सूचना/Information ☆ सम्पादकीय निवेदन – श्री रवींद्र  सोनावणी – अभिनंदन ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

श्री रवींद्र सोनावणी

🏆 हार्दिक  अ भि नं द न 🏆

आपल्या समुहातील ज्येष्ठ कवी श्री रवींद्र सोनावणी यांना, शब्दसेतू साहित्य मंच, पुणे आयोजित काव्यलेखन स्पर्धेत  प्रथम पुरस्कार प्राप्त झाला आहे. ई- अभिव्यक्ती परिवाराकडून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा💐

संपादक मंडळ

ई अभिव्यक्ती मराठी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मातृवंदना… ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆

श्री रवींद्र सोनावणी

? कवितेचा उत्सव ?

☆ मातृवंदना… ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆

(प्रथम पुरस्कार प्राप्त कविता)

आज तुझ्या त्या पावन स्मृतीला त्रिवार हे वंदन

अमुच्यासाठी झिजलिस निशीदिनी होऊनिया चंदन

 

जीवन सरले दुःख सोसता

कधी न आटली माया ममता

गरिबीचा तर शाप भयानक

तुझ्या ललाटी लिहीला होता

या व्यवहारी जगात नडले तुजला साधेपण

अमुच्यासाठी झिजलिस निशीदिनी होऊनिया चंदन

 

पंचत्वामधी विलीन होऊन

आभाळाला गेलीस भेदून

तरीही अमुच्या हृदयी उरलीस

तू प्रेमाचा सुगंध होऊन

प्रसन्न होऊन देवाने तुज स्वर्ग दिला उघडून

अमुच्यासाठी झिजलिस निशीदिनी होऊनिया चंदन

 

चंद्र सूर्य अन् तारे देखील

तव त्यागाची किर्ती सांगतील

अंगणातील फुलझाडेही

तुझ्याचसाठी बहरुन येतील

लोचनातून आठवणींचा पाझरतो श्रावण

अमुच्यासाठी झिजलिस निशीदिनी होऊनिया चंदन

© श्री रवींद्र सोनावणी

निवास :  G03, भूमिक दर्शन, गणेश मंदिर रोड, उमिया काॅम्पलेक्स, टिटवाळा पूर्व – ४२१६०५

मो. क्र.८८५०४६२९९३

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सत्य… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

?  कवितेचा उत्सव  ?

☆ सत्य… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

दुःखालाही कंटाळा आला,

वास्तव्याला राहण्याचा !

सतत प्रश्न अन् कटु सत्याला,

संगत घेऊन जगण्याचा !…..१

*

कोण तू  अन् कोण मी,

आपण सारे भाग सृष्टीचे

उत्पत्ती अन् लय यांचे,

साक्षी निसर्ग किमयेचे !….२

*

कुठे, कसे, कधी जन्मा यावे,

हे तर आपल्या हाती नाही

लक्ष योनीतून फिरता फिरता,

जगी काळ घालवतो काही !…३

*

धागे सारे मोह मायेचे ,

उगीच बांधतो स्वतःभोवती

मोहवणाऱ्या जगी  जिवाला,

गुंफून घेतो अवतीभवती !….४

*

सत्य चिरंतन मना  उमगते,

जेव्हा येते कधी आपदा

निमित्त मात्र ही असतो आपण,

भू वरी या सदा सर्वदा !…५

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग १० ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग १० ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- आयुष्यात कोणतेही प्रसंग कोणत्याही घटना कधीच विनाकारण घडत नसतात. त्याला कांही एक कार्यकारणभाव असतोच.माझी बहिण आणि मेव्हणे दोघांनीही मला एम्प्लॉयमेंट एक्स्चेंजमधे नाव नोंदवायला प्रवृत्त करणंही याला अपवाद नव्हतं याचा थक्क करणारा प्रत्यय मला लवकरच येणार होता!)

खरंतर अशा विशिष्ट कार्यकारणभाव असणाऱ्या पण त्या त्या क्षणी चकवा देत अकल्पितपणे घडत रहाणाऱ्या प्रसंगांनीच आयुष्य आकाराला येत असतं.ते सगळे क्षण आपण नेमके कसे स्विकारतो यावरच आपलं हेलपाटणं किंवा सावरणं अवलंबून असतं.मी त्याक्षणी आयुष्यात अशा वळणावर उभा होतो,की एखादीही नकारात्मक घटना स्विकारण्याची माझी मानसिक तयारीच नव्हती.पण अगदी कोणत्याही क्षणी घडू शकतील असे माझ्या ‘त्या’च्यावरील श्रद्धेची कसोटी पहाणारे अनेक प्रसंग मात्र वाटेत दबा धरुन बसलेले होतेच.मला ते ज्ञात नसल्यामुळेच केवळ मी अज्ञानातल्या सुखात निश्चिंत होतो!

दुसऱ्या दिवशी बहीण आणि मेव्हण्यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार मी दोन दिवस उन्हात हेलपाटे घालून मुंबईतल्या एम्प्लॉयमेंट एक्स्चेंजमधे नाव नोंदवलं. फॉर्म भरताना पत्रव्यवहाराचा पत्ता अर्थातच बहिणीचा दादरचाच दिला होता.

मुंबईतल्या कडक उन्हात मी दोन दिवस घातलेल्या त्या हेलपाट्यांमुळे किंवा मुंबईतल्या बदललेल्या हवापाण्यामुळेही असेल मला अचानक खूप ताप भरला. सलग तीन दिवस डाॅक्टरांचं औषध घेतल्यानंतर तो हळूहळू उतरला तरी अशक्तपणा जाणवत होताच.मन तर मरगळूनच गेलं होतं. अगदी बहिण झाली तरी तिच्यावर असं ओझं बनून पडून रहाणं मला नको वाटतं होतं.एखादा चमत्कार घडावा तसा मनात भरुन राहिलेला तो अंधार अचानक नाहीसा होऊन लख्ख प्रकाश जाणवला तो माझ्या मोठ्या भावाकडून आलेल्या अनपेक्षित टेलिग्राममुळे!

इस्लामपूरला भावाच्या बि-हाडी स्टेटबॅंकेने पाठवलेलं माझं अपाॅईंटमेंट लेटर येऊन पडलं होतं.त्यानुसार जाॅईन व्हायला पंधरा दिवसांची मुदत होती.भावाने तत्परतेने ते काॅललेटर रजिस्टर पोस्टाने दादरच्या पत्त्यावर पाठवून दिल्याची ती तार होती!

माझ्या आनंदाला पारावार राहिला नाही.नकारात्मक विचारांनी मलूल झालेलं मन एकदम उल्हसित झालं.पिसासारखं हलकं होऊन हवेत तरंगू लागलं.मनाच्या उभारीमुळे अंगातला अशक्तपणा कुठल्याकुठे पळून गेला.

मी मुंबईला यायला निघाल्यापासूनच्या काळात घडलेली ही पहिलीच सुखद घटना न् तीही अशी अनपेक्षित. त्यामुळे ती मनाला उभारी देत होती आणि मला पूर्णत: निश्चिंतता!

भावाने पाठवलेलं रजिस्टर मिळालं त्याच्या दुसऱ्या दिवशीच त्यातलं काॅल लेटर घेऊन मी स्टेट-बँकेच्या स्टाफ डिपार्टमेंटमधे जाऊन भेटलो तो ‘गुरुवार’ होता!हा योगायोग मला दिलासा देत मनावरचं अनामिक दडपण थोडं दूर करणाराच होता.बॅंकेच्या मेडिकल आॅफीसरना ऍड्रेस केलेलं माझ्या मेडिकल टेस्टसाठीचं पत्र आणि स्टेट बॅंकेच्या वरळी ब्रॅंचला जॉईन होण्यासाठीचं कॉल लेटर तयार होईपर्यंत मला बसायला सांगण्यात आलं.ती दहाएक मिनिटं मी खूप रिलॅक्स होतो. आई-बाबा,भाऊ सगळ्यांची अतिशय तिव्रतेने आठवण झाली.  आणि त्यांना हे सगळं सांगण्यासाठी मी आतूर होऊन गेलो.मोबाईल खूप दूरची गोष्ट,तेव्हा घरोघरी टेलिफोनही नसायचे.पत्र हे एकच संपर्काचं साधन. त्यामुळे घरच्या आठवणींसोबत उलटसुलट विचार मनात गर्दी करीत होते.भावाचा विचार मनात आला आणि आठवण झाली ती त्याने पूर्वी याच विषयीच्या गप्पांच्या ओघात मला सांगून ठेवलेल्या एका गोष्टीची. ती आठवताच मी क्षणभर साशंक झालो. इथले मेडिकल ऑफिसर कुणी ख्रिश्चन डॉक्टर होते. ते अतिशय स्ट्रीक्टच नव्हे फक्त तर खडूसच होते म्हणे. त्यांना व्यवस्थित फेस करणं महत्त्वाचं होतं. मी याच सगळ्या विचारात दंग असतानाच माझ्या हातात माझ्या मेडिकल टेस्टसाठीचं आणि माझं पोस्टींगचं अशी दोन्ही पत्रे देण्यात आली. मेडिकल टेस्टचं पत्र पाहिलं आणि मला आश्चर्यचा धक्काच बसला. पत्र त्या कुणा ख्रिश्चन मेडिकल आॅफीसरच्या नावे नव्हतं तर चक्क ‘डॉ.आनंद लिमये’ यांना ऍड्रेस केलेलं होतं! नेहमीचे ते खडूस मेडिकल-ऑफिसर रजेवर होते म्हणे.म्हणून त्यांच्या जागी  पॅनलवर नाव असणारे हे  डॉ.आनंद लिमये त्यांचा तात्पुरता कार्यभार सांभाळत होते!मला माझ्या मेडिकल टेस्टसाठी त्यांच्याच क्लिनिकमधे जायचं होतं.माझ्या मोठ्या भावाचं नावही आनंद लिमयेच. मनाला थक्क करणारा हा योगायोग निदान त्याक्षणी तरी मला एक शुभसंकेतच वाटला होता! मेडिकल टेस्टचं दडपण क्षणार्धात विरूनच गेलं.आता यापुढं आयुष्यात हवं ते मिळवण्यापासून मला कुणीही रोखू शकत नाही ही कल्पनाच अतिशय सुखकारक होती.मी लगेचच डॉ.आनंद लिमये यांना भेटलो.तो शुक्रवार होता.मेडिकल टेस्ट फॉरमॅलिटीज् पूर्ण होऊन मी संध्याकाळी उशिरा घरी परत आलो.माझं पोस्टींग वरळी ब्रॅंचला झालेलं असल्याने मेडिकल रिपोर्ट ते दुसऱ्या दिवशी  परस्पर वरळी ब्रँचलाच पाठवणार होते जिथे मला सोमवारी जॉईन व्हायचं होतं !

दुसऱ्या दिवशीचा रविवार हा माझ्या आयुष्यातला आरामाचा अखेरचा दिवस ही कल्पनाच उत्साहाला उधाण आणणारी होती.त्यानंतर माझं अतिशय धावपळीचं, जबाबदारीचं नवं आयुष्य सुरु होणार होतं!मुंबईला येण्यासाठी घर सोडतानाची अस्वस्थता आणि अनिश्चितता यांचा लवलेशही आता मनात नव्हता.सगळा संघर्ष संपला होता आणि मी जणूकाही प्रशस्त

प्रकाशवाटेच्या उंबरठ्यावर उभा!तो उंबरठा ओलांडून त्या वाटेवर पहिलं पाऊल टाकणंच काय ते बाकी होतं!आता घरची जबाबदारी मी उचलू शकणार होतो.मोठ्या भावाच्या डोईवरचं ओझं मला हलकं करता येणार होतं.सर्वार्थानं  सर्वानाच दिलासा देणारं हे अनोखं वळण माझ्यासाठी ‘त्या’नं मला दिलेलं वरदानच होतं जसं कांही. आयुष्य इतकं सरळ सोपं असू शकतं याचा असा आनंददायी  अनुभव मी आयुष्यात प्रथमच घेत होतो. मनात होता फक्त आनंद,उत्साह आणि नवं कार्यक्षेत्र,तिथली माणसं,कार्यपध्दती,नवा अनुभव या सगळ्याबद्दलची आतूर उत्सुकता..! पण…? पण हे सगळं माझ्यासाठी अळवावरचं पाणीच ठरणार आहे अशी पुसटशी शंकाही तेव्हा माझ्या मनात आलेली नव्हती!आयुष्य इतकं सरळ सोपं नसतं याचा धक्कादायक प्रत्यय माझ्यावर आघात करायला टपून बसला होता हे हातून सगळं निसटून गेल्यानंतरच मला समजणार होतं.अगदी होत्याचं नव्हतं झाल्यानंतर!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ लंच ब्रेक… ☆ डॉ. शैलजा करोडे ☆

डॉ. शैलजा करोडे

🌸 जीवनरंग 🌸

☆ लंच ब्रेक… ☆ डॉ. शैलजा करोडे

रात्रीचे दहा वाजलेत. शहरातील शासकीय रूग्णालयात दहा/बारा मुले अत्यवस्थ आहेत. शाळेची मुख्याध्यापिका असल्याने ही मुले माझीही जवाबदारी असल्याने मी ही रूग्णालयात थांबून होते. मुलांचे आई वडील तर चिंताक्रांत तर होतेच पण माझीही चिंता काही कमी नव्हती. उलट मला पालकांच्या रोषाला सामोरे जावे लागत होते. होय दुपारच्या मध्यान्ह भोजनानंतर मुलांना उलट्या व जुलाबाचा त्रास सुरू झाला होता. मी मुलांना ताबडतोब रूग्णालयात दाखल तर केलेच, पालकांनाही सूचित केले होते. “मॅडम, असं घडलंच कसं, काय खाल्लं मुलांनी आज ” ” काय म्हणजे, खिचडी आणि उसळ होती आजच्या मेनूत. ” ” मुलांना खायला देण्यापूर्वी तुम्ही किंवा तुमच्या शिक्षकांनी टेस्ट नाही केलं काय ? ” ” केलं ना, आमच्या शिक्षिका अरूंधती मॅडमने खाऊन पाहिलं थोडं. नंतरच मुलांना वाढलं. त्यांना त्रास नंतर झाला, तोपर्यंत मुलांची जेवणं आटोपली होती. त्याही खाजगी रूग्णालयात आहेत. ” ” ते काही नाही, आमच्या मुलांच्या जीवावर बेतलंय. याची चौकशी झालीच पाहिजे. दोषींवर कार्रवाही झालीच पाहिजे. ” पालकांचा सूर निघाला होता. तर काही पालकांनी पोलिस स्टेशनातही तक्रार दिली होती. या सगळ्याला सामोरं जायचं होतं मला. दिवसभर भूक तहान विसरुन मी रूग्णालयात थांबून होते.

विशाखा, रात्रीचे दहा वाजलेत. मी येतोय रूग्णालयात तुला न्यायला. घरी मुले व आई बाबा चिंतेत आहेत. सगळं ठीक होईल. रूग्णालयात डाॅक्टर्स, नर्सेस आणि मुलांचे आई वडील आहेतच. तू तुझे कर्तव्य केलेच आहेस. तुझ्या रूग्णालयात थांबण्याने परिस्थिती बदलणार आहे काय ? आपण डाॅक्टर्स च्या संपर्कात राहणार आहोतच. मी येतोय.”

इतक्यात डाॅक्टर आलेत राऊंडला. ” काय म्हणताय आमचे छोटे उस्ताद ” डाॅक्टरांच्या या आपुलकीच्या वाक्यानेच रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांमध्ये चिंतेचे सावट जाऊन थोडा उत्साह संचारला. ” व्हेरी गुड, काय बरं वाटतंय ना आता. घरी जायचंय काय ? ” ” होय डाॅक्टर अंकल ” प्रथमेश चौधरी बोलला. प्रथमेश इयत्ता पाचवीत शिकणारा दहा वर्षीय विद्यार्थी होता. नंतर निलेश, प्रकाश, प्रज्वल बरीच मुले आता बरं वाटत आहे सांगत होती. बारा पैकी दहा मुलांना डाॅक्टरांनी घरी नेण्यास परवानगी दिली. घरीच मुलांची काळजी घ्या. गरम व पचायला हलकं अन्न द्या दोन तीन दिवस. Now you are o k my little friends. take care.

मुलांना डिस्चार्ज मिळाला. मलाही थोडं बरं वाटलं. आता निकिता आणि वेदांत राहिले होते. त्यांना अजूनही अशक्तपणा वाटत होता त्यामुळे सलाईन चालू होते. डाॅक्टरांनी रूग्ण फाईलमध्ये औषधे लिहून देऊन नर्सला तशा सूचना दिल्या.

अशोक मला नेण्यासाठी रूग्णालयात आले. निकिता व वेदांतलाही भेटले. ” काळजी घ्या ” त्यांच्या पालकांशी बोलले, चल विशाखा, बराच उशीर झालाय. किती मलूल दिसतोय तुझा चेहरा. पाणी सुद्धा प्यायलेली दिसत नाहीस बर्‍याच वेळेपासून ” म्हणत अशोकने पाण्याची बाॅटल उघडून आधी मला पाणी प्यायला लावले. तशी मला थोडं बरं वाटलं. चहा आणू काय तुझ्यासाठी” “नको, अकरा वाजयला आलेत, आता कोठे मिळेल चहा, चला घरी जाऊ” आम्ही निघालो. पण विचारचक्र माझी पाठ सोडत नव्हतं.

सरस्वती विद्या मंदिर माझी शाळा साक्षात सरस्वतीची उपासना करणारीच होती. चांगला हुशार, होतकरू, मेहनती शिक्षक व कर्मचारी वृंद हे माझ्या शाळेचं वैशिष्ट्य. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव, संगीत, पोहणे, मैदानी खेळ, श्रमदानातून वृक्षारोपण व इतर विकासात्मक कार्यक्रम राबविणे, यामुळे शाळेचा नावलौकीक सर्वदूर पसरला होता. माझ्या शाळेत प्रवेश मिळावा म्हणून पालकांची धडपड असायची, विशेष म्हणजे पटसंख्येअभावी बंद पडणार्‍या मराठी शाळा पाहाता आमची शाळा मात्र आगळ्या वेगळ्या वैशिष्ट्यासह नावलौकिक मिळवत होती. शाळेची पटसंख्या 425 होती ही खरंच माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट होती. माझ्या शाळेत गरीब परिस्थितील मुलेही भरपूर होती. मध्यान्ह भोजन ही तर त्यांची गरज होती. शाळेच्या निमित्ताने त्यांचं एकवेळचं भोजन होत असल्याने कुपोषणातून ही मुले बाहेर आली होती.

रोज दुपारी एक वाजता लंच ब्रेक व्हायचा. मुलांची शाळेच्या वर्‍हाड्यातचं अंगत पंगत व्हायची. तत्पपूर्वी शाळेतील एक शिक्षिका आधी ते अन्न ग्रहण करायची व मगच ते मुलांना वाढलं जायचं. कालपर्यंत सगळंच व्यवस्थित चाललं असतांना आज मात्र ही घटना घडली होती. मुलांना अन्न विषबाधा झाली होती.

“विशाखा उतर खाली. घर आलंय आपलं ” मी तंद्रीतून बाहेर आले. ” नको इतका विचार करूस. सांभाळ स्वतःला. आजारी पडायच. काय तुला “” पणअशोक शाळेची प्रमुख म्हणून मलाच जवाबदार धरणार ना. चौकशीचा ससेमिरा माझ्याच मागे लागणार ना ” ” लागू दे ना चौकशीचा ससेमिरा. तू कशी काय दोषी असशील ?. अन्नधान्य खरेदी, अन्नधान्य पुरवठा करणारे, नंतर अन्न शिजविणारे केटरर्स, भली मोठी साखळी आहे ही. तुझा तर याच्याशी काहीही संबंध नाही. मग कशाला चिंता करतेस” “अशोक अजूनही दोन मुलं रूग्णालयात आहेत. मुले शाळेत पाच सहा तास असतात म्हणजे आम्हीही त्यांच्या आईच्या भूमिकेत असतो रे. माझं मन नाही लागत “. “बरोबर आहे तुझं. ती दोन्ही मुलंही उद्या डिस्चार्ज होतील. काही काळजी करू नकोस. झोप शांतपणे, दिवसभर खूप दमली आहेस “

नेहमीप्रमाणे शाळेची प्रार्थना आटोपुन विद्यार्थी आपापल्या वर्गात गेले. शाळेचं पुढील आठवड्यात इन्स्पेक्शन होणार होतं. मी शाळेचा वर्षभरातील सगळा अहवाल नजरेखालून घालत होते कि शिपाई अर्जुन आला व पोलीस इन्स्पेक्टर भोसले चौकशीसाठी आल्याचे सांगितले. काही पालकांनी तक्रार नोंदवली होती. “पाठव त्यांना आत”

मॅडम काल काही मुलांना मध्यान्ह भोजनानंतर विषबाधा झाली. त्यासंदर्भात चौकशीसाठी आलोय.

“या, बसा इन्स्पेक्टर “

तर मॅडम, शाळेला अन्न कोणत्या कोणत्या केटरर कडून येतं. ?

प्रिया केटरर्स सर्व्हिसकडून “रोज मुलांना अन्न देण्यापूर्वी शिक्षिकांनी आधी ग्रहण केलं जातं काय ? ” होय, कालही अरुंधती मॅडम यांनी ग्रहण केलं होतं. त्यांनाही त्रास झाला. त्याही खाजगी रूग्णालयात आहेत. ” ” ठीक आहे मॅडम, पुढील चौकशी करतो आम्ही. तुम्हांलाही कळवू ” ओ के इन्स्पेक्टर ” 

ही काही माझ्याच शाळेपुरती मर्यादित घटना नव्हती. अनेक ठिकाणी नित्कृष्ठ अन्न, केटरर्सचा हलगर्जीपणा, अन्न शिजवतांना स्वच्छता न राखणे यानुळे असे प्रकार घडतात. कालच्या घटनेतही हाच प्रकार आढळून आला. दोषींवर कार्रवाहीपण होईल. पण मुलांचं काय ? माझ्या ओळखीतील एका गरजवंत काकुंना मी शालेय मध्यान्ह भोजनाची व्यवस्था करणार काय म्हणून विचारलं, ” होय करीन कि मी, पण मला एवढे झेपेल काय ? ” काकू दोन तीन मदतनीस ठेवा ना. त्यांनाही रोजगार मिळेल आणि माझ्या मुलांना सात्विक घरगुती भोजन मिळेल. मी तुमचं नाव कळवते वरती.

आता लंच ब्रेक मध्ये मी ही मुलांसोबत असते.

“वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे

सहज हवन होते नाम घेता फुकाचे

जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्णब्रम्ह

उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म “

मी खर्‍या अर्थाने जगते.

© डॉ. शैलजा करोडे

नेरुळ नवी मुंबई मो. 9764808391

ईमेल – karodeshailaja@gmail.com 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “साठवणीतल्या आठवणी…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ “साठवणीतल्या आठवणी…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

गोष्ट आहे तुमच्या माझ्या आईची…

आमच्या परीक्षा झाल्या की आई वर्षभराच्या साठवणीच्या कामाला  लागायची. प्रथम फळीवरचे मोठे पत्र्याचे  आणि ॲल्युमिनियमचे डबे खाली काढले जायचे. डबे  धुऊन उन्हात वाळवले जायचे.

ऊन कडक आहे… याचा आईला आनंद व्हायचा .त्यात घडी करून ठेवलेले प्लास्टिकचे मोठे कागद असायचे. ते स्वच्छ धुऊन ऊन्हात  वाळवायचे .आदल्या दिवशी गच्ची  झाडून घ्यायची. संध्याकाळी बादलीने पाणी वर न्यायचे आणि गच्ची धुऊन काढायची.

सगळ्यात प्रथम मान सांडग्यांचा असायचा. लाकडी पाट धुवून वाळवून ठेवलेला असायचा. रात्री हरभरा, मूग, उडीद डाळ भिजत घालायची. सकाळी पाट्यावर मिरची आले मीठ घालून जाडसर वाटायची .

पाटावर मध्यभागी सुपारी ठेवली जायची .त्यावर हळदीकुंकू वाहून आई मनोभावे नमस्कार करायची. वर्षभराचे पदार्थ चांगले व्हावेत म्हणून गणपतीची प्रार्थना करायची.

कामाचा” श्री गणेशा” व्हायचा…

त्या सुपारीभोवती गोल गोल सांडगे घालायचे .पाट उचलून वर गच्चीत ठेवायचे काम आमचे असायचे. बाकीच्या पिठाचे सांडगे वर गच्चीत प्लास्टिक वर घातले जायचे. त्यांचा आकार जराही कमी जास्त झालेला आईला चालायचा नाही .एकसारखे सांडगे सुरेख दिसायचे. ते जरासे वाळले की आमची खायला सुरुवात व्हायची.  वरून कडक आणि आतून ओलसर सांडगे खाऊनच निम्मे संपायचे. साठवणीचे करण्यासाठी आई परत एकदा करायची. हे सांडगे तळून भाजलेल्या दाण्याबरोबर खाल्ले जायचे. भाजी नसेल त्या दिवशी  खोबरं,कांदा,लसुण यांच वाटण करून  त्यात सांडगे घालून आई त्याची भाजी करायची .तळून कढीत टाकले की गरम भाताबरोबर खाताना भाताची चव मस्त लागायची.

नंतर पापडाचा नंबर लागायचा. उडीद आणि मूग डाळ गिरणीत समोर उभं राहून आई दळून आणायची. सकाळीच पापडखार, काळीमिरी, घालून उडदाचे पीठ घट्ट भिजवले जायचे .अगदी “दगडासारखे” हा शब्द आईचाच… ते कुटुन द्यायचे काम भावाचे असायचे. वरवंट्याने दणादण तो पीठ कुठून द्यायचा. आई तेलाचा हात लावून बोट्या करून ठेवायची. त्याची चव अप्रतीम लागायची. येता जाता आम्ही ते पापडाचे पीठ आवडीने खात असू. शेजारच्या दोन-तीन काकु त्यांचे जेवण झाले की पोलपाट लाटणे घेऊन यायच्या .गोल बसून घरात गप्पा मारत पापड लाटणे सुरू व्हायचे. लाटलेले पापड हातावर घेऊन आम्ही वर उन्हात नेऊन घालत असु.हे  पापड सारखे हलवायला लागायचे नाही तर कडक  होऊन त्यांचा आकार  बदलायचा. आई खालूनच सांगायची..”पापडाचा द्रोण होऊ देऊ नका रे” वर एकदा येऊन आई नजर टाकून जायची.  रात्री मुगाची खिचडी व्हायची .त्याच्याबरोबर ताजा तळलेला पापड असायचा…

सगळ्यात जास्त व्याप असायचा तो गव्हाच्या कुरडयांचा. त्यासाठी आई तीन दिवस गहू भिजत घालायची. नंतर ते पाटावर  वरवंट्याने वाटायचे .मग  भरपूर पाण्यात कालवायचे. चोथा  व सत्व वेगळे करायचे.  त्याला गव्हाचा  चीक  म्हणायचे.आई लवकर उठून तो चीक  शिजवायची. तो गरम असतानाच कुरडया घालायला लागायच्या.  पात्र भरून  द्यायचं काम बहिणीचे व माझे असायचे. हा.. हा म्हणता.. पांढऱ्याशुभ्र कुरडयांनी प्लास्टिक भरून जायचे. त्यावर्षी काही मंगल कार्य असेल तर रंगीत कुरडया घातल्या जायच्या. सूर्यदेव वर यायच्या आत कुरडया घालून झाल्या पाहिजेत असे आईने ठरवलेले असायचे.

नंतर आई आम्हाला खाण्यासाठी चिक शिजवून द्यायची. त्यात तूप घालून किंवा दूध साखर किंवा हिंग जिऱ्याची कडकडीत फोडणी करून खाल्ला तरी तो छान लागायचा.

सुट्टीच्या दिवशी वडील सकाळीच सायकलवरून मोठ्या मंडईत जायचे.  भरपूर बटाटे आणायचे. बटाटे किसायची मोठ्या भोकाची किसणी वर्षातून एकदाच माळ्यावरून खाली यायची. पहाटे उठून बटाटे उकडायचे ,सोलायचे व थेट प्लास्टिक वर खीसायचे. उन्हाने चार-पाच वाजेपर्यंत  कीस कडकडीत  वाळून जायचा .त्यात  दाणे ,तिखट, मीठ ,साखर घालून  चिवडा केला जायचा. कधी त्यात नाॅयलाॅन साबुदाणा तळून घातला जायचा. गावाला जाताना गाडीत खायला आई हा चिवडा करून घ्यायची.

साबुदाणा दळून आणून त्या पीठात ऊकडलेला बटाटा  घालून  ऊपवासाचे पापड केले जायचे. त्यातही मिरचीचे व  तिखटाचे असे दोन प्रकार होते. बटाट्याचे चिप्स लहानपणी खूप आवडायचे. जाळीचे व प्लेन असे वेफर्स करणारी चपटी किसणी होती .त्या वेफर्सची ट्रायल घेण्यातच बरेचसे बटाटे खर्ची व्हायचे. कितीही प्रयत्न केला तरी तीन-चार फक्त पातळ व्हायचे बाकी जाडच…… तरीसुद्धा ते जाडे जुडे वेफर्स आम्ही आवडीने खात होतो. त्याची दरवर्षी काहीतरी निराळी पद्धत आईला कोणीतरी सांगे. तरी बटाटा पातळ  कापला जायचा नाही. कंटाळून आई विळीवर पातळ काप करून घ्यायची. विकतचे वेफर्स हा फार महाग पदार्थ समजला जायचा त्यामुळे तो आणला जायचा नाही. साबुदाण्याच्या पापड्या घातल्या जायच्या. मध्ये जरा ओलसर असलेल्या त्या ओल्या कच्च्या पापड्या सुद्धा छान लागायच्या. थोडीशी खारट साबुदाण्याची व जिऱ्याची चव यांचा मस्त मेळ जमायचा… या पापडाच्या पिठात शिजवताना बटाटा किसून घालायचा व मिरची वाटून लावायची त्या जरा वेगळ्या पापड्या तळल्यावर सुंदर दिसायच्या.

मसाल्याच्या भरलेल्या मिरच्या, साबुदाणा भरलेल्या उपासाच्या मिरच्या ,कुटाच्या मिरच्या असे मिरच्यांचे प्रकार व्हायचे. दहीभाताला किंवा दही पोह्याला हीच मिरची लागायची.

शेवयांसाठी खास दोन-तीन दिवस राखून ठेवलेले असायचे .त्याचे पीठ जमले….. शेवयांची बारीक तार निघालेली पाहिली की आई खुष व्हायची .हातावर शेवया  करायच्या. लांब करून त्या न तुटतील इतक्या ताणायच्या. लाकडी काठीवर वाळवायच्या. केशर ,बदाम आणि अटीव दुधातल्या त्या खिरीची चव अजून जिभेवर  आहे . त्या शेवयांचे जे तुकडे खाली पडायचे त्याचा कांदा, कोथिंबीर,भाज्या घालून उपमा केला जायचा. तो फारच चवदार लागायचा .तेव्हा नूडल्स हा प्रकार नव्हता . नूडल्स पेक्षा हा प्रकार  टेस्टी असायचा. पण शेवया खूप मेहनत घेऊन केलेल्या असल्यामुळे त्या खिरीसाठीच वापरल्या जायच्या.

ज्या दिवशी जो पदार्थ केला असेल त्या दिवशी रात्रीच्या जेवणात तो पदार्थ असे .वडील ऑफिसमधून आल्यावर आवर्जून चौकशी करायचे.

“वा वा “म्हणायचे. आई खुष होऊन  हसायची. एक एक पदार्थ तयार होऊन डब्यात भरला जायचा त्यावर कोहाळ्याचे सांडगे ,उपवासाच्या पापड्या ,लसणाचे पापड, असे खडू ओला करून लिहिले जायचे. वरची फळी गच्च भरून जायची.

आईला या महिन्यात आराम नसायचाच. कारण हे प्रकार करून संपेपर्यंत वडील मिरच्या, हळकुंड, शिकेकाई आणून द्यायचे. मिरच्यांची डेखे काढायची .मिरच्या, हळकुंड गच्चीत वाळवायचे .वर्षांचे तिखट हळद होऊन जायचे. खूप दिवसापासून लिंबाची साले साठवलेली असायची.” गव्हला कचरा” म्हणजे काय असायचे कोण जाणे? पण  लांब असणाऱ्या आयुर्वेदिक औषधी दुकानातून वडील तो आणून द्यायचे. आवळकाठी, रिठे गच्चीत वाळत घातलेले असायचे .हे सगळे घालून  शिकेकाई दळून आणायची  .रविवारी आई या शिकेकाईचे भरपूर पाणी गरम  करून द्यायची. त्यानी केस धुवायचे असा दंडक होता.

महिन्यातून एकदा आई स्वतः चोळून न्हाहु  घालायची. आईच्या हातात  केस होते तोपर्यंत केस लांब आणि जाड होते .कॉलेजमध्ये गेल्यावर केसांना पहिला साबण लावला तेव्हा आई खूप चिडली होती.

मे महिना संपता संपता आईची लोणच्याची गडबड उडायची. कैरीचे तिखट ,गोड लोणचे. तक्कु ,कीसाचे लोणचे, लवंगी मिरची लोणचे असे विविध प्रकार आई करायची. गुळांबा ,साखरआंबा, मुरांबा हे पदार्थ व्हायचे .झाकणाला पांढरे स्वच्छ कापड लावून आई बरण्या बंद करायची .सेल्फ मधला वरचा कप्पा या बरण्यांचा असायचा. शाळा सुरू झाल्यावर डब्यात पोळी भाजी बरोबर लोणचे, गुळांबा असायचा .

कितीतरी दिवस आईचा हा उद्योग चालायचा .आता विचार केला तर आश्चर्य वाटते… पण तेव्हा ते सर्व लागायचे.  वर्षभर बरोबर पुरायचे.

सध्या सारखी शिबीर ,क्लास असे काही नसायचे  पण आम्हाला सुट्टीचा कधी कंटाळा यायचा नाही.

आईला मदत करताना त्यातून खूप शिकायला मिळायचे .आजकाल  एवढे प्रकार कोणी करत नाही आणि लागतही नाहीत .जे पाहिजे ते तयार मिळते. पाकिटे आणायची खायची… पण ती पूर्वीची मजा त्यात नाही एवढे खरे….

 सुमारे दीड फूट उंचीची चिनीमातीची लोणच्याची बरणी ,पत्र्याचे चौकोनी, गोल डबे बरेच वर्ष माझ्या माहेरी माळ्यावर पडून होते .दरवेळेस माळा साफ करताना त्याची अडचण वाटायला लागली..

 पण  ते  काढून  परत वर ठेवले जायचे. 

एके वर्षी वडिलांनी ती  मोठी बरणी  देऊन टाकली ……किती तरी दिवस आम्ही बहिण भाऊ त्या बरणीसाठी हळहळत होतो………. उगीच टाकली असे अजूनही वाटते.

 ती बरणी नुसती बरणी नव्हती…  ते आमचे लहानपण होते.

 तो जपून ठेवावा असा  ठेवा ….आमच्या आनंदाची.. ती एक साठवण होती.

 ती  बरणी म्हणजे  आमच्या कष्टाळू आईची आठवण होती  ……

आजही साठवण लिहिताना आईच आठवली…

आई गेली आणि सारे संपले…… 

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ उडुपी थाळी – लेखक :अज्ञात ☆ प्रस्तुती  – सौ.अस्मिता इनामदार ☆

सौ.अस्मिता इनामदार

? इंद्रधनुष्य ?

☆  उडुपी थाळी – लेखक :अज्ञात ☆ प्रस्तुती  – सौ.अस्मिता इनामदार ☆

महाभारत हे त्या काळातील सर्वात मोठे महायुद्ध होते कारण त्या काळात या युद्धात भाग न घेतलेले क्वचितच एखादे राज्य असेल. कारण या युद्धात भारतासह अफगाणिस्तान आणि इराणचे सर्व राजे कौरव किंवा पांडवांच्या बाजूने उभे राहिले, परंतु एक राज्य असे होते जे या युद्धक्षेत्रात असूनही युद्धापासून दूर राहिले, ते म्हणजे दक्षिणेतील उडुपीचे राज्य.

जेव्हा उडूप्पीचा राजा या युद्धात भाग घेण्यासाठी आपल्या सैन्यासह कुरुक्षेत्रावर पोहोचला तेव्हा कौरव आणि पांडव दोघेही त्यांना आपापल्या बाजूने वळवण्यासाठी प्रयत्न करू लागले.

उडुपीचा राजा अत्यंत दूरदर्शी होता, त्यांनी श्रीकृष्णाला विचारले – हे माधव! दोन्ही बाजूंनी जो कोणी पाहतो तो या युद्धासाठी आतुर वाटतो, पण दोन्ही बाजूंनी उपस्थित असलेल्या एवढ्या मोठ्या सैन्यासाठी जेवणाची व्यवस्था कशी होईल याचा कोणी विचार केला आहे का?

त्यावर श्रीकृष्ण म्हणाले- महाराज! तुम्ही अगदी बरोबर शंका उपस्थित केली आहे, तुमच्या या शंकेवरून मला असे वाटते की तुमच्याकडे नक्कीच यासंदर्भात काहीतरी योजना आहे, कृपया ती योजना मला सांगावी.

यावर उडुपीचे राजे म्हणाले की – हे वासुदेव! भावा भावांमध्ये होणारे हे युद्ध मला उचित वाटत नाही त्यामुळे या युद्धात भाग घ्यायची माझी इच्छा नाही.

परंतु हे ही सत्य आहे की हे युद्ध आता टाळता ही येणार नाही, म्हणूनच मी असे ठरवले आहे की माझ्या संपूर्ण सैन्यासह येथे उपस्थित राहून लढणाऱ्या सर्व सैनिकांसाठी भोजनाची व्यवस्था करावी अशी माझी इच्छा आहे.

यावर श्रीकृष्ण आनंदाने म्हणाले – महाराज!  तुमची कल्पना खूप चांगली आहे, या युद्धात 50 लाख योद्धे सहभागी होतील आणि तुमच्यासारखा कुशल राजा त्यांच्या अन्नाचे व्यवस्थापन पाहणार असेल तर या बाजूने ही आम्ही निश्चिंत राहू.

मला हे सुध्दा माहीत आहे की या विशाल महासागराएवढ्या मोठ्या सैन्याच्या अन्नाचे व्यवस्थापन भीमसेन आणि तुमच्या शिवाय कुणालाही शक्य नाही.

भीमसेन या युद्धापासून लांब राहू शकत नाहीत, म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की तुमच्या सैन्यासह दोन्ही सैन्याच्या भोजनाची जबाबदारी घ्या, अशा प्रकारे उडुपीच्या महाराजांनी सैन्याच्या भोजनाची जबाबदारी घेतली.

पहिल्या दिवशी त्यांनी उपस्थित सर्व योद्धांसाठी भोजनाची व्यवस्था केली, त्यांची कार्यक्षमता इतकी अफाट होती की दिवसाच्या शेवटी अन्नाचा एक कण ही वाया गेला नाही.

जसजसे दिवस सरत गेले तसतशी योद्ध्यांची संख्याही दिवसागणिक कमी होत होती आणि दोन्ही बाजूचे योद्धे हे पाहून आश्चर्यचकित होत होते की, प्रत्येक दिवसाच्या शेवटी उडुपीचा राजा कडून एक अन्नाचा कण ही वाया जात नाहीये तर. त्यांना हे कसे समजते की आज एवढ्याच सैन्याचे भोजन बनवायचे आहे?

खर तर तेथील उपस्थित असणाऱ्या सैन्याला एक प्रश्न पडत होता की उडप्पीचा राजांना हे कसे काय समजते की आज किती सैन्य मरणार आहे व ते रोज त्याच आधारे भोजन बनवतात.?

एवढ्या मोठ्या सैन्याच्या अन्नाचे व्यवस्थापन करणे हा खर तर एक चमत्कारच होता आणि अन्नाचा एक दाणाही वाया जाऊ नये अशा पद्धतीने नियोजन करणे हे सुध्दा एका चमत्कारापेक्षा कमी नव्हतेच.

अखेर युद्ध संपले आणि पांडव जिंकले.आपल्या राज्याभिषेकाच्या दिवशी शेवटी युधिष्ठिराने न रहावुन उडुपीच्या राजाला विचारले की – हे महाराज! समस्त देशांचे राजे आमची प्रशंसा करत आहेत की तुमचे लहानसे सैन्य असूनही तुम्ही अशा सैन्याला पराभूत केले की त्या सैन्याचे नेतृत्व स्वतः भीष्म, गुरू द्रोण आणि आमचा थोरला भाऊ कर्ण यांसारखे महापुरुष करत होते. परंतु मला असे वाटते की तुम्ही आम्हा सर्वांच्यापेक्षा जास्त कौतुकास पात्र आहात, कारण ज्यांनी एवढ्या मोठ्या सैन्यासाठी केवळ जेवणाची व्यवस्थाच केली नाही तर ती व्यवस्था अशा प्रकारे चोख पार पाडली की अन्नाचा एक कण ही वाया जाऊ दिला नाही. मला तुमच्याकडून या कौशल्याचे रहस्य जाणून घ्यायचे आहे.

यावर उडुपीचे राजे हसले आणि म्हणाले – “सम्राट! या युद्धात तुम्ही मिळवलेल्या विजयाचे श्रेय कोणाला देणार?”

यावर युधिष्ठिर म्हणाले – “याचे श्रेय श्रीकृष्णाशिवाय कोणाला देता येईल? जर ते नसते तर कौरव सैन्याचा पराभव करणे अशक्य झाले असते.”

तेव्हा उडुपीचे राजे म्हणाले,  हे राजा!  ज्याला तुम्ही माझा चमत्कार म्हणत आहात तो सुद्धा श्रीकृष्णाचाच महिमा आहे, हे ऐकून तिथे उपस्थित असलेले सर्वजण आश्चर्यचकित झाले.

मग उडूप्पीच्या राजांनी या रहस्यावरून पडदा उठवला व व म्हणाले “महाराज! श्रीकृष्ण प्रतिदिन रात्री शेंगदाणे (भुईमुगाच्या शेंगा) खात असे व मी दररोज त्यांच्या शिबिरात मोजून शेंगा ठेवत असे, व त्यांच्या शेंगा खाऊन झाल्या व ते तेथून निघून गेले की मी तेथे जाऊन ती टरफल बाजूला करून त्यांच्या किती शेंगा शिल्लक राहिल्या आहेत त्या मोजत असे.

ते जितक्या शेंगा खात असे दुसऱ्या दिवशी युध्दात १०००  गुणा सैन्य मारले जायचे , समजा त्यांनी ५० शेंगा खाल्या तर दुसऱ्या दिवशी युध्दात ५०००० सैनिक मारले जायचे व मी याच निकषावर दुसऱ्या दिवशी भोजनाची व्यवस्था करत असे आणि त्यामुळेच कधी अन्नाचा एक कण ही वाया जात नसे.

प्रभू श्री कृष्णाचा हा चमत्कार ऐकून उपस्थित असणारे सगळेच त्यांच्यासमोर नतमस्तक झाले, ही कथा महाभारतातील दुर्मिळ कथांपैकी एक आहे, ही कथा कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यात असलेल्या कृष्ण मठात नेहमी सांगितली जाते, कर्नाटकच्या या मठाची स्थापना उडुप्पीच्या सम्राटाद्वारा केली गेली आहे.

प्रभू श्रीकृष्णानी स्वत: उडुप्पीच्या महाराजांना आशीर्वाद दिला होता की तुम्ही ज्याप्रकारे भोजनाची व्यवस्था केली होती आणि असे अप्रतिम सात्विक भोजन तयार केले होते, त्याबदल्यात मी तुम्हाला आशीर्वाद देतो की तुमच्या राज्याच्या सर्व पुरुषांच्या हातात असा नैसर्गिक गुण असेल की ते सात्विक भोजन तयार करतील व ते संपूर्ण जगात सर्वोत्कृष्ट असेल, म्हणूनच आज उडुपीच्या लोकांनी जगभरात अनेक रेस्टॉरंट्स उघडली आहेत आणि त्यांच्या हातांनी बनवलेले जेवण आज जगभर प्रसिद्ध आहे.

भारतात ही असे एक शहर नाही जिथे एकही उडुपीचे रेस्टॉरंट नाही , भारता सोबतच  परदेशातही अनेक उडुपी रेस्टॉरंट आहेत.

आणि या उडुपी रेस्टॉरंट्सची एक खास गोष्ट म्हणजे भगवान श्रीकृष्णाच्या याच आशीर्वादामुळे ते आपल्या हॉटेलमध्ये फक्त सात्विक भोजन बनवतात.

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : अस्मिता इनामदार 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “भैरूची गोष्ट…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

श्री कमलाकर नाईक

?  वाचताना वेचलेले  ? 

☆ “भैरूची गोष्ट…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

पहाट झाली. भैरू उठला.

बैल सोडले. औत जोडले.

शेतात गेला. शेत नांगरले.

दुपार झाली. औत सोडले.

बैलांना वैरण घातली. जवळ ओढा होता. बैलांना पाणी पाजले. आपली भाकरी सोडली.

चटणी, भाकरी, कैरीचे लोणचे.

झाडाखाली बसला. आवडीने जेवला.

पन्नासेक वर्षांपूर्वी शाळेच्या पाठ्यपुस्तकातून भेटणारा हा जुना भैरू. काळाच्या ओघात तो भेटेनासा झाला. त्याची जागा आता नव्या भैरूनं घेतली. हा भैरूही त्या भैरू सारखाच पहाटे उठतो…

पहाट झाली. भैरू उठला…

नाईटलॅम्पच्या अंधुक उजेडात उशापाशी ठेवलेला चष्मा त्याने चाचपडत शोधला आणि मोबाईल हातात घेतला – ‘गुड मॉर्निंग … सुप्रभात’चे मेसेजेस पाठवायला. कॅलेंडरकडे नजर टाकून त्याने वार बघितला. आज शनिवार, म्हणजे ‘जय हनुमान, जय बजरंगबली’चे मेसेजेस टाकायला हवेत, भैरूच्या मनात आलं. शाळा-कॉलेजमधल्या मित्रांचे ग्रुप्स, सोसायटीचा ग्रुप, बँकेतल्या रिटायर्ड मंडळींचा ग्रुप, नातेवाईकांचे ग्रुप्स, सगळीकडे ‘गुड मॉर्निंग…सुप्रभात’चे मेसेजेस टाकल्यावर एक काम हातावेगळं केल्याचं समाधान भैरूला वाटलं. ‘आता या सगळ्यांची मॉर्निंग गुड जावो की बॅड, आपल्याला काय त्याचं’ या भावनेनं तो पुन्हा बेडवर आडवा झाला. आता तास-दीड तासाने उठल्यावर तो पुढच्या कामाला लागणार होता.

चहा-नाश्ता संपवून भैरूनं मोबाईल पुन्हा हातात घेतला. या ग्रुपमधले मेसेजेस त्या ग्रुपमध्ये टाकायचं काम आता त्याला करायचं होतं. इकडची ‘बाबाजींची प्रवचनं’ तिकडे, तिकडचं ‘रोज सकाळी एक गाणे’ इकडे, अमुक ग्रुप मधलं ‘दिनविशेष’ तमुक ग्रुप मध्ये, तमुक ग्रुपमधल्या ‘हेल्थ टिप्स’ अमुक ग्रुपमध्ये… एक तासानंतर इकडचं तिकडे आणि तिकडचं इकडे करून झाल्यावर एक मोठं काम झाल्याचा सुस्कारा भैरूनं सोडला. ‘हे सगळं आपण स्वतः वाचत बसत नाही हे किती बरंय’, आंघोळीला जाताजाता भैरुच्या मनात आलं.

आंघोळ, त्यानंतर देवपूजा घाईघाईनं उरकून त्याहूनही अधिक घाईघाईनं भैरूनं पुन्हा मोबाईल हातात घेतला. बँकेच्या ग्रुपमध्ये कुणाचातरी वाढदिवस होता. या बर्थडे बॉयशी आपली तोंडओळखही नाही, भैरुच्या लक्षात आलं आणि पाठोपाठ ‘आपण विश केलं नाही तर बरं दिसणार नाही. लोक काय म्हणतील?’ असं मनात आलं. लगोलग त्यानं त्याच्या स्टॉकमधल्या केकचा फोटो टाकून त्याला शुभेच्छा दिल्या आणि पाठोपाठ दुसऱ्या एका ग्रुपमध्ये कुणीतरी गचकल्याच्या पोस्टवर RIP लिहून गेलेल्याच्या आत्म्याला शांतीही मिळवून दिली. मोबाईल खाली ठेवायच्या आधी भैरूनं सकाळपासून आलेल्या सगळ्या गाण्यांना, अभंगांना ‘वा छान’, ‘मस्तच’ अशी दाद देऊन टाकली आणि मग ती गाणी, ते अभंग डिलीटही करून टाकले. ‘दाद देण्यासाठी हे सगळं ऐकलंच पाहिजे, असं अजिबात नाही,’असं भैरूचं मत होतं.

कुणाची वामकुक्षी संपलेली असो वा नसो, आपण आपलं काम उरकून मोकळं व्हावं, या भावनेनं दुपारी दोनच्या सुमारासच भैरूनं झाडून साऱ्या ग्रुप्सना, व्हॉट्सअप कॉन्टॅक्ट्सना चहा-बिस्किटांचे फोटो असलेले ‘गुड आफ्टरनून’चे मेसेजेस टाकून दिले. मग सोसायटीच्या ग्रुपमध्ये एका मेंबरने ‘सोसायटीची रिडेव्हलपमेंट लवकरात लवकर करावी’ अशी पोस्ट टाकली होती त्याला सहमतीचा अंगठा दाखवला आणि त्याच्याच खाली चार पोस्ट नंतर आलेल्या, ‘रिडेव्हलपमेंटची तूर्तास गरज नाही’ या पोस्टलाही पाठिंबा दर्शवणारा अंगठा दाखवला. ‘सर्व-पोस्ट-समभाव’ आपल्या अंगी आहे, याचा अभिमान भैरूला पुन्हा एकदा वाटला. भैरूनं मग काही ग्रुप्समध्ये ‘युती’च्या बाजूने आलेली पोस्ट फॉरवर्ड केली तर काही ग्रुप्समध्ये ‘आघाडी’च्या बाजूनं आलेली. ‘कुणी का येईना सत्तेवर, आपलं काम पोस्ट्स फॉरवर्ड करायचं,’ भैरुच्या मनात आलं.

‘डॉलरच्या तुलनेत रुपया’ या सकाळीच फॉरवर्ड केलेल्या पोस्टवर एका ग्रुपमध्ये दोन-चार जणांनी शंका उपस्थित केल्या होत्या तर दुसऱ्या एका ग्रुपमध्ये एक-दोन जणांनी प्रतिप्रश्न केले होते. ‘आपल्याला यातलं XX काही समजत नाही,’  हे पक्कं माहीत असल्याने पुढचे दोन दिवस या दोन्ही ग्रुप्सवर फिरकायचं नाही अशी खूणगाठ बांधत भैरू एका तिसऱ्याच ग्रुपकडे वळला तर तिथे त्यानं फॉरवर्ड केलेल्या ‘ऐका मालकंसची गाणी’वर हा ‘मालकंस नाही, कलावती आहे’ अशी टिप्पणी कुणीतरी केली होती. त्यावर शेक्सपिअरच्या थाटात ‘नांवात काय आहे?’असं उत्तर देऊन भैरूनं विषय संपवला.

“काय मागवू रे तुझ्यासाठी – पिझ्झा की बर्गर?” या सौ च्या प्रश्नाला, “दोन्ही” असं थोडक्यात उत्तर देऊन भैरू ‘जंकफूड – एक शाप’ ही पोस्ट फॉरवर्ड करण्यात बिझी झाला.

रात्रीचे नऊ वाजल्याचे बघून भैरूनं त्याच्या पोतडीतून चंद्र-चांदण्यांची चित्र असलेले ‘गुड नाईट – शुभरात्री’चे मेसेजेस बाहेर काढले, पाठवलेही. आता मोबाईल बंद करणार तोच त्याच्या शाळासोबत्यानं पाठवलेलं ‘मालवून टाक दीप….’ गाणं त्याच्या व्हॉट्सअपवर दिसू लागलं. ‘मालवून टाक दीप….’ चे पुढचे शब्द ‘चेतवून अंग-अंग! राजसा किती दिसांत लाभला निवांत संग!’ हे आहेत, हे ध्यानीमनीही नसलेल्या भैरूनं ते ‘गुड नाईट… स्वीट ड्रीम्स’ अशी जोड देत शेजारच्या आजोबांना तत्परतेनं फॉरवर्ड केलं आणि मोबाईल बंद करून तो झोपायच्या तयारीला लागला.

उद्या पहाटे त्याला उठायचं होतं.उद्या रविवार म्हणजे सूर्याचे फोटो असलेले गुड मॉर्निंगचे मेसेजेस पाठवायचे होते… मग प्रवचनं, गाणी… इकडचं तिकडे अन् तिकडचं इकडे.

तो भैरू पहाटे उठून कष्ट करून शेतमळा फुलवत असे. हा भैरू पहाटे उठून बिनकष्टाचा वायफळाचा मळा फुलवतो.

——————

लिहिलेलं बायकोला वाचून दाखवल्यावर, “मी ओळखते बरं का या भैरूला,” असं ती आपल्याकडे बघत डोळे मिचकावत मिश्किलपणे का म्हणाली हे न उमगल्यानं बुचकळ्यात पडलेला मी.

कवी :अज्ञात

संग्राहक  : श्री कमलाकर नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ बोट चार पाकळ्यांची… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल

?️?  चित्रकाव्य  ?️?

? बोट चार पाकळ्यांची?  सुश्री वर्षा बालगोपाल 

चार मित्रांमध्ये अहमहमिका अशी लागली 

बोट चार पाकळ्यांची जागी थांबली ||

*

सहकार गाव होतं, त्यात चार दोस्त 

सुख – दु:ख समान त्यांचे रहात होते मस्त 

चार दिशांची आमिशे कोणी दावली 

बोट चार पाकळ्यांची जागी थांबली ||

*

चार दिशेला तोंडे परी, एका थाळीत जेवत होते 

एकजूट होऊन संकटा ध्वस्त ते करत होते 

सत्ता मोहाने डोकी अशी का फिरली 

बोट चार पाकळ्यांची जागी थांबली ||

*

प्रकृतीच्या एका प्रवाही चौघांची ही नाव 

विरुद्ध दिशेला नेण्या जो तो खेळे डाव 

मला नाही तर तुलाही नाही, मती भ्रष्ट कशी जाहली 

बोट चार पाकळ्यांची जागी थांबली ||

*

कुठे गेली एकता अन कुठे समानता 

सोप्या गोष्टी अवघड झाल्या नुरली सहजता 

तुला नाही मला नाही, नाव भोवऱ्यात बुडली 

अशी देशाची आपल्या स्थिती असे जाहली ||

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ तन्मय साहित्य #231 ☆ बाल कविता – गोलू को पानी की सीख… ☆ श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ ☆

श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’

(सुप्रसिद्ध वरिष्ठ साहित्यकार श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ जी अर्ध शताधिक अलंकरणों /सम्मानों से अलंकृत/सम्मानित हैं। आपकी लघुकथा  रात  का चौकीदार”   महाराष्ट्र शासन के शैक्षणिक पाठ्यक्रम कक्षा 9वीं की  “हिंदी लोक भारती” पाठ्यपुस्तक में सम्मिलित। आप हमारे प्रबुद्ध पाठकों के साथ  समय-समय पर अपनी अप्रतिम रचनाएँ साझा करते रहते हैं। आज प्रस्तुत है आपकी एक बाल कविता – गोलू को पानी की सीख…” ।)

☆ तन्मय साहित्य  #231 ☆

☆ बाल कविता – गोलू को पानी की सीख… ☆ श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ ☆

पानी के संकट को लेकर

गोलू को कितना समझाएँ

ध्यान नहीं देता है बिल्कुल

कैसे उसको सीख सिखाएँ।

*

गर्मी का आतंक मचा है

रोज-रोज फिर घटना पानी

जल को लेकर तू-तू मै-मैं

हुई रोज की नई कहानी,

उस पर गोलू की शैतानी

जब तब पानी व्यर्थ बहाए

गोलू को कितना समझाएँ।

*

सुबह-सुबह जब शौच को जाए

मुँह धोए ब्रश करे नहाए

पानी सतत बहता रहता

टोंटी खुली छोड़ आ जाए,

नहीं भुलक्कड़ है इतना वह

जान बूझ कर हमें चिढ़ाए

गोलू को कितना समझाएँ।

*

सूझा एक उपाय आज अब

गया नहाने बाथरूम जब

साबुन मला बदन में सिर में

पानी आना बंद हुआ तब,

रोया चिल्लाया तड़पा वह

पानी दे कोई मुझे बचाए

गोलू को कितना समझाएँ।

*

पहले तो कबूल करवाया

गलती का एहसास कराया

फिर टंकी का वाल्व खोलकर

पानी का महत्व समझाया,

सीख मिली गोलू जी को

अब बूँद-बूँद जल रोज बचाए

गोलू को कितना समझाएँ।।

☆ ☆ ☆ ☆ ☆

© सुरेश कुशवाहा ‘तन्मय

जबलपुर/भोपाल, मध्यप्रदेश, अलीगढ उत्तरप्रदेश  

मो. 9893266014

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares