रीप असो किंवा कौटुंबिक कार्यक्रम असो, प्रवासाची पूर्ण तयारी झाल्याशिवाय मला चैन पडत नाही. माझे मिस्टर तर मला कायमच चिडवतात, ‘ तुझा प्रत्येक प्रवास हा पहिलाच असल्यासारखे टेन्शन घेतेस !’ पण स्वभावाला औषध नसते 

ना ! कुठेही गेले तरी प्रवासात आपली गैरसोय होऊ नये आणि दुसरीकडे गेल्यावर कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू नये, म्हणून मी जास्तीत जास्त काळजी घेत असते. पैसे, मौल्यवान वस्तू, कपडे सगळं जागच्या जागी असावं असं मला वाटतं ! 

आम्ही जेव्हा प्रथमच एका लांबच्या ट्रीपला गेलो त्यावेळी किती पैसे लागतील याचा अंदाज नव्हता. ह्यांच्या एका बॅंकर मित्राने आग्रह केला आणि पैशाचा प्राॅब्लेम आला तर आमच्या बॅंकेची ब्रॅच तिथे आहे, मी पैसे काढून देऊ शकतो असा दिलासा दिला. ट्रिपला निघणार होतो त्या दिवशी शनिवार होता.त्यामुळे बॅंकही बंद झाली होती. अचानकच ठरल्यामुळे आहे ते पैसे घेऊन ट्रीपला गेलो. त्यामुळे ऐन वेळी ठरलेल्या त्या ट्रीपला आम्ही उत्साहाने निघालो.

प्रत्यक्षात तिथे पोचल्यावर हाॅटेल खर्च, प्रेक्षणीय स्थळे बघण्यासाठी गाडीचे बुकिंग केले आणि मार्केटमध्ये गेलो. बंगलोरमध्ये जाऊन बंगलोर सिल्क घ्यायची नाही असं कसं होईल ! बरीच खरेदी केली..

२/४ दिवस हाॅटेलवर रहाणे, फिरणे, खाणे पिणे यांवर भरपूर पैसे खर्च केले. बॅंकवाल्या मित्राला ऐनवेळी पैसे मिळू शकले नाहीत आणि शेवटी परतीच्या तिकिटाचे पैसे जेमतेम उरले ! आणि असा तो प्रवास संपवून घरी आलो तेव्हा एक मोठा धडा शिकलो की प्रवासाला जाताना जरा जास्तच पैसे बरोबर लागतात !

असा हा पहिला पहिला मोठा प्रवास मला कायमचा स्मरणात राहिला !

आता वयाची साठी उलटली तरी यात फारसा बदल झाला आहे असं वाटत नाही. उलट विसरायला नको म्हणून आधीपासूनच तयारीला सुरुवात होते.

हा झाला व्यावहारिक जीवनातला नेहमीचा प्रवास ! पण अलीकडे मात्र मन वेगळ्याच दिशेला धावतं ! 

हा जीवन प्रवास केव्हा सुरू झाला? माणूस जन्माला येतो तोच आपल्या जीवन प्रवासाची सुरुवात करून !

या प्रवासाची सुरुवात आणि शेवट दोन्हीही माहिती नाही. तरीही आपण त्या जीवन प्रवाहात स्वतःला झोकून देतो. जीवनातील सुखदुःख भोगतो. जीवनाचा आनंद घेतो. वृद्धत्वाने खचून जातो, तर कधीतरी मृत्यू हा त्याचा शेवट आहे या जाणिवेने परिस्थितीला सामोरा जातो !

काही वेळा कोणाच्यातरी मृत्यूची बातमी येते .कोणी वृद्धत्वाने, तर कोणी आजाराने, तर कोणी  आत्महत्येने, अकाली जीवन संपवते. असे काही ऐकले की मन नकळत मृत्यूचा विचार करू लागते.

 कधी वाटते की हे मानवी आयुष्य किती छोटे, मर्यादित आहे. देवाने माणसाला विचारशक्ती, बुद्धी दिली आहे. त्या जोरावर तो निसर्गाला टक्कर देत असतो. खरंतर निसर्ग हा अनाकलनीय आहे, त्याच्याशी आपल्या बुद्धीची तुलना करणे अशक्य आहे. तरीही आधुनिक काळात माणसाने केलेली प्रगती पाहिली की अश्मयुगापासून आत्तापर्यंत केलेल्या प्रगतीने खूपच थक्क व्हायला होते. हा तर अखंड जीवन स्त्रोत आहे आणि या स्त्रोताचे आपण एक बिंदू आहोत.

त्या प्रवासाची आपल्या बुद्धीला कल्पना सुद्धा करता येणार नाही ! असंख्य विचारांचा गुंता कधी कधी मनाला अस्वस्थ करतो. निसर्गाच्या अद्वितीय श्रेष्ठ शक्तीचे एक बिंदू रूप म्हणून आपला हा जीवन प्रवास सुरू होतो. तो अधिकाधिक चांगला श्रेयस्कर  करणे हेच आपल्या जीवनाचे ध्येय असले पाहिजे.

आता या प्रवासाचा शेवटचा टप्पा जगताना आपण जे चांगले करता येईल ते करावे. जगण्याचा आनंद भरभरून घ्यावा, तरच शेवटचा दिस गोड जावा असे म्हणत त्या जीवन प्रवासाचा निरोप आपल्याला घेता येईल…..  शेवटी काय, सारे प्रवासी घडीचे !

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ भाऊ आणि बहिणी…अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

??

☆ भाऊ आणि बहिणी…अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे

भाऊ आणि बहिणी हे आपल्या आई-वडिलांनी म्हातारपणी आपल्यासाठी ठेवलेल्या सर्वात मौल्यवान ठेवी आहेत याची आपल्याला फार उशिरा जाणीव होते.

आम्ही लहान असताना भाऊ-बहिणी आमचे सर्वात जवळचे सवंगडी होते. दररोज, आम्ही एकत्र खेळत होतो आणि गोंधळ घालत होतो.  आणि बालपणीचा काळ एकत्र घालवत होतो. मोठे झाल्यावर, आम्ही आमच्या स्वतःच्या कुटुंबात रमलो, स्वतःचे वेगळे जीवन सुरू झाले. आम्ही भाऊ बहिणी सहसा क्वचितच भेटतो. आमचे पालक हा एकमेव दुवा होता ज्याने आम्हा सर्वांना जोडले.

आपण हळूहळू म्हातारे होईपर्यंत वाट पाहत राहू, आपले आई-वडील आपल्याला सोडून गेले आहेत आणि आपल्या आजूबाजूच्या नातेवाईकांची संख्या कमी होत चालली आहे, त्याचवेळी आपल्याला हळूहळू मायेची किंमत कळते.

मी नुकताच इंटरनेटवर एक व्हिडिओ पाहिला, ज्यामध्ये १०१ वर्षांचा मोठा भाऊ त्याच्या ९६ वर्षांच्या धाकट्या बहिणीला भेटायला गेला होता.  थोड्या वेळानंतर जेव्हा दोघे वेगळे होणार होते, तेव्हा धाकट्या बहिणीने कारचा पाठलाग केला आणि तिच्या भावाला २०० युआन दिले आणि त्याला काहीतरी छान खाण्यास सांगितले.  तिचे बोलणे पूर्ण होण्याआधीच दोघांनाही अश्रू अनावर झाले. असे काही नेटिझन्स होते ज्यांनी टिप्पणी केली की एवढ्या मोठ्या वयात भाऊ आणि बहिणी भेटणे खरोखरच खूप भाग्याचे लक्षण आहे.

होय, आपण म्हातारे झाल्यावरच आपल्याला कळते की या जगात आपल्याशी कोणीतरी रक्ताने बांधलेला असणे किती महत्त्वाचे आहे. जेव्हा तुम्ही म्हातारे असाल आणि तुमचे आई-वडील दोघेही गेले असतील, तेव्हा तुमचे भाऊ आणि बहिणी या जगातील सर्वात जवळचे लोक असतात. मित्र दूर जाऊ शकतात, मुलं मोठी होतात, तीही दूर जातात. पण तुमचा जोडीदार तुमच्यासोबत असेल नसेल, तरी फक्त तुमचे भाऊ आणि बहिणी आहेत जे तुम्हाला तुमच्या आयुष्याचा उत्तरार्ध पूर्ण करण्यासाठी पुरेशी साथ देवू शकतात.

आपण म्हातारे झालो तरी बंधु भगिनी एकत्र जमू शकणे हा एक मोठा आनंद आहे. त्यांच्या सहवासात आम्हाला उबदारपणाची कमतरता भासणार नाही.  त्यांच्या सहवासात आम्ही कोणत्याही अडचणींना घाबरणार नाही.  वृद्धापकाळापर्यंत, कृपया आपल्या बंधू आणि बहिणींशी जुळवून घ्या.

भूतकाळात काहीही अप्रिय घडले असले तरीही, भाऊ आणि बहिणींनी एकमेकांशी अधिक सहनशील आणि क्षमाशील असले पाहिजे. अशी कोणतीही गाठ नाही जी भाऊ-बहिणीमध्ये बांधता येत नाही.  अशी कोणतीही ढाल नाही जी काढली जाऊ शकत नाही.—  बंधू-भगिनींनी कधीही जुने हिशेब मांडू नयेत किंवा जुनी नाराजी बाळगू नये.  थोडे अधिक परस्पर अवलंबित्व आणि परस्पर पालनपोषणाने, संबंध अधिक चांगले आणि चांगलेच होतील, कारण —– 

—  कारण या जगात आपल्या पालकांनी फक्त आपल्यासाठी दिलेल्या या सर्वात मौल्यवान भेटवस्तू आहेत.

लेखक : अज्ञात

संग्राहिका –  सुश्री प्रभा हर्षे 

पुणे, भ्रमणध्वनी:-  9860006595

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “जीवनसे भरी तेरी आंखे !” —☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

 

? मनमंजुषेतून ?

☆ “जीवनसे भरी तेरी आंखे !—  ☆ श्री संभाजी बबन गायके 

तुझ्या डोळ्यांत पाहू जाता !

जीवनाची उत्पत्तीच पाण्यातून झाली असल्यानं पाण्याला जीवन म्हणणं तसं सयुक्तिकच ! वारि, नीर, तोय,सलिल,अंबु,उदक,जल ह्या अन्य नावांनीही तृषातृप्ती करणारं हे द्रव जेंव्हा डोळ्यांतून स्रवणा-या अश्रूंचं आवरण घेऊन वाहू लागतं तेव्हाच पाण्याचा आणि जीवनाचा अर्थ खोल आहे, याची जाणिव होऊ लागते.

तुझ्या डोळ्यांतलं पाणी म्हणजे जीवनच जणू. या जीवनाच्या ओलाव्यानेच तर तुझी नेत्रकमळं सदोदित ओली दिसतात…पापण्यांवरचे दंवबिंदु मोत्यांसारखे चमकत असतात सकाळच्या कोवळ्या उन्हांच्या तिरीपेत. माझ्या जगण्याचा डोह आता मरणासन्न आहे….तप्त सूर्य या डोहातले शेवटचे थेंब शोषून घ्यायचा कंटाळा करतोय बहुदा. त्याला काही एकच डोह शुष्क करायाचा आहे थोडाच! जगभरातले सर्व सागर,सर्व जलाशय त्याच्याच तर धाकात जगत असतात.

का जगावं असा यक्षप्रश्न सतत शिल्लक पाण्याच्या अंतरंगात ठिपकत असतो सारखा…तेव्हा जगण्याला उभारी तरी का म्हणून यावी? पण तुझे हे डोळे….जगण्याचा किनारा सोडून दूर जाऊ देत नाहीत .

सागराला तसं काय कमी आहे गं? सर्व खळाळत्या नद्या त्याच्याच तर बाहुपाशात विसावतात अखेरीस….येताना मातीला धावती आलिंगनं देत आलेल्या असल्या तरी. त्यांचे सुगंधी श्वास तर त्याच्याच अंगणात भरती-ओहोटीचा फेर धरून नाचत असतात की. किना-यावर येण्याचं नुसतं नाटक…त्यांना परत त्याच्याच कडे जायचं असतं हे काय कुणाला ठाऊक नाही होय? पण हा सागरही तुझ्या रूपाच्या रसाची आस बाळगून असतो…..म्हणूनच तर पुनवेला दोन पावलं पुढं येत असतो….न चुकता. आणि रुसून माघारीही जातो कोस दोन कोस !

तुझं रूप रंग-रेषांच्या क्षितिजावर मावत नाही, आकारांचे बांध तुझ्या रुपाला अडवून ठेऊ शकत नाही…तुझं हुबहू चित्र कोण कसं आणि कधी काढू शकेल, देव जाणे ! आणि तुझ्या वर्णनासाठीचे शब्द, त्यांना बद्ध करणारे छंद-वृत्त कवींना सुचावेत तरी कसे? तुझं रूप शब्दांना, चित्रांना कायमच अनोळखी राहून जातं…त्यांचा शोध सतत सुरू असला तरी.

काळजाला जागं ठेवणारे श्वास आणि त्याची आवर्तनं आहेस तू . तू आहेस म्हणून हृदय धडधडतं आहे त्याच्या अधीर वेगानं आणि तुझ्या रुपाच्या आवेगानं. तू  म्हणजेच जगणं, तू म्हणजेच जगत राहणं…अविरतपणे.

तुझ्या श्वासांच्या सुगंधाला मधुबनाचं कोंदण लाभलंय…आणि तुझे बाहुपाश…पाश नव्हेत कमलदलेच जणू. त्यातून स्वतंत्र होण्याचा विचारही मनाला शिवत नाही. अपार पसरलेल्या नभात तुझा मुखचंद्र म्हणजे किरणांची पखरणच जणू. या किरणांच्या उजेडात जीवनाचा अंधार विलुप्त होऊन जावा ! हिरव्यागर्द हिरवळीतून तुझी पावलं एखाद्या हरिणीच्या वेगाशी लीलया स्पर्धा करतील अशी नाजूक आणि तितकीच चपळ. तू गोड गोजि-या हरिणांच्या सोबत चार पावलं जरी चाललीस तरी त्यांच्यातलीच एक दिसशील…..गोड !

आयुष्याच्या धकाधकीत काळजाला पडलेल्या चिरा तशाच राहतात…ठसठसत. या जखमांना टाके घालणं म्हणजे आणखी वेदना पदरात पाडून घेण्यासारखं…दुखणारं. पण तुझ्या पदराचा एक धागाही पुरेसा होईल हे जीवनवस्त्र पुन्हा होतं त्या रूपात पाहण्यासाठी….तुझ्या डोळ्यांतील जीवन पाहून का नाही कुणाला पुन्हा जीवनाच्या सावलीत विसावा घ्यावासा वाटणार? हे तर हवेहवेसे वाटणारे बांधलेपणच ! जोपर्यंत तुझ्या डोळ्यांतल्या जीवनाचा निर्झर खळाळत राहील…तोवर माझं आयुष्य वहात राहील…तृप्ततेच्या आभाळाखाली !

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print