श्री आनंदहरी
कवितेचा उत्सव
☆ खरंच सांगा… ☆ श्री आनंदहरी ☆
माझा माझा म्हणतो देश हा
मी देशाचा आहे काय ?
देशासाठी आपण आपुल्या
खरंच सांगा करतो काय ? !!
स्वातंत्र्यासाठी कितीक वीरांनी
प्राणांचीही दिली आहुती
आज आपणा स्वातंत्र्याची त्या
सांगा जाणीव आहे किती ?
हक्क सांगतो सदैव आपण
कर्तव्याला स्मरतो काय ? ।।
कधी बंद,कधी मोर्चे काढता
शांततेचाच असतो नारा
कुठून कसा हो शिरतो त्यात
हिंसेचा मग विनाश वारा ?
मालमत्ता ही आपुली सारी
सांगा आपण राखतो काय ? ।।
भारत माझा देश आहे
प्रतिज्ञा नितदिन म्हणतो आपण
सर्व धर्म समभाव हा असता
दंगली का हो करतो आपण ?
देशातील साऱ्या बांधवांशी
खरंच समतेने वागतो काय ? ।।
आपुल्यासाठीच असे कायदा
सांगा आपण किती पाळतो ?
देश आपुला आहे तर मग सांगा
भ्रष्टाचार हा का बोकाळतो ?
कितीही गरजलो शब्दांतुनी तरी
आपण एकचि असतो काय ? ।।
माझा माझा म्हणतो देश हा
मी देशाचा असतो काय ?
देशासाठी आपण आपल्या
खरंच सांगा करतो काय ? ।।
© श्री आनंदहरी
इस्लामपूर जि. सांगली
८२७५१७८०९९
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈