मराठी साहित्य – विविधा ☆ जगण्यातला अर्थ… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? विविधा ?

जगण्यातला अर्थ… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

‘मैने तेरे लिये ही सात रंग के सपने चुने… ‘ असं मुकेश यांनी गायलेलं एक गीत आहे. जगण्याची आशा जोपर्यंत जिवंत असते तोपर्यंत माणूस इंद्रधनुषी सात रंगांची स्वप्न पहात असतो. मंगेश पाडगावकर म्हणतात, ” या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे.”

खरोखरच हे जीवन विविधरंगी आहे. पण कधी कधी हेच जीवन एखाद्यासाठी भयंकर असे दु :स्वप्न बनू शकते. आयुष्य जिवंतपणी नरक बनतं. अशा वेळी जगणं नकोसं होतं. परंतु अशाही विपरीत परिस्थितीत काही माणसं हार मानत नाहीत. कारण जगण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती त्यांच्याकडे असते. अशा परिस्थितीत ते असं काही जगतात की ते त्यामुळे त्यांचं जीवन सफल तर होतंच पण ते इतरांसाठी प्रेरणादायी बनतं. अशीच एक कथा ऑस्ट्रियातील विक्टर फ्रँकल यांची.

ते न्यूरोलॉजिस्ट आणि मानसोपचार तज्ञ होते. अभ्यास आणि संशोधन हेच जणू त्यांचे जीवन झाले होते. आत्महत्या करणाऱ्या स्त्रियांसाठी ते काम करत होते. जीवनाला कंटाळून निराश झालेल्या आणि आत्महत्या करणाऱ्या स्त्रियांना त्यापासून परावृत करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू होता. अशातच दुसरे महायुद्ध सुरू झाले. विक्टर फ्रँकल आणि त्यांच्या कुटुंबीयांना अटक करून नाझी छळ छावण्यात पाठवण्यात आले. तिथे ते सगळे अपरिमित छळाचे बळी ठरले. या कालावधीत फ्रँकल यांनी आपल्या वडिलांचा, आईचा मृत्यू पाहिला. त्यांच्या गर्भवती असलेल्या पत्नीचे निधन झाले. परंतु या सगळ्या भयंकर, भीतीदायक वातावरणातून ते सुदैवाने वाचले, बाहेर आले आणि पुन्हा त्यांनी आपल्या कार्याला वाहून घेतले. त्यांनी आपल्या जीवनातील जे अनुभव घेतले त्यावर आधारित Man’s Search for Meaning या नावाचे पुस्तक लिहिले. या पुस्तकाचे ‘ अर्थाच्या शोधात ‘ या नावाने मराठी भाषांतर झाले आहे. डॉ विजया बापट यांनी हा अनुवाद केला आहे. फ्रँकल यांनी एकूण ३२ पुस्तके लिहिली. या पुस्तकांचे एकूण ३४ भाषांमध्ये भाषांतर झाले आहे.

फ्रॅंकल यांच्या अनुभवाचे आणि जीवनाचे सार म्हणजे अर्थाचा शोध हे पुस्तक. त्यात ते म्हणतात, ” हे जीवन जर अर्थपूर्ण असेल तर मानवी जीवनातील दुःखालाही अर्थ असला पाहिजे. आपले भाग्य आणि मृत्यू या गोष्टी ज्याप्रमाणे टाळता येत नाहीत त्याप्रमाणेच दुःख ही न टाळता येणारी गोष्ट आहे. मानवी जीवनात येणाऱ्या दुःखाचे महत्त्व कमी लेखून चालणार नाही. दुःखाशिवाय मानवी जीवनाला परिपूर्णता येत नाही.

आपल्या जीवनाला जर अर्थ नसेल तर जीवन भरकटते. आपण वाईट सवयींच्या आणि व्यसनांच्या आधीन होतो. माणसाच्या हातून सर्व काही हिसकावले जाऊ शकते. परंतु विपरीत परिस्थितीतही जीवन जगण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती जर त्याच्याकडे असेल तर ती त्याच्याकडून कोणी काढून घेऊ शकत नाही. आपल्या भोवताली असणारी, आपल्या विरुद्ध असणारी परिस्थिती बदलण्याची क्षमता जर आपल्यात नसेल तर आपण स्वतःला बदलले पाहिजे. आपण घेतलेल्या भूमिकेत जगण्याचा अर्थ शोधण्याचे स्वातंत्र्य आपल्याला आहे.

जीवनात संकटे तर येणारच परंतु अशा परिस्थितीत खचून न जाता आपल्या जगण्याला नवा अर्थ देता यायला हवा. असा अर्थ तीन प्रकारे आपल्याला देता येऊ शकतो आणि त्यामुळे आपले जगणे अर्थपूर्ण होऊ शकते. त्याबरोबरच ते इतरांसाठीही मार्गदर्शक आणि प्रेरणादायी होऊ शकते.

१. आपल्याला आपल्या जगण्याचा अर्थ प्रत्यक्ष कामातून शोधत यायला हवा.

२. इतरांवर प्रेम करण्यातूनही तो शोधता येतो. आणि

३. दुःख, वेदना सहन करतानाही तो शोधता येतो.

असे हे तीन मार्ग आपल्या जगण्याला एक दिशा देऊ शकतात. यासाठी काही उदाहरणे आपण पाहूया. म्हणजे फ्रँकल यांना नेमके काय म्हणायचे आहे ते आपल्याला लक्षात येईल.

त्यांनी सांगितलेली पहिली गोष्ट म्हणजे प्रत्यक्ष कामातून जगण्याचा अर्थ, जगण्याची दिशा शोधता यायला हवी. ‘इकीगाई’ हे प्रसिद्ध पुस्तक सुद्धा हेच आपल्याला सांगतं की आपल्याला का जगायचं हे कळलं, तर कसं जगायचं हे नक्कीच कळेल. बाबा आमटे यांनी एका महारोग्याला अत्यंत भयानक अवस्थेत वेदनांनी तळमळताना पाहिलं. समाजाने आणि त्याच्या नातेवाईकांनी त्याला जणू मरण्यासाठीच सोडून दिलं होतं. बाबांनी त्याची सेवा सुश्रुषा केली आणि मग कुष्ठरोग्यांच्या कार्यासाठी स्वतःला वाहून घेतले. आपले संपूर्ण जीवनच त्यांच्यासाठी समर्पित केले. त्यातून त्यांना जगण्याचा अर्थ कळला. त्यांचे जीवन म्हणजे समाजासाठी एक आदर्श असा वस्तुपाठ होता. पुणे येथे भिक्षेकर्‍यांचे डॉक्टर म्हणून प्रसिद्ध असणारे डॉक्टर अभिजीत सोनवणे यांनी भीक मागणाऱ्यांची वाईट अवस्था पाहिली. त्यांच्यासाठी आपण काहीतरी करावे असे त्यांना आतून वाटू लागले आणि आपले जीवन त्यांनी त्यांच्यासाठी समर्पित केले. अनेक भिक्षेकर्‍यांना त्यांनी रोजगार मिळवून देऊन स्वतःच्या पायावर उभे केले आहे. त्यांना स्वाभिमानाने जगणे शिकवले आहे.

प्रत्येक व्यक्ती स्वतःवर आणि स्वतःच्या कुटुंबावर प्रेम करतेच परंतु त्यापलीकडे जाऊन इतरांवर मानवतेच्या भावनेतून प्रेम करणे, इतरांप्रती कृतज्ञतेच्या भावनेतून काहीतरी समाजकार्य करणे हे सुद्धा जीवनाचा अर्थ शोधण्यासाठी महत्त्वाचे आहे. अशी अनेक मंडळी आहेत की जी आपले काम करतानाच, इतरांसाठी देखील काम करतात, त्यांच्यावर प्रेम करतात. ती माणसे जगावीत, त्यांना चांगले खायला प्यायला मिळावे, चांगले कपडेलत्ते मिळावे म्हणून प्रयत्न करतात. संभाजीनगर येथील श्री चंद्रकांत वाजपेयी आणि त्यांचे सगळे सहकारी वाया जाणारे अन्न गोळा करून ज्यांना त्याची गरज असेल त्यांच्यापर्यंत पोहोचवतात. नाशिक येथील श्री अशोक धर्माधिकारी आणि त्यांचे सहकारी आदिवासी स्त्रिया, मुले यांना आवश्यक त्या वस्तू दरवर्षी त्यांच्या भागात जाऊन पुरवतात. त्यांची दिवाळी आनंदाची करतात. अशी अनेक माणसे आहेत ही दोन नावे फक्त मी उदाहरणादाखल दिली. अनेक माणसे वृद्धाश्रमात जाऊन सेवा करतात, आपला वेळ देतात. आपले काम करता करताच या समाजोपयोगी गोष्टीही ते करत असतात. यातून त्यांना आपल्या जीवनाचा अर्थ सापडतो आणि खरोखरीच त्यांचे जीवन धन्य होते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी देशावर प्रेम केले. ‘ स्वतंत्रतेचे स्तोत्र ‘ या कवितेत ते म्हणतात

तुजसाठी मरण ते जनन

तुजवीण जनन ते मरण.

एक सुंदर सुविचार आहे, ” फक्त स्वतःसाठी जगलास तर मेलास, पण स्वतःसाठी जगून इतरांसाठी जगलास तर जगलास. “

ज्यांनी स्वतः यातना सहन केल्या आहेत, वेदनांना तोंड दिले आहे अशी माणसे केवळ स्वतःचे दुःख कुरवाळत न बसता इतरांसाठी काम करून आदर्श घालून देतात. अशी पण खूप उदाहरणे आहेत. संतोष गर्जे हा स्वतः अनाथ असलेला तरुण! त्याने प्रचंड यातना सोसल्या आणि जगण्यासाठी संघर्ष केला. परंतु आपल्यासारख्या अनाथ लेकरांना अशा प्रकारचे जीवन जगावे लागू नये म्हणून अशा अनाथ मुलांचा सांभाळ करण्यासाठी बीड जिल्ह्यातील गेवराई या ठिकाणी त्यांनी मोठे कार्य उभे केले आहे. तो आणि त्याची पत्नी अनाथ मुलांना आई-बापांची माया देत आहेत, त्यांना जगण्यासाठी समर्थ बनवत आहेत. असेच एक उदाहरण आहे राहुल देशमुख यांचे. आता ते एका राष्ट्रीयकृत बँकेत अधिकारी आहेत. पण त्यांना लहानपणी शिक्षण घेत असताना काही काळानंतर अंधत्व आले. शिक्षण घेताना प्रचंड त्रास सहन करावा लागला. अंध असल्यामुळे कोणी त्यांना होस्टेलला प्रवेश देखील देत नव्हते. आपल्या बुद्धिमत्ता आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. पण इतर अंध विद्यार्थ्यांना आपल्यासारखा त्रास शिक्षण घेताना होऊ नये म्हणून त्यांच्यासाठी राहूल यांनी वस्तीगृह सुरू केले, त्यांना शिक्षण घेता येईल अशी व्यवस्था केली, त्यांना त्यांच्या पायावर उभे राहण्यासाठी व्यवस्था केली आणि त्यातून अनेक तरुण आज नोकरीला लागले आहेत मोठ्या हुद्द्यावरती काम करत आहेत. हरमन सिंग सिद्धू हा अपघातात गंभीर जखमी झाला आणि अनेक वर्षांपासून व्हीलचेअरला खिळून राहिला आहे. आपल्या वेदना शमवण्यसाठी अनेक प्रकारच्या गोळ्या त्याला घ्याव्या लागतात. परंतु तो आपल्या वेदनांबद्दल चकार शब्दही बोलत नाही. लोकांनी अपघातापासून वाचावे म्हणून त्यांनी ‘ सुरक्षित पोहोचा ‘ ही संस्था सुरू केली आणि आज तिचे कार्य ते करीत आहेत. अशी प्रेरणादायी कितीतरी उदाहरणे आपल्या अवतीभवती आहेत. या आणि अशा बऱ्याच व्यक्तींवर मी माझ्या पुस्तकांमधून लेख लिहिले आहेत आणि त्यांचे कार्य समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

या सगळ्या गोष्टींचे तात्पर्य असे की आपल्या जीवनातील परिस्थिती जरी आपल्याला प्रतिकूल असेल तरी आपण निराश न होता किंवा खचून न जाता त्या परिस्थितीला धीराने तोंड देऊन आपले जीवन जगण्याची दिशा प्राप्त करू शकतो. मानवी जीवनात दुःख हे अपरिहार्य आहे परंतु अशा दुःखाला कुरवाळत न बसता काही माणसे आपले दुःख विसरून इतरांसाठी मानवतेच्या भावनेतून कार्य करत राहतात आणि आपल्या जगण्याचा अर्थ शोधतात. अशावेळी जगण्याचा अर्थ कळतो जीवनाच्या अशा टप्प्यावर मग हे जीवन सुंदर आहे अशी जाणीव झाल्याशिवाय राहत नाही. संत तुकाराम महाराजांच्या शब्दात सांगायचे तर

जे का रंजले गांजले

त्यासी म्हणे जो आपुले

तोचि साधू ओळखावा

देव तेथेची जाणावा.

अशी माणसे म्हणजे आधुनिक संतच होत. ते दीपस्तंभ होत.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ टेक ऑफ… 🛫 लेखक : श्री मंदार जोग ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन ☆

सुश्री सुनीला वैशंपायन 

☆ टेक ऑफ… 🛫 लेखक : श्री मंदार जोग ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन 

मुंबईच्या टर्मिनल २ च्या डिपार्चर जवळ एक गाडी येऊन थांबली. लगबगीने व्हील चेअर आणली गेली. गाडीतून रिटायर्ड विंग कमांडर अशोक केतकरांना उचलून व्हील चेअर मध्ये बसवण्यात आलं. विमान कंपनीने त्यांना दिलेला त्यांचा अटेंडंट त्यांची व्हील चेअर डीपार्चर गेटच्या दिशेने ढकलू लागला आणि अशोक केतकरांच्या डोळ्या समोरुन त्यांचा भुतकाळ सरकू लागला!

ते सर्व्हिस मध्ये असताना एका विमान अपघातात त्यांचा जीव तर वाचला होता. पण त्यांनी दोन्ही पाय गमावले होते. दोन युद्धात भारत मातेची सेवा केलेला तो भारत मातेचा सुपुत्र आता कायमचा व्हील चेअर वर बसला होता. एकेकाळी आभाळाला गवसणी घालणारा तो शूर वीर आता जमिनीवर देखील उभा राहू शकत नव्हता! दर वर्षी एकदा ते दिल्लीला मात्र जात असत. प्रजासत्ताक दिनी ते आणि त्यांचे काही जुने कलिग्स इंडिया गेट जवळ जमत असत. मग दोन दिवस दिल्लीत त्या फ्रेंड्स बरोबर मुक्काम करून ते परत येत. आजही ते त्यासाठीच निघाले होते. गेल्या अनेक वर्षांचा ते शिरस्ता होता.

पण गेली चार पाच वर्ष मात्र त्यांना दिल्लीला जाण जीवावर येत असे. कारण त्यांच्या सगळ्या कलीग ची मुलं एकतर सैन्यात, एअर फोर्स मध्ये होती किंवा चांगल शिकून चांगल्या पोस्टवर नोकरीला होती. ह्यांची मुलगी भार्गवी मात्र सेकंड इयरला असतानाच एक मुलाच्या प्रेमात पडून त्याच्याशी लग्न करून गेली होती. कारण काय तर त्याची आई दुर्धर आजाराने ग्रस्त होती आणि तिला तिचे डोळे मिटायच्या आत मुलाचं लग्न झालेलं पहायचं होतं. ह्यांनी आणि बायकोने बराच विरोध केला. एकुलत्या एका मुलीचं छान करिअर व्हावं हे त्याचं स्वप्न होतं. पण तिने ऐकलं नाही. मग ह्यांनीही संबंध तोडले. आज त्यालाही पाचेक वर्ष उलटली होती!

त्यांची व्हील चेअर चेक इन सोपस्कार पूर्ण करून बोर्डिंग गेट पर्यंत आणली. अटेंडंट त्यांच्या शेजारी उभा होता. बोर्डिंग ची घोषणा झाली. शिरस्त्या प्रमाणे ह्यांची व्हील चेअर सर्वात आधी आत नेण्यात आली. त्यांना पहिल्या रो मध्ये स्थानापन्न केल्यावर बाकी प्रवासी बोर्ड झाले. विमान टॅक्सी वे वरून रन वे वर येऊन थांबल. अशोक रावांनी खिडकीतून बाहेर पाहिलं. त्यांना त्यांच्या फ्लाइंग दिवसांची आठवण आली. त्यांनी नकळत डोळे पुसले. ते अजस्त्र धुड रन वे वर जवळ जवळ ताशी अडीचशे किलोमीटर वेगाने धावू लागल. आणि एका क्षणी आकाशात झेपावलं. खिडकीतून खाली बघत असलेल्या अशोक रावांचे हात आपसून जॉय स्टिक धरल्या सारखे हालचाल करत होते! जुन्या आठवणींनी त्यांच्या डोळ्यात घळाघळा पाणी येत होतं. त्या अपघातानंतर सर्व्हिस सोडल्यावर ते करत असलेल्या प्रत्येक विमान प्रवासात येत असे तसंच!

विमान आता आकाशात स्थिरावलं आणि सीट बेल्ट काढायचे संकेत मिळाले. अशोक रावांनी सीटबेल्ट काढला आणि एअर होस्टेस ला बोलवायला वरच बेल बटण दाबल. एअर होस्टेस आली. अशोक रावांनी पाणी मागितलं आणि ते बरोबर आणलेलं पुस्तक वाचू लागले. काही मिनिटात एक लहानसा मुलगा हातात पाण्याचा ग्लास घेऊन आला आणि त्याने त्यांना पाणी दिलं. त्याला पाहून अशोक रावांना आश्चर्य वाटलं आणि तितक्यात पायलट ने अनाउन्समेंट सुरू केली.

पायलट – प्रिय गेस्ट. फ्लाईट ६इ ६०२८ मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपल्या बरोबर एक अत्यंत महत्वाचे आणि आदरणीय गेस्ट आहेत. त्याचं नाव आहे रिटायर्ड विंग कमांडर अशोक केतकर. ते पहिल्या रांगेत a सीटवर आहेत. विंग कमांडर अशोक केतकर ह्यांनी भारतासाठी दोन मोहिमांमध्ये भाग घेऊन आपले शौर्य दाखवून शत्रूचा पराभव करण्यात मोलाचे योगदान दिलेले आहे. एका अपघातात त्यांना दोन्ही पाय गमवावे लागले असले तरी त्याचा लढवय्या स्वभाव मात्र अजूनही जिवंत आहे. एअरफोर्सची शिस्त, सिनियर च्या आदेशांचे पालन ह्या गोष्टी त्यांनी व्यक्तिगत आयुष्यातही पाळल्या. इतक्या की त्यांच्या मुलीने करिअर सोडून त्यांच्या मनाविरुद्ध लग्न केल्यावर त्यांनी तिच्याशी संबंध तोडले. पण मुलगी बापाला कशी विसरू शकत होती? ती दुसऱ्या शहरात असली तरी तिचं वडिलांवर लक्ष होतं. तिने लग्न केल्यावर एका महिन्यातच तिच्या नवऱ्याची, राहुलची आई गेली. ती नवऱ्या बरोबर दिल्लीत रहात होती. पण वडिलांची इच्छा तिच्या लक्षात होती. तिने त्या दृष्टीने प्रयत्न सुरु केले. उत्तम गुण मिळवून ग्रॅज्युएट झाली. पुढे चांगल्या कॉलेज मध्ये admission मिळवली… तिने त्यांच्या मनाविरुद्ध लग्न केलं असलं तरी त्यांनी तिच्यासाठी ठरवलेलं करिअर मात्र तिने पूर्ण केलं.

अशोकराव हे ऐकून स्तिमित झाले. सगळ्या प्रवाश्यांना उत्सुकता लागली होती. पायलटचा आवाज आला.

पायलट – बाबा… तुम्हाला मला पायलट झालेली पहायचं होतं ना? ते तुमचं स्वप्न होतं ना? मग आज तुमचं स्वप्न पूर्ण झालेलं तुम्हाला दिसेल. आज हे विमान तुमची लाडकी भार्गवी उडवते आहे. तीच भार्गवी जिच्यावर रागावला आहात… आणि हो तुम्हाला आता ज्या मुलाने पाणी दिलं ना तो माझा मुलगा आहे आदित्य… तुमचा नातू…

प्रचंड शॉक बसलेल्या अशोक रावांनी भरलेल्या डोळ्यांनी त्या गोड मुलाकडे पाहिलं. तो त्यांच्याकडे बघत निरागस हसत होता. त्यांनी आदित्यला उचलून घेतला आणि त्याचे मुके घेतले. एव्हाना भार्गवी बाहेर आली होती. हातात फोन माईक धरून डोळ्यातून धारा तश्याच वाहू देत अशोक रावांकडे बघत बोलू लागली..

भार्गवी – बाबा मला माफ करा… मी तुमच्या मनाविरुद्ध जाऊन लग्न केल… पण त्यावेळी परिस्थितीच तशी होती. आणि बाबा राहुल खुप चांगला मुलगा आहे. एका mnc मध्ये तो मोठ्या पदावर आहे. आम्ही दिल्लीला असतो. आज तुम्ही ह्या फ्लाईट ने दिल्लीला जाणार हे मला आई कडून कळल्यावर मी ही फ्लाईट मागून घेतली आणि आदित्यला घेऊन आले. बाबा प्लीज मला माफ करा… मला तुमचा खूप खूप अभिमान आहे बाबा… म्हणूनच आज मी, एक कमर्शियल पायलट तुम्हाला, एका फायटर पायलट ला salute करते आहे.

हे बोलून भार्गवी ने एक कडक salute केला. विमानातील सगळे प्रवासी आणि क्रू देखील salute करत उभे होते…. भार्गवी हळूच अशोक रावांच्या शेजारी बसली आणि त्यांना मिठी मारून हमसून हमसून रडू लागली. बाप आणि मुलीची अनेक वर्षांनी अशी भेट होत होती. अशोक रावांचा शर्ट तिच्या श्रूंनी भिजला होता…. तितक्यात आदित्य बोबड्या आवाजात म्हणाला – 

आदित्य – आजोबा मी ना तुमच्या सारखा फायटर पायलट होऊन देशाची सेवा करणार आहे. मला मम्मी रोज तुमच्या स्टोरी सांगून फायटर पायलट बनायला सांगते.

हे ऐकून अशोकरावांना प्रचंड आनंद झाला. तेवढ्यात आतून को पायलट ने विमानाच्या डीसेंड ची घोषणा करून सिट बेल्ट बांधायची सुचना केली. भार्गवी त्यांचा निरोप घेऊन कॉकपीट मध्ये गेली. विमान आता उतरू लागलं. आत भार्गवी विमान उतरवत होती. इथे शेजारी बसलेल्या आदित्यला अशोकराव विमान उतरवताना काय काय करतात ते अभिनय करून सांगत होते. खिडकीबाहेर अस्ताला जाणारा सूर्य एका माजी, एका आजी आणि भविष्यातील एका पायलटला आपल्या सोनेरी किरणांनी न्हाऊ घालत होता. विमानाचा डिसेंड सुरू झाला असला तरी आता कुठे अशोकरावांच्या आयुष्याच्या विमानाने परत एकदा टेकऑफ करायला धावपट्टीवर वेग घेतला होता!

लेखक : श्री मंदार जोग 

प्रस्तुती : सुश्री सुनीला वैशंपायन 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “लोखंडी काॅट…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ “लोखंडी काॅट…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

पन्नास पंचावन्न वर्षांपूर्वी एकंदरीत सर्वच समाज साधा मध्यमवर्गीय असा होता. अर्धे अधिक लोकं गरीबच होते. घरं बैठी साधी लहान लहान दोन- तीन खोल्यांची असायची. तेव्हा लोकं आहे त्यात सुखासमाधानात, काटकसरीत राहणारी असायची. घरात दहा-बारा लोकं सहज असायचे. इतके जण असुनही घरात एकचं लोखंडी कपाट असायचे, ज्याला सगळेच ” गोदरेजचे कपाट ” म्हणत असत. त्यात घरातल्यांचे चांगले कपडे ठेवलेले असायचे.

घरातलं सगळ्यांत मुख्य एकमेव फर्निचर म्हणजे… ” लोखंडी कॉट” असायची.

तिचा अनेक प्रकारे उपयोग व्हायचा. त्या कॉटवर एकावर एक गाद्या ठेवलेल्या असायच्या त्या सुद्धा दोन किंवा फारतर.. तीन असायच्या. घरातला कर्ता पुरुष कॉटवर झोपणार हे ठरलेले असायचे. बायका तर कधीच कॉटवर झोपायच्या नाहीत. खाली सतरंजीवरच झोपायच्या.

शर्टाची घडी घालून गादीखाली ठेवली की झाली इस्त्री… कारण तेव्हा क्वचितच कोणाकडे इस्त्री असायची.

काॅटखाली लोकं लोखंडी ट्रंक, लाकडी पेट्या ठेवतं. त्यात कागदपत्रांची एक पेटी असायची. स्वेटर, मफलर, टोप्या अशा कधीतरी लागणाऱ्या गोष्टी ट्र॔केत ठेवत असत.

नेहमी न लागणारं सामान गाठोड्यात बांधून ती गाठोडी पण कॉटखाली ठेवलेली असायची.

आणि खालचा हा सगळा पसारा दिसू नये म्हणून खालची बाजू झाकायला जुन्या साडीचा एखादा पडदा केलेला असायचा.. तो लावलेला असायचा.

चादरी काही ठिकाणी गादीखाली ठेवलेल्या असायच्या. उशा कॉटवर एका बाजूला भिंतीला लागून रचून ठेवलेल्या असायच्या. जरा धक्का लागला की त्या पडायच्याच. … मग आई रागवायची…

प्रत्येक घरी असंच असायचं.. त्यामुळे कोणाला त्याची लाज वाटायची नाही. काही कार्यक्रम असला की घरातली ती काॅट घडी करून ठेवता येत असे. तेव्हा घर एकदम मोठे वाटायचे. ती बाहेर अंगणात ठेवली जायची.

पन्नास वर्षांपूर्वी माझं लग्न झालं तेव्हा पहिली खरेदी म्हणजे यांनी मोठी, भक्कम अशी लोखंडी कॉट घेतली. तेव्हा फार आनंद झाला होता. खूप मोठी खरेदी केली असं वाटत होत. कारण तेव्हा पगार अगदी कमीचं होता. काॅटला कडेला छान गोल असे बार होते. त्याला टेकवून तक्या ठेवला की पाय पसरून आरामात बसता येत असे. दर दोन वर्षांनी हे त्याला रंग देत असत. वापरातल्या वस्तूंची नीट काळजी घेऊन जपून, सांभाळून ठेवायच्या असा नियमच होता. आणि तो बहुतेक वेळा पाळला जायचा.

आमची बदली माढा, उदगीर, उस्मानाबाद, मुरुड, पुणे आणि सांताक्रुज मुंबई येथे होत गेली. या सगळ्या प्रवासात ती कॉट आमच्याबरोबरच होती. डबल बेड घेतले तरी ती कॉट काढायचा विचार कधीच मनात आला नाही. मुंबईला सांताक्रुझला बँकेचे क्वार्टर होते. तिथे वर गच्चीत काॅट ठेवली होती. आम्ही मैत्रिणी काॅटवर बसून गप्पा मारत असू…

हे रिटायर झाल्यानंतर आम्ही पुण्याला आलो. आम्ही तिसऱ्या मजल्यावर राहत होतो. तिथे पण गच्ची होती. मग ती काॅट गच्चीत ठेवली. नातवंडांनी त्या कॉटचा चांगला उपयोग केला. आता रंग द्यायचं काम त्यांच्याकडे होतं. पण दोघं अगदी उत्साहाने दर दोन वर्षांनी कॉटला रंग देत असत. त्यामुळे इतकी वर्ष 

होऊन सुध्दा कॉट अगदी छान होती. आमची डबा पार्टी त्या कॉटवर होत असे. नातू सतरंज्या, गालीचा, ऊशा घेऊन वर जायचा. तक्या ठेवायचा. काॅटवर झोपायला त्याला फार मजा वाटायची.

या काॅटचा पुरेपूर आनंद आम्ही घेतला. आम्ही रहात असलेल्या बिल्डिंगचे री डेव्हलपमेंट होणार म्हणून ती जागा सोडावी लागणार होती.

तेव्हा आता या काॅटच काय करायचे? … हा विचार मनात आला.

तेव्हा अश्विनीला भाचेसुनेला विचारले. कारण त्यांचा बंगला आहे. ती म्हणाली, ” मामी ती कॉट मी नेते “

ती नेते म्हणाली याचा मला फार आनंद झाला. टेम्पो आणुन ती काॅट घेऊन गेली. आता काॅट तिच्या गच्चीत आहे. त्यावर बसून तिचा अभ्यास चालू असतो.

पन्नास वर्षाच्या संसारात साथ दिलेली काॅट योग्य स्थळी गेली असे मला वाटले.

सहवासात असलेल्या या गोष्टी निर्जीव नसतातच… त्यांच्यात आपला जीव गुंतलेला असतो.

आपण आयुष्यभर वापरलेल्या वस्तूंची मनात असंख्य आठवणींची साखळी असते…. ठेव असते.

या आठवणींचा मनात एक हळवा.. सुखद असा कोपरा असतो. तो असा मधूनच उघडायचा…

मग त्यांच्या आठवणीत आपले आपण दिवसभर रमुन जातो…. घरी बसून मिळणारा हा सहज सोपा आनंद उपभोगायचा….

तुमच्याकडे होती का अशी कॉट? आल्या का काही आठवणी? …

आता आपलं ठरलंच आहे … अशा गोष्टीत रमायचं…

… त्याचा मनाने पुन्हा एकदा अनुभव, आनंद, आस्वाद घ्यायचा… हो की नाही…

… मग कळवा तुमच्या आठवणी…

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

पुणे

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “चूक की बरोबर?” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

??

☆ “चूक की बरोबर?” ☆ श्री मंगेश मधुकर

नेहमीच्या वेळेत ऑफिसला निघालो. पिकअवर असल्यानं रस्त्यावर तोबा ट्राफिक. गाडी इंच इंच पुढे जात होती. ही रोजचीच परिस्थिती त्यामुळे आताशा राग, संताप, चिडचिड यापैकी काहीही होत नाही. डोकं शांत असतं. काही वेळानं पुढे सरकत चौकात पोचलो तर रेड सिग्नल लागला. सिग्नलच्या आकड्यांकडे पाहताना “वॉव, वॉव” असा सायरनचा आवाज यायला लागला लगेचच सगळ्या नजरा आवाजाच्या दिशेनं वळल्या. शांत जलाशयावर दगड मारल्यावर जसे तरंग निर्माण होतात अगदी तसं सायरन ऐकून गाडीवाल्यांमध्ये चुळबुळ सुरू झाली.

“घ्या पुढे.. ”

“रस्ता मोकळा करा”

“लाल गाडी हो की पुढे.. ”

“ए बुलेट, फोनवर नंतर बोल आधी गाडी बाजूला घे” एकेक गाडीवाले बोलायला लागले सोबत हॉर्नचा किलकिलाट होताच. अंब्युलन्सला वाट देण्यासाठी जो तो प्रयत्न करू लागला. सिग्नलजवळ सर्वात पुढे असलेल्या पाच-दहा जणांना मागचे गाडीवाले पुढे जाण्यासाठी आग्रह करायला लागले.

“ओ, गाडी घ्या पुढे! ! ”एकजण माझ्याकडे बघत ओरडला.

“सिग्नल! ! ”

“घ्या पुढे काही होत नाही. मामांनी पकडलं तर अंब्युलन्सचं कारण सांगायचं. ते पण काही करत नाही. ”सिग्नल तोडण्यासाठी दबाव वाढत होता. आम्ही मात्र कफ्यूज काय करावं ते समजेना. शेवटी माणुसकी जिंकली. तीस सेकंद बाकी असताना आम्ही गाडी पुढे दामटली आणि काही वेळातच अंब्युलन्स मार्गस्थ झाली परंतु मी मात्र पोलिसांच्या तावडीत सापडलो. पन्नाशीचा पोलिस जाम खतरुड दिसत होता. माझ्याआधी पकडलेल्या लोकांशी उर्मटपणे बोलत होता. माझं लायसेन्स, पीयूसी, गाडीची कागदपत्रे तपासल्यावर साहेब तुसडेपणाने म्हणाले “सभ्य दिसताय आणि सिग्नल मोडता. ” 

“सभ्य म्हणालात त्याबद्दल धन्यवाद! ! सिग्नल मुद्दाम मोडला नाही. महत्वाचं कारण होतं.”

“काहीही असो”

“अहो, अंब्युलन्सला रस्ता मोकळा करून दिला” 

“दंड भरावा लागेल”

“साहेब, मी नियम पाळणारा माणूस आहे”

“असं तुम्ही म्हणताय पण आत्ताच सिग्नल तोडला हे कॅमेऱ्यात रेकॉर्ड झालंय. ”

“सिग्नल मी एकट्यानेच तोडला नाही अजून चारपाच जण होते. ”

“पण सापडलेले तुम्ही एकटेच. बाकीच्यांना नोटिस जातीलच. ”

“चांगुलपणा दाखवला ही चूक झाली का? ”

“ते मला माहिती नाही”

“अहो, जरा समजून घ्या. सीरियस पेशंट असलेल्या अंब्युलन्ससाठी सिग्नल तोडला”

“तुम्हांला काय माहिती की ऍम्ब्युलन्समध्ये सीरियस पेशंट होता. ”

“अंदाज…. साधी गोष्ट आहे. थोडी माणुसकी दाखवली”

“त्यासाठी ट्राफिकचे नियम तोडायची गरज नव्हती. गाडी कडेला घ्यायची”

“एवढं मलाही कळतं पण जागा नव्हती म्हणून.. ”

“तुमच्यासारखे जंटलमन लोक असे वागतात आणि मग ट्राफिकच्या नावानं.. ”

“ओ, बास!! जास्त बोलू नका. इतका वेळ समजावतोय पण ऐकतच नाही. जनरली अशावेळी पोलिस मदत करतात पण तुम्ही..”

“नियम म्हणजे नियम”

“पण काही परिस्थिती अपवाद असतात ना. उगीच दुसऱ्या कोणाचा राग माझ्यावर काढताय. जाऊ द्या. ”

“मी कुठं थांबवलयं. तुम्हीच वाद घालताय. दंड भरा आणि जा”

आमची वादावादी सुरू असताना बघ्यांची गर्दी जमली. आधीच खूप उशीर झालेला त्यामुळे मी माघार घेत दंड भरून पावती घेतली आणि गाडी घेऊन निघालो तेव्हा संतापाने डोकं भणभणत होतं. काहीही चूक नसताना खिशाला भुर्दंड पडला तोही एक चांगलं काम केलं म्हणून… डोक्यात विचारांचं वादळ, मी वागलो ते चूक की बरोबर????

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “‘दैवतीकरण’ साहजिकच!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

 

? इंद्रधनुष्य ?

“‘दैवतीकरण’ साहजिकच! ☆ श्री संभाजी बबन गायके 

११ मार्च २०२५… ३३६ वर्षे उलटून गेली छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या बलिदानाला. ११ मार्च १६८९ ते ११ मार्च २०२५ … या काळात स्वधर्मासाठी एवढा प्रचंड त्याग आणि वेदनांशी लढा इतर कोणाच्याही इतिहासात आढळून येत नाही!

शारीरिक छळाची वर्णने शब्दांत वाचून सहृदय माणसाच्या मनावर जेवढा परिणाम होतो, त्यापेक्षा ती अभिनित दृश्ये पाहताना होतो तो परिणाम अपरिमेय असतो. छावा चित्रपटातील शेवटची दृश्ये पडद्यावर पाहून जवळपास सर्वच प्रेक्षक नि:शब्द होतात, हे त्याचेच द्योतक म्हणावे लागेल.

क्रूरकर्मा औरंगजेब खरे तर छत्रपती संभाजी महाराजांचे प्राण एका वारामध्ये घेऊ शकला असता. पण त्याने त्यांच्या मृत्यूचा उपयोग उभ्या महाराष्ट्रालाच नव्हे तर त्याच्या वाटेत येऊ पाहणा-या प्रत्येकाच्या मनात कायमची धडकी भरवण्यासाठी केला… हे सर्वश्रुत आहे! पण त्याचे हे मनसुबे पूर्ण झाले नाहीत… हा इतिहास आहे! अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जीभा… हा या मराठी मातीचा बाणा आहे!

आपल्यापेक्षा सामर्थ्यवान असलेल्या व्यक्तींना सन्मान देण्याची मानवी सहजवृत्ती आहे. किंबहुना अवघ्या प्राणिसृष्टीमध्ये ही वृत्ती आढळून येते. मानवाने त्याच्यापेक्षा सामर्थ्यवानांस देव ही पदवी देण्याची रीत दिसून येते. राजाला भूदेव अर्थात पृथ्वीवरचा देवाचा अवतार किंवा देवच मानले जाते, हे आपण पाहू शकतो.

अखंड स्मरणीय थोरले छत्रपती श्री शिवाजी महाराज साहेब आणि धाकलं धनी अखंड स्मरणीय श्री संभाजी महाराज साहेब यांना रयतेने आपल्या मनातल्या गाभा-यात देवाचे स्थान दिले आहे, हे कोण नाकारू शकतो?

महापुरुषांना देवत्व देऊन त्यांना गाभा-यात बसवणे, त्यांची पूजा करणे, आरती करणे याला विचारवंत माणसांचा आक्षेप आहे. या महापुरुषांच्या विचारांचा, मार्गदर्शनाचा विसर पाडून घेऊन त्याच्या विरुद्ध कृती करणे इथपर्यंत हा आक्षेप योग्यच आहे. पण, या ‘देवांच्या’ विचारांवर चालणारी माणसं जर यांना देवत्व बहाल करत असतील, तर त्यांच्या भावना दुखावण्याचा अधिकार कुणाला कसा प्राप्त होतो, हा प्रश्न आहे.

प्रभू श्रीराम, प्रभू श्रीकृष्ण यांचे देवत्व मान्य करून त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन जीवन व्यतीत करणारे अनेक लोक आहेत. त्यामुळे समाजाचे कल्याणच झाले आहे. अर्थात, देवत्वाचे स्तोम माजवून त्या माध्यमातून आर्थिक, सामाजिक प्राप्ती करून घेऊन आपले ऐहिक जीवन सुखमय करणारे लोकसुद्धा आहेत, हे आपले दुर्दैव म्हणावे लागेल… पण त्याला काही इलाज नाही. आपण केवळ आक्षेप नोंदवू शकतो… तोही तशी सोय असेल तर!

आधी सामान्य माणसे म्हणून दृष्टीस पडलेले महात्मे पुढे मठात, मंदिरांतल्या गाभा-यांत विराजमान झालेच की. त्यांच्या आरत्या, स्तोत्रे, ग्रंथ निर्माण झालेच की. त्यांच्यामागे खूप मोठा समुदाय असून ते अनेक लोकोपयोगी कामे सिद्ध करतात, हे ही खरेच आहे. आणि याला आक्षेप असण्याचे कारण नाही.

गेली कित्येक वर्षे श्री संभाजी महाराज बलिदान मास पाळणारी, उपवास करणारी, विशिष्ट अन्न त्यागणारी, पादत्राणे न घालणारी हजारो माणसे आहेत. काही ठिकाणी मंदिरे सुद्धा निर्माण झाली आहेत. ‘जय देव जय देव जय श्री शिवराया’ ही स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी लिहिलेली आरती आहेच. यातून सामान्य लोकांच्या मनात धर्मप्रेम, राष्ट्रप्रेम जागृत होत असेल तर याचे स्वागतच करायला पाहिजे. मराठी सैनिक जेंव्हा युद्धात ‘ बोल श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय…’ अशी गर्जना करत देशाच्या रक्षणासाठी प्राणार्पण करतात त्यामागे ही देवत्वाचीच भूमिका असते.

केवळ देव मानून थांबू नका…. त्यांच्या देवत्वाचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करा… हे सांगणे वेगळे आणि देवत्व देऊ नका! हे सांगणे वेगळे.

शेवटी, समाजात सामान्य लोक बहुसंख्येने आहेत हे मान्य करून त्यांच्या भावनांना यथायोग्य मान देत देत काही सुधारणा सुचवता आल्या तर जरूर तसे करावे.. पण सरसकट ‘नको’ हा विचार टिकणारा नसल्याने त्याज्य आहे!

मी चार वर्षांपूर्वी छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारीत एक आरती लिहिण्याचा असफल प्रयत्न केला होता. जमेल तसा युट्यूब विडीओ तयार करून प्रसिद्ध केला होता. यात श्री आशुतोष मुंगळे या गायकाने आवाज दिला आहे. ते शब्द संदर्भासाठी इथे देत आहे. यातूनही कुणी योग्य ती प्रेरणा घेऊ शकते!

☆ श्री छत्रपती संभाजी महाराज यांना शब्दवंदना ….आरती! ☆

काव्य लेखन :- श्री संभाजी बबन गायके.

गायन:-आशुतोष मुंगळे

आरती ओवाळू शिवसूत श्री शंभू राया

मुजरा स्वीकारावा तुमच्या वंदितो पाया…

शालिवाहन शक पंधराशे एकोणऐंशी वर्ष

मराठी मातीला बहु जाहला हर्ष…

द्वादशी शुद्ध मास शोभला ज्येष्ठ

देहासी आले श्री शंभू नरश्रेष्ठ …

पुरंदराच्या हृदयी मावेना माया…

 *

शिवरायांच्या सईबाईंची उजवली कूस

घडवण्या समशेर सज्ज सह्याद्री मूस…

युवराजांच्या कंठी शोभे कवड्यांची माळ 

शिवगंधाने सजले भव्य रुंद ते भाळ…

जिजाऊ आतुरल्या शंभू बाळा पहावया…

 *

उधळला चौखूर शंभू रायांचा अश्व

रोमांचित झाले अवघे मराठी विश्व…

लढता शंभू भासे जैसा कोपला रुद्र

भेदी चक्रव्युहा अभिमन्यू सौभद्र…

भगवा विजयी गगनी पहा लागे फडकाया…

 *

आत्मसात करुनी शास्त्र भाषांचे ज्ञान

सभेत पंडितांच्या शंभू शोभे विद्वान…

रयतेचा राजा घेई न्यायाचा पक्ष

शिवरायांचा छावा शंभू प्रजाहित दक्ष…

सिंहाची गर्जना शत्रू लागे कांपाया…

 *

अवचित काळोखाने सूर्य झाकोनिया गेला…

उजेड अंधाराने खोल पाताळी नेला…

झुकली ना दृष्टी विझल्या नयनांच्या ज्योती

हर हर महादेव थेंब रक्ताचे गाती…

मृत्यू गहिवरला येता शंभुशी न्याया…

 *

आरती ओवाळू शिवसूत श्री शंभू राया…

मुजरा स्वीकारावा तुमच्या वंदितो पाया!…

  

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “जरूरी आहे आपल्यात बदल करण्याची…” – लेखक : अनामिक ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆

सुश्री शोभा जोशी 

? वाचताना वेचलेले ?

☆ “जरूरी आहे आपल्यात बदल करण्याची…” – लेखक : अनामिक ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆

 “  “ लेखक : अनामिक प्रस्तुती : शोभा जोशी 

जरूरी आहे, आपल्यात बदल करण्याची!


“आज माझ्या युनिट टेस्टचा रिझल्ट आहे.

क्लासमध्ये बघायला या, नाही तर मी बोलणार नाही! “

… ही गोड धमकी आठवतंच मी माझ्या मुलीच्या दुसरीच्या वर्गात शिरलो.

माझ्या आधीही काही पालक हौसेनं निकाल बघायला आलेले. बाबापेक्षा आईंची संख्या जास्त.

मी बावरतच वर्गात नजर फिरवली. मला पाहताच अनपेक्षित लाभ झाल्यासारखी, मुलगी उठुन आनंदाने मला घेऊन टीचरकडे गेली न् म्हणाली.. “ माय फादर. ” मीही ‘गुडमॉर्निंग’ म्हणालो.

टीचरनी एक कागद दिला व म्हणाल्या, “ हिच्या नावापुढे सही करा. “

मुलीनं रोल नंबरवरुन नांव शोधलं. सही करताना लक्षात आलं की आधीच्या तिन्ही सह्या आईच्या होत्या. मनात विचार आला, ‘खरेच एवढे बिझी आहोत का आपण? ’

विचारातच सही केली. टीचरनी एक्झाम पेपर्स माझ्याकडे दिले न म्हणाल्या, “ बसून बघा सगळे पेपर. ” असं म्हणुन टीचर बाकीच्या पालकांच्या शंका सोडवू लागल्या.

मी तिच्या बेंचवर कसा तरी बसलो. बाजुला माझं बाळ. अगोदर सगळ्या पेपरवरचे मार्क्स पाहिले. ४० पैकी ३५, ३६. कुठे ३२.

– – टीचरजवळ १ मार्क गेला म्हणुन मुलांची काळजी करणा-यांची गर्दी बघुन, माझी मुलगी पहिल्या ५ मध्ये काय, १० मध्येही नसेल याची खात्री झाली. मीही मग चुकलेली प्रश्नोत्तरे बघायला लागलो.

.. उत्तरे व्यवस्थित सुवाच्च सुटसुटीत लिहिलेली. चुकीचं उत्तरही छान लिहिलेलं.

मी तिच्याकडे पाहताच ती हसत जीभ चावायची. तिने असं केलं.. की मी रागवू शकत नाही म्हणून.

“बाबा, इथे माझी गडबड झाली म्हणून चुकलं! “

“आता तुला याचं बरोबर उत्तर माहित आहे का? ” – मी.

“हो. सगळी माहीत आहेत. “

“मग ठीक आहे. चुकू दे उत्तर. मार्क मिऴालेत समज”

“कसं काय? ” ती गोंधळली.

“बरोबर उत्तरे विसरण्यापेक्षा चुकलेले प्रश्न लक्षात ठेवलेले बरे. ” मी उत्तरलो.

ती परत ‘का? ‘

“कळेल नंतर! ” मी

मीही भरभर पेपर बघितले व टीचरना परत दिले. धन्यवाद देऊन मुलीला घेऊन बाहेर पडलो.

तिला उचलून कडेवर घेऊन पाय-या उतरत होतो तेवढ्यात जिन्यात इंग्रजीत सुविचार दिसले. तिला ते वाचायला लावले. तिने ते वाचले पण अर्थ तिला कळाला नव्हता.

मग मी तिला ते सुविचार उदाहरणासहित समजावून दिले. पहिल्या मजल्यावर येईस्तोवर तिला एक सुविचार पाठही झाला.

अचानक काही तरी आठवल्यासारखं मुलीनं विचारलं, “ बाबा तुम्ही टीचरना काहीच का नाही विचारलं? ”

“काहीच म्हणजे? “

“म्हणजे की मार्क कमी का मिळाले, मी दंगा करते का ते? घरी कधी कधी दमवते, टीव्ही बघत अभ्यास करते, अशी तक्रार पण नाही! “..

मला हसू आलं.

मी तिला हसतच विचारलं, “तू शाळेत कचरा करतेस का? “

“नाही”. – ती.

“सगळ्या टीचरना रिस्पेक्ट देतेस? “

“हो”.

“तुझ्याजवळ नेहमी एक इरेजर, शार्पनर, पेन्सिल एक्स्ट्रा असते, ते तू कुणाला लागलं तर लगेच देतेस? “

“हो”.

“रोज एकाच बेंचवर न बसता सगळ्यांशी मैत्री करतेस? ‘

“हो”.

“नेहमी खरं बोलतेस? “

परत “हो”

“लगेचच मनापासून सॉरी आणि थॅंक्यु म्हणतेस ना?

‘हो बाबा हो.. किती विचारताय हो? ‘

“मग ठीक आहे बेटा. या बदल्यात थोडे मार्क गेले, अध्येमध्ये घरी दमवलं तर चालतंय मग. ” मी म्हणालो.

“ का पण? “

“हेच तर शिकायचंय आता तुला”

“आणि मार्कं, शिक्षण, पहिला नंबर?

“बेटा दुसरीचे मार्क दाखवून जीवनात काही मिळणार नाही आणि शिक्षण काय? कायम चालुच असतं. “

…. सगळं तिच्या डोक्यावरुन गेलेलं. ती जरा उचकुनच म्हणाली,

“बाबा, मी मोठी झाल्यावर मला तुम्ही नक्की काय करणार आहे? “

तिच्या डोळ्यात बघुन मी म्हणालो, “सुसंस्कृत”.

…. परत एकदा डोक्यावरुन गेलं. कळावं म्हणुन ती म्हणाली, “ त्यासाठी मी काय करायचं नक्की. ”

मीही लगेच तिला धीर देत म्हणालो, “फार काही नकोस करू. आता जशी आहेस तसं तु कायम रहा! “

“मग ठीक आहे बाबा” तिच्या जीवात जीव आला.

एक दोन पाय-या उतरल्यावर ती परत म्हणाली, “बाबा, माझा रिझल्ट काय होता? मी पाहिलाच नाही की? “

मी म्हणालो, “रिझल्ट? तू दुसरी पास होणार! “

…. पास शब्द ऐकताच तिचा चेहरा आणखी खुलला. माझ्या खांद्यावर मान ठेऊन लाडीक स्वरात कानात म्हणाली,

“म्हणजे बाबा, आजही तुम्ही मला एक बटरस्कॉच आईस्क्रिम देणार ना? “

मीही हसत तिला घट्ट छातीशी धरत ‘Yes’ म्हणलं.

 

हीच खरी शिकवण कुठे तरी लोप पावत चालली आहे, आणि आपण चुकीच्या मार्गाने आपल्या मुलांचे मूल्यमापन करत आहोत। 

…. जरूरी आहे, आपल्यात बदल करण्याची!

लेखक : अनामिक

प्रस्तुती : श्रीमती शोभा जोशी

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ जीवो जीवस्य जीवनम्… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य ?️?

☆ जीवो जीवस्य जीवनम्… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के

तडफड झाली बंद क्षणात

चोचीमधला होता घास

पकड एवढी घट्ट आपसूक

जीव जाई गुदमरून श्वास —

*

दोघांचे डोळे जवळजवळ

भक्ष्याचा आनंद एका नेत्री

भयभीत भाव दुज्या डोळी

मरणच या क्षणाची खात्री — 

*

जीवो जीवस्य जीवनम्

इथे तिथे निसर्गात चाले

मान्य असते आपणा परंतु

होतातच ना डोळे ओले! — 

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कथा चर्चा ☆ क्लासिक किरदार – “ओ हरामजादे” – लेखक – स्व. भीष्म साहनी ☆ चर्चा – श्री कमलेश भारतीय ☆ ☆

श्री कमलेश भारतीय 

(जन्म – 17 जनवरी, 1952 ( होशियारपुर, पंजाब)  शिक्षा-  एम ए हिंदी , बी एड , प्रभाकर (स्वर्ण पदक)। प्रकाशन – अब तक ग्यारह पुस्तकें प्रकाशित । कथा संग्रह – 6 और लघुकथा संग्रह- 4 । यादों की धरोहर हिंदी के विशिष्ट रचनाकारों के इंटरव्यूज का संकलन। कथा संग्रह -एक संवाददाता की डायरी को प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी से मिला पुरस्कार । हरियाणा साहित्य अकादमी से श्रेष्ठ पत्रकारिता पुरस्कार। पंजाब भाषा विभाग से  कथा संग्रह-महक से ऊपर को वर्ष की सर्वोत्तम कथा कृति का पुरस्कार । हरियाणा ग्रंथ अकादमी के तीन वर्ष तक उपाध्यक्ष । दैनिक ट्रिब्यून से प्रिंसिपल रिपोर्टर के रूप में सेवानिवृत। सम्प्रति- स्वतंत्र लेखन व पत्रकारिता)

पुनर्पाठ में आज प्रस्तुत है स्व भीष्म साहनी जी की एक कालजयी रचना “ओ हरमजादे” पर श्री कमलेश भारतीय जी की कथा चर्चा।

☆ कथा चर्चा ☆ क्लासिक किरदार – “ओ हरामजादे” – लेखक – स्व. भीष्म साहनी  ☆ चर्चा – श्री कमलेश भारतीय ☆

यह दैनिक ट्रिब्यून का एक रोचक रविवारीय स्तम्भ था – “क्लासिक किरदार“। यानी किसी कहानी का कोई किरदार आपको क्यों याद रहा ? क्यों आपका पीछा कर रहा है? – कमलेश भारतीय

प्रसिद्ध कथाकार भीष्म साहनी की कहानी ओ हरामजादे मुझे इसलिए बहुत पसंद है क्योंकि जब मैं अपने शहर से सिर्फ सौ किलोमीटर दूर चंडीगढ़ में नौकरी करने नया नया आया तब एक शाम मैं बस स्टैंड पर अपने शहर को जाने की टिकट लेने कतार में खड़ा था कि पीछे से आवाज आई – केशी, एक टिकट मेरी भी ले लेना। यह मेरे बचपन के दोस्त सतपाल की आवाज थी।

कितना रोमांचित हो गया था मैं कि चंडीगढ़ के भीड़ भाड़ भरे बस स्टैंड में किसी ने मेरे निकनेम से पुकारा। आप सोचिए कि हजारों मील दूर यूरोप के किसी दूर दराज के इलाके में बैठा कोई हिंदुस्तानी कितना रोमांचित हो जाएगा यदि उसे कोई दूसरा भारतीय मिल जाए ।

ओ हरामजादे कहानी यहीं से शुरू होती है जब मिस्टर लाल की पत्नी नैरेटर को इंडियन होने पर अपने घर चलने की मनुहार लगाती है और घर में अपने देश और शहर को नक्शों में ढूंढते रहने वाले पति से मिलाती है। लाल में कितनी गर्मजोशी आ जाती है और वह सेलिब्रेट करने के लिए कोन्याक लेकर आ जाता है। फिर धीरे-धीरे कैसे लाल रूमानी देशप्रेम से कहीं आगे निकल जालंधर की गलियों में माई हीरां गेट के पास अपने घर पहुंच जाता है। जहां से वह भाई की डांट न सह पाने के कारण भाग निकला था और विदेश पहुंच कर एक इंजीनियर बना और आसपास खूब भले आदमी की पहचान तो बनाई लेकिन कोई ओ हरामजादे की गाली देकर स्वागत् करने वाला बचपन का दोस्त तिलकराज न पाकर उदास हो जाता। इसलिए वह कभी कुर्ता पायजामा तो कभी जोधपुरी चप्पल पहन कर निकल जाता कि हिंदुस्तानी हूं, यह तो लोगों को पता चले ।

आखिर वह जालंधर जाता क्यों नहीं ? इसी का जवाब है : ओ हरामजादे । लाल एक बार अपनी विदेशी मेम हेलेन को जालंधर दिखाने गया था। तब बच्ची मात्र डेढ़ वर्ष की थी। दो तीन दिन लाल को किसी ने नहीं पहचाना तब उसे लगा कि वह बेकार ही आया लेकिन एक दिन वह सड़क पर जा रहा था कि आवाज आई : ओ हरामजादे, अपने बाप को नहीं पहचानता ? उसने देखा कि आवाज लगाने वाला उसके बचपन का दोस्त तिलकराज था । तब जाकर लाल को लगा कि वह जालंधर में है और जालंधर उसकी जागीर है । तिलकराज ने लाल को दूसरे दिन अपने घर भोजन का न्यौता दिया और वह इनकार न कर सका । पत्नी हेलेन को चाव से तैयार करवा कर पहुंच गया। तिलकराज ने खूब सारे सगे संबंधी और कुछ पुराने दोस्त बुला रखे थे। हेलेन बोर होती गयी। पर दोस्त की पत्नी यानी भाभी ने मक्की की रोटी और साग खिलाए बिना जाने न दिया। लाल ने भी कहा कि ठीक है फिर रसोई में ही खायेंगे। पंजाबी साग और मक्की की रोटी नहीं छोड़ सकता। वह भाभी को एकटक देखता रहा जिसमें उसे अपनी परंपरागत भाभी नजर आ रही थी पर घर लौटते ही पत्नी हेलेन ने जो बात कही उससे लाल ने गुस्से में पत्नी को थप्पड़ जड़ दिया क्योंकि हेलेन ने कहा कि तुम अपने दोस्त की पत्नी के साथ फ्लर्ट कर रहे थे। उस घटना के तीसरे दिन वह लौट आया और फिर कभी भारत नहीं लौटा। फिर भी एक बात की चाह उसके मन में अभी तक मरी नहीं है।

इस बुढ़ापे में भी मरी नहीं कि सड़क पर चलते हुए कभी अचानक कहीं से आवाज आए – ओ हरामजादे । और मैं लपककर उस आदमी को छाती से लगा लूं यह कहते हुए  उसकी आवाज फिर से लड़खड़ा गयी। लाल आंखों से ओझल नहीं होता। पूरी तरह भारतीयता और पंजाबियत में रंगा हुआ जो अभी तक इस इंतजार में है कि कहीं से बचपन का दोस्त कोई तिलकराज उसे ओ हरामजादे कह कर सारा प्यार और बचपन लौटा दे। कैसे भीष्म साहनी के इस प्यारे चरित्र को भूल सकता है कोई ?  कम से कम वे तो नहीं जो अपने शहरों से दूर रहते हैं चाहे देश चाहे विदेश में। वे इस आवाज़ का इंतजार करते ही जीते हैं।

© श्री कमलेश भारतीय

पूर्व उपाध्यक्ष हरियाणा ग्रंथ अकादमी

संपर्क : 1034-बी, अर्बन एस्टेट-।।, हिसार-125005 (हरियाणा) मो. 94160-47075

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कविता ☆ पुण्य स्मरण…  – मराठी कवयित्री : सौ. उज्ज्वला केळकर ☆  भावानुवाद – श्री भगवान वैद्य “प्रखर” ☆

श्री भगवान वैद्य ‘प्रखर

? कविता ?

☆ पुण्य स्मरण…  – मराठी कवयित्री : सौ. उज्ज्वला केळकर ☆  भावानुवाद – श्री भगवान वैद्य “प्रखर”

सौ. उज्ज्वला केळकर

उस महापुरुष का पुण्यस्मरण…

पुतले का अनावरन

चरित्र का गुणगान,

‘पिछले कई शतकों में

नहीं हुआ ऐसा महामानव

न होगा अगले कई शतकों में’

 

भीगे स्वर…

पनीली आंखें…

अभिभूत मन …

 

‘उनके बतलाये मार्ग पर चलने का

करें संकल्प…’

तालियां…जोरदार तालियां…

 

‘उनके कार्य की ज्योत

जलाये रखने का करें संकल्प…’

 

फिर एक बार जोरदार तालियां …

 

अनेक शब्द…

अनेक संकल्प

पुतले के चरणों में करके अर्पण,

निकल गये सारे रिक्त नैनों से,

खुले मन से।

 

महापुरुष का पुतला

समेटता रहा उनके संकल्पों के कफन ।

मूल मराठी कविता – सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – [email protected] 

हिन्दी भावानुवाद – श्री भगवान वैद्य ‘प्रखर

संपर्क : 30 गुरुछाया कालोनी, साईंनगर, अमरावती-444607

मो. 9422856767, 8971063051  * E-mail[email protected] *  web-sitehttp://sites.google.com/view/bhagwan-vaidya

संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – अनहद ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं।)

? संजय दृष्टि – अनहद ??

एक लहर आती है,

एक लहर लौटती है,

फिर नई लहर आती है,

फिर नई लहर लौटती है,

आना, लौटना,

काया पाना,

काया तजना,

समय के प्रवाह में

नित्य का चोला बदलना,

लहरों के निनाद में

सुनाई देता अनहद नाद,

अनादि काल से

समुद्र कर रहा

श्रीमद्भगवद्गीता का

सस्वर पाठ…!

?

© संजय भारद्वाज  

11:07 बजे , 3.2.2021

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय, एस.एन.डी.टी. महिला विश्वविद्यालय, न्यू आर्ट्स, कॉमर्स एंड साइंस कॉलेज (स्वायत्त) अहमदनगर संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆ 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

☆ आपदां अपहर्तारं ☆

🕉️💥 श्री शिव महापुराण का पारायण सम्पन्न हुआ। अगले कुछ समय पटल पर छुट्टी रहेगी। जिन साधकों का पारायण पूरा नहीं हो सका है, उन्हें छुट्टी की अवधि में इसे पूरा करने का प्रयास करना चाहिए। 💥 🕉️ 

अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares