वैद्यकीय व्यवसायातील योगदानातील कामगिरीमुळे आदर व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी (भारतात) 1991 पासून 1 जुलै हा दिवस डॉक्टर्स डे म्हणून साजरा करण्यात येतो. प. बंगालचे दुसरे मुख्यमंत्री डॉ. बिधनचंद्र रॉय यांनी वैद्यकीय व्यवसायात केलेल्या अद्वितीय व संस्मरणीय कामगिरीमुळे हा दिवस निवडण्यात आला.
त्यांचा जन्म 1 जुलै व देवाज्ञाही 1 जुलै रोजीच झाली हा मोठा विचित्र योगायोग.
सुमारे पन्नास साठ वर्षापूर्वीचे दिवस आठवले तर अस लक्षात येते की…..
“पडू आजारी मौज वाटे ही भारी”…..वाटत असे किंवा विषमज्वर झालेल्या मुलांच्या घरातील सारी मंडळी, रात्रीच्या रात्री जागून काढत असत.ताप उतरला की सर्वजण सुटकेचा निश्वास सोडत असत.
त्या साठी नवस, देवऋषी, मंत्र तंत्र, उतारा टाकणं सर्व कांही होत असे.
ही वस्तुस्थिती सर्व खेड्यांमधून असे.
काळ थोडा पुढे गेला.
खेड्यांमधून अधुन मधून डाॅक्टर येत असत पण सर्वांना डाक्टरांनी सुई टोचलीकी बरे वाटलच पाहिजे असा दृढ विश्वास असे.
तर सर्वसाधारणपणे डाक्टर त्यांचे साठी देव होते.
शहरात परिस्थिती थोडी निराळी होती.हंss चल जीभ दाखव ,पोट तपासून पाहतो व कांही नाही पळ; बरोबरच आतूनच कंपांउंडरला कांहीतरी सांगत.तत्परतेने औषधी पुड्या व बाटलीतून (डोसचे कागदी लेबल डकवलेल्या) गोड गुलाबी पातळ औषध दिवसातून अमूक वेळा घे म्हणून सांगत असत.पैसे लिहून ठेवले जात.
अर्थातच दुखणे कोठल्या कोठे पळून जाई. इथपर्यंत फॕमिली डाक्टरच सर्व आजारांवर औषध तर देत असतच पण घरगुती अडचणींवर सल्लाही देत असत.
नंतर नंतर नवीन स्पेशालीटी निर्माण होत गेल्या .निदानासाठी नवनव्या सोयी उपलब्ध होत गेल्या. औषध देण्याची पध्दत बदलली.वेळेवर झालेल्या निदान व औषधे या मुळे मानवी जीवन अधिक चांगले सुखकर होऊन आयुर्मान वाढले. परंतु उपचारही महाग होत गेले .त्या बरोबर फॕमिली डाक्टर्स ऐतिहासिक झाले.
रूग्ण व डाक्टर यांचा सुसंवाद होत राहीला पाहीजे.
एक जुलै डाक्टर दिना निमीत्त सर्व *डाकदर बाबूंना * हार्दिक शुभेच्छा
☆ पाठवणी… (भावानुवाद) – श्री मोहनलाल पटेल ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
‘ऐकलत? ही मूर्ख, पुन्हा परत आली.’ घराच्या परसातून सरला आपल्या पतीला म्हणाली.
एक उंची पुरी धिप्पाड म्हैस आवाराच्या छोट्याशा फाटकापुढे उभी होती. फाटक बंद होतं.
सोहनालालने ती मोतीरामला सहा हजाराला विकली होती. पण ती म्हैस या घराशी इतकी एकरूप झाली होती की आता दुसर्यां दा पळून आली होती.
रागारागाने सरला म्हणाली, ‘मी तिला आवारात घुसू देईन, तर ना! मी आत्ता तिला मोतीरामच्या घरी घेऊन जाते’ आणि सोहनालाल आवारात येताच ती म्हणाली,
‘यावेळी तिला असं पळवून लावा की ती आपल्या घराचा रस्ताच विसरली पाहिजे.’
‘असं कसं पळवून लावता येईल?’
‘मग… मग तर ती इथून जाणारच नाही.’
‘तू तिच्या डोळ्यात बघ. किती दयनीय दृष्टीने पाहते आहे. तिच्यासाठी तर हेच तिचं घर आहे. जन्मली, तेव्हापासून इथेच आहे. हे आवार , हे लिंबाचं झाड…’
काय बोलावं, हे सरलाला उमगत नव्हतं. ती काही वेळ म्हशीकडे बघत बसली आणि मग आवाराचं फाटक उघडलं.
म्हैस पळत आपल्या खुंटीपाशी जाऊन उभी राहिली. सोहनालालने तिच्या पाठीवर हात ठेवला मग म्हणाला, ‘बिचारी भुकेजलेली असेल.’
मोतीराम पुन्हा म्हशीला न्यायला आला, तेव्हा सरला आणि सोहनालाल यांनी एकमेकांकडे पाहिलं. सोहनालाल खोलीतून पैसे घेऊन आला आणि मोतीरामला म्हणाला, ‘हे तुझे पैसे. नीट मोजून घे.’
मोतीरामने पैसे घ्यायला प्रथम नकार दिला, तेव्हा सोहनालाल म्हणाला, ‘ती नाही राहणार तुझ्याकडे. जे झालं, ते झालं. म्हैस घरी आली, आमच्याही जिवाला शांती मिळतेय.’
थोडी बोलाचाली झाल्यानंतर मोतीराम पैसे घेऊन गेला. तो गेला आणि घरात एकदम शांतता पसरली.
सरला म्हशीच्या पाठीवरून हात फिरवू लागली. नंतर तिला पदराला डोळे पुसताना सोहनालालने पाहिले. त्याच्या मनात आलं, ‘केवळ म्हशीसाठीती असं करणार नाही. तिच्या मानात आणखी काही तरी आहे. हे सगळं मुलीसाठी तर नाही? ’
तो सरलाजवळ आला, आणि म्हणाला, ‘वेडी, जुन्या गोष्टी आठवून काय उपयोग? आपलंच नशीब फुटकं..’ आणि सरला मोठमोठ्याने रडू लागली. ‘एका जनावराचा विचार करतोय. तितका मुलीसाठी नाही केला. तीन वेळा ती घर सोडून आश्रयासाठी आली होती. पण आपण तिला भीती दाखवून, धमक्या देऊन परत पाठवलं.’
’ सासरचे लोक मारेकारी झाले. … तिच्या आत्म्याला काय वाटलं असेल?’
मारेकरी आपण आहोत सरला… ‘ सासर घर हेच तिचं घर म्हणत पुन्हा पन्हा तिची पाठवणी केली. तिला घरात घेतलं नाही….’
मग गप्प बसून दोघेही बराच वेळ म्हशीची पाठ कुरवाळत राहिले.
मूळ गुजराती कथा – ‘विदाई’ मूळ लेखक – श्री मोहनलाल पटेल
अनुवाद – श्रीमती उज्ज्वला केळकर
संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
ज्येष्ठ पती-पत्नींनो, तुम्ही एकमेकांना शेवटचा स्पर्श हल्ली कधी केला होता?…आठवते का.??
बर्याच वर्षांपूर्वी नसिरुद्दीन शहा आणि शबाना आजमी यांचा स्पर्श चित्रपट पाहिला होता. सई परांजपे त्याच्या दिग्दर्शिका..! अंधशाळेच्या प्रिन्सिपॉल सोबत झालेली भावनिक गुंतागुंत आणि त्यामुळे गवसलेले स्पर्शांचे विविध अर्थ आणि कंगोरे यांचे सुंदर मिश्रण होतं त्यात.. नसिरुद्दीन शहा यांनी उभा केलेला प्रिन्सिपल केवळ अप्रतिम.
शबाना आजमी प्रिन्सिपल सोबत आणि मुलांसोबत ओळख झाल्यानंतर साडी विकत घेताना डोळे मिटून त्या साडीचा “स्पर्श” हाताच्या बोटांनी अनुभवतात तो प्रसंग अजूनही डोळ्यांसमोर आहे..
हे सगळं आठवायला एक कारण घडलं. काल-परवा `आपलं माणूस ` हा सिनेमा पाहिला.. अप्रतिम..!
नाना आणि सुमीत राघवन.. त्यातल्या शेवटच्या एका प्रसंगात नाना सुमीतला बोलता-बोलता विचारतात, “आबांना, म्हणजे तुझ्या वडिलांना, या वर्ष-दोन वर्षांत कधी सिनेमाला घेऊन गेला होतास.? कधी आऊटिंगला ? बाहेर जेवायला.?”—- सुमीत गप्प…इथपर्यंत ठीक..
पण नंतर नाना सुमीतला विचारतात, “शेवटचं कधी शिवला होता रे म्हातार्याला?” — आणि अंगावर सरसरून काटा आला.. नाना पुढे म्हणतात —“ एका घरात राहून एकमेकांना आपण वर्षानुवर्षे “स्पर्श” करत नाही ही साधी गोष्ट नाही, हा तर पुढचा कहर..”
किती साधी गोष्ट.. एकमेकांना ‘स्पर्श’ करणं. एकमेकांशी बोलतो आपण, एकमेकांची काळजीही घेतो, पण खरंच स्पर्श टाळतो का?— आणि तो खरंच इतका महत्वाचा असतो ? आयुष्यात किती वेळा किती जणांना कसे-कसे स्पर्श करतो आपण ?
खरंतर त्वचा म्हणजे पंचेंद्रियांपैकी एक. स्पर्शाची जाणीव करून देणारी. पण हीच स्पर्शाची जाणीव वादळ होऊन अशी अंगावर येते..
लहानशी गोष्ट—स्पर्श… पण तिचं महाभारत होतं. मग कितीतरी स्पर्श आठवतात, आणि आठवत राहतात..
पायाला मुंग्या आल्यावर कधी अंगठ्याला ‘स्पर्श’ केलाय ?–आपलाच स्पर्श, पण किती अनोळखी वाटतो?
आणि मग असे कितीतरी स्पर्श आठवू लागतात..!
उन्हाने तापलेल्या रस्त्यांवरून अनवाणी चालण्याने भाजलेल्या तळपायांना झालेला थंडगार पाण्याचा स्पर्श..
दिवाळीत आंघोळी… आधी पाडव्याला आईने.., भाऊबीजेला बहिणीने अंगाला तेल लावताना, त्यांच्या तळव्यांचा स्पर्श—-तळवे सारखेच, पण कुठे आईची माया, कुठे बहिणीचा खट्याळपणा त्या स्पर्शांमधेे थांबलेला.
रूढी-परंपरा स्पर्शांशीच संबंधित —–
ओवाळताना सुवासिनीच्या अंगठ्याचा कपाळाला होणारा स्पर्श.,
स्पर्श लाजरे असतात, बुजरेअसतात.. मायने ओथंबलेले असतात. कधी कधी धीट, तर कधी आक्रमक असतात — पण ते बोलतात—
पायावर डोकं ठेवताना कपाळाला होणारा पायांच्या बोटांचा स्पर्श आश्वासक भासतो…
आजीने मायेने तोंडावरून फिरवलेला थरथरता वृध्द हात, त्यावेळी नकोसा वाटला तरी, आता सतत भास होऊन गालांवरून फिरत असतो..
स्पर्श रेशमी असतात—जाडेभरडे असतात— पण आपल्या सगळ्या जीवनाला अर्थ देणारे असतात..
आज माझी आई सत्तरीच्या पुढे आहे. कधी-कधी तिच्या मांडीवर डोकं ठेवून लोळत मी टिव्ही पाहतो. ती पण माझ्या नसलेल्या केसांवरून हात फिरवत म्हणते–“रोड झालास रे”. ती स्पर्शांची गुंतावळ दहा-पंधरा मिनिटांत
कितीतरी देवाण-घेवाण करते..
स्पर्शांना धर्म, जात, देश कसलेच बंधन नसते.. ईदच्या दिवशी एकमेकांना आलिंगन देऊन मुबारक बात दिली जाते, तशीच दसर्याला सुद्धा गळाभेट असतेच की. पाश्चात्य संस्कृतीमध्ये शेकहँड करतात. फ्रेंच लोक गालाला गाल लावतात. ही परिचयाची, भेटीची पद्धत. इथेही स्पर्श महत्त्वाचा..
का असेल स्पर्श महत्त्वाचा?—
मला वाटतं इतर ज्ञानेंद्रिय खोटं बोलू शकतात पण स्पर्श फक्त खरं बोलतात.. आणि हे प्रत्येक संस्कृतीला माहिती असतं..
मानवी जीवनाची अथांग गाथा अशीच स्पर्शांनी मोहरलेली आहे.
आणि तेच स्पर्श उतारवयात मिळेनासे झाले तर ..?
म्हणूनच नानांच्या प्रश्नाने अंगावर काटा येतो. “ शेवटचं कधी शिवला होतास रे म्हातार्याला? ”
लक्षातच येत नाही आपल्या —हजारो शब्दांचं, शेकडो औषधांचं काम एखाद्या स्पर्शानं होऊन जातं. माणसं थकतात म्हणून स्पर्श नाही ना थकत.. ती आपली गोष्ट सांगत राहतात . कुठे तरी, कोणाचे तरी, हात ताटकळतात..
डोक्यावरून फिरण्यासाठी. कुणाचेतरी तळवे कोमेजून जातात – तोंडावरून, पाठीवरून न फिरल्यामुळे..
“आता फार काही बोललास तर तोंडाला फेफर येई पर्यंत हा पेपरवेट फेकून मारिन मोऱ्या तुला !”
“हे बरं आहे पंत, आपणच प्रश्न विचारायचा आणि मी उत्तर द्यायला लागलो की….”
“अरे गाढवा तुझा पत्ता काय म्हणजे इतके दिवस कुठे गायब झाला होतास ? असं विचारतोय मी !”
“अस्स होय ! पंत तुम्हीं सुचवलेले अनेक व्यवसाय आता नावा रुपाला आले आहेत आणि ते सांभाळता सांभाळता दिवसाचे २४ तास पुरत नाहीत मला !”
“मग आज कसा काय वेळ मिळाला ?”
“पंत, चांगली पावसाळी हवा आहे, हवेत छान गारवा आहे, अशा वेळेस काकुंच्या हातचा आल्याचा गरमा गरम चहा मिळाला तर मग काय, सोनेपे सुहागा ! म्हणून आलो !”
“मोऱ्या उगाच चहाला जाऊन कप लपवू नकोस !”
“म्हणजे ?”
“म्हणजे आता इतक्या दिवसांनी आला आहेस मोऱ्या, तर तुला चहा मिळणारच आहे, पण मी तुझ्या बारशाच्या घुगऱ्या खाल्ल्या आहेत हे विसरू नकोस ! त्यामुळे पटकन काय ते खरं कारण सांग, म्हणजे हिला सांगून तुझ्या नरड्यात चहा ओतलाच म्हणून समज !”
“पंत तुम्ही खरंच मनकवडे आहात अगदी !”
“आता मला जास्त मस्का न लावता चटचट बोललास तरच तुला लवकर चहा मिळेल मोऱ्या, नाहीतर माझं मन वाकड झालं तर चहाच काय, साध पाणी सुद्धा मिळणार नाही तुला लक्षात ठेवं !”
“सांगतो, सांगतो पंत ! आता पावसाळा जवळ येवून ठेपलाय दारात हे तर तुम्हांला माहित आहेच !”
“बरं मग ?”
“तर पंत या पावसाळ्यात एखादा नवीन उद्योग सुरु करावा असं मनांत आलं आणि म्हणून तुमच्या सुपीक डोक्यात एखादी नवीन आयडिया आली असेल आणि ती जर कळली तर…..”
“अब आया उंट पहाडके नीचे !”
“म्हणजे मी उंट ?”
“नाही रे, तू तर पहाड !”
“मग उंट कोण ?”
“तो तिकडे अरबस्तानात !”
“पण त्याचा इथे काय संबंध पंत ?”
“खरंच कठीण आहे तुमच्या हल्लीच्या पिढीच मोऱ्या !”
“म्हणजे ? मी नाही समजलो पंत!”
“ते सोडून दे मोऱ्या, आता तू तुझ्या येण्याचं खरं खरं कारण सांगितलं आहेस तर मी तुला एक धंद्याची नवीन आयडिया, जी आजच माझ्या सुपीक डोक्यात आली आहे ती सांगतो तुला !”
“म्हणजे तुमच्या डोक्यात ऑलरेडी नवीन आयडिया आलेली आहे ?”
“अरे उंटा…..”
“पण पंत तो तर अरबस्तानात असतो ना ?”
“अरे हॊ खरंच की !”
“मग !”
“सॉरी, सॉरी मोरू ! माझ्या गाढवा, हे कसं वाटतंय ?”
“हां, आता कसं बरं वाटलं कानाला पंत !”
“मला पण बरं वाटलं मोऱ्या ! तर काय सांगत होतो… हां उंट या प्राण्याला वाळवंटातल जहाज म्हणतात हे तुला ठाऊक असेलच !”
“हॊ पंत, शाळेत असतांना शिकलोय!”
“नशीब त्या उंटाच !”
“काय ?”
“काही नाही रे गधडया ! तर तू म्हणतोयस ते बरोबरच आहे, पावसाळा अगदी सुरू झाला आहे आणि तशातच पेपर मधल्या आणि न्यूज चॅनेलच्या बातम्या वाचून आणि ऐकून मला या नवीन उद्योगाची आयडिया सुचली बघ !”
“कुठल्या बातम्या पंत ?”
“मोऱ्या या पावसाळ्यात सुद्धा दरवर्षी प्रमाणे रस्त्यांच्या नद्या होणार आहेत आणि आपले मुंबई बेट दरवर्षी 2 सेंटीमीटर या वेगाने पुढच्या अनेक वर्षात समुद्रात बुडणार आहे !”
“काय सांगता काय पंत ? हे खरं आहे ?”
“पेपरवाले तरी असं ओरडून ओरडून सांगतायत आणि सगळे न्यूज चॅनेल पण त्यांचीच री ओढतायत !”
“मग अशा येवू घातलेल्या आपत्तीत, कुठला नवीन उद्योग करून मी माझ्या संपत्तीत भर घालावी असं वाटतंय तुम्हांला पंत ?”
“अरे व्वा मोऱ्या, अगदी अलंकारिक बोलायला लागलास की !”
“कसचं कसचं पंत, तुमच्या सहवासात राहून थोडं थोडं शिकलोय झालं ! बरं पण तुम्ही धंद्याची नवीन आयडिया सांगणार होतात ती तर सांगा आधी !”
“मोऱ्या या पावसाळ्यात तू लोकांना छत्र्यांचे मोफत वाटप करावेसे असं मला वाटतं !”
“पंत, आत्ताच मी कुठला नवीन धंदा करून माझ्या संपत्तीत भर घालावी असं म्हटलं आणि तुम्ही मला छत्र्या मोफत वाटायला सांगताय ?”
“अरे माझं नीट ऐकून तर घे !”
“बरं पंत, बोला !”
“अरे मी मगाशी तुला म्हटलं ना, या पावसाळ्यात पण मुंबईच्या रस्त्यांच्या नद्या होणार आहेत म्हणून!”
“हॊ, पण हल्ली गेला बाजार प्रत्येकाकडे छत्री असतेच असते आणि नसेल तर रेनकोट तरी असतोच असतो !”
“ते माहित आहे रे मला, पण रस्त्याची नदी झाल्यावर या दोघांचा काही उपयोग आहे का सांग बरं मला मोऱ्या !”
“नाही, पुरुषभर पाण्यात तसा या दोघांचा काडीचा उपयोग नाही हे तुमचं म्हणणं खरं आहे पंत ! “
“हॊ ना, म्हणून तू आता पोहतांना शिकावू स्विमर जसे प्लास्टिकचा हवा भरलेला फ्लोट वापरतात त्याचा बिझनेस सुरु कर आणि एका फ्लोटवर एक छत्री मोफत दे, म्हणजे जोराचा पाऊस असेल तेव्हा लोकं छत्री वापरतील आणि…. “
“रस्त्यांच्या नद्या झाल्या तर फ्लोट वापरून लोकं आपला जीव वाचवतील, हॊ ना पंत ?”