☆ हम बोलेगा ईमोजी बेहेतर बोलता है ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆
काय मंडळी खरे आहे ना? माझा तरी अनुभव तसाच आहे. अपना हाल एक ईमोजी सबको बिना बोले बताता है| तर झाले असे,माझी मैत्रीण ( जी सतत ईमोजी मधून बोलत असते ) तिची चूक नाही बरं का.एकदा ती आजारी होती. बरे सांगावे कसे ?ग्रुप वर मेसेज केला तर कोणी विचारपूस करेना मग तिने 🤕 ईमोजी स्टेटसला.आणि घोळच झाला.सगळ्यांना वाटले तिला अपघात झाला किंवा डोके दुखत आहे.मग तशी चौकशी सुरू झाली.आणि सर्दी झाली आहे सांगता सांगता खरेच डोके दुखी झाली.पण इतक्या चौकशा झाल्या म्हंटल्यावर स्वारी ईमोजी माय झाली की.
हे ईमोजी महत्व माझ्या काही डोक्यात बसेना.तरी पण बघू प्रयत्न करून म्हणून तिच्या पावलावर पाऊल प्रमाणे ईमोजी वर ईमोजी ठेवून मी पण ईमोजी धर की टाक करते आणि हसे करून घेते.काय होते कोणी काही म्हंटले की पोस्ट आवडली की मी कोणताही भेद न करता ( स्त्री पुरुष ) दिलून टाकते.सांगायचे इतकेच असते,पोस्ट आवडली.आणि छान वाटले.पण त्यातून नसती आफत ओढवते ना.🫢 आणि काय चुकले कळतच नाही.🤦🏻♀️
मग एक समजले ईमोजी जसे शब्दा वाचून बोलतात तसे चुकीचे ईमोजी फार धोकादायक 🫣.एकदा अतीच फजिती केली ना या ईमोजी रावांनी.एकदा गृपवर कोणासाठी तरी श्रद्धांजली अर्पण केली होती.मी पण घाई घाई 😢 हे पोस्टवून टाकले.खूप सारे रिप्लाय आले होते त्यात सर्वांनी माझी चांगलीच खिल्ली उडविली होती.मग लक्षात आले रडक्या 🥲 ईमोजी ऐवजी चुकून 😂 हे साहेब तेथे घाई घाई गेले होते.😭
खरी गंमत येते 🥰😘 💞 हे ईमोजी राव पोस्टल्यावर.प्रेमात बुडालेला 🥰 हा जास्तच डेंजर.😘 (लाल टेंगुळ – एका मैत्रिणीने याचे केलेले नामकरण ) हा लहान मुलांना चालेल,मैत्रिणीला चालेल.पण नको तिथे घाईने/चुकीने गेला तर? जिथे गेला तिथे 🕺🏻आनंदी आनंद.आणि आपली कोंडी. आणि 🥰 (तीन टेंगळे – कोणाला तरी खरीच 🤕 आणेल) हे म्हणजे एकदम चाटून पुसून काम.🫢🤫
हे सोपे कसले हे तर माझ्या सामान्य किंवा बाळ बुध्दीला एकदम अवघड 😇 काम.बरे कतीही काळजी घेतली किंवा उसनी हुशारी आणली तरी ही भाषा काही जमत नाही. कारण भलभलते गैरअर्थ काढण्यात समोरचे पटाईत (अगदी आपली चूक असली तरी 🙆🏻♀️).मग काय 🤦🏻♀️पुन्हा चूक आपलीच असल्याचे पुरावे सादर केले जातात.👊🏻
आणि हो हे झुके भाऊ कधी बदल करतील सांगता येत नाही.डोळे झाकून ईमोजी घाई घाई पोस्टावा तर तिथे वेगळाच अपरिचित (अर्थ न कळलेला) ईमोजी राव येऊन बसलेला असतो.आणि आपल्याला फजितून टाकतो.
असे अनुभव जमा करत करत ईमोजीराव पोस्टताना फार काळजी घेते पण तरीही भिक नको पण कुत्रे आवर या प्रमाणे कोणीतरी म्हणतेच, टाईप कर फोन कर पण ईमोजी आवर मग मी जास्तच दक्षता घेते.अगदी गुगल बाबां कडून सगळी माहिती घेते.अर्थ समजून घेते.पण काहीतरी घोळ होतोच आणि शिंगरू मेलं हेलपाट्याने या प्रमाणे मी मरते हे चुकीचे इमुंचे (लाडा चे नाव हो) अर्थ किंवा अनर्थ निस्तरताना.
कदाचित हे चुकीने टाकलेले किंवा घाईने पोस्टलेले मेसेज यातून गैरसमज किंवा गैरअर्थ निघू नयेत या साठीच एडिट किंवा डिलीट चे रबर दिले असावे. व माझ्या सारख्या चुकून पोस्टणाऱ्या लोकांची सोय केली असावी.
पण मी दमून जाते हो हे निस्तरताना.आणि ठरवते काही 🙃🙂 उलट सुलट होण्या पेक्षा 🤫 चूप बसावे.
आता हे शेपूट फारच लांबत चालले.तर सांगायचे इतुकेच की शब्दावाचून बोलणारे ईमोजी चुकले तर शब्दांच्या पलीकडले अनर्थ करतात.त्या मुळे हे भाऊ नीट अर्थ समजल्या बिगर पोस्टू नयेत.
☆ तू सध्या काय करतेस ? – भाग-१ ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆
पद्मा हॉटेल जवळ श्री ने रिक्षा सोडली. हातावरील घड्याळाकडे नजर टाकली. चार वाजुन पाच मिनिटं झाली होती. बापरे. पळा आता. बस मिळण्याची शक्यता तशी कमीच. तो धावत धावतच स्टैंडवर गेला. नाशिक-पुणे शिवशाही निघण्याच्या तयारीत होती. मिळाली बस एकदाची. बसमध्ये चढला, सीट नंबर शोधून काढला.१७आणि१८या जोडसीटवरील १७नंबर त्याचा होता.१८नंबरच्या विंडो सीटवर एक मुलगी बसली होती. तिच्या शेजारी जावुन बसला.
तो बसला आणि बस सुटलीच.श्री ने बैग वरती रैकमध्ये ठेवली. खिशातून मोबाईल काढला. इयर पीन कानात घालून गाणे सेट केले आणि मग इकडेतिकडे नजर टाकली.
शेजारी बसलेल्या मुलीकडे त्याची नजर गेली. तोंडाला रुमाल बांधला असल्यामुळे ती कोण.. कशी दिसते.. किंबहुना मुलगी आहे की बाई आहे हे सुद्धा त्याला समजत नव्हते. डोळ्यावर चष्मा. ती पण गाणे ऐकण्यात तल्लीन झाली आणि. त्याने दुर्लक्ष केले. त्याला कशातच उत्साह वाटत नव्हता. छे! उगाचच नाशिकला आलो.काही उपयोग झाला नाही येथे येउन.
नाशिकरोडला गाडी थांबली. काही जण नव्याने गाडीत चढले. बसने नाशिकरोड सोडले. रेल्वे पुल ओलांडून सिन्नरच्या दिशेने गाडी निघाली.
थोड्या वेळाने शेजारी बसलेल्या मुलीने तोंडाचा स्कार्फ काढला. हो..मुलगीच होती ती. त्याच्याच वयाची. अजुनपर्यंत ते दोघे एकमेकांशी एका शब्दानेही बोलले नव्हते. त्याने तिच्याकडे पाहिले. कुठेतरी बघितल्या सारखा चेहरा वाटतो हा. ओळखीचा वाटतो. डोक्याला त्याने खूप ताण दिला. पण आठवत नव्हते.
चटकन त्याला आठवले. मोबाईल मधून त्याने शाळेतील मित्र मैत्रीणींचा ग्रुप शोधला. सागरमल मोदी शाळेतील त्यांचा whats app वर ग्रुप होता. वेगवेगळ्या मुलींचे DP बघीतले.
अरे हो..हि तर इशा.इशा चंद्रात्रे.आपल्याच वर्गातली. पण ही कशी आपल्याला ओळखत नाहीये.
“हाय”
“अं…हो……हाय.”
“तु इशा ना ? इशा चंद्रात्रे?”
“हो..तु कसं ओळखतोस? मी नाही ओळखलं तुला”
“नाही? अगं मी श्री.. श्रीकांत देवधर.. सागरमल मोदी.. काही आठवते का?”
“अय्या तु तो श्री?मी खरंच नाही ओळखलं”
“बरोबर आहे.. शाळा सोडून पण दहा वर्ष झाली”.
आता ती जरा ओळख दाखवत होती.. पण तरी तुटकपणे.बोलण्याची तिची फारशी इच्छा दिसत नव्हती.
“तु आहेस ना..What’s up वर.सागरमल मोदी च्या ग्रुपवर? मग माझा DP बघितला नाही कधी? “त्याने विचारले.
“नाही. मी ग्रुपवर आहे फक्त. तेवढ्या पुरती. विक्रांतने घेतले मला ग्रुपवर. पण मला नाही फारसा इंटरेस्ट”.
ती जरा उदासच वाटली. मग जरावेळ दोघेही नुसते गप्प बसुन राहिले. त्याला वाटले.. हिने जरा आपल्याशी बोलावं.चार पाच तास आपण एकत्र प्रवास करणार. इतक्या वर्षांनी भेटलो, प्रायमरी शाळेत आपण एकत्र होतो. त्यानंतर आपले नाशिक सुटले. आता कोण कोण भेटतात.. कोण काय करतात, हिला विचारावे. तेवढाच वेळ पण जाईल. पण ही आपली मख्ख. खिडकीतून बाहेरच बघत बसली आहे. आणि बाहेर तरी काय आहे बघण्यासारखे? रस्त्याची कामे? वाळुचे,खडिचे ढिग?
त्यानेही विषय वाढवला नाही. हिलाच जर बोलायची इच्छा नसेल तर जाऊ द्या ना. आपल्याला तरी काय पडली आहे?
जरा वेळाने तिला कोणता तरी कॉल आला.
“हो..हो..बसले मी गाडीत.. हो..वेळेवर सुटली गाडी.”
“..हो गं बाई.पोहोचल्यावर फोन करते..कसले टेन्शन?”
“काही टेन्शन वगैरे नाहीए मला.. हो..ठेव फोन तु”.
मघापासून तो पहात होता.हि कुठल्यातरी दबावाखाली आहे. म्हणुनच फारशी कशातच उत्सुकता दाखवत नाहिए.विचारावं का हिला?
बोलेल का ती आपल्याशी मनमोकळेपणाने?
“काय करतेस तु सध्या इशा?” शेवटी त्याने सुरुवात केली.
“यंदाच B.E. पुर्ण केलं. E & TC मध्ये”
“मग आता पुढे काय?”
“बघायचे. चालू आहे शोध जॉबचा”.
“कैम्पस मध्ये नाही काम झालं?”
“नाही रे. त्यांना सगळे मेरीटवाले लागतात. मला Agrigate 5o% च आहे”
“तु पुण्याला ये.पुण्यात मस्त जॉब आहेत”.
“तु पुण्यात असतोस?”
“हो.तु आता पुण्याला कशासाठी निघाली आहेस?”
“जाऊ दे.सोड तो विषय. मला ना आता हे जॉब वगैरे विषय काढले ना की एकदम फ्रस्ट्रेशन येतं”.
“वा गं वा.तु तेव्हा तर एकदम डैशिंग होतीस.ते कुठे राणीभवन का कुठे जायसीच ना? मारामाऱ्या शिकायला?”
“ए गप हं.काही पण बोलु नकोस. आणि मारामाऱ्या नाही हं.त्याला आत्मसंरक्षण म्हणतात. ते शिकवायचे तिथे.”
“मग ते शिकुन तर एकदम स्ट्रॉंग झाली पाहिजेस.ते का अर्धवट सोडलस तु?”
“हो.चौथीनंतर मी तेथे गेलेच नाही. बाबा संघाचे काम करतात ना.. त्यांनी खूप फोर्स केला.. म्हणून मी गेले. जेमतेम
दोन तीन वर्ष.”
आता ती जरा मोकळी होउन बोलायला लागली होती. पण तिच्या उदासीनतेचे कारण काही सांगत नव्हती. जरा वेळ तसाच गेला.
आता उन्हाची तिव्रता कमी झाली होती. सुर्य अस्ताला जात होता.
खिडकीतून गार हवा आत येत होती. इशा बाहेर मावळतीच्या सुर्याकडे पहात होती. डोक्यात असंख्य विचार.
होईल का आपले काम?
मिळेल का आपल्याला हा तरी जॉब?त
विचारावे का ह्याला?
मघा तर म्हणत होता.. पुण्यातच असतो म्हणून.
असेल कुठे त्याची ओळख?
“इंटरव्ह्यू आहे पुण्यात?”अचानक श्री ने विचारले.
ती दचकली. याने कसे ओळखले.
“अं..! काही विचारले का तु आत्ता?”
“हो.मी विचारले की तु इंटरव्ह्यू साठी पुण्याला चालली आहे का?”
“तु कसं ओळखलं?”
चला, म्हणजे आपण अंदाजानी खडा टाकला, तो बरोबर लागला.
“ते सोड.कुठे आहे तुझा इंटरव्ह्यू? कुठली कंपनी?”
“श्री जाऊ दे ना. कशाला विचारतो आहेस.अजून कशात काही नाही. नाशिकला दोन ठिकाणी इंटरव्ह्यू दिले. दोन्हीकडून हात हलवत आले.आता हा तिसरा प्रयत्न. मला त्याचेच टेन्शन आहे. इजा-बिजा-तिजा होते की काय. अजून तु काही विचारु नकोस”
“हे बघ,तु हा इंटरव्ह्यू दे तर खरं. आणि नाही झाले काम ना.. तर काही निराश होऊ नकोस.आपल्या आहेत ओळखी.होऊन जाईल कुठेही तुझे काम”
क्षणभर थांबून तो म्हणाला,
“अगं कुठेतरी कशाला.. आमच्या राजुमामाचीच कंपनी आहे. त्याला लागतात तुमच्या सारखे B.E. चे फ्रेश मुलं..मुली.E.&TC वाले”.
ती खिडकीतून बाहेर बघत बसली. जणू काही आपल्या शेजारी कोणी आहे.. कोणी आपल्याशी बोलत आहे याची जाणीवच नव्हती. डोक्यात विचार. नुसते विचार. आता आपण घरी भार होऊन रहाण्यात अर्थ नाही. बाबांनी परीस्थिती नव्हती तरी इतके शिकवले. कोठून कोठून पैसे आणून त्यांनी म़ाझे शिक्षण पुरे केले. पुर्वी सारखे काम होत नाही त्यांना आता. आता काही नाही तर, आपला आपण खर्च तरी सोडवला पाहिजे. त्यांच्याकडे आता पैशासाठी हात पसरणे नको वाटते. पण नाही मिळत जॉब. काय करू? इंटरव्ह्यू साठी गेले की अंगाला कंप सुटतो. पाय लटपट करायला लागतात.
आमचे घर एक मजली होते. ढग्यांचं घर अशी त्या घराला ओळख होती.
ज. ना. ढगे म्हणजेच जनार्दन नारायण ढगे
उत्तम शिक्षक, प्रसिद्ध लेखक,साहित्यप्रेमी, तत्त्वचिंतक,(फिलॉसॉफर),संत वाङमयाचे गाढे अभ्यासक,प्रवचनकार,व्याख्याते आणि एक यशस्वी बिझनेसमन अशी त्यांची विविध क्षेत्रातील ओळख होती. अशा या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाची म्हणजेच माझ्या वडिलांविषयी मी लिहीनच पण तत्पूर्वी माझं लहानपण ज्या घरात गेलं, ते घर, परिसर आणि तिथलं वातावरण आणि त्यातून झालेली आयुष्याची मिळकत हीही माझ्यासाठी खूप मोलाची आहे.
आठवणी खूपच आहेत. मनाच्या कॅनव्हासवर अनेक रेघारेघोट्यांचं जाळं चित्रित झालेलं आहे आणि आजही जेव्हा जेव्हा मन उघडं होतं तेव्हा तेव्हा या चित्रांचं पुन्हा एकदा सुरेख प्रदर्शन मनात मांडलं जातं.
घराच्या खालच्या मजल्यावर दोन दोन खोल्यांचे स्वतंत्र असे खण होते. हल्लीच्या शब्दात म्हणायचे तर ब्लॉक्स होते. फ्लॅट्स हा शब्द या घरांसाठी उचित नाही. फ्लॅट म्हटलं की एक निराळी संस्कृती, निराळे आकार, निराळी रचना, संपूर्णपणे वेगळीच जीवन पद्धती नकळतच उभी रहाते. फार तर दोन दोन खोल्यांची ती स्वतंत्र घरे होती असं म्हणूया आणि त्यात गद्रे आणि मोहिले हे आमचे दोन भाडोत्री रहात होते. वाचकहो! भाडोत्री हा शब्दही मला आवडत नाही. भाडोत्री या शब्दात दडलाय एक तुच्छपणा, काहीसा उपहास अगदीच टाकाऊ आणि नकारात्मक शब्द आहे हा असे मला वाटते. “ ते आमचे भाडोत्री आहेत.” असं म्हणणारा मला उगीचच गर्विष्ठ वाटतो. कुठेतरी अहंकाराचा दर्प तिथे येतो. अशावेळी खरोखरच मराठी भाषेचा जाज्वल्य अभिमान असला तरीही टेनन्ट हा शब्द भावना न दुखावणारा वाटतो. असो. सांगायचं होतं ते इतकंच की त्या खालच्या मजल्यावरच्या दोन स्वतंत्र घरात गद्रे आणि मोहिले यांचे परिवार भाड्याने राहत होते. महिन्याला पाच रुपये असे भरभक्कम भाडे! दोन्ही घरांना मागचं दार होतं आणि तिथेच एक मोरी होती. ती त्या दोघांकरिता सामायिक होती. कपडे धुण्यासाठी एक घडवलेला काळा चौकोनी दगड आणि पाण्यासाठी नळही होता आणि मोरीच्या एका बाजूला कॉमन टॉयलेटही होतं.संडास म्हणण्यापेक्षा टॉयलेट बरं वाटतं.शिवाय त्यावेळी फ्लश नसायचे पण त्या काळात भाड्याने राहण्यासाठी ज्या सोयी सुविधा अपेक्षित होत्या त्या सर्व या घरांसाठी होत्या असं म्हणायला हरकत नाही आणि अशा या घरामध्ये हे दोन परिवार सुखाने राहत होते.
गद्रे होते ब्राह्मण आणि मोहिले होते चांद्रसेनीय कायस्थ प्रभू. गद्रे कट्टर कोकणस्थ आणि मोहिले पक्के मांस मच्छी खाणारे. मोहिलेंच्या ताईंनी बोंबील तळले की गद्रे वहिनी मागचं दार धाडकन जरा जोरातच आपटून लावायच्या आणि दार आपटल्याचा आवाज आला की माझी आजी वरून गद्रे वहिनींवर रागवायची,” अहो दारं आपटू नका. दार मोडलं ना तर स्वतःच्या खर्चाने नवे दार बसवावे लागेल हे लक्षात ठेवा.”
अखेर आम्ही घरमालक होतो ना?
पण अशा थोड्याफारच धुसफुसी होत्या बाकी सारी गोडी गुलाबी होती. गद्रे वहिनी त्यांच्या कोकणस्थित माहेराहून येताना फणस घेऊन यायच्या आणि त्याचे गोड,रसाळ गरे सगळ्या गल्लीत वाटायच्या.
पाऊस पडला की पहिल्या आठवड्यात शेवळं ही रानभाजी ठाण्यात मिळायची. अजूनही मिळते. या शेवळाची भाजी अथवा कणी मोहिले ताईंनी केली की त्या वाटीभर घरोघरी पाठवायच्या. वेगळ्या चवीची रुचकर भाजी आणि खूप मेहनतीची पण लहानपणी खाल्लेल्या या रानभाजीची चव आजही माझ्या रसानेवर तशीच्या तशी आहे. ही अत्यंत गुंतागुंतीची आणि मेहनतीची भाजी करण्याच्या भानगडीत मी कधीच पडले नाही कारण माझ्या डोळ्यासमोर याही भाजीचा एक इतिहासच आहे.
माझे वडील यास्तव खास सायकलवरुन बाजारात जाऊन टोपलीभर शेवळं घेऊन यायचे. बाजारात, ती पाऊस पडल्यावर एक दोनदाच मिळते म्हणून ही बेगमी करून ठेवायची. या भाजीची निवडून साफसफाई माझी आजी अत्यंत मन लावून करायची. ती शास्त्रशुद्ध चिरून भर तेलात तळून ठेवायची आणि अशी ही चिरलेली तळून ठेवलेल्या शेवळाची भाजी निदान चार-पाच वेळा तरी वेगवेगळ्या प्रकाराने घरात शिजायची. या कामासाठी वडील,आई आणि आजी अत्यंत झटायचे आणि आम्ही ती चाटून पुसून खायचो. त्यावेळी खाद्यपदार्थ टिकवण्यासाठी रेफ्रीजरेटर ही संकल्पना इतकी प्रचलित नव्हती. आणि अभावानेच पण ज्यांच्याकडे असायचा त्या ठाण्यातल्या धनवान व्यक्ती होत्या. आणि त्यांची घरे अथवा बंगले जांभळीनाका,नौपाडा,घंटाळी अशा उच्चस्तर वस्तीत असायचे. त्यांचा क्लासच वेगळा होता.
मात्र अशी ही पारंपरिक आणि गुंतागुंतीची, प्रचंड मेहनतीची शेवळाची भाजी आजही माझी ताई आणि धाकटी बहीण निशा तीच परंपरा सांभाळत तितकीच चविष्ट बनवतात आणि तुम्हाला खरं वाटणार नाही पण आजही मी केवळ ती भाजी खाण्यासाठी पुण्याहून ठाण्याला बहिणीकडे जाते कारण शेवळाची भाजी हा माझ्यासाठी केवळ खाद्यपदार्थच नव्हे तर या चवीभोवती माझ्या बालपणीच्या रम्य आणि खमंग आठवणी आहेत.हे व्यावहारिक नसेल पण भावनिक आहे.आजही शेवळाची भाजी खाणं हा एक सामुहिक आनंद सोहळा आहे.
तर गद्रे आणि मोहिले याविषयी आपण बोलत होतो.
मोहिल्यांची चारू ही माझी अतिशय जिवलग मैत्रीण. तिचे भाऊ शरद, अरुण शेखर हेही मित्रच होते. शेखर तसा खूप लहान होता आणि तो माझी धाकटी बहिण छुंदा हिचा अत्यंत आवडता मित्र होता याविषयीचा एक गंमतीदार किस्साही आहे. तोही आपण या माझ्या जीवन प्रवासात वाचणार आहोतच.
चारुच्या वडिलांना भाई आणि आईला ताई असेच सारेजण म्हणायचे. भाई हे अत्यंत श्रद्धाळू आणि धार्मिक होते. साईबाबांवर त्यांची नितांत श्रद्धा आणि भक्ती होती. ते कोणत्यातरी सरकारी कार्यालयात नोकरीला होते. पगार बेताचाच पण तरी चार मुलांचा प्रपंच ते नेटाने सांभाळत होते. त्या वयात आम्हा मुलांना त्यांच्या प्रापंचिक समस्या जाणवत नव्हत्या. कधीतरी ताई आणि भाईंची झालेली भांडणं, शब्दांची आणि भांड्यांची आदळआपट ऐकू यायची त्यावेळी चारू आमच्याकडे किंवा समोरच्या मुल्हेररकरांकडे जाऊन बसायची. गल्लीतली आम्ही सगळीच मुलं अशावेळी एकत्र असायचो. कधी ना कधी हे प्रत्येकाच्या घरी घडायचं आणि त्यावेळी नकळतच आम्ही सारी अजाण,भयभीत झालेली मुलं अगदी जाणतेपणाने एकमेकांसाठी मानसिक आधार बनायचो.
भांडण मिटायचंच. तो एक तात्पुरताच भडका असायचा. नंतर ताई निवांतपणे घराच्या पायरीवर येऊन बसायच्या आणि भाई जोरजोरात टाळ्या वाजवत साईबाबांची आरती म्हणायचे
।।माझा निजद्रव्य ठेवा
तुम्हा चरण रजसेवा
मागणे हेचि आता
तुम्हा देवाधिदेवा।।
आजही ही आरती म्हणताना माझ्या डोळ्यासमोर सहजपणे टाळ्या वाजवणारे भाई येतात.
गल्लीत अण्णा गद्रे आणि गद्रे वहिनी हे जोडपंही तिथल्या संस्कृतीत सामावलेलं होतं. अण्णांचा दूधाचा व्यवसाय होता. मला आता नक्की आठवत नाही पण त्यांचा आणखी काही जोडधंदाही होता. अण्णांची मिळकत चांगली होती, काही जण गमतीने अण्णांवर टीका करीत. “गद्र्यांचा काय पाण्याचा पैसा”
दुधात पाणी घालून ते विकायचे म्हणून हा प्रहार असायचा.
वहिनी ही गोऱ्यापान, गुबगुबीत आणि हिरवट घारे डोळे असलेल्या एकदम टिपिकल कोब्रा महिला आणि घट्ट काष्ट्याचे लुगडं नेसलेल्या, ठुमकत चालणाऱ्या आणि आपण कोकणस्थ ब्राह्मण असल्याचा एक गर्व चेहऱ्यावर घेऊन वावरणाऱ्या वहिनी मला आजही आठवतात. त्यांच्या हातच्या ताकाची चव मी कधीही विसरू शकणार नाही. पण त्यांच्याविषयी आता जेव्हा माझ्या मनात विचार येतो तेव्हा तीव्रतेने एक सलही बोचतो. या गद्रे दांपत्यांना लागोपाठ तीन मुली झालेल्या होत्या.
विजू, लता, रेखा. आम्ही साऱ्या अगदी गाढ मैत्रिणीच होतो. या तिघींना आण्णांचा अतिशय धाक होता.अण्णांचं मुलींवर प्रेम नव्हतंच असं काही मी म्हणू शकत नाही पण एक मात्र खरं की त्यांना मुलगा हा हवाच होता. मुली झाल्या म्हणून ते नेहमी दुःखीच असायचे. रेखाच्या पाठीवरही त्यांना एक दोन कन्यारत्नं झाली पण ती काळाने हिरावून नेली. त्यांना मूठमाती देऊन अण्णा जेव्हा घरी येत आणि डोक्यावरून आंघोळ करत तेव्हा त्यांना कुठेतरी सुटल्याची भावना वाटत असावी. वहिनी काही काळ मुसमुसत कदाचित त्यांच्या मातृत्वाला झालेली जखम थोडी भळभळायची. गल्लीतली मंडळी मात्र म्हणायची “मुलगी जन्माला आली आणि अण्णांनी तिला अफू पाजली”
हे खूप भयंकर होतं पण त्यावेळी याचा अर्थ कळायचा नाही. खरं की खोटं हे ही माहीत नव्हतं पण या सगळ्यांमागे मुलीच्या जन्माचं दुःख होतं हे निश्चित आणि ते मात्र प्रखरतेने जाणवायचं,बोचायचं,प्रश्नांकित करायचं.
अखेर या दांपत्यास एक मुलगा झाला. त्याचे दणक्यात बारसेही झाले. गल्लीत अण्णांनी केशरयुक्त पेढे मन मुराद वाटले. आनंदी आनंद साजरा केला त्या मुलाचे नाव ठेवले मोरेश्वर आणि गल्लीत तो झाला सगळ्यांचा मोरया कधी मोरू, कधी मोर्या.
आणि अशा पार्श्वभूमीवर आम्ही पाच बहिणी होतो आणि माझी आजी अभिमानाने म्हणायची “माझ्या पाच नाती म्हणजे माझे पाच पांडव आहेत.”
वारीचं कुतूहल काही केल्या उलगडतच नाही .प्रत्येक गोष्टीच कौतुक वाटत राहतं .
मला तर ह्या वारकऱ्यांच्या पांढऱ्या कपड्याचा पण वाटतं ….
त्याविषयी विचारावं असं वाटलं. वारीला गेले होते तेव्हा त्यांच्याशी संवाद साधला .त्यातल्या काही जणांनी जे सांगितलं ते तुम्ही वाचा.
“आम्ही हे कपडे फक्त वारीलाच घालतो इतर वेळेस नाही”
“मला माझी बहीण घेऊन देते. तिच्या घरचं खटलं खूप मोठं आहे. तिला वारीला यायला कधीच जमत नाही. म्हणते…. तुला तरी कपडे घेते रे ….”
“माझी आई माझ्यासाठी शिवते. मशीन काम येत तिला.बघा ना “
असं म्हणून दादांनी उभे राहून पायजमा शर्ट दाखवला मला…
“हा बघा सोपाना याचा भाऊ याचं लय लाडकोड करतोय.. तोच देतो याला नवीन कापडं घेऊन”
“माझी बायको अंगणवाडीत शिक्षिका आहे. आमच्या गावी चांगली कापडं भेटत नाहीत. बायको तालुक्याला जाऊन माझ्यासाठी घेऊन येते.”
एक एक जण सांगत होते. मी ऐकत होते. एकानी तर सांगितले की …
वारकऱ्यांनी वारीत घातलेले हे कपडे दुसरे लोक आनंदाने मागून नेतात .कौतुकाने घालतात ….
हे ऐकून तर माझं डोळे भरून आले. किती निर्मळ श्रद्धा …त्या कपड्याचं पण अप्रूप असाव…
किती भक्तीभाव… आपली संस्कृती किती संवेदनशील आहे याचीच यातून आपल्याला प्रचिती येते.
लोकांना वारकऱ्यांच्या साध्या कपड्यातून सुद्धा विठ्ठलाशी जवळीक साधावीशी वाटते..
वारीला निघालेल्या आया बहिणी शेजारीच बसल्या होत्या. त्यांच्याकडे बघितलं सगळ्या जणींचे साधेसुधे कपडे होते. त्या आमचं बोलणं ऐकत होत्या. एकजण म्हणाली
“पुरुषांची गोष्ट वेगळी असते. त्यांना पाहिजेतच तशी कापडं… आमच्या बायकांचं काय हो ….वारीत यायला मिळालं याचाच आम्हाला आनंद होतो बघा …..इथं आमची कापडं कोण बघतंय?”..
शांत संयमीत आवाजात त्या बोलत होत्या. खऱ्याखुऱ्या वारकरणी होत्या. देहभान विसरून जातात या बायका……
श्रद्धा ,भक्ती आणि विठूरायावरचं अढळ प्रेम त्यांना चालण्याच बळ देतं.
त्यांच्या कपड्याकडे लक्ष जाण्यापेक्षा त्यांच्या आतल्या निर्मळ अंतःकरणाचे दर्शन मला झालं .
विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती डोक्यावर घेऊन ती उभी राहिली.
” कसं चालता हो इतकी जड मूर्ती डोक्यावर घेऊन ?मी विचारल
मागील काही भागातून आपण डार्कवेब बद्दल माहिती घेत आहोत. त्यात आपण याचा वापर कोण करते? सरकारचे त्यावर नियंत्रण का नाही तसेच डार्कवेबचा वापर करणे कायद्याने प्रतिबंधित आहे का याचा मागोवा घेतला. आज आपण त्यातीलच एक गोष्ट बघणार आहोत.
‘रेड रूम’
डार्कवेबचा विषय निघाला आणि रेडरूम बद्दल चर्चा झाली नाही असे सहसा होत नाही. ज्यांना डार्कवेब ही गोष्ट माहिती आहे त्यांना रेडरूम हेही माहित असते. अनेकदा तर लोकांना आधी रेडरूम बद्दल माहिती मिळते आणि नंतर त्याबद्दल जास्त माहिती घेताना डार्कवेब बद्दल माहिती मिळते.
सर्वप्रथम ही ‘रेडरूम’ काय भानगड आहे ते पाहू. होय… भानगडच. कारण रेडरूम बद्दल तुम्हाला जी माहिती मिळेल त्यानुसार, रेडरूम म्हणजे अशी जागा ज्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीवर अत्याचार केले जातात किंवा त्याची हत्या केली जाते आणि ती घटना अनेक जण मनोरंजन म्हणून बघतात. थोडक्यात WWE मध्ये असते ना, दोन, चार जण एकमेकांना हातात येईल त्या गोष्टीने बदडतात आणि लोकांना ते बघण्यात आनंद वाटतो. इथे फक्त दोन गोष्टी बदलतात. पहिली गोष्ट म्हणजे इथे ज्या व्यक्तीवर अत्याचार केले जातात ती व्यक्ती सहन करण्याशिवाय काहीच करू शकत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे सगळे प्रेक्षक आपल्या घरी डार्कवेब इंटरनेटचा वापर करून आपल्या लॅपटॉपवर किंवा मोबाईलवर हे सगळे बघू शकतात. या साठी ते दिलेल्या लिंकवर बीटकॉईन किंवा इतर एखाद्या डिजिटल करन्सीच्या रुपात पेमेंट करतात.
काही वेळेस तर असेही सांगितले जाते की यात तुम्ही दोन पध्दतीने भाग घेऊ शकतात. एक म्हणजे प्रेक्षक म्हणून. आणि दुसरे म्हणजे कोणत्या पद्धतीचा अत्याचार करायचा हे सांगून. हे सगळे लाइव्ह घडत असते, आणि हे बघण्यासाठी लोक हजारो / लाखो रुपये खर्च करतात.
आता कुणाला असे वाटेल की एखाद्या निर्बल माणसावर अत्याचार करण्यात किंवा पाहण्यात कुणाला काय मजा येत असेल? आणि त्यासाठी कुणी हजारो, लाखो रुपये कुणाला का देतील? हाच विचार माझ्याही मनात आला होता. पण डार्कवेबवर अशा लिंक दिसतात हे मात्र खरे आहे.
तुम्हाला आता रेडरूम म्हणजे काय हे थोडक्यात माहिती झाले असेल. आता याच्या पुढील प्रश्न. हे खरंच अस्तित्वात आहे का?
माझ्या मते अशा कोणत्याही रेडरूम डार्कवेबवर अस्तित्वात असणे जवळपास अशक्य आहे. का? कारण डार्कवेबचे काम करण्याची पद्धत. याआधीच्या भागात आपण पाहिले आहे की डार्कवेब क्लाइंट आणि सर्व्हर याची ओळख पटणे अवघड व्हावे यासाठी मास्किंग करत असते. त्यातून काही जण VPN चाही वापर करतात. त्यानुसार data अनेक वेगवेगळ्या आयपीवर पाठवला जातो. अशा अनेक ठिकाणाहून फिरत तो क्लाइंट पर्यंत पोहोचतो. इंटरनेटचा स्पीड लक्षात घेता अशा ठिकाणी लाइव्ह स्ट्रीमिंग कितपत शक्य आहे? म्हणजे टेक्निकली हे शक्य वाटत नाही. मग यात शक्यता कोणती असेल? तिथे एखादी लिंक देऊन झूम किंवा गुगलमिट सारख्या ठिकाणी सहभागी करून घेणे. पण इथे डार्कवेब वापरले जात नाही. डीपवेबचा यात वापर होऊ शकतो. ( गुगलमिट, झूम या गोष्टी डीपवेब प्रकारात मोडतात. कारण त्याचा वापर करण्यासाठी ज्याने अशी मिटिंग अरेंज केली असेल त्याची परवानगी लागते. )
रेडरूम बद्दल जर आपण कोणत्याही तज्ञाला विचारले तर त्याचे उत्तर असते, ‘मी याबद्दल ऐकले आहे पण कधीही रेडरूममध्ये गेलो नाही.’
काही जण आता असेही विचारतील की युट्युबवर तर याबद्दलचे अनेक व्हिडिओ दाखवले जातात. ते काय आहे? ते सगळे व्हिडिओ हे मुद्दाम बनवले जातात. किंवा अनेकदा वेगवेगळ्या चित्रपटातील क्लिपला ग्रेस्केल मध्ये ( म्हणजे black & white बनवून ) बदलून पोस्ट केले जातात. त्यामागे पोस्ट करणाऱ्याची मानसिकता ही थोडीशी मस्करी करण्याची किंवा आपल्याला काहीतरी जास्त माहिती आहे हे इतरांना सांगण्याची असते.
असे सगळे असूनही मग डार्कवेबवर ‘रेडरूम’ बद्दलच्या लिंक का असतात? किंवा चार दिवसात ‘रेडरूम’ सेशन होणार आहे अशी लिंक का आढळते?
याला दोन कारणे आहेत. त्यातील पहिले कारण म्हणजे काही जणांच्या मनात अशा विचित्र भावना निर्माण होत असतात. काहीतरी थ्रिल म्हणून ते अशा ठिकाणी रजिस्ट्रेशन करतात. पैसे भरतात आणि फसले जातात. ज्याला पैसे मिळाले तो नंतर गायब होतो. आपण कुणाला पैसे पाठवले हेच माहिती नसेल तर तुम्ही त्याला पकडणार तरी कसे? म्हणजेच फसवणुकीसाठी अशा लिंकचा वापर अनेक hacker करतात.
याचे दुसरे कारण म्हणजे अशा अनेक लिंक काही देशाच्या सुरक्षा यंत्रणाच बनवत असतात. अशा ठिकाणी जे लोक येतात त्यांची माहिती घेऊन त्यांना अटक केली जाते. हा एक प्रकारचा सापळा असतो. अनेक विकृत लोक या सापळ्यात अडकतात आणि त्यांना योग्य ते शासन किंवा समुपदेशन केले जाते.
अनेकदा डार्कवेब पेक्षाही विचित्र गोष्टी आपल्या सर्फेस वेबवर बघायला मिळतात. त्याचे साधे उदाहरण म्हणजे काही जण आत्महत्या करताना फेसबुक लाइव्ह करतात. काही गेम असे असतात की त्याचा उपयोग लहान मुलांना आत्महत्या करण्यास किंवा कुणाची हत्या करण्यास प्रवृत्त करतात. अनेक खेळांवर तर सरकारने बंदीही घातली आहे. आणि हे सगळे सर्फेस वेबवर चालते.
थोडक्यात ‘रेडरूम’ ही गोष्ट डार्कवेबवर प्रत्यक्षात अस्तित्वात असणे जवळपास अशक्य आहे.
मागील आठ भागांच्या लेखमालेतून डार्कवेब बद्दलची माहिती सोपी करून सांगण्याचा मी प्रयत्न केलाय. पुढेमागे अशीच एखादी लेखमाला परत घेऊन येईन, तो पर्यंत रामराम… धन्यवाद…
☆ “बाप” एक माणूस….!! – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित☆
एकदा “बाप” ही उपाधी मागे लागल्यावर सगळ्या मृदु, कोमल भावनांची मक्तेदारी बायकोच्या नांवावर करून हा माणूस कधी निर्विकार, मख्ख तर कधी कर्तव्य-कठोर मुखवटा धारण करून बसलेला एक खडक बनतो.
पोटच्या पोरांसाठी सतत कष्ट करणारा, त्यांच्यासाठी अनेक गोष्टी चुपचाप सहन करणारा, त्यांची कोड- कौतुकं पुरविण्यासाठी वेळप्रसंगी जीवाचा आकांत करणारा बाप, तसा आईच्या थोरवी पुढे दुर्लक्षितच पण त्याचे त्याला कधीच वैषम्य वाटत नाही. जाहीर कौतुकाची तर त्याला कधी अपेक्षाही नसते. आपली लेकरं आपल्यापेक्षा मोठी व्हावीत ह्या एकाच ध्यासापोटी आपला ‘बापा’चा कठोर मुखवटा सांभाळत त्याचे आयुष्य सरत असते….
पण एका समाधानाच्या क्षणी, हा मुखवटा गळून पडतो… अंतरंगामध्ये झुळुझुळु वाहणाऱ्या मायेच्या निखळ पाण्याचा थोपवून धरलेला झरा, मुलांच्या कर्तृत्वाची झेप पाहतांना जेंव्हा त्याच्या डोळ्यांचे बांध फुटून वाहू लागतो तेंव्हा त्याच्याच लेकरांना उमगतं की अरे, आपला बाप हाच खरा आपल्या आयुष्यातला “बाप माणूस” आहे ….!
अशा सगळ्या “बाप-माणसांना” त्रिवार वंदन..!!
☆
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : सुहास रघुनाथ पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
(संस्कारधानी जबलपुर के हमारी वरिष्ठतम पीढ़ी के साहित्यकार गुरुवर डॉ. राजकुमार “सुमित्र” जी को सादर चरण स्पर्श । वे आज भी हमारी उंगलियां थामकर अपने अनुभव की विरासत हमसे समय-समय पर साझा करते रहते हैं। इस पीढ़ी ने अपना सारा जीवन साहित्य सेवा में अर्पित कर दिया। वे निश्चित ही हमारे आदर्श हैं और प्रेरणास्रोत हैं। आज प्रस्तुत हैं आपका भावप्रवण कविता – कथा क्रम (स्वगत)…।)
साप्ताहिक स्तम्भ – लेखनी सुमित्र की # 199 – कथा क्रम (स्वगत)…