मराठी साहित्य – क्षण सृजनाचे ☆ जन्म-1 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ क्षण सृजनाचे : जन्म – 1 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर 

या गोष्टीला खूप म्हणजे खूपच वर्षं झाली. पण काही वेळा स्मृतीच्या तळातून ती अचानक वर उसळून येते. १९६७ सालची गोष्ट. त्या वर्षी मी बी.एड. करत होते.फेबु्रवारी महिना. आमचा फायनल लेसन प्लॅन लागला होता. परीक्षेच्या वेळी पहिल्या दिवशी पहिलाच माझा मराठीचा लेसन होता. युनीट कोणत घ्यावं, कसा लेसन घ्यावा इ. विचार स्वाभाविकपणेच मनात घोळत होते. लेसनसाठी पाठ्य पुस्तकातील कविता निवडावी, की बाहेरची? असं सगळं विचार मंथन चालू होतं. त्यातच माझी मासिक पाळी सुरू झाली. यावेळी चार-पाच दिवस उशीर झाला होता. तरी पाठपरीक्षेपूर्वी ३-४ दिवस सहज सगळं निपटलं असतं. पण यावेळी नेहमीप्रमाणे चार-पाच दिवसानंतरही ब्लिडींग थांबेना. मग मात्र धाब दणाणलं. पाठ परीक्षा हातची गेलीच बहुतेक, असं म्हणत डॉक्टरांकडे गेले.

डॉ. श्रीनिवास वाटवे हे त्या वेळचे नावाजलेले गायनॅकॉलॉजीस्ट. त्यांना दाखवले. त्यांच्याशी बोलणे झाले. त्यांनी `क्युरेटिन’चा सल्ला दिला. संध्याकाळी अ‍ॅडमिट झाले. रात्री सात-साडे सातला क्युरेटीन होणार होते. त्याप्रमाणे मला प्रिपेअर करून टेबलवर घेतले. तिथे भिंतीला लागून असलेल्या शो-केसमध्ये सर्जरीची साधने होती. वेगवेगळ्या आकाराच्या सुर्‍या, कात्र्या, चाकू , सुया, पकडी आणखी किती तरी. लखलखित. चकचकित.

अ‍ॅनॅस्थेशिया देणारे डाक्टर अद्याप यायचे होते. त्यामुळे डॉक्टर, सहाय्यक, नर्सेस सगळी मंडळी डॉक्टरांची वाट बाहेर उभे होते. रूममध्ये टेबलावर फक्त मी आणि भोवतीनं शो-केसमधली लखलखित साधने. हत्यारे.

मी मनाशी पाठाबद्दलचा विचार करायचे ठरवत होते. कशी सुरुवात करायची्… कोणते प्रश्न विचारायचे? वगैरे… वगैरे… पण त्यातलं काही डोक्यात येतच नव्हतं. भरकटलेल्या विचारांना शब्द मिळत गेले-

 

घटका भरत आलेली

जीवघेणी कळ

मस्तक भेदून गेलेली

ललाटीची रेषा,

वाट हरवून बसलेली

घड्याळाची टिक टिक

जिण्याचा तोल साधत

सांडत असलेली

 

इतक्यात डॉक्टर आले. मला भूल दिली गेली. डॉक्टरांनी आपलं काम पूर्ण केलं.

काही वेळाने माझी भूल उतरली. भूल उतरता उतरताही मगाच्याच ओळी मनावर उमटत राहिल्या. त्या पुसून मी पुन्हा पाठाचा विचार करू लागले. पण तो विचार मनातून हद्दपारच झाला. त्याच्याच पुढच्या ओळी प्रगटत राहिल्या.

 

इथरची बाधा

नसानसातून शरीरभर भिनलेली…

लाल… हिरवी… पिवळी… निळी वर्तुळं

काळवंडत गेलेली…

पांढर्‍या शुभ्र ठिपक्यांच्या

लयबद्ध हालचाली.

पाजळत्या रक्तपिपासू हत्यारांची

लांबच लांब पसरलेली

अशुभ सावली.

संज्ञा बधीर होताना

सारं सारं दूर सरतय.

रक्तात उमलणार्‍या

गुलबकावलीचं हसू,

लाटालाटांनी मनभर उसळतय.

अणूरेणू व्यापून उरतय.

 

इथे माझ्या नेणिवेने क्युरेटिनचं `सिझेरियन केलं होतं आणि कल्पनेनं गुलबकावलीचं फूल माझ्या ओंजळीत ठेवलं होतं. माझ्या `जन्म’ या कवितेचा जन्म अशा रीतीने तिथे ऑपरेशन टेबलवर झाला.

©  श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनाचे ☆ ऋतुचक्र ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ क्षण सृजनाचे : ऋतुचक्र – श्रीमती उज्ज्वला केळकर

सकाळी चहा केला, की स्वैपाकघराला लागून असलेल्या गॅलरीत उभं राहून समोरच्या झाडा-पेडांकडे बघत बघत चहा घ्यायची माझी जुनीच सवय. सकाळचा थोडासा गारवा, समोरच्या झाडा-पेडांच्या हिरवाईमुळे डोळ्यांना मिळणारा थंडावा, थोडी का होईना, स्वच्छ हवा, या सार्‍या वातावरणामुळे देह-मन कसं प्रसन्न होतं. ही सारी प्रसन्नता मग दिवसभर पुरवायची.

मध्यंतरी मी आठ – दहा दिवस गावाला गेले होते. त्यावेळी झाडांची पानगळ अगदी भरात होती. त्यांच्या अंगा –खांद्यावर बागडणारे, विसावणारे पक्षी कसे स्पष्ट दिसत होते.

गावाहून परत आले. दुसर्‍या दिवशी नेहमीप्रमाणे चहा घेऊन गॅलरीत उभी राहले, तर एक पक्षी चिर्रर्र करत आला आणि झाडांच्या पानांच्या हिरव्या छ्त्रीत छ्पून गेला. सगळीकडं शोध शोध शोधलं त्याला, पण कुठे म्हणून दिसेना. मनात आलं, जाताना ओकं- बोकं वाटणारं झाड बघता बघता नव्या नाजुक कोवळ्या, पोपटी पालवीनं कसं भरून गेलय. वार्‍याच्या मंद झुळुकीबरोबर नवी पालवी हिंदोळत होती. झुलत, डुलत होती.

एका खालच्या फांदीच्या डहाळीवर एका  कोवळ्या पानाशेजारी एक जीर्ण शीर्ण झालेलं जुनं पान होतं. त्याचं जून, जरबट देठ अजूनही डहाळीला धरून होतं. पण ते बोट आता कधीही सुटणार होतं. त्याच्या शेजारचं कोवळ, लहानगं पान कधी त्याला लडिवाळ स्पर्श करून जायचं, तर कधी क्षणभर त्याच्या छातीवर मान ठेवून पाहुडायचं. तिकडे बघता बघता वाटलं, जसं काही आजोबांच्या छातीवर डोकं ठेवून नातू पहुडलाय आणि गप्पा मारतोय आजोबांशी. मनाला मग चाळाच लागला, काय बर बोलत असतील ते?

त्या जुन्या पानाला आता लवकरच डहाळीपासून दूर जावं लागणार होतं. त्याने शेजारच्या नव्या कोवळ्या पानावरून हात फरवत त्याचा निरोप घेतला, तशी ते नवं पान रडवेलं होत म्हणालं, ‘आजोबा, जाऊ नका नं तुम्ही! मला खूप खूप वाईट वाटेल तुम्ही गेल्यावर!’

जुनं जून पान म्हणालं, ‘मला जायलाच हवं. आम्ही जुन्या पानांनी जागा करून दिल्याशिवाय या फांद्यांवर, डहाळ्यांवर नवी पानं, फुलं काशी येतील?’

‘कुठे जाशील तू इथून?’ नव्या पानाने विचारलं.

‘मी इथून झाडाच्या तळाशी जाईन. तळाच्या मातीवर पडेन. हळू हळू माझा चुरा होईल. त्यावर पाणी पडेल. मग मी हळू हळू जमिनीच्या आत आत जाईन. माझं खत होईल. मी आणखी आत जाईन. मुळापाशी जाईन. मुळं माझं सत्व शोषून घेतील. वर वर खोडातून फांद्यांपर्यंत , डहाळ्यांपर्यंत पोचवतील. तिथून पाना-फुलांपर्यंत पोचवतील आणि आशा तर्‍हेने मी तुझ्याकडे येईन नि तुझ्यात सामावून जाईन. आता नाही नं तू उदास होणार? रडणार?

‘आजोबा लवकर याल नं? मी वाट पाहीन.’

‘हो तर!’ असं म्हणता म्हणता जून जरबट देठाने आपलं डहाळीचं घर सोडलं. पिवळं पाडलेलं जून जरबट पान इवल्या पानाचा निरोप घेत खाली आलं आणि झाडाच्या तळाशी विसावलं. तळाशी असेलया इतर सोनेरी, तपकिरी पानात मिसळून गेलं. तिकडे पाहता पाहता एकदमच सुचलं –

पर्णरास सोनियाची तरुतळी विसावली वर हासतात फुले, रत्नझळाळी ल्यालेली

आज हासतात फुले, उद्या माती चुंबतील हसू शश्वताचं त्यांचं, रस फळांचा होईल.

पुन्हा झडतील पाने , फुले मातीत जातील. रस जोजवेल बीज बीज वृक्ष प्रसवेल.’

तर अशी ही कविता. समोरच्या झाडाची बदलती रुपे बघता बघता सहजपणे सुचलेली.

 

©  श्रीमती उज्ज्वला केळकर, सम्पादिका – ई-अभिव्यक्ति (मराठी)

176/2 ‘गायत्री ‘ प्लॉट नं12, वसंत साखर कामगार भवन जवळ , सांगली 416416 मो.-  9403310170

Please share your Post !

Shares
image_print