मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ “आली गाडी.. गेली गाडी..…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “आली गाडी.. गेली गाडी…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

“सांगितलं कि गं तुला कितीतरी बाऱ्या!… माझ्या गावा कडं येताना तू मोकळीच येऊ नगंस म्हनून!… तिकडनं मंमईहून येताना माझ्या सासुरवाशीण लेकीला संगट घेऊन येशील, चार दिवस आपल्या म्हातारीला भेटायला… पन तू काय मनावर घायचं नावं घेत न्हाईस!… अन फुकाच्या मातूर दिसरातीच्या सतरा बाऱ्या येरझारा घालतीस… तसं तुला काय गं कुणाच्या सुखदुखाचं काय पडलेललं नसतयं म्हना!… तू जोडून घेतलेला हाय नव्हं त्यो चौवीस डब्यांचा बारदाना… आमच्यावानी संसाराचा ओढत जातीस तुझा गाडा…बाया बापड्या, बापयं गडी मानूस, लेकरं बाळं, ट्रंका, बोचकी, पिशव्या नि हबशींनी ओतू जातोय डब्बा डब्बा… जसा जीवनाच्या प्रवासाला निघतातं तसं…कुणी हसतया,कुणी रडतया तर कुणी इवळतया तर कुनाची कुजबूज, शबुद नसलेली धुसफूस तर कुनाची कावाकाव…तुला यातलं काही कळंत नसतया तुझी असती रूळावरून वाघ पाठीमागं लागल्यासारखी धावाधाव…जाशील तिकडं मुलूख तुला थोडा जसा दक्षिणेतलं रामेश्वर अन उत्तरेतलं काशी…सगळीच अनोळखी कुणं कुणाची कशाला करतीय चवकशी… जो तो इथं वागतोय तालेवार असल्यावानी…सगळ्यांना घेतीस सामावून तू आपल्याच पोटात.. अन जो तो असतो आपल्याच नादात.. कुणाचं दुखलं खुफलं… मन फुलून आलं आनंदान.. तुला गं पडाया कशाची फिकीर.. शिटीवर शिटी फुंकत जातीस वरडत नि एकेक स्टेशान मागं सोडंत.. जत्रा भरेली फलाटावरची चढ उतार होतेय तू आल्यावर… वाईच पोट होतयं तुझं  ढवळल्यागत… पर तुला काहीच फरक पडतो काय… फलाटाला सोडून गेल्यावर त्या फलाटाचा उसासा तुला कधी कळतो काय?… साधू संतावानी तू अशी कशी गं निर्लेपवानी… अन तुला कसं कळावं एका आईचं आतडं कसं तिळ तिळ तुटतयं  लेकीच्या भेटीसाठी.. चार वर्षांमागं लेकीला गं सासरला धाडलं…काळजाचा तुकडाच दूर दूर गेला नि भेटीगाठीला गं आचवला… सांगावा तो तिचा यायचा सठीसाही माहीला सुखी आहे पोरं कानात सांगुन जायचा.. परी पोरीच्या भेटीसाठी जीव तो आसुसलेला असायचा… लिहा वाचायची वानवा हाय माझ्याजवळ..पतुर पाठवाया  उभा राहायतयं धरम संकट.. फोनची श्रीमंती आमच्या खेड्यातपतूर पोहचलीच नाही… बोलाचाली चा मायेचा शबुद सांग मंग कानावर कसा पडावा बाई..इकडच्या धबडगा घराचा उंबरठा नि शेताचा बांध कधी मला गावाची वेस वलांडून देईनात खुळे… अन तिकडं पोरीला सासरच्या जोखडात अडकवून टाकतात कारणांचे खिळे… मग तुझा घ्यायचा आधार असं मला लै मनात आलं.. म्हटलं तू सारखी ये जा करतीस लाखावरी माणसांची ने आण करतीस मगं तुला माझ्या पोरीला एकडाव तरी संगट घेऊन यायला जड कशाला जाईल.. अगं चार दिसं नसंना पण उभ्या उभ्या येऊन पोरं जरी येऊन भेटून, नदंरला पडून गेली तरी बी लै जीवाला बरं वाटंल बघ.. सकाळी सकाळी तू तिला इथं सोडायचं अन रातच्याला माघारी घेऊन जायचं… तू म्हनशील मगं तूच तसं का करीनास… न्हाई गं बाई… पोरीची अजून कूस उजवली नाही तवर तिच्याकडं जाता येत न्हाई हि परंपरा हायं आमची… तवा तुझ्याकडं पदर पसरून मागणं केलं… काही बी करं कसं बी जमवं पण एक डाव, या वेड्या आईला तिच्या पोरीची भेट एवढी घडवं… आणि पोरीला आणशील तवा हसऱ्या चेहऱ्याने  निळ्या धुराचा पटका हवेत उडवत, आनंदाचा हिरवा बावटा फडकत फलाटावर येशील… गळाभर लेकिला तिचं मी भेटल्यावर मायेच्या पायघड्या घालून तिला माहेराच्या घराकडं नेईन…औटघटकेचं का असंना पण माहेरपण करीन…आणि…रातच्याला पाठवणी करायला येईन तवा तू वेळ झाली निघायची म्हणून शिटीवर शिटी फुंकत…अंधारातल्या आकाशात ताटातुटीचे उमाळाचे काळे सावळे धुराचे सर रेंगाळत सोडशील…अन फलाट सोडून निघशील तेव्हा जड अंतकरणानं पाय टाकत पुढे पुढे जाताना… क्षणभरासाठी का होईना लालबावट्याला बघून थांबशील… वेड्या आईकडं  पोरीनं  पुन्हा एकदा मान वेळावून खिडकीतून बघितलं का याचा अंदाज घेशील… दोन निरोपाचे आसू गालावर टपकलेले निपटलेले  दिसल्यावर तू तिथून हलशील… इतकचं इतकचं माझ्यासाठी करशील… करशील नव्हं… “

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “लोकसाहित्य-संशोधनात रमलेली विदुषी” – भाग – २  ☆ डॉ. वि. दा. वासमकर ☆

डॉ. वि. दा. वासमकर

?  विविधा ?

☆ “लोकसाहित्य-संशोधनात रमलेली विदुषी” – भाग – २  ☆ डॉ. वि. दा. वासमकर ☆

(विधीनाट्यांमध्ये पूर्वरंग आणि उत्तररंग असे दोन भाग असतात पूर्वरंग हा परंपरेनुसार धर्मविधीसाठी राखून ठेवलेला असतो त्यात ईश्वरविषयक किंवा तत्त्वज्ञानविषयक तात्विक व गंभीर विवेचनाचा भाग असतो. आणि उत्तररंगात तद्नुषंगिक आख्यानात लोकरंजन आलेले असते, असे त्या स्पष्ट करतात.) इथून पुढे —

‘लोककलांची आवाहकता’ या लेखामध्ये अलीकडच्या काळात मराठी रंगभूमी लोककलांचा आश्रय घेताना दिसते. असे त्या सुरुवातीलाच म्हणतात. ‘घाशीराम कोतवाल’ या नाटकापासून दशावतार, गोंधळ, भारूड, जागरण अशा लोकनाट्यविधांचा उपयोग अनेक नवीन नाटकांनी केलेला आहे. याचे कारण सांगताना त्या म्हणतात, -“पश्चिमेचे अनुकरण हे एक कारण आहेच. पण केवळ पश्चिमेच्या एखाद्या नाटकाच्या अनुकरण करणे एवढ्याच एका प्रेरणेने मराठी नागर नाटकात लोकनाट्याचा प्रवेश झाला आहे काय?… आपले एकूणच आधुनिक जीवन हे दिवसेंदिवस तंत्रज्ञानाधीन होत चालले आहे. आधुनिक जीवनाचा निसर्गाशी आणि मातीशी असलेला संबंध तुटत चालला आहे. त्यामुळे भौतिक समृद्धी वाढत असतानाही एका पोकळीची जाणीव होत आहे. अशावेळी मानवी संस्कृती पुन्हा आपली मुळे शोधीत आहे… कलेच्या क्षेत्रातील या प्रेरणेचा आविष्कार पुन्हा नव्याने लोककलांचा शोध घेण्यातून होत आहे. कारण लोककलांमध्ये एक उत्स्फूर्तता असल्याने साक्षात जिवंतपणा असतो… जेथे जेथे समूहमनाशी नाते जोडण्याची तीव्रतेने गरज भासली, तेथे तेथे नागरकलांपेक्षा लोककला प्रभावी ठरलेल्या दिसतात. आजच ब्रेख्टमुळे नागर रंगभूमी लोककलांकडे वळली आहे असे नव्हे”. ताराबाईंच्या या भाष्यातून लोककलांचे महत्त्व आधोरेखित होते. ‘अदाची लावणी आणि नाट्यगीत’ हा आणखी एक महत्त्वाचा लेख या संग्रहात आहे. म्हणजे दरबारातील लावणी किंवा बैठकीची लावणी होय. अदा म्हणजे अभिनय. ही लावणी अभिनयप्रधान असते. तिच्यात अंगप्रत्यंगांचा लयबद्ध अविष्कार असतो. भावनांना चेतवणारे आविष्कार करणे हे या लावणीचे प्राणतत्त्व असते, असे प्रतिपादन करून प्रारंभीच्या सर्व शृंगाररसप्रधान नाट्य गीतांचे स्वरूप पाहिले, अभिनयरूप पाहिले तर बैठकीच्या अदाच्या लावणीचा हा नवा अवतार असल्याचे लक्षात येईल, असे त्या स्पष्ट करतात. अदा करणाऱ्या कलावतीची जागा स्त्रीपार्टी पुरुष नटाने घेतली पण शृंगारप्रधान नाट्यगीताचा आशय, सांगीतिक अविष्कारदृष्ट्या चाली आणि आंगिक अभिनय, मुद्राभिनय हा सर्वच आविष्कार एकसंधपणे पाहिला तर बैठकीच्या लावणीचे हे नवे रूप असल्याचे लक्षात येईल, असे मार्मिक अवलोकन त्या करतात.

तारा भवाळकर या जशा लोकसाहित्यमीमांसक आहेत, तशाच त्या स्त्रीवादी दृष्टिकोनातून विचार करणाऱ्या विचारवंतही आहेत. स्त्रीवादाच्या अनुषंगाने त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्यातील एक म्हणजे ‘मायवाटेचा मागोवा’ हे पुस्तक. हे पुस्तक श्रीरामपूरच्या शब्दालय प्रकाशनने 1998 मध्ये प्रसिद्ध केले. या पुस्तकात दहा लेखांचा समावेश केला आहे. ‘लोक साहित्याचे पुनराकलन’ हा या संग्रहातील दुसरा लेख. हा लेख त्यांनी स्त्रीवादविषयक चर्चासत्रामध्ये वाचला होता. या लेखाच्या सुरुवातीला ताराबाईंनी स्त्रीवाद म्हणजे काय याचे स्पष्टीकरण दिले आहे. ते थोडक्यात असे -आधुनिक जीवनातील अनेक विचारधारांची निर्मिती पाश्चिमात्य जगतात झाली. आणि नंतर त्या जगभर पसरल्या. त्यातीलच एक म्हणजे स्त्रीवाद… स्त्रीकडे पाहण्याचा, तिला वागवण्याचा, तिच्याशी वागण्याचा दृष्टिकोन जगभर एकाच प्रकारचा आहे. आणि तो पुरुषांच्या तुलनेने गौणत्वाचा आहे. विषमतेचा आहे. स्त्री गौण आहे; पुरुषप्रधान आहे; ही भूमिका कुटुंब, समाज, धर्म, राज्य, अर्थ, संस्कृती आदी सर्व क्षेत्रात अनेक वर्षे नांदत आहे. आणि ही विषमता केवळ लिंगाधारित विषमता आहे… स्त्री-पुरुष विषमतेतून खरे तर विषमतेच्या जाणिवेतून, आधुनिक जगात स्त्री विषयक चळवळी सुरू झाल्या. यांतून संघर्षरत असलेल्या स्त्रीच्या जाणिवा अधिक विकसित झाल्यानंतर स्त्रीला स्वतःच्या स्थितीचा आणि म्हणूनच एकूणच मानवी समाजातल्या स्त्री-पुरुष नातेसंबंधाचा पुनर्विचार करण्याची तीव्र गरज भासू लागली… सृजनशील स्त्रीला आपले गौणत्व नेहमीच जाचत होते. प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध तिने आवाज उठवायला सुरुवात केली आणि या चळवळीतून सिमॉन द बोव्ह या फ्रान्समधील स्त्रीच्या ‘द सेकंड सेक्स’ या ग्रंथाची निर्मिती झाली 1949 मध्ये प्रकाशित झालेल्या या ग्रंथाचा जगाच्या पाठीवरील सर्व प्रमुख भाषांमध्ये भाषांतर झाले. आणि यातून स्त्रीवादी चळवळीचा उदय झाला. आपल्याकडेही अनेक विचारवंत स्त्रिया या चळवळीशी निगडित झाल्या. त्यातील एक म्हणजे डॉ. तारा भवाळकर. ताराबाईंनी स्त्रियांच्या भावना त्यांच्या गीतातून, कथातून, किंवा म्हणी – उखाण्यातून कशा प्रकट झाल्या आहेत याचे चित्रण अनेक लेखांमध्ये केले आहे. ‘लोकसाहित्याचे पुनराकलन’ या लेखांमध्येही त्याचा प्रत्यय येतो. त्या लिहितात – 

देवा नारायणा माझी विनंती फार फार |

जन्म बायकांचा नको घालूस वारंवार ||

अशा स्त्री जन्माला नकार देणाऱ्या ओव्या स्त्रीगीतातून अक्षरशः शेकड्याने सापडतात, असे ताराबाई म्हणतात. त्या पुढे म्हणतात, “लोकगीतातून एरव्ही रामाचे कितीही कौतुक केले असले तरी त्याने गर्भवती सीतेचा परित्याग करणे स्त्री मनाला रुचलेलं नाही. तो लोकगीतातील स्त्री मनाला फार मोठी जखम करून गेलेला दिसतो.

सीता पतिव्रता नाही रामाला कळाली |

वनाच्या वाटेवरी चाके रथाची गळाली ||

असे म्हणून पुरुषसत्तेचा प्रतिनिधी असलेल्या रामाची अन्यायी वृत्ती चव्हाट्यावर मांडली आहे. ‘किती चतुर बायका’ हा लेखही स्त्रीवादी दृष्टिकोनातून लिहिला आहे. या लेखामध्ये शंकर-पार्वतीचा एक संवाद उद्धृत केला आहे. या संवादात शंकर आणि पार्वती एकमेकाला कोडी घालत असतात – ऐका हो शंकरा बोलाचा अर्थ करा असे पार्वतीने म्हटल्यावर संशयग्रस्त शंकर विचारतात – ऐकलं ग पार्वती बोलाचे अर्थ किती? कोणाला हात देत होतीस, कोणाला पाय देत होतीस, कोणाच्या मुखाकडे पाहून तू हसत होतीस या ओळींमध्ये शंकराने एका परीने पार्वतीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे. यावर पार्वती मिश्किलपणे म्हणते- कासाराला हात देत होते, सोनाराला पाय देत होते, आरशाच्या मुखाकडे पाहून मी हसत होते हे उत्तर ऐकत राहताना पार्वतीच्या ओठाच्या कोपऱ्यात हसू दिसायला लागतं. हे उत्तर देणारी पार्वती नक्कीच चतुर आहे; असे ताराबाई म्हणतात.

 सारांश डॉ. तारा भवाळकर यांचे लोकसाहित्य संशोधन विचारात घेतले की, त्यांच्या चिकित्सक, मर्मग्राही दृष्टिकोनाचा सहज प्रत्यय येतो. त्यांच्या विपुल लेखनाचे सार थोडक्यात सांगायचे झाले तर त्या लोक संस्कृतीशी, स्त्रीच्या मानसिकतेशी अंत:करणापासून जोडल्या गेल्या आहेत.

– समाप्त –

लेखक : डॉ. वि. दा. वासमकर

सांगली (महाराष्ट्र)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “गोष्ट तशी जुनीच…” – भाग – २ –  लेखिका : डॉ. तारा भवाळकर ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? जीवनरंग ❤️

☆ “गोष्ट तशी जुनीच…” – भाग – २ –  लेखिका : डॉ. तारा भवाळकर ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित

(ही बहिणही रडत भेकत माहेरी आली. तर सगळे तिला म्हणाले, ” हे बघ, एकदा नीट पाहून तुझे आम्ही लग्न लावून दिलं होतं. आता तू आणि तुझं नशीब. ” ) – इथून पुढे — 

” असं कसं, असं कसं ? आता तिच एकटीचच नशीब कस?

त्या नव-याचही नशीब नाही का ?आणि तिची सासू आमच्या

मरून गेलेल्या आईचा काय म्हणून उद्धार करते ? मोठ्या ताईला आणि दुस-या माईला दोन दोन मुलगे कसे झाले मग आधी ? त्या नाहीत का याच आईच्या लेकी. “

” पुरे ग, तुझी अक्कल नको पाजळू. प्रसंग काय, ही बोलतीय काय ? “

” काय चुकीचं बोलले ? अं, खरं तर हे तुम्ही तिच्या सासरच्या माणसांना ठणकावून सांगायला हवं होतं. आणि तिचा नवरा एवढा शिकला सवरलेला हिला काडीमोड न देताच असं कसं दुसरं लग्न करतो ? बेकायदेशीर नाही का ते ? ही आपली रडत भेकत इथं आली. तिथं नव-याला आणि सासूला नाही का जाब विचारायचा. लग्नाच्या आधी माहित होतं ना त्यांना आम्ही चौघी बहिणीच आहोत म्हणून. “

“अग पण तुला विचारलय का कुणी ? अं? आम्ही मोठी माणसं आहोत ना ? तिला त्यांनी घटस्फोट दिला आणि उद्या ही पोरींच्या सकट माहेरी पाठवून दिली तर सांभाळणार कोण त्यांना ? “

” मग काय त्याच घरात राहणार काय ही सवती बरोबर ? “

” काय करणार मग? त्याच्याशी बोलणं झालंय आमचं. तो हिलाही नांदवायला तयार आहे. हा मोठेपणाच की त्याचा. “

” डोंबलाचा मोठेपणा. मुलगा किंवा मुलगी होण्यात बाईचा काहीच दोष नसतो, असला तर पुरुषाचाच असतो हे शास्त्रानं सिद्ध झालय. तुम्हालाही हे माहित आहे आणि त्यालाही हे माहीत आहे. “

” अग पण त्यांच्या वंशाला मुलगा हवा असला तर त्यांना ? “

” कशाला पण ? मुलगी नाही का वंशाचं नाव मोठं करीत ? आणि मुलगा व्यसनी, मठ्ठ, गुन्हेगार झाला आणि एकुलता एक म्हटलं की हमखास अती लाडानी तो तसाच होतो, तर मग त्या वंशाचं नाव काय कोळश्यानं लिहीणार आहेत का हे लोक ? “

” अग बाई, काय तोंडाला हाड आहे का नाही तुझ्या ? जरा शुभ बोलायला काय होतं तुला ? “

” तुम्ही सगळी करणी अशुभ करा. “

” जाऊ दे, मरु दे. आता हिचचं एकदा लग्न करून द्या. मग हिची चुरुचुरू बोलणारी जीभ काय करते ते दिसेल “

अखेर वडीलच म्हणाले 

” हिने आजवर माझं काहीच ऐकलं नाही. ” ते ही थकले होते आता.

” काॅलेजला जाऊ नको म्हटलं, गेली. मैदानावर मुलांच्या बरोबर खेळू नको म्हटलं तर अर्धी चड्डी घालून उंडारतीय. तोंड सुटल्यासारखी कुठे कुठे भाषण करतीय. कोण हिच्याशी लग्न करणार? सज्जन घरात तर हिचा निभाव लागणं कठीण! “

” कुणी सांगितलं तुम्हाला माझं लग्न करा म्हणून. आणि यांना सगळ्यांना जी सज्जन घरं पाहून दिली होती त्यांनी काय दिवे लावलेत ? “

खरंतर तिचं म्हणणं सगळ्यांना मनातून पटत होतं. पण कबूल करवत नव्हत. घरातला विरोधही दिवसेंदिवस बोथट होत गेला होता.

तिला जे जे करावसं वाटत होतं ते ते ती करतच होती. पण वडिलांच्या कडून पैसे घेणे तिने कधीच बंद केलं होतं. हायस्कूल मध्ये ती सतत वरच्या वर्गात होती. त्यामुळे तिला फी पडत नव्हती. शिवाय किरकोळ खर्चासाठी शिष्यवृत्ती मिळत होती. सतत कुठल्या ना कुठल्या स्पर्धेत तिला बक्षीस मिळत होती. इतकं करून कॉलेजला इतर मुलींच्या सारखे तिचे नखरे नव्हते. नटण्या मुरडण्याची, दाग दागिन्यांची तिला आवड नव्हती. मोजके पण व्यवस्थित कपडे आणि नीटनेटकी स्वच्छ रहाणी. तरी अशी काय भणंगासारखी राहते ? मुलीच्या जातीला शोभेसं राहू नये का? बांगड्या नाहीत, गळ्यात नाही. काही नाही. घराण्याची अब्रू काढते नुसती. अशा कुरबुरींच्याकडे तिने कधीच लक्ष दिल नाही. कॉलेजच्या दुसऱ्या वर्षापासूनच तिने एका कारखान्यात अर्धवेळ नोकरी धरली होती. एक श्रीमंत सेवाभावी गृहस्थानी केवळ बायकांना स्वावलंबी होता यावं म्हणून हा कारखाना सुरू केला. तिचं कामातलं कौशल्य, लोकसंपर्क साधण्याची कला, कष्टाळूपणा, प्रामाणिकपणा याची नोंद वरिष्ठांनी कधीच घेतली होती. तिचं काॅलेजच पदवीचं वर्ष संपलं आणि मालकांनी तिला मुद्दाम बोलावून घेतल.

“आता काय करणार आहेस ?”

“तसं काही ठरवलं नाही. पण काहीतरी कायमची नोकरी, कामधंदा करायचा आहे हे निश्चित. “

” आहे हेच काम वाढवायला आवडेल तुला?”

” म्हणजे ?”

“एक नवीन युनिट सुरू करायचय. खास ग्रामीण महिलांसाठी. इथं कोणती 

उत्पादन करायची, महिलांना प्रशिक्षण कसं द्यायचं, दर्जा कसा वाढवायचा, बाजारातला खप कसा वाढवायचा अशा सर्वांगीण जबाबदारी घेणाऱ्या व्यक्तीच्या शोधात मी आहे. तुझी इच्छा असेल तर ही जबाबदारी घेण्यासाठी मी तुला निमंत्रण देतोय असं समज. “

क्षणभर ती गोंधळली. पण दुस-याच क्षणी तिच्या नजरेत आणि अविर्भावात असा भाव होता की हे असच व्हायला हवं होतं. मला प्रथम विचारलं याच्यात काहीच आश्चर्य नाही. तरी मृदूपणाने ती म्हणाली 

” तुमच्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही. “

आणि आता ? आता ती कारखानामय झाली. घरात राहणं जवळजवळ संपलं. आवश्यक कामासाठीही घरी जायला वेळ मिळेना. अखेर मालकांनीच कारखान्याजवळ तिच्या निवासाची चांगली व्यवस्था केली. एक दिवस शिपाई काम करणारी तिची सहकारी बाई सांगत आली, “बाहेर दोघीजणी तुम्हाला भेटण्यासाठी केव्हाच्या थांबल्या आहेत. तुम्ही मिटींग मधे होतात म्हणून सांगितल, “थांबा”. पण तरीही त्या थांबूनच राहिल्या. आता यातही तिला नवीन काहीच नव्हतं. तिची आणि तिच्या कारखान्याची कीर्ती, व्याप वाढतच होता. कोणी कोणी माणसं अखंड तिच्या भेटीसाठी खोळंबून असत. कधी व्यापारी, छोटे उद्योजक, कधी कुठल्या संस्थेच्या

कार्यक्रमासाठी तिला पाहुणे म्हणून निमंत्रण करणारे आणि कधी कधी काम मागणारे. आता केवळ स्त्रियांसाठी यापेक्षा गरजू आणि पात्र कामगारांसाठी मग त्या स्त्रिया असोत की पुरुष. तिचा कारखाना चालू होता. त्यातून तरुण तरुणी नवनवीन कल्पना घेऊन ताज्या उत्साहाने तिच्या कारखान्यात काम करत होते. माणसातल्या कष्टाळूपणाला आणि प्रामाणिकपणाला तिथे जास्त किंमत होती. दिखाऊ दिमाख त्यांना वर्ज्य होता.

“बाईसाहेब, पाठवू का त्या दोघींना आत ? “

खरंतर आता तिला थोडी शांतता हवी होती. खूप वेळ कामात राहिल्याने शीण आला होता. तरी ती म्हणाली “हो पाठव ” 

दोन ओढलेल्या प्रौढा समोर खालमानेने उभ्या होत्या. फाईल मध्ये पाहतच, अंदाज घेत तिने विचारलं “हं, काय काम होतं ?”

त्रयस्थ स्वर ऐकून त्या आणखीनच काव-या बाव-या झाल्या. तिची मान अजून फाईलमध्येच होती.

” काम हवं होतं. “

हे ही नेहमीचचं.

कसलं काम? काय करायची तयारी आहे ? “

” काहीही “

” कधीपासून येणार? “

” अगदी आजपासूनही. फार गरज आहे हो. “

सलग दोन वाक्य कानावर पडली तेव्हा ती काहीशी चमकली. हळूच नजरेच्या कोपऱ्यातून दोघींच्याकडे तिने पाहिलं. अंदाज खरा होता. क्षणभर ती विमनस्क झाली. आपल्याला वाईट वाटतंय की संताप येतोय हे तिचं तिलाच कळेना. पण आपल्या भावनांच्या वर नियंत्रण ठेवणं आता तिचा स्वभाव झाला होता. त्याखेरीज हा एवढा मोठा व्याप जबाबदारीने सांभाळणं शक्य नव्हतं.

पुन्हा त्यांच्याकडे पाहिलं न पाहिलंस करुन तिनं शिपाई बाईला तिच्या हाताखालच्या व्यवस्थापकांच्याकडे न्यायला सांगितलं आणि त्या बाहेर पडताच व्यवस्थापकांना फोनवरून आवश्यक त्या सूचना दिल्या. दोन महिने गेले. दोन-तीन दिवस कारखान्याला दिवाळीची सुट्टी होती. रितीप्रमाणे सर्वांना दिवाळी भेट दिली गेली.

कारखाना आता शांत वाटत होता.

त्या दोघींच्याकडं तिचं नकळत लक्ष होतं. आता त्या रुळल्या होत्या. बुजरेपणा कमी झाला होता. सुरुवातीला संध्याकाळी थकल्यासारख्या दिसायच्या. आता उत्साही दिसत. दिवाळीची भेटवस्तू घेऊन जाताना आज त्या ताठ मानेने ब

बाहेर गेल्या. दिवाळीची सकाळ. तिने निरोप दिल्याप्रमाणे ठरल्यावेळी त्या दोघी तिच्या घरी गेल्या. आज तीच काहीशी कावरी बावरी झाली होती. आपण केलं ते बरं की वाईट तिचं तिलाच ठरवता येत नव्हतं. तरी समाधान होतच. दारातून प्रसन्नपणे तिने दोघींना हात धरुन आत आणलं. कोचावर बसवत म्हणाली, ” या, ताई, माई. खूप बरं वाटलं. “

” तुम्ही ओळखलतं? “

“तूच म्हणा. मी प्रथमच तुम्हाला ओळखलं होतं. तुमची परिस्थिती माझ्या कानावर येत होती. पण मी जाणीवपूर्वक घराकडे पाठ फिरवली होती. आपली विश्वं एकमेकांच्या पासून फार दूर होती. रोज खाणाखाणी करत एकमेकांना घायाळ करत जगण्यातनं काय निष्पन्न होणार होत? तुमची पिढ्यान पिढ्यांची चाकोरी, विशेषतः मनांची, माझ्या बोलण्या वागण्याने बदलणार नाव्हती. उलट कटूता वाढणार होती. म्हणून मी शांतपणे घर सोडलं. पण तेव्हाही मला माहीत होतं, एक दिवस नक्की तुम्ही माझ्याकडे येणार आहात. “

” मग आम्ही आलो त्यावेळी ओळख का नाही दिलीसं?”

” फार अवघड गेल मला तेव्हा दुरावा दाखवणं. पण तुमची तुम्हाला नीट ओळख व्हावी म्हणून दूर राहणं मला गरजेचं वाटलं. “

“नाही, खरं आहे. त्यावेळी तू ओळख दाखवली असतीस तर आम्ही परत ऐदीपणानं तुझ्याकडूनच मदतीची अपेक्षा करत राहिलो असतो. त्याचा सर्वांनाच त्रास झाला असता. “

“मुख्य म्हणजे तू म्हणतेस तशी आमची आम्हाला ओळखच पटली नसती. खऱ्या अर्थाने तुझी ही ओळख झाली नव्हती. कामातला आणि स्वावलंबनातला आनंद या दोन महिन्यांनी दिला. महत्त्वाचे म्हणजे स्वातंत्र्याचा अर्थ कळला. बळ कळलं. हो, नाहीतर पूर्वीसारखच म्हणत राहिलो असतो, स्वातंत्र्याच्या नावावर ही भरकटतीय. खरंतर केवढी मोठी जबाबदारी तू पेलतीयेस. स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारी. त्यात बळही आहे. आनंदही आहे. वेगळ्या नशिबाची गरजच काय. “

कितीतरी वर्षांनी सगळ्या बहिणी खऱ्या अर्थाने मायेने जवळ आल्या होत्या. सगळे तपशील त्यात वाहून गेले होते.

— समाप्त —

लेखिका : डाॅ. तारा भवाळकर 

प्रस्तुती : सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – आत्मसाक्षात्कार ☆ मी… तारा… – भाग – ३ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? आत्मसाक्षात्कार ?

☆ मी… तारा… भाग – ३ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

(आत्मसाक्षात्कार म्हणजे स्वत:शीच केलेलं हितगुज किंवा आपणच घेतलेली आपली मुलाखतच म्हणा ना!

डॉ. तारा भावाळकर या लोकसाहित्याच्या आणि लोकसंस्कृतीच्या अभ्यासक समीक्षक आणि संशोधक. या व्यतिरिक्त नाट्य, समाज, शिक्षण इ. अन्य क्षेत्रातही त्यांच्या लेखणीने करामत गाजवली आहे. त्यांनी आपला लेखन प्रवास, कार्यकर्तृत्व, आपले विचार, धारणा याबद्दल जो आत्मसंवाद साधला आहे… चला, वाचकहो… आपण त्याचे साक्षीदार होऊ या. वस्तूत: ही मुलाखत १३ एप्रील १९२१ पासून क्रमश: ई-अभिव्यक्तीवर ५ भागात प्रसारित झाली होती. आज डॉ. तारा भावाळकर विशेषांकाच्या निमित्ताने ही मुलाखत आम्ही पुन्हा प्रकाशित करत आहोत.. उज्ज्वला केळकर )

तारा – याशिवाय ताराबाईंनी आणखी काही लिहिलय की नाही?

ताराबाईलिहिलय….. इथून पुढे )

ताराबाईज्याला संकीर्ण स्वरूपाचं म्हणता येईल, असं ताराबाईंनी खूप काही लिहिलय. सुरुवातीच्या काळात हरिवंश राय बच्चन यांच्या कवितांचा… खंडकाव्याचा… ‘मधुशाला’चा अनुवाद त्यांनी केलाय. निरनिराळी व्यक्तिचित्रे असलेले, ‘माझीये जातीचे’ सारखे पुस्तक त्यांनी लिहिले आहे. ‘मरणात खरोखर जग जगते’ सारखा एखादा कथासंग्रह आहे. ललित लेखन आहे. समीक्षा लिहिल्या आहेत. काही संपादनं केली आहेत. आचार्य जावडेकर यांच्या जेलमधील पत्रांचे संपादन केलं आहे. रा. रं. बोराडे यांच्या ग्रामीण स्त्रीविषयक कथांचे संपादन केले आहे. त्याला प्रस्तावना लिहिल्या आहेत. ज्याला अवडक-चवडक म्हणता येईल, असं आत्मकथनपर लेखनही त्यांनी बरंच केलं आहे.

तारातर ताराबाई, तुमच्या एकंदर लेखनाचा धावता परिचय तुम्ही करून दिलात, आता तुम्हाला मागच्या आयुष्याकडे वळून पहाताना काय वाटत? धन्यता वगैरे… ? आणि ही वाटचाल करताना तुम्हाला मार्गदर्शन कुणाचं मिळालं का? तुम्हाला कुणाचं काही घ्यावसं वाटलं का? किंवा तुमच्यासमोर लेखनाबाबत कुणाचे आदर्श होते, याबद्दल काही सांगाल का?

ताराबाईत्याचं काय आहे, एकाच एका मार्गदर्शकाची ताराबाईंना कधी गरज वाटली नाही आणि ते शक्यही नव्हतं. कारण त्या महाविद्यालयात गेल्या नाहीत. शिकणं आणि शिकवणं या गोष्टी एकाच वेळी त्या परस्परावलंबी अशा करत गेल्या. पण सुदैवाने प्राथमिक शिक्षणापासून, कुणी ना कुणी तरी, ज्यांना आपण गुणी माणसं म्हणतो, मोठी माणसं म्हणतो, ते पाठीवर हात ठेवणारे लोक मिळत गेले. लोकसाहित्याच्या अभ्यासाला दिशा दाखवणारी, रा. चिं. ढेरे, प्रभाकर मांडे यासारखी जेष्ठ मंडळी, नरहर कुरूंदकर, मुंबई विद्यापीठाच्या उषाताई देशमुख, सरोजिनी वैद्य अशी मंडळी भेटत गेली. सरोजिनी वैद्य यांच्या बरोबर त्या अमेरिकेला एक संशोधनपर निबंध वाचण्यासाठीही जाऊन आल्या. १९९१मध्ये आरीझोना स्टेट युनुव्हर्सिटी, अमेरिका येथील चर्चासत्रात त्यांचा सहभाग होता आणि यावेळी त्यांनी आपला लोकसाहित्यावरील संशोधनपर निबंध वाचला होता.

शांताबाई शेळके यांनी ताराबाईंचे लोकसाहित्यावरचे लेखन वाचल्यानंतर म्हंटले होते, ‘ताराबाई स्त्रीकेन्द्रित लेखन करतात. स्त्रियांविषयी पोटातिडिकेने लिहितात पण स्त्रीमुक्तीवाल्यांच्या लेखनात जी उंच पट्टी जाणवते, ती ताराबाईंच्या लेखनात नाही. त्यांचे लेखन आक्रोशी नाही. ’ कोल्हापूरला ताराबाईंना एक पुरस्कार मिळाला होता. ‘मंगल पुरस्कार’. साहित्य क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल त्यांना तो दिला गेला होता. हा पुरस्कार शांताबाई शेळके यांच्या हस्ते देण्यात आलेला होता. त्यावेळी बोलताना हे उद्गार त्यांनी काढले होते. हे भाषण चालू असतानाच अखिल भारतीय मराठी साहित्य संमलनासाठी शांताबाईंची एकमताने निवड झाल्याची बातमी आली. त्यामुळे हा प्रसंग ताराबाईंच्या विशेष स्मरणात आहे.

बेळगावच्या इंदिरा संत जवळिकीच्या. कुसुमाग्रज हे नेहमीच पाठीशी होते. ताराबाईंच्या ‘लोकनागर रंगभूमी’ पुस्तकाचं पु. ल. देशपांडे यांनी विशेष कौतुक केलं होतं. पुण्याला किर्लोस्कर शताब्दीच्या निमित्ताने भाषणे करायची संधी, त्यांना पु. ल. देशपांडे यांच्या प्रशस्तीमुळे मिळाली होती. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी पत्र पाठवून विश्वकोशात अतिथी संपादक म्हणून काम करण्याची विनंती केली होती. त्यावेळी विश्वकोशात लोकसाहित्य हा विषय प्रथम समाविष्ट झाला. असे ताराबाईंच्या पाठीवर हात ठेवणारे, प्रोत्साहन देणारे असे अचानक भेटत गेले. जगण्याच्या प्रवाहात, कुणी येतात, भेटतात, कुणी हात सोडून जातात, तसं त्यांच्याबाबतीतही झालं.

अडचणी येतच असतात. एकीकडे नोकरी, घर सांभाळणं, लेखन, भाषण, संशोधन या सगळ्या गोष्टी एकाच वेळी करत असताना, काही बर्‍या-वाईट गोष्टी घडत असतात. ताराबाई म्हणतात, ‘वाईट ते सोडून द्यायचं!’

ताराताराबाईंच्या आयुष्यात अडचणी आल्या, पण त्याचप्रमाणे अचानक आनंद देणार्‍या घटनाही घडल्या असतीलच ना!

ताराबाईहो. तर! नशिबाने चांगली माणसंही भेटत गेली. प्रोत्साहन देणारी माणसं भेटत गेली.

क्रमश: भाग ३ 

डॉ. ताराबाई भावाळकर

संपर्क – ३, ’ स्नेहदीप’, डॉ. आंबेडकर रास्ता, सांगली, ४१६४१६ मो. ९८८१०६३०९९

 प्रस्तुती – सौ उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ अलविदा मित्रा… ☆ डॉ. शैलजा करोडे ☆

डॉ. शैलजा करोडे

? मनमंजुषेतून ?

☆ अलविदा मित्रा… ☆ डॉ. शैलजा करोडे ☆

(सरत्या वर्षाला निरोप )

मित्रा तुला अलविदा म्हणतांना खूप गहिवरून आलंय रे

तू नव्याने आलास तेव्हा तुझं जंगी स्वागत झालं

एक आनंदतरंग घेऊन आलास तू माझ्या जीवनात

माझ्या सुखदुःखाच्या क्षणांशी एकरूप झालास

संकटसमयी माझं बळ शक्ती ठरलास

माझ्या आनंदात दिलखुलासपणे सहभागी झालास

तुझ्या कुशीत मी कधी अश्रूंनाही वाट मोकळी करून दिली

तू आंजारलं गोंजारलंस प्रेमानं सांत्वन केलंस

… आणि आता क्षण येऊन ठेपलाय …. तुला निरोप देण्याचा

 

तुझ्याशी खूप बोलायचयं… काही सांगायचयं … पण तू तर निघालास

काय म्हणालास मित्रा ?.. काळ कोणासाठी थांबलाय ?

बरोबर आहे मित्रा तुझं ….

माझीचं सगळी गात्रं थकलीत, मीच नाही धावू शकले तुझ्या वेगाने

 

 

तू निघालास मित्रा पुन्हा कधीही परत न येण्यासाठी

पण तुझ्या आठवणी मी जपून ठेवल्यात ह्रदयकुपीत

अलविदा मित्रा…… अलविदा.. अलविदा.. अलविदा….

 

© डॉ. शैलजा करोडे

नेरुळ नवी मुंबई मो. 9764808391

ईमेल – karodeshailaja@gmail.com 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून  ☆ माझी कामाठीपुर्‍यातली भिक्षुकी – मी धूपार्तीचा भिक्षुक.. ! – भाग – २ – लेखक : श्री तात्या अभ्यंकर ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

??

☆ माझी कामाठीपुर्‍यातली भिक्षुकी – मी धूपार्तीचा भिक्षुक.. ! – भाग – २  – लेखक : श्री तात्या अभ्यंकर ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆

(साला, मी एक पांढरपेशा उच्चभ्रू? जाऊ दे, तो चर्चेचा विषय आहे! झमझम बारमध्ये महिन्याकाठी सताठशे रुपये पगार मिळणारा मी उच्चभ्रू? ) – इथून पुढे 

त्या गल्लीच्या मागल्या बाजूसच एका चाळवजा इमारतीत वेश्यायवसाय चालतो.. मला त्या लहानश्या खुराड्यातील तेवढ्याच लहानश्या मोरीवजा बाथरुमात नेण्यात आले.. त्या घरची मावशी अन् आजूबाजूच्या वेश्या यांनी मला वाट करून दिली.. एरवी बाराही महिने फक्त पोटातल्या भुकेच्या डोंबाचा अन् पर्यायाने केवळ वासनेचाच वावर असणार त्या खोलीत.. परंतु त्या दिवशी मला तसं काही जाणवलं नाही.. सण-उत्सवाचा, गणपतीच्या वातावरणाचा परिणाम? भोवती त्या वेश्यांची दोन-चार कच्चीबच्ची घुटमळत होती. कुणाच्या हातात गणपतीच्या पुढ्यातलं केळं तर कुणाच्या हाताता आराशीमधली चुकून सुटलेली रंगेबेरेंगी नकली फुलांची माळ, कुणाच्या हातात साखरफुटाणे तर कुणाच्या हातात कुठुनशी आलेली एखादी झांज! मला क्षणभर अभिमान वाटला तो माझ्या उत्साही व उत्सवप्रिय मुंबापुरीचा! काय काय दडवते ही नगरी आपल्या पोटात!

सोबत तो टकला हिजडा होता. त्यानं माझ्या हातात एक नवीन साबणाची वडी आणि स्वच्छ टॉवेल ठेवला..

मी स्नान करून, टॉवेल नेसून बाहेर आलो.. आसपासच्या वेश्यांचं तोंड चुकवून अंगात शर्टप्यान्ट चढवली.. त्या टकल्या हिजड्याचं मात्र मला खरंच खूप कौतुक वाटत होतं.. तो मोरीच्या बाहेरच थांबला होता.. ‘हा आज आपला पाहुणा आहे आणि याला काय हवं नको ते आपण पाहिलं पाहिजे. ‘ एवढी एकच तळमळ दिसत होती त्याच्या चेहर्‍यावर.. ! उच्चभ्रू समजातल्या सो कॉल्ड हॉस्पिटॅलिटीचा त्यानं कोणताही कोर्स केलेला नव्हता.. !

तेवढ्या पाच मिनिटात त्या मावशीने चा करून माझ्या पुढ्यात कप धरला.. कोण ही मावशी? ८-१० वेश्यांचं खुराड सांभाळणारी.. तिनं मी अंघोळीहून येईस्तोवर माझ्याकरता चा देखील टाकाला?!

कपडे घातल्यावर त्या टकल्यानं ते अय्यप्पाचं पवित्र मानलं गेलेलं कुठलंसं वस्त्र उपरण्यासारखं माझ्या खांद्यावर घातलं.. आम्ही त्या खोलीतून बाहेर गणपतीपाशी आलो आणि मी मुख्य गाभार्‍यात शिरलो..

“तात्यासेठ, ये लक्ष्मी है.. इसको बोलो पूजा कैसे करनेका, क्या करनेका.. !”

त्यांच्यातला एक लक्ष्मी नावाचा एक तरूण रूपवान हिजडा छानशी साडीबिडी नेसून तिथंच पूजा करायला म्हणून उभा होता.. माझं सहजच समोरच्या तयारीकडे लक्ष गेलं.. फुलं, अक्षता, अष्टगंध, समया, उदबत्त्या.. सगळी तयारी अगदी अपटूडेट होती.. ते सगळं पाहिल्यावर मी स्वत:ला विसरलो.. आपण एक सुशिक्षित सुसंस्कृत पांढरपेशे आहोत आणि मुंबैच्या कामाठीपुर्‍यात उभे आहोत ही गोष्ट मी विसरून गेलो. माझं मन एकदम प्रसन्न झालं..

सुसंस्कृत, सुसंस्कृत म्हणजे तरी काय हो? नस्ता एक बोजड शब्द आहे झा़लं.. त्या क्षणी माझ्या आजुबाजूचे ते सारे हिजडे सुसंस्कुत नव्हते काय?!

“प्रारंभी विनती करू गणपती.. “

दशग्रंथी तात्या अभ्यंकराने पूजा सांगायला सुरवात केली.. तशी त्या पार्थिवाची प्राणप्रतिष्ठा वगैरे पहिल्या दिवशीच झाली असणार.. मी सांगत होतो ती केवळ संध्याकाळची धूपार्ती!

‘प्रणम्य शिरसा देवं’, ‘शांताकारं भुजगशयनं. ‘, गणपती अथर्वशीर्ष… ‘ च्यामारी येत होते नव्हते ते सारे श्लोक तिथे बिनधास्तपणे आणि मोकळ्या मनाने म्हटले! अगदी गेला बाजार शिवमहिन्म स्तोत्रातल्याही सताठ ओळी मला येत होत्या त्याही म्हटल्या –

महिन्मपारंते परमविदुषो यद्यसदृषि

स्तुतिर्ब्रह्मादिनाम् अपितदवसंनास्त्वयिगिरा:

अथावाच्य..

आता आठवत नाही पुढलं काही.. पण कधी काळी ल्हानपणी मामांकडून शिवमहिन्माची संथा घेतली होती ती आता कामी येत होती. आपल्याला काय हो, शंकर तर शंकर.. तो तर बाप्पाचा बापुसच की!

ओल्या बोंबलाच्या कालवणाने चलबिचल होणारा मी, अगदी पूर्णपणे एका भिक्षुकाच्या भूमिकेत शिरलो होतो… सहीसही ती भूमिका वठवत होतो.. ‘काय साला विद्वान दशग्रंथी ब्राह्मण आज आपल्याला लाभला आहे!’ असे भाबडे कृतज्ञतेचे भाव आजुबाजूच्या हिजड्यांच्या चेहर्‍यावर मला दिसत होते.. त्यांचा तो म्होरक्या टकला हिजडा तर अक्षरश: कृतकृत्य होऊन रडायचाच बाकी होता.. श्रद्धा, श्रद्धा म्हणजे दुसरं तरी काय असतं हो?!

‘गंधाक्षतपुष्पं समर्पयमि.. ‘ असं म्हणून लक्ष्मीला गंध, अक्षता व फुलं वाहायला सांगितलं..

“अबे … उस्मान … वो फुल उधर नजदिक रख ना.. !”

फुलाचं तबक थोडं दूर होतं ते रागारागाने एका हिजड्याने कुणा उस्मानला नीट गणपतीच्या जवळ ठेवायला सांगितलं.. !

गणेशपुजन सुरू असतांनाच, “अबे … उस्मान …”?

पावित्र्याच्या अन् शुचिर्भूततेच्या व्याख्या प्रत्येकाच्या, किंबहुना प्रत्येक समाजाच्या वेगळ्या असतात.. !

“धूपं समर्पयामि, दीपं सर्पमर्पयामि.. ” दशग्रंथी अभ्यंकर सुरूच होते! आणि माझ्या सूचनांनुसार लक्ष्मी सगळं काही अगदी यथासांग, मनोभावे करत होती.. की होता?!

सरते शेवटी पूजा आटपली, आरती झाली.. मला पुन्हा एकदा आतल्या एका खोलीत नेण्यात आलं.. त्या मंडळातले सारे कमिटी हिजडे अगदी कृतकृत्य होऊन माझ्याभोवती जमले होते..

‘अब मुझे जाना होगा.. देर हो गई है.. ‘ असं मी म्हटल्यावर थोडं तरी काही खाऊन गेलंच पाहिजे असा मला त्या टकल्यासकट इतर हिजड्यांनी आग्रह केला.. पाचच मिनिटात कुणीतरी गरमागरम पुर्‍या, छोले, गाजरहलवा असा मेनू असलेलं ताट माझ्या पुढ्यात घेऊन आला..

अखेर दशग्रंथी विद्वान तात्या अभ्यंकर अल्लाजनसोबत तेथून निघाले.. एक वेगळाच अनुभव घेतला होता मी.. गणपतीकडे त्या यजमान हिजड्यांकरता काय मागणार होतो मी? ‘यांचा शरीरविक्रयाचा धंदा चांगला होऊ दे’ – हे मागणार होतो? आणि मुळात त्यांच्याकरता देवाकडे काही मागणारा मी कोण? माझीच झोळी दुबळी होती.. त्यांच्या झोळीत माप टाकायला गणपती समर्थ होता.. !

निघण्यापूर्वी त्या टकल्या हिजड्यानं माझ्या हातात एक पाकिट आणि हातात एक पिशवी ठेवली आणि मला नमस्कार करू लागला.. वास्तविक मलाच त्याच्या पाया पडावसं वाटत होतं.. वयानं खूप मोठा होता तो माझ्यापेक्षा… !

तेथून निघालो. पाकिटात शंभराची एक कोरी नोट होती.. सोबत ही पिशवी कसली?

‘आमच्याकडे जाताना भिक्षुकाला शिधा द्यायची पद्धत आहे.. ‘ अल्लाजानने माहिती पुरवली..

मी पिशवी उघडून पाहिली तो आतमध्ये एका पुढीत थोडे तांदूळ, दुसर्‍या पुडीत थोडी तूरडाळ.. आणि दोनचार कांदेबटाटे होते.. डाळ-तांदुळाचा तो शिधा पाहून मला क्षणभर हसूच आलं..

‘अरे हे काय? डाळ-तांदुळाचा शिधा?’ मी अलाजानला विचारलं..

“डालचावल के अलावा इन्सानको जिंदगीमे और क्या लगता है?!”

अल्लाजानच्या तोंडून सहजच निघालेलं ते वाक्य बी ए, एम ए, पीएचडी… सार्‍या विद्यांना व्यापून त्यांच्या पल्याड जाणारं होतं, गेलं होतं.. !

मला आजही त्या शिध्यातले डाळतांदूळ पुरत आहेत.. !

– समाप्त – 

लेखक : श्री तात्या अभ्यंकर 

प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय १८ — मोक्षसंन्यासयोगः — (श्लोक १ ते १0) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय १८ — मोक्षसंन्यासयोगः — (श्लोक १ ते १0) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

श्रीमद्‌भगवद्‌गीता : शेवटचा अध्याय : १८ : मोक्षसंन्यासयोग 

श्रीमद्भगवद्गीतेचे मराठी श्लोकात पद्यरुपात भावानुवाद करून तुमच्यापुढे सादर करायचा वसा अंगिकारला. इ. स. २०२२ च्या उत्तरार्धात या अभियानाला प्रारंभ केला. उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा सोडणार नाही या नम्र निष्ठेने हे कार्य करीत आलो. भगवंतांची कृपा आणि त्यांचे पाठबळ याखेरीज हे शक्यच नव्हते. किंबहुने हे कार्य त्यांचेच आहे; मी तो केवळ त्यांच्या हातातील लेखणी! हे सद्भाग्य मला दिल्याबद्दल भगवंतांप्रती कृतज्ञता व्यक्त करून आता अठराव्या अध्यायातील अखेरच्या श्लोकांचा भावानुवाद आजपासून सादर करून या अभियानाचा समारोप करीत आहे. शुभं भवतु।

अर्जुन उवाच 

संन्यासस्य महाबाहो तत्त्वमिच्छामि वेदितुम्‌ । 

त्यागस्य च हृषीकेश पृथक्केशिनिषूदन ॥ १ ॥ 

कथित अर्जुन 

महाबाहो ऋषिकेषा केशिनिसूदना मनमोहना

सन्यास त्याग तत्व पृथक जाणण्याची मज कामना ॥१॥

श्रीभगवानुवाच 

काम्यानां कर्माणां न्यासं संन्यासं कवयो विदुः । 

सर्वकर्मफलत्यागं प्राहुस्त्यागं विचक्षणाः ॥ २ ॥ 

*
काम्य कर्माचा त्याग सांगती काही पंडित संन्यास

सर्वकर्मफलत्यागा इतर विचक्षण म्हणती संन्यास ॥२॥

*
त्याज्यं दोषवदित्येके कर्म प्राहुर्मनीषिणः । 

यज्ञदानतपःकर्म न त्याज्यमिति चापरे ॥ ३ ॥ 

*
विद्वान काही म्हणती कर्मा दोषी

त्याग करावा कर्माचा सांगती मनीषी

ना त्यागावी कधी यज्ञ दान तप कर्म

दुजे ज्ञानी सांगती हेचि सत्य धर्माचे वर्म ॥३॥

*
निश्चयं शृणु मे तत्र त्यागे भरतसत्तम । 

त्यागो हि पुरुषव्याघ्र त्रिविधः सम्प्रकीर्तितः ॥ ४ ॥ 

*
प्रथम कथितो तुजसी विवेचन त्यागाचे

सात्विक राजस तामस प्रकार त्यागाचे

नरपुंगवा तुज माझे कथन दृढ निश्चयाचे

भरतवंशश्रेष्ठा घेई जाणुनी हे गुह्य त्यागाचे ॥४॥

*
यज्ञदानतपःकर्म न त्याज्यं कार्यमेव तत्‌ । 

यज्ञो दानं तपश्चैव पावनानि मनीषिणाम्‌ ॥ ५ ॥ 

*
यज्ञदानतप नये त्यागू कर्तव्ये निगडित जीवनाशी

यज्ञदानतप तिन्ही कर्मे पावन करिती मतिमानाशी ॥५॥

*
एतान्यपि तु कर्माणि सङ्गं त्यक्त्वा फलानि च । 

कर्तव्यानीति मे पार्थ निश्चितं मतमुत्तमम्‌ ॥ ६ ॥ 

*
कर्मांसह या अन्यही कर्मे करत राहणे कर्तव्य 

फल आसक्ती त्यागोनीया पार्था आचरी कर्तव्य ॥६॥

*
नियतस्य तु संन्यासः कर्मणो नोपपद्यते । 

मोहात्तस्य परित्यागस्तामसः परिकीर्तितः ॥ ७ ॥ 

*
नियतीदत्त कर्माचा संन्यास नाही योग्य 

मोहाने त्याग तयांचा हाचि तामस त्याग ॥७॥

*
दुःखमित्येव यत्कर्म कायक्लेशभयात्त्यजेत्‌ । 

स कृत्वा राजसं त्यागं नैव त्यागफलं लभेत्‌ ॥ ८ ॥ 

*
समस्त कर्मे दुःखदायक पूर्वग्रहासी धरिले

होतिल तनुला क्लेश मानुनी कर्माला त्यागिले 

असेल जरी राजस त्याग अनुचित ही धारणा

फल त्या त्यागाचे कधिही प्राप्त तया होईना ॥८॥

*
कार्यमित्येव यत्कर्म नियतं क्रियतेऽर्जुन । 

सङ्गं त्यक्त्वा फलं चैव स त्यागः सात्त्विको मतः ॥ ९ ॥

*
विहित कर्मे आचरणे हे जाणुनी देहकर्तव्य

आसक्ती फल मनी न ठेवुनी करणे कर्मकर्तव्य

नाही वासना कर्मफलाची करितो त्यांचा त्याग

पार्था मानिती त्यासी बुधजन सात्विक त्याग ॥९॥

*
न द्वेष्ट्यकुशलं कर्म कुशले नानुषज्जते । 

त्यागी सत्त्वसमाविष्टो मेधावी छिन्नसंशयः ॥ १० ॥ 

*
कुशल अकुशल कर्मांसह त जो करी न भेदभाव

सत्त्वगुणी मेधावी त्यागी निःसंशय तो मानव ॥१०॥

मराठी भावानुवाद  © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘खरे‘ महानपण‘ … ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

श्री सुनील शिरवाडकर

? इंद्रधनुष्य ? 

खरे ‘महानपण‘… ☆ श्री सुनील शिरवाडकर

वीजेच्या मीटरचं रिडींग घेण्यासाठी तो दर महिन्याला नियमितपणे येत असतो. मीटरचा फोटो काढायचा.. आणि जायचं.. पुढच्या आठवड्यात वीज बील आणुन द्यायचं.. हे त्यांचं काम.

त्या दिवशी मला जरा रिकामपण होतं.. त्याच्याकडेही वेळ होता. मग बसलो गप्पा मारत. त्याच्या बोलण्यातुन समजलं.. असे रिडींग घेण्याचं काम साधारण दोनशे जण करतात. आणि हे सगळं चालवण्यासाठी जी एजन्सी आहे त्याचा मालक एक मोठा राजकीय पुढारी आहे.

तसं आपण ऐकुन असतोच.. या या पुढार्यांचा हा असा बिझनेस आहे वगैरे.. त्यामुळे मला फारसं आश्चर्य वाटले नाही. हे जगभरच चालतं. अमेरीकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश देखील एका मोठ्य तेल कंपनीचे मालक होतेच. कित्येक क्रिकेटपटू, अभिनेते हॉटेल व्यावसायिक असतात हेही ऐकुन असतो. या एवढ्या पैशाचं ते करतात तरी काय असा सामान्यांना प्रश्न पडतोच. उपजीविकेसाठी काही उद्योग धंदा करणे वेगळे.. आणि हे वेगळे.

या पार्श्वभूमीवर मला आठवले लोकमान्य टिळक.

लोकमान्य टिळक.. त्यांची देशभक्ती.. त्यांचं कार्य याबद्दल आपण सगळेच जण जाणुन आहे. पण टिळक उपजीविकेसाठी नेमकं काय करत होते हे फारसं कोणाला माहित नाही. केसरी हे वर्तमान पत्र ते चालवत.. पण त्याकडे टिळकांनी व्यवसाय म्हणून कधीच बघितले नाही.

काही काळ त्यांनी फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून नोकरी केली. पण आगरकरांशी काही वाद झाल्यानंतर त्यांनी ती नोकरी सोडली. टिळक घरचे तसे खाऊन पिऊन सुखी होते. पण सार्वजनिक कामांसाठी अतिरिक्त पैसा हा लागतोच. त्यासाठी मग काय करावे असा त्यांना प्रश्न पडला. टिळकांना कायद्याचे ज्ञान उत्तम प्रकारचे होते. त्यांनी ठरवलं.. आपण विद्यार्थ्यांना वकिलीचे शिक्षण द्यायचं.. वकिलीच्या शिक्षणाचे क्लास काढायचे.. त्यातुन पैसा उभा करायचा.

पुण्यातील हा बहुधा पहिला खाजगी कोचिंग क्लास. सुरुवातीला त्यांच्यावर टिकाही झाली.. पण त्यांनी मनाची तयारी केली होतीच. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कायद्याचं शिक्षण घ्यायला मुले येऊ लागली. कायद्याच्या शिक्षणासोबतच टिळक आपल्या विद्यार्थ्यांना अप्रत्यक्षरित्या राजकारणाचे धडेही देऊ लागले. टिळकांच्या तालमीत तयार झालेले ही तरुण मुले आपापल्या गावी जाऊन वकिली करता करता राजकारण पण करु लागले. थोडक्यात काय तर.. टिळकांना त्यांच्या राजकारणासाठी एक भक्कम यंत्रणा क्लासच्या माध्यमातून उभारता आली.. आणि हे सगळं उत्तम प्रकारे अर्थार्जन करता करता.

तशीच गोष्ट महात्मा फुले यांची. फुले यांनी फारसं राजकारण केलं नाही. पण समाजकारण मात्र केलं. सामाजिक कामे करत असताना.. समाजसेवा करत असताना म. फुल्यांनी आपल्या शेतीवाडी कडे अजिबात दुर्लक्ष केलं नाही. शेतीत त्यांनी अनेक नवनवीन प्रयोग केले. पुण्यातील मांजरी शिवारात त्यांची जमीन होती. दहा बारा माणसं कायमस्वरूपी कामासाठी होती.. आणि गरज पडली तर अजुनही मजुर रोजंदारी वर असायचे. शेतीच्या कामासाठी १५-२० बैल होते.. झालंच तर २-३ गायी होत्या. दरमहा शेकडो रुपयांची उत्पन्न त्यातुन जोतीरावांना मिळत होतं. पुण्यातुन मोठ्या रुबाबात ते कधी घोड्यावरुन.. तर कधी घोडागाडीतुन शेतीची पाणी करायला येत.

विदेशी भाज्या, फळे लावण्याच्या बाबतीत लोकांमध्ये गैरसमज होते. पण जोतीरावांनी जेव्हा कोबी, फुलकोबी, टॉमेटो, मोसंबी, अंजीर, डाळींब अशी वेगवेगळी पिके घेतली.. त्यातुन चांगला पैसा कमावला.. ते पाहून आजुबाजुचे शेतकरीही त्यांचं अनुकरण करु लागले.

जोतीराव एक बांधकामांचे ठेकेदारी होते ‌येरवडा येथील पुलाच्या बांधकामाचा ठेका त्यांनीच घेतला होता. बांधकाम पुर्ण झाल्यावर त्यांनी सर्व मजुरांना आपल्या मांजरी येथील बागेत मोठ्या थाटात जेवण दिलं होतं.

खडकवासला येथील तलावाच्या बांधकामासाठी दगड पुरवण्याचे कंत्राट जोतीरावांनी घेतले होते. पुण्यातील गंजपेठेतील आपल्या दुकान वजा ऑफिसमध्ये बसून जोतीराव हे सगळे व्यवहार करत.

टिळकांनी काय.. किंवा जोतीरावांनी.. राजकारण, समाजकारण करताना त्यांनी पैसे कमावण्यासाठी जे केलं ते सचोटीने. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे त्यांनी मिळवलेला पैसा केवळ लोकांसाठी.. विशेषतः विद्यार्थ्यांसाठी वापरला होता.

केवळ स्वतःसाठी.. स्वतःच्या गोतासाठी व्यवसाय.. उद्योगधंदे करणारे.. साम्राज्य उभे करणारे आजचे हे राजकीय पुढारी.. त्यांच्या तुलनेत समाजासाठी आपला पैसा खर्च करणारे पदरमोड करणारे शंभर वर्षापुर्वीचे राजकीय, सामाजिक नेते म्हणुनच महान वाटतात.

© श्री सुनील शिरवाडकर

मो.९४२३९६८३०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “एकमेवाद्वितीय…” – माहिती संकलक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

📚 वाचताना वेचलेले 📖

“एकमेवाद्वितीय…” – माहिती संकलक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

लंडनमधे एक चौकात सावरकरांचा अर्धकृति पुतळा आहे. हा तिथे बसवू नये म्हणून Conservative पक्षाने संसदेत वाद घातला होता, पण सरकारने सांगितले…….

…. “इंग्लंडच्या सर्व शत्रुंमध्ये जे सर्वश्रेष्ठ आहेत, सावरकर हे त्यातील एक आहेत. इंग्लंड हे भाग्यवान राष्ट्र आहे, त्याला सावरकर यांच्यासारखा चारित्र्य संपन्न, प्रखर राष्ट्रभक्त आणि कमालीचा बुद्धिमान शत्रु मिळाला.”

सावरकर…. एकमेवाद्वितीय…

१) हिंदुस्तानला संपूर्ण स्वातंत्र्य हवे अशी मागणी करणारे हे पहिलेच पुढारी. सन १९०० मध्ये त्यांनी संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली होती..

२) १८५७ च्या बंडास “स्वातंत्र्ययुद्ध” म्हणून गौरवणारे पहिलेच इतिहास संशोधक.

३) १८५७ च्या समरानंतर हिंदुस्थानातील जनतेला शमवण्यासाठी व्हिक्टोरिया राणीने काढलेल्या पत्रकाला “एक भिकार चिटोरे” म्हणून झिडकारणारे सावरकर पहिलेच, तेही १९०० साली म्हणजे वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी..

४) देशभक्ती केली म्हणून ज्यांची बी. ए. ची पदवी काढून घेतली असे पहिले विद्यार्थी…

५) परदेशी मालाची होळी करणारे सावरकर हे पहिलेच पुढारी, सन १९०५ मध्येच त्यांनी परदेशी मालावर बहिष्कार व स्वदेशीचा पुरस्कार करण्याचा संदेश दिला, मात्र कॉंग्रेसच्या गांधींनी १९२१ साली सावरकरांचे हेच तत्व तंतोतंत उचलले आणि लोकप्रिय झाले.

६) परदेशी मालाच्या होळीमुळे देशभक्तीच्या कारणास्तव वसतीगृहातून काढून टाकलेले सावरकर हे पहिलेच विद्यार्थी…..

७) मे, १९०९ मध्ये बॅरिस्टर होऊनही सनद दिली नाही असे सावरकर हे पहिलेच विद्यार्थी…

८) शत्रूच्या राजधानीत जाऊन (लंडन) त्यांच्या विरोधात युद्ध पुकारण्याची हिंमत ठेवणारे सावरकर हे पहिलेच…

९) शत्रूच्या ताब्यातून (मार्सेलिस बंदर) धाडसाने सागरात उडी मारून निसटण्याचा प्रयत्न केलेले सावरकर हे पहिलेच क्रांतीकारी…

१०) प्रसिद्धीपूर्वीच ज्यांचे ग्रंथ जप्त करण्यात आले असे पहिलेच क्रांतीकारक…

११) शत्रूच्या राजधानीत जाऊन लंडनमधील १८५७ च्या स्वातंत्र्यसमराचा सुवर्णमहोत्सव साजरा करणारे सावरकर हे पहिलेच क्रांतिकारी…

१२) शिखांचा इतिहास लिहिणारे पहिले लेखक हे सावरकरच….

१३) स्वातंत्र्यलढ्याकडे जगाचे लक्ष वेधून घेण्याचा पराक्रम करणारे सावरकर हेच पहिले…

१४) भारतीय स्वातंत्र्यलढ्यासाठी सर्व देशातील क्रांतिकारकांची संघटना उभारणारे सावरकर हेच पहिले… त्यासाठी तुर्की, रशियन, आयरिश, इजिप्शियन, फ़्रेंच इ. क्रांतीकारकांशी संपर्क केला होता…

१५) विसाव्या शतकात २ जन्मठेपींची शिक्षा सुनावण्यात आलेले सावरकर हे एकमेव आणि फक्त सावरकरच…

१६) अंदमानच्या कारावासात भिंतींवर काट्याने आणि खिळ्याने महाकाव्य रचणारे महाकवी एकमेव सावरकर…. तसेच सुमारे ६००० पंक्ती कोठडीत लिहिल्या, मुखोद्गत करून बाहेर आल्यावर प्रकाशित करण्याचा महापराक्रम करणारे एकमेव असे सावरकर…

१७) बालपणी वहीनी व बहिणीसोबत ओव्यांच्या भेंड्या खेळताना त्यात नवनवीन ओव्या रचून त्यात स्वातंत्र्याची प्रेरणा गुंफू पहाणारे सावरकर हेच एकमेवाद्वितीय…

१८) तुरुंगात असताना मराठी व्याकरणातील वृत्ते आठवत नाहीत म्हणून नवी वृत्ते रचून मराठी भाषेच्या व्याकरणात भर घालणारे सावरकर हेच एकमेव… व्याकरणात त्या वृत्तांना “वैनायक” म्हणून ओळखले जाते.

१९) अस्पृष्यांना रत्नागिरीत विट्ठल मंदीरात प्रवेश मिळवून देणारे सावरकर हेच पहिले.

२०) एका अस्पृश्याने शंकराचार्यांच्या गळ्यात हार घालण्याची घटना घडविणारे सावरकर हेच पहिले…

२१) अस्पृश्य लोक स्पर्श करू शकतील असे मंदिर स्वखर्चाने बांधवून घेणारे पहिले सावरकरच.. कै. श्री. भागोजी कीर यांनी सावरकरांच्याच प्रेरणेतून रत्नागिरीत “पतितपावन” मंदिर बांधले.

२२) भाषाशुद्धीचे महत्व सांगणारे सावरकरच..

२३) सगळे सुशिक्षित लोक इंग्रजीला वाघिणीचे दूध म्हणून गौरवीत असताना, मातृभाषा व राष्ट्रभाषेचा अभिमान देशात जागवणारे फक्त सावरकरच पहिले…

२४) प्रत्यक्ष साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून, “लेखण्या सोडा, बंदुका हाती घ्या” असा दिव्य दाहक संदेश देणारे पहिले साहित्यिक सावरकरच…

२५) शास्त्रशुद्ध अभ्यास करून देवनागरी लिपी टंकलेखनास (टायपिंगसाठी) सुयोग्य बनवणारे सावरकरच…. लिपीमध्ये सुधारणा करणारा जगातील एकमेव नेता आणि लोकोत्तर पुरूष म्हणजे फक्त सावरकरच……

 

माहिती संकलक : अज्ञात 

प्रस्तुती : श्री सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – ☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ “सीतायन” –  लेखिका: डॉ. तारा भवाळकर  ☆ परिचय – श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “सीतायन” –  लेखिका: डॉ. तारा भवाळकर  ☆ परिचय – श्री जगदीश काबरे

पुस्तक :  सीतायन

…वेदना-विद्रोहाचे रसायन

लेखिका: डॉ. तारा भवाळकर

प्रकाशक: मनोविकास प्रकाशन, पुणे

प्राचीन भूतकाळ हा अंधाऱ्या गुहेसारखा असतो. त्याच्यासंबंधी नेमकी अशी कोणतीच विधाने करता येत नसतात. एक हत्ती आणि सात आंधळे या गोष्टीतल्यासारखी संशोधकाची स्थिती होते. काही प्रकाशकणांच्या आधारे लेखक सामुग्रीची जुळवाजुळव करतो आणि ती अभ्यासुन आपले मत मांडतो. भारतीय इतिहासाच्या संबंधात हे अधिकच खरे आहे. कारण भूतकाळासंबंधीच्या साधनसामुग्रीचा अभाव ही एक इथल्या इतिहासाची बुद्धिनिष्ठ सत्यान्वेषी मांडणी करण्यातील अडचण आहेच; पण त्याचबरोबर ब्राह्मणी विचारपद्धती हाही त्यातील एक प्रमुख अडसर आहे. येथील विद्वान हे एकाच वर्ग संस्कृतीत वाढलेले आहेत. कारण त्यांनाच फक्त अध्ययन आणि अध्यापनाचा अधिकार होता… शिक्षणाचा अधिकार होता. म्हणून त्यांच्या मनाची जडण-घडण ठेवणसुद्धा एकसारखी आहे. हा साचा ठरून गेला आहे. त्यापेक्षा वेगळी भूमिका मांडणाऱ्यांच्या अंगावर ते वस्सकन धावून जातात, तुटून पडतात. त्यांना फक्त आपण वाचलेली पुस्तके दखलपात्र वाटतात आणि बाकीची सगळी चिकित्सक पुस्तके त्यांना पिवळी पुस्तके वाटतात.

आतापर्यंत जेवढी रामायणे लिहिली गेली वा दृकश्राव्य माध्यमात दाखवली गेली ती सगळीच रामाचा गौरव करणारी होती. त्यात फक्त रामाच्या गुणकर्तृत्वाचे गोडवे गाईले गेले, त्याच्या पराक्रमाचे, पौरुषाचे, मर्यादा पुरूषोत्तमाचे कौतुक केले गेले. सीता पतिव्रता असल्यामुळे तिला मिळाले दुय्यम स्थान! स्त्रियांच्या बाबतीत ही संस्कृती नेहमीच पक्षपाती राहिलेली आहे हे वेळोवेळी सिद्ध झालेच आहे. कारण या संस्कृतीने पुरुष वर्गालाच न्याय दिला आहे. या पार्श्वभूमीवर ‘सीतायन’ या पुस्तकात मात्र आजवर सातत्याने अन्याय झालेल्या, दुर्लक्षिल्या गेलेल्या सीतेला यथोचित न्याय देण्याचा, तिची भूमिका मांडण्याचा, समजावून घेण्याचा आणि राम-सीतेतील नात्याचा योग्य सांस्कृतिक अन्वयार्थ लावण्याचा लोकसंस्कृतीच्या अभ्यासातून आणि जनमानसात रुजलेल्या रामायणातून तारा भावाळकरांनी सीतेची वेदना चपखल शब्दात मांडली आहे.

तसे पाहिले तर आजचे वाल्मिकी रामायण खूप अर्वाचीन आहे. बुद्धकाळानंतरचे ते आहेच. कारण यवनांचेही उल्लेख त्यात आढळतात. त्याअर्थी ते अलेक्झांडरच्या स्वारीनंतरचे असावे असेही म्हटले जाते. रामायणाची केवळ दोन-चार संस्करणे झालेली नाहीत. दोन-चारशे संस्करणे झालेली आहेत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. अनेक प्रक्षेप त्यात झालेले आहेत. अनेकांनी आपल्या सोयीप्रमाणे वाटेल ते त्यात घुसडले आहे. त्यातील प्रक्षेप बाजूला काढून निश्चित मूळ वाल्मीकी रामायण बाजूला काढणे वाटते तितके सोपे नाही. ते कठीण काम आहे. प्रक्षिप्त भागांसंबंधी मत प्रतिपादन करताना अनेकदा आपले पूर्वग्रह आड येण्याची शक्यता असते. ज्या गोष्टी आपल्याला पटत नाहीत, आपल्या पूर्वनिश्चित दृष्टिकोनावर आघात करतात, धर्मश्रद्धा पायदळी तुडवतात तो भाग प्रक्षिप्त म्हणून मोकळे व्हायचे. ही ब्राह्मणी विचारवंतांची आणि ग्रंथकारांची अनैतिहासिक एकांगी धर्मश्रद्धवृत्ती अनेकदा कोणत्याही बाबीच्या सत्यन्वेषणाला आड येते, बाधा निर्माण करते.

रामायणाचे मूळ कोणते यासंबंधी विचारवंतांत मतभेद आहेत. ए. वेबर या ग्रंथकाराने रामायणाचे मूळ, बौद्धांच्या दशरथ जातकात आहे असे म्हटले आहे. तो म्हणतो, ‘प्राचीन धार्मिक राजासंबंधी जी बौद्धकथा प्रचलित होती तीच या रामायण काव्याला आधारभूत झाली’ (महाराष्ट्रीय ज्ञानकोश हिंदूस्थान खंड, पृ. ७३). याशिवाय संस्कृतिकोशात म्हटले आहे ‘वाल्मिकीच्या पूर्वी रामाविषयी काही गाथा प्रचलित होत्या. याचे प्रमाण बौद्ध त्रिपिटिकावरूनही मिळू शकते. या रामविषयक गाथा हाच रामकथेचा मूलस्त्रोत असे म्हणता येईल. ‘ (भारतीय संस्कृतिकोश खंड ८, पृ. १७). डॉ. भदंत आनंद कौसल्यायन यांनीसुद्धा रामायणाचा मूलस्त्रोत बौद्धांच्या जातककथा हाच सांगितला आहे. रामायणातील काही श्लोक व जातकातील काही गाथा सारख्या आहेत हे त्यांनी त्यांच्या ‘जातकठ्ठ कथा’ या पुस्तकाला लिहिलेल्या प्रस्तावनेत सप्रमाण दाखविले आहे, ते म्हणतात की, ‘रामकथा का अनगढ़ स्वरूप जातक में है और वाल्मिकी के रामायण में चित्रित उसी का सँवारा स्वरूप है। (खाजगी मुलाखत : डॉ. भदंत आनंद कौसल्यायन). श्री. दिनेशचंद्र सेनसुद्धा दशरथ जातकात रामकथेचा आधार व पूर्वरूप पहातात. (बेंगाली रामायण पृ. ७३). या सर्व बाबी पाहिल्या म्हणजे जातक आणि रामायण यातील संबंध लक्षात येतो. परिणामी आज आपल्या हाती असलेले ‘वाल्मिकी रामायण’ खूपच अर्वाचीन आहे हे लक्षात येते. त्यातही अनेक प्रक्षेप घुसवलेले आहेत. त्यामुळे ‘आम्ही वाचलेले वाल्मीक रामायण तेवढेच खरे’, असे समजणे हा आपलाच कोतेपणा ठरतो.

रामायणासंबंधात अनेक वेगवेगळ्या धारणा आहेत. जगभर ही कथा वेगवेगळ्या रूपात अस्तित्वात आहे. तिच्या अनेक आवृत्या आहेत. अनेकांच्या मते, रामायण ही एक मिथ् (पुराणकथा) आहे. त्याला वास्तवाचा आधार नाही. (पण आजचे हिंदुत्ववादी मात्र रामायणाला हिंदुत्वाच्या अस्मितेपोटी भारताचा प्राचीन इतिहासच समजतात. ) खरे पहाता वाल्मिकीच्या प्रतिभेला स्फुरलेली ती सर्जनशील कलाकृती आहे. वाल्मिकी रामायण घडले की घडले नाही ही गोष्ट महत्त्वाची नाही. राम, लक्ष्मण, सीता कैकेयी, रावण इ. या ऐतिहासिक व्यक्ती होत्या की नाही हेही महत्त्वाचे नाही. महत्वाचे आहे ते हे की रामायण भारतीयांच्या मनामनात कशा पद्धतीने रुजलेले आहे त्याचा ठाव घेणे. ज्यात राम हा क्षत्रिय राजकुमार म्हणून अवतरतो. ब्राह्मण्याचा समर्थक व संरक्षक असे त्याचे रूप लक्षात येते. मनुस्मृती आणि रामायणाचा अनुबंध लक्षात येतो. ‘सीतायन’ ग्रंथाच्या लेखिकेनेही भारतातील वेगवेगळ्या प्रांतातील ‘अंकुशपुराण’, ‘कन्नड चित्रपट रामायण’, ‘चंद्रावती रामायण’, ‘बंगाली दुर्गा पुजा’, ‘दशरथ जातक’ अशा विविध रामायणात लिहिलेल्या कथांचा अभ्यास करून त्यातील सीतेचे सत्व अभ्यासपूर्ण रीतीने मांडलेले आहे. ‘ओवीगीतातील सीतायन’ या प्रकरणामध्ये अडाणी, अशिक्षित समजल्या जाणाऱ्या पण सुजाण मनाच्या स्त्रियांनी ओव्यातून..

“राम म्हणू राम। न्हाई सीतेच्या तोलाचा।

हिरकणी सीतामाई। राम हलक्या दिलाचा।।”

असे म्हणत रामाला धिक्कारले आहे. असे अनेक ओव्यांचा आधार घेत त्यांनी सिद्ध केले आहे. सीतेच्या सोशिकतेचा कडेलोट रामाच्या अहंकारामुळे कसा झाला, तिला कैकेयीच्या सासुरवासामुळे भूमिगत कसे व्हावे लागले याचे विश्लेषणात्मक वर्णन मनाला भावून जाते आणि ‘स्त्री जन्मा तुझी ही कहाणी’, असे वाटल्या वाचून राहत नाही. पुस्तकात रामायणाचा विचार सीतेच्या दृष्टिकोनातून केल्यामुळे लेखिकेने सीतेची प्रतिमा रामापेक्षा उजवी दाखवलेली आहे, असा आरोपही सनातनी रामभक्त करतात; पण खरे पाहता लोक परंपरेचं रामायणाशी असलेलं नातं लक्षात घेता सीतेच्या संदर्भात भारतीय जनमानसाने सीतेलाच झुकते माप दिले आहे हे मराठी, हिंदी, कन्नड, बंगाली, बौद्ध कथा आणि अनेक आदिवासी कथांमधूनही वाचकाच्या लक्षात येते. अर्थात हा वेगळा विचार सनातनी भक्तांच्या पचनी पडेलच असे नाही… किंबहुना तो पचनी पडतच नाही म्हणूनच ते या पुस्तकावर सोशल माध्यमात तोंडसुख घेताना दिसतात. पण सजग विचारी माणसांनी या पुस्तकाचे स्वागतच केलेले आहे. मागच्या शतकात ‘रिडल्स इन हिंदूईझम’ लिहिणारे आंबेडकर, ‘रामायणातील संस्कृतीसंघर्ष’ लिहीणारे प्रा. अरुण कांबळे आणि ‘सच्ची रामायण’ लिहिणारे स्वामी पेरियार यांनी ज्या पद्धतीने रामायणाची विवेकी चिकित्सा केली त्याच तोडीची रामायणाची चिकित्सा करणारे तारा भावाळकरांचे ‘सीतायन’ हे पुस्तक सर्वांनी वाचावे असेच आहे. रामाला उच्चासनी बसवण्याच्या पुरुषप्रधान मानसिकतेच्या पार्श्वभूमीवर या पुस्तकाने सीतेला खरा न्याय दिलेला आहे

परिचय : श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares