तीन मार्च हा श्रवण दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त लेख:
☆ श्रवण ☆
‘श्रवण’ हे पहिले भाषिक कौशल्य आहे. त्याचे नंतर भाषण, वाचन, लेखन इत्यादी. श्रवण मध्ये मूळ धातू’ श्रु’ ऐकणे. पण ऐकणे आणि श्रवण यात फरक आहे. आपल्या कानावर बरेच आवाज पडत असतात त्यातील विशिष्ट आवाज लक्षपूर्वक ऐकणे म्हणजे श्रवण (listening)आणि ऐकणे म्हणजे नुसते आवाज कानावरून जाणे(hearing). वेदांना श्रुती म्हणतात. मग वेद वचन ऐकणारा तो श्रोता. आणि त्याने ऐकलेली वचने म्हणजे श्रुत. यावरून ज्ञानी माणसाला बहुश्रुत म्हणतात. ऐकणारे इंद्रिय कान याला कर्ण, श्रोत्र, श्रवण असे प्रतिशब्द आहेत.
आपल्या वैदिक संस्कृतीत श्रवणाला पूर्वापार महत्त्व आहे. कारण श्रवणाद्वारेच ज्ञानगंगा प्रवाहित राहिली. गुरु शिष्य शिक्षण पद्धतीत गुरुने सांगावे. शिष्याने ते मनापासून ऐकावे, मग कंठस्थ करावे व पुढील पिढीला सांगावे. अशी पद्धत होती. ज्ञानेश्वर म्हणतात ‘वक्ता तो वक्ताची नोहे। श्रोतेविण।’अधिकारी श्रोता नसेल तर वक्त्याचे बोलणे वाया जाते. इतके श्रवणाचे महत्व. विश्वामित्रांनी रामलक्ष्मणाना यज्ञ रक्षणासाठी आपल्याबरोबर नेले. वाटेत चालता चालता त्यानी जो ज्ञानोपदेश केला तो राम-लक्ष्मण यांनी श्रवण केला. चित्तात धारण केला. तेथे लिहून घेण्याची गरज पडली नाही. श्रवण असे एकाग्रतेने करायचे असते. ते जेव्हा परमेश्वराच्या लीला गुणांचे होते. तेव्हा ती ‘श्रवण भक्ती ‘होते नवविधा भक्तीतील ही पहिली भक्ती.
गौतम बुद्ध एकदा झाडाखाली बसले होते. तेव्हा कोणी एक जण येऊन त्यांना अपमान कारक बोलू लागला. पण गौतम बुद्ध शांत होते. त्यांच्या शिष्याला याचे आश्चर्य वाटले. तेव्हा गौतम बुद्ध म्हणाले देणाऱ्याने दिले तरी काय घेणे ते आपण ठरवायचे असते. हाच श्रवण विवेक. तो माणूस मुकाट्याने निघून गेला. श्रवण केलेल्या गोष्टीचा माणूस विनियोग कसा करतो हे सांगणारी अकबर बिरबलाची एक गोष्ट आठवते. एकदा अकबराने तीन सारख्या धातूच्या मूर्ती आणल्या आणि बिरबलाला त्यांच्यातील फरक ओळखायला सांगितला. बिरबल चाणाक्ष होता. त्याने एक तार घेतली. एका मूर्तीच्या कानात घातली. ती दुसऱ्या कानातून बाहेर आली. म्हणजे असे काही लोकांचे श्रवण वरवरचे असते. नळी फुंकिली सोनारे इकडून तिकडे गेले वारे, अशा प्रकारचे. दुसऱ्या मूर्तीच्या कानात तार घातली, तर तोंडातून बाहेर आली. म्हणजे त्याने ऐकले ते लगेच बोलून टाकले. पण तिसऱ्या मूर्तीच्या कानातील तार पोटात गेली. ती बाहेर आली नाही. म्हणजे त्याने ऐकले त्यावर विचार मनन केले. हे खरे श्रवण. समर्थ रामदास म्हणतात ‘, ऐसे अवघेची ऐकावे। परंतु सार शोधून घ्यावे ।असार ते जाणूनी त्यागावे ।या नाव श्रवण भक्ती । पण सगळेच ऐकले तरी त्यातले सार तेवढेच घ्यावे. म्हणून गणपतीला शुर्पकर्ण म्हणतात. सुपासारखे कान असलेला. सुप जसे फोलपट टाकून स्वच्छ धान्य ठेवते. तसेच गणपतीचे कर्ण. त्याचे श्रवण हा गुण सर्वांनीच घ्यावा.
कान हे श्रवणाचे प्रतीक. तो आपला आपण बंद होत नाही. जसे तोंड व डोळा बंद करता येतो. त्यामुळे त्याला नकार देता येत नाही. डोळा फक्त समोरचेच पाहतो. पण चारी बाजूच्या लहरी कानावरती सहजच पडतात. घरात बसलेले असताना विविध आवाज आपल्या कानावर ती पडतात. पक्षी किलबिलत असतात. रेडिओ सुरू असतो. पंख्याचा आवाज येत असतो. कोणीतरी काही बोलत असते. अशा गडबडीत कोणत्यातरी एका इच्छित आवाजावर लक्ष केंद्रित करणे हेच श्रवण कौशल्य. त्यासाठी गरज मनाच्या एकाग्रतेची. हाच खरा श्रोता. यालाच ज्ञानेश्वर अवधान म्हणतात. श्रोत्यांना वेळोवेळी सांगतात, ‘ आता अवधान ऐकले द्यावे ।मग सर्व सुखाची पात्र होईजे।’
कानावरून आलेले विविध वाक्प्रचार व म्हणी आपल्या मराठी भाषेचे सौंदर्य वाढवतात. उदाहरणार्थ बळी तो कान पिढी, कानामागून आला तिखट झाला, भिंतीला कान असतात, कान व डोळा या चार बोटाचे अंतर, कान टवकारणे इत्यादी
माणूस हा सौंदर्याचा भोक्ता. त्यामुळे कानाला सजविण्यासाठी त्याला दागिन्या घालण्याची पूर्वापार प्रथा आहे. त्याला कुंडल असे म्हणतात. त्यासाठी बारशाच्या दिवशीच कान टोचतात. आपल्या सोळा संस्कारतील हा एक संस्कार. कानाच्या वरच्याभागी पुरुषही भिकबाळी नावाचा दागिना घालतात. ‘मकर कुंडले तळपती श्रवणी’ असे विठ्ठलाच्या कुंडलाचे वर्णन करतात. कुंडलांचा कुंडली जागृतीशी संबंध आहे असे म्हणतात. कान टोचण्यामध्ये शास्त्रीय कारणही आहे त्यामुळे आजारांची शक्यता कमी होते व स्वास्थ्य टिकते. या कुंडलावरून ‘वारियाने कुंडल हाले’ किंवा ‘बुगडी (म्हणजे कानातील दागिना) माझी सांडली ग’ अशी गाणी हे रचली गेली. असो कितीही दागिने घातले तरी
हस्तस्य भूषणानं दानं।सत्यं कंठस्यभूषणम्।
कर्णस्यभूषण शास्त्रं।भूषणैः किं प्रयोजनम्।
शास्त्र श्रवण करणाऱ्याच्या कानाला दुसऱ्या दागिन्यांची गरज नाही.
☆ ‘प्रेमळ आदेश…’ – भाग- १ – मूळ हिन्दी लेखक – अनामिक ☆ अनुवाद – श्री मेघःशाम सोनवणे ☆
रात्रीचे साधारण ८ वाजले होते. ऑफिसमधून परत आल्यानंतर मी जेवण बनवत होते आणि राकेश अजूनही त्याच्या लॅपटॉपवर ऑफिसच्या कामात व्यस्त होता. तेवढ्यात फोन वाजला. हा कोणाचा फोन आहे याची उत्सुकता मला किचनमधून खेचत होती. फोनवर बोलताना राकेशला खूप अस्वस्थ होताना मी पाहिलं.
‘कृपया, त्यांना दवाखान्यात घेऊन जा. मी ताबडतोब निघतो आहे, तरी मला पोहोचायला २-३ तास लागतील, ‘ असं म्हणत त्यांनी फोन ठेवला. मी काही विचारण्याआधीच त्यांनी घाईघाईने मला सगळा प्रकार सांगितला आणि त्यांचे काही कपडे आणि महत्त्वाच्या गोष्टी बॅगेत ठेवायला सुरुवात केली.
मथुरा येथे राहणारी राकेशची काकू अचानक खूप आजारी पडली होती. त्यांची अवस्था पाहून शेजाऱ्याने आम्हाला फोन केला. आमच्याशिवाय या जगात काकूंचं कोण आहे? त्यांना स्वतःचे मूलबाळ नाही आणि काही वर्षांपूर्वी काकांचे निधन झाले आहे.
आमच्या लग्नात काकूने माझ्या सासूबाईंचे सर्व विधी पार पाडले. राकेशच्या आई-वडिलांचा फार पूर्वी कार अपघातात मृत्यू झाला होता. त्यावेळी राकेशची बहीण गरिमा शिक्षण पूर्ण करून नोकरीच्या शोधात होती, मात्र राकेश शाळेत शिकत होता, जो त्याच्या बहिणीपेक्षा 8 वर्षांनी लहान आहे. त्यानंतर काका-काकूंनी बहिणीचे लग्न लावून दिले आणि पुढील शिक्षणासाठी राकेशला शाळेनंतर वसतिगृहात पाठवले. राकेशने मला या दोन वर्षात अनेक वेळा सांगितले आहे की माझ्या काका आणि काकूंनी दीदी आणि माझ्यावर त्यांच्या मुलांसारखे प्रेम केले आहे.
पूर्वी संपूर्ण कुटुंब एकत्र राहायचे पण राकेश चौथीत शिकत असताना त्याच्या काकांची मथुरेला बदली झाली. यानंतर त्यांची इतर अनेक शहरांमध्ये बदली झाली पण त्यांनी मथुरेत घर बनवले होते, त्यामुळे त्यांच्या मृत्यूनंतर आत्या मथुरेत आल्या. नाही तर त्या कुठे गेल्या असत्या?
मला काकूंबद्दल फारशी माहिती नव्हती. आमच्या लग्नाच्या वेळी त्या आमच्याकडे फक्त ५-६ दिवस राहिल्या होत्या. खरे तर आम्हा दोघांना लग्नानंतर बँकॉक ला जायचे होते, म्हणून त्या मथुरेला परतल्या. मी काय काय विचार करू लागले होते. राकेशच्या आवाजाने मला पुन्हा वर्तमानात आणले. ते म्हणत होते, बघ मी घाईत काही ठेवायला विसरलो तर नाही ना?
बॅग भरून झाल्यावर राकेश काकूला एकटं कसं सांभाळतील असा विचार करत मी पण सोबत येण्याबद्दल विचारले तर ते म्हणाले की आधी जाऊन परिस्थिती बघायला हवी, गरज पडली तर तुला फोन करेन. त्यानंतर ते मथुरेला रवाना झाले.
लग्नानंतर ही पहिलीच वेळ होती की मी रात्री घरी एकटी होते. एक विचित्र भीती आणि अस्वस्थता मला झोपू देत नव्हती. रात्री दोनच्या सुमारास मी राकेशशी बोलले. काकू बेशुद्ध असल्याचे कळले. अनेक प्रकारच्या चाचण्या केल्या जात होत्या, आत्ताच काही सांगता येणार नाही असे डॉक्टर म्हणाले होते. राकेश खूप काळजीत दिसत होते.
दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजता राकेशने फोन केला की काकूंच्या उपचार आणि डॉक्टरांवर ते समाधानी नाहीत. काकूंसोबत ते दिल्लीला येत आहेत. दिल्लीतील रुग्णालयाशी चर्चा सुरू आहे.
संध्याकाळपर्यंत ते काकूंना सोबत घेऊन दिल्लीला पोहोचले. काकू बेशुद्ध अवस्थेत खूप अशक्त दिसत होत्या. रंगही पिवळा पडला होता. ते दवाखान्यात पोहोचण्यापूर्वीच मी तिथे पोहोचले. डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले.
काकूंना ५ दिवसांनी दवाखान्यातून घरी सोडण्यात आले होते, मात्र डॉक्टरांनी औषधोपचारासह विश्रांती घेण्याच्या सक्त सूचना दिल्या होत्या. आम्ही त्यांना घरी आणले. हा आजार काही विशेष नव्हता. वाढते वय, एकटेपणा, चिंता, कामाचा थकवा, वेळेवर नीट न खाणे ही या आजाराची कारणे होती.
आम्हा दोघांना आणखी सुटी घेणे शक्य नव्हते. आम्ही त्यांच्यासाठी नोकर किंवा नर्सची शोधले पण मिळाले नाही, म्हणून आम्ही घरी काम करणाऱ्या मोलकरणीला दिवसातून २-३ फेऱ्या मारून त्यांना दूध, चहा, नाश्ता वगैरे देण्यास सांगितले आणि ऑफिसला जाऊ लागलो. पण हो, आम्ही दिवसातून अनेक वेळा काकूंशी फोनवर बोलायचो. त्यांची चौकशी करीत असू. काही अडचण तर नाही ना? विचारत राहिलो.
राकेश बद्दल माहित नाही, पण माझा त्रास जरा वाढला होता. जे घर आत्तापर्यंत फक्त आमचं होतं ते अचानक माझ्या सासरच्या घरासारखं वाटू लागलं. आता उठणे, बसणे आणि कपडे घालणे यात काही बंधने जाणवू लागली. आंटी याविषयी कधीच काही बोलल्या नसल्या तरी घरात त्यांची उपस्थिती माझ्यासाठी पुरेशी होती.
पण मी हे सर्व पूर्ण उत्साहाने करत होते, कारण काकू अपेक्षेपेक्षा लवकर बऱ्या होत होत्या. अवघ्या एका आठवड्यानंतर त्यांना मोलकरणीची गरज उरली नाही. त्या स्वतः उठून त्यांची छोटी-मोठी कामे करू लागल्या. त्या लवकरच बऱ्या होऊन मथुरेला परततील याचा मला आनंद झाला. आणखी काही दिवसांची तर गोष्ट होती.
एक दिवस राकेश म्हणाला कि ‘आता आपण काकूंना परत जाऊ द्यायचं नाही. त्या आता आपल्या सोबतच राहणार आहेत. आता या वयात त्यांना एकटे राहणे कठीण होणार आहे. पुन्हा आजारी पडल्या तर? मग त्यांच्याप्रती आपलेही काही कर्तव्य आहे. त्यांनी आमच्यासाठी खूप काही केले आहे. ‘ राकेश काही चुकीचं बोलले नव्हते पण माझं मन अस्वस्थ झालं.
मला आठवतं, जेव्हा राकेशचं स्थळ माझ्यासाठी आलं तेव्हा माझ्या आई-वडिलांनी माझं मत विचारलं. राकेश कसा दिसतो? किती शिक्षित आहेत? ते किती कमावतात? मला हे सर्व जाणून घेण्याची गरज वाटली नाही कारण मला वाटले की माझ्या आई-वडिलांनी आणि काकांनी हे स्थळ पाहिले आहे तर सर्व काही ठीकच असणार. ते माझ्यासाठी चांगलेच अ तील. मला त्यांच्या कुटुंबाबद्दल जाणून घ्यायचे होते. विचारले असता माझे सासरी मुलाला आई वडील नसल्याचे कळले. एकच मोठी बहीण आहे, तिचेही लग्न झाले आहे. एवढेच जाणून घेणे माझ्यासाठी पुरेसे होते कारण माझ्या मनात सासूची प्रतिमा अशी होती की सून नेहमीच दबावाखाली असते. काही महिन्यांपूर्वीच लग्न झालेल्या माझी मैत्रिण जया हिच्याशी मी जेव्हा कधी बोलायचे तेव्हा ती तिच्या नवऱ्यापेक्षा तिच्या सासूबद्दलच जास्त बोलायची. ती नेहमी काळजीतच असायची.
शिवाय, माझी बहीण जेव्हा कधी तिच्या माहेरी आई-वडिलांच्या घरी यायची तेव्हा ती बरेच दिवस परत जातच नाही. आई नेहमी तीला समजावून परत पाठवायची. तिच्या पती किंवा दिराविषयी नव्हे तर सासूंविषयी अनेक तक्रारी होत्या.
पण राकेशची काकू आता आमच्या घरीच राहणार होती. सासू-सासऱ्यांचे एकवेळ ठीक आहे, पण काकूचे बोलणे, टोमणे, टोमणे कुणी व का ऐकावे? असा विचार करणं खूप चुकीचं असलं तरी हा स्वार्थी विचार होता, आणि त्याचा मला खूप त्रास होऊ लागला होता.
एके दिवशी संध्याकाळी मी ऑफिस वरून घरी पोहोचले तेव्हा मी पाहिले की काकूने वाशींगमशीन लावली होती आणि घरातील सर्व मळालेले कपडे जमा करून धुतले होते. मी फक्त रविवारी मशीन वापरते आणि आठवड्याभराचे कपडे धुते. नुकतेच काकूंच्या आजारपणामुळे हे काम राहिले होते. इतके कपडे एकदम धुतलेले पाहून मला आश्चर्य वाटले, “हे काय काकू, तुम्ही एवढं काम का केले? आता तुम्ही आराम करा. ”
“सीमा, मी दिवसभर आरामच तर करते, मग आजकाल मशीनमध्ये कपडे धुणे हे काय काम आहे का? ” असे बोलून काकू हसल्या.
आता जेवणाच्या वेळी गप्पांचा ओघ सुरू झाला. काकू राकेशच्या लहानपणीच्या सवयी आणि खोडकरपणाविषयी सांगायच्या. माझ्या सासरच्या घराबाबतही त्यांनी मला अशा अनेक गोष्टी सांगितल्या, ज्या मला सांगायला कुणीच नव्हतं. मलाही राकेशचा चिडचिडा स्वभाव आणि आवडी-निवडी माहीत होतं होत्या. आता मला त्यांना चिडवायला आणि छेडायला खूपच मजा येत होती. अशा स्थितीत काकूंनीही हसत हसत मला पूर्ण साथ दिली.
— क्रमशः भाग पहिला
मूळ हिंदी कथालेखक : अनामिक
मराठी अनुवाद – मेघःशाम सोनवणे
मो 9325927222
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
” तुमचा सगळा प्रोग्रॅम आधी पाठवा. ते वाचून मग ठरवतो. ” असा एक उद्धट फोन महिन्याभरापूर्वी आला. सहसा असले फोन आले की, मी किंवा पूर्वा उत्तरं देण्याच्या भानगडीत पडत नाही. ओळख पाळख नसणारा माणूस ‘मीच भारी’ अशा स्वरात अन् तोऱ्यात बोलायला लागला की, आम्ही पुढं काही बोलत नाही. त्यामुळं, आम्ही प्रतिसाद दिला नाही.
दोन दिवसांनी पुन्हा तोच फोन..
” तुम्ही पाठवला नाहीत प्रोग्रॅम.. मी पाठवा असं म्हटलं होतं तुम्हाला. ” समोरुन अरेरावी..
” पण मी ‘पाठवतो’ असं म्हटलं नव्हतं तुम्हाला. ” मी शांतपणे म्हटलं.
” तुम्ही पाठवा. ”
” आम्ही प्रोग्रॅम जाहीर करत नाही. तो आदल्या दिवशीच सांगितला जातो आणि केवळ नोंदणी केलेल्यांनाच. ”
” असं का बरं? ”
” गेली एकोणीस वर्षं आमची हीच पद्धत आहे. आम्ही प्रवासाचे डिटेल्स जाहीर करत नाही.”
” असं असेल तर मला माझ्या मुलाला पाठवण्यात इंटरेस्ट नाही. ” समोरुन जोरात आवाज.
” ठीक” मी म्हटलं अन् फोन ठेवून दिला.
तीन चार दिवस उलटून गेले. पुन्हा एकदा तोच फोन..
” मला माहिती पाठवा.. “
मी फोन ठेवून दिला. पुढचे काही दिवस वेगवेगळ्या फोन नंबर्स वरुन तो माणूस फोन करत राहिला. मी आमच्या नियमानुसार अनुभूती चा प्रोग्रॅम दिला नाही.
एके दिवशी माझ्या एका मित्राचा मला फोन आला.
” अनुभूतीच्या जागा भरल्या का रे? ”
” नाही अजून. का रे? ”
” अरे, एकजण तुला फोन करतायत. तू त्यांना कुठले कुठले गड किल्ले आहेत, याची माहिती दिली नाहीस, अशी त्यांची तक्रार आहे. तू त्यांना माहिती दे ना. ”
” अनुभूतीचे काही नियम आहेत रे. आम्ही प्रोग्रॅम आदल्या दिवशीच सांगतो. आणि तोही पूर्ण सांगत नाही. उद्या कुठं जायचं आहे तेवढंच सांगतो. संपूर्ण प्रोग्रॅम जाहीर केला जात नाही. ” मी सांगितलं.
” पण असं का? ”
” अनुभूती चा अर्थ काय? अनुभूती म्हणजे आपलं आयुष्य अधिक समृद्ध करणारा विलक्षण अनुभव. तोच तर या कार्यक्रमाचा प्राण आहे. आपण सगळी ठिकाणं सांगून टाकली की, लोक गूगल सर्च करतात, युट्यूब वर शोधून पाहतात. सगळी उत्सुकता, अप्रूप, आनंद घालवून टाकतात. मग त्या कार्यक्रमाचा उद्देशच साध्य होत नाही. “
” अरे, पण त्यातले अनेक किल्ले त्यांनी आधीच पाहिले असतील तर? मग त्यांना तेच तेच पाहावं लागणार नाही का? ”
” हे बघ. मी आठ वर्षांचा असताना पहिल्यांदा रायगडावर गेलो. आज ३२ वर्षं झाली, मी जवळपास चारशे हून जास्त वेळा तिथं जातोय. पण अजूनही असं वाटतं की, प्रत्येक वेळी तो गड मला वेगवेगळा दिसतो. ”
” पण तुला आवड आहे म्हणून तू सारखा सारखा तिथं जातोस. लोकांना तशी आवड नसेल आणि फक्त दहा दिवस काहीतरी ॲक्टिव्हिटी म्हणून पाठवायची इच्छा असेल तर? ”
“अनुभूती त्यांच्यासाठी नाहीच मुळी. कारण हा इतिहास, समाज, संस्कृती, परंपरा, ज्ञान, आपला वारसा यांच्याशी मुलांना नातं जोडायला शिकवणारा कार्यक्रम आहे. तो टाईमपास प्रोग्रॅम नाही. म्हणूनच असा विद्यार्थी आणि असे पालक आम्ही आमच्या गटात घेतच नाही. माझ्याहीपेक्षा जास्त पॉश कॅम्प्स आयोजित करणारे कितीतरी तज्ञ लोक आहेत. त्यांनी अगदी अवश्य तिकडं नाव नोंदवावं. पण माजुरडे पालक आणि विद्यार्थी आम्हाला नकोत. ”
” पण त्यांना त्यांच्या मुलाला तुझ्याच प्रोग्रॅमला पाठवायचं आहे. तुझा प्रोग्रॅम वेगळा असतो अन् मुलांना खूप शिकायला मिळतं, असं त्यांना अनेकांनी सांगितलं म्हणूनच त्यांना इंटरेस्ट आहे. ”
” मग त्यांनी आमचे नियम पाळायला हवेत. तेही कोणतीही तक्रार न करता. तू त्यांना हे स्पष्ट सांग आणि या विषयात अजिबात मध्यस्थी करु नकोस. ” असं सांगून मी विषय थांबवला.
काही वर्षांपूर्वी अनुभूती च्या प्रवासातच एका पालकांचा मला फोन आला होता. त्यांची मुलगी आमच्या सोबत होती. आणि “दहा दिवसांत एकदाही फोन करायचा नाही” अशीच अट सगळ्या पालकांना घातली होती. आम्ही कोल्हापुरात होतो. मला फोन आला.
” सर, तुम्ही कोल्हापुरात आहात ना… तिथल्या *** नावाच्या हॉटेलात बेस्ट नॉनव्हेज मिळतं. ”
“पण आपण अनुभूती मध्ये जेवण पूर्णतः शाकाहारीच असतं. हे आधीच स्पष्ट सांगितलेलं आहे. “
” सर, माझा एक जवळचा मित्र कोल्हापुरातच राहतो. तो तिला घ्यायला येईल आणि नॉनव्हेज जेवण करवून पुन्हा आणून सोडेल. तुम्ही सगळे तुमचं तुमचं व्हेज जेवण करा. ” मुलीचे वडील म्हणाले.
” तसं जमणार नाही. ” मी.
” आता कोल्हापूर मध्ये जाऊन नॉनव्हेज खायचं नाही, असं कसं चालेल? ”
” तुम्ही नॉनव्हेज खाऊ घालण्यासाठी तिला खास कोल्हापूर ला घेऊन जा. आत्ता मी इथून तिला कुणाहीसोबत सोडणार नाही आणि पुन्हा अशा गोष्टींसाठी मला फोन करु नका. ” ठणकावून सांगितल्यावर पुन्हा असा फोन आला नाही.
असाच आणखी एक प्रसंग. आम्ही सिंहगड – तोरणा असा ट्रेक करुन खाली उतरलो आणि विश्रांतीसाठी थांबलो. भल्या पहाटे माझा एक मित्र तिथं कार मधून पोर्टेबल शेगडी आणि आप्प्यांचं पीठ घेऊन आला. तीन शेगड्या होत्या. आणि आम्ही सगळे जण सेल्फ कुकिंग पद्धतीनं आपापले आप्पे करुन घेऊन मनसोक्त ताव मारत होतो. पण आमच्यात एक मुलगी होती.
“मला आप्पे नकोत. आमच्याकडे सारखेच केले जातात. तुम्ही खा, मी खात नाही. ” आम्ही सगळ्यांनी दोन तीन वेळा आग्रह करुन पाहिला, नंतर विषय सोडून दिला.
नाश्ता करुन आम्ही राजगड कडे रवाना झालो आणि माझ्या विशेष आवडीची गुंजवणे मावळाची वाट धरली. ती वाट खरोखरच घाम फोडणारी आहे. शारीरिक क्षमतेची परीक्षा पाहणारी आहे. शेवटचा टप्पा आणखीनच आव्हानात्मक आहे. कारण तो दरवाजाच तशा कठीण ठिकाणी आहे. झालं.. हट्टानं
रिकाम्या पोटी बसलेल्या बाईसाहेब गुंजवण्याच्या जंगलातच फतकल मारुन खाली बसल्या. अंगातलं बळ संपलं होतं. पोटात भूक उसळ्या मारत होती. डोकं लागलं दुखायला. निम्मे जण वाट काढत वरती वरती सरकत होते. ते सगळे होते तिथं थांबले. ग्लुकोन डी आणि लिंबाचं सरबत पाजत पाजत तिला हळूहळू वरती आणलं. गुंजवणे दरवाज्याच्या उंबऱ्याशी बसूनच ती जेवली अन् मग अर्ध्या तासाच्या विश्रांतीनंतर तिच्या अंगात त्राण आलं.
पण ह्या अर्धवट ज्ञानी हट्टी उद्योगामुळे अडीच तीन तासांचं खोबरं झालं. संजीवनी माची सोडून द्यावी लागली..! स्वतःचंच म्हणणं खरं करण्याची सवय अनेक मुलामुलींना असते आणि आयुष्यात अनेक ठिकाणी महागात पडते ती अशी…
फुटाणे, शेंगदाणे खाण्याची सवय आता “जुनाट” ह्या प्रकारात समाविष्ट झाली आहे. पेरीपेरी, फ्रेंच फ्राईज हे प्रकार आता रुढ झाले आहेत. मुलं पेरुची जेली खातील, पण पेरु खाणार नाहीत. जामुन शॉट घेतील, पण जांभळं खाणार नाहीत. मसाला पापड खातील, पण भाताचे सांडगे किंवा कोंड्याच्या पापड्या खाणार नाहीत. त्यांना लाह्यांचा काला माहितीच नसतो.
भल्या पहाटे गडावर चढून जावं. सकाळच्या उन्हात गड फिरावा. न्याहारी करण्यासाठी लाह्या, राजगिरा किंवा पोहे सोबत घ्यावेत. तिखट मिठाच्या डब्या असाव्यात. एका डबीत शेंगदाण्याचा कूट घ्यावा. बचकभर हिरव्या मिरच्या, आल्याचे तुकडे असावेत. गड फिरुन झाल्यावर एखाद्या देवडीशी किंवा गडावरच्या देवळात बसावं. धोपटी उघडून सगळं साहित्य बाहेर काढावं. आजूबाजूला फिरुन दोन दगड शोधावेत. टाक्याच्या पाण्यानं स्वच्छ धुवून पुसून घ्यावेत. दगडावर दोन तीन मिरच्या अन् बोटभर आलं चांगलं ठेचून घ्यावं. लाह्यांवर पाण्याचा सपका मारावा. मग त्यात कूट, मिरच्या, आलं, तिखट, मीठ घालून एकत्र करुन घ्यावं. गडावरच्या गडकरणी भगिनींकडून सुगडातलं घट्ट कवडीचं दही घ्यावं. अन् दह्यात सगळं कालवून ताक घालून झकास काला तयार करावा. पोटभर खावा. वरुन पुन्हा दही, ताक रिचवून तृप्त मनानं ढेकर द्यावी. तिथंच पथारी पसरून दोन तास ताणून द्यावी. ह्यातलं सुख आपल्या मुलांना ठाऊकच नाही.
गडावर जाऊन तिथं फ्रूटीसारखी बाटलीबंद कोल्ड्रिंक्स पिऊन लोकांना नेमकं काय मिळतं हे मला आजतागायत समजलेलं नाही. लोक तिथंही पिझ्झा बर्गर मिळेल का हे शोधतात. आईस्क्रीम शोधतात. पण लिंबाचं सरबत त्यांना महाग वाटतं. वास्तविक पाहता, गडभ्रमंती करणाऱ्याच्या सोबत दोन चार लिंबं, दोन चार कांदे बटाटे असायलाच हवेत. थंडगार शिळ्या भाताचा डबा सोबत असला तरीही उत्तम. म्हणजे गडावरुन दही ताक मिळवून दहीभात ताकभात करुन खाता येतो. हे सगळं आपल्या मुलांनी आवर्जून अनुभवायला हवं. मनगटी घड्याळाशी असलेला संबंध जरा कमी करुन सूर्याच्या घड्याळानुसार जगायला हवं. म्हणजे मग नव्या जगाची ओळख व्हायला लागते. आणि हेच जग अत्यंत श्रीमंत, समृद्ध, निकोप आणि सर्वतोपरी उत्कृष्ट असल्याची अनुभूती येते.
आपल्या पूर्वजांची ज्ञानसमृद्धता किती उच्च दर्जाची होती, याचा परिचय आताच्या पिढीला होणं आवश्यक आहे. पुरातन लेण्या, मंदिरांवरची शिल्पकला, कोरीवकाम, योग्य दगडाची निवड, बांधकामाचा भक्कमपणा, पुष्करण्या, बारवा, पाण्याची टाकी, जिवंत झऱ्यांचा शोध ही केवळ भटकंती नव्हे. ही आपल्या पूर्वजांच्या अफाट बुद्धिमत्तेची आणि कर्तृत्वाची जिवंत साक्ष आहे. ते वैभवच आपलं भूषण आहे. दऱ्याडोंगरांत, निबीड अरण्यात वसलेली देवस्थानं पाहणं, त्यांचा अभ्यास करणं आणि तिथली शांत प्रसन्नता अनुभवणं ह्यात जो आनंद आहे तो “मॉलोमॉल” भटकण्यात अन् प्ले स्टेशन खेळण्यात नाही, हे आपल्या मुलांना योग्य वयातच शिकवायला हवं. त्यांच्या करिअरमधला राष्ट्रीय प्रवेश परीक्षांचा स्कोअर जितका महत्वाचा आहे, तितकाच त्यांचा व्यक्तिमत्व विकाससुद्धा महत्वाचा आहे. त्यांची नाळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेशी घट्ट जोडली जाणं हे फार फार गरजेचं आहे. तरच हा वारसा जपणारे हात अन् त्याविषयीच्या संवेदना जागृत ठेवणारी मनं तयार होतील.
बलोपासना, मनोपासना, ज्ञानोपासना आणि राष्ट्रोपासना या चारही उपासना आपल्या मुलांनी नित्यनेमाने केल्या तर त्यासारखा व्यक्तिमत्व विकासाचा दुसरा उत्तम मार्ग नाही. ही उपासनेची चतु:सुत्री जितकी घट्ट रुजेल तितके आपल्या मुलांच्या व्यक्तिमत्वाचे वटवृक्ष तयार होतील आणि गगनाला भिडतील. उत्तमतेचं अन् चारित्र्याचं अधिष्ठान ज्याच्या आयुष्यात असतं, त्याचं भवितव्य उज्ज्वलच असतं.
ह्याच विचारानं “अनुभूती” ची सुरुवात आम्ही १९ वर्षांपूर्वी केली. यंदा सुद्धा दहा दिवसांची ही विलक्षण प्रेरणा देणारी आणि नवं आयुष्य जगायला शिकवणारी “अनुभूती” ८ मे ते १९ मे, २०२५ या कालावधीत आहे. दहा किल्ले आहेत, तीन जंगल ट्रेक आहेत, विविध पुरातन मंदिरं आहेत, समुद्रावर मनसोक्त खेळणं आहे, ऐन रत्नागिरीत आमराईतला अस्सल हापूस आंब्याचा आस्वाद घेण्याचा अनुभव आहे आणि अर्थातच रात्रीच्या अंधारात गड चढून जाण्याचा थरारक अनुभव तर आहेच…!
☆ ‘महाकुंभ धार्मिक ते इव्हेंटचा ताळमेळ…‘ – लेखिका : सुश्री स्वाती महाजन जोशी ☆ प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले☆
☆
महाकुंभची चर्चा गेली तीन चार महिने सुरू होती. मुळात जास्त गर्दीत जाण्याची अजिबात आवड नसलेली मी प्रयागराजला जाण्याचा विचारही केला नव्हता. लांबून बघू. वेगवेगळ्या वाहिन्यावरून आनंद लुटण्याचे ठरविले होते. फार धार्मिक नसल्याने तेही पुरेसे होते. पण पण पण खर सांगायचे तर माझ्यातला पूर्वीचा पत्रकार जागा झाला. एवढे लोक का जातात, आणि नक्की काय वातावरण असते हे बघण्याची उत्सुकता निर्माण झाली. आणि एका ग्रुपवर कल्पनाने विचारले महाकुंभला जायला कोणी तयार आहे का? लगेच होकार कळवला. बघता बघता दहाजणी तयार झाल्या. पण काही कारणाने फक्त चारजणी निघालो. आम्ही जात असलेल्या तारखा या आमच्या पथ्यावर होत्या.
आम्ही ज्या दिवशी पोहोचणार होतो, त्याच दिवशी महाकुंभत पंतप्रधान मोदी येणार होते. काय परिस्थिती असेल याची काहीच कल्पना नव्हती. आम्ही सेक्टर १० मध्ये संस्कार भारतीच्या तंबूत होतो. तिथे अजिबात गर्दी नव्हती. त्या भागातील गंगा मैय्याचा किनारा मोकळा होता. आम्ही मनसोक्त गंगामैय्येत डुंबलो. अरे काहीच गर्दी नाही, उगाचच लोक घाबरवत होते, असे वाटून गेले. दुपारी बाहेर पडलो. नदीच्या दोन किनाऱ्यावर महाकुंभचे शहर पसरलेले आहे.
आमच्या भागात विविध संस्थांचे मंडप होते. नेत्र कुंभ, अमृतानंदमयी, रावेतसरकार असे विविध प्रवचनकार, सेवाभावी संस्था तसेच विविध राज्यांचे मंडप होते. मुख्यतः सांस्कृतिक आणि इव्हेंट असे या भागात होते. तर सर्व आखाडे दुसऱ्या किनाऱ्यावर होते. हे सर्व बघत प्रयाग शहरात आलो, तेव्हा गर्दीचा अंदाज आला. तरीही वाहनांना प्रवेश देण्याइतके रस्ते रिकामे होते. आम्ही चौघीही खूष होतो. आपले त्रिवेणी संगमावरचे स्नान सहज होईल. पण गंगा मैय्याच्या मनात जे असते तेच होते, अशी श्रद्धा प्रयागच्या नागरिकांमध्ये असते. त्याचे प्रत्यंतर आम्हाला आले. ६ फेब्रुवारीला प्रयागमध्ये लोकांचा समुद्र बघायला मिळाला. पण स्नान करायचेच या जिद्दीने आम्ही चालत राहिलो. किती चाललो माहित नाही. असेल १२-१४ किलोमीटर. मग खूप प्रतीक्षेनंतर स्नान झाले. संगमात उतरल्यावर मन शांतावले. सर्व क्षीण नाहीसा झाला. मन काही क्षणापुरते निर्विकार झाले. मग परतीचा प्रवास तेवढ्याच चालण्याने झाला. महाकुंभात सर्वजण समतल पातळीवर आल्याची जाणीव सुखावून जात होती. गाडीघोडा, पैसा काही उपयोगाचा नाही हे येथील गर्दी सांगून जात होती.
सुव्यवस्थेचा -स्वच्छतेचा कुंभ
या सर्व प्रवासात आम्हाला जाणवले ते खरंच शब्दांत मांडणे अवघड आहे. दिड महिन्याच्या काळात ४५ कोटी लोक येणार त्यांना सर्व प्रकारच्या सुविधा पुरवणे म्हणजे शिवधनुष्य पेलण्याइतके अवघड होते. पण प्रयागराजला गेल्यावर तिथल्या यंत्रणेने हे शिवधनुष्य लीलया पेलले आहे हे लक्षात आले. गंगा मैय्याच्या पूरक्षेत्रात पूर्ण शहर सर्व सुविधांसह उभारण्यात आले आहे. गंगा मैय्या सप्टेंबर पर्यंत तिथे मुक्काम ठोकून होती. ती आपल्या जागेवर परतल्यावर कामे सुरू झाली, असे स्थानिक सांगत होते. म्हणजे फक्त साडेतीन महिन्यांत अगदी वीजपुरवठ्यासाठीची यंत्रणा, मलनिःसारणाची सोय, पाणीपुरवठ्याच्या वाहिन्या सर्व उभारण्यात आल्या. प्रत्येक संस्थेला जागा ठरवून देण्यात आल्या. त्यावर मंडप, तंबू टाकण्याची आणि शौचालये उभारण्याची जबाबदारी संस्थांवर होती. पूरक्षेत्र असल्यामुळे सगळीकडे वाळूच वाळू. त्यावर सर्व रचना उभारली आहे. शौचालयाची प्लास्टिकची भांडी त्यात रोवण्यात आली आहेत. सर्व मैला एकत्र करण्यासाठी मोठ्या टाक्या जमिनीच्या खाली बसवल्या आहेत. दर दोन दिवसांनी त्या साफ करायला राज्य सरकारची मलनिःसारणाची गाडी येते. रस्त्यावर जागोजाग तात्पुरती शौचालये आहेत. पण ना त्यातून घाण बाहेर येते ना पाणी ना दुर्गंधी. साफ करणाऱ्यासाठी नेमलेले सेवक तत्परतेने काम करत होते. रस्त्यावर अगदी क्वचित कचरा दिसत होता.
श्रद्धेचा-मानवतेचा कुंभ
महाकुंभात येणाऱ्या भाविकांना खूप संस्था सेवा देत आहेत. प्रसाद म्हणून चहा, पाण्याच्या बाटल्या, नाश्ता वाटप सुरू आहे. इस्कॅानने तर लाखो लोकांना जेवण देण्याची सोय केली होती. महाप्रसादाच्या लाईनीमध्ये खूप तरूण मुलं-मुली उभी दिसली. ही मुले कोण हा प्रश्न मनात येतच होता तेवढ्यात रिक्षाचालकाने सांगितले की हे सर्व प्रयागमध्ये बाहेरून शिकायला आलेले विद्यार्थी आहेत. बहुतेकांचे पालक शेतकरी किंवा शेतमजूर आहेत. गेल्या महिन्यापासून त्यांचा दोन वेळच्या जेवणाचे पैसे वाचले आहेत. अगदी सहजतेने मिळालेल्या माहितीने मनात येऊन गेले अरे हा श्रद्धेबरोबरच मानवतेचा कुंभ आहे. सर्वांच्या हातात स्टीलच्या एकसारख्या थाळ्या होत्या. जेवण झाले की प्रत्येक जण त्या धुवून पुढच्या भाविकाच्या हातात देतात, हेही रिक्षाचालकाने सांगितले.
गंगा मैय्याचे प्रेम
महाकुंभ नसताना किती श्रद्धाळू येतात, असे रिक्षाचालकाला विचारले. गंगा मैय्येच्या कृपेने पोटापुरता धंदा होतो. पावसाळ्यात मात्र गंगा मैय्या उग्र रूप धारण करते. ती माझ्या घराच्या पायरीपर्यत येते. कधी तीन कधी चार-पाच दिवस राहते आणि मग निघून जाते, हे रिक्षाचालक सांगत असतानाच मला कुसुमाग्रजांच्या मोडला नाही कणा या कवितेची आठवण झाली. गंगा मैय्येवर येथील लोकांच्या अपार श्रद्धा आहे.
.. तशीच भक्ती लड्डू गोपालवर आहे. आपण रोज जे जे करतो तसाच दिनक्रम ते लड्डू गोपालचा पाळतात. कुठेही जाताना गोपाल बरोबर असतोच. त्याला एकट्या घरी कसे ठेवायचे ही त्यामागची भावना. कुंभातही अनेकांच्या लड्डू गोपालची बास्केट होती. माझ्या परीघातील कोणीच एवढे श्रद्धावान नाही, त्यामुळे मी हे पाहून अचंबित झाले.
एकदंर हा महाकुंभ जितका साधू-संतांचा-भाविकांचा आहे. तितकाच तो स्वच्छता कर्मचारी आणि पोलिस यंत्रणेचाही आहे. माणसाच्या समुद्राला नम्रतेने शिस्तीत बांधण्याचा प्रयत्न करणाऱ्या या यंत्रणेला खरंच सलाम करावासा वाटला. माताजी- बहेनजी- भैय्याजी- स्वामीजी म्हणत वर्दळ सुरळीत ठेवण्याचा त्यांचा आटोकाट प्रयत्न खरंच सुखावून जात होता.
आम्ही चारचौघीच होतो. फक्त महिला म्हणून कुठेच कसलाच त्रास झाला नाही. अगदी लखनौवरून रात्री २ वा. प्रवास सुरू करायलाही आम्हाला भीती वाटली नाही. हा महाकुंभचा परिणाम की तेथील राज्य सरकारबाबत असलेला विश्वास सांगता येत नाही पण चार दिवसात कधीच कसलीच भीती वाटली नाही हे मात्र खरं.
– – – अतिगर्दीचे, वाहतूक कोंडींचे व्हिडिओ येत आहेत, ते खोटे आहेत असे म्हणणे चुकीचे ठरेल. पण यंत्रणेच्या मर्यादा लक्षात घेतल्या तर परिस्थिती पुढे तेही शरणागत आहे. महाकुंभाचा धडा म्हणजे गंगा मैय्येच्या मनात असेल तर स्नान घडले. तिला शरण जा ती तुम्हाला आशिर्वाद देईलच.
☆
लेखिका : सुश्री स्वाती महाजन जोशी
प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
‘मी होळीत काय आणि का जाळलं? ‘ याविषयी तुकोबाराय सांगतात,
दैन्य दुःख आम्हां न येती जवळीं । दहन हे होळी होती दोष ॥
लोकं होळीत शेणाच्या गवऱ्या, लाकडं जळतात. पण तुकोबा म्हणतात..
” मी होळीत माझ्यातले ‘दोष’ जाळले. आणि दोष जाळण्याचा परिणाम असा झाला, की दारिद्र्य आणि दुःख माझ्या जवळसुद्धा येत नाही. ”
दोष नाही, तर दारिद्र्य नाही. त्यामुळं दारिद्र्यातून निर्माण होणारं दुःख नाही…
सर्व सुखें येतीं मानें लोटांगणी । कोण यासी आणी दृष्टिपुढें ॥
.. “दु:ख तर जवळ येतंच नाही, उलट सुखं माझ्यापुढं लोटांगण घालतात आणि आम्हाला येऊ द्या म्हणतात. पण मी त्यांना माझ्या डोळ्यासमोरही उभं करत नाही. ”
…. सगळं जग सुखाच्या मागं लागलेलं असताना, तुकोबाराय सुखाला हाकलून लावतात. कारण, त्यांना सुखाची हाव नाही, आणि दोष जाळल्यामुळं दुःख तर आधीच दूर पळून गेलेलं आहे…
आमुची आवडी संतसमागम | आणीक तें नाम विठोबाचें ॥
.. मला सुखाची अपेक्षा का नाही? तर, “संतांचा सहवास आणि विठोबाचं नाव, एवढ्याचीच मला आवड आहे. ”
आमचें मागणें मागों त्याची सेवा | मोक्षाची निर्देवा कुणा चाड? ॥
“मला मागायचंचअसेल, तर मी सुख नाही मागणार. फक्त ‘संतांचा सहवास आणि विठोबाचं नाव’ एवढंच मागेन. याच्यापुढं तर मला मोक्षसुद्धा नको. या सुखापुढं मोक्षाची आवड कुण्या दुर्दैवी माणसाला राहील? ”
तुका म्हणे पोटीं सांठविला देव | न्यून तो भाव कोण आम्हां? ॥
“मी माझ्या पोटातच विठ्ठलाला साठवून ठेवलं आहे. वैकुंठ देणारा विठ्ठलच माझ्यात साठवून घेतल्यामुळं, मला आता कशाची कमतरता? ”
…. सगळं भरून पावल्यासारखंच आहे. म्हणून मला मोक्ष नको. अर्थात मोक्षानंतर मिळणारं वैकुंठही नको.
धन्य ते तुकाराम महाराज आणि धन्य ती संतांची मांदियाळी
आपल्यातीलही सर्व दोष जळावेत म्हणून मनापासून शुभेच्छा
☆
प्रस्तुती – सुश्री नीलांबरी शिर्के
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ देवाचे लक्ष आहे बरं का… – लेखक – अनामिक☆ प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर ☆
एके दिवशी सकाळी दारावरची बेल वाजली. मी दरवाजा उघडला तेव्हा पाहिले कि, एक आकर्षक बांद्याची व्यक्ती सस्मित समोर उभी होती. मी म्हटले, बोला! काय काम आहे?
ते म्हणाले, ठीक आहे भाऊ, तुम्ही रोज माझ्यासमोर प्रार्थना करत होता म्हणून म्हटले आज भेटूनच घेऊ.
मी म्हटले, “माफ करा मी तुम्हाला ओळखले नाही. “
तेव्हा ते म्हणाले, “बंधू! मी भगवान आहे. तू रोज प्रार्थना करत होतास, म्हणून मी आज पूर्ण दिवस तुझ्या बरोबर राहणार आहे. “
मी चिडत म्हटलं, “ही काय मस्करी आहे? ” “ओह ही मस्करी नाही सत्य आहे. फक्त तूच मला पाहू शकतोस. तुझ्या शिवाय मला कुणीही पाहू किंवा ऐकू शकणार नाही!
काही बोलणार इतक्यात मागून आई आली…
एकटा काय उभा आहेस, इथं काय करतोस? चल आत, चहा तयार आहे आत येऊन चहा पी. आई ला काही तो दिसला नाही.
आईच्या या बोलण्या मुळे आता या आगंतुकच्या बोलण्यावर थोडा विश्वास होऊ लागला. माझ्या मनात थोडी भीती होती. चहाचा पहिला घोट घेतल्या बरोबर मी रागाने ओरडलो.
अग आई, चहा मध्ये इतकी साखर रोज रोज का घालतेस? एवढे बोलल्या नंतर मनात विचार आला कि, जर आगंतुक खरोखर भगवान असेल तर त्याला आई वर रागावलेलं आवडणार नाही. मी मनाला शांत केले आणि समजावले कि, अरे बाबा, आज तू नजरेत आहेस. थोडे लक्ष दे…
मी जिथे असेल त्या प्रत्येक ठिकाणी ते माझ्या पुढ्यात आले… थोड्या वेळाने मी आंघोळीसाठी निघालो, तर ते सुद्धा, माझ्या पुढे…..
मी म्हटले ” प्रभू, इथे तरी एकट्याला जाऊदे. “
आंघोळ करून, तयार होऊन मी देव पूजेला बसलो. पहिल्यांदा मी परमेश्वराची मना पासून प्रार्थना केली. कारण आज मला, माझा प्रामाणिक पणा सिद्ध करायचा होता.
ऑफिसला जाण्यास निघालो. प्रवासात एक फोन आला. फोन उचलणार, इतक्यात आठवले, आज माझ्यावर प्रभू ची नजर आहे, गाडी बाजूला थांबवली. फोन वर बोललो आणि बोलत असताना, म्हणणार होतो की, या कामाचे पैसे लागतील, पण का कोण जाणे, तसे न बोलता म्हटले तू ये! तुझे काम होईल आज”….
ऑफिस मध्ये पोचल्यावर मी माझे काम करत राहिलो. स्टाफ वर रागावलो नाही किंवा कुठल्याही कर्मचाऱ्यां बरोबर वादविवाद केला नाही. रोज माझ्या कडून विना कारण अपशब्द बोलले जायचे. पण त्यादिवशी तसे काहीं न बोलता, काही हरकत नाही, ठीक आहे, होऊन जाईल काम, असे म्हणत सहज पणे सर्व कामे केली.
आयुष्यातील हा पहिला दिवस होता. ज्या दिवशी माझया दिनचर्येत राग, लोभ, अभिमान, दृष्टता, अपशब्द, अप्रमाणिकपणा, खोटेपणा कुठे ही नव्हता.
संध्याकाळी ऑफिस मधून निघून घरी जायला निघालो. कार मध्ये बसलो आणि बाजूला बसलेल्या प्रभूंना म्हणालो, ” भगवान, सीटबेल्ट बांधा. तुम्ही पण नियमांचे पालन करा. ” प्रभू हसले. माझ्या आणि त्यांच्या चेऱ्यावर समाधान होते.
घरी पोचलो. रात्रीच्या भोजनाची तयारी झाली. मी जेवायला बसलो. प्रभू! प्रथम तुम्ही घास घ्या. मी असे बोलून गेलो. त्यांनीही हसून घास घेतला.
जेवण झाल्यानंतर आई म्हणाली, ” आज पहिल्यांदा तू जेवणाला नावे न ठेवता, काही दोष न काढता जेवलास! काय झाले? आज सूर्य पश्चिमेला उगवला की काय?
मी म्हटले, “आई, आज माझ्या मनात सूर्योदय झाला आहे. रोज मी फक्त अन्नच खात होतो. आज प्रसाद घेतला. माता आणि प्रसादात कधी काही उणीव नसते! “
थोडा वेळ शतपावली केल्यानंतर, मी माझ्या खोलीत गेलो आणि निश्चिन्त व शांत मनाने उशीवर डोके टेकवले… झोपी जाण्यासाठी… प्रभू नि माझ्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला, म्हणाले, ” आज तुला झोप येण्यासाठी, संगीत, किंवा औषध किंवा पुस्तकाची गरज भासणार नाही. ” खरोखर, मला गाढ झोप लागली.
ज्या दिवशी आपणास कळेल की, ‘तो’ पहात आहे, आपल्या हातून सर्व काही चांगले घडेल!
देवाचे लक्ष आहे बरं का….
लेखक : अनामिक
प्रस्तुती – श्री अनिल वामरकर
अमरावती
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “फिनिक्सच्या राखेतून उठला मोर” (कथासंग्रह) – लेखक : श्री जयंत पवार ☆ परिचय – श्री प्रसाद साळुंखे ☆
पुस्तक : फिनिक्सच्या राखेतून उठला मोर (कथासंग्रह)
लेखक – श्री जयंत पवार
प्रकाशन – लोकवाङ्मय गृह
मागे एक एकांकिका लिहित होतो. चाळीत घडणारी कथा होती. आणि त्याला गिरणी संपाचा चुटपुटता स्पर्श होता. तेव्हा वाचन वाढव असा सल्ला देणाऱ्या मित्रांमध्ये ‘ फिनिक्सच्या राखेतून उठला मोर ‘ या जयंत पवारांच्या कथासंग्रहाचं नाव वारंवार येत होतं. मी मात्र आपलं घोडं दामटवून अधाशासारखी एकांकिका खरडली. मित्राला पहिला खर्डा दाखवणार तोपर्यंत त्याचा अपघातात दुर्दैवी अंत झाला, मग इतर कोणाला द्यायची नाही असं ठरवलं.
हे सगळ पटपट उफाळून यायचं कारण म्हणजे त्या दिवशी किताबखानाला हा कथासंग्रह पाहिला. डोक्यात हे सारं घोळत असताना आपसूकच हात या कथासंग्रहाकडे गेले आणि मी तो पदरी पाडून घेतला. जयंत पवार हे नाव नाट्यरसिकांच्या परिचयाचं. पण कथासंग्रह वाचल्यावर आपल्याला कथाकार म्हणूनही ते तितकेच भावतात. म्हणजे नाट्यसंहिताच थोडी उणी अधिक वाक्य टाकून कथेचं लेबल लावून पेश केलीय असे नाही. कथा रचनेचा समर्थ वापर जयंत पवार यांनी केलेला आढळतो. कथाकार म्हणून त्यांची कथाकथनाची शैली अफलातून आहे.
पुस्तकाची पहिली आवृत्ती जुलै २०१० ला प्रकाशित झाली. या कथासंग्रहात २००२ पासून २००९ पर्यंतच्या जयंत पवारांच्या वेगवेगळ्या अंकात प्रसिद्ध झालेल्या सात कथा आहेत. यातूनच समजते की कथालेखन अभ्यासूपणे आणि गांभीर्याने केलेलं आहे. केवळ दिवाळी अंकांच्या आग्रहाखातर केलेलं हे लिखाण नाही. तसंही असं लिखाण आतून स्फुरावं लागतं. अनुभवाची सरमिसळ त्यात असते, वाचनाचा व्यासंग असतो, मग त्यावर कोणाचाही आग्रह चालत नाही अगदी स्वतःचाही. तर अशा फार गडबडीने न लिहिता संवेदना वेचत, आयुष्याच्या अनुभवांच्या, कल्पनांच्या हलक्या धगीवर निवांत मुरू देत बनलेल्या ताज्या कसदार कथा आहेत.
‘टेंगशेंच्या स्वप्नातील ट्रेन’ या पहिल्या कथेपासून हा प्रवास सुरू होतो. या कथेत जगण्यातलं बोटचेपं धोरण, व्यवस्थेच्या दडपणात अंकुरलेला आणि फैलावलेला मध्यमवर्गी षंढपणा आपल्याला दिसतो. ज्यावर कथा, ललित काही लिहिलं किंवा आजच्या भाषेत फेसबुकवर किंवा अन्य सामाजिक प्रसार माध्यमावर माफक हळहळलो म्हणजे “मी त्यांचा भाग नाहीए हं” हा भंपकपणा अधोरेखित होतो.
नंतर आपण ‘साशे भात्तर रुपयांचा सवाल अर्थात युद्ध आमचे सुरू! ‘ कथा वाचतो. ज्यात एका हिशोबाच्या गैरसमजामुळे दोन समाज एकमेकांना हिशोबात ठेवण्याचं प्रयत्न करतात, पण त्याच्या या कुरघोडीत कोणाचा फायनल हिसाब होतो हे वाचणं रंजक वाटतं.
नंतर ‘ फिनिक्सच्या राखेतून उठला मोर ‘ ही कथा आपण वाचतो ही कथा गिरणी संपावर बेतली आहे. ज्यात गिरणी कामगारांच्या कुटुंबावर भाष्य आहे. फिनिक्स मॉलचा झगमगाट यांच्या आयुष्यातला अंधार घालवू शकणार आहे का? तिथला एसी भूतकाळातील जखमांवर थंडावा देईल का? तो चकचकीतपणा स्वप्नांवरची वास्तववादी धूळ फुंकेल का? अशा कोंदटवाण्या प्रश्नांवर आपल्याला विचार करायला ही कथा भाग पाडते. भूतकाळ आणि वर्तमानकाळ अशी कथा सफाईने फिरत राहतो त्यामुळे पात्रपरिचय, पात्राचे निरनिराळे पैलू आपल्याला पाहता येतात.
‘जन्म एक व्याधी’ नावाची एक कथा आहे. ज्यात कथेचा निवेदक घरातले छोटे मोठे कलह काही त्याच्या डोळ्यासमोर घडलेले तर काही घरातल्यांकडून ऐकलेले सांगत राहतो. हे सांगणं फार नाट्यपूर्ण आहे. एखादा सुधारणाप्रिय माणूस आपल्या चुकांवर मात करून सुधारु शकतो का? का त्याची भूतकाळाची लेबलं लोक आपल्या सोईसाठी वापरतात, असे बरेच विचार ही कथा वाचताना येतात.
मग पुढची गोष्ट म्हणजे ‘ चंदूच्या लग्नाची गोष्ट अर्थात सड्डम में टढ्ढुम ‘ ही माझी या कथा संग्रहातील सगळ्यात आवडती कथा. ही कथा खुसखुशीत आहे. कथानायक (? ) चंदू जवळपास मन जिंकून घेतो आहे. त्याच्या वात्रटपणाकडे आपण सुरुवातीला डोळेझाक करतो. पण कथा जसजशी पुढे सरकत जाते तसतसं आपलं मतपरिवर्तन होतं. आपण जवळपास चंदू होऊन जातो. एवढे गुंतून जातो की कपाळावरच्या आठ्या चंदूला ‘अरे नको करू’ असं बजावत राहतात. या कथेवर कोणी चित्रपट काढला तर धमाल होईल, म्हणजे कलाकारांची उत्तम भट्टी जमली तर फर्स्ट हाफ तरी अफलातून होईल.
नंतर सुरू होतो ‘एका रोमहर्षक लढ्याचा गाळीव इतिहास’ थेट पुन्हा गिरणी संपाची पाश्र्वभूमी. बाहेर गिरणी संपाचा लढा तर चाळीत चाळीतल्या संडासावर ताबा मिळवण्याच्या कुरघोड्या अशा दोन घटना आपण समांतर पाहतो. संपाच्या लढ्याचा वेदनादायी निकाल बहुतेकांना माहितीच आहे पण या चाळीतल्या दुसऱ्या तुंबळ युद्धाचं नेमकं काय होतं यासाठी ही कथा वाचावी लागेल.
सातवी म्हणजे अगदी शेवटची कथा म्हणजे
‘छटाकभर रात्र आणि तुकडा तुकडा चंद्र ‘ आयुष्याच्या छटाकभर रात्री ज्यांनी बारमध्ये घालवल्या त्यांना तुकड्या तुकड्यात दिसलेल्या एका चंद्राविषयी हे लिहिलं आहे. तीन कवी आणि एका गूढ कथा लेखकाच्या आसपास ही कथा फिरते. एकच गोष्ट त्यांना निरनिराळी दिसते, सत्याचा शोध घेत घेत अंतिम सत्य उरते ते म्हणजे मृत्यू. या कथेत नेमका निवेदक कोण याचा गल्लत होते आणि तळटीप वाचून तर गुंता अधिकच वाढतो. ही कथा वाचून मी प्रस्तावनेकडे वळलो काही तिरबागडं लिहिलं जाऊ नये म्हणून.
निखिलेश चित्रे यांची प्रस्तावना अत्यंत अभ्यासूपणे लिहिली आहे. आणि खरोखर वाचतांना किंवा वाचल्यानंतरही आपल्याला उमगलेल्या अर्थाचा पडताळा करण्यासाठी ही विस्तृत आणि मुद्देसूद प्रस्तावना कथेतल्या वास्तवाच्या भावनिक दाहावर फिरणारं हळुवार मोरपीस ठरतं.
सात कथांचे सात सूर वेगवेगळ्या संवेदनांना हात घालतात. पण सूरांना घट्ट पकडून ठेवलेल्या या कथा एका भन्नाट मैफलीचा आपल्याला आनंद देतात. या राखेतून उठलेल्या मोरपिसाऱ्यात आयुष्याच्या वेगवेगळ्या छटा दिसतात, ज्यामुळे कधी विचारांचं काळोखं मळभ दाटतं, तर कधी आतल्या पडझडीत काहीतरी संततधार चिंब कोसळत राहतं.
परिचय : श्री प्रसाद साळुंखे
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9664027127
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
(वरिष्ठतम साहित्यकार आदरणीय डॉ कुन्दन सिंह परिहार जी का साहित्य विशेषकर व्यंग्य एवं लघुकथाएं ई-अभिव्यक्ति के माध्यम से काफी पढ़ी एवं सराही जाती रही हैं। हम प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – “परिहार जी का साहित्यिक संसार” शीर्षक के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाते रहते हैं। डॉ कुंदन सिंह परिहार जी की रचनाओं के पात्र हमें हमारे आसपास ही दिख जाते हैं। कुछ पात्र तो अक्सर हमारे आसपास या गली मोहल्ले में ही नज़र आ जाते हैं। उन पात्रों की वाक्पटुता और उनके हावभाव को डॉ परिहार जी उन्हीं की बोलचाल की भाषा का प्रयोग करते हुए अपना साहित्यिक संसार रच डालते हैं।आज प्रस्तुत है आपका एक सार्थक एवं सटीक व्यंग्य – ‘दुख की होली‘। इस अतिसुन्दर रचना के लिए डॉ परिहार जी की लेखनी को सादर नमन।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – परिहार जी का साहित्यिक संसार # 280 ☆
☆ व्यंग्य ☆ दुख की होली ☆
खन्ना परिवार की होली दुख की होली हो गयी है। भ्रम में न पड़ें, उनके यहां कोई ग़मी नहीं हुई है। बात यह है कि उनके यहां काम करने वाली सभी बाइयां छुट्टी लेकर गांव चली गई हैं। उनके घर में तीन बाइयां खाना बनाने से लेकर झाड़ू-पोंछा तक का काम करती हैं। उनमें से दो के परिवार में कोई मृत्यु हो गई थी, इसलिए वे दुख की होली मनाने गांव चली गयी हैं। उनके हफ्ते भर से पहले लौटने की उम्मीद नहीं है। बाकी एक है, लेकिन उसने भी तीन दिन की छुट्टी ली है। खन्ना परिवार के लिए मुश्किल वक्त है।
मिसेज़ खन्ना बहुत सफाई-पसन्द हैं। बाई सफाई करती है तो वे सिर पर खड़ी रहती हैं। उंगली चला चला कर धूल की पर्त बताती हैं। बाई को चैन से बैठने नहीं देतीं। इसीलिए बाइयों की छुट्टी उनके लिए मुसीबत का सबब बनती है।
घर का काम मिसेज़ खन्ना के लिए मुसीबत है। उनका वज़न ज़्यादा है, रक्तचाप की दवा लेनी पड़ती है। घुटनों में भी पीड़ा रहती है। चलना मुश्किल होता है। किचिन में ज़्यादा देर खड़ी नहीं रह सकतीं। इसीलिए बाइयों के चले जाने पर घर में दिन भर चिड़चिड़ होती है, पति और बच्चों पर गुस्सा निकलता है।
बाइयों की अनुपस्थिति के पहले दिन मिसेज़ खन्ना ने रो-झींक कर दोपहर का खाना बना दिया। लेकिन उसके बाद वे, निढाल, पलंग पर लेट गयीं। पति से बोलीं, ‘मैं शाम का खाना नहीं बनाऊंगी। आई एम टोटली एक्ज़्हास्टेड। घुटने इतना ‘पेन’ कर रहे हैं। शाम का खाना होटल से बुलवा लेना। इट इज़ बियोंड मी।’
बच्चों ने सुना तो खुश हो गये ।बाहर से खाना आना है तो पिज़्ज़ा-बर्गर, नूडल्स आना चाहिए। बाहर से आना है तो फिर घर जैसा खाना क्यों? पिता के सामने फरमाइश पेश होने लगी।
अब मिस्टर खन्ना बैठे हिसाब लगा रहे हैं। पिज़्ज़ा-बर्गर आएगा तो एक दिन का बिल ही दो ढाई हज़ार पर पहुंचेगा। अभी तो पांच छः दिन काटना है। तब तक कितने का चूना लगेगा?
अब मिसेज़ खन्ना के साथ-साथ मिस्टर खन्ना की होली भी दुख की होली हो गयी है।
(ई-अभिव्यक्ति में मॉरीशस के सुप्रसिद्ध वरिष्ठ साहित्यकार श्री रामदेव धुरंधर जी का हार्दिक स्वागत। आपकी रचनाओं में गिरमिटया बन कर गए भारतीय श्रमिकों की बदलती पीढ़ी और उनकी पीड़ा का जीवंत चित्रण होता हैं। आपकी कुछ चर्चित रचनाएँ – उपन्यास – चेहरों का आदमी, छोटी मछली बड़ी मछली, पूछो इस माटी से, बनते बिगड़ते रिश्ते, पथरीला सोना। कहानी संग्रह – विष-मंथन, जन्म की एक भूल, व्यंग्य संग्रह – कलजुगी धरम, चेहरों के झमेले, पापी स्वर्ग, बंदे आगे भी देख, लघुकथा संग्रह – चेहरे मेरे तुम्हारे, यात्रा साथ-साथ, एक धरती एक आकाश, आते-जाते लोग। आपको हिंदी सेवा के लिए सातवें विश्व हिंदी सम्मेलन सूरीनाम (2003) में सम्मानित किया गया। इसके अलावा आपको विश्व भाषा हिंदी सम्मान (विश्व हिंदी सचिवालय, 2013), साहित्य शिरोमणि सम्मान (मॉरिशस भारत अंतरराष्ट्रीय संगोष्ठी 2015), हिंदी विदेश प्रसार सम्मान (उ.प. हिंदी संस्थान लखनऊ, 2015), श्रीलाल शुक्ल इफको साहित्य सम्मान (जनवरी 2017) सहित कई सम्मान व पुरस्कार मिले हैं। हम श्री रामदेव जी के चुनिन्दा साहित्य को ई अभिव्यक्ति के प्रबुद्ध पाठकों से समय समय पर साझा करने का प्रयास करेंगे।
आज प्रस्तुत है आपकी एक विचारणीय एवं हृदयस्पर्शी लघुकथा “– अनबोलते जानवर–” ।)
~ मॉरिशस से ~
☆ कथा कहानी ☆ — अनबोलते जानवर —☆ श्री रामदेव धुरंधर ☆
बछिया गौशाला के एक किनारे में बंधी होती थी। दूसरे किनारे में वह गाय बंधी हुई थी जो वर्षों से दूध देती आयी। यह बछिया उसी से पैदा हुई थी। गाय दूध से खाली हो गयी और उसे कसाई के हाथों बेच दिया गया। तत्काल बछिया को उस किनारे से खोल कर गाय की खूँट से बांध दिया गया। बछिया ने खूँट के इस अंतर से जाना वह दूध देगी और फिर उसका हश्र उसकी माँ जैसा होगा।
(“साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच “ के लेखक श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही गंभीर लेखन। शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है। साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।श्री संजय जी के ही शब्दों में ” ‘संजय उवाच’ विभिन्न विषयों पर चिंतनात्मक (दार्शनिक शब्द बहुत ऊँचा हो जाएगा) टिप्पणियाँ हैं। ईश्वर की अनुकम्पा से आपको पाठकों का आशातीत प्रतिसाद मिला है।”
हम प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाते रहेंगे। आज प्रस्तुत है इस शृंखला की अगली कड़ी। ऐसे ही साप्ताहिक स्तंभों के माध्यम से हम आप तक उत्कृष्ट साहित्य पहुंचाने का प्रयास करते रहेंगे।)
☆ संजय उवाच # 280 ☆ मिलें होली, खेलें होली…
क्यों बाहर रंग तलाशता मनुष्य/
अपने भीतर देखो रंगों का इंद्रधनुष..,
जिसकी अपने भीतर का इंद्रधनुष देखने की दृष्टि विकसित हो ली, बाहर की दुनिया में उसके लिए नित मनती है होली। रासरचैया उन आँखों में हर क्षण रचाते हैं रास, उन आँखों का स्थायी भाव बन जाता है फाग।
फाग, गले लगने और लगाने का रास्ता दिखाता है पर उस पर चल नहीं पाते। जानते हो क्यों? अहंकार की बढ़ी हुई तोंद अपनत्व को गले नहीं लगने देती। वस्तुत: दर्प, मद, राग, मत्सर, कटुता का दहन कर उसकी धूलि में नेह का नवांकुरण है होली।
नेह की सरिता जब धाराप्रवाह बहती है तो धारा न रहकर राधा हो जाती है। शाश्वत प्रेम की शाश्वत प्रतीक हैं राधारानी। उनकी आँखों में, हृदय में, रोम-रोम में प्रेम है, श्वास-श्वास में राधारमण हैं।
सुनते हैं कि एक बार राधारमण गंभीर रूप से बीमार पड़े। सारे वैद्य हार गए। तब भगवान ने स्वयं अपना उपचार बताते हुए कहा कि उनकी कोई परमभक्त गोपी अपने चरणों को धो कर यदि वह जल उन्हें पिला दे तो वह ठीक हो सकते हैं। परमभक्त सिद्ध न हो पाने भय, श्रीकृष्ण को चरणामृत देने का संकोच जैसे अनेक कारणों से कोई गोपी सामने नहीं आई। राधारानी को ज्यों ही यह बात पता लगी, बिना एक क्षण विचार किए उन्होंने अपने चरण धो कर प्रयुक्त जल भगवान के प्राशन के लिए भेज दिया।
वस्तुत: प्रेम का अंकुरण भीतर से होना चाहिए। शब्दों को वर्णों का समुच्चय समझने वाले असंख्य आए, आए सो असंख्य गए। तथापि जिन्होंने शब्दों का मोल, अनमोल समझा, शब्दों को बाँचा भर नहीं बल्कि भरपूर जिया, प्रेम उन्हीं के भीतर पुष्पित, पल्लवित, गुंफित हुआ। शब्दों का अपना मायाजाल होता है किंतु इस माया में रमनेवाला मालामाल होता है। इस जाल से सच्ची माया करोगे, शब्दों के अर्थ को जियोगे तो सीस देने का भाव उत्पन्न होगा। जिसमें सीस देने का भाव उत्पन्न हुआ, ब्रह्मरस प्रेम का उसे ही आसीस मिला।
प्रेम ना बाड़ी ऊपजै / प्रेम न हाट बिकाय/
राजा, परजा जेहि रुचै / सीस देइ ले जाय…
बंजर देकर उपजाऊ पाने का सबसे बड़ा पर्व है धूलिवंदन। शीश देने की तैयारी हो तो आओ सब चलें, सब लें प्रेम का आशीष..!
इंद्रधनुष का सुलझा गणित / रंगी-बिरंगी छटाएँ अंतर्निहित / अंतस में पहले सद्भाव जगाएँ /नित-प्रति तब होली मनाएँ।….
अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार ☆ सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय, एस.एन.डी.टी. महिला विश्वविद्यालय, न्यू आर्ट्स, कॉमर्स एंड साइंस कॉलेज (स्वायत्त) अहमदनगर ☆ संपादक– हम लोग ☆ पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆ ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆
श्री शिव महापुराण का पारायण सम्पन्न हुआ। अगले कुछ समय पटल पर छुट्टी रहेगी। जिन साधकों का पारायण पूरा नहीं हो सका है, उन्हें छुट्टी की अवधि में इसे पूरा करने का प्रयास करना चाहिए।
अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं।
≈ संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈