मराठी साहित्य – काव्यानंद ☆ माणूस… कवी – डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण – सुश्री नीलिमा खरे ☆

सुश्री नीलिमा खरे

? काव्यानंद ?

☆ माणूस… कवी – डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण – सुश्री नीलिमा खरे ☆

आपण सध्याच्या युगात वेगवेगळे “डेज” साजरे करत असतो.आज १जुलै चा दिवस डॉ.बी सी.राय यांचा जन्म दिवस.. हा दिवस

“डॉक्टर्स डे” मानला जातो .   आजचा दिवस समाजातील वैद्यकीय व्यावसायिक लोकांप्रती आदरभाव व कृतज्ञता व्यक्त करण्याचा!! किमान या एका दिवशी तरी आपण सारे मनापासून,अंत: करण्यापासून त्या सर्वांप्रती व्यक्त होऊ या.

वैद्यकीय व्यवसाय हा थेट माणसाच्या जीवनाशी निगडीत असल्याने समाजाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे.

संपूर्णपणे  ज्ञानाधिष्ठित  असा हा व्यवसाय. वेळेवर व योग्य औषधोपचार झाल्यास संबंधित माणूस जगण्याची /आजारातून बरा होण्याची शक्यता निर्माण होते.बहुतांश डॉक्टर या पेशाकडे केवळ अर्थार्जनाचा व समाजात मानाने व प्रतिष्ठित पणे जगण्याचा दृष्टिकोन ठेवून जगत नसतात.तर एक माणूस म्हणून समाजासाठी आपल्या वैद्यकीय ज्ञानाचा उपयोग करण्यात आनंद मानत असतात.आपले विधित कार्य करत असताना डॉक्टर लोकांना ही समाजाने त्यांच्या विषयी काही भावना जपाव्यात असे वाटले तर त्यात गैर काहीच नाही.

पुण्यातील अनुभवी,ज्येष्ठ व प्रथितयश स्री रोग तज्ञ डॉ. निशिकांत श्रोत्री हे मान्यवर साहित्यिक ही आहेत.त्यांनी स्वतःच्या भावना “माणूस”या कवितेतून व्यक्त केल्या आहेत.

आज या कवितेचा आस्वाद घेऊ या. त्यातील भाव भावना, कवितेतील आंतरिक तळमळ ,कळकळ समजून घेऊ या. त्यातून कवीचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही आपल्याला समजून येणार आहे.

☆ माणूस ☆

*

नका देऊ देवत्व मजला म्हणू नका राक्षस

भावभावनांतुन हिंदोळत साधा मी  माणूस

*

माझे ते जवळी होते अपुले जाणून

कोणाला ना दूर लोटले परके मानून

सेवा हे तर ब्रीद मानले आशा नाही फलास

कधि सावरलो कधी घसरलो परी ना हव्यास

*

देवपूजा करीत आलो मनात ठेवुन भक्ती

मानवसेवा माधवसेवा नाही मनी विरक्ती

मानवतेला कर्म जाणुनी मानिली न तोशीस

भुकेजल्या पाहुनी भरविला मम मुखीचा घास

*

निज आत्म्याचे दर्शन मजला सकलांच्या अंतरी

परमात्म्याची जाण काही नाही मजला जरी

सकल जनांच्या नेत्री मोद बघण्याचा ध्यास

अन्य काही आशा नाही रुचली मन्मनास

©️ डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

रसग्रहण

“माणूस” हे कवितेचे शीर्षक कवितेचा विषय व आशय अगदी सुस्पष्ट करते. त्यामुळे वैयक्तिक माणूस म्हणूनही या कवितेशी आपला संबंध सहजपणे जुळून येतो. डॉक्टर श्रोत्रींनी जीवनाशी संबंधित अनेक भावनांना त्यांच्या कवितांमधून स्पर्श केला आहे .आज माणूस या कवितेतून ते त्यांच्या स्वतःविषयीच्या /स्वतःच्या मनातल्या भावना आपल्यासमोर मांडत आहेत. कवी पेशाने स्त्रीरोगतज्ञ आहेत .

अनेक स्त्रियांच्या प्रसुतीचे वैद्यकीय कार्य डॉक्टर या नात्याने त्यांनी  समर्थपणे पार पाडले आहे. अनेक वेळेला अडल्या-नडल्यांचे ते जणू देवच ठरले असतील किंवा तसे भासले असतील. तसेही वैद्यकीय

व्यवसाय हा संपूर्णपणे माणसाच्या जीवनाशी थेट निगडित असल्याने डॉक्टरांकडे “पृथ्वीवरील देव” या भूमिकेतून आपण  सर्वसामान्य जण बघत असतो. खरंतर असे देवत्व बहाल झाले असता /लाभले असता कुणी ही माणूस सुखावून जाईल,आनंदून जाईल.परंतु सत्याशी प्रामाणिक असलेला आणि जाणीवेने जाणींवाविषयी आणि जाणिवांशी बध्द असलेला डाॅ. श्रोत्री सरांसारखा कवी  माणूस या भूमिकेशी फारकत घेताना दिसतो.या विषयीचे विचार अत्यंत स्पष्टपणे कवीने कवितेतून मांडले आहेत.

नका देऊ देवत्व मजला म्हणू नका राक्षस

भावभावनांतुन हिंदोळत साधा मी  माणूस

मी केवळ डॉक्टर आहे म्हणून मला देवत्व बहाल करू नका असे कवी स्पष्ट करत आहे . कवी पुढे म्हणतो की कदाचित काही लोक ,काही माणसे यांच्या मते ते (डॉक्टर किंवा माणूस म्हणून ) राक्षस किंवा दानव ही असू शकतील. कारण काही वेळेला रुग्णाच्या भावनेशी ,परिस्थितीशी डॉक्टरांना काही घेणे दिले नसते असे समजणारे ही खूप लोक समाजात वावरत असतात. त्यांच्याकडे निर्देश करून कवी म्हणतो की असे जर वाटत असेल तर मला राक्षस मात्र म्हणू नका. मी देवही नाही व राक्षस ही नाही. तर मी एक सर्वसामान्य माणूस आहे ज्याने वैद्यकीय ज्ञान प्राप्त केले आहे .व त्या ज्ञानार्जनामुळे  वैद्यकीय व्यावसायिक म्हणून समाजात वावरत आहे, त्या दृष्टीने कार्यरत आहे. कवी पुढे म्हणतो की मी  सर्वांसारखाच भावभावनांच्या हिंदोळ्यावर  झुलणारा माणूस आहे.चांगले /वाईट ,भले /बुरे अशा भावनांना सामोरे जाणारा मी ही एक सर्वसामान्य माणूस आहे हे  अत्यंत स्पष्टपणे मान्य केले आहे..द्विधा मनस्थितीचा कदाचित खुद्द कवीला सामना करावा लागलेला असू शकतो हे सूचित केले आहे. मनात आलेल्या/ उद्धवलेल्या भावनांचा प्रांजळपणे / प्रामाणिक पणे स्वीकार करणे /ते मान्य करणे यासाठी मनाची एक विशिष्ट धारणा लागते ती या कवितेतून आपल्याला प्रत्ययास येते. खरंतर ही भावना व्यक्त करून कवीने आपण एक चांगला माणूस आहोत हे जाणवून दिले आहे. अशाप्रकारे देव नाही व राक्षस नाही परंतु एक अतिशय निरपेक्ष भावनेने वैद्यकीय क्षेत्रात काम करणारा माणूस म्हणून समाजाने आपल्याकडे पहावे अशी माफक अपेक्षा कवीने या ध्रुवपदातून व्यक्त केली आहे. ती सूज्ञ माणसाला नक्कीच रास्त वाटेल.

माझे ते जवळी होते अपुले जाणून

कोणाला ना दूर लोटले परके मानून

सेवा हे तर ब्रीद मानले आशा नाही फलास

कधि सावरलो कधी घसरलो परी ना हव्यास

कवितेच्या पहिल्या कडव्यातून कवी म्हणतो/ आपल्याला सांगतो की अपुले ज्यांना जाणले म्हणजे जे कवीला आपले वाटले व ज्यांना कवी आपला वाटला ते लोक कवीच्या नेहमीच जवळ होते. “अपुले” या शब्दावरील हा श्लेष अतिशय समर्पक आणि कवितेतील आशयाला पुष्टी देणारा. कवी मनाची प्रगल्भता व साहित्यिक जाण नेमकेपणाने दाखवणारा ही!!

कवीने सर्वांना अपुले जाणून जवळ केले, कुणालाही परके म्हणून दूर लोटलेले नाही . सर्वांना आपले मानून सर्वांशी एकसमान व्यवहार केला. त्यांना वैद्यकीय सेवा प्रदान केली ती रुग्ण आणि डॉक्टर या भावनेने व माणूस व माणुसकीच्या नात्याने सुध्दा.. हे सर्व करण्याचे  कारण म्हणजे समाजातील गरजू लोकांची सेवा हेच जीवन असे ब्रीद कवीने मानले आहे. अशा वेळी सेवा करेल त्याला मेवा मिळेल अशा आशयाची वृत्ती मात्र कदापी मनात ठेवलेली नाही .फळाची आशा मनात कधीच धरली नाही.”आशा नाही फलास” मधील दुसरा श्लेषात्मक अर्थ असा  की फळाला आशा लाभली नाही. कदाचित गरजू लोकांनी कवीच्या मनातील वैद्यकीय व्यावसायिक व माणूस म्हणून जगण्याची भावना जाणली नाही .तशा प्रकारे कधीतरी निराशाही वाट्याला आली असावी .कवी प्रांजलपणे कबूल करतो अशा वातावरणाचा/परिस्थितीचा सामना करावा लागला तेव्हा कधी तरी कवी त्याच्या निरलस मनोवृत्ती पासून दूर झाला.लोकांच्या वागणूकीने बैचेन झाला.तरी ही त्याने कुणाकडून कसली ही अपेक्षा केली नाही.त्याच्या ब्रीदापासून/ ध्येयापासून तो कधी थोडा  घसरला असला तरी बाजूला सरला  नाही.व कुठल्याही प्रकारचा हव्यास  मनात ठेवलेला नाही. निरपेक्षपणे /तटस्थपणे आपले सेवेचे कार्य कवीने अव्याहत चालू ठेवले.वर उल्लेख केल्याप्रमाणे या कडव्यात योजलेले दोन ठिकाणचे श्लेष अलंकार व जाणून,मानून तसेच फलास, हव्यास मधील यमक सुंदर तऱ्हेने  जुळले आहे.साहजिकच यामुळे कवितेला लाभलेली नादमयता मनाला मोहविते.अतिशय साधे,सहज सोपे शब्द पण अर्थ आशयपूर्ण आहे.

देवपूजा करीत आलो मनात ठेवुन भक्ती

मानवसेवा माधवसेवा नाही मनी विरक्ती

मानवतेला कर्म जाणुनी मानिली न तोशीस

भुकेजल्या पाहुनी भरविला मम मुखीचा घास

उच्च शिक्षण घेतले आहे किंवा माणसाला जीवनदान देण्याचे पुण्य किंवा मह्तकार्य करतो आहे अशी भावना मनात येऊन स्वतः देव असल्याची भावना कवीच्या मनात कधीच डोकावली नाही.करता करविता देव आहे ,जी अदृश्य शक्ती आहे तिच्या प्रती त्याने मनोमन श्रद्धा जपली आहे. त्याची मनापासून पूजा केली, त्यामागील खरा भक्ती भाव जपून ,जाणून व ठेवून .हे सर्व केवळ उपचार म्हणून नव्हे. स्वतःचे नेमस्त काम करता करता ते करण्याची प्रेरणा देणारा, ताकद देणारा जो ईश्वर त्याच्या प्रती अगदी मनोमन, खरेपणाने श्रद्धा भाव कवीने जपलेला लक्षात येतो.

मानव सेवा करता करता माधव सेवा म्हणजे कृष्ण सेवा/ कृष्णाची भक्ती ही केली.मानवसेवा हीच माधवसेवा म्हणजे ईशसेवा ही भगवान श्री सत्यसाईबाबांची सुप्रसिद्ध शिकवण कवीने आचरणात आणली आहे.पण महत्वाचे म्हणजे हे करताना मनाला विरक्तीची भावना मात्र जाणवली नाही.माणूस म्हणून जगण्याची ही प्राथमिक जाणीव कवीने  कसोशीने पाळली. रुग्ण सेवा करताना जरी कधी काही निराशा जनक प्रसंग उद्भवले असले तरीही त्यापासून दूर होण्याचा विचार चुकून सुद्धा कवीच्या मनात आलेला नाही. त्या क्षेत्रापासून/ त्या व्यवसायापासून विरक्ती घेण्याचा विचार कधीच मनात आलेला नाही. विरक्ती या शब्दावरील श्लेषही अतिशय सुंदर . आध्यात्मिक विरक्ती व व्यावसायिक विरक्ती असे हे दोन अर्थ अतिशय चपखलपणे येथे कवीने मांडलेले आहेत. त्यातील भावार्थाची सखोलता मनाला स्पर्शून उरणारी. व्यावहारिक पातळीवरील जीवन जगण्याचा आटोकाट व प्रामाणिक प्रयत्न कवीने केला आहे हे सहजपणे लक्षात येते.मानवतेला कर्म मानल्यामुळे त्या प्रतीचे कर्तव्य निभावताना कुठल्याही प्रकारची वेगळी तोशीस स्वतः ला लागत आहे अशी भावना कधीही कवीच्या मनात उद्भवलेली नाही. मानवतेचे कर्म हा कवीच्या जीवनाचा धर्म बनला.

“भुकेजल्या पाहुनी भरविला मम मुखीचा घास” या चरणातील “भुकेजल्या” या शब्दावरील श्लेष अतिशय मार्मिक व मर्मभेदी आहे. भुकेजला म्हणजे केवळ अन्नाच्या दृष्टीने नव्हे तर जो गरजवंत आहे, जो गरजू आहे ,ज्याला कुठल्या तरी प्रकारची भूक आहे तो भुकेजला असा व्यापक अर्थ येथे अभिप्रेत असावा असे वाटते. या ठिकाणी वैद्यकीय व्यवसायातील सेवेची ज्याला गरज आहे तो भुकेजला.. अशा व्यक्तिला सेवा तर दिलीच पण वेळ प्रसंगी स्वतःच्या मुखातील घासही भरवला. “मुखातील घास “या शब्द योजनेतील श्लेष ही अतिशय समर्पक आहे व विलक्षणही आहे. लौकिक अर्थाने “मुखीचा घास” म्हणजे कुणा गरजवंताला /भुकेल्या व्यक्तिला खायला देणे. असे करताना कदाचित देणाऱ्याला स्वतःच्या तोंडचा घास काढून भुकेल्या व्यक्तिला द्यावा लागेल.

येथे या बरोबरच दुसरा अर्थ असा की जी वैद्यकीय सेवा रुग्णाला प्रदान करुन  कवीने त्या बद्दलचा मोबदला म्हणून अर्थार्जन केले असते व त्याला स्वतःच्या व त्याच्याशी संबंधित इतरेजनांच्या मुखात घास घालता आला असता तो त्याने बाजूला सारला/ त्यागला म्हणजे मोफत रुग्णसेवा देली.

या दुसऱ्या कडव्यात ही वर निर्देश केलेले श्लेष अलंकार उत्तम. भक्ती, विरक्ती आणि तोशीस,घास मध्ये  यमक छान साधले आहे.

मानवसेवा,माधवसेवा मधील “मा”चा अनुप्रास लक्षवेधी आहे.साध्या , सोप्या व सुयोग्य साहित्यिक अलंकारांच्या वापरातून कवीने त्याच्या मनातली भावना अतिशय उच्च प्रतीवर नेऊन ठेवलेली आहे.

निज आत्म्याचे दर्शन मजला सकलांच्या अंतरी

परमात्म्याची जाण काही नाही मजला जरी

सकल जनांच्या नेत्री मोद बघण्याचा ध्यास

अन्य काही आशा नाही रुचली मन्मनास

तिसरे कडवे म्हणजे आचरणातली व आचरणाची परिसीमा ठरेल अशी.कवीने ही  भावना स्पष्ट पणे विशद / व्यक्त केलेली जाणवते. स्वतःच्या आत्म्याचे जो खरतर अदृश्य आहे पण त्याची जाण आहे आणि जो प्रत्येकाला प्रिय आहे  त्याचे दर्शन कवीला सगळ्यांच्या अंतरी झाले. सगळ्यांच्यात त्याने स्वतःला पाहिले . स्वतःचा  आत्मा प्रत्येकाला सर्वात जास्त प्रिय असतो.त्या विषयीची भावना /आसक्ती वेगळीच असते.तो भाव, तसे प्रेम इतरांच्या आत्म्यात पाहणे हे खरं तर दुरापास्त.. सर्व साधारणतः कुणी तो विचार ही करणार नाही.परंतु कवीने मात्र जाणीवपूर्वक तो विचार केला व प्रत्यक्षात आणण्यासाठी जीवाचे रान केले.अर्थात स्वतः कवी व इतरेजन यांच्यात भेदभाव केला नाही.स्वत:ला स्वतः साठी जे अपेक्षित असते तोच भाव आ‌जूबाजूच्या , संपर्कात आलेल्या लोकांसाठी ठेवला असा भावार्थ. इतरांच्या अस्तित्वाशी, त्यांच्या भाव भावनांशी अतिशय प्रामाणिक पणे तो समरस होऊन गेलेला आहे.हे सर्व घडताना कवी मान्य करतो की त्याला परमात्म्याची /ईश्वराची जाण जराही नाही. म्हणजे ईश्वराविषयी /त्याच्या अस्तित्वाविषयी त्याला ज्ञान नाही हे कबूल करण्याचा प्रामाणिकपणा कवीने बाळगला आहे /दर्शवला आहे.परोपकारी वागण्याने इतरांना आनंद दिल्याने परमात्मा प्राप्त होतो ,मोक्ष मिळतो अशी जन सामान्यांची समजूत असते.प्रत्यक्षात असे होते का, परमात्मा खरंच अस्तित्वात आहे का याची जाणीव कवीला नाही . अर्थात कवीने अशा प्रकारचा कुठला मोह मनात बाळगला नाही.स्वत:चा लाभ ही कल्पना ही कवीच्या हृदयात नाही.केवळ सद्भाव व  विवेकी विचारांना प्राधान्य देणे हे कवीने महत्वाचे मानले आहे.सर्वांच्या डोळ्यात आनंद बघणे ,सर्वांना सुखी बघणे हाच एक ध्यास कवीच्या मनाने घेतलेला आहे .इतर कसलीही आशा नाही .धन, संपत्ती, पैसा अडका, कीर्ती, प्रसिद्धी त्याच्या मनाला रुचलेली नाही .त्यांची आस नाही.केवळ या साऱ्या गोष्टींकडे पाहून कवीने रुग्णसेवेचे व्रत आचरले नाही.स्वत:च्या कृतीने दुसऱ्या च्या डोळ्यात आनंद पाहणे हा सर्वश्रेष्ठ आनंद आहे अशी कवीची मनोधारणा आहे.आयुष्यभर जतन केलेले तत्वज्ञान कवीने अंत:करणापासून आचरणात आणले आहे.विचाराला आचाराची जोड दिली आहे. “निज आत्म्याचे दर्शन मजला संकलांच्या अंतरी” हा चरण वाचताना श्री शंकराचार्यांनी विशद केलेला अद्वैतवाद प्रकर्षाने आठवतो.मी व समोरची व्यक्ती ही मीच अशी भावना/भूमिका कवीने निरंतर मनात जाणीवपूर्वक जपलेली आहे.व महत्वाचे म्हणजे तसेच आचरण ही कायम केले आहे.ते ही कुठल्याही प्रकारची स्वार्थ भावना मनात न ठेवता!! तसेच दुसरा श्लेषात्मक अर्थ आत्मा व परमात्मा ही एकच आहेत. त्यांच्या अस्तित्वाचा अद्वैत भाव कवीने जाणला आहे.म्हणून कवी स्पष्ट करतो की त्याला परमात्म्याची कुठल्याही प्रकारे जाण जराही नाही.कारण कवीने स्वतःचा आत्मा परिपूर्ण परिपक्व पध्दतीने जाणला आहे.त्या विषयी कसलाही, कुठलाही संदेह अगदी कणभर सुध्दा त्याच्या मनात नाही.त्यामुळे आत्म्याला जे योग्य वाटते,पटते ते कवी मनापासून करतो आहे.त्या आत्म्याला दुसऱ्याच्या डोळ्यातील आनंद पहाण्यात आनंद/मोद होत असल्याने त्याच्या वागण्यात बदल होत नाही.स्वत:च्या आनंदाच्या शोधात व तो प्राप्त करण्यात कवी मनापासून प्रयत्न करत आहे.असे वागताना साहजिकच दुसऱ्या आत्म्याला/परमात्म्याला (पर -दुसरा)ही आनंद लाभणार याची कवीला खात्री आहे.इतरे जनांना आनंद देताना आत्म्याला परमोच्च आनंद मिळणार हे कवी जाणून आहे.

या तिसऱ्या व अंतिम कडव्यात योजलेले श्लेष,यमक अलंकार अतिशय परिणाम कारक आहेत.कवितेतील भावनेला वाचकांपर्यंत समर्थ पणे पोहचवितात.

माणूस या संकल्पनेशी बांधिलकी जपत कवीने आयुष्यात आपला मार्ग कसा अनुसरला व त्यानुसार निरंतर मार्गक्रमणा केली हे या कवितेत सांगितले  आहे. स्वतःच्या जगण्याबद्दलचे व त्याविषयीच्या दृष्टिकोनाचे स्वरूप साध्या ,सुलभ पण तरीही परिणामकारक शब्दात कवीने व्यक्त केले आहे. जगण्याचा आशावाद आणि आदर्शवाद जपताना कवीने स्वतः एक आदर्श घालून दिला आहे असे वाटते, नव्हे  खात्री पटते.अशा पद्धतीने प्रत्येक व्यक्ती/माणूस जर खऱ्या अर्थाने माणूस म्हणून जगला तर साऱ्या मानव जातीचे कल्याण/ हित व तदनुषंगिक संपूर्ण समाजाचे कल्याण होईल हे निर्विवाद. डॉक्टर श्रोत्री यांच्यासारख्या वैद्यकीय व्यावसायिक व्यक्तीने कर्म करताना त्यातील धर्म भाव सश्रद्ध भावनेने  कसा जगावा/जपावा याचा वस्तुपाठ घालून दिला आहे.वैद्यकीय व्यावसायिक व्यक्ती, जागरूक  कवी मन व या दोन्ही गोष्टींचा सुरेख संगम या कवितेत आपल्याला दिसून येतो..

जगण्याचा परिपूर्ण पाठ देणारी व आयुष्याला दिशा देणारी अशी ही कविता आहे. ही सर्व स्तरावर नक्कीच पोहोचली पाहिजे असे वाटते.

मला येथे आवर्जून एक निरीक्षण/मत नोंदवायचे आहे.रसग्रहणासाठी जेव्हा ही कविता पहिल्यांदा वाचली तेव्हा साधी, सोपी वाटली.तेव्हा  यात एवढा खोल व गहन अर्थ सामावलेला आहे हे लक्षात आले नाही.परंतु जसं जसं रसग्रहण लिहायला सुरुवात केली तेव्हा यात मांडलेला जीवनाचा /जीवन विषयक दृष्टीकोनाचा पैस ध्यानात आला..वरवर साधी वाटणारी ही कविता तिच्या अंतरंगात शिरल्यावर किती प्रांजळ, सुसंगत, सुसंवादी, सुसंस्कृत विचार धारा उलगडून दाखविणारी आहे हे लक्षात आले.ही जाणीव या कवितेचे बलस्थान आहे हे मुद्दाम नमूद करावेसे वाटते.चांगल्या/उत्तम काव्याचे हे यश आहे हे निश्चित.. अर्थात याचे सर्व श्रेय कवीला!!

© सुश्री नीलिमा खरे

१४-६-२०२४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ शोध बकुळीचा… ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

सौ. सुचित्रा पवार

☆ शोध बकुळीचा… ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

“या,बाई या,या बाई या

बकुळीच्या झाडाखाली फुले वेचुया

वेचलेल्या फुलांचा हार करूया

आणि कृष्णाच्या गळ्यात हार घालूया”

लहानपणी बाईंनी शिकवलेल्या या गाण्यावर अधून मधून आम्ही नाच करत असायचो.बकुळीच्या झाडाची प्रथम ओळख अशी झालेली.डोळ्यांपुढं ओट्यात फुलं वेचलेलं चित्र यायचं;पण बकुळ फुले कशी असतील?असं वाटायचं.सर्वसाधारण मोगऱ्याची फुले नजरेसमोर यायची आणि प्राजक्ताचं झाड डोळ्यांपुढं दिसायचं.पण बकुळ कधी दृष्टीस पडलं नाही.कलापथक पाहताना मात्र बकुळ,गुलाब,शेवंता अशी पात्रांची नावे असायची.शालेय पाठयपुस्तकात परत कधी बकुळीचा उल्लेख आला नसल्याने जरासा विस्मरणात गेलेला बकुळ पुन्हा

तारुण्यात

“बकुळीच्या झाडाखाली,निळ्या चांदण्यात,हृदयाची ओळख पटली,सुगंधी क्षणात..”

या ओळीं ऐकल्यावर पुन्हा ताजा झाला.या झाडानं जणू वेडच लावलं.डोळ्यांपुढं ते आकाश व्यापणारं झाड,त्याखाली बसलेले दोन प्रेमी जीव,फुलांचा सडा आणि अपरिचित सुगंध आला;पण ते झाड असं स्वप्नवतच वाटायचं.मोबाईल,नेट असलं काही नसल्याने ते सर्च करून बघण्याचा प्रश्न देखील नव्हता त्यामुळं कुठंही बकुळीचा उल्लेख आला की डोळ्यांपुढं मोठा वृक्ष आणि त्याचा खाली पडलेला सडा असं दृश्य यायचं.पुढं कुठंतरी वाचनात आलं की बकुळ झाड कोकणात असते, मग तर त्याला बघण्याची आशा मावळली.स्वच्छ सुंदर गाव स्पर्धेत हातनूर गावाची बातमी वाचत असताना बकुळीच्या झाडाचा उल्लेख आला.शाळेच्या कॅम्पेनिंगला गेल्यावर चौफेर,रस्त्याकडेला कुठं बकुळ झाड दिसतेय का बघितलं.पण ते झाड कसलं असतंय माहीतच नव्हतं त्यामुळं ते शोधूनही उपयोग नव्हता.  आता मोबाईल आल्यावर ‘दुर्मिळ झाडे व प्रजाती’ या फेसबुक ग्रुपवर बरीच झाडे,वेली ,फुले पाहण्याचा योग आला त्यातच बकुळीची फुलं न झाड बघायला मिळाले.

परवा अंगणात खारुताईने आकर्षक छोटी छोटी केशरी फळे टाकल्याचे बघितले पण ती कशाची असावीत ?कळले नाही.आमच्या कॉलनीत रस्त्याकडेला एकसारखीच झाडे बघून एकीला विचारलं,’ही एकसारखीच जंगली झाडं का बरी लावली असतील?’त्यावर ती म्हणाली,”अहो यातली दोन जंगली आहेत आणि बाकी बकुळीची आहेत?”काय?मला आश्चर्याचा धक्काच बसला.क्षणभर ‘युरेका!युरेका!करून ओरडावं की काय?असंच वाटलं.मी जवळ गेले.असंख्य कळ्यांनी नि केशरी फळांनी भरलेलं झाड बघून मला अत्यानंद झाला.मनात म्हणलं,”इतके दिवस तुला शोधत होते पण इतक्या जवळ असून देखील तू मला हुलकावणीच देत राहिलास  ते केवळ तुला कधी न पाहिल्यानेच!मस्त धुंद करणारा सुवास  घेतल्यावर वाटलं,देवघरात ही ओंजळभर फुलं ठेवल्यावर कशाला हवी कृत्रिम उदबत्ती?तसेही देवाने इतकी सुगंधित फुले निर्माण केली आहेत की खरेच त्याला उदबत्ती आवडत असेल का?हा प्रश्नही चाटून गेला.मला अगदी कृतकृत्य झाल्यासारखे वाटले.किती वर्षे याच्या भेटीसाठी वाट पहावी लागली!

“मधूघट भरले तुझ्या दारी,का वणवण फिरशी बाजारी?”

अशीच काहीशी माझी अवस्था!आता दररोज त्या कळ्या फुलण्याच्या प्रतीक्षेत होते.मन:चक्षुपुढे पुन्हा त्या असंख्य कळ्या फुलून झाडावर चांदण्या सांडल्याचे भासमान दृश्य आले.पण अति उन्हामुळं किंवा कमी पावसामुळं असेल,माझी ही मनीषा पूर्ण झाली नाही,मात्र दररोज सकाळी मॉर्निंग वॉकच्या वेळी झाडाजवळून जाताना मंद धुंद सुगन्ध भरभरून लुटताना मन कसं प्रसन्न,खुश होतेय!

याच जन्मात मला बकुळीचं झाड भेटलं न कविना त्याची भुरळ का पडली असावी याचं इंगितही कळलं.

आता पावसाळ्यात अंगणात बकुळ नक्कीच लावणार आणि कधीतरी ते असंख्य चांदणफुलांनी डवरलेलं झाड पाहण्याचं स्वप्न पुरं करणार.बघू,कृष्ण खरेच ते भाग्य भाळी लिहितोय का?

© सौ.सुचित्रा पवार 

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ चार अनुवादित लघुकथा : भाग्यवान // वेळेचा अभाव // संशोधन // ममत्व ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ चार अनुवादित लघुकथा : भाग्यवान // वेळेचा अभाव // संशोधन // ममत्व ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर 

१.  भाग्यवान

दादा आणि भाऊ बालमित्र. दोघेही एका शाळेत, एका वर्गात शिकले. पुढे दादासाहेब शाळेत मास्तर झाले आणि नंतर हेडमास्तर. भाऊसाहेब एका कचेरीत कारकून म्हणून लागले. पुढे हेड क्लार्क झाले.

दोघांची लग्ने जवळपास एकदमच काही महिन्यांच्या अंतराने झाली. दादांचा मुलगा आदित्य आणि भाऊंचा मुलगा गौरव हेही समवयस्क. दादांना पुढे अमेय झाला. भाऊंना मुलगी झाली गौरी. ही सारी मुलेही एकाच शाळेत शिकली.

दादांची मुले आदित्य आणि अमेय अतिशय हुशार आणि प्रखर बुद्धीची. सतत नंबरात असलेली. स्कॉलरशिप मिळवणारी. दादांना त्यांचा अभिमानच नव्हे, तर गर्व होता. भाऊंच्या पुढे ते आपल्या मुलांचं वारेमाप कौतुक करत. आपण किती नशीबवान आहोत, हे वारंवार बोलून दाखवत. त्यांना थोडसं हिणवतसुद्धा. भाऊंची मुलेही हुशार होती, पण दादांच्या मुलांप्रमाणे चमकत्या करिअरची नव्हती.

आदित्य पवईहून एम. टेक. झाला. त्याला चांगल्या पगाराची नोकरी लागली. सुंदर, सुविद्य पत्नी मिळाली. पुढे परदेशात मोठे पॅकेज मिळाले. तो अमेरिकेला निघून गेला. अमेयही त्याच्या पाठोपाठ अमेरिकेला गेला. तिथेच स्थिरावला. तिथेच लग्न केले. संसार मांडला.

गौरव डिप्लोमा झाला. नंतर एम. बी. ए . केले. टू व्हीलर दुरुस्तीचा वर्कशॉप सुरू केला. गोड बोलणं, कष्ट करण्याची तयारी यामुळे गौरवचा धंद्यात चांगलाच जम बसला. पुढे त्याने टू व्हीलर गाड्यांची एजन्सी घेतली. त्याचाही संसार मार्गी लागला.

दादा आणि भाऊ आता निवृत्त झाले होते. ते रोज संध्याकाळी भेटत. एकत्र फिरायला जात. वाढत्या वयानुसार रोजची भेट अधून मधून झाली. नंतर नंतर दुर्मिळ होऊ लागली. दोघांच्या तब्बेतीच्या तक्रारी सुरू झाल्या. गौरव आपल्या वडलांची काळजी घेत होता. अधून मधून आपल्या दादा काकांकडे येऊन त्यांचीही विचारपूस करत होता. त्यांना काय हवं- नको ते बघत होता. गरजेच्या गोष्टी आणून देत होता.

दादांची मुले अमेरिकेत गेल्यानंतर सुरूवातीला एक-दोनदा येऊन गेली. नंतर नंतर मात्र त्यांना यायला वेळ मिळेनासा झाला. दादांना पेन्शन होती. ते काही आर्थिकदृष्ट्या आपल्या मुलांवर अवलांबून नव्हते.

दादांचे प्रोस्टेटचे ऑपरेशन करायचे ठरले. गौरवने दादांच्या मुलांना कळवले. मुले म्हणाली, ‘पैसे पाठवू का?  यायला वेळ नाही.’ दादांच्या रक्तप्रवाहात ब्लॉकेजेस निघाली. अ‍ॅंजिओप्लास्टी करायचे ठरले. गौरवने दादांच्या मुलांना कळवले. मुले म्हणाली, ‘पैसे पाठवू का?  यायला वेळ नाही.’ दादांना माईल्ड हार्ट अ‍ॅटॅक आला. गौरवने दादांच्या मुलांना कळवले. मुले म्हणाली, ‘पैसे पाठवू का?  यायला वेळ नाही.’ गौरवने दादांचे सारे मुलाच्या मायेने केले.

दादांना आताशी वाटू लागलय, आपली मुलं थोडी कमी हुशार असती तर बरं झालं असतं. भाग्यवान आपण नाही. भाऊ आहे.

लेखिका – सौ. उज्ज्वला केळकर    

२.  वेळेचा अभाव

फेसबुकवर जशी काही स्पर्धा चालू होती. क्षणांशात  एक नवीन पोस्ट त्याने टाकली.  त्यात अनेक फोटो सामील होते. रंग बदलणारे ढग, चित्रकार सूर्य, झाडांचे, पर्वतराज हिमालयाचे, मोहवणार्‍या आकर्षक धारणीचे, हसणार्‍या खिदळणार्‍या रत्नाकराचे, सर्पिणीसारख्या नागमोडी वळणाने जाणार्‍या सरितांचे, याचे… त्याचे… आणखी किती तरी… 

यावेळी दु:खी-कष्टी झालेल्या सुनीलने आपल्या मृत झालेल्या वडलांचा देह आणि हार घातलेला त्यांचा फोटो अपलोड केला. आसपासच्या आगरबत्यातून, वर वर चढत जाणार्‍या धूम्ररेखा नुकतंच त्यांचं निधन झाल्याची ग्वाही देत होत्या.

सगळ्यात जास्त लाईक्स या फोटोला मिळाले.

एका बहिणीने आपल्या भावाला फोन केला,

‘तू त्यांच्याकडे जाऊन का आला नाहीस? निदान पोस्टवर त्यांच्याविषयी श्रद्धांजलीचे दोन शब्द तरी लिहायचे. सुनीलला सांत्वना मिळाली असती.’

‘ताई तेवढा वेळ नव्हता. लाईक तर केलं ना?’ आणि तो पुन्हा विविध सुंदर दृश्यांचे फोटो आपलोड करू लागला.

मूळ कथा – समयाभाव   

मूळ लेखिका – अनिता रश्मि  

भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर

3. संशोधन   

‘मुलांनो, मला असं वाटतं, यावेळी शेतकर्‍यांवर संशोधन प्रबंध हाती घ्यावा.’

‘फारच छान!’

‘मग सगळ्यात आधी नामवंत लेखकांकडून या विषयावरच्या कथा मागवून घ्याव्या.’

‘ठीक आहे सर, पण याबाबतीत एक गोष्ट मनात येतेय.’

‘अरे, नि:संकोचपणे सांग.’

‘सर, शेतकर्‍यांवर संशोधन प्रबंध हाती घेत आहोत, तर त्यावरील कथांची गरज आहे का?’

‘म्हणजे काय? संशोधनासाठी कथेत शेतकरी हे पात्र असायलाच हवं.’

‘मला म्हणायचय, प्रत्यक्षात शेतकरी काय करतोय, कसा जगतोय, याचं वर्णन यायला नको का?’

‘अजबच आहे तुझं बोलणं! वास्तवातल्या पात्रांवर कधी संशोधन झालय?’

‘पण सर, संशोधनात नवीन गोष्टी यायला हव्यात नं?’

‘ओ! समजलं तुला काय म्हणायचय!’

‘मग काय त्याबद्दल माहिती गोळा करूयात?’

अरे बाबा, आपल्याला, लेखकाच्या लेखणीच्या टोकाच्या परिघात असलेल्या कथांमधील शेतकरी पात्रांवर संशोधन करायचय. त्यांच्याबद्दल वाचल्यानंतर अश्रूंसह दयाभव जागृत व्हायला हवा. शेत सोडून रस्त्यावरून ट्रॅक्टर फिरवणार्‍यांवर आपल्याला संशोधन करायचं नाहीये.’

‘पण असं तर ते आंदोलन करण्यासाठीच करताहेत नं!’

‘हे बघ, ज्या शेतकर्‍यांबद्दल तू बोलतोयस, त्यातील एक तरी अर्धा उघडा, अस्थिपंजर शरीर असलेला आहे का?’

‘पण सर, आता काळ बदललाय. प्रत्येक जण प्रगती करतोय.’

‘बाबा, एक गोष्ट लक्षात ठेव, संशोधनासाठी शोषित असलेलीच पात्र योग्य ठरतात. अशा पात्रांच्या कथाच काळावर विजय मिळवणार्‍या ठरतात.

मूळ कथा – शोध   

मूळ लेखिका – अर्चना तिवारी  

भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर

४. ममत्व

सावित्रीच्या मुलीच्या सासरहून फोन आला की पारोला मुलगा झालाय. आजी झाल्याच्या आनंदात तिने आसपास, परिचित नातेवाईक यांच्यामध्ये मिठाई वाटली. काही वेळाने मुलीचा फोन आला, ‘माझ्याकडे यायचं, तर आपला चांगला आब राखून ये. आपली इज्जत आणि प्रतिष्ठा वाढेल, अशी ये.’

पारोचं जेव्हा लग्नं ठरलं, तेव्हा मागणी तिच्या सासरच्यांकडून होती. त्यावेळी तिने आपले दागिने विकून आणि जी काही जमा-शिल्लक होती, ती काढून, मोठ्या थाटा-माटात तिचं लग्नं लावून दिलं होतं.

यावेळी मागणी तिच्या स्वत:च्या मुलीची होती. खरं तर पारोला आपल्या आईच्या परिस्थितीची चांगली जाणीव होती. सावित्रीने आपल्या दोन्ही मुलांना पारोच्या फोनबद्दल सांगितलं. पण दोघांनीही आपण स्वत:च पैशाच्या तंगीत आहोत, असं म्हणत हात झटकले. सावित्रीने मग आपल्या राहिलेल्या दोन सोन्याच्या बांगड्या विकल्या. आपल्या नातवाला सोन्याची चेन केली. मुलीच्या सगळ्या परिवारासाठी कापड-चोपड घेतलं. फळांच्या आणि, मिठाईच्या टोपल्या घेतल्या आणि ती पारोकडे आली. पारोच्या सासरी तिची इज्जत वाचली पण ती जेव्हा घरी आली, तेव्हा तिच्यावर दु:खाचा पहाड कोसळला.

सावित्रीने आपल्या बांगड्या विकल्याचे ऐकून तिची मुलं आणि सुना अशा संतापल्या की वाद-विवाद, भांडणात ती दोन घास अन्नालाही महाग झाली. आता सावित्री मंदिरात सेवा करून आपला जेवणाचा आणि औषधापाण्याचा खर्च चालवते आणि तिथल्या धर्मशाळेच्या तुटक्या-फुटक्या खोलीत खंत करत आपलं म्हातारपणाचं ओझं वहाते.

इकडे मुलं आणि सुना सांगत फिरतात की आईला देवाची इतकी ओढ लागली आहे, आता ती घराच्या बंधनात बांधून राहू इच्छित नाही. ती आता संन्यासिनी झालीय. आता ती घरीदेखील येत नाही.

मूळ कथा – ममत्व 

मूळ लेखक – अशोक दर्द   

भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर

अनुवादिका –  सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “दगडातला देव …” भाग – २ ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ “दगडातला देव …” भाग – २ ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

आज अचानक मीनाचा फोन आला “आहेस का घरी येऊ का?”

म्हटलं   “ये…”

जोशी काकांच्या कोकण ट्रीपला तिची ओळख झाली. व्हाट्सअप ग्रुप वर मेसेज असायचे.खर तर ट्रीप नंतर तिचा फारसा संबंध  आला नव्हता. व्हाट्सअप ग्रुप वर होतो तेवढच.. त्यामुळे आज ती घरी का येते हे कळेना…

मीना आणि अजून पाच जणींचा ग्रुप होता. जोशी काका वेगळं काही सांगायला लागले की त्या बोअर व्हायच्या. तिथून निघून जायच्या…. कॉमेंट्स करायच्या .

असू दे …..बरोबर आहे त्यांचं… सगळ्यांनाच कस आवडेल म्हणून आम्ही पण काही बोलत नव्हतो.

गणपती मंदिरात मीना माझ्या शेजारी उभी होती तिनी दगड ऊचलला

आणि म्हणाली..

“हे बघ नीता काही गणपती बीणपती दिसत नाही ऊगीच आपलं ..  काका काहीतरी  सांगतात आणि तुमचा लगेच विश्वास बसतो “असं म्हणून तो दगड माझ्या हातात देऊन ती   निघून गेली होती. 

मी तिचा आणि माझा दगड पर्समध्ये ठेवला होता.

ती येणार म्हटल्यावर आज हे आठवले….

तीचं काय काम आहे समजेना…

ती आली.

जरा वेळाने म्हणाली

” मी उचललेला दगड तू घरी आणला होता तो आहे का ग?”

“आहे माझ्याकडे..पण त्याची तुला आज कशी आठवण झाली?”

“नीता तुझा लेख वाचला आणि आम्ही जोशी  काकांना किती हसत होतो त्यांची टिंगल करत होतो हे आठवले. तुम्ही किंवा काका देव दिसला की  लगेच स्तोत्र,आरत्या काय म्हणता म्हणून आम्ही वैतागत  होतो …..काका उपदेश करतात म्हणून आम्ही त्यांची खिल्ली ऊडवायचो….

तुझा लेख वाचला आणि माझ्या वागण्याच मला खरंच वाईट वाटायला लागलं……

त्या माणसातला देव आम्ही पाहिलाच नाही….म्हणून आज मुद्दाम तुला भेटायला आले.”

“अगं होतं असं अनवधानांनी असू दे नको वाईट वाटून घेऊ…..ट्रीप मध्ये मजा ,गंमत करायची असं तुमच्या डोक्यात होत ..त्यामुळे तुम्हाला ते आवडत नसेल… “

मी तिची समजुत काढली.

“आणि अजून एक गोष्ट झालेली आहे ती तुला सांगते .माझ्या नातीचा गॅदरिंग मध्ये

“अधरं मधुरम् वदनं मधुरम्”

या मधुराष्टकावर डान्स बसवलेला आहे. ती ते  मनापासुन  ऐकत असते.तीचे ते पाठ पण झाले आहे. काल नातीने मला विचारले आजी तुला हे माहित आहे का? तेव्हा आठवले तुम्ही कृष्णाच्या मंदिरात हे म्हटले होते.”

“हो आठवले.तीथे कदंब वृक्ष होता.त्याची माहिती काकांनी सांगितली होती.”

यावर ती म्हणाली 

“आज मनापासून सांगते .जोशी काकांची माफी मागावी असं वाटलं. आता ते नाहीत म्हणून तुझ्याकडे आले.”

तीचे हात हातात घेतले.

थोड्या वेळानंतर तीचा दगड घेऊन आले.दगड तिच्या हातात देऊन म्हटलं

” एक सांगु का? यात बाप्पा शोधायचा प्रयत्न करूच नकोस .नुसती काकांची आठवण म्हणून ठेव .या दगडाकडे पाहून तुला ईतरही काही आठवेल आणि तेच खर महत्त्वाच आहे.तुझ्या विचारांमध्ये बदल झाला  आहे.ही या दगडाची किमया आहे. “

असं म्हणून तिच्या हातात तो दगड दिला

तिने तो आधी कपाळाला लावला आणि मग तो बघायला लागली……. …

आणि अचानक म्हणाली

“नीता मला गणपती दिसतो आहे…. अग खरच शपथ घेऊन सांगते..”

तिचे डोळे भरून वहात होते…

असचं असत ना…

अनमोल गोष्टी हातातून जातात आणि मग त्याचं महत्त्व आपल्याला..

 पटतं……

तसेच काकांसारखी माणसं आयुष्यातून जातात पण गेल्यानंतरही अशीच शहाणी करतात… विचारात परिवर्तन घडवून आणतात…

असू दे ….

अशी माणस आपल्या आयुष्यात आली हेही आपलं भाग्य म्हणायचं. आणि त्यांनी सांगितलेल्या मार्गावरून चालत राहायचं….

– समाप्त – 

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ डार्क वेब : भाग – 3 ☆ श्री मिलिंद जोशी ☆

श्री मिलिंद जोशी

? इंद्रधनुष्य ?

 ☆ डार्क वेब : भाग – 3 ☆ श्री मिलिंद जोशी ☆ 

(ही अतिशय महत्वपूर्ण माहिती देणारी लेखमाला दर सोमवारी आणि मंगळवारी प्रकाशित होईल) 

इंटरनेटचा वापर करणाऱ्या जवळपास ६०% लोकांनी डार्कवेबचे नावही ऐकलेले नसते. उरलेल्या ४०% लोकांपैकी जवळपास ८०% लोकांच्या मनात डार्कवेब बद्दल अनेक गैरसमज आहेत. माझ्याच क्षेत्रातील एका मित्राशी बोलताना डार्कवेब बद्दलचा विषय निघाला.

“तुला डार्कवेब बद्दल काय माहिती आहे?” त्याने मला विचारले.

“अगदी जुजबी माहिती आहे.” मी उत्तर दिले.

“बरंय… याबाबतीत जितकी कमी माहिती, तितके चांगले.” त्याने सांगितले.

“का?”

“अरे खूप भयंकर जागा आहे ती. मी तुला सांगू नाही शकत, मला काय काय अनुभव आले तिथे.” त्याने चेहरा गंभीर करत सांगितले.

“ओह… तरीही सांगच तू. बघू तरी मलाही तसाच अनुभव येतोय का.” मी म्हटले.

“म्हणजे? मी खोटे बोलतोय असे वाटते का तुला?”

“नाही यार… पण मला जाणून घेण्याची इच्छा आहे.”

“तुला सांगतो मिल्या… दोन वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ही. मी नवीनच डार्कवेब बद्दल ऐकले होते. नेटवर अजून माहिती मिळवली आणि केले ना टोर ब्राउजर डाउनलोड. लगेच इंस्टाल मारलं. पण ते काय गुगल नसतं. आपण एखादी साईट सर्च केली आणि लगेच ती समोर आली.” इतके बोलून त्याने थोडा पॉज घेतला.

“आयला… मग रे?”

“मग काय? जवळपास अर्धा पाऊण तास घालवला, आणि मिळवले काही साईटचे पत्ते.”

“क्या बात है यार… एक नंबर.” मी त्याला दाद दिली.

“तुला सांगतो, कधी कधी तिथे कोणती भाषा असते तेच आपल्याला समजत नाही. आणि आपल्या समोर जी लिंक असते त्यावर क्लिक केल्यानंतर काय होईल हेही आपल्याला समजत नाही.” त्याने सांगितले.

“बापरे…”

“पण आपल्यात एक मुंगळा असतो, तो काय शांत थोडाच बसू देतो? मी त्या लिंकवर क्लिक केले मात्र, माझ्यासमोर काही विंडो ओपन झाल्या. त्या सगळ्या विंडोमध्ये वेगवेगळे माणसं दिसत होते. त्यांच्या चेहऱ्यावर काहीही भाव नव्हते. सगळे अगदी हिप्नोटाईझ केल्यासारखे दिसत होते. आणि तुला खोटे वाटेल, त्यातील एका विंडोमध्ये मीही दिसत होतो.” त्याने सांगितले.

“आयला… डेंजरच…”

“तुला सांगतो… इतका घाबरलो मी, लगेच विंडो बंद केली. पण काही केल्या ती बंद होत नव्हती. मग हळूहळू त्यातून विचित्र आवाज येऊ लागला. माझी तर हालत पतली झाली. माझ्या चेहऱ्यावर घाम आला. आणि मग त्या माणसांच्या चेहऱ्यावर विचित्र हसू होते. मी लगेच लॅपटॉपचे पावर बटन दाबले. तरी तो बंद होईना. मग पावर बटन ५ सेकंद दाबून तो डायरेक्ट बंद केला.” त्याने सांगितले.

“बापरे… मग रे?”

“त्यानंतर एक दीड तास मी लॅपटॉपला हातच लावला नाही. पण जसा मी तो चालू केला, माझ्या समोर परत तीच स्क्रीन होती. तेच लोकं होते आणि मेसेज आला, ‘नाऊ यु आर ट्रॅपड्’…” हे सांगून तो माझ्या चेहऱ्याकडे बारकाईने बघू लागला. माझ्या चेहऱ्यावर थोडे हसू आले.

“तुला खोटे वाटते म्हणजे…” त्याने माझ्या चेहऱ्यावरील भाव ओळखले.

“नाही रे… खोटे वाटत नाही पण तू एक गोष्ट करायची ना… तुझ्या लॅपटॉपच्या कॅमेऱ्यावर बोट ठेवायचे. त्यांना काही दिसले नसते मग…”

“अबे येडे, पण माझा लॅपटॉप तर हॅक झाला ना…”

“होय… बरोबर…”

“म्हणून तुला सांगतो, कधीही तिकडे फिरकू नकोस…” त्याने सांगितले आणि मी मान हलवली.

आता अनेकांना वाटेल, खरेच का असे होऊ शकते? तर उत्तर आहे, ‘होय’… हे असे नक्कीच होऊ शकते. पण… अशी हॅकिंग आपल्या सर्फेस वेबवरही होऊ शकतेच की. म्हणून काय आपण सर्फेस वेब वापरायला घाबरतो का? नाही ना… बरे माझ्या मित्राने सांगितलेल्या कोणत्या गोष्टी आपल्या सर्फेस वेबवर होऊ शकत नाहीत? सगळ्याच होऊ शकतात. आपण झूम किंवा गुगल मिटिंग करतो त्यावेळी आपल्यासमोर अशाच अनेक विंडो येतात, ज्यात वेगवेगळ्या ठिकाणाहून लोक जोडले गेलेले असतात. आपण ज्यावेळी ती मिटिंग अटेंड करतो त्यावेळी आपला माईक, आपला कॅमेरा वापरण्याची परवानगी आपण त्या सॉफ्टवेअरला दिलेली असते. इथे फक्त एक गोष्ट जास्तीची झाली. आपण दिलेल्या परवानगीसोबत आपल्या सिस्टीमचा जास्तीचा अॅक्सेस ही वापरला गेला. थोडक्यात इथे सावधानी गरजेची आहे, भीती नाही.

अंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारे खेळाडू ज्यावेळी ताशी १४५ किलोमीटरच्या स्पीडने येणाऱ्या बॉलचा सामना करतात त्यावेळी त्यांच्या मनात भीती असेल तर त्यांना खेळता येईल का? पण त्यांच्या मनात भीती नसते याचा अर्थ ते गार्ड / पॅड / ग्लोज / हेल्मेटचा वापर करत नाहीत का? करतात ना? तसेच या बाबतीतही असते.

डार्कवेब हा प्रकार जरी आपल्याला वेगळा वाटत असला तरी तो फारसा वेगळा नाही हेच या लेखातून मला सांगायचे आहे. बाकी गोष्टी पुढील भागात.

– क्रमशः भाग तिसरा  

©  श्री मिलिंद जोशी

वेब डेव्हलपर

नाशिक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ चौदा हजार चारशे सदुसष्ट ललाटरेखा ! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

चौदा हजार चारशे सदुसष्ट ललाटरेखा ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

त्याच्या कलेवरासोबत आलेल्या ज्येष्ठ सैनिकाने तिच्या हातात राष्ट्रध्वज सोपवला, तिला सल्यूट बजावला आणि तो बाजूला झाला. तो ध्वज घेऊन ती शवपेटीनजीक आली…तिने शवपेटीवर आपलं रिकामं कपाळ टेकवलं आणि शवपेटीवर पांघरलेल्या राष्ट्रध्वजावर आसवांचा शेवटचा अभिषेक घातला. तिला तिथून हलायचं नव्हतं…पण व्यवहाराला थांबून चालणार नव्हतं. शवपेटी वाहून आणणा-या एका सैनिकानं हातानंच इशाला केला….या ताईला आवरा कुणीतरी!   एक ज्येष्ठ सैनिक पुढे झाला…. तिने त्याच्याकडे म्लान वदनाने पाहिलं….तिने आपलं उजव्या हाताचं मनगट आभाळाच्या दिशेनं वळवलं, हाताचा तळवा उघडला….तोंडही उघडं होतं…पण आता त्यातून ध्वनि उमटत नव्हता…माझं कसं होणार? हा तिने न विचारलेला प्रश्न मात्र त्या ज्येष्ठ सैनिकाला मोठ्याने ऐकू गेला त्या गदारोळात….त्याने तिच्या डोक्यावर आपले दोन्ही हात क्षणभर ठेवले आणि मागे घेऊन नमस्कर मुद्रेत जोडले!…जाऊ दे, बेटी आता तुझ्या मालकाला शेवटच्या प्रवासाला! आम्ही असू तुझ्यासोबत! 

अंत्ययात्रेत तीन हुंदके उमटत होते…एक त्याच्या आईचा, एक वडिलांचा आणि एक त्याच्या पत्नीचा. तिच्या गर्भातल्या बाळाच्या हुंदक्याला त्याचा स्वत:चा असा आवाज नव्हता! 

सैनिकाच्या जाण्यानंतर निर्माण होणारं दु:ख कुणाचं धाकलं आणि कुणाचं थोरलं? आयुष्याच्या मध्यावर असलेल्या किंवा त्याच्याही पुढे गेलेल्या आई-वडिलांचं? की जिचं उभं आयुष्य पुढं आ वासून तिच्याच समोर उभं ठाकलं आहे त्या तरूण विधवा पोरीचं? 

गळ्यात मंगळसूत्र पडतं तेंव्हाच माहेर बुडतं लेकींचं आपल्याकडच्या. कुंकू नावाच्या गोलाकार समिंदरात बाई उडी घेते ती याच मंगळसूत्राच्या भरवशावर. यातील दोन वाट्या म्हणजे एकमेकांना जोडलेली दोन गलबतं. वल्हवणारा भक्कम असला आणि त्यानं किना-यापोत साथ दिली तर किनारा काही दूर नसतो फारसा…फक्त वेळ लागतो एवढंच. पण श्वासांचं हे वल्हं वल्हवणरा हात सैनिकाचा असला आणि तोच स्वत: आपल्या गलबतासह मरणाच्या खोलात अकाली गर्तेस मिळाला तर? त्याच्यासोबतचं गलबत भरकटणारच! वरवर सालस,शांत,समंजस भासणारा व्यवहाराचा समुद्र मग आपले खोलातले रंग पृष्ठभागावर आणायला लागतो….वादळापूर्वीची शांतता म्हणजे स्वप्नात अनुभवलेली खोटी गोष्ट वाटू लागते! गलबत आधीच इवलंसं….लाटांना फार प्रयास पडत नाहीत त्याला तडाखे द्यायला! 

मृत्यू अपरिहार्य आहेच. आणि त्यामुळे विवाहीत बाईच्या कपाळी येणारं वैधव्यही! हा मृत्यू एखाद्या सैनिकाला लढता-लढता आलेला असेल तर या वैधव्याची दाहकता आणखीनच गडद होत जाते भारतात! धारातीर्थी पडलेल्या सैनिकाच्या पत्नीने कोणत्याही रंगाची साडी परिधान केलेली असली तरी केवळ एक वाक्याने त्या साडीचा रंग पांढरा होऊन जातो….”कुंकू पुसून टाक,सूनबाई!” 

पतीचे निधन झालेली स्त्री विधवाच असते. पण कर्तव्यासाठी प्राणापर्ण केलेल्या सैनिकांच्या पत्नींना आताशा व्यवस्था वीरनारी म्हणू लागली आहे, आणि हेही नसे थोडके! अन्यथा पूर्वी सर्व ओसाड कपाळांची किंमत एकच असायची! खरं तर सैनिकाशी लग्न करणं हेच मोठं धाडसाचं काम आहे…या अर्थाने प्रत्येक सैनिक-पत्नी वीरनारीच मानली गेली पाहिजे. या महिला करीत असलेला शारीरिक,मानसिक त्याग प्रचंड आहे. असो. 

अविवाहीत हुतात्मा सैनिकाच्या आई-वडिलांचं दु:ख थोरलंच. पण विवाहीत हुतात्मा सैनिकाच्या घरात आणखी एक मोठं दु:ख मान खाली घालून बसलेलं असतं! ते दु:ख वेगानं धावत असतं अंध:कारमय भविष्याच्या दिशेनं! 

तिला हे माहीत आहे….तिने इतरांच्या बाबतीत हे होताना पाहिलं,ऐकलं आहे! किंबहुना सैनिकाशी लग्नगाठ बांधून घेताना तिला याची कल्पना कुणी स्पष्टपणे दिली नसली तरी तिला हे का ठाऊक नव्हतं? पण तरीही तिने कुठल्याही कारणाने का होईना..हे धाडस केलंच होतं! परिणामांची जबाबदारी सर्वस्वी तिचीच!  अमर रहे….च्या घोषणा अल्पावधीतच हवेत विरून जातात, राजकीय,सामाजिक नेत्यांच्या भाषणांतील,मदतीच्या आश्वासनांतील काही शब्द,आकडेही बहुतांशवेळा पुसट होत जातात

आपल्या देशात सैन्यसेवेत असलेले सुमारे १६०० जण विविध कारणांनी मरण पावतात दरवर्षी. यात अतिरेक्यांशी लढताना,सीमेच्या पलीकडून होणा-या गोळीबारात धारातीर्थी पडणा-यांचे संख्याही दुर्दैवाने बरीच असते….यातून वीरनारींची संख्याही वाढत राहते. प्रत्यक्ष सशस्त्र संघर्षात मृत्यू पावलेल्या सैनिकांच्या, हयात असलेल्या वीरनारींची संख्या मार्च २०२३ पर्यंत होती….चौदा हजार चारशे सदुसष्ट! आणि या आकड्यांत दुर्दैवानं या वर्षीही भरच पडलेली आहे! 

सैनिकाच्या अकाली मृत्यूमुळे कुटुंबाची,विशेषत: पालक आणि पत्नी यांची होणारी हानी प्रचंड असते. हौतात्म्याची भरपाई करणं शक्य नसलं तरी ज्या समाजाचं हा सैनिक वर्ग जीवाची बाजी लावून रक्षण करत असतो, त्या समाजाचं प्रथम कर्तव्य हेच असावं की त्यानं या नुकसानीची मानवीय दृष्टीकोनातून भरपाई करण्याचा प्रयत्न करणे! 

कामी आलेल्या सैनिकाच्या परिवाराला गेल्या काही वर्षांपासून सुमारे एक कोटी रुपये दिले जातात. पण हा पैसा स्वत:सोबत अनेक समस्याही घेऊन त्या कुटुंबात प्रवेश करतो. हयात असणा-या माजी सैनिकांना निवृत्तीवेतन दिले जातेच. त्याच्या पश्चात त्याच्या आई-वडीलांना,पत्नीला आणि काही नियमांना अधीन राहून अपत्यानांही निवृत्तीवेतन दिले जाते. पाल्यांचे शिक्षण,नोक-या इत्यादी अनेक बाबतीतही शासकीय धोरणं कल्याणकारी आहेत.  

तरूण तडफदार असेलेले सैनिक सैनिकी कारवायांमध्ये ब-याचशा मोठ्या संख्येने अग्रभागी असतात. यात हौतात्म्य प्राप्त झालेले सैनिक जर विवाहीत असतील तर त्यांच्या पत्नीही वयाने तरूणच असतात, हे ओघाने आलेच. 

विधवेने पुनर्विवाह करणे या बाबीकडे समाजाकडून अक्षम्य दुर्लक्ष आणि अमानवीय विचारांमुळे विरोध झाल्याचे कालपरवापर्यंत दिसून येत होते. नुकसानभरपाईपोटी आलेला पैसा,कुटुंबाची संपत्ती कुटुंबातच रहावी, या अंतर्गत उद्देशाने स्त्रियांचे पुनर्विवाह लावून देताना वधूवरांच्या वयातील अंतरांचा किती विचार केला गेला असेल, हाही प्रश्नच होता. 

समाजाचा स्त्रियांना केवळ उपयुक्त साधन मानणे हाही विचार सर्वत्र होता आणि आहेच. हुतात्मा सैनिकाच्या कुटुंबियांना मिळणा-या निवृत्तीवेतनात आणि इतर आर्थिक लाभांत पत्नीचाही तेव्हढाच वाटा असतो. तीच जर पुनर्विवाह करून गेली तर घरातील पैसा इतरत्र जातो किंवा जाईल, हे समाजाने हुशारीने ताडले आहे. त्यामुळे आदर्श पत्नी म्हणून तिने अविवाहीत रहावे, सासु-सास-यांची सेवा करीत उर्वरीत आयुष्य रेटावे, असा प्रयत्न होतो. त्यातून पुढे आलेली आणि माणुसकीचे फसवे कातडे पांघरून रूढ झालेली प्रथा म्हणजे चुडा प्रथा. सैनिकाच्या विधवेने किंवा कोणत्याही विधवेने त्या दीराशी लग्न करणे! हे प्रमाण राजस्थानात सर्वाधिक आहे. यात बाईच्या पसंती-नापसंतीला कितपत वाव असेल? पण यात संबंधित दीर अविवाहीत असला पाहिजे ही अट मात्र सुदैवाने आहे. पण हा गुंता किती मोठा आणि महिलांसाठी किती अडचणींचा असेल याचा विचार केला तरी अवघडल्यासारखे होते. 

पंजाब,हरियाना,हिमाचल प्रदेश, बिहार सारख्या राज्यांत हाच कित्ता थोड्या अधिक फरकाने गिरवला जातो. पंजाब-हरियाणात करेवा प्रथा आहे. यातही दिवंगत सैनिकाच्या/व्यक्तीच्या विधवा पत्नीचा अविवाहीत दीराशी लग्नाचा रिवाज आहे. आणि पहिल्या पतीच्या अंत्यसंस्कारानंतर केवळ दोन आठवड्यानंतरही असे विवाह लावले जातात. आणि यात कोणताही समारंभ केला जात नाही…

वर वर पाहता या प्रथा विधवांना आधार देणा-या वाटत असल्या तरी यांत विधवेविषयी सहानुभूती वाटणे किती आणि आर्थिक विचार किती हा प्रश्न आहेच. राजस्थानात या प्रश्नाने तर मोठे स्वरूप धारण केले आहे. कारण राजस्थानातील वीरनारींची संख्या मार्च २०२३ पर्यंत १३१७ एवढी होती. अशा प्रकारे आपल्या दीराशी वैवाहिक संबंध प्रस्थापित करण्याची मनापासून किती विधवांची इच्छा असावी? आपली भावनिकतेच्या जाळ्यात ओढून सोयीस्कर अर्थ लावणारी, पुरुषप्रधान सामाजिक मानसिकता लक्षात घेता याचं उत्तर काय असेल, हे सूज्ञ समजू शकतात. 

पंजाबात दोन हजारांपेक्षा अधिक तर हरियाना,उत्तराखंड, हिमाचल प्रदेशात सुमारे अकराशेच्या वर वीरनारी आहेत. अपत्य नसलेल्या वीरनारीने पुनर्विवाह केला तरी तिचे निवृत्तीवेतन सुरु राहते. पण तिचे इतर मार्गांने होणारे उत्पन्न निवृत्तीवेतनाएवढे किंवा जास्त झाले की ही रक्कम देणे बंद केले जाते. अपत्य असेल आणि नात्याबाहेर पुनर्विवाह केला तरी वेगळे नियम लागू होतात. 

सैनिक विधवेशी तिला मिळत असलेल्या पैशांवर डोळा ठेवून विवाह करणा-यांची संख्याही असेलच. परंतू यात किमान त्या स्त्रीची स्वसंमती तरी असते. वीरनारींना त्यांच्या पतींनी गाजवलेल्या शौर्याचे पारितोषिक म्हणून काही विशेष रक्कमही दरमहा देण्याची पद्धत आहे. मात्र ही रक्कम त्या स्त्रीने फक्त तिच्या दीराशीच लग्न केले असल्यासच देय असे २००६ पूर्वी. २०१७ मध्ये या नियमात बदल करण्यात आला! 

सरकार,नेते,संघटना,व्यक्ती यांनी दिलेली आश्वासने प्रत्यक्षात येतातच असे दुर्दैवाने होत नाही, हेही वास्तव आहे. हुतात्मा वीर सैन्याधिका-यांच्या कुटुंबियांना कित्येक वेळा शासन पेट्रोल पंप, गॅस एजन्सी इत्यादी बहाल करीत असते. यासाठीही मोठा कागदोपत्री कारभार कुटुंबियांना करावा लागतो. सैनिक कोणत्या परिस्थितीत मृत्यू पावला याही गोष्टीला नुकसानभरपाईबाबत मोठे महत्त्व आहे. 

भारताच्या ग्रामीण,आदिवासी भागातील वीरनारींच्या कपाळी तर काहीवेळा भयावह संकटे आल्याची उदाहरणे आहेत. त्यापैकीच एक म्हणजे एन.एस.जी.कमांडो लान्स नायक राजकुमार महतो यांची पत्नी जया महतो! राजकुमार महतो कश्मिरात अतिरेक्यांविरुद्ध प्राणपणाने लढताना धारातीर्थी पडले. त्यांच्या कुटुंबातील तीन व्यक्ती या नजीकच्या कालावधीत काही कारणांनी मृत्यू पावलेल्या होत्या. त्यात राजकुमारही गेल्यामुळे गावक-यांनी या घटनांसाठी थेट जया यांना जबाबदार धरले आणि चेटकीण म्हणून त्यांना ठार मारण्याची तयारीही केली होती. भारतीय सैन्य जया महतो यांच्या मदतीला वेळेवर पोहोचू शकले म्हणून त्या बचावल्या! पण आपला समाजाचा काही भाग अजूनही किती मागासलेला आहे, याचे हे भयानक उदाहरण मानले जावे!   

नव्या घरात सैनिकाची पत्नी म्हणून काहीच काळापूर्वी प्रवेश केलेल्या सामान्य मुलीला तिचा पतीच जर जगातून निघून गेला तर तिच्या वाट्याला येणारी परिस्थिती किमान महिलावर्ग तरी समजावून घेऊ शकेल. अर्थात, विधवा सून आणि तिचे सासू-सासरे यांच्यातील भावनिक आणि आर्थिक परिस्थितीला काही अन्य बाजूही असतीलच. पण तरीही सर्वाधिक नुकसान सोसावे लागलेल्या सर्वच तरूण वीरनारींची स्थिती फारशी बरी नसण्याचीच शक्यता अधिक आहे. समाजातील सर्व विचारवंतांच्या स्तरावर या समस्यांची यथायोग्य आणि वास्तवदर्शी माहिती पोहोचणे गरजेचे आहे! 

(या लेखाच्या पहिल्या परिच्छेदात वर्णन केलेली घटना एका विडीओ मध्ये पाहण्यात आल्यानंतर मी यावर गांभिर्याने विचार करून ही अल्प माहिती घेतली आहे. छायाचित्रातील ही वीरनारी भगिनी आणि लेखात उल्लेखिलेल्या बाबी याचा संबंध असेलच असे नाही. केवळ प्रतिपाद्य विषयाला परिमाण लाभावे म्हणून हे छायाचित्र वापरले आहे. यात काही त्रुटी असतीलच. पण समस्या मात्र ख-या आहेत, यात शंका नाही. विशेषत: सुशिक्षित महिलांनी यावर विचार करून याबाबतीत काही करता आले तर जरुर करावे.!) 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ बघता बघता… – कवि : अज्ञात ☆ प्रस्तुती सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) ☆

सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ बघता बघता… – कवि : अज्ञात ☆ प्रस्तुती सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) 

बघता बघता आई,

मी तुझ्यासारखी व्हायला लागले.

संध्याकाळ झाली की

हात जोडायला लागले.

 

आठवणीने तुळशीला दिवा लावते.

झोपाळ्यावर बसून

रामरक्षा ही म्हणायला लागले.

आणि झोपाळ्यावर डोलताना

कुठल्याही आठवणीनी डोळ्यात

पाणी साठवायला लागले.

 

चहाच्या कपाचा डाग पुसायला

पटकन फडकं शोधायला लागले.

धुतले नाही तरी त्यात

पाणी भरून ठेवायला शिकले.

 

कॉटनचे कपडे आणि मऊ स्पर्श

दोन्ही आठवणीने वापरायला लागले.

कपड्याचा दिसण्यापेक्षा

स्पर्शाचा आनंद 

शरीराला कळायला लागला.

 

रात्रीच्या जेवणानंतर 

थोडंसं गोड खावसं वाटायला लागलं.

स्वतःच्या पांढऱ्या होत जाणाऱ्या केसांकडे  पाहताना

तुझे काळे पांढरे लांब केस आठवायला लागले.

तुझ्या हातावरच्या सुरकुत्या

आता माझ्या हातावर उमटणार

याची वाट पाहायला लागले.

 

“म्हातारी झाले मी”

असं तू म्हणलीस कि मी,

अट्टाहासाने नाही म्हणायची.

आता मी म्हातारी झाले.

बघता बघता तुझ्यासारखी झाले.

 

काही दिवसांनी

दिसेनही तुझ्यासारखी.

आईची सावली अस कुणी म्हटलं

तर हरखून जायला लागले.

आई 

…. मी तुझ्यासारखी व्हायला लागले

 

कवयित्री : अज्ञात 

प्रस्तुती :  शुभदा भा.कुलकर्णी (विभावरी)

कोथरूड-पुणे

मो.९५९५५५७९०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares