नेत्रदानाचे महत्व लक्षात घेऊन दरवर्षी 10 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय दृष्टिदान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या माध्यमातून लोकांमध्ये नेत्रदानाची जनजागृती केली जाते.
नेत्रदानाचे महत्व या बद्दलची जनजागृती करून लोकांना मृत्यूनंतर डोळे दान करण्याची प्रतिज्ञा घेण्यास प्रवृत्त करणे, हे दृष्टीदिनाचे उद्दिष्ट आहे. विकासशील देशांमध्ये प्रमुख सार्वजनिक आरोग्याच्या समस्यांपैकी अंधत्व ही मुख्य समस्या आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार कार्निया संबंधित आजार, मोतीबिंदू आणि काचबिंदू नंतर होणाऱ्या दृष्टी हानि आणि अंधत्वच्या मुख्य कारणांपैकी आहे.
कुठलही दानं हे उत्स्फूर्तपणे करावं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण ज्यांना काही देऊ करतो त्या गोष्टींची आवश्यकता, गरज ही समोरील व्यक्तीला हवी. तुमच्याकडे अतिरिक्त असणाऱ्या गोष्टी दुसऱ्या ला फारशी गरज नसतांना देऊ करणे हे दान ह्या परिभाषे खाली नक्कीच येत नाही हे देणा-यांनी आवर्जून लक्षात ठेवावे.
नुकत्याच उमलू लागलेल्या आमच्या वयात “धनवान”ह्या चित्रपटातील “ये आँखे देखकर हम सारी दुनिया भूल जाते है”हे गाणे किंवा “आँखोंही आँखोमे ईशारा हो गया,बैठे बैठे जिने का सहारा हो गया”ह्यासारखी अवीट गोडीची अविस्मरणीय गाणी दिसण्याच्याही पलीकडील नजरेच,दृष्टी चं महत्व आम्हाला सांगू लागली. खरचं सगळ्या जगाची,ज्ञानाची, माहिताची ओळख पटविण्याचं काम हे डोळेच तर करतात. लहानसं इटुकलं पिटुकलं बाळ सुद्धा जन्म झाल्याबरोबर आपल्या मिचमिच्या डोळ्यांनी उजेडाचा क्षणभर त्रास सहन करीत अवतीभवतिच हे जग बघायला सुरवात करतं. मग हळुहळू हे डोळे आपल्याला नुसतीच नजर, दृष्टी देतात असं नाही तर सभोवतालचे ज्ञान मिळवित एक नवा दृष्टिकोन पण देतात.
हे डोळेच तर आपल्याला नवनवीन संकल्पना सहज समजवायला मदत करतात , हे डोळेच आपल्याला नवनवीन क्षेत्रात प्रगती करायला मदत करतात, हे डोळेच आपल्याला ह्या आणाभाका, कस्मेवादे निभवायला शिकवितात. हे डोळेच आपल्याला परस्परांची ओळख पटवायला शिकवितात. त्याचबरोबर ह्या डोळ्यांनी स्वतःला कसं ओळखावं हे पण शिकवितात. ह्या डोळ्यांमध्येच आपल्याला माया,ममता,प्रेम दिसून येतं,जीवन खूप सुंदर आहे ह्याची ग्वाही पटते, तर कधीकधी ह्या डोळ्यांमध्येच आपल्याला चीड, राग,संताप दिसून आल्याने आपलं नेमकं कुठं, काय, किती चुकलं ते आपण शोधायला लागतो. ह्य डोळ्यां मध्येच कधी आपल्याला वासनेची झलक आढळून आल्यास आपण लगेच सतर्क होतो. खरोखरच हे डोळे आपल्याला सगळी ओळखं पटवून देऊन जगात सक्षमपणे जगणं शिकवितातं.
आपल्याला निरामय, अव्यंग,सुदृढ शरीर नशीबाने देवाने दिले तर आपल्याला त्या अवयवांच्या किंमतीचा अंदाजच लागत नाही. ज्या कुणाजवळ ह्यातील एखाद्या अवयवाचा जरी अभाव असेल तर त्यालाच त्याच्या खरी किंमत ही कळते.आजकाल बरीच जनजागृती झाल्याने, त्याचं महत्त्व पटल्याने लोक आजकाल अवयवदानाचा त्यातल्यात्यात नेत्रदानाचा संकल्प सोडतात.
मी माझ्यापुरती तरी नेत्रदानाची व्याख्या बदलली आहे. मी ह्याला नेत्रदान न म्हणता नेत्रभेट म्हणते. “दान दिले” ह्या संकल्पनेपेक्षा “भेट दिली”ही संकल्पना वापरल्याने माणसासाठी जास्त घातक असलेल्या “मी”पणा किंवा “अंह”चा स्पर्श होत नाही, शिवाय दान ह्याचा अर्थ तुम्हाला कामी असतांना, गरज असतांना सुद्धा तुम्ही ते दुस-याला दिले तर त्या त्यागाला दान म्हणणं उचित ठरेल. परंतु नेत्रदान तर आपण आपला शेवटला श्वास सोडल्यावर, त्यांची आपल्याला गरज संपल्यावर दुसऱ्या ला देतो म्हणून नेत्रभेट हे नाव जास्त समर्पक असं मला वाटतं.
त्या ईश्ववराची लीला पण अगाध असते बरं का,
एखादा अवयव नसलेल्या व्यक्तीत त्याची उणीव,कमतरता भरून काढायला पर्यायी ईश्वराने दुसरी एखादी शक्ती त्याला खास म्हणून दिलेली असते. त्यामुळे डोळे नसून सुद्धा दया, प्रेम,कणव, संस्कार, कृतज्ञता,समजूतदारपणा, सुसंस्कृतपणा ह्या बाबतीत अग्रेसर असलेल्या अंध व्यक्ती आपल्या सभोवती सहजतेने, विनातक्रार वावरतांना आढळतात.
आजच्या दिनी जास्तीत जास्त लोकांनी नेत्रदानाचा संकल्प सोडून अंधांना दृष्टी देण्याचं मोलाचं कार्य करावं एवढचं मी म्हणेन.
☆ चित्रकार… भाग-२ – लेखक : श्री शशांक सुर्वे ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला केळकर☆
(इतरांच्या दृष्टीने जरी त्या भूत वैगेरे असल्या तरी माझ्या दृष्टीने एक प्रेमळ मायेची ऊब देणारी स्त्रीच आहे…) इथून पुढे …
भूत ही संकल्पना किती क्रूर,नकारात्मक रंगवली आहे ना लोकांनी??….कदाचित ते कधी कमला काकूंना भेटले नसतील….त्यांच्याबद्दल मी थोडी माहिती आजूबाजूला फिरून गोळा केली….त्या एकट्याच ह्या बंगल्यात राहत होत्या….सुधाकर काका 60 व्या वर्षीच कमला काकूंना एकटे सोडून देवाघरी गेले होते….ह्या आधी त्यांचा एकुलता एक मुलगा त्यांना एका अपघातात सोडून गेला….काकू अगदी एकट्या ह्या घरात राहत होत्या…ह्यातच एका दिवशी त्यांना ह्रदयविकाराने गाठले आणि हे घर अगदीच रिकामे झाले…..सुधाकर काका आणि कमला काकूंनी मोठ्या मेहनतीने हे घर बांधले होते ते त्यांनी जिवंतपणी कुणालाही विकलं नाही त्यामुळे अजूनही कमला काकूंचा वावर ह्या घरात आहेत असे आजूबाजूचे लोक म्हणतात…त्यामुळे हे घर कुणी विकत घेत नाही..आणि हे खरेच आहे….खरोखर त्या इथे वावरतात….माझ्याशी बोलतात……मलाही त्या खूप आवडतात…..
त्या दिवशी शाळेतून मी घरी येत होतो तर वाटेत हा बंगला होता….गेटच्या आतल्या बाजूला एका झाडावर एक पोपट बसला होता…..मला तो पोपट निरखून रेखाटायचा होता त्यामुळे विचार न करताच मी आत गेलो आणि इथल्या एका धुळकट पायरीवर बसून तो पोपट रेखाटू लागलो….मी एकदा चित्र काढायला बसलो की माझं कशात लक्ष नसत…..काही दिवसांपूर्वी एका माणसाने मला सांगितले होते इथे जास्त उशीर थांबू नको ही जागा भूतीया आहे…..भूत हा शब्द ऐकून घाबरून मी इथून काढता पाय घेतला होता पण आता त्या पोपटाच्या मागे मी इथे कसा आलो मला कळलंच नाही…..मी चित्र काढू लागलो पण न राहून अस वाटत होतं की मागे कुणीतरी उभं आहे….अचानक कानात एक कुजबुज ऐकू आली….
“खूप छान चित्र काढलं आहेस बाळा”
मी थबकून मागे बघितलं….मागे कुणीच नव्हतं…..नंतर लक्षात आलं आपण तर त्याच भूतीया घरात आहोत….अगदी धावत पळत तिथून आलो…..खूप घाबरलो होतो तेव्हा…..पण नंतर त्या बाळा शब्दाने मला विचार करायला भाग पाडलं…..खूप दिवसांनी तो शब्द ऐकत होतो……कुणीतरी माझ्या चित्राचीही तारीफ केली होती….एकेदिवशी शाळेतून येताना अचानक एक नजर त्या बंगल्याकडे गेली…..आज तो बंगला कमालीचा स्वच्छ आणि नीटनेटका वाटत होता….मी येताच तिथल्या गार्डन मध्ये मंद वाऱ्याची झुळूक वाहू लागली न जाणो अस वाटत होतं कुणीतरी आपल्याला त्या घरात बोलवत आहे….आज्जीच्या घरी आल्यावर जसा आनंद होतो तस काहीसं मनात वाटत होतं त्यामुळे थोडा धीर एकवटून बंगल्यात शिरलो…..परवा कुलूप असलेले दार आज उघडे दिसत होते…..दारात उभं राहून आत जाऊ की नको?? हाच विचार मनात चालू होता…..दारातून मला आतली हॉल मधली मोठी तैलचित्रे स्पष्ट दिसत होती…..ती चित्रे बघून आत शिरलो…..कमालीचा जिवंतपणा होता त्या चित्रात जणू प्रत्यक्ष आपण त्या ठिकाणी उभे आहोत असं वाटत होतं…..सगळी चित्रे फिरून फिरून बघत होतो….चित्राच्या खाली कमला असे नाव आणि सही होती 1996 हे साल देखील होते आपण एका भूतीया घरात आहोत हे जणू विसरूनच गेलो….अचानक थोडी सळसळ जाणवली चमकून तिकडे बघितले तर एका पॅड वर एक कोरा कागद अडकवला होता बाजूला पेन्सिल,ब्रश काही रंग आणि समोर एक खोटे सफरचंद ठेवलेले दिसत होते…..जणू सगळा सेटअप माझ्यासाठीच होता अस वाटत होतं…..कोणताही विचार न करता समोर ठेवलेल्या सफरचंदाचे चित्र रेखाटू लागलो…..ह्या वेळी मला ती भीती नव्हती जी इतर वेळी चित्र काढताना असायची…..माझी चित्रे आगीत फेकणारे माझे पप्पा पाठीत धपाटा मारणारी माझी मम्मी सगळ्यांच्या विसर पडला होता…..माझ्या पेन्सिल पकडलेल्या हातात एक वेगळेच बळ आले होते….समोरच्या सफरचंदाचे हुबेहूब चित्र,आउटलाईन वैगेरे माझ्याकडून रेखाटली जात होती….कानात कुणीतरी मला मार्गदर्शन करत होते….त्या दिवशी पहिल्यांदा मी मुक्तपणे जगल्याचा भास मला झाला…..मन अगदीच प्रसन्न झाले होते…..माझे आवडते काम करायची संधी मला मिळाली होती…..मग काय शाळा सुटल्यावर ITP च्या क्लास ना जाता भूतीया बंगल्यावर जाऊन चित्रे रेखाटू लागलो….रोज रोज माझ्यासाठी नवीन पेपर समोर एखादा नवीन ऑब्जेक्ट आपोआप तयार असायचा…..त्या कमला काकू मला मार्गदर्शन करीत होत्या….त्याची अगदी काळसर आकृती दिसत होती….वाऱ्याबरोबर हलणारी….पण त्यांचा खरवरीत मोठी नखे असलेला हात जेव्हा माझ्या डोक्यावर प्रेमाने फिरायचा तेव्हा मायेचे एक वेगळीच अनुभूती येत होती…..तिथे भय,किळस असले भाव गळून पडत असत….मग त्या मायेच्या स्पर्शासाठी घरी येऊन पप्पांचा मार सुद्धा अगदी किरकोळ वाटत असे……कमला काकू माझ्या चित्रांची खूप तारीफ करायच्या माझं जिथं चुकत असे तिथे आपोआप एखादी आउटलाईन यायची…..माझ्या चुकीच्या वेळी त्यांच्या सांगण्यात कुठेही आरडाओरडा नव्हता….त्यांचा इतरांच्यासाठी भयानक दिसणारा काळा हात माझ्या पाठीत बसत नव्हता… उलट तो हात माझ्या डोक्यावरून फिरवून त्या मला प्रोत्साहन देत होत्या…..जवळपास महिनाभर इथे आलो….आईचा अबोला नको म्हणून ITP चा दिवसरात्र जागून अभ्यासही केला तरी जिल्ह्यात 9 वा आलो……साहजिक मार तर पडणारच होता…..आईनेही अबोला धरला होता पण मी जेव्हा भूतीया बंगल्यात आलो आणि कमला काकूंना रिझल्ट बद्दल सांगितलं तर त्यांनी टाळ्याच वाजवल्या….आपल्या खरवरीत हातात माझा हात घेऊन अभिनंदन देखील केले……खूप बर वाटलं…..दिवसरात्र केलेली मेहनत सफल झाल्याची अनुभूती आली…..दोन वेगवेगळ्या टोकाच्या मध्ये मी होतो….एक माझे जन्मदाते असून सुद्धा मला त्यांची पुढची पैसे कमावण्याची मशीन बनवू पाहत होते आणि एक जी काकू माझी कुणी नसून सुद्धा माझ्या आवडत्या कामात मला साथ देत होती….मुलांनी मोठं व्हावं हे प्रत्येक आईवडिलांचे स्वप्न असते हे मान्य आहे पण मुलांचे छंद,त्यांच्या कला,त्यांची स्वप्ने ह्याचा विचार कोण करणार??…..त्यामुळे मी हा निर्णय घेतला आहे….कायमच कमला काकूंच्या बरोबर रहायचं…..पण त्यांच्या जगात जाण्यासाठी मला हे जग सोडावे लागेल…..हरकत नाही…..तसही ह्या जगात ते वजनदार दप्तर,अभ्यासावरून मारझोड करणारे माझे आईवडील,शाळेचा निकाल टॉप ला रहावा म्हणून मुलांच्यावर सक्ती करणारे दिवसभर शाळेत बसवून घेणारे ते शिक्षक,ज्यादाचे क्लासेस अजून बरच काही माझी वाट बघत असतील……नकोच ते सगळं….आताच मी कमला काकूंचे ते त्यांच्या अमानवी रूपातले चित्र रेखाटले आहे ते बघून त्यांच्या विद्रुप चेहऱ्यावरचा आनंद मला स्पष्ट दिसत आहे….त्यांनी जवळपास मला प्रेमाने मिठीच मारलीय…..हेच प्रेम मला हवं आहे म्हणून आता त्या बंगल्याच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारणार आहे…..ह्या दुनियेतली शेवटची उडी…..सरळ कमला काकूंच्या दुनियेत……तिथे गेल्यावर मला त्या प्रेमळ स्त्रीचे खरे रूप बघता येईल…
— समाप्त —
लेखक:- श्री शशांक सुर्वे
प्रस्तुती : उज्ज्वला केळकर
संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
राजस्थान रॉयल्सचा कप्तान संजू सॅमसन याची परवा इन्स्टाग्रामवर पोस्ट बघितली.
त्याचा ब्लॅक अँड व्हाईट फोटो, दूर लांबवर नजर आणि डोळ्यात आशेची चमक.
त्याने खाली लिहिले होते,” वियप्पु थुनियित्ता कुप्पयम. “… म्हणजे माझा शर्ट माझ्या घामाने विणला आहे.
त्याला म्हणायचे होते, ‘ मी जो इथवर पल्ला गाठलाय तो केवळ कष्टाने, घामाने.आणि अजून खूप पुढे जायचे आहे.’
आयुष्यात पुढे यायचे असेल तर कष्ट आलेच. गीतेत कृष्णही हेच सांगतो,
“उद्धरेत आत्मना आत्मानम् ।”….. स्वतःच स्वतःचा विकास करत रहा.
विकासाचा रस्ता कायम अंडर कंस्ट्रक्शन असतो. अडचणींचे दगड, धोंडे ओलांडावे लागणार
… रफाल नडाल, २२ वेळा ग्रॅन्ड स्लाम जिंकला. उत्तम टेनिसपटू. तरीही अपूर्णतेची हुरहुर.
मनात जिद्द…. दोन,तीन महिन्यापूर्वी बेडरिडन होता. त्याची हिप सर्जरी झाली होती. त्याला स्वतःला तो टेनिस खेळू शकेल की नाही याची खात्री नव्हती. पण मनात दुर्दम्य इच्छा.मे महिन्यात पॅरीसमधे फ्रेन्च ओपन खेळण्याची. आणि तो इच्छाशक्तीच्या जोरावर पॅरीसमधे खेळला.
कृष्ण गीतेत सांगतो …..
आत्मनः म्हणजे मन बलवान करा.
मन याचा अर्थ अंतर्मन…. सबकाॅन्शस माईंड.
या मनात चांगले विचार, सकारात्मक विचार पेरत रहा.
या अंतर्मनाची शक्ती इतकी अफाट आहे की ते विचार सत्यात उतरतील.Thoughts will turn into things.
जाॅर्ज वाॅशिंग्टन गरीब होता. एका शाळेत शिपायाची नोकरी करीत होता.शाळा सुटायच्या वेळी घंटा वाजविण्याचे काम त्याचे होते. घंटा वाजवताना तो मस्करीत म्हणायचा,
“टण,टण,अमेरिकेचा प्रेसिडेंट वाॅशिंग्टन. ” .. हे रोज म्हणता म्हणता तो विचार त्याच्या अंतर्मनात
आपोआप झिरपत गेला.तो झपाटून गेला. त्याच्या कामाची व्याप्ती वाढली व तो खरोखर अमेरिकेचा अध्यक्ष झाला.
जसा समुद्रावरचा वारा जहाजाला कुठल्याही दिशेने भरकटवू शकतो तसेच मनही भरकटते.
पण जहाजाचे शीड जहाजाची दिशा ठरवते तसेच उत्तम विचार हे मनाच्या तारूची दिशा ठरवतात.
कृष्ण नंतर हे ही सांगतो, “ न आत्मानम्अवसादयेत् l “
… स्वतःची अधोगती करू नका…… स्वतःला कमी लेखू नका….. न्यूनतेची भावना नको.
… आपल्यातल्या उणिवा ओळखून त्या दुरुस्त करा.
थोडक्यात उन्नती साधायची असेल तर स्वतःचा कम्फर्ट झोन सोडावा लागतो. थोडी रिस्क घ्यावी लागते.
परवा आय.पी.एल. मॅचमधे विराट कोहली इतका तगडा बॅट्समन असूनही त्याला जाणवलं की स्पिनर्स- -समोर त्याचा स्ट्राईक रेट कमी होतो आहे. ही त्याची उणीव भरून काढण्यासाठी त्याने पंजाबसमोर खेळताना रिस्क घेतली. त्याने स्लाॅग स्वीपचा सरावही केला नव्हता. तरीही त्याने तो शाॅट मनात इमॅजिन करून मारला व सिक्सर्स घेतल्या.
थोडक्यात परिस्थितीप्रमाणे स्वतःला ढाच्यात बसवता आले पाहिजे.
☆ मनाचे श्लोक आणि REBT… – भाग-२ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले☆
(म्हणून घडणाऱ्या घटनेकडे बघताना आपण आपल्या विचारांवर लक्ष केंद्रित केले तर आपण त्या घटनेकडे तटस्थपणे बघू शकू.) — इथून पुढे ..
सर्वसाधारणपणे मनुष्य आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक घटनेकडे आपापल्या नजरेने बघत असतो. त्यामध्ये तो आपले पूर्वसंस्कार, श्रद्धा आणि पूर्वानुभव मिसळून त्या घटनेकडे बघत असतो. त्यामुळे त्या घटनेपासून त्याला दुःख होण्याची शक्यता जास्त असते. Rebt मनुष्याला विवेक अर्थात विचार करायला सांगते. त्या विशिष्ट घटनेकडे बघताना आपण कोणताही पूर्वलक्षी प्रभाव न ठेवता त्या घटनेकडे वस्तूनिष्ठपणे पाहायला शिकविते. जेव्हा आपण कोऱ्या मनाने, शांत मनाने कोणत्याही घटनेकडे बघतो तेंव्हा मनुष्य अधिक सजगतेने त्या घटनेकडे बघू शकतो. आणि जेव्हा ‘मी’ विरहीत होऊन निर्णय घेतला जातो तेव्हा तो जास्तीत जास्त अचूक असतो.
Rebt आपल्याला आपल्या समजुती (beliefs) बदलायला सांगते. कोणतीही घटना आपल्याला कमीअधिक प्रमाणात भावनावश करते. भावना समजून घेतल्याचं पाहिजेत पण भावना बदलणे अवघड आहे म्हणून भावना बदलण्याच्या प्रयत्न न करता आपण आपले विचार बदलले तर घडणाऱ्या घटनेचे परिणाम बदलू शकतात. भावनांच्या आहारी जाऊन घेतलेला निर्णय बरेच वेळा घातक ठरण्याची शक्यता जास्त असते. विचारानुसार होणारी कृती ही अधिक लाभदायी ठरण्याची शक्यता जास्त असते.
आपले विचार सर्वस्वी हवामानावर अवलंबून नसतात. तसं असतं तर कडाक्याच्या थंडीत सर्वजण कामधंदा न करता घरात बसून राहिले असते. पण तसे तर होतं नाही. याचाच अर्थ आपले विचार हे बाह्य गोष्टींवर अवलंबून नसतात. ते बहुतांशी स्वतंत्र असतात. खरंतर ते आपल्याच हातात असतात. बाहेरच्या वातावरणाचा किती परिणाम आपल्यावर होऊ द्यायचा हे सुद्धा आपल्याच हातात असते. आपण ठरवलं तर आपले विचार आपण खात्रीपूर्वक बदलू शकतो. तसेच मोकाट विचारांना काबूत आणणे हे सुद्धा आपल्याला प्रयत्नांती नक्कीच शक्य आहे. भरकटणाऱ्या विचारांना थांबविणे म्हणजेच स्वतःला सावरणे होय. मनुष्य अस्वस्थ होतो तो त्याच्या विचारांमुळेचं आणि शांत होतो तो सुद्धा त्याचा विचारांमुळेचं. कोणते विचार निवडायचे याचे स्वातंत्र्य मनुष्याला असते. प्रत्येक वस्तूची निर्मिती प्रथम विचारात होते आणि मग भौतिक रुपात. आजवर आपण जे पाहिले त्याची निर्मिती प्रथम विचारात झाली आहे नि मग प्रत्यक्षात झाली आहे. आपले अंतर्मन बघू शकत नाही पण आपण जी दृश्ये त्यास दाखवितो ती ते खरी मानते आणि तशी स्थिती ते आपल्या मनात निर्माण करीत असते. आपण जे विचार पेरीत असतो तेच अनंत पटीने वाढून परत येत असतात. एक फळात किती बिया आहेत हे आपण सांगू शकतो पण एका बीमध्ये किती फळ आहेत हे सांगणे कठीण असते. फक्त योग्य विचार निवडणे, ते प्रसारित करणे आणि त्यानुसार आचरण करणे जर मनुष्याला जमले तर आपण सर्व समस्यांवर मात करु शकतो. हे जग जसे आहे तसे आपल्याला दिसत नाही तर जसे आपले विचार असतात तसे ते आपल्या नजरेस दिसत असते.
समर्थ आपल्याला हेच ‘मानसशास्त्र’ थोड्या वेगळ्या पद्धतीने सांगतात. समर्थांची मांडणी त्या काळानुरूप म्हणजे थोडी अध्यात्मिक स्वरुपाची आहे. मनुष्य भक्तिमार्गात चालू लागला की त्याच्या अंतरंगात नकळत बदल होण्यास सुरुवात होते. विशुद्ध जाणिवेतून मनाच्या शोधाला रामनामातून आरंभ होतो. सद्गुरुकृपेमुळे मन अधिक सजग व्हायला सुरुवात होते. मनाला विवेकाचे अधिष्ठान लाभते. मनाला चांगल्या वाईटाची जाणीव होऊ लागते. ते स्वतःशी संवाद करु लागते. खरंतर त्याचे स्वतःशी द्वंद्व करु लागते. मनात चांगल्या वाईट विचारांची घुसळण सुरु होते. आणि मग विवेकाने मनुष्य चांगल्या गोष्टींचा स्वीकार करायला सुरुवात करु लागतो. मनाच्या श्लोकांचा अभ्यास करुन मनुष्य नुसता विवेकी होत नाही तर मनुष्यत्व ते देवत्व असा प्रवास करण्यास उद्युक्त होतो. हा प्रवास बहुतांशी अंतर्गत असतो. कारण मूलभूत बदल मनातच होत असतात आणि तेच गरजेचं असतं. बरेच वेळेस अंतरंगातील बदल बाह्यरूपात प्रतिबिंबित होतातच असे नाही. मनाच्या श्लोकात उत्तम भक्त (अर्थात उत्तम पुरुषाची) लक्षणे सांगितली आहेत. तसेच व्यक्तिमत्व विकास, उत्तम व्यवस्थापन कौशल्ये आणि दैनंदिन जीवनात उपयुक्त ठरणारी अनेक सूत्रे सुद्धा अगदी सोप्या भाषेत सांगितलेली आढळतात. ‘
मनुष्याला नेहमी सुख मिळावे असे वाटत असते. पण त्याला सुख मिळतेच असे नाही किंवा खरे सुख म्हणजे काय हे त्याला कळतेच असे नाही. समर्थानी सांगितलेले ह्याचे एकमेव कारण म्हणजे देहबुद्धी. ही देहबुद्धी नष्ट करण्यासाठी ‘विवेका’ची कास धरण्याची समर्थ शिकवण देतात. ‘विवेक’ म्हणजे विचारांच्या प्रक्रियेला लाभलेली विचारांची खोली. विचाराला स्वच्छ जाणिवांची खोली लाभली की विवेक जन्मतो. विवेक जगण्याची धारणा देतो. विवेकाने क्रिया पालटते. ‘विवेक’ आणि ‘प्रयत्न’ हे समर्थांचे विशेष आवडते शब्द आहेत. मनाच्या श्लोकांत त्यांनी ‘विवेक’ हा शब्द अनेक वेळा वापरला आहे. ‘विवेके सदा सस्वरूपी भरावे'( १०,१४५) ‘विवेके देहबुद्धी सोडून द्यावी'(१२), ‘विवेके कुडी कल्पना पालटीजे'(४०), ‘विवेके तजावा अनाचार हेवा'(६९), ‘विवेके क्रिया आपली पालटावी'(१०५), ‘विवेके मना आवरी स्थानभ्रष्टा'(१०६), ‘विवेके अहंभाव याते जिणावें'(११०), ‘विवेके अहंभाव हा पालटावा'(११५), ‘विवेके तये वस्तूची भेटि घ्यावी'(१७०), ‘विवेके विचारे विवंचुनी पाहे'(१७३), इ. अशा प्रकारे विविध पद्धतीने समर्थ आपल्याला विचार करायला सांगतात.
(* कंसातील क्रमांक हे मनाच्या श्लोकांचे आहेत)
मनुष्याने कितीही प्रगती केली तरी जोपर्यंत नितीमूल्यांची प्रतिष्ठापना होत नाही तोपर्यंत त्या प्रगतीस काही अर्थ नाही. मनाचे श्लोक मनुष्याला सामान्य मनुष्य ते देव, अर्थात रामाच्या पंथाकडे नेतात. मनाच्या श्लोकांचा अभ्यास केला नि त्याप्रमाणे आचरण केले तर मनुष्य देवत्वास नक्की पोहचू शकेल यात शंका नाही. समर्थ शेवटच्या श्लोकांत तसे अभिवचन देत आहेत.
मनाची शते ऐकता दोष जाती।
मतीमंद ते साधना योग्य होती॥
चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी।
म्हणे दास विश्वासता मुक्ति भोगी॥२०५।।
अर्थात, मनाच्या श्लोकांच्या अभ्यासाने मनुष्याची अंशतः का होईना उन्नतीच होते असे फलश्रुती वाचल्यावर आपल्या लक्षात येते.
आतापर्यंत आपण दोन्ही पद्धती स्थूलमानाने अभ्यासल्या आहेत. पण प्रत्येक मानसोपचार पद्धतीची स्वतःची अशी वैशिष्ट्ये आहेत. प्रत्येक जाणकार त्याची प्रतवारी वेगवेगळी करु शकेल. सामान्य मनुष्याने मनाच्या श्लोकांकडे पारंपरिक आणि धार्मिक भावनेने न बघता एक विचारपद्धती अर्थात software म्हणून बघितले तर ते अधिक उपयुक्त (user friendly) होईल असे वाटते. तसेच rebt पद्धती ही सुद्धा योग्य प्रकारे आचरणात आणली गेली तर ती सुद्धा उपयुक्त अशीच आहे. आज सारे जग त्याचे चांगले परिणाम अनुभवत आहे. REBT पद्धती अधिकाधिक लोकप्रिय होताना दिसत आहे.
इथे एक गोष्ट थोडी परखडपणे सांगावीशी वाटते की आपल्या संस्कृतीतील गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध, मनाचे श्लोक, आत्माराम आदि ग्रंथ हे मनुष्याचा आत्मिक विकास साधण्यासाठी निर्माण झालेले प्रमाण ग्रंथ आहेत. संतांनी स्वतः ती उच्चस्थिती प्राप्त केली आणि अखिल मानवजातीचे कल्याण व्हावे असा शुद्ध हेतू उरात ठेऊन ह्या सर्व ग्रंथाची निर्मिती केली आहे. त्या ‘पोथ्या’ नाहीत. आपण त्यांना वस्त्रात गुंडाळून कोनाड्यात ठेवले ही आपली घोडचूक आहे. ‘जीवन जगण्याची कला’ शिकविणारी पाश्चात्य लेखकांची अनेक पुस्तके आज बाजारात उपलब्ध आहेत. त्यातील सर्व तत्वज्ञान आपल्या गीतेमधील, ज्ञानेश्वरीमधील आणि दासबोधातीलच आहे. असे असूनही आजच्या तरुणपिढीला आपण मनाचे श्लोक, गीता, दासबोध वाचायला शिकवीत नाही आणि प्रवृत्तही करीत नाही. सध्या समाजात हे सर्व ग्रंथ साठीनंतर वाचायचे असतात असा गोड गैरसमज बेमालूमपणे पसरविला जात आहे. एकीकडे आपण अशा ग्रंथांची पारंपरिक पद्धतीने पारायणे करतो पण त्या ग्रंथातील ‘खरे ज्ञान’ अथवा ‘मर्म’ आत्मसात करुन पुढील पिढीस ते आचारण्यास उद्युक्त करीत नाही. ही खरी शोकांतिका आहे. कोणतेही तंत्र/ शास्त्र वापरात आले तर त्याचा खरा उपयोग आहे. ज्याप्रमाणे नदी म्हटली की वाहतीच असणार तसे आपले सर्व धार्मिक ग्रंथ हे लोकजीवन समृद्ध होण्यासाठी अमलात/ आचरणात आणण्याचे ग्रंथ आहे. ‘नराचा नारायण’ करण्याची क्षमता ह्या सर्व ग्रंथांमध्ये आहे असे सर्व संतांनी सांगितले आहे. तेव्हा अधिक सजग होऊन हे ग्रंथ तरुणपिढीपर्यंत पोहचविण्याचे कार्य आपल्याला हाती घ्यावे लागेल.
वरील चिंतनातून साधकांनी / अभ्यासार्थीनी मनाचा अभ्यास अधिक तरलतेने करावा आणि अनंताच्या पंथाकडे सुरु झालेल्या जीवनप्रवासाचा ‘आनंद’ घ्यावा अशी शुभेच्छा व्यक्त करुन माझ्या लेखनास विराम देत आहे.
(साधकाने समर्थांच्या विचारांच्या साहायाने आपल्या मनाचे संश्लेषण….अर्थात संधारणा कशी करावी? हे नित्यपाठाने होऊ शकेल की आधुनिक मानसशास्त्रात ‘विवेकनिष्ठ उपचार पद्धती… REBT उपचाराला पूरक म्हणून त्याचा उपयोग करावा? .. हा प्रश्न एकाने विचारला.. आणि त्या अनुषंगाने… मनाचे नुसते विश्लेषण नको तर संश्लेषणही करण्याचे तंत्र साधकाला समजावे हा या लेखाचा उद्देश आहे.)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “जे द्याल, तेच परत येईल, कितीतरी पटीने…!” – लेखक – श्री जयप्रकाश झेंडे ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆
१८९२ मध्ये स्टॅनफोर्ड विद्यापीठात घडलेली घटना ही सत्यघटना आहे. परंतु याची शिकवण मात्र शाश्वत आहे, कायम टिकणारी आहे. एक १८ वर्षांचा मुलगा अत्यंत कष्टानं विद्यापीठातील शिक्षण घेत होता. आपली फी भरणं ही त्याला अवघड जात होतं. हा मुलगा अनाथ होता आणि एकदा फीचे पैसे कोठून आणायचे या विवंचनेत होता. एक अतिशय चमकदार कल्पना त्याच्या डोक्यात आली. त्यानं आणि त्याच्या मित्रानं महाविद्यालयाच्या एका संगीत जलशाचं आयोजन करायचं निश्चित केलं. त्यातूनच आपल्या शिक्षणाची फी गोळा करायचं ठरवलं. त्यांनी एक मोठा पियानोवादक आय. जे. पेडरवस्की यांना भेटायचं ठरवलं. त्यांच्या व्यवस्थापकानं २००० डॉलर एवढ्या रकमेची मागणी संगीत जलशासाठी केली. या दोघा मित्रांचा संगीत जलसा यशस्वी करण्यासाठी प्रयत्नही मोठा धडाक्यानं सुरू झाले.
जलशाचा दिवस उजाडला. पेडरवस्की यांनी कबूल केल्याप्रमाणे हा कार्यक्रम पारही पडला. परंतु दुर्दैवानं तिकीट विक्रीतून फक्त १६०० डॉलरच जमा होऊ शकले. अतिशय जड अंत:करणानं दोघेही मित्र पेडरवस्की यांच्या घरी पोहोचले. त्यांनी पेडरवस्कींना सर्व परिस्थिती समजावून सांगितली. त्यांना जमा झालेली संपूर्ण रक्कम म्हणजे १६०० डॉलर्स आणि उरलेल्या ४०० डॉलर्सचा चेक दिला. लवकरच आम्ही या ४०० डॉलर्सची रक्कम देऊ हे वचनही दिलं.
नाही, असं चालणार नाही, मला हे अमान्य आहे असं पेडरवस्की म्हणाले आणि त्यांनी तो ४०० डॉलर्सचा चेक फाडून टाकला आणि मुलांना १६०० डॉलर्सची रक्कम परत केली. त्या मुलांना सांगितलं, हे १६०० डॉलर्स घ्या. यातून तुमचा झालेला खर्च वजा करा. त्यानंतर आपल्याला भरावयाच्या फीची रक्कमही त्यातून काढून घ्या आणि त्यातून जी रक्कम उरेल तीच रक्कम मला द्या. मुलांना या वागण्याचं खूपच आश्चर्य वाटलं आणि या औदार्याबद्दल पेडरवस्कींचे मनापासून आभार मानून मुलं परतली.
ही चांगुलपणाची एक छोटीशीच कृती होती, परंतु त्यावरूनच श्री. पेडरवस्की यांच्या मोठेपणाची एक चुणूक दिसून येते, त्यांच्यातली माणुसकी प्रतीत होते. त्यांना माहीतही नसणाऱ्या परक्या दोन विद्यार्थ्यांना त्यांनी मदत का करावी?
आपणा सर्वांच्यात आयुष्यात हे प्रसंग येतात आणि अशा वेळी आपण मात्र विचार करतो अशीच मदत मी सर्वांना करत राहिलो तर माझं काय होईल? परंतु खऱ्या अर्थी मोठी असणारी माणसं मात्र विचार करतात की मी त्यांना मदत केली नाही तर त्यांचं काय होईल? आपल्याला त्यांच्याकडून परत काय मिळेल, याचा विचारही अशा मोठ्या माणसांच्या मनाला स्पर्श करीत नाही.
पुढे काही वर्षांनी श्री. पेडरवस्की पोलंडचे पंतप्रधान झाले. ते अतिशय उत्तम नेते होते, परंतु दुर्दैवानं जागतिक युद्ध सुरू झालं. त्यात पोलंड उद्ध्वस्त झालं. देशात जवळ १५० लाख माणसं अन्नधान्यावाचून भुकेली होती. त्यांची भूक भागविण्यासाठी पोलंडकडे पैसाही नव्हता. कोठून आणि कशी मदत मिळवावी, या विचारानं पेडरवस्की अस्वस्थ झाले होते. त्यांनी अमेरिकेतील अन्नधान्य आणि साहाय्य या सरकारी प्रशासनाकडे मदत मागितली. त्या विभागाचे प्रमुख हर्बर्ट हुव्हर हे होते. तेच पुढे अमेरिकेचेही अध्यक्ष झाले. हुव्हर यांनी मदत देण्याचं कबूल केलं आणि त्यांनी ताबडतोब पोलंडमधील भुकेल्या लोकांसाठी हजारो टन अन्नधान्य पाठवूनही दिलं. पोलंडमधील लोकांवरचा कठीण प्रसंग टळला, संकट दूर झालं. पेडरवस्कींची मोठी चिंता दूर झाली. त्यांनी स्वत: अमेरिकेला जाऊन हुव्हर यांचं आभार मानायचं ठरवलं.
जेव्हा पेडरवस्की त्यांना भेटले आणि त्यांचे आभार मानू लागले तेव्हा त्यांचे बोलणं मध्येच तोडून पटकन हुव्हर म्हणाले, पंतप्रधान महोदय, आपण माझे आभार मानण्याची काहीच गरज नाही, आणि ते योग्यही होणार नाही. आपल्याला कदाचित स्मरणार नाही, परंतु अनेक वर्षांपूर्वी आपण दोन विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत केली होती आणि मी त्यातील एक विद्यार्थी आहे.
हे विश्व म्हणजे अतिशय सुंदर आहे. आपण या जगासाठी जे देतो तेच अनंत पटीनं आपल्याकडेच परत येत असतं. अनेक वेळेस ते आपल्याला कळतही नाही.
लेखक : श्री जयप्रकाश झेंडे
संग्राहिका: सौ. मंजुषा सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “तुरुंगातील सावल्या…” – मूळ लेखक : रूझबेह भरूचा – अनुवाद : सुश्री लीना सोहोनी ☆ परिचय – डॉ. मुग्धा सिधये – तगारे ☆
पुस्तक – तुरुंगातील सावल्या
लेखक – श्री रूझबेह भरूचा
अनुवाद – सुश्री लीना सोहोनी
परिचय : डॉ. मुग्धा सिधये – तगारे
भारतीय तुरुंगामध्ये शिक्षा भोगत असलेल्या वा खटल्याच्या सुनावणीच्या प्रतिक्षेत असलेल्या स्त्रिया व त्यांची लहान मुले या विषयावर रूझबेह भरूच्चा यांचं हे पुस्तक. पुणे, दिल्ली, भुवनेश्वर,श्रीनगर इत्यादी ठिकाणच्या तुरुंगाना भेटी देऊन तिथल्या स्त्री कैदयांच्या व मुलांच्या मुलाखती देऊन लिहिलेलं हे अनुभवस्पर्शी व आगळं वेगळं पुस्तक…!
मुळातच कैदी किंवा गुन्हेगार हा शब्द आला की आपली दृष्टी पूर्वग्रहदूषित असते. त्यांनी काही तरी वाईट काम केलं आहे म्हणून त्या शिक्षा भोगत आहेत. गृहितालाच काही वेळा धक्का बसतो हे पुस्तक वाचताना ! त्यांची ५ वर्षाखालील वयाची मुलं त्याच्याबरोबर तुरुंगात रहात असतात, वाढत असतात त्यांचा काहीही गुन्हा नसताना ! तुरुंगात बहुतांश वेळा त्यांच्यासाठी वेगळ्या काहीही सोयी नसतात. आणि त्यामुळे त्यांचं बालपण होरपळून जातं. ह्या बाबतीत संवेदनशीलपणे विचार व कृती केली. डॉ. किरण बेदी यांनी तिहार जेलची IG झाल्यावर त्यांनी इंडिया फाउंडेशन सारख्या NGO च्या मदतीने तुरुंगामधे मुलांसाठी पाळणाघर.गरोदर स्रियांसाठी बाळंतपणाची सोय. चांगला आहार इत्यादी अनेक अमूलाग्र बदल केले.माणूसकी व अनुकंपा,नेतृत्वगुण,सचोटी, वेगळा नाविन्यपूर्ण विचार, कल्पकता इत्यादी गुणांमुळे डॉ. किरण बेदींनी तुरुंगामध्ये इतिहास घडवला.ज्याची जगाने मॅगसेसे पुरस्कार देऊन दखल घेतली. दुदैवाने त्यांच्या बदलीनंतर सार काही तसंच राहिलं नाही.
हया कैंदीच्या स्त्रियांच्या व त्यांच्या मुलांच्या भावविश्वाची दखल लेखकाने खूपच संवेदनशीलतेने घेतली आहे. 5व्या वर्षानंतर त्या बिचाऱ्या मुलाला किंवा मुलीला दूरवर कुठे तरी अनाथआश्रमात पाठवण्यात येते. आई असूनही ममतेला आईच्या वात्सल्याला स्पर्शाला ती पारखी होतात, झुरत राहतात.
एकूणच लेखकाबरोबर जेव्हा आपला हा तुरुंगातल्या भेटीचा प्रवास मनाने होतो. तेव्हा, तुरुंगातल दाहक वास्तव पाहून धक्का बसतो. भारतीय न्यायव्यवस्था, पोलिस यंत्रणा ,तुरुंगाधिकारी, कैद्याविषयींचे कायदा या सार्यामधल्या त्रुटी समन्वयाचा अभाव, दुरावस्था पाहून यामध्ये अमूलाग्र सुधारणा व त्याच्या अंमलबणीची गरज जाणवते.
कित्येक निरपराध स्त्रिया नाहक (व्यवस्थेच्या बळी ठरून) जेलमधे वर्षानुवर्षे सडत राहतात. केवळ जामिन भरायला काही हजार रुपये नाहीत म्हणून・・・・ तर कधी व्यवस्थेशी पंगा घेतल्याबाबत सुशिक्षित सुसंस्कृत माणसांना हयात ढकलं जातं. हे वाचून मन विदीर्ण होते.
हया पुस्तकात शेकडो स्त्रियांच्या कहाण्या आपण वाचतो प्रत्येकीची कहाणी वेगळी असली तरी ” आईपणाचं दुःख तेच आहे. एक समाज म्हणून किती बदल घडायला पाहिजेत आणि हयाची सुरुवात व्यक्ति म्हणून आपल्यापासून हवी. आणि तसं झालं तर गुन्हायांचे प्रमाण कमी होऊन हे तुरूंग भरलेच जाणार नाहीत.जे आज क्षमतेपेक्षा दुप्पटीने भरून वाहत आहेत. लेखकानेही यासाठी काही ठोस उपाय पुस्तकात सुचवले आहेत. विषय कितीही गंभीर असला तरी केस स्टडीच्या अंगाने जाणाऱ्या हया पुस्तकात लेखकाने अधूनमधून विनोदाचा शिडकावा करून ताण हलका करायचा प्रयत्न केला आहे. सत्य , वास्तवदर्शी असं हे पुस्तक आहे. अनुवादिकेनेही सुंदर अनुवाद करून पुस्तकाची लय व मराठी भाषेचा लहेजा हे दोन्ही सांभाळले आहेत.
परीक्षण : डाॅ. मुग्धा सिधये – तगारे
बालरोगतज्ज्ञ. सांगली.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
(संस्कारधानी जबलपुर के हमारी वरिष्ठतम पीढ़ी के साहित्यकार गुरुवर आचार्य भगवत दुबे जी को सादर चरण स्पर्श । वे आज भी हमारी उंगलियां थामकर अपने अनुभव की विरासत हमसे समय-समय पर साझा करते रहते हैं। इस पीढ़ी ने अपना सारा जीवन साहित्य सेवा में अर्पित कर दिया है।सीमित शब्दों में आपकी उपलब्धियों का उल्लेख अकल्पनीय है। आचार्य भगवत दुबे जी के व्यक्तित्व एवं कृतित्व की विस्तृत जानकारी के लिए कृपया इस लिंक पर क्लिक करें 👉 ☆ हिन्दी साहित्य – आलेख – ☆ आचार्य भगवत दुबे – व्यक्तित्व और कृतित्व ☆.आप निश्चित ही हमारे आदर्श हैं और प्रेरणा स्त्रोत हैं। हमारे विशेष अनुरोध पर आपने अपना साहित्य हमारे प्रबुद्ध पाठकों से साझा करना सहर्ष स्वीकार किया है। अब आप आचार्य जी की रचनाएँ प्रत्येक मंगलवार को आत्मसात कर सकेंगे। आज प्रस्तुत हैं आपकी एक भावप्रवण रचना – आप बुलाने आये…।)
साप्ताहिक स्तम्भ – ☆ कादम्बरी # 58 – आप बुलाने आये… ☆ आचार्य भगवत दुबे
संस्कारधानी के सुप्रसिद्ध एवं सजग अग्रज साहित्यकार श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज” जी के साप्ताहिक स्तम्भ “मनोज साहित्य” में आज प्रस्तुत है आपकी भावप्रवण कविता “गौरैया कहती सुनो…”। आप प्रत्येक मंगलवार को आपकी भावप्रवण रचनाएँ आत्मसात कर सकेंगे।