श्री समीर सरदेसाई

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ रणांगण… श्री विश्राम बेडेकर ☆ परिचय – श्री समीर सरदेसाई ☆

पुस्तक नाव: रणांगण

लेखक : विश्राम बेडेकर

प्रकाशक: रा. ज.देशमुख अँड कंपनी अँड पब्लीशर्स प्रा. लि.

पृष्ठे: ११४

किंमत: रू १८०/-

परिचयकर्ता:- समीर सरदेसाई(रत्नागिरी)

१९३० च्या दशकात साहित्य वर्तुळात प्रसिद्धीस येत असलेली ती तरुण आणि बंडखोर लेखिका, आणि तो मराठी चित्रपट सृष्टीत लेखक  पटकथाकार म्हणून स्थिरावू पहाणारा एक धडपड्या तरुण. अशी तरुण साहित्यिक जोडी जेवायला बसलेली असते.अर्थात गप्पा साहित्या विषयी च सुरू असतात.पत्नी च्या अनेक कादंबऱ्याचा मोठाच बोलबाला सुरू झालेला असतो.त्यामुळे पत्नी खुश असते.ती त्याला उत्सुकतेने विचारते अरे तू माझी ही कादंबरी वाचलीस का? तिने लिहलेली पुस्तके हा तिचा अभिमानाचा विषय असतो.खरे तर याला ही तिची दोन पुस्तके आवडलेली असतात पण उघड स्तुती करणे याच्या जिभेला जड जाते.तरीही तो चार बरी वाक्य टाकतो.पण तिचे काय समाधान होत नाही.ती अजून एका तिसऱ्या पुस्तकां बद्दल त्याला विचारते.आधीच त्याला स्तुतीपर बोलण्याचे कुपथ्य झाले होते. याने म्हटले त्यांच्याबद्दल जितकं कमी बोलावं तितकं बरं, म्हणून नाही बोललो, ती विचारते.. म्हणजे? ते पुस्तक भिकार आहे! तुझा मेहुणा प्रकाशक, त्याला तुला आधी मिळालेल्या नावाचा बाजार करायचा होता. म्हणून त्यांना तुला ते लिहायला लावलं आणि तू बळी पडलीस. एवढ सगळं एकल्यवर ती भयंकर संतापली…. यांन लिहिलं तरी काय आहे?….. जन्मल्यापासून सहा महिन्यात मेलेल एक नाटक. आणि आपल्याला इंग्लंडहुन लिहिलेली प्रेम पत्र पण त्यात सुद्धा कितीतरी चुका…. ती थोडे घुश्याने म्हणाली…. बोलणं सोपं असतं आधी करून दाखवावं मग बोलावं…. ते शब्द याला डिवचून गेले आणि मग याने ठरवलेच आता लिहून दाखवायचं. दुसऱ्याच दिवशी याने कागद पेन्सिली गोळा केल्या आणि खोलीचे दार लावून आत बसला. हा नुकताच  इंग्लंडहून बोटीने आला होता.बोटीवरच्या अनुभवांनी याचे मन खदखदत होते.याने ते मन कागदावर उपडे केले.त्या वेदनेच्या रसायनाला  लेखणीने पाट काढून दिले .हा लिहीत राहिला,लिहीत गेला…भान विसरून.आणि असं रोज एक महिना हा लिहीत होता. रोज लिहिलेले कागद तिच्यापासून लपवून ठेवत होता. आणि एक दिवस सगळं लिहून झाल्यावर हे हस्तलिखित आपल्या हरी नावाच्या जिवलग प्रकाशक मित्राकडे त्याने सोपवले, आणि म्हणाला तू छाप हे. पण यावर लेखक म्हणून माझे नाव कुठेही असता कामा नये.मित्राने पुस्तक एक महिन्यात  छापून दिले… पुस्तकावर लेखकाचं नाव “एक प्रवासी”; काही दिवसातच पुस्तकाचा साहित्य वर्तुळात बोलबाला सुरू झाला.त्यात केव्हातरी हे पुस्तक तिच्या हाती पडलं तिने ते लगेचच वाचून काढलं आणि ह्याला दाखवून म्हटलं खूप छान आहे हे पुस्तक… तू वाचलायस ?…. हा म्हणाला नाही…..मी लिहिलं आहे.

ती म्हणाली…”तू? खरच तू लिहलं आहेस हे?”

हा म्हणाला…..”म्हणाली होतीस ना आधी करून दाखवाव मग बोलावं? मी नंतर करून दाखवलं एवढच”.

 *मित्रांनो ही गोष्ट आहे 1939 सालातली आणि यातील तो आहे “तो” म्हणजे या पुस्तकाचे लेखक श्री “विश्राम बेडेकर ” आणि यातील “ती” म्हणजे तीन नावांनी प्रसिद्ध असलेल्या ख्यातनाम लेखिका….विभावरी शिरुरकर …. बळूताई खरे आणि याची पत्नी म्हणून ओळख असणाऱ्या मालतीबाई बेडेकर होय……ही झाली या कादंबरीची जन्म कथा.

 तब्बल 84 वर्षे झाली तरीही रणांगण आजही ताजेतवाने आहे महाराष्ट्रातील एकही विद्यापीठ नसेल की जिथे या कादंबरीचा पदवी किंवा पदव्युत्तर  अभ्यासक्रमासाठी समावेश झालेला नसेल.  मराठीतील गाजलेल्या  कादंबरी ची यादी ही रणांगणाशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. अनेक वर्तमानपत्रे खाजगी संस्था यांनी वेळोवेळी घेतलेल्या वाचक कौलांमध्ये रणांगण या कादंबरीचे खूप वरचे स्थान आहे.प्रसिद्ध लेखक आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते भालचंद्र नेमाडे कोसलाच्या प्रस्तावनेत म्हणतात …” बेडेकरांच्या रणांगण नंतर एकही चांगली कादंबरी मराठीत झाली नाही” .तब्बल 84 वर्षे होऊन आजही या कादंबरी मधील आशय ताजा आहे. साहित्य क्षेत्रातील मैला चा दगड ठरलेली ही कादंबरी वाचताना अगदी गुंगून जायला होतं. कादंबरीचा काळ आहे 1930 च्या दशकाचा आणि  दुसऱ्या महायुद्धाची नुकतीच सुरुवात होत असलेल्या 1939 मधला आहे इंग्लंड कडून परत मुंबईकडे येताना जहाजावर या कादंबरीचा कथानायक चक्रधर हॅर्टा नावाच्या जर्मन ज्यू तरुणीला भेटतो आणि तिच्या प्रेमात पडतो. सर्वच कथानक हे या बोटीवरच उलगडत जाते. बोटीवरचा हा अकरा दिवसाचा प्रवास आहे. बोटीवर विविध देशांचे धर्माचे वंशाचे तसेच भारतातील ही विविध जाती धर्माचे लोक असतात. या अकरा दिवसाच्या प्रवासात घडलेले हे कथानक आहे.

व्यक्ती  व्यक्ती मधील प्रेम भावना, राष्ट्रप्रेम, धार्मिक आणि वांशिक अस्मिता, या सर्व भावनांना बेडेकरांनी अगदी बेमालूम पणें एकत्र गुंफलेले आहे.. प्रेम हा या कादंबरीचा मूळ गाभा असला तरी दुसऱ्या महायुद्धाची पार्श्वभूमी,धार्मिक आणि वांशिक विद्वेष त्यातून बदलत गेलेले जागतिक राजकारणांचे संदर्भ आणि  त्यातून निर्माण होणाऱ्या व्यापाऱ्याचा   हव्यास, आणि मानवी जीवन व्यवहाराचे यश अपयश हे सगळं या कादंबरीत अतिशय चपखलपणे मांडण्यात आलेले आहे. बऱ्याच वाचकांना ही कादंबरी म्हणजे निव्वळ प्रवास वर्णन व त्यातील प्रेम कथा असे वाटते परंतु जशी ती प्रेमकथा आहे तशीच ती युद्ध कथाही आहे दोन संहारक युद्धांच्या दरम्यान घडलेली मानवी मनाची युद्धकथा आहे.हे युद्ध काही साधेसुधे नव्हते ते महायुद्ध होते. दुसऱ्या महायुद्धाची सुरुवातीलाच जर्मनीत वांशिक विद्वेषाचे वारे खूप मोठ्या प्रमाणावर वाहायला लागले होते.आणि याची झळ पूर्ण युरोपभर पसरायला लागली होती. आणि याच वातावरणाचा अनुभव घेऊन, चक्रधर नावाचा या कादंबरी चा मराठी नायक भारतात परतण्यासाठी निघाला होता. ज्या इटालियन बोटीतून हा प्रवास करत असतो, त्याच बोटीवर कथेची नायिका हॅर्टा सुद्धा असते. हिटलरशाहीमुळे ज्यांची त्यांच्या देशातून हकालपट्टी होते त्यातीलच एक अभागी हॅर्टा एक होती.पुढे काय होणार आहे याचा काही आगा पिछा नसलेल्या या हॅर्टा ला चक्रधर भेटतो.आणि बघता बघता या बोटीवर च दोघांचेही प्रेम फुलते.दोघांचेही आधी प्रेमाचे जोडीदार वेगळे होते. चक्रधरची प्रेयसी उमा दुसऱ्याशी लग्न करून जाते. आणि हॅर्टाचा प्रियकर जर्मन सैन्याकडून मारला जातो.तिच्या पूर्ण कुटुंबाला एकंदरच जर्मनीतील द्वेष  आणि क्रौर्य पाहता आपण जगू की मरू याची खात्री नसते.त्यामुळे हे कुटुंब जर्मनी सोडून चीन ला चाललेलं असत.आणि त्याचवेळी तिला बोटीवर चक्रधरच्या रूपाने पुन्हा प्रेमाचा ओलावा मिळतो.बोटीवरच्या अवघ्या दहा दिवसाच्या त्याच्या सानिध्यात ती स्वर्ग सुख अनुभवते. तिला मिळालेले हे थोडेसे सुखही सोडवत नसते.आणि म्हणूनच चक्रधरच्या प्रेमात नी:संकोचपणे बुडून जाते. यावेळी ती आजूबाजूच्या परिस्थितीची कसलीच पर्वा  न करता चक्रधर पुढे समर्पित होण्याची तयारी दर्शवते. आपण ज्यू असल्याने आपल्याशी चक्रधरला  कधीही लग्न करता येणार नाही याची तिला पुरेपूर जाणीव असते. परंतु तरीही चक्रधर तिच्यापासून कायमचा दुरावण्यासाठी अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक असताना त्याचे दुःख करत वेळ न घालविता ती त्या परमोच्य सुखाच्या क्षणासाठी धडपडते. अखेर ती बोट मुंबईच्या किनाऱ्याला लागल्यानंतर हॅर्टा ला चक्रधरला पासून कायमचे दूर जावे लागते. कधीही न परतण्यासाठी. हॅर्टाला आपली चक्रधर शी पुन्हा कधीही भेट होणार नाही याची जेव्हा जाणीव होते तेव्हा मात्र ती उन्मळून पडते. बोटीवरून चक्रधरला पत्र पाठवूनही तिला आपल्या मनाचा कोंडमारा सहन करता येत नाही आणि ती बोटीवरून उडी घेऊन आत्महत्या करते आणि चक्रधर…! तो मुंबईतल्या एका हॉटेलमध्ये तिची आठवण काढत कुढत बसलेला असतो.  कारुण्य व मानवी जीवनाची हतबलता याचे सुरेख मिश्रण या कादंबरीत पाहायला मिळते.धर्म, वांशिकता व त्यातून निर्माण होणारा सत्तासंघर्ष  व व्यापारच्या लालसे पोटी होणारे महायुद्ध, आणि यात होरपळून निघणारी व सर्वस्व गमावून बसलेली सर्वसामान्य जनता.आपलीं जन्मभूमी आणि कर्मभूमी सोडून मर्जी विरुद्ध अन्य देशात करावे लागलेले स्थालंतर त्यातून  जगण्यासाठी  करावी लागणारी अगदी केविलवाणी धडपड. याचे अचूक व मर्मभेदी वर्णन बेडेकरांनी यात चित्रित केले आहे.एखाद्या खऱ्याखुऱ्या रणा सारखेच हे प्रत्येकाच्या आयुष्यातील वैयक्तिक रणांगण जिंकणं देखील तितकेच कठीण असा एकूण निष्कर्ष निघतो. मग आपला देश, आपले रीतिरिवाज, आपले लोक, आपलं माणूस म्हणजे नक्की काय? एका माणसाशी नाते जोडणे म्हणजे नक्की काय? कितपत सामाजिक, आणि कितपत वैयक्तिक? हे सगळे प्रश्न बेडेकर उपस्थित करतात.*

अवघ्या ११४ पानी पुस्तकात बेडेकरांनी जे चितारले आहे, ते सगळ परिचयात देणं खूप अवघड नव्हे दुरापस्त आहे.तसेच या पुस्तकातील खरी दाहकता अनुभवायला प्रत्येकाने  स्वतः हे पुस्तक वाचून संदर्भ लावणे शहाणपणाचे ठरेल असे मला वाटते.

पुस्तक परिचय – श्री समीर सरदेसाई

रत्नागिरी

९६६५०५९९१४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments