श्री तुकाराम दादा पाटील
कवितेचा उत्सव
☆ झालो समर्थ आम्ही… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆
गाऊमिळून सगळे आता भविष्य गाणे
स्वातंत्र्यसूर्य जपला आम्ही पराक्रमाने
होतो जगात आहे जयघोष भारताच
बिमोड पूर्ण झाला आहेच संकटांचा
डुलतो नभी तिरंगा आदर्श वास्तवाचा
नांदायचे आम्हाला आता इथे सुखाने—-
जपली मनात सगळी आम्ही सवंग नाती
सांभाळते जिव्हाळा इथली पवित्र माती
आहेत भावना या रुजल्या मनात साऱ्या
बनलो समर्थ आम्ही साधार निर्णयाने—-
स्वप्नातले इरादे साकार व्हावयाला
भरपूर भाव आहे अजूनी परिश्रमाला
घेऊन हात हाती राबू मिळून सारे
एकेक शिखर गाठू आता क्रमाक्रमाने—-
अभिमान सार्थ आहे आम्हास संस्कृतीचा
विश्वास मान्य आहे आदर्श मायभूचा
इतिहास बोध देतो येथे पराक्रमाचा
नमतो आम्ही तयाला अत्यंत आदराने—-
चैतन्य चंद्र आहे हाती नव्या पिढीच्या
दिपल्या प्रकाश वाटा कित्येक योजनांच्या
सामर्थ्य खूप आहे बाहूत आज त्यांच्या
करतात देशसेवा सारे तनामनाने—-
☆
© प्रा. तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३
दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈