श्री अरविंद लिमये
विविधा
☆ तो आणि मी…! – भाग ६१ ☆ श्री अरविंद लिमये ☆
(पूर्वसूत्र- मी अकोला ब्रॅंचचा चार्ज घेतल्यानंतरच्या पहिल्या पंधरा दिवसातल्या या सगळ्या उलाढालींमधे मला श्वास घ्यायलाही फुरसत मिळालेली नव्हती. क्रिमिनल लाॅयरना भेटून आल्यानंतरच्या त्या रात्री कांही वेळ कां होईना मला प्रथमच बऱ्यापैकी झोप लागली होती. त्या मिटल्या डोळ्यांना मात्र उद्यापासूनचा प्रत्येक क्षण खऱ्या अर्थाने माझ्या सहनशक्तीची कसोटी पहाणारा ठरणार आहे याची कल्पनाही नव्हती.)
मी अकोल्याला जॉईन झालो ती जानेवारी २००० ची नुकतीच झालेली सुरूवात होती. त्या अनपेक्षित बदलीमुळे ही नवीन वर्षाची सुरुवात फारशी उत्साहवर्धक वाटली नव्हती एवढे खरे. आज पंचवीस वर्षांनंतर ते सगळे दिवस पुन्हा आठवताना त्या अनुभवाने मला समृध्द करून गेलेले कितीतरी प्रसंग आपण अजूनही विसरलेलो नाही हे नव्याने जाणवतेय. या प्रसंगांमधला एकेक क्षण मला हादरवणारा, माझी कसोटी पहाणारा जसा होता, तसाच या ना त्या रूपातल्या ‘त्या’च्या अस्तित्त्वाची जाणीव करून देणाराही होता!
अतिशय कडक, जीवघेण्या अशा उन्हाळ्याचा अनुभव मी माझ्या आयुष्यांत तिथे प्रथमच घेत होतो. पहिल्याच दिवशी पहाटे शेगावला जाऊन गजानन महाराजांचे दर्शन घेऊन झाल्यावर परतीच्या प्रवासासाठी शेगाव एसटी स्टँडवर येऊन पोचेपर्यंतचे ते दोन अडीच तास काय ते बऱ्यापैकी सुसह्य वाटले होते. पण परतीच्या बसमधे चढण्यापूर्वीच सकाळचे सातही वाजलेले नसताना ऊन तापू लागलंय हे जाणवले. अकोल्यापर्यंतचा तो फारतर तासाचा प्रवास पण कणभर वाऱ्याचाही शिरकाव न होऊ देणारं तीव्रता हळूहळू वाढू लागलेलं ते ऊन, स्वतः चटके सोसत माझ्या डोईवर गरम सावली धरणारं त्या एस टी चं आमच्यासाठी ऊन अडवून उभं राहिलेलं ते छत, प्रवासात खिडकीबाहेर बघणंही नको असं वाटणारं बाहेरचं तापू लागलेलं वातावरण, स्वतःची गारवा देणारी हिरवाई असोशीने घट्ट धरून ठेवायची धडपड करणारी केविलवाणी पळती झाडं… हे सगळंच माझी उसनी उमेद कोळपून जायला पुरेसं ठरत होतं. अकोला स्टॅंडवर बसमधून उतरलो तेव्हा सकाळचे आठच वाजून गेले होते तरीही मी घामाने चिंब भिजलो होतो आणि बाहेर ऊन अधिकच तापू लागलेलं होतं! तो जानेवारी महिना होता तरी ही अवस्था. खूप वर्षांपूर्वीच्या महाबळेश्वरला मी अनुभवलेल्या तेव्हा नकोशा वाटणाऱ्या धुवांधार पावसाच्या आठवणी त्याक्षणी मात्र मला हरवलेल्या जिवाभावाच्या मित्रा सारख्या वाटू लागल्या. शेगावला दर्शन घेऊन योग्य वेळेत परत आल्याचं समाधानही या सगळ्या मनोवस्थेत कांहीसं मलूल होऊन गेलं होतं!
बसमधून उतरताच बऱ्यापैकी तापत चाललेलं ऊन पाहून हाकेच्या अंतरावरच्या लॉजवर जाण्यासाठीही मी रिक्षाला हात केला. रिसेप्शन वरून किल्ली घेऊन रूमचं दार उघडलं. समोरच्या भिंतीवरच्या चित्रातल्या गजानन महाराजांच्या चेहऱ्यावरच्या स्मितरेषेने आणि माझ्याकडे एकटक पहाणाऱ्या त्यांच्या गूढ नजरेने माझं स्वागत केलं तेव्हा मनातलं कडक ऊन क्षणभर मळभ यावं तसं विरून गेलं. त्यांच्या नजरेचा तो स्पर्श दिलासा देणारा होता आणि माझ्या कसोटीची आत्ता कुठं सुरुवात झालीय याची जाणीव करून देणाराही!
आधी सांगितल्याप्रमाणे पहिले पंधरा दिवस अतिशय घाईगर्दीत उलटून गेले होते. वाढत जाणारा उन्हाळा अर्थात सुसह्य नव्हताच पण हार मानूनही चालणार नव्हतं. पहिल्या दिवशी ब्रॅंचमधे गेल्याबरोबर परस्परांचा परिचय वगैरे सगळं पार पडलं. ब्रॅंचचं रुटीन सुरू झालं. सकाळी हेवी ब्रेकफास्ट करून आल्यामुळे लंचटाईममधे बाहेर जाऊन जेवून यायचं ठरवलं होतंच. मी ड्रॉवरमधली कॅप काढली आणि अकाऊंटटला मी जाऊन येतो असं सांगितलं. त्याने मला थांबवलं.
“आत्ता.. इतक्या उन्हात?” त्याने आश्चर्याने विचारले.
“हो. इथून जवळ चांगलं हॉटेल आहे का एखादं? म्हणजे जेवण चांगलं मिळेल असं…? “
” आहेत पण नुसती कॅप घालून कसे जाणार? इथं नेहमी मोठा रूमाल डोक्याला बांधूनच जावं लागतं. नको सर. आम्ही सगळ्यांनी डबे आणलेत. आपण शेअर करूया. “
मला संकोचल्यासारखंच झालं. “नाही.. नाही.. नको. तुमचं चालू दे. मी आलोच. ” मी म्हंटलं.
” सर. नको. एका माझं. आम्ही इथे रहाणारे असूनही हे चार महिने अशा उन्हात अगदी नाईलाज असल्याशिवाय कुणीच बाहेर पडत नाही. तुम्हाला सवय नाहीय. तुम्हाला ते अजिबात सहन होणार नाही. प्लीज रिस्क घेऊ नका. आणि संकोचही करू नका. या. “
ते आग्रहाने म्हणाले. त्यात काळजी होती. आपुलकीचा ओलावा होता. आत्तापर्यंतच्या रखरखीत वातावरणात अचानक आलेली ती एक गार वाऱ्याची झुळूकच वाटली मला.
त्यादिवशी सगळ्यांच्या बरोबर बसून घासभर खाताना त्या सर्वांच्या डब्यातल्या जळजळीत तिखट भाज्या घशाखाली उतरवतानाही मनाला स्पर्शून गेलेला दिलासा मन शांतवणारा होता. या प्रतिकूल परिस्थितीत माझी
मूळं इथं रूजायला तोच दिलासा पुढे पाण्याचा शिडकावा करणारा ठरला होता हे नक्कीच. त्याच दिवशी घडलेली आवर्जून दाद द्यावी अशी आणखी एक गोष्ट म्हणजे त्यांनीच शिपायाला सांगून माझ्यासाठी ब्रॅंचमधून बाहेर पडायच्या आधी दोन कॉटनचे मोठे रुमाल आवर्जून मागवून घेतले होते. ते मला देऊन त्यांनी तिथं उन्हाळा संपेपर्यंत मी स्वतः काय काय काळजी घेणे आवश्यक आहे तेही समजावून सांगितले. तो रुमाल टाळूवर घडी ठेवून दोन्ही कान व्यवस्थित झाकले जातील अशी काळजी घेऊन न सुटेल असा कसा बांधायचा हे प्रात्यक्षिक करून मला शिकवलं होतं. माझी नेहमीची कॅप घालायची ती रुमाल बांधलेल्या डोक्यावर हेही गंमतीने हसत मला सांगितलं होतं. या गोष्टी लहान लहान वाटत असल्या तरी माझ्यासाठी त्या खूप मोठा आधार, निश्चिंतता देणाऱ्या होत्या. नवीनच ओळख झालेल्या तिथल्या या सगळ्या स्टाफ मेंबर्सशी माझं असं आपुलकीचं घट्ट नाते निर्माण झालं जे पुढं मी तिथं असेपर्यंत माझी पाठराखण करीत होतं! इथं कितीही संकटं आली तरी त्यातून बाहेर पडायला मदतीचे हातही इथे असणार आहेत हेच तो मला सुचवत असावा असंच वाटत राहिलं. म्हणूनच तर त्या पहिल्याच दिवशी नेमके या आधीच्या भागात लिहिल्याप्रमाणे ऑडिट डिपार्टमेंटमधले माझे सहकारी श्री. देशपांडे आवर्जून मला भेटायला आले होते. माझ्या रहाण्याची सोय करून देण्यासाठी! हे सगळं प्रतिकूल परिस्थितीत ‘त्या’ने माझी पाठराखण करणारंच तर होतं!
जगणं किती क्षणभंगूर असू शकतं याचा या भाजून काढणाऱ्या पेटत्या उन्हानेच मला दिलेला ‘जीवघेणा’ अनुभव आज आठवला तरी चर्र होतं. ती अकोल्यात जाॅईन झाल्यानंतरच्या पहिल्या महिन्यातलीच ती घटना!
क्रिमिनल लॉयरकडे सोपवलेल्या त्या ११ कर्ज खात्यांखेरीज मी तातडीने लक्ष घालून काळजी घ्यायला हवी अशी मोठ्या रकमांची इतरही अनेक कर्जखाती होती. ती थकबाकीत जाऊ नयेत म्हणून त्या खातेदारांशी सतत संपर्कात राहून नियमित वसुलीची खात्री करून घेत, इतरही त्रुटी निर्माण होणार नाहीत यासाठी दक्ष रहाणे आवश्यक होते. या आठवड्यात व्हिजिट करायलाच हवी अशी पाच सहा खाती होती. त्यातील एकाकडे मी इन्स्पेक्शनला जायचे ठरवले. माझी ती पहिलीच व्हिजीट असल्याने माझ्याबरोबर ॲडव्हान्सेस डिपार्टमेंटमधला ऑफिसर येणार होता. अकोला स्टॅन्डजवळच्या एका बसस्टाॅपजवळ मी सकाळी साधारण साडेनऊला यायचे असे ठरले. तो ऑफिसर तिथेच येऊन मला घेऊन जाणार होता. मी पाच मिनिटे आधीच तिथे गेलो. बस-स्टॉप वर गर्दी होती. म्हणून मग शेजारच्याच एका झाडाखाली सावलीत जाऊन उभा राहिलो. त्या झाडाखाली एक थकलेला म्हातारा खेडूत बसलेला होता. दीनवाणा करपून गेलेला चेहरा, विझलेली नजर, आणि त्या नजरेतला केविलवाणा भाव! मी तिथे उभा राहून एक दोन मिनिटेच झाली असतील, तेवढ्यांत झाडावरून धपकन् काहीतरी माझ्यासमोर पडल्याचा आवाज आला. मी दचकून पाहिलं तर झाडाच्या पानांच्या सावलीत बसलेला, तहानेने व्याकुळ झालेला एक कावळा झाडावरून खाली मरून पडलेला होता! ते बघूनसुद्धा मला कसंतरीच झालं. थोडं मागं सरकून उभं रहावं म्हणून मी वळून बघितलं तर बाकावर बसलेला तो म्हातारा माणूस माझ्याकडेच बघत होता.
” पावनं, किती वाजलं म्हणायचं..? ” त्याने काकुळतीने विचारलं. मी हातातलं घड्याळ पाहिलं. त्याला वेळ सांगावी म्हणून नजर वर केली न् अंतर्बाह्य हादरलोच. आत्ता एका क्षणापूर्वी माझ्याशी बोललेला तो… त्याची निर्जीव मान त्याच्या खांद्यावर लुळी पडल्यासारखी विसावलेली आणि डोळे तसेच सताड उघडे! दुसऱ्याच क्षणी तो कोलमडल्यासारखा खाली मातीत कोसळला! तेवढ्यांत तिथे आलेल्या ऑफिसरने स्कूटर माझ्याजवळ येत थांबवली. त्या आवाजाने मी दचकून भानावर आलो.
” साहेब, साॅरी.. थोडा उशीर झाला.. चला, बसा. जाऊया. ” तो म्हणाला. तोवर जाणायेणाऱ्या ८-१० माणसांनी त्या म्हाताऱ्यासमोर गर्दी केलेली होती! तिथेच मरून पडलेला तो कावळा मात्र कुणाच्या खिजगणतीतही नव्हता!
उन्हाच्या कडाक्याने बळी घेतलेले ते दोन जीव आणि त्यांच्या अखेरच्या श्वासांचा मूक साक्षीदार असणारा मी..! तो पूर्ण दिवस मृत्यूच्या त्या काळ्या सावल्या मला अस्वस्थ करीत राहिल्या. त्या दोन जीवांसारखाच मीही येईल त्या परिस्थितीला तोंड देत जगण्यासाठीच तर धडपडत होतो! आणि कुणाचंही असो पण ते जगणंही किती क्षणभंगूर असू शकतं याचा ‘जीवघेणा’ अनुभव जणू जिवंत होऊन मला हादरवून सोडत होता! तिथल्या तळपत्या उन्हाने मला दिलेला तो चटका एखाद्या दु:स्वप्नासारखा पुढे कितीतरी दिवस माझ्या मनात रेंगाळत, यापुढे उगवणारा इथला प्रत्येक दिवस इथं तग धरून रहाण्यासाठी मला कराव्या लागणाऱ्या जीवघेण्या संघर्षाचं सूतोवाचच करतोय असंच मला तिथल्या संघर्षकाळांत सतत जाणवत रहायचं!
क्रमश:… (दर गुरूवारी)
©️ अरविंद लिमये
सांगली (९८२३७३८२८८)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈