(श्री श्याम खापर्डे जी भारतीय स्टेट बैंक से सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकारी हैं। आप प्रत्येक सोमवार पढ़ सकते हैं साप्ताहिक स्तम्भ – क्या बात है श्याम जी । आज प्रस्तुत है आपकी भावप्रवण कविता “क्या क्या नहीं कहा?”)
(ई-अभिव्यक्ति में संस्कारधानी जबलपुर से श्री राजेंद्र तिवारी जी का स्वागत। इंडियन एयरफोर्स में अपनी सेवाएं देने के पश्चात मध्य प्रदेश पुलिस में विभिन्न स्थानों पर थाना प्रभारी के पद पर रहते हुए समाज कल्याण तथा देशभक्ति जनसेवा के कार्य को चरितार्थ किया। कादम्बरी साहित्य सम्मान सहित कई विशेष सम्मान एवं विभिन्न संस्थाओं द्वारा सम्मानित, आकाशवाणी और दूरदर्शन द्वारा वार्ताएं प्रसारित। हॉकी में स्पेन के विरुद्ध भारत का प्रतिनिधित्व तथा कई सम्मानित टूर्नामेंट में भाग लिया। सांस्कृतिक और साहित्यिक क्षेत्र में भी लगातार सक्रिय रहा। हम आपकी रचनाएँ समय समय पर अपने पाठकों के साथ साझा करते रहेंगे। आज प्रस्तुत है आपका एक विचारणीय कविता ‘कान्हा…‘।)
शाळा सुटली तेव्हा पाठ्यपुस्तकातल्या कवितांचा निरोप घेताना कविताशाखेची एक मुळी बरोबर घेतली होती. पुढे महाविद्यालयाच्या प्रांगणात ती चांगलीच बहरली. साहित्याची विद्यार्थिनी नसूनदेखील कवितेचे प्रेम अखंड राहिले. इंदिरा संत, महानोर, ग्रेस, आरती प्रभू, पाडगावकर यांच्या कवितांनी दिवस नुसते घमघमत होते.
ग्रंथालयाच्या प्रतीक्षायादीसाठी किती अधीर असायचे मन ! संग्रह पटकन हाती पडायचे नाहीत. मग उधार-उसनवारी, मिनतवारी करावी लागे. कविता क्वचित कानी पडत आणि पुन्हा वाट पाहणे संपत नसे.
‘गडद नीलिमा चष्म्यावरचा, शर्टावरची बटणे काळी’… इंदिरा संतांच्या कवितेतल्या इंद्रधनूवर रेलणारी सुरंगा आपणच आहोत, असा भास होई, ‘तो चहा गुलाबी, ती चर्या खळाळणारी…’असे काही वाचताना धूसर स्वप्नांची वाट आता दूर नाही, असे वाटे. आरती प्रभूंच्या ‘माझी वस्त्रं तुझी झाली’ या ओळींवर पतंग होऊन मन झेपावत असे. पाडगावकरांची ‘जांभळी नीज ये’ रेंगाळत राही. बोरकरांची ‘पाठमोरी पौर्णिमा’ शोधून वाचली जाई.
‘पाठमोरी तू बीजेची रात्र, लावण्ये रमा हासुनी पाही वळोनी,
होऊ दे ना पौर्णिमा…’
दुर्बोधतेच्या घनवनाची तमा न बाळगता ग्रेसच्या कविता शोधायची अनिवार हौस फिटतच नसे.
‘शून्यात गर्गरे झाड तशी ओढाळ दिव्यांची नगरी
वक्षात तिथीचा चांद तुझा की वैरी … ‘
…. या ओळींवर फिरफिरून नजर जात असे. महानोरांच्या रानाने तर साद घातलेली होती. राजबन्सी पाखराने खुणावले होते. हिंदी-मराठी चित्रपटगीतांतून, भावगीतांतून कविता भोवती रोषणाई करीत असे. गदिमांच्या गाण्यातले कडवे मनात अधोरेखित करीत असे.
‘प्रिय नयनातील भाव वाचता
चुकून दिसावा मोर नाचता
दूर देशीचे बुलबुल यावे कधीमधी पाहुणे… ‘
… त्यातले छंद-प्रास आवडत, की शब्दांतून साकारणाऱ्या दृश्यांचा मोह अनावर होई, की नाद ओढ लावीत;ते कळायचे नाही. आपल्या कोवळ्या तारुण्याची जादू असावी, की काय, असेही वाटे. मग आपणही कविता कराव्यात, असे वाटे. जमिनीवर पाय काही ठरायचे नाहीत.
त्यातच पुढे साहिरचे ‘तल्खियॉं’ हाती आले. त्यातल्या दाहकतेने चटका लावला.
‘तेरे पैराहने रंगोंकी जुनूखेज़ महक
ख्वाब बन बनके मेरे ज़हन में लहराती है ,
रात की सर्द खामोशी में हर इक झोंके से
तेरे अनफ़ास, तेरे जिस्म की ऑंच आती है
… ‘तुझ्या रंगीत वसनांचा उन्मादक गंध एखाद्या स्वप्नासारखा तरळतो. रात्रीच्या नि:शब्दतेत थंड झुळकीबरोबर तुझ्या श्वासांची, शरीराची दाहकता जाणवतीय.’
असे काही वाचल्यावर माझ्या सुसंस्कृत मनाच्या भिंती थरथरल्या. इंदिरा संतांच्या कवितेतल्या मणिबंधावर उतरणाऱ्या खुळ्या पाखरासारखी मी धडधडत राहिले.
आता पुढची कथा सांगायला हवी. मोठ्या वादळात कवितांची घरटी पार उध्वस्त झाली. छंद हरवले. शब्द निमाले. आवडीच्या कवितांचा संग्रह जवळ असावा, हे विलासी स्वप्न दूर-दूर जात राहिले. आकडेमोड, खर्चाची तोंडमिळवणी, देणी-घेणी, दुखणीबाणी यात किती चंद्र-सूर्याचे उदयास्त होऊन गेले, ते कळले नाही. बधिरपणातून सावरेपर्यंत बरीच चढण चढले. एखाद्या शांत पांथस्थाने झाडाखाली क्षणभर बसावे, तशी थोडी थांबले आणि कवितेची सृष्टी पुन्हा एकदा जवळ केली. जमेल तसे एकेक कवितासंग्रह घरी आणत गेले. रात्री उशागती दिव्याच्या सोबतीने कवितांची उजळणी करू लागले. सरत्या चैत्राच्या उत्तररात्री असते, तशी नक्षत्रांची आरास कुठली असायला? मंद दिव्याची सोबत पुरत असे. कळ्या-फुलांचे बहर नव्हते. वाळलेल्या काटक्यांच्या समिधा मात्र होत्या.
स्वातंत्र्यानंतर जन्मलेल्या पिढीतली असल्याने कुसुमाग्रजांच्या क्रांतिघोषाच्या जयजयकारापासून, धगधगत्या यज्ञज्वाळेपासून दूर चालत आले होते खरी; पण आता त्यांची कविता माझ्यापाशी होती.
‘नवरत्नांनी जडवलेले अलंकार अंगावरून उतरवीत ती माझ्यासमोर उभी राहिली… आणि अखेर देहाला बिलगलेलं झिरमिर आवरणही तिनं दूर फेकून दिलं…
निरभ्र सोलीव रूपाकडे पहात कवीनं विचारलं-
‘तू कोण?’
ती हसून उद्गारली – ‘मीच ती तुझी कविता !’
अखंड पाषाणातल्या सावळ्या मूर्तीसारखी कवीची कविता माझी झाली. वृत्तछंदाचे अलंकरण आता उरले नव्हते. प्रासाची पैंजणे नव्हती … ‘निशिगंध’ वाचत गेले.
…. असलेपणाची आरास? अवघ्या विश्वातले आपले चिमुकले अस्तित्व हाच उत्सव, तर मग जीवन हा तर नित्य आनंद सोहळा… माझ्या प्रौढपणीच्या पाठयपुस्तकातले पान मोहरून उठले. व्यक्तिगत सुखदु:खाच्या संदर्भातले कवितेचे भान वैश्विक स्तरावर उंचावले गेले. त्याच्या पाऊलखुणा शोधत राहिले…
‘विसरल्या उन्हातिल वाटा, विसरले पथातील काटे
ही गुहा भयावह आता स्वप्नांसम सुंदर वाटे
रसभाव भराला आले काव्याहून लोभसवाणे’
…. गदिमांच्या सहज सुचलेल्या मंजुळ गाण्याने काहीतरी सांगितले. बोरकरांची ही कवितादेखील काही कुजबुजून गेली….
‘येते उदासता कधी ओल्या काळोखासारखी,
मध्यरात्री तिची पण फुले नक्षत्रपालवी…’
… दिवा मंद तेवताना ही रोषणाई कसली अन भोवती हा कोलाहल कसला? तो तुमच्या-आमच्या ‘असण्याचा’ सोहळा आहे. कवितेच्या अलौकिकतेच्या पालखीबरोबर दोन पावले चालायचे आहे ना… सर्वांच्यासह…
☆ सुसंस्कृत… लेखिका : सुश्री ज्योती रानडे – संकलन : प्रा. माधव सावळे ☆ सौ.प्रभा हर्षे ☆
राधाबाईंकडे आज खूप गडबड होती. त्यांच्या लेकीला, कलावतीला बघायला लोक यायचे होते. चार खोल्यांचं घर लखलखीत स्वच्छ करून झालं होतं. बाहेरच्या हॅालमध्ये त्यांचे यजमान, किर्तनकार वामनराव, येरझारा घालत होते. वामनरावांचं किर्तन म्हणजे आयुष्य कसं जगावं याचा धडाच असे पण आज ते स्वत:च थोडे काळजीत होते!
“अहो, मुलाचे वडील प्रसिध्द डॅाक्टर आहेत पण फार रागीट आहेत असं ऐकतोय. काणे मंडळी आहेतच म्हणे रागीट.” ते पत्नीस म्हणाले.
“हे बघा, योगेश फार चांगला मुलगा आहे हो.. आई प्रेमळ आहे. असेनात का वडील रागीट..आपली कला शहाणी आहे..
“रामकृष्ण हरी..रामकृष्ण हरी” वामनराव त्याच्या नकळत जपात हरवून गेले. या राधेची सकारात्मक वृत्तीच आपली शक्ती बनून आयुष्यभर पुरली होती हे त्यांना परत एकदा जाणवलं!
कलावती तयार होऊन बाहेर आली. ते सात्विक सौंदर्य व त्या मासोळीसारख्या काळ्या डोळ्यातील बुध्दिमत्ता बघून राधाबाई धन्य झाल्या. वामनरावांनाही भरून आलं..
मोतिया रंगाच्या साडीत कलावती किती सुंदर दिसत होती! हिरवेकंच मोरपीसाच्या नक्षीचे काठ, हातात मोत्याची एक एक बांगडी, कानात भोकरं, आणि गळ्यात मोत्याचा सर घातलेली कलावती अप्रतिम दिसत होती. संस्कृत मधे डॅाक्टरेट करत असलेली सुसंस्कृत लेक आमची! या हिऱ्याला उत्तम कोंदण मिळवून दे रे श्रीहरी..म्हणत वामनरावांनी श्रीकृष्णाच्या प्रतिमेसमोर हात जोडले..
अंगणात विठूकाका काम करत होता. त्यांनी पण खिडकीतून तर्जनी व अंगठा जोडून छान दिसतेस असं कलावतीला सांगितलं व ते परत बाग नीटनेटकी करू लागले.
कलावतीनं अबोलीच्या फुलांचा सुरेख गजरा केला होता तो आईच्या केसात माळला..
“कले..अग मला म्हातारीला कसला गजरा घालतेस? तू घाल ना! तुला बघायला येत आहेत ते!”राधाबाई लटक्या रागाने म्हणाल्या.
“घाल ग! गोड दिसत आहेस! आवडशील त्यांना!”कलावतीला आईला चिडवल्याखेरीज चैन पडत नसे!
“आवरा, आवरा पटकन!” वामनरावांनी उठून हॅालमधील आकाशी पडदा सरळ केला. बैठकीच्या गादीवरचे लोड सरळ केले. रामकृष्ण हरी जप करत त्याच्या खुर्चीवर बसले.
बेल वाजली.. मंडळी आली. उंच्यापुऱ्या, देखण्या योगेश कडे बघून वामनराव व राधाबाई खुष झाले. योगेश इंजिनीअर होऊन एका बड्या कंपनीत काम करत होता. त्याचे वडील डॅाक्टर काणे शहरातील प्रसिध्द डॅाक्टर होते. आई शांत व सौम्य दिसत होती.
हवा पाण्याची बोलणी झाली. हॅाल मधे घातलेल्या साध्या सतरंजीकडे बघताना त्यांच्या डोळ्यात तुच्छता तरळून गेली असे वामनरावांना वाटून गेले..
”तुमचं किर्तन कधी ऐकलं नाही कारण मला वेळच नाही कुणाची किर्तनं ऐकायला..पण काय हो..किर्तन करून पोट भरणे मला तरी कठीण वाटतं.” डॅा. काणे वामनरावांकडे बघत म्हणाले.
माणसाच्या वैभवाच्या व्याख्या घर, गाडी, बंगला यापर्यंतच सीमित आहेत हे जाणवून वामनराव मंद हसले.
एकमेकांच्या अंतरीच्या वैभवाकडे बघायला कधी शिकणार? कालच्या निरूपणाचा हाच विषय होता..अंतरीचे अमृत..
“आम्हाला डॅाक्टर मुलगीच हवी होती पण आमचे युवराज तुमच्या लेकीला भेटले म्हणून आम्ही आज इथे येऊन पोचलो आहोत. बोलवा तुमच्या मुलीला.” डॅा. काणे गुर्मीत म्हणाले.
कला बाहेर आली..तिच्याकडे बघून योगेशचा खुललेला चेहरा खूप काही सांगून गेला! तिनं केलेलं मेघदूताचं रसग्रहण ऐकायला गेल्यापासूनच ती त्याच्या मनात भरली होती. आषाढस्य प्रथमदिवसे.. नं तिनं केलेली सुरूवात व महाकवी कालिदासाच्या वाड्ग्मयावरचं तिचं प्रभुत्व बघून तो थक्क झाला होता. तिच्या साधेपणातलं सौंदर्यच त्याचा पाठपुरावा करत त्याला तिच्या घरी घेऊन आलं होतं.. पण आज बाबा कसे बोलतील आज याची त्याला फार काळजी होती.
किर्तनाऐवजी काही दुसरं का केलं नाहीत?” काणे म्हणाले. वामनराव “देवाची इच्छा..तो ठरवतो..म्हणाले पण काणे काही पाठ सोडायला तयार नव्हते.
कलावतीला काण्यांचे प्रश्न खटकत होते…रामदासी किर्तनाने पंचक्रोशी पवित्र करणाऱ्या माझ्या संत प्रवृत्तीच्या बाबांबद्दल यांना थोडाही आदर नाही हे तिला दिसत होतं पण योगेश ते प्रश्न ऐकून इतका गप्प कसा बसतो आहे हे तिला कळतं नव्हतं.
खिडकीतून विठूकाकांनी मुलगा छान आहे असं दाखवलं व ती खुदकन् हसली. विठूकाका तिच्या जन्मापासून त्यांच्याकडे येत असतं. किर्तनाला येणारे एक साधक! पण वामनबुवांसाठी आपण काहीतरी करावं ही प्रबळ इच्छा! ते येत व बगीचा सुंदर करून जातं. कधी बुवांशी चहा घेत गप्पा मारत तर कधी कलावतीला बागकाम शिकवतं..
डॅा.काणे कलावतीला म्हणाले ,”संस्कृतचे क्लास तुम्ही घेऊ शकता. उठून बाहेर कुठं जाऊन नोकरी करायची जरूर नाही.” ते योगेशला काही बोलूच देत नव्हते म्हणून वामनरावच म्हणाले,”कला, योगेशना बाग दाखव ना आपली!”
ते दोघे बाहेर गेले. योगेश चांगला मुलगा होता. वडिलांपुढे मात्र एक अक्षरही मायलेक बोलू शकत नाहीत हे कलेला जाणवले. त्यांनी काहीवेळ गप्पा मारल्या व राधाबाईंनी चहा प्यायला आत बोलावले म्हणून ते आत गेले.
कला म्हणाली, “अहो विठूकाका, आत या ना चहा प्यायला!”
डॅा. काणे चहाचा कप हातात घेऊन बाग पहाण्यास दाराकडे वळत असतानाच आत येणाऱ्या विठूकाकाला धडकले व चहा धक्का लागून त्यांच्या शर्टावर सांडला..
“Nonsense! “ ते काकांकडे रागाने पहात ओरडले. काका बिचारे हातातल्या फडक्याने चहा पुसू लागले पण योगेशचे बाबा ओरडले, “ते घाणेरडं फडकं माझ्या कपड्यांना लावू नको. दिसत नाही हातात चहा आहे माझ्या?” काका शरमिंदे होऊन खाली बघत उभे राहिले..
कलावती एकदम उभी राहिली. ती काण्यांकडे बघून म्हणाली, “तुमचा चहा सांडला का?”
“हो मग!” हा गावठी माणूस येऊन धडकल्यावर आणि काय होणार?
कलावती हसली.. “नाही डॅाक्टर साहेब! तुमचा चहा सांडला कारण तुमच्या कपात चहा होता. तुमच्या कपात जर कॅाफी असती तर कॅाफी सांडली असती! बरोबर ना?”
डॅाक्टर काणे चिडून म्हणाले,”यात विशेष काय सांगितलंस?जे कपात आहे तेच सांडणार.. का पाणी सांडेल?”
“आपण मोठे डॅाक्टर आहात.. बरोबर आहे .. जे आत आहे तेच बाहेर सांडणार! आयुष्यात असे अनेक धक्के बसणार आहेत..परिस्थितीचे, नातेसंबंधांचे..आणि आत जर विवेक, नम्रता, कृतज्ञता असेल तर त्या धक्क्यांनंतरही हे गुणच बाहेर सांडतील..पण..आपल्या आतच जर तुच्छता, अहंकार, क्रोध असेल तर तेच बाहेर पडणार ना..ज्याचा मला गेले दोन तास त्रास होतो आहे.. योगेश मला आवडला आहे. पण आपल्यापुढे तो काही बोलू शकत नाही..त्याच्यात नम्रता आहे..माझ्या आई बाबांबद्दल आदर आहे आणि आपले बाबा आज कसे बोलतील ही काळजीही आहे. ते मला बाहेर अंगणात समजलं म्हणूनच मला तो अजूनच आवडला..
पण भारतीय समाजात लग्न होतं तेव्हा ते दोन कुटुंबांचं असतं. आमचं लग्न झालं तर माझे किर्तनकार बाबा आपले व्याही होणार याचा तुम्हाला त्रास होईल. ते व्यवहाराच्या दृष्टीनं आपल्या तोलामोलाचे नाहीत..पण ज्ञानाच्या बाबतीत त्यांची कोणी बरोबरी करू शकणार नाही..
मी घरात संस्कृतचे क्लास घेणार नाही.. मी विद्यापीठांत जाऊन संस्कृत शिकवणार आहे.. मी पण डॅाक्टरच होत आहे पण कालिदासाच्या वाड्ग्मयावर! रघुवंशातील भाषा थोडी कृत्रिम का वाटते व मेघदूत मनाला का भिडतं हे विद्यार्थ्यांना शिकवणारी..
आणि हे आमचे विठू काका आहेत ना त्यांचा मान राखणारं घरच मला हवं आहे..तिचे डोळे भरून येऊन आवाज कापरा झाला होता..
बरं झालं की आत जे असतं तेच बाहेर सांडतं.. निदान मला कळलं तरी.. योगेश तू जेव्हा डॅाक्टर साहेबांना सांगू शकशील ना.. बाबा तुमचं आज चुकलं किंवा बरोबर आहे त्यादिवशी येऊन माझा हात हातात घे.” ती थांबली!
डॅाक्टर काणे जळजळीत नजरेनं बायको व मुलाकडे बघत म्हणाले, “ चला इथून.. खालच्या दर्जाच्या लोकांशी नातं नाही जोडायचं आपल्याला.” ते तावातावानं बाहेर पडले..त्यांची पत्नी दु:खी चेहऱ्याने बाहेर पडताना बघून योगेश म्हणाला, “आई, थांब. मला कलावती पसंत आहे. मी तिच्याशीच लग्न करणार आहे!”
आईनं प्रेमाने कलावतीला जवळ घेतलं आणि वामनराव व राधाबाईंना त्या म्हणाल्या, “सुसंस्कृत आहे मुलगी असं ऐकलं होतं पण आज “सुसंस्कृत” म्हणजे काय समजलं”!
कलावती व योगेश नजरेत नजर घालून तो क्षण अनुभवत उभे होते. बाहेरून डॅाक्टर काणे गाडीचा हॅार्न वाजवत होते पण काही वेळात थांबले.. आत असलेलं सारंच बाहेर सांडून जगाला दिसू नये म्हणून!
कलावती हॅार्न थांबलेला बघून मनातच हसली.आयुष्य मोकळा कप देतं.. तो कशानं भरायचा हे आपल्या हातात आहे या विचारात असताना योगेशनं तिचा हात हातात घेतला व अंगठी पुढं केली..
वामनराव रामकृष्ण हरी..म्हणत स्मितहास्य करत डॅाक्टरांना आत बोलवायला बाहेर गेले.. खरेच सुसंस्कृत होते म्हणूनच !!
लेखिका : सुश्री ज्योती रानडे
संकलन : प्रा. माधव सावळे
प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
कृष्णा, बंदी वासातून स्वातंत्र्याकडे तुझी वाटचाल काल रात्रीपासून सुरू झाली! कंसाच्या बंदीवासात देवकीच्या पोटी जन्माला येताच, दुसऱ्या क्षणी तुला तिथून स्थलांतर करावे लागले! विष्णू अवतारातील एक म्हणून पृथ्वीवर जन्माला आल्याबरोबरच तुला इथले मानवी जीवनाचे वनवास भोगावे लागले, आणि गोकुळात जाऊन तू साधा गोपाल म्हणून जगलास! इतर गोकुळ वासी मित्रांबरोबर तुझे खेळ रंगले पण ते करता करता तू किती राक्षसांचे पारिपत्य केलेस आणि दृष्टांच्या निर्दालनासाठी असलेला तुझा मानवी अवतार कार्यरत झाला! गरीब बिचाऱ्या गोपांना घरचे दूध, दही, लोणी मिळत नाही म्हणून गोपींची मडकी फोडलीस, सर्वांसोबत त्यांच्या दही काल्यात रंगून गेलास आणि समाजवादाचा एक धडा शिकवलास! जे आहे ते सर्वांनी वाटून घ्यायचं! थोडा मोठा झाल्यावर सांदिपनी ऋषींच्या आश्रमात शिकण्यासाठी गेलास! तेथे गरीब सुदाम्याशी मैत्रीचे बंध ठेवून पुढील काळात त्याचा उद्धार केलास! किशोरावस्था संपून मोठा झालास आणि कंसाचा वध करून मथुरेचे राज्य मिळवलेस!
तारुण्य सुलभ भावने ने स्वयंवरासाठी गेलास, तुला द्रौपदीची आस होती का ?की पुढे काय घडणार याचे दृश्य रूप तुला दिसले होते ?त्यामुळे पांडवांच्या पदरी द्रौपदी देऊन तू तिचा “सखा” बनलास! दुर्गा भागवत म्हणतात की, मित्र या नात्याला “सखा” हे रूप देऊन स्त्री-पुरुषातील हे नाते तू अधिक उदात्त केलेस! आयुष्यभर पांडवांची साथ देत कौरव- पांडव युद्धात तू अर्जुनाचा सारथी बनून कुरुक्षेत्रावर उतरलास, योद्धा म्हणून नाही तर सारथी बनून!एक सहज विचार मनात आला, द्रौपदीने कर्णाला ‘सूतपुत्र’ म्हणून नाकारले,! सारथ्य करणारा माणूस समाजात खालच्या स्तरावर असतो हे तिने दाखवून दिले, पण शेवटी युद्धात तू सारथी बनून जी पांडवांना मदत केलीस त्यातून तू सारथी हा सुद्धा किती महत्त्वाचा असतो हे द्रौपदीला दाखवून दिलंस का? तुझं सगळं अस्तित्वच देवरूप आणि मानव रूप यांच्या सीमेवर होतं! जन्म घेतलास त्यात तू त्याच रंगात रंगून गेलास! मगध देशाच्या लढायांना कंटाळून तू गोकुळ, मथुरा सोडून द्वारकेला पळून गेलास आणि स्वतंत्र राज्य स्थापन केलं म्हणून तुला ‘रणछोडदास’ नाव मिळालं! वेगवेगळ्या राज्यातील राजकन्यांशी विवाह करून तू साऱ्या भरत खंडाला एकत्र आणण्याचा प्रयत्न केलास! आणि अवतार कार्य समाप्त करताना एका भिल्ला च्या हातून तुझ्या तळपायाला बाण लागून तुझे जीवन कार्य संपवलेस! कृष्णा,
तुझे नाव घेतले की आपोआपच गुणदोषातून मुक्ती मिळते असं वाटतं! कारण आपण काहीही घडलं तरी “कृष्णार्पण” असा शब्द वापरून ते संपवतो. सगळं हलाहल जणू संपून जातं तुझ्या स्मरणात!
तुझा जन्म काळ मध्यरात्री येतो, तेव्हाही आम्ही वाजत गाजत तुझा जन्मोत्सव साजरा करतो. कारण अंधाराची रात्र संपून तुझ्या जन्माने उत्साहाचा आणि कर्तृत्वाचा जन्म होणार असतो. आजचा गोपाळकाला म्हणजे उत्साही कामाची सुरुवात! पावसाच्या सरींबरोबरच पुढील वर्ष आनंदात जाऊ दे हीच इच्छा आपण प्रकट करतो . चार वर्षांपूर्वी आधुनिकतेच्या नावाखाली कृष्ण किंवा परमेश्वराचे अस्तित्व न मानणारे “कोरोना” पुढे शरणागत झाले होते .तेव्हा माणसाच्या लक्षात आले की विज्ञानाने कितीही मात केली तरी एक “हातचा “तुझ्याकडे, परमात्म्याकडे आहे हे मात्र आपण मान्य केले पाहिजे!
☆ सुखी व्हायचं आहे का ? मग — लेखक – श्री धनंजय देशपांडे ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆
“कर्मा रिटर्न्स” हे विसरू नका !
एका सुंदर शहरात छान बंगल्याची एक कॉलनी होती. त्या कॉलनीत एक बंगला बरेच दिवस रिकामा असतो. त्यामुळे शेजारच्या बंगल्यातील मंडळी त्यांच्या बागेतला कचरा रात्री हळूच या बंद असलेल्या बंगल्याच्या आवारात टाकून देत असत. त्यामुळे तिथं कचऱ्याचा भला मोठा ढीग साचलेला.
अशातच एक दिवस त्या बंद बंगल्यात एक तरुण जोडपं राहायला येत. कंपाउंड दार उघडून ते आत येताच समोर हा कचऱ्याचा ढीग दिसतो. ती चिडते, वैतागते. हे असं कुणी केलं असेल यावर तडफड व्यक्त करते. तो मात्र शांत असतो. तिला “आधी आत तर जाऊया” असं हसून म्हणत तिला आत घेऊन येतो. येतानाच बाहेरून जेवून आल्याने आता हाताशी वेळ असतो. तर तो तिला म्हणतो, “गॅलरी त्यातल्या त्यात स्वच्छ दिसतेय तर तू तिथं थोडा आराम कर” असं म्हणून तिला तिथं बसवून हा पठया हातात झाडू घेऊन आधी पूर्ण घर साफ करतो. नंतर बागेत येतो. तिथला कचऱ्याचा ढीग नीट एका कोपऱ्यात नेतो. बागकामासाठी लागणारी हत्यारे तिथेच बागेत एका छोट्या कपाटात असतात. त्यातून तो कुदळ फावडे घेऊन एक छोटा खड्डा तयार करतो. त्यात हा कचरा टाकून वरती थोडी माती व पाणी शिंपडून खड्डा बंद करतो.
नंतर पाईप घेऊन त्याने पूर्ण बागेच्या परिसरात मस्त पाणी मारतो. मरगळलेली ती झाडे आता एकदम तरारून येतात. जमिनीवरची हिरवळ देखील जणू खुश होऊन डोलू लागते. एक प्रकारचं चैतन्य तिथं अवतरत. अन त्याच्या लक्षात येतं की बागेत मस्त आंब्याचे, चिकूचे, पेरूचे झाडे आहेत. त्या झाडाला मग तो थोडं पाणी टाकून ठेवतो.
*
हे करता करता संध्याकाळ होते. तोही थकून गेलेला असतो. तोवर ती हि आतून बाहेर येते. म्हणते, “मी आतलं सामान बऱ्यापैकी लावलं आहे. मात्र आता किचनचा कंटाळा आलाय रे”
तो म्हणतो, “हरकत नाही, आपण बाहेर जाऊया. थोडं फिरणं पण होईल अन येताना खाऊन येऊ”
त्याप्रमाणे दोघे तयार होऊन बाहेर जातात.
त्या दरम्यान शेजारच्या त्या बंगल्यातले लोक तोवर हे सगळं पाहत असतात. मात्र रोजच्या सवयीने रात्रीच्या अंधारात ते स्वतःचा कचरा या स्वच्छ केलेल्या बंगल्यात टाकतात. अन दार बंद करून आत बसतात.
हे तरुण जोडपं जेव्हा फिरून खाऊन घरी येत तर दिसत की पुन्हा शेजारच्यांनी कचरा टाकला आहे. ती आता मात्र खवळते. “मी बघतेच त्यांच्याकडे” असं म्हणून ती शेजारी जायला निघणार इतक्यात तो तिला थांबवतो अन हसून म्हणतो, “तू आत जा. बाकी सोड माझ्यावर”
असं म्हणून तिला आत पाठवून तो पुन्हा खराटा घेऊन तो कचरा गोळा करून त्या दुपारी केलेल्या खड्ड्यात टाकून पाणी टाकून ठेवतो.
*
असे रोजच होऊ लागते. शेजारचे अंधाऱ्या रात्री कचरा टाकून जात अन हा खराटा घेऊन तो खड्ड्यात टाकून ठेवत असे. हळूहळू त्या खड्ड्यातील कचऱ्याचे मस्त सेंद्रिय खत तयार होते. ते खत तो बागेतल्या फळझाडांना टाकत राहतो. त्यामुळे लवकरच त्या झाडाला मस्त फळे येतात.
अन त्या दिवशी तो एक धमाल निर्णय घेतो.
नेहमीप्रमाणे रात्री शेजारचे कचरा टाकून जातात. तो हा कचरा गोळा करून शोष खड्ड्यात टाकतो. अन सकाळी उठल्यावर त्या बागेतली झकास अशी तयार झालेली फळे तोडून एका टोपलीत भरून ती टोपली घेऊन शेजारच्या घरी जातो. बेल वाजवतो. आतून तिथली मंडळी पिप होलमधून पाहतात तर हा तरुण दिसतो. ते शेजारी गडबडतात की आता भांडायला आला की काय ? असं म्हणून ते भांडणाच्या तयारीत दार उघडतात तर समोर हा तरुण हसतमुखाने हातातली फळाची टोपली त्या शेजार्याला देतो.
शेजारी चकित होतो. शेवटी ओशाळून तोच म्हणतो की, “आम्ही रोज कचरा टाकत होतो तरी तुम्ही भांडण करत नाहीत तर उलट आम्हालाच फळे द्यायला आलात. हे कसे काय?”
तर तो तरुण म्हणाला,
ज्याच्याकडे जे असते ते तो देत असतो.
तुमच्याकडे कचरा होता तो तुम्ही दिला. माझ्याकडे फळे होती ती मी दिली,
उलट यामध्ये पण तुमचेच आभार मानेल की तुम्ही दिलेल्या कचऱ्यामुळे माझ्या झाडाला लवकर फळे आली. थँक्स”
असं बोलून शांतपणे तो तरुण निघून येतो.
*
डीडी क्लास : मित्रमैत्रिणींनो, एक नेहमी लक्षात ठेवा, तुम्हाला सुखी व्हायच असेल तर एकच गोष्ट विसरू नका. कर्मा रिटर्न्स हे तर असतंच. तुम्ही चांगले केले तर त्याचे फळ चांगले मिळणार, मात्र त्याचवेळी समोरच्याने वाईट कृत्य केले तरी त्याला माफ करून त्याच कृत्यातून पॉजिटीव्ह असे काहीतरी काय करता येईल हे पहा. (जसे त्या तरुणाने कचऱ्याचे खत केले) मग तुमच्या मनाला शांतता लाभेल. चिडचिड होणार नाही.
“अमुकने माझ्या आयुष्याचे वाट्टोळे केले”
असं काहीजण म्हणतात. पण त्यात तथ्य नसते. कुणीच कुणाचे असे वाट्टोळे करत नसतो तर तुम्हीच काहीतरी वाईट कर्म केलेले असते तर तेच रिटर्न तुमच्याकडे आलेले असते. हे कळले तर जीवन सुखकर होईल.
कर्म हे असे एक हॉटेल आहे, जिथे ऑर्डर द्यावी लागत नाही.
तिथे तुम्हाला तेच मिळते जे तुम्ही शिजवलेले असते.
कुठेतरी मस्त ऐकण्यात आलेलं ते शेवटी सांगतो अन थांबतो.
“दाग तेरे दामन के धुले न धुले
नेकी तेरी कही तुले न तुले
मांग ले गलतियो की माफी
कभी तो खुद से ही
क्या पता ये आँखे
कल खुले न खुले !
लेखक : श्री धनंजय देशपांडे
प्रस्तुती – श्री अनंत केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈