मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मी डिसेंबर… ☆ सुश्री त्रिशला शहा ☆

सुश्री त्रिशला शहा

? कवितेचा उत्सव ?

☆ मी डिसेंबर… ☆ सुश्री त्रिशला शहा ☆

नमस्कार लोकहो,

निरोप द्या आता मजला

फिरुन येईन पुढच्या साला

बारा महिन्यातला मी बारावा

नेहमीच असतो नंबर शेवटी माझा

कामी येतो मी तुमच्यासाठी

गुलाबी थंडी असते माझ्याचवेळी

ख्रिसमस आणि दत्तजयंती

साजरी होते माझ्याचवेळी

एकतीस तारीख असते सर्व मासी

पण साजरी होते माझ्याचवेळी

मी जातो म्हणूनच नविन साल

सुरु होते माझ्याच पाठी

म्हणूनच म्हणतो निरोप द्या आता मजला

नविन वर्षाची पहाट येईल आता

स्वागत त्याचे करा जल्लोषी

महिना बारावा म्हणून पुन्हा येईन मी

© सुश्री त्रिशला शहा

मिरज

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ नवं वर्ष -नवी स्वप्नं ☆ सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) ☆

सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

?  विविधा ?

☆ नवं वर्ष -नवी स्वप्नं ☆ सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) 

— वा-यानं फडफडणार कॅलेंडर वार शांत होताच जरा स्थिरावल.डिसेबर २०२४

नजरेला पडल.मनांत आलं.. बघतां बघतां वर्ष सरलं कि.!

कुणा जवळच्याला निरोप द्यावा तसं मनं खंतावलं.

डोळेही ओलावले.

खरं तर कॅलेंडरच शेवटचं पानं म्हणजे नेहमीच नवीन वर्षाच्या चाहुलीचं.!

तसा नववर्षाच्या स्वागतासाठी तरुणाईचा जल्लोष सुरू झाला आहे.त्यादिवसाचे बेत उत्साहाने ठरवून झाले आहेत.

आता नवं वर्षाचे नविन कॅलेंडर भिंतीवर लागेल.तसंही

जुन्याच्या जागी नवीन येत असतंच. !. एका कॅलेंडरच जाणं आणि नव्या कॅलेंडरच येणं एवढाच,याचा सहज सोपा अन् मर्यादित अर्थ आहे का? या कॅलेंडरच्या पानांवर असलेल्या प्रत्येक तारखेसोबत,आपली गती, कार्यक्रमाच्या नोंदी जोडलेल्या आहेत.मागील वर्षाला निरोप देतांना हेही लक्षांत येत अगदीं ठरवलेल्या काही गोष्टी करायच्याच राहून गेल्यात. प्रगतीचे-समाधानाचे ,आनंदाचे जे हवेसे क्षणं मिळाले त्या बरोबरच मनं अस्वस्थ, उद्विग्न करणारे ,डोळ्यांत पाणी येणारे नकोसे क्षणंही आज आपल्या बरोबर आहेत.यातील नकोशा क्षणांच जगतांना झालेलं ओझं मागे ठेवून, आपल्याला हवं ते शुभंकर असं बरोबर घेऊयात. २४ सालचं कॅलेंडर पुन्हा एकदा चाळतांना प्रत्येक तारीख, दिवस यातून स्वतःच स्वतःला वाचूयात.रोजचं जगणं , स्पर्धा, परीक्षा यातून प्रत्येक पानाबरोबर वाटचाल करतांना,धांवतांना मुठीतली कांही स्वप्नं घरंगळून गेली असतील.तर ती, या नवीन वर्षात एक एक गोळा करुयात.काहीवेळा अगदी अनपेक्षितपणे आपलं स्वत:च असं जग,जगणं नव्या वळणावर येऊं लागलंय याचा अनुभव येतो.अशावेळी मनं असंख्य प्रश्नांत भिरभिरत असेल तर प्रश्नांचा पसारा आवरुन सकारात्मकतेने त्याकडे पाहूयात.तसेच आपल्या व समोरच्या कडून कळत न कळत झालेल्या चुका ‘ साॅरी ‘ या शब्दाने दुरावा नाहिसा करतात,याचा
प्रत्यय घेऊयात.जुन्या बरोबर नवी नाती निर्माण करुयात.

ज्यांच्यामुळे आपलं जगणं आत्तापर्यंत वळणदार, समाधानी,सुखावह झालं, त्यांच्या बद्दल वयाचा विचार नकरता कृतज्ञता व्यक्त करुयात. मनांत येत.. आता नवीन कॅलेंडर भिंतीवर लागेल अन् पहिल्या पानावरचा पहिला दिवस हा नुसता उगवणार नाही तर प्रत्येकाच्या मनांतील नव्या स्वप्नांना जागवेल. नव्या संकल्पांसाठी, नव्या उर्मीला साद देईल.!

नव्या वर्षातल पहिलं पाऊलं नव्याचा आरंभ करतांना पहिल्या दिवसालाच चिकटून राहणार नाही याची काळजी घेऊयात.मागील वर्षातील ताणे-बाणे, कडवटपणा, सारं विसरून आनंद, समाधान देत-घेत नवीन वर्षाच स्वागत करुयात. मानसिक, शारीरिक आरोग्यपूर्ण जीवन, समाधान.

यासाठी सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!💐

©  शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

कोथरूड-पुणे.३८.

   मो.९५९५५५७९०८ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ व्रतोपासना – ५. तळपत्या सूर्याची निंदा करु नये ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

🔅 विविधा 🔅

व्रतोपासना – ५. तळपत्या सूर्याची निंदा करु नये ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

उन्हाळा सुरु झाला की मला काही मंडळी आवर्जून आठवतात. त्यांना जणू सूर्य म्हणजे आपला शत्रू वाटतो. आणि कोणत्याही वेळी बाहेर पडले तरी ही मंडळी काय हा सूर्य,किती ते उन अशी सतत तक्रार करत असतात. याला बऱ्याच प्रमाणात मीडिया पण जबाबदार आहे. त्यांच्या प्रॉडक्टच्या जाहिराती मनावर फार परिणाम करतात.

त्या विरुद्ध काही मंडळी सूर्योपासना करतात. त्या विषयी फार आदर वाटतो.

उन्हाळा सुरु झाला की, आपण सहज म्हणतो, ‘ काय हा उन्हाळा. केव्हा संपणार? ‘ पण हा सूर्य तळपलाच नाही तर पुढे पावसाळा कसा येणार? आणि धनधान्य कसे पिकणार? आणि हा सूर्य प्रकाश सगळ्याच जीवसृष्टी साठी आवश्यक असतो. कित्येक कामे सूर्यावर अवलंबून असतात. आपली दिनचर्या जरी घड्याळावर अवलंबून असेल तरी इतर सृष्टी साठी मात्र सूर्य आवश्यक असतो. आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा सूर्य आवश्यक आहे. त्याच्या शिवाय आपण दिवसाची कल्पना सुद्धा करू शकत नाही. आपल्याला आवश्यक आणि महत्वाचे व्हिटॅमिन डी आपल्याला सूर्य प्रकाशात सहज व मोफत मिळते. पृथ्वीवर ज्या भागात काही महिने सूर्य उगवत नाही त्यांना सूर्याचे दर्शन,त्याची उब खूप महत्वाची वाटते.

सूर्याचे अनन्य साधारण महत्व आहे आणि ते सर्वांना माहिती आहे.  ज्या वेळी सूर्य जास्त प्रखर असेल त्यावेळी आपण आपले विविध उपयांनी संरक्षण करु शकतो. त्या साठी सूर्याला नावे ठेवणे योग्य नाही. आपण मोठी माणसे जसे वागतो,बोलतो त्याचेच अनुकरण लहान मुले करतात. आपण जर त्यांना सूर्याचे महत्व सांगितले तर त्यांना आपण चांगली दृष्टी, चांगले विचार देऊ शकतो. आपण ज्या निसर्ग देवता मानतो त्यांचे पूजन करतो त्यात सूर्याचे स्थान खूप महत्वाचे आहे. म्हणून  सूर्याची कधीही निंदा करू नये.

हे व्रत म्हणून आपण नक्कीच आचरणात आणू शकतो.

© सुश्री विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक, संगितोपचारक.

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “क्युआर कोड आणि लग्न” – लेखक : श्री. किरण कृष्णा बोरकर ☆ प्रस्तुती : श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

☆ “क्युआर कोड आणि लग्न” – लेखक : श्री. किरण कृष्णा बोरकर ☆ प्रस्तुती : श्री अमोल अनंत केळकर

आज बऱ्याच दिवसांनी केके उर्फ कमलाकर कदम याला भेटायचा योग आला .

योग कसला केकेनेच फोन करून बोलावले होते.तसाही तो दिवसभर लॅपटॉप घेऊन ऑफिसमध्ये बसूनच असतो.पण फोनवर बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष भेटून गप्पा मारणे आम्हाला आवडते.

गप्पा मारताना त्याच्यासमोर पडलेल्या पाकिटाकडे लक्ष गेले. सहज म्हणून मी ते उघडले तर ती लग्नपत्रिका वाटत होती.पण त्यावर कोणाचेच नाव छापले नव्हते फक्त मोठा क्यूआर कोड होता.

मी ते केके दाखविले.तसा तो हसला.

“भाऊ डिजिटल लग्नपत्रिका आहे ही “

“अरे वा “असे म्हणून मी माझा फोन काढून तो कोड स्कॅन करायचा प्रयत्न केला पण ते ओपन होत नव्हते.

“भाऊ ज्यांना पत्रिका दिलीय त्यांच्याच नंबरवरून ओपन होईल ते” असे म्हणून त्याने स्वतःचा फोन घेऊन स्कॅन केला .ताबडतोब त्याच्या मोबाईलवर लग्न पत्रिका आणि एक गूगल फॉर्म आला .

” हा फॉर्म भरून द्यावा लागेल .तू येणार आहेस का ? ” त्याने विचारले.

मलाही उत्सुकता वाटली.

मी होय म्हणालो.

“हे बघ, त्यानी कधी येणार विचारले आहे . म्हणजे सकाळी की संध्याकाळी ?”केकेने विचारले.

मी गमतीने म्हटले” दोन्ही वेळेस”.

त्याने माणसेच्या कॉलममध्ये दोन आकडा टाकला.

“भाऊ, त्याने मला फक्त संध्याकाळी स्वागत समारंभाला बोलावले आहे .म्हणजे संध्याकाळीच जाऊ.सकाळचे दोन स्लॉट आपल्यासाठी बंद आहेत.”

“दोन स्लॉट ?” मी प्रश्नार्थक चेहरा केला.

“सकाळी अक्षता टाकायला एक स्लॉट .जेवायला दुसरा आणि संध्याकाळी स्वागत समारंभाला तिसरा स्लॉट .”त्याने उत्तर दिले.

मग संध्याकाळी किती वाजता जायचे त्याचे टायमिंग लिहिले .

“भाऊ एक तास पुरे का ? आठ ते नऊ लिहितो “त्याने माझा होकार समजून लिहिले .

“जेवण काय हवेय ?” त्याने पुन्हा प्रश्न केला.

“अरे जे आहे ते खाऊ ? “मी चिडून म्हटले.

“तसे नाही भाऊ .हल्ली लग्नात काऊंटरवर दिसतील ते पदार्थ घेतात आणि नंतर टाकून देतात .त्यांनी लिस्ट दिलीय त्यातून पदार्थ निवड” माझ्या हाती फोन देत तो म्हणाला.

जेवणाचे बरेच पदार्थ लिस्टमध्ये होते.अगदी लोणचे सॅलेड पासून पान सुपारी पर्यंत.वरती माझे नाव होते.

जवळजवळ वीस पदार्थ होते .मी त्यातून भात,पुरी वरण, बासुंदी ,पनीर भाजी, सॅलेड ,आईस्क्रीम सिलेक्ट केले .

“वा भाऊ, मोजकेच जेवतोस ? छान सवय आहे .लग्नाच्या दिवशी संध्याकाळी बरोबर आठ वाजता ये नऊ ला हॉलमधून बाहेर पडू .” केकेने त्याचा मेनू सिलेक्ट करीत फॉर्म सबमिट केला.

लग्नाच्या दिवशी बरोबर आठ वाजता हॉलमध्ये पोचलो .

अरे, हॉलचा दरवाजा बंद होता. लग्न कॅन्सल झाले की काय ?माझ्या मनात शंका .

पण केके बेफिकीर दिसला .त्याने दरवाजावरील क्यू आर कोड स्कॅन केला. ताबडतोब त्याला ओटीपी आला त्याने दरवाजावरील कीपॅडवर ओटीपी दाबला आणि दरवाजा उघडला .

आतमध्ये नेहमीसारखे लग्नाचे वातावरण होते.पण कुठेही गडबड गोंधळ दिसत नव्हता .आम्ही स्टेजवर पाहिले तर वधुवर उभे होते पण त्यांच्या आजूबाजूला फारशी गर्दी दिसत नव्हती.

पण स्टेजच्या दोन्ही बाजूला मोठे क्यूआर कोड दिसत होते .

“भाऊ आहेर किती देणार ?” केकेने विचारले.

“पत्रिका तुला आहे मला नाही ?” माझ्यातील मराठी माणूस जागा झाला .

त्याने हसून मान डोलावली आणि नवऱ्याच्या बाजूच्या क्यूआर कोडवर हजार रु स्कॅन केले .पैसे पोचल्याची रिसीट मिळाली .मग त्याने ओळखीच्या लोकांना भेटायला सुरवात केली .

अचानक नवरा नवरीच्या डोक्यावर ठेवलेल्या डिस्प्ले मध्ये केकेचे नाव आले.तसा केके मला घेऊन स्टेजवर गेला .नवऱ्याची आणि माझी माझी ओळख करून दिली .नवरा अर्थात केके ला ओळखत होता . बहुतेक त्याचाच विद्यार्थी असावा.आमचा एक फोटो काढला .

“चल जेवू या ?”

केके मला घेऊन खाली गेला .तिथेही मोजकीच माणसे जेवत होती . केकेने काऊंटरवर त्याचा नंबर सांगितला आणि आम्ही बाजूच्या टेबलवर बसलो .पाच मिनिटात आमची दोन ताटे घेऊन एक वेटर टेबलवर आला .

आयला ! मी जे पदार्थ सांगितले होते तेच पदार्थ ताटात होते .

“केके ,दुसरा एखादा पदार्थ पाहिजे असेल तर ? “मी केकेच्या ताटातील गुलाबजामकडे पाहून कुतूहलाने विचारले .

“मिळणार नाही ? त्या दिवशी चान्स होता सिलेक्ट करण्याचा तो सोडलास .याला चंचल मन म्हणतात.”

केके शांतपणे जेवू लागला .अतिशय मोजकेच पदार्थ असल्यामुळे आमचे जेवण पटकन संपले अर्थात त्यातील पदार्थ पाहिजे तितके घेण्याची सोय होती पण आमचे पोट भरले होते.सवयीनुसार मी बासुंदी वाटी अजून एक मागून घेतली .

“भाऊ नऊ वाजत आले” त्याने मोबाईल दाखविला .

च्यायला ! मोबाईलमध्ये अलार्म वाजत होता .

“अरे कोण ओळखीचा भेटला तर वेळ होणारच ना ?”मी चिडून केकेला म्हटले.

“त्यासाठी दहा मिनिटे वाढवून दिलीत.पण नंतर बाहेर नाही पडलो तर दरवाजा आपल्यासाठी लॉक होईल आणि नवरा नवरी सोबतच बाहेर पडू .मंजूर आहे का ?” त्याने शांतपणे मला विचारले.

मी नाईलाजाने मान डोलावली .

तिथे पाच सहा ठिकाणी वेगवेगळे सेल्फी पॉईंट ठेवले होते . त्यावर एक व्हाट्स अप नंबर दिला होता. बहुतेकजण वेगवेगळ्या पोजमध्ये सेल्फी काढत होते .ग्रुपफोटो ही बरेचजण काढत होते .फोटो काढले की त्या व्हाट्स अप नंबरवर सेंड करत होते.

“केके हा काय प्रकार ?”माझा पुन्हा एक प्रश्न.

“भाऊ इथे फोटो काढून व्हाट्सअप वर पाठवले की त्यात नवरा नवरीचे फोटो एडिट करून टाकण्यात येतील .म्हणजे एकाच लोकेशनवर सारख्याच पोजमध्ये फोटो रिपीट होणार नाहीत आणि स्टेजवरची गर्दी टाळता येईल. ” केके सहज स्वरात म्हणाला आणि माझा हात धरून दुसऱ्या दरवाजाने ओटीपी नंबर दाबून बाहेर पडला.

बाहेर येताच मी केके ला विचारले “यामागे डोके तुझेच ना ?”

केके हसला .

“भाऊ लग्न मनासारखे एन्जॉय केलेस ना ? थोडी शिस्त आणि कठोरपणा आहे .पण सर्वाना मनाप्रमाणे एन्जॉय करता आले ना .आता बघ ना तुझा वेळ वाचला .तुला पाहिजे ते मनासारखे खाता आले .अन्न फुकट गेले नाही.लोकांची धक्काबुक्की नाही .वधूवराना घाई नाही .स्टेजवर पाकीट द्यायला रांग नाही .तू जितका वेळ दिलास तितका वेळ तुला लग्न एन्जॉय करता आले . तू एक तास दिलास आम्ही तुला एका तासात मोकळे केले .तू जितका जास्त वेळ दिला असतास तितकाच वेळ आम्हीही घेतला असता “.केके हसून म्हणाला .

“पण ही आयडिया कशी आली तुझ्या डोक्यात ?” मी विचारले.

“त्या दिवशी तुकाराम कदमाच्या मुलाच्या लग्नाला गेलो होतो .लग्न दुपारचे जेवणाची आणि लग्नाची वेळ सारखीच त्यामुळे खूप गडबड उडाली होती.अरे ,लग्नाचे विधीही करू देत नव्हते.वधूवर उभे राहिले की लोक आहेर द्यायला धावायचे.पुन्हा फोटोही काढायचे. जेवायला ही गर्दी .त्यात हॉल छोटा .अन्नाची प्रचंड नासाडी .बिचाऱ्या कदमांनी खूप खर्च करून लग्नाचा घाट घातला होता.त्यांच्याकडून काहीच कसर बाकी ठेवली नाही तरीही लोक बडबड करीत होती .नावे ठेवत होती. पैसे खूपच खर्च केले होते पण नियोजन नव्हते .मग मीच ठरविले यावर काहीतरी मार्ग काढायचा . आपल्या पोरांना क्यू आर कोड तयार करायला लावले म्हटले हेच वापरून नियोजन करायचे.त्यात हे लग्न ठरले .मग मी वधू वर त्यांचे आईवडील आणि खास नातेवाईक याची मिटिंग घेतली आणि ही प्रोसिजर सेट केली. दोन्हीकडून किती माणसे येतील ? त्यात दिवसभर कोण असणार ? पटकन येऊन कोण जाणार ? याची वर्गवारी केली .जेवण फुकट घालवायचे नाही हा दोन्ही पार्ट्याचा प्रमुख आग्रह होता.विधी पूर्ण झाले पाहिजे यावर दोघांचे एकमत होते.थोडा वाईटपणा घ्यायला ते तयार होते .मग काय लावले आपल्या पोरांना कामाला .आपल्या पोरांनाही काम मिळाले माझे ही थोडे सुटले तुलाही मनासारखे जेवण मिळाले ” केके माझ्या हातावर टाळी देत म्हणाला .

“धन्य आहेस बाबा तू ” मीही त्याला हात जोडीत म्हणालो .

लेखक : श्री. किरण कृष्णा बोरकर

प्रस्तुती – श्री अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण… भाग – २४ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… भाग – २४ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

मृणाल

मृणाल म्हणजे माझी आतेबहीण. माझ्यात आणि तिच्यात  फार फार तर एखाद्या वर्षाचं अंतर असेल म्हणजे आम्ही तशा बरोबरीच्याच. एकत्रच वाढलो,  एकत्र खेळलो,  बागडलो, मोठ्या झालो आणि आयुष्याला जशी वळणं  मिळत गेली तसं तसे आपापल्या विश्वात रमलो.

पण आज मागे वळून बघताना, मृणाल एक व्यक्ती म्हणून तिचा विचार करताना माझ्या मनात अनेकविध अनेक रंगी भावना जागृत होतात.  कळत नकळत आपण या व्यक्तीमधल्या कोणत्या आदर्श मूल्यांकडे आकर्षित होत गेलो किंवा आजही आकर्षित होतो याचा विचार माझ्या मनात येतो आणि एकाच वयाच्या जरी असलो तरी त्या त्या वयातल्या वैयक्तिक गुणांचे मापन करताना मृणाल माझ्यापेक्षा अनेक बाबतीत सरस्, सर्वश्रेष्ठ होती—आहे  आणि तिच्या या श्रेष्ठत्वाचा पगडा अथवा सरसतेचं  प्रभुत्व माझ्या मनावर लहानपणापासूनच होतं असं वाटतं. 

गोष्टी अगदी किरकोळही असतील. म्हणजे ज्या वयात मला साधी कणिक भिजवता येत नव्हती त्या वयात मृणाल अगदी सफाईदारपणे सुंदर मऊ गोलाकार पोळ्या करत असे.  कुमुद आत्या कधी आजारी असली तर क्षणात ती साऱ्या घर कामाची जबाबदारी लीलया उचलत असे.  अगदी तिच्या आईप्रमाणे घरातलं स्वयंपाक पाणी व इतर सारी कामे, शिवाय आईच्या औषधपाण्याचं वेळापत्रक सांभाळून, सर्व काही आवरून शाळेत वेळेवर पोहोचायची.  शाळेतही अत्यंत हुशार विद्यार्थिनी म्हणून तिची ख्याती होती. एकही दिवस गृहपाठ केला नाही म्हणून तिला शिक्षा झाली नसेल.  सुंदर हस्ताक्षरातल्या तिच्या वह्यांची आठवण आजही माझ्या मनात आहे.  शिवाय ती नुसतीच अभ्यासू किंवा पुस्तकी किडाही नव्हती.  लहान वयातही तिचं वाचन दांडगं होतं.  तिला कोणतंही पुस्तक द्या ते ती एका बैठकीत वाचून काढायची. वाचनाचा वेग आणि आकलन या दोन्हीचा समतोल ती कसा काय साधायची याचं मला आजही नवल वाटतं.  जे पुस्तक वाचायला मला एक दोन दिवस तरी लागायचे ते ती काही तासातच कशी काय संपवू शकते याचं मला नेहमी आश्चर्य वाटायचं आणि अशा अनेक कारणांमुळे असेल पण ही समवयस्क  आतेबहीण  मनातल्या मनात माझी गुरुच बनायची.  नकळत मी ही माझ्या मनाला सांगून पहायची,” मृणाल सारखं आपल्यालाही हे आलं पाहिजे…जमलं पाहिजे.”

एक मात्र होतं तिचं लहानपण आणि माझं बालपण -काळ एकच असला तरी आमच्या भोवतालचं वातावरण वेगळं होतं. मृणाल भावंडात मोठी होती म्हणून तिला जन्मत:च मोठेपण लाभलेलं होतं. आई-वडिलांची, भावंडांची ती अतिशय लाडकी होती हे नि:संशय.  तिचे पप्पा ज्यांना आम्ही “बाळासाहेब” म्हणत असू- ते  एक चतुरस्त्र  व्यक्तीमत्त्व नक्कीच होतं. शिक्षण क्षेत्रामधील एक नामांकित व्यक्ती म्हणून त्यांचा लौकिक होता. शिक्षणाचे महत्त्व त्यांना फार होतं. शिक्षण याचा अर्थ केवळ पाठ्यपुस्तकीय किंवा केवळ जगण्यासाठी उपयुक्त साधन एवढंच नव्हे तर ते कसं चौफेर आणि अवधानयुक्त असावं याबद्दल ते खूप आग्रही होते.  आपल्या तिन्ही मुलांनी नेहमीच उच्च स्थानावर असायला हवं म्हणून ते जागरूकही होते.  त्याबाबतीत ते काहीसे कडक  आणि शिस्तप्रिय मात्र होते.  काहीसं छडी लागे छम छम विद्या येई घमघम  या काव्यपंक्तीचा लाक्षणिक अर्थ त्यांच्या कृतीत जाणवायचा. त्यामुळे त्यांचा धाक वाटायचा.   आदराबरोबर भीती वाटायची आणि मला असंही तेव्हा वाटायचं की मृणालभोवती एक धाक आहे,  काहीसं दडपण आहे.  ज्या मुक्त वातावरणात मी वाढत होते त्यापेक्षा मृणालभोवतीचं वातावरण नक्कीच वेगळं होतं. बाळासाहेबांची आणि माझ्या वडिलांची वैचारिक बैठक,  दोघांच्याही व्यक्तिमत्त्वातील भव्यता जरी समान असली तरी कुठेतरी विचारांच्या प्रतिपादनात नक्कीच साम्य नव्हतं आणि याच फरकाचा परिणाम आमच्या जडणघडणीत होत असावा पण असे जरी असले तरी माझ्या आणि मृणालच्या अनेक आघाडीवरच्या प्रगतीत महत्  अंतर होतं.  हे अंतर पार करण्याची जिद्द माझ्यात नव्हती  पण मी विलक्षण प्रभावित मात्र व्हायची. 

सुट्टीत आम्ही नेहमी एकत्र खेळायचो. विशेषतः आमचे  बैठे खेळ खूपच रंगायचे. त्यातले ठळक खेळ  म्हणजे कॅरम,  पत्ते आणि बुद्धीबळ.  कॅरम आणि पत्ते खेळताना  माझ्या मनात नेहमीच छुपा विचार असायचा की, “मृणालच आपली पार्टनर असावी.  तिच्या विरोधात नको बाई खेळायला.” कारण त्यातही ती अग्रेसरच होती पण त्यात मला जाणवायचा तो तिचा समजूतदारपणा.  खेळताना “कुठे चुकले” हे मात्र ती सांगायची  पण ते सांगताना तिचा सूर अगदी विलंबित लईत असायचा.

तिच्यात आणि माझ्यात खेळताना एक फरक जाणवायचा तो म्हणजे मला खेळायला खूप आवडायचे,  माझी वृत्ती खेळकर होती पण “खेळाडू” हा किताब मला मिळू शकला नाही.  याउलट मृणाल मैदानी खेळात, बैठ्या खेळात,  बॅडमिंटन, टेबल टेनिस सारख्या खेळातही प्रवीण  होती. आमच्या शाळेच्या टीमची तर ती कॅप्टनच होती. अंतर शालेय जिल्हास्तरीय क्रीडा क्षेत्रात तिची उल्लेखनीय कामगिरी होती आणि खेळातलं हे प्राविण्य तिने महाविद्यालयीन स्तरावरही  गाजवलं.  तिला मिळणाऱ्या ट्रॉफीज  पाहून त्या बालवयात, उमलत्या वयात तिच्याविषयी वाटणाऱ्या कौतुकानेच नव्हे तर “मी का नाही तिच्यासारखी होऊ शकत?” या वैष्यम्यानेसुद्धा  मी भारावून जायचे. 

खरं म्हणजे आमच्या परिवारामध्ये वेगवेगळी गुणसंपदा तशी प्रत्येकात होती पण मृणाल मला नेहमीच सर्वगुणसंपन्न वाटायची.  दिवाळीत  तिने काढलेल्या मोठमोठ्या सुबक रांगोळ्या, तिचे भरत काम,  तिचे शिवणकाम,  तिने बनवलेला फराळ या सगळ्यातला तिचा जो उत्कृष्टपणा असायचा त्याने मात्र मी थक्क व्हायचे.  केवळ तिच्या गुणांची यादी देणे हा मात्र माझा या लेखनाविषयीचा उद्देश नक्कीच नाही.

तिच्या आयुष्याचा आलेख मांडताना म्हणजे अगदी शाळेत सतत पहिला नंबर मिळवणाऱ्या शाळकरी मुलीपासून ते इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या गव्हर्नमेंट कॉलेजच्या  डीन पदी पोहोचणारी,  पीएचडीचे अनेक विद्यार्थी घडवणारी, विद्यार्थीप्रिय  एक बुद्धिमान स्त्री म्हणून तिच्याकडे  पाहताना टप्प्याटप्प्यावर माझ्या मनात अनेक प्रश्न आहेत.  अनेकविध गुणांची शिदोरी बांधून देताना त्या अज्ञात परमेश्वराने तिच्या भविष्यातल्या नियतीविषयीचा विचार आणि तरतूद करून ठेवली  होती का?

कुमुदआत्या  गेली तेव्हा मला वाटते मृणाल कॉलेजच्या पदवी क्रमाच्या शेवटच्या वर्षाला असेल.  विनू, अनिल (तिचे  धाकटे भाऊ) तर लहानच होते. खरं म्हणजे अर्धवट वयात ज्यांचं मातृत्व हरवतंं  तेव्हा  त्यांचं  बिथरलेपण काय असू शकतं याची मी नक्कीच साक्षीदार आहे आणि त्याहीपेक्षा जास्त एका क्षणात  प्रौढत्वात विरघळणारी  बाल्याची रेषा मला अधिक कंपित करून गेली.  क्षणात तिने डोळ्यातले अश्रू पुसले होते आणि लहान भावांचे भविष्य आणि वडिलांचं पोरकेपण,  एकाकीपण अत्यंत प्रेमाने आणि जबाबदारीने स्वतःच्या झोळीत पेललं.  एका क्षणात तिने एक वेगळं मातृत्वच  स्वीकारलं जणू आणि आनंदाने नसलं तरी  विनातक्रार तिनं  ते सांभाळलं.  सामान्यातलं असामान्यत्व म्हणजे काय,  साधुत्व म्हणजे काय,  संतपण  कशाला म्हणायचं याविषयीचे अदृश्य सूक्ष्म सूत्र मला मृणालच्या व्यक्तिमत्त्वात नक्कीच शोधता आलं.

कुमुदआत्या गेल्यानंतरचं तिचं आयुष्य म्हणजे खरोखरच एक यज्ञ होता,  एक तपस्या होती.  जगण्याची तिची भूमिकाच पार बदलून गेली होती. भावंडांना आईची उणीव तिने कधीच भासू दिली नाही आणि पहाडासारख्या  शिस्तप्रिय, कडक व्यक्तिमत्त्वांच्या वडिलांसाठीही ती सावली बनून राहिली. स्वतःच्या साऱ्या कायिक, ऐहिक सुखाच्या तिनं जणू काही समिधा केल्या पण आईविना जगताना परिवारातला आनंद टिकवण्यासाठी ती धडपडत राहिली.  विनू  आणि अनिल मार्गी लागल्यानंतर तिने स्वतःच्या आयुष्याचा विचार करायला सुरुवात केली. तोपर्यंत ती चाळीशीत पोहचली होती.  अर्थात  तिने स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर,  करिअरचे उच्चतम टप्पे पार केलेलेच होते. अपार जिद्दीने आणि चिकाटीने शिष्यवृत्ती मिळवल्या, परदेशी सेमिनार गाजवले. विद्यार्थ्यांचे प्रेम मिळवले.  शैक्षणिक क्षेत्रात अत्यंत गरजेचा घटक म्हणजे गुणांकनातला प्रामाणिपणा. तिने तो कायम जपला. स्पर्धात्मक परीक्षेसाठीच्या परीक्षकांच्या पॅनलवर असताना तिला करोडपती बनण्याची अनेक प्रलोभने दाखवली गेली पण तिने ती अत्यंत तात्विकपणे झुगारून लावली आणि त्यासाठी तिला ते पदही सोडावे लागले पण त्यामुळे ती यत्किंचितही  विचलित झाली नाही. 

खरं सांगू जेव्हा मी आणि मीच नव्हे तर तिच्या आजूबाजूचे सारे समवयस्क एका ठराविक चाकोरीतलं सुखी आयुष्य जगत होते तेव्हा मृणाल मात्र जीवनातली अडथळ्यांची शर्यत अथकपणे नेटाने खेळत होती. सर्वगुणसंपन्नतेची  शिदोरी तिला कोणा अज्ञात शक्तीने बांधून दिली होती त्या बळावर ती खंबीरपणे स्वाभिमानाने तिचं जीवन जगत होती.

अनेकवेळा मला ती काहीशी घट्ट विचारांची वाटते. तिच्यात एक क्रिटीक आहे असंही जाणवतं. ती पटकन् किंवा उगीचच समोरच्याला बरं वाटावं म्हणून कौतुक करण्याच्या भानगडीत पडत नाही.हा गुण समजायचा की तिच्या व्यक्तीमत्त्वातला अभाव मानायचा हे मला माहीत नाही. पण ती एक आवडती प्राध्यापिका, प्राचार्य होती. तिने अनेकांना घडवलं याचा अर्थ तिने कुणाही गुणवंताचं मानसिक खच्चीकरण न करता किंवा अवास्तव कौतुकही न करता त्याचा यशाचा मार्ग त्याला दाखवून दिला हे सत्य आहे. शिक्षक कसा असावा याचा ती वस्तुपाठच आहे.

एका अपघातात तिला कायमस्वरूपी अपंगत्व प्राप्त झालं तरी पण कधी असहाय्यतेचं अथवा अधूपणाचं भांडवल करून जगणं तिने मान्य केलं नाही. अशाही परिस्थितीत आजही  कौटुंबिक सुखदुःखाच्या प्रसंगी,  सामाजिक वा  इतर अनेक ठिकाणी तिची मनापासून उपस्थिती असते. 

इतक्या मोठ्या पदावर विराजमान असतानाही निवृत्तीनंतर मिळणाऱ्या वेतनासाठी केवळ सामाजिक करंटेपणाशी,  संकुचित जळाऊ वृत्तीशी तिला विनाकारण लढा द्यावा लागला होता.  स्वतःच्या शारीरिक व्याधींचाही बाऊ न करता केवळ “भागधेय” असं समजून ती कणखरपणे लढत राहिली.  ती शरण कधीच गेली नाही.

आजही आजारी नवऱ्याची मनापासून सेवा करताना तिचा तोल ती कधीही  ढळू देत नाही.  आम्हीच तिच्यावरच्या प्रेमामुळे तिला काहीबाही सूचना देत असतो पण ती एकच सांगते,” ठीक चाललंय्  माझं.  करू शकते मी.  इतका काही त्रास नाहीये.”

अमेरिकेवरून येणाऱ्या धाकट्या भावासाठी आजही त्याच वात्सल्याने ती त्याच्या आवडीचे खाद्यपदार्थ स्वतःच्या हाताने बनवते.  माझ्या मनात नेहमी येतं इतक्या गुणसंपन्न बुद्धिमान व्यक्तीचं आयुष्य कसं असायला हवं होतं..? निवांत आरामदायी…  असं नक्कीच नाही जे आज तिचं आहे.  जगत असताना कदाचित तिच्या हातून फार मोठ्या भावानिक  चुका झाल्या का? कुठेतरी व्यवहारात ती कमी पडली का? की तिच्या आयुष्यातल्या सुखाच्या वेळाच चुकल्या?

ती मला एकदा म्हणाली होती, “ सुख म्हणजे  नक्की  काय असतं ते मला माहीत नाही पण मी माझ्या दुःखाला, वेदनांना शंभर टक्के देऊन  त्यांना मात्र माझ्या ताब्यात ठेवलेलं आहे.”  अशावेळी मला तिच्या स्त्रीत्वात एक कणखर पौरुष दिसतं. 

पुन्हा पुन्हा मी मृणालचा विचार करते तेव्हा मला वाटतं मृणालसारख्या व्यक्ती इतरांनाच उदाहरणादाखल असतात, आधारभूत असतात आणि मुख्य म्हणजे अशा व्यक्ती कधी निराधार नसतातच.  त्यांच्या अंतरातलं बळ हाच त्यांचा आधार असतो.  बाह्य जगाच्या आधाराची त्यांना गरज नसते का? एक मात्र नक्की की स्थितप्रज्ञतेचे प्रवाह  मला तिच्या जगण्यात नेहमी जाणवतात.  खिंड लढवणाऱ्या योध्याचे दर्शन  मला तिच्यात होते.  मी असं म्हणणं म्हणजे अतिशयोक्ती आहे किंवा अवास्तव केलेलं ग्लोरीफिकेशन आहे असं मला या क्षणीही अजिबात वाटत नाही. 

मृणाल या शब्दाचाही मला खरा अर्थ तिच्यात सापडतो… ..  कमळाचा देठ .. ..  तो कुठे दिसतो का?   चिखलात  घट्ट रुतलेला असतो.  आपल्याला दिसतात ती फक्त पाण्यावरची गोजिरवाणी सुरेख उमललेली कमळं… … मृणालही अशीच आहे.  जीवनरूपी दलदलीत  पाय घट्ट रोवून रुतलेली. चेहऱ्यावर मात्र सदैव हास्याचं कमळ फुललेलं. 

 क्रमशः…

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अशोकसुंदरी… ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆

सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये 

? इंद्रधनुष्य ?

☆ अशोकसुंदरी… ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆

साक्षात शंकर महादेवाची पत्नी गणपती आणि कार्तिकेयाची माता असलेल्या पार्वतीला सुद्धा कधीतरी खूप एकाकी वाटे. भगवान शंकर ध्यानात मग्न आणि पुत्र आपापल्या उद्योगात. त्यामुळे तिला वाटले आपल्याला समजून घेणारी आपल्या भावनांची कदर करणारी अशी एक कन्या आपल्याला हवी. एकदा भगवान शंकर तिला इंद्राची राजधानी अमरावती येथे घेऊन गेले. तेथे सुंदर वृक्षवल्ली पाहून पार्वतीला खूप आनंद झाला. तेथे कल्पवृक्ष पाहून तिला खूप आनंद झाला .  तिने आपल्याला एक मुलगी हवी अशी इच्छा बोलून दाखवली. कल्पवृक्षाने तिला एक सुंदर बालिका दिली. पार्वती खुश झाली. तिने तिचे नाव ठेवले अशोक सुंदरी. दुःख दूर करणारी एक सुंदर स्त्री म्हणजे अशोकसुंदरी. अशोकसुंदरी हळूहळू मोठी झाली. तारुण्याने मुसमुसली .तेव्हा पार्वतीने तिच्या लग्नाविषयी विचार सुरू केला. चंद्रकुलात उत्पन्न झालेला राजपुत्र नहुुश हा आपला जावई व्हावा असे तिला वाटले. तिने अशोक सुंदरीला सांगताच तिला सुद्धा ते पटले .एक दिवस हुंड राक्षसाचे लक्ष तिच्याकडे गेले. त्याने तिला लग्नाविषयी विचारले. तिने नकार देताच त्याने तिचे कपटाने अपहरण केले. अशोक सुंदरीने त्याला शाप दिला, मी साक्षात पार्वती देवीची कन्या आहे .तुझा मृत्यू नहुशाच्या हातून घडेल असा मी तुला शाप देते. मग  ती तिथून निसटली. व कैलास पर्वतावर पार्वतीकडे गेली. इकडे घाबरलेल्या हुंडा राक्षसाने नहुशाचे पण अपहरण केले.  तेथील एका दासीने त्याला गुपचूप पळवले आणि वशिष्ठ ऋषींच्याकडे सुपूर्द केले. वशिष्ठ- अरुंधती यांनी त्याचे चांगले पालनपोषण केले. त्याला खूप शिकवले . त्याने हुंड राक्षसाशी युद्ध करून त्याला ठार केले आणि अशोक सुंदरीशी विवाह केला. अशी ही पार्वतीची पर्यायाने शंकर- पार्वती यांची कन्या अशोक सुंदरी.

लेखिका : सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ काही राहून तर नाही ना गेलं? – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शीतल कुलकर्णी ☆

 

📖 वाचताना वेचलेले 📖

काही राहून तर नाही ना गेलं? – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शीतल कुलकर्णी 

           तीन महिन्यांच्या बाळाला

             दाईपाशी ठेवून

        कामावर जाणाऱ्या आईला

                 दाईनं विचारलं ~

     कांही राहून तर नाही ना गेलं ?

        पर्स, किल्ल्या सगळं घेतलंत ना ?

             आता ती कशी हो, हो म्हणेल ?

         पैशापाठी पळता-पळता

       सगळं काही मिळविण्याच्या

        महत्वाकांक्षेपोटी

    ती जिच्यासाठी एवढा आटापिटा

      करतेय तीच तर राहून गेलीय !

 *

      लग्नात नवऱ्या मुलीस सासरी

       पाठवताना लग्नाचा हाॅल

       रिकामा करून देताना

      मुलीच्या आत्यानं विचारलं ~

  दादा, कांही राहून तर नाही गेलं ना ?

            चेक कर जरा नीट..!

       बाप चेक करायला गेला, तर

          वधूच्या खोलीत

     कांही फुलं सुकून पडलेली दिसली.

       सगळंच तर मागं राहून गेलंय.

        २१ वर्षे जे नाव घेऊन आपण

    जिला लाडानं हाक मारत होतो,

     ते नाव तिथंच सुटून गेलंय, आणि

       त्या नावापुढे आतापर्यंत

        अभिमानानं जे नाव लागत होतं,

     ते नावही आता तिथंच राहून गेलंय.

 *

       दादा, बघितलंस ?

   काही मागे राहून तर नाही ना गेलं ?

      बहिणीच्या या प्रश्नावर

  भरून आलेले डोळे लपवत बाप

  काही बोलला तर नाही, पण

    त्याच्या मनात विचार आला~

     सगळं काही तर इथंच राहून गेलंय !

 *

     मोठी मनीषा मनी बाळगून मुलाला

     शिक्षणासाठी परदेशात पाठवलं होतं,

   आणि तो शिकून तिथंच सेटल झाला.

     नातवाच्या जन्मावेळी मोठ्या

      मुश्किलीनं तीन महिन्यांचा

      व्हिसा मिळाला होता,

  आणि निघतेवेळी मुलानं विचारलं ~

      बाबा, सगळं कांही चेक केलंय ना ?

          काही राहून तर नाही ना गेलं ?

         काय सांगू त्याला, की आता..

      आता राहून जाण्यासारखं 

      माझ्यापाशी उरलं तरी काय आहे ..!

 *

            सेवानिवृत्तीचे दिवशी

         पी.ए.नं आठवण करून दिली ~

                 चेक करून घ्या सर ..!

           काही राहून तर नाही ना गेलं ?

     थोडं थांबलो, आणि मनात विचार

             आला, सगळं जीवन तर

       इथंच येण्या-जाण्यात निघून गेलं.

      आता आणखी काय राहून

          गेलं असणार आहे?

 *

      स्मशानातून परतताना मुलानं …

      मान वळवली पुन्हा एकदा,

         चितेकडे पाहण्यासाठी …

               पित्याच्या चितेच्या

           भडकत्या आगीकडे पाहून

              त्याचं मन भरून आलं.

                 धावतच तो गेला

       पित्याच्या चेहऱ्याची एक

         झलक पाहण्याचा

           असफल प्रयत्न केला….

             आणि तो परतला.

                 मित्रानं विचारलं ~

            काही राहून गेलं होतं कां रे ?

 *

          भरल्या डोळ्यांनी तो बोलला ~

      नाही , काहीच नाही राहिलं आता.

        आणि जे काही राहून गेलंय,

        ते नेहमीच माझ्या सोबत राहील.

 *

एकदा… थोडा वेळ काढून वाचा,

   कदाचित …जुना काळ आठवेल,

             डोळे भरून येतील, आणि

          आज मन भरून जगण्याचं

         कारण मिळेल !

 *

  मित्रांनो, कुणास ठाऊक ?केव्हा या जीवनाची संध्याकाळ होईल.

 *

             असं काही होण्याआधी

               सर्वांना जवळ घ्या,

           त्यांच्या पाठीवर हात फिरवा.

         त्यांच्याशी प्रेमानं बोलून घ्या

     जेणेकरुन कांही राहून जाऊ नये ..!                                 

लेखक: अज्ञात

प्रस्तुती :सौ. शीतल कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – मावळला ‘अर्थ – सूर्य’ … – ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? मावळला ‘अर्थ-सूर्य’? श्री आशिष  बिवलकर ☆

अर्थ व्यवस्थेचा | गेला सरदार |

वित्त कारभार | सुधारून ||१||

*

विद्या विभूषित | श्रेष्ठ अर्थतज्ञ  |

राष्ट्रासी कृतज्ञ | देशसेवा ||२||

*

विसावे शतक | सरता सरता |

तारणहारता | व्यवस्थेचा ||३||

*

अर्थव्यवस्थेची | सुधारली नीती |

विकासाची गती | शिल्पकार ||४||

*

मुक्त धोरणाने | बदलली दिशा |

पल्लवीत आशा | देशासाठी ||५||

*

राजकारणात | अंगी मौनव्रत |

संयमी इभ्रत | राखुनिया ||६||

*

अर्थ माळेतील | मणी ओघळला |

आज मावळला | अर्थसूर्य ||७||

.. .. जेष्ठ अर्थतज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ स्मृतिशेष जयप्रकाश पाण्डेय विशेष – कहाँ गए वे लोग ? ☆ हेमन्त बावनकर ☆

💐 स्व. जयप्रकाश पाण्डेय 💐

☆ ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ स्मृतिशेष जयप्रकाश पाण्डेय विशेष – कहाँ गए वे लोग ? ☆ हेमन्त बावनकर

हेमन्त बावनकर

प्रिय मित्रों,

 वैसे तो इस संसार में प्रत्येक व्यक्ति एक विशिष्टता लेकर आता है और चुपचाप चला जाता है। फिर छोड़ जाता है वे स्मृतियाँ जो जीवन भर हमारे साथ चलती हैं। लगता है कि काश कुछ दिन और साथ चल सकता । किन्तु विधि का विधान तो है ही सबके लिए सामान, कोई कुछ पहले जायेगा कोई कुछ समय बाद। किन्तु, जय प्रकाश भाई आपसे यह उम्मीद नहीं थी कि इतने जल्दी साथ छोड़ देंगे। अभी कुछ ही दिन पूर्व नागपूर जाते समय आपसे लम्बी बात हुई थी जिसे मैं अब भी टेप की तरह रिवाइंड कर सुन सकता हूँ। और आज दुखद समाचार मिला कि आप हमें छोड़ कर चले गए। इस बीच न जाने कितने अपुष्ट समाचार मिलते रहे और हम सभी मित्र परमपिता परमेश्वर से प्रार्थना करते रहे कि कुछ चमत्कार हो जाये और हम सब को आपका पुनः साथ मिल जाए। 

कहाँ गए वे लोग ?

इस वर्ष (२०२४) के प्रारम्भ से ही जय प्रकाश जी के मन में चल रहा था कि एक ऐतिहासिक साप्ताहिक स्तम्भ “कहाँ गए वे लोग?” प्रारम्भ किया जाये जिसमें हम अपने आसपास की ऐसी महान हस्तियों की जानकारी प्रकाशित करें जो आज हमारे बीच नहीं हैं किन्तु, उन्होने देश के स्वतंत्रता संग्राम, साहित्यिक, सामाजिक या अन्य किसी क्षेत्र में अविस्मरणीय कार्य किया है।  और २८ फरवरी २०२४ को इस श्रृंखला की पहली कड़ी में पंडित भवानी प्रसाद तिवारी जी की स्मृति में एक आलेख प्रकाशित कर इस श्रृंखला को प्रारम्भ किया। भाई जय प्रकाश जी की रुग्णावस्था में इस कड़ी को भाई प्रतुल श्रीवास्तव जी ने सतत जारी रखा। हमें यह कल्पना भी नहीं थी कि जिस श्रृंखला को उन्होने प्रारम्भ किया हमें उस श्रृंखला में उनकी स्मृतियों को भी जोड़ना पड़ेगा। इससे अधिक कष्टप्रद और दुखद क्षण हमारे लिए हो ही नहीं सकते। 

हम भाई जय प्रकाश जी और श्री विवेक रंजन श्रीवास्तव जी के साथ मिलकर सदैव नूतन और अभिनव प्रयोग की कल्पना कर उन्हें साकार करने का प्रयास करते रहते थे। इसके परिणाम स्वरूप हमने महात्मा गांधी जी के150वीं जयंती पर गांधी स्मृति विशेषांक, हरिशंकर परसाई जन्मशती विशेषांक, दीपावली विशेषांक जैसे विशेषांकों को प्रकाशित किया। डॉ कुंदन सिंह परिहार जी के 85 वे जन्मदिवस पर “85 पर – साहित्य के कुंदन” का प्रकाशन उनके ही मस्तिष्क की उपज थी। ऐसे कई अभिनव प्रयोग अभी भी अधूरे हैं और कई अभिनव प्रयोग उनके मन में थे जो उनके साथ ही चले गए। 

व्यंग्यम और व्यंग्य पत्रिकाओं से उनका जुड़ाव 

व्यंग्यम संस्था तो जैसे उनके श्वास के साथ ही जुड़ी थी। ऐसी कोई चर्चा नहीं होती थी जिसमें व्यंग्यम, अट्टहास और अन्य साहित्यिक पत्रिकाओं की चर्चा न होती हो। व्यंग्यम के वरिष्ठ सदस्यों और व्यंग्यकार मित्रो के दुख का सहभागी हूँ।

व्यंग्य लोक द्वारा – “व्यंग्य लोक स्व. जयप्रकाश पाण्डेय स्मृति व्यंग्य सम्मान” की घोषणा 

श्री रामस्वरूप दीक्षित जी द्वारा प्राप्त सूचनानुसार व्यंग्य लोक द्वारा – “व्यंग्य लोक स्व. जयप्रकाश पाण्डेय स्मृति व्यंग्य सम्मान” की घोषणा की गई है। इस सम्मान में रु 5000 राशि प्रदान करने की घोषणा की गई है। साथ ही पहला सम्मान स्व. जयप्रकाश जी के गृहनगर जबलपुर में प्रदान किया जाएगा। यह एक प्रशंसनीय कदम है। 

डॉ कुन्दन सिंह परिहार जी के अनुसार उन्होने सोशल मीडिया में 700 से अधिक मित्रों द्वारा अर्पित श्रद्धांजलियां और शोक संदेश देखे हैं जो उनके सौम्य व्यवहार और लोकप्रियता के प्रतीक हैं।  व्यंग्यम, अट्टहास, व्यंग्य लोक और अन्य पत्रिकाओं से जुड़े सभी वरिष्ठ साहित्यकारों और व्यंग्यकार मित्रो ने मेरे अनुरोध को स्वीकार कर इस विशेष अंक में भाई जय प्रकाश जी से जुड़ी हुई अपनी स्मृतियाँ और संक्षिप्त विचार श्री विवेक रंजन श्रीवास्तव जी, श्री प्रतुल श्रीवास्तव जी और श्री रमाकांत ताम्रकार जी के माध्यम से  प्रेषित किए।

इस प्रयास में हम आपके संस्मरणों/विचारों को श्रद्धासुमन स्वरूप भाई जय प्रकाश जी को समर्पित करते है।  

बस इतना ही।

हेमन्त बावनक, पुणे 

वर्तमान में बेंगलुरु से 

 संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – संस्मरण ☆ स्मृतिशेष जयप्रकाश पाण्डेय विशेष – एक हरदिल-अज़ीज़ इंसान का विदा होना ☆ डॉ. कुंदन सिंह परिहार ☆

डॉ कुंदन सिंह परिहार

☆ स्मृतिशेष जयप्रकाश पाण्डेय विशेष – एक हरदिल-अज़ीज़ इंसान का विदा होना ☆ डॉ. कुंदन सिंह परिहार

भाई जयप्रकाश पांडेय अचानक ही, असमय, संसार से विदा हो गये। अल्पकाल में ही बीमारी ने उनका जीवन-दीप बुझा दिया, और हम सब उनके मित्र ठगे से देखते रह गये। उनके परिवार के लिए यह अकल्पनीय आघात है। प्रकृति ऐसे ही बेलिहाज हमें जीवन की अनिश्चितता और क्षणभंगुरता का आभास कराती है।

जयप्रकाश जी से संबंध 40-45 वर्ष पुराने हुए। कभी वे एक लेखक संगठन के स्थानीय सचिव और मैं उसका स्थानीय अध्यक्ष हुआ करते थे। तब कई बार विपरीत स्थितियों के विरुद्ध खड़े होने की उनकी दृढ़ता और संगठन-क्षमता का मुझे भान हुआ। वे बड़ी-बड़ी समस्याओं को शान्ति से निपटा देते थे, लेकिन यथासंभव वे लोगों से अपने पुराने संबंधों को बिगड़ने नहीं देते थे। उनके मित्रों की संख्या विशाल थी क्योंकि उनकी नज़र मित्रों की कमियों, कमज़ोरियों पर कम जाती थी। अभी उनके देहान्त के बाद फेसबुक पर मैंने उनके लिए लगभग 700 लोगों की श्रद्धांजलियां देखीं।

मैंने पाया कि पांडेय जी बड़े स्वाभिमानी थे। व्यर्थ में किसी के सामने झुकना उन्हें पसन्द नहीं था। अपने सम्मान के प्रति वे सचेत रहते थे। वे वैज्ञानिक सोच वाले थे। अंधविश्वासों, ढकोसलों के फेर में नहीं पड़ते थे।

जयप्रकाश जी सहज ही मित्रों का उपकार करते थे। मैं लगातार अपनी जन्मतिथि को छिपाता रहा क्योंकि मैं आत्मप्रचार को पसन्द नहीं करता, लेकिन पचासी पर पहुंचने पर उन्होंने मुझे पकड़ लिया और अपने निवास पर आयोजन कर डाला। उन्होंने मेरे ऊपर एक 80-85 पेज की टाइप्ड पुस्तिका निकाल दी जिसमें कई लोगों से लेख मंगवाकर शामिल किये। ऐसे ही मेरे एक व्यंग्य- संग्रह का विमोचन अपने निवास पर कर डाला। पत्रिकाओं में मुझसे पूछे बिना ही वे मेरी रचनाएं भेज देते थे। लोकप्रिय पत्रिका ‘अट्टहास’ के अक्टूबर 24 के अंक के अतिथि संपादक के रूप में उन्होंने जबलपुर के कई व्यंग्यकारों की रचनाएं छापीं। उसमें मेरी एक रचना मुझसे मांगे बिना ही भेज दी। बाद में दिसंबर अंक के लिए भी मेरी एक रचना भेज दी।

जबलपुर में ‘व्यंग्यम’ समूह की अधिकतर बैठकें उन्हीं के निवास पर हुईं जहां वे उपस्थित लेखकों की पूरी खातिरदारी करते थे। बीमारी के दौर में भी उनकी इच्छा पर यह सिलसिला चलता रहा। बीमारी को पराजित करने की उन्होंने पूरी कोशिश की, लेकिन अंततः बीमारी उन पर हावी हो गयी और हमने अपने बहुत प्यारे मित्र और समाज ने एक बहुत मूल्यवान व्यक्ति को खो दिया।

पांडेय जी के द्वारा छोड़े गये शून्य के मद्देनज़र मुझे शायर निदा फ़ाज़ली का शेर याद आता है—

‘उसको रुख़सत तो किया था, मुझे मालूम न था,

सारा घर ले गया घर छोड़ के जाने वाला।’

डॉ कुंदन सिंह परिहार

59, नव आदर्श काॅलोनी, गढ़ा रोड, जबलपुर – 2 

 संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares