सुश्री अरूणा मुल्हेरकर

? सूरसंगत ?

☆ सूर संगत~ मानवी जीवन आणि संगीत ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆ 

मानवी जीवन आणि संगीत यांचे अतूट नाते आहे.

टॅहॅं टॅहॅं असे एका लयीत गातच, (आपण त्याला रडणे म्हणतो) बालक  जन्माला येते.

रांगायला लागते तेही एका विशिष्ठ तालात. आई बाळाला निजण्यासाठी अंगाईगीत गाऊन मांडीवर थोपटते ते एका ठराविक लयीत.बाळ मोठे होत होत पहीली पावले टाकू लागते तेव्हा त्याच्या पायातील पैंजण रुणुझुणु नाद करतात आणि बाळ कसे ठुमकत ठुमकत चालत असते. अशावेळी स्मरते ते तुलसीदासांचे भजन”ठुमक चलत रामचंद्र।बाजत पैंजनिया”

ह्रदयाची धडधड,शरीरांतून रक्ताची एका विशिष्ट लयीत प्रवाहीत होण्याची क्रिया हे ईश्वरनिर्मीत संगीतच आहे. एखाद्या तरूणीच्या मादक कटाक्षाने मनाची झालेली थरथर

संगीतांतील एखाद्या भावविव्हळ तानेसारखीच असते. जीवन म्हणजे चैतन्य आणि जेथे चैतन्य तेथे संगीत हा निसर्ग नियमच आहे. पाण्याची खळखळ, वार्‍याची फडफड, समुद्राची गाज, पानांची सळसळ, पक्षांचा कलरव, कोकिळेचे कूजन, भ्रमराचे गूंजन हे जर शांतपणे ऐकले की असे लक्षात येते की या सर्वांमध्ये एक नाद, ताल, लय आहे, निबद्धता आहे, संगीत आहे.

मानवाच्या जीवनांत संगीत म्हणजे कंठातून उत्पन्न होणारे सुरांचे प्रकटीकरणगायन, स्वरवाद्यांतून उत्पन्न होणारे सादरीकरणस्वरवादन आणि पदन्यास व हस्तमुद्रांद्वारे केलेला भावनाविष्कार~नर्तन.

जीवनाचे हे तारू भवसागरांतून पार करीत असतांना प्रत्येक मानवाचे गायन, वादन, नर्तन चालूच असते.

टाळ वाजवत, लेझीमांच्या तालावर तोंडाने हरिनामाचा गजर करत आषाढी कार्तिकीला पंढरीला निघाले वारकरी नाचत  असतो. देवळांतून चालत असलेली भजन कीर्तने, आरत्या टाळ्या वाजवत गात असतो. मशीदीतून आलेली बांग,चर्चमधून घंटानाद आपण ऐकत असतो.

लग्न,मुंज,वाढदिवस,साठीसमारंभ,धार्मिक कृत्ये साजरी करतांना सनईसारखी मंगलवाद्ये असावीच लागतात.

गणपतीची अथवा इतर कोणत्याही विजयाच्या मिरवणूकीत ढोल ताशा हवाच.

माणसाला गजराबरोबरच शांतीचीही तितकीच आवश्यकता आहे. भरकटलेल्या, अशांत मनाला शांति मिळते ती स्वरांनीच. लतादिदींच्या मधूर लकेरीत, जसराजजींच्या मोहमयी आलापीत, किशोरीताईंच्या चपल तानेत, अनूप जलोटांच्या भजनांत, शोभा गुर्टूंच्या श्रृंगारीक दादरा/ठुमरीत, जगजित सिंग/पंकज ऊधास यांच्या गझलेत किंवा रवीशंकराच्या जादुभर्‍या सतारीत, अमजदअलींच्या सरोद वादनात अथवा शिवकुमार शर्मांच्या छेडलेल्या संतुराच्या तारांत ज्या दिव्य आनंदाचा लाभ होतो, मनःशांति मिळते ती अनुभूति शब्दांत वर्णिताच येत नाही.

स्वरलहरींचा प्रभाव किती विलक्षण आहे हे शास्त्रानेही मान्य केले आहे. अनेक व्याधींवर विविध रागांतील स्वर औषधांसारखे गुणकारी आहेत हे शास्त्राद्वारे मान्य झाले आहे.

सुलभ प्रसूतीसाठी अडाण्याचे झंझावाती स्वर फार परिणामकारक आहेत हे सिद्ध झाले आहे. आॅपरेशन थिएटरमध्ये बरेच डाॅक्टर आॅपरेशन चालले असताना मंद वाद्यसंगीत लावतात. आॅफीसेसमध्येही कामाचा ताण हलका करण्यासाठी आणि कार्यक्षमता वाढविण्यासाठी पार्श्वसंगीताचा उपयोग करण्याची प्रथा हळूहळू रुजू लागली आहे.

माणूसच काय पण पशुपक्षी व फुलापानांवरही संगीताचा पोषक प्रभाव पडू शकतो हे शास्त्रीय प्रयोगाने सिद्ध होत आहे.

संगीताविना जीवन नाही हेच खरे.

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments