श्री हरिश्चंद्र कोठावदे
कवितेचा उत्सव
☆ कविते !… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆
(वृत्त :आनंदकंद – (गागाल गालगागा गागाल गालगागा))
कविते ! तुझीच बाधा, आजन्म भोवणार
वणव्यात चांदण्याची, मी गोष्ट सांगणार —
ना बाण कागदी हे, रक्ताक्षरे उरीची
गंगौघ आसवांचा, गंगेत नाहणार —
आयुष्य श्रावणी हे, उन पावसात चिंब
सतरंग जीवनाचे, रसिकांस दावणार —
कबरीत काळजाच्या, दफने किती करावी
दूभंग या धरेला, आकाश सांधणार —
गंधाळतील दुःखे, झंकारतील सूर
टाहोत मैफिलीच्या, संगीत छेडणार —
नगरी अमानुषांची, होणार छिन्नभिन्न
योद्धेच शब्द आता, रणशिंग फुंकणार —
कोणी नसेल संगे, माझ्यात मी असेन
तूझ्याच विश्वरूपा, माझ्यात पाहणार —
माझाच ध्रूव जेव्हा, अढळातुनी ढळेल
खेचून मी स्वतःला,चौकात आणणार !!!!
© श्री हरिश्चंद्र कोठावदे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈