श्री आशिष मुळे
कवितेचा उत्सव
☆ “मेघ-मल्हार…” ☆ श्री आशिष मुळे ☆
टाकून केश-संभार उभ्या
निष्प्राण या वेली
उभे निःशब्द वृक्ष
अजुनच निस्तब्ध होऊनी
पसरली कोरडी धरती
मैलों न मैल भेगाळली
सरकली निवडुंगाच्याही
पाया खालची माती
मनात मेघ बळीराजाच्या
नयानांतुनी बरसती त्याच्या
चिंता-सर्प विहरती आता
छोट्याशा नंदनवनात त्याच्या
प्रेम पक्ष्यांच्या मावळती आशा
उन्हात या हरवले ते दिशा
लेखण्या संतप्त कवीयांच्या
फेकती आज नभात पाशा
आता वेळ लावू नकोस रे
ऋतुकाल विसरू नकोस रे
प्रताप नभांत करावया
फक्त विजाच तळपवू नकोस रे
सोडून सिंहासन तुझे
आता उतरून खाली ये
बिलगावया प्रियेला तुझ्या
आज आत्ता लगेच ये….
© श्री आशिष मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈