मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “ती सध्या काय करते?” ☆ श्री आशिष मुळे ☆

श्री आशिष मुळे

? कवितेचा उत्सव ?

☆ “ती सध्या काय करते?” ☆ श्री आशिष मुळे ☆

ऐक पोरा बोल अनुभवाचे

ऐकायला काहीच खर्च नाही

‘ ती सध्या काय करते ‘

याला काही अर्थ नाही 

*

चिडू नकोस रडू नकोस

त्याचे तिला काहीच नाही

परी हृदयावर हसऱ्या

तिची तलवार…. चालत नाही

*

खरंच होते का नव्हते

याने शिलकीत भर नाही

काय होते किती होते

हिशोबात या…. ‘अर्थ‘ नाही

*

तिच्यासाठी झुरण्यापेक्षा

मर्द बनण्यात नुकसान नाही

असेल गरज तर येईलही

नाही आली तरी….. हरकत नाही

*

हो अभेद्य उत्तुंग इतका

चोर वाटांची गरज नाही

उधळू दे अश्व आत्मज्ञानाचा

अश्वमेधाला…. मुहूर्त नाही

© श्री आशिष मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ समंजसतेने… ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆

श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

? कवितेचा उत्सव ?

☆ समंजसतेने… ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆

किती जागवाव्या रात्री

 टक्क पापण्यांनी….

 किती होरपळावे या

 चंद्र चांदण्यांनी…

*

किती ग्रीष्म शिशिरांना

 सोसावे निमूट…

 किती समंजसतेने

 वागायचे नीट…

*

किती कश्या कश्याचे रे

 पेलायचे भार…

 शांततेने वादळे नी

 सहायचे पूर…

*

किती वाहू द्यावे पाणी 

 ओंजळीमधून…

 किती जगायचे, दार

 मनाचे झाकून…

© श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

संपर्क : ओंकार अपार्टमेंट, डी बिल्डिंग, शनिवार पेठ, आशा  टाकिज जवळ, मिरज

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग २३ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग २३ ☆ श्री अरविंद लिमये

(पूर्वसूत्र – “आणखी एक. मनात आले ते बोललो नाही तर मलाच चैन पडणार नाही म्हणून सांगतो. तुम्ही काल एवढा त्रास सहन करून दत्तदर्शनासाठी वाडीला गेलात तेव्हाच तुमच्या मनातल्या भावना महाराजांपर्यंत पोचल्या आहेत. आणि त्याच महत्त्वाच्या. त्यामुळे आता परत जाऊन दिवसभर काम करून पुन्हा पौर्णिमेच्या दर्शनासाठी आज दुपारच्या बसने नृ. वाडीला यायची धडपड कराल म्हणून मुद्दाम हे सांगतोय. दगदग नका करू. “

 सासरे सांगत होते. मी आज्ञाधारकपणे मान हलवली. निरोप घेऊन पाठ वळवली. पण मन स्वस्थ नव्हतं. नकळत का होईना पण आपल्याकडून घडलेल्या चुकीमुळेच आपला संकल्प सिद्धीस जाण्यात अडथळा निर्माण झाल्याची खंत मनात घर करून राहिली होती. हातातून काहीतरी अलगद निसटून जात असल्याच्या भावनेने मन उदास झाले होते. तीच उदासी सोबत घेऊन माझा परतीचा प्रवास सुरू झाला होता!!)

एरवी सगळ्यांशीच मोजकं बोलणारे माझे सासरे आज भावनेच्या भरात कां होईना अंत:प्रेरणेने जे बोलले ते माझ्या काळजीपोटीच होते. पण त्यातही त्यांच्याही नकळत एक सूचक संदेश दत्तगुरुंनी माझ्यासाठी पेरुन ठेवला असल्याची जाणिव या परतीच्या प्रवासात माझ्या अस्वस्थ मनाला अचानक स्पर्श करुन गेली आणि मी दचकून भानावर आलो. एरवी नंतर मला कदाचित कामांच्या घाईगर्दीत जे जाणवलंही नसतं तेच ही जाणिव नेमकं मला हळूच सुचवून गेली होती!मी अक्षरश: अंतर्बाह्य शहारलो. ‘आज पौर्णिमा आहे. मी मनात आणलं तर आज पुन्हा दुपारच्या बसने नेहमीसारखं निघून नृ. वाडीला जाणं मला अशक्य नाहीय. सासऱ्यांनी जे मी करीन हे गृहित धरलं होतं त्याचा तोवर मी विचारही केला नव्हता. पण आता मात्र मी काय करु शकतो, करायला हवं याची नेमकी दिशा मला मिळाली आणि मनातल्या मनात त्याचं 

नियोजनही सुरू झालं!अर्थात ते जमेल न जमेल हे माझ्या स्वाधीन नव्हतं. जमायचं नसेल तर कांहीही होऊ शकतं. बस चुकणं, ती मिळाली तरी बंद पडणं, वाटेत अपघात होणं किंवा आज बॅंकेत पोचताच अचानक आॅडिट सुरु होणं, ए. जी. एम् अचानक ब्रॅंच व्हिजिटसाठी येणं असं कांहीही. यातल्या कोणत्याच गोष्टी माझ्या हातातल्या नव्हत्या आणि त्यापैकी कांही घडलंच तर त्याला माझा इलाजही नव्हता. अखेरच्या क्षणापर्यंत प्रयत्न करणं एवढंच मी करू शकत होतो आणि ते मी करायचं असं ठरवून टाकलं!!

त्यामुळे अर्थातच प्रवास संपताना मनातली अस्वस्थताही कमी झाली होती. ब्रॅंचला गेल्यानंतर मात्र असंख्य व्यवधानं तिथं माझीच वाटच पहात होती. त्यामुळे कामाचं चक्र लगेच सुरु झालं न् पुढे बराच वेळ श्वास घ्यायलाही फुरसत मिळाली नाही. रांजणेंच्याजवळ मनातला विचार बोलून ठेवायचंही भान नव्हतं. गर्दीचा भर ओसरला तेव्हा सहज माझं लक्ष भिंतीवरच्या घड्याळाकडे गेलं. दुपारचे दोन वाजून गेले होते. मी रांजणेना नेमक्या परिस्थितीची कल्पना दिली. सहज शक्य झालं तर आज सव्वातीनच्या बसने परत नृ. वाडीला जाऊन यायची इच्छा असल्याचंही त्यांना सांगितलं.

“अजून तुमचं जेवणही झालेलं नाहीय. मेस बंद होण्यापूर्वी तुम्ही लगेच जाऊन जेवून या. तोवर मी आधी कॅश टॅली करून ठेवतो. म्हणजे कॅश चेक करून तुम्हाला निघता येईल. बाकीची माझी कामं तुम्ही गेल्यानंतर मी केली तरी चालू शकेल. ” रांजणेंनी मला आश्वस्त केलं. त्याक्षणानंतर सगळं मार्गी लावून मी स्टॅंण्ड गाठलं. बसमधे मनासारखी जागा मिळाली. मान मागे टेकवून मी शांतपणे डोळे मिटले. आदल्या दिवशी याच बसमधे मी असाच बसलो होतो तेव्हा पुढे काय घडणाराय याबाबतीत मी पूर्णतः अनभिज्ञ होतो. त्यानंतरच्या सगळ्याच घटना माझ्या नजरेसमोरुन सरकत जात असताना मला त्या स्वप्नवतच वाटत राहिल्या.

नृ. वाडीला पोचलो तेव्हा मनातली उत्कट इच्छा फलद्रूप झाल्याचं समाधान मन उल्हसित करीत होतं!दत्तदर्शन घेताना आत्यंतिक आनंदभावनेने मन भरून येत असतानाच माझी मिटली नजर ओलावली होती!

दर्शन झाल्यानंतर हीच कृतार्थ भावना मनात घेऊन मी पायऱ्या चढून वर आलो आणि मला वास्तवाचं भान आलं. रात्रीचे दहा वाजत आले होते. इथेच मुक्काम केला तर पहाटे वेळेत सांगलीला पोचून सहाची बस मिळवणं शक्य होणार नव्हतं. त्यासाठी मुक्कामाला सांगलीला जाणं आवश्यक होतं.

सांगली स्टॅंडला बस येताच मी घाईघाईने बसमधून उतरलो. पावलं नकळत सासुरवाडीच्या घराच्या दिशेने चालू लागताच मी थबकलो. तिथे जाणं मला योग्य वाटेना. काल सासऱ्यांनी पोटतिडकीने मला जे करु नका असं सांगितलं होतं नेमकं तेच मी केलेलं होतं. ‘आता त्यांच्याकडे जायचं तर हे लक्षात येऊन त्यांचं मन दुखावलं जाऊ शकतं. तसं होऊन चालणार नाही’ असा विचार मनात आला. मी परत फिरलो. खिशातल्या पैशांचा अंदाज घेतला. केवळ दोनतीन तास पाठ टेकण्यासाठी लाॅजवर जाणं ही त्याक्षणी गरज नव्हे तर चैन ठरणार होती हे लक्षात आलं आणि पुन्हा स्टॅण्डवर आलो. ती पूर्ण रात्र सांगली स्टँडवर बसून काढली!

स्टॅंडच्या बसून रात्र जागून काढताना सलगच्या धावपळीच्या प्रवासानंतरचा अपरिहार्य असा थकवा होताच पण त्याचा त्रास मात्र जाणवत नव्हता. कारण मनातलं पौर्णिमा अंतरली नसल्याचं समाधान त्यावर फुंकर घालत होतं! त्याच मन:स्थितीत मी कधीकाळी ऐकलेले बाबांचे शब्द मला स्वच्छ आठवले.

‘दत्तसेवा अनेकांना खूप खडतर वाटते. त्यामुळेच ‘मी’ करतो असं म्हणून ती प्रत्येकालाच जमत नाही. निश्चय केला तरी त्या निश्चयापासून परावृत्त करणारे प्रसंग सतत समोर येत रहातात. तेच आपल्या कसोटीचे क्षण!जे त्या कसोटीला खरे उतरतील तेच तरतात…!’

त्या रात्री बाबांच्या या शब्दांचा नेमका अर्थ मला माझ्या त्या दिवशीच्या अनुभवाच्या पार्श्वभूमीवर खऱ्या अर्थाने समजला होता!!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ शून्याच्या आत… – भाग 2 – डॉ हंसा दीप ☆ भावानुवाद – सुश्री साधना प्रफुल्ल सराफ ☆

सुश्री साधना प्रफुल्ल सराफ

? जीवनरंग ?

शून्याच्या आत… – भाग 2 – डॉ हंसा दीप ☆ भावानुवाद – सुश्री साधना प्रफुल्ल सराफ 

डॉ हंसा दीप

(आता मात्र तेच भाऊ बहिण आपापल्या मुला-बाळात, आपल्या परिवारात गुंतून गेले आहेत.) – इथून पुढे —

या सगळ्यात ती स्वतः कधी पंचावन्न वर्षांची झाली, ते तिचं तिलाही कळलं नाही. पंचावन्न वर्षांची ती पासष्ट वर्षांची दिसू लागली आहे. तरुण होती तेंव्हा चांगली-चांगली स्थळं येत असत तिच्यासाठी. मुलगे डेटसाठी बोलवत असत. पण त्या दिवसात जबाबदाऱ्यांची मोठीच्या मोठी यादी असायची तिच्याकडे. तिच्या जगात आई-वडील, बहिण-भाऊ यांच्या शिवाय आणखी कोणासाठी जागाच नव्हती. आता आई-वडील राहिले नाहीत, भाऊ-बहिण आपापल्या आयुष्यात मग्न झाले. खरं तर आतासुद्धा ती त्यांच्या छोट्या छोट्या समस्या आपणच सोडवल्या पाहिजेत असं मानून त्यासाठी एवढा लांबचा प्रवास करून त्यांच्याकडे जात असते. त्यांना पाहिजे असो, की नसो त्यांना शारीरिक मानसिक आणि आर्थिकही मदत करत असते. या बहिणींकडून नेहमी मिळणाऱ्या मदतीमुळे हे भाऊ-बहिण प्रत्येक छोट्या गोष्टीतही तिचा सल्ला मागत असत आणि त्यांची प्रत्येक समस्या ही स्वतःच सोडवत असे. ‘नेकी और पूछ पूछ!’ भावा-बहिणीला फायदा कसा घ्यावा हे कळत होतं, ते तो घेत राहिले. हे सगळं करता करता कित्येक वर्षं उलटून गेली.

जगरहाटी पुढच्या दिशेने पळत राहिली आणि या पळापळीत ती अगदी एकटी पडली. स्वतःबद्दल विचार करायला वेळच नव्हता तिच्याकडे! आता तब्येतही बिघडायला लागली. ती आपल्या शहरातच, टोरंटोमधेच काम करत राहिली. हॉस्पिटलमधल्या अनेक विभागांशी ती जोडलेली होती. नोकरी चालू असताना अनेक लोकांशी संबंध यायचा तिचा, पण घरात तेवढीच एकटी असायची ती. फक्त ती आणि घराच्या भिंती! आता ती वयाच्या अशा वळणावर होती, की जिथे तिच्या मदतीसाठी कोणीतरी असण्याची गरज होती. पण कोण करणार तिला मदत? इतकी वर्षे तिने ज्यांना मदत केली, ते सगळे फार लांब राहत होते. ते असेही कधी तिच्याकडे आलेले नव्हते. तीच मदतीचा हात पुढे करून त्यांच्याकडे धावत जात असे. त्यांचा आता कधी फोनही येत नसे. तीच फोन करत असे, अशा आशेने, की तिचा एकटेपणा समजून घेऊन, केंव्हातरी तरी ते म्हणतील की—“ताई इथेच ये आता. ”

“आता ये ना इकडेच, ताई, तुझी खूप आठवण येते. ”

“आता तुला एवढ्या दूर राहून नोकरी करण्याची गरजच नाही. ”

पण असं कधीच झालं नाही. आणि कोणालाही तिने आपल्या मनात काय चाललंय याचा पत्ता लागू दिला नाही. हेही ती कधी बोलली नाही, की तिला आता कोणाच्या तरी मदतीची गरज आहे. मनातल्या मनात कुढत राहायची. त्यांच्याशी बोलण्यासाठी काही ना काही निमित्तं शोधात रहायची. पण, “कसे आहात?”, “काय चाललंय?” अशा संभाषणाच्या पलीकडे काही बोलणंच होत नसे. फोन ठेवल्यानंतर तासन्तास ती फोनकडेच एकटक बघत रहायची. जणू, फोननेच कसला तरी कट रचला होता, की तिला जे ऐकायचं आहे, ते तिला ऐकू येऊ नये, यासाठी.

दिवस जात राहिले, तब्येत आणखीच बिघडत गेली. मग तिने मोठी सुट्टी घेतली, पण कोणाला सांगितलं नाही, की ती एवढी आजारी आहे म्हणून. गुडघे, खांदे सतत दुखू लागले. मोठी सुट्टी संपली तरी तब्येत बरी होण्याची लक्षणं काही दिसेनात. आता तिला सिक लिव्ह घेऊन घरी रहाणं हे बेजबाबदारपणाचं वाटायला लागलं. आपण कामावर जात नसल्याने इतर लोकांना किती त्रास होत असेल हे तिला माहित होतं. जोवर ती सुट्टीवर होती, तोपर्यंत तिच्या जागेवर ते दुसऱ्या कोणाला घेऊ पण शकले नसते. बराच विचार करून शेवटी तिने कंपल्सरी रिटायरमेंट घेण्याचं निश्चित केलं, तेच या परिस्थितीत आपलं कर्तव्य आहे, असं तिला जाणवत होतं. त्यामुळे तिला चांगली पेन्शनही मिळाली असती, आणि त्याचबरोबर एक चांगलं पॅकेजही मिळणार होतं, जे तिच्या पुढच्या आयुष्यासाठी पुरेसं झालं असतं. या निर्णयाची अंमलबजावणी होण्यात कुठलीही अडचण आली नाही. सगळं काही सहजपणे झालं. तिचे आतले दरवाजे तर आधीच बंद झालेले होते, आता घराच्या बाहेरच्या जगातील सर्व लोकांचे दरवाजेही तिच्यासाठी बंद होत गेले. एकटेपणामुळे ती खुद्द स्वतःसाठीच अनोळखी होत गेली. ती कोण आहे आणि कुठे आहे, याचाही तिला पत्ता नसायचा. सर्वत्र मौनाचंच राज्य असायचं. बोलणार तरी कोण, आणि कोणाशी? टी. व्ही. कोकलत असायचा, पण ते ऐकायलाही तिला नकोच असायचं. मौनात रहाणं आता टाळता येणारच नव्हतं.

काही दिवसातच तिला आपलं जग शून्यवत झाल्यासारखं वाटू लागलं. फक्त ती आहे, आणि तिच्या आत एक रिकामं वर्तुळ आहे ज्यात शून्यं च शून्यं भरलेली आहेत. एकमेकांवर रेललेली, एकमेकांशी खेळणारी शून्यं!

काही वर्षांपूर्वी एका सहकाऱ्याने तिला सुचवलं होतं, की तिने एखादं मूल दत्तक घ्यावं. तेंव्हा ती आपल्या बहिण भावांचे संसार थाटून देण्यात इतकी बुडालेली होती, की असला काही विचार करण्याची फुरसतच नव्हती तिला. आता जेंव्हा तशी गरज भासते आहे, तेंव्हा लहान मूल सांभाळून मोठं करण्याचं वय राहिलेलं नाही. बराच विचार करून अखेर तिने एक मांजर पाळायचं ठरवलं. ती पांढऱ्या रंगावर काळे-भुरे चट्टे-पट्टे असलेली मांजर आता तिच्या जीवनाचा केंद्रबिंदू बनून गेली. आता ती त्या मांजरीच्याच विचारात बुडून गेलेली असायची. सकाळ-संध्याकाळ एकच विचार— “ती ठीक आहे ना”. हा मुका प्राणी तिच्या एकटेपणातला मित्र तर झाला होता, पण तिला मदतीची पण आवश्यकता होती. ती मांजर कशी काय तिला मदत करणार?

“मांजरीनं आज नीट खाल्लं नाही. ”

“ती रात्री नीट झोपली नाही. ”

“तिला आज डॉक्टरकडे घेऊन जायला पहिजे. ”

या सगळ्या काळज्या करण्यात तिचे दिवस जाऊ लागले. रात्री कधी कधी ती मांजरीच्या चाहुलीने जागी होत असे, मग तिला काहीतरी खायला देऊन, उगाचच थर्मामीटर लाऊन तिला ताप तर नाही ना, हे बघत असे. रात्री नीट झोप न झाल्यामुळे बऱ्याच वेळा दिवसा तिचा डोळा लागत असे आणि त्याच वेळी फोनची घंटी खणखणत असे. भाऊ किंवा बहिणीचा फोन असेल, या विचाराने गडबडीने फोन घेत असे, तर तो मेडिकल चेकअप साठी तरी असायचा, किंवा कुठल्या तरी वस्तूच्या जाहिरातीसाठी केलेला कॉल असायचा.

बहिण भावाची आपल्या बद्दलची बेफिकीर वागणूक तिला चांगली माहित होती. कधी कधी तिला वाटायचं, की आपण तेंव्हाच आपला विचार केला असता तर! हे असे विचार मनात आले, तरी असंही वाटायचं, की ते तर खुश आहेत, त्यांना कुठले त्रास नाहीत यातच आपणही खुश राहायला हवं. आपणच केलेल्या कर्माला आता कसं बदलता येईल असाही विचार यायचा तिच्या मनात. आता तिचे सर्व विचार त्या मांजरीभोवतीच केंद्रित झालेले होते. या एकटेपणात ती मांजरीशी बोलत असे. आपलं ऐकवायची, तिचं पण ऐकायची! दोघींची जेवणाची, झोपायची वेळ एकच होती. पण मांजर तर मांजरच होती. मधेच उठून कुठेतरी निघून जायची, ही लगेच अस्वस्थ होत असे. काही चुकीचं तर होत नाहीये ना, मांजर पण का बरं अशी मला सोडून जाते! असो, पण कोणीतरी घरात आहे हा विचारच तिला काहीतरी करण्यासाठी उत्साह देत असे.

– क्रमशः भाग दुसरा  

मूळ कथा : शून्य के भीतर – डॉ. हंसा दीप. कॅनडा

मराठी भावानुवाद  –  सुश्री साधना प्रफुल्ल सराफ

संपर्क – 1565, सदाशिव पेठ, ‘लक्ष्मी सदन’, पी. जोग क्लास लेन, पुणे, ४११०३०. मो. 7709014058.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ हे भगवंता…… सुश्री शिल्पा मैंदर्गी ☆ प्रस्तुती – सौ.अंजली दिलीप गोखले ☆

सुश्री शिल्पा मैंदर्गी

☆ मनमंजुषेतून ☆ हे भगवंता… सुश्री शिल्पा मैंदर्गी ☆ प्रस्तुती – सौ.अंजली दिलीप गोखले ☆

सौ.अंजली दिलीप गोखले 

(पूर्ण अंध असूनही अतिशय उत्साही. साहित्य लेखन तिच्या सांगण्यावरून लिखीत स्वरूपात सौ.अंजली गोखले यांनी ई-अभिव्यक्ती साठी सादर केले आहे.)

हे भगवंता मला तुझ्या मंदिराच्या दारासमोरचा धुरळा बनव

म्हणजे तुझ्या एका कृपा कटाक्षाने मी पवित्र होऊन जाईन. I

*

हे भगवंता मला तुझ्या मंदिराच्या पायाचा दगड बनव

म्हणजे तुझ्याकडे येणाऱ्या भक्तांच्या पदस्पर्शाने माझा अहंकार गळून पडेल. I

*

हे भगवंता मला तुझ्या मंदिराचा उंबरा बनव.

म्हणजे भक्ति मला ओलांडून आत प्रवेश करेल. I

*

भगवंता मला तुझ्या मंदिरातील घंटा बनव.

म्हणजे मंजूळ अशा घंटानादाने मला तुझी ओढ लागेल ।

*

हे भगवंता मला तुझ्या मंदिरातील समोर असलेले कासव बनव

म्हणजे भक्त जेव्हा त्यावर डोकं टेकतील 

तेव्हा त्यांच्यातील श्रध्देमुळे माझे मन निर्मळ बनेल ।

*

भगवंता मला तुझ्या गाभार्‍यातील समई बनव

म्हणजे मंद प्रकाशात सारा अंधकार उजळून निघेल ।

*

हे भगवंता मला तुझ्या पायातील छुम छुम वाजणारे पैंजण बनव

म्हणजे मी तुझ्या चरणांशी नेहमीच बांधलेली राहीन ।

*

हे भगवंता मला तुझ्या गळ्यातील तुळशीचा हार बनव

म्हणजे मला तुझ्या नित्य सहवासाचा परमानंद मिळेल |

*

हे भगवंता मला तुझ्या कानातील कुंडले बनव

म्हणजे भक्त जेव्हा तुझी स्तुती करतील ती मला जवळून ऐकता येईल. I

*

हे भगवंता मला तुझ्या ओठावरील बासरी बनव

म्हणजे तुझ्या हदयातून आलेले सूर मला स्पर्शून बाहेर पडतील. I

*

हे भगवंता मला तुझ्या मस्तकावरील किरीट बनव

म्हणजे मला सतत तुझ्या पदकमलांचे दर्शन होत राहील ।

*

हे भगवंता मला तुझ्या मदिरावरील कळसाचा ध्वज बनव.

म्हणजे मला शांती आणि प्रेमाचा संदेश जगाला देता येई ल ।

*

… आणि नाहीच काही यातलं तुला जमलं 

तर निदान तुझ्या मंदिराच्या दारात बाजूला असलेल्या

पारिजातकाच्या झाडावरून खाली पडलेलं

नाजूकसं केशरी दांड्याचे फूल बनव

… म्हणजे मला तुझ्या भक्तिचा सुगंध आसमंतात दरवळवता येईल.

(मला आवर्जून एक प्रश्न पडतो की… ‘ही इतकी भावपूर्ण आणि सुंदर प्रार्थना करणारी लेखिका/कवयित्री शिल्पा… हिला दृष्टिहीन कसे म्हणायचे ?‘ … तिच्या भावना…  तिचेच शब्द फक्त कागदावर उतरवणारी मी… – अंजली दिलीप गोखले.

© सुश्री शिल्पा मैंदर्गी

दूरभाष ०२३३ २२२५२७५

प्रस्तुती : सौ. अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “पद्मविभूषण शिवशाहीर श्री. बाबासाहेब पुरंदरे” ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

? इंद्रधनुष्य ?

☆ “पद्मविभूषण शिवशाहीर श्री बाबासाहेब पुरंदरे☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

जय भवानी •••जय शिवाजी••• म्हणताना उर जसा अभिमानाने भरून येतो ना, शिवाजीचे कर्तृत्व आठवून रक्तामध्ये एक अनोखी शक्ती निर्माण होऊन, एक जोष निर्माण होतो ना••••

तसाच •••किंबहुना त्याहुनही जास्त जोष, किमान सर्व पुरंदरे यांच्या अंगी येतो•••• तो म्हणजे शिवचरित्र, शिवाजी महाराज, घरोघरी पोहोचविणाऱ्या, पद्मविभूषण, शिवशाहीर, श्री बाबासाहेब पुरंदरे हे नाव उच्चारले की••• हे आदरणीय व्यक्तिमत्त्व समोर दिसले की, आत्ताच 98 व्या वर्षी काढलेले उद्गार आठवतात ••• त्यांच्या दीर्घायुष्याचे रहस्य सांगताना ते म्हणतात, मी माझ्या मनात एक आठ – नऊ वर्षाचे मूल जपलेआहे. त्यामुळे त्यांचे भाव हे मला चिरतरुण, दीर्घायू करायला मदत करत आहेत.

असेच छान छान उद्गार, छान छान विचार, आमच्या कानावर सतत पडत असल्याने, एक अभिमान वाटावा, असा आदर्श समोर आला••• अगदी ठरवलेले नसले तरी, त्यांची कृती, विचार, वागणे, बोलणे, रहाणे, हे सगळे नकळत मनावर बिंबवले गेले••• नव्हे मनात रुजले गेले आहे••• आणि हेच बीज अंकुरून आता कुठे तरी त्यांची पाऊलधूळ मला स्पर्श करण्याचे सामर्थ्य आले आहे असे वाटते.

विचारणारे विचारतात श्री बाबासाहेबांकडून तुला हा वारसा मिळाला आहे का? तर नक्कीच, अगदी अभिमानाने, ‘हो’ असे उत्तर येईल••• पण मुळात, पुरंदरे हा इतिहासच एवढा रोमांचक आहे की, त्यातून पुरंदरे नसणाऱ्यांना सुद्धा स्फूर्ती येईल•••

मी आता इतिहास म्हटले तो म्हणजे किती तरी पिढ्यानुपिढ्या आलेले रक्तातून रक्तात आलेले संस्कार हा पुरंदर इतिहास सुद्धा मला वाटतं बाबासाहेब यांच्यात संशोधनातून पुढे आला आहे पुरंदरे दप्तर यामध्ये असलेली रंजक माहिती ती पुन्हा नवीन पुरंदरे दप्तर यामध्ये बाबासाहेबांनी लिहिलेली आहे पण म्हणतात ना गेल्या दहा पिढ्या बद्दल जास्त नाही सांगता आले तरी आज श्री बाबासाहेब पासून आमची मुले किंवा त्यांची नातवंडे अशा पिढ्यांमध्ये श्री बाबासाहेबांचा आदर्श घेतला जातो आहे त्यांच्याकडे बघून आम्ही बाबासाहेबांचे पुरंदरे या नात्याने वंशज आहोत आणि त्यांच्या कर्तुत्वाचा बोलण्याचा आणि खाण्याचा प्रचंड प्रभाव पडल्यामुळे आज मी जे काही थोडेफार लिखाण करू शकते ते शक्य झाले.

माझे वडील, सासवडचे श्री नानासाहेब पुरंदरे, एक अनोखे साहित्यप्रेमी, साहित्य रसिक होते••• त्यांनी फार जास्त लिखाण केले नसले तरी, श्री बाबासाहेबांसह अनेक साहित्यिक आमच्या घरी यायचे, राहायचे, साहित्यिक चर्चा व्हायच्या••• हे सगळे संस्कार, मनावर होत गेले••• आणि ज्या मातीत आपण रुजले गेलेलो असतो त्या मातीचे संस्कार, शिकवावे लागत नाहीत•••तर ते आपोआप होतात••• त्याप्रमाणे पुरंदर्‍यांचे संस्कार हे आपोआप झाले.

श्री बाबासाहेबांची चालणारी शिवचरित्र व्याख्यानमाला, ही आठवडाभराची पर्वणी असायची•• ती व्याख्याने प्रत्यक्ष ऐकली जायची, पण त्या काळात घरी असलेला मुक्काम •••त्यात नामवंत लोकांबरोबर झालेल्या चर्चा •••यातून त्यांचे बारकाईने निरीक्षण होत होते •••त्याची छाप कुठेतरी मनावर खोल पडली गेली. •••

त्यामुळे स्वाभिमानी, पण नम्रपणा हा आपोआप गुण आला असावा••• लहानपणी त्यांच्या भाषणातूनच या बाबासाहेबांची ओळख झाली •••हे आपले काका आहेत हे सांगताना होणारा आनंद अवर्णनीय असायचा••• पण त्यांचे लहानपण मात्र आम्ही मोठे झाल्यावरच कळले.

सासवडच्या राहणाऱ्या मोरेश्वर पुरंदरे यांच्या कुटुंबात 29 जुलै 1922 रोजी या सुपुत्राचा जन्म झाला •••आणि हौसेने या बालकाचे नाव, ‘बळवंत’ ठेवले गेले••• तेच हे ब. मो. तथा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे•••

यांना लहानपणापासून त्यांच्या वडिलांमुळे गड किल्ल्याची आवड निर्माण झाली. वडील छान गोष्टी सांगायचे, तशी गोष्टी सांगायची आवड निर्माण झाली; आणि वयाच्या आठव्या वर्षी एक कीर्तनकार न आल्यामुळे, नरसिंह अवताराची गोष्ट त्यांना सांगायला लागली.

निर्भीडपणे सर्व लोकांमध्ये त्यांनी सांगितलेली ही कथा सगळ्या गावकऱ्यांना आवडल्यामुळे हेच त्यांच्या वक्तृत्वाचे मोठे कारण झाले.

याच गोष्टीचे साधर्म्य, शिवबांनी अफजल खानाचे पोट फाडले••• या कथेशी वाटून, त्यांना शिवचरित्राचा ध्यास लागला; आणि याच नादातून, ध्येयातून, त्यांनी शिवचरित्राची निर्मिती केली.

शिवचरित्र लिहून झाल्यावर, ते छापायला पैसे नसल्याने, भाजीपाला विकूनही त्यांनी ही रक्कम जमवली.

याच कथेतून, ध्येयासक्ती कशी असावी •••, पैसे नसले तरी कष्ट करण्याची तयारी असणे•••, आणि त्यासाठी पडतील ते कष्ट घेतले पाहिजेत •••आणि सगळ्यात महत्वाचे मनात जिद्द असावी••• असे अनेक गुण त्याचे महत्त्व हे न सांगता मनावर बिंबले गेले •••आणि यातूनच आपणही काही लिहावे •••कष्टाला डगमगू नये••• जिद्द धरावी हे गुण आले आहेत असे वाटते•••

श्री बाबासाहेबांच्या लिखाणाचा प्रभाव इतका पडला की, अलीकडे मी शिवाजीच्या दहा-बारा कथा पावसाच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केला आहे •••त्यातील काही कथा मी माझ्या फेसबुक वरूनही प्रसारित केल्या आहेत.

बाबासाहेब हे कधीच प्रसिद्धी, कीर्ती, यांच्या मागे धावले नाहीत••• तर, शिवाजीच्या प्रेमापोटी, इतिहासाच्या ध्येया पोटी, आणि काहीतरी करून दाखवायची जिद्दीपोटी, ते आपले काम निस्वार्थीपणे करत राहिले••• आहेत •••आणि राहतीलही•••यात शंकाच नाही! त्यामुळेच, यातून झालेल्या परिणामामुळे, हा परिणाम फक्त बाबासाहेबां पुरता मर्यादित न राहता, महाराष्ट्रात, भारतात, नव्हे तर••• विदेशातही जाणवू लागला••• आणि मग, त्यांची कृती इतकी सुंदर, ते खरोखर महान आहेत •••हे आपल्या कार्याने दाखवून दिल्यावर, वयाच्या 95 व्या वर्षी, त्यांना ‘पद्मविभूषण’ हा पुरस्कार मिळाला.

यापूर्वी त्यांना असंख्य पुरस्काराने गौरवण्यात आले आहे पण आवर्जून सांगावेसे वाटणारी पुरस्कार म्हणजे, महाराष्ट्रभूषण, पुण्यभूषण, पद्मविभूषण, आणि पुरंदर्‍यांचे भूषण ठरलेले हे पुरंदरे भूषण!!!!!

त्यांचे मोठेपण सांगायचे झाले तर, त्यांचा धाडसी बाणा, लेखन शैली, स्मरणशक्ती, वक्तृत्व, आत्मविश्वास, आणि जिद्द••• हे वैशिष्ट्य, त्यांचे अनुकरण जे करु इच्छीतात, नियमितपणे त्यांचे लेखन वाचतात, ऐकतात, त्यांना आपोआप आशीर्वादाने मिळतोच; नव्हे हे सगळ्यांनी घ्यावे अशी त्यांची इच्छा आहे.

अशा शिवशाहीर बाबासाहेबांची, वारसदार म्हणून मला त्याचा सार्थ अभिमान आहे •••त्यांच्याबद्दल एवढेच म्हणेन•••

श्री मंत सरदार,

बा वन कशी शिवाजी अभ्यासक,

बा णा शिवाजी धारक,

सा धी रहाणी उच्च विचारसरणी अंगीकारक,

हे रंब, भवानी उपासक,

हुमान अनेक संपादक,

पु ण्यनगरी चे रहिवासक,

रं ध्रोरंध्री शिवाजी ठासक,

र महाराष्ट्रीयास प्रेरक,

रे शमी बोलीतून मनोवेधक,

पुरंदरे भूषण, महाराष्ट्रभूषण, पुण्यभूषण, पद्मविभूषण, शिवशाहीर, श्री बाबासाहेब पुरंदरे, आपणास आरोग्यमयी, उमेद देणारे, शांतीचे, समाधानाचे, राजा शिवछत्रपती गुणगौरव करणारे, प्रदीर्घ आयुष्य लाभलेले ••• आपली आशिष छत्रछाया, अशीच सगळ्यावर राहो••• हीच प्रार्थना •••

आणि बाबासाहेबांनी दिला, आत्मविश्वास, जिद्द, अभिमानाचा वसा,

आम्ही चालवू हा पुढे वारसा••• हे मुख वचन•••

 

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मी आता म्हातारी झाले असं अजिबात म्हणायचं नाही… कवी : प्रा. विजय पोहनेरकर ☆ प्रस्तुती – सुश्री स्वाती मंत्री ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ मी आता म्हातारी झाले असं अजिबात म्हणायचं नाही… कवी : प्रा. विजय पोहनेरकर ☆ प्रस्तुती – सुश्री स्वाती मंत्री ☆

 कोण म्हणतं तू म्हातारी झाली

आत्ताशिक तर तू फक्त साठीची झाली

 

मी थकले, मी दमले

असं सारखं सारखं म्हणू नको

बाई गं तुला विनंती आहे

बळंच म्हातारपण आणू नको !

 

सून आली, नातू झाला

नात झाली, जावाई आला

म्हणजे म्हातारपण येतं नसतं

स्वतःकडे लक्ष द्यायचं सोडलं की

वार्धक्य येत असतं !

 

डाय कर नको करू हा तुझा

व्यक्तिगत प्रश्न आहे

नीट नेटकं टापटीप रहा

एवढंच आमचं म्हणणं आहे

 

बैलाला झुली घातल्या सारखे

गबाळे ड्रेस घालू नको

उगीचच अधर अधर

जीव गेल्यासारखं चालू नको

 

लोकांनी आपल्याला काहीही म्हणो

आपण स्वतःला सुंदर समजावं

रिटायर्ड झालं, साठी आली

तरी रोमँटिक गाणं गावं !

 

पोथ्या, पुराणं, जपतप, कुलाचार

याला आमचा विरोध नाही

पण मी आता म्हातारी झाले

असं अजिबात म्हणायचं नाही !

 

जरी साठी आली तरी….

स्वतःसाठी वेळ द्यायचा

मैत्रिणींचा ग्रुप करायचा

ट्रिपला जायचा प्लॅन करायचा

आणि जीवनाचा आनंद घ्यायचा !

 

आणि हो

दुःखाचे तुणतुणे वाजवायचं नाही

प्रारब्ध प्रारब्ध म्हणून रडायचं नाही

 

घराच्या बाहेर पडायचं

मोकळा श्वास घ्यायचा

आणि हिरवागार निसर्ग पाहून

 धुंद होऊन ” मारवा गायचा !”

 

फिट रहाण्यासाठी सगळं करायचं

हलकासा व्यायाम, योगा

थोडा morning walk

फेशियल, मसाज, स्टीम बाथ……

सगळं कसं रेग्युलर करायचं !

कुढत कुढत जगायचं नाही

आणि म्हातारपण आलं

असं म्हणायचं नाही !

 

साठाव्या वर्षी फॅशन करू नये

असं कुणी सांगितलं ?

प्लाझो, वनपीस, जेगीन, टी शर्ट सगळं घालायचं

अन गळम्यासारखं नाही

मस्त ऐटीत, टाईट चालायचं !

 

नको बाबा! लोक काय म्हणतील?

अरे म्हणली का पुन्हा लोक काय म्हणतील ?

मग ट्रीपला काय नऊवारी लुगडं,

आणि तिखटा मिठाचा वास येणाऱ्या

मेणचट रंगांच्या साड्या घेऊन जाणार का ?

अग बाई, जगाची फिकीर करायची नाही

अन म्हातारी झाले असं म्हणायचं नाही !

 

हे सगळं तू का करायचंस,

 ते नीट समजून घे

कारण तू घराचा आधार आहेस

कुटुंबाचा कणा आहेस

वास्तू नावाच्या पंढरपुरातली

मंजुळ वीणा आहेस !

तुझं शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहिलं तरंच घर आनंदी राहणार आहे,

देवघरात दिवा लागून स्वयंपाक घरात

” अन्नपूर्णा येणार आहे !”

घराघरात संस्काराचा सडा

आणि चैतन्याचा झरा वाहण्यासाठी

तुझं मन प्रसन्न असणं

खूप गरजेचं आहे !

 

कवी : प्रा. विजय पोहनेरकर

फोन नं. 9420929389

संग्राहिका : श्रीमती स्वाती मंत्री  

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ दोन काव्ये — (१) सोबती… श्री प्रमोद वामन वर्तक (२) सांग पावसा… ☆ सौ. रेणुका धनंजय मार्डीकर ☆

श्री प्रमोद वामन वर्तक  

?️?  चित्रकाव्य  ?️?

? सोबती… श्री प्रमोद वामन वर्तक ☆

सोबत सोडून मित्रांची 

म्हटले एकटेच फिरूया 

एकदा आपल्या डोळ्यांनी

दुनिया आपण अनुभवूया

*

बघतांना अनोखी दुनिया 

फिरून फिरून थकलो 

आणि नेहमीच्या सवयीने 

पार्किंग लॉटात विसावलो

*

कधी लागला माझा डोळा 

माझे मलाच नाही कळले

पडता अंगी पिवळी बेडी 

डोळे खाडकन उघडले

*

“लॉटच्या मधे उभा मी 

यात नियम कुठे मोडला?”

धीर करून विचारले 

एका अदृश्य पोलीसाला

*

“सोबत मित्रांची सोडलीस

हाच तुझा मोठा गुन्हा

आज ताकीद देतो तुला 

करू नको ही चूक पुन्हा”

करू नको ही चूक पुन्हा”

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

☆ ☆ ☆ ☆ ☆

सौ. रेणुका धनंजय मार्डीकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? उमलून आले स्थलपद्मसौ. रेणुका धनंजय मार्डीकर ☆

उमलून आले स्थलपद्मम्

रूप मनोहर विहंगम्

कलिका बहरती शतपुष्पम्

मम् मानसी रुजले पाटलम्

*

पावस ऋतु हा मनमोही

रूप पाहुनी लवलाही

अंतरमन गाणे गाई

शुभ्र धवल रूपडे पाही

*

बहरून आल्या पहा खुळ्या

हिरव्या पानी शुभ्र कळ्या

पर्जन्याचे स्वागत करण्या

गुलाब झाल्या त्या सगळ्या

© सौ.रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ तन्मय साहित्य #245 – कविता – श्रीकृष्ण जन्माष्टमी विशेष – आओ फिर से गोविंद…. ☆ श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ ☆

श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’

(सुप्रसिद्ध वरिष्ठ साहित्यकार श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ जी अर्ध शताधिक अलंकरणों /सम्मानों से अलंकृत/सम्मानित हैं। आपकी लघुकथा  रात  का चौकीदार”   महाराष्ट्र शासन के शैक्षणिक पाठ्यक्रम कक्षा 9वीं की  “हिंदी लोक भारती” पाठ्यपुस्तक में सम्मिलित। आप हमारे प्रबुद्ध पाठकों के साथ  समय-समय पर अपनी अप्रतिम रचनाएँ साझा करते रहते हैं। आज प्रस्तुत है श्रीकृष्ण जन्माष्टमी पर एक विचारणीय कविता आओ फिर से गोविंद” ।)

☆ तन्मय साहित्य  #245 ☆

☆ श्रीकृष्ण जन्माष्टमी विशेष आओ फिर से गोविंद…. ☆ श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ ☆

आनन्दकन्द गोपाल, कृष्ण गिरधारी

आओ फिर से, गोविंद सुदर्शन धारी।

*

वृन्दावन में, बचपन बीता अति प्यारा

आये जो दैत्य कंस के, उन्हें सँहारा

असुरों की फौज बढ़ी, धरती पर भारी

आओ फिर से, गोविंद सुदर्शन धारी।…

*

कोमल कलियों को, कुचल रहे अन्यायी

बेटी-बहनों के साथ, करे पशुताई

पहले जैसे नहीं रहे, लोग संस्कारी

आओ फिर से, गोविद सुदर्शनधारी।…

*

कालीया नाग को, जैसे सीख सिखाई

जहरीले नाग, फुँफकार रहे हरजाई

फन कुचलो माधव, नटनागर बनवारी

आओ फिर से, गोविद सुदर्शनधारी।…

*

आतंकवाद ने, अपने पैर पसारे

जयचंद कई हैं छिपे, देश में सारे

खोजें उनको, दें दंड देश हितकारी

आओ फिर से, गोविद सुदर्शनधारी।…

*

मथुरा में जाकर, दुष्ट कंस को मारा

महाभारत में फिर, गीताज्ञान उचारा

भारत की यही पुकार, मुकुंद मुरारी

आओ फिर से, गोविद सुदर्शनधारी।…

☆ ☆ ☆ ☆ ☆

© सुरेश कुशवाहा ‘तन्मय

जबलपुर/भोपाल, मध्यप्रदेश, अलीगढ उत्तरप्रदेश  

मो. 9893266014

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ जय प्रकाश के नवगीत # 68 ☆ आँखों में मधुवन… ☆ श्री जय प्रकाश श्रीवास्तव ☆

श्री जय प्रकाश श्रीवास्तव

(संस्कारधानी के सुप्रसिद्ध एवं अग्रज साहित्यकार श्री जय प्रकाश श्रीवास्तव जी  के गीत, नवगीत एवं अनुगीत अपनी मौलिकता के लिए सुप्रसिद्ध हैं। आप प्रत्येक बुधवार को साप्ताहिक स्तम्भ  “जय  प्रकाश के नवगीत ”  के अंतर्गत नवगीत आत्मसात कर सकते हैं।  आज प्रस्तुत है आपका एक भावप्रवण एवं विचारणीय नवगीत “आँखों में मधुवन…” ।

✍ जय प्रकाश के नवगीत # 68 ☆ आँखों में मधुवन… ☆ श्री जय प्रकाश श्रीवास्तव

मौसम गाए गीत नया

ऋतुगंध सुनाए सगुन

सावन विरहा मुझ पर टूटा

आए हैं दुर्दिन ।

*

यह पावस क्षण-क्षण आपस के

ख़्वाब दिखा जाये

बूँद न टूटे बूँद-बूँद के

अंग समा जाये

*

मेघ दूत लौटा दे मेरा

रंग भरा फागुन।

*

फागुन के आँगन में तुम सँग

रंग वसंत हुए

सागर बीच नहीं प्यासों के

अब तक अंत हुए

*

सावन में फागुन को देखूँ

फागुन में सावन।

*

मौसम एक अकेला राजा

ऋतुएँ सब रानी

पर लगता मन का वृंदावन

तुम बिन बेमानी

*

पलकों पर सपने तिरते हैं

आँखों में मधुवन।

***

© श्री जय प्रकाश श्रीवास्तव

सम्पर्क : आई.सी. 5, सैनिक सोसायटी शक्ति नगर, जबलपुर, (म.प्र.)

मो.07869193927,

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares