नवीन वर्ष सुरू करण्याच्या प्रथा अनेक आणि वेगवेगळ्या आहेत. एक जानेवारीपासून व्यावहारिक वर्ष सुरू होते. एक एप्रिल पासून आर्थिक वर्ष , कार्तिक शुद्ध प्रतिपदेपासून व्यापारी वर्ष, एक जून पासून शैक्षणिक वर्ष, त्याचप्रमाणे हिंदू संस्कृतीचे वर्ष हे चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून सुरू होते. त्यालाच आपण गुढीपाडवा असे म्हणतो.
याला वर्षप्रतिपदा तसेच युगादी तिथी असेही म्हटले जाते. वर्षारंभाचाचे दिवस जरी वेगवेगळे असले तरी एक गोष्ट समान आहे .ती म्हणजे वर्ष हे बारा महिन्यांचेच आहे. ” द्वादश मासौ संवत्सर:। ” असे वेदाने प्रथम सांगितले .आणि जगाने ते मान्य केले आहे. या सर्वांमध्ये चैत्र शुद्ध प्रतिपदा हा वर्षारंभ सर्वात योग्य प्रारंभ दिवस आहे. त्याचे कारणही तितकेच महत्त्वाचे आहे.
नैसर्गिक आणि भौगोलिक—- गुढीपाडव्याच्या आसपासच सूर्य वसंत संपात आवर येतो.( संपात बिंदू, क्रांती वृत्त व विषुववृत्त ही दोन वर्तुळे ज्या बिंदूत परस्परांना छेदतात, तो बिंदू.) आणि त्यावेळी वसंत ऋतू सुरू होतो. त्यावेळी उत्साहवर्धक आणि समशीतोष्ण असे हवामान असते. झाडांनाही नवीन पालवी येत असल्याने, तीही टवटवीत दिसतात. कधीही नवनिर्मिती ही आनंददायी असते. तेव्हा अशा वातावरणात नवीन वर्षाची सुरुवात करणे योग्य आणि आदर्शही आहे.
गुढीपाडवा या सणाला पौराणिक असाही आधार आहे. प्रभू रामचंद्रांनी वालीचा वध केला. दुष्ट प्रवृत्तींच्या राक्षसांचा आणि रावणाचा वध करून प्रभू रामचंद्र अयोध्येला आले, तो हा दिवस. महाभारताच्या आदिपर्वात उपरीचर राजाने, त्याला इंद्राने दिलेल्या कळकाची काठी त्याने जमिनीत रोवली. आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला त्याची पूजा केली. या परंपरेचा आदर म्हणून गुढी पूजन केले जाऊ लागले. एका कथेनुसार, शंकर-पार्वती यांचे लग्न चैत्र शुद्ध प्रतिपदेला ठरले. आणि तृतीयेला झाले .म्हणून या दिवशी आदिशक्ती पार्वतीचीही पूजा करतात.ऐतिहासिक दृष्टीने विचार करता शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने , मातीचे सैन्य केले .आणि त्यावर पाणी शिंपडून, त्याला जीवन दिले. आणि प्रबळ शत्रूचा पराभव केला. शालिवाहनाने क्षात्र तेज संपलेल्या समाजात ,आत्मविश्वास निर्माण केला. आणि शत्रूवर विजय मिळविलेला हा दिवस. आणि शालिवाहन शक तेव्हापासून सुरू झाले.
अध्यात्मिक दृष्ट्या या दिवसाचे महत्व सांगायचे तर ,या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, म्हणजे सत्ययुगाला सुरुवात झाली असे मानतात .त्यामुळे तो हा दिवस. वर्षा. रंभाचा मानला जातो.
व्यावहारिकदृष्ट्या गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तातील एक मानला गेला आहे. या दिवसातील कोणतीही घटिका हि शुभ मुहूर्त असल्याने ,वेगळा मुहूर्त काढावा लागत नाही.” गणेशयामल ” या तंत्र ग्रंथात सांगितले आहे की 27 नक्षत्रां पासून निघालेल्या लहरीं मध्ये सत्वगुण निर्माण करणाऱ्या प्रजापती लहरी,चैत्र महिन्यात आणि विशेषतः चैत्र शुद्ध प्रतिपदेला, सर्वात जास्त असतात. म्हणून तो दिवस वर्षारंभ मानणे योग्य आहे.
☆ कडुलिंबाची फांदी… ☆ सुश्री स्वप्ना अभिजीत मुळे (मायी) ☆
“हे घे अमृता” म्हणत त्यांनी लोणच्याची वाटी त्या भगदाड पडलेल्या भिंतीवरून दिली. हसत त्या अमृताला म्हणाल्या, “काय ग, वर्ष झालं असेल नाही का आपल्या मैत्रीला?”
अमृता म्हणाली, “नाही, वर्ष नाही झालं. पण होत आलं असेल. मागच्या लॉकडाऊन नंतर त्या तुफान पावसात पडलेली ही भिंत आणि मग दिसणारे आपले चेहरे.”
काकु म्हणाल्या,” कधी मन एकरूप होत गेले कळलंच नाही. पण बरं त्या कोरोनाच्या दुष्ट काळात जरा सोबत असल्यासारखं वाटलं. गप्पांमुळे मन मोकळं होत राहीलं ना. एकतर सगळेच घाबरत होते एकमेकांकडे जायला आणि फोनवर पण तोच विषय. कोरोनाचा. त्यापेक्षा आपलं मस्तच जमलं. दुपारी दासबोध काय, संध्याकाळी रामरक्षा, आणि तू ही तुळस इथे ठेवलीस हे बरं केलंस. तुझं माझं अंगण जोडलं ना तिने. पण परत तुझं ऑफिस, मग भेटी कमी झाल्या पण ओढ कायम हं.”
त्यांचं वाक्य तोडत अमृता म्हणाली, “आणि ह्या खाऊने तर अजूनच लज्जत वाढवली जगण्याची. किती चव आहे काकु तुमच्या हाताला. मला एकदा घरी येऊन गरमगरम पोटभर जेवायचं आहे तुमच्या हातचं. पण अजून घरी येण्याचे काही योग दिसत नाहीत. तुमच्या त्या रस्त्याचं काम किती रखडलं आहे. तुम्ही कसं करता काही लागलं तर?”
काकु म्हणाल्या, “अग लागतंच किती दोघांना, आणि फोनवर मागवतो किराणा, भाजीपाला, दूध. आम्ही कुठे जात नाही आणि इथून तुझं घर मला बऱ्यापैकी दिसतं. माझंच ह्या भिंतीआड असल्याने लक्षात येत नसेल तुझ्या. थोडं खोलवर पण आहे ना आमचं घर. जाऊ दे आपले चेहरे दिसतात हेच खूप आहे…”
“हो ना काकु, आणि माझे डोहाळे तुम्ही ह्या चार महिन्यात हा खाऊ देऊन पुरवत आहात, मला तर आईच्या रुपात भेटल्या तुम्ही.”
हे असं सगळं चालु होतं आणि पाडव्याची चाहूल लागली. पलीकडची काकूंच्या घराची योजना नेमकी लक्षात येत नव्हती, पण एक कडुलिंबाची फांदी काकूंच्या डोक्यावर होती. अमृताने आदल्या दिवशीच सांगुन ठेवलं, “काकू, उद्या ती फुलं असलेली फांदी मला द्या हं तोडून.” काकूंनी फक्त फांदीकडे बघितलं आणि काहीच बोलल्या नाहीत.
सकाळी सकाळी अमृताने सुंदर रांगोळी काढली, सुंदर जरीची साडी नेसली. नवरोबा सुद्धा तयार झाले. मंद मोगऱ्याचा गजरा केला. गुढी उभारताना सुंदर जरीच्या साडीवर गाठी, गजरा सगळं घातलं आणि कडुलिंब राहिला की!
अमृताच्या लक्षात आलं तशी तिने भिंतीकडे हाक मारली, “अहो काकू, मला तेवढी कडुलिंबाची डगळी द्या ना. माझी गुढी उभारणं थांबली आहे.”
काकूने, “नाही जमणार गं ..” असं उत्तर दिलं आणि अमृताला संताप आला, “अरे काय कमाल आहे ह्या काकूंची. ह्यांना आवडतात म्हणून मोगऱ्याची फुलं रोज देते मी ह्यांना. तुळस त्यांना प्रसन्न करते म्हणून मी ती दोघींच्या मधल्या भिंतीवर ठेवली आणि ह्या एवढी छोटी गोष्ट का देत नाहीत.”
तिची ही बडबड ऐकून नवरा तिला म्हणाला, “अगं, तू जरा शांत हो. नसेल जमत तोडायला त्यांना. म्हणून लगेच, तू केलेल्या उपकारांची लिस्ट काय वाचतेस तू. त्या मोठ्या आहेत वयाने. तुझे तर किती लाड करतात, आणि तू एवढ्या छोट्या गोष्टीवरून लगेच त्यांना वाईट ठरवतेस?? बघू,मी शोधून आणतो.”
अमृता म्हणाली, “नाही. तू थांब. अरे आपल्या कॉलनीत झाडच नाही आहे कडुलिंबाचे. माझं सर्व सर्च करून झालं आहे दोन दिवसांपासून, मॉर्निंगवॉकला गेले होते तेंव्हा. म्हणून तर ह्यांना सांगून मोकळी झाले. चांगल्या ठसठशीत तर दिसतात. एक लांब कडी घेऊन जरा टाचा वर केल्या कि तोडू शकतील त्या फांदी.”
नवरा म्हणाला, “वाद नको, आणि ह्या छोट्या गोष्टीवरून संबंध सुद्धा खराब करू नकोस. जोडायला वेळ लागतो, तोडायला नाही. चल काही बिघडत नाही कडुलिंब नसेल तर. गाठी आणि आंब्याची पानं आहेत ना. तीच बांधू.”
अमृता दिवसभर डोक्यात राग घेऊन होती. आज खरंतर काकु तिला बासुंदी पुरी देणार होत्या. त्यांनी हाक मारली पण अमृताने दारच उघडलं नाही. तिच्या नवऱ्याला मात्र हे वागणं पटलं नाही, आणि काकुंचंही कारण कळेना. खरंच थोड्या उंचीवर ती फांदी होती.
दुपारी जेवण आटोपल्यावर त्याने अमृताला बळेच बाहेर काढलं आणि तो काकूंच्या कॉलनीकडे वळला. रस्त्याच्या कामामुळे तसं चालणं अवघड होतं, पण त्याला भीती होती सोक्षमोक्ष जर झाला नाही तर गैरसमजाच्या जाळ्यात हे नातं अडकून संपून जाईल.
अंदाज घेत ते त्या जुन्या इमारतीत शिरले. अमृता म्हणाली “कशाला जायचं पण आपण. त्यांनी कधी बोलवलं नाही आपल्याला..”
त्यावर तो म्हणाला, “अमृता, अगं खाल्ल्या मिठाला तरी जाग. ज्या काकू तुला घासातला घास देतात त्या काकु एका छोट्या गोष्टीला तुला नाही म्हटल्या तर तू इतकी विरोधात गेली त्यांच्या. असा स्वभाव जर राहिला तर आयुष्यात आपण माणसं जोडू शकणार नाही गं. माझ्या आईने मला सांगितलंय कि, कोण्या माणसाचा कधी राग आला तर त्याने आपल्यासाठी जे चांगलं केलं ते आठवायचं.”
बोलत बोलत ते वरच्या मजल्यावर गेले. जरा पडका जुना जिना होता. जुनं कुजलेलं लाकूड असलेली बाल्कनी, त्यात प्लास्टिकच्या डब्यात हिरवागार मरवा सजला होता. दाराशी रांगोळी नव्हती. ‘एवढा सण पण साधी रांगोळी काढली नाही. नुसतं आपल्याला शहाणपण शिकवतात ह्या’ असं अमृताच्या मनात पण आलं.
“काकू” म्हणत दोघांनी हाक मारली. दरवाजा बंद होता. कडी वाजवली तरी बराच वेळ लागला दरवाजा उघडायला. दरवाजा उघडला पण समोर कोणी दिसलं नाही.
एकदम खालून आवाज आला, “या या. अहो, लेक आणि जावई आलेत.” म्हणत त्यांनी बाजेवर पडलेल्या काकांना हाक मारली आणि त्या खरकत खरकत बाजेकडे गेल्या.
अमृता आणि तिचा नवरा सुन्न होऊन बघत होते. काकूंना गुढग्यापासुन पायच नव्हते.
काका खूप आजारी दिसत होते पण खोलीत प्रसन्नता होती. छोटयाशा देवघरात छोटी गुढी उभी होती. लहानसा दिवा तेवत होता.
अमृताला रडूच आलं आणि ती काकूंच्या गळ्यात पडून रडायला लागली. काकूंनी तिला रडू दिलं. डोक्यावर हात फिरवत म्हणाल्या, “दोन वर्षांपूर्वी पोरगी गरोदर राहिली. तिला डोहाळजेवणाला आणण्यासाठी मी गेले आणि येताना अपघातात माझे पाय गेले आणि माझी पोटूशी पोरगी जागेवरच गेली गं.
ह्यांच दुखणं खूप जुनं. त्यात मी अशी झाले. निराशेचे ढग दाटले, पण पालवी फुटावी तशी तू जीवणात आली. कदाचित देवाची मर्जी.
तुला हे सगळं सांगावसं वाटत होतं. पण ओळखीनंतर तू काही दिवसात गोड बातमी दिलीस. मग वाटलं आता काही सांगितलं तर तू दयाळू नजरेने बघशील. काही दिला खाऊ तर तो तुला मला होणारा त्रासच वाटेल. कदाचित तू जसं हक्काने सांगत होतीस ‘मला हे खावं वाटतंय’ तसं तू बोलली नसतीस. मला माझी लेक दिसते ग तुझ्यात. हे काय तुझ्या डोहळजेवणाची हळूहळू तयारी करतेय.” म्हणत काकूंनी पुठ्ठ्याचे हरिण बनवलेले दाखवले. “बघ हरणाच्या गाडीत बसवते तुला.”
आता तर अमृताच्या नवऱ्यालाही रडू आलं. काका निपचित पडून होते पण ते तोडके मोडके शब्द जोडत बोललेच, “आयुष्यात कितीही संकटं आली तरी हिच्या आनंदाची, उत्साहाची, चैतन्याची गुढी कायम उंच असते. म्हणून तर कठीण काळातही ती छान जगते.”
काकूंनी पटकन दोन वाट्यात बासुंदी दिली. काकूंचं ते पाय नसतानाही सहजतेने जगणं अमृता आणि तिच्या नवऱ्याला पुढच्या जगण्यासाठी खूप काही शिकवून गेलं होतं. “काकू, आज खरा गुढी उभारण्याचा अर्थ कळला हो. खरंच आभार तुमचे.”
काकू म्हणाल्या, “आपल्यातील आत्मविश्वास असा उंच ठेवायचा. स्वतःच्या मनाला असं आनंदाचं रेशीम वस्त्र गुंडाळत रहायचं. आपल्या ऊर्जेची गुढी मग लहरत राहाते.”
दोघे निघाले. काकू निरोपासाठी दरवाज्याकडे येणार तेंव्हा अमृता म्हणाली, “मागूनच या आपल्याच जागी. दासबोधाची वेळ झाली ना.
“हो ना!” म्हणत काकू खरंच मागच्या दरवाज्यात गेल्या. दगड रचून केलेल्या खुर्चीवर अश्या जाऊन बसल्या. अमृताला वाटलं आपण फक्त तो हसरा चेहरा बघत होतो. आता कळलं, हि गुढी किती अवघड मार्गातून तिथे सज्ज असते.
तिने काकूंच्या देवघरातील गुढीकडे बघितलं. कुठलाही थाटमाट नसताना गुढी छोटीशी पण प्रसन्न आणि आंनदी दिसत होती.
अमृताने दिलेलं छोटंसं मोगऱ्याचं फुल सगळा आसमंत दरवळून टाकत होतं. अमृताला जणू सांगत होतं, तू ही आता ह्यांचं आयुष्य दरवळून टाक.
आंब्याच्या झाडावर कोकीळ पक्षाचे “कुहू” ऐकू येते आणि वसंत ऋतूच्या आगमनाची वर्दी मिळते. चैत्राची चाहूल जाणवते. नववर्षाची सारीच नवलाई घेऊन सृष्टीही बहरते.
सूर्य जेव्हा मेष राशीत प्रवेश करतो, त्यावेळी हिंदू पंचांगातल्या शालिवाहन शकानुसार चैत्र महिना सुरू होतो. फाल्गुन पौर्णिमेच्या होळीची बोंबाबोंब आणि रंगपंचमीच्या रंगात नहाल्यानंतर वसंत ऋतु एखाद्या राजासारखा, दिमाखात अवतरतो. नवा उत्साह, नवी उमेद, चैतन्याचे नजराणे घेऊन तो कसा ऐटीत येतो.
जुने जाते नवे येते. वृक्ष नव्या, कोवळ्या, हिरव्या रंगाच्या पालवीने बहतात. गुलमोहराला अपूर्व रक्तिमा चढतो. पिवळा बहावा फुलतो. पलाश वृक्षाची अग्नी फुले डोळ्यांना सुखावतात. मोगऱ्याचा सुगंध दरवळतो. आणि कोकणचा राजा रस गाळतो. उत्तम उत्तम गोष्टींची मनमुराद पखरण करणारा हा वसंत! ना कशाची वाण ना कशाची कमतरता. सारेच साग्रसंगीत, उच्च अभिरुची दर्शवणारे.
।। गंधयुक्त तरीही उष्ण वाटते किती ..।।
आसमंत उष्णतेने भरून जातो. उन्हाच्या झळा जाणवतात. तप्त वारे वाहतात पण तरीही हे वारे गंधयुक्त असतात. अनंत आणि मोगऱ्याचा दरवळ जाणवतो. जंगलात कुठेतरी पिवळी धमक सुरंगीची फुलं उमलतात. आणि त्याचा सुगंध साऱ्या सृष्टीला व्यापून राहतो.
चैत्र महिना— वसंत ऋतु म्हणजे सृजनोत्सव. चैत्र महिन्याच्या साक्षीने आनंदाचे एक महोत्सवी स्वरूपच प्रकटते. या मासाचे आपल्या सांस्कृतिक जगण्याशी उत्कट नाते आहे.
या आनंदोत्सवाचे स्वागत उंच गुढ्या उभारून शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडव्याच्या दिवशी केले जाते. दुष्टांचा संहार आणि सुष्टांचा विजय म्हणून हा विजयोत्सवही ठरतो. या ब्रह्मध्वजाच्या पूजेनेच हिंदू नववर्षाची सुरुवात होते. तोच हा चैत्रमास! चंद्र, चित्रा नक्षत्राच्या सानिध्यात असतो म्हणून हा चैत्र मास.
संस्कृतीची, धार्मिकतेची, सृजनाची, सौंदर्याची जाण देणारा हा टवटवीत, तजेलदार, तालबद्ध मास— वसंत आत्मा— मधुमास.
चैत्रगौरी पूजनाच्या निमित्ताने आंब्याची डाळ,कैरीचे पन्हे याचा रसास्वाद घेणे म्हणजे परमानंदच. अंगणात चैत्रांगण सजते.
या महिन्याला जसे श्रद्धा, भक्तीरसाचे वलय आहे, तसेच शृंगार रसात न्हालेल्या प्रणय भावनेचाही अनुभव आहे.
पक्षी झाडावर घरटी बांधतात. त्यांची मधुर किलबिल मिलनाची हाक देतात. मधुप फुलातल्या परागाशी प्रीतीचे नाते जुळवतात. तरुण-तरुणींची सलज्ज कुजबुज ऐकू येते. कवी कल्पनांना प्रणय गीतांचे धुमारे फुटतात. चाफा फुलतो आणि बोल घुमतात,
” हे विश्वाचे आंगण, आम्हा दिले आहे आंदण
उणे करु आपण दोघेजण रे..”
साऱ्या सृष्टीतच या शृंगार रसाची झलक जाणवत असते. निर्मितीच्या, सर्जनशीलतेच्या भावनांना हळुवारपणे गोंजारणारा हा चैत्र महिना, राधा कृष्णाच्या प्रीतीत रमणारा हा चैत्र महिना, कुणाच्या कवितेत असाही फुलतो..
सिंगार सिसकता रहा
बिलखता रहा हिया
दुहराता रहा गगन से चातक
पिया पिया …
किंवा,
ऋतू वसंत से हो गया कैसा ये अनुराग
काली कोयल गा रही
भांति भांति के राग…
तर असा हा नवीनतेचा, प्रेमाचा, उत्पत्तीचा, चैतन्याचा संदेश घेऊन येणारा, सुगंधाचा दरवळ पसरवणारा, हसरा बागडणारा, धुंद करणारा चैत्र मास …किती त्यास वर्णावे?
☆ “- १० मार्च — सावित्रीआई फुले यांची पुण्यतिथी -” – लेखक : श्री राजेश खवले ☆ प्रस्तुती – सुश्री वीणा छापखाने ☆
१० मार्च ! सावित्रीआई फुले यांची पुण्यतिथी! नुकतीच कोरोनाची लाट येऊन गेली. रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी अनेक डॉक्टर, नर्सेस आणि इतर विभागातील कर्मचाऱ्यांनी आपले प्राण पणाला लावून कर्तव्य बजावले. अनेकांनी तर आपले प्राणही गमावले ! त्यांच्या कार्याला शतशः प्रणाम! त्यांचे हे काम सावित्रीआई फुले यांनी 1896-97 साली पुण्यात प्लेगच्या साथीत केलेल्या कामाची आठवण करून देणारे आहे. आज सावित्रीआई यांची पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने त्यांचे या क्षेत्रातील कार्य जाणून घेणे औचित्यपूर्ण आहे.
१८९६ मध्ये भारतात आलेला प्लेग हा Bubonic प्लेग होता. चीनच्या पश्चिम यूनान या प्रांतात 1850 साली या प्लेगचा रुग्ण पहिल्यांदा आढळला. चीन ते हॉंगकॉंग आणि तेथून भारत असा या रोगाचा प्रसार झाला. येर्सिनिया पेस्टीस या जिवाणूमुळे हा रोग होत असे. उंदीर किंवा तत्सम प्राण्यांच्या अंगावर वावरणारे पिसू हे या जीवाणूचे वाहक होते. १८९६ साली या प्लेगची भारतात सुरुवात झाली. पहिला रुग्ण मुंबईमध्ये आढळून आला. लवकरच बंगाल, पंजाब, द युनायटेड प्रोविन्स आणि नंतर ब्रह्म देशातही या प्लेगने धुमाकूळ घातला. केवळ एका महिन्यात पुण्याची 0.६ टक्के जनता प्लेगने बळी गेली होती. पुण्यातील जवळजवळ अर्ध्या लोकांनी गाव सोडले होते. दिवसाला तीनशे ते चारशे लोक प्लेगने मरत असत. काही वर्षातच लाखो लोक या प्लेगच्या आजाराला बळी पडले. सरकारने या आजाराला प्रतिबंध घालण्यासाठी ‘ The Epidemic Diseases Act 1897 ‘ पारित केला.
प्रा. ना. ग. पवार सांगतात- १८९७ सालच्या सुरुवातीपासून पुणे व पुण्याच्या ग्रामीण भागात प्लेगने थैमान घातले होते. यशवंत फुले यावेळी अहमदनगरला होते. त्यांना सावित्रीबाईने बोलावून घेतले. वानवडी व घोरपडी यांच्यामध्ये असलेल्या ग्यानोबा ससाने यांच्या माळरानावर आपल्या नोकरीतून सुट्टी काढून आलेल्या डॉक्टर यशवंतने खाजगी इस्पितळाची सेवा उपलब्ध करून दिली.
ग्यानोबा कृष्णाजी ससाणे सांगतात, तात्यासाहेब (म्हणजे महात्मा फुले) सन १८९० साली वारले. तात्या नंतर यशवंतराव डॉक्टरकीची परीक्षा पास झाले व फौजेत नोकर राहिले. यशवंतरावाने १८९३ साली डॉक्टरकीचे शिक्षण पूर्ण केले होते. डॉ. यशवंत यांना डॉक्टर विश्राम रामजी घोले यांचे मार्गदर्शन लाभले होते. विश्राम रामजी घोले हे १८९३ साली व्हाईसरायचे असिस्टंट जनरल सर्जन होते. महात्मा फुले यांना अर्धांगवायूचा आजार झाल्यानंतर त्यांच्यावर उपचार डॉक्टर घोले यांनीच केले होते. वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर डॉक्टर यशवंत यांनी सैन्यात नोकरी पत्करली होती.दक्षिण आफ्रिकेतून सुट्टी घेऊन ते आले होते.
प्रा. ना.ग. पवार सांगतात, सावित्रीबाईंजवळ पैशाची कमतरता असूनही त्यांनी इतरांच्या आर्थिक मदतीने रुग्णांची यथाशक्ती सेवा केली. प्लेगचा उद्भव झाला आहे किंवा होणार आहे असा संशयाने सुद्धा गोरे सोल्जर्स घराघरात घुसून रुग्णांना बाहेर काढत व धाक दाखवीत. ते सावित्रीबाईंना पाहवले नाही.
मुंढवे या खेडेगावात मागासवर्गीयांची वस्ती होती. झोपडीवजा घरात अस्वच्छता ही भरपूर! तेथे या प्लेगचा अधिक जोर होता. या सर्व भागात सावित्रीबाई जातीने फिरू लागल्या. सत्यशोधक समाजाच्या कार्यकर्त्यांनी सावित्रीबाईंना बरीच साथ दिली. सत्यशोधक समाजाचे एक पुढारी नारायण मेघाजी लोखंडे यांची सावित्रीआईंना विशेष साथ लाभली होती.
प्रा. हरी नरके सांगतात, इतक्यात मुंबईत कामगार नेते आणि भारतीय कामगार चळवळीचे जनक रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे हे प्लेगने आजारी असलेल्या कामगारांवर रुग्णांवर उपचार करताना गेल्याची बातमी आली. सावित्रीबाईंना शोक अनावर झाला. जवळचा खंदा कार्यकर्ता गेला पण त्या रडत बसल्या नाहीत. उठल्या नी पुन्हा कामाला लागल्या. यावेळी पुणे शहरातले बहुतेक सगळे पुढारी जिवाच्या भीतीने गावोगावी पांगले होते. प्रा. पवार सांगतात, तीन-चार महिने प्लेगचा फारच जोर होता. माणसे पटापट मरू लागली. औषधोपचार नीट होणे कठीण व शासकीय सेवाही तुटपुंजी अशा अवस्थेत सावित्रीबाईंनी स्वतःचे प्राण पणास लावून प्लेगच्या साथीत दिवस-रात्र एक करून मदत कार्य केले.
प्रा. हरी नरके सांगतात, सावित्रीबाई स्वतः आजारी माणसांना उचलून दवाखान्यात आणीत. त्यांच्यावर उपचार करीत. हा रोग संसर्गजन्य आहे हे माहीत असूनही त्या रुग्णांची सेवाशुश्रूषा करीत होत्या. मुढंवा गावच्या गावकुसाबाहेर पांडुरंग बाबाजी गायकवाड या मुलाला प्लेगची लागण झाल्याचे कळताच सावित्रीबाई तिकडे धावल्या. मुलाला पाठीवर घेऊन धावत पळत त्या दवाखान्यात पोहोचल्या. त्यातच सावित्रीबाईंना प्लेगची बाधा झाली, आणि दहा मार्च १८९७ रोजी रात्री नऊ वाजता त्यांचे प्लेगमुळे निधन झाले. त्यांच्या मृत्यूची बातमी दिन बंधने शोकाकुल होऊन दिली.
खरे पाहिले तर यावेळी सावित्रीबाईंचे वय हे जवळजवळ ६७ वर्ष होते. म्हणजे त्या सदुसष्ट वर्षाच्या आजीबाई झाल्या होत्या. परंतु समाजकार्य करण्याची उर्मी त्यांच्या अंगामध्ये अगदी ठासून भरलेली होती. मुंढवा ते हडपसरचा ससाणे मळा हे अंतर सुमारे आज सात ते आठ किलोमीटर होते. यावेळी तो पांडुरंग नावाचा मुलगा सुमारे दहा- अकरा वर्षाचा होता. सावित्रीआईंनी त्याला चादरी मध्ये गुंडाळून आपल्या पाठीवर घेतले आणि हा सात ते आठ किलोमीटरचा प्रवास चालत पूर्ण केला. मुलाला
दवाखान्यामध्ये पोहोचविले. डॉक्टर यशवंत यांनी त्या मुलावर उपचार केले आणि तो मुलगा वाचला सुद्धा!
सावित्रीआईंच्या मृत्युनंतर यशवंतराव पुन्हा सैन्यात गेले. १८९८-९९ मध्ये ते अफगाणिस्तानात क्वेटा येथे लढाईवर गेले होते. अफगाणिस्तानात दोन वर्ष होते. १९०१ साली ते चीनमध्ये लढाईवर गेले होते. ते नंबर १२८ पायनर पलटणीवर डॉक्टर होते. १९०५ साली अहमदनगर मध्ये पुन्हा प्लेगची साथ आली. यशवंतराव प्लेगच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी अहमदनगरला गेले. रुग्णांवर उपचार करताना त्यांनादेखील प्लेग झाला. १३ ऑक्टोंबर १९०५ रोजी त्यांचा प्लेगने मृत्यू झाला.
दहा मार्च ! आजच्याच दिवशी रुग्णांची सेवा करताना सावित्रीआईंनी त्यांचे प्राण गमावले. रुग्णांच्या सेवेकरिता आपले प्राण पणाला लावणाऱ्या सावित्रीआई फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त्याने त्यांना विनम्र अभिवादन.
लेखक : श्री राजेश खवले
संग्राहिका : सुश्री वीणा छापखाने
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “या हृदयीचे त्या हृदयी” ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
चष्मा साफ करता करता एक वयस्कर काका आपल्या बायकोला म्हणाले : अगं,आपल्या जमान्यात मोबाइल नव्हते.
काकू : हो ना ! पण बरोबर 5 वाजून 55 मिनिटांनी मी पाण्याचा ग्लास घेवून दरवाजात यायची आणि तुम्ही पोहचायचे.
काका : मी तीस वर्षे नोकरी केली पण मला आजपर्यंत हे समजलं नाही की, मी यायचो त्यामुळे तू पाणी आणायचीस की तू पाणी आणायचीस, त्यामुळे मी लवकर यायचो.
काकू : हो. आणि अजून एक आठवतं की तुम्ही रिटायर व्हायच्या आधी तुम्हाला डायबीटीस नव्हता व मी तुमची आवडती खीर बनवायचे, तेव्हा तुम्ही म्हणायचे की, आज दुपारीच वाटलं होतं की आज खीर खायला मिळाली, तर काय मजा येईल.
काका : हो ना .. अगदी. ऑफिसमधनं निघताना मी जोही विचार करायचो घरी आल्यावर बघतो, तर तू तेच बनवलेलं असायचं.
काकू : आणि तुम्हाला आठवतं ? पहिल्या डिलीव्हरीच्या वेळी मी माहेरी गेले होते, तेव्हा मला कळा सुरू झाल्या होत्या. मला वाटलं, हे जर माझ्याजवळ असते तर ? आणि काय आश्चर्य, तासाभरात तर स्वप्नवत तुम्ही माझ्या जवळ होतात.
काका : हो. त्या दिवशी मनात विचार आला होता, की तुला जाऊन जरा बघूयात.
काकू : आणि तुम्ही माझ्या डोळ्यात डोळे घालून कवितेच्या दोन ओळी बोलायचे.
काका : हो आणि तू लाजून पापण्या मिटवायचीस व मी त्या कवितेला तुझा ‘लाइक’ मिळाला असं समजायचो.
बायको : एकदा दुपारी चहा करताना मला भाजलं होतं. त्याच दिवशी सायंकाळी तुम्ही बर्नोलची ट्यूब अापल्या खिशातनं काढून बोललात,’ही कपाटात ठेव’.
काका : हो..आदल्या दिवशीच मी बघितलं होतं की ट्यूब संपलीय. काय सांगता येतं, कधी गरज पडेल ते? हा विचार करून मी ट्यूब आणली होती.
काकू : तुम्ही म्हणायचे की आज ऑफिस संपल्यावर तू तिथंच ये. सिनेमा बघूयात आणि जेवण पण बाहेरच करूयात.
काका : आणि जेव्हा तू यायचीस तर मी जो विचार केलेला असायचा तू अगदी तीच साडी नेसून यायचीस.
काका काकूजवळ जावून तिचा हात हातात घेत बोलले : हो, आपल्या जमान्यात मोबाइल नव्हते पण आपण कनेक्टेड होतो.
काकू : आज मुलगा आणि सून सोबत तर असतात,पण गप्पा नाही, तर व्हाट्सएप असतं. आपुलकी नाही, तर टॅग असतं. केमिस्ट्री नव्हे, तर कॉमेंट असते. लव्ह नाही, तर लाइक असते. गोड थट्टामस्करीच्या ऐवजी अनफ़्रेन्ड असतं. त्यांना मुलं नकोत, तर कैन्डीक्रश सागा, टेम्पल रन आणि सबवे सर्फर्स पाहिजे.
काका : जाऊ दे गं! सोड हे सगळं. आपण आता व्हायब्रेट मोडवर आहोत. आपल्या बॅटरीची पण 1 च लाइन उरली आहे.
अरे ! कुठं चाललीस ?
काकू : चहा बनवायला.
काका : अरे… मी म्हणणारच होतो की चहा बनव म्हणून.
बायको : माहिती आहे. मी अजूनही कवरेज क्षेत्रात आहे आणि मेसेजेस पण येतात.
दोघेही हसायला लागले.
काका : बरं झालं,आपल्या जमान्यात मोबाइल नव्हते.
मित्रांनो !
खरंच आतापर्यंत बरंच काही निसटून गेलंय व बरंच काही निसटून जाईल.
बहुतेक आपली ही शेवटची पिढी असेल की जिला प्रेम, स्नेह, आपलेपणा ,सदाचार आणि सन्मानाचा प्रसाद वर्तमानपिढीला वाटावा लागेल. गरजेचं पण आहे.
लेखक : अज्ञात
संग्राहिका : सौ उज्ज्वला केळकर
176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ मी प्रवासिनी क्रमांक 33 – भाग- 2 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆
✈️ सुंदर, शालीन आणि अभिमानी जपान ✈️
क्योटो इथे एक बौद्ध मंदिर पाहिले. जगातले सगळ्यात मोठे लाकडी बांधकाम असे त्याचे वर्णन केले जाते. बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी सहाव्या शतकात तिथे भारतातून नागार्जुन आणि वसुबंधू नावाचे बौद्ध भिक्षू आले होते, असे तिथे लिहिले होते. नंतर बुद्धाचे १००० सोनेरी पुतळे असलेले व मधोमध भगवान बुद्धाची शांत भव्य मूर्ती असलेले देऊळ पाहिले. त्या मूर्तीपुढील पुतळ्यांची नावे इंद्र, गंधर्व, नारायण, विष्णू, लक्ष्मी अशी आहेत पण त्यांचे चेहरे विचित्र दिसतात. एका पॅगोडामध्ये छताला भव्य सोनेरी कमळांची नक्षी आहे. पाऊस सुरू झाल्याने उरलेले क्योटो दुसऱ्या दिवशी बघण्याचे ठरले.
क्योटो रेल्वे स्टेशनवर जायला म्हणून एका बसमध्ये चढलो. पण सकाळी जिथे उतरलो होतो ते स्टेशन कुठे दिसेना. कसे दिसणार? कारण आम्ही अगदी विरुद्ध दिशेच्या बसमध्ये बसलो होतो. आमची काहीतरी गडबड झाली आहे हे आजूबाजूच्या जपानी लोकांच्या लक्षात आले पण भाषेची फार अडचण! अगदी थोड्या जणांनाच इंग्रजी समजते. पण तत्परतेने मदत करण्याची वृत्ती दिसली. एका जपानी माणसाला थोडेफार समजले की आम्हाला क्योटो स्टेशनवर जायचे आहे. बस, डेपोमध्ये गेल्यावर त्याने खाणाखुणा करून सांगितल्याप्रमाणे आम्ही धावत पळत त्याच्या मागे गेलो. त्याने आम्हाला योग्य बसमध्ये बसवून दिले.
दुसऱ्या दिवशी क्योटोला जाऊन गोल्डन टेम्पलला गेलो. एका तळ्याच्या मध्यावर संपूर्ण सोन्याच्या पत्र्याने मढविलेला पॅगोडा आहे. सभोवतालच्या तळ्यात त्याचे सोनेरी प्रतिबिंब चमकत होते. चारी बाजूंनी झाडीने वेढलेल्या पर्वतराजीत राजघराण्याचे हे देऊळ आहे .नंतर जवळच असलेल्या सिल्व्हर टेम्पलला गेलो. असंख्य फुलझाडांच्या आणि शिस्तीने राखलेल्या झाडांमध्ये हे देऊळ आहे .डोंगरातून वरपर्यंत जाण्यासाठी वृक्षराजींनी वेढलेल्या पाऊलवाटा आहेत. स्वच्छ झऱ्यांमधून सोनेरी, पांढरे ,तांबूस रंगांचे मासे सुळकन इकडे तिकडे पळत होते.
जेवण आटोपून नारा इथे जाण्यासाठी छोट्या रेल्वे गाडीत बसलो. स्वच्छ काचांची छोटी, सुबक गाडी छोट्या छोट्या गावांमधून चालली होती. हिरवी, पोपटी डोलणारी शेती, आखीवरेखीव भाजीचे मळे, त्यात मन लावून कामं करणारी माणसं, टुमदार घरं, घरापुढे छान छान मोटारगाड्या, रंगसंगती साधून जोपासलेला बगीचा असे चित्रातल्यासारखे दृश्य होते. नारा येथील हरीण पार्क विशेष आकर्षक नव्हते. जवळच असलेल्या लाकडी, भव्य तोडाजी टेम्पलमध्ये ७० फूट उंचीची भगवान बुद्धाची दगडी मूर्ती आहे. या मूर्तीच्या दोन्ही बाजूला तशाच भव्य पंचधातूच्या, पण सोनेरी मुलामा दिलेल्या बुद्धमूर्ती आहेत.देवळाचे प्रचंड लाकडी खांब दोन कवेत न मावणारे आहेत . जुन्या पद्धतीची जपानी बाग पाहिली. झुळझुळणाऱ्या झऱ्याच्या मध्यावर अगदी आपल्या कोकणातल्यासारखा लाकडी रहाट फिरत होता. पूर्वी ही रहाटाची शक्ती वापरून धान्य दळण्यासाठी त्याचा उपयोग करीत असत. बागेमध्ये अनंत व जास्वंदीची झाडे सुद्धा होती.
आज मियाजिमा व हिरोशिमा इथे जायचे होते. शिनकानसेनने म्हणजेच बुलेट ट्रेनने हिरोशिमा इथे उतरून मियाजिमा इथे गेलो. तिथून छोट्या बोटीने जाऊन पाण्यावर तरंगणारा पाच मजली शिंटो पॅलेस पाहिला.हे छोटेसे बेट पर्वतराजींनी वेढलेले आहे. त्यावरील घनदाट वृक्ष फॉल सीझनच्या रंगाने सजू लागले होते.
क्रूझने परत मिआजिमा स्टेशनला येऊन जपान रेल्वेने हिरोशिमाला आलो. जगातला पहिला अणुबॉम्ब जिथे टाकला गेला ते ठिकाण! मानवी क्रौर्याचे अस्वस्थ करणारे स्मारक! अगदी खरं सांगायचं तर तेथील म्युझियम, तिथे दाखवत असलेला माहितीपट आम्ही फार वेळ बघू शकलो नाही. लोकांचे आक्रंदन, जळणारे देह, कोसळणाऱ्या इमारती यातील काहीही फार वेळ बघवत नाही. मानवतेवर कलंक लावणारे असे ते विदारक चित्र पाहून डोळ्यातून अश्रूधारा वाहू लागतात. मनुष्य इतका क्रूर बनू शकतो यावर विश्वास ठेवणं कठीण जातं. तिथल्या लहान मुलांच्या स्मारकाजवळ काचेच्या मोठ्या चौकोनी पेट्या ठेवल्या होत्या. अणुबॉम्बला विरोध आणि जागतिक शांततेला पाठिंबा दर्शविण्यासाठी आपण तिथे ठेवलेल्या पांढऱ्याशुभ्र कागदांचे पक्षांचे आकार करून त्या पेट्यांमध्ये टाकायचे. आम्हीही तिथे नाव पत्ता लिहून आमचा शांततेला पाठिंबा दर्शवीत कागदाचे काही क्रेन्स करून त्या काचेच्या पेटीत टाकले. तत्परता म्हणजे एवढी, की आम्ही जपानहून परत येण्याच्या आधीच आम्ही शांततेला पाठिंबा दर्शविल्याबद्दल हिरोशिमाच्या मेयरचे आभारदर्शक पत्र घरी येऊन पडले होते.
आज हिमेजी कॅसल बघायला जायचे होते. कोबेच्या सान्योमिया स्टेशनवरून हिमेजीला जाताना अकाशी येथील सस्पेन्शन ब्रिज पहिला.अमेरिकेतील सॅनफ्रान्सिसकोच्या गोल्डन ब्रीजपेक्षासुद्धा हा ब्रीज लांबीने जास्त आहे. हिमेजी स्टेशनला उतरून तिथला भव्य, संपूर्ण लाकडी राजवाडा बघायला गेलो. त्याच्या बाहेरील प्रांगणात बोन्सायचे आणि सुंदर फुलांचे मोठे प्रदर्शन भरले होते. मोठ्या वृक्षांची हुबेहूब छोटी प्रतिकृती करण्याची ही जपानी कला! अगदी छोट्या, सुंदर आकारांच्या कुंड्यांमधून वाढवलेले छोटे वृक्ष, त्यांना आलेली छोटी फळं, छोटी जंगलं, दगडातील डोंगरातून वाहणारे झरे सारे पाहात रहावे असे होते. डेलिया, जरबेरा, सूर्यफुलांचे विविधरंगी ताटवे होते.
आज सकाळी कोबेमध्येच घराजवळील रोपवे स्टेशनला जायचे होते. आम्ही राहात होतो, तिथून दहा मिनिटांच्या अंतरावर ओरिएंटल हॉटेल नावाची भव्य वास्तू होती. हॉटेलमधल्याच रस्त्याने बुलेट ट्रेनच्या शिनकोबे स्टेशनला जाण्याचा मार्ग होता. हॉटेलच्या लॉबीमध्ये दोन्ही बाजूला फर्निचर, कपडे, खेळण्यांची आकर्षक दुकाने होती. शिनकोबे क्लब होता. लहान मुलांना खेळायची जागा होती. छोटे पब, रेस्टॉरंट होते. जमिनीखालील दोन मजल्यांवर ग्रोसरी व फळे फुले यांची दुकाने होती. तिथून भुयारी रेल्वेच्या स्टेशनला जाता येत होते आणि आमचा रोपवेला जाण्याचा मार्ग हॉटेलच्या रस्त्यामधून एका बाजूला होता. एखाद्या जागेचा जास्तीत जास्त, अत्यंत सोयीस्कर व नेटका उपयोग कसा करून घ्यायचा याचे हे एक उत्तम उदाहरण वाटले.
रोपवेने डोंगरमाथ्यावर गेलो.फुजिसान म्हणजे फुजियामा पर्वत सोडला तर इथे कुठचाही डोंगर उघडा- बोडका नाहीच. वृक्षांची लागवड करून, ते जोपासून सारे हिरवे राखले आहे. डोंगर माथ्यावरील हर्ब पार्कमध्ये औषधी वनस्पती, भाज्या वाढविल्या आहेत. त्यात गवती चहा, पुदिना, तुळस, माका, ब्राह्मी, आले, मिरी वगैरे झाडे जोपासली होती. मोठ्या काचगृहातून केळीची लागवड केली होती. कारंजी ,झरे ,फुलांचे गालिचे होते. डोंगर माथ्यावरून साऱ्या कोबे शहराचा नजारा दिसत होता.
(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही गंभीर लेखन। शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं। हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। )
संजय दृष्टि – विश्व कविता दिवस विशेष – शिलालेख
आज वैश्विक कविता दिवस है। यह बात अलग है कि स्वतः संभूत का कोई समय ही निश्चित नहीं होता तो दिन कैसे होगा? तब भी तथ्य है कि आज यूनेस्को द्वारा मान्य अधिकृत विश्व कविता दिवस है।
बीते कल गौरैया दिवस था, आते कल जल दिवस होगा। लुप्त होते आकाशी और घटते जीवनदानी के बीच टिकी कविता की सनातन बानी। जीवन का सत्य है कि पंछी कितना ही ऊँचा उड़ ले, पानी पीने के लिए उसे धरती पर उतरना ही पड़ता है। आदमी तकनीक, विज्ञान, आर्टिफिशियल इंटेलिजेंस के क्षेत्र में कितना ही आगे चला जाए, मनुष्यता बचाये रखने के लिए उसे लौटना पड़ता है बार-बार कविता की शरण में।
इसी संदर्भ में कविता की शाश्वत यात्रा का एक चित्र प्रस्तुत है।
अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार ☆सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय ☆संपादक– हम लोग ☆पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆ ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆
मर्यादापुरुषोत्तम श्रीराम को समर्पित आपदां अपहर्तारं साधना गुरुवार दि. 9 मार्च से श्रीरामनवमी अर्थात 30 मार्च तक चलेगी।
💥 इसमें श्रीरामरक्षास्तोत्रम् का पाठ होगा, साथ ही गोस्वामी तुलसीदास जी रचित श्रीराम स्तुति भी। आत्म-परिष्कार और ध्यानसाधना तो साथ चलेंगी ही।💥
अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं।
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈
संस्कारधानी के सुप्रसिद्ध एवं सजग अग्रज साहित्यकार श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज” जी के साप्ताहिक स्तम्भ “मनोज साहित्य” में आज प्रस्तुत है “मनोज के दोहे…”। आप प्रत्येक मंगलवार को आपकी भावप्रवण रचनाएँ आत्मसात कर सकेंगे।