(श्री राकेश कुमार जी भारतीय स्टेट बैंक से 37 वर्ष सेवा के उपरांत वरिष्ठ अधिकारी के पद पर मुंबई से 2016 में सेवानिवृत। बैंक की सेवा में मध्यप्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगढ़, राजस्थान के विभिन्न शहरों और वहाँ की संस्कृति को करीब से देखने का अवसर मिला। उनके आत्मकथ्य स्वरुप – “संभवतः मेरी रचनाएँ मेरी स्मृतियों और अनुभवों का लेखा जोखा है।” आज प्रस्तुत है आलेख की शृंखला – “देश -परदेश ” की अगली कड़ी।)
☆ व्यंग्य # 122 ☆ देश-परदेश – Brain Rot ☆ श्री राकेश कुमार ☆
आम बोल चाल की भाषा में हम दिन में अनेकों बार ये कहते रहते है, “दिमाग का दही” कर दिया या “भेजा खा गया” आदि। सामने वाला भी कह देता है, कि मेरे को अपना पेट थोड़े ही खराब करना हैं, जो तेरा बेकार वाला दिमाग खाऊंगा।
विगत वर्ष अंग्रेजी के पितामह ऑक्सफोर्ड ने तो brain rot को वर्ष “दो हजार चौबीस का शब्द” तक घोषित कर दिया था। जब ऑक्सफोर्ड किसी को प्रमाणिकता का सर्टिफिकेट जारी कर देवें, तो वो पूरे विश्व को मानना ही पड़ता हैं।
कुछ दिन पूर्व हमारे देश के सामान्य ज्ञान के शिरोमणि कार्यक्रम याने की “के बी सी” में भी इस बाबत प्रश्न दागा गया था। हमारे दिमाग की भी बत्ती जल गई कि ब्रेन रॉट किस बला का नाम हैं।
गूगल बाबा से तुरंत संपर्क किया गया, तो उसने भी जैसे का तैसा जवाब दे दिया।ये जो तुम्हारी हर बात जानने की जिज्ञासा से ही ब्रेन रॉट नामक रोग हो जाता हैं।
गूगल और यू ट्यूब के महासागर में दिन रात डुबकियां लगा कर बेफालतू का ज्ञान प्राप्त करने की होड़ ही ब्रेन ड्रेन के मुख्य कारण हैं। इसके अलावा व्हाट्स ऐप पर चौबीसों घंटे फरवर्डेड मैसेज को आगे से आगे फॉरवर्ड करने की अंध दौड़ तुम्हारे को ब्रेन रॉट से डेड ब्रेन तक जल्दी पहुंचा देगी।
वैसे, इस प्रकार के मैसेज को पढ़ते रहने से भी तो, ब्रेन रॉट ही होता हैं।
☆ स्त्री… विविध भूमिकांमधील…☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’ ☆
जागतिक महिला दिन !!!
स्त्री……. विविध भूमिकांमधील
सर्वप्रथम सर्व माता भगिनींना जागतिक महिला दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा आणि त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल त्रिवार वंदन !!!
आपल्या आयुष्यात स्त्रीया (महिला) कायम वेगवेगळ्या भूमिका पार पाडत असतात आणि आपले आयुष्य समृद्ध करत असतात. हे सर्व करताना त्यांना काय मिळतं याचा कितीही अभ्यास केला तरी पूर्णत्वाने ते मला कळेल असे म्हणणे धाडसाचेच होईल. “जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे।” हेच खरे. आज ‘जागतिक महिला दिनाच्या’ निमित्ताने आपल्या जीवनात मोलाची भूमिका बजावणाऱ्या काही प्रमुख नात्यांस या लेखाच्या माध्यमातून मानाचा मुजरा करीत आहे.
आई
आज हा लेख लिहिण्याचा प्रयत्न करु शकतोय कारण एक स्त्रीने (मातेने) मला जन्म दिला आहे. आपल्या आयुष्यातून स्त्री वजा केली तर आपले आयुष्य अर्थहीन होईल असे म्हटले तर वावगे होऊ नये. आई नुसता जन्म देत नाही तर ती आपली बाळाच्या जीवनास आकार देते. आई देताना काही हातचे राखून ठेवत नाही. जे शक्य असेल ते सर्व आपल्या बाळास देते आणि सर्व देऊनही भरुन पावते. या “जगात ‘रिती’ होऊनही ‘भरुन’ पावणारी” कोण असेल तर फक्त ‘आई’!! ‘आई’ या शब्दात सारे विश्व सामावलेले आहे. सर्व शास्त्रे, शस्त्रे, सुखदुःख आणि अध्यात्म ‘आई’ दोन अक्षरी शब्दात मावते. ज्याला संपूर्ण समाधान प्राप्त करायचे असेल त्याने समोरच्या मनुष्याची ‘आई’ व्हावे अथवा त्याला आपली ‘आई’ मानावे. ज्याला अध्यात्मात प्रगती करायची आहे त्याने सद्गुरुंना किंवा आपल्या आराध्य देवतेला ‘आई’ मानावे आणि स्वतःला ‘बालक’. सर्व ठिकाणी जर मातृभाव ठेवता आला तर कोणत्याही शस्त्र अथवा शास्त्राची गरजच पडणार नाही, असे वाटते. मनुष्याने सुखी होण्यासाठी एकतर ‘मातृभाव’ ठेवावा किंवा ‘पुत्रधर्म’ पाळावा. दोन्हीकडे कर्तव्यपूर्तीचे समाधान खात्रीने लाभते. सर्व महान संतांचा हाच अनुभव आहे. आपण तसा प्रयत्न करू. *
बहीण
आईनंतर सर्वात जवळचे नाते कोणते असेल तर ते बहिणीचे. बहीण लहान असावी की मोठी यावर वाद होऊ शकतो पण बहीण असावीच असे प्रत्येकाचे मत असेल असे खात्रीने वाटते. ताई आणि माई. घरात मोठी मुलगी असेल तर घराला आपसूक वळण लागते असे माझे मत आहे. जे आपण आई किंवा बाबांना सांगू शकत नाही ते आपण आपल्या बहिणीला नक्की सांगू शकतो. मन मोकळं करण्यासाठी सर्वात खात्रीचे, जवळचे कोण असेल तर बहीण. कारण तिच्यात आणि आपल्यातील वयाचे अंतर फार नसते त्यामुळे ती आपली मनःस्थिती अधिक सजगतेने समजून घेऊ शकते. कधी ती आपली ‘ढाल’ बनते तर कधी ‘तलवार’!! बहीण लग्न होऊन प्रथम सासरी जायला निघते तो क्षण भावाच्या आयुष्यातील सर्वात कसोटीचा !! जरी ती सासरी गेली तरी तिची नजर कायम आपल्या भावंडांवर असते. पुढे कालांतराने आई वडील नसले तरी बहिणीमुळे भावाला एकाकीपण येत नाही. ती आपल्या आयुष्यात सावली सारखी असते. ती शीतल छाया जरुर देते पण आपल्या आयुष्यात अडसर बनत नाही. द्रौपदीने हरि ला चिंधी बांधली आणि तिच्या आयुष्याचे ‘सोने’ झाले. *’बहिण अथवा भावासाठी आपल्या आयुष्याची ‘चिंधी’ करणाऱ्या अनेक बहिणी या जगात आहेत. आज आपण त्यांना वंदन करू.
पत्नी
एखाद्या स्त्रीसाठी सर्वात नाजूक आणि आव्हानात्मक भूमिका कोणती असेल तर पत्नीची. आपल्याकडे परंपरेनुसार स्त्रीच सासरी जाते. साधारण २० ते २२ वर्षे माहेरी राहिल्यावर लग्न होऊन दुसऱ्या घरी जायचे. तेथील सर्व माणसांना आपले मानायचे. पती, सासूसासरे, नणंद, दीर, आणि कुटुंबातील इतर नातेवाईक तसेच पुढे मुलांना समजून घेऊन त्यांच्याशी आपुलकीने सुसंवाद साधायचा. ते घर आपलं मानून आवश्यक ते सर्व त्या घरासाठी करायचे. एका अर्थांने त्या घराला घरपण द्यायचे. हे लिहायला, वाचायला सोपे नक्कीच आहे पण आचरणात आणायला तितकेच अवघड. इतकं सारं करीत असताना स्वतःचे भावविश्व जपायचे. इतकं सारं फक्त स्त्रीचं करु शकते.
*कार्येषु मंत्री करणेषु दासी|
भोज्येषु माता शयनेषु रम्भा ||
धर्मानुकूला क्षमया धरित्री |
भार्या च षाड्गुण्यवतीह दुर्लभा||*
(भावार्थ :- कार्यात मंत्री, गृहकार्यात दासी, भोजन करताना माता, संसारधर्म पाळताना रंभा, धर्मकार्यात अनुकूल आणि क्षमाशील पत्नी असावी. पण असे सहा गुण असलेली पत्नी मिळणे दुर्लभ आहे.)
वर सांगितलेल्या गुणांपेक्षा कितीतरी अधिक गुण आज प्रत्येक ‘पत्नी’ने आत्मसात केलेले असतात असं म्हटलं तर अतिशयोक्ती होऊ नये. पत्नी ‘पत्नी’ राहिलेली नाही तर ती आज सर्वार्थाने घराची पालनकर्ती झाली आहे असे म्हटले तर चुकीचे ठरु नये. आजच्या महिला दिनाच्या निमित्ताने आपण हे नातं निभावणाऱ्या सर्व स्त्रियांना वंदन करू.
लेक अर्थात मुलगी
“मुलगी शिकली तर सारे घर शिकते”असे बरीच घोषवाक्ये आपण ऐकतो. कुटुंबाचा विचार केला तर घरात मुलींचे स्थान खूप महत्वाचे असते. त्यातल्यात्यात बापलेकीचे नाते अधिक रेशमी आणि तितकेच उबदार. मुलगी जशी घराची शान असते तशी ती बाबाचा प्राण असते. खरं ती घराचं ‘नाक’ असते. ‘कालचा’ बाबा आणि ‘आजचा’ बाबा यात लौकीक अर्थाने फरक दिसत असेल पण लेकीच्या बाबतीतील आजचा बाबा अगदी तसाच संवेदनशील आहे आणि पुढेही राहील…. उलट तो अधिक भावुक झालेला दिसेल. ‘दमलेल्या बाबांची कहाणी’ त्या त्या घरात जितकी लेकीला उमगते तितकी खचितच दुसरं कोणाला उमगत असेल. मुलीचा जन्म झाल्यापासून ती सासरी जाईपर्यंत आणि त्यानंतरही ह्या नात्यात तसूभरही फरक पडत नाही. बालपणी ‘लाडकी बाहुली होती माझी एक…. ‘ म्हणून जोजवणाऱ्या बाबाला आपली ‘बाहुली’ कितीही मोठी झाली तरी त्याला ती ‘बाहुली’च वाटते. लेक चालली सासरला…. यातील वेदना आणि भावना फक्त एक बापच खऱ्या अर्थाने समजू शकतो. तिच्या मनात बाबासाठी एक खास रेशमी कप्पा कायम असतोच. आज या नात्यालाही वंदन करू.
मैत्रीण (स्त्री अथवा पुरुष दोघांची)
मैत्रीण :- स्पर्श न करताही जिला आधार, ज्याला आधार देता येतो तो मित्र अथवा मैत्रीण असे म्हटले तर सयुक्तिक होईल असे वाटते. आज अनेक स्त्रपुरूष सहकारी आहेत, एकत्र काम करतात त्यामुळे त्यांच्यात मैत्री होणे अधिक सहज. बदलत्या जीवनशैलीमुळे एखादी स्त्री पुरुषाला अधिक चांगले समजून घेत असेल. आज मैत्रीत कोणताही विषय वर्ज्य नाही. नीती नियमांचे, विधीनिषेधाचे नियम पाळून जेव्हां निकोप मैत्री केली होते, तेव्हा ते मैत्री न राहता त्याचे मैत्र कधी होते ते कळतही नाही. कृष्ण (युगंधर) आणि द्रौपदी (युगंधरा) हे आपल्यासाठी स्त्री पुरुष मैत्रीचा आदर्श आहेत.
खरंतर स्त्री अनेक नाती/भूमिका निभावत असते, मी इथे प्रमुख ‘नात्यां’चे वर्णन केले आहे. आज स्त्री काय करीत नाही असे नाहीच. मानवी जीवनाच्या सर्व क्षेत्रांना स्त्रीशक्तीने स्पर्श केलेला आहे. नुसतं स्पर्श न करता स्त्रीशक्तीने प्रत्येक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. चूल, मूल, कला, क्रीडा, शास्त्र, संरक्षण, अग्निशमन, नौकानयन, अग्निरथ/विद्युतरथ, प्रशासन, शिक्षण, राजकारण, धर्मकारण, सेवा, उद्योग, अशा विविध क्षेत्रात महिला अव्वल स्थानावर आहेत. याबद्दल या सर्व स्त्रिया आदरास पात्र आहेत.
लेखाचा समारोप करताना काही गोष्टी जाणीवपूर्वक नमूद कराव्याश्या वाटतात. आज आपण स्पर्धेच्या युगात आहोत. सामाजिक बंधने आज सैल होताना दिसत आहेत. समाज झपाट्याने बदलत आहे. स्त्रीला अनेक उपमा दिल्या जातात. *त्यामध्ये स्त्रीला प्रामुख्याने शक्ती म्हटले जाते आणि ते खरे देखील आहे. पण विज्ञान असे सांगते की शक्ति जर नियंत्रित नसेल तर अधिक घातक आहे. स्त्री शक्तीची अनेक उदाहरणे आपल्याला माहीत आहेत म्हणून ती मुद्दाम इथे देत नाही. शक्ति जर ‘स्वनियंत्रित’ असेल तर अधिक चांगले!! त्यासाठी संपूर्ण समाजाने यमनियम पाळले पाहिजेत असे सुचवावेसे वाटते.
श्रीसद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे एक वचन आहे. “आजपर्यंत धर्म टिकला तो घरातील स्त्रियांमुळेच!!!”* सर्व संतांनी स्त्रियांचे नेहमीच कौतुक केले आहे, त्यांचा आदर केला आहे. सर्व संतांनी कायम पुरुष जातीला उपदेश केला आहे पण स्त्रियांना उपदेश केल्याचे उदाहरण नाही. पुरुष मूलतः स्खलनशील आहे पण स्त्री संयमी आहे, मर्यादा पाळणारी आहे, असा त्यांना विश्वास आहे. आज स्त्रीमुक्तीबद्दल अनेक आंदोलने करणाऱ्या महिला दूरदर्शन वरील ‘अर्धनग्न’ जाहिराती बघून मूग गिळून गप्प बसतात, तेव्हा मनास खंत वाटते. उदाहरण द्यायचे झाल्यास एखादा सुगंधित फवारा मारला म्हणून परपुरुषाच्या मागे पळणाऱ्या अनेक स्त्रिया जाहिरातींमधून दाखवल्या जातात तेव्हा हा समस्त स्त्रीशक्तीचा अपमान आहे. पण यात आपला अवमान होतो असे स्त्रियांना वाटत असते तर अशा जाहिराती बनल्या नसत्या किंवा त्या प्रसारित झाल्या नसत्या. त्यांच्याविरुद्ध कोणी न्यायालयात गेल्याचे ऐकिवात आलेले नाही. #स्त्रीमुक्ती म्हणजे फक्त पेहरावबदल’ इतकाच अर्थ अभिप्रेत आहे का? पुरुषाने प्रत्येक स्त्रीचा तिच्या वयानुसार सन्मान करावा अशी आपली संस्कृती सांगते. मग ती कधी आई असेल, कधी बहीण असेल तर कधी मुलगी तर कधी आज्जी आणि स्त्रीनेही याच नात्याने प्रत्येक पुरुषाकडे पाहावे असा दंडक होता. पूर्वी स्त्रिया स्वतःची ओळख मी अमक्याची आई (उदा. राजूची आई) अशी करून देत असत. समाजात मातृत्वाला मूल्य होते, प्रतिष्ठा होती, आज पुन्हा याचीच गरज आहे असे जाणवते. आपल्या देशाला ‘माता’ मानणारा भारत हा एकमेव देश आहे. ‘स्त्रीशक्तीचा इतका मोठा गौरव खचितच कोणी केला असेल.. !’
आज समाजात काय चालू आहे, हे आपण सर्व उघड्या डोळ्यांनी बघत आहोत. पण ही स्थिती आपल्यालाच बदलावी लागेल. हे काम फक्त स्त्रियांनी करुन जमणार नाही तर ते प्रत्येक समाजघटकाचे दायित्व आहे. आजच्या महिला दिनाच्या शुभमुहूर्तावर प्रत्येक माता भगिनीस घरात आणि समाजात योग्य तो सन्मान मिळेल असा प्रयत्न आपण सर्वांनी करु.
☆ तीन अनुवादित लघुकथा – रक्षक की भक्षक / आई आणि माता / आज्ञाधारक – मूळ हिन्दी लेखिका : सुश्री मीरा जैन ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर☆
सुश्री मीरा जैन
१. रक्षक की भक्षक
हाय स्टँडर्ड साड्यांचं दुकान. एक बाई दुकानदाराशी साड्यांच्या किमतीबाबत बारगॅनिंग करत होती. त्यांच्या दुकानातील साड्यांच्या किमती फिक्स असतात. बारगॅनिंगचा काहीही उपयोग होत नाही, अशी त्या दुकानाची ख्याती होती. कुणी बारगॅनिंग करू लागलंच तर दुकानदार फटकन म्हणे, ‘आपल्याला जमत असेल, तर घ्या. जबरदस्ती थोडीच आहे?’ त्यामुळे त्या बाईच्या बारगॅनिंगकडे दुकानातले सगळेच जण कुतुहलाने पहात होते.
आताही दुकानदार आपल्या फिक्स रेटबद्दल पुन्हा पुन्हा संगत होता, पण ती बाई काही ऐकायला तयार नव्हती. अखेर तिचा विजय झाला. ५०००ची साडी तिने ४००० ला मिळवलीच.
ती जाताच दुकानातील बाकीच्या बायकांनी दुकानदारावर पक्षपात करत असल्याचा आरोप करत, त्याच्याशी भांडण काढलं. त्यावर हात जोडून दुकानदाराने आपल्या वागण्याचं स्पष्टीकरण दिलं, ’ आपलं म्हणणं अगदी योग्य आहे. पण आपणच निर्णय करा. मरू घातलेला काय करणार नाही? तुम्ही ती बाई आलेली गाडी पाहिलीत ना! त्यावर पिवळा दिवा होता. पोलिसांची गाडी…. मला याच वस्तीत राहयचा आहे. कामवायचं आहे आणि खायचंही आहे.
मूळ हिन्दी कथा – रक्षक या भक्षक
मूळ लेखिका – मीरा जैन
अनुवाद – उज्ज्वला केळकर
☆☆☆☆☆
२) आई आणि माता –
दहा वर्षाच्या राजूच्या एका हातात मोतीचुराचा लाडू होता आणि दुसर्या हातात तिरंगा झेंडा. राजू पळत पळत घरी येत होता, इतक्यात तो एका दगडाला थडकला आणि चिखलात पडला. त्याचा स्वच्छ गणवेश तर चिखलाने माखलाच, पण त्याच्या हाता-पायालादेखील खरचटलं. चेहरादेखील चिखलाने बरबटला होता. तो तसाच घरी आला. त्याला त्या अवस्थेत पाहिल्यावर उमा, त्याची आई प्रथम घाबरली. मग त्याला रागावत म्हणाली, ‘नीट बघून चालता येत नाही? चालताना असा कसा पडलास? अगदी गांवंढळ आहेस तू! ‘
त्यावर राजू म्हणाला, ‘मम्मी, माझ्या उजव्या हातात तिरंगा झेंडा होता. हा हात मी जमिनीवर टेकवला असता, तर कदाचित मला एवढं लागलं नसतं. पण माझ्या राष्ट्रध्वजाला चिखल लागला असता. मला ते नको होतं. माझ्या राष्ट्रध्वजावर चिखलाचा एक ठिपकाही पडणं, मला सहन झालं नसतं. ’
तिरंग्याबाबत राजूच्या मनात इतकी सन्मानाची भावना आहे, हे बघून, उमाचे डोळे भरून आले. तिला वाटलं आज आपल्या मातृत्वाचं सार्थक झालं. तिने राजूच्या डोक्यावर हात फिरवत म्हंटलं, ‘बाळा, तुझे विचार ऐकून मी अतिशय खूश आहे. माझं म्हणणं नीट ऐकून ठेव. तू तिरंगा नेहमीच स्वच्छ ठेवशील हे हीक आहे, पण जरी कधी दुसर्या कुणी याच्यावर चिखल उडवायचा प्रयत्न केला, तरी तू त्याचा प्रतिकार करायला हवास. आपला तिरंगा नेहमीच स्वच्छ, स्वस्थ आणि वर्चस्ववान राहील, याची तू काळजी घ्यायला हवीस!’
आईचं बोलणं ऐकल्यावर राजू आपलं सगळं दू:ख विसरून प्रफुल्लित आणि भाव-विभोर होऊन आपल्या आईकडे पाहू लागला. त्याला आपल्या आईमध्ये साक्षात् भारतमाता दिसू लागली होती.
मूळ हिन्दी कथा – माँ और माता
मूळ लेखिका – सुश्री मीरा जैन
अनुवाद – सौ. उज्ज्वला केळकर
☆☆☆☆☆
३) आज्ञाधारक
दोन गाढवांमध्ये वाद चालू होता. वादाचं कारण होतं, दोघांमधे कोण जास्त सुंदर आणि शहाणा आहे. वादातून जेव्हा काहीच निष्पन्न झालं नाही, तेव्हा ते दोघे निर्णयासाठी कोल्ही काकीकडे गेले. कोल्हीने दोघांचं बोलणं ऐकलं. मग ती म्हणाली, ‘मी याचा निर्णय दोन दिवसांनी देईन पण तोपर्यंत तुम्ही आपआपल्या घरात राह्यचं आणि मी सांगेन ते करायचं. दोघांनी कोल्हीची ही अट मान्य केली.
कोल्हीने दोन दिवस त्यांच्याकडून कठोर परिश्रम करून घेतले. दोघांनीही कुरकुर न करता, कोल्ही म्हणेल, ती ती कामे केली. आता कोल्हीला प्रश्न पडला, ‘कुणाला श्रेष्ठ म्हणून घोषित करायचं? कारण दोघेही रूप-गुण, अंग – बांधा, आज्ञाधारकता, सहनशीलता याबाबतीत सारखेच आहेत. निर्णयाचा क्षण जसजसा जवळ येत चालला, तशी दोन्ही गाढवांप्रमाणे कोल्हीच्या हृदयाची धडधडही वाढली. कुणाच्या बाजूने निर्णय द्यायचा? अचानक कोल्हीला एक उपाय सुचला. तिने दोन्ही गाढवांकडून वचन घेतलं, की ती एका चिठ्ठीवर निर्णय लिहून देईल. दोघांनीही तो कुठलाही वाद न घालता मान्य करायचा आणि या निर्णयाबाबत दोघांनीही जीवनभर आपापसात काही बोलायचं नाही. ’गाढवांनी ते मान्य केलं।
कोल्हीने मग आपला निर्णय तोंडी न सांगता चिठ्ठ्या लिहिल्या आणि दोन्ही गाढवांना एकेक चिठ्ठी दिली. ते दोघेही आपापली चिठ्ठी वाचून अतिशय खूश झाले. या निर्णयाला अनेक वर्षे झाली पण आजही ते, त्या दिवसाइतकेच खूश आहेत. त्या दिवशी त्या दोघाच्याही चिठ्ठीत कोल्हीने एकच वाक्य लिहिलं होतं, ‘तू जास्त सुंदर आणि शहाणा आहेस.’
मूळ हिन्दी कथा – आज्ञाकारिता
मूळ लेखिका – सुश्री मीरा जैन
अनुवाद – सौ. उज्ज्वला केळकर
☆☆☆☆☆
अनुवादिका –सौ. उज्ज्वला केळकर
संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३ सेक्टर – ५, सी. बी. डी. – नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र
धोबी गल्लीतलं अगदी मध्यावरचं चार नंबरचं एक माडीचं घर म्हणजे ढग्यांचं घर. खरं म्हणजे त्या काळातलं ते एक स्वतंत्र कुटुंब असं म्हणायला काही हरकत नाही. संयुक्त कुटुंबाच्या तुलनेत लहानच परिवार असलेलं. म्हणजे आई वडील, पाच मुली आणि आजी असं आठ माणसांचं पण स्वतंत्र कुटुंब. कारण आजीला एकच मुलगा आणि त्याचाच हा संसार. तसं मराठमोळं, साधं, फारशी कठीण, कडक व्रतंवैकल्य न करणारं असलं तरी सांस्कृतिक परंपरा बऱ्यापैकी सांभाळणारं असं हे सुशिक्षित, सुसंस्कृत सभ्य कुटुंब आणि या कुटुंबाच्या केंद्रस्थानी होती ती पिकल्या केसांची, सुरकुत्या कायेची, गालावर एक ओघळता काळा मस असलेली, सावळी, ठेंगणी पण ताठ आणि चमकदार डोळ्यांची आजी.
काळाने अनेक बऱ्या, वाईट, कडू गोड प्रसंगाने तिला अक्षरश: झोडपून काढले होते. पण त्या वादळातही टिकून राहिलेली ती एक ठिणगी होती. प्रस्थापित रूढी, रिती, परंपरा यांच्याशी सतत वाद घालत तिने आयुष्या विषयीची एक स्वतःचीच प्रणाली स्थित केली होती आणि तीच तेव्हां आणि नंतरही त्या कुटुंबाची परंपराच ठरली. जुन्यातलं सकारात्मक तेवढं तिने टिकवलं मात्र नकारात्मक ते सपशेल नाकारले. जे जाचक, प्रगतीला खिळ आणणारे, निरर्थक, केवळ गतानुगतीक असलेलं परंपरावादी तिनं स्व सामर्थ्याने लोटून दिलं आणि त्याचा एक वस्तूपाठवच तिने कुटुंबासाठी ठेवला. म्हणून ढग्यांचं कुटुंब हे वेगळं होतं.
आचार विचार सगळ्याच बाबतीत.
ढग्यांच्या आजीला पाच नातीं वरून खूप जण खिजवायचे. “म्हातारे, तुझा वंश बुडालाच म्हणायचं की!”
आजी इतकी खमकी होती, म्हाणायची,
“ मेल्या! तुझा मुलगा नाक्या नाक्यावर उनाडक्या करत फिरतो तो काय रे तुझ्या वंशाचे दिवे पेटवणार? माझ्या पाच नाती माझे पाच पांडव आहेत. बघशीलच तू. ” नंतर तो कुणी एक जण आजीच्या वाटेला कधीच गेला नाही.
गल्लीतल्या मीनाच लग्न जमत नव्हतं. कारण तिच्या पत्रिकेत कडक मंगळ होता. त्यामुळे पत्रिका जुळवण्याच्या पहिल्याच पायरीवर, आलेल्या स्थळाची पाठ फिरायची. मीना सुंदर होती. गोरीपान, सडपातळ, लांब काळेभोर केस. पलीकडच्या गल्लीतल्या एका मुलाचं मन तिने केव्हाच जिंकलं होतं. दोघेही एकमेकात अडकले होते पण तो खालच्या जातीतला, मीना कायस्थ. शिवाय पत्रिकेचा रेटा होताच. दोन प्रेमी विवाह बंधनात अडकण्याची शक्यताच नव्हती. आजीला जेव्हा हे कळलं तेव्हा दोघांच्याही घरातल्या बुजुर्गांना तिने चांगलंच सुनावलं. “कसली जात पात नि कसल्या पत्रिका पाहता? लग्नाच्या गाठी स्वर्गात जुळतात. जन्मभर मुलांना काय त्या परंपरेच्या बंधनात जखडून ठेवणार आहात का? एक पाऊल पुढे तर टाकून बघा. ”
आजीच्या बोलण्याने दोन्ही परिवारात मत परिवर्तन झालं की नाही माहीत नाही पण त्या दोन प्रेमिकांना मात्र धैर्य प्राप्त झाले आणि त्यांनी लग्नही केलं. त्यांच्या वेलीवर जेव्हा पहिलं फूल उमललं तेव्हां दोघंही प्रथम आजीचा आशीर्वाद घ्यायला घरी आले.
आजी तशी नास्तिक नव्हती. देवावर तिची श्रद्धा होती. घरातल्या खिडकीजवळच्या भिंतीवर एक सुंदर निळकंठाचा फोटो होता. घरातल्या प्रत्येक बाहेर जाणाऱ्या व्यक्तीने त्या फोटोला नमस्कार केल्याशिवाय बाहेर पडायचं नाही हा तिचा शिरस्ता होता. मात्र कोणी कधी विसरले तर त्याच्या माघारी ती स्वतःच त्या फोटोला दहादा नमस्कार त्याच्या वतीने करायची. आणि पुटपुटायची,
“ देवा याला क्षमा कर, याचं रक्षण कर. ”
तसे तिचे आणखी काही संकेत होते. शनिवारी नवे कपडे घालायचे नाही. उंबरठ्यावर किंवा जेवताना शिंक आली तर डोक्यावर पाणी शिंपडायचं. ” “वदनी कवळ घेता” म्हटल्याशिवाय जेवायचं नाही, नेहमी हसत खेळत जेवायचं, ताटातलं संपवायचं, मनातला राग जेवणावर काढायचा नाही. वगैरे अनेक.
ढग्यांच्या घरात गौरी, गणपती, ईद, नाताळ सगळ्यांचं स्वागत असे. खंडोबाची तळी भरली जायची. गुढी उभारली जायची, राम जन्म, कृष्णाष्टमी सगळं साजरं केलं जायचं. तेव्हा ती म्हणायची, “ जास्त खोलात जाऊ नये. आनंद मिळेल इतपत कराव सगळं. ”
नैवेद्य दाखवला नाही म्हणून घरातल्या लहान मुलांना तिने कधीही उपाशी राहू दिलं नाही. घरात हळदी कुंकवाचा समारंभ असेल तर ओळखी मधल्या विधवा स्त्रियांना ती सुनेला आवर्जून बोलवायला सांगायची.
शरीपा नावाची एक मुस्लिम स्त्री त्यांच्यासमोर राहायची. तिलाही आमंत्रण असायचं. हा हिंदू हा मुस्लिम, हा जातीचा हा परजातीचा, असा भेदभाव तिने कधीच पाळला नाही. मानवतेची नाती जपली.
फक्त पितृपक्षापुरताच नव्हे तर ती रोजच जेवायच्या आधी कावळ्याचा घास कौलावर जाऊन ठेवायची. कुणी विचारलं तर म्हणायची, ” आपल्या घासात या पशु पक्षांचाही वाटा असतोच ना?”
गाईला घास भरवताना, “ती गोमाता, देवता समान” इतकीच भावना राखली नाही तर मूक, अश्राप प्राण्याची भूक भागवण्याचा तिने प्रयत्न केला. “तहानलेल्या जीवाला पाणी द्यावं भुकेल्याला अन्न द्यावं” मग त्यावेळी तिने स्पृश्य अस्पृश्य काहीही मानलं नाही. परंपरा जपलीही, परंपरा मोडलीही.
सलाग्र्यांच्या घरी सवती सुभा फार होता. एक दिवस सलाग्रे ताईवर तिचा सावत्र मुलगा मुसळ घेऊन तिच्यावर धावून गेला तेव्हा आजीने वरच्यावर त्याचा बलदंड हात पकडला आणि त्याला चांगलेच सुनावले,
“काय रे गधड्या दर शनिवारी मारुतीच्या डोक्यावर तेल घालायला हनुमान मंदिरात जातोस ते या कर्मासाठी का? सावत्र आई असली तरी आईच आहे ना? तिनेच वाढवलं ना तुम्हाला आणि एका स्त्रीवर हात उगारतोस? तेही तोळाभर सोन्यासाठी? उद्यापासून मंदिराची पायरी चढलास तर खबरदार. ढोंगी कुठला!”
अशी नित्य नियमित पूजाअर्चा, व्रतं वैकल्यं, कडक उपास तपास करणाऱ्या लोकांवर तिची बारीक नजर असे. खरोखरच्या देवभोळ्यांना ती म्हणायची, ” एक दिवस तुझा देव तुला पावेल बरं”
नाहीतर बाहेर एक आत एक अशा लोकांना ती थेट सांगायची, ” कशाला कष्टवतोस स्वतःला? तुझा देवही दगड आणि तू ही दगड. ”
आजी कुणालाच घाबरायची नाही आणि ‘सत्याचा वाली परमेश्वर’ ही तिची श्रद्धा मात्र तिने कधीही सोडली नाही. ज्या हातात तिने बडगा घेतला त्याच हाताने तिने रंजल्या गांजल्यांना भरवले. प्रेमामृताचे घोट पाजले. सकारात्मक जपले आणि नकारात्मकतेला तिने पाठ फिरवली आणि आयुष्यभर तिने तिची ही वैचारिक परंपरा जपली. काळ मागे पडत असताना आणि काळ पुढे जात असतानाही..
आज ती नाही, तिचा लेक नाही, सून नाही. पण तिच्या नाती, पणत्या, पणतु, खापर पणत्या, खापर पणतु सारे आहेत आणि त्या सर्वांच्या जीवनात आजीच्या परंपरेचे अनेक थेंब तळी करून आहेत.
कुणी हे का? हे कसं? हे वेगळं आहे, असं म्हटलं तर त्यावर एकच उत्तर असतं, “हीच आमच्या आजीची परंपरा!”
☆ MMM… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुनिता जोशी ☆
कॉलेजला जाईपर्यंत मला MMM म्हणजे मालाडचा MM मिठाईवाला एवढच माहीत होतं!
पुढे आयुष्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा परिसस्पर्श झाला..
आणि MMM म्हणजे “मदन मोहन मालवीय” हे मला तेव्हा कळले…
गमतीने जनता MMM म्हणजे Money Making Machine म्हणत असे…
बनारस हिंदू विश्वविद्यालय बांधताना जमिनीपासून निधी पर्यंत… पंडित मदन मोहन मालवीय यांनी गोळा केलेली साधनसंपत्ती बघितली तर, मनी मेकिंग मशीनचा अर्थ कळतो!
सुमारे शंभर-सव्वाशे वर्षांपूर्वी, बनारस हिंदू विश्वविद्यालय उभे करण्यासाठी त्यांनी काही कोटीचा निधी अत्यंत प्रेमाने व कुशलतेने गोळा केला होता…
याच देणगीसाठी हैदराबादच्या निजामाला भेटले…
विश्वविद्यालयाच्या नावातील “हिंदू” हा शब्द नबाबाला खटकत होता…
पण निधीसाठी हिंदू या शब्दाशी तसूभरही तडजोड करायला पंडित मदन मोहन मालवीय तयार नव्हते.
समोर बसलेल्या पंडितजींकडे आपल्या पायावर घेतलेला पाय हलवत नवाब बोलत होता…
नबाबाच्या पायात मोजडी होती… एका अर्थी अप्रत्यक्षपणे नवाब पंडितजीना वहाण दाखवत होता.
पंडित जागेवरून उठले आणि अत्यंत नम्रतेने त्यांनी नबाबाच्या पायातली मोजडी काढून घेतली…
नबाबाने दुसरा पाय पुढे केला.. पंडितजीनी ती ही मोजडी काढून घेतली आणि बनारस हिंदू विश्वविद्यालयासाठी आपल्याकडून हीच देणगी असे मी समजतो म्हणून बाहेर पडले…
आपण पंडितजीना जोडे दिले या आनंदात, नवाब खुशीत गाजरं खात होता…
आणि तो पर्यंत नबाबाच्या कानावर बातमी येऊन धडकली.
पंडित जी त्याच्या मोजड्यांचा हैदराबादच्या भर चौकात लिलाव करणार आहेत…
नबाबाच्या अब्रूचं खोबरं व्हायची वेळ आली होती…
आणि खरंच दुसऱ्या दिवशी सकाळी पंडितजी… नवाबाच्या मोजड्या घेऊन लिलावासाठी हैदराबादच्या भर चौकात उभे राहिले…
लिलावाची बोली सुरू झाली…
नबाबाचा खास माणूस प्रत्येक बोलीच्या वर आपली बोली लावू लागला…
पंडितजीचे जिवलग सहकारी गर्दीतून नबाबाच्या खास माणसाच्या बोली च्या वर प्रत्येक वेळी बोली लावत होते…
अर्थात तशी योजना खुद्द पंडितजीनीच केली होती…
पंडितजीची अपेक्षा होती तेवढी बोली नबाबाच्या खास माणसाने लावली…
बहुदा ती तीन-साडेतीन लाखाच्या आसपास असावी…
पंडितजींनी आपल्या जिवलग सहकाऱ्यांना डोळ्याने इशारा केला..
बोली थांबली…
लिलाव संपला…
आपल्याच मोजड्या… तीन साडेतीन लाख रुपये मोजून नवाबाने हैदराबादच्या भर चौकातून खरेदी केल्या… आणि हो हे शे-सव्वाशे वर्षापूर्वीचे तीन साडेतीन लाख रुपये…
जेव्हा ६४ पैशांचा रुपया होता आणि एका रुपयाला ३२ नारळ मिळत होता.
“हिंदू” या एका शब्दासाठी आपल्या बुद्धीमत्तेचे सगळे कसब पणाला लावणारा…
☆ “है प्रीत जहाँकी रीत सदा !”☆ श्री संभाजी बबन गायके☆
त्याला फक्त एकच भाषा येत होती. आणि कामसुद्धा एकच माहीत होते…. जो पेशा स्वीकारला आहे त्या पेशातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आज्ञा जशाच्या तशा पाळणे. त्याने त्याच्या देशासाठी सीमा भागात रस्ते बांधणीसाठी आवश्यक सर्वेक्षण करण्याचे काम इमानेइतबारे केले. त्याच्या देशाचे आणि शेजारच्या देशाचे युद्ध झाले आणि संपले सुद्धा. तो काही बंदूक चालवणारा सैनिक नव्हता. त्याचे सर्वेक्षणाचे काम मात्र सुरूच राहिले.
आपल्या तंबूच्या बाहेर असाच फेरफटका मारायला तो बाहेर पडला आणि रस्ता चुकला आणि शेजारच्या देशाच्या हद्दीत पोहोचला. अन्नपाण्यावाचून बर्फाळ डोंगरात वाट शोधून थकलेला तो रेडक्रॉसच्या या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या लोकांना आसाम मध्ये दिसला आणि त्यांनी त्याला शेजारच्या देशाच्या सैन्याच्या हवाली केले… अर्थात हा देश म्हणजे आपला भारत ! ‘जीते हैं किसीने देश तो क्या, हमने तो दिलों को जीता है… ‘ अशी धारणा असलेला देश.
देशाच्या सुरक्षिततेचा प्रश्न म्हणून भारतीय यंत्रणेने या चिनी सैनिकावर हेरगिरीचा आरोप ठेवला आणि त्याच्यावर रीतसर खटला चालला आणि त्याची रवानगी सात वर्षांच्या तुरुंगवासासाठी करण्यात आली! यानिमित्त तो देशातील काही तुरुंग फिरला. शिक्षा संपल्यानंतर मात्र याला कुठे पाठवायचे असा मोठा प्रश्न उभा राहिला. का कुणास ठाऊक मात्र याला चीनला पाठवण्याचे प्रयत्न झाले नाहीत. चीनकडूनही तशी काही चौकशी करण्यात आली नसावी, बहुदा.
भारतीय पोलिसांनी याला मध्यप्रदेशातील तिरोडी या दुर्गम गावात सोडून दिले. भाषेचा अडसर अजूनही होताच. तो फक्त आपले नाव सांगू शके.. वांग की! त्याच्या नावाचा एक अर्थ होता… वांग म्हणजे राजा आणि की म्हणजे एकमेवाद्वितीय! आणि योगायोगाचा भाग म्हणजे तिरोडीच्या गावकऱ्यांनी त्याचे नामकरण केले राज बहादूर. ते त्याला नेपाळी किंवा पूर्वोत्तर राज्यातील माणूस समजले असावेत!
या चिनी राजाने मग तिरोडी जवळच्याच पीठ गिरणीत दळणाचे काम केले. काही पैसे जमा झाल्यावर गावातच दूध विक्रीचे एक छोटे दुकान सुरू केले. एकूणच दिसणे, स्वभाव आणि बोलणे वेगळे असल्याने गावकरी त्याच्याशी तसे प्रेमाने वागत असत.
हळूहळू हा आपला (नसलेला) भाई हिंदीचा भाई झाला… त्याला मोडके तोडके हिंदी समजू लागले. त्याला चीनमधील त्याच्या घराचा पत्ता माहित होता.. त्याने कित्येक पत्रे पाठवलीसुद्धा. पण त्याच्या पत्राचे पहिले उत्तर मिळायला तीस वर्षे लागली.
मध्ये बराच कालावधी गेल्यामुळे आणि वांगकडे कोणतीही कागदपत्रे नसल्याने न घर का न घाट का अशी त्याची अवस्था झाली होती. त्याला आपले भाऊ आणि आईची खूप आठवण येत असे… पण त्याच्यापुढे पश्चातापाशिवाय काहीही नव्हते. वांगच्या आधी दोन चिनी सैनिक भारतातल्या मनोरुग्णालयात सुमारे पस्तीस वर्षे होते. त्यांना कालांतराने म्हणजे २००३ मध्ये चीनच्या हवाली करण्यात आले!
सर्वांशी अदबीने, प्रामाणिकपणे वागत असल्याने वांगबद्दल कुणाची काही तक्रार नव्हती. त्याचे वागणेही संशयास्पद नव्हते. त्याचा गावातले लोक सोडून इतर कुणाशी संबंध नव्हता. स्थानिक पोलिस त्याची अधून मधून खबर घेत असत आणि त्याला माराहाण सुद्धा होई.
कालांतराने वांग याने त्या गावातल्याच सुशीला नावाच्या अतिशय गरीब मजूर मुलीशी विवाह केला.. कित्येक वर्षे तो अत्यंत गरीबीत राहिला. त्यात त्याने दोन मुली आणि एका मुलाला जन्म दिला.
वांगची कथा तशी कित्येकवेळा समाज माध्यमातून प्रसिद्ध झाली होती पण त्याकडे त्यावेळी फारसे कुणी लक्ष दिले नाही. पण बीबीसी वर त्याची खबर आली आणि ती चीन पर्यंत पोहोचली. चीन सरकार आणि भारत सरकारमध्ये वांगबाबत बोलणे झाले आणि चीनने २०१३ मध्ये वांग, त्याचा मुलगा विष्णू, आणि सूनबाई नेहा आणि खनक नावाची नात यांना चीनचा पासपोर्ट दिला… पण वांग २०१७ मध्ये चीनमध्ये जाऊ शकला. अर्थातच त्याचे तेथे मोठे स्वागत झाले. याला कारणीभूत झाला तो सोशल मिडीया. त्याची पत्नी मात्र त्याच्या सोबत गेली नाही. मुलगा, सून आणि नात यांच्यासाठी चीनने प्रवासी विजा दिला होता. भारत सरकारने मात्र वांग याची इच्छा असल्यास त्याला भारतात परतण्याची परवानगी देऊ केली! पण तीनच महिन्यांत वांग त्याच्या आजारी पत्नीला भेटायला भारतात परतला. ऑक्टोबर २०१७ मध्ये सुशीला मृत्यू पावल्या. मग वांग पुन्हा चीनला परतला. आता त्याच्यापुढे दोन कुटुंबे होती.. चीनमध्ये त्याचे भाऊबंद आणि भारतात त्याचा मुलगा, मुलगी, सून आणि नातवंडे !
वांगने चिनी सैन्याकडे त्याच्या पेन्शनची मागणी केली. पण त्यांच्या कागदपत्रात वांग की ‘मयत’ दिसतो. आणि त्याच्याकडे आणखी कोणतीही कागदपत्रे नाहीत. मार्च २०२४ मध्ये वांग भारतात तीन महिन्याच्या प्रवासी वीजावर आला होता. त्यानंतर त्याची खबर किमान मिडीयात तरी आलेली नाही… बहुदा तो चीनला परतला असावा!
चिनी अर्थात चायनीज वस्तू त्यांच्या दर्जाबाबत भारतात तशा बदनाम आहेत! ‘चलेगा तो चांद तक नहीं तो शाम तक’ असेही गंमतीने म्हटले जाते. परंतू त्यात तथ्य असण्याची शक्यता खूप जास्त दिसते! असो. पण वांग हा चायनीज मात्र भारतात चक्क पन्नास वर्षे टिकला! इथल्या प्रेमळ माणसांनी या शत्रूला सांभाळून घेतले… हीच तर भारताची खासियत आहे. चीन आणि पाकिस्तानी लोकांबाबत मात्र असे म्हणता येत नही… आपले कितीतरी सैनिक त्यांच्या कैदेत खितपत पडले होते… आता तर ते या जगात असण्याची शक्यता अगदीच धूसर आहे… कारण भारत-चीन युद्धाला साठपेक्षा अधिक वर्षे उलटून गेलेली आहेत.
युद्धामुळे खूप नुकसान होते असे वयाची ऐंशीपेक्षा जास्त वर्षे उलटलेले वांग की म्हणत असतात.. त्यांनी कुटुंबाचा विरह खूप जास्त वर्षे सहन केला, त्यांची आणि आईची भेट शेवटपर्यंत झाली नाही !
पण चिनी कम आणि भारतीय जास्त असलेले वांग की उर्फ राज बहादूर वांग भारताबद्दल कृतज्ञ आहेत ! ‘ जीते हो किसीने देश तो क्या.. हमने तो दिलों को जीता है! ‘ असे आपण अभिमानाने म्हणू शकतो
☆ वागणुकीची इस्त्री ! – लेखक : श्री सचिन मेंडिस ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆
कधी कधी अगदी छोट्याशा चुका फार मोठं काही शिकवून जातात. मागच्या आठवड्यातील किस्सा घ्या. नवा कोरा, रेशमी कुर्ता इस्त्री करायला घेतला. मनात उत्सुकता होती, एकदम टापटीप दिसायला हवा. पण लक्षात आलं नाही की इस्त्री सुती कपड्यांसाठी तापवलेली होती. अतिशय उच्च तापमानावर. सरळ गरम इस्त्री कुर्त्याच्या छातीवर टेकवली आणि क्षणात… एक भला मोठा काळा डाग उमटला. थोडं सावरायच्या आतच एक अनपेक्षित, अक्राळ विक्राळ भगदाड. इस्त्रीची सेटिंग न पाहता सुती कपड्याचं उच्च तापमान रेशमी कपड्यावर लादण्याचा बेफिकीरपणा मला चांगलाच नडला होता.
ते भगदाड पाहून खूप वाईट वाटलं. पण त्या क्षणात एक वेगळाच विचार मनात चमकून गेला. आपण नात्यांमध्येही हेच करत नाही का? प्रत्येक माणूस वेगळ्या फॅब्रिकचा असतो. कुणी डेनिम, सहजपणे सगळं सोसून घेणारं. कुणी लिनन थोडं टोकदार पण व्यवस्थित सांभाळलं तर शिस्तीत बसणारं. आणि काही माणसं रेशमासारखी अतिशय नाजूक, हलकसं गरम तापमानही न झेलता येणारी.
पण आपण काय करतो? सगळ्यांना एकाच वागणुकीने हाताळायला जातो. आपल्या स्वभावाच्या तापमानात कुणी सहज बसतं, कुणी त्यात व्यवहार म्हणून सांभाळून घेतं, आणि काहीजण आपली रेशमी नाती सोडून कायमचे निघून जातात. आपण बोलतो, वागतो विचार न करता. आपल्या शब्दांची उष्णता समोरच्या व्यक्तीच्या मनाच्या वस्त्रांना झेलता येईल का, याचा विचार करत नाही आणि मग जळालेले डाग पाहून आपल्यालाच वाईट वाटतं. खरं तर आपल्या स्वभावाच्या तापमानावर माणसं मोजायची नसतात, त्यांना त्यांच्या धाग्यांच्या ताकदीने समजून घ्यायचं असतं. प्रत्येक माणूस वेगळ्या फॅब्रिकचा असतो. त्याला समजून घेतलं तर नातं टिकतं, नाहीतर फक्त जळालेले ठसे उरतात.
काही नाती गरम इस्त्रीनेच नीट बसतात. थोडं स्पष्ट बोलावं लागतं, काही वेळा थोडं तापूनही घ्यावं लागतं. पण काही नाती मात्र फक्त गारवा ओळखतात. त्यांना उष्ण स्पर्श झेलताच येत नाही. बोलण्याच्या उष्णतेने जर नातं जळत असेल, तर समजून घ्या की तुम्ही योग्य तापमान ठरवलेलं नाही. आपण जर आपल्या संवेदनशीलतेचे तापमान व्यक्तीनुसार हाताळले, तर नाती सहज टिकतील, सुरकुत्या विरहित होतील आणि कुठेही न जळता सुंदर दिसतील.
पुढच्या वेळी इस्त्री हातात घेतली किंवा कुणासोबत संवाद साधला तेव्हा स्वतःला एकदा विचारून बघा, ही व्यक्ती सुती आहे की रेशमी? आणि त्यानुसार आपल्या वागणुकीचं तापमान ठरवा. सगळ्या नात्यांना सारखं तापमान लागू केलं की काही सुरकुत्याही नाहीशा होतात आणि काही नातीसुद्धा. जळलेला रेशमी कुर्ता एकवेळ शिवता येईल पण जळलेलं नातं पुन्हा विणता येईलचं असं नाही.
आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीशी काही ऋणानुबंध असतात.
निरपेक्ष प्रेमाने जवळ येणारी माणसं ओळखता आली पाहिजेत. कारण परमेश्र्वराने आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळावी म्हणून ती योजना केलेली असते पण आपण वारंवार त्यांना नाकारलं तर ते पुन्हा कधीही आपल्या जवळ येणार नाहीत. कारण सुसंधी वारंवार मिळत नाही.
लेखक – श्री सचिन मेंडीस
प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈