आज ५ नोव्हेंबर-— चोखंदळपणे एका वेगळ्याच वाटेवरून जात, मराठी साहित्यात निसर्गसाहित्याची अनमोल भर घालणारे वन्यजीव अभ्यासक श्री. मारुती चितमपल्ली यांचाआज जन्मदिन.( सन १९३२ ) वनाधिकारी म्हणून ३६ वर्षे केलेल्या नोकरीसह आयुष्यातली ६५ वर्षे जंगलांच्या सान्निध्यात राहून, तेथील प्राणीजीवन , आणि त्या जीवनातले बारकावे टिपून, ते आपल्या अतिशय ओघवत्या शैलीत, बारकाव्यांसहित रेखाटणारे त्यांचे लेखन वाचकांना आवडायलाच हवे असेच— याचे कारण असे की, याविषयीच्या तपशीलवार माहितीला त्यांच्या लालित्यपूर्ण लेखनशैलीचे सुंदर कोंदण लाभलेले आहे.
“ क्षणोक्षणी पडे, उठे परि बळे, उडे बापडी —-” ही कविता आपल्यापैकी बऱ्याच जणांनी शाळेत शिकलेली आहे. पण त्यातले अतीव कारुण्य मनाला अतिशय भिडल्यामुळे जंगलातील पक्ष्यांबद्दल कमालीची आस्था आणि ओढ वाटून, त्या प्राणी-पक्षी यांच्या विश्वाची सखोल माहिती मिळवायची, आणि जनसामान्यांपर्यंत ती आपल्या लिखाणाच्या माध्यमातून पोहोचवायची, हाच आयुष्यभराचा ध्यास घेणारे श्री. चितमपल्ली हे एक विरळेच व्यक्तिमत्व. घरच्यांबरोबर रानवाटा तुडवता तुडवता त्यांना लहानपणापासूनच पक्ष्यांची आणि वन्य प्राण्यांची खूप माहिती मिळाली होती. आणि त्याच जोडीने त्याबाबतच्या त्यांच्या मामाच्या अंधश्रद्धाही समजल्या होत्या. पण चितमपल्ली यांचे वैशिष्ट्य हे की, स्वतः अशा कुठल्याही अंधश्रद्धेचा बळी न होता, त्या माहितीचा त्यांनी संशोधनासाठी उपयोग केला. वने, वन्यप्राणी, वन्यजीव व्यवस्थापन, पक्ष्यांचे विशाल जग, याविषयी त्यांनी उल्लेखनीय संशोधन केले आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यासंदर्भात निबंध-वाचनही केले. नोकरीदरम्यान विख्यात पक्षीतज्ज्ञ डॉ.सलीम अली यांच्यासोबत त्यांनी अनेक ठिकाणची जंगलं अक्षरशः पिंजून काढली होती. आणि पुढे वन्यजीवन संवर्धनासाठी जनजागृती व्हावी म्हणून चळवळही सुरु केली होती. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे संचालकपदही त्यांनी भूषवलेले आहे. राज्य वन्यजीव संरक्षण सल्लागार समितीचे ते सदस्य होते. सन २००६ मध्ये सोलापूर येथे झालेल्या ८३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
त्यांचे एक खूप मोलाचे काम म्हणजे, त्यांनी जंगल आणि त्याभोवतीचे विश्व यातील कितीतरी घटकांना नवी नावे दिली. या मूळ तेलगूभाषिक माणसाने मराठीच्या समृद्ध शब्दवैभवात आणखी सुमारे एक लाख शब्दांची मोलाची भर घातलेली आहे. पक्षीशास्त्रातल्या अनेक इंग्लिश संज्ञांचे त्यांनी मराठी नामकरण केलेले आहे. उदा. कावळ्यांची वसाहत- ज्याला इंग्लिशमध्ये rookery असे म्हणतात, त्याला त्यांनी ‘ काकागार ‘ असे समर्पक नाव दिले. तसेच ‘ सारंगागार ‘ हे बगळ्यांसारख्या पक्षांच्या विणीच्या जागेचे नाव. फुलांच्या बाबतीत घाणेरीला ( टणटणी )
‘ रायमुनिया ’, बहाव्याला ‘ अमलताश ‘ ही नावे त्यांच्यामुळेच लोकांना माहिती झाली आहेत.
“ आनंददायी बगळे “ ( संस्कृत साहित्यातील काही पक्षी ), “ घरट्यापलीकडे “, “ जंगलाचं देणं “,
“ निसर्गवाचन “, “ पक्षीकोश “, “ रानवाटा “, “ शब्दांचं धन “, अशी त्यांची कितीतरी पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत. यापैकी “ पक्षी जाय दिगंतरा “ ही त्यांची अतिशय प्रसिद्ध साहित्यकृती आहे.
त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यापैकी काही असे—भारती विद्यापीठाचा जीवनसाधना पुरस्कार, सहकार महर्षी साहित्य पुरस्कार, ‘ रानवाटा ‘ या पुस्तकासाठी उत्कृष्ट साहित्यनिर्मितीचा राज्य पुरस्कार, भैरू रतन दमाणी साहित्य पुरस्कार, म. रा. मराठी विभागाकडून ‘ विं. दा. करंदीकर जीवनगौरव पुरस्कार “, “ १२ व्या किर्लोस्कर चित्रपट महोत्सवाचा जीवनगौरव पुरस्कार “ इ .
पुण्याची ‘अडव्हेंचर’ ही गिर्यारोहण संस्था ‘ मारुती चितमपल्ली निसर्गमित्र पुरस्कार ‘ देत असते.
“ मारुती चितमपल्ली : व्यष्टी आणि सृष्टी “ हे पुस्तक त्यांच्यावर लिहिले गेले आहे.
विशेष सांगायला हवे ते हे की, मराठी, तेलगू, गुजराती, उर्दू, जर्मन, आणि रशियन एवढ्या भाषा तर त्यांना अवगत होत्याच, पण परंपरागत पद्धतीने संस्कृत साहित्याचा अभ्यास केलेला असूनही, वयाच्या ८४ व्या वर्षी कालिदास संस्कृत विद्यापीठाचा “ प्राचीन भारतीय साहित्यातील पर्यावरण “ हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केला.
असं विविधांगी व्यक्तिमत्व असणाऱ्या श्री. मारुती चितमपल्ली यांना आजच्या त्यांच्या जन्मदिनी अतिशय आदरपूर्वक वंदन.
☆☆☆☆☆
आज ज्येष्ठ साहित्यिका श्रीमती शकुंतला गोगटे यांचा स्मृतिदिन.( १९३० – ५/११/१९९१ ) श्रीमती गोगटे यांनी अनेक कादंबऱ्या, लघुकथा संग्रह असे विपुल लिखाण केलेले आहे. त्यांचे बरेचसे लिखाण सामाजिक विषय डोळ्यांसमोर ठेवून केल्याचे जाणवते. त्यातही, पांढरपेशा मध्यमवर्गाचे जीवन रंगवलेले दिसते. बूमरँग, मर्यादा, सारीपाट, अभिसारिका, समांतर रेषा, त्याला हे कसं सांगू?, सावलीचा चटका, माझं काय चुकलं, मी एक शून्य, दोघी, मना तुझा रंग कसा, झंकार, ही आणि त्यांनी लिहिलेली इतर पुस्तके वाचकांच्या पसंतीस पूर्णपणे उतरलेली आहेत. त्या “ सर्वोत्कृष्ट स्त्री लेखिका “ म्हणून ओळखल्या जात होत्या.
श्रीमती शकुंतला गोगटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली
☆☆☆☆☆
सुश्री मंजुषा सुनीत मुळे
ई – अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : – १) कऱ्हाड शिक्षण मंडळ “ साहित्य-साधना दैनंदिनी. २) माहितीस्रोत — इंटरनेट
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
बलिप्रतिपदा! दीपावलीच्या उत्सवातील हा तिसरा दिवस. कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजेच बलिप्रतिपदा. बलिराजाच्या स्मरणार्थ साजरा होणारा दिवस. कोण हा बलिराजा? पौराणिक कथेनुसार हा अत्यंत सत्वशील,दानशूर असा हा राजा. पण गर्वाने धुंद झालेला.तो दानशूर असल्याने दिलेला शब्द पाळत असे.त्याच्या या गुणाचा फायदा घेऊन भगवान विष्णूंनी त्याचे गर्वहरण केले.त्यांनी बटू वामनाचा अवतार धारण केला व भिक्षा मागण्यासाठी बलिराजाकडे गेले.त्यांनी त्याच्याकडे फक्त तीन पाऊले जमीन मागितली.बलिराजाने ती देण्याचे वचन देताच विष्णूने भव्य रूप धारण केले.एक पाऊल स्वर्गात,दुसरे पृथ्वीवर ठेवले व तिसरे पाऊल कुठे ठेवू असे विचारले.तेव्हा आपला शब्द पाळण्यासाठी बलिराजाने आपले मस्तक पुढे केले.या संधीचा फायदा घेऊन विष्णूंनी आपले पाऊल त्याच्या मस्तकावर ठेवून त्याला पाताळात गाडले व आपले अवतार कार्य पूर्ण केले.मात्र त्याच्या अंगी असलेल्या सद्गुणांची कदर करून त्याला पाताळाचे राज्य देऊ केले व आपण स्वतः या राज्याचे द्वारपाल बनले.त्याच्या सद्गुणांची पुढील पिढ्यांना जाणीव असावी म्हणून हा दिवस त्याच्या नावाने साजरा केला जाईल असे वरदानही दिले.तो हा दिवस.त्याच्या प्रजा हित कारक वृत्तीमुळे आजही ‘इडा पीडा टळो आणि बळीराजाचे राज्य येवो’ अशी प्रार्थना केली जाते.कितीही सद्गुण अंगी असले तरी एखादा दुर्गुण सुद्धा त्या गुणांवर मात करतो व विनाशाला कारणीभूत होतो याचे हे उदाहरण म्हणावे लागेल.
हा दिवस वेगवेगळ्या प्रांतात वेगळ्या नावाने व पद्धतीने साजरा केला जातो. खरे तर हा शेतक-याचा सण. शेतकरी झेंडूच्या माळांनी जनावरांचा गोठा सुशोभित करतात. काही ठिकाणी शेणाचा गुराखी, गवळणी, कृष्ण, पाच पांडव केले जातात.आगरी समाजात शेणाच्या गोळ्यांचा बळीराजा केला जातो.तांदूळाच्या पिठाच्या रांगोळ्या काढल्या जातात. धनगर समाज आपल्या मेंढरांचे कौतुक करतो तर आदिवासीही आपल्या पशूधनाकडे विशेष लक्ष देतात. संपन्नतेच्या या दिवसांत ज्यांच्यामुळे संपन्नता आली त्या पशूधनालाही आनंदात सहभागी करून घेतले जाते. हीच आपली कृषी संस्कृती आहे.आपले सगळे सण उत्सव हे निसर्गाशी निगडीत असे आहेत आणि ते तसेच ठेवण्याचे आपले प्रयत्न असले पाहिजेत.
उत्तर भारतात हा दिवस नवीन विक्रम संवत म्हणून साजरा होतो. तसेच काही ठिकाणी गोवर्धन पूजाही केली जाते. पक्वान्न व मिठाई मोठ्या प्रमाणात अर्पण केले जातात. त्यामुळे याला अन्नकूट असेही म्हणतात. काही ठिकाणी बलिराजा व त्याची पत्नी विंधावली यांचे चित्र काढून पूजा केली जाते.
याच दिवशी पार्वतीने महादेवाना द्यूतात हरवले.म्हणून ही द्यूतप्रतिपदा.
कृषी संस्कृतीतील नव्या आर्थिक वर्षाची सुरूवात होण्याचा हा दिवस.व्यापारी मंडळीही आदले दिवशी म्हणजे अमावस्येला लक्ष्मीपूजन झाल्यावर प्रतिपदेला हिशेबाच्या नव्या वह्यांचे पूजन करतात व नवे आर्थिक व्यवहार सुरू करतात.नवीन आर्थिक वर्षाचा पहिला दिवस असल्याने गुढी पाडव्याप्रमाणेच या दिवसाचे महत्त्व आहे. त्यामुळे या दिवसाला दिवाळी पाडवा असेही म्हणतात. आपल्या संस्कृतीत शुभ मानल्या गेलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा अर्धा मुहूर्त. या मुहूर्तावर सोने तसेच नव्या वस्तुंची खरेदी, गुंतवणूक केली जाते. या शुभदिनी पत्नी आपल्या पतिला ओवाळते व ओवाळणीच्या रूपात पती पत्नीला भेटवस्तू घेऊन देतो. नव विवाहीत मुलीच्या माहेरी विवाहानंतरच्या पहिल्या दिवाळीला जावयाला व त्याचे आप्तेष्टांना बोलेवले जाते. त्यांचा विशेष आदर सत्कार केला जातो. भेटवस्तू दिल्या जातात. पहिली दिवाळी दिवाळसण म्हणून दणक्यात साजरी होते. बदलत्या काळानुसार भेटवस्तूचे स्वरूप बदलत गेले तरी त्यामागील भावना मात्र टिकून आहेत हेच आपल्या भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे.
हा दिवाळी पाडवा आणि नूतन वर्ष सर्वांनाच आनंदाचे ,सुखसमृद्धीचे जावो. निसर्गावर मात करण्यापेक्षा निसर्ग मित्र बनून आपल्या मूळ संस्कृतीचे जतन करण्याचा संकल्प करू! शुभ दीपावली !
☆ गोव्यातील नरकचतुर्दशी.. ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे ☆
आपण जशी आतुरतेने दिवाळीची वाट पहात असतो तशी गोवेकर मंडळी दिवाळीची वाट पहात असतात.
गोवा म्हटले की आपल्याला तिथला ख्रिसमसची आठवण होते तसे इथल्या दिवाळीचे वेगळेपण आहे गोव्यात गणेशोत्सव प्रमाणे दिवाळी उत्साहाने साजरी केली जाते उत्तर प्रदेशात दसऱ्या दिवशी रावणाचे दहनकेलं जातं तसं नरक चतुर्दशी दिवशी नरकासुराच्या प्रतिमेचे दहन करण्याची प्रथा गोव्यात आहे.एक वर्ष गोव्यात असताना हा सोहळा पहाण्याचा योग आला.
दिवाळीच्या पूर्वसंध्येला नरकासुराच्या प्रतिमा उभारल्या जातात. ह्या प्रतिमा अगदी ऐंशी फुटापर्यंत आणि अक्राळविक्राळ बनविल्या जातात अशी माहिती मिळाली. पुण्यातील गणेश उत्सवाप्रमाणे ढोल,ताशा झांजे गजरात मिरवणूक काढली जाते., त्यांची स्पर्धा ठेवली जाते. या प्रतिमा तयार करण्यासाठी घराघरातून वर्तमानपत्र रद्दी व कागद गोळा केले जातात., तसेच थर्माकोलचा वापरही केला जातो.ही प्रथा शेकडो वर्षापासून .सुरू आहे. गोवा मुक्ती संग्रामानंतर नरकासुराच्या प्रतिमेचे दहन केले गेले आणि पुढे ही पद्धत सुरू झाली अशी माहिती मिळाली.
पूर्वी दिवाळीच्या सुमारास भाताचे पीक निघाले की शेतातील तण, घराच्या आजूबाजूचे गवत,सुका पालापाचोळा यापासून नरकासुराच्या प्रतिमा तयार करत यातूनच आजचे नरकासुराचे महाकाय रूप तयार झाले.
गोव्यामध्ये पणजी, मडगाव,फोंडा, म्हापसा वास्को याठिकाणी मोठमोठ्या प्रतिमा उभ्या केल्या जातात. हल्ली कारखान्यात मुखवटे बनवले जातात , काही कुटुंबे नरकासुराचे मुखवटे तयार करण्याचे काम करतात. नरकचतुर्दशीला श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला म्हणून दिवाळीच्या पूर्वसंध्येला उभारलेल्या नरकासुराच्या प्रतिमेचे नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे दहन करतात .हा सोहळा पाहण्यासाठी खूप लोक येतात. त्यानंतर अभ्यंगस्नान करून दिवाळीचा फराळ केला जातो. दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव, नात्यांचा उत्सव तसाच खाद्यपदार्थांचा उत्सव आहे. फराळ म्हटले की लाडू करंजी ,चकली, शंकरपाळी आलीच.पणगोव्यात पहिल्या दिवशी मात्र फोवच म्हणजे पोह्यांचे पांच प्रकार करतात.गोडाचे पोहे त्यात गुळ आणि ओला नारळाचा चव घालतात,तिखसे फोव हिरव्या मिरच्या व ओले खोबरे घालून करतात,ताकाचे फोव ताकातभिजवून त्यात मिरची कोथिंबीर घालतात, आगीचे फोव म्हणजे सोलकढीत भिजवलेले आणि फोटो फोव फोडणी करून केलेले पोहे . हा फराळ करून मग एकामेकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या जातात. हल्ली बऱ्याच घरात दिवाळीचा फराळ आपल्या सारखा बनवला जातो.
ह्या काळात सुट्टी असल्यामुळे पर्यटक हा सोहळा पाहण्यासाठी गर्दी करतात.आणि या आगळ्यावेगळ्या सोहळ्याचा आनंद लुटतात.
मित्र हो, शारदारमणांची सेटी बघितलीत आपण ? थोडी-थोडकी नाही, चांगली पन्नास हजारांची सेटी आहे. एकदा तरी बघून याच आपण!
शारदारमण म्हणजे आपले ते हो, गेल्या वर्षी सर्वाधिक शब्द (४०,४०, ०००) वर्षात लिहिले, म्हणून गिनीज बुकमध्ये ज्यांचं नाव नोंदवलं गेलं. होतं ते. त्यानंतर गप्पा-टप्पा करताना त्यांची मित्रमंडळी म्हणाली, ‘तुमचा कविता संग्रह छापलेला नाही आहे, हे काही बरोबर नाही. जर तो छापला गेला असता, तर जास्तीत जास्त कविता लिहिणारा कवी म्हणून तुमचं नाव गिनीज बुकात छापलं गेलं असतं.’ त्याच बैठकीत शारंचा कविता संग्रह छापण्याची गोष्ट नक्की केली गेली. कविता संग्रह छापायचा आणि त्याचा प्रकाशन समारंभही धुमधडाक्यात करायचा, हे मित्रांनी नक्की केलं. सर्व मित्रांनी आपणहून ती जबाबदारी पत्करली.
शारंच्या १५० कवितांच्या १५-१६ झेरॉक्स प्रती काढल्या गेल्या. वेगवेगळ्या प्रकाशनांकडे पाठवण्यासाठी. त्या मौज, मेहता, राजहंस इ. प्रकाशकांकडे पाठवल्या गेल्या. हे मराठीतले दर्जेदार प्रकाशक मानले जातात ना!
त्यांचे सगळे दोस्त त्यांच्या कवितांच्या झेरॉक्सचा एक एक सेट घेऊन आपल्या परिचयाच्या प्रकाशनाला दाखवायला घेऊन गेले आणि शारं, पुढच्या संग्रहासाठी कविता लिहायला बसले. झेरॉक्सचा आणि दोस्तांच्या जाण्या-येण्याचा खर्च शारंनी करणं भागच होतं.
दुसर्या दिवसापासून शारं. रोज प्रकाशकाकडून येणार्या स्वीकृतीपत्राची वाट बघू लागले.त्यांनी ३६५ x २४ =८७६० इतके तास उत्तराची प्रतीक्षा केली परंतु ‘साभार परत’ शिवाय पोस्टातून काहीच येत नव्हतं. त्यांनी यापल्या दोस्तांना कविता संग्रहाचं काय झालं, म्हणून विचारलं. त्यांनी पुन्हा प्रकाशकांकडे जायचं ठरवलं. यावेळी त्यांनी शारं.कडून भाड्याची अर्धी रककांच घेतले होती. सगळी जण प्रेस कॉपी जशीच्या तशी घेऊन परतले. सगळे प्रकाशक म्हणाले, आम्ही कविता सग्रह फुकट छापत नाही. सुप्रसिद्ध कवींचाही… अगदी साहित्य अॅकॅडमीचे अवॉर्ड मिळालेल्यांचाही फुकट छापत नाही.‘
आता पैसे घालूनच काढायचा तर आपण आपल्या इथेच काढू ना!’ त्या दिवशी जोरजोरात चर्चा झाली आणि नक्की झालं, की आपण आपल्या इथेच संग्रह काढायचा. हजार प्रतींसाठी जास्तीत जास्त बारा- चौदा हजार खर्च येईल. प्रत्येक प्रतीची किंमत २५ रु. ठेवावी. प्रत्येक जण २५ प्रती विकेल. खर्च तर निघून जाईलच, काही फायदाही होईल. सगळ्यांनी सर्व प्रकारच्या सहकार्याचं आश्वासन शारं.ना दिलं कोणी मुद्रकाचा शोध घेईल, कुणी चित्रकाराचा. मुखपृष्ठाबरोबरच आतल्या प्रत्येक कवितेवर रेखाचित्र टाकायचे ठरले. त्यामुळे पुस्तक आकर्षक होईल आणि सहजपणे विकला जाईल. कोणी प्रेस कॉपी तपासण्याचे आश्वासन दिले।
शारं.नी पी.एफ. मधून नॉन रिफंडेबल कर्ज घेतले. नंदू मोरेने नवा नवा धंदा सुरू केला होता. त्याच्याकडे पुस्तके छाण्यास दिली. चर्चा अशी झाली, नवखा आहे. पैसे कमी घेईल. सावलतीने पैसे दिले तरी चालतील. पण नंदू धंद्यात बच्चा नव्हे, त्यांचा बाप निघाला. त्याने कधी कागदांसाठी, कधी प्लेटससाठी, कधी स्कॅनिंगसाठी अॅडव्हान्स म्हणून जवळ जवळ सार्या पुस्तकांचे पैसे आधीच उचलले.
सहा महिन्यांनंतर पुस्तक निघालं प्रकाशन समारंभ संपन्न झाला. हा समारंभ बाकी काही नाही तरी दहा-बारा हजार खाऊन गेला. प्रकाशन समारंभानंतर कवि संमेलंन झाले. त्यासाठी आस-पासचे शंभर कवी उपस्थित होते. उपस्थित कवींना शारं.चे कविता संग्रह भेट दिले गेले. विविध मासिकांना आणि नियतकालिकांना अभिप्रायासाठी पुस्तके पाठवली गेली. २०-२५ पुस्तके परिचितांना नातेवाईकांना भेट दिली गेली. ८००-९०० पुस्तके शारं.च्या बाहेरच्या खोलीत, कोपर्यापासून खोलीची अर्धी जागा अडवून राहिली, शारं.चे आत्तापर्यंत पुस्तकासाठी ५०,००० रुपये खर्च झाले होते. आम्ही तुमची २५ पुस्तके तरी विकूच विकू, असं म्हणणारे त्यांचे दोस्त आता तोंडही दाखवत नव्हते. वितरकांशी संपर्क केल्यावर त्यांनी ८५ते ९५ टक्के कमिशननी पुस्तके मागितली. कुणी तरी तर दीड रुपया किलो या रद्दीच्या भावात पुस्तके मागितली.
दिवस सरत होते. शारं.च्या दहा बाय दहाच्या खोलीत पुस्तकांचा डोंगर उभा होता. शारं. रोज ऑफिसमधून आले की तिकडे पाहून सुस्कारे टाकत.
काही दिवसांनंतर शारं.चं लक्ष त्या डोंगरावरून उडालं. मग त्यांच्या रमणीने मुलांच्या मदतीने तो डोंगर उतरवला. एकावर एक पुस्तक ठेवून, तीन लोक आरामात बसू शकतील, इतकी लांबी, रुंदी आणि ऊंची धरून पुस्तकांच्या ओळी बनवल्या.त्यावर प्लायवूडची पट्टी ठोकली. त्यावर फुलाफुलांचं डिझाईन असलेलं रेक्झीन ठोकलं.
आता कोणी शारं.च्या घरी गेलं, तर गंज चढलेल्या पत्र्याच्या खुर्चीवर बसायची पाळी त्यांच्यावर येत नाही. ते आरामात ५०,००० च्या सेटीवर बसू शकतात.
कुणी विचारतं, ‘काय नवी सेटी घेतलीत?’
‘हो ना!’ शारं.ची रमणी उत्तर देते.
‘पुस्तकांची चांगली कमाई झालेली दिसतीय!’
हो ना! ती उद्गारते. आपण बसलेली सेटी, ५०,००० ची आहे.
तेव्हा, मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आपण एकदा तरी शारदारमणांच्या सेटीवर बसून याच! .
अशी गीते गात शेणाने सारवलेल्या स्वच्छ अंगणात रांगोळी काढत आमची दिवाळी सुरू व्हायची. बांबूच्या कामट्या आणि रंगीत कागद वापरून केलेला आकाश कंदील घरावर उंच टांगलेला असायचा.
फराळाची सुरुवात शकुनाच्या करंजीनेच करायची असा जणू अलिखित नियम होता. त्यातही सुरुवातीला मोदकच करायचा गणपतीला नैवेद्य दाखवायचा हेही पूर्वापार चालत आलेले. करंजीचे पीठ म्हणजे रवा मैदा आई निरशा दुधात भिजवायची त्यामुळे करंजी खुसखुशीत व्हायची व सोवळ्यात राहायची. नरक चतुर्दशीला पहाटे देवाला नैवेद्य दाखवून मगच आम्हाला खायला मिळायची. करंज्या झाल्या की लगेच चिरोटे, शंकरपाळी, रव्याचे व बेसनाचे लाडू,
साध्या भाजणीची खमंग कडबोळी व विशिष्ट भाजणीची चकली तयार व्हायची. त्याच तळणीच्या तेलात चिवडा परतायचा की झाला फराळ संपन्न. दिवाळीच्या पहिल्या दिवशी आई दहीपोहे करायची व त्या दिवशी हवा तितका फराळ खा म्हणायची. नंतर मात्र ती देईल तितकेच आम्ही आनंदाने खात असू. घरोघरी फराळाची ताटे फिरत असत.
दिवाळी हा सणांचा राजा——–
मांगल्याचा, प्रकाशाचा, खमंग फराळाचा, गोड-धोड पक्वान्नांचा, जल्लोषी फटाक्यांचा, बाळगोपाळांनी कल्पकतेने साकारलेल्या किल्ल्यांचा, रंगीबेरंगी आकाशकंदीलांचा, भेट कार्ड देऊन साधणाऱ्या जिव्हाळ्याचा, झेंडूची फुले, आंब्याची पाने यांनी बनवलेले तोरण दाराशी बांधून सर्वांचे स्वागत करण्याचा, सुंदर सुंदर रांगोळ्यांचा, पणत्यांच्या दीपोत्सवाचा, कोर्या करकरीत कपड्यांचा, फुलांनी सुगंधित झालेल्या देवघराचा, जावईबापूंच्या दिवाळसणाचा, पाडवा , भाऊबीज साजरे करून त्यातील नात्यांचा गोडवा वाढवणारा , सर्वांना तृप्त करणारा हा सण.
उगारला चाळीमध्ये मुले किल्ला, आकाश कंदील व तोरणे करत असत. आम्ही मुली फराळ व रांगोळ्या यात आमचे कौशल्य दाखवत असू. सगळेच मध्यमवर्गीय पण मिळेल त्यात समाधान मानून आपले काम जास्तीत जास्त चांगले करायची धडपड सगळेजण करायचे.सांगलीचे एक काका दरवर्षी फटाके विकायला यायचे. त्यांच्याकडूनच वडील मंडळी. खरेदी करायचे. केवढा आनंद व्हायचा. मिळेल तो वाटा पुरवून पुरवून वापरायचा. बायका भाजणीचे पीठ, अनारसा पीठ, करंज्यांचे सारण, घरीच मन लावून करायच्या.” इन्स्टंट चा जमाना” अजून आलेलाच नव्हता.
वसुबारसेला दिवाळीची सुरुवात व्हायची. मूल झालेल्या प्रत्येक बाईने त्या दिवशी उपवास करायचा असे आई सांगायची. त्यामुळे आपली. मुलेबाळे आरोग्यसंपन्न व सुखासमाधानात राहतात असा तिचा दृढ विश्वास होता. संध्याकाळी गायवासराची पूजा प्रार्थना करताना वेगळा आत्मविश्वास यायचा.
धनत्रयोदशीला सगळ्यांच्या दिव्यांच्या वातीचे टोक दक्षिण दिशेला. त्याला मनोभावे नमस्कार केला की अपमृत्यु टळतो हे आजही पटत आहे. त्यादिवशी बायकांची दिवाळी असायची. सुवासिक तेल , शिकेकाई भरपूर गरम पाणी घेऊन साग्रसंगीत नहाणे व्हायचे. पित्त होऊ नये म्हणून गोड शिरा खायचा. दुपारी पाट , रांगोळी, उदबत्ती, एखादे पक्वान्न असे उदरभरण झाले की गोविंदविडा खायचा. अशी चैन असायची. एका दिवाळीला आजोळी चिकुर्डे येथे गेलो होतो. आजोबा नामांकित वैद्य असल्यामुळे त्यांनी मनोभावे केलेली धन्वंतरीची पूजा आजही आठवते.
नरक चतुर्दशीला पहाटे अभ्यंगस्नान केले नाही तर नरकात जावे लागते असा धाक असल्यामुळे सगळे पहाटे उठून अभ्यंग स्नान करीत असत. आई सर्वांना औक्षण करायची. मग नवे कपडे, वडील मंडळींना नमस्कार, त्यांनी तोंड भरून दिलेले आशीर्वाद, पोटभर फराळ, फटाके उडवणे, दुपारी सुग्रास भोजन, एखादी डुलकी संध्याकाळी थाटामाटात लक्ष्मी पूजन , हळदी कुंकू अशी धमाल असायची.
पाडव्याला पत्नीने पतीला सुवासिक तेल लावून आंघोळ घालावी व आंघोळ घालतानाच ओवाळावे अशी पद्धत होती. महागडी बक्षिसे देण्याची पद्धत नव्हती. बायका देखील हट्ट करत नव्हत्या. भाऊबीजेला बंदा रुपाया मिळाला की आम्ही बहिणी हुरळून जायचो. उगारला कानडी लोक खूप. भाऊबीजेच्या दुसरे दिवशी त्यांच्याकडे
“आक्कनतदगी ” म्हणजे “आक्काची तीज” अर्थात आक्काची तृतीया असे. त्यादिवशी भाऊ बहिणीला ओवाळून भेट देत असे .कधीकधी आम्ही दिवाळीला आमच्या मूळ गावी वाळव्याला जात असू. तिथे मोठ्ठ घर होतं. पडवीत गाई-म्हशी पाडसं होती. खूप मोठ्ठा ओटाहोता . तिथे गाईच्या ताज्या शेणा ने सारवून शेणाचे गोकुळ आम्ही बहिणी उत्साहाने तयार करत असू. गोप गोपी कृष्ण राधा तुळशी वृंदावन उखळ मुसळ जाते गाय वासरू सारे निगुतीने तयार करत असू. बलीप्रतिपदेला भलामोठा बळीराजा बनवताना मला फारच मजा यायची. पांडव पंचमीला पाच पांडव, द्रौपदी, कृष्ण, बलराम , राधा , सत्यभामा, रुक्मिणी , यशोदा, गोपी असे आठवून आठवून खूप पात्र॔ उभी करतांना दुपार होऊन जायची. आईचा स्वयंपाक तयार असायचा. मग आम्ही प्रत्येक पात्रासमोर शेणाची ताटली ठेवून सर्व जेवण वाढत असू.
त्यावेळी दिवाळीच्या पहिल्या दिवशी परटिणीचा मान असायचा. घरोघरी जाऊन ती पुरुषांना ओवाळायची. प्रत्येक जण यथाशक्ती ओवाळणी द्यायचे.
आता जमाना बदलला. जुने रीतिरिवाज मागे पडले. जागेची अडचण, वेळेची कमतरता, आधुनिकतेचे फॅड यामुळे दिवाळी साजरी करण्याच्या कल्पना बदलत चालल्या.सुट्टी त बाहेर भटकणे बाहेरचे खाणे सहली काढणे यात या पिढीला रस आहे. आनंदाच्या कल्पना बदलत चालल्या आहेत.” कालाय तस्मै नम:”
☆ दिवाळी कालची आणि आजची.. भाग –1 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆
भारतीय संस्कृती ही निसर्गाधिष्ठित तर आहेच,पण त्याचप्रमाणे विज्ञाननिष्ठ अशी महान संस्कृती आहे.सण , उत्सव हे ही निसर्गाला अनुसरूनच आहेत.
सगळ्या सणांचा राजा म्हणजे दिवाळी.दिव्यांच्या ओळी .तेल आणि वात यांची ज्योती तोच दीप.पूर्वी अंगणात दिव्यांच्या ओळी प्रज्वलित करत असत.आज जागे अभावी एखादी पणती आणि रंगबिरंगी लाईटच्या माळा लावलेल्या जातात.पूर्वी दारात अंगणात सौंदर्याचा साक्षात्कार आणि मांगल्याचे प्रतीक म्हणून सडा टाकून रंग भरून मोठमोठ्या रांगोळ्या काढल्या जायच्या.आज मोठ्या शहरात लहान जागेत कुंदनच्या तयार रांगोळ्या ठेवून हौस भागवली जाते.दिवाळी हा सण खरा कृषीवलांचा सर्वोच्च आनंदाचा सण. घरात आलेली धान्यलक्ष्मी हीच धनलक्ष्मी. गोठ्यात असंणार जित्राब गाई ,म्हशी, बैल ,वासरे यांची दिवाळी.सगळ्यांच्या कष्टातून आलेलं धन त्याची पूजा ही दिवाळी.70 वर्षापूर्वीची माझ्या आठवणीतली आणि आजची. दिवाळी यामध्ये खूप फरक पडलेला मी पहातेय. एकशे वीस वर्षापूर्वी कवी केशवसुतांनी दिवाळी छान वर्णन केली आहे भिंती रंगविल्या नव्या फिरूनिया केली नवी आंगणे…….. पूर्वी अंगणात मातीचे किल्ले छोटे गाव शेत केल जायचं. पण आज अंगण खूपच कमी ठिकाणी असली तरी आहे त्या जागेत सजावट करून कृत्रिम किल्ले आणून ठेवले जातात खरा लोकसंस्कृतीचा अभ्यास करायचा असेल तर खेड्यात जायला हवं. माझ्या लहानपणीची दिवाळी मला आठवते. शेणाने अंगण सारवून शेणाच्याच गवळणी, विहीर, जात ,दळणारी बाई असे अनेक प्रसंग, म्हणजे गावगाडा करायचा. शेतातील झेंडूचे फुले त्यावर खोचायची. रोज पहिलं काढायचं आणि नवीन करायचं पांडव पंचमी दिवशी पांडव, द्रौपदी, उठून बसलेला बळीराणा , त्यांच्यासमोर ताट,वाट्या भांडी सगळ शेतातच. त्या ताटांमधे थोडं,थोडं फराळाच घालायचं वरती जोंधळ्याच्या धाटांचा मांडव करायचा. मात्र शेणाची कधी घाण वाटली नाही. आज हे चित्र क्वचितच पहायला मिळेल. पूर्वी दिवाळीच्या अगोदर कामट्या आणून, तासून ,चिरमुरे कागद लावून आकाश दिवे घरी करत असत. आता बाजारात नवनवीन रंग बिरंगी आकाशदिवे मिळतात. वेळ आणि कष्टही वाचले. पूर्वी दिवाळीची अपूर्वाई म्हणजे नवीन कपडे. सर्वसामान्यपणे एक कपडा दांडीवर आणि एक अंगावर असे असायचे. त्यामुळे वर्षातून एकदा दिवाळीला नवीन कपडे घेणे असायचेच. आता कपडा आवडला की घेतला, असे नेहमीच कपडे घेणे चालू असते. त्यामुळे पूर्वीचा दिवाळीच्या कपडे खरेदीचा आनंद हा वेगळाच होता. आणखी महत्त्वाचा भाग म्हणजे फराळाचे पदार्थ. पूर्वी फराळाचे अनेक प्रकारचे पदार्थ करत असत . वर्षातून एकदाच सगळं व्हायचं. जवळच्यांना फराळाचे डबे द्यायचे असायचे. बारा बलुतेदारांना फराळ द्यावा लागायचा. आज शहरात आणि त्रिकोणी किंवा चौकोनी कुटुंबात ऑर्डरचे आणि मर्यादित पदार्थ असल्याने ते शक्य होत नाही. आता सर्व पदार्थ कायम मिळत असल्याने त्याचे अप्रूप वाटत नाही. पूर्वी दिवाळीची चाहूल लागली की सासरी गेलेल्या मुली माहेरासाठी आसुसलेल्या असायच्या. मायबापही मुली नातवंडे येणार, म्हणून मनाचे मांडे रचत असत. आता मुलींना माहेरी जाण्यापेक्षा कुटुंब आणि ग्रुपने ट्रीपला जाण्यात, मौजमजा करण्यात जास्त ओढ वाटते. पूर्वी दिवाळीला पाहुणे आले की आनंद व्हायचा तो एक नात्यांच्या गुंफणीचा उत्सव असायचा. विभक्त कुटुंबात पाहुणे येणे हे प्रमाण खूप कमी झालेलं आहे.
“जाशील रे मोऱ्या, जरा घोटभर चहा घे आणि मग निघ, काय ?”
“बरं, आता तुम्ही इतका आग्रह करताच आहात तर…”
“अरे माझं जरा कामं होतं, म्हणून म्हटलं चहा पिता पिता बोलू !”
“पंत, आज गंगा उलटी कशी काय वाहायला लागली ?”
“म्हणजे ?”
“पंत मी नेहमी तुमच्यकडे काहीतरी कामं घेऊन येतो, सल्ला मागायला येतो आणि आज….”
“अरे गाढवा, गंगेला सुद्धा कधीतरी वाटत असेल नां, प्रवाहाच्या उलट वहावं म्हणून ! ते सगळं असू दे, मला सांग तुझी ती चाळीतली दुसरी खोली रिकामीच आहे नां अजून, का कोणी भाडेकरू ठेवला आहेस ?”
“नाही पंत, अहो ती रिकामीच आहे. गावाकडचे पै पाहुणे आले की बरी पडते वापरायला !”
“हे बरीक चांगल झालं!”
“चांगल झालं म्हणजे ?”
“अरे चांगल म्हणजे, मला ती खोली जरा वापरायला देशील का ?”
“पंत, हे काय विचारण झालं ? काही सामान वगैरे ठेवायच होत का ?”
“हो रे मोऱ्या, दोन नवीन मोठे led tv ठेवायचे होते !”
“मग पंत, त्यासाठी आख्खी खोली कशाला ? माझ्या राहत्या घरी मी ठेवतो की !”
“अरे नुसते दोन tv नाहीत, आणखी बरंच सामान आहे रे !”
“बरंच सामान म्हणजे, मी नाही समजलो! आणि मुळात तुमच्याकडे एक tv ऑलरेडी असतांना हे दोन नवीन LED कशाला घेतलेत ?”
“आता तुला सार काही सविस्तर सांगतो. अरे आमच्या पमी आणि सुमीच लग्न आहे दोन महिन्यांनी, हे तुझ्या कानावर आलं असेलच !”
“हो, बायको म्हणाली मला तसं चार पाच दिवसापूर्वी. त्या दोघींचे लग्न एकाच मांडवात लागणार आहे म्हणून.”
“हो रे, माझे दोन्ही जावई मला खरोखरचं भले भेटले बघ, म्हणून तर एकाच मांडवात एकाच दिवशी दोघींची लग्न लागणार आहेत. एका लग्नाच्या खर्चात दोन लग्न !”
“हे चांगलंच आहे पंत आणि म्हणून मला वाटलं तुमचे पाहुणे वगैरे येणार त्यासाठी तुम्हाला खोली वापरायला हवी आहे.”
“नाही रे. अरे सध्या दिवाळी ऑफर चालू होती LED tv ची, एकावर एक फ्री ! म्हणून म्हटलं घेऊन टाकू एक सुमीला आणि एक पमीला !”
“अस्स होय, पण मग tv शिवाय आणखी काय काय सामान ठेवायचं आहे पंत त्या खोलीत ?”
“अरे सध्या दिवाळी मुळे offer चा नुसता सुकाळ आहे बघ ! सोफा कम बेडचा सेट घेतला तर त्यावर मोठ डायनींग टेबलं आणि आठ खुर्च्या मोफत ! बोल आहेस कुठे ? म्हणून म्हटलं…..”
“घेऊन टाकू सोफा कम बेडचा सेट, जो होईल पमीला आणि डायनींग सेट सुमीला, काय बरोबर नां ?”
“अगदी बरोबर बोललास मोऱ्या !”
“पण पंत, हे सगळं सामान जरी माझ्या खोलीत ठेवलं तरी माझी अर्धी खोली रिकामी….”
“रहाणार नाही, याची गॅरंटी देतो मी !”
“म्हणजे ?”
“अरे अजून मला त्या खोलीत एक मोठं गोदरेजच कपाट आणि त्यावर फुकट मिळणारी मोठी लाकडी शो केस ठेवायची आहे नां !”
“अरे बापरे, त्या वस्तूंची पण काही स्कीम चालू आहे का ?”
“हो ना रे मोऱ्या ! अरे गोदरेज कपाटावर एक लाकडी मोठी शोकेस फुकट आहे कळल्यावर म्हटलं घेऊन टाकू लग्नात द्यायला, एक….”
“सुमीला आणि एक पमीला, काय बरोबर नां ?”
“बोरोब्बर ओळखलंस मोऱ्या !”
“पंत तरी पण माझी खोली….”
“अजून सामान आहे म्हटलं !”
“काय ?”
“अरे अजून त्या खोलीत दोन मोठे टिबल डोर फ्रीज, दोन मोठे मायक्रो वेव्ह, दोन डिनर सेट, दोन व्ह्याकूम क्लीनर आणि दोन डिश वॉशर पण ठेवायचे आहेत, एकावर एक फ्री मिळालेले !”
“बापरे, म्हणजे त्या दोघींच्या नवीन संसाराला लागणाऱ्या सगळ्या वस्तू तुम्ही देताय म्हणा की.”
“अरे मला दोनच मुली आणि दोघींच्या घरच्यांनी काहीच मागितल नसलं, तरी आपण समजून नको का द्यायला ?”
“ते ही खरचं म्हणा ! पण पंत त्या दोघी लग्न लागल्यावर राहणार कुठे ?”
“अरे तुला सांगतो त्यांच्या रहायच्या जागेची सोय पण मीच करून ठेवली आहे !”
“काय सांगताय काय आणि ती कशी काय बुवा ?”
“अरे त्याच काय झालं विरारच्या एका बिल्डरची ऑफर होती, एका फ्लॅटवर एक फ्लॅट फ्री म्हणून, म्हटलं घेऊन टाकू एक सुमीला होईल आणि एक पमीला होईल !”
“खरंच कमाल झाली तुमची पंत ! पण तुम्हाला एक खाजगी प्रश्न विचारला तर राग नाही नां येणार ?”
“अरे मोऱ्या, राग कसला बोल तू बिनधास्त !”
“तसं नाही पंत, आता तुम्ही एवढा सगळा खर्च करताय तर त्यासाठी भरपूर पैसे पण लागले असतीलच नां ?”
“अर्थातच मोऱ्या ! अरे एकावर एक वस्तू किंवा जागा फुकट असली तरी पहिल्या वस्तूला पैसे हे मोजावेच लागले मला !”
“मी तेच म्हणतोय, तुम्ही तर गेल्या वर्षी म्युनिसिपालिटी मधून रिटायर झालात आणि इतका खर्च एकदम कसा काय झेपला तुम्हाला पंत ?”
“मला वाटलंच, तू हा प्रश्न नक्की विचारणार म्हणून ! अरे माझ्या या सगळ्या खर्चाची तरतूद आपल्या मायबाप महाराष्ट्र सरकारनेच केली आहे बघ !”
“ती कशी काय पंत ? मी नाही समजलो !”
“मोऱ्या, चाळीत कोणाला बोलू नकोस, तुला म्हणून सांगतोय ! अरे मला आपल्या राज्य सरकारच्या लॉटरीच दिवाळी बंपर सोडतीच दोन कोटी रुपयांचे पाहिलं बक्षीस लागलंय, आहेस कुठे ?”