☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-६ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆
.. चैत्र पालवी…
मराठी चैत्र महिना उत्साहाचं वारं घेऊनच येतो. माहेरवाशिण चैत्रगौर घरोघरी विराजमान होते. आपल्यातल्या सुप्त गुणांना, कलेला वाव देण्यासाठी गृहिणींची लगबग सुरू होते. आमची आई आणि विमल काकू चैत्रगौर अप्रतिम सजवायच्या. पंचामृत, शुद्धोदक चंदन, अत्तर लावून चैत्रगौर लखलखीत घासलेल्या नक्षीदार झोपाळ्यात मखमली आसनावर विराजमान व्हायची. गृहिणीच्या उत्साहाला उधाण यायचं. हळदी कुंकवाच्या दिवशी. घरातल्याच वस्तू वापरून कमी खर्चात सुंदर आरास सजायची. सोनेरी जरीकाठाचे, मोतीया रंगाचे उपरणे अंथरून पायऱ्या केल्या जायच्या. अफलातून आयडिया म्हणजे सुबक कापून टरबुजाचं कमळ, कैरीचा घड, द्राक्षाचं स्वस्तिक आणि हिरव्यागार पोपटी कैरीला टोकाकडून कुंकू पाण्यात कालवून लाल जर्द चोचीचा डौलदार पोपट सुंदर ग्लासात ऐटीत बसायचा. छताला हाताने बनवलेलं तोरण चमकायचं. फळांच्या खाली बारीक दोऱ्याने विणलेली कमळं ऐसपैस पसरली जायची. असा होता चैत्रगौरीचा थाट. मग का नाही गौर प्रसन्न होणार?
आईच्या मैत्रिणीकडे शांतामावशीकडे अन्नपूर्णेसह लक्ष्मी पाणी भरत होती. चांदीच्या ताटात वाट्या, तांब्याभांडं, व पेल्याचा सेटच होता तिच्याकडे. त्याकाळी स्टील घेणे सुद्धा महागात पडायचं. सजलेल्या चैत्रगौरीपुढे चांदीच्या ताटलीत छोट्या नक्षीदार वाट्यांमधून आंब्याची डाळ, पन्हं आणि झक्कास हरभऱ्याची उसळ, काकडीची चकती सुबकपणे मांडून चविष्ट नैवेद्य देवीपुढे मांडला जायचा. चांदीच्या रेखीव पेल्यात केशर, विलायची युक्त केशरी पन्हं पाहून आमच्या मुलांच्या तोंडाला पाणी सुटायचं आणि मग काय ! पोटभर छानशी उसळ, चटकदार कैरीची डाळ, आणि बर्फाचे खडे घातलेले जम्बो ग्लासातले ते केशरी अमृत पिऊन पोटभर फराळ करून हळदी कुंकवाची, फराळाची सांगता व्हायची.
सवाष्णीसाठी तर हा समारंभ म्हणजे मानाचे पान. हळदी कुंकू, गजरा, अत्तर, आंब्याच्या डाळी, आणि काकडीबरोबर घशाला थंडावा देणारं अप्रतिम चवीचं थंडगार पन्हं पिऊन त्या तृप्त तृप्त व्हायच्या.
नवरात्रात रोज उठता बसता म्हणजे पहिल्या आणि दसऱ्याच्या दिवशी सवाष्ण व कुमारीका जेवायला असायची. पुण्यात शिकायला आलेले गरीब विद्यार्थी अध्ययन शिक्षण घ्यायचे पण पोटोबाचे काय? हा त्यांचा प्रश्न सुगरण गृहिणी सहजतेने माधुकरी देऊन सोडवायच्या. आता मुलांना तोंडातून शब्द बाहेर पडल्यावर सहज अगदी त्या क्षणी सारं काही मिळतंय, आई-वडिलांच्या जीवावर पैसा अडका, कपडे, चैनीच्या वस्तू, गाड्या अगदी विनासायास मिळताहेत, पण त्या काळी पोटासाठी पुण्यात विद्यार्थ्याला ठराविक घर हिंडून घरोघरी “भवती भिक्षां देही ” असं म्हणून फिरावे लागायचे. तेव्हां गृहिणीची त्या देण्यात.. “अतिथी देवो भव ” ही पुण्यकर्माची भावना असायची. बुद्धीने कष्टाने मिळवलेलं ते संघर्षमय असं विद्यार्थी जीवन होतं. अशा या विद्येच्या माहेरघरात कितीतरी विद्यमान व्यक्ती यशोदायी होऊन शिक्षण क्षेत्रात चमकल्या. उगीच नाही पालक म्हणायचे, ‘ पुणं तिथे काय उणं ‘. असं होतं विद्यादान, अन्नदान करण्यात अग्रगण्य असलेलं तेव्हाचं कसबे पुणं..
☆ आणि…कविता जिवंत राहिली… भाग – 2 ☆ श्री नितीन सुभाष चंदनशिवे☆
(माझी तमाशा नावाची कविता बेंबीच्या देठातून सादर केली. कविता संपली. टाळ्या कानावर यायला लागल्या. त्याच टाळ्यांच्या आवाजात पुन्हा येऊन जाग्यावर बसलो आणि पुन्हा डोळ्यासमोर संसार दिसू लागला.) – इथून पुढे
स्पर्धा संपली. पारितोषिक वितरण समारंभ सुरू झाले. त्यावेळी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते पारितोषिक वितरण होणार होतं. मंचावर ते उपस्थित होते. सूत्रसंचालकाने विजेत्यांची नावे जाहीर करण्यासाठी माईक हातात घेतला. आणि छातीत धडधड सुरू झाली. त्याने सर्वात आधी तृतीय क्रमांक पुकारला. टाळ्या सुरू झाल्या. तो तीन नंबरचा विजेता स्टेजवर गेला. त्याच्या हातात ट्रॉफी, गळ्यात शाल, पुष्पगुच्छ व ते पांढऱ्या रंगाचं पाकीट राजकुमार बडोले यांनी दिलं. त्याला तिथेच थांबवला. माझी नजर त्याच्या पांढऱ्या पाकिटावरून हटत नव्हती. सूत्रसंचालकाने दुसरा नंबर घोषित केला. माझं नाव नव्हतं. पोटात अजून गोळा आला. तो विजेता ही तसाच जाऊन स्टेजवर थांबला. आणि आता सुत्रसंचालक प्रथम क्रमांक घोषित करणार होता. मी डोळे गच्च मिटून घेतले. पोटात कळ यायला लागली होती. छातीत धडधड वाढेलेली होती. दोन डोळ्यांच्या बंद पापणीच्या आड फक्त गरोदर असणारी माझी पत्नी माझी वाट बघत असलेली दिसत होती. आणि कानावर आवाज आला. “आणि या स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचा विजेता आहे, ज्याने तमाशा कविता सादर केली असा नितीन चंदनशिवे. “टाळ्यांचा प्रचंड कडकडाट होत होता. बंद पापणीच्या आतून डोळ्यांनी बांध सोडला आणि गालावर पाणी घळघळ वाहायला लागलं. सगळ्या जगाला मोठ्याने ओरडून सांगावं वाटत होतं मी आयुष्यभर कविता लिहिणार आहे. होय मी कवी म्हणून जिवंत राहणार आहे.
टाळ्या थांबत नव्हत्या. आतल्या आत हुंदके देत मी स्टेजवर गेलो. बाजूच्या विंगेतून साडी नेसलेली मुलगी हातात ट्रे घेऊन येताना दिसू लागली. मी प्रमुख पाहुण्यांच्या समोर अंतर राखून उभा राहिलो होतो. फोटोवाला फोटो घेण्यासाठी कॅमेऱ्या डोळ्याला लावून तयार झाला होता. मी खिशातला मोबाईल काढला. आणि दिपालीला फोन केला. पहिल्या रिंगमध्ये फोन उचलला आणि म्हणली, “चंदनशिवे काय झालं सांगा ना लवकर, “ती बिचारी वेड्यासारखं हातात फोन धरून माझ्या फोनची वाट बघत बसली होती. मी फोन कानाला दाबून गच्च धरला आणि म्हणलं, “दिपाली पहिला नंबर आलाय. ” मला एक अपेक्षा होती तिने अभिनंदन वैगेरे म्हणावं अशी. पण ती तसलं काही बोलली नाही. ती पटकन म्हणाली, ‘ते पहिला नंबर आलाय ठीक आहे पण रक्कम किती आहे ते सांगा आधी. “आणि तेवढ्यात ती मुलगी ट्रे घेऊन जवळ आली. ती प्रमुख पाहुण्यांच्या हातात ट्रे देत होती. इकडं कानाजवळ दिपाली फोनवरून रक्कम विचारत होती. माझ्या डोळ्याला समोर फक्त पांढरं पाकीट दिसू लागलं. मी कसलाच विचार केला नाही. ते पाकीट मी हिसकावून हातात घेतलं. सगळेजण तोंडाकडे बघत होते. मला काहीच वाटत नव्हतं. मी स्टेजवर ते पाकीट फोडलं. दोन बोटं आता घालून त्या पाचशे रुपयाच्या नोट्या मोजल्या. दहा नोटा होत्या. आणि मी फोन कानाला लावून म्हणलं, “दिपाली, पाच हजार रुपये आहेत. “हे वाक्य बोलताना घळकन डोळ्यातून एक धार जोरात वाहिली. त्यावर दिपाली काहीच बोलली नाही. तिचा एक बारीक हुंदका मात्र ऐकू आला. आणि जवळ जवळ वीस पंचवीस सेकंद आम्ही एकमेकांशी काही बोललो नाही. फक्त दोघांचे श्वास आम्ही अनुभवत होतो. मला वाटतं आम्ही दोघेजण किती जगू माहीत नाही. पण, आयुष्यातला तो पंचवीस सेकंदाचा काळ हा सुवर्णकाळ वाटतो मला. आम्ही नवरा बायकोने त्या पंचवीस सेकंदाच्या काळात आमचं जन्मोजन्मीचं नातं मुक्याने समजून घेतलं. नंतर हातात ती ट्रॉफी आली. गळ्यात शाल पडली. फुलांचा तो गुच्छ घेतला. आणि मी तिथून कसलाही विचार न करता निघालोसुद्धा. त्या फोटोवाल्याला हवी तशी पोझ मिळालीच नाही. आणि माझ्या त्या वागण्याने सगळेजण मला बावळट आहे की काय अशा नजरेने बघत होते. फोटोवाला ही रागानेच बघत होता. मी थेट गेटमधून पांढरं पाकीट खिशात कोंबून बाहेर पडलो.
घरी येताना तिच्यासाठी मिठाई घेतली. तिला समोसे आवडतात. म्हणून गरमागरम समोसे ही घेतले. तिसऱ्या मजल्यावर आमचं घर होतं. मी अक्षरशा पायऱ्या तुडवत पळत पळत धापा टाकत दारात आलो. दार वाजवणार तेवढ्यात तिनेच दार उघडलं. आणि म्हणाली, “कवी नितीन चंदनशिवे यांचं माझ्या संसारात स्वागत आहे. ” हुंदका दाटून आला. मला स्पर्धा जिंकल्याचा, पाच हजार मिळाल्याचा, आनंद नव्हताच. मी आयुष्यभर तिच्यासमोर ताठ मानेने कविता लिहिणार होतो कवी म्हणून तिच्या नजरेत जगणार होतो. कवी म्हणून जिवंत राहणार होतो. याचा आनंदच नाही तर मी हा महोत्सव माझ्या काळजाच्या गाभाऱ्यात आतल्या आत साजरा करत होतो. तिने माझे पाणावलेले डोळे पुसले. तिच्यासाठी खायला आणलेलं तिच्या हातात दिलं. आम्ही दोघेही खायला बसलो. आणि ती म्हणाली, “चंदनशिवे आपल्याला जर मुलगा झाला तर आपण त्याचं नाव निर्भय ठेवायचं. कारण आज पोटात तो सारखं लाथा मारून मला त्रास देत होता. तो सोबतीला होता म्हणून मनात भितीच नव्हती. तुमचा फोन येणार आणि तुम्हीच जिंकलाय असं सांगणार असंच वाटत होतं. “
सगळी मिठाई दोघांनी खाल्ली. तिने कागद आणि पेन घेतलं. आणि किराणा मालाची यादी लिहायला सुरुवात केली. तिने ती यादी लिहून झाल्यावर माझ्या हातात दिली. आणि “जा घेऊन या लवकर सामान” अस म्हणून ती पिशवी घेण्यासाठी उठली.
आणि त्याच कागदाच्या मागील बाजूस मी कविता लिहिली. ती अशी….
“माझा महिन्याचा पगार होतो तेव्हा,
माझी बायको तिच्या सुंदर हस्ताक्षरात
किराणा मालाची यादी लिहिते,
ती यादीच
माझ्यासाठी जगातली
सर्वात सुंदर कविता असते…
आणि यादीची समिक्षा
फक्त आणि फक्त
तो दुकानदारच करत असतो
तो एक एक शब्द खोडत जातो
पुढे आकडा वाढत जातो
आणि कविता
तुकड्या तुकड्याने
पिशवीत भरत जातो
आयुष्यभर माहीत नाही
पण, कविता आम्हाला
महिनाभर पुरून उरते
कविता आम्हाला महिनाभर पुरून उरते”
मित्रहो, संघर्षाच्या सुगंधी वाटेला सुद्धा वेदनेचे फास असतात. बंद डोळ्यांनाच फक्त सुखाचे भास असतात. पण जोडीदारावर अमाप माया आणि विश्वास ठेवला की, संसाराच्या या गाडीत बसून प्रवास करताना येणाऱ्या वादळात ही गाडी कधी थांबत नाही. आणि म्हणूनच उंबरठ्यावर भूक वेदनेचे अभंग गात असली तरीही आतल्या घरात नवरा बायकोने कायम आनंदाच्या ओव्या गात जगलं पाहिजे. यासाठी शब्दांचा लळा आणि आनंदाचा गळा हा असलाच पाहिजे. कारण, आयुष्य सुंदर आहेच आणि आयुष्याचं गाणं हे अशाच सुख दुःखाच्या सुरांनी नटलेलं असलंच पाहिजे.
☆ आणि…कविता जिवंत राहिली… भाग – 1 ☆ श्री नितीन सुभाष चंदनशिवे☆
तो दिवस आम्हा नवरा बायकोच्या आयुष्यातला सर्वात सुंदर दिवस होता. ती गरोदर होती सातवा महिना सुरू होता. निर्भय तिच्या पोटात वाढत होता. माझा तीन महिन्यापासून पगार झाला नव्हता. मी कंत्राटी कामगार होतो. आणि वेळ अशी आली होती, घरातलं सगळं राशन संपलं होतं. गॅस संपून आठ दिवस झाले होते. स्टोव्ह मध्ये शिल्लक राहिलेल्या रॉकेलवर ती काटकसर करून कसातरी दोनवेळचा स्वयंपाक करत होती. टीव्ही चा रिचार्ज संपला होता. त्यामुळे टीव्ही ही बंद होता. रोजचं येणारं दूध बंद केलं होतं. घरमालक सारखा भाडे मागण्यासाठी फोन करत होता. तीन महिने मी काहीतरी करून ढकलत आणले होते. तिच्या सोनोग्राफीला आणि दवाखान्याला बराच बराच खर्च झाला होता. गावाकडे आई वडील आजी आणि बहीण असायचे. तिकडे ही लक्ष द्यावे लागायचे. दिपालीने कधीच कसला हट्ट केला नाही. उलट जितकी काटकसर करता येईल तेवढी ती करत होती. आणि माझ्यासोबत लढत होती. परंतु आजची परिस्थितीच भयंकर होती. घरात थोडेसे तांदूळ शिल्लक राहिले होते. बाकीचे सगळे डब्बे रिकामे झाले होते. एका वेळची सोय होणार होती. आणि मी माझ्या सगळ्या मित्रांना फोन करत होतो. पण माझा फोन कुणीच उचलत नव्हतं. कारण, त्यांना माहीत होतं हा पैसे मागायलाच फोन करतोय. सगळ्यांकडून उसने घेऊन झाले होते. त्यांचीही परिस्थिती काही वेगळी नव्हती. एकाने फोन उचलला आणि मी बोलायच्या आधीच तो म्हणाला “नितीन थोडेफार पैसे असले तर दे ना, “मी काहीच उत्तर दिलं नाही फोन कट केला. आणि कुणालाच फोन करून काही होणार नाही. आपल्यालाच काहीतरी करावं लागेल असा मनात विचार करून मी खाली अंथरलेल्या चटईवर बसलो.
तिची अंघोळ झाली होती. आम्ही पुण्यात पिंपळे निलख मध्ये भाड्याच्या रूममध्ये राहत होतो. टीव्ही बंद असल्यामुळे तिला करमत नव्हतं. तिचा मूड ठीक करण्यासाठी मी कधीतरी तिच्या आवडीचं “सुन्या सुन्या मैफलीत माझ्या तुझेच मी गीत गात आहे हे गाणं गुणगुणत असायचो. “मी गाणं गायला सुरवात केली, पण ती एकटक खाली मान घालून चटईवर बोट फिरवत होती. तिने लक्षच दिलं नाही. माझ्या कवितेवर ती फार प्रेम करते म्हणून कवितेच्या ओळी म्हणायला सुरवात केली तेव्हा, तिने झटकन माझ्याकडे रागाने पाहिलं. मी मान खाली घातली. घराच्या उंबऱ्यावर भूक हंबरडा फोडायला लागली की घराच्या आत जगातलं कोणतंच संगीत आणि कोणतीच कविता मनाला आनंद देऊ शकत नाही. हे कळलं.
आम्ही बराच वेळ एकमेकांशी काहीच बोललो नाही. ती मान खाली घालून चटईवर बोटाने कोणती न उमटणारी अक्षरे गिरवत कुणास ठाऊक. सात महिन्याची गरोदर असणारी, एक नवा जन्म पोटात वाढवू पाहणारी, आई होण्याच्या उंबरठ्यावर असणारी दिपाली आमच्या बाळासाठी कदाचित एखादं नाव पुन्हा पुन्हा गिरवत असावी. मी तिच्या बोटाकडे एकटक पाहत होतो. ती स्वताला सावरत हळूहळू उठली. आणि दार उघडून बाहेर गेली. मी काहीच बोललो नाही. तिने शेजारच्या घरातून पेपर वाचण्यासाठी मागून आणला. कारण घरातली सगळी रद्दी या आठवड्यात तिने वाचून संपवली होती. रविवार होता पेपरला पुरवण्या होत्या. तिचा चेहरा थोडासा खुलला आणि ती पुन्हा खाली बसली.
मी एकटक तिच्या डोळ्यात पाहत होतो. आणि ती पेपरची पाने चाळू लागली. आणि अचानक ती जोरात ओरडली. “ओ चंदनशिवे हे बघा काय आलंय पेपरला. “मी म्हणलं ‘काय दिपाली”? तर तिने मला विचारलं “काय ओ चंदनशिवे तुम्ही कवी आहात ना”? मी पार गळून गेलेल्या आवाजात म्हणलं “हो आहे पण काय करणार कवी असून आणि कविता तरी काय करणार आहे माझी” तिने हाताला गच्च धरून जवळ ओढलं आणि माझ्या समोर ते पेपरचं पान धरलं. आणि त्या पानावर असलेली जाहिरात मला आजही आठवतेय. !!अंशुल क्रियेशन प्रस्तुत, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य राज्यस्तरीय खुली काव्यवाचन स्पर्धा. !! रोख रकमेची तीन बक्षिसे. खाली पत्ता होता चिंचवड, पुणे. आणि संपर्क साधा म्हणून मोबाईल नंबर दिलेला होता. मी ती जाहिरात बघितली. दिलेल्या नंबरवर फोन केला. नाव सांगितलं. नावनोंदणी केली. आणि मी दिपालीकडे बघितलं तर तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक मला दिसायला लागली होती. ती म्हणाली, “चंदनशिवे घरात शेवटचे सत्तर रुपये आहेत. ते मी तुम्हाला देतेय. या स्पर्धेत जा. आजच स्पर्धा आहे ही. तिथं कविता म्हणा, आणि त्यातलं सगळ्यात मोठी रक्कम असणारं बक्षिस घेऊनच घरी या. पण एक सांगते आज, जर तुम्ही बक्षिस नाही मिळवलं तर संध्याकाळी या घरात फक्त नितीन चंदनशिवे आत येईल. कवी नितीन चंदनशिवे पुन्हा या जगात कुठं दिसला नाही पाहिजे. “तिच्या या वाक्याने माझ्या पोटातलं काळीजच कुणीतरी मुठीत गच्च आवळून धरल्यागत वाटायला लागलं.
ती पुढे म्हणाली, “जर माझ्या संसाराला तुमची कविता राशन मिळवून देऊ शकत नसेल तर ती कविता मला या घरात नकोय. ” सात महिन्याची गरोदर असणारी, सर्वसामान्य गृहिणीसारखी सुखी संसाराची स्वप्नं पाहणाऱ्या दिपालीचं त्यावेळी काही चुकलं असेल असं मला अजिबात वाटत नाही. मी ते तिचं आवाहन स्वीकारलं. तिने घरातले जपून ठेवलेले सत्तर रुपये माझ्या
हातात देताना माझा हात घट्ट आवळून धरला आणि मला आतल्या आत हुंदका आला. मी अंगात कपडे घातले. तिच्या डोळ्यात बघितलं आणि निघालो.
मी चिंचवडला आलो. बसच्या तिकीटला दहा रुपये गेले होते. तिथं प्रवेश फी पन्नास रुपये होती. ती भरली. ती भरत असताना माझ्या मनाच्या वेदना नाही मांडता येणार. परत जाण्यासाठी दहा रुपये शिल्लक राहिले होते. मी ते जपून ठेवले. बाजूला सर्वांसाठी नाष्ट्याची सोय केली होती. मला खावंसं वाटलं नाही. कारण ती घरात उपाशी होती. मी मनातल्या मनात हादरून गेलो होतो. मी स्पर्धेला आलो होतो खरा पण, आतल्या आत माझ्या कवितेची माझ्या पत्नीशी स्पर्धा सुरू झालेली होती. कारण इथं जिंकलो तरच माझ्या अंतरंगात कविता आयुष्यभर जिवंत राहणार होती. आणि हरलो तर, फक्त शरीर घेऊन मेलेल्या मड्यागत जगणं समोर दिसत होतं.
स्पर्धा सुरू झाली. बराच वेळ होत चालला होता. इतरांच्या कविता मला ऐकूच येत नव्हत्या. कारण डोळ्यासमोर फक्त माझी गरोदर असणारी बायको दिसत होती. आणि उपाशी पोटाने तिने मला मारलेली “ओ चंदनशिवे” ही हाक ऐकू येत होती.
माझं नाव पुकारलं गेलं. मी स्टेजवर जायला निघालो. तेव्हा, मी आयुष्यातला फार मोठा जुगार खेळायला चाललो होतो आणि डावावर कविता लावली होती. अन तेवढ्यात पायऱ्या चढून वर जाताना, स्टेजवर बाबासाहेबांचा आणि रमाईचा एकत्र असलेला फोटो दिसला. अंगावर काटा आला. अंग थरथर कापलं. विज चमकावी तसं मेंदूत काहीतरी झालं. रमाईला आणि बाबासाहेबांना डोळे भरून बघून घेताना अंगात बळ येत गेलं. इतकं बळ आलं की त्या क्षणाला मी जगातली कुठलीही स्पर्धा जिंकू शकत होतो. माझी तमाशा नावाची कविता बेंबीच्या देठातून सादर केली. कविता संपली. टाळ्या कानावर यायला लागल्या. त्याच टाळ्यांच्या आवाजात पुन्हा येऊन जाग्यावर बसलो आणि पुन्हा डोळ्यासमोर संसार दिसू लागला.
आजकालच्या काळात प्रत्येक व्यक्तीमध्येच रावण निर्माण झालेला आहे. पूर्वी असं म्हणत की प्रत्येकामध्ये राम असतो. पण आता प्रत्येक जण दहा डोक्यांचा झालेला आहे. त्यातलं पहिलं डोकं तो त्याचं स्वतःचं घेऊन जन्माला आलेला असतो. त्यामुळे ते स्व-बुद्धीचे डोकं त्याचं स्वतःचं असतं. त्यानंतर एकेक डोकी त्याला चिकटत जातात आणि तो दहा डोक्यांचा होतो.
या नऊ डोक्यांबरोबर स्वतःचे मूळ डोकं स्वबुद्धी हे दहावं डोकं संभ्रमित होत असतं. किंबहुना या दहाव्या डोक्याला संभ्रमित करण्यासाठीच इतर नऊ डोकी त्याला चिटकवली जातात. मग प्रत्येकाचाच रावण बनतो.
अर्थात रावण हा कुशाग्र बुद्धिमत्तेचा आणि उत्तम राज्यकर्ता होता असे प्रत्यक्ष श्रीरामांनीच म्हटले आहे. फक्त त्याचे स्वतःचे डोके ज्या ठिकाणी वरचढ ठरते तेव्हाच फक्त तो चांगला ठरतो. इतर नऊ डोकी जेव्हा त्याच्या स्वतःच्या मूळ डोक्यावर मात करतात म्हणजेच स्वबुद्धीवर मात करतात तेव्हा हातून पापकृत्य घडते….. म्हणूनच आज आपल्या प्रत्येकामध्ये एक रावण दडलेला आहे. आपलं मूळ डोकं वापरण्यात जर आपण यशस्वी झालो तर आपण जीवनात सत्कृत्य करू शकतो.
इतर डोक्यांचा आपल्यावर किती प्रभाव पडू द्यायचा हे ज्याने त्याने ठरवायचे आहे. आपल्याला रावणच बनायचे आहे. दुसरा पर्यायच नाही. परंतु सत्कृत्य करणारा रावण की दुष्कृत्य करणारा रावण एवढेच आपण ठरवू शकतो. आपल्याला राम बनता येणे शक्य नाही. कारण या इतर डोक्यांना आपल्याला दूर ठेवता येणे शक्य नाही. म्हणून किमान आपली स्वबुद्धी वापरायला शिकणं एवढंच आपल्या हातात आहे.
रावणाचा विनाश होत नसतो. आज दसऱ्याच्या दिवशी रावण जाळण्याचा उत्सव आपण करतो असे म्हणतो पण रावणाची मूर्ती जाळणारे अनेक रावणच असतात. त्यात राम कुठेही नसतो. त्यामुळे हजारो वर्षे रावणाचे दहन करून सुद्धा रावण आहेतच. राम कुठे दिसतो का ते जळणारा रावण पहात असतो. कारण त्याला रामाच्या हातून मृत्यू हवा असतो. तेवढे सद्भाग्य सुद्धा आज रावणाला मिळत नाही. अनेक जिवंत रावण मिळून एका रावणाच्या प्रतिकृतीला जाळत असतात.
… जेंव्हा रामाच्या हातून सद्गती मिळेल तेव्हाच रावण संपतील. राम केव्हा कसे आणि कधी निर्माण होतील हेच रावणांनी पाहणं त्यांच्या नशिबात आहे का ? तोपर्यंत मात्र…
पप्पांचा गणपती आणि आईची गौर अशी या पूज्य दैवतांची आमच्या घरात अगदी सहजपणे विभागणीच झाली होती म्हणा ना आणि ही दोन्ही दैवते अत्यंत मनोभावे आणि उत्साहाने आम्हा सर्वांकडून पुजली जायची. त्यांची आराधना केली जायची.
पप्पांचे मावस भाऊ आणि आमचे प्रभाकर काका दरवर्षी आईसाठी गौरीचं, साधारण चार बाय सहा कागदावरचं एक सुंदर चित्र पाठवायचे आणि मग आगामी गौरीच्या सोहळ्याचा उत्साह आईबरोबर आम्हा सर्वांच्या अंगात संचारायचा.
माझी आई मुळातच कलाकार होती. तिला उपजतच एक कलादृष्टी, सौंदर्यदृष्टी प्राप्त होती. ती त्या कागदावर रेखाटलेल्या देखण्या गौरीच्या चित्राला अधिकच सुंदर करायची. गौरीच्या चित्रात असलेल्या काही रिकाम्या जागा ती चमचमणाऱ्या लहान मोठ्या टिकल्या लावून भरायची. चित्रातल्या गौरीच्या कानावर खऱ्या मोत्यांच्या कुड्या धाग्याने टाके घालून लावायची. चित्रातल्या गौरीच्या गळ्यात सुरेख
गुंफलेली, सोन्याचे मणी असलेली काळी पोत त्याच पद्धतीने लावायची. शिवाय नथ, बांगड्या, बाजूबंद अशा अनेक सौभाग्य अलंकाराची ती सोनेरी, चंदेरी, रंगीत मणी वापरून योजना करायची. या कलाकुसरीच्या कामात मी आणि ताई आईला मदत करायचो. आईच्या मार्गदर्शनाखाली या सजावटीच्या कलेचा सहजच अभ्यास व्हायचा. मूळ चित्रातली ही कमरेपर्यंतची गौर आईने कल्पकतेने केलेल्या सजावटीमुळे अधिकच सुंदर, प्रसन्न आणि तेजोमय वाटायची. त्या कागदाच्या मुखवट्याला जणू काही आपोआपच दैवत्व प्राप्त व्हायचं. गौरीच्या सोहळ्यातला हा मुखवटा सजावटीचा पहिला भाग फारच मनोरंजक आनंददायी आणि उत्साहवर्धक असायचा. एक प्रकारची ती ऍक्टिव्हिटी होती. त्यातून सुंदरतेला अधिक सुंदर आणि निर्जिवतेला सजीव, चैतन्यमय कसे करायचे याचा एक पाठच असायचा तो!
पप्पांचा तांदुळाचा गणपती आणि आईच्या गौरी मुखवटा सजावटीतून नकळतच एक कलात्मक दृष्टी, सौंदर्यभान आम्हाला मिळत गेलं.
घरोघरी होणारे गौरीचे आगमन हे तसं पाहिलं तर रूपकात्मक असतं. तीन दिवसांचा हा सोहळा… घर कसं उजळवून टाकायचा. घरात एक चैतन्य जाणवायचं.
आजीकडून गौरीची कथा ऐकायलाही मजा यायची. ती अगदी भावभक्तीने कथा उलगडायची. गौरी म्हणजे शिवशक्ती आणि गणेशाच्या आईचं रूप! असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया गौरीकडे गेल्या आणि सौभाग्य रक्षणासाठी त्यांनी गौरी कडे प्रार्थना केली. गौरीने असुरांचा संहार केला आणि शरण आलेल्या स्त्रियांचे सौभाग्य रक्षण केले. पृथ्वीवरील प्राण्यांना सुखी केले. ही कथा ऐकताना मला गौरीपूजन ही एक महान संकल्पना वाटायची. मी गौरीला प्रातिनिधिक स्वरूपात पहायची. माझ्या दृष्टीने अबलांसाठी गौरी म्हणजे एक प्रतीकात्मक सक्षम शौर्याची संघटन शक्ती वाटायची.
गावोगावच्या, घराघरातल्या पद्धती वेगळ्या असतात. काही ठिकाणी मुखवट्याच्या गौरी, कुठे पाणवठ्यावर जाऊन पाच —सात — अकरा खडे आणून खड्यांच्या गौरी पूजतात पण आमच्याकडे तेरड्याची गौर पुजली जायची. पद्धती विविध असल्या तरी मूळ हेतू धान्य लक्ष्मीच्या पूजेचा, भूमी फलित करण्याचाच असतो.
सकाळीच बाजारात जाऊन तेरड्याच्या लांब दांड्यांची एक मोळीच विकत आणायची, लाल, जांभळी, गुलाबी पाकळ्यांची छोटी फुले असलेली ती तेरड्याची मोळी फारच सुंदर दिसायची. तसं पाहिलं तर रानोमाळ मुक्तपणे बहरणारा हा जंगली तेरडा. ना लाड ना कौतुक पण या दिवशी मात्र त्याची भलतीच ऐट! आपल्या संस्कृतीचं हेच खरं वैशिष्ट्य आहे. पत्री, रानफुलांना महत्त्व देणारी, निसर्गाशी जुळून राहणारी संस्कृती आपली!
तेरड्यासोबत केळीची पाने, विड्याची पाने, सुपाऱ्या, फुलं, फुलांमध्ये प्रामुख्याने तिळाच्या पिवळ्या फुलांचा समावेश असायचा आणि असं बरंच सामान यादीप्रमाणे घरी घेऊन यायचं. बाजारात जाऊन या साऱ्या वस्तू आणण्याची सुद्धा गंमत असायची. माणसांनी आणि विक्रेत्यांनी समस्त ठाण्यातला बाजार फुललेला असायचा. रंगीबेरंगी फुले, गजरे, हार, तोरणं यांची लयलूट असायची. वातावरणात एक सुगंध, प्रसन्नता आणि चैतन्य जाणवायचं. मधूनच एखादी अवखळ पावसाची सरही यायची. खरेदी करता करता जांभळी नाक्यावरचा गणपती, तळ्याजवळचं कोपीनेश्वर मंदिर, वाटेवरच्या विठ्ठलाच्या मंदिरात जाऊन घेतलेलं देवतांचं दर्शन खूप सुखदायी, ऊर्जादायी वाटायचं. जांभळी नाक्यावरच्या गणपतीला या दिवसात विविध प्रकारच्या फुलांच्या, फळांच्या, खाद्यपदार्थांच्या सुंदर वाड्या भरल्या जात, त्याही नयनरम्य असत. देवळातला तो घंटानाद आजही माझ्या कर्णेंद्रियांना जाणवत असतो.
अशा रीतिने भाद्रपद महिन्यातल्या शुद्ध पक्षात, अनुराधा नक्षत्रावर आमच्या घरी या गौराईचं आगमन व्हायचं आणि तिच्या स्वागतासाठी आमचं कुटुंब अगदी सज्ज असायचं. गौराई म्हणजे खरोखरच लाडाची माहेरवाशीण. आम्हा बहिणींपैकीच कुणीतरी त्या रूपकात्मक तेरड्याच्या लांब दांडीच्या मोळीला गौर मानून उंबरठ्यावर घेऊन उभी राहायची मग आई तिच्यावरून भाकरीचा तुकडा ओवाळून, तिचे दूध पाण्याने पाद्यपूजन करायची. तिला उंबरठ्यातून आत घ्यायची. गौर घाटावरून येते ही एक समजूत खूपच गमतीदार वाटायची. गौराईचा गृहप्रवेश होत असताना आई विचारायची,
हा गोड संवाद साधत या लाडक्या गौराईला हळद-कुंकवाच्या पावलावरून घरभर फिरवले जायचे आणि मग तिच्यासाठी खास सजवलेल्या स्थानी तिला आसनस्थ केले जायचे.
घरातली सर्व कामं आवरल्यानंतर गौरीला सजवायचं. तेरड्यांच्या रोपावर सजवलेला तो गौरीचा मुखवटा आरुढ करायचा. आईची मोतीया कलरची ठेवणीतली पैठणी नेसवायची पुन्हा अलंकाराने तिला सुशोभित करायचे. कमरपट्टा बांधायचा. तेरड्याच्या रोपांना असं सजवल्यानंतर खरोखरच तिथे एक लावण्य, सौंदर्य आणि तेज घेऊन एक दिव्य असं स्त्रीरूपच अवतारायचं. त्या नुसत्या काल्पनिक अस्तित्वाने घरभर आनंद, चैतन्य आणि उत्साह पसरायचा. खरोखरच आपल्या घरी कोणीतरी त्रिभुवनातलं सौख्य घेऊन आले आहे असंच वाटायचं.
दुसऱ्या दिवशी म्हणजे ज्येष्ठ नक्षत्रावर तिचं पूजन केलं जायचं. आज गौरी जेवणार म्हणून सगळं घर कामाला लागायचं. खरं म्हणजे पप्पा एकुलते असल्यामुळे आमचं कुटुंब फारसं विस्तारित नव्हतं. आम्हाला मावशी पण एकच होती, मामा नव्हताच. त्यामुळे आई पप्पांच्या दोन्ही बाजूंकडून असणारी नाती फारशी नव्हतीच पण जी होती ती मात्र फार जिव्हाळ्याची होती. पप्पांची मावशी— गुलाब मावशी आणि तिचा चार मुलांचा परिवार म्हणजे आमचा एक अखंड जोडलेला परिवारच होता. आमच्या घरी किंवा त्यांच्या घरी असलेल्या सगळ्या सणसोहळ्यात सगळ्यांचा उत्साहपूर्ण, आपलेपणाचा सहभाग असायचा. पप्पांची मावस बहीण म्हणजे आमची कुमुदआत्या तर आमच्या कुटुंबाचा मोठा भावनिक आधार होती. आईचं आणि तिचं नातं नणंद भावजयीपेक्षा बहिणी बहिणीचं होतं. अशा सणांच्या निमित्ताने कुमुदआत्याचा आमच्या घरातला वावर खूप हवाहवासा असायचा. मार्गदर्शकही असायचा. घरात एक काल्पनिक गौराईच्या रूपातली माहेरवाशीण आणि कुमुद आत्याच्या रूपातली वास्तविक माहेरवाशीण असा एक सुंदर भावनेचा धागा या गौरी सोहळ्याच्या निमित्ताने गुंफलेला असायचा.
केळीच्या पानावर सोळा भाज्या एकत्र करून केलेली भाजी, भरली राजेळी केळी, अळूवडी, पुरणपोळी, चवळीची उसळ, काकडीची कढी, चटण्या, कोशिंबीर, पापड, मिरगुंडं, वरण-भात त्यावर साजूक तूप असा भरगच्च नैवेद्य गौरीपुढे सुबक रीतीने मांडला जायचा. जय देवी जय गौरी माते अशी मनोभावे आरती केली जायची. आरतीला शेजारपाजारच्या, पलीकडच्या गल्लीतल्या, सर्व जाती-धर्माच्या बायका आमच्याकडे जमत. त्याही सुपांमधून गौरीसाठी खणा नारळाची ओटी आणत. फराळ आणत. कोणी झिम्मा फुगड्याही खेळत.
हिरव्या पानात हिरव्या रानात गौराई नांदू दे अशी लडिवाळ गाणी घरात घुमत. आमचं घर त्यावेळी एक कल्चरल सेंटर झाल्यासारखं वाटायचं. मंदिर व्हायचं, आनंदघर बनायचं.
या सगळ्या वातावरणात माझ्या मनावर कोरलं आहे ते माझ्या आईचं त्या दिवशीच रूप! सुवर्णालंकारांनी भरलेले तिचे हात, गळा, कपाळावरचं ठसठशीत कुंकू, कळ्याभोर केसांचा अलगद बांधलेला अंबाडा, त्यावर माळलेला बटशेवंतीचा गजरा, नाकात ठसठशीत मोत्यांची नथ, दंडावर पाचूचा खडा वसवलेला घसघशीत बाजूबंद आणि तिनं नेसलेली अंजिरी रंगाची नऊवारी पैठणी! आणि या सर्वांवर कडी करणारं तिच्या मुद्रेवरचं सात्विक मायेचं तेज! साक्षात गौराईनेच जणू काही तिच्यात ओतलेलं!
संध्याकाळी हळदी कुंकवाचा कार्यक्रमही असायचा. ठाण्यातल्या प्रतिष्ठित बायकांना आमंत्रण असायचं पण आजूबाजूच्या सर्व कामकरी महिलांसाठी हळदी कुंकवाचं आमंत्रण आवर्जून दिलेलं असायचं. पप्पा हळदीकुंकवाच्या कार्यक्रमासाठी प्रिन्सेस स्ट्रीटवरच्या पारसी डेअरी मधून खास बनवलेले केशरी पेढे आणायचे. एकंदरच गौरीच्या निमित्ताने होणारा हा हळदीकुंकवाचा कार्यक्रम थाटामाटात संपन्न व्हायचा. त्यावेळच्या समाज रीतीनुसार हळदीकुंकू म्हणजे सुवासिनींचं, या मान्यतेला आणि समजुतीला आमच्या घरच्या या कार्यक्रमात पूर्णपणे फाटा दिलेला असायचा. सर्व स्त्रियांना आमच्याकडे सन्मानाने पूजलं जायचं. आज जेव्हा मी याचा विचार करते, तेव्हा मला माझ्या आई-वडिलांचा खूप अभिमान वाटतो. त्यांनी किती सुंदर पुरोगामी विचारांची बीजं आमच्या मनात नकळत रुजवली होती.
तिसऱ्या दिवशी गौरीचं विसर्जन असायचं. भरगच्च माहेरपण भोगून ती आता सर्वांचा निरोप घेणार असते. तिच्यासाठी खास शेवयांची खीर करायची, तिची हळद-कुंकू, फुले— फळे, धान्य, बेलफळ यांनी ओटी भरायची. मनोभावे आरती करून तिला निरोप द्यायचा. जांभळी नाक्यावरच्या तलावात तिचे विसर्जन करताना मनाला का कोण जाणे एक उदासीनता जाणवायचीच पण जो येतो तो एक दिवस जातो किंवा तो जाणारच असतो हे नियतीचे तत्त्व या विसर्जन प्रसंगी प्रकर्षाने जाणवायचं. गौरी गणपती विसर्जनासाठी तलावाकाठी जमलेल्या जमावात प्रत्येकाच्या मनात विविधरंगी भाव असतील. “गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या “ या हाकेतल्या भक्तीभावाने मन मोहरायचं.
आजही या सोहळ्याचं याच प्रकाराने, याच क्रमाने, याच भावनेने आणि श्रद्धेने साजरीकरण होतच असतं पण आता जेव्हा जाणत्या मनात तेव्हाच्या आठवणींनी प्रश्न उभे राहतात की या सगळ्या मागचा नक्की अर्थ काय? एकदा आपण स्वतःवर बुद्धीवादी विज्ञानवादी अशी मोहर उमटवल्यानंतर या कृतिकारणांना नक्की कोणत्या दृष्टिकोनातून पाहायचं? उत्तर अवघड असलं तरी एक निश्चितपणे म्हणावसं वाटतं की या साऱ्या, जगण्याला आकार देणाऱ्या एक प्रकारच्या अॅक्टिव्हिटीज आहेत. त्यात एक कृतीशीलता आहे ज्यातून जीवनाचे सौंदर्य, माधुर्य कलात्मकता टिकवताना एक समाज भानही जपलं जातं. श्रद्धा, भक्ती, विश्वास या पलीकडे जाऊन या सोहळ्यांकडे तटस्थपणे पाहिलं तर मानवी जीवनाच्या संस्कार शाळेतले हे पुन्हा पुन्हा गिरवावेत, नव्याने अथवा पारंपरिक पद्धतीने पण हे एक सोपे सकारात्मक ऊर्जा देणारे महान धडेच आहेत.
एखाद्या घराला दारं-खिडक्या असणं जितकं महत्त्वाचं असतं तितकं माझ्यासाठी वाचन महत्त्वाचं आहे. मानवी बुद्धीच्या दार आणि खिडक्या जितक्या खुल्या असतील तितकं माणसाचं आकाश मोठं होतं. वाचनाचं हे दार उघडलं ना की एका वेगळ्याच विश्वात माझा प्रवेश होतो. तिथं मी आणि पुस्तक या दोघांचचं विश्व असतं. गंमत म्हणजे लेखक जसा लिहिताना त्याच्या लेखनाचा सम्राट असतो तसंच मीही वाचताना वैचारिक विश्वाचं एक सम्राटपण अनुभवत असते. लेखकाचं बोट सोडून हळूहळू कधी मी त्या कथेतील पात्राचं नायकत्व स्वीकारते ते मला कळतही नाही. आणि मग जगण्याचा पैल विस्तारायला लागतो. मी कधीही न गेलेल्या किंवा न जाऊ शकलेल्या प्रदेशात फिरून येते. बरं हे फिरण्याचे अनुभवही किती तऱ्हेतऱ्हेचे असतात. त्यामुळे काही गोष्टी आपोआप घडतात. आवडलेल्या पात्राबरोबर एक नातं जुळतं. आणि ते इतकं हृद्य असतं की माझ्या जगण्यातले प्रश्न भले अनुत्त्तरीत राहिले असतील पण त्या पात्राच्या जीवनातले प्रश्न मात्र माझ्याही नकळत मी सोडवण्याचा प्रयत्न करते.
स्वयंपाक करताना, काम करताना, इतकंच काय बाहेर जाताना देखील हे आवडीचं पात्रं मनात घर करून असतं. त्याचा विरह, त्याचा आनंद, त्याला मिळणारं यश, प्रसिद्धी, त्याची स्वप्नं, त्याच्या इच्छा, त्याच दुरावलेलं प्रेम, नाती आणि क्वचित सारं काही मिळून मोक्ष पदाला पोहोचलेला तो हे सगळं सगळं मी तन्मयतेनं अनुभवते. आणि त्यातल्या प्रसंगात, संवादात माझे अंतरीचे काही मिसळते. मग माझ्या वास्तव जीवनातल्या अनेक पोकळ्या त्या त्या समरसतेनं भरून निघतात. जगण्यातल्या अनेक शक्यता मला सापडतात. कुठतरी तुकड्या तुकड्यात विखुरलेले माझे क्षण, अपुऱ्या इच्छा, नव्यानं गवसू लागलेला जीवनाचा अर्थ मला दिसू लागतो. अनुभवाच्या संचितात भर पडते. आणि जाणवतं की सारं काही मिळणं म्हणजे जगणं किंवा परिपूर्णता नव्हे. क्वचित काही सोडून देणं, निसटून जाणं हे देखील आयुष्याला अर्थपूर्णता देणारं आहे. जीवनाची परिपूर्णता हा एक भास वाटतो. आयुष्याचं रोज नव्याने स्वागत करायला मी तयार होते.
शेवटी मुक्तता, आनंद म्हणजे काय. . घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा स्वीकार करणं. . . कशाचंही ओझं न बाळगणं. . . हे सारं सारं वाचन मला देऊ करतं. . .
“सर, तुमच्याकडे जरा काम होतं. घरी कधी भेटता येईल?” माझ्या चांगल्या परिचयाचे एक इंटिरियर डिझायनर आहेत. आमच्या घरची पुस्तकांची कपाटं त्यांनीच डिझाईन केली आहेत. त्यांचा फोन आला.
दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही घरी भेटलो. ते म्हणाले, “सर, मला तुमची मदत पाहिजे. माझे एक क्लायंट आहेत. त्यांना तुमची पर्सनल लायब्ररी दाखवायची आहे. तुम्हाला चालेल का?”
“पुस्तकं उसनी मागणार नसतील तर चालेल. ” मी सांगून टाकलं.
पुस्तकांच्या बाबतीतला मुखदुर्बळपणा किंवा भिडस्तपणा मी आता आवरता घेतला आहे. “जरा वाचायला नेतो आणि परत आणून देतो” असं शपथेवर सांगणारे लोकसुध्दा नंतर पुन्हा उगवत नाहीत, हा अनुभव मी शेकडो वेळा घेतला, अनेक उत्तमोत्तम दुर्मिळ पुस्तकं गमावली आणि स्वतःचं नुकसान करुन घेतलं आहे. त्यामुळं, कुणी पुस्तक मागितलं की मी स्पष्ट नकार देतो.
दोन दिवसांनी एका चौकोनी कुटुंबाला घेऊन ते घरी आले. त्यांनी सगळी लायब्ररी पाहिली आणि मला विचारलं, “सर, एखाद्या चांगल्या मराठी घरात कोणकोणती पुस्तकं असावीत, हे तुम्ही आम्हाला सांगू शकाल का? आम्ही यादी लिहून घेतो. ” ते क्लायंट गृहस्थ म्हणाले.
“माझं घर हे सुध्दा एक चांगलं मराठी घरच आहे. माणसानं अवश्य वाचावीत अशी हजारों पुस्तकं माझ्या संग्रहात आहेत. त्यांची आम्हीं वयोगटानुसार यादी केली आहे. ती दाखवतो. ” असं सांगत मी त्यांना यादी दाखवली. त्यांनी फोटो काढून घेतले. आणि चमत्कारिक प्रश्न सुरु झाले –
“फास्टर फेणे की हॅरी पॉटर? तुम्ही काय सजेस्ट कराल?”
“तरला दलाल, संजीव कपूर की रुचिरा?”
“मृत्युंजय, स्वामी, श्रीमान योगी यांच्याशिवाय आणखी ऐतिहासिक पुस्तकं कोणती असावीत?”
“पु. ल. देशपांडे आणि व. पु. काळे यांचे संपूर्ण सेट घेतले तर स्वस्त पडतात का? असे अजून कुणाकुणाचे सेट्स आहेत?”
मी चक्रावून गेलो. त्यांचा मुलगा आणि मुलगी माझ्या लिस्ट मधून “फेमस बुक्स” शोधत होते आणि नावं सापडली की त्या पुस्तकांचे फोटो काढून घेण्यात गुंतले होते. काहीच उमगत नव्हतं. दोन अडीच तासांनी ते सगळे गेले.
साधारण दीड महिन्याने पुन्हा त्यांचा फोन आला. “सर, आम्हीं मागच्या आठवड्यात तुमच्याकडे लायब्ररी बघायला आलो होतो. ”
“बोला”
“तुम्ही आमची लायब्ररी बघायला आमच्या घरी याल का?” त्यांनी विचारलं.
“म्हणजे?”
“म्हणजे तुमची लायब्ररी बघितल्यानंतर आम्हीं आमची पण तशीच लायब्ररी तयार केली आहे. तुम्ही एकदा पाहायला आलात तर फार बरं होईल. ”
“बघतो, प्रयत्न करतो” असं म्हणून मी वेळ मारुन नेली खरी. पण चार पाच दिवस त्यांचें वेळीअवेळी सारखेच फोन यायला लागले. शेवटी रविवारी त्यांच्याकडे गेलो.
प्रशस्त मोठा फ्लॅट होता. अगदी नवा कोरा. बहुतेक ते राहतं घर नव्हतं. काम सुरु होतं. त्यांनी हॉल दाखवला. सेम टू सेम बुक केस, आणि त्यात सेम पुस्तकं.. जवळपास दीड-दोनशे पुस्तकं असतील.
“सर, आतमधून एलईडी लायटिंग केलं आहे, त्याला डीमर बसवला आहे. खास टफन ग्लासचे शेल्फ बसवले आहेत. आणि लाकूड सगळं सागवानच वापरलं आहे. तुम्ही वेगळ्या अर्थानं घेऊ नका, पण तुमच्यापेक्षा भारी मटेरियल वापरलं आहे. ” ते भडाभडा सांगत होते. मी ऐकत होतो.
पाडगावकरांची बोलगाणी स्टीलच्या कपाटात ठेवली काय किंवा उंची फर्निचरमध्ये ठेवली काय, त्यातला आस्वाद बदलणार आहे का? शो केसमध्ये पॉश पोझिशनमध्ये लावल्याशिवाय पु. लं च्या पुस्तकांतून विनोदच खुलत नाही, असं कुठं असतं? पुस्तकं आपल्याला त्यांच्या अंतरंगात रमवण्यासाठी असतात. आपण त्यातून शिकतो, अंतर्मुख होतो, त्यांच्याशी जोडले जातो, प्रभावित होतो. कधी ती हसवतात, कधी रडवतात, कधी प्रेरणा देतात, कधी शहाणपण शिकवतात. पण हे सगळं त्या पुस्तकातल्या आशयावर अवलंबून असतं, पुस्तकं जिथं ठेवतो त्या फर्निचरवर अवलंबून नसतं.
“सर, हा डेस्क बघा. ह्यात काय केलंय, ते आत एक गोल खाच पाडली आहे. त्या खाचेत एक कॉफीमग बरोबर बसतो. म्हणजे वाचताना कॉफी घेऊन बसलं तरी प्रॉब्लेम नाही. कप हिंदकळण्याचा प्रश्नच नाही. ” त्यांनी ते छोटं डेस्क दाखवलं.
तेवढ्यात त्यांच्या मुलीनं दाखवलं, “सर, या अँगलनं इथं खुर्चीत पुस्तक घेऊन बसलं की, फोटो पण परफेक्ट येतो. पुस्तक वाचतानाच्या फोटोंना सोशल मीडियावर ऑल टाईम डिमांड.. “
मी त्या इंटिरियर डिझायनरकडं पाहिलं, त्याच्या चेहऱ्यावरून अभिमान अगदी ओसंडून वाहत होता.
थोड्या वेळानं मी त्यांचा निरोप घेऊन बाहेर पडलो, घरी आलो. संध्याकाळी ते इंटिरियर डिझायनर माझ्या घरी पुन्हा हजर..
“सर, तुम्ही पुस्तकांविषयी एवढं गाईड केलं, वेळ दिला, स्वतः साईट व्हिजिट केली. तुमची फी सांगा ना. ”
“कसली फी? कुठली साईट व्हिजिट ?”
“सर, पुढच्या महिन्यात त्या घराचा गृहप्रवेश आहे. ‘एकदम सुसंस्कृत घर’ अशी थीम धरुनच इंटिरियर केलं आहे. त्यांच्यातले कुणीही ही पुस्तकं वाचणारच नाहियत. घरातली माणसं पुस्तकं वाचतात, असा फील देण्यासाठी मोठी बुक केस आणि त्यात ठेवलेली पुस्तकं हा डिझाईन चा भाग आहे. म्हणून तर तुमचा स्पेशल गायडन्स घेतला आणि त्याचे स्पेशल चार्जेस सुद्धा मी क्लायंटच्या बिलात लावलेत. तुम्ही सांगितलेली पुस्तकं मीच खरेदी केली आणि आणून लावली. आता गृहप्रवेशाच्या वेळी सगळ्यांना बघायला मिळेल ना, म्हणून साईट कंप्लीट करुन दिली. ” त्यांनी सरळ सांगून टाकलं.
“सर, घरात पुस्तकं असणं चांगलं असतं, येणाऱ्या लोकांवर इम्प्रेशन पडतं, असं क्लायंटचं म्हणणं होतं. ते म्हणाले, ‘उत्तम बुक केस डिझाईन करा आणि पुस्तकं पण तुम्हीच आणून फिट करा’, त्यानुसार मी तुमचं गायडन्स घेऊन काम केलं. ”
आत्ता माझ्या डोक्यात प्रकाश पडला. नोकरीसाठी बायोडेटा किंवा लग्नाळू मुलामुलींची प्रोफाईल्स वाचताना ‘आवडी निवडी’ असं शीर्षक दिसलं की, हमखास दिसणारी पहिली आवड म्हणजे वाचन.. खरोखरच आवड असो किंवा नसो, सहज खपून जाण्याजोगं एकमेव उत्तर म्हणजे वाचन.. ! त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण मी आत्ता प्रत्यक्ष अनुभवत होतो.
मग त्या घरमालकांच्या संवादातली एकेक गोष्ट उलगडायला लागली. उंची सागवान, एलईडी दिवे, टफन ग्लास, प्रोफाईल डोअर्स, फोटो येईल अशी चेअर सेटिंग… या सगळ्या गोष्टींची लिंक लागली.
आश्चर्य वाटलं, वाईट वाटलं आणि खरं सांगायचं तर कीव आली. पैसा ओतून सुसंस्कृत किंवा अभ्यासू असण्याचा आभास निर्माण करण्याचा जो रोग माणसाला जडतोय ना, त्याचं वर्णन चोखोबांनी शेकडो वर्षांपूर्वीच करुन ठेवलंय. “काय भुललासी वरलिया रंगा” असा त्यांचा अभंग जगद्विख्यात आहे.
पूर्वी “तो मी नव्हेच” असं दाखवण्यासाठी माणसं धडपड करायची. आता “असा मी असामी” असा आभास निर्माण करण्यासाठी धडपडतायत, याचं हे एक नवं उदाहरण अनुभवायला मिळालं. आपलं बाह्य रूप विकत घेता येतं, तशी आपली प्रतिमासुध्दा विकत घेण्याचा उद्योग कुठल्या स्तरावर गेला आहे, हे पाहिल्यावर मन ढवळून निघालं. रोज एक पुस्तक धरुन त्या बुक केससमोर खुर्चीत बसायचं आणि फोटो काढून सोशल मीडियावर पोष्टायचा, म्हणजे इमेज क्रिएट होईल ? वा रे लॉजिक.. !
“थ्री इडियट्स” मधला श्यामलदास छांछड आठवतो का? “वाट्टेल ते करा, पण या पोराला माझ्या मुलाच्या नावानं इंजिनियर करा. माझ्या मुलाच्या नावाची इंजिनिअरिंगची डिग्री या भिंतीवर लागली पाहिजे” असा दम देणारा श्रीमंत माणूस आठवला? तीन तासांच्या संपूर्ण सिनेमात हा तीस सेकंदांचा सीन आपण विसरुन जातो. पण वाट्टेल ते करुन स्वतःची प्रतिमा विकत घेण्याच्या मागं लागलेली माणसं सोशल मीडियाचं प्रस्थ वाढायला लागलं, तशी वाढतच चालली आहेत.
लोकांमध्ये, समाजात आपली ईमेज भव्यदिव्य दिसावी म्हणून लोकं काय काय करतात, याचे काही विचित्र नमुने पाहिले तर, कपाळावर हात मारुन घेण्याची वेळ येते. “मी अमुक अमुक दुकानातूनच भाजी घेते, अमुक अमुक ठिकाणाहूनच आंबे घेते”, इथपासून ते “अमुक अमुक देवालाच मी दर चतुर्थीला जातो” इथपर्यंत सगळ्या जगाला अभिमानानं सांगणारे कितीतरी लोक तुम्हाला दिसतील. “एकवीस हजार रुपये भरुन तिकीट काढून तिरुपतीचं स्पेशल दर्शन घेऊन आलो” असंही सांगणारे लोक आहेत आणि “दरवर्षी काहीही न खाता पिता एकवीस तास रांगेत उभारुन दर्शन घेतो” असंही सांगणारे लोक आहेत.
“आम्हीं अमुक ठिकाणचाच वडापाव खातो”, “मला तर दुसरी कुठली भेळ आवडतच नाही”, “मी एसी शिवाय तर प्रवासच करत नाही”, “मी आणि लाल डब्यातनं प्रवास? बापजन्मात शक्य नाही”, ” रेग्युलर ब्लड शुगर लेव्हल चेक करायला सुद्धा मी तिथं जात नाही, माणूसच घरी बोलावतो. त्याला सांगतो, शंभर रुपये जास्त घे पण तिथं बोलावू नकोस, मला जमणार नाही” असले अनेक तोरे मिरवणारे कितीतरी जण आहेत.
आपल्या गळ्यातली सोनसाखळी मुद्दाम दिसावी असा शर्ट घालणारी जशी माणसं आहेत, तशीच अमुक एखाद्या ग्रंथालयाची मेंबरशिप नुसतीच घेऊन ठेवणारीसुद्धा माणसं आहेत. त्यांना वाचनाचा छंद नसतो पण आपल्या गावातल्या सगळ्यात प्रतिष्ठित संस्थेचा मी सभासद आहे, हे सगळ्यांना सांगण्यातच त्यांना खरा रस असतो.
मध्यंतरी गुरुपौर्णिमेला आपल्या गुरुंचे पाय धुवायचे आणि पाय धुताना, फुलं वाहताना ढसाढसा रडतानाचे फोटो, व्हिडिओ काढून ते सोशल मीडियावर फिरवायचे, ही एक जबरदस्त ‘तथाकथित इमोशनल’ क्रेझ निर्माण झाली होती. अशी गुरुपूजनं गल्लोगल्लीचे फ्लेक्सजिवी करत सुटले होते. आनंदाच्या क्षणी ओक्साबोक्शी का रडायचं? याचं उत्तर मला अजूनही मिळालेलं नाही.
मी जसा आहे तसं दाखवणं कठीणच आहे, माझी ईमेज बिघडेल. म्हणून मग खोटी बेगडी ईमेज पैशाच्या जोरावर विकत घ्यायची, हा रोग बळावतोय. मग ते कपडे असोत, महागड्या वस्तू असोत किंवा मोठाली कर्जं काढून घेतलेल्या गोष्टी असोत.. पण आता छंद आणि आवडी निवडीसुध्दा विकत घेण्यापर्यंत माणसं पोचली ? आणि त्या ईमेज बिल्डिंग साठीसुध्दा स्पेशल कन्सल्टिंग सुरु झालंय? हे लोकांना आणखी खड्ड्यात घालणारं ठरेल.
छंद आणि व्यासंग हे आपल्या व्यक्तीमत्वाच्या खऱ्याखुऱ्या विकासासाठी असतात. आपलं व्यक्तिमत्त्व उत्तम व्हावं, चांगल्या गुणांचा विकास व्हावा, समाजात आपलं चांगलं स्थान निर्माण व्हावं, अशी इच्छा असणं मुळीच गैर नाही. पण त्यासाठी स्वतःला घडवावं लागतं आणि तसं घडण्यासाठी फार मनापासून, सातत्यानं कष्ट घ्यावे लागतात. ते विकत घेता येत नाही.
स्वतःची ईमेज बिल्ड व्हावी म्हणून कोणत्याही संतवर्यांनी साहित्य निर्मिती केली नाही. जगाला दाखवण्यासाठी म्हणून त्यांनी काही केलं नाही. अतिशय साधं, संतुलित, प्रामाणिक आणि समाज प्रबोधनाला वाहिलेलं आयुष्य अशीच त्यांची जीवनपद्धती होती. प्रसिद्धीच्या शिखरावर असूनसुद्धा त्यापासून सतत दूर राहणारी कित्येक माणसं असतात. वास्तविक त्यांच्याकडं ज्ञान असतं, वकूब असतो, यश असतं, कौशल्य असतं, पण तरीही ते त्याचं भांडवल करत नाहीत. स्वतःच्या यशाविषयी स्वतःहून एक अक्षर सांगत नाहीत, पुढं पुढं करत नाहीत, स्वतःचं प्रस्थ तयार करत नाहीत आणि लोकांनाही स्वतःविषयी असलं काही करु देत नाहीत. हाच तर त्यांचा सगळ्यात मोठा आणि त्यांच्याकडून आवर्जून घेण्यासारखा सद्गुण असतो.
डॉ. कलाम, स्व. बाबा आमटे, स्व. दाजीकाका गाडगीळ, स्व. श्रीनिवास खळे, उस्ताद बिस्मिल्ला खाँ साहेब, अत्यंत साधी राहणी असणारे स्व. मनोहर पर्रीकर अशी कितीतरी उदाहरणं देता येतील. ही माणसं त्यांच्या अंगच्या गुणांमुळेच लोकांसाठी प्रेरणास्थान बनली, आदर्श बनली. आदर्श होण्यासाठी म्हणून त्यांनी हेतुपूर्वक काही केलं नाही. स्वतःचं प्रस्थ तयार करणं त्यांना अशक्य नव्हतं. पण त्यांनी तो मार्ग जाणीवपूर्वक टाळला.
जसजशी आपली सोशल अकाउंट्स तयार झाली, तसतशी आपली इतरांना दाखवण्याची धडपड सुरू झाली. राहणीमान जगाला दाखवण्याचा पायंडा पडला. खरंखुरं जगण्यापेक्षा नसलेलं दाखवण्याची इच्छा मनात कायमची मुक्कामालाच येऊन राहिली. आणि तीच कृत्रिमता आता गळ्यापर्यंत आली आहे.
लोकांचे डोळे दिपवून टाकून मिळवलेला आनंद किंवा प्रतिष्ठा कशी आणि कितपत टिकेल ? आणि त्यासाठीच सतत जगत राहिलो तर खरं समाधान तरी कुठून मिळणार? खरं समाधान प्रत्यक्ष जगण्यातूनच मिळवायचं की केवळ त्याच्या आभासातच जगत राहायचं, हे आता आपणच ठरवायला हवं.
लोकांवर सतत इम्प्रेशन मारत बसण्याचा शौक कितीही गोड वाटत असला तरीही नंतर त्याची ओझी झेपण्यापलीकडं जातात. आणि ते नाटक फसलं की, खोटेपणा उघडा पडतोच. म्हणूनच, कृत्रिमतेच्या स्टिरॉइड्सचे न परवडणारे साईड इफेक्ट्स टाळायचे असतील तर, जगण्याचं हे शहाणपण जितक्या लवकर आत्मसात होईल, तितकं उत्तम.
मी वनिता आणि ही माझी रोजनिशी… रोजनिशी म्हणते कारण मला दुसरं नाव आठवत नाही. ही तारीखवार लिहिलेली रोजनिशी नाही. ज्या दिवशी लिहिण्यासारखं घडेल किंवा लिहावं असं मनात येईल त्या दिवशी लिहिलेली ही डायरी आहे.
वयाची पंचाहत्तरी जवळ यायला लागली आणि मनात विचार येऊ लागला की आता वानप्रस्थाश्रम सोडून संन्यासाश्रमाकडे वाटचाल सुरु करायला हवी. ह्याची पहिली जाणीव त्या दिवशी झाली.
दाराची बेल वाजली. दार उघडलं तर दारात सामान घेऊन वाणी उभा. मी म्हटलं, अरे, आम्ही तर यादी दिली नव्हती. तो म्हणाला, सकाळीच तर वहिनीसाहेब यादी देऊन गेल्या. तो सामान ठेवून निघून गेला. ही पहिली वेळ होती जेव्हा सुनेने माझ्याशी चर्चा न करता वाण्याला महिन्याच्या सामानाची यादी दिली होती. सामानातही खूप बदल झाला होता. गव्हाच्या ऐवजी तयार आट्याची पाकिटं आली होती. तेलही बदललं होतं. तुकडा बासमतीऐवजी अख्खा बासमती आला होता. त्या दिवशी ठरवलं, आता स्वयंपाकघराचा मोह सोडून तिथून बाहेर पडायचं. त्यात लुडबुड करायची नाही. बाहेर बसून भाजी निवडणं वगैरे एवढीच मदत करायची.
दुसऱ्या दिवशी रविवार होता. मुलगा म्हणाला, आई, उद्या आम्ही सर्व जण सिनेमाला जातो आहोत. तुझं पण तिकीट काढणार होतो, पण त्या थिएटरला पायऱ्या खूप आहेत. तुला त्रास होईल म्हणून तिकीट काढलं नाही. तो म्हणाला ते खरं होतं. अलीकडे पायऱ्या चढताना खूप दम लागायचा. त्या दिवसापासून जाणवलं, आता नाटक, सिनेमा ही मनोरंजनं बंद करायला हवीत. घरातच टीवी, फोन, वाचन ह्यात मन रमवायला हवं.
नात पार्टीला गेली होती. खूप उशीर झाला होता. एक वाजत आला होता. माझा डोळ्याला डोळा लागेना. तिची काळजी वाटत होती. तिचे आईवडील शांत होते. ती आल्या आल्या मी म्हटलं, अगं, किती उशीर! पण माझं वाक्य पूर्ण होण्यापूर्वीच ती म्हणाली, अगं आजी, मी आईबाबांना सांगून गेले होते मला उशीर होईल म्हणून. तू कशाला एवढी काळजी करतेस? तिच्या त्या ‘तू कशाला एवढी काळजी करतेस?’ ह्या वाक्याने मला जागं केलं. खरंच, तिची काळजी करायला तिचे आईवडील समर्थ आहेत. मी कोण तिची काळजी करणारी? माझा काय संबंध? त्या दिवसापासून ठरवलं, भावनांना आवर घालायचा. कशातच गुंतायचं नाही.
तुका म्हणे उगी राहावे। जे जे होईल ते ते पाहावे।
घरच्या आघाडीवर अशी हळूहळू निवृत्त होत असताना शरीरानेही वृद्धत्वाची जाणीव करून द्यायला सुरुवात केली होती. पहिला नंबर लावला पायांनी. जरा जास्त वेळ उभं राहिलं की पाय भरून यायला लागले. चालताना किंवा बसल्यावर एवढं जाणवत नव्हतं, पण उभं राहिलं की त्रास होत होता. शॉपिंगला किंवा कुठे समारंभाला गेलं तर चटकन कुठे बसायला जागा मिळते का ते बघायला लागले. हळूहळू शॉपिंग, समारंभ हे बंदच केलं. रस्त्यावरून चालण्याचा आत्मविश्वास कमीकमीच होत गेला. कोणीतरी बरोबर असावं असं वाटायला लागलं. आणि मग बाहेर जाण्यावर बंधनंच आली.
नंतर जाणीव करून दिली दातांनी. दात दुखत नव्हते, पण त्यांचे तुकडेच पडत होते. म्हणून डेंटिस्टकडे गेले. त्यांनी खालचे सर्व दात काढायला सांगितले. ते दात काढून नवीन बसवण्यात दोन महिने निघून गेले. हे दोन महिने खाण्याचे फार हाल झाले. अगदी खूप शिजवलेलं किंवा पातळ खाणंच खाता येत असे. त्याचा तब्येतीवरही परिणाम होत होता. कवळी बसवल्यानंतरही ती सेट होईपर्यंत खूप त्रास झाला. कवळी घातली की हिरड्या सोलवटायच्या. शेवटी एकदाची ती कवळी सेट झाली पण तेव्हापासून अन्नाची चवच गेली.
जास्त वेळ बसलं की पाठ आणि कंबर दुखायला लागली. ह्या साऱ्यामुळे माझं जगच आक्रसून गेलं. एरवी सगळीकडे बेधडक वावरणारी मी, पायाच्या दुखण्यामुळे शॉपिंग, समारंभ बंद झाले. एकटी जाण्याचा आत्मविश्वास कमी झाल्यामुळे रस्त्यावर जाणंच बंद झालं. मी आता कॉलनीतच फेऱ्या घालू लागले. पण तिथेही एक दिवस चालताना ठेच लागली आणि पडता पडता वाचले. त्यामुळे तोही आत्मविश्वास गमावला. खाली जायची भीती वाटायला लागली. शेवटी माझी खोली, माझा पलंग आणि मदतनीस ठेवलेली बाई एवढंच माझं संकुचित जग झालं. बाहेर कुठे जायची दगदग नकोशी वाटू लागली.
वृद्धत्व जवळ जवळ येत होतं पण त्यातही काही सोनेरी क्षण येतात जे मनाला उभारी देऊन जातात. मुलगा ऑफिसमधून लवकर घरी येतो. आल्यावर माझ्या खोलीत येतो. पलंगाजवळ खुर्ची घेऊन बसतो आणि माझी चौकशी करतो. आई तू बरी आहेस ना? गोळ्या नीट वेळेवर घेतेस ना? वेळच्या वेळी जेवत जा. व्यायाम कर. त्याचे हे प्रश्न अगदी साधे असतात पण त्यातल्या आपुलकीच्या स्पर्शाने माझं मन आनंदाने भरून येतं.
एक दिवस रात्री जेवताना सून म्हणते, आई, तुम्हाला पोळी चावताना त्रास होतो ना? मी रात्री तुमच्यासाठी घावन करत जाईन. चावायला सोपं आणि पचायलाही हलकं. तिची ही काळजी मनाला हळुवार स्पर्श करून जाते.
चष्मा लावून गोळ्यांची नावं वाचताना नात तिथे येते आणि म्हणते, आजी तुला गोळ्या रोज शोधाव्या लागतात ना? दर रविवारी मी आठवड्याच्या गोळ्यांच्या पुड्या करून ठेवत जाईन. हिरव्या पुडीतल्या गोळ्या सकाळी लाल पुडीतल्या रात्री घ्यायच्या. ते तुला सोपं होऊन जाईल. गोष्ट साधीशीच पण मन भरून येणारी.
नातवाचा वाढदिवस दुसऱ्या दिवशी असतो. तो म्हणतो, आजी! तुझा शिरा खूप सुंदर होतो. उद्या माझे मित्र येणार आहेत. तू शिरा करशील? दुसऱ्या दिवशी जास्त वेळ उभं न राहता येणाऱ्या माझ्या अंगात दहा हत्तीचं बळ संचारतं आणि मी शिरा करते. तो कसा झाला ह्यापेक्षा नातवाने करायला सांगितलं ह्याचाच आनंद फार मोठा असतो.
मार्केटमधून येताना सून तीन गाऊन्स घेऊन येते. म्हणाते आता घरात साडी नका नेसत जाऊ. पायात येते. पडायला होईल. घरात हे गाऊन्स घालत जा. घालायला सोपे आणि सुटसुटीत. तिने दाखवलेली काळजी मनाला भिडते.
एका रविवारी मुलगा म्हणतो, आई तू घराबाहेर जाऊ शकत नाहीस. आज आपण लॉंग ड्राईवला जाऊ या. तुलाही बाहेर पडल्यावर बरं वाटेल. आम्ही सगळेच बाहेर पडतो. खूप दिवसांनी भेटलेला बाहेरचा निसर्ग मनात भरून घ्यावासा वाटतो.
अश्या आंबटगोड आठवणी जागवताना मनात येतं, खरंच आता किती थोड्या अपेक्षा उरल्या आहेत. घरातल्या कोणीतरी रोज खोलीत येऊन आपुलकीने फक्त कशी आहेस असं विचारावं. सुनेने रोजचं जेवणाचं ताट मदतनीस बाईबरोबर न पाठवता एखाद दिवशी स्वतः घेऊन यावं. जवळ बसावं. चार गोष्टी बोलाव्यात. नातवंडानी वेळ मिळेल तेव्हा जवळ बसून तुटलेल्या बाहेरच्या जगातल्या चार गोष्टी सांगाव्यात. आजारी पडल्यावर कोणी तरी येऊन कपाळावर नुसता हात ठेवावा.
सांजवेळ ही हुरहूर लावणारी असते. आयुष्याची सांजवेळही अशीच हुरहूर लावते. गतायुष्यात केलेल्या चुका आठवून देणारी, छोट्याश्या अपेक्षा पूर्ण व्हाव्यात असं वाटायला लावणारी…
… अशी ही सांजवेळ.
लेखिका : शैलजा दांडेकर
प्रस्तुती : उज्ज्वला केळकर
संपर्क –17 16/2 ‘गायत्री’ प्लॉट नं. 12, वसंत दादा साखर कामगारभावन के पास , सांगली 416416 महाराष्ट्र
मित्रहो, माझे गाव बदनापूर. आता जालना जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असले तरी पन्नास साठ वर्षांपूर्वी औरंगाबाद जिल्ह्यातील आणि जालना तालुक्यातील एक छोटेसे खेडे होते. मी बदनापूरच्या शाळेमध्ये दुसऱ्या किंवा तिसऱ्या इयत्तेत असतांना आम्हाला बहुदा भूगोलाच्या पुस्तकात एक धडा होता. त्यात बदनापूर हे कृषी संशोधन केंद्र असलेले महत्त्वाचे गाव असल्याचा उल्लेख होता. तसेच जालना हे मोठे व्यापारी शहर असल्याचाही उल्लेख होता. बदनापूर आणि जालन्यामध्ये केवळ एकोणीस किलोमीटरचे अंतर. जणू घर अंगणच.
मी मार्च १९६६ मध्ये बदनापूरच्या जि. प. प्रशालेतून पहिल्या श्रेणीत एस. एस. सी. उत्तीर्ण झाल्यावर जालन्याच्या जे. ई. एस महाविद्यालयात पी. यू. सी. सायन्सला प्रवेश घेतला आणि माझा आणि आगगाडीचा संबंध सुरु झाला. पी. यु. सी. पासून बी एस्सी {स्पेशल फिजिक्स } ची पदवी मिळेपर्यंत सलग चार वर्षे बदनापूर ते जालना नियमितपणे रेल्वेने जाणे येणे केले. सकाळी सात वाजून पाच मिनिटांनी बदनापूरच्या स्टेशनवर येण्याची पॅसेंजर ट्रेनची वेळ असे. बहुदा ती वेळेवरच येत असे. तसेच सायंकाळी ५. २०ला जालन्याहून परतीची गाडी {पूर्णा ते मनमाड पॅसेंजर} होती. तीसुद्धा वेळेवरच येत असे. त्या चार वर्षांच्या काळातील रेल्वेविषयीच्या अनेक आठवणी हृदयाच्या कोपऱ्यात साठवून ठेवलेल्या आहेत. त्यातल्या फक्त दोन आठवणी इथे सांगतो.
बदनापूर ते जालना विद्यार्थ्यांसाठीचा सवलतीच्या दरातील मासिक पास चार रुपये तर त्रैमासिक पास दहा रुपये होता. त्यासंबंधीच्या प्रमाणपत्रांचे पुस्तक दक्षिण मध्य रेल्वेच्या सिकंदराबाद कार्यालयाकडून
कॉलेजला येत असे. कॉलेजकडून प्रमाणपत्र घेऊन रेल्वे स्टेशनवर दिले की सवलतीच्या दरात विद्यार्थ्यांना पास मिळत असे. बहुतेक मी बी. एस्सी प्रथम वर्षाला असतांना रेल्वेने भाडेवाढ केली होती. ती बातमी त्या काळातील ‘अजिंठा’ आणि ‘मराठवाडा’ या लोकप्रिय असलेल्या वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झाली होती. त्या बातमीत स्पष्ट लिहिलेले होते की, रेल्वेची भाडेवाढ झालेली असली तरी विद्यार्थ्यांच्या सवलतीच्या पासमध्ये कुठलीही वाढ करण्यात आलेली नाही. परन्तु नंतरच्या आठवड्यात माझा पास संपला म्हणून मी कॉलेजमधून जालन्याच्या रेल्वे स्टेशनवर आलो आणि तिकीट खिडकीपाशी जाऊन दहा रुपये आणि कॉलेजचे प्रमाणपत्र देऊन त्रैमासिक पास मागितला. तर तिथल्या बुकिंग क्लार्कने बारा रुपये मागितले. मी म्हटलं, “ बारा रुपये कसे? दहा बरोबर आहेत. “.. तर तो म्हणाला, “पेपर पढते नही क्या? अभी रेल्वे फेअर बढ गया है. ”
मी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की, विद्यार्थ्यांच्या कन्सेशनमध्ये फरक पडलेला नाही. तरी तो ऐकेना. शेवटी अनिच्छेने मी बारा रुपये देऊन पास घेतला. पण मन बेचैन होते. बदनापूरला आल्यावर लगेच “वाचकाचे मनोगत” या सदरासाठी अजिंठा या वर्तमानपत्राला पत्र लिहिले. त्यात रेल्वेच्या भाडेवाढीसंबंधी मागच्या आठवड्यात आलेल्या बातमीचा उल्लेख केला. तसेच माझ्याकडून जालन्याच्या बुकिंग क्लार्कने दोन रुपये जास्त घेतल्याचाही उल्लेख केला आणि ते पत्र पोस्टाच्या पेटीत नेऊन टाकले.
दोन दिवसांनी रविवार होता. त्या रविवारी माझ्या मोडक्या तोडक्या इंग्रजी भाषेत रेल्वेच्या सिकंदराबाद कार्यालयास पत्र लिहून वस्तुस्थिती कथन केली आणि ते पत्र पोस्टाच्या पेटीत टाकले.
आश्चर्य म्हणजे ‘दैनिक अजिंठा या वर्तमानपत्रास पाठवलेले माझे पत्र तीन चार दिवसांनी अजिंठा पेपरमध्ये छापून आले. विशेष म्हणजे माझ्या पत्राखाली संपादकांनी टीप लिहून स्पष्ट केले की, ” विद्यार्थ्यांच्या पासच्या दरात कुठलीही वाढ झालेली नाही, याची आम्ही औरंगाबादच्या स्टेशनमास्तरकडून पुष्टी करून घेतली. ” मला ते माझे प्रसिद्ध झालेले पत्र वाचून खूप आनंद झाला.
पुढचा आश्चर्याचा धक्का म्हणजे, दोन दिवसांनी रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्याचे पत्र ‘अजिंठा’मध्ये त्याच कॉलममध्ये प्रसिद्ध झाले. त्या पत्राचा आशय असा. ” गैरसमजुतीतून जालन्याच्या रेल्वे स्टेशनवरील क्लार्कने दोन रुपये जास्त घेतलेले आहेत. तरी संबंधित विद्यार्थ्याने स्टेशनवर जाऊन दोन रुपये परत घ्यावेत. ”
मग मी तो पेपर दाखवून जालन्याच्या स्टेशनवरच्या बुकिंग क्लार्ककडून दोन रुपये परत घेतले. त्यानेही दिलगिरी व्यक्त केली. पुढच्या आठवड्यात “रेल निलायम सिकंदराबाद”कडून माझ्या बदनापूरच्या पत्त्यावर तशाच आशयाचे इंग्रजी पत्र आले, तेव्हा तर माझा आनंद गगनात मावेना….. आज दोन रुपयांचे इतके महत्त्व वाटत नसले तरी पंचावन्न वर्षांपूर्वी त्या दोन रुपयांचे काय महत्त्व असेल हे आपण समजू शकतो.
रेल्वेसंबंधीची दुसरी आठवण म्हणजे, एक दिवस कॉलेजमध्ये जास्त वेळ थांबावे लागल्यामुळे सायंकाळी सहा वाजता जालना स्टेशनवर आलो. ५. २० ची गाडी अर्थातच गेलेली होती. आता यानंतरची पॅसेंजर ट्रेन रात्री साडेआठ वाजता होती. ती काचीगुड्याहून यायची. पण तिचा लौकिक असा होता की, ती नेहमी दोन तासांपेक्षा जास्त लेट असायची. त्या दिवशी ती तीन तास लेट होती. म्हणजे गाडी रात्री साडेअकरा वाजता येण्याची शक्यता होती. मी स्टेशनवर तिकीट खिडकीच्या समोर बाकावर बसून राहिलो. पोटात काही नव्हते. रात्री नऊ वाजेनंतर झोप येऊ लागली. कारण रोज सकाळी जालन्याला येण्यासाठी पाच वाजताच उठावे लागे. {आई मात्र मला डबा तयार करून देण्यासाठी चार वाजताच उठायची.}
एव्हाना स्टेशनवरची गर्दी बरीच कमी झाली होती. कारण त्यादरम्यान कुठलीच गाडी येणार नव्हती. मी मनात विचार केला, “आपली गाडी साडेअकरा वाजता येईल. तोपर्यंत थोडी झोप होईल. “
म्हणून मी तिथेच बाकावर आडवा झालो. जेव्हा जाग आली तेव्हा पहाटेचे पाच वाजले होते. पोटात धस्स झाले. आई घरी वाट पहात असेल या विचाराने आणखी त्रस्त झालो. आता काय करायचे? हा विचार करीत असतांना लक्षात आले की, स्टेशनजवळच अगदी पाच मिनिटांच्या अंतरावर बस डेपो आहे. तिथून पहाटे साडेपाच वाजता जालना ते मालेगाव बस निघते. मी पटकन तिथे चालत गेलो. तर बस उभीच होती. पण निघायला वेळ असल्यामुळे ड्रायव्हर, कंडक्टर कुणीच नव्हते. दोन तीन लोक बसमध्ये बसलेले होते. मीसुद्धा आत जाऊन बसलो. कंडक्टर आल्यावर तिकिटाचा सव्वा रुपया देऊन बदनापूरचे तिकीट घेतले. थोड्या वेळेत बस सुटली आणि बदनापूरला सकाळी सहा वाजता पोचलो. आई नेहमीप्रमाणे चार वाजता उठलेली होती आणि माझ्या वाटेकडे डोळे लावून बसली होती. मला बघताच आईने आधी माझ्या तोंडावरून मायेने हात फिरवला आणि नंतर विचारपूस केली.
☆ मला कमालच वाटते देवाची, आणि दैवाचीही… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजिरी येडूरकर ☆
एकाच वर्षी, एकाच महिन्यात, एकाच दिवशी… दोन बाळं जन्माला आली. एक महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात, तर दुसरं पार तिथे उत्तर प्रदेशातील निझामाबादेत. एकाचा जन्म हिंदू कुळातील… तर दुसर्याचा जन्म मुस्लिम घराण्यातला.
पण अखेर आपापल्या उमेदीच्या काळात, दोघेही कार्यरत झाले ते मात्र एकाच क्षेत्रात. एकाने मराठी चित्रपटसृष्टी गाजवून सोडली, तर दुसर्याने हिंदी चित्रपटसृष्टी दणाणून. एकाला आद्य ‘वाल्मिकी’ म्हणून ओळखत लोक, तर दुसर्याला इस जमानेका ‘गालिब’. खोर्याने गीतं लिहिली दोघांनीही, अगदी आपापल्या शेवटच्या श्वासापर्यंत.
अर्थातच एक गेला, ह्या इहलोकीची यात्रा संंपवून अंमळ लवकरच… आणि त्या दुसर्याने माझ्याही पिढीची, तरुणाई धुंद करून सोडली. म्हणजे बघा ना… ‘पहेला नशा पहेला खुमार.. नया प्यार है नया इंतेजार’ लिहितेवेळी, हे जुनं खोड पंच्याहत्तरच्या आसपास होतं.
तर… एका प्रतिभावानाने लिहिलं होतं…
‘तुझ्यावाचूनीही रात जात नाही
जवळी जरा ये हळू बोल काही
हात चांदण्यांचा घेई उशाला
अपराध माझा असा काय झाला’
आणि दुसर्याने लिहिलं होतं…
‘रातकली एक ख्वाब में आई
और गले का हार हुई
सुबह को जब हम नींद सें जागे
आँख तुम्ही सें चार हुई’
म्हणजे ही दोन गाणी अनुक्रमे ‘मुंबईचा जावई’ आणि, ‘बुढ्ढा मिल गया’ ह्या चित्रपटांतली. हे दोन्ही चित्रपट आले तेव्हा, ह्या दोघांनीही वयाची पन्नाशी ओलांडलेली. आणि असे अगणीत चमत्कार उतरलेयत ह्या दोघांच्या सिद्धहस्त लेखणीतून, स्वतःच्या त्या त्या वेळच्या वयाला न जुमानता.
हेच बघा वानगीदाखल…
‘सुटली वेणी, केस मोकळे
धूळ उडाली, भरले डोळे
काजळ गाली सहज ओघळे
या सार्याचा उद्या गोकुळी होइल अर्थ निराळा
झुलवू नको हिंदोळा’
आणि…
‘ये है रेशमी ज़ुल्फों का अँधेरा
न घबराइए
जहाँ तक महक है मेरे गेसुओं की
चले आइये’
आहाहा ! रोमान्सनी काठोकाठ भरलीयेत ही दोन्ही गाणी. पण तरीही अगदी कणभरानेही व्हल्गर नसल्यामुळेच, एका स्त्रीच्या तोंडीही खुलून येतांना दिसतात.
बरं नायिकाच नाही… तर ह्या दोघांच्याही शब्दांच्या पायघडीवरुन चालणारा नायकही, अगदी ओतप्रोत भरलेला आहे प्रेमभावनेनी. आणि तरीही… ती आत्यंतिक संयतपणे व्यक्त करणाराही आहे तो.
एकाचा नायक म्हणतो…
‘अनादी चंद्र अंबरी, अनादी धुंद यामिनी
यौवनात तू नवी मदीय प्रीत-स्वामिनी
घर न प्रीतकुंज हा, बैस ये सुहासिनी
नविन आज चंद्रमा’
दुसर्याचा नायक म्हणतो…
‘जब तलक ना ये तेरे रसके भरे होठों से मिलें
यूँ ही आवारा फिरेगा ये तेरी ज़ुल्फ़ों के तले
गाए जाऊँगा वही गीत मैं तेरे लिए
जलते हैं जिसके लिये’
तर… १ ऑक्टोबर, ह्या दोघांचा जन्मदिन. आणि दोघांचं जन्मवर्षही एकच… १९१९. काय म्हणावा हा दैवी योगायोग……
#ग_दि_माडगुळकर
#मजरुह_सुलतानपुरी
… आपापल्या आकाशात… स्वयंतेजाने तळपलेल्या ह्या दोन्ही सूर्यांना, मनःपूर्वक अभिवादनाचं ओंजळभर अर्ध्य.
☆
लेखक : अज्ञात
प्रस्तुती – सौ.मंजिरी येडूरकर
लेखिका व कवयित्री, मो – 9421096611
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈