मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ साडी म्हणोनी कोणी – लेखिका : सौ. क्षमा एरंडे ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता सुहास पंडित ☆

सौ. स्मिता सुहास पंडित

⭐ मनमंजुषेतून ⭐

☆ साडी म्हणोनी कोणी – लेखिका : सौ. क्षमा एरंडे ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता सुहास पंडित ☆

“ मावशी, उद्या कॉलेज मध्ये साडी डे‌ आहे, मी तुझी पैठणी नेसणार आहे चालेल ना तुला?”

“अगं चालेल काय पळेल, पण ब्लाऊज…… “,

“don’t worry मावशी I will manage”… ‘इती केतकी’,

एक बरं आहे या जनरेशनचे, त्यांच्याकडे सर्व पर्याय उपलब्ध असतात. केतकी येईलच इतक्यात…… पैठण्या पण दोन तीन त्यातली तिला कोणती आवडेल… जाऊ देत तिन्ही तिच्यासमोर ठेवाव्यात, आवडेल ती नेसेल. आपण पैठणी नेसून किती वर्ष, महिने झालेत आठवायलाच हवे.

कपाट उघडले तसा कपाटातून आवाज येऊ लागला. कोणी तरी आपापसात बोलत आहेत असा मला भास झाला.

“अगं मला नेस मला नेस, ” आवाजाच्या दिशेने पाहते तर‌, हॅंगर जोरदार हेलकावे घेत होते. नारायणपेठी हलल्यासारखी वाटली,

“ए तू बाजूला हो गं, ” नारायण पेठीला कोणीतरी दूर लोटले. तशी ती पटकन बाजूला झाली.

“बायकांना माहेरचा खूप खूप अभिमान असतो असं ऐकलं होतं, पण छे:, गेली वीस वर्षे मी बाहेरचं जग पाहिलं नाहीये. वीस वर्षांपूर्वी ‘सौरभच्या’ मुंजीसाठी, ‘माहेरची (पांढरी) साडी’, हवी म्हणून खास गर्भरेशमीची फर्माईश होती.. येतयं का काही लक्षात, बघ बघ जरा माझ्याकडे”.. बिचारी पांढरी साडी विरविरली.

‘अगं बाई खरंच की’, माझे मलाच वाईट वाटले.

आता सौरभचे लग्न ठरत आलयं. खरंच वीस वर्ष झाली आपण कसे काय विसरलो माहेरच्या साडीला. साडीला चुचकारले, आईची आठवण आली, क्षणभर गलबलल्या सारखे झाले.

“आम्ही पण कपाटात आहोत बरं का, तुझ्या लक्षात तरी आहे का, ‘बरोबर-बरोबर, आम्ही आता काकूबाई झालो ना., ‘अहो’ इंदोरला गेले होते, अहोंना किती instructions दिल्या होत्यास, डाळिंबी रंगच हवा, काठ सोनेरीच हवेत. सुरुवातीला नेसलीस, आता आम्ही बसलोय मागच्या रांगेत.. “ प्रेमाने मी इंदूरीवरून हात फिरवला. तशी ती आक्रसून गेली..

“माझ्याकडे बघता का जरा मी तर अजून गुलाबी कागदात तशीच आहे गुंडाळलेली”… अगं बाई खरंच वास्तूशांतीची आलेली, त्यालाही पाच वर्ष झाली.. मला तो रंग आवडला नव्हता, मग ती पिशवीत तशीच राहिली, नवी कोरी.. ” 

“मी कित्ती लकी आहे, डिझायनर बाईसाहेब पुटपुटल्या. “.. खरंच होतं तिचे.. पण, त्यातली मुख्य मेख तिला कुठं माहिती होती… तेवढा ‘एकमेव’ ब्लाऊज मला अंगासरशी बसत होता.

तेवढ्यात, शिफॉन बाईंनी लगेच तिला टाळी मागीतली,

“अगं मी नेसले ना की बाईसाहेब बारीक दिसतात, मग कायं, आमचा नंबर ब-याचदा लागतो बरंका…. “

कपाटातल्या साड्यांची सळसळ जरा जास्तच होवू लागली. पटकन कपाटाचे दार लावून टाकले.

आतल्या कांजीवरम, इरकलं कलकत्ता, पोचमपल्ली, ऑरगंडी, पुणेरी.. सगळ्यांची एकमेकींच्यात चाललेली कुजबूज बाहेर मला स्पष्ट ऐकू येत होती. प्रत्येकीची आपली आपली कहाणी होती. त्या कहाणीचे रूपांतर आता रडकथेत झाले होते आणि याला सर्वस्वी मीच जबाबदार होते..

बाहेर येऊन पहिलं गटागटा पाणी प्यायलं. खरंच मोजायला गेले असते तर ‘सेन्च्युरी’ नक्की मारली असती साड्यांनी. पण नाही नेसवत आता. काही जरीच्या साड्या जड पडतात. आताशा पंजाबी ड्रेसच बरे वाटू लागलेत. वावरायला सोप्पं पडतं ना. कपाटातल्या डझनभर साड्या मिळालेल्याच आहेत, तिथं आपल्याला choice थोडाच असतो. प्रेमापोटी मिळालेल्या, काही सरकवलेल्या(म्हणजे घडी बदल, इकडून तिकडे)मग काय नगाला नग, कपाट ओसंडून वाहणार नाही तर काय… सगळ्यांना सांगून दमले, आता काही देत जाऊ नका, साडी तर नकोच नको… पण…

असो…..

आता मात्र मनाशी पक्की खूणगाठ बांधली, जास्तीत जास्त वेळा साडीच नेसायची आणि हो, त्याच्यावरचे ब्लाऊज होण्यासाठी ‘१ तारीख आणि सोमवार’ ज्या महिन्यापासून येईल तेव्हा पासून जिम चालू करायचे..

मनावरचा ताण एकदम हलका झाला.

‘केतकी’ साठी पैठणीसोबत अजून दोन चार साड्या काढून ठेवल्या, तेवढीच हवा लागेल त्यांना.

खरं तर ‘साडी’ नेसणे‌ हीच समस्त महिला वर्गाची दुखरी नस‌ असावी…….

… हव्या हव्याश्या‌ तर वाटतात.. पण……

लेखिका : सौ क्षमा एरंडे

प्रस्तुती : सौ. स्मिता सुहास पंडित 

सांगली – ४१६ ४१६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ स्मृतिगंध — लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? मनमंजुषेतून ?

☆ मोठ्या मनाचा छोटा सेल्समन ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

४ ) मनमंजुषा —

 “ स्मृतिगंध “ लेखक : अज्ञात प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले

स्मृतिगंध…..

 

मला आठवतंय,…

खूप मोठं होईपर्यंत आम्ही लहानच होतो !

सगळंच स्वस्त होतं तेव्हा, बालपण सुद्धा….

भरपूर उपभोगलं त्यामुळे…. उन्हापावसात, मातीत, दगडात, घराच्या अंगणात, गावाबाहेरच्या मैदानात… कुठेही गेलं तरी बालपणाची हरित तृणांची मखमल सर्वत्र पसरलेली असायची…

 

आता तसं नाही…

लहानपणीच खूप मोठी होतात मुलं ! 

खूप महाग झालंय बालपण…. !

 

पूर्वी आईसुद्धा खूप स्वस्त होती,

फुल टाईम ‘ आईच ‘ असायची तेव्हा ती…… !

 आम्हाला सकाळी झोपेतून उठवण्यापासून ते रात्री कुशीत घेऊन झोपवण्यापर्यंत सगळीकडे आईच आई असायची….

 

आता ‘मम्मी’ थोडी महाग झालीय 

जॉबला जातेयं हल्ली. संडेलाच अव्हेलेबल असते…. ! 

 

मामा चे गाव तर राहिलच नाही….

मामा ने सर्वाना मामाच बनवल….

प्रेमळ मामा आणि मामी आता राहिलेच नाहीत पूर्वीसारखे….

आधी मामा भाच्यांची वाट पहायचे….

आता सर्वाना कोणी नकोसे झालाय….

 हा परिस्थितीचा दोष आहे…

 

मित्र सुद्धा खूप स्वस्त होते तेव्हा…

हाताची दोन बोटं त्याच्या बोटांवर टेकवून नुसतं बट्टी म्हटलं की कायमची दोस्ती होऊन जायची…. शाळेच्या चड्डीत खोचलेला पांढरा सदरा बाहेर काढून त्यात ऑरेंज गोळी गुंडाळायची आणि दाताने तोडून अर्धी अर्धी वाटून खाल्ली की झाली पार्टी… !!!

 

आता मात्र घरातूनच वॉर्निंग असते,

“डोन्ट शेअर युअर टिफिन हं !” 

मैत्री बरीच महाग झालीय आता.

 

हेल्थला आरोग्य म्हणण्याचे दिवस होते ते…. !!! 

 

सायकलचा फाटका टायर आणि बांबूची हातभर काठी एवढ्या भांडवलावर अख्ख्या गावाला धावत फेरी घालताना तब्येत खूप स्वस्तात मस्त होत होती…..

 

घट्ट कापडी बॉलने आप्पाधाप्पी खेळताना पाठ इतकी स्वस्तात कडक झाली की पुढे कशीही परिस्थिती आली तरी कधी वाकली नाही ही पाठ…

इम्युनिटी बूस्टर औषधं हल्ली खूपच महाग झालीत म्हणे…. !!!

 

ज्ञान, शिक्षण वगैरे सुद्धा किती स्वस्त होतं…..

फक्त वरच्या वर्गातल्या मुलाशी सेटिंग लावलं की वार्षिक परीक्षेनंतर त्याची पुस्तकं निम्म्या किंमतीत मिळून जायची…..

वह्यांची उरलेली कोरी पानं काढून त्यातून एक रफ वही तर फुकटात तयार व्हायची….

 

आता मात्र पाटीची जागा टॅबने घेतलीय,

ऑनलाईन शिक्षण परवडत नाही आज !

 

एवढंच काय, तेव्हाचे 

आमचे संसार सुद्धा किती स्वस्तात पार पडले….

शंभर रुपये भाडं भरलं की महिनाभर बिनघोर व्हायचो…

सकाळी फोडणीचाभात/पोळी किंवा भात आणि मस्त चहा असा नाष्टा करून ऑफिसमध्ये जायचं, जेवणाच्या सुट्टीत (तेव्हा लंच ब्रेक नव्हता) डब्यातली भेंडी/बटाटा/गवारीची कोरडी भाजी, पोळी आणि फार तर एक लोणच्याची फोड… !!

 रात्री गरम खिचडी, की झाला संसार…

 ना बायको कधी काही मागायची ना पोरं तोंड उघडायची हिंमत करायची…..

 

आज सगळंच विचित्र दिसतंय भोवतीनं…. !! 

Live-in पासून ते Divorce, Suicide पर्यंत बातम्या बघतोय आपण…. , मुलं बोर्डिंगमधेच वाढतायत, सगळं जगणंच महाग झालेलं….. !! 

 

काल परवा पर्यंत मरण तरी स्वस्त होतं…..

पण आता….

 तेही आठ दहा लाखांचं बिल झाल्याशिवाय येईनासं झालंय….

 

म्हणून म्हणतोय… जीव आहे तोवर भेटत रहायचं.. आहोत तोवर आठवत रहायचं……

नाहीतर आठवणीत ठेवायला सुद्धा कोणी नसणार…. ही जाणीव पण झाली तर रडत बसण्याशिवाय दुसरा पर्याय नसेल हो..

म्हणून जमेल तेवढे नातेवाईक किंवा मित्र गोळा करून ठेवा….

नाहीतरी ह्या स्मृतीगंधा शिवाय आहे काय आपल्याजवळ.. हो ना….. !!!

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती – डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ जे जे आपणासी ठावे… लेखिका : सुश्री स्नेहल अखिला अन्वित ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

??

☆ जे जे आपणासी ठावे… लेखिका : सुश्री स्नेहल अखिला अन्वित ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला केळकर ☆

|| जे जे आपणासी ठावे ते ते इतरांसी सांगावे 

शहाणे करून सोडावे सकल जन ||

…. समर्थ रामदासस्वामींच्या आज्ञेनुसार काही दिवसांपूर्वी, मी दिसेल त्याला, भेटेल त्याला शहाणं करून सोडायचं चंग बांधला होता.

तर एक्झॕक्टमधे झालं काय होतं, मला साधारण पंधरा दिवसांपूर्वी प्रचंड खोकल्याने झोडपलं होतं. अन् आमचा खोकला म्हणजे खानदानी, काही झालं तरी महिना भरल्याशिवाय नरडं सोडणार नाही. मी घरातली होती नव्हती तेवढी सगळी औषधं ढसाढसा ढोसली, तरी मेला जाईना. मग मी आमच्या डॉक्टरीणबाईकडं व्हिजिट दिली… एका व्हिजिटीत तो गेला नाही म्हणून आणखी दुसऱ्यांदा दिली. पण दळभद्री खोकला जळूसारखा चिकटूनच राहिला.

मी लागोपाठ तीन रात्री टक्क जागी होते. म्हणून चौथ्या रात्री मी माझ्या उशा-पायथ्याशी खोकल्याशी लढण्याची जंगी तयारी करून ठेवली. पाण्याची बाटली, एका वाटीत चाटण, दुसरीत खडीसाखर, तिसरीत दालचिनी, चौथीत लवंग आणि लागली तर चपटी (इथे औषधाच्या बाटलीस ‘चपटी’ असे उपनाम देण्यात आले आहे, वाचकांनी नसते गैरसमज करून माझे चारित्र्यहनन करण्याची व्यर्थ खटपट करू नये) इतका सगळा जामानिमा तयार ठेऊन मोबाईलवर खोकला पळवण्याचे आणखी बारा घरगुती जालीम उपायही नजरेखालून घालवत बसले होते.

उपाय वाचून दम लागला म्हणून हळूच यू टयूबवर गेले तर त्यांच्या शॉर्ट्स मधे एक बाई समोर आली, अन् तिने अॕक्युप्रेशरद्वारे खोकला बंद करायची क्लृप्ती दाखवली… तळहातावर तेल लावायचे, आणि अंगठ्याच्या खाली मसाज करायचा अन् तळहाताच्या मागचा एक पॉइंट दाबायचा. दोन्ही हातांवर याचा प्रयोग करायचा. मी ते हुबेहूब तसच्या तसं केलं, आणि आडवी झाले.

वाचकहो, मला एकदाही खsक करून सुध्दा खोकला आला नाही. तो गेला तो गेला तो गेलाच ! 

जन्मात पहिल्यांदा माझा खोकला चुटुकन् गेला होता.

मैं तो सारा दिन खुशी के मारे उडी मार मारके थक गयी भाईशाब !

मग नंतरच्या दिवशी आमच्या ताई खोकल्याने हैराण दिसल्या, मी त्यांना तो उपाय अगदी फुकटात सांगितला. वरून ती बाई देखील पाठवली. त्यांच्या हृदयात आशेचा काजवा लखलखला.

मग दूरच्या जवळच्या समस्त नातेवाईकांना फोनवर कळवून टाकलं. पुस्ती म्हणून त्या बाईलाही त्यांच्याकडे ढकलून दिलं.

मग आम्ही मधे नाही का वणवण भटकत होतो, त्यावेळी ज्या दुकानात साडी घेतली, तिथे मिनिटामिनिटाला खाॕsक खाॕsक करून साडी खरेदीत व्यक्त्यय आणणाऱ्या दुकानदारीण बाईला सुध्दा मी प्रात्यक्षिक दाखवलं अन् त्याबद्दल तिने साडीवर तब्बल तेवीस रुपयांची भरघोस सूट दिली.

वाटेत माझा मित्र त्याच्याच बायकोबरोबर भेटला अन् केवळ खोकल्यासाठी दवाखान्याची पायरी चढणार म्हटल्यावर तिथल्या तिथे मी त्यांची वाट अडवून त्या अॕक्युप्रेशरद्वारे स्पेशालिस्ट बाईला त्यांच्याकडे धाडून टाकलं. मी त्यांचे साधारण रुपये पाचशे खडेखडे वाचवल्याबद्दल त्यांनी पिशवीतलं एक संत्र देऊन माझे ओलेत्या डोळ्यांनी आभार मानले.

दररोज सकाळ-सकाळी मुलाच्या शाळेच्या निमित्ताने आमच्या सोसायटीची साफसफाई करणाऱ्या भैयाभाऊंना माझ्या दर्शनाचा लाभ होतो. मला बघून बरेचदा देखो ना भाभीsss असा सूर लावून ते आमच्या सोसायटीवाल्यांची कुरबुर सांगत असतात. अशाच एका शुभ्र सकाळी भैयाभाऊंना माझ्या समोर खोकल्याची ढास लागली अन् मी तिथल्या तिथे ऐसा तळहात लेनेका और तेल लेके दुसरे हातसे कैसे मळनेका वगैरे शिस्तीत समजावून सांगितलं…..

‘हा हा समज गया भाभीजी! जैसा तंबाखू मे चुना लगाता है वैसाच ना? ‘

किती पटकन त्याला क्लिक झालं अन् तोपर्यंत मी इतरांना घसा फुगेपर्यंत तासभर समजावून सांगत फिरत होते.

त्या कालावधीत मला जो भेटेल आणि खोकेल त्याला मी त्या बाईची थोरवी पटवून देत होते.

शेवटी नवरा वैतागून म्हणाला, बाssई तू नाक्यावर जाऊन उभी रहा भोsपू घेऊन!

मुलगी म्हणाली, मम्मी तू एक भाड्याची रिक्षा करून त्यात स्पीकर लावून गल्लीबोळातून मार्गदर्शन करत का फिरत नाहीस? जास्त टार्गेट अचीव्ह होईल तुझं!

पोरगा म्हणाला, गल्लीबोळात फिरायला पप्पाची बाईकच‌ जास्त बरी पडेल!

परंतु नवऱ्याने स्पष्ट नकार दिल्याने ती योजना तिथल्यातिथे रद्द झाली.

तर समस्त जणांचा खोकला पळवून लावावा, या एकाच ध्येयाने प्रेरित होऊन मधल्या कालावधीत मी माझ्या तोंडाचा पार किस पडला.

मात्र आता माझ्याच गेलेल्या खोकल्याने परत यू टर्न मारलाय आणि चार दिवसांपासून मी त्या अदृश्य तंबाखूला चुना लावून तळहातावर चोळ चोळ चोळतीये. दोन्ही हातावर रगडून रगडून आणि त्याच्यामागचा पॉइंट दाबून दाबून त्यातून आता कळा मारायला लागल्यात तरी तो खोकला हाय तिथ्थच हाय.

शेवटी काल मीच डॉक्टरांची पायरी चढून आले वाचकहो!

त्यातून ते ‘सकल जन’ आता माझ्या नावाने बोंबटया मारत बसलेत. काहींनी तर त्या बाईला सुध्दा माझ्याकडे परत धाडून दिलं.

डिसअपॉइंटमेंटचा कहर झाला हो अगदी कहर…

लेखिका : सुश्री स्नेहल अखिला अन्वित

प्रस्तुती : सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ जनजागृतीच्या मार्गावर – भाग – २ ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ जनजागृतीच्या मार्गावर – भाग – २  ☆ श्री सुनील देशपांडे

 (परिवर्तनाची ही दिशा देण्यासाठी मग इतर समाज घटकांनीही आपापले योगदान देणे आवश्यक आहे.)  इथून पुढे —- 

ज्यांच्याकडे वय नाही पण वेळ आहे, संचार नाही पण विचार आहे, कष्ट होत नाहीत पण दृष्टी आहे. आचारांची तळमळ आहे, कार्याची कळकळ आहे आणि दुसऱ्याला समजून घेऊन विचार मांडता येतील अशा कार्याची जळजळ मनामध्ये धगधगत आहे असे ज्येष्ठ शोधले पाहिजेत. तरूणांचं भले बापाशी पटत नसेल पण आजोबांशी गट्टी जमते. असे तरुणांशी गट्टी जमवणारे आजोबा शोधले पाहिजेत. त्यांना कार्यरत केलं पाहिजे. कार्याची व्याप्ती खूप मोठी आहे परंतु दिशा निश्र्चित असेल व योग्य साथ असेल तर व्याप्ती वाढवता येते. भरकटलेल्या दिशांना योग्य मार्ग मिळू शकत नाही आणि म्हणूनच निश्‍चित दिशा ठरवून पावले टाकल्यास समाजपरिवर्तन हळूहळू का होईना पण नक्की होऊ शकते. हा मोठ मोठ्या समाजसुधारकांनी दिलेला मंत्र आहे. त्यांच्या चरित्रां मधून आणि कृती मधून त्यांनी समाजाला हा मंत्र दिला आहे. पण तो मंत्र समजून घेण्याची पात्रता आणि इच्छा किती जणांच्यात असते हाच तोप्रश्न आहे. स्वत:चं जीवन जगून झाल्यानंतर तरी, स्वार्थापलिकडे जाऊन विचार करण्याची तयारी किती जणांमध्ये असते ? समाज परिवर्तनाची क्रिया सातत्याने चालू राहणे आवश्यक असते. पिढ्यानपिढ्या मधून ती झिरपत जाणे आवश्यक असते आणि मग अनेक पिढयांनंतर जेव्हा मागे वळून पाहतो तेव्हा निश्चितच या परिवर्तनाचा अभिमान वाटू शकतो. बाबा आमटे यांनी सुरू केलेल्या कार्याला त्यांच्या तिस-या पिढीने कुठल्या कुठे नेऊन ठेवले आहे हे पाहिलं की या विधानाचा प्रत्यय येतो. आजच्या पिढीला दाखवण्यासारखं हे जिवंत उदाहरण अभिमानास्पद ठरतं. अवयवदानाच्या क्षेत्रात आपल्यालाही पिढ्यानपिढ्या चालू राहील असे कार्य उभे करायचे आहे. तरूणांना घडवण्यासाठी ज्येष्ठांची फळी उभी करायची आहे. असे अनेक प्रश्न उभे राहतील. यापूर्वी आपण विचार केला होता तो असा की …. कॉलेज तरुण, शालेय विद्यार्थी यांच्या स्पर्धा आयोजित करणे.

 हा जसा एक भाग असावा, त्याचप्रमाणे या विषयासंबंधी ज्येष्ठ नागरिक संघ आणि वृद्धाश्रम या ठिकाणी जर स्पर्धा आयोजित केल्या आणि चांगल्यापैकी बक्षीस ठेवलं, तर या विषयांमध्ये रस असणारे ज्येष्ठ मार्गदर्शक शोधणं तसं फार अवघड होणार नाही. अनेक ज्येष्ठ खरं म्हणजे साठी ओलांडली म्हणून निष्क्रिय होत नाहीत. निरुपयोगी तर अजिबातच नाही, कधीच नाही. परंतु कार्याची दिशा न मिळाल्याने भरकटलेले, आयुष्यात खूप काही केलं आता विश्रांती घ्यावी असे म्हणणारे आणि काही दिवसांनंतर त्या विश्रांतीचा कंटाळाही आलेले असे असणारच. पण समाज ज्येष्ठ नागरिक संघ आणि विशेषतः वृद्धाश्रम या निष्क्रिय लोकांच्या जागा असे समजतो. त्यांना सक्रिय करण्याचा कुणी प्रयत्नच करीत नाही. अर्थात स्वतःहून सक्रीय होणारे सन्माननीय अपवाद सोडून. या सर्व मंडळींना विविध विषयात रस असतोच. कुणी कवी असतात, कुणी विचारवंत असतात, कुणी कलावंत असतात, कुणी अभिनेते असतात. यातील काहीजणांना आयुष्यात पोटामागे धावताना आपल्या कलांना विकसित करण्याची संधी मिळालेली नसते. अशांना अशा काही संधी उपलब्ध करून दिल्या तर त्यांना ते आवडेलही. त्यांना शोधण्यासाठी ज्येष्ठ नागरिक संघ व वृद्धाश्रम यांच्या मधून अशा स्पर्धांच्या माध्यमातून अशा व्यक्तींपर्यंत पोहोचता येणे शक्य आहे. त्यातून तरूण पिढीला घडवणारे मार्गदर्शक कार्यकर्ते, वक्ते, कलावंत, विचारवंत हे आपल्या कार्याशी जोडून घेता येणे शक्य आहे. असा प्रयत्न का करू नये ? खरं म्हणजे वृद्धाश्रमांकडे लोक अति भावनिक दृष्टिकोनातून बघतात. काहीजण तर अडगळीची माणसे टाकण्याची जागा अशा भावनेतून त्याकडे बघतात. मी तर म्हणतो वृद्धाश्रमांमध्ये राहणं चुकीचं किंवा वाईट असं काहीच नाही. खरं म्हणजे तेच जास्त सोयीचं आणि ज्येष्ठांच्या दृष्टीने उपकारक. तसेच उपक्रम कारकही आहे. ज्येष्ठांना एकमेकांच्या संगतीमध्ये विविध प्रकारच्या उपक्रमातून चांगल्या पद्धतीने सहजीवन करता येईल. मुलांच्या घरात अडगळ म्हणून राहण्यापेक्षा वृद्धाश्रमांमध्ये आनंदी जीवन जगणे हे केव्हाही चांगले. ज्या घरांमध्ये मुलांना अडगळ होत नसेल परंतु तेथे निष्क्रिय पणे बसून राहण्यापेक्षा वृद्धाश्रमांमध्ये समवयस्कांच्या संगतीत आनंदात दिवस काढणे आणि सक्रीय रहाणे व अधून मधून मुलांच्या संसाराची खबरबात घेण्यासाठी त्यांचेकडे जाऊन येणे हे सगळ्यात सुखाचे आणि आनंदाचे आहे असे मला वाटते. आम्ही सुद्धा आता आमच्या फ्लॅटमध्ये दोघेच रहातो. पण आमच्याकडे सामाजिक उपक्रम आहेत. त्यामुळे आम्ही सक्रिय आहोतच. परंतु आमच्या फ्लॅटमध्ये आम्ही वृद्धाश्रमा प्रमाणेच राहतो. व्यवसाय व इतर उपक्रम नसते तर मग वृद्धाश्रमांमध्ये रहाता आलं असतं तर तेच जास्त सुखावह वाटलं असतं. आत्तापर्यंत केलेल्या पदयात्रां मुळे सामाजिक उपक्रमांसाठी जे काही मिळवलं तो भाग सोडला तरी, वैयक्तिक आयुष्यामध्ये बरंच काही शिकता आलं. पहिलं म्हणजे आपल्या गरजा आपण कमीत कमी ठेवू शकलो तर आपण जास्तीत जास्त उपक्रमशील राहू शकतो. दुसरी गोष्ट, आयुष्यात तडजोड केल्यास जे चांगले क्षण अनुभवता येऊ शकतात ते अडून राहण्यात किंवा अनावश्यक मतांमध्ये ठाम राहण्यामध्ये मिळू शकत नाहीत. सामाजिक उपक्रमांमधून आपण समाजाच्या काही उपयोगी पडू शकतो या भावनेतून जे मानसिक समाधान मिळतं त्यामुळे शारीरिक आरोग्यही चांगलं राहू शकतं. या पदयात्रेमध्ये खरोखरच आश्चर्य करण्यासारखं घडलं. पदयात्रेच्या आदल्या दिवशीपर्यंत मी सर्दी खोकल्याने बेजार होतो. घरचे काळजीतच होते. परंतु पदयात्रेच्या सुरुवातीपासून पदयात्रा संपेपर्यंत किंबहुना परत येईपर्यंत एकदासुद्धा खोकला आला नाही. सर्दीने त्रास दिला नाही. पण परत आल्यानंतर पुन्हा थोडासा सर्दी-खोकला सुरू झाला आणि त्यात कोरोनाच्या बातम्या सुरु झाल्या त्यामुळे फारसा कुठे बाहेर पडलो नाही. आणि त्यानंतर लॉकडाऊन मध्येच अडकून पडलो. त्यामुळे पदयात्रा झाल्यानंतर कुठल्या कार्यक्रमाला जाणे नाही कुणाला भेटणे नाही. म्हणजेच आपण जर खरोखरच ध्येयवादी कामाने पछाडलेले असू तर शरीरही त्याला साथ देते. म्हणून उतारवयामध्ये सतत कार्यरत असावं, कार्याने पछाडलं गेल्यास उत्तमच. गरजा कमीतकमी ठेवाव्यात परिस्थितीशी आणि माणसांशी जुळवून घेता आलं पाहिजे. हे सर्व धडे नुसते शिकलो नाही तर आयुष्यात अंगीकारायला ही शिकलो. हा पदयात्रेने मला वैयक्तिक झालेला सगळ्यात मोठा फायदा आहे. ज्या गोष्टी आपल्या आवडीच्या असतात त्या करण्यात आनंद असतो. करण्यापासून त्रास आणि श्रम वाटत नाहीत आणि शरीरही साथ देतं. हा धडा जर प्रत्येकाला समजावून सांगून लागू करायचं ठरवलं तर, ज्येष्ठांकडून खूप मोठं समाजकार्य होऊ शकेल. त्यासाठी विविध उपक्रमांमधून सतत प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे. करूया काही प्रयत्न, करून बघूया.

बघूया ना ? देणार साथ ?

कृपया सहकार्य करा. आवाज द्या श्रोती जमा करा, आम्ही आपल्याकडे येऊ.

संपर्क करा. फोन करण्यापेक्षा व्हाट्सअप मेसेज करा अथवा ई मेल करा. आपले नाव पत्ता कळवा मी आपल्याशी संपर्क करेन.

– समाप्त – 

© श्री सुनील देशपांडे 

 उपाध्यक्ष, फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन.

 फोन :९६५७७०९६४०

 ई मेल. : – organdonationfed@gmail. com;  [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आठवणीतले झाकीर हुसैन ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ आठवणीतले झाकीर हुसैन ☆ सौ राधिका भांडारकर ☆

कोणत्याही क्षेत्रातील कलाकार असोत त्यांचा आपले जीवन आनंदित करण्यात फार मोठा वाटा असतो आणि असा एखादा कलाकार जेव्हा त्याच्या केवळ स्मृती आणि कला मागे ठेवून आपल्यातून निघून जातो तेव्हा नकळतच आपल्या आयुष्यात फार मोठी पोकळी निर्माण होते. मनात उदासीनता दाटून येते. प्रसिद्ध तबलावादक पंडित झाकीर हुसैन यांच्या निधनाच्या बातमीने मन असेच सुन्न झाले. कुरळ्या दाट केसांचा झाप उडवत तबल्यावर ताल, लय, शब्द सूर आणि नादाचा जिवंत झरा उसळवत “वाह! ताज” म्हणणारा हा दिव्य कलाकार काळाच्या पडद्याआड गेला हे मान्य करणे खूप कठीण जाते. त्याची कला तर दिव्य होतीच पण माणूस म्हणूनही त्याच्यातले अनेक गुण वाखाणण्यासारखे होते.

उस्ताद झाकीर हुसैनच्या तबला वादनाचे अनेक प्रत्यक्ष कार्यक्रम मला ऐकायला मिळाले हे माझे खूपच भाग्य आणि प्रत्येक वेळी एक कलाकार आणि माणूस म्हणून त्याचे जे दर्शन झाले तेही तितकेच अविस्मरणीय.

जळगावला रोटरी क्लब तर्फे “झाकीर हुसैन लाईव्ह” हा कार्यक्रम आयोजित केला गेला होता. कार्यक्रमापूर्वी त्यांची लोकमत वृत्तपत्र कार्यालयात प्रकट मुलाखत होती. लोकमतची लेखिका म्हणून मला आमंत्रण होते. मुलाखतीत ते अगदी मन मोकळेपणाने, हसत खेळत गप्पाच मारत होते. त्यांच्या गोऱ्यापान कपाळावरचं गंध पाहून आम्ही सारेच काहीसे अचंबित झालो होतो आणि तेवढ्यात मुलाखतकारांनी नेमका तोच प्रश्न त्यांना विचारला. ते अगदी मन मोकळेपणाने हसले आणि म्हणाले. “मुंबईहून जळगावला येत असताना वाटेत चांदवडला देवीच्या दर्शनासाठी मंदिरात जाण्याचा योग आला. ये जो माथे पे तिलक है वो देवी का आशीर्वाद है।” अंत:करणापासून ते बोलत होते. पुढे म्हणाले, ” कलाकारासाठी एकच धर्म असतो. तो फक्त आपल्या कलेशी एकनिष्ठ राहण्याचा. अनेक धर्मांच्या भिंती त्याला सतावत नाहीत.. कोंडून ठेवत नाहीत. तो मुक्त असतो. संगीत की भाषा ही अलग होती है। ती हृदयाशी, मनाशी जोडलेली असते. ना कुठल्या जातीशी ना कुठल्या धर्माशी. ” झाकीर हुसैन यांचे हे अंतरीचे बोल श्रोत्यांच्या मनाला भिडले. टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला.

उस्ताद झाकीर हुसैन हे असे कलाकार होते की कुठल्याही श्रेष्ठत्वाची भावना त्यांना स्पर्शून गेली नाही. ते जितका त्यांच्यापेक्षा बुजुर्ग कलाकारांचा मान राखत तितकाच मान ते नवोदित कलाकारांनाही देत. त्यांच्या “सोलो” कार्यक्रमात ते त्यांना साथ देणाऱ्या सारंगी, व्हायोलिन वादकालाही तितकेच प्रोत्साहित करत. श्रोत्यांना त्याच्याही कला सादरीकरणाकडे लक्ष द्यायला प्रेरित करत.

एकदा मुंबई येथे षणमुखानंद सभागृहात श्रेष्ठ सतारवादक पंडीत रविशंकर यांचा कार्यक्रम होता. तो त्यांचा शेवटचा कार्यक्रम असे जाहीर केलेले होते. साथीला तबल्यावर झाकीर हुसैन होते. दोघेही दिग्गज, आपापल्या कलेतले किमयागार. त्यांना ऐकण्यासाठी प्रचंड मोठा श्रोत्रुसमूह उपस्थित होता. सभागृह गच्च भरले होते. पंडीत रविशंकर यांची पत्नी आणि कन्या उपस्थित होत्या. कन्या अर्थात मंचावर पंडितजींबरोबर वादक म्हणून उपस्थित होती. पत्नी श्रोत्रुवर्गात पहिल्या रांगेत आसनस्थ होत्या. बहारदार कार्यक्रम चालू होता. एकेका टप्प्यावर रंग चढत चालला होता. सतार ऐकावी की झाकीर हुसैन यांचं तबलावादन ऐकावं.. श्रोते बेभान झाले होते. इतक्यात पंडीत रविशंकर यांच्या पत्नीने मोठ्या आवाजात सर्वांना ऐकू जाईल अशा स्वरात साऊंड सिस्टिम वाल्यांना सांगितले, ” तबल्याचा आवाज कमी करावा. पंडितजी की सतार ठीक से सुनाई नही दे रही है?” आणि एका क्षणात झाकीर हुसेन यांनी स्वतःच त्यांच्या समोरचा माईक काढून टाकला. ते उठले आणि पंडितजींच्या चरण्यास स्पर्श करून म्हणाले, ” आपण गुरु आहात. माझ्याकडून आपला अवमान झाला असेल तर मला माफ करावे. ” पंडितजींनी झाकीर हुसेनला मिठीत घेतले. वास्तविक त्यांना झाल्या प्रकाराबद्दल खेद वाटला असावा पण मंचावरचा तो दोन कलाकारांच्या नात्याचा, भक्तीचा एक आगळावेगळा सोहळा पाहून सारेच भारावून गेले होते. त्या दोघांमध्ये खरं म्हणजे कसलीच स्पर्धा नव्हती. ते फक्त आपापल्या महान कलेचे चेले होते आणि भक्त होते. जुगलबंदीत मशगुल होते.

आणखी एक असाच प्रसंग !

रॅलेला (नॉर्थ कॅरोलीना अमेरिका) गणेशोत्सवाच्या निमित्ताने सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांची संगीत मैफल होती आणि त्यांचे साथीदार म्हणून उस्ताद झाकीर हुसैन तबल्यावर होते. गायक सुरेश वाडकर यांची संपूर्ण मैफील सुंदरच झाली. मैफिलीचा समारोपही झाला मात्र श्रोते काही उठायला तयार नव्हते. आयोजकांनी दोन-तीन वेळा जाहीर केले की, ” कार्यक्रम संपला आहे” तरीही लोक परतायला तयारच नव्हते. प्रेक्षागृहातून एकच आवाज घुमला!” आम्हाला झाकीर हुसैन यांचे स्वतंत्र तबलावादन ऐकायचे आहे. ते ऐकल्याशिवाय आम्ही जाणार नाही. ”

थोडक्यात नाईलाजाने म्हणावे लागते की तिथली जी गर्दी होती ती उस्ताद झाकीर हुसेन यांच्यासाठी होती, त्यांचे तबल्यावरचे बोल ऐकण्यासाठी होती. झाकीर हुसेन नम्रपणे उठले, त्यांनी संपूर्ण प्रेक्षागृहस वाकून वंदन केले आणि ते म्हणाले, ” आजच्या मैफिलीत माझी कामगिरी साथीदाराची होती आणि ती मी बजावली. आजची मैफल माझे प्रिय मित्र आणि गुरु पंडीत सुरेश वाडकर यांची आहे. आज मी स्वतंत्रपणे माझी कला आपणापुढे सादर करू शकत नाही. मला क्षमा असावी. ” किती हा नम्रपणा आणि केवढी ही महानता आणि तत्त्वनिष्ठता! कृपया इथे बिदागीचा प्रश्न उपस्थित करणे हे संकुचितपणाचे द्योतक ठरेल. खरा कलाकार नेहमी दुसऱ्या कलाकारांना मनापासून दाद कशी देऊ शकतो, त्याचा मान कसा राखू शकतो याचं हे एक सुंदर उदाहरण.

असा हा मनस्वी कलाकार, तालवाद्याचा सरताज आज आपल्यात नाही पण त्याची कला अमर आहे, बोल अमर आहेत. अशा या तबलावादक, संगीतकार, तालवादक संगीत निर्माता आणि अभिनेता म्हणून गाजलेल्या महान भारतीय कलाकारास भावपूर्ण श्रद्धांजली!

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ जनजागृतीच्या मार्गावर – भाग – १ ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ जनजागृतीच्या मार्गावर – भाग – १ ☆ श्री सुनील देशपांडे

वयाच्या साठाव्या वर्षानंतर म्हणजेच ज्येष्ठ नागरिक (सीनियर सिटीजन झाल्यानंतर) समाजकार्याच्या तळमळीमुळे मी अवयव दानाचे क्षेत्र हे स्वतःचे कार्यक्षेत्र म्हणून निवडले.

अवयवदानाच्या क्षेत्रात कार्य करायचे ठरवल्यानंतर मी माझ्यापरीने अभ्यास करून व्याख्याने व स्थानिक कार्यक्रम यामधून लोकांपुढे जाऊन हा नवीन विषय त्यांच्यापुढे मांडण्याचा प्रयत्न करत होतो. परंतु नंतर लक्षात आले की या बाबतीत जनजागृती करायची असेल तर स्थानिक स्तरावरील तोटके प्रयत्न उपयोगाचे नाहीत. या विषयाला मोठ्या जनजागृतीची आवश्यकता आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा विषय पोहोचवणे आवश्यक आहे. त्यामुळे पदयात्रा या संकल्पनेचा उगम माझ्या मनात झाला. त्यादृष्टीने मी प्रयत्न सुरू केले. फेडरेशन ऑफ ऑर्गन ॲन्ड बॉडी डोनेशन या संस्थेत सहभागी होऊन या आमच्या संस्थेमार्फत आजपर्यंत एकूण चार पदयात्रा यशस्वी रीत्या पूर्ण केल्या. माझ्या वयाच्या ६६व्या वर्षापासून ७० वर्षापर्यंत या चार पदयात्रां मधून जवळपास ४००० किलोमीटर अंतर पायी चालत जाऊन, एकूण पन्नास हजार पेक्षा अधिक लोकांपर्यंत हा विषय पोहोचवू शकलो. महाराष्ट्रातील जवळपास सर्व जिल्हे पायाखालून घातले. या सर्वांचा अनुभव मिश्र स्वरूपाचा असला तरी एकूण अनुभव उत्साहजनक होता हे नक्की. त्यामुळे माझ्या मनाप्रमाणे काही करू शकलो याचं समाधान आहेच. पण आता सत्तरी पार केली आहे. हळू हळू डोळे आणि कान सहकार्य करण्यासाठी कुरकुरत आहेत. प्रकृती चांगली असली तरी पदयात्रेचा मार्ग कितपत चालू ठेवता येईल याबाबत साशंक आहे. तरीही कार्य चालूच राहील. राहणार आहे आणि राहिले पाहिजे. पण हे प्रयत्न खूपच तोटके आहेत आणि अत्यंत तुटपुंजे आहेत याची नम्र जाणीव मला या पदयात्रांनी नक्कीच करून दिली आहे.

 अवयवदान प्रबोधनाच्या कार्यासाठी अनेक कार्यकर्ते निर्माण झाले पाहिजेत. तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणावर जागृती निर्माण होऊन ते मोठ्या संख्येने सहभागी झाले पाहिजेत. आता याचसाठी कार्य करायचे आहे. त्यासाठी या विषयाचे प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. या विषयाचे प्रबोधक व कार्यकर्ते निर्माण करणे आवश्यक आहे. त्यासाठी विविध स्थानिक स्तरावरील संस्थांमार्फत प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करून या क्षेत्रातील कार्यकर्त्यांची संख्या आणि ज्ञान याची वृद्धी करणे आवश्यक आहे. आम्ही फेडरेशन ऑफ ऑर्गन ॲन्ड बॉडी डोनेशन या संस्थेतर्फे व केंद्र सरकारच्या अधिपत्याखालील रोटो-सोटो च्या सहकार्याने विविध प्रशिक्षण कार्यक्रम व या विषयावरील प्रबोधनपर साहित्य प्रकाशित करणे असे उपक्रम आयोजित करीत आहोत. त्यासाठी योग्य ते प्रशिक्षण कार्यक्रमांचे प्रारूप तयार केले गेले आहे.

आता याच कार्यावर भर देण्याचे निश्चित केले आहे. वास्तविक पाहता कोरोनाच्या प्रकोपामुळे व परिस्थितीमुळे एक धडा सर्वांनी शिकणे आवश्यक आहे.

इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये सरकार, सर्व सरकारी यंत्रणा, सर्व मोठे उद्योग व्यवसाय, सर्व स्वयंसेवी संस्था, सर्व प्रसार माध्यमे आणि सर्व सोशल मीडिया या सर्वांमार्फत कोरोना, कोरोना आणि फक्त कोरोना, हाच विषय आणि त्याबाबतची माहिती आणि जागृती याचे सतत प्रयत्न सतत दोन वर्षे चालू आहेत. त्याच्या कायदेशीर अंमलबजावणीसाठी सर्व कायदा आणि सुव्यवस्था यंत्रणा तसेच आरोग्य यंत्रणा कार्यरत होत्या आणि तेही 24 तास. पण एवढे असूनही असे दिसून येते की लोकांमध्ये जागृती समाधानकारक होत नाही.

आपण बातम्यांमध्ये रोज पाहतच होतो की एवढी प्रचंड जागृती मोहीम चालू असून सुद्धा स्वतःला सुशिक्षित (?) म्हणवणारे परंतु खरे सुशिक्षण नसलेले फक्त विद्याविभूषित असे पांढरपेशे व मध्यमवर्गीय हे सुद्धा या सर्व जागृती मोहिमेपासून फारसा चांगला धडा शिकताना दिसत नव्हते. मग अशिक्षित व हातावरचे पोट असणारे यांची काय स्थिती असेल ही कल्पनाच करावी. त्याचप्रमाणे सांपत्तिक उच्च स्थितीमध्ये असणारे किंवा राजकारणी आमदार, खासदार, नगरसेवक, महापौर, नगराध्यक्ष अशांसारख्या काही व्यक्तीसुद्धा स्वतःच्या संबंधित अथवा वैयक्तिक समारंभाचे आयोजन व नियोजन करताना आणि त्यात सहभाग घेताना दिसत. अशा वेळेला सरकारी यंत्रणांचीही पंचाईत होते. त्यांना यावर काय कारवाई करावी हेच समजेनासे होते. धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय अशी त्यांची बिकट अवस्था होऊन जाते. यावरून समाजाला जागृत करणे हे किती प्रचंड अवघड आहे हे लक्षात येते. पदयात्रेच्या निमित्ताने बऱ्याच वेळा हे लक्षात आले आहे की महाविद्यालयात किंवा शाळेमध्ये शिकणारे विद्यार्थी यांच्यामध्ये सुद्धा बर्‍यापैकी जागृती होऊ शकेल असे दिसते आहे. त्यामुळे एकंदरीत अवयवदानाच्या विषयासंबंधी जनजागृति व्हावयाची असेल तर किमान दोन-तीन पिढ्यांमध्ये तरी सातत्याने हे कार्य चालू असले पाहिजे. जेव्हा तरुण या कार्यात कार्यरत असताना, सामील होताना दिसतात तेव्हा पुढील पिढीत काहीतरी आशादायी घडेल अशा समजुतीला बळ मिळते. म्हणूनच तरुण आणि विद्यार्थी वर्ग यांच्यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने शाळा-महाविद्यालयांमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करणे उपयोगी ठरेल. त्या स्पर्धांमध्ये भाग घेणारे तरी निश्चित या विषयाचा अभ्यास करतातच. बऱ्याच वेळेला मी असे पाहिले आहे की शालेय विद्यार्थी जेंव्हा स्पर्धेमध्ये भाग घेत असतात तेव्हा त्या विषयाच्या अभ्यासामध्ये त्यांचे आई वडील सुद्धा सामील झालेले असतात. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या स्पर्धांमधून संपूर्ण कुटुंब या विषयाच्या अभ्यासाकडे वळवता येईल.

तरुणांना या विषयाच्या अभ्यासाकडे वळवण्यासाठी या विषयासंबंधीच्या स्पर्धा काही संस्थांनी आयोजित केल्या होत्या. त्या मधूनही आजचे तरुण या स्पर्धेच्या निमित्ताने या विषयाचा अभ्यास करून त्याचे चांगल्या प्रकारे सादरीकरण करू शकतात हे लक्षात येते.

आजकालच्या तरुणांना या विषयाचे योग्य प्रकारे प्रशिक्षण देऊन चांगल्या प्रकारे समाजामध्ये या विषयाचे प्रबोधन करता येऊ शकेल याबाबत शंका नाही. त्यामुळे प्रशिक्षणाच्या माध्यमातून तरुण कार्यकर्ते तयार करणे हे उद्दिष्ट ठेवणे गरजेचे आहे. या गरजेपोटी फेडरेशनचे पुढचे पाऊल हे प्रशिक्षणाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांच्या जागृतीचे असल्यास अवयवदानाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर जागृती घडवून आणता येईल असा विश्र्वास वाटतो.

जनजागृती ज्या समाजपरिवर्तनासाठी करावयाची आहे त्याची दिशा काय असली पाहिजे हे प्रथम ठरवायचे आहे. तरुणांच्या डोळ्यात असलेली भविष्याची स्वप्ने जाणून घ्यायची आहेत. ती स्वप्नं साकार करण्यासाठी त्यांच्या हातांना श्रममूल्यांची जाणीव करून देऊन त्याची जपणूक केली पाहिजे. आकाशाला गवसणी घालणाऱ्या त्यांच्या मनात कार्याचं पाखरू हळू हळू फडफडवलं पाहिजे. आकाशी भरारी मारणाऱ्या त्यांच्या मनाबरोबर त्यांच्या पायांना जमिनीशी असलेलं नातं घट्ट करायला शिकवलं पाहिजे.

जमिनीवर रोवून पाय 

आभाळ धरता आलं पाहिजे 

उंच होता आलं पाहिजे 

आभाळ खाली आणलं पाहिजे 

मनात जिद्द धरली पाहिजे

कोणत्याही कार्यासाठी ही जिद्द निर्माण व्हायला हवी. त्या जिद्दीसाठी प्रयत्नशील राहण्याची जाणीव निर्माण केली पाहिजे. या जाणिवेतूनच समाजासाठी कार्य करणारी मने तयार होतील. त्यांचे कडूनच परिवर्तनाला दिशा मिळेल. परिवर्तनाची ही दिशा देण्यासाठी मग इतर समाज घटकांनीही आपापले योगदान देणे आवश्यक आहे.

— क्रमशः भाग पहिला 

© श्री सुनील देशपांडे 

 उपाध्यक्ष, फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन.

 फोन :९६५७७०९६४०

 ई मेल. : – organdonationfed@gmail. com;  [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मय्यत… ☆ सुश्री शीला पतकी ☆

सुश्री शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ मय्यत… ☆ सुश्री शीला पतकी 

सकाळीच साडेसात वाजता मोबाईल वाजला.  खरं तर हल्ली पहाटे छान झोप लागते आणि मग उठायला जरा उशीरच होतो… दिवसभर करायचं काय? त्यामुळे जरा निवांतपण चालू आहे…. मी फोन घेतला … कामवाल्या बाईचा फोन …बाई शेजारी मयत झाली, मी येत नाही ….मी रागाने  फोन बंद केला.  सकाळी उठून कसले फोन करतात …  बरं कोणाचं तरी कुणीतरी मेलेलं असतं, पण ह्यांना तिथे जाणं अगदी जरुरीचेच आहे .मी नवीन कामवाली बाई ठेवताना तिला पहिला प्रश्न विचारला .. ‘ तुझं नाव काय आणि कुठे राहतेस? ‘ कारण तिचा आमचा पाण्याचा वार एक येऊ नये यासाठी ही धोरणात्मक हुशारी …दुसरा प्रश्न विचारला ‘ महिन्यातून मयत किती? ‘ ….. तिला काही कळलं नाही.  ती गोंधळून गेली .. ‘ म्हणजे मयत झाले असे सांगून किती वेळा जाणार आहेस.’ . त्यावर तिचं केविलवाणं उत्तर.. ‘ आम्हाला जावंच लागतं बाई .. ते काय असंच आता सांगता येतं का.’ .. मी म्हटलं ‘ का ग तुम्ही गेला तर ते काय उठून उभारणार आहे ? का काम करावीत मग ?  जावं …. तिथे जाऊन काय करता तुम्ही ? काहीच नाही … एकाला एक आवाज काढून रडत बसायचं.  त्यांच्याबद्दल तुम्हाला प्रेम सुद्धा नसतं,  मग असं का वागता ? पहिल्यांदा कर्माला महत्व द्यावं …..! ‘ डोंबलाचं कर्म … तिला काहीच कळत नव्हतं.  ती म्हणाली, ‘ बाई आम्ही जर गेलो नाही तर आम्हाला कोण येणार ? ‘ .. ‘ अग तुला कुठे दिसणार आहे ..? ‘  हा वाद खूप वेळ चालला ती आपल्या उत्तरावर ठाम होती की मयत झालं तर मला जावं लागणार …  सगळेच तसे …  त्यामुळे मी तिला नाकारू शकत नव्हते .

मग त्या शब्दावरून लहानपणीचा एक प्रसंग मला आठवला.  सहा-सात वर्षांचि मी असेन.  वडिलांबरोबर कार्यक्रमाला जात असे.  वडील एका सायकलवर आणि आमच्याकडे साथीदार असलेला डोके नावाचा मुलगा दुसऱ्या सायकलवर होता… त्याच्या सायकलवर मी डबल सीट बसलेली.  वडील थोडे पुढे निघून गेले, आम्ही थोडे मागे होतो.  एके ठिकाणी पोलिसांनी डबल सीट म्हणून आम्हाला पकडले आणि दंड काढा म्हणून सांगितले.  याच्याजवळ पैसे नव्हते, मला तर काहीच कळत नव्हते.  मी त्यांच्या तोंडाकडे बघत होते.. आधी पोलीस म्हणल्यावर मी घाबरून गेले.. तो डोके म्हणाला ‘ नाही हो बच्चे की मा मर गई है .. मयत मे जाना है .. बच्चे को मावशी की घर से लाया हु ‘ …. पोलीस हळहळला .. ‘ अरे अरे कितने छोटी बच्ची ‘ .. त्याने माझ्या डोक्यावरून हात फिरवला आणि आम्हाला सोडून दिलं … मला काही हा प्रकार कळला नाही.  फक्त एवढं कळलं की त्याने मयत हा शब्द वापरला होता.. माझ्या मनात त्या शब्दाविषयी कुतूहल होते.  असा या शब्दाचा काय अर्थ होता की सरकारी पोलीस सुद्धा हळहळला .. त्याने माझ्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवला आणि आम्हाला दंड न करता सोडून दिले.  म्हणजे काहीतरी महान शब्द असावा.  दोन दिवस मी त्याच्यावर विचार करत होते.  दोन दिवसांनी मी वडिलांना एकदा विचारलं.. ‘ दादा मयत म्हणजे काय हो? ‘ वडील म्हणले ‘ तुला काय करायचे, कोणी सांगितलं तुला हे ‘ .. मग मी झाला प्रसंग सांगितला.  वडील म्हणाले ‘ काही तसं नसतं.  तुझ्या आईकडे तू निघाली आहेस अस त्याने सांगितलं.’ पण मला ते काही फारसं पटलं नाही.  

पुढे दोन चार दिवसांनीच आमच्या तिथल्या मशिदीवरून अनाउन्समेंट झाली….’ इनके घर मयत हो गयी है और मयत दो बजे निकलेगी ‘ .. मला कळेना की मशिदीतला माणूस आईला भेटायला जायचे हे माईक वरून सगळ्यांना का सांगतो आहे आणि त्या दिवशी मला मयतचा खरा अर्थ कळला.  मयत म्हणजे माणूस मेलेले असणे.  मात्र मला खूप वाईट वाटले की आमच्या त्या डोके नावाच्या माणसाने माझ्या आईला मारले …. केवळ दंड भरावा लागू नये म्हणून.  मग मी त्याला मात्र लहान असूनही बोलले व ‘ तुम्ही आमच्या आईला मारता काय ‘ आणि मी आईला गच्च मिठी मारली !… 

कुठल्या शब्दाचे अर्थ संदर्भ आपल्याला कधी आणि कसे लागतील ते काही सांगता येत नाही.  अगदी 70 व्या वर्षी सुद्धा काही शब्द नव्याने कळले आहेत.  असो … ‘ मयत ‘ या एका शब्दावरून आज खूप काही आठवलं आणि तेच समोर लिहिलं.  असला विषय आवडला का म्हणून विचारलं खरं ..  नाही ना,  असो….!

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ज्याचा त्याचा देव्हारा ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? मनमंजुषेतून ?

ज्याचा त्याचा देव्हारा ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

परवा एका उद्योजक मित्राच्या, तुम्ही बरोबर वाचलेत, उद्योजक मित्राच्या बंगल्याच्या वास्तुशांतीला जाण्याचा योग आला ! उद्योगपती मित्र असायला मी कोणी नेता थोडाच आहे ? असो ! तर त्याने दिलेले त्याच्या बंगल्याचे “ध्यान” हे नांव वाचून, खाली घसरणारी ढगळ हाप पॅन्ट, त्यातून अर्धवट बाहेर आलेला मळलेला शर्ट आणि नाकातून गळणारे मोती, असे शाळेत असतांनाचे त्याचे त्या वेळचे ध्यान डोळ्यासमोर आले आणि मी मनांतल्या मनांत हसलो ! पण पठ्याने पुढे मोठ्या मेहनतीने पैसा कमवला आणि त्याच्या बरोबर थोडं फार नांव !

बंगल्यात शिरल्या शिरल्या उजव्या हाताला एक मोठ देवघर होतं. अनेक देवादिकांच्या मोठ मोठ्या तसबीरींनी त्याची भिंत भरून गेली होती, पण माझं लक्ष वेधून घेतलं ते तिथल्या जवळ जवळ माझ्या उंचीच्या शिसवी देव्हाऱ्याने ! मित्राची आई त्या प्रचंड देव्हाऱ्या समोर आतील असंख्य देवांच्या लहान मोठ्या मूर्तिची, स्वतः एका चौरंगावर बसून पूजा करत होती ! मला थोडं आश्चर्यच वाटलं, कारण माझा मित्र पक्का नास्तिक आहे हे मला ठाऊक होतं. म्हणून तो देव्हारा बघून मी त्याला म्हटलं, “अरे तू एवढा देव देव कधी पासून करायला लागलास ?” “कोण म्हणत ?” “अरे मग हे एवढ मोठ देवघर त्यात तो भला मोठा देव्हारा, हे कशाचं लक्षण आहे ?” “तुला खोटं वाटेल, पण आजतागायत मी आपणहून या देवघरात पाऊल ठेवून त्यांच्या पुढे कधीच हात जोडलेले नाहीत किंवा त्यांच्याकडे काहीच मागितलेले नाही ! माझा माझ्या मनगटावर पूर्ण भरोसा आहे !” “मग हे सगळं…. ” “आई साठी ! त्या देव्हाऱ्यात अनेक देव देवता आहेत, पण मी त्या देव्हाऱ्या समोर डोळे मिटून जेव्हा केव्हा उभा राहतो तेव्हा मला फक्त आणि फक्त त्यात माझ्या आईची मूर्ती दिसते, जिला मी मनोमन नमस्कार करतो, जी माझ्यासाठी सार काही आहे !” त्याच्या त्या उत्तराने मी अंतर्मुख झालो हे नक्की!

मध्यन्तरी बऱ्याच वर्षांनी सुट्टीत गावाला गेलो होतो. एकदा सकाळी गावातून फिरता फिरता, माझ्या लहानपणीच्या शाळेवरून जायची वेळ आली. तेवढ्यात मधल्या सुट्टीची घंटा झाली आणि सगळी चिल्ली पिल्ली आपापल्याला वर्गातून शाळेच्या अंगणात, कोणी खेळायला, कोणी डबा खायला बाहेर उधळली ! मी गेट समोर उभा राहून माझे बालपण आठवत उभा राहिलो ! आताही शाळेत डोळ्यात भरेल असा कुठलाच बदल झालेला जाणवला नाही मला ! नाही म्हणायला, शाळेच्या अंगणातलं पारावरच एक छोटंस मंदिर मला कुठे दिसेना. त्या क्षणी मला काय झालं, ते माझं मला कळलच नाही, मी बेधडक शाळेत शिरून हेडमास्टरची रूम गाठली. तर त्यांच्या त्या खुर्चीत एक चाळीशीची स्मार्ट मॅडम बसली होती.

ओळख पाळख वगैरे झाल्यावर मी त्यांना म्हटलं “माझ्या आठवणी प्रमाणे आपल्या शाळेच्या अंगणात पारावर एक छोटस मंदिर होतं, ते दिसलं नाही कुठे ?” “त्याच काय आहे ना जोशी साहेब, ते मंदिर ना मी इथे बदली होऊन आल्यावर फक्त मागच्या अंगणात शिफ्ट केलंय !” “ओके ! मॅडम, मी आपल्या शाळेचा माजी विद्यार्थी असलो तरी मला विचारायचा तसा अधिकार नाही, पण आपल्याला एक प्रश्न विचारला तर राग नाही नां येणार ?” “अवश्य विचारा जोशी साहेब, त्यात राग कसला !” “नाही म्हणजे मला तुम्ही तसं करायच कारण कळेल का ?” “जोशी साहेब मी जेंव्हा इथे चार्ज घेतला, तेंव्हा पहिल्याच दिवशी सगळ्या शिक्षकांना सांगितलं, की मी मंदिर मागे शिफ्ट करणार आहे आणि त्या वेळेस सुद्धा आपल्याला पडलेला प्रश्नच बहुतेकानी मला विचारला !” “मग तुम्ही त्यांना काय सांगितलंत ?” “मी त्यांना म्हणाले, माझी देवावर श्रद्धा आहे पण मी अंधश्रद्ध नाही किंवा त्याचे अवडंबर पण माजवत नाही ! मला असं वाटतं की आज पासून तुम्ही आपापला वर्ग, हाच एक ‘देव्हारा’ मानून, त्यात असलेल्या प्रत्येक विद्यार्थीरुपी नाजूक, ठिसूळ दगडातून सगळ्यांना हवी हवीशी सुबक छान, मूर्ती घडवायच अवघड काम करायच आहे ! तीच त्या प्रभूची सेवा होईल असं मला वाटतं. माझं म्हणणं त्यांना पटलं आणि त्यांनी त्या प्रमाणे वागून, कामं करून गेली सतत पाच वर्ष ‘तालुक्यातील उत्कृष्ट शाळा’ हे बक्षीस आपल्या शाळेला मिळवून दिलं आहे जोशी साहेब !” मॅडमच ते बोलणं ऐकून काय बोलावे ते मला कळेना ! मी त्यांना फक्त नमस्कार केला आणि शाळे बाहेर पडलो ! घरी जातांना, त्या चिमुकल्यांचा चिवचिवाट बराच वेळ कानावर पडत होता !

डिसेंबरचे कडाक्याच्या थंडीचे दिवस होते. कशी कुणास ठाऊक, पण पहाटे पाच वाजताच जाग आली आणि या अशा थंडीत मस्त आल्याचा, गरमा गरम चहा प्यायची इच्छा झाली ! बायकोला उठवायचं जीवावर आलं, म्हटलं बघूया स्टेशनं पर्यंत जाऊन कुठली टपरी उघडी आहे का. कपडे करून खाली उतरलो. रस्त्यावर तसा शुकशुकाट होता. एरवी भुकणारी कुत्री पण दुकानांच्या वळचणीला गप गुमान झोपली होती. लांबून एका रस्त्यावरच्या चहाच्या टपरीचा दिवा पेटलेला दिसला आणि माझा जीव जणू चहात पडला म्हणा नां ! जवळ जाऊन बघितलं तर तो सामानाची मांडा मांडच करत होता. “अरे एक कडक स्पेशल मिळेल का ?” “साहेब पाच मिनिट बसा. आत्ताच धंदा खोलतोय बघा. ” मी बरं म्हणून त्याच्या टपरीच्या बाकडयावर बसलो. थोडयाच वेळात त्याने रोजच्या सवयी प्रमाणे, चहा उकळल्याचा अंदाज घेवून, तो चहा दुसऱ्या भांड्यात एका फडक्याने गाळला. आता फक्त काही क्षणांचाच अवधी आणि ते पृथ्वीवरचे अमृत माझ्या ओठी लागणार होतं ! त्याने मग दोन ग्लास घेवून एका ग्लासात पाणी ओतलं आणि एका ग्लासात चहा. ते पाहून मी आधाशा सारखा हात पुढे केला, पण त्याने माझ्याकडे सपशेल दुर्लक्ष करून, ते दोन ग्लास आपल्या हातात घेतले आणि मेन रोड वर जाऊन काहीतरी मंत्र म्हणून, पहिल्यांदा पाण्याचा आणि नंतर चहाचा ग्लास असे दोन्ही रस्त्यावर ओतले ! मला काहीच कळेना ! इथे त्याच पहिल बोहनीच गिऱ्हाईक चहासाठी तळमळतय आणि त्याने तो चहाचा पहिला ग्लास चक्क रस्त्यावर ओतला ! मी काही विचारायच्या आतच त्याने दुसरा चहाचा ग्लास भरून माझ्या पुढे केला. मी चहा पिता पिता त्याला म्हटलं “अरे तो ताजा चहा आणि पाणी रस्त्यावर कशाला टाकलंस?” “साहेब मी रोजचा पहिला चहा देवाला अर्पण करतो बघा!” “देवाला ? अरे पण मला त्या मेन रोडवर तुझा कुठला मुदलातला ‘देव्हाराच’ दिसत नाही आणि तुला त्यातला देव दिसून त्याला तू तुझा पहिला चहा अर्पण पण केलास ! खरच कमाल आहे तुझी !” “साहेब कमाल वगैरे काही नाही. माझ्या बापाने सुरु केलेली ही टपरी आता मी चालवतोय, पण त्याने शिकवल्या प्रमाणे हा रोजचा रीती रिवाज मी न चुकता पाळतोय बघा ! साहेब शेवटी देव सगळीकडे असतो असं म्हणतातच नां ? प्रश्न फक्त श्रद्धेचा असतो, खरं का नाही ?” त्याच्या या प्रश्नावर मी फक्त हसून मान डोलावली आणि त्याला पैसे देऊन सकाळी सकाळी मिळालेल्या सुविचाराचा विचार करत घरचा रस्ता पकडला !

मंडळी, शेवटी कोणाचा ‘देव्हारा’ कुठे असेल आणि त्यात तो किंवा ती कुठल्या देव देवतांची पूजा अर्चा करत असतील, हे सांगणे तसे कठीणच ! शेवटी, तो चहावाला मला म्हणाला तसं, प्रश्न शेवटी श्रद्धेचा असतो, हेच त्रिकाल बाधित सत्य, नाही का ?

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “शुभेच्छा…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ “शुभेच्छा…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

तसं तर परिस्थिती जरासुध्दा बदललेली नसते …. तारीख नुसती बदलते..

चोवीसचं पंचवीस झालं .. .. वाटतं की नवीन वर्ष आलं…. नवीन वर्ष आलं..

 

काय झालं बरं वेगळं… अगदी काही नाही…

जरा विचार केला की लक्षात येतं दिवस येतात आणि जातात..

आपणच आपल्याला समजून घ्यायचं…..कारण बाकी कोणी घेत नाही..

शहाण्यासारखं वागत राहायचं….. आपल्या परीने…

कालच्या चुका आज करायच्या नाही असं निदान ठरवायचं तरी .. .. उद्याची फारशी काळजी करायची नाही… भरपूर काम करायचं …. कष्ट करायचे..

मुख्य म्हणजे….. कशाची आणि कोणाकडून अपेक्षा करायची नाही..

झालं .. इतकंच तर असतं…..

नूतन वर्षाच्या वास्तव शुभेच्छा ……

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ गाणं आपलं आपल्यासाठी… ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆

सुश्री तृप्ती कुलकर्णी

? मनमंजुषेतून ?

☆ गाणं आपलं आपल्यासाठी… ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी 

एखादं गाणं आपल्या आयुष्यात कुठल्या वेळी आपल्या कानावर पडतं त्यावर त्या गाण्याची आणि आपली नाळ किती जुळणार हे अवलंबून असतं असं मला वाटतं. आपल्या मनात त्यावेळी लागलेला एखादा विशिष्ट सूर आणि त्या गाण्याचा सूर जर जुळला तर ते गाणं आपल्या जिव्हाळ्याचं होतं. मग त्याचा राग, त्यातली सुरावट, ते कुणी गायलंय, कुठल्या वेळी गायलंय, त्यातले शब्द, त्याचा अर्थ, या सगळ्या पलीकडे जाऊन ते गाणं आपल्याला एखाद्या जिवाभावाच्या व्यक्तीने, बऱ्याच भेटीनंतर समोर दिसताच आनंदाने बिलगावं तसं बिलगतं. आणि मग पुढे एखाद्या चित्रपटाच्या पार्श्वसंगितासारखं आयुष्यातल्या अनेक प्रसंगात ते गाणं आपल्या मनात त्याच्या विशिष्ट सुरावटीसह रुणझुणत राहतं. अनेक अर्थाने आपल्याला समृद्ध करत राहतं. अशावेळी त्या गाण्याचा मूळ भाव काय, त्याची रचना कशी आहे, कुठल्या प्रसंगात केली आहे, अशा कुठल्याच गोष्टींचा प्रभाव त्यावर पडत नाही. ते गाणं अगदी आपलं आपल्यासाठीच खास झालेलं असतं. आपण आपल्या मनातले, स्वप्नातले विशेष रंग, विशेष सूर त्या गाण्याला दिलेले असतात. आणि त्या भावनेतूनच आपण ते गाणं पुन्हा पुन्हा आपल्या मनात आळवत राहतो.

काही गाणी अशीच मनाला भिडलेली आहेत. त्या त्या वेळी कुठल्या प्रसंगात ती आपल्यासमोर आलेली आहेत ते सुदैवाने माझ्या लक्षात राहिलं आहे. त्यामुळे त्याला अनुसरून असलेला एखादा प्रसंग समोर आला की आपल्या प्ले लिस्टच्या लूपवर टाकल्यासारखी ती आपोआपच सुरू होतात. 

पण त्यातलं एक गाणं फार खास आहे. कारण बऱ्याचदा ते मनात रुणझुणत असतं….. 

‘भय इथले संपत नाही…’. कविवर्य ग्रेस यांचे अफाट शब्दरचना असलेलं शिवाय पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी शब्दबद्ध केलेलं आणि गान सम्राज्ञी लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गाणं अजरामर ठरेल यात शंकाच नाही. पण या गाण्याची गंमत म्हणजे देवकी पंडित, राहुल देशपांडे यांनी देखील हे गाणं गायलं आहे आणि त्या प्रत्येक वेळी ते तेवढेच प्रभावशाली ठरलं आहे. त्यामुळे ग्रेसांच्या आणि हृदयनाथांच्या प्रतिभेला सलाम करावासा वाटतो. 

हे गाणं मी पहिल्यांदा ऐकलं, तो प्रसंग आजही माझ्या डोळ्यासमोर जसाच्या तसा उभा राहतो. अकरावीतली गोष्ट आहे. स्केचिंग करून घरी परत येताना बरीच संध्याकाळ झाली होती. विठ्ठल मंदिराच्या समोरच्या एका छोट्याशा खाजगी रस्त्यावरून मी आमच्या घराकडे निघाले होते. त्या रस्त्यावर पुष्कळ फुलझाडी आहेत. कारण आजूबाजूला बंगले आणि काही जुन्या अपार्टमेंट आहेत. अगदी कातर म्हणावी अशी ती वेळ. झाडांची स्केचेस काढून आम्ही मैत्रिणी परत घरी निघालो होतो. रात्रीच्या रस्त्यावरच्या लाईटमध्ये झाडांच्या पडणाऱ्या सावल्या किती वेगळ्या दिसतात. या विषयावर मी आणि माझी मैत्रीण गप्पा मारत होतो. या निद्रिस्त सावल्या जास्त मोहक की मूळ झाडं? असा आमचा चर्चेचा विषय होता. गप्पा मारता मारता मधल्या एका टप्प्यावर माझी मैत्रीण दुसरीकडे वळली आणि मग मी एकटीच हळूहळू पावलं टाकत घराकडे निघाले. एकटेपणाने वेढलं तसं दिवसभराचा धावपळीचा थकवा चांगलाच जाणवायला लागला. अगदी थोडं अंतर चालणंसुद्धा नको झालं होतं. त्यात पाठीवर जड सॅक, हातामध्ये मोठं स्केचबुक घेऊन उद्याच्या सबमिशनचा विचार मनात चालू होता.

बाहेरचं वातावरण मात्र प्रसन्न होतं. थंडीचे दिवस होते. हवेत सुखद गारवा होता. रस्त्यावरच्या झाडांमुळे, फुलांचा खूप सुंदर असा मंद वास येत होता. रस्त्यावर बराच शुकशुकाट होता. तुरळक सायकलवरून जाणारे कुणी किंवा बंगल्याबाहेर उभे असणाऱ्या काही व्यक्ती असं सोडलं तर फारशी रहदारी नव्हती. तसाही तो रस्ता खाजगी आणि आतल्या बाजूला असल्यामुळे फारशी वर्दळ त्यावर नसायचीच. त्यामुळे माझा तो लाडका रस्ता होता. त्या रस्त्यावरच एका बंगल्याच्या खाली एक कारखाना होता. कारखाना म्हणजे एक मोठी पत्र्याची दणकट शेड होती आणि त्याला मोठ्या खिडक्या होत्या. आत मध्ये भरपूर लाईट लागलेले असायचे आणि तीन-चार लोकं काहीतरी काम करत असायचे. काय काम करायचे ते माहित नाही पण त्या जागेवर बऱ्याचदा फेविकॉलचा वास यायचा. कसला तरी कटिंगचा आवाज यायचा. तिथे उशिरापर्यंत साधारण नऊ-साडेनऊपर्यंत काम चालायचं. तर त्या कारखान्याचे वैशिष्ट्य म्हणजे कधीही, गडबड, गोंधळ ओरडा नसायचा. पण तिथे संध्याकाळ झाली की कायम रेडिओ विशेषतः आकाशवाणी चॅनल चालू असायचा. आणि त्या रेडिओवरची गाणी रस्त्यावर दूरपर्यंत ऐकू यायची. 

त्यादिवशी असाच रेडिओ चालू होता आणि जशी जशी मी त्या कारखान्याच्या जवळ आले तसं माझ्या कानावर हे सूर पडले ‘ भय इथले संपत नाही…’ आणि का कोण जाणे सुरुवातीचे हे शब्द ऐकून मी थबकलेच. हळूहळू जसं ते गाणं पुढे जायला लागलं तशी मी त्याच्यात इतकी रंगून गेले की नकळत मी त्या कारखान्याच्या मागच्या बाजूला असलेल्या चाफ्याच्या झाडाखाली येऊन उभी कधी राहिले ते माझं मलाही कळलं नाही. अगदी शांतपणे कान देऊन जणू झाडांना, गाण्याला किंवा अगदी रस्त्यालासुद्धा माझ्या असण्याचा त्रास होणार नाही अशी काळजी घेत मी ते गाणं ऐकू लागले. वातावरणाची मोहिनी असेल, मनातली स्थिती असेल किंवा आणखीन काही असेल पण त्या गाण्यानं त्या दिवशी मला अगदी अलगदपणे कवेत घेतलं ते आजतागायत. ‘ झाडांशी निजलो आपण झाडात पुन्हा उगवायचे ‘ हे शब्द माझ्या कानावर पडायला आणि बरोबर त्याचवेळी मी उभ्या असलेल्या झाडावरून चाफ्याचं एक फुल गळून माझ्या पायापाशी पडायला एकच गाठ पडली. त्यासरशी एका विशिष्ट तंद्रीत मी पटकन वर बघितलं. सहज आकाशाकडे लक्ष गेलं. स्वच्छ चांदणं होतं. फुल पडण्याचा योगायोग काहीतरी वेगळाच होता. काय झालं ते कळलं नाही. झाडावरून फुलानं सहजपणे ओघळून पडावं तसं त्या गाण्यानं माझं मी पण बाजूला सारून मला आपल्या कवेत घेतलं. आजही अगदी हे लिहीत असतानासुद्धा मला ती भारावलेली अवस्था आठवते. 

नक्की कशाचं भारावलेपण होतं ते माहित नाही. इतकं जाणवलं की हे सूर आपले आहेत. आपल्यासाठी आहेत. आपल्याला आता कायम सोबत करणार आहेत. आणि ते गाणं माझं झालं. त्यानंतर येणाऱ्या अनेक सुखदुःखाच्या प्रसंगात विशेषतः जेव्हा जेव्हा एकटेपणा जाणवतो तेव्हा तेव्हा हे गाणं मला आठवतं. पण वेदना घेऊन नाही तर कसली तरी अनामिक ऊर्जा आणि चैतन्य घेऊन ते गाणं येतं. मला हे गाणं नेहमीच सर्जनशीलतेला उद्देशून म्हटलं आहे असं वाटतं. कदाचित त्यावेळी माझ्या डोक्यात सबमिशनचे विचार असतील ते पूर्ण करण्याचा ताण असेल त्यावर या गाण्यानं थोडं आश्वस्त झाल्यासारखं वाटल्याने असेल. पण मला ते गाणं .. निर्मिकाला निर्मितीचं भय हे कायम व्यापूनच असतं पण तरीही त्या भयाला सहजतेने सामोरं जावं, सश्रद्ध शरण व्हावं मग निर्मिती तुम्हाला पुन्हा संधी देते .. असं सांगणार वाटतं. 

…… निर्मिक आणि निर्मिती यांच्यामधल्या निरंतर चालणाऱ्या खेळात निर्मिकाला लाभणारा उ:शाप वाटतं.

©  सुश्री तृप्ती कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares