सौ.ज्योत्स्ना तानवडे
कवितेचा उत्सव
☆ बंध जिव्हाळ्याचे ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆
(सर्वोत्कृष्ट पुरस्कार प्राप्त कविता)
☆
झाली धावती दुनिया
जिवलग जाती दूर
कसा जुळावा एकोपा
वाटे मनी हुरहूर ||
☆
होते अपेक्षांचे ओझे
कोणी न माघार घेती
प्रेमासवे द्वेष ईर्षा
हात धरुनिया येती ||
☆
खोटे रुसवे फुगवे
किती दिसांचा दुरावा
मानपान रागापायी
उगा अबोला धरावा ||
☆
नाती दुरावली व्यर्थ
होती मनोमनी खंत
वाटे सरावी रुष्टता
पुन्हा फुलावा वसंत ||
☆
गुढीपाडव्याचा सण
खास निमित्त मिळाले
रम्य अशा संध्याकाळी
गणगोत जमा झाले ||
☆
गळामिठी गप्पागोष्टी
मनोमनी मुक्त झाले
आपोआप संवादाचे
सुसंवाद ऐकू आले ||
☆
दाटलेले मेघ सारे
गेले अवघे विरून
झाले मोकळे आकाश
मनी आनंद भरून ||
☆
© सौ.ज्योत्स्ना तानवडे
वारजे, पुणे.५८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈